वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रोगग्रस्त, पिसाळलेले आणि आक्रमक कुत्र्यांना तर नक्कीच ठार मारले पाहिजे. श्वान प्रेमिंनी कुत्र्यांवर प्रेम करण्यासोबत त्यांच्या पालनाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांना जर कुत्र्यांवर एवढंच प्रेम करायच असेल तर त्याची किंमतही मोजायला तयार रहायला हव. मनुष्य हा प्रथम माणसांसाठी आहे. आपल्या देशात अनेक अनाथ मुले आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी सहानुभुती का दाखवित नाही?
June 5, 2010
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 22, 2018
प्रेम हा विवाह जीवनाचा पाया आहे. प्रेमात शारीरिक आकर्षण हा फार मोठा भाग आहे, पण त्याचबरोबर प्रेम हे मानसिक व भावनिक पातळीवर रुजले असेल तरच शारीरिक पातळीवर टिकू शकते. लग्नामुळे दोन वेगवेगळ्या आर्थिक, कौटुंबिक, स्वाभाविक आणि काही वेळा वेगवेगळ्या जातीधर्मातील व्यक्ती आयुष्य एकत्रित घालवण्याच्या ओढीतून एकत्र येतात, स्त्री पुरुषांमधल्या नैसर्गिक आकर्षणामुळे विवाहाने एकत्र बांधले जाणे ही एक वेळ सोपी गोष्ट आहे
November 22, 2023
परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उद्गार सदैव खरे ठरतील, यात शंका नाही!
February 15, 2022
लेखक व्यापारी नौदलातील
निवृत्त कॅप्टन आहेत.
शिवाय लेखक आणि कवीही आहेत.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसचे गर्वगीत' ह्या कवितेने नाविकांची, त्यांच्या धैर्याची, चिकाटीची चपखल ओळख आपल्या कवितेतून करून दिली आहे. नौदल म्हणजे नेव्ही. राष्ट्रीय सागरी सीमांचे रक्षण करणारे दल.
जगात सर्वात आधी कुठल्या उद्योगाचे जागतिकीकरण झाले असेल तर ते जहाज उद्योगाचे. अनेक लहान-मोठ्या बंदरांनी युक्त असलेला आणि साडेसात हजार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या भारताने एक प्रशिक्षित आणि उत्तम दर्जाचे मनुष्यबळ पुरवणारे राष्ट्र म्हणून ह्या क्षेत्रात नेहमीच आघाडी घेतलेली आहे.
जागतिक व्यापारात नौवहन (शिपिंग) क्षेत्राचे व पर्यायाने नाविकांचे महत्त्व अनन्य साधारण झाले आहे. आपल्या दैनंदिन गरजांतील सर्वच जीवनावश्यक गोष्टींचा जहाज वाहतुकीशी संबंध येतोच. व्यापारी नौदल (मर्चंट नेव्ही) हे कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय नौदलापेक्षा वेगळे दल आहे. ह्यात सर्व प्रकारच्या युद्धनौका आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणाऱ्या लहान-मोठ्या आकारांच्या जहाजांचा समावेश होतो.
ह्या जहाजांचे आकार म्हणजे महाकाय असतात. कंटेनर कॅरियरमधून शेकडो कंटेनर्स वाहून नेले जातात. एकेका कंटेनरचा आकार २० फूट x ८ फूट x ८.५ फूट असा असतो. टिम्बर कंटेनरमधून हजारो टन लाकडाचे ओंडके नेले जातात, एवढे सांगितले म्हणजे जहाजांच्या प्रचंड भव्यतेची कल्पना यावी. तेल, धान्य, खनिजे, खते, दगडी कोळसा, सप्त-पंचतारांकित प्रवासी जहाजे, मोटरगाड्या, ट्रक, बसेस अशी अवजड वाहने असा माल ही जहाजे वाहून नेतात. खोल समुद्रात जाणारी, किनाऱ्याजवळ काम करणारी आणि समुद्रात उत्खनन करणारी, पाईप लाईन केबल टाकण्याचे विशिष्ट काम करणारी अशीही जहाजे असतात. पण ती आकाराने लहान असतात. अशी पन्नास हजाराहून जास्त विविध प्रकारची व्यापारी जहाजे जगभरातल्या समुद्रावर आहेत. त्यांच्यासाठी साडेनऊ टक्के मनुष्यबळ भारताकडून पुरवले जाते. मालवाहू जहाजांची संख्या आज १३०० पेक्षा अधिक आहे. त्यावर साधारणपणे १० लाख कर्मचारी काम करत आहेत. व्यापारी नौदलात मनुष्यबळ प्रमाणित संख्येत लागते. परंतु ते प्रशिक्षित असावे लागते.
व्यापारी जहाजावरील कामकाज प्रामुख्याने तीन विभागात चालते: डेक, इंजिन आणि सलून म्हणजे केटरिंग विभाग. डेक विभागाचे कार्य म्हणजे जहाजावरील मालाची चढउतार, त्यावेळी त्या मालाची देखभाल, जहाजाचे नेव्हिगेशन, जहाजावरील लाईफ सेव्हिंग, फायर फायटिंगची साधने तसेच जहाजाच्या (इंजिनरूम सोडून) सर्व भागांची देखभाल करणे. चीफ ऑफिसर हा डेकचा प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली सेकंड, थर्ड, डेक कॅडेट असा अधिकारी वर्ग असतो. इंजिन विभागाचे प्रमुख कार्य म्हणजे जहाजाचे मेन इंजिन, इंजिनरूममधील जनरेटर्स, बॉयलर्स, फ्युएल प्युरीफायरसहित सर्व मशिनरी, क्रेन्स, स्टिअरिंग गिअर इत्यादी यंत्रांची देखभाल करणे. इथे चीफ इंजिनीअरच्या हाताखाली सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे इंजिनीअर्स असतात. इलेक्ट्रिकल ऑफिसर किंवा इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर असा अधिकारी वर्ग असतो. जहाजावरील खानपान व्यवस्थेशी निगडित सर्व जबाबदाऱ्या सलून विभागाकडे असतात. ह्या विभागाचा चीफ कुक हा प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली सेकंड कुक, मेसमन असा कर्मचारी वर्ग असतो. कॅप्टन हा तिन्ही विभाग प्रमुखांचा अंतिम वरिष्ठ आणि सर्वोच्च अधिकारी असतो. संपूर्ण जहाजाची जबाबदारी कॅप्टनवर असते. कॅप्टन हा डेक विभागातून येतो म्हणजे चीफ ऑफिसरला बढती मिळाल्यावर त्याला हे पद मिळते. ह्याशिवाय इंजिन विभागात काम करण्यासाठी ८ ते १० रेटिंग्ज म्हणजे खलाशी वर्ग असतो. असा साधारण २२ ते २७ प्रशिक्षित लोकांचा चमू एका व्यापारी जहाजावर कार्यरत असतो.
जहाजावर विविध प्रकारची कामे असतात. पदे, वेतन, आणि जहाजावर विविध प्रकारची कामे असतात. पदे, वेतन, आणि कामाच्या वेळा त्यानुसार असतात. कोणत्याही विभागात काम करायचे तर अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. जहाज सेवापूर्व प्रशिक्षणाचा अधिकारीपदासाठी साधारणपणे खर्च ३ ते ६ लाख, खलाशासाठी १ ते १.५ लाख असा असतो. संस्थेच्या धोरणानुसार हा खर्च वेगवेगळा असू शकतो. Indian Maritime University (IMU) हे भारतातील व्यापारी नौदलातील शिक्षण-प्रशिक्षण देणारे केंद्रीय विद्यापीठ आहे. ह्या क्षेत्रातील प्रवेशपरीक्षा ह्यांच्या मार्फत घेतल्या जातात. पुढील व्यावसायिक परीक्षा भारत सरकारच्या जहाज उद्योग मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली STCW नियमांतर्गत घेतल्या जातात. मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांची यादी https://www.dgshipping.gov.in ह्या संकेतस्थळावर आहे.
