वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लेखक डिजिटल पब्लिशिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत. भारतीय भाषांच्या इंटरनेटवरील पदार्पणासाठी १९९५ मध्ये तंत्रज्ञान निर्मिती करून ‘मराठीसृष्टी डॉटकॉम’ ह्या १९९५ मध्ये सुरू केलेल्या जगातील पहिल्या मराठी पोर्टलचे ते संस्थापक आणि मराठी साहित्यिकांच्या ग्लोबल बँडिंगसाठी ‘स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक’ ह्या प्रकल्पाचे ते जनक आहेत. भारतीय भाषांमधील १००० हून जास्त वेबसाईटच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. सामान्य माणसांपासून ते उद्योगजगत, प्रकाशन संस्था वगैरेंसाठी मराठी टायपिंग, डीटीपी, फॉन्ट्ससहित मराठी OCR Font Conversio, भाषांतर इत्यादीसाठी त्यांनी सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख
माझा शैक्षणिक प्रवास तसा खडतरच होता. प्राथमिक शिक्षण जन्मगावी वाघोड ता. रावेर (जळगाव) या माझ्या जन्मभूमीतच घेतलं. माध्यमिक शिक्षणही दहावीपर्यंत गावातच झालं. अकरावी (मॅट्रीक) साठी रावेर या तालुक्याच्या गावी माझे मामा गुरुवर्य ना.भि. वानखेडे यांच्या घरी राहिलो. तेव्हा मला खरी शिक्षणाची गोडी आणि शिक्षणक्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. नंतर दोन वर्षे खिरोदा येथे ओ.टी. डी. (चित्रकला शिक्षक) कोर्स केला. पहिला आलो. रावेरच्याच माझ्या सरदार जी. जी. हाय. ज्यु. कॉलेजात चित्रकला शिक्षक म्हणून रूजू झालो. त्यापुढचं शिक्षण बहि:स्थ पद्धतीने घेणं सुरु ठेवलं. डी.एम. आणि ए. एम. (बहि:स्थ) जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये सुटीत परीक्षा देऊन पूर्ण केलं. इंटर आर्टस (कला) भोपाळ बोर्डामार्फत इंदूरला परीक्षा देऊन केल्यावर पुणे विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादित केली. पुढे अमरावती विद्यापीठाची एम.ए. मराठी आणि बी.ए. मराठी स्पेशल या पदव्या प्राप्त झाल्यात. एम. ए. ला मेरीट मध्ये आलो. त्याठिकाणीच गुरुवर्य डॉ. भाऊसाहेब मांडवकरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.
प्राप्त झाली. १९७३ ते १९९० पर्यंतचा हा प्रवास शिक्षकी पेशा सांभाळून स्वत:च्या उच्चशैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याने पूर्ण झाला. त्यानंतर मूळजी जेठा महाविद्यालयात जळगाव येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचा प्राध्यापक म्हणून आणि विभाग प्रमुख असा १९९१ ते २०११ पर्यंतचा पल्ला गाठला. २०११ ते २०१४ तीन वर्षे महिला महाविद्यालयात प्राचार्यपदी सेवानिवृत्त झालो. सुमारे ४१ वर्षांचा हा दीर्घ प्रवास कष्ट, जिद्द, चिकाटी आणि विधायक सर्जनशील निर्मितीच्या संदर्भातील आजीवन विद्यार्थी असल्यासारखाच पूर्ण झाला. जगाच्या व्यावहारिक भूमिका, समाजातील गुणवत्तेची चाड असलेला माणसांची सोबत, शिक्षण क्षेत्रात सतत धडपडणाऱ्या वृत्तीतून प्रयोगशील जगण्याची कला आणि विधायक सर्जनशीलतेतून लेखन चिंतन, वाचन, मनन करण्याची प्रेरक शक्ती प्राप्त होत गेली. त्यामुळे "तृप्त मी; अतृप्त मी; तरीही संतृप्त मी!" असा माझा कष्ट-वेदनांवर मात करणारा आनंददायी प्रवास घडला. या काळात अनेकांना योग्य मार्ग दाखवत त्यांच्या पायावर उभं करताना आनंद वाटला. सहकारी मित्रांना मदत करीत त्यांच्या सोबत विविध प्रकल्प उभे करता आले. शैक्षणिक गुणवत्ता आणि दुर्बल घटकांतील मुला-मुलींना प्रवाहात आणता आलं.
चित्रकला - कलेचा इतिहास आणि रसग्रहण, सौंदर्यशास्त्र या बरोबर साहित्य-संशोधन आणि समीक्षा तसेच साहित्य चळवळीत सक्रीय होऊन नवनव्या वाटा चोखाळता आल्या. पूर्वाधातील कला शिक्षण आणि उत्तरार्धातील साहित्य क्षेत्रातील वाटचाल अशा दोन विश्वात रमताना ललित कला आणि काव्यकला यांचा सुंदर मेळ माझ्या आयुष्यात बसला. प्रत्येक गोष्ट अनुभवाने सिद्ध झाली. स्वयंअभ्यासातून अनुभवविश्व विस्तारत गेलं. जीवाभावाचे मित्र, मार्गदर्शक गुरु आणि सुस्वभावी संस्थाचालकांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे माझ्या धडपडणाऱ्या वृत्तीला, अतृप्ततेला यशाची तृप्तता लाभत गेली. आपण एक कर्मशक्तीचे उपासक आणि ही पर्यावरणातली माणसं प्रेमाचं सिंचन करणारे विशाल अंत:करणाचे सुहृद लाभले. त्यातून जे घडत गेलं, ते आज संतृप्त करणारं विश्व मला वाटते. यामध्ये कोणतीही गोष्ट मागच्या दारानं, वशिल्यानं किंवा दुसऱ्याचा हक्क डावलून कधी मिळवली नाही. बुद्धीमत्ता, विवेकपूर्ण विचार, चारित्र्यसंपन्न शिकवण, आणि कर्मभक्तीचा श्रद्धाशील डोळस श्रमसंस्कृतीचा संस्कार यामुळेच ही प्रगतीची वाटचाल घडून आली. यातील अतृप्तता ही नवं करण्याची प्रेरकशक्ती होती, त्यातून जिद्द-चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा वाढत होती. तृप्ततेच्या वाटेवरून जाता जाता सेवानिवृत्ती नंतरची संतृप्तता आज अनुभवता येते. इतकं सरळमार्गी जीवन जगता आलं. हा योग घडता घडता घडवून आणला त्याला अनुभवला आणि भाग्ययोग म्हणून स्वीकारला.
मानवी जीवनात 'अतृप्तता' ही नवनव्या वाटा शोधण्याची जननी असते. गरजा आणि नवे प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा यातून कष्टमय प्रवासात, साधनामय अभ्यासात, कर्ममय सेवेत सामावत गेली की यशप्राप्तीचे क्षण येतात. तेच तृप्ततेचा क्षण घेऊन येतात. समृद्ध - संपन्न भावविश्वाला कर्मशील घामाचं सिंचन केलं की, कष्टाची गोंडस फुलं आणि फळं बहरतात. संकल्प करणं आपल्या हातात असतं, त्यासाठी कष्ट झेलणं हे आपल्या रक्तात असतं परंतु सर्वच संकल्प सिद्धीस जातातच असं नसतं. तेव्हा क्षणभर उदासीनता येते. प्रयोग अपूर्ण राहतात. त्यातून अतृप्तीचा भाव उत्पन्न होतो. नव्या वाटा - नवे प्रयोग करण्यास हा भाव बळ देत राहातो. त्यामुळेच निराशेचं मळभ झटकून टाकलं की आशेचा नवा किरण सापडतो. नवा खेळ, नवी विटी, नवा दांडू, नवे मैदान, नव्या दिशा आणि नवे सर्जनशील निर्मितीचे डोहाळे लागतात. अतृप्ततेला तृप्ततेचा गंध लाभला की शेवटी संतृप्तीचा आनंदघन बरसू लागतो.
या आनंदमय जीवन प्रवाहात काही क्षण असतात वेदनामय, दुःख देणारे किंवा कटुअनुभवांचे धनी. एकदा एकाविद्यापीठात विभाग प्रमुखाची जागा भरायची होती. त्यासाठी रीतसर प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु सरळमार्गी चालण्याचा माझ्यासारख्या आणखी दोन तीन लोकांना या अनुभवाचे साक्षीदार व्हावे लागले. विद्यापीठीय राजकारण, मा. कुलगुरुंना सल्ला देणारे स्वार्थी लांगूलचालन करणारे आणि एकूण निवडप्रक्रियेचा कब्जा करून स्वतःची वर्णी लावणारे काही कुटील लोक असतात. त्यामुळे अशा व्यक्तीने त्या पदावर स्वत:ची वर्णी लावून घेतली. या चाकोरीबाहेरच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी न होता सरळमार्गी मुलाखत दिली. विषयतज्ञांना आधी न भेटता किंवा कोणतीही सेटींग न लावता सामोरा गेलो. परंतु सहा महिन्याने मा. कुलगुरु महोदयांकडून निरोप आला. “अहो, तुम्ही भेटला पण नाही. आम्हाला कळलं नाही. चांगल्या माणसांवर अन्याय झाला हे आता उशीरा लक्षात आलं. स्वार्थी माणूस ओळखायला वेळ लागला. तुम्ही भेटला नाहीत तर कसं कळेल तुमच्या गुणवत्तेबाबत? " मी शांतपणे ऐकून घेतलं, स्थितप्रज्ञ राहण्याचं कसब अनुभवातून मिळालं होतच. वाईट वाटत नाही पण मनात खंत वाटते. खदखदून येतं. त्या विभागात ॲकॅडॅमिक प्रगती होऊ शकली नाही.
पदव्युत्तर संशोधन, अभ्यासक्रमांची कालबद्ध मांडणी, उत्तम अध्ययन अध्यापनाचे कौशल्य आणि भाषा-साहित्य, बोली भाषांचे अध्ययन आणि अभ्यास पुढे जाऊ शकला नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो अशी म्हण आहे. त्याचीच प्रचिती येत राहिली काळ पुढे सरकला. स्वार्थीवृत्तीच्या माणसाने तो विभाग सोडून अन्यत्र जम बसवला. जर मला ही संधी मिळाली असती तर कदाचित काही सातत्यपूर्ण आणि दूरगामी विचारांचे प्रागतिक कार्य उभे राहू शकले असते. परंतु ग्रामीण लोकभाषा, बोलींचे आणि तौलनिक भाषा अभ्यासाचे संदर्भात जे उद्दिष्ट ठेवून विभाग उभारला गेला जे अपूर्ण राहिले. याची खंत वाटणारचं.
