(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • तोंडाच्या स्वच्छतेसाठी माउथवॉश

    बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दुर्गंधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या हिरड्यांचा समस्या, जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी शकते. अशा येऊ व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही समस्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यतः तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्ये असणारी रसायने वेगवेगळी असतात. काही रसायने दोन्ही उत्पादनांत आढळतात. माउथवॉश चूळ भरण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे तोंडातील जिवाणू नाहीसे होतात. तोंडातील जिवाणूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते. श्वासाला उत्साहवर्धक ताजेपणा येण्यासाठी मिंटसारखे फ्लेवर (स्वाद) माउथवॉशमध्ये वापरले जातात.

    माउथवॉशमध्ये अल्कोहोल, क्लोरहेक्झाडाईन ग्लुकोनेट, थायमॉल, सिटाईलपायरीडिनियम क्लोराईड, हेक्झेटिडीन, ट्रायक्लोसन यांतील काही जिवाणूनाशक रसायने वापरलेली असतात. काही माउथवॉशमध्ये फ्लोराईड वापरलेले असते. जिवाणूरोधक रसायनांव्यतिरिक्त स्वाद आणि सुगंधासाठी युकॅलेप्टल, मेंथॉल, मिथाईल सॅलिसिलेट यांचा वापर केला जातो आणि माउथवॉशमधील गोडवा सोडिअम सॅकरीन या रसायनामुळे येतो. माउथवॉशमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रिझरव्हेटिव्हचा वापर केला जातो. सोडियम बेंझोएट हे रसायन प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरतात.

    तोंडाची स्वच्छता आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी गुळणी करून स्वच्छता करणे ही पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. हिरड्या फुटण्यावर, हिरड्या आकुंचन करण्यासाठी तुरटीच्या गुळण्या करीत असत. तुरटी म्हणजे अॅल्युमिनियम सल्फेट. माउथवॉशमधील रसायने जंतूनाशकाचे कार्य करतात, हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमध्ये वेदना होणे यासाठी उपाय म्हणून माउथवॉशचा वापर उपयोगी ठरतो. माउथवॉशने दातात अडकलेले अन्नपदार्थाचे कण काही प्रमाणात निघू शकतात, पण टूथपेस्टच्या साहाय्याने टूथब्रशने दातात अडकलेले अन्नपदार्थांचे कण चांगल्या प्रकारे निघतात.

    ताज्या श्वासासाठी माउथवॉश वापरायला काहीच हरकत नाही. मौखिक आरोग्य चांगले राहिले तर दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत. माउथवॉश वापरलात तरी टूथब्रश वापरून टूथपेस्टने दातांची चांगली स्वच्छता करणे आवश्यकच आहे.

  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग २ – जांभूळ

    महाराष्ट्रामध्ये हा सदाहरित वृक्ष सर्व ठिकाणी आढळतो. परंतु याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सपाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते.

  • हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १० – पृथ्वीवरील कल्पवृक्ष : नारळ

    हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान, नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.

  • ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ४ – त्रिफळा चूर्णातील महत्वाचा घटक – बेहडा वृक्ष

    लहानपणी बेहड्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे मुलांचे उद्योग असायचे. बांधाच्या कडेने असणारे बेहडा खरं तर लक्ष्य वेधून घेणारा वृक्ष कधीच नव्हता. हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला की यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट.
    बेहडा वर्षभर एवढी रूपे बदलतो की प्रत्येक ऋतू मध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवी ने शहारलेला, हिरव्यागार पानांनी नटलेला आणि पिवळसर बहराने लगडलेला अशी आल्हाददायक तर पूर्ण पानझडी होऊन फक्त खोड राहिलेला निष्पर्ण अशी वर्षभर नानाविध रूप धारण करणारा बेहडा. हाच बेहडा अनेक वेळा आपल्या ढोल्या असणाऱ्या खोडामुळे ढोलीत घरटे करणाऱ्या पक्ष्यांचा आवडता वृक्ष.. पोपट, मैना, पिंगळा, मलबारी धनेश, राखी धनेश, महा धनेश, घुबडं असे अनेक पक्षी याच्या ढोल्यांमध्ये आपल्या पिलांना जन्म देतात.

    बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या वनस्पतीही याच कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्रवनांत बेहडा आढळतो. कोकणात त्याला भेडा किंवा हेला असेही म्हणतात. तो एक आकर्षक वृक्ष असून वनीकरणासाठी, रस्त्याच्या कडेला सावलीसाठी व बागांमध्ये शोभेसाठी लावतात. कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारत, वामनपुराण इ. ग्रंथांत याचे उल्लेख आले आहेत.

    भारतीय भाषां मधील याची नावे:

    शास्त्रीय नाव: Terminalia bellirica

    इंग्रजी: bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan

    आसामी: बौरी

    बंगाली: বহেড়া बहेडा

    गुजराती: બહેડા बहेडा

    हिंदी: बहेडा , बहुवीर्य, भूतवास, कर्षफल

    मराठी: बेहडा , बिभीतक , कलिद्रुम, वेहळा, हेळा किंवा भेळा

    बेहडा आणि हिरडा हे प्रामुख्याने सदाहरित जंगलात आढळतात. हे वृक्ष भारतात बहुतांश ठिकाणी आढळतो. या वृक्षांचे औषधी उपयोग तर आहेतच, शिवाय त्याच्या लाकडाचेही उपयोग होतात. इतर वनवृक्षांच्या मानाने या वृक्षाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे वनीकरणासाठी या वृक्षांची लागवड करावी. हा उंच वाढणारा सदाहरित/पर्णझडी वृक्ष आहे.

    भारतामध्ये सखल भागात अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून, समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, शुष्क पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळून येतो. महाराष्ट्रात पश्चिम घाटात आंबोली, पाचगाव,चांदोली, महाबळेश्वर, गगनबावडा इत्यादी ठिकाणी हा वृक्ष आढळून येतो. साल वृक्ष व साग वृक्षांच्या जंगलात हा वृक्ष प्रामुख्याने आढळतो. सुमारे १०-१२ मीटर वाढणाऱ्या या वृक्षाच्या खोडाच्या तळास "बट्रेस'मुळे असतात. फांद्यांच्या टोकाला घोळक्‍याने पाने आलेली असतात. काहीशी अंडाकृती, गोलाकार पाने असतात. फुले पिवळसर-पांढरट गुच्छात बिनदेठाची असतात. साल राखाडी रंगाची असून त्यावर अनेक लहानलहान उभ्या भेगा असतात. कोवळी पालवी लालसर रंगाची असते. पाने साधी, एकाआड एक व गुळगुळीत असून ती फांद्यांच्या टोकाला एकत्रितपणे वाढलेली असतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाने गळून पडतात फळे गोलाकार परिपक्व झाल्यानंतर बदामी होतात. यामध्ये च्युबुलॅजिक ऍसिड, इलाजिक ऍसिड, इथिल ईस्टर, गॅलिक ऍसिड; ग्लुकोज, मॅनीटॉल, रामनोज हे रासायनिक घटक असतात. फळांचा उपयोग मुख्यत्वे करून त्रिफळा चूर्णामध्ये एक घटक म्हणून केला जातो.

    हिरडा व बेहडा हे एकाच कुळातील वृक्ष आहेत पण प्रजाती (species) वेगळी आहे. परंतु त्यात महत्वाचे फरक आहेत.

    हिरडा बेहडा
    १. १५-२० मीटर उंच ४० ते ५० मीटर उंच वाढतो
    २. पानांचा आकार लांबट पानांचा आकार लहान व कपासारखा
    ३. खोड व लाकूड टणक व टिकाऊ लाकूड टिकाऊ नसते
    ४. खोडाची साल टणक पण मऊ खोडाची साल खरबरीत जाड व भेगा असलेली
    ५. फळे गोलसर लांब, आकाराने लहान फळे मोठी, अंडाकृती, टोकांना निमुळती फिक्कट गुलाबी रंगाची राखाडी रंगाची. प्रत्येक फळात एकच बी असते.
    ७. मंजिरी सरळ असतात. मंजिरी लोम्बत्या असतात.


    फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाने गळून पडतात आणि त्यानंतर बेहडा फुलायला लागतो. फुले अगदी लहान व पिवळट असून त्यांना एक प्रकारचा उग्र वास असतो. अनाकर्षक फुलांच्या असंख्य तुऱ्यांनी वृक्ष मोहरल्यावर जमिनीवर वाळलेल्या फुलांचा सडा पडतो. बेहडा वृक्ष त्याच्या फळांसाठी प्रसिद्ध असून फळे उन्हाळ्यात लागतात. फळे (म्हणजे बेहडे) आठळीयुक्त, २-३ सेंमी. व्यासाची, लंबगोल आणि तपकिरी असतात. प्रत्येक फळात एकच बी असते. ही फळे पक्षी, खारी, माकडे आणि शेळ्यामेंढ्या तसेच हरिणे खातात. उन्हाळ्यात बेहड्याच्या झाडाखाली फळे पडलेली दिसून येतात.

    लागवड:

    परिपक्व फळे रोगविरहित मध्यम वयाच्या झाडापासून गोळा करून ती सावलीत वाळवावीत. फळांवरील आवरण पक्षी, माकडे, खारूताई, प्राणी आवडीने खातात, असे बियाणे जमा करून पेरल्यास रोपे चांगली येतात. एका किलोत ५०-६० ताजी फळे असतात. फळावरील आवरण काढून टाकल्यास ४००-५०० बिया एका किलोत असतात. आवरण काढून बियाणे चांगले वाळविल्यास ते एक वर्षापर्यंत साठविता येते. आवरण काढण्यासाठी फळे २४ तास पाण्यात ठेवल्यास ते काढण्यास सोपे जाते. साठवून ठेवलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता ८५ते ९५ टक्केपर्यंत मिळते, परंतु रोपेनिर्मितीसाठी ताजे बियाणे वापरले असता रोपे दर्जेदार होतात. त्यामुळे ज्या वर्षीचे बियाणे त्याच वर्षी वापरावे. बियाणे गादीवाफ्यावर पेरताना दोन ओळींतील अंतर २० सें.मी. व दोन बियांतील अंतर पाच सें.मी. ठेवून पेरावे. साधारणतः २१ दिवसांनंतर बियाणे उगवण्यास सुरवात होते. रोपांना आवश्‍यकतेनुसार पाणी देणे आवश्‍यक असते. तणकाढणी, खते, कीडनाशकांची फवारणी रोपांच्या वाढीनुसार करावी. सुरवातीला रोपांवर पाने कुरतडणारी अळी आढळून येते. रोपे एक महिन्याची झाल्यानंतर पिशवीत इजा न होता टाकून घ्यावी.बेहडा वृक्षाची लागवड बियांपासून, रोपे तयार करून, खुंटांपासून केली जाते. खुंटनिर्मितीसाठी १२-१५ महिन्यांची रोपे वापरावीत. लागवडीसाठी २ x २ x २फुटांचा खड्डा घेऊन ७ x ७ मीटर अंतराने लागवड करावी. मध्यम निचरा होणारी जमीन या वृक्षास चांगली मानवते.

    लागवडीनंतर सुमारे आठ ते दहा वर्षांनंतर फळे मिळण्यास सुरवात होते. चांगल्या मोठ्या वाढलेल्या झाडापासून ५० ते १०० किलोपर्यंत फळे मिळतात.

    उपयोग:
    फळांचे टरफल जुलाब व कफ कमी करणारे आहे, तसेच सर्दी, पडसे, खोकला, दमा विकारात उपयुक्त असते. स्वरभंगावरती बेहडा फळे भाजून चघळतात. लाकडाचा उपयोग इमारत व मोटारीचे साटे, फळांसाठी खोके, प्लायवूड, ब्लॅकबोर्ड तयार करण्यासाठी केला जातो. ब्रूहत् संहितेत याचा घरबांधणीस उपयोग करू नये असेही नमूद आहे.

    औषधी उपयोग:

    १) डोळ्यात अंजन करून घातल्यास डोळ्याचे रोग दूर करतो.
    २) शरीरातील कुठल्याही प्रकारची जळजळ असेलतर दोन तीन चमचे चुर्ण पाण्यात घालून प्या दोन वेळा, त्वचेची आग होत असल्यास लेप देणे जळजळ थांबते.
    ३) अपचन दुर करुन आमाशय स्ट्राँग बनवतो भूक वाढवतो.
    ४) मुळव्याधीत अत्यंत गुणकारी.
    ५) घशाचे विकार, आवाजाच्या त्रासात ही लाभदायक. वातदोष दूर करतो,पित्त दोष दूर करतो,कफ दोष दूर करतो.
    ६) दमा, अस्थमा, श्वसनासंबधीत आजारात गुणकारी.
    ७) रोज तीनचार ग्रँम मधात घेतल्यास मुत्रमार्गातील जळजळ इनफेक्शन कमी होते.
    ८) बेहड्याच्या ताज्या फळांचा मुरंबा कुठल्याही प्रकारचा खोकला दुर करतो.
    ९) बेहड्याची चारपाच पाने व साखर व थोडी साल ताजी पाण्यात उकळून प्यावे कफ मोकळा होतो बेटका पडणे बंद होते.
    १०) बेहड्याची साल तोंडात धरा कफ खोकला कमी होतो.
    ११) लहान मुलांना पोटसाफ होत नसेलतर फळ उगाळून अर्धा ते पाव चमच तो रस दोन चमचे दूधात देणे.
    १२) बेहड्याचा सालीचे चुर्ण दोन ते पाच ग्रँम लवंग चुर्ण दोन लवंगांचे एकत्रित करून मधात चाटवा कसलेही जुलाब बंद होतील.
    १३) बेहड्याचा फळाचे चुर्ण दोन चमचे भांडभर पाण्यात भिजवून सकाळी ते लावा. केस गळणं काही दिवसात बंद होत. केस काळेच राहतात अथवा पांढरे काळे व्हायला लागून गळतीची समस्या बंद होते तीन महीन्यात पुर्ण फरक दिसतो.लावल्यानंतर चार तासाने धुवायचे.
    १४) बेहड्याची साल ४०ग्रँम, नवसागर दोन, एक ग्रँम सोन गेरु च मिश्रण करुन ते रोज दोन ग्रँम चुर्ण मधात रोज सकाळी संध्याकाळी घ्या. दमा, अस्थमा दुर होतो, दम्याच्या पंपाची गरज बंद होते.
    १५) बेहड्याच्या सालीचे चुर्ण बकरीच्या दूधात शिजवून थंड झाल्यावर दिवसात तीन वेळा गर मधात दोन ते तीन ग्रँम खालल्यास ही दमा, अस्थमा यातून मोकळीक मिळते.बकरीचे दूध न मिळाल्यास पाच ग्रँम चुर्ण दूधात उकळून हळद व दोन चमचे मध घालून दोनदा घ्या कोठासाफ होऊन श्वसनासंबधीत सर्व विकार दुर होतील.
    १६) बेहड्याच एक पान धोतर्याचे एक पान,तमालपत्र एक पान पाने वाळलेली चुर्ण करून रिकाम्या सिगरेटमध्ये अगर चिलमीत घालून प्यायल्यास दमा दुर होतो.पण धोतर्याची मात्रा वाढल्यास माणूस वेडा होतो ,गुंगी येते,नशा चढते रोज प्रयोग करु नये अती त्रास असल्यास करावा.
    १७) बेहड्याची साल हिरवी रोज विड्याच्या पानात दोन बदाम व एक गोडांबी घालून खालल्यास कसाही नपुसंक पणा असो महीनाभरात दुर होतो फक्त महीनाभर ब्रम्हचर्य पाळावे.
    १८) जनावरांच्या जखमान मध्ये किडे पडलेले असल्यास खत झालेले असल्यास बेहड्याचा सालीचा गर रोज खाण्यात मिक्स करुन दिल्यास आराम पडतो.
    १९) डोकेदुखी मध्ये उत्तम.
    २०) गुळण्या केल्यास बसलेला घसा ठिक होतो.
    २१) रक्तदोष दूर करतो.
    २३) पोटातील कृमीनाशक आहे.
    २४) राजयक्ष्मा/टीबी/क्षयरोगात लाभदायक.
    २५) खोबरेल तेल तिळ तेल पन्नास पन्नास ग्रँम व पन्नास ग्रँम बेहड्याच्या फळांचे चुर्ण घालून उकळून तेल उकळवा गाळून भरून ठेवा रोज रात्री लावा एक केस गळणार नाही
    २६) बेहड्याचा५०ग्रँम काढा सकाळी घेतल्यास ताप उतरतो.
    २७) बेहडा व जवस यांचा काढा रोज सकाळी दुपारी संध्याकाळी पन्नास एम एल घेतल्या पित्त शांत होते,कफ,सर्दी, खोकला, ताप कमी होतो.
    २८) बेहडा चुर्ण पाच ग्रँम, अश्वगंधा चुर्ण पाचग्रँम एकत्रित उकळून नियमितपणे घेतल्यास ह्रदयविकारात आराम मिळतो,बीपी नाँर्मल होते.
    २९) जेवणानंतर पाच ग्रँम चुर्ण घेत गेल्यास पचनशक्ती वाढते सर्व अन्न न कुजता पचते.
    ३०) खोबरेल तेल तिळ तेल पन्नास पन्नास ग्रँम व पन्नास ग्रँम बेहड्याच्या फळांचे चुर्ण घालून उकळून तेल उकळवा गाळून भरून ठेवा रोज रात्री लावा एक केस गळणार नाही.
    ३१) बेहड्याचा फळांचा लेप उगाळून रांजणवाडी वर बाहेरून लावा रांजणवाडी जाईल.
    ३२) बेहड्याचा फळांचा लेप शितपित्तावर लावा अंगावरील गांध चट्टे जातील व पाचसहा ग्रँम पावडर मधात घालून घेत जा
    ३३) तोंडातून खूप लाळ गळत असेलतर बेहडा चुर्ण दोन ग्रँम दोनदा मधात चाटवत जा फरक काही दिवसात दिसेल.
    ३४) हर्निया च्या गाठीवर बेहड्याचा लेप लावा फरक लगेचच दिसायला लागेल.
    ३५) सारखी खाज खरूज येतेय बेहड्याच तेल लाव आराम पडेल.
    ३६) एरंडेल तेलात बेहड्याच्या साली चे चुर्ण उकळून त्याचा लेप गळवा वर लावा ते लवकरच मोकळे होईल.
    ३७) डोळ्याची दृष्टी सतत कमी होत असेलतर बेहडा चुर्ण दोन ग्रँम बाळंतशेपा दोन ग्रँम व खडीसाखर दोन ग्रँम रोज दोनवेळा खा
    ३८) बेहड्याच्या फळांचे तेल पिंपल्स, मुरुम, तारुण्यपिटीका,पिंपल्स वर लावल्यास वात,पित्त कफाचे न जाणारे पिंपल्स ही जातात.
    ३९) बेहड्याची फळे जाळून पाव चमचा भस्म निम्मे सैधव एकत्रित करून घेतल्यास आजारात गेलेली शक्ती परत येते.माणूस नवजवान होतो.
    ४०) भाजणे,पाखरू चावणे याने त्वचेवर आलेले फोड जाण्यासाठी फळांचा उगाळून लेप लावा
    ४१) महीलांना कामेच्छा नसल्यास रोज फळ उगाळून ते दोन ग्रँम प्या.
    ४२) आवळा मुरंब्या सोबत चमचाभर बेहड्याच्या सालीचे चुर्ण घेतल्यास कँल्शियम ची कमतरता पुर्ण होते हाडे,मासपेशी स्ट्राँग होतात.
    ४३) सोळा कुष्ठ प्रकारा पैकी कुठल्याही प्रकारचे कुष्ठ बेहड्याच्या सालीचे ताजे चुर्ण घेतल्यास दुर होते.
    ४४) सफेद कोड,गुलाबी डाग,तसेच इतर डाग असणाऱ्या मंडळी नी हे ताज्या सालीचे चुर्ण घेतल्यास कोड कमी होतं ते गोमुत्रात कालवून लावल्यास डाग फिक्के होतात व त्वचा पुर्ववत होते,फक्त वेळ लागतो.
    ४५) सारख्या उलट्या होत असल्यास दोन ग्रँम चुर्ण मधात चाटवा.
    ४६) पोटात वायगोळा, वात येत असेल तर दोन ग्रँम मधात घ्या दोनदा.
    ४७) बेहड्याच्या सालीचे चुर्ण पाण्यात सकाळी संध्याकाळी घेतल्यास कावीळ कमी होते
    ४८) बेहड्याच्या चुर्णात चमचाभर मध घालून चाटण करा उचकी लगेचच थांबेल. सेवनविधी २ते ५ग्रँम चुर्ण एका वेळी.

    झाडाचा औषधी गुणधर्म खरं त्याच्या फळांमध्ये असतो. या झाडाला भरपूर प्रमाणे मध्ये मध्ये फळे येत असतात. फळांचा आकार अंडाकृती असून भुरकट रंगाचा असतो. फळावरील जो वरील भाग असतो तो औषधांमध्ये वापरला जातो. या फळांमध्ये जी बी असते ती फोडल्यानंतर त्यामध्ये गर असतो.

    हा गर खायला चवीला काजू सारखा लागतो. हा गर जर जास्त प्रमाणात खाल्ला तर गुंगी येण्याची शक्यता सुद्धा असते. शिवाय डोकेदुखीचा त्रास वाढत जातो.

    बेहड्याच्या पावडरचा उपयोग प्रामुख्याने घशाचे विकार असतात तसेच कफप्रधान विकार असतात ते विकार दूर करण्यासाठी केला जातो. जुना श्वास घेण्यास संबंधित व खोकल्याचा आजार असेल तर तो दूर करण्यासाठी बेहडा पावडर मदत करतो.जर तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास असेल तर अशावेळी बेहड्याचा पावडर सोबत मध खाल्ल्यास खोकला लवकर बरा होतो. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, खाल्लेले पचत नसेल तर जेवण झाल्यानंतर वेड्याची पावडर एक ग्लास पाण्यामध्ये घेतल्यास पोट व पचनसंस्था काही समस्या आहेत त्या लवकर दूर होतात.

    बेहड्याच्या बियाचे तेल सुद्धा काढतात. या बियांचा पासून बनवलेले तेल यामुळे केस गळतीची समस्या ,केस पातळ झाले असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे तेल सांधेदुखीवर सुद्धा रामबाण औषध ठरते.

    आपल्या घशाचा दाह होत असेल तर अशा वेळी बेहड्याची टरफले फक्त चघळली तरी आपल्याला लवकर फरक पडतो.
    जर तुम्हाला सतत उचकी येण्याचा त्रास असेल तर अशावेळी बेहाडा याच्या बिया मधील गर चाटावा.

    ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा व्यक्तींनी बेहडाच्या सालीचा चूर्ण म्हणून वापर करावा.
    जर तुमची नजर कमजोर असेल यासाठी सुद्धा बेहडा चूर्ण उपयोगी पडते.

    बेहडाची पूड आणि मधु यांना एकत्र करुन त्याचा उपयोग काजळ म्हणून करु शकता. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत मिळेल.

    त्वचा रोगावरही बेहड्याच्य तेलाचा उपयोग करुन त्वचेवर लावल्यामुळे त्वचेवरील खाज, पुरळ कमी होण्यास मदत मिळते.
    लेख लिहतांना नवीन जुन्या पुस्तकाचा आधार तसेच इतर संदर्भ यासाठी अभ्यासले असून काही उपाययोजना निरिक्षण व अनुभवातून दिलेल्या आहेत.प्रयोजन केवळ औषधी वनस्पतीची व त्यांच्या उपाययोजना ची सखोल माहिती सर्वांना व्हावी व निरामय आयुष्य जगताना ही औषधे सहाय्यक व्हावीत हे आहे. या शिवाय ही अनेक आयुर्वेदिक औषधे, होमिओपॅथी ची औषधे, वेगवेगळ्या चिकित्सा पध्दतीचे उपाय ही आहेत. वरील उपाय हे तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखाली करावेत.

    -- दिलीप कुलकर्णी.

    संदर्भ:

    Anil Kumar Dhiman (2006), Ayurvedic drug plants, Daya Publishing House, Delhi
    आयुर्वेद प्रचार मासिक, मार्च १०, २०२० वैद्य गजानन

    Baheda पेपरबैक – १ जानेवारी २०१९ लेखक डॉ. अनुराग विजय वर्गीस
    पॉप्युलर प्रकाशन, जयपूर

    बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच. टीम इये मराठीचिये नगरी एप्रिल १३, २०२२.

    मराठी विकिपीडिया

    गूगल वरील लेख

    आभार: डॉ. दीक्षित जी. बी. माजी विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

  • चहा बनवण्याची सोपी व शात्रीय पद्धत

    चहाचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सिनेन्सिस आहे. तसेच या वनस्पतीच्या पाने व पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून चहा हे पेय बनते.. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते.

    पाण्यानंतर हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो.
    एकोणीशे चाळीस च्या दशका पर्यंत भारता मद्धे सकाळी चहा पिण्याची पद्धत नव्हती. त्याऐवजी लोक लिंबू पाणी प्यायचे. मित्रांना आमंत्रण देतानाही लिंबू पाणी पिण्यासाठी या असे असायचे.

    नंतरच्या काळात ब्रिटिश लोकांनी दक्षिण भारत व ईशान्ये कडे डोंगरउतारावर चहाची लागवड सुरु केली. तो चहा खपवण्या साठी त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे प्रलोभन दाखवून भारतीयांना चहाची सवय लावली. आमच्या लहान पणी आठवडे बाजारात लिप्टनचा चहाची टांग्यामधून जाहिरात करणारे एजंट यायचे व लोकांना फुकट चहा पावडर वाटायचे. अशा प्रकारे लोकांना सवय लावून नंतर विक्री करायचे.

    जगामद्धे नाही तरी भारतात चहाचे असंख्य प्रकार आहेत. त्यातील काही मुख्य प्रकार असे आहेत

    १. बदाम पिस्ता चहा, २. बिरयानी चहा, ३. गुलाबी चहा, ४. ईराणी चहा, ०५. आसाम चहा ०६. दार्जिलिंग चहा ०७. निलगिरी चहा ०८. तंदुरी चहा. ०९. कहवा काश्मिरी चहा.१० चॉकलेट चहा ११. कोल्हापूर कडील बासुंदी चहा १२. इराण्यांचा मस्का बन टी १३. ब्रिटिश लोकांचा हाय टी (खारी व बेकरी पदार्था बरोबर)

    अलीकडे कोविड महामारीत प्रसिद्धीस आलेले, मसाला टी, मालेगावचा काढा चहा, गवती चहाची पाने, तुळस वगैरे टाकून केलेला औषधी चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी.

    चहा तयार करण्याच्या पद्धती:

    चहाच्या पत्तीमद्धे टॅनिन नावाचे रसायन असते. पत्ती उकळत्या पाण्यात टाकली कि त्यातील टॅनिन पाण्यामद्धे उतरते.त्याची चव तुरट-तिखट असते. या रसायनामुळे मेंदूला तरतरी येते व त्याची सवय लागते. ब्रिटिश लोक चहा कोरा बिनदुधाचा घेतात. पण भारतीय लोकांना दूध व पत्ती घालून केलेला चहा आवडतो.

    चहाची चव हि पत्ती कितीवेळ उकळत्या पाण्यात आहे व त्यात किती प्रमाणात दूध घातले जाते यावर अवलंबून असते.काहींना कडक चहा आवडतो असा चहा उकळत्या पाण्यात बराच वेळ ठेवला जातो त्यामुळे त्यात ज्यास्त टॅनिन उतरते व चहा कडक बनतो.

    चहापत्तीची गुणवत्ता देखील चांगला चहा बनवण्यास कारणीभूत असते. त्यामुळेच बाजारात चहापत्तीचे विविध ब्रँड उपलब्ध आहेत. जो तो आपल्या आवडीप्रमाणे चहापत्ती वापरतो. सर्वात महाग व उत्कृष्ट चहा हा दार्जिलिंगचा मानला जातो.

    अनेकांना चहाशिवाय चैन पडत नाही. काही जण आळस घालवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी आवर्जून चहा पितात. तसंच बरेच जण दिवसाची सुरुवात चहाने करतात. विशेषतः विद्यार्थी वर्ग रात्री अभ्यास करताना हुशारी येण्यासाठी व झोप घालवण्या करता चहा घेतात. दिवसाची सुरुवात मनाजोग्या चहाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; मात्र हाच चहा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवतो. त्यामुळे चहाची चवसुद्धा वेगवेगळी असते.

    चहात केवळ चार गोष्टी वापरल्या जातात. प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून चहा तयार करत असल्याने चव वेगवेगळी लागते. कोणी साखर वापरून, तर कोणी गुळाचा वापर करून चहा बनवतो. तसंच यामध्ये दूध टाकून किंवा बिनदुधाचाही चहा बनवला जातो.

    आपल्या, तसंच मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो; पण चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा याची खास माहिती/ पद्धत सांगणार आहे. चहा विविध प्रकारे तयार केला जातो. प्रत्येकाची चहा बनवण्याची एक खास पद्धत असते. तसंच प्रत्येकाची चहा उकळण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. दूध किंवा दुधाशिवायही चहा बनविला जातो. बिनदुधाचा चहा आरोग्यास चांगला असतो; मात्र आपल्याकडे दुध घालून बनवलेला चहा सर्वांत जास्त प्रमाणात प्यायला जातो.

    चहा बनविताना चुकीची पद्धत वापरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे चहाची चव बिघडते. बरेच जण आधी दूध उकळून मग त्यामध्ये पाणी, चहा पावडर घालतात. ही चुकीची पद्धत आहे. यात बराच वेळ दूध उकळावं लागतं. गॅस जास्त लागतो. सर्वांत शेवटी चहा पावडर घालणंही चुकीचीच पद्धत आहे. चहा चांगला उकळावा लागतो. तसं केलं, तर कमी चहा पावडर वापरूनही चहाला चांगली चव आणि गंध मिळतो.

    ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने (BSI) वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चहा करण्याची पद्धत सांगितली आहे. चहाचे भांडे हे नेहमी स्टीलचे किंवा पितळेचे असावे. या पद्धतीत एका स्टील किंवा पितळी भांड्यामध्ये फक्त दूध उकळवावं. चमच्याने ते ढवळत राहावं. दुसऱ्या भांड्यात चहासाठी पाणी गरम करायला ठेवावं. पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण एकसमान असावं. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये चहा पावडर घालावी. चहा पावडर साखरेच्या प्रमाणापेक्षा थोडी कमी असावी. त्यानंतर चहाला चांगली उकळी येऊ द्यावी. साखर चवीनुसार घालावी. कांही लोक चहा पाण्यामध्ये न उकळवता मुरवत ठेवतात. त्यानंतर आवडीनुसार चहात आलं, लवंग, मिरपूड यांपैकी काही घालायचं असेल तर घालू शकता. चहात आले कुटून घालताना चहाचे तापमान थोडे कमी होऊ द्यावे नाहीतर दूध नासते. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं दूध चहामध्ये घालावं. त्यानंतर मात्र चहा जास्त वेळ उकळू किंवा मुरुवू नये.
    अशी ही चहा बनवण्याची खास पद्धत आहे. विशेष म्हणजे जुन्या शहरांमध्ये बरीच वर्षं चहा विकणारे अमृततुल्य विक्रेतेसुद्धा चहा बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतात. ही पद्धत तुम्हीही नक्की वापरून पाहा. ह्यात पण तुम्ही छोटा मोठा बदल करून तुम्हास आवडणाऱ्या चवीचा चहा बनवू शकता.
    चहा हे पृथ्वीवरील अमृत समजले जाते व ते प्राशन करण्यासाठी एवढा सोहळा केलाच पाहिजे ना?

    सध्या ह्या व्यवसायात उच्च शिक्षित तरुण पण उतरले आहेत. ते वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचा चहाचा ब्रँड निर्माण करतात. त्यांचा व्यवसाय पण छान चालतो. जसे कि पुण्यात येवले टी ईत्यादी.

    सावधानता : चहा हा पित्तकारक गुणधर्माचा आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी जास्त चहा घेऊ नये. साधारण पणे दिवसातून २-३ कप चहा पुरेसा असतो.

    -- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

  • दंतमंजन किंवा मशेरी

    रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम आपण दात स्वच्छ करतो. दातांच्या फटींत व तोंडात इतरत्र अन्नाचे कण तसेच राहू दिले, तर लाळ व उष्णता यांमुळे ते कुजू लागतात. रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो. पिष्टमय आणि गोड पदार्थांचे तोंडात राहिलेले कण आणि तोंडातील बॅक्टेरिया यापासून लॅक्टिक आम्ल तयार होते व त्याने दंतवल्कावर व (एनॅमलावर) अनिष्ट घडतो. परिणाम एनॅमलमध्ये कॅल्शियम फॉस्फेट हे क्षार असतात. लॅक्टिक आम्लामुळे दातांवरील कॅल्शियम फॉस्फेटचे आवरण नाहीसे होते. यातूनच दात किडणे, हिरड्यांतून रक्त किंवा पू येणे, तोंडाला व श्वासाला घाण वास येणे इ. व्याधी उद्भवतात. दात स्वच्छ करण्यासाठी फार पूर्वीपासून दंतमंजन वापरले जात असे. दात स्वच्छ करण्यासाठी दातांवर घासण्याकरिता बनविलेल्या मिश्रणास 'दंतमंजन' म्हणतात.

    पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी कडुनिंबांच्या काड्यांचा वापर करत असतं. कडुनिंब हे जंतुनाशक आहे. कडुनिंबाव्यतिरिक्त खैर, करंज, अक्रोड इ. तुरट चवीच्या झाडांच्या मृदू काड्या वापरत असतं. या झाडांच्या सालीत टॅनिन नावाचे जे द्रव्य असते त्याने हिरड्या आकसतात व कुंचल्यामुळे दातांच्या फर्टीतील अन्नकण निघून येतात. हिरडा, बेहेडा, आवळा (त्रिफळा चूर्ण) इत्यादींचे चूर्ण मधात मिसळून त्याने दात घासण्याची पद्धत होती. हिरड्यांमध्ये गॅलिक आम्ल, चेबुलिनिक आम्ल, टॅनिक आम्ल असते. आवळ्यात अँसकॉर्बिक आम्ल आणि बेहडामधे चेबुलॅजिक, गॅलिक, ऑक्झॅलिक आम्ल असतात. त्रिफळा चूर्णात तिन्ही फळांच्या एकत्रित रसायनांमुळे तोंडातील जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध होतो.

    वनस्पतींशिवाय कोळसा आणि समुद्रफेस (एक प्राणिज औषधिद्रव्य) यांच्या चूर्णाचाही वापर दंतमंजन म्हणून पूर्वी केला जात असे. कोळसा, भाताचे तूस किंवा गोवऱ्या जाळून मिळणारी राख याचाही वापर केला जात असे. तंबाखू जाळून केलेली पूड (मशेरी) आजही वापरली जाते. तंबाखूत निकोटिन हे रसायन असते, ज्यामुळे रक्तदाब वाढणे यासारखे आजार होऊ शकतात, म्हणून ते न वापरणंच योग्य.

  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ४ – डाळिंब

    डाळिंबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्‍हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्‍याचा उल्‍लेख आढळून येतो; डाळिंबाचे उगमस्‍थान इराण असून इ.स. 2000 वर्षापासून डाळिंबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्‍पेन, इजिप्‍त, अफगाणिस्‍थान, मोराक्‍को, बलूचीस्‍थान, पाकीस्‍तान, इराक, ब्रम्‍हदेश चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्‍ये लागवड केली जाते. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राचा देशाच्या उत्पादनामध्ये ६६.९० टक्के वाटा आहे.

  • हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ८ – अशोक वृक्ष

    बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे. मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो.

  • ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ७- पानझडी जंगलातील रंगत वाढवणारा – खैर वृक्ष

    पानझडी जंगलातील रंगत वाढवणारा - खैर वृक्ष

    खैर या वृक्षाचे (शास्त्रीय नाव: Acacia catechu, अकॅशिया कॅटिचू; इंग्लिश: Black Catechu (ब्लॅक कॅटिचू), Mimosa catechu (मिमोसा कॅटिचू); संस्कृत - खदिर) हा १५ मी. उंचीपर्यंत वाढणारा पानझडी जंगलातील काटेरी वृक्ष आहे. चीन, आग्नेय आशिया, भारतीय उपखंड व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशांत हा निसर्गतः आढळतो.

    काताबद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष. खैर-बाभूळ, खदिर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फॅबेसी कुलातील आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतापासून भारतातील आसामापर्यंत आणि म्यानमारमधील रुक्ष मैदानांत हा वृक्ष आढळून येतो. भारतातील पश्चिम घाट, आंध्र प्रदेश, पंजाब इ. प्रदेश आणि हिमालयात सु. १,५०० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात हा चिपळूण, सावर्डे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आढळतो. याच्यापासून काथ (कात) हा विड्याचा घटकपदार्थ बनवला जातो.

    खैर हा मध्यम आकाराचा वृक्ष ९-१२ मी. उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी हिरव्या, तर जुन झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. काटे लहान पण टोकाला वाकडे असतात. पाने संयुक्त व पिसांसारखी असून दलांच्या १०-१२ जोड्या असतात. लहान दले असंख्य व बिनदेठांची असतात.

    फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणसावर येतात. खैराची फुले पिवळ्या रंगाची असतात. त्यांना देठ नसतो. सपाट टोकाला निमुळत्या होत गेलेल्या शेंगा वृक्षावर येतात. शेंगा पातळ, पिंगट, सरळ, ५-८ सेंमी. लांब व टोकास चोचीसारख्या असतात. त्यात ३-१० बिया असतात.

    खोडाच्या लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास कात (कॅटेच्यू) म्हणतात. खैर वृक्षाचे लाल खैर व सोन खैर असे दोन प्रकार आहेत. लाल खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया चुंद्रा आहे. महाराष्ट्रात विशेषकरून हेच आढळत असल्यामुळे सामान्यपणे हेच खैर किंवा काताचे झाड असे मानतात.

    खैराच्या झाडाच्या अतिजून, लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात (किंवा काथ) म्हणतात.
    खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरतात. काताचा उपयोग जखम लवकर भरून येण्यासाठी होतो. तसेच उपदंशच्या व्रणावरही कात उपयुक्त आहे. कात पाचक, रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. खैराचे लाल खैर, सोनखैर असे इतर प्रकार आहेत. लाल खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया चुंद्रा आहे. सोन खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया पॉलिकँथा (अ‍ॅकेशिया सुमा) आहे. कातासाठी हेही झाड प्रसिद्ध असून ते उ. कर्नाटक व द. महाराष्ट्र येथे आढळते. याखेरीज प. बंगाल, बिहार, व श्रीलंका येथेही आढळते.

    मुखवासासाठी कात पानाच्या विड्यात वापरतात. कातडे कमाविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांना चारतात. कातामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन द्रव्ये असतात.

    कात:
    मुख्यतः खैर वृक्षाच्या (ॲकेशिया कॅटेच्यू) लाकडापासून काढलेला अर्क गाळून वाळविल्यावर जो घन पदार्थ मिळतो त्यास `कात’ असे म्हणतात. खैराशिवाय थोडया प्रमाणात ताज्या सुपाऱ्या, आवळी फळ, गॅंबिअर झाडाची (युन्कॅरिया गँबीर) पाने कात तयार करण्यासाठी वापरतात. खैर झाडापासून `कात’ व `कच्छ’ असे दोन पदार्थ मिळतात. ज्यामध्ये कॅटेचीन जास्त प्रमाणात असते त्यास `कात’ व ज्यामध्ये कॅटेच्यू टूनिक अम्ल जास्त असते त्यास `कच्छ’ असे म्हणतात. भारतामध्ये कात विड्यातून खातात तसेच त्याचा औषधातही उपयोग करतात. कच्छचा उपयोग कपडे रंगविण्यासाठी व कापड छपाईमध्ये तसेच गॅंबिअर काताऐवजी कधीकधी करतात. सामान्यतः `कात’ आणि `कच्छ’ या दोहोंनाही कात म्हणूनच ओळखले जाते. खैर वृक्ष भारत व ब्रह्मदेश या देशांतील जंगलात आढळतात. अ‍ॅकारिया गॅबिएर या झाडांच्या फांद्या व पानांपासून काथ करतात. खेराचं लाकूड पाण्यात उकळून तयार केलेला अर्क वाळवल्यावर त्यापासून काथ तयार होतो. काथाचा रंग तपकिरी करडा किंवा तांबडत करडा असतो.

    काथाचा खडा छिद्रमय आणि ठिसूळ असतो. काथ तोंडात टाकताच पहिल्यांदा कडू आणि झणझणीत चव लागते. त्याला

    एक विशिष्ट वास असतो. काथामध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते. याच टॅनिक अ‍ॅसिडमुळे काथाचा उपयोग गुळण्या करण्यासाठी व हिरड्यांना लावण्यासाठी केला जातो.

    केसांमध्ये दिसणारा सफेद केस कोणालाच नको असतो. काही जण केस पांढरे व्हायला लागल्यानंतर डाय करायला लागतात. पांढरा रंग लपविण्यासाठी बरेचदा अमोनिया असणारा रंग वापरला जातो. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. केसांना रंग देण्यासाठी मेंदीचाही वापर सर्रास केला जातो. यामुळे केसांचे नुकसान होत नाही. पण बऱ्याचदा असे वाटते की, मेंदीचा रंग उतरायला लागल्यावर केस लाल दिसू लागतात आणि मेंदीने केसांना एकच रंग मिळतो. पण असे नाही. मेंदीमुळेही तुम्हाला हवा तसा रंग केसांना देता येतो. तुम्ही मेंदी तयार करताना काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला हवा तसा रंग तुम्हाला केसांना देता येतो आणि तेही कोणत्याही केमिकलयुक्त रंगाशिवाय. मेंदीने तुम्ही केसांना लाल, ब्राऊन आणि बरगंडी असे कलर नक्कीच देऊ शकता. यामुळे मुळात केसांना कोणतेही नुकसान पोहचत नाही आणि तुमचे केसही व्यवस्थित राहतात. काथामुळे हिरड्या मजबूत होतात. तोंडातल्या आतील जखमा बऱ्या होतात. तसेच यामुळे गळ्याची सूज उतरते. चिघळलेल्या जखमांवर काथाचे मलम लावल्यास त्या लवकर बऱ्या होतात. खाण्याचं पान बनवतानाही काथाचा वापर केला जातो.

    सरळ झाडापेक्षा वेड्यावाकड्या झाडांपासून कात जास्त मिळतो. नुकत्याच तोडलेल्या झाडापासून मिळणाऱ्या काताचे प्रमाण वाळलेल्या झाडापेक्षा जास्त असते. मेलेल्या झाडापासून कात निघत नाही. शरद ऋतूत व हिवाळ्यात तोडलेल्या झाडांपासून कात जासत मिळतो. झाडाचा बुंधा ६०-१२० सेंमी. व्यासाचा झाल्यावर व झाडावर पांढऱ्या रेषा किंवा ठिपके दिसल्यास ती तोडतात. एका झाडापासून त्याच्या लाकडाच्या ७% कात मिळतो. काताचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो. कात औषधी आहे. मुखवासासाठी कात पानाच्या विड्यात वापरतात. कातडे कमाविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांना चारतात. कातामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन द्रव्ये असतात.

    खैर झाडामध्ये एल एपिकॅटेचीन, रॅसेमिक ॲककॅटेचीन व कॅटेच्यू टूनिक अम्ल ही संयुगे असतात. जून झाडात `खीरसळ’ हे करडे पांढरे स्फटिकीय चूर्ण सापडते. त्यात प्रामुख्याने एल एपिकॅटेचीन हे संयुग आढळते. कात तयार होत असताना एपिकॅटेचिनाचे रॅसेमिक ॲककॅटेचिनामध्ये रुपांतर होते. ते थंड पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे), तर उष्ण पाण्यात विद्राव्य असून पाण्याच्या सानिध्यात त्याचे ऑक्सिडीकरण (ऑक्सिडीभवन) होऊन कॅटेच्यूटूनिक आम्ल बनते.

    उत्पादन:

    खैरकात-

    कुटिर उद्योगात हा कात एकाच प्रकाराने करतात. यामध्ये कच्छ मिळविण्याचा प्रयत्न केला जात नाही. साधारणपणे नोव्हेंबर-फेब्रुवारीमध्ये कात तयार करण्यात येतो. खैराची झाडे तोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करतात. त्यावरील आवरण काढून टाकतात व आतील लाल लाकडाचे आणखी बारीक आकाराचे तुकडे करतात. हे तुकडे मातीच्या भांड्यात पाण्याबरोबर शिजवून त्यातील अर्क काढतात. ही मातीची भांडी भट्टीवर किंवा चुलवणवर एका ओळीत ठेवतात. साधारणः एकाच वेळी सु.२५ भांडयांचा उपयोग करतात. प्रत्येक भांडयात सु.७ किग्रॅ.तुकडे भरतात.

    लाकडापासून पहिला अर्क काढण्यास तीन तास लागतात. तीन तासांनंतर भांड्यातील पाणी ओतून काढतात व दुसरे पाणी घालून परत शिजवितात. असे ३-५ वेळा पाणी बदलतात. शेवटच्या खेपेचे पाणी नवीन लाकडाबरोबर शिजवितात.

    अर्कयुक्त पाणी मसलिन कापडातून गाळतात व या विद्रावाची संहती (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण) मातीच्या भांडयात वाढवितात. नंतर हा विद्राव बरेच दिवस तसाच ठेवतात. नंतर तो वाळू व मातीयुक्त स्तर असलेल्या भांडयात ठेवून किलतानाने बंदिस्त करतात व १५ दिवस तो तसाच ठेवतात. विद्रावातील विद्राव्य टॅनीन बाहेर पडते व कात आत राहतो. त्याचे ठोकळ्यांत रुपांतर करुन त्याच्या आवश्यक त्या आकाराच्या वडया करतात. ह्या वडया सावलीत वाळवितात. उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये काताला चव येण्यसाठी विद्रावात सेमुळ झाडाची लाकडे एक आठवडाभर ठेवतात व नंतर कात घट्ट करतात.

    कात तयार करण्याची वरील पध्दत वेळखाऊ व खर्चिक असून तयार होणाऱ्या कातात टॅनिनचे प्रमाण वेगवेगळे असते, तसेच कातात मलिनता जास्त असते. शिवाय त्यात कच्छ हा उपपदार्थही मिळत नाही. डेहराडून येथील `फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट’ मध्ये झालेल्या संशोधनानुसार कात बनविण्याच्या पध्दतीत सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारलेल्या पध्दतीत कच्छही मिळतो. या पध्दतीमध्ये लाकडाचे तुकडे (२५ किग्रॅं. पर्यंत) तांब्याच्या जाळीवर ठेवतात. ही जाळी तांब्याच्या भांडयात ठेवलेली असते. त्यात पाण्याच्या साहाय्याने (३० लि. पाणी) अर्क काढतात. पहिला अर्क निघण्यास दिड ते दोन तास लागतात. नंतर दोन वेळा अर्क काढतात. यावेळी तीस मिनिटे लाकडे शिजवितात. तिसऱ्या वेळेचा अर्क सौम्य असतो. तो नवीन लाकडाबरोबर वापरतात. सर्व अर्क एकत्रित करुन उघडया काहिलीत त्याची संहमी (घनता १.०७-१.१३ ग्रॅ./घ.सेंमी. होईपर्यंत) वाढवितात व नंतर अर्क २-३ दिवस तसाच ठेवतात. यावेळी काताचे स्फटीक बनतात. ते काढून घेतात व दुसऱ्यांदा स्फटिक मिळवितात. सर्व स्फटिक पाण्याने धुवून ते कॅन्‌व्हासमधून गाळून हातदाब यंत्राने दाबून वडया तयार करतात. प्रथम वडया सावलीत व नंतर ४००से. वर वायूच्या साहाय्याने जाळीवर वाळवितात. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास एक आठवडा लागतो व मिळणाऱ्या मालाचा दर्जा उत्तम असतो. मूळ विद्रावाची संहती तांब्याच्या काहिलीत वाढवून, तो विद्राव लाकडी चौकटीत ओततात. यामुळे कच्छ उत्तम प्रतीचा मिळतो. एकाच झाडाच्या लाकडापासून एकाच वेळी ३-३.५% कात व ८-१०% कच्छ मिळतो.

    मोठया प्रमाणावर कात बनविण्याचे काम यांत्रिक पध्दतीने करतात. मोठया प्रमाणात अर्क काढण्यासाठी तांब्याचे ऑटोक्लेव्ह (दाबाखाली शिजविण्याचे पात्र) वापरतात. यामध्ये एका ऑटोक्लेव्हमधून पाणी दुसऱ्यात जाण्याची योजना केलेली असते व अशा रीतीने १२ तासांत अर्क निघतो. अर्काची संहती निर्वातावस्थेत वाढवितात व प्रशीतकामध्ये तो थंड करुन काताचे स्फटीक मिळवितात व ते स्फटिक विद्रावापासून दाब-गा ळणीने अगर केंद्रोत्सारणाने (केंद्रापासून दूर जाणाऱ्या प्रेरणेने) बाजूला काढतात. त्याच्या वडया करुन उष्ण हवेने वाळवितात. पटल बाष्पीभवन पात्रात विद्रावाची संहती वाढवून कच्छ मिळवितात.

    काताचे प्रकार:

    फूल कात, जनकपुरी कात, गल्ला कात, मधई कात, पापडी कात, गोरा कात इ. काताचे प्रकार बाजारात आढळतात. फूल कात वजनाला हलका व फिक्कट रंगाचा असतो. गोरा कात हा कच्छ, गॅंबिअर व तांबडी माती यांचे मिश्रण असतो. पापडी कातामध्ये खडू व अरेबिक डिंक असतो. सुवासिक कातात बडीशेप, अजमोदा, वेलची, दालचिनी, लवंग, धने, चंदन, केशन, केवडा इ. पदार्थ मिसळतात. बाजारात येणारा कात हा फिक्कट तांबड्या रंगाचा, विविध आकारांमध्ये किंवा चौकोनी वड्यांच्या स्वरुपाचा असतो. तो तुरट असतो. अतिशुध्द काताचे स्फटिक असतात. पण बाजारी कातात सामान्यतः अर्जुनाची साल (चूर्ण), गॅंबिअर कात, कच्छ, हिरडा, गॉल नट, चिनी माती, खडू, स्टार्च, अरेबिक डिंक, तांबडी माती, लोहाचा तांबडा ऑक्साइड इ. मिसळतात. बाजरी काताचे विश्लेषण केल्यास आर्द्रता ११.२ %, कॅटेचीन २१.४ %, कॅटेच्यू टूनिक अम्ल ३४.७ %, इतर कार्बनी पदार्थ २७.१५ % व राख ५.५ % आढळते तर चांगल्या प्रतिच्या कातात कॅटेचीन ६० %, थंड पाण्यात विद्राव्य असणारा भाग ३० %, आर्द्रता ९.२५ %, अविद्राव्य भाग ०.७५ % व राख ०.५ % आढळते.

    कच्छ हा करड्या किंवा नारिंगी काळसर रंगाच्या लहान धनाच्या वा ठोकळ्यांच्या स्वरुपात मिळतो. हा कठीण व गंधहीन असून तुरट चवीचा असतो. त्याचे विश्लेषण केल्यास आर्द्रता १०-१२.५ % टूनीन ४५-५० %, टॅनीनविरहित भाग २४-३२ %, राख २-३ % मिळते.

    उपयोग:

    भारतात काताचा उपयोग विडयातून खाण्यासाठी फार प्राचीन काळापासून केला जात आहे. तसेच त्याचा आयुर्वेदीय औषध म्हणूनही उपयोग करतात. त्याच्यात शीतक, पाचक, जंतुनाशक गुणधर्म आहेत. व्रण, रक्तस्त्राव, त्वचारोग, उपदंश, मूळव्याध व कातडीच्या भेगा यांवर त्याचा पोटातून घेण्यासाठी व बाहेरुनही उपयोग करतात. काताचा इतर औषधांबरोबर चूर्ण, गोळया, आसव, अरिष्ट, मलम इ. स्वरुपांतही उपयोग करतात.

    खैराचे लाकूड अतिशय कठिण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, घाण्याच्या लाटा, होड्या, खांब, तलवारीच्या मुठी इ. कामांस ते उपयुक्त असते. जळणासाठी तसेच कोळशाकरिता ते वापरतात.

    कच्छचा उपयोग रंजक क्रियेत व कातडे कमावण्यासाठी करतात. तसेच पाण्याशी वारंवार संबंध येणाऱ्या बोटींना व कोळयांच्या जाळ्यांना संरक्षक पदार्थ म्हणून लावतात. कॅलिको कापड छपाईत, लगदा व कागद रंगीत करण्यासाठी, पाणी मृदू करण्यासाठी, स्टेन्सिल व छपाई यांच्यासाठी लागणाऱ्या शाईच्या निर्मितीत, बाष्पित्राच्या (बॉयलरच्या) आतील भागांवर बसणारे पाण्यातील लवणांचे थर नाहीसे करण्यासाठी व खोल असणाऱ्या तेलाच्या विहिरी खोदताना चिखलाची श्यानता (दाटपणा) कमी करण्यासाठीही कच्छचा उपयोग करतात. कातडी कमावण्यासाठी कच्छ वापरल्यास त्यांचा रंग जाऊन ती कठीण होतात.

    भारतातील कात उत्पादन, कारखान्यांची संख्या इ. आकडेवारी फारशी उपलब्ध नाही. तयार होणारा कात भारताततच वापरला जातो. मात्र काताची आयात व निर्यातही होते. भारतातून ब्रिटनला कच्छ व गॅंबिअर कात निर्यात करण्यात येतो, तर ब्रह्मदेश व सिंगापूर येथून त्याची काही प्रमाणात आयात करण्यात येते. पान खाण्याची सवय असणाऱ्यांना कात शिवाय पान खाणं शक्य नाही. काता शिवाय पान कधीही चांगली चव देऊ शकत नाही.
    पण पानात घालणाऱ्या कातच्या औषधी उपयोगा विषयी आपण चर्चा करू.

    पानात वापरला जाणारा कात तपकिरी रंगाचा असतो. जो औषधी गुणधर्माचा आहे. ह्याच्या नियमितपणे सेवन केल्याने अनेक रोग नाहीसे होतात.

    दातांचे आजार दूर करतो -

    कातचे नियमित सेवन केल्याने दाताचे आजार दूर करू शकता. या साठी कात मंजनेत मिसळून दात आणि हिरड्यांना नियमितपणे स्वच्छ केल्याने दाताचे सर्व आजार नाहीसे होतात. ह्याचा वापर करताना लक्षात ठेवा की हे मंजन मध्ये जास्त मिसळायचे नसून फक्त अर्ध्या चिमूटभर घ्यावयाचे आहे.

    तोंडाचे छाले दूर करते-

    बऱ्याच वेळा काही लोक तोंडाच्या छाल्यापासून त्रासलेले असतात, तर काही लोक पान खाण्याचा सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्याचे अर्थ असे असतात की जेव्हा देखील आपण पानाचे सेवन कराल त्या मध्ये कात आवर्जून टाकावा आणि मगच त्या पानाचे सेवन करावं. असं एक किंवा दोन वेळा केल्यानं तोंडातील छाले नाहीसे होतात.

    करपट ढेकर दूर होते-

    आता कळलेच असणार की कात किती फायदेशीर आहे. जर आपण करपट ढेकर येण्यापासून त्रासलेले असाल तर ते दूर करण्यासाठी आपण कात चा वापर करू शकता. या साठी आपण सकाळ संध्याकाळ एक ते दोन चमचे गरम पाण्यात कातची भुकटी मिसळून सेवन करा. या मुळे करपट ढेकर ची समस्या दूर होईल.

    घशात खवखव होणे -

    जर आपण बदलत्या हवामानामुळे घशात होणाऱ्या खव-खव मुळे त्रासलेले असाल, तर त्याला दूर करण्यासाठी कात वापरू शकता. यासाठी आपण काताची भुकटी गरम पाण्यात मिसळून किंवा काताची भुकटी चघळून घशातील खवखव दूर करू शकता. बरेच लोक हे सर्दी-पडसं साठी एक प्रभावी औषध मानतात.

    कात खैर नावाच्या झाडापासून निघालेल्या लाकडाने मिळतो. हे एक औषधी झाड आहे. असे म्हणतात की आयुर्वेदात विविध प्रकारचे औषध बनविण्यासाठी काताचा वापर करतात. हे पानात लावण्याच्या शिवाय हिरड्यांची सूज, वेदना आणि तोंडाचे छाले सारख्या त्रासाला दूर करण्यासाठी ह्याचा वापर करतात.

    साधारण पणे कातास ५०-६० रुपये किलो भाव मिळतो. परंतु आजकाल ५-१० वर्षात काताची मागणी बरीच वाढली आहे कारण कात सध्या पान मसाला, गुटखा यामद्धे वापरला जातो. वरील उपचार हे वैद्याच्या देखरेखी खाली करावेत.

    खाऊचे पान व कात यांचे अतूट नाते आहे. काताशिवाय पान रंगत नाही. गीतकार राजा बढे यांनी लिहलेली व लावणी सम्राज्ञी सौ. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या लावणीत काताचे सुंदर वर्णन आहे.
    कळीदार कपूरी पान कोवळं छान केसरी चुना
    रंगला कात केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
    असा हा काताचा रंगतदार महिमा

    -- डॉ. दिलीप कुलकर्णी.

    संदर्भ:

    विकेपेडिआ

    C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products Vol.V. New Delhi,1960

    इ संध्यानंद 07-Apr-2020

    Dina Nath Tiwari (1995) A monograph of Khair tree. International Book Depo, Dehradun.

    गूगल वरील अनेक लेख.

  • जन्मजात हृदरोग

    खरे पाहिले असता हृदय हा एक स्पंदक (पंप) नसून एका आवरणांमध्ये गुंडाळलेला डावा व उजवा असे दोन स्पंदक आहेत.

    ते एका पडद्याने विभागलेले असतात त्यामुळे त्यातील रक्त एकमेकांत मिसळत नाही. या प्रत्येक स्पंदकामध्ये दोन कप्पे असतात. डावा स्पंदक शरीरामध्ये शुद्ध रक्त पसरतो व सर्व अवयवांना रक्ताद्वारे प्राणवायू व इतर पोषक द्रव्ये पुरवितो. उजवा स्पंदक सर्व शरीरातून आलेले अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी फुप्फुसाकडे पाठवितो. फुप्फुसांमध्ये प्राणवायू व कार्बनडायॉक्साइड या वायूंची अदलाबदल होऊन रक्त परत शुद्ध बनते आणि हृदयाच्या डाव्या कप्प्यांत परत येते.

    याप्रमाणे रक्ताभिसरण एकाच दिशेने चालू ठेवण्यासाठी दोन कप्प्यांमध्ये एक झडप असते. ती फक्त एकाच दिशेने उघडते. ज्या वेळी हृदयविकार अर्भकाच्या जन्मापासून असतो त्या वेळी त्यास 'जन्मजात रोग' म्हणतात. यात डाव्या व उजव्या कप्प्यांना विभागणाऱ्या पडद्यांतील छिद्र, रक्तवाहिन्यांची चुकीची जोडणी, चिकटलेल्या झडपा किंवा तत्सम रोगांचा समावेश होतो. 'निळसर अर्भक' ब्ल्यू बेबी हा याच रोगाचा एक प्रकार होय, तसेच वारंवार सर्दी होणे, शरीराची वाढ खुंटणे वगैरे लक्षणेही दिसतात. यात जवळजवळ सर्व रुग्णामध्ये औषधोपचार व निरनिराळ्या शस्त्रक्रियांद्वारे हृदयाची कार्यक्षमता पूर्ववत केली जाते. आता तर शस्त्रक्रियेशिवाय अगदी लहान अर्भकातही ही छिद्रे बंद केली जातात. जर नाडीचा वेग कमी असेल तर पेसमेकरच्या मदतीने तो वाढविता येतो आणि शेवटचा उपाय म्हणून हृदयरोपणही करता येते. अशा तऱ्हेने लहान मुलांना पुढील आयुष्य चांगल्या तऱ्हेने जगणे शक्य होते.

    -डॉ. पुरुषोत्तम अ. काळे
    मराठी विज्ञान परिषद