आधी जमिनीवरील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जहाजावरील प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षण घेतल्यानंतर जहाजावरील नोकरीची-बढतीची शक्यता आहे काय, हे आधी पडताळून पाहणे आवश्यक आहे. लेखीतोंडी परीक्षा पास झाल्यानंतर STCW च्या नियमानुसार व्यावसायिक प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय जहाजावर नोकरी करता येत नाही.
मर्चंट नेव्ही हे प्रामुख्याने व्यावसायिक असे खाजगी उद्योगक्षेत्र आहे. कामाचे करार हे हुद्यांनुसार काही कालावधीसाठी केले जातात. भारतीय महिलाही ह्या क्षेत्रात आता येऊ लागल्या आहेत. जहाजाच्या रोजच्या कामात विविधता असते. तरुण वयातच उत्तम वेतन मिळते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थैर्य फार लवकर मिळते. संपूर्ण वेतन करमुक्त असते. प्रवासाची संधी मिळाल्याने वेगवेगळे देश पाहायला मिळतात. जहाजावर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीच्या सोयीनुसार जहाज जिथे असेल त्या देशात विमानाने पाठवले जाते. त्यांच्या जहाजावर जाण्या येण्याच्या, त्यासाठी आवश्यकतेनुसार व्हिसा मिळवण्याच्या तसेच प्रवासादरम्यान आवश्यकतेनुसार होटेलमध्ये राहण्याच्या खर्चाची व त्यासाठी आवश्यक व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी जहाज कंपनीकडूनच घेतली जाते.
ह्या क्षेत्रातली आव्हानेही लक्षात घेतली पाहिजेत. कुटुंबापासून अनेक महिने दूर राहावे लागते. फोनवरही संपर्क होईलच असे नाही. भिन्न भाषा, भिन्न संस्कृती असलेल्या वेगवेगळ्या देशातील लोकांशी संपर्क येतो. त्यांच्याशी जुळवून घेता आले पाहिजे. हवामान अस्थिर असते. त्यातील धोक्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखता आले पाहिजे. थोडक्यात, मानसिक आणि शारीरिक संतुलन राखता आले पाहिजे. टँकर जहाजांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे खास प्रशिक्षण दिले जाते. व्यक्तिगत संरक्षक साधने वापरून, सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केल्यास टँकर जहाजांवर तेल-रसायनांची हाताळणी सुरक्षितपणे होते.
नैतिकता, प्रामाणिकपणा, कर्तव्यकठोरता, कामावरील निष्ठा, कार्यकुशलता, नेतृत्वगुण, नम्रता, स्वावलंबन, चिकाटी, संघभावना, सातत्य, उत्तम वागणूक, इंग्रजीवरील प्रभुत्व अशा अनेक गुणांमुळे भारतीय नाविकांनी अधिकारी आणि खलाशी म्हणूनही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात खूप मोठे नाव कमावलेले आहे. तसेच व्यापारी नौदलातही मोलाचे योगदान देऊन अभिमानास्पद अशी परंपरा निर्माण केली आहे. हा नावलौकिक अबाधित राखून भारतीयांसाठी नोकरीच्या अधिकाधिक संधी ह्या क्षेत्रात उपलब्ध आहेत. ह्यासाठी सुयोग्य तरुणांची ह्या क्षेत्राला नक्कीच गरज आहे. पर्यावरणाविषयी आत्मीयता, संगणक वापरण्याचे ज्ञान हेसुद्धा ह्या क्षेत्रातील निवडीसाठी उपयुक्त गुण आहेत. कामाची विविध कौशल्ये लवकर शिकून आत्मसात करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत साहसी आणि खिलाडू वृत्तीने जुळवून घेण्याची क्षमता, विश्लेषणात्मक तार्किक बुद्धिमत्ता, बहुकार्यात्मक उपयोगिता ज्यांच्यामध्ये आहे, अशा तरुणांनी अवश्य हे क्षेत्र निवडावे.
-कॅप्टन वैभव दळवी
June 30, 2022
एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता.
January 14, 2021
गजानन तो संत महात्मा ह्या भूतली आला असे
मानव म्हणूनी जन्म घेतला सर्वासाठीं ईश्वर भासे ।।१।।
आला होता गरिबांसाठीं कैवारी बनूनी त्यांचा
आजही त्याचे स्मरण होतां नाश होई दुःखाचा ।।२।।
कोठूनी आला, कसा आला कळले नाहीं कुणां
जात पात धर्म बंधने त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा ।।३।।
तो तर आला सर्वासाठीं मानवातील देव बनुन
धन्य केले कित्येकांना संकटे दूर करुन ।।४।।
संदेश घेवूनी आला होता प्रभूचा पृथ्वीवरी
धर्म रक्षण्या सांगुन गेला महान कार्य तो करी ।।५।।
नास्तिकतेची चढली होती धूळ विचारावरती
झटकून देतां तिजला नविन ज्योत पेटविती ।।६।।
जागृत केला भाव प्रभूचा प्रत्येक व्यक्तीचे मनीं
आस्तित्व ईश्वर शक्तीचे दाखविले गजाननांनी ।।७।।
कलियुगीचा असे हा काळ धर्म चालला विसरुन
गजाननाच्या रुपामध्यें दिसले सर्वा देवपण ।।८।।
प्रफुल्लित करिंता ज्ञानानी फुंकार मारुनी राखेवर
भक्तीभावानें पुजितां तुम्हीं पावन होतो ईश्वर ।।९।।
लेखक नव्हता, कवि नव्हता शिकविले नाहीं ज्ञान
सामान्य अशा घटनानीं दाखवूनी दिले प्रभूपण ।।१०।।
लोकांस वाटले चमत्कार गजाननाच्या जीवनाचे
हे तर सहजची घडले आस्तित्व होते त्यांत प्रभूचे ।।११।।
आजही त्याच्या नावामध्यें आहे शक्ति प्रभूची
संसारातील दुःखे हरपती कृपा होतां गजाननाची ।।१२।।
मानव म्हणून होता साधा उघडून देई मंदीरद्वार
देई घालवूनी दुःखें सारी हलका केला पाप भार ।।१३।।
बऱ्याच घडल्या घटना दिसले ज्यामध्ये चमत्कार
प्रभूविषयीं श्रद्धा निर्मूनी केली ईशवृत्ती साकार ।।१४।।
प्रभूसी पावन करण्या पाहिजे महान तपशक्ति
कित्येक जन्माची त्याला लागत असते भक्ति ।।१५।।
कठीण असते सारे पावन करण्या प्रभूला
मोठ मोठ्या विभूती हार जाती त्याला ।।१६।।
तुरळक कांही व्यक्ति प्रभूमय जे झाले
शेगांवचे गजानन त्यांतलेच एक ठरले ।।१७।।
त्यांच्याकडे असते दिव्य शक्तीचे बळ
सहजतेनें ते जे करिती चमत्कार समजे सकळ ।।१८।।
गण गण गणांत बोते मुखी घेत होते सतत
तन्मय होऊन शब्दामध्यें ध्यान मग्न ते होऊन जात ।।१९।।
आंता कांही प्रसंग सांगतो चमत्कार भासला त्यामध्यें
ईश्वर चैतन्याची झलक दिसून आली आनंदे ।।२०।।
प्रथम येतां शेगांवी कपडे नव्हते अंगावरी
वेडा पिसा वाटूनी समजले त्यास भिकारी ।।२१।।
एका घरा पुढतीं पडल्या उष्ट्या पत्रावळी
गजानन बसून तेथें जमवी शिते सगळी ।।२२।।
तुच्छ लेखले सर्वानीं प्रथम बघतां त्याला
अन्नातील ब्रह्म जाणतां पाणी आले नयनाला ।।२३।।
वृत्ती असते लोकांची बघण्या बाह्याकडे
अंतरीच्या दिव्यत्वाची उमज त्यांना न पडे ।।२४।।
नाल्यामधले थोडे पाणी मलीनतेने साचलेले
हात लागतां गजाननाचा निर्मळ बनूनी वाहूं लागले ।।२५।।
कित्येक रोगी त्रासून गेले दुर्धर अशा व्याधींनी
आशिर्वाद मिळतां गजाननाचा सुद्दढ झाले शरिरांनी ।।२६।।
शुष्क झालेल्या विहीरींमध्यें उचंबळूनी आले पाणी
आनंदी झाले गांवकरी तहानलेल्यांची तहान भागूनी ।।२७।।
अहंकारानी पेटलेले आले होते गोसाविजन
अग्नीज्वालांत बघूनी त्यांना नतमस्तक झाले सारेजण ।।२८।।
वांझोट्या एका गाईने उच्छाद फार मांडला
क्षीर देण्यास लावूनी शांत केले तिजला ।।२९।।
अंतःकरण जाणून भक्ताचे देई त्यांना तसेच दर्शन
आनंदी केले कांहीना विठोबाच्या रुपांत येवून ।।३०।।
नावेमध्यें जात असतां गजाननाच्या सहवासे
संकट समयीं प्रत्यक्ष नर्मदा धावूनी आली असे ।।३१।।
टिळकासम थोरांना आशिर्वाद मिळती गजाननाचे
गीतारहस्य लिहूनी ज्यानी पांग फेडले भूमातेचे ।।३२।।
येथे नव्हता जादूटोणा नव्हते कांहीं गंडे दोरे
विश्वास ज्याचा प्रभूवर त्यांनाच मिळते सारे ।।३३।।
जीवनाचे असून चक्र त्यांच्या असतात मर्यादा
दिव्य शक्तीनें ओलांडतां चमत्कार भासतो सदा ।।३४।।
असेंच बघूनी चमत्कार विश्वास ठेवतो प्रभूवरी
श्रद्धा होण्या निर्माण चमत्कारच काम करी ।।३५।।
एकदा बसतां श्रद्धा प्रभूस समर्पण होई
प्रभूस पावन करितां चमत्कार विसरुनी जाई ।।३६।।
गजाननाच्या जीवनांतील बघू नका चमत्कार
श्रद्धा ठेवूनी त्यांचेवरी पावन करा ईश्वर ।।३७।।
आजही येता भक्तमंडळी दूर दूर गांवाहूनी
समाधान पावती सारे दर्शन त्यांचे घेवूनी ।।३८।।
पावन होई नवसाला हीच त्याची महती
आदर ठेवूनी भक्तजन प्रेमभावना अर्पण करती ।।३९।।
गुरु त्यांना समजोनी पूजा करा त्यांची
पारायण करा सतत गजाननाच्या पोथीची ।।४०।।
सतत करितां पारायण गजाननमय तुम्ही व्हाल
लय लागूनी ईश्वराची उद्धरुन तुम्ही जाल ।।४१।।
अवतार कार्य करुनी देहयात्रा संपविली
ईश्वर श्रद्धा मिळवून धार्मिक चेतना पेटविली ।।४२।।
संवाद करुनी विठ्ठलाशी समाधीची घेतली अनुमती
शेगांवी मुक्कामीं येवून सर्वासमोर समाधिस्त होती ।।४३।।
अठराशे बत्तिस शके भाद्रपद शुद्ध पंचमीला
समाधी घेऊनी गजाननांनी जीवन यात्रेस निरोप दिला ।।४४।।
भव्य असे मंदीर उभारले गेले शेगांवी
लाखो भक्त मंडळी त्यांचे दर्शन घेई ।।४५।।
डॉ. भगवान नागापूरकर
१८- २२०१८४
January 18, 2018
आज नरकचतुर्दशी. या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून मग अंघोळ करण्याची पद्धत आहे. यालाच 'पहिली अंघोळ' असंही म्हटलं जातं. 'पहिली' अंघोळ असं म्हणण्यामागे काय कारण असेल बरं? कारण असं आहे की; या दिवसापासून रोज नित्यनेमाने अभ्यंग करायचा आहे. याकरता 'पहिली'. आपण मात्र वर्षातला पहिला आणि शेवटचा अभ्यंग एकाच दिवशी करत असतो!!
अभ्यंग:
संपूर्ण अंगाला कोमट तेल लावणे म्हणजे अभ्यंग. हा अभ्यंग दररोज नित्यनेमाने करावा असे आयुर्वेद सांगतो. निरोगी व्यक्तींनी दैनंदिन वापरासाठी तिळाचे तेल कोमट करून वापरावे. संपूर्ण शरीराला वरून खालच्या दिशेने तेल लावून जिरवावे. तेल वापरताना कंजूसपणा करू नये. चांगला थपथपून 'तेल्या मारुती' करावा. सुमारे दहा मिनिटांत सर्वांगाला तेल लावून होते.
नियमित अभ्यंग केल्याने त्वचा उत्तम राहते, अकाली वळ्या-सुरकुत्या पडण्यासारखे त्रास होत नाहीत, श्रमहरण होऊन ताजेतवाने वाटते, झोप उत्तम लागते आणि शरीराला पुष्टी प्राप्त होते. विशेषतः डोके, कान आणि तळपाय यांना अभ्यंग आवर्जून करावा. तळपायांना अभ्यंग केल्याने दृष्टी उत्तम राहते.
अभ्यंग कोणी टाळावा?
कफाचे विकार असणारे, स्थूल, अजीर्ण झालेले वा भूक नीट लागत नाही असे तसेच नुकतेच पंचकर्म झाले आहे अशा व्यक्तींनी अभ्यंग करू नये असे आयुर्वेद सांगतो.
अभ्यंगानंतर व्यायाम करावा असेही आयुर्वेदाला अपेक्षित आहे. केवळ आरामात अंग चोपडून घेऊन ऐषाराम करणे हा आयुर्वेदाचा उद्देश नाही. व्यायाम हा आयुर्वेदानुसार 'निराग्नि स्वेद' असून अभ्यंगात जिरवलेले तेल त्वचेत अधिक मुरण्यासाठी; तसेच घाम येऊन शरीरातील मेदाचा क्षय होण्यास त्याचा उपयोग होतो. आजही कित्येक आखाड्यांत हीच पद्धत अवलंबली जाते हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
उद्वर्तन:
उद्वर्तन म्हणजे उटणे लावणे. त्रिफळा, नागरमोथा, कचोर वगैरे विविध आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनस्पतींच्या चूर्णांच्या मिश्रणातून उटणे बनते. उटणे बनवताना आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. ते तुमच्या प्रकृतीनुसार योग्य मार्गदर्शन करतील. बाजारातून तयार उटणे विकत घेताना त्याचा दर्जा अवश्य लक्षात घ्या. उगाच २-५ रुपयांची उटण्याची पाकिटे घेऊन किती स्वस्त मिळालं यावर खूष होण्याऐवजी त्यात नेमकं काय घातलं असेल याचा विचार करा!!
उटणे लावताना घालून वरच्या दिशेने लावावे. या उटण्यामुळे आधी लावलेल्या तेलाचा बराचसा स्निग्धांश शोषला जातो. त्याचप्रमाणे विशेष करून मेदाचा नाश होतो. स्थूल व्यक्तींनी तेल न लावताच केवळ कोरडे उटणे लावावे. उटणे लावल्याने त्वचेचे आरोग्य उत्तम राहते; तसेच कफ आणि मेदाचा नाश होतो.
आयुर्वेदोक्त अभ्यंग आणि उद्वर्तन यांचा अनुभव घेऊन त्यांनंतर गरम पाण्याने स्नान करून आजच्या दिवसाची सुरुवात करा आणि येणाऱ्या हेमंत व शिशिर या दोन्ही ऋतूंत सर्व दिवसांची अशीच सुरुवात करून आपले आरोग्य उत्तम राखा!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
October 29, 2016
सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील आजवरच्या ५१ शतकांपैकी तब्बल १० शतके जानेवारी महिन्यात आलेली आहेत. या दहापैकी ३ शतके ४ जानेवारी या तारखेला आलेली आहेत : तिन्ही परदेशी मैदानांवर.
January 5, 2011
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
June 6, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti