वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मलेरियाचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणे असून त्यासोबत इतर अनेक लक्षणे रुग्णात आढळतात , जी रोगाचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात . बरेच वेळा रोगाची सुरवात सामान्यपणे आढळणारा फ्लू अथवा Viral Fever असावा त्याप्रमाणेच होते . डोके दुखणे , थकवा वाटणे , पोटात बारिकसे दुखणे , स्नायू व सांधे दुखणे , भूक मंदावणे व अन्नावरील वासना उडणे , उलट्या होणे आणि शरीर गलितगात्र होणे अशा प्रकारच्या लक्षणांनी सुरवात होते .
मलेरियाच्या तापामध्ये साधारणत : एक विशिष्ट पद्धत दिसून येते . अ ) अंगात कणकण वाटणे व अंग थंड पडणे - ही परिस्थिती २० मिनिटे ते १ तासापर्यंत टिकते ब ) नंतर प्रचंड हुडहुडी भरते जी दोन , तीन ब्लॅन्केटस् अंगावर घेऊनसुद्धा थांबत नाही . मलेरियामध्ये हुडहुडी हे फार महत्त्वाचे लक्षण आहे . यात थंडी भरून येताना रुग्णाची जी दमणूक होते तो अनुभव विलक्षण असतो . तो आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतो . या बरोबर ताप वाढत जाऊन अगदी १०४ ° ते १०५ ° पर्यंत चढू शकतो . याचा काळ १ ते ४ तास टिकतो . अकस्मात होणारी तापामधील वाढ बरेचदा रात्रीपेक्षा दुपारी माध्यान्हीच्या कालानंतर जास्त असते . क ) नंतर दरदरून घाम येण्यास सुरवात होते . हा काळ साधारण २ ते ३ तास राहतो . एकूण तापाचा कालावधी ६ ते १२ तास असतो .
मलेरिया परोपजीवींच्या गटानुसार उदा . P. Vivax व P. Falciparum यामध्ये तापाची पद्धत वेगवेगळी असते . तापाचे कालचक्र ४८ किंवा ७२ तासानंतर पुन्हा परत सुरू होऊ शकते . त्यावरुन कोणत्या पद्धतीचा मलेरिया आहे याचे ढोबळ निदान करता येते .
Plasmodium Vivax Malaria ( Benign )
बहुतेक वेळा या प्रकारच्या परोपजीवांमुळे होणारा मलेरिया तुलनेने कमी
धोकादायक असतो . गंभीर स्वरूपाचे परिणाम सहसा आढळत नाहीत . परंतु Vivax गटाचे परोपजीवी ( Schizonts ) या स्थितीत असताना यकृतामध्ये ( Liver ) सुप्तावस्थेत राहतात . योग्य संधी मिळताच ते रक्तात शिरतात व पुन्हा मलेरियाचा ताप येऊन सोबत लक्षणेही दिसू लागतात . तो केव्हाही पुन्हा उद्भवू शकतो . याला ( Relapse ) परत येणारा ताप म्हणतात . त्यावेळी मात्र डास न चावताच हा ताप रुग्णाला परत आलेला असतो .
Plasmodium Falciparum Malaria
बरेच वेळा ताप येण्याची पद्धत वरील वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणे अजिबात नसते . या ठिकाणी काही वेळा रुग्णाला ताप १०० ° ते १०१ ° एवढाच असतो . काही वेळा सातत्याने दोन दिवस सतत ताप अंगात राहतो . थंडी किंवा हुडहुडी वाजण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते . परंतु अशा रुग्णात मलेरियाच्या परोपजीवांचे प्रमाण जास्त असेल वा निदान बरोबर न झाल्याने औषधोपचार उशीरा चाल झाले असतील तर , किंवा हे परोपजीवी मलेरिया विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या औषधांना प्रतिसाद न देणारे असतील तर मात्र हा रोग गंभीर स्वरूप धारण करू शकतो . खेदाची गोष्ट अशी की काही वेळा रुग्ण दगावूही शकतो .
Falciparum मुळे घातक स्वरूपातील होणारे मलेरियाचे ( Pernicious Malaria ) मुख्य तीन प्रकार आढळतात .
१ ) मेंदूत पसरणारा मलेरिया : ( Cerebral Malaria )
मेंदूमधील रक्ताच्या केशवाहिन्यातील ( Blood Capillaries ) तांबड्या रक्तपेशीत मलेरियाचे परोपजीवी पसरतात त्यामुळे मेंदूतील पेशींवर जबरदस्त आघात होतो . अशा रुग्णांना गुंगी वा सुस्ती येणे अशा लक्षणाने सुरवात होते . काही तासात रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जातो . मानेच्या तसेच हातापायांच्या वेड्यावाकड्या हालचाली होतात . लहान मुलांमध्ये आकडी येते . काही वेळा लकव्यासारखी लक्षणे दिसू लागतात . ( Paralysis ) मलमूत्रावरील ताबा जाऊ शकतो . मेंदूमधील Hypothalamus भागावर परिणाम झाला तर ताप १०६ ° ते १०७ ° पर्यंत जाऊ शकतो . मृत्यूची शक्यता अशा वेळी जास्त असते .
२ ) Algid Malaria : शरीरातील सर्व रक्तवाहिन्या अशक्त झाल्याने रक्तप्रवाह हळूहळू थांबतो . नाडी मंद चालते व रक्तदाब कमी होत जातो . काही वेळा कॉलरा सारखे रेच ( हगवण सुरू होते , व त्यातून रक्त पडते .
३ ) Septicaemic Malaria : यामध्ये हृदय , रक्तवाहिन्या , फुप्फुसे , मुत्रपिंड इत्यादी सर्व अवयव हळूहळू निकामी होत जातात .
४ ) Black Water Fever : ( काळपट पिंगट रंगाची लघवी होणारा ताप ) रक्तातील हिमोग्लोबिन पासून बनलेले haemozoin हे काळपट रंगाचे कण व तांबड्या रक्तपेशींचे झालेले तुकडे हे सर्व लघवीमार्फत शरीराबाहेर पडू लागतात . अशा वेळी लघवीचा रंग Port wine किंवा कोकाकोलासारखा दिसत असतो. अनेकदा हे असे होण्याचे नक्की कारण उमजत नाही . काही वेळा मलेरियाच्या तापामुळे वाजणारी प्रचंड थंडी अथवा औषधांचा होणारा विचित्र परिणाम यामुळे हे घडून येत असावे . रुग्णास ताप असूनसूद्धा परोपजीवी रक्तात दिसत नाहीत . त्यामुळे रोगाचे निदान करणे कठीण जाते . कधी कधी मुत्रपिंडे निकामी झाल्यास रोग गंभीर स्वरूप धारण करतो .
मलेरियाचे रुग्ण तपासताना मुख्यतः खालील गोष्टी आढळतात .
१ ) फिकेपणा ( Anaemia )
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते . ते काही वेळा धोकादायक पातळी पर्यंत कमी होते . ( Hb - 4G % or less ) प्रचंड थकवा वाटणे . काम करण्याची शक्ती अजिबात नसणे यामुळे रुग्ण निपचीत पडतो .
२ ) कावीळ : ( Jaundice )
काही रुग्णात मलेरिया बरोबर रक्तातील कावीळीची ( Bilirubin ) पातळी अधिक झालेली आढळते .
३ ) प्लीहा वाढणे : ( Enlarged Spleen )
ज्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन मलेरियाची लक्षणे असतात , अशी रुग्णांमध्ये प्लीहा वाढलेली आढळते व त्यामुळे पोटही सुजलेले दिसते . क्वचित प्रसंगी अशा वाढलेल्या प्लीहेस इजा झाल्यास ती फाटते व पोटाच्या आत रक्तस्राव होऊन रुग्ण दगावतो.
या वैद्यकीय ज्ञानाचा गैरफायदा भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालात काही ब्रिटीश अधिकारी घेत असत . कामावर घेतलेले मजूर अनेकदा अशक्त असत . त्यांना नीट काम न केल्यास लाथा बुक्के मारून तुडवले जाई . अशा परिस्थितीत जर एखादा मजूर दगावला , तर खुनाचा आळ येऊ नये यासाठी ते अधिकारी बेलाशकपणे असे कारण सांगत , ' मजूराला मलेरियाचा त्रास होता . तो प्लीहा फुटल्याने मरण पावला ' .
४ ) काही रोग्यांमध्ये प्लीहा व यकृत दोन्हीमध्ये वाढ होते .
माणसाच्या शरीरात मलेरिया परोपजीवी शिरण्याचे विविध मार्ग
१ ) अॅनॉफेलीस मादी डास मनुष्याला चावल्यानंतर त्यामुळे होणारा मलेरियाचा रोग हा एक नेहमीचा व महत्त्वाचा मार्ग आहे .
२ ) ज्या अॅनॉफेलीस मादी डासाच्या लाळेत Sporozoites अवस्थेतील परोपजीवी आहेत , अशा डासांमधील लाळ सशक्त माणसांना टोचून त्यांच्यात मलेरियाचा रोग निर्माण केला जातो काही ठिकाणी संशोधनाच्या दृष्टिकोनातून प्रयोग म्हणून असा प्रयत्न केला गेला आहे .
३ ) रक्तपेढीत अनेक लोकांचे रक्त घेतले जाते . त्यापैकी एखादा रक्तदाता मलेरियाचा रुग्ण असू शकतो . त्यावेळी त्याच्या रक्तात असणाऱ्या परोपजीवींचा प्रवेश तेथून पुढे ज्या रुग्णाला ते रक्त दिले जाईल त्याच्या शरीरात सरळपणे होतो व तेथे ते वाढून नंतर रुग्णाला नाहकपणे मलेरियाचा त्रास भोगावा लागतो . या कारणास्तव रक्तदात्याचे रक्त हे मलेरियाच्या परोपजीवांपासून मुक्त असल्याची खात्री रक्ताची तपासणी करून ठरविणे हे बंधनकारक आहे.
४ ) आईच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत असते . या गर्भाशयाला जोडून लागूनच Placenta म्हणजे वार असते ज्यातून बाळाचे पोषण केले जाते . सामान्यपणे आईच्या रक्तात जर कोणतेही जंतू किंवा इतर प्रकारचे परोपजीवी असतील तरी त्यांना थोपविण्याची क्षमता वारेमध्ये असते , अशा प्रकारे बाळाचा बचाव केला जातो . परंतु वारेच्या वाढीच्या प्रक्रियेत काही दोष निर्माण झाला असेल व अशा वेळी आईला मलेरियाचा रोग झाल्यास त्याचे परोपजीवी बाळाच्या रक्तात शिरून त्या बाळाला मलेरिया होऊ शकतो .
५ ) व्यसनाधीन लोकांच्या एकत्रित गटामध्ये एखाद्याला मलेरियाचा रोग झालेला असेल तर धुंदी येण्याकरिता तेथे वापरल्या जाणाऱ्या एकाच इंजेक्शनच्या सुईमधून मलेरियाचे परोपजीवी इतरांमध्ये पसरू शकतात .
वरील नमूद केलेल्या २ ते ५ या मार्गांनी पसरणारा मलेरियाचा रोग फार क्वचितच आढळतो .
औषधी उपाय म्हणून मलेरियाच्या परोपजीवींचा उपयोग ८० ते ९ ० वर्षांपूर्वी वैद्यकीय शास्त्रात केल्याची उदाहरणे आहेत . त्याचा मनोरंजक इतिहास थोडक्यात असा आहे .
Syphilis ( गुप्तरोग ) या रोगाचे रुग्ण त्याकाळी फार मोठ्या संख्येने आढळून येत . या रोगामध्ये काही रुग्णांना मेंदूत बाधा होत असे . त्याला Neurosyphilis वा general Paralysis of Insane असे म्हणत . असे लक्षात आले होते की या रोग्यांना जर नंतर मलेरिया झाला असेल तर ताप गेल्यानंतर Neurosyphilis मुळे होणारी लक्षणे नाहिशी होत व रोगी त्यामधून बाहेर येत असे . या निरीक्षणाचा उपयोग एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जात असे .
Neurosyphilis असलेल्या रुग्णांना मच्छरदाणीत झोपवीत . ज्या मादी डासांच्या लाळेत मलेरियाचे परोपजीवी आहेत अशांना आत सोडीत . हे डास त्यांना चावल्यावर ह्या रूग्णांना मलेरियाचा ताप येत असे . ताप येण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यत रुग्णाला वेगळे झोपविण्यात येत असे . त्यावेळी रोग्याला मलेरियासाठी वापरले जाणारे कोणतेही औषध देण्यात येत नसे . ताप उतरल्यानंतर काही दिवसात Neurosyphilis मुळे होणाऱ्या लक्षणात बराच उतार पडत असे हा प्रकार काट्याने काटा काढावा यासारखा होता.
मलेरियाच्या परोपजीवांमुळे शरीरात निर्माण होणारी घातक विषारी द्रव्ये ( Malarial Toxins )
रुग्णामध्ये मलेरियाचा ताप वाढत असताना मलेरियाच्या परोपजीवींविरुद्ध रक्तातील तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशी , तसेच अभयत्व देणाऱ्या पेशी ( immune cells ) यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू होते . त्यावेळी अनेक विषारी द्रव्ये निर्माण होतात या द्रव्यांमुळे शरीरातील विविध संस्थांवर कमी जास्त स्वरूपाचे परिणाम घडतात . ही रासायनिक प्रक्रियेची शृंखला नियमबद्धपणे घडत असते .
शरीरात तयार होणारी प्रमुख विषारी द्रव्ये
१ ) Cytokinine २ ) Tumor Necrosis Factor ( TNF ) 3 ) Phospholipids and Phosphoglycans
शरीरात घडून येणारे महत्त्वाचे परिणाम
१ ) हिमोग्लोबिन ( Hb ) व तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णाला धोक्याच्या पातळीपर्यंत नेणारा Anaemia होतो .
२ ) तापामध्ये अचानक होणारा चढ उतार
३ ) Plasmodium Falciparum मुळे मेंदूच्या पेशींमध्ये होणारे बदल .
४ ) शरीरातील संपूर्ण रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होऊन त्यांचे कार्य मंदावते व शक्तीपात होतो . ( Endotoxin Vascular Shock )
५ ) अचानकपणे जास्त प्रमाणात स्रवणाऱ्या Insulin मुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत कमी होते .
वारंवार होणारा मलेरिया
मलेरियाचा ताप एकदा येऊन गेल्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा आपला प्रताप त्याच रुग्णाला दाखविला नसता तर कदाचित मलेरिया या रोगाची समस्या ऐवढ्या तीव्रतेने जाणवली नसती . परंतु एकदा होऊन गेलेला मलेरिया पुढील ३ ते ४ वर्षांत एकदाच नव्हे तर चार ते पाच वेळा पुन्हा होण्याची शक्यता असते . वैद्यकीय इतिहासात काही रुग्णांत ४ ते ५ वर्षांच्या कालावधीत ३० ते ३५ वेळा मलेरिया झाल्याचे आढळून आल्याची नोंद आहे . हा रोग होण्याच्या आपत्तीची टांगती तलवार काही रुग्णांवर कायम असते . त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम घडून येतात . या वारंवार होणाऱ्या मलेरियाच्या रोगाची मुख्य कारणमिमांसा अशाप्रकारे आहे .
१ ) मानवी शरीरात साधारणपणे जंतू , परोपजीवी , विषाणू यांची लागण झाल्यानंतर कायम स्वरूपाची प्रतिबंधकारक शक्ती तयार होत असते . त्यामुळे त्या रोगांचा वारंवार उपसर्ग होण्याची शक्यता फार कमी असते . परंतु मलेरियाच्या परोपजीवांच्या बाबतीत मात्र पहिल्या तापानंतर शरीरात तयार होणाऱ्या प्रतिबंधकारक शक्तीची पातळी फारच कमी असल्याने यानंतर पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या तापाला रोखण्यास ती असमर्थ ठरते .
परोपजीवांच्या प्रत्येक अवस्थेची प्रतिजने ( Antigens ) भिन्न असल्यामुळे त्याला प्रतिबंधक ठरणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) पुरेशा संख्येने तयार होत नाहीत . अर्थातच पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांशी मुकाबला करणे प्रतिपिंडांना कठीण जाते आणि परोपजीवी मग शरीराचा ताबा घेतात .
२ ) काही काही रुग्णांनाच डास परत परत चावा घेतात . त्यामुळे तो रुग्ण पहिल्या तापातून बरा होतो न होतो तोच नवीन परोपजीवांची फौज त्याच्या शरीरात शिरते .
३ ) काही कारणाने औषधाचा डोस पूर्ण न करता उपचार अर्धवटच सोडून दिले जातात . तर अशा वेळी पहिलाच ताप उलटण्याची शक्यता असते .
४ ) Plasmodium Vivax या प्रकारच्या मलेरियाच्या तापामध्ये यकृतामध्ये ( Liver ) सुप्तपणे राहणारे परोपजीवी ६० ते १८० दिवसात परत आपले डोके वर काढतात व अशावेळी डास परत न चावताही मलेरियाचा ताप येण्यास सुरवात होते .
५ ) सामान्यत : Plasmodium Falciparum उलटण्याची शक्यता नसते . परंतु पहिल्याच तापातील रक्तात फिरणारे Falciparum चे प्रतिसाद न देणारे काही परोपजीवी औषधांना पूर्णपणे दाद न देणारे असतील तर अगदी २५ ते ३० दिवसात पुन्हा ताप येण्यास सुरवात होते . एखाद्या घरातील काहीच लोकांना वारंवार मलेरिया होतो , तर काही जणांना या रोगाची लागण कधीच होत नाही असे का या जटील प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे .
मलेरियाची लक्षणे व चिन्हे या प्रकरणात मलेरियाचे रुग्ण सामान्यतः कोणत्या प्रकारचे आढळतात याचे विवेचन केले आहे . कित्येकदा रुग्णात दिसणारी लक्षणे डॉक्टरांना बुचकळ्यात टाकणारी असतात . अशा परिस्थितीत प्रयोगशाळेतील रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या उपयुक्त ठरतात . अशा तऱ्हेच्या केसेस हॉस्पिटल व खाजगी डॉक्टर मंडळींसमोर आल्यावर रुग्णावर त्वरीत उपाययोजना करणे अत्यावश्यक असते . अशा पद्धतीच्या प्रत्यक्ष घडलेल्या केसेस् नाव व जागा बदलून पुढील वेगवेगळ्या प्रकरणात वेळोवेळी समाविष्ट केलेल्या आहेत .
ह्या सर्व केसेस् वाचल्यानंतर वाचकांना मलेरिया हा रोग प्रसंगी कशा रितीने गंभीर स्वरूप धारण करू शकतो यावर प्रकाश टाकण्याचा लेखकाचा उद्देश आहे .
केस नंबर १
श्रीमती निर्मला जोशी वय ५६ , पतीच्या निधनानंतर दादरमध्ये एकट्याच राहत होत्या . नोव्हेंबर महिन्यात दिवाळी निमित्त नाशिकमध्ये १५ दिवस व नंतर १० दिवस मध्यप्रदेश येथील कान्हा जंगल , पंचमढी या भागात फिरून दादरला परतल्या . घरात एकट्याच , आल्यावर प्रवासाचा शीण व पुढे अंगात कणकण , पाठोपाठ १०१ ° पर्यंत ताप चढला . फॅमिली डॉक्टरांनी नेहमीची औषधे दिली . थंडी वाजणे , हुडहुडी भरणे ही लक्षणे नव्हती . ठाण्यात राहणाऱ्या मुलीने आईला आपल्या घरी नेण्याचा आग्रहच धरला . ठाण्यात गेल्यावर ताप व सोबत उलट्या चालू झाल्याने १ दिवसानंतर काविळीची शंका आली . सकाळपासून निर्मलाबाईंची असंबद्ध बडबड मुलीला बुचकळ्यात पाडणारी होती . त्यांना ब्लड प्रेशर , डायबेटीस किंवा इतर कोणताही आजार नव्हता . दुपारनंतर चक्कर आली आणि अर्ध्या तासात त्या बेशुद्ध झाल्या . मुलीची तारांबळ उडाली . डॉक्टरांना घरी बोलावले . निर्मलाबाईंचे ब्लड प्रेशर अतिशय कमी झालेले परंतु ताप जास्त नव्हता . ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले पुढील ४ ते ५ तासात पूर्णपणे शुद्ध हरपली . ( Semi Comatose ) तत्परतेने I.C.U मध्ये हलविण्यात आले . ५ तासात रक्ताच्या तपासणीमधून P. Falciparum Positive असल्याचे समजले हळूहळू काविळीचे प्रमाण वाढत होते . Blood Creatinine धोक्याच्या पातळीकडे वेगाने जात होते . मलेरियावरील अद्ययावत औषधे देण्यात येत होती . ३ दिवसात काहीही फरक नव्हता किंबहुना केस हाताबाहेर जाते की काय अशी शंका वाटू लागली . मुलींना त्याप्रमाणे कल्पनाही देण्यात आली होती जोशीबाईंच्या मूत्रपिंड व यकृतावर गंभीर परिणाम झाला होता . चौथ्या दिवसापासून मात्र मुंगीच्या पावलाने सुधारणा दिसू लागली . १० दिवसांनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली . अतिशय अशक्तपणा होता . घरी परतल्यावर रक्ताच्या पुन्हा केलेल्या तपासणीत परत P. Falciparum चे परोपजीवी दिसल्याने तज्ञांच्या सल्यानुसार परत एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . ताबडतोब मलेरियावरील औषधे सुरू करण्यात आली . अशक्तपणा हळूहळू कमी होत महिन्याभरात तब्येत सुधारली . कोणताही दुष्परिणाम राहिला नाही . त्यानंतर आता गेली १० वर्षे आनंदी आयुष्य जगत आहेत . या साऱ्या धक्कादायक अनुभवातून जोशीबाईंना दादर सोडून ठाण्यात वास्तव्यास जाणे सोईस्कर वाटले व त्या ठाणेकर झाल्या . या केसमध्ये डासांपासून मिळालेला प्रसाद हा दादरचा नसून नाशिक किंवा कान्हाच्या जंगलामधून मिळाला असावा अशी दाट शंका घेण्यास वाव आहे .
केस नं . २
सौ . मानसी पटवर्धन वय वर्षे ६१ , दादर मध्ये वास्तव्य , आठ दिवसासाठी परदेशी मलेशियाच्या सहलीस गेल्या . पहिले दोन दिवस समुद्रावरील खेळ , गार वारा बाधल्याचे निमित्त होऊन खूप थंडी भरून ताप आला . सोबत उलट्या त्यात अन्नावरची वासनाही गेली . १० वर्षांचा जुना डायबिटीस , खाणे बरोबर जात नसल्याने डायबिटीस वरील औषधे बंद केली . परदेशातील सहलीचे दोन दिवस त्रास तसाच सहन केला . पण अतिशय अशक्तपणा वाटू लागला लघवी कमी होण्यास सुरवात झाली. दुसऱ्या दिवसापासून तांबडी काळपट ( Port wine ) रंगाची लघवी होण्यास सुरवात झाली. दुपारपासून बोलण्यात असंबद्धता व गरगरणे सुरू झाले . बलवत्तर नशीब असल्याने मानसीताईंच्या परिचयातील एक डॉक्टर कोलालंपूर येथेच स्थायिक असल्याने ताबडतोब त्याच्या मदतीने हॉस्पिटलच्या I.C.U. मध्ये हलविले . Blood Pressure एकदम खाली आलेले व रक्तातील साखर ३५० मि . ग्रॅ . झालेली होती . E.C.G. नॉर्मल होता . बोरिवलीमधील मानसीताईंच्या पॅथॉलॉजिस्ट असलेल्या मुलाने मलेशियामधील डॉक्टरांशी संवाद साधला व फॅलसिफेरमची शक्यता व्यक्त केली . आमच्या देशात मलेरिया नाही असे मानणारे मलेशियामधील डॉक्टर ती शक्यता नाकारीत होते . शेवटी तिथेच दुसऱ्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले . त्यांनी भारतातून आलेला रुग्ण ही बाजू लक्षात घेऊन , मलेरियाच्या रक्त तपासणीसाठी ते दुसऱ्या ठिकाणी प्रयोगशाळेत पाठविले . तोपर्यत बोरिवलीचा मानसीताईंचा मुलगा मलेशियात आईजवळ जाऊन पोहोचला . दोन दिवसातच रक्ताचा रिपोर्ट Falciparum Positive असा आला . ताबडतोब योग्य औषधे देण्यात आली . आठ दिवसात तब्येतीला आराम पडला . रक्ताचा रिपोर्ट Negative आला . मानसीताई सुखरुपपणे मुलासोबत मुंबईला पोहोचल्या . या केसमध्ये P. Falciparum मलेरिया मधील Black Water Fever हे निदान केलेले असून यामधे लघवीचा बदललेला Port wine रंग हे महत्त्वाचे लक्षण आहे .
केस नंबर ३
श्री . मधुसुदन जोशी वय वर्षे ८२ , मधुमेहाचे गेले ३० वर्षांचे जुने दुखणे औषधांमुळे ताब्यात आहे . वयोमानानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा वाढता त्रास , त्यामुळे मधून मधून लघवीचे Infection होत असे . दादर मध्ये वास्तव्य होते . घराला लागूनच नवीन ३५ मजली इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे चालूच आहे . आजूबाजूला प्रचंड धूळ व डासांचा उपद्रव . त्यामुळे वारंवार खोकला , दम्याचा त्रास व तापही येत असे . लघवी व छातीचे Infection यावरच Antibiotics दिली जात होती . एकदा हुडहुडी भरुन ताप चढत असताना रक्त घेतले . त्यात Plasmodium Vivax चे परोपजीवी आढळले . लघवीचा रिपोर्ट नॉर्मल होता . Lung Infection मुळे रक्तातील पांढऱ्या पेशींच्या Polymorphs मध्ये वाढ झाली होती . आता पूर्वीच्या औषधांबरोबर मलेरिया विरुद्धची औषधेही देण्यास सुरवात केली . आठ दिवसात आराम पडला . ३ महिन्यानंतर पुन्हा तसाच ताप येण्यास सुरवात झाली . रक्ततपासणीत परत P. Vivax चे परोपजीवी मिळाले . परत मलेरिया विरुद्ध औषधांचा मारा करावा लागला . गेल्या दीड वर्षात ४ वेळा अशाच प्रकारे ताप येत आहे व मलेरियाचे रक्तातून निदान झाल्यावर पुन्हा पुन्हा त्यावरील औषधे द्यावी लागत आहेत . वाढत्या वयोमानामुळे व Antibiotics च्या वारंवार लागणाऱ्या वापरामुळे आता जोशीबुवांच्या शरीरातील प्रतिबंधक शक्ती कमी झालेली आहे . वारंवार होणारा Vivax मलेरिया जोशी आजोबांना खचितच त्रासदायक होत आहे.
--डॉ. अविनाश वैद्य
रोनॉल्ड रॉसच्या मलेरियासंबंधीत काव्यरचना
रोनॉल्ड रॉस कवी- मनाचा असल्याने काही प्रसंगी अतिशय हळवा होत असे. त्याने अनेक कविता लिहील्या. त्यातील मलेरियाच्या संशोधनासंबंधीत दोन कविता येथे देत आहे.
मलेरियाच्या संशोधनकार्यात ज्यावेळी अनेक अडथळे येत गेले, डासांचा, माणसांचा व मलेरिया परोजीवांचा परस्पर संबंध उलगडत नव्हता त्यावेळी रॉस चिंताग्रस्त झाला. त्याच सुमारास त्याला स्वत:ला मलेरियाचा रोग झाला. त्याच्या दु:खी, उदास मनात काहूर माजले. अशा मनस्थितीत त्याला सुचलेली ही कविता त्याच्या भावना व्यक्त करीत आहे.
Solitude
What ails the solitude
Is this the judgement day?
The sky is red as blood
The very rock decay
And crack and crumble and
there is a flame of wind
where with the burning sand
is ever mass'd and thin'd
The world is white with heat
The world is rent and riven
The world and heaven meet
the lost stars cry in heaven
स्वैर अनुवाद:
एकांतवास
एकान्तवासाचे दु:ख असह्य होत आहे आज निकालाचा दिवस तर नसेल? आकाशातील प्रभा रक्तवर्णी झाली आहे, खडक फुटून असंख्य भेगा पडत आहेत पहाडांचे कड्यांमागून कडे कोसळत आहेत झंझावाताचा डोंब उसळला आहे तप्त वाळू भाजून काढते आहे लाही लाही उन्हाने जमीन पांढरीशुभ्र होत आहे भगदाड पडून पृथ्वीचे तुकडे तुकडे होत आहेत जणू पृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन घडत आहे आणि... हरवलेले तारे स्वर्गात आक्रोश करीत आहेत.
ज्या दिवशी डासाच्या विच्छेदनातून मलेरियाच्या परोपजीवांची अंडी दिसली तो सोनेरी क्षण रॉसने कवितेच्या माध्यमातून साकारला. जगभरात तो दिवस Mosquito Day - 20 Augest म्हणून साजरा केला जाऊ लागला. स्वत:च्या या विजयाचा आनंद प्रगट करणारी रॉसची ही कविता पुरेशी बोलकी आहे.
Exile
The day relenting God hath placed. within hand a wonderous thing And God Be praised at his command seeking his secret deeds with tears and toiling breath, I find thy cunning seeds O, million murdening death, I know this little thing Amyriad men will save O death where is thy sting, thy victory O Grave
स्वैर अनुवाद:
हद्दपार
पाझर फुटून देवाने हाती दिला हा सोन्याचा दिवस ईश्वरा, तुझी किती प्रशंसा करू
तुझ्या आज्ञेवरून शोधू शकलो मी तुझे गुप्त रहस्य, त्यासाठी अथक परिश्रम करून व डोळ्यात अश्रू आणून कौशल्याने शोधल्या मी त्या कपटी कावेबाज परोपजीवरूपी बिया, हे लक्षावधी प्राण घेणाऱ्या मृत्यूदेवा, मला गवसली ही छोटीशी गोष्ट वाचतील त्यामुळे असंख्य माणसांचे प्राण हे मृत्यो, कुठे गेला तुझा डंख, तुझा विजय कारण....मी आहे थडग्यावर फडकवली विजयाची माळा !
--डॉ. अविनाश वैद्य
वैद्यकीय शास्त्राने विविध रोगांविरुद्ध लस निर्माण करण्यात गेल्या शतकात अशी गरूड भरारी मारली की ज्यामुळे अनेक रोग आज इतिहासजमा झाले आहेत . प्लेग , देवी , कांजण्या , पोलिओ , घटसर्प , डांग्या खोकला अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर परिणामकारक लसीची निर्मिती झाली . अर्थात मग मलेरिया या रोगावर लस का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला कोड्यात टाकतो .
मलेरियाच्या परोपजीवांचे माणसाच्या शरीरात येईपर्यंत व आल्यानंतरही अनेक अवस्थांतून संक्रमण हाते . त्यामुळे मलेरियाच्या रोगासाठी लस एक किंबहुना अनेक पद्धतींनी बनवावी लागेल . तसेच मलेरियाची लस दिल्यानंतर माणसाला त्यापासून कायमचे अभयत्व मिळते किंवा नाही ही महत्त्वाची अडचण आहे . हे सर्व अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न असून त्यावरून सरळ सकारात्मक उत्तर मिळणे हे आजमितीला तरी दुरापास्त दिसते . म्हणून या विषयाची केवळ तोंड ओळखच या प्रकरणात दिली आहे .
लस निर्मितीमध्ये खालील पद्धतीचा अवलंब केला आहे .
१ ) मलेरिया परोपजीवांच्या विविध स्थिति ( Stages ) मधील प्रतिजनांच्या ( Antigens ) सखोल अभ्यासाच्या निष्कर्षातून जवळजवळ ३० वेगवेगळी प्रतिजने विविध पद्धतीने मिसळून त्यांच्या विरुद्ध प्रतिपिंडे ( Antibodies ) निर्माण केली गेली आहेत . ही सर्व प्रतिजने ( P. Falciparum ) पासून तयार केलेली आहेत .
२ ) डासांच्या लाळेमधून माणसाच्या शरीरात शिरणाऱ्या Circumspores वा Sporozoites पासून तयार केलेली प्रथिने ( Proteins ) प्रतिजन म्हणून वापरून त्याविरुद्ध ( CSP Antigen ) प्रतिपिंडे तयार केली गेली . ह्या प्रतिपिंडांची योजना यकृतामध्ये परोपजीवी शिरू शकणार नाहीत व त्यातूनही थोडे ( Sporozoites ) चकवून यकृतात शिरलेच तर त्यांचा नायनाट ही प्रतिपिंडे व शरीरातील अभयत्व देणाऱ्या T. lymphocytes पेशी करतील या भूमिकेतून आखली होती . या प्रयोगातून Sporozoites निकामी ठरल्यानंतर पुढच्या स्थितीतील परोपजीवी निर्माणच होणार नाहीत हा हेतू होता . परंतू या पद्धतीच्या लसीला शरीरातून योग्य प्रतिसाद मिळाला नाही . यामुळे यात नवीन तांत्रिक बदल केले गेले आहेत .
३ ) CSP Antigen व Hepatitis B Virus ( एका पद्धतीचे कावीळीचे विषाणू ) ज्याचा वाहक म्हणून उपयोग करून लस बनविण्यात आली आहे .
४ ) परोपजीवांतील जनुकांमधील DNA , रासायनिक वाहक , आणि T. lymphocytes या तिघांच्या मदतीने प्रतिबंधकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे .
५ ) Pattrraya लशीमध्ये परोपजीवांमधील विविध प्रथिनांचे मिश्रण ( Cocktail ) बनविले आहे ज्यामध्ये 35KD , 55KD , 83KD असे प्रतिजनांचे मुख्य घटक आहेत . या विरुद्ध तयार झालेली प्रतिपिंडे तांबड्या रक्तपेशींभोवती ढालीसारखा पडदा निर्माण करतात ज्यायोगे परोपजीवांना तांबड्या रक्तपेशीत शिरताच येत नाही . या पद्धतीप्रमाणे Glaxo SKF कंपनीने Mosquirix नावाची लस तयार केलेली असून आतापर्यंत याच्या निर्मितीसाठी ३०० दशलक्ष डॉलर्स खर्च झालेला आहे . प्राथमिक प्रयोग अफ्रिकेतील लहान मुलांवर करण्यात येत असून ५५ ते ६० टक्के यश हाती येईल असा कंपनीचा दावा आहे .
६ ) भारतात हैद्राबाद येथील Bharat Biotech मधील शास्रज्ञ डॉ . चेतन चिटणीस यांनी गेली १० वर्षे या विषयावर सखोल संशोधन केलेले आहे . परोपजीवी कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींना भेदतात . या संशोधनावर आधारित ह्या लसीची निर्मिती केलेली असून २०१२ सालापर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे . या त्यांच्या बहुमोल कामाबद्दल Infossys या कंपनीने २०१० मधील ५० लाख रुपयांचे विज्ञान पारितोषिक या लस संशोधनासाठी दिले आहे .
७ ) परोपजीवांचा मनुष्य - डास - मनुष्य हा प्रवास खंडित करण्याचे महत्त्वपूर्ण काम लसी मार्फत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू आहे . ह्या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे मलेरिया झालेल्या रुग्णाला ही लस टोचल्यावर त्याचे परिणाम त्याच्या शरीरात न होता , त्या रुग्णाला जे डास चावतील त्यांच्यावर होऊन मलेरियाच्या परोपजीवांचे जीवनचक्र थांबविण्यात यश मिळेल
लस निर्मितीतील संभाव्य अडचणी अशा आहेत .
१ ) मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींवर पोसले जात असताना या परोपजीवांच्या भोवती अतिशय पातळ प्रथिनांचे आवरण निर्माण होते . त्याचप्रमाणे प्रत्येक परोपजीवाच्या आवरणात सूक्ष्म स्वरूपातील रासायनिक विविधता असते . या विविधतेसाठी लागणारा रासायनिक बदल हा परोपजीवांमधील जनुकांमार्फत दिला जातो . या समस्येमुळे एकाच रासायनिक सूत्राचे प्रतिजन बनविणे कठीण असल्याने लस बनविण्यात तांत्रिक अडचणी उत्पन्न होतात .
२ ) प्रतिजनांमधील विविधतेमुळे शरीरात तयार होणारी प्रतिपिंडे तयार होतानाच कमकुवत असतात . त्यांची रक्तातील पातळी कायम न राहता हळूहळू कमी होत जाते व क्षमताही कमी होते .
३ ) परोपजीवांच्या गुणसूत्रात विविध औषधामुळे सतत रासायनिक बदल होत असतो .
४ ) मलेरियाचे परोपजीवी शरीरात वाढत असताना काही वेळा ते एवढ्या मोठ्या संख्येने तयार होतात की औषधांचा मारा तिथे अपुरा पडतो . त्यामुळे त्यांचे उत्पादन पूर्णपणे थांबविण्यात औषधे असफल ठरतात . यामधूनच परोपजीवांची तयार होणारी नवी पिढी औषधांना तर प्रतिसाद देत नाहीच परंतु वापरण्यात येणाऱ्या लसीचा शरीरातील अभयत्वासाठी होणाऱ्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणते .
आजमितीला निसर्गाने परोपजीवांना झुकते माप देत लस निर्मितीच्या कार्यक्रमात अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत .
मलेरियावरील प्रभावी लस निर्मिती - ऑक्टो . २०११
ग्लॅक्सो SKF कंपनीचे प्रमूख वैज्ञानिक डॉ . जो . कोहेन यांनी RIS , S / AS02A या नावाची लस मलेरियासाठी शोधून काढली आहे . या लसीचा उपयोग अफ्रिकेतील ५ ते १७ महिन्यांच्या ६००० बालकांमध्ये करण्यात आला . परिणामी ५७ टक्के बालकांना मलेरियापासून मुक्तता मिळाली व शंभरातील ४७ मुलांना झालेल्या मलेरियाची तीव्रता अतिशय कमी स्वरूपाची आढळली .
अफ्रिका खंडातील बर्कोना , फासो , गॅबॉन , केनिया , मालावी , मोझांबिक , टांझानिया अशा सात देशात अकरा ठिकाणी २ वर्षांच्या कालावधीसाठी चाचण्या घेण्यात आल्या . अशा या चाचण्यांच्या निरीक्षणामधून निघालेल्या सकारात्मक निष्कर्षांमुळे मलेरिया विरुद्ध निघालेली पहिली लस अशी जगन्मान्यता या लसीला मिळाली आहे . दहा वर्षांच्या अथक प्रयत्नातून या लसीचा शोध लावण्यात आल्याने आता मलेरिया निर्मूलनासाठी अंतिम दरवाजा उघडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे . २०१५ सालापर्यंत जगभर ही लस वापरण्यास सुरवात होईल असा ठाम विश्वास डॉ . जो कोहेन यांनी व्यक्त केला . आजपर्यंत कोणत्याही परोपजीवाविरुद्ध लस निर्मिती झालेली नसल्याने जगभरातील मनुष्यप्राण्याला पछाडणाऱ्या मलेरिया या रोगाविरुद्ध लस मिळाल्याचे सांगताना डॉ . कोहेन यांचे डोळे पाणावले होते . पुढच्या टप्यातील चाचणी १५४६० नवजात बालकांमध्ये घेतली जात आहे . तीन वेळा क्रमाने दिल्या जाणाऱ्या या लसीला इतर रोगांसाठी दिल्या जाणाऱ्या लसींसोबत देण्याची योजना आखली गेली आहे . लस शीतपेटीत ठेवण्याची गरज आहे . सर्वात मुख्य समस्या ही लसीच्या किमतीशी निगडीत आहे . जोपर्यंत १०० टक्के यश येत नाही तोपर्यंत देणगी दाते पुढे येण्यास कचरतात . परंतु आजच्या या निष्कर्षांमुळे त्यांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकतेत बदलत आहे , अर्थात हेही नसे थोडके ! उदाहरणार्थ बिल गेट फाउंडेशन सारखी श्रीमंत संस्था या उपक्रमाला मदत देण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे .
या पार्श्वभूमीवर आमच्या मुंबई शहरातील ही बातमी वाचा .
जुहू गल्ली , मुंबई येथे ३०० मुलांना मलेरियाविरुद्ध लस देण्याची फसवेगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे . अजूनही बाजारात जी लस उपलब्धच नाही अशा लसीचे इन्जेक्शन मुलांना देण्यात आले व सोबत बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्येक मुलाला दिले गेले . त्यानंतर कांही मुलांच्या पालकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना ही प्रमाणपत्रे दाखविली व त्यातून हा घोटाळा उघडकीला आला आहे . मुले मलेरियापासून पूर्णपणे मुक्त झाली आहेत अशी पालकांची चुकीची समजूत करून देण्यात आली होती .
- ( Midday या वृत्तपत्रातील १० नोव्हेंबर २०११ मधील बातमी ) A80 खरे तर लस बाजारात येण्यास किमान दोन वर्षे तरी लागतील.
--डॉ. अविनाश वैद्य
मानवी शरीरातील नेहमी तपासता न येणाऱ्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्या कानांना ऐकू न येणाऱ्या म्हणजे अल्ट्रासाउंड ध्वनी लहरींचा वापर केला जातो. क्ष-किरणांप्रमाणेच या ध्वनिलहरी हव्या त्या भागावर केंद्रित करता येतात. अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातील ध्वनी लहरींचा उपयोग करून शरीराची तपासणी करण्याच्या तंत्राला सोनोग्राफी असे म्हणतात.
हृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात. याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते. यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात. हे इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो.
तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते का? असे प्रश्न विचारत दूरदर्शनवर अनेक टूथपेस्टची जाहिरात होत असते. या टूथपेस्टमध्ये नक्की असते तरी काय? दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यासाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले, बिनविषारी व रुचिहीन आणि बारीक कण असलेले पदार्थ टूथपेस्टमध्ये वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम सल्फेट, सजल अल्युमिना, पोटॅशियम टाटरेिट, बेंटोनाइट इत्यादी न विरघळणारे अनेक पदार्थ यासाठी वापरतात. या पदार्थांमुळे बऱ्याच वेळा टूथपेस्टला आम्लता किंवा क्षारता (अल्कलिनिटी) येते. टूथपेस्ट आम्लधर्मी असेल, तर तोंडाला जास्त लाळ सुटते व क्षारधर्मी असेल तर अन्नकण कुजून तयार झालेल्या आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया होते. उदा. कॅल्शियम फॉस्फेटने आम्लता व पोटॅशियम टाटरिटाने क्षारता येते.
टूथपेस्ट दातांच्या फटींमध्ये पोहचावी म्हणून त्यात प्रक्षालकाचा (मळलेला पृष्ठभाग स्वच्छ करणारा पदार्थ) वापर करतात. सोडियम लॉरिल सल्फेटचा वापर प्रक्षालक म्हणून केला जातो. कॅल्शियम व मॅग्नेशियम परबोरेट किंवा मॅग्नेशियम पेरॉक्साइड यांचाही अंतर्भाव टूथपेस्टमध्ये असतो. या रासायनिक पदार्थांचे अपघटन होऊन ऑक्सिजन बाहेर पडतो आणि त्यामुळे जंतुनाश होतो आणि तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.
याशिवाय मेंथॉल, थायमॉल, यूजेनॉल, मिथिल सॅलिसीलेट इ. सुगंधी द्रव्ये टूथपेस्टमध्ये घालतात. त्यामुळे उत्साहवर्धक स्वाद निर्माण होतो व टूथपेस्टमध्ये एखादे उग्र वासाचे द्रव्य असल्यास त्याचा वास झाकला जातो. ही द्रव्ये काही प्रमाणात जंतुनाशकही आहेत.
काही टूथपेस्टमध्ये फ्लोराईडचा समावेश असतो. फ्लोराईडमुळे दातात कॅव्हिटी (कीड लागण्यास) होण्यास प्रतिबंध होतो. लेमन, मिंट अशा वेगवेगळ्या स्वादामध्ये टूथपेस्ट उपलब्ध असतात. बहुतेक वेळा मिंट फ्लेवरचा उपयोग मुख्यतः केलेला असतो. मुलांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॉबेरी, बबलगम या फ्लेवरचा उपयोग करतात. हे फ्लेवर आइसोअमाईल अॅसिटेट आणि इथाईल, मिथाईल, फिनाईल, ग्लाइसिडेट या रसायनांमुळे येतात. टूथपेस्टला असणारा गोडवा सोडियम सॅकरीन किंवा सॉरबिटॉल सॅकरीनमुळे येतो. मीठ म्हणजेच सोडिअम क्लोराईडचा वापर जिवाणूरोधक म्हणून केला जातो.
हसरा चेहरा सगळ्यांनाच प्रसन्न करतो, पण त्याबरोबर हसणाऱ्या व्यक्तीच्या दंतपंक्तीचे दर्शनही घडवत असतो. दातांवर जर डाग असतील तर एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बोलताना, हसताना दात दिसतील हा विचार सतत अशा व्यक्तींना त्रास देत असतो आणि मग दात शुभ्र करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
खरंतर दातांचा रंग नैसर्गिकरीत्या पांढरा शुभ्र नसतो, तो हलका पिवळसर किंवा राखाडी असतो. दंतवल्क (एनॅमल) पारदर्शक असते, दंतवल्काच्या आत दंतिन असते, या दंतिनचा रेंग आपल्याला दिसत असतो. हा रंग बदलण्यास शरीरातील अंतर्गत तसेच बाह्य गोष्टी कारणीभूत असतात. दंतवल्कास तडे पडले तर अन्नपदार्थातील रंग दातांमध्ये शोषले जाऊन दातांना त्यांचा रंग येतो. चहा, कॉफी, मद्य, फळांचे रस, तंबाखूचे सेवन यांमुळेसुद्धा दातांचा रंग बदलतो. वयोमानानुसार दातांच्या रंगात फरक पडतो. जसे वय वाढते तसे दंतिनचा रंग गडद पिवळा होतो. दुधाच्या दातांवरील आवरण तसेच
(दंतवल्क) पारदर्शक नसते त्यामुळे दुधाचे दात पांढरे शुभ्र दिसतात. जर दात किडले तर दातांवर काळे डाग पडतात. काही आजारांमुळे टेट्रासायक्लिनसारख्या प्रतिजैविकांच्या सेवनांमुळे दातांचा रंग बदलतो.
नैसर्गिकरीत्या दात शुभ्र नसले तरी प्रत्येकाला पांढरे शुभ्र दात हवे असतात. दात शुभ्र करणाऱ्या अनेक टूथपेस्ट उपलब्ध आहेत. या टूथपेस्टमधे दातांवरील डाग नाहीसे हायड्रोजन करण्यासाठी पेरॉक्साइडचा वापर विरंजक द्रव्य (ब्लीचिंग एजंट) म्हणून केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साइड सूक्ष्मजीवविरोधकही आहे. हायड्रोजन पेरॉक्साइडबरोबर कार्बामाइड पेरॉक्साइडचा वापर काही टूथपेस्टमधे केला जातो. याशिवाय सोडिअम बायकार्बोनेट, पॉलीव्हिनाइल पायरोलीडन, सोडियम ट्रायपॉलीफॉस्फेट, पॅपिन हे नैसर्गिक एन्झाइम ही रसायने टूथपेस्टमध्ये वापरली जातात.
खरंतर सीलिका, कॅल्शियम कार्बोनेट ही अपघर्षके दंतवल्कावरील डाग दूर करतात आणि त्यानंतर दात शुभ्र करणारी रसायने आपले कार्य करतात. दातांवर डाग पडू नये म्हणून दातांची स्वच्छता नियमित ठेवणे आवश्यक आहे.
कोणत्याही रोगाचे निर्मूलन करताना लोकशिक्षणाची गरज हा मुख्य घटक असतो . Prevention is better than cure असे म्हणणे सोपे आहे परंतु त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणे तितकेच कठीण आहे . मलेरिया हा रोग होण्यास डास हा मुख्यतः जबाबदार असल्याने त्याच्या निर्मूलनाच्या विविध पद्धती दाखविणारे तक्ते , व्हिडीओ फिल्म्स् या शाळा , कॉलेजे , ऑफिसेस् व वस्त्यांमधून दाखविणे आवश्यक आहे . शहरामध्ये शेकडोंनी बाहेर गावाहून येणारे मालवाहू ट्रक्स् , बसेस् तसेच रेल्वेचे डबे हे डेपोत व यार्डात जातात . त्यावेळी त्या गाड्या व डब्यांखालील चेसिस् व चाकांच्या खोबणीत असंख्य डास लपलेले असतात . त्यांच्यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधून मलेरिया रोगाचा फैलाव होतो . मलेरिया झालेल्या रुग्णांना त्यावरील औषधे योग्य वेळी व योग्य प्रमाणात मिळणे अत्यंत गरजेचे आहे . जे प्रवासी मलेरियाचा प्रादुर्भाव नसलेल्या प्रदेशातून मलेरिया ग्रस्त भागात जातात तेव्हा त्यांना रोगप्रतिबंधक औषधे त्या प्रदेशात शिरण्यापूर्वीच दिली जाणे अत्यंत गरजेचे आहे . मलेरिया या रोगासंबधी सामान्य लोकांना प्राथमिक स्वरुपाची माहिती देणारा एक तक्ता मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केला होता . त्याचा हा नमुना
मलेरिया
महत्त्वाची लक्षणे प्रतिबंधक उपाययोजना
ताप घराच्या आजूबाजूस पाण्याची डबकी
हुडहुडी व थंडी तयार न होऊ देण्याची खबरदारी घ्यावी .
डोकेदुखी पाणी साठविण्याची पिंपे व भांडी
अंग दुखणे झाकून ठेवावीत
उलटी व उमासे येणे
खोलीमध्ये Indoor residual spray ( IRS ) कीटकनाशकाचा फवारा मारावा. जास्त काळ टिकणाऱ्या व कीटकनाशक रसायनाचा लेप असलेल्या मच्छरदाण्या वापराव्यात . ( Long lasting insecticidal ( LLIN ) गरोदर स्त्रिया व लहान मुले यांनी वरील प्रकारच्या मच्छरदाणीत झोपणे अत्यावश्यक आहे.)
-डॉ. अविनाश वैद्य
जसा ईसीजी हृदयाचे आरोग्य सांगतो, तसेच इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ हा मेंदूचे आरोग्या कसे आहे हे सांगतो. मेंदूतील विद्युत प्रक्रियेची नोंद करणाऱ्या यंत्राला इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ असे म्हणतात. मेंदूविषयक रोगांच्या निदानासाठी त्याचा उपयोग होतो. मेंदूला गाठ, पक्षाघात अशा आजारात प्राथमिक निदानासाठी ईईजी वापरला जातो. पण आता एमआरआय (मॅग्नेटिक झोनन्स इमेजिंग) व सिटीस्कॅनमुळे ईईजीचा वापर तुलनेने कमी केला जातो.
मलेरिया व औषधे
मनुष्य जातीला मलेरिया सदृश तापाने २५०० ते ३००० वर्षांपासून पछाडल्याचे दाखले आहेत . हा रोग कशा पद्धतीने होतो ह्याचे गूढ उकलण्यास १ ९ वे शतक उजाडावे लागले ; परंतु त्या आधी या तापावर प्रभावी औषधे वापरल्याच्या नोंदी आहेत .
२००० वर्षांपूर्वी चीनमध्ये अशा तापावर चॅगशॅन ( डिकोरा फेरीफ्युगा ) वनस्पतीचे चूर्ण वापरीत असत . १२ व्या शतकापासून पुढे चीनमध्ये Artemisia Anuya ( क्विंघासो ) या वनस्पतीचा उपयोग ताप उतरविण्यासाठी केला जात असे . परंतु नेहमीच्या चीनी पद्धतीनुसार अर्थातच हे औषध जगापासून पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले होते ते अगदी थेट १ ९ ८० सालापर्यंत ! आजमितीला बनणारे Artesunate हे याच वनस्पतीपासून बनविले जाणारे एक प्रभावी औषध आहे .
१७ व्या शतकात दक्षिण अमेरिकेतील स्पेनच्या व्हाईसरॉयच्या पत्नीला झालेला मलेरिया सदृश ताप तेथील एका वनस्पतीच्या सालीच्या अर्कामुळे बरा झाला . त्यावेळी या वनस्पतीला स्थानिक लोक तापाची झाडे ( Fever Tree ) म्हणून ओळखीत . या झाडांचा शास्त्रीय अभ्यास करून त्यांना सिंकोना ( व्हाईसरॉयच्या पत्नीचे स्पेनमधील गाव ) हे गावाचे नाव देण्यात आले .
तसे पाहाता पेरु व त्यांचा शेजारी बोलेव्हिया या देशांमधील क्युचुआ हे इंडियन जमातीचे लोक या सिंकोना झाडाचा उपयोग शेकडो वर्षांपासून ताप उतरविण्यासाठी करीतच होते. तापाबरोबर येणारी हुडहुडी या झाडाच्या रसाने नाहिशी होते व तापही उतरतो याचे ज्ञान त्यांना फार पूर्वीपासून होते . इंडियन जमातीचे लोक ह्या झाडाच्या खोडाची बारीक पावडर वाईनबरोबर मिसळून ती पिण्यास देत ; ज्या अनुभवातून त्याचा मलेरिया प्रतिबंधकारक उपयोग लक्षात आला होता . या जेसूट बार्क ( झाडाची साल ) पावडरचे महत्त्व पेरु मध्ये एवढे वाढले की त्याची मौल्यवान वस्तूंमध्ये गणना होऊ लागली . या झाडाची आयात युरोपात होऊ लागली . इंग्लंडच्या राजाने ही मौल्यवान भेट रोमच्या राजाला दिली . त्यासुमारास इटलीत पोपसकट अनेक मान्यवर व्यक्तींना मलेरिया सदृश तापाने ग्रासलेले होते . फ्रेंच संशोधक पियारे आणि जोसेफ यांनी सिंकोना पासून निघणाऱ्या पावडरचे रासायनिक पृथ : करण केले व १ ९ २० मध्ये त्याला क्विनिन हे नाव देण्यात आले . क्विनिन हा शब्द पेरु भाषेतून क्युचुआ ( इंका ) सिंकोना बार्क व त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन ते क्विना क्विना अथवा पवित्र बार्क ( बार्क म्हणजे झाडाची साल ) या नावाने ओळखले जाऊ लागले .
युरोपियन वसाहती स्थापन करणाऱ्यांनी आपल्याबरोबर क्विनिन अफ्रिकेत नेले . त्यामुळे तेथील स्थानिक लोकांची मलेरियातून मुक्तता होऊ लागली व यामुळे या वसाहतकारांचा अफ्रिकेत चांगला जम बसला . या झाडाचे महत्त्व ओळखून पेरु मधील सरकारने सिंकोनाचे बी युरोपात निर्यात करण्यास बंदी घातली . एका डच व्यापाऱ्याने सिंकोनाच्या बिया पळवून त्याची लागवड जावा बेटांमध्ये केली , जेथे त्यांचे साम्राज्य होते . अशा रीतीने डचांनी संपूर्णपणे सिंकोना बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली . पुढे जवळजवळ १०० वर्षांनंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले . जावा बेटांवर जपान्यांनी कबजा केला . सिंकोना पावडर युरोपात येणे बंद पडले . हॉलंडमध्ये जो काही साठा होता तो जर्मनांच्या ताब्यात गेला . त्यामुळे युरोपियनांची कोंडी झाली . अमेरिकेने कोस्टो रीका या बेटांवर सिंकोना वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही . या सर्व अनर्थामुळे अमेरिका व युरोप या दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना दुसऱ्या महायुद्धात क्विनिन न मिळाल्याने त्यांचे हजारो सैनिक मलेरियामुळे मृत्युमुखी पडले . जपानच्या हाती जावा बेटावरील सिंकोना झाडे होती परंतु त्यापासून क्विनिन तयार करण्याकडे तेथील जपान्यांनी बरोबर लक्ष न दिल्याने त्यांचेही हजारो सैनिक या औषधा अभावी मृत्यु पावले .
महायुद्ध संपले आणि अमेरिकन संशोधकांनी क्विनिनचे उत्पादन प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने केल्यामुळे टनांमध्ये हे उत्पादन होऊ लागले . होमिओपॅथीचा जनक असलेला सॅम्युअल हॅनेमान एकदा ' मलेरियावरील उपचार ' या लॅटिन पुस्तकाचे भाषांतर करीत असताना एका विधानाने त्याचे लक्ष वेधून घेतले . ' सिंकोना बार्क या वनस्पतीमधील क्विनिन या घटकाच्या कडवट गुणधर्मामुळे मलेरिया बरा होतो ' अशा आशयाचे ते वाक्य होते . यापेक्षा अधिक कडू असलेले परंतु मलेरियासाठी प्रभावी नसलेले अनेक औषधी पदार्थ हॅनेमानला ठाऊक होते . सिंकोना बार्कमध्ये नेमके काय रसायन आहे हे शोधण्यासाठी त्याने एक धाडसी प्रयोग केला . त्याने स्वतःच सिंकोना बार्क घेऊन बघितले . काही डोस घेतल्यावर त्याला काही लक्षणे मलेरिया सदृश दिसू लागली . उदाहरणार्थ थंडी वाजून हुडहुडी भरून ताप , डोकेदुखी , अंगदुखी अशक्तपणा वगैरे . डोस बंद केल्यावर ही लक्षणे लगेच नाहिशी होत . त्यांच्या लक्षात आले की सिंकोना बार्क मध्ये मलेरिया सारखी लक्षणे उत्पन्न करण्याची क्षमता आहे . म्हणूनच ते मलेरियावरील औषध आहे . मलेरियाची लक्षणे असलेल्या तापाच्या अनेक रुग्णांना हॅनेमानने सिंकोना बार्कचे अल्प डोस देऊन बरे केले . होमिओपॅथीच्या सिद्धान्ताप्रमाणे उपचाराचे रसायन अतिशय अल्प प्रमाणात दिल्यास रुग्ण बरा होतो .
अशा तऱ्हेने १६३० पासून १९४० सालापर्यंत क्विनिन या एकमेव औषधाने मलेरिया विरुद्ध टक्कर दिली . आजही काही वेळा त्याचा विचार केला जातो . १ ९ ०० ते १ ९ १० या काळात Atomic lodine अथवा Nascent reacting lodine या पासून बनलेले बेसेलिन हे औषध मलेरियावरील रामबाण औषध म्हणून युरोपात उदयास आले होते . या औषधावर भारतातील एक नावाजलेले शास्त्रज्ञ डॉ . शंकर आबाजी भिसे ( जन्म १८६७ मुंबई ) यांनी बरेच संशोधन केले होते . ब्रम्ही तेलाचा उपयोग करुन lodine चे प्रमाण वाढवून त्यांनी Bhise's Medicine for Malaria तयार केले होते . ज्याला पुढे १ ९ २० मध्ये अमेरिकेत पेटंट मिळाले होते . तसेच खाणीमधून मिळणारे गंधकमिश्रित पाणी व काही विशिष्ट समुद्र वनस्पतींचे मिश्रण डॉ . भिसे यांनी तयार केले होते , ज्याचा ॲमेझॉन खोऱ्यातील मलेरिया विरुद्ध यशस्वीपणे उपयोग केला गेला होता . पुढे मेक्सिकोमध्ये या मिश्रणाचे इंन्जेक्शन बनविण्यात आले होते . क्विनिन पेक्षा ही औषधे जास्त प्रभावी ठरली होती .
Edgar Caye नावाच्या डॉक्टरने अशा तऱ्हेच्या औषधांचा मलेरिया विरुद्ध वापर केलेला होता . अशा तऱ्हेच्या अभ्यासाला Holistic Medicine म्हणतात . Caye हे त्याचे जनक होते .
जगातील दर ५० मलेरियाच्या रुग्णांपैकी एक रुग्ण हा अजूनही गावठी वनस्पतीपासून निघणारे औषध वापरतो . झाडांच्या विविध प्रकारच्या जवळपास १४० फॅमिली मधील १२०० निरनिराळ्या तऱ्हेच्या झाडांपासून तयार होणारी औषधे मलेरिया विरुद्ध जगभर वापरली जातात .
१ ९ ४३ मध्ये एका जर्मन औषध कंपनीने क्लोरोक्वीन हे पूर्णत : रासायनिक द्रव्ये वापरून औषध तयार केले . पुढे १० ते १५ वर्षे या एकमेव औषधाने मुसंडी मारली . परंतु त्याच्या बेसुमार वापरामुळे P. Falaciparum विरुद्ध त्याची परिणामकारकता कमी होऊ लागली .
१९६० मध्ये थायलंड , कंबोडिया येथे Falciparum परोपजीवांचा Resistant strain मिळाला , ज्याला क्लोरोक्वीन रेझिस्टंट असेही म्हणतात . या विशिष्ट परोपजीवांचा पुढे दक्षिणपूर्व आशियात प्रसार झाला .
१९७३ मध्ये आसाममधील कार्बी अँगलाँग जिल्ह्यात या क्लोरोक्वीन रेझिस्टंट स्ट्रेनचे
(Chloroquin Resistant strain ) अस्तित्व लक्षात आले .
१९५० सालापासून दर दशकात नवीन औषधांची भर पडत आहे . आजमितीला खालील औषधे मलेरियाकरिता उपलब्ध आहेत .
औषधांची यादी व त्याच्यासमोर ती कोणत्या Brand Name ने बाजारात उपलब्ध आहेत ह्यांची नावे दिलेली आहेत . औषधे बनविणाऱ्या अनेक कंपन्या असल्याने सर्वच्या सर्व ब्रँड नेम देणे शक्य नाही . ही औषधे बाजारात गोळ्या , द्रवरूप डोस अथवा इंन्जेक्शन या स्वरूपात मिळतात .
Generic Name Brand Name
1 ) Quinine Cinkona , Kunen , Malgo 300 ,
Quinarsol , Quinine
2 ) Chloroquine Lariago , Chloroquine
phosphate , Emquin , Rimoquin, Resochin
3 ) Amodiaquine Basoquin, Camoquin
4 ) Primaquine Malirid
5 ) Proquanil
6 ) Mepacrine
7 ) Artesunate Falcigo, Larinate, RTsun (combikit)
8 ) Bulaquine Aablaquin
9 ) Mefloquine Confal, Facital, Mefax, Mefloc
10 ) Artemether Larither, Paluther
11 ) Pyrimethamine Croydoxin, Loridox, Rimodar
and Sulphodoxine
12 ) A - B Arteether Duther, Reether
13 ) Doxycycline
14 ) Erythromycin
अशा प्रभावी औषधांमधून योग्य औषध निवडणे , ती औषधे गोळ्या , इन्जेक्शन , द्रवरूप डोस वा शिरेमार्फत देणे तसेच दोन निरनिराळ्या गटांची औषधे एकत्रित Combination Therapy देणे , हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरविणे अत्यंत आवश्यक आहे काही औषधांमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात . या सर्व विषयाची व्याप्ती फार मोठी असल्याने यासंबंधी अधिक विवेचन केलेले नाही . इतकी प्रभावी औषधे हाती असताना सुद्धा काही वेळा ताप आटोक्यात येत नाही . त्यातील काही समस्यांचा आढावा येथे घेतला आहे .
१ ) औषधांना प्रतिसाद न देणारे परोपजीवी ( Resistant strains of parasites ) व्यवस्थितपणे औषधांचा डोस देऊन सुद्धा जिवंत राहतात व त्यांची वाढ रोखण्यात अपयश येते . एका विशिष्ट मर्यादेच्या वर औषधांचा डोस वाढविणे शक्य नसते . परोपजीवांच्या जनुकात होणारा बदल , व बदललेल्या जनुकांची अमर्याद होणारी वाढ याचबरोबर परोपजीवांमधील औषधांना प्रतिसाद देण्याची नकारात्मकता यामुळे औषधांची मारकता कमी होताना दिसते .
२ ) उलटणारा मलेरियाचा ताप हा शरीरात प्रथम शिरलेल्या परोपजीवांमुळेच होत असतो याचे मुख्य कारण असे की सर्व परोपजीवी रक्तातून नाहिसे झालेले नसतात . यासाठी औषधांचा अपुरा डोस अथवा त्यांचा अपुरा पडणारा प्रभाव कारणीभूत होतो . वारंवार येणारा मलेरियाचा ताप व परत परत डास चावल्याने होणारा मलेरिया या दोन्ही गोष्टी उलटणाऱ्या तापापेक्षा भिन्न आहेत .
३ ) परोपजीवांच्या एकूण संख्येमध्ये औषधाला दाद न देणाऱ्या परोपजीवांचे प्रमाण किती आहे व त्यांची एकत्रितपणे रोग पसरविण्याची क्षमता किती आहे , या परोपजीवांमधील गुणधर्माला Selection Pressure असे संबोधिले जाते . दाद न देणाऱ्या परोपजीवांची संख्या जेव्हा दाद देणाऱ्या परोपजीवांच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर Selection Pressure जास्त आहे असे मानतात . मलेरिया विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम कमी होण्याकडे , अथवा परिणाम मुळीच न होण्याकडे जात असलेला कल ( Trend of Resistance to various drugs ) गेल्या पन्नास वर्षात अनेक औषधांच्या संदर्भात चालूच आहे . या Resistance ( प्रतिकार शक्ती ) प्रक्रियेत खंड पडलेला नाही हे लक्षात आलेले आहे . या मागे अनेक कारणे आहेत .
गरज नसताना सरसकट प्रत्येक ताप मलेरिया समजून नवीन गटाची विविध औषधे वापरण्याकडे दिवसें दिवस कल वाढतो आहे . त्याचबरोबर रक्ताची परोपजीवांसाठी केलेली तपासणी नकारात्मक ( Negative ) असताना औषधे द्यावीत का नाहीत ठरविणे तितकेच कठीण आहे . प्रयोगशाळेच्या रक्त तपासणीची गुणवत्ता ( Quality Control ) चांगली राखणे तितकेच महत्त्वाचे ठरते . या जटील प्रश्नांचा गुंता सोडविणे काही वेळा फार कठीण असते .
जगातील काही गरीब देशांत कमी दर्जाची औषधे मिळत असल्याने रोग आटोक्यात येत नाही . अशा तऱ्हेच्या बनावट औषधे बनविणाऱ्या अनेक बोगस कंपन्या ही त्या देशांची डोकेदुखी आहे.
कुपोषणाने ग्रासलेल्या व AIDS झालेल्या रुग्णात मलेरियाचे परोपजीवी जास्त काळ ठाण मांडून बसतात . त्यामुळे औषधयोजना निराळी करावी लागते . Plasmodium Vivax झालेल्या रुग्णांना काही महिन्यांनंतर परत मलेरिया होण्याचा संभव असतो . त्याकरिता Primaquin या औषधाचा १५ दिवसांचा कोर्स घेण्याची गरज असते . परंतु हे औषध चालू करण्यापूर्वी रक्तातील G.6 PD ( Glucose 6 Phosphate dehydrogenase ) ह्या Enzyme ( विकर ) ची तपासणी करणे आवश्यक आहे . या Enzyme चे रक्तातील प्रमाण फार कमी असेल वा पूर्णपणे त्याचा अभाव असेल तर हे औषध देणे धोकादायक ठरते . पारशी सिंधी व काही मराठी पोटजातीतील काही लोकांमध्ये या Enzyme चा अभाव आढळतो .
मलेरिया प्रतिबंधक औषध उपचार
Drug Prophylaxis : जगामध्ये ज्या देशात मलेरिया अजिबात नाही अशा भागातील प्रवासी जेव्हा मलेरिया ग्रस्त देशात प्रवासास जातात , त्यावेळी त्या देशात पोहोचण्याच्या आधीपासून ते पुन्हा स्वत : च्या देशात परत आल्यानंतर काही दिवसांपर्यंत इतका काळ त्यांना मलेरिया प्रतिबंधक औषधे घेणे गरजेचे असते , या औषधपद्धतीला Chemoprophylaxis or Drug Prophylaxis असे म्हणतात .
मलेरिया ग्रस्त १०० देशांना जगभरातून १२५ दशलक्ष लोक प्रतिवर्षी भेट देत असतात . त्यापैकी ३०,००० लोकांना मलेरिया होतो . यासाठी कोणत्या देशातून प्रवास करताना कोणती औषधे घ्यावीत यासंबंधीत तक्ता W.H.O. तर्फे प्रसिद्ध होत असतो . काळाप्रमाणे औषधे बदलत असतात , त्यांची प्रवाश्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे .
ज्या देशांमध्ये मलेरिया कायमचा ठाण मांडून बसलेला आहे , तेथील लोकांनी अशी प्रतिबंधक औषधे घेतल्याने मलेरियावर प्रतिबंधकता येत नाही . परंतु काही तज्ञांच्या मते यापैकी काही औषधे बराच काळ घेतल्यास उपयोग होण्याची शक्यता असते . तरीसुद्धा गर्भवती स्त्रियांनी अशी औषधे घ्यावीत का हे त्यांच्या तज्ञ डॉक्टरने ठरवावे कारण औषधाचा गर्भावर कोणता परिणाम होईल किंवा नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे . अशी औषधे घेण्याने १०० टक्के प्रतिबंधता मिळेलच अशी खात्री नाही . अखेरीस मलेरियावरील लसीचा पर्याय हाच उपयोगी ठरेल अशी आशा वाटते .
आयुर्वेदिक औषधोपचार व मलेरिया
आयुर्वेदात ज्वराचा अभ्यास फार पुरातन कालापासून केला जात असे . ज्वराची मुदत व हुडहुडीचे प्रमाण यावरून ज्वराचे तीन प्रकार मानलेले आहेत . रोज येणारा ताप , तिसऱ्या व चौथ्या दिवशी येणारा ताप यानुसार येणाऱ्या ज्वराप्रमाणे औषधे ठरविली जात . तापाच्या प्रथम अवस्थेत भूक न लागणे , अंगमोडी , जिभेवर जमा होणारा पांढरा थर अशी लक्षणे असताना पूर्ण लंघन करावे , त्यामुळे प्रतिबंधकारक शक्ती वाढण्यास मदत होते . मलेरिया व तत्सम आजारात अनेक वनस्पतींपासून बनविलेले काढे , मात्रा , पावडरी वापरल्या जात .
सध्या प्रचलित असणारी औषधे आहेत . १ ) सुदर्शन गानवटी २ ) पंचतिकता घानवटी ३ ) नारायण ज्वरअंकुश ४ ) पिवली वर्धमान रसायन ५ ) Alstronine
अमेरिकेतील वॉल्टर रीड आर्मी संशोधन संस्थेत २०,००० वनस्पतींपासून बनविल्या जाणाऱ्या अर्कावर गेली १० वर्षे मलेरिया परोपजीवांपासून होणाऱ्या तापावर संशोधन चालू आहे . त्यातील २६ औषधे निवडलेली असून त्यांचा वापर करण्याबाबत प्रयत्न चालू आहेत . यामधील Alstonia Scholaris वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधात मलेरिया परोपजीवांविरुद्ध चांगले गुण असल्याचे लक्षात आले आहे . वनस्पतींपासून तयार केली जाणारी औषधे कमी किमतीत मिळण्याची शक्यता असल्याने गरीब देशात त्यांचा भरपूर उपयोग करता येईल . परंतु अजून ही औषधे बाजारपेठेत येण्यास बऱ्याच निकषांची गरज आहे .
Copyright © 2025 | Marathisrushti