वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. राम नेमाडे यांनी लिहिलेला हा लेख
जीवनाचा मार्ग सरळ नसतोच कधी. त्यात वेडीवाकडी वळणे, खाचखळगे असतातच. फुलांचे ताटवे फुललेले पाहावयाचेत ना मग त्यातून वाट काढण्याचीही तयारी ठेवावी लागते. प्रत्येक मोठा माणूस शून्यातूनच मोठा झालेला असतो. शून्याचा आकार लहान मोठा असू शकतो पण मूल्य त्याचे तेवढेच.
मोठेपण मिळते खरे पण त्यालाही मर्यादा असतातच. कधी ते अपेक्षेप्रमाणे मिळते, कधी ते अकल्पितही असते. माझ्यासारख्या अठराविश्वे दारिद्र्यात जन्मलेल्या व वाढलेल्या माणसाने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेली झेप क्षणभर सुखावणारी असली तरी ती राणीमुंगीने वीण काढावी अशीच असते. ज्या क्षेत्रात आपण नावारूपाला येतो, तेही पुढे चाकोरीबद्धच ठरते. नाही का! रोज तेच ते!
मी शिक्षक झालो, प्राध्यापक झालो, आकाशवाणीतून व्यक्त झालो, दूरदर्शनवरही प्रगटलो. लोक म्हणतात नाव केलं असा मी त्यातला पहिला आहे का? कष्ट भोगले, हालअपेष्टा सहन केल्या, वादाच्या भोवऱ्यातही अडकलो पण ही कथा जवळ जवळ सर्वच ध्येयवादी माणसांची आहे. जे मी केले ते माझ्याहातून घडायचंच होते त्यात माझ्या कर्तृत्त्वापेक्षा प्रवाहपतीत्वाचाही भाग असेल. व्यवसाय आवडीचा होता. त्यात मी रमलोही पण संचिताचे संकेत काही वेगळेच होते.
माझं बालपण गरिबीत गेले हे मी सुरुवातीला सांगितलंच आहे. मी प्राथमिक शाळेत असतांना घरच्यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवलेली असे. सकाळी शाळेत जाण्याआधी गोठ्यातील गाई गुरे गोठाणावर नेऊन उभी करायची. गावातली सगळी गुरेवासरे एकत्र जमली की गुराखी त्यांना जंगलवाटेने चरायला घेऊन जाई. गुराखी येईपर्यंत मी एका पत्र्याच्या गोडाऊनच्या भिंतीवर बोदवडच्या टुरिंग टॉकीजमध्ये सुरू असलेल्या सिनेमाची जाहिरात कोळसा, विटेचा तुकडा वापरून सुंदर अक्षरात चितारत असे. सिनेमा कोणत्याही प्रॉडक्शनचा असला तरी मी मात्र 'आर एस एन' प्रॉडक्शन प्रस्तुत असे मोठ्या अक्षरात लिहीत असे. रामा सोनाजी नेमाडे या माझ्या नावाची ही अद्याक्षरे होती. याचाच अर्थ असा की त्या बालवयात आपण भविष्यात सामाजिक, ऐतिहासिक आशयाचे सिनेमे काढू असे स्वप्न मी पाहात असे. सिनेमा बघायला पैसे होते कुठे? कसे बसे चार आणे गोळा करून एखाददुसरा सिनेमा पाहण्याची संधी मिळे. मग सिनेमा आवडला तर रोज जाऊन सिनेमाच्या कनातीजवळ उभं राहायचं. तिथून चित्र दिसत नसले तरी संवाद ऐकू येत, आधी सिनेमा पाहिलेला असल्याने संवादाबरोबर डोळ्यापुढे चित्रे उभी राहात. 'देवता' नावाचा सिनेमा मला खूप आवडला होता. सतत एक आठवडा मी ते संवाद ऐकले आणि गंमत म्हणजे सर्व पात्रांचे संवाद तोंड पाठ झाले. मग मी मराठी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून मुलांना मनोरंजनासाठी 'देवता' सिनेमातील काही संवाद साभिनय म्हणून दाखविण्याची परवानगी मिळवली. माझे ते कार्यक्रम खूप गाजले. आठ दहा आण्यांची कमाईपण होऊ लागली. मग त्या पैशातून सुरु असलेल्या सिनेमाची गाणी असलेली छोटी पुस्तके मी मध्यंतरात गेटमनची परवानगी घेऊन विकू लागलो. पुस्तकाची किंमत एक आणा असायची. हौशी लोक विकत घ्यायचे. त्यातून काही पैसे सुटत.
मी त्याकाळी महादेवाच्या देवळात गावातील समवयस्क मुलांना घेऊन नाटक-नृत्याचा सराव करायचो. संवाद मीच लिहिलेले. गाणीही मीच लिहायचो. नृत्याचा सरावही केला होता. गावातील दिसायला सुंदर मुलांना मीच नृत्य शिकवत असे. पूर्वी नाटकात मुली काम करीत नसत. मुलांनाच स्त्रीपात्र करावे लागायचे. तमाशाचेही तसेच होते. तमाशात नाचे पोरचं असायचे. अर्थात हे रात्री कंदिलाच्या अथवा चांदण्याच्या प्रकाशात कार्यक्रम चालायचे. मात्र या कार्यक्रमांचा जन्म महादेवाच्या मंदिरात झाला. आणि शेवटही तिथेच झाला. जनता जनार्दनाच्या दरबारात त्यांची रूजवात झाली नाही. पुढे पोटाची खळगी भरण्यासाठी अल्पवयात कामाला लागलो. पुढे शिक्षणक्षेत्रात नावा रूपाला आलो. माझ्यातील कवी. नाटककार, सिनेमा प्रोड्युसर या सर्वांना अफूची गोळी देऊन गुंगीतच ठेवले. मधूनमधून त्यांना शुद्ध येते. पुन्हा नवा डोस देऊन झोपवून टाकतो.
आता आयुष्य मावळतीच्या उतरणीवर घसरगुंडीवर बसलं आहे. नेत्रही पैलतिरी लागले आहे. उरी मात्र अजूनही ह्या कलाविष्कारांची ज्योत धगधगते आहे. देव अजब गारुडी आहे. तो सर्व काही त्याच्या मर्जीनुसार करतो. तरीही नामानिराळा. म्हणून वाटते यालाही द्यावा गुंगारा आणि आयुष्याच्या या वळणावरही मनात राहून गेलेले ते सर्व काही करावे पण त्यासाठी कुणीतरी 'देवता' भेटायला हवा.
या नाटक, सिनेमाचे स्वप्न पाहता पाहता जीवनाचे नाटक झाले. हिरोतर होता आले नाही पण मनातल्या मनात विदूषक होऊन बसलो.
-डॉ. राम नेमाडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये जोसेफ तुस्कानो यांनी लिहिलेला हा लेख
जगणे सरळधोपट असले की त्यात बेचवपणा येतो. कुतूहल, धाडस, उत्कटता, ईर्षा यातून बरेवाईट निर्णय घेऊन आपण जगतो. ठेचकळत, अडखळत अपयशावर मात करत यश संपादन करतो त्याची चव काही औरच असते. आयुष्यातील विविध टप्प्यात उत्कृष्ठतेचा ध्यास अवश्य मनी असावा, पण तिच्या प्राप्तीचा हट्ट नसावा. 'देवाची इच्छा' ही एक पळवाट असते. आपल्या चुकीसाठी वा कमतरतेसाठी आपण त्या दयाधनाला दोष देतो. नियतीने आपल्या वाटेला जे वाढले ते स्वीकारण्याचे मनोधैर्य आपण आपल्याठायी रुजविले पाहिजे. तो आपल्या संस्काराचा भाग बनला पाहिजे. तसेच, अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अपयश म्हणजे आपला मार्ग चुकल्याचे दर्शक असते. त्यावेळी मार्ग दलण्याचा सूज्ञपणा आपण दाखवला पाहिजे. कारण, खाचखळगे आणि चढउतार प्रत्येकाच्या जीवनात येतात व जो तो आपआपल्या केमिस्ट्रीनुसार ते हाताळत असतो. त्यात, मी तर मुळात रसायनाचा विद्यार्थी. अणू-परमाणू, मूलद्रव्ये, संयुगे, रसायनिक क्रिया यांच्या जंजाळात गुरफटत करियर करत होतो.
तशी, बालपणापासून लष्करात सैनिक होण्याचे स्वप्न उरी बाळगून होतो. अंगावर थरार आणणारे शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि भारत-चीन युद्धातील शूरवीरांच्या कथा त्यामागची प्रेरणा होती. छातीचा कोट करून देशाच्या सीमेवर लढण्याचे खुपसे मनसुबे रचले होते. पण, यकिंचित देहयष्टीमुळे ते काही शक्य झाले नाही. इंटरसायन्स परीक्षा पार पडली तेव्हा एक आशेचा अंधुक किरण दिसला व तो म्हणजे लष्करात मेडिकल ऑफिसर व्हायचे नि देशाची सेवा करायची. ८ मे १९७३ हा दिवस होता आणि पुण्याला प्रवेशपरीक्षा देण्यासाठी मी दादर स्टेशनला पोहचलो होतो. तेव्हा समजले की जॉर्ज
फर्नांडीस या कामगार नेत्याने रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला आहे. रेल्वेचा चक्का जाम झाला होता व माझे उरले सुरले स्वप्न डी-रेल झाले होते.
मुंबई युनिव्हर्सिटीत पदव्युत्तर शिक्षण (इंस्टीट्यूट ऑफ सायन्स, मुंबई) घेत असताना, दादरनजीक माटुंगास्थित 'कॉटन टेक्नॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी (CTRL) या संशोधनसंस्थेत प्रथम करियरची संधी मिळाली. शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहावे व घरच्यांवर भार पडू नये म्हणून वसईतल्या गास गावानजीकच्या सोपारा येथे ट्यूशन क्लासेस चालवीत होतो. त्याच वेळी, सी.टी.आर.एल. मध्ये नोकरी मिळाली. तेव्हा, एम. एस्सी. चा अभ्यास, एस.एस.सी. नि ज्युनियर कॉलेजचे क्लासेस आणि नोकरी असा तिहेरी भार पडला होता. रात्री बारा ते सकाळी पाच एवढुशी रात्र झोपण्यासाठी वाटेला यायची. पण, जीवनात काहीतरी वेगळे करायची जिद्द मनात प्रबळ झाली होती व त्या प्रेरणेने कार्यमग्नता सावलीसारखी सोबत करत होती. .सी.टी.आर.एल. (आता, त्या संस्थेचे नाव CIRCOT म्हणजेच सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन असे आहे.) मध्ये तर, कौटुंबिक वात्सल्याच वातावरण होते. वडीलधारी वैज्ञानिक मंडळीत माझ्यासारख्या तेव्हाच्या पोरगेल्या उमेदवाराचे खूप लाड झाले होते. डॉ. इंदिरा भट, सिताराम शृंगारपुरे ( त्यांना आम्ही पुरे नावाने पुकारत असू), वत्सला अय्यर आणि समवयस्क नयना अशा त्या ग्रुपमध्ये काम करताना जाम मजा यायची. मी. एम.एस्सी. पूर्ण करण्यासाठी त्या साऱ्या ज्येष्ठांनी मला प्रोत्साहन दिले व मीही त्या संधीचा फायदा उठवत नोकरी करत असतानाच बायोकेमिस्ट्री विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. देशातल्या वस्त्रोद्योगाची या ठिकाणी मला मूलभूत ओळख झाली. वस्त्राचे रसायन, भौतिक व गणित इथे समजून आले. कापड झळझळीत व्हावे म्हणून करावी लागणारी मर्सीरायजेशन प्रक्रिया, तंतूची ताकद वाढविण्यासाठीची गॅमा-प्रारण प्रक्रिया, वस्त्रांची अग्निरोधकता इ. नावीन्यपूर्ण प्रकल्पावर काम करायला मिळाले. तिथे तीन वर्षे संशोधन सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर, 'बेटर प्रोस्पेक्ट्स'साठी नोकरी बदलली.
घाटकोपरच्या बॉम्बे टेक्सटाइल रिसर्च असोसिएशन (BTRA) मधला गजबजलेला पायलट प्लांट संशोधनकार्याला प्रेरणा देणारा ठरला. १९८०-८३ चा तो काळ कसोटीचा ठरला। 'बिट्रा'मध्ये संशोधन करत होतो अन नेमका त्याचवेळी तेव्हाचे कामगारनेते दत्ता सामंतप्रणीत संघटनेतर्फे मुंबईतील सूतगिरण्यातील कामगारांचा बेमुदत संप सुरू झाला. कपड्याचे फोम, प्रिंटिंग, अग्निरोधन प्रक्रिया, तागासारख्या नैसर्गिक तंतूची जलशोषकता; यासारख्या विविध प्रकल्पात गढलो असताना खाडकन जाग आली. संस्थेच्या कणा असलेल्या सूतगिरण्या धडाधड बंद पडू लागल्या. संशोधनासाठी लागणारी रसायने, उपकरणे इ. च्या रतीब अचानक थांबला. संशोधन कामाला अडसर आला. काम पुरते मंदावले. ऐन कारकिर्दीत, मनात नैराश्य घोंगावू लागले. नुकतंच लग्न झाले होते. संसाराची जबाबदारी शिरावर येऊन पडली होती. तेव्हाच्या त्या अस्वस्थ मनस्थितीत बिट्राच्या भल्यामोठ्या तंत्र-विज्ञान लायब्ररीने साद घातली. तिथले एकेक ग्रंथ वाचून काढण्याचा सपाटा लावला. तिथेच, मग विज्ञानलिखाण करण्याचे बीज मनात रुजले. पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या 'विज्ञानयुग' मासिकाचे संपादक गजाभाऊ क्षीरसागर यांनी पाठविलेले एक पोस्टकार्ड निमित्त ठरले नि दोन रु. च्या मानधनावर विज्ञानयुगमध्ये पहिला लेख ('प्रकाश संश्लेषणाची किमया') प्रकाशित झाला. गजाभाऊची पाठीवरली कौतुकाची थाप अस्वस्थतेची खुमखुमी ठरली. त्यातूनच मग, तंतुपासून कापडापर्यन्त निर्मिती होणाऱ्या वस्त्राचा इतिहास 'वस्त्रायन' या नावाने मालिकेच्या रूपात त्यांच्या दिवाळी अंकात (१९८१) प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाने तो इतिहास पुण्याच्या प्रपंच प्रकाशनातर्फे ग्रंथरूपाने १९८४ साली प्रसिद्ध केला. माझ्या विज्ञान लिखाणाचा तो श्रीगणेशा ठरला. आज अस्मादिकांच्या खात्यावर छोटी-मोठी अशी इंग्रजी-मराठीतून राज्यभरातील विविध प्रकाशन संस्थांकडून प्रसिद्ध झालेली पन्नासेक निव्वळ विज्ञानपुस्तके (विज्ञान कथा, विज्ञानग्रंथ, ललित विज्ञान, लेखसंग्रह इ.) जमा आहेत. माझ्यावर सिद्धहस्त विज्ञान लेखक असा शिक्का बसला आहे. कालांतराने, विज्ञान प्रचार नि प्रसार जीवनातले मिशन बनून गेले.
'बिट्रा'त नोकरी करत असताना पीएच.डी. करण्याची योजना मनीमानसी होती, पण परिस्थिती अनुकूल नव्हती. कारकीर्द डळमळीत झाली होती. पुढ्यात पेच होता. त्याचवेळी दोन संधी चालून आल्या. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या तेव्हाच्या 'सायन्स टूडे' मासिक आणि दुसरी, भारत पेट्रोलियम या तेलकंपनीत लिखाणाची खुमखुमी वाढली होती व मला मनापासून 'सायन्स टूडे' खुणावत होते. त्यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये रुजू असलेले वसईचे ज्येष्ठ पत्रकार जोसेफ नरोन्हा यांचा सल्ला घेतला. 'सायन्स टूडे'त बांधिलकी पाळावी लागेल. त्यापेक्षा बी. पी. सी. एल. मध्ये नोकरी करून फ्री लान्सिंग करता येईल, हा मोलाचा सल्ला त्यांच्याकडून मिळाला.
ज्या क्षेत्रात आपण करियर करायचे तिथले 'प्रॉडक्ट नॉलेज' परिपूर्ण असले पाहिजे ही धारणा एव्हाना मनात दृढ झाली होती. लगोलग, तेव्हा मुंबईस्थित असलेल्या 'ब्रिटिश इंस्टिस्ट्यूट' यासंस्थेत पेट्रोलियम टेक्नॉलॉजी या विषयाचा डिप्लोमा करायला घेतला आणि वर्षभरात (१९८६) पूर्ण केला. सुमारे ७५०० जीवनोपयोगी पदार्थाच्या निर्मितीचा स्त्रोत असलेल्या काळ्या खनिज तेलाची माहिती विस्मयकारक होती, कारण तेव्हा शाळा-कॉलेजात हा विषय शिकविला जात नव्हता.
भारत पेट्रोलियम ही देशभर पसरलेली महाकाय कॉपोरेट कंपनी १९८४ च्या डिसेंबरला, मी मुंबईतल्या गुणवत्ता आश्वासन प्रयोगशाळेत मी रुजू झालो. मुंबईतल्या प्रॉडक्शन प्लान्टमध्ये वर्षभर काम केल्यानंतर माझी रवानगी थेट दिल्लीला झाली. त्यावेळी, कंपनीचे ध्येय-उदिष्ट होते. people above oil. मी पडलो टेक्निकल माणूस. मला प्रारंभी ते घोषवाक्य कळलेच नाही. माणसाची घनता तेलापेक्षा जास्त, मग तो तेलावर (तरंगणार) कसा? या प्रश्नाने बराच वेळ तेव्हा खाल्ला. नंतर, एका सीनियरकडून समजावून घेतले, ते असे: तेव्हा हा व्यवसायाचा भाग आहे, पण ग्राहक असलेला माणूस (समाज) त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. व्वा! क्या बात है! ते माझ्या कंपनीच्या सामाजिक बांधिलकेचे द्योतक होते. पुढे, energizing people at work place/be-yond work place हे कंपनीचे धोरण बनले. त्या जनस्फूर्तीप्रणाली अंतर्गत माझ्या विज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी दोनदा (२००८/ २०१०) पुरस्कार देऊन कंपनीने राष्ट्रीय पातळीवर माझा सन्मान केला होता. Earning while learning या माझ्या घोषवाक्याने देखील स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. ही कंपनी माझ्या होतकरू तरूणासाठी एक learning organization ठरली होती. कंपनीच्या हाऊस जर्नलमधून माझ्या लिखाण नि समाजकार्याची यथोचित नोंद व्हायची. एकदा तर त्यांनी माझा A scientist by day and a writer by night असा गौरवदेखील केला होता. या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून स्फूर्ती घेऊन इंधनातील प्रदूषक घटकावर आळा घालता यावा म्हणून त्यांच्या तपासणीसाठी महागड्या उपकरणाची योजना केली होती. कंपनीच्या कामानिमित्त देशभर भटकंती व्हायची नि त्याद्वारे अनुभव, ज्ञान, शहाणपण यात भर पडत होती. राष्ट्रीय पातळीवर सभा-परिषदाना हजेरी लावत होतो. देशातील पेट्रोलियमशी निगडीत प्रमाण-संस्थाच्या कामकाजात भाग घेऊ शकलो होतो. देशातल्या पेट्रोलियम प्रयोगशाळांचा दर्जा-परीक्षक बनलो होतो... तरीही, आपलं ज्ञान हे समुद्रातील थेंबाइतके देखील नाही याची जाणीव अनुभवत होतो:
पण, १९८५ मधील तो मे महिना मी कसा विसरू? कंपनीने माझी तडकाफडकी दिल्लीला बदली केली होती. त्या आणीबाणीच्या घटनेला कारणदेखील तसेच घडले होते. हिंदुस्तान पेट्रोलियम या दुसऱ्या देशव्यापी तेलकंपनीच्या मँगलोर तेल शुद्धीकरण कारखान्यात एक हादसा घडला होता. तिथे घरगुती वाटपासाठी उत्पादित केलेल्या केरोसिन या इंधनात नॅफ्थासारख्या ज्वालाग्राही पदार्थाची भेसळ झाली होती व स्टोव्हमध्ये ते इंधन पम्प करताना २२ जण दगावले होते. त्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या जगन्नाथ समितीने देशभरातील तेलडेपोत मिनी-लॅब स्थापन करण्याचा फतवा काढला होता. त्याद्वारे बाजारात जाणाऱ्या घासलेट तेलाची ज्वालाग्राहकतेची तपासणी होऊ शकणार होती. त्यासाठी माझी रवानगी दिल्लीतल्या मुख्यालयात केली गेली होती व तेथून उत्तर विभागातील डेपोत छोट्या प्रयोगशाळा उभारण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती... पण, मी वसई-मुंबईबाहेर कधी गेलो नव्हतो. शाळेत सातवीत पुण्याला शाळेच्या पिकनिकसोबत गेलो होतो, तेवढाच. कंपनीने भल्यापहाटे मुंबईमार्गे पॅरिसला जाणाऱ्या महाकाय जंबो विमानाचे तिकीट हाती देऊन 'ताबडतोब नीघ' म्हटले होते. घरी सगळे नाराज झाले होते. माझ्या छकुल्याचा पहिला वाढदिवस दोन-तीन दिवसावर येऊन ठेपला होता. जिवाची भावनिक घालमेल झाली होती... प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर चाचपडावे लागले होते. भर समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या हतबल माणसासारखी माझी अवस्था झाली होती. पण, मनाचा हिय्या केला. जीवनात काहीतरी वेगळे करायचे आहे, हे आधीच ठरले होते... मग, तेही दिवस निघून गेले... पाच वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा मुंबईला परतलो होतो. बी.पी.सी.एल.च्या संशोधन आणि विकास, तसेच गुणवत्ता प्रबंधन विभागात काम करत असताना, विविध इंधनांची पारख करायला शिकलो, भिन्न प्रकारची वंगणे विकसित करण्याचे ज्ञान प्राप्त केले, पाच वर्षापूर्वी निवृत्त झालो तेव्हा कंपनीच्या पश्चिम विभागाचा . गुणवत्ता आश्वासन-प्रबंधक होतो.
आज आमंत्रणावरून मी समाजाच्या विविध व्यासपीठावरून नि शाळा-कॉलेजात पेट्रोलियम पदार्थ, पर्यावरण, बदलते हवामान, ऊर्जाबाबत, शिक्षण इ. विषयावर व्याख्याने देत असतो. अनुभव आणि ज्ञान यांची देवघेव व्हावी हा हेतू असतो. विशेष म्हणजे, कुतुहलपूर्ण जिज्ञासू पोरं पुढ्यात बसून टक लावून ऐकतात तेव्हा मन आनंद व समाधानाने भरून येते. कारण लहान मुलांच्या मनाची पाटी कोरी असते व त्यावर गिरवलेली अक्षरे त्यांच्यासाठी संस्कार ठरतात.
-जोसेफ तुस्कानो
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये एकनाथराव खडसे यांनी लिहिलेला हा लेख
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी यागावी गणेशचतुर्थीच्या दिवशी मी जन्माला आलो. माझे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. माध्यमिक शिक्षण औरंगाबादला घेण्यासाठी जावे लागले. कारण त्याठिकाणी माझे दोघे भाऊ कॉलेजमध्ये शिकत होते. एक मेडिकलला होता तर दुसरा एम.एससी करत होता. मी मात्र कॉमर्स शाखेकडे वळलो. अकोला येथील कॉलेजमध्ये गेलो. आणि बी. कॉम पदवी मिळवली. मला नोकरी करायचीच नव्हती. माझ्या डोक्यात फॅक्टरी काढण्याचे विचार होते. म्हणून प्लॅस्टिक मोल्डिंगचा डिप्लोमा हा अभ्यासक्रम करण्यासाठी मुंबई गाठली. अकोल्याला एक युनीट सुरु केले. त्यात नायलॉनची बटनं व बॉलपेनचे मोल्डिंग करीत होतो. २ वर्षे जीव तोडून काम केल्यावर देखील या कामात मला यश मिळू शकले नाही. म्हणून घरी परत आलो व शेती करू लागलो.
गावी आल्यावर लोकांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली व निवडून देखील आलो. गावात पिकांच्या चोऱ्या होत होत्या. मी तरुण असल्यामुळे चीड येत होती.
शेतकरी शेतात राबराब राबतात व पीक घेण्याचा प्रयत्न करतात आणि चोर ते चोरून नेतात माझे प्रयत्न चोराला पकडण्याकडे चालू होते. त्यांत मला बऱ्यापैकी यश देखील लाभत होते. माझ्या या प्रयत्नामुळे गावातील काही नेत्यांनी मला पीकसंरक्षक सोसायटीच्या निवडणूकीला उभे राहण्याचा आग्रह धरला. शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्यांना आपल्याला मदत करता यावी या उद्देशाने मी निवडणूक लढवली व निवडून आलो. माझ्या एकंदरीत कामाचा झपाटा बघून सलग २वर्षे लोकांनी मला पीकसंरक्षक सोसायटीचा अध्यक्ष म्हणून निवडून दिले. त्या बरोबरीला खरेदी-विक्रीसंघात देखील काम करीत होतो. भाजपाचा मी हाडाचा कार्यकर्ता आहे. ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून निवडून आलो. गावाच्या राजकारणात मी पूर्ण गढून गेलो होतो. खरेदी विक्रीसंघाचे चेअरमन पद देखील मला भूषवावे लागले. यातून पंचायत समितीवर काम करण्याची संधी मिळाली.
विविध स्तरावर काम करण्याचा हा माझा प्रयत्न म्हणजे खरंतर महाविद्यालयीन जीवनात सुरुवात झाली. शिकत असतांनाच मी महाविद्यालयातील निवडणूक लढवीत होतो. तालुका पातळीवर पतसंस्था, सहकारी संस्था, तेलबिया, गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था, विविध कार्यकारी संस्था अशा अनेकविध संस्थांमध्ये कामाचा अनुभव मिळाला. तालुका शिक्षण समितीवर निवडून आलो व सचिव म्हणून १२ वर्षे काम करता आले. प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी भेटत गेले व माझ्या जीवनाला दिशा मिळत गेली. भुसावळ पीपल्स को ऑप. बँकेचा संचालक झालो. कृषी उत्पन बाजार समितीचा संचालक म्हणून १० वर्षे काम केले. सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्थांमध्ये काम केल्यामुळे योजनांची माहिती झाली व त्याची अंमलबजावणी करण्याचा अनुभव मिळाला. जनतादलाचे तालुका उपाध्यक्षपद लाभले. ७ वर्षानंतर भाजपाचा जिल्हाध्यक्ष झालो. अनुभवाचे फलित मोठे असते महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी चालून आली.
१९९० मध्ये आमदारकीचे तिकीट मिळाले. एदलाबाद हा मतदारसंघ त्याआधी पूर्णत: काँग्रेसमय होता. तिथून प्रतिभाताई पाटील सतत निवडून येत होत्या. त्या १८ वर्षे मंत्री होत्या. त्यामुळे माझ्यासाठी ही निवडणूक हे मोठे आव्हानच होते. परंतु एकच जमेची बाजू होती की, तालुक्यात सतत १५ वर्षे वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करीत होतो. या कालावधीत जनतेची निस्वार्थबुद्धीने सेवा केल्यामुळे लोकांचे प्रेम संपादन केले होते.
आणि या सर्वांचा परिपाक म्हणून लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिले. १९९५ मध्ये पुन्हा मी आमदार म्हणून निवडून आलो. थोड्याच दिवसात मंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात पडली. खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याच्याकडून विविध योजनांची माहिती करुन घेत होतो. शिवाय तालुकास्तरावरील विविध संस्थांमध्ये काम केलेले असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला व मी माझ्या मतदारसंघात या योजना कशा नेता येतील व त्याचा फायदा तेथील जनतेला कसा होऊ शकेल याचा समन्वय करू शकलो. शिक्षण, वित्त व नियोजन व पाटबंधारे खात्याचा मंत्री म्हणून काम केले. आमदार व्हायच्याआधी मी स्वतःची शेती करीत होतो. त्यामुळे शेती करतांनाच्या अडचणींची मला पूर्ण कल्पना होती. पाण्याशिवाय शेती करणे बेभरवशाचे झाले होते. कारण पाऊस कमी त्यामुळे विहिरी खोदल्याशिवाय पाण्याचा दुसरा स्तोत्र उपलब्ध नव्हता. शेती करू लागल्यावर मी माझ्या शेतात सहा/ सात विहिरी खोदल्या होत्या सारखा पाण्याचा शोध घेत होतो. पाटबंधारेमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी कसे पुरविता येईल याचा विचार करता येईल हे बघता आले व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यात मला यश आले. तसेच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहण्याची मला संधी मिळाली.
यानंतर १९९९, २००४, २००९ व २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुका मी लढवल्या व त्यात सातत्याने निवडून आलो. २००९ मध्ये मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू लागलो. मंत्री असतांना केवळ त्या खात्याची मला माहिती असावयाची. पण विरोधी पक्ष नेता झाल्यावर सर्व खात्याचे महाराष्ट्र भरातील प्रश्न मला समजू लागलेत. व त्यामुळे राज्याचे प्रश्न व त्यावर अपेक्षित कार्यवाही काय असावी याचे मला ज्ञान प्राप्त झाले.
२०१४ नंतर मला कृषी, दुग्ध विकास, मत्सोद्योग, महसूल व राज्य उत्पादन शुल्क अशा विविध विभागांची जबाबदारी असलेले मंत्रीपद लाभले. त्यामुळे माझ्या कार्यशक्तीला ते एकप्रकारे आव्हानच होते. आपल्याला काम करण्यासाठी किती ऊर्जा लागते याचा खरं म्हणजे आपल्यालाच अंदाज नसतो. मी एवढी खाती कार्यक्षमतेने सांभाळलीत.
बालवयापासूनच मला वाचनाची आवड होती. कथा, कादंबऱ्यांचे वाचन करीत होतो.वडिलांनी खाऊसाठी दिलेल्या पैशाचा विनियोग लायब्ररीची फी भरण्यासाठी करीत असे. गावात शिकलेला असून नोकरीला न गेलेला मी असल्यामुळे श्रावण महिन्यात पोथी वाचायला मला बोलावले जाई. त्यामुळे हरीपाठ, महाभारत, रामायण, भागवत,
दासबोध इत्यादी धर्मग्रंथाचे माझे वाचन होत होते. त्यामुळे मला आपल्या धर्म ग्रंथांचे ज्ञान झाले. वारकरी संप्रदायाचा जवळून परिचय झाला व त्यातून मी एक विषय घेऊन कीर्तन करु लागलो. माझ्यावर धार्मिक पगडा खूप होता. असंख्य अभंग माझे तोंडपाठ झाले. मी प्रवचन करू लागलो या माध्यमातून भावनात्मकतेने माणसे जोडली गेली. अन्यथा, कुठल्याही राजकीय वारसा नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, तालुक्यातील इतर सरकारी संस्था व त्यानंतर ३० वर्षे पर्यंत आमदार म्हणून कोण निवडून देणार? मी भरपूर प्रवास केला, सर्व विभागांशी संबंध जोडले, कोणताही संबंध तुटू दिला नाही. कॉलेजमधील मित्रमंडळींशी मी अजून संबंध बाळगून आहे. अधिकारी वर्गाशी तर मी अधिक संबंध ठेवतो कारण मला माहीत आहे की, छोट्या छोट्या कामांसाठी त्यांचाच उपयोग होतो. प्रसंगी तेच मोठमोठी कामे देखील करून देतात.
राजकीय जीवनात चढउतार चालूच असतात मी त्यामुळे कधीच नाऊमेद होत नाही कारण मी समाधानी आहे. मला जे मिळाले ते खूप आहे. मला राजकीय काहीही पार्श्वभूमी नसतांना मी इथपर्यंत पोहोचलो यातच मी आनंदी आहे. अर्थात् राजकारणात असल्यामुळे दिवसाचे १४/१६ तास घराबाहेर असतो कित्येकदा तर दिवसेंदिवस बाहेर असतो. त्यामुळे साहजिकच पत्नीला माझा कौटुंबिक सहवास कमी लाभतो. परंतु माझ्या राजकीय यशात तिचा मला संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे केवळ मी एवढ्या उड्या मारू शकतो. माझी मुलगी जळगाव जिल्हा सहकारी बँकेत अध्यक्ष आहे व ती कार्यक्षमतेने कारभार करते तर माझी पत्नी जिल्हा दूध महासंघाची अध्यक्ष असल्यामुळे ती देखील कार्यरत राहाते. सूनबाई जळगाव जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे तिचा वावर जळगाव जिल्ह्यात सारखा असतो व विविध कार्यक्रमामध्ये ती व्यग्र असते.
पाटबंधारे मंत्री असतांनाची गोष्ट सांगतो. एक आंधळे कुटुंब मला भेटायला आले. दोघेही ठार ठार आंधळे होते. त्यांच्याकडे माझे लक्ष गेले. मी त्यांना विचारले की काय काम आहे. त्यांनी सांगितले. घाटघर धरणात त्यांची जमीन गेली आहे. ते धरणग्रस्त आहेत. त्यांचा मुलगा एस.एस.सी. पास असून तोच त्यांचा आधार आहे. खालचे अधिकारी कुणीच दाद देत नाही म्हणून आपल्याला भेटायला आलो. कृपा करून माझ्या मुलाला नोकरी मिळवून द्या. तो नोकरीला लागला तर तो आमचा नीट सांभाळ करू शकेल. त्यांचे जोडलेले हात व त्यांची करूण कहाणी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी तत्काळ संबंधित अधीक्षक अभियंत्याला फोन केला व केस त्यांना समजून सांगितली व त्या जोडप्याच्या मुलाला धरणग्रस्त म्हणून नोकरी देण्याविषयी सूचना दिल्या. त्यानंतर मध्ये बराच कालावधी निघून गेला. असाच मी एकदा नाशिकला दौऱ्यावर होतो..
रेस्टहाऊसवर मला भेटायला येणारे गर्दी करीत होते. या गर्दीत हे अंध जोडपे होते. त्यांचा नंबर लागल्यावर मी त्यांना विचारले, 'आपले काय काम आहे? ' मी त्यांना विसरलो होतो. ते म्हणाले, 'साहेब, काम काहीच नाही. आपल्या कृपेने माझ्या मुलाला नोकरी लागली.
त्याचे लग्न झाले, ही सून व हा नातू आपल्या भेटीसाठी आलेत. त्यांना आपला आशीर्वाद द्या. या अंध जोडप्याने माझ्या डोळ्यात दोन वेळा पाणी आणले. परंतु त्यामुळे मला समजले की आपल्याला चांगली कामे करता येतात. दोन, दुःखिताचे अश्रू पुसता येतात हाच माझ्या जीवनातील खरा आनंद. माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या माणसांच्या वागण्यातूनच मी शिकत गेलो. माझा स्वभाव बदलत गेला व माझ्या कर्तृत्त्वाला नवनवीन कंगोरे पडत गेले.जीवनाचा मागोवा घेतांना लक्षात आलं, भेटलेली काही कुटुंब दुःखाने किती पिचलेली आहेत. शेतकरी कुटुंबातील असतील तर पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करणाऱ्यांचे दुःख वेगळेच. शेतीतून पाण्याअभावी उत्पन्न नीट येत नाही. बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. संसारातील विविध प्रश्न आ वासून उभे असतात. त्यात मुलाचे शिक्षण असेल, मुलीच्या लग्नाचा प्रश्न असेल, पैशाशिवाय यातील काहीही प्रश्न सुटू शकणारे नसतात. घरातल्या कर्त्या पुरुषाला आपण काहीही करू शकत नाही हा विचार सारखा छळतो. आणि मग अशाच एखाद्या बेसावधक्षणी त्याला मरणाला मिठी मारावी लागते. काही कार्यकर्ते आमच्याबरोबर असतात रात्रंदिवस परंतु त्यांचे व्यक्तिगत प्रश्न कधीकधी ते सांगत नाही. कुणीतरी जवळचा माणूस मग ते सांगतो मग त्याला योग्य ती मदत करता येते. अन्यथा त्याची व्यथा त्याच्याच जवळच राहाते. राजकरणाच्या या धबडग्यात ती लक्षात देखील येत नाही. हीच गोष्ट आमच्या ड्रायव्हरची. कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यावर कुठेतरी आमची जेवणाची सोय केलेली असते. एका ठिकाणी माझा ड्रायव्हर जेवलाच नाही. आम्ही पुढील कार्यक्रमाला निघालो. तो सारखा पाणी पीत होता. त्याला विचारले तर तो म्हणाला, 'जेवण मिळाले नाही.' त्याप्रसंगानंतर मी दौऱ्यावर असतांना आधी माझ्या ड्रायव्हरच्या व बॉडीगार्डच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे किंवा नाही याची चौकशी करतो.
राजकारणात विविध पदे लाभलीत. सामान्य माणसाच्या आयुष्यात ज्या अपेक्षा असतात त्यातील बऱ्याचशा पुऱ्या करता आल्यात परंतु दौऱ्यात भेटलेल्या दु:खितांचे प्रश्न व पीडीत महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे बळ मला परमेश्वराने द्यावे ही अपेक्षा करतो. कारण जग खूप मोठे आहे. त्यांचे प्रश्न देखील खूप मोठे आहेत. ते सोडवितांना लागणारी माझी ऊर्जा कमी पडते हीच माझ्या मनातील सल आहे.
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा
-एकनाथराव खडसे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
मे महिना म्हणजे सुट्टीचा आणि धमाल करण्याचा महिना. तुमच्या या धमाल आनंदात भर घालण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत एक विज्ञानकथा. विज्ञान, तंत्रज्ञान, गुन्हेगारी आणि भावना यांचे आगळेच रसायन असणारी ही कथा आहे. आम्हांला खात्री आहे की, ती तुम्हांला नक्की आवडेल!
सकारात्मक राहू या, असे म्हणले की सगळेच, हो हो चला सकारात्मक राहू या, असे म्हणतात. पण सकारात्मक राहायचे म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हो हो करत पळ काढायचा आणि म्हणायचे मी सकारात्मक विचार केला हो, असे नसते ना.
आजच्या स्पर्धेच्या युगात अशा भ्रूणहत्या ठिकठिकाणी घडताहेत. त्यावर कुणाचाही वचक नाही , कुणाला काही देणंघेणं पडलेलं नाही आणि कुणालाही कसलंही सोयरसुतक नाही…
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही, तरीही देशातील सर्वात मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनेबाबत अंतरजालावर उपलब्ध माहिती या लेखात सादर करत आहे.
आमची मराठी मुले कुठे कमी पडतात ?
एका अती शिक्षित व्यक्तीने मला काहीसे नाराजीने म्हटले की “विद्यापीठ उगाच नाही डॉक्टरेट देत कोणाला ! त्यासाठी डोकंही असावं लागतं”…अर्थात त्या व्यक्तीचही म्हणणं खरंच आहे.तुमचा अभ्यास तुम्हाला ती डॉक्टरेट देतो.पण ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्याने डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्या व्यक्तीला सगळं काही समजते…
दिवाळी म्हणजे आठवते ती लवकर उठवणारी आई.उठा उठा दिवाळी आली,मोती साबणाची वेळ झाली असे सांगणारे आजोबा..दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आधुनिक दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.
Copyright © 2025 | Marathisrushti