दुसरा अनुभव अशाच एका दुसऱ्या विद्यापीठातील पदभरती संदर्भातला आहे. तिथे ही मी प्राध्यापक पदासाठी पात्र असल्याने अर्ज केला. मला मुलाखतीचे पत्र ही प्राप्त झाले. परंतु एका विद्वान, सेवानिवृत्त प्राध्यापक मित्राकडून निरोप आला. “तुम्ही या पदासाठी मुलाखतीला जाऊ नये. कारण मा. कुलगुरुंनी त्यांचा जवळचा एक मित्र त्यासाठी निश्चित केला आहे. त्याचा बायोडाटा तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. तुम्ही गेला तर उगाच अडचण येईल, चर्चा होईल, म्हणून तुम्हास हा निरोप देण्यास मला सांगण्यात आले आहे." मला क्षणभर खिन्न झाले. परंतु दुसऱ्याक्षणी मी विचार केला. जर आपण गेलो, निवड झाली तरी ज्या महाशयांच्या प्रशासनात काम करायचे ते दुखावल्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा मुलाखतीत न जाण्याचे मी निश्चित केले. नंतर कळले ते अपेक्षित ठरलेल्या व्यक्तीला नेमण्यात आले. गुणवत्तेला डावलून या उच्चशिक्षण क्षेत्रातल्या निवडी, नेमणूका होतात. त्यात राजकारण केलं जातं. गुणवत्ता घसरते. अशी उथळ माणसं, वशिलेबाज व्यक्ती आतून जे गौडबंगाल करतात ते वेगळंच असते. असो. या घटना प्रासंगिक असतात. त्यामुळे फारसं नुकसान होत नाही, अशी स्वतःची समजूत करून घ्यावी लागते. सर्वच क्षेत्रात लागलेला हा भ्रष्ट विचारांचा रोग, आणि वशिलेबाजी याचे समर्थन कोणीच करत नाही. परंतु विरोधही फारसा होत नाही. यामुळे मनात खंत उत्पन्न होणारच! मी याला अन्याय म्हणणार नाही. माझा काही व्यक्तिगत स्वार्थ दुखावला म्हणून मी याचा निषेध ही करणार नाही. परंतु प्रवृत्ती कशा विकृतीमय होतात आणि सुसंस्कृतीचे विकृतीकरण करतात. याची अनुभवरुपी समृद्धी मला अतृप्तीतून तृप्तीकडे वाटचाल करण्यास वाट दाखवते.
'अनघा दिवाळी अंक २०१८' यांनी आवाहन करीत या संदर्भात लेखनासाठी प्रवृत्त केलं. आपल्या संपन्न आयुष्यातील यशासोबतच 'अपयशाची सल' कशी असते? या संदर्भात हे आत्मनिष्ठ लेखन करायला संधीच दिली. 'यश' ही जशी सापेक्ष संकल्पना तशीच 'अपयश' सुद्धा असते. संधी मिळाली तर यशाचं सोनं होत असते. असा मानवी मनातला विचार असतो. अनेक अनुभव येतात, संधी दार ठोठावून येते. परंतु काही ठिकाणी आपण कमी पडतो. नैतिक मूल्यांचा पिंड आपणास प्रलोभनापासून दूर ठेवतो. आपल्या इच्छा-आकांक्षांचा आपल्यासमक्ष बळी दिला जातो. त्यामुळे तात्कलिक खंत निर्माण होऊ शकते. दीर्घकालीन आणि शाश्वत विचार केला तर आपण ज्याजागी आहोत त्या सेवेतच आपण जे जे उत्तम, उदात्त आणि विधायक करतो ते खूप महत्वाचे असते. त्यातूनच कर्मयोगाची तृप्तता मिळत असते. त्यामुळे आयुष्यात कोणाबाबत कटुता उरत नाही. क्षणैक मतभेद, वाद असले तरी त्यातून अलिप्तता पाळल्यास उत्तम परिणाम उपभोगता येतात. त्याचा उत्तम परिपाक म्हणजे उत्तम आरोग्य, सुदृढ प्रकृती आणि निरामय जीवनाची सुमारे ६६ वर्षे आज पूर्ण करताना कृतार्थ वाटते. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जोडले गेलेत, शिक्षण आणि कला क्षेत्रात तसेच विविध पातळीवर ते जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. त्यांचा प्रेमळ ऋणानुबंध हीच अनमोल शिदोरी मी मानतो. १६ विद्यार्थ्यांचे पी.एच.डी., दहा विद्यार्थ्यांचे एम.फील मराठी साहित्य-भाषा आणि लोकसाहित्य या विषयात ALP मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. आनंदाची ही अनुभूती गाठीशी आहे. प्राचार्य पदी विराजमान झाल्यावर संस्थाचालक, सहकारी प्राध्यापकवृंद यांच्या सहभागाने महिला सक्षमीकरण आणि उच्चशिक्षणात त्यांचा सहभाग वाढत गेला. सावित्रीबाई फुले दत्तक पाल्य योजनेतून आर्थिक दुर्बल मुलींना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य संपन्न झाले. ही आत्मिक आनंद देणारी घटनाच आहे.
साहित्य, समीक्षा, संशोधन आणि शिक्षण तसेच प्रत्रकारिता अशा विविधक्षेत्रात अनेक जीवाभावाची प्रेमळ-सज्जन माणसं भेटलीत. अनेक नवे ग्रामीण-दलित लेखक-कवी यांना प्रोत्साहन देता आले. साहित्यसंमलने, चर्चासत्रे, षदा आणि नियतकलिकातील समीक्षा तसेच शोधनिबंध या दृष्टीने एक मोठा कार्यकर्तृत्वाचा वाटा निर्माण झाला. नव्या हातांना लिहितं करीत, त्यांची खडतर वाट सुकर करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रात अनेक सेवाभावी संस्था, वाचन चळवळ, वृत्तपत्रे-आकाशवाणी माध्यमे, स्काऊट गाईड चळवळ, सानेगुरुजी कथामाला, बालबोधपीठ इत्यादि ठिकाणी सततकार्य करण्याची संधी मिळाली.
मराठी बोली साहित्यसंघाचे उपाध्यक्षपद, जनसाहित्यसंमेलनाचे आणि खानदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, बोली साहित्यसंमेलन आणि जिल्हा साहित्य संमेलनांचे आयोजनात सक्रीय सहभाग लाभला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अ.भा. म. साहित्य महामंडळावर सदस्य म्हणून सातत्याने कार्यरत राहिलो. मासिके, ग्रंथसंपादन समितीवर कार्य केलं. माध्य. उच्च माध्य. शिक्षण मंडळावर मराठी अभ्यासमंडळ सदस्य म्हणून (तज्ज्ञ) कार्य केले. इ. ९वी ते १२वीची आठपाठ्यपुस्तके तयार केली.
राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या अंतर्गत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश (तीन खंड) संपादनाच्या समितीवर कार्य केले. विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, बहि:स्थ परीक्षक, प्रबंधाचे परीक्षण इत्यादि कार्य अत्यंत निष्ठेने केले. या दीर्घ प्रवासात भेटलेले विद्यार्थी, सहकारी संस्थाचालक आणि प्रशासनातील मान्यवर यांच्या प्रती जिव्हाळा वाढला.
या सर्वांचा सहवास मला चैतन्यदायी वाटला. निराशा नव्हतीच, आशा पल्लवित होत होत्या. म्हणून आज स्वार्थपणानं म्हणेन की, "तृप्त मी, अतृप्त मी, तरीही संतृप्त मी" अशी भाव विश्वातली सद्भावना आणि लौकिकप्राप्त जगातली मी निर्माण केलेली स्वतःची ओळख, प्रसिद्धी मला लाभली. अहंगंडाचा ऱ्हास आणि न्यूनगंडाचा निरास करीत माझा विजयरथ जीवनाच्या विजयपथावर वाटचाल करीत राहिला. याचे समाधान वाटते.
-प्राचार्य डॉ. किसन पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. नीतिन आरेकर यांनी लिहिलेला हा लेख
श्रेष्ठ दर्जाचं साहित्य हे प्रत्येक काळातील वाचकासमोर एक आव्हान असतं. कारण ते कालसापेक्ष असतं आणि तितकंच कालातीतही असतं. ते साहित्य वाचकाच्या कुवतीनुसार त्याला समाधान देत असतं. तो वाचक, त्या साहित्याची, त्याला सापडलेल्या वा त्याला आधारासाठी उपलब्ध असलेल्या निकर्षांच्या आधारावर समीक्षा करत असतो. तुकारामांचं साहित्य हे असं एकाच वेळी कालसापेक्ष व कालातीत आहे; आणि ते प्रत्येक काळातील वाचकासमोर आव्हानही आहे.
तुकाराम हे खरे समकालीन होते. त्यांच्या अभंगांत प्रामुख्याने व्यक्ती आणि समाज यांतील संबंधाची जाणीव स्पष्टपणे दृग्गोचर दिसत असते. ज्या काव्यामध्ये व्यक्ती आणि समाज यांच्यातील अतूट बंधांचा, परस्परावलंबित्त्वाचा, त्यांच्यातील मूलभूत स्वरूपाच्या वा तर्कातीत जीवैक्याचा प्रत्यय येतो, ते काव्य सामाजिक जाणिवेचे काव्य आहे असे मानायला हरकत नसते. तुकारामांचे अभंग तसे होते. अर्थात वाङ्मयीन महत्ता ही त्यात अंतर्भूत असणाऱ्या सामाजिक जाणिवेवर अवलंबून असते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जाणिवेचे अन्य प्रकारही असतात आणि सामाजिक जाणीव टाळूनही श्रेष्ठ दर्जाचं काव्य निर्माण करणं शक्य असतं. व्यक्ती आणि समाज या संबंधांबरोबरच व्यक्ती आणि निसर्ग, व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्ती आणि दिशा, व्यक्ती आणि व्यक्तिमन असे विविध प्रकारचे बंध काव्यांतर्गत जाणिवेला कारणीभूत ठरू शकतात आणि त्यांवर तिची महत्ता अवलंबून असते. या संबंधांव्यतिरिक्तही अन्यही संबंध असू शकतात. हे संबंध संपूर्णपणे स्वतंत्र व स्वायत्त नसतात. त्यांच्या कक्षा परस्परांना घेवून जाऊ शकतात. साहित्याचा जसजसा शोध घेत जावं, तसतशी ही जाणिवेची संमिश्रता, व्यामिश्रता अधिकाधिक जाणवू लागते. श्रेष्ठ दर्जाचे काव्य हे आपल्या परीने काव्याच्या मूलस्वरूपाशी एकनिष्ठ असते. श्रेष्ठ दर्जाच्या काव्यातील सामाजिक जाणीव ही उत्कटतेनं भावगर्भ आणि चिंतनगर्भ असू शकते, नव्हे असते!
जाणकार सहानुभूती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, स्वभावतःच कुतूहलपूर्णता या गुणांची कवीला आवश्यकता असते. पण त्या जोडीला कवीजवळ आवश्यक ती शब्दकळा व मांडणीचं सामर्थ्यही असणं आवश्यक असतं. कवी सभोवतालच्या सृष्टीमधून अनुभव टिपून त्या अनुभवाचे प्रतिसृजन करत असतो. श्रेष्ठ दर्जाची कविता ही पारंपरिक प्रतिमासृष्टीला छेद देऊन नवीन प्रतिमासृष्टी जन्माला घालते. कित्येक वेळा कवीला आपल्या सभोवतालची विपरिमता, विरूपता, अगतिकता व यांत्रिकता अस्वस्थ करते. ही अस्वस्थता त्याच्या काव्यातून प्रकट होते. अशावेळी दंभस्फोट करायला त्याला उपहास, उपरोध यांसारखे प्रबळ व तीक्ष्ण हत्यार वापरता येते. हे करत असताना कवीजवळ सूक्ष्म संवेदनशक्ती, प्रसरणशील व लवचिक कल्पनाशक्ती, औचित्याची दांडगी समज, सर्वांभूती महानुभूती आणि स्वाभाविक अस्वस्थता असेल तर त्याची सृजनशीलता नवनवे उन्मेष धारण करते. या सर्व गोष्टींचे संमीलन आपणास तुकारामांच्या अभंगगाथेत आढळते.
तुकारामांची अभंगगाथा ही एकाचवेळी आत्मगर्भ आहे आणि समाजागर्भही आहे. ती वैयक्तिक दुःखभोगातून सामाजिक दुःखभोगही मांडत राहते. ती सूक्ष्मातून स्थूलाकडे व स्थूलातून सूक्ष्माकडे जात येत राहते.
तुकारामांचा संपूर्ण जीवनकाळ हा महाराष्ट्रातील अत्यंत धामधुमीचा व अस्मानी संकटांना सामोरा जाणारा काळ आहे (१६०८-१६५०). हा काळ प्रचंड उलथापालथीचा काळ आहे. दीर्घ काळ चाललेला दुष्काळ, कर्मठ वातावरण, महानुभाव-नाथ-दत्त-वारकरी-सूफी संप्रदायांचे विविध विचारप्रवाह, मोंगली आक्रमणे, बहामनी सुलतानांच्या परस्परांतील लढाया, शिवाजी राजांचा उदय (१६२०) आणि त्याचा हळूहळू विस्तार, शेतकऱ्यांचे शिपाईगड्यात होणारे रुपांतरण अशा अनेक गोष्टी अवतीभवती सुरू होत्या. तत्कालीन आर्थिक घडीही पूर्णपणे विस्कटलेली होती. मुस्लीम राजसत्ता असली तरी प्रत्यक्षात हिंदू, मराठी सरदार ही या बहामनी राजसत्तांची ताकद होती. फार मोठ्या प्रमाणात धार्मिक अराजकाला तत्कालीन महाराष्ट्रीय समाजजीवन तोंड देत नव्हतं. तुकारामादी संतांना जो जाच झाला, तो यवनांपेक्षा मुस्लीम राजसत्तेपेक्षा सनातनी ब्राह्मण वर्गाचा, हे ध्यानी घेतलं पाहिजे. तुकारामांच्या गुरुपरंपरेतील बाबाजी दीक्षित, त्यांचे गुरु केशव चैतन्य, राघव चैतन्य यांना सर्व धर्मीय, पंथीय व भाषिक समाज भजत होता. वर्णातीत, धर्मातीत सहिष्णुतेचं त्या काळातील दख्खनी भूप्रदेश हा उदाहरण होता.
तुकारामांच्या अभंगातील बराचसा भाग हा जातीयतेविरुद्ध आणि संकुचित, कर्मठ धर्मसत्ते विरुद्ध होता. तुकारामांनी त्या काळातल्या अतिशय उदार असणाऱ्या परंपरेशी आपलं वैचारिक नातं जोडल्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथांकडून चालत आलेल्या परंपरेला नवा अर्थ प्राप्त करून देता आला. त्यांच्याइतका मोठा कवी आजतागायत झालेला नाही. तुकारामांनंतर धार्मिक सहिष्णुतेला वाईट दिवस आले. प्रसरणशील व लवचिक असणाऱ्या वारकरी पंथावरही प्रतिगामी बुरसट विचारांचा प्रभाव वाढला व तो आजही टिकून आहे.
आयुष्यातील दोन तृतीयांश काळ एक वैश्यवृत्तीचा उत्तम सावकार म्हणून व्यतीत केल्यावर तुकोबांनी सर्वसंगपरित्याग केला आणि एका संसारशील मनुष्याचे अस्तित्वांतर संतत्त्वात झाले. याचे एक कारण त्यांनी केलेला वारकरी संप्रदायाचा अंगिकार होय. वारकरी संप्रदायाचा निर्माता म्हणून पुंडलिकांना ओळखले जाते तर त्याचे प्रवर्तक म्हणून ज्ञानदेव मानले जातात. नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला, नाथांनी त्याला भक्कम आधार प्रदान केला. तुकारामांनी त्याचा कळस गाठला. वारकऱ्यांचं दैवत आहे- विठ्ठल ! विठ्ठ (प्राकृत-विष्णु) + स्थल (शिव) = विठ्ठल अशी विठ्ठलाची नाम उपपत्ती मानली जाते. या देशातील सर्वाधिक संघर्ष हा हिंदू-मुस्लीम किंवा हिंदू आणि अन्य धर्मीयांत झालेला नाही; तर तो वैष्णव आणि शैव यांच्यात झालेला आहे असे इतिहास सांगतो. वारकरी संप्रदायाला एखादा प्रेषित नाही. तो एक प्रवाही समूहमनाचा सामाजिक आविष्कार आहे. गळ्यात तुळशीमाळ, मुखी हरिनाम, शाकाहार, निर्व्यसनीपणा, कपाळी टिळा, विठ्ठल दैवत असा वारकऱ्यांचा साधा सोपा आचारधर्म पंढरीची वारीसुद्धा त्यांनी करायला हवी असे नाही.
तुकारामांचं घराणं आंबिले उर्फ मोरे! हे घराणं देहू गावात प्रतिष्ठित महाजनकी चालवणारं घराणं होतं. कुणबी जातीच्या तुकारामांचं निम्म्याहून अधिक जीवन सर्वसामान्यरित्या व्यतीत झालं होतं. त्यांना चार भावंडं होती. मोठा सावजी हा आध्यात्मिक वृत्तीचा होता. पत्नीच्या मृत्यूनंतर तो घर सोडून गेला तो कायमचा. तुकारामांची पहिली पत्नी रखमा व तिचा संताजी नावाचा एक मुलगा होता. तिला दम्याच्या विकाराने ग्रासल्यावर त्यांचा विवाह जिजा उर्फ आवलीशी लावला गेला. "संसारतापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ।।" असे ते लिहितात. दिवसभरातील विविध व्यावहारिक संदर्भ देत घेतच त्यांची अभंगगाथा प्रसृत होत होती. त्यातच दोन वर्षांच्या दुष्काळाने सर्वत्र हाहाकार माजला. त्यांची पत्नी रखमा निवर्तली, संताजीचा मृत्यू झाला. कुठेही अन्नधान्य मिळत नाही, प्रचलित समजूतीप्रमाणे त्यांनी घरातील अन्नधान्य लोकांना देऊन टाकलं. हुंड्या फाडून टाकल्या व ते स्वतःला संसारतापापासून मुक्त करून गावाबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसले. तिथे त्यांना नवं जीवनदर्शन घडलं. सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा सर्व स्तरावर अवांच्छित अपयश मिळालेले तुकाराम जीवनाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहू लागले. “नाही मज कोणी आपुले दुसरे" या अवस्थेतील तुकाराम विठ्ठलाला डोळ्यासमोर ठेऊन अभंगरचनांतून आपल्या व्यथा मांडू लागले. त्यामुळे या व्यथांना व्यक्तिगत संदर्भ न राहता ती सार्वत्रिक स्वरूपाची व्यथा झाली. हा दुःखाचा प्रातिनिधिक समूह आविष्कार होता. परिणामी त्या दुःखाला मानवतेच्या असहाय्य आर्ततेचे रूप प्राप्त झालेले दिसते. "जळो माझी काया । लागली वोगवा | धाव रे केशवा | मायबापा ।।" ही आर्तता तुकारामांना त्यांच्या अहंकारापासून दूर नेते व सर्वव्यापी माणूसपण त्यांच्यात साकारते - “पंचभूतांचिये । सापडलो संदी। घातलीसे बंदी | अहंकारे ।। तुका म्हणे आता । देह देऊ बळी । करूनि सोडू होळी । संचिताची ।।
तुकारामांचा हा आक्रोश सत्यशोधनाचा होता. जीवनातील शाश्वत सत्याला शोधू पाहणाऱ्या एका अस्वस्थ संवेदनाशील मनाने, स्वतःच्या अनुभूतीच्या आधारे आत्मतत्त्वाला गवसणी घालण्याचा तो प्रयत्न होता. हे आत्मतत्त्व त्यांना स्वतःतच सापडले. 'विष्णुमय जग | वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम | अमंगळ ।।.. तुका म्हणे एका । देहाचे अवयव । सुख दुःख जीव । भोग पावे ।।” किंवा “अरोग्यता तुका । पावला अष्टांगी। मिरविला रंगी । निजात्मरंगे ।।"
तुकारामांनी आपल्या अभंगांच्या सहाय्याने स्वतःचे उन्नयन घडवलेले दिसते. पण हे करत असताना संसाराची सर्व कामे त्यांनी जिजावर आवलीवर सोडून दिली. "नामदेवे केले । स्वमामाजी जागे ।" असे म्हणत शतकोटीचे अभंग करीन अशी मनाशी त्यांनी खूणगाठ बांधली होती आणि आवलीनंही पुरुषप्रधान संस्कृतीतल्या मराठी स्त्रीच्या आदर्श प्रारूपाप्रमाणे संसाराचा गाडा रेटला होता.
तुकारामांचं एक ऐतिहासिक कार्य फारसं लक्षात घेतलं गेलं नाही. त्यांचे व त्यांनी ज्या संप्रदायाचा अंगिकार केला त्या वारकरी संप्रदायाचे, ते ऐतिहासिक कार्य म्हणजे, त्यांनी ईश्वर आणि देव यांच्यात मध्यस्थांची स्वयंघोषित भूमिका बजावणारा पुरोहित वर्गच नष्ट केला. तुकाराम होते तोवर या पुरोहित वर्गाला फारशी किंमत नव्हती. तथापि त्यांच्या पश्चात समाजचक्रात उलटं वळण जे घेतलं ते आजतागायत. आपल्या समाजपुरुषांच्या ऐतिहासिक कामगिरीवर आपणच बोळा फिरवत असतो. "तुका म्हणे सोपी केली पायवाट | उतरावया भवसागर रे ।।" अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. एकदा 'पायवाट' सोपी केल्यानंतरत्यांनी अभंगातून ईश्वराच्या 'दलाली वर कोरडे ओढले. त्यांच्या भक्तिपर काव्यातही तत्कालीन भ्रष्ट ब्राह्मणवर्ग आणि तथाकथित सरंजामदारांवर त्यांनी भेदक टीका केली आहे. “रात्रंदिन आम्हां । युद्धाचा प्रसंग ।" अशा शब्दात आपल्या भोवतीच्या परिस्थितीचं वर्णन केल्यानंतर तुकाराम स्वतःच्या कवित्वाबद्दल बोलतात - "तुका म्हणे मज । देव बोलवितो ।” किंवा “मज विश्वंभर बोलवितो ।" स्वतःच्या काव्य-निर्मितीसंदर्भात ज्ञानदेवांनंतर इतक्या निरिच्छपणे कोणी बोललं नसेल.
काळाच्या ओघात तुकाराम स्वतःच्या हयातीतच दंतकथा बनले होते. चमत्कारांची भारूडं स्वतःभोवती निर्माण झाल्यानंतर ती भारूडं फेकून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला होता. "सत्यासाठी माझी शब्दवंचना" असं म्हणत ते आपल्या प्रयत्नांसंबंधी काही विधान करू पाहतात. त्यांच्या सामाजिक टीकेवरून सतराव्या शतकातील समाजरचनेचे एक प्रारूप वाचकांसमोर उभे राहते. ही टीका बोचरी असली तरीही तिच्यात सुभाषितांचं सत्त्व दडलेले दिसते - "तुका म्हणे हे । भाविकांचे वर्म । येरी धर्माधर्म । विचारावे ।।", “भक्तिभावे विण । तुका म्हणे अवघा सिण ।।”, “एक ब्रह्मचारी | गाढवा झोंबता । हाणोनिया लाता। पळाले ते ।।", "गाढवही गेले । ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे जाले । जगामाजी ।।", "जोडोनिया धन । उत्तम वेव्हारे । उदास विचारे । वेच करी II', "सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।"
तुकाराम जितेजागतेपणी देवत्वापर्यंत पोहोचत आहेत हे पाहून तत्कालीन धर्ममार्तडांनी त्यांची कविताच पाखंडी ठरवली होती व त्या कवितांना स्वहस्ते जलसमाधी देण्याची आज्ञा केली होती. तुकारामांना स्वतःच्या कवित्वाविषयी प्रचंड आत्मियता होती. त्यांची कविता नवी समाजमूल्ये निर्माण करते आहे याची त्यांना जाण होती. अनेक समाजमान्य संकल्पनांना त्यांनी नवे मूल्यभान प्राप्त करून दिले होते. “बाईलेचा त्याग म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे," "व्यभिचारी स्त्रीचीही जाज्ज्वल्य निष्ठा असते," "भगवे कपडे घालतो तोच साधू नव्हे तर जो रंजल्या गांजल्यांना आला म्हणतो तोच खरा साधू ओळखावा" अशासारख्या नवकल्पना ते मांडत होते. अर्थातच सनातनी समाज ते नाकारत होता. त्यांनी मांडलेले नवे नैतिक अर्थ त्या समाजाच्या अस्तित्वाला धोकादायक होते. म्हणून ते अभंग इंद्रायणीत बुडवायला सांगितले गेले. तरीही ते अभंग लोकगंगेत तरले. ज्ञानदेवांनंतर विद्रोहाचे इतके मोठे ज्वलंत उदाहरण इतिहासात दिसत नाही. लोकगंगेने अभंग तारल्यावर हा विरक्त संत त्याचे श्रेय विठ्ठलाला देऊन मोकळा होतो व म्हणतो- "बरे होतो, दीन होतो तरी ।।"तुकारामांचे अभंग वाचताना, आज, मनात शंका उभी राहते की त्यांना नेहमीच्या त्रिमिती जगापलिकडची चौथी मिती जाणवत होती का? या चौथ्या मितीची एक वेगळीच जाणीव त्यांच्या अभंगातून जाणवते -“मीच मज व्यालो । पोटा आपुलिया आलो II,' “मरणाही आधी | राहिलो मरोनी ।।" “आपुले मरण | पाहिले म्यां डोळा," "आम्ही मेलो तेव्हा । देह दिला देवा । आता करू सेवा । कोणाची मी ।।" या मितीची जाण आल्यानंतर दहाकार तुकाराम सर्पाकार होतात व म्हणतात - “अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ।।” आकाशाएवढे होताना अखेरीस ते लोकात उरलो असंच म्हणतात - "तुका तुकला तुका। विश्वीं भरोनि उरला लोका ।।"
सर्वाकार होत असतानाच तुकाराम हे लोकाकार होतात. म्हणजेच सूक्ष्मातून स्थूलाकडे व स्थूलाकडून सूक्ष्माकडे त्यांचा प्रवास होत राहतो. एकदा का “याचसाठी केला । होता अट्टाहास | शेवटचा दिस। गोड व्हावा ।।" ही भावना निर्माण झाली की तुकाराम जनमानसात व लोकरूपात विलीन होऊन जातात.
निमित्त तुकारामांचे पण शोध एका कवित्वाच्या माध्यमातून निराकाराकडे जाऊन पोहोचणाऱ्या संतांचा!
--प्रा. नीतिन आरेकर
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
प्रसन्नवदन, रसाळ, ओघवती वाणी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असूनही सहजसोप्या शैलीत अध्यात्म, साहित्य ह्या विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचने, व्याख्याने आणि हिंदी-उर्दूतून सूफीझम ह्यावर देशात-परदेशात विवेचन आणि भावगर्भ निवेदन करणाऱ्या म्हणून ख्याती.
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. विजय पांढरीपांडे यांनी लिहिलेला हा लेख
ज्या संस्थेतून मी इंजिनियरिंगची पदवी घेतली ह्या संस्थेचं पूर्वीचं नाव विश्वेश्वरैया रिजनल इंजिनियरिंग कॉलेज असं होतं. २००२च्या सुमारास त्या सर्व रिजनल कॉलेजेसचं रूपांतर नॅशनल इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन आय टी) असं करण्यात आलं. अन् ह्या संस्थाना केंद्र सरकारतर्फे अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिर्व्हसिटीचा) दर्जा देण्यात आला. ही संस्था पूर्णपणे केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या (मिनिस्ट्री ऑफ् एच आर डी) अखत्यारीत आली. त्या स्थित्यंतराच्या काळात संस्थेचे प्रिन्सिपॉल होते. डॉ.एम. यू. देशपांडे जे माझे इंजिनियरिंग पदवी काळातले प्राध्यापक होते. पदवी झाल्यानंतर देखील त्यांच्याशी माझे स्नेहबंध टिकून होते. त्यांनी मला फोन करून माझा बायोडेटा पाठवायला सांगितले. एन आय टी च्या पहिल्या वहिल्या (संस्थापक) डायरेक्टरच्या पदासाठी त्यांना ही माहिती हवी होती. त्या वेळी मी उस्मानिया विद्यापीठात बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. अनेक संशोधन प्रकल्पांवर काम सुरू होतं. एका जागतिक प्रकल्पाचा (World Bank Project) मी समन्वयक होतो. विभाग प्रमुख, चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज, डीन ही सर्व महत्त्वपूर्ण प्रशासकीय पदं भूषवून झाली होती. तेव्हा हे स्थित्यंतर स्वीकारावं की नाही ह्या द्विधा मनःस्थितीत होतो. पण डॉ. एम. यूंचा बराच आग्रह पडल्यामुळं मी बायोडेटा पाठवला. ज्या संस्थेत आपण शिकलो त्या संस्थेत सर्वोच्च पद (डायरेक्टर हे पद केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या बरोबरीचे) स्वीकारून त्या संस्थेसाठी, शैक्षणिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण हातभार लावण्याची संधी निश्चितच आव्हानात्मक होती.
यथावकाश दिल्लीला मुलाखती झाल्या. आय आय टी चेन्नईचे डायरेक्टर प्रा. नटराजन निवड समितीचे चेअरमन गव्हर्निंग बोर्ड देखील समितीचे सभासद होते. ते व्ही एन आय टीचेच निवृत्त प्राध्यापक होते.
मुलाखत छान झाली. अपेक्षेप्रमाणे माझी निवड ही झाली. सगळे कसे घाईगर्दीत पार पडले. कुटुंबात अर्थातच आनंदाचे वातावरण.. मुलांच्या शिक्षणाच्या अन् इतर जबाबदाऱ्या नुकत्याच पार पडलेल्या. त्यामुळे कुठंही कसलीही अडचण नव्हती. केंद्र सरकारचाच जॉब असल्याने उस्मानिया विद्यापीठातून लिअन् (सुटी) मिळण्यात कसलीही अडचण नव्हती. मी मागितल्याप्रमाणे दोन जादा इंक्रिमेंट्स देखील मिळाले. आम्ही नागपुरला (तात्पुरते) स्थलांतर करायचे ठरविले. हे पद पाच वर्षासाठीचे होते.
माझ्यासाठी ही खरंच अतिशय अभिमानाची बाब होती. ज्या संस्थेत आपण शिक्षण घेतले त्याच संस्थेच्या सर्वोच्च पदाच्या (काटेरी सिंहासन!) खुर्चीत बसून शिक्षणाला नवी दिशा देणे, नवे अभ्यास क्रम राबविणे, संशोधनासाठी नव्या प्रयोगशाळा उभारणे, मुख्य म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी ह्या सर्वांमध्ये सौहार्दाचे, सुसंवादाचे, वातावरण तयार करून चैतन्य निर्माण करणे अशी मोठी भव्य दिव्य स्वप्नं उराशी बाळगून मी कार्यारंभ केला.
तसे प्रॉब्लेम्स सर्वच ठिकाणी असतात. समस्या नाहीत अशी जागा, संस्था सापडणे कठीण. तसेच ह्या संस्थेचेही होते. तरीही पण सहकारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी ह्यांच्या सहकार्याने मी ह्या समस्या सोडवू शकेन असा आत्मविश्वास होता. माझ्या बरोबरच शिकलेले माझे काही मित्र आता तिथेच प्राध्यापक होते. कुणी महत्त्वाच्या पदावर होते. ह्या सर्वांनीच मला सहकार्याचा हात देऊ केला ही जमेची बाजू होती. राष्ट्रीय स्तरावरची, अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केंद्रीय संस्था म्हणून विद्यार्थ्यांचा दर्जा देखील उत्तम होता.
मला संघर्ष करावा लागला, लढा द्यावा लागला तो वेगळ्याच कारणासाठी. किंबहुना एका व्यक्तीसाठी. ती ही व्यक्ती साधीसुधी नव्हे तर ह्या संस्थेच्या चेअरमनशीच संघर्ष निर्माण झाला. चेअरमनची नियुक्ती मानव संसाधन खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांनी केलेली. ह्या निवडीत योग्यतेपेक्षा राजकारण जास्त. मंत्री अन् चेअरमन घनिष्ठ मित्र.. एका संस्थेशी निगडित.. जुने सहकारी. चेअरमन ह्याच शहरातले. मुख्य म्हणजे ह्याच संस्थेतले निवृत्त प्राध्यापक. ते स्वत:ला एक स्वघोषित बडे प्रस्थ मानीत होते. विद्यापीठातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. संस्थेत त्यांचे चमचे होते. विद्यार्थी होते. त्यांच्या भोवती लाळघोटेपणा करणाऱ्या लाचारांची संख्या बरीच होती. त्यात त्यांचे चेले होते. काही जणांना (मी रूजू होण्यापूर्वीच्) त्यांनी महत्त्वाच्या पदांवर बसवून उपकृत केले होते.
अशा व्यक्तीशी संघर्ष करायचा हे सोपे काम नव्हते. केंद्रीय मंत्र्यांची कृपादृष्टी असल्यामुळे आपण काहीही करायला मोकळे आहोत, कसल्याही सोयी सवलती घ्यायला पात्र आहोत, आपल्यालाच सर्व अधिकार प्राप्त आहेत अशी त्यांनी (अर्थातच चुकीची) समजूत करून घेतली होती. संस्थेच्या दैनंदिन कारभारात त्यांची नको तितकी ढवळाढवळ चालत होती. थोडक्यात संस्थेचे चेअरमन हे डायरेक्टर सारखे वागत होते. माझ्या कार्यक्षेत्रात अतीक्रमण करीत होते. नको त्या संबंधात 'ऑर्डर' देत होते! तसे पाहिले तर चेअरमनचे अधिकार मर्यादित असतात. जेव्हा केव्हा बोर्डाची मिटींग असेल तेव्हा तिचे अध्यक्षपद भूषविण्यापुरते.. किंवा हवा असेल तेव्हा (तरच) सल्ला देण्यापुरते किंवा आपत्कालीन स्थितीत घेतलेल्या निर्णयांना चेअरमन ह्या नात्याने संमती देण्यापुरते. राज्यपालांसारखे हे पद तसे शोभेचे पण अर्थात प्रतिष्ठेचे. अर्थात कोणत्याही पदाची प्रतिष्ठा वाढविणे किंवा घालविणे हे त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या मानसिक जडण घडणीवर अवलंबून असते.
एकीकडे राष्ट्रीय एकात्मतेचा, चारित्र्य संपन्न संस्कृतीचा, नैतिकतेचा पुरस्कार करायचा, भाषणे ठोकायची, चिंतन शिबिरात बौद्धिकं घ्यायची अन् दुसरीकडे वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे, स्वार्थी धोरण स्वीकारायचे, सवलती उकळायच्या, बेकायदा लाभ घ्यायचे. असे दुटप्पी धोरण.. अशी नाटकी माणसे संस्थेच्या प्रगतीला, नैतिक अधिष्ठानाला घातक असतात.
ह्या महाशयांचे एकेक प्रताप, त्यांच्या मागण्या त्यांनी जबरदस्तीने घेतलेल्या बेकायदेशीर सोयी सवलती हे जसजसे माझ्या लक्षात यायला लागले, सहकाऱ्यांनी आणून दिले तेव्हा मी सावध झालो.
माझे ह्या कॉलेजवरील, शहरावरील प्रेम हा माझा भावनिक पाया होता. जबाबदारी स्वीकारण्याचा कॉलेजचे ऋण अंशत: फेडण्याची संधी मला गमवायची नव्हती. त्यामुळे मी सावधगिरीने पण ठामपणे जे चुकीचे आहे त्याला विरोध करीत राहिलो. जी अनियमितता मला आढळली ती सर्व कागदपत्रे मी दिल्लीला मंत्रालयात, सचिवांकडे पाठवून दिली. ह्या संदर्भात मी स्वत: कधी ना दिल्लीला गेलो ना मंत्र्यांची किंवा सचिवांची भेट घेतली. माझा विरोध लक्षात आल्यावर चेअरमननी माझ्यावर दडपण आणण्याचा, असहकार पुकारण्याचा प्रयत्न केला. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची मिटिंग बोलविणे, त्यांच्याच हातात होते. महत्त्वाचे निर्णय खोळंबून राहण्याची शक्यता होती. तेव्हा मी सचिवांना (केंद्रीय मंत्रालयाच्या) स्पष्ट जाणीव दिली. मंत्रालयाने एकदा काय तो निर्णय घ्यावा. ते किंवा मी कुणीतरी जायला हवे. दोघेही एकत्र राहणे संस्थेच्या हिताचे नाही. प्रगतीसाठी योग्य नाही. मी वैतागून राजीनामा देखील पाठवून दिला. नियमाप्रमाणे तीन महिन्यांची नोटीस देऊन. ह्या दरम्यान चेअरमन, महाशय युरोपचा दौरा करुन आले. संस्थेच्या पैशाने! हे अनियमित होते. परदेशी संस्थाशी करार वगैरे करायचे तर ते काम डायरेक्टरचे. मुळात ते गेले होते जर्मनीतील आपल्या मुलाकडे! तेथील मोबाईलचे बिल देखील त्यांनी संस्थेकडे पाठविले, जे मी नामंजूर केले.
केंद्रिय सचिवांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. उलट तुम्ही चेअरमनचे काहीही ऐकू नका, त्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवा असा स्पष्ट आदेश दिला. पण संस्थेचा, पेचप्रसंग सुटत नव्हता. चेअरमनच नव्हे तर त्यांच्या भवतीचे चमचे देखील अधुनमधुन कोंडी करीत होते.
अशा संघर्षात एक गंमत असते. लोकांना तुमच्या विषयी सहानुभूति असते. त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायचा असतो. पण तशी त्यांची हिंमत नसते. त्यांच्याकडे पुरेसे नैतिक बळ नसते. उद्या आपल्यावरच उलटले तर? अशी भीती असते. त्यामुळे बहुतेक मंडळी तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असता तेव्हा किनाऱ्यावर बसून टाळ्या पिटण्यात धन्यता मानतात! हे नग्न कटु सत्य आहे!
मला संस्थेच्या राजकारणात, कुणावर कसली कुरघोडी करण्यात रस नव्हता. माझ्या अल्पशा कालावधीत मला संस्थेतील प्राध्यापकांचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे भरपूर सहकार्य मिळाले.
माझा तीन महिन्याचा नोटीस पिरियड संपताच मी माझ्या सहकाऱ्याकडे पदभार सोपवून उस्मानिया विद्यापीठात परतलो. आम्ही लवकरच निर्णय घेतो असा निरोप सरकारतर्फे आला देखील. पण तीन महिन्यात जर ते निर्णय घेऊ शकले नाहीत तर वाट पाहून काय उपयोग ह्या विचाराने मी वैतागून परतलो.
आश्चर्य म्हणजे माझा पदभार सोपविल्याचा फॅक्स दिल्लीला पोहचताच दुसऱ्या दिवशी चेअरमनची हकालपट्टी करण्याचा आदेश निघाला. मला दिल्लीहून मंत्रालयातून सचिवांचे सारखे फोन- "आता तुमच्या मनासारखं झालंय ना- आता तुम्ही परत जॉईन व्हा- हे दोन दिवस खास रजेचे समजा...'
मला हे मान्य नव्हते. हीच ऑर्डर दोन
दिवस आधी निघाली असती तर?
उच्च शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात चेअरमन सारख्या व्यक्तीची हकालपट्टी होण्याचे हे पहिलेच उदाहरण. तो निर्णय (उशीरा कां होईना) केंद्रीय मंत्र्यांनी घेतला त्याचे ही कौतुकच- पण म्हणतात ना- 'बूंदसे गयी वो हौद से नही आती।' आश्चर्य म्हणजे
चेअरमननी नेमलेल्या डायरेक्टरची (जो त्यांचाच चेला होता!) देखील हकालपट्टी करण्यात आली. मला परतण्याचे, एवढे मोठे चालून आलेले प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे दु:ख नव्हते. पण आपल्या संस्थेसाठी ठरविल्याप्रमाणे मी काही करू शकलो नाही त्याचे मात्र तीव्र दुःख होते.
मला असे वाटते की त्या विशिष्ट काळापुरते, विशिष्ट कार्यापुरते संस्थेतील घाण साफ करण्यापुरते माझे काम होते. मी तिथे गेलो नसतो, लढलो नसतो तर अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे, राजकारणी कटकारस्थानामुळे त्यांच्यासह काही टोळक्यांचा व्यक्तिगत फायदा झाला असता. पण संस्थेचे मात्र फार नुकसान झाले असते. जे काही घडले त्या मागे दैवी संकेत होता असे मला वाटते.
ज्या संस्थेने, पक्षाने ह्या अध्यक्ष महोदयांना मोठे केले, मान दिला त्यांनीही पुढे त्यांना अक्षरश: वाळीत टाकले. पण मेरे मुर्गीकी एकही टांग ह्या मग्रुरीने ते त्या मातृ संस्थेलाच दोष देत बसले!
आज असे कोणतेही क्षेत्र नाहीं, जिथे राजकारण नाही, भ्रष्टाचार नाही. अनेक गोष्टी आपण गृहित धरून चालतो. हे असे चालायचेच म्हणून मूग गिळून स्वस्थ बसतो. म्हणूनच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते. मोजक्या स्वार्थी, राजकारणी, लोकांचा फायदा होतो. कावळे स्वत:ला 'राजहंस' समजायला लागतात.देशाच्या कानाकोपऱ्यातली ही घाण, समाजव्यवस्थेला लागलेली कीड दूर करणे. आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी ह्यासाठी वाट बघण्यात अर्थ नसतो. कुणीतरी ती वाजवायचीच असते. मग आपणच कां नाही! अशा चांगल्या कार्याला परमेश्वराची दैवी साथ नेहमीच लाभत असते. आपण संघर्षाची तयारी मात्र ठेवायला हवी.
आपल्याच मातृसंस्थेसाठी उभारलेले कार्य अर्धवट सोडून यावे लागले ह्याची खंत मला नेहमीच वाटते. पण ह्या अल्पावधीत तिथे केलेल्या साफसफाईची नोंद नागपूरच्याच काही सुजाण नागरिकांनी, पत्रकारांनी घेतली ह्याचा अभिमान देखील वाटतो. ह्या कारकीर्दीचा 'परिणाम' म्हणून पुढे नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी माझे नाव 'कुणीतरी' आपण होऊन रिकमेंड केले होते. राज्यपाल कार्यालयाचे बोलवणेही आले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे त्यावेळी मला ते पद स्वीकारणे शक्य झाले नाही. ह्या अनुभवाचा फायदा मला पुढे औरंगाबादचे कुलगुरुपद सांभाळतांना निश्चितच झाला. कारण एकदा ठेच लागली की माणूस सावध होतो. शहाणा होतो. आयुष्याच्या संध्याकाळी हे शहाणपण माझ्याच मातृसंस्थेने दिले हे ही नसे थोडके!
-डॉ. विजय पांढरीपांडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. भागवत चौधरी यांनी लिहिलेला हा लेख
माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील फुलगाव या छोट्याशा गावी २९/१०/१९५१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. वडील जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले तर आईने शाळेचे तोंडच बघितलेले नव्हते. आमच्या गावाजवळ विल्हाळे म्हणून गाव आहे. तिथे तलाव खोदण्याचे काम चालू होते. कारण त्यावर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला होता. त्यावेळी तलावाच्या दुष्काळी कामावर आई जात होती. मी लहान होतो. आई एका मोठ्या हाऱ्यात (मोठी टोपली) मला ठेवून कामाच्या ठिकाणी घेऊन जात असे. शाळेत जाण्याची वेळ आली. गावातील प्राथमिक शाळेत ७ व्या वर्षी नाव घातले गेले. ती शेतकी शाळा होती. म्हणजे शेती हा विषय अभ्यासाला होता. चौथीत आल्यावर का कुणास ठाऊक परंतु डोक्यात सारखे विचार यावयाचे की, आपण मोठे झाल्यावर डॉक्टर व्हावयाचे. शाळेत असताना माझ्यावर महात्मा गांधी, पंडीतजी, लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा पगडा बसला होता. गावात साफसफाईची मोहीम मित्रमंडळींसह काढीत होतो. आपण लोकांसाठी काहीतरी कामे करावी असे वाटत असे. अभ्यासात माझी गती चांगली होती. गणितात मला नेहमी १०० पैकी १०० गुण मिळायचे. सहावीत असताना मला गणितात १०० पैकी ९८ गुण मिळाले. वडिलांना शेतातून येताना मास्तर भेटले व ते म्हणाले याला २ मार्कस् कमी मिळाले. झाले. वडील घरी आले. वडिलांनी २ मार्कस् कमी मिळाले म्हणून मला खूप मार दिला. शाळेत मला शिक्षकांचे खूप सहकार्य मिळायचे. माझे ड्रॉईंग चांगले होते. परंतु अक्षर वाईट होते. चौथीत असताना शिक्षक शाळेत न आल्यास मी आपणहून वर्गात उभा राहायचो व मुलांना शिकवीत असे. ही गोष्ट हेडमास्तरांना समजली. त्यांनी माझे कौतुक केले. त्यानंतर मी वरणगावला हायस्कूलमध्ये जाऊ लागलो.
जिला चौथीत तसेच सातवीत असताना मी मिडलस्कूल व हायस्कूल स्कॉलरशिपच्या परीक्षांना बसलो होतो. मी त्या दोन्ही परीक्षेत पास झालो. त्यामुळे मला पाचवीपासून सातवीपर्यंत मिडलस्कूल स्कॉलरशिप होती आणि आठवीपासून हायस्कूल स्कॉलरशिप मिळत होती. हायस्कूलमध्ये देखील एखादे शिक्षक गैरहजर असले म्हणजे मी वर्गात शिकवीत असे. घरी वातावरण शिक्षणाचे नसूनही माझी प्रगती चांगली होती. नातेवाईकांमध्ये माझ्या मावशीचे यजमान श्री. बलवंतराव चौधरी हे त्या काळात बी.कॉम. झालेले होते व ते शासनात मोठे अधिकारी म्हणून कार्यरत होते. परंतु त्यावेळी आमच्याच गावातील श्री. बाबूराव शिंदे यांच्या घरी मला आसरा मिळाला. त्यांचा मुलगा रमेश हा माझ्या वर्गात होता. त्यामुळे मी त्याच्याच घरी अभ्यास करीत असे. त्याची आई त्याला व मला गणित व सायन्स शिकवीत असे. माझ्याकडे शाळेची पुस्तके नसायची. मित्रांची पुस्तके अभ्यासापुरती आणायची, काही जुनी पुस्तके विकत घ्यायची. दोन ड्रेस असत. तेच धुवून घालावे लागत. मामाच्या मुलांचे कपडे व बूट नंतर वापरायला मिळायचे. तसेच सुटीत मी संत्र्यांच्या बागेत डोक्यावर पाणी घेऊन जात असे. त्याबद्दल मला मजुरी म्हणून ४ आणे दिवसाला मिळत. वडील जरी चौथी इयत्ता पास होते तरी त्यांची निमकी, पावकी, अडीचकी, दीडकी, औटकी तोंडपाठ असे. मी चौथीत असताना आईला अक्षर ओळख करून दिली. उच्चार शिकवले. तिच्या वयाच्या ६०-६५ व्या वर्षी नातीला (म्हणजे माझ्या मुलीला) आई इंग्रजी शिकवू लागली. मी हॉस्पिटलमधून आल्यावर काय म्हणायचे हे आई नातीला शिकवीत असे, 'वेलकम पप्पा', हॉस्पिटलला जायला लागल्यावर शिकवायची 'बाय पप्पा, कम अर्ली.' माझ्या मुलीवर तिच्या लहानपणी माझ्या आईने शिकविलेल्या काही गोष्टीमुळे चांगले संस्कार झालेले आहेत. ज्या हायस्कूलमध्ये मी शिकायला जायचो ते माझ्या गावाहून तीन कि.मी. अंतरावर होते. आठवी ते दहावीपर्यंत मी शाळेत पायीच जात असे. अकरावीत गेल्यावर वडिलांनी सायकल घेऊन दिली. असे असले तरी मी प्राथमिक शाळेत असो वा हायस्कूलमध्ये असो माझा पहिला नंबर कधीही चुकला नाही. स्कॉलरशिपच्या परीक्षेत तर मी भुसावळ तालुक्यात पहिला आलो. माझ्या सायन्स शिकण्याकडे विशेष कल होता. अकरावीत (एस.एस.सी.) मी शाळेत पहिला आलो व मला राष्ट्रीय शिष्यवृत्तीदेखील मिळाली.
एस. एस. सी. पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटत होते की, मी पॉलिटेक्निकला जाऊन डिप्लोमा करावा. म्हणजे आमच्या गावाजवळील वरणगावच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत लगेच नोकरी मिळेल व शिक्षण पूर्ण झाल्यावर तीन वर्षात पगार सुरु होईल व गावाजवळ झटपट नोकरी मिळले. कारण त्यावेळी वरणगावात ऑर्डनन्स फॅक्टरीचे काम सुरु झाले हाते. परंतु मला पुढे शिकायची इच्छा होती. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न होते. म्हणून मी जवळगावला कॉलेजमध्ये प्री डीग्री सायन्सला अॅडमिशन घेतली. त्यावेळी प्रा. थत्ते रसायनशास्त्र शिकवायचे. ते मुलांमध्ये कधीच मिसळत नसत किंवा आपणहून कुणाला खास मदत देखील करीत नसत. आमची मिड-टर्म परीक्षा झाल्यावर त्यांनी मला बोलावले. ते माझ्या रसायनशास्त्राच्या पेपरवर खूष होते. ते मला आग्रह करू लागले की, मी बेसिक सायन्सला जावे. नॅशनल टॅलेंटच्या परीक्षेला बसावे. ते त्यासाठी मला मदत करायला तयार होते. ते कधीही नाहीतर अशाप्रकारे कुणाला मदत करीत नसत. परंतु मी त्यांना सांगितले की, मला मेडिकलला जायचे आहे. त्यांनी मला पुन्हा ६ महिन्यांनी बोलावले व सांगितले की, तुझी पेपर सोडविण्याची, उत्तर मांडण्याची पद्धती फारच चांगली आहेत. तू बी.एस्सी., एम.एससी. होऊन पीएच. डी. करू शकतो. म्हणजे तुला डॉक्टरेट मिळेलच. परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कारण माझ्यापुढे डॉ. अरुण पाटील यांचा आदर्श होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मलादेखील मेडिकलला जायचे होते. मला प्री. डिग्री सायन्सला ८९ टक्के गुण मिळाले. मग मी मुंबईला इंटर सायन्सला अॅडमिशन घ्यायचा विचार केला. कारण मुंबईला मेडिकल कॉलेजेस चांगली आहेत व आपण एक वर्ष तिथे राहिलो तर मार्कांचा फरक पडेल अशी माझी मनाची धारणा होती. माझे मामा, डॉ. व्ही. सी. राणे हे त्यावेळी आय. आय. टी., पवईला केमिकल इंजिनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख होते. मी त्यांच्याकडे आलो. ते मला इंजिनियरिंगसाठी आग्रह करीत हाते व त्या अनुषंगाने इंटर सायन्सला रूईया, रूपारेल कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी आग्रह करू लागले. पण मला मेडिकललाच जावयाचे हे मी त्यांना स्पष्ट केले व सांगितले की, 'मी आय. आय. टी. च्या प्रवेश परीक्षेला देखील बसलो नाही.' मामांचे मित्र त्यावेळी रूपारेल कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यामुळे माझी अॅडमिशन तिथे होणारच होती. परंतु त्यांच्याकडे होस्टेलला जागा नसल्यामुळे शेवटी जोगेश्वरीच्या ईस्माईल युसुफ कॉलेजमध्ये इंटर सायन्सला अॅडमिशन घेतली. कारण तिथे होस्टेलमध्ये मला जागा मिळाली. खरे पाहू केले तर रूईया, रूपारेल कॉलेजच्या मानाने ईस्माईल युसुफ कॉलेजचा शिक्षणाचा दर्जा खालचा होता. परंतु होस्टेलची सुविधा असल्यामुळे मला त्याच कॉलेजला अॅडमिशन घ्यावी लागली. इंटर सायन्सचा निकाल लागला. त्या कॉलेजमध्ये मी पहिला आलो होतो आणि विद्यापीठात १६ वा आलो होतो. त्यामुळे मला मुंबई विद्यापीठातील कोणत्याही चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत होता. ज्या दिवशी इंटरव्ह्यू होते त्या दिवशी मुंबईला प्रचंड पाऊस झाला होता. रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत होती. सायनच्या मेडिकल कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होता. सकाळच्या ९ ते १२ च्या सत्रात २५ व दुपारच्या सत्रात २५ विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू होणार होते. मला त्या दिवशी कॉलेजमध्ये पोहोचायला दुपारचे पावणेचार वाजले. मला वाटले की, आता माझी अॅडमिशन गेली. परंतु डॉ. अरूण पाटील माझ्याबरोबर होते. त्यांनी सांगितले की, तू मेरिटमध्ये आलेला आहेस. काळजी करू नकोस. तुझी अॅडमिशन होईल. चौकशी केली तेव्हा कळले की, २५ विद्यार्थ्यांचे इंटरव्यू झालेत त्यापैकी २३ विद्यार्थ्यांनी के.ई.एम.च्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली होती. कारण त्यावेळी के.ई.एम. चे मेडिकल कॉलेज हे मुंबईतील नंबर वनचे कॉलेज गणले जात होते. इंटरव्ह्यूसाठी येणारे एक डॉक्टर ४ वाजता आले. त्यामुळे माझा इंटरव्ह्यू ४ वाजता झाला. डॉ. अरूण पाटील त्यावेळी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. त्याशिवाय जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये प्रॅक्टिकलचा मोठा अनुभव मिळतो हे मला समजले होते. म्हणून मी देखील तेच कॉलेज निवडले. अशा रीतीने मी शेवटी ग्रँट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी झालो. त्यावेळी कॉजेलमध्ये रॅगिंग चालायचे. मला ते नवीन होते. ग्रामीण भागातून आलेलो होतो त्यानंतर इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये केवळ एकवर्ष होतो. त्यामुळे शहरी वातावरणाची एवढी जाण आलेली नव्हती. जिथे रॅगिंग चालले होते तिथे जाऊन मी उत्सुकतेने बघू लागलो. डॉ. अरुण पाटील यांनी व त्यांच्या मित्रांनी मला होस्टेटला परत पाठवले. त्यामुळे माझी रॅगिंगमधून सुटका झाली. कॉलेजमध्ये मी वयाने व उंचीने लहान असल्यामुळे सर्व सिनीयरचे मित्र मला सांभाळून घेत. माझा पूर्वीचा स्वभाव खूपच एकलकोंडा होता. घरची गरिबी असल्यामुळे सतत पैशाची अडचण असायची. माझ्यापुढील प्रश्न त्यामुळे सतत यक्षप्रश्नच असत. मेरीटमध्ये असूनही घरची गरिबी असल्यामुळे पुस्तके घ्यायलादेखील पैसे नसत. त्यामुळे लायब्ररी व मित्रांवर अवलंबून राहावे लागत असे. मला नॅशनल स्कॉलरशिप चालूच होती. मोठे भाऊ थोडी मदत करीत. तरी माझे भागत नव्हते शेवटी बँक ऑफ इंडियाकडून शैक्षणिक कर्ज काढले. होस्टेलचे कॉस्मोपोलिटकल वातावरण, मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मोकळा स्वभाव यामुळे माझ्या स्वभावात हळूहळू बदल होत गेला व मूळच्या हेकेखोर स्वभावाला आपोआप मुरड पडत गेली. होस्टेलच्या वातावरणात मी हळूहळू रूळत गेलो. मी बोलका झालो. सहा महिन्यात मी सर्वांना बरोबर घेऊन अभ्यास करू लागलो. ग्रामीण भागातून आलेले, दलित विद्यार्थी यांना शिकवू लागलो. Anatomy व Physiology हे विषय मी बरोबरीच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असे. एकदाचे एम.बी.बी.एस. चे पहिले वर्ष संपले. एम.बी.बी.एस. च्या पहिल्या वर्षाला असताना माझ्या पायात चप्पल असायची. कारण बूट विकत घेणं मला पैशांच्या अभावी शक्य होत नव्हतं. एक प्राध्यापक अतिशय कडक होते. एके दिवशी त्यांनी मला बोलावले व सांगितले की, कॉलेजला येताना दररोज बूट घालून येत जा. तसेच दररोज दाढी करून येत जा. मला त्यावेळी दाढी पण नीट आलेली नव्हती. मी माझी खरी परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांनी तो मनात राग धरला व मला ते त्रास देऊ लागले. त्यांनी मला कमी मार्कस् दिले तरीदेखील मला ७० टक्के मार्कस् मिळाले. शेवटी मी मेट्रो सिनेमाजवळून रु.१५ चे बूट आणले. माझ्या प्राध्यापकांना मी होस्टेलवर इतर विद्यार्थ्यांना शिकवतो हे समजल्यावर बरे वाटले. त्यांनी मला शाबासकी दिली. एम.बी.बी.एस. चे दुसरे व तिसरे वर्ष मित्रमंडळींच्या सान्निध्यात व सहकार्याने आनंदात गेले. शेवटचे वर्ष सरत आले होते. मी पास झालो. मला एम.बी.बी.एस. झाल्यावर गावाकडे जाऊन प्रॅक्टिस करावी असे वाटत होते. त्यावेळी प्रत्येक रविवारी आम्ही कँप घेत असू. डॉ. व्ही. सी तळवलकर कुटुंबीय त्यासाठी खूप मदत करीत. मानवतेच्या दृष्टिकोनातून सतत विचार करणारे ते कुटुंब. दर रविवारी चिरनेर, पनवेल आणि आजूबाजूच्या ठिकाणी कँपसाठी आम्हाला नेण्या-आणण्याची जबाबदारी तळवलकर कुटुंब करीत असे. कँपमधून पेशंट तपासणे, त्यांना औषधे देणे या सारखी सामाजिक कामे आम्ही करीत असू. नाहीतरी मी सामाजिक बांधिलकी लहानपणापासूनच मानत आलेलो होतो.
एम.बी.बी.एस. झाल्यावर डॉ. नागोरी यांच्याबरोबर इंटर्नशिप केली. त्यांच्याबरोबर मी टेनिसदेखील खेळायचो. एम.एस.साठी मी काय घ्यावयाचे अशी चर्चा चालू झाल्यावर त्यांनी मला Robs & Smith चे १६ व्हॉल्यूम्स (खंड) वाचायला दिले. मी ते एक महिन्यात वाचले व निर्णय घेतला की मी जनरल सर्जरीला न जाता नाक, कान, घसा (ई.एन.टी.) सर्जरीला पसंती दर्शवली. जनरल सर्जरीत आव्हानात्मक काही असत नाही. ई.एन.टी. सर्जरी ही Micro सर्जरी आहे. ती शास्त्रीयदृष्ट्या अतिशय किचकट सर्जरी असून त्याला खूप मागणी आहे. मला ई.एन.टी.मध्ये एम.एस. केल्यावर प्लॅस्टिकसर्जरी करावयाची होती. ग्रामीण भागातील सहा महिन्यांची इंटर्नशिप डहाणूला केली. त्या कालावधीत त्या भागातील लोकांचे शारीरिक आजारांचे वैयक्तिक प्रश्न सोडवले. तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसरचा त्याला विरोध होता. ते आम्हाला म्हणत, 'इथे राहू नका, मी तुम्हाला सांभाळून घेईन.' परंतु तिथे राहण्याची उत्तम सोय होती. स्वच्छ समुद्र किनारा, वातावरण चांगले व ग्रामीण लोकांचे आरोग्य दुरुस्तीसाठी आपण काहीतरी करावे ही आमची मनीषा. नंतर कळले की, आमच्या कामामुळे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. लोक त्या डॉक्टरांचा अनुभवाची आमच्याशी तुलना करू लागले. तरुण डॉक्टर आम्हाला चांगले तपासतात, चांगले औषध देतात. आमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती चांगला आहे. त्यामुळे जनमानसातील आमची प्रतिमा उजळली व त्या मेडिकल अधिकाऱ्यांचे वैयक्तिक धंदे असल्यामुळे त्यांना आम्ही तिथे मुक्कामी राहून काम करतो हे आवडत नव्हते. शेवटी त्यांचे खरे रूप उघडकीस आल्यावर त्यांची गच्छन्ती झाली. त्यानंतर शहरी भागातील इंटर्नशिप जे. जे. हॉस्पिटलमध्ये करावयाची होती. त्यावेळी डॉ. बी. जे. वकील यांच्या युनिटमध्ये काम करायला मिळाले. ते स्वतः खूप मेहनती, कष्टाळू होते. त्यांच्या टिटॅनस व गॅस्ट्रोएन्ट्रायटिस या वॉर्डात काम केले. त्यावेळी त्यासंदर्भात काही लेख देखील लिहिले.
इंटरर्नशिप संपल्यावर एम. एस. साठी रजिस्ट्रेशन मिळाले. त्यानंतर ई. एन.टी.साठी एम.एस. करायला सुरुवात झाली. डॉ. आपटे व डॉ. हकीम यांच्याकडे खूप शिकायला मिळाले. हॉस्पिटलमध्ये काम करावे लागत असे. त्यावेळी मी १८/२० तास काम करीत असे. वॉर्डात २० कॉटस् असल्या तरी ५० रूग्णांची सोय केली जात असे. त्यामुळे अभ्यासाला वेळच मिळत नसे. पैशांच्याबाबत दुष्काळ कायमच होता. त्यावेळी डॉ. भाल पाटील यांचा मुलगा डॉ. पराग आम्हाला ज्युनियर होता. तरीदेखील तो माझा चांगला मित्र होता. त्याला माझ्याबद्दल फार अभिमान वाटायचा. तो नेहमी म्हणावयाचा, 'अरे किती वाईट आर्थिक परिस्थितीशी टक्कर देत तुम्ही एम.एस. केले आहे. मला घरचे उत्तम वातावरण, आर्थिक सुबत्ता असून एम. सीएच होता येत नाही.' मेडिकल फिल्डमधील काही दादा लोकांची दादागिरी प्रसिद्ध होती. त्यांच्या कुटुंबियांशिवाय इतरांना या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रात शिरकावच मिळू नये हा त्यांचा दुष्ट डाव होता. त्यामुळे प्रत्येक वर्षी एम.सी.एच. च्या इंटरव्ह्यूला तो गेला की, त्याला काहीही प्रश्न न विचारता ते एवढेच म्हणायचे, 'डॉ. पाटील, कम नेक्स्ट ईयर, ' डॉ. परागने ही गोष्ट फार सिरीयस घेतली. कारण यापूर्वी दोन वर्ष त्याला असेच परत पाठवले होते. त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या व त्या विमनस्क मनस्थितीत त्याने आपले आयुष्यच संपवले. या क्षेत्रात अशा विकेट पडतच असतात. पण मी पाहिलेली ही पहिली विकेट.
माझी पहिली हाऊसमनशिप डॉ. आपटे यांच्या हाताखाली झाली. त्यांनी मला Sub Mandual Gland चे ऑपरेशन करायला लावले. माझ्यासाठी ते आव्हान होते. मी ते स्विकारले व ऑपरेशन करू लागलो. ते पाहण्यासाठी सिनीयर डॉक्टर्स हजर होते. ते बघण्यासाठी डॉ. ओसवाल हेदेखील त्यावेळी हजर होते. ते आजदेखील मला त्यामुळे चांगले ओळखतात. आज ते लेसर सर्जरीमध्ये जगातील तज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. आपटे व डॉ. पी.ए. शहा यांच्या सान्निध्यात कॅन्सर सर्जरी करण्याकडे माझा कल जाऊ लागला. मला ती उत्सुकता निर्माण झाली. दुसरी हाऊसमनशिप मी डॉ. व्ही. एन. श्रीखंडे यांच्या हाताखाली केली. त्यांच्यामुळे मला थायराईड, पॅरारिड तसेच जनरल सर्जरीचा भरपूर अनुभव मिळाला. तसेच सर्जरीतील फिलॉसॉफीची बैठक मजबूल झाली. डॉ. श्रीखंडे हे सर्जरीतली माझे आदर्श आहेत. डॉ. आपटे Anatomy मध्ये तज्ञ होते. त्यांच्यामुळे Surgical Anatomy चे माझे ज्ञान खूप वाढले. मी वेळात वेळ काढून अॅनॉटॉमीच्या विभागात जाऊन dissection करीत असे. यावेळी पदवीपूर्वच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा माझा नियम चालूच होता. त्यावेळी 'मार्ड' चा प्रतिनिधी म्हणून देखील मी काम करीत असे.
त्यानंतर मला रजिस्ट्रारची जागा जी.टी. हॉस्पिटलमध्ये मिळाली. त्यावेळी मी 'मार्ड' या डॉक्टरांच्या संघटनेचा सचिव झालो होतो. त्यावेळी मी डॉ. एम. एम. मेहता यांच्या युनिटला जोडला गेलेलो होतो. डॉ. मेहता कान, नाक व स्कोपीची ऑपरेशन्स भरपूर करीत. त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले. परंतु पहिले ३ महिने आमचे छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायचे. मी त्यांना सांगितले की, मला डोके व मानेची ऑपरेशन्स करावयाची आहेत. डॉ. मेहता म्हणावयाचे की, 'अशी ऑपरेशन्स अद्याप मी केली नाहीत त्यामुळे तू करू नकोस. कारण मला त्याचे ज्ञान नाही.' त्यांच्याशी मी वाद घालायचो की, तुम्ही स्वत: वाचा, स्वतः शिका, मला शिकवा. ते चिडायचे. ते म्हणावयाचे, 'मी तुझा बॉस आहे की तू.' मी त्यांना सांगावयाचो की 'तुम्हीच माझे बॉस आहात. परंतु मला डोके व मानेची शस्त्रक्रिया करावयाची आहे, ते शिकायचे आहे. ते तुम्ही मला शिकवलेच पाहिजे.' एकदा एक किचकट केस आली होती. जबड्याच्या कॅन्सरचे ते ऑपरेशन होते. डॉ. मेहतांनी मला विरोध केला. मी हट्टाला पेटालो. डॉ. मेहता चिडलेले होते. ते त्यांच्या केबिनमध्ये या संदर्भातील वेगवेगळे पेपर्स, लेख व पुस्तके चाळत बसले होत आणि मोठ्या कष्टाने त्यांनी मला शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. मी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. ऑपरेशनच्या कालावधीत डॉ. मेहता यांनी तीन वेळा फोन करून चौकशी केली ऑपरेशन झाल्यावर डॉ. मेहता म्हणाले, ' पेशंटला आय.सी.यू. मध्ये ठेवू या.' मी त्याला विरोध केला. त्यांनी मला कारण विचारले. तेव्हा मी सांगितले की, 'हा माझा पेशंट आहे. आय.सी.यू.मध्ये ठेवल्यावर तेथील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील. वॉर्डात ठेवल्यावर पेशंटची सर्व जबाबदारी माझी राहील.' मी पेशंटची सर्व काळजी घेत होतो. मी वॉर्डात त्याच्याजवळच बसून राहात असे. एकदा तर रेल्वे गाड्यांचे प्रचंड गोंधळ होते. मी कल्याणला राहात होतो. जे. जे. मध्ये डॉक्टरांचा संप चालू होता. मी कल्याणहून भिवंडीला गेलो. तेथून बसने मुंबई सेंट्रलला आलो. तेथून टॅक्सीने जे.जे. हॉस्पिटलला पोहोचलो. त्यामुळे मला वॉर्डात पोहोचायला १२ वाजले. डॉ. मेहता हे ऑनररी डॉक्टर असल्यामुळे ते उशिराच येत. पण ते त्या दिवशी ११ ।। वाजताच वॉर्डात आले. मी तिथे नाही हे कळल्यावर त्यांनी सुपरिटेडेंटकडे माझी तक्रार केली. त्यांनी वस्तुस्थिती डॉ. मेहतांना सांगितल्यावर ते शांत झाले. अशीच दुसरी एक घटना घडली. मी माझ्या कामात नेहमी काटेकोर असे. त्यावेळी जे.जे.मधील आर.एम.ओ. चा संप चालू होता. मी कामावर होतो. पण त्या दिवशी मला डायरिया झालेला होता. मी सुपरिटेंडेंट साहेबांना आल्यावर त्याबद्दल कानावर घातले होते की, मी अशावेळी क्वार्टरवर जात जाईन. अन्यथा, मी वॉर्डात असेनच. डॉ. मेहता राऊंडला आल्यावर मी दिसत नाही हे पाहिल्यावर त्यांचे पित्त खवळले. त्यांनी माझी तक्रार केली. परंतु सुपरिटेंडेंट साहेबांना मी कल्पना दिलेली असल्यामुळे त्यांनी डॉ. मेहतांना समजावले आणि सांगितले की 'डॉ. चौधरी अशा परिस्थितीत एक दिवसांची रजा घेऊन घरी राहू शकले असते परंतु हॉस्पिटलची परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःला डायरियाचा त्रास होत असूनही ते काम करीत आहेत ही गोष्ट त्यांच्यासाठी कौतुकाची आहे.
मला थायराईडची ऑपरेशन्स करायची होती. डॉ. मेहता ती मला करू देईनात. शेवटी डॉ. श्रीखंडे यांनी डॉ. मेहतांना सांगितले की, डॉ. चौधरी सिन्सियर असून त्याला थायराईडचे ऑपरेशन करू द्या. त्याला काही अडचण आली तर मी मदतीला येईन आणि काही प्रॉब्लेम निर्माण झालाच तर त्याची जबाबदारी मी घेईन, जणूकाही ते ऑपरेशन मीच केले आहे असे समजून. त्यानंतर डॉ. मेहतांनी मला थायराईडची ऑपरेशन्स करायची पूर्ण परवानगी दिली. आता डॉ. मेहतांना माझ्या कामाबद्दलच्या बांधिलकीची पूर्ण ओळख पटली व त्यांनी मला Microscope, Drill Machine, Suction Machine, Hand Pieces & Drill Bitts आणून दिले व बिनधास्त काम करायची मुभा दिली. मी शनिवारी, रविवारीदेखील खूप काम करू लागलो व त्यांना त्याचे रिझल्टस् दाखवित असे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर खूप विश्वास बसला. आतादेखील ते माझ्या कायम संपर्कात आहेत. अर्थात मी देखील सतत त्यांना फोन करीत असतो. परंतु समजा कामाच्या गडबडीमुळे मी फोन करायला विसरलो तर ते मला फोन करतात. मी रजिस्ट्रार असताना समजा एम. एस. च्या लेक्चरला बसलो असलो तर ते स्वत: माझे रजिस्ट्रार म्हणून फोन घेत व अशा रीतीने ते मला मदत करीत.
माझी ३१/१२/१९७८ रोजी एम. एस. ची प्रॅक्टिकलची परिक्षा संपली. दुसऱ्या दिवशी डी. एम. ई. आर. चे संचालक डॉ. अंजनेल्यू यांनी ऑफिसमध्ये मला बोलावले व सांगितले की, आंबेजोगाईला नवीन मेडिकल कॉलेज उघडले आहे तेथे 'रीडर' चे पद त्यांनी मला देऊ केले होते. मी. एम.एस. विशेष प्राविण्य मिळवून पास झालो होतो. मला प्लॅस्टिक सर्जरी करायची होती. पण मला रजिस्ट्रेशन मिळत नव्हते. शेवटी वरळीच्या ईएसआयएसमध्ये नोकरी पत्करी. त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागलो. त्यापूर्वी मी के.ई.एम. हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चररच्या जागेसाठी अर्ज दिला होता. परंतु इंटरव्ह्यूच्यावेळी त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, तुम्ही आमच्या कॉलेजमधून शिकलेले नाही, म्हणून तुम्हाला उत्तम मार्कस् असून इथे लेक्चररची जागा मिळणार नाही. ऑक्टोबर १९७९ ते १९८३ पर्यंत मी लेक्चचर म्हणून डॉ. आपटेंच्या बरोबर काम करीत होतो. वेगवेगळी जर्नल्स वाचून मी सर्जरी करू लागलो. नागपूरला मला असोसिएट प्रोफेसर म्हणून कामाची ऑफर आली. परंतु मी तिथे गेलो नाही. Neuro Surgery, Plastic Surgery, ENT, Head & Neck Surgery करू लागलो. मी एक टीम तयार केली व किचकट ऑपरेशन्स करू लागलो. मोठमोठ्या हॉस्पिटलने परत पाठविलेल्या कॅन्सरच्या रूग्णांची मी ऑपरेशन्स करू लागलो. शिकवण्याचा पेशा पत्करल्यामुळे शासनाने दिलेले माझे शैक्षणिक कर्ज माफ झाले. डॉक्टरांचा पेशा हा पवित्र पेशा आहे. शिकवण