वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वर्षा ऋतु-
निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:|
मास- श्रावण, भाद्रपद
इंग्रजी- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
रास- सिंह
ऋतुलक्षण- वर्षा हा विसर्गकाळातील ऋतु आहे.
“आदानग्लानवपुषाअग्नि: सन्नो sऽ पि सीदति |
वर्षासु दोषैः इष्यन्ति तेऽम्बुलम्बाम्बुरेम्बरे ||
सतुषारेण मरुता सहसा शीतलेन च |
भूबाष्पेणाम्लेपायेन मलिनेन च वारिणा ||
वन्हिनैव च मन्देन तोष्विन्यन्योन्वइषिषु |
भजेत् साधारणं सर्व उष्णं तेजपनं च यत् ||”
वा. सु. ३
अग्नि- शिशिरादि इतर तीन विसर्ग काळातील ऋतुंच्या उष्णतेच्या योगाने शरीर निःसत्व होऊन त्यांचा अग्नि मंद झालेला असतो. अशा वेळी वर्षाऋतूत दोषांचा प्रकोप होतो व अग्नि अधिकच मंद होतो.
दोषावास्था- वर्षा ऋतूत बल व अग्नि क्षीण झाल्याने पित्ताचा संचय होण्यास सुरुवात होते.
रस- वर्षा ऋतुत अम्ल रसाची वृद्धि होते.
वर्षा ऋतुतील दोषस्थितीचा जननेंद्रियावर होणारा परिणाम-
प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो. सृष्टीतील क्लेदाधिक्यामुळे स्थानिक (जनेनेंद्रियांवर) जिवाणु विषाणूजन्य विकार उदा. Candidiasis, Trichomonas, इ. अनेक विकार होतात.
स्त्रियांच्या अनुषंगाने विचार केल्यास
“ न हि वातादृते योनि नारीणां संप्रदुष्यति ||”
च. चि. ३०
अनियमित रजस्त्राव, नष्टार्तव, अल्परजस्राव ३ विकार हे वाढतात. स्थानिक विकारांमध्ये आर्द्रतेमुळे व शैत्यामुळे योनिकण्डु, मुत्रादाह, श्वेतस्त्राव ३ विकार संभवतात. अम्लविपाकी जलामुळे पित्तसंचय होतो व पित्ताच्या आश्रयाने असणाऱ्या रक्त धातूची दुष्टी होते. त्यामुळे त्याचा परिणाम रजावर होतो.
पुरुष- अग्नि व बलं क्षीण झाल्याने मैथुन सामर्थ्य कमी होतो
वर्षा ऋतु-मैथुन कालावधि-
आचार्य सुश्रुत व वाग्भटांच्या नुसार १५ दिवसांच्या अंतराने मैथुन करावे व चरकानुसार वर्षा ऋतुत व्यवाय वर्ज्य करावा असे वर्णन आढळते.
वर्षाऋतू व गर्भाधान-
“ उद्मन्थ दिवास्वप्न अवश्यायं नदीजलम |
व्यायाम आतपं चैव व्यवायं चात्र वर्जयेत् ||”
आचार्य चरक व सुश्रूतांनी वर्षा ऋतुमध्ये मैथुन वर्ज्य करावे असे म्हटले आहे याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वर्षाऋतुमध्ये आचार्यांना गर्भाधान अपेक्षित नाही.
गर्भोत्पत्तीस आवश्यक घटक-
आचार्य सुश्रूतांनी खालील चार घटकांचा उल्लेख केला आहे.
“ध्रुवं चतुर्णां सानिध्यात गर्भा स्यात् विधीपूर्वकः |
ऋतु क्षेत्र अम्बु बिजाणां सामग्र्यात अंकुरो यथा ||”
“शुध्दे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रे ऽ निले हृदी |
वीर्यवंत सुतं सुते.... ||”
अ.हृ.शा १/१८.
वरील सर्व श्लोकांचा विचार केला असता शारीरिक व मानसिक दृष्टीने निरोगी असणाऱ्या स्त्री व पुरुषाने संपूर्ण वीर्यात आयु प्राप्त झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी मैथुन कर्म करावे असे वर्णन आढळते.
वरील प्रत्येक घटकाचा वर्षा ऋतुच्या अनुषंगाने विचार करूया-
ऋतु-
वर्षा ऋतुमध्ये वातप्रकोप असतो. त्यामुळे अनियमित रजःस्राव, अल्प रजःस्राव, कष्टार्तव हे विकार दिसून येतात. गर्भात्पत्तीसाठी नियमित ऋतु चक्र असणे गरजेचे आहे.
क्षेत्र-
आचार्य वाग्भटांच्या श्लोकांनुसार त्यांनी शुद्ध गर्भाशय व प्राकृत अनिल (अपान वायू) यांचाही गर्भसंभव सामग्रीमध्ये विचार केला आहे. पुरुष व स्त्री जननेंद्रिय अपान वायूच्या क्षेत्रात येतात. वर्षा ऋतुतील वातप्रकोप हा क्षेत्रदुष्टीसाठी व विकृत संतान उत्पत्ती साठी कारणीभूत ठरतो. तसेच सृष्टीतील शैत्य व आर्द्रतेच्या परिणामामुळे स्थानिक व्याधि निर्माण होऊ शकतात.
अम्बु (आहार पाकोत्पन्न रस)-
गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचे पोषण हे मातेकडून होत असते. गर्भधारणेवेळी असणाऱ्या मानसिक व शारिरीक स्थितींचाही गर्भावर परिणाम होत असतो. ह्याच अनुषंगाने आचार्य चरकांनी विमान स्थानामध्ये प्रकृतीचे वर्णन करताना मातु आहार, विहार, प्रकृति, काल, गर्भाशय प्रकृती असे वर्णन केले आहे.
वर्षाऋतु अग्निमांद्य असल्याने गर्भधारणा झाल्यास अग्नि अधिक मंद होऊ शकतो व गर्भाच्या पोषणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भोपघातकार भावांचा विचार केला असता मातेने वातप्रकोपक आहारविहार केल्यास विकृत संतान उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते.
बीज-
उत्तम गर्भ प्राप्तीसाठी अदुष्ट शुक्र शोणिताची आवश्यकता असते. वर्षा ऋतूमध्ये जल अम्ल विपाकी असते. त्यामुळे पित्ताचा क्षय व रक्त दुष्टी होऊ शकते. सुश्रुतांनी ‘रक्तंलक्षम् आर्तवं गर्भाकृत् च’ असे आर्तवाचे वर्णन केले आहे. त्यामुळे प्राकृत बीजनिर्मितीवर वर्षा ऋतुचा प्रभाव होऊ शकतो.
अदुष्ट शुक्रबीजाचा विचार केला असता मैथुन सामर्थ्य व प्राकृत शुक्रनिर्मिती ही देहबलावर अवलंबून असते. त्यामुळे वर्षा ऋतुत देहबल कमी असल्याने त्याचा परिणाम शुक्रधातूच्या उत्पत्तीवर होतो.
वर्षा ऋतुत गर्भधारणा झाल्यास पुढे येणाऱ्या शरदातील पित्त प्रकोपामुळे गर्भपात, गर्भस्त्राव होऊ शकतात.
जन्मणाऱ्या बालकाच्या प्रकृतीवर व स्वास्थ्यावर वात दोषाधिक्य दिसू शकते. वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता आचार्यांनी वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य का सांगितला याची मीमांसा ध्यानात येते.
आयुर्वेदाच्या दृष्टीने गर्भोत्पादन हे शुक्राचे श्रेष्ठ कर्म आहे व व्यवायाचे प्रमुख उद्देश ‘प्रजोत्पादन” असल्याने वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य म्हणजेच गर्भधारणा न होऊ देणे हे आयुर्वेदीय संहिताकारांना अपेक्षित असावे.
गर्भिणी व विशिष्ट आहाररस इच्छा-
ज्याप्रमाणे वर्षाऋतुमध्ये निसर्गात वनस्पतींचा निर्मिती होत असते. त्याप्रमाणे गर्भिणी मध्ये गर्भाची नवनिर्मिती होत असते.
वर्षाऋतुमध्ये सृष्टीची स्थिती-
‘ आद्भिः अम्लविपाकाभिः ओशाधीभिः समीरणाः |’ अशी असते. म्हणजेच अम्ल रसाची निर्मिती होते. याचप्रकारे गर्भिणीला अम्ल रसेच्छा होते.
वर्षा ऋतु-
पथ्यकर आहार-
पुराण शाली, लाल षष्टिक, गहू, भाजलेले धान्य, पुराण जव, कुलत्थ, मूग, उडीद, जीरक, हिंग, काळे मिरे, जडवळ, माठ, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, लसूण, कांदा, सुंठ, सुरण, कद्दू, बोर, ताक, दूध, उकळलेले पाणी (श्रृतशीत जल), सैंधव मीठ, मधु, निंबू, अजा मांस, दाडिम, अंगुर, गरम जेवण.
पथ्यकर विहार-
चंदन, खस आदि चूर्णाचा अभ्यंग, स्वच्छ, कोरडे व लघु (हलके) रंगाचे कपडे घालणे, कोरड्या जागेवर बसणे, नेहमी पादत्राणे घालणे.
अपथ्य आहार-
बाजरी, मका, नवीन तांदूळ, मसूर, हरभरा (अरहर), तुरीची डाळ, हिरवा वाटाणा, पालक, मेथी, कारली, फुलकोबी, बटाटा, काकडी, सिंगाडा, टरबुज, कवठ, म्हशीचे दूध, पनीर, श्रीखंड, मिठाई, थंड जल, नदी आणि विहिरीचे पाणी, शुष्क मांस, मासे, तळलेले पदार्थ, न झाकलेले पदार्थ, शिळे पदार्थ.
अपथ्य विहार-
दिवास्वाप, अधिक परिश्रम, अत्याधिक व्यायाम, प्रवात सेवन.
वर्षा ऋतु - योगासने
वर्षा ऋतूत मनुष्याचे शारीरिक बल अत्यंत कमी असते आणि वात-पित्ताची दुष्टी असते. त्यामुळे शरीरास लाभदायक व दोष दुष्टी निवारक योगासने असावीत.
वर्षा ऋतूत उपयुक्त योगासने -
1. पद्मासन 2. वज्रासन 3. हलासन 4. ताडासन 5. बद्धकोनासन 6. भुजंगासन 7. वृक्षासन 8. धनुरासन 9. सर्वांगासन
डॉ. सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग
पोदार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल
वरळी, मुंबई – ४०० ०१८
भ्रमणध्वनी +917738086299
Email – subhashmarlewar@gmail.com
स्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असते पण ज्यावेळेस ही स्त्री काही कारणाने आजारी पङते त्यावेळेस मात्र घरातील लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते, एवढेच काय पण त्यांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत होते.
ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.
चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.
नुकताच अशोक नगर, मध्य प्रदेशला एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.
दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती वर लक्ष गेल. भारत मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.
थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.
अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५५ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हया कडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत. शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारत मातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....
आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली. एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते. (त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात) . लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.
थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.
हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात. एमवे आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल (तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर त्याचे मानसिक समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.
मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य मानू लागले आहे. दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो .
ज्यांना मधुमेहाच्या व्याधिनं ग्रासलेलं आहे अशा मंडळींच्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणाचं व्यवस्थित नियंत्रण होऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज साठत जातो. त्यामुळं त्यांच्या शरीरस्वास्थ्याला बाधा येते. त्यांच्या खाण्याला गोडाची चव तर द्यायची पण त्यांना ग्लुकोजच्या अतिरिक्त सेवनापासून वाचवायचं म्हणून मग काही कृत्रिम साखरी तयार केल्या गेल्या आहेत.
आता तुम्ही म्हणाल की हे सारं सव्यापसव्य करणं वैज्ञानिकांना ठीक आहे हो. आम्ही कुठं असं संशोधन करायला जातो? किंवा आमची काय टाप आहे आईन्स्टाईन महाराजांची खोडी काढण्याची! शिवाय त्यांच्या विधानाबद्दल शंका घ्यायला आधी ते काय म्हणताहेत हे तर समजायला हव. तिथंच तर आमचं घोडं पेंड खातं.
तुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे-- मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आशा व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते.
विशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कठीण प्लेक तयार होण्याचे प्रमाण वाढते. ह्याचा परिणाम म्हणून ह्या व्यक्तींना पुढील आयुष्यात हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका संभवतो. वेळीच ह्या वाढत्या लठ्ठपणाला आळा घातला नाही तर पुढे जाऊन जसा लठ्ठपणा फैलावताना दिसतोय, तद्वतच ह्रदय रोगाचा फैलावताना दिसेल. Atherosclerosis ही हळूहळू वाढीस लागणारी एक प्रोसेस (प्रक्रिया) असून ती अगदी लहानपणातच सुरू होते असे हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काही व्यक्तींमधे ही प्रक्रिया त्यांच्या तिशी मध्येच दिसून येते तर काहींच्या बाबतीत ही प्रक्रिया पन्नाशीत किंवा साठीत दिसून येते.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार जेव्हा तुमचे वजन हेल्दी रेंज मध्ये (निरोगी श्रेणीत) असते तेव्हा
-- तुमच्या शरीरात रक्ताभिसरण चांगले व प्रभावी असते
-- तुमची फ्लूइड लेव्हल (प्रवाही पातळी) चांगल्या प्रकारे मॅनेज (व्यवस्थापित) होते
-- टाईप 2 डायबेटिस, ह्रदय रोग, काही प्रकारचे कॅन्सर आणि स्लीप अॅपनीया (झोपेत बिघाड) हया सारख्या रोगांचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.
Reis आणि त्याचे सहकारी ह्यांनी 3300 व्हाइट आणि अफ्रीकन अमेरिकन प्रौढ व्यक्तिंची अध्ययनासाठी निवड केली आणि त्यांना 25 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. प्रयोगात सहभागी व्यक्तीचे वय 1980 मध्यान्ह मध्ये 18 - 30 वर्षे होते. सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भातील बॉडी मास इंडेक्स (BMI): उंची (सेंटीमीटर)/वजन (किलोग्राम), कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, आहार, शारीरिक हलचाली विषयी माहिती, तसेच कोलेस्टरॉल, ब्लडप्रेशर, टाईप 2 डायबेटिस होण्याची शक्यता ह्या सर्वाची माहिती दोन दशकांपेक्षा जास्त काळापर्यंत गोळा केली. सहभागी व्यक्तीच्या कोरोनरी आर्टरी मध्ये कॅलसिफीकेशन ज्याला सोप्या भाषेत कठीण प्लेक असेही म्हणता येईल ते झाले आहे कि नाही हे बघण्यासाठी 15, 20, आणि 25 वर्षाला ह्या व्यक्तींचा CT (computed tomography) स्कॅन केला. प्लेक चा धोका वाढण्याचे कारणअसते मेटाबॉलिक अॅक्टिव्ह फॅट जी इनफ्लमेशन वाढवते. हेच वाढलेले इनफ्लमेशन Atherosclerosis होण्यास आणि त्याच्या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावते. ह्या अध्यापन विषयीचे निष्कर्ष JAMA July 2013 ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
निष्कर्ष :
-- तरूण प्रौढांमध्ये जे लठ्ठ होते त्यांच्यात कठीण प्लेक तयार होण्याचा धोका 2 ते 4% पर्यंत वाढलेला आढळला आणि हे सहभागी होणार व्यक्तीचे वय, लिंग, रेस, आर्थिक व सामाजिक स्थिती, बी.एम.आय, कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, शारीरिक हालचालीची लेव्हल, आणि दारूचे सेवन ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त लठ्ठपणा स्वतंत्र घटक कारणीभूत ठरताना आढळला आहे.
-- ज्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचा कालावधी जितका जास्त आणि ज्यांचा पोटाचा घेर (abdomial girth) जास्त त्या व्यक्तींमध्ये ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल वाढण्याचा धोका जास्त तसेच त्या व्यक्तीला टाईप 2 डायबेटिस होण्याचे प्रमाण जास्त आणि आशा व्यक्तीला ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी औषधांची गरज भासू शकते.
दुसर्या एका प्रयोगात UK मधील व्यक्तींना 30 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. Masi आणि त्याच्या सहकारी व्यक्तींनी National Survey of Health and Development (NHSD)/1964 birth cohort मधली NHSD अध्ययनातील ज्यांचे 2006 ते 2010 साली 60 ते 64 वर्षे वय असलेल्या 1233 व्यक्तींची निवड केली. सहभागी व्यक्तींच्या बीएमआय, aortic pulses - wave velocity, aortic calcification score and caratoid IMT, ह्या सर्व गोष्टींची माहिती 36, 43, 53, आणि 60-64 वर्षी गोळा केली. सहभागी व्यक्तींना त्यांच्या बीएमआय नुसार वेगवेगळ्या गटात विभागले.
अध्यापन पूर्ण होईपर्यंत नॉर्मल वजन
-- 36, 43, 53, किंवा 60-64 ह्या वेळेस सहभागी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली
-- नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले आणि कमी केलेला बीएमआय नंतर वाढू दिला नाही
-- नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले पण घटलेला बीएमआय परत वाढला.
60-64 ह्या वयोगटातील स्थूल किंवा लठ्ठ सहभागी व्यक्तींची तुलना त्यांच्याच वयोगटातील नॉर्मल वजन असलेल्या सहभागी व्यक्तींच्या बरोबर केली असता ह्या लठ्ठ व्यक्तींमधे इतर लठ्ठ व्यक्तींप्रमाणे मेटाबॉलिक सिंड्रोमचा प्रॉबलेम आढळला ज्यात ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल एच बी एवन सी वाढलेले आढळले. तसेच aortic pulses - wave velocity, aortic calcification score सुद्धा जास्त वाढलेले आढळले. हे अध्यापन European Society of Hypertension 2015 मिटींगमध्ये सादर केले.
तिशी चाळीशी मध्ये जर आपण चांगल्या सवयी पाळू लागलो तर ह्रदय रोगाचा धोका कमी करू शकतो
शास्त्रज्ञांना असे आढळले आहे कि तिशी चाळीशी मधील व्यक्ती जेव्हा आपल्या अन-हेल्दी (वाईट) सवयी ज्या ह्रदयाला घातक ठरू शकतील आशा सवयी बदलून चांगल्या सवयींचा अंगीकार करते तेव्हा coronary artery disease चा धोका असल्यास तो आटोक्यात येतो आणि नैसर्गिकरित्या coronary artery disease होण्याचा संभाव्य धोकाही उलटवू शकते. ज्या व्यक्ती त्यांचे जसजसे वय वाढत जाते तसेतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयी आत्मसात करतात त्या व्यक्तींमध्ये त्यांच्या coronary artery वर मोजता न येण्या इतका हानिकारक परिणाम दिसू लागतो असे ही आढळले आहे.
शास्त्रज्ञांनी 5000 व्यक्तींना Coronary Artery Risk Development in Young Adults (CARDIA) हया अध्ययनात सहभागी केले आणि ह्या व्यक्तींच्या रोजच्या सवयी हेल्दी आहेत कि नाहीत, त्यांच्यात coronary artery calcification झाले आहे कि नाही तसेच त्यांची जाडी ह्या विषयीची माहिती गोळा केली. सहभागी व्यक्ती जेव्हा 18 ते 30 वर्षाचे होते तेव्हा आणि ह्या सर्व गोष्टींचा आढावा परत 20 वर्षांनंतर ही घेतला.
हेल्दी जीवनशैली ठरवताना: ती व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ नाही, धुम्रपान करत नाही, शारीरिक व्यायाम योग्य प्रमाणात करते, आहार हेल्दी आहे, आणि दारूचे सेवन एकदम कमी करत असेल ह्या सर्व गोष्टींचा विचार केला गेला. अध्यापनाच्या सुरुवातीच्या काळात 10% पेक्षा ही कमी सहभागी व्यक्ती ह्या 5 ही गोष्टींची पूर्तता करत होत्या. अध्यापन पुर्तीच्या काळात म्हणजे 20 वर्षांनंतर 25% सहभागी व्यक्तींनी कमीतकमी एक तरी हेल्दी जीवनशैलीचा अंर्तभाव केला होता तर 40% सहभागी व्यक्तींनी वय वाढत जात होते तसतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयींचा अंतर्भाव केला.
हेल्दी जीवनशैलीचा अंतर्भाव केलेल्या सहभागी व्यक्तींमध्ये जाडी व coronary artery calcification कमी झालेले आढळले तर वाईट जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्तींमध्ये मात्र मोठा जाणवण्याची इतपत परिणाम झालेला आढळला. हे अध्यापन जून 2014 Circulation ह्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे.
ह्या वरून स्पष्ट होते की तुम्ही कोणत्या ही वयात तुमच्या वाईट सवयी बदलायच्या ठरवून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर तुम्ही तुमचा ह्रदय रोगाचा धोका टाळू शकाल.
कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदात फुगून जाते. आपल्या शरीरात एक जीव वाढतो आहे. या गोष्टीवर प्रथम तीचा विश्वासच बसत नाही आणि मुलाला जन्म देणारी हि पहिलीवहिली स्त्री जणू आपणच आहोत. असे क्षणभर वाटण्याएवढा विशेष आनंद तीला होत असतो. आपल्या होणाऱ्या बाळाविषयी ती अनेक स्वप्न बघते, आणि त्या स्वप्नात ती रंगून जाते. परंतु क्वचित कधी बाळाच्या जन्मानंतर किंवा गरोदर असतानाच तिच्या स्वप्नाचा चुरा होतो . जन्माला आलेले बाळ विकृत किंवा आजारी असे जन्माला येते . आणि आता एकविसाव्या शतकांत “एकच अपत्य आणि सुखी दांपत्य” अशी स्थिती आहे. आता एकच अपत्य म्हटले तर दाम्पत्याच्या सर्व आशा आकांक्षा त्यावरच अवलंबून असतात .
“ एक अपत्य सुखी दांपत्य” या सूत्राच्या सर्व दांपत्यानी अवलंब केलातर वणव्याप्रमाणे फोफावलेल्या लोकसंख्येला आळा बसेल शिवाय एकच अपत्य असल्यामुळे त्यावर सर्व लक्ष केंद्रित करून त्याला सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांगपरीपूर्ण बनविता येईल. यासाठी गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेनंतर म्हणजेच सगर्भावस्थेत बालकाच्या जन्मापूर्वीपासून संस्कार करणे शक्य आहे. बाळाच्या निर्मितीसाठी माता-पिता हे कारणीभूत असतात. त्यामुळे माता-पित्यांची शारीरिक अवस्था आरोग्यपूर्ण, सुसंस्कारित व शुद्ध असावी लागते. शरीरशुद्धी व मन:शुद्धी यासाठी आहार-विहाराचा विचार आवश्यक आहे. पथ्थ्यकर आहार-विहाराने बीजनिर्मिती उत्तम होऊ शकते व आरोग्यपूर्ण बीजसंयोगातून मातेच्या उदरात जन्माला येणारा अंकुर हा परिपूर्ण असतो.
गर्भधारणेनंतर पित्याचा सहभाग संपतो. मग उरते फक्त माता. तीला नऊ महिने नऊ दिवस त्या अंकुराचे स्वत:च्या उदरात पोषण करावयाचे असते. तीच्या आहार-विहार, आचार-विचाराचा परिणाम बाळावर होत असतो. याचा प्रत्यय आपणास वारंवार येतोच. वैदिक कालापासून आजपर्यंत आपण वाचत असलेल्या कथांमधून हे आपणास जाणवत असते. गर्भिणी अवस्थेतील आहार-विहाराचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. कारण हे जग वेगवेगळ्या ग्रहांवर जातेय, तेव्हा प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारया जगास हाताला हात धरून आणखी पुढे नेण्यासाठी आपल्या बाळाचे योगदान असावे अशी प्रत्येक मातेची मनोकामना असतेच.
बाळाच्या वाढीसाठी मातेचा आहार कसा असावा त्यापेक्षा तो कसा असू नये हा विचार मला जास्त महत्वाचा वाटतो. आजच्या युगात स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करित आहेत. त्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत परंतु सर्व क्षेत्रामध्ये पुरुषाच्या काही वाईट सवयीमध्येहि बायका त्यांचा खांद्याला खांदा लावू पहात आहेत. हि अत्यंत खेदाची बाब आहे. यात धृम्रपान, मद्यपान किंवा इतर मादक, उत्तेजक पदार्थांचे सेवन उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या स्त्रिया राजरोसपणे करीत आहेत. याचा वाईट परिणाम त्यांच्या स्वत:च्या जीवनावर तर होतोच परंतु त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या अपत्यावरही होतो. हे स्त्रियांना विसरून कसे चालेल? स्त्रीस्वातंत्र्याचा हा मिथ्यायोग म्हणता येईल.
एखादे व्यसन जडल्यावर मनुष्य स्वत:ला काबूत ठेवू शकत नाही. व हे खरे आहे परंतु व्यसनाच्या आधीन जाण्यापूर्वी आपण शंभर वेळा विचार करून स्वत: सावरलेले बरे स्त्रियांवर संपूर्ण घर अवलंबून असते. तीचे विपरीत वागणे व्यसनाधीन होणे तिच्या स्वत:च्या घरालाच नव्हे तर समाजासाठी सुद्धा विघातक ठरते. कारण घरा-घरातून निर्माण होणारा समाज ह्या स्त्रियाच घडवत असतात. तेव्हा स्त्रियांनी संयमी असणे हि समाजाची गरज आहे. याचा अर्थ असा नव्हे की पुरुषाने बेबेंद वागावे. स्त्री आणि पुरुष हि एकाच रथाची दोन चाके आहेत. बेबंद पुरुषाला आपल्या प्रेमशक्ती व संयमाने बांधून ठेवणे स्त्रियांसाठी सहज शक्य आहे.
अपत्ये हि अप्रत्यक्षपणे स्त्रियांवर अवलंबून असतात. परंतु विशेषत: सगर्भावस्थेतमधे व प्रसूतीनंतर काही काळ ते मातेवर पूर्णत: अवलंबून असतात. म्हणून या काळात स्त्रियांनी व्यसनपासून स्वत:ला अलिप्त ठेवणे आवश्यक आहे. यात धूम्रपान करणे, तंबाखू खाणे, दातास मिश्री लावणे, मद्यपान करणे, ताडी-सिंधी पिणे व इतर घातक व मादक औषधीद्रव्यांचा वापर करणे याचा समावेश असू शकतो. याचा परिणाम बालकांच्या शरीरावर व बुद्धीवर प्रत्यक्ष होत असतो. याशिवाय या काळात आनंदी व प्रसन्न राहणे, वृत्ती सात्त्विक ठेवणे आवश्यक आहे. यासाठी प्राणायाम, ध्यान-योगासन यांची मदत होऊ शकते. आवड असणाऱ्यांनी पूजा-अर्चा करण्यास हरकत नाही. अलीकडच्या यंत्रयुगात मानवता तळाशी गेलेली असून हिंसाचार बोकाळलेला आहे. अश्या वेळी “सुसंस्कारित अपत्य निर्मिती” हि काळाची गरज आहे.
मातेच्या व्यसनाचा परिणाम बाळाच्या केवळ मानसिक विकासावर होतो असे नव्हे तर त्यामुळे बालकाचा शारीरिक विकासही खुंटतो. गर्भिणी अवस्थेमधे धृम्रपान करणारया स्त्रियांमधे बालकाचे वजन ३०० ग्रॅम ने कमी होते असे अलीकडे झालेल्या अभ्यासात सिद्ध झालेले आहे. ज्या गर्भिणी माता निर्व्यसनी आहेत, त्यांच्या बाळाचे वजन प्राकृत असते. यावरून व्यसनाधीन स्त्रियांनी काय तो बोध घ्यावा. मद्यपान करणाऱ्या स्त्रियांच्या बालकामधे पोटाच्या तक्रारी आधिक असतात. त्यांच्या पाचनप्रक्रियेमधे वारंवार बिघाड होतो. हे एका अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. याशिवाय आणखी इतर व्यसने असताना काय दुष्परिणाम होतील हे सांगायला नको! सामान्यपणे गर्भिणी स्त्रियांनी खालील गोष्टींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये.
१ . चहा, कॉफी यांसारखी उत्तेजक पेय घेण्याचे टाळावे.
२. मसाले, तिखट, आंबट, तिक्ष्ण-उष्ण, जास्त प्रमाणात मीठ अश्या पदार्थांचे सेवन करू नये.
३. मांसाहार, मासे, पूर्णत: बंद करावेत.
४. जेवताना रात्रीच्या जेवणात उरलेले, फ्रीजमधे साठवून ठेवलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.
५. आंबवलेले पदार्थ, वडापाव, इतर रुक्ष पदार्थ खाण्याचे टाळावे .
६. गरोदरपणाच्या शेवटच्या काळात प्रवास शक्यतो टाळावा.
७. साडी किंवा गाऊन सुती व सैल असावेत. अंगाला चिकटणाऱ्या व घट्ट प्रावरणाचा उपयोग टाळावा .
गर्भिणी अवस्थेमधे स्त्रीला स्वत: बरोबर आपल्या बाळाचेही पोषण करावयाचे असते. मातेने घेतलेल्या आहारापासून बाळाचे पोषण होते. गर्भ हा पूर्णत: मातेवरच अवलंबून असतो. त्यामुळे मातेचा आहार सकस, पूर्ण उष्मांक असलेला असणे आवश्यक आहे. सामान्य स्त्री पेक्षा गर्भिणी स्त्रीला आधिक उष्मांकाची गरज असते.
‘गर्भिणी स्त्री आहार घटक तालिका’
अ.क्र. आहार घटक सामान्य स्त्री गर्भिणी स्त्री स्तनपानकरणारी स्त्री
१] उष्मांकाची २२०० २५०० २५००
२] प्रोटीन ५० मी.ग्रॅम ६० ग्रॅम ७० ग्रॅम
३] कॅल्शियम ५०० मी.ग्रॅम १००० मी.ग्रॅम १५०० मी.ग्रॅम
४] लोह १८ मी.ग्रॅम ४० मी.ग्रॅम ३० मी.ग्रॅम
५] जीवनसत्व –अ ५००० I U ६००० I U ८००० I U
६] जीवनसत्व –ड ४०० I U ४०० I U ४०० I U
७] थायमीन १.१ मी.ग्रॅम १.५ मी.ग्रॅम
८] निकोटिनिक अॅसिड१४ मी.ग्रॅम १५ मी.ग्रॅम
९] अस्कोर्बीक अॅसिड ४५ मी.ग्रॅम ६० मी.ग्रॅम
१०] जीवनसत्व ब१२ २ ug. २ ug.
११] फोलिक अॅसिड ०.५ ग्रॅम १ ग्रॅम
प्रथम त्रैमासात गरोदर स्त्रीला वरील दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे फोलिक अॅसीड, प्रोटीन, थायमीन, इ अत्यंत आवश्यकता असते. हे आहारघटक मिळाल्यास योनिगत रक्तस्त्राव, गर्भपात होऊ शकतो किंवा गर्भधारणा पुढे चालू राहिल्यास बाळ वजनाने कमी जन्मास येते. काही वेळा तर अकाली प्रसव सुद्धा होतो. वरिल तक्त्यात दर्शविलेली जीवनसत्वे आहारात न मिळाल्यास गर्भिणी पांडू त्याच बरोबर गर्भिणी विषाक्तता (Toxiimia of pregnancy) होऊ शकते. तसेच प्रसवामधे रक्तस्त्राव अपरा गर्भाशयास चिकटून राहणे. प्रसवास प्राकृत वेळेपेक्षा विलंब होणे या व इतर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. म्हणून आहारामध्ये गरोदर स्त्रियांनी खालील पदार्थ, हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश करावा. खालील तक्त्यावरून हे सहज लक्षात येईल.
| अ.क्र | जीवनसत्व | प्राप्तीस्थान |
| १ | जीवनसत्व-अ | कोबी,गाजर,लाल-पिवळीफळे,दुध,पनीर,लोणी, सर्व हिरव्या पालेभाज्या |
| २ | जीवनसत्व-ब | अंडी, मासे, कडधान्ये, गव्हाचाकोंडा, गव्हांकुर, दुध,हिरव्या पालेभाज्या |
| ३ | जीवनसत्व-क | सर्व आंबट-गोड फळे, टोमॅटो, कलिंगड, पेरू, कोबी, अननस, बटाटे, हिरव्या पालेभाज्या |
| ४ | जीवनसत्व-ड | दुध, अंडी, मासे, याशिवाय, सूर्यप्रकाश |
| ५ | जीवनसत्व-इ | सुकामेवा, अंडी, दुध, वनस्पतीतेल, इ. |
| ६ | जीवनसत्व-के | गव्हाचा कोंडा, हिरव्यापालेभाज्या, टोमॅटो, फ्लावर, सोयाबीन, वनस्पतीतेल, प्राण्यांचे लिव्हर |
| ७ | कॅल्शियम | दुध, दुधापासून बनवलेले पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजीर, द्राक्ष, बाजरी, तीळ, उडीद, शिंपल्यातील किडे |
| ८ | लोह | मेथी, हिरव्यापालेभाज्या, चणे, मुग, उडीद, सोयाबीन, खजूर, तीळ, बाजरी, अंडी, मांस, प्राण्यांचे यकृत |
जीवनसत्व ब हा एक जीवनसत्वाचा समूह आहे. यामधे ८ जीवनसत्वाचा समावेश असतो. ब -१ ,ब -२ ,ब -६ ,ब -१२, पेन्टॉथीनिक, अॅसिड, बायोटीन निएसीन इ.
वरिल तक्त्यावरून गर्भिणीस लागणाऱ्या आहार घटकाची कल्पना तुम्हाला आलेली आहेच. त्यामुळे त्याचा अभावी होणारे परिणाम पुढे वर्णन करित आहे.
जीवनसत्व अ – याच्या अभावी प्रथम त्रेमासात मळमळ व उलट्या होऊ शकतात. गर्भिणीच्या पायामध्ये गोळे येतात.
जीवनसत्व क – लोहाच्या शोषणासाठी याची आवशता आवश्यकता असते. याच्या आभावाने गर्भिणीच्या हिरड्यांना सुज येऊन ते स्पंजाप्रमाणे पोकळ होतात व रक्तस्त्राव होतो. “स्कर्वी” नावाचा रोग यामुळे होतो. याच्या अभावामुळे गर्भिणीला
रक्तक्षय होण्याची शक्यता असते.
जीवनसत्व ड - सकाळच्या कोवळ्या उन्हातून ते मिळते . गर्भिणीच्या चयापचया मध्ये या जीवनसत्वाचा महत्वाचा वाटा आहे.
जीवनसत्व के - याच्या अभावामुळे गर्भस्त्राव, गर्भपात, योनिगत रक्तस्त्राव होऊ शकतो.
जीवनसत्व इ - रक्तातील लाल कण या जीवनसत्वामुळे सुधृड बनतात. प्रजोत्पादनामधे या जीवनसत्वाचा महत्वाचा वाटा आहे. याच्या आभावाने काही स्त्रियांना वंध्यत्व येते.
लोह - लोहाच्या आभावाने गर्भिणीला पाण्डू होतो त्याचबरोबर प्रसवोत्तर रक्तस्त्रावाची शक्यता असते.
गर्भिणी अवस्थेत दुध, तूप, तांदूळ यांसारखे शुभ्र सात्विक पदार्थ स्त्रीने सेवन केल्यास होणारे बालक सुदृढ, गौरवर्णीय व कांतिमान होते. त्यामुळे आय्र्वेडत दुध, तूप, मध, लोणी, तूपभात इ. पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले आहे.
या प्रमाणे आहारयोजना असल्यास पूर्णमास व प्राकृत प्रसव होते. प्रसवानंतर रक्तस्त्राव, राक्ताल्पता यांसारख्या गुंतागुंती निर्माण होत नाहीत. म्हणून गर्भिणी मातेने कुठल्याही परिस्थितीत परिपूर्ण आहार घेणे आवश्यक आहे.
राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती.
जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह' हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची वेळ' लिहिलेली असते. म्हणजे तुमचे तुम्हीच ठरवा काय खायचे ते!
परंतु हल्लीहल्लीपर्यंत छोट्या गावांतील लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांत जेवण्यासाठी पळसाच्या पानांपासून तयार होणारी पारंपारीक पत्रावळ वापरात होती. मात्र आता ती तिथूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याजागी आता खेडोपाडीही होणार्या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील थर्माकोल व कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे. द्रोणाची जागा प्लास्टिकच्या द्रोणाने घेतली आहे.
सध्या समारंभांमध्ये कागदी पत्रावळी व द्रोणांचा जास्त वापर होताना दिसतो. या कागदी किंवा थर्माकोलच्या पत्रावळींना केळीच्या पानांचा आकार दिलेला असतो. शिवाय एका बाजूला मेणाचा वापर करुन पत्रावळी चकचकीत केल्या जातात. मात्र अशा कोटिंग केलेल्या चकचकीत पत्रवळी आरोग्यासाठी घातकच असतात. कारण उन्हात या पत्रावळींवरचा मेणाचा थर वितळायला लागतो आणि तो थेट आपल्या पोटात जातो. थर्माकोलपासून बनवलेल्या पत्रावळींमुळेही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
जेवणासाठी वापरण्यात येणारी पळसाच्या पानांपासून तयार केलेली पत्रावळ आरोग्यासाठीही चांगली असल्याची ग्वाही अगदी आयुर्वेदातही दिलेली दिसते. पुरातन काळापासून मंगल कार्यातील जेवण समारंभांसाठी पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणाचा वापर होत असे. पळसाच्या पानांत आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्व आहे. विशेष म्हणजे पळसाच्या पानांना किडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. आता मात्र या स्वस्त व आयुर्वेदीय महत्व असलेल्या या पत्रावळीच भोजनसमारंभातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी तर समारंभातच नव्हे तर अगदी रोजच्या घरातल्या जेवणातसुद्धा पत्रावळीचा वापर होत असे. पत्रावळींच्या वापरामुळे अनेक फायदे होत त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे जेवल्यानंतर बायकांनासुध्दा ताट-वाट्या घासण्याचा त्रास कमी होत असे. पूर्वी घरातली पुरुष मंडळी संध्याकाळी घरी येताना येताना शेतावरची भाजी, फुले आणि कधीकधी पत्रावळीसाठी पळसाची पानेही घेउन घरी येत असत. काही घरांमध्ये पत्रावळी लावणे हा एक कार्यक्रम असे.
पत्रावळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या पत्रावळी असत. पळसाच्या पानाची पत्रावळ तर ऑल टाईम फेव्हरिट असायची पण त्याचबरोबर वडाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्या चाफ्याची पाने यांच्याही पत्रावळी बनवल्या जायच्या. मोहाच्या पानांचीही पत्रावळ काही ठिकाणी श्राध्दाला मुद्दाम लावली जात असे. कोकणात अनेक बायका चातुर्मासात आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात.
प्राचीन भारतीय संस्कृतीत पत्रावळी किंवा केळीच्या पानावर जेवणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आयुर्वेद शास्त्रातही विविध पानांचे व त्यातून दिल्या जाणार्या अन्नपदार्थांचे उल्लेख आहेत. आजही दक्षिण भारतातील अनेक भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. थर्माकोल आणि मेणाचा मुलामा दिलेला कागद यांचा वापर पर्यावरणासह शरीरासही धोकादायक असताना केवळ `रेडीमेड'च्या नादापोटी व वेळ वाचविण्यासाठी हा धोका पत्करला जात आहे.
पळसाची पत्रावळ बनवणे हा एक ग्रामोद्योग होता. या उद्योगावर आधारित असलेल्यांची उपजीविकाही आता बुडाली आहे.
थर्माकोल, प्लास्टिक वगैरेचे विघटन पूर्णपणे होत नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला अपाय होतो. आधुनिक काळातील `वापरा आणि फेका' या संस्कृतीमुळे अन्नधान्याच्या नासाडीसह प्लॉस्टिक व कृत्रिम वस्तूंचा बेसुमार वापर होत आहे. लग्नसमारंबात पाण्यासाठी सर्रासपणे मिनरल वॉटरच्या बॉटल्स किंवा पाऊच वापरले जातात.
अर्थात आता यावर उपाय कठीणच आहे कारण प्लास्टिक, थर्माकोल वगैरेचा वापर आपल्या एवढा अंगवळणी पडला आहे की ती सवय चटकन मोडणार नाही.
भारतीय उपचार पद्धतीला हजारों वर्षांची परंपरा लाभली आहे. तसेच हजारो वनस्पतींचा वापरही होत आलेला आहे. कितीतरी वनस्पती घराघरांत सहजतेने वापरण्यात येत आहेत. शेकडो वनस्पती आमच्या दैनंदिन आहाराचा भाग झालेल्या आहेत, आमच्या पूर्वजांनी सांगितलेले औषधी तत्व विसरलो असलो तरी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर सुरूच आहे. प्राचीन ज्ञानाचा आजच्या संदर्भाने पूर्ण कौशल्यासह वापर करून आपली प्रगती साधने आवश्यक आहे.
नुकतीच एक बातमी वाचली कि भारतात तरूण लोकांमध्ये ह्रदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. याची कारणमींमासा करताना बदलती जीवनशैली, ताण, खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या गोष्टींकडे बोट दाखवले गेले. थोडक्यात ‘हे होणारच’ असा सूर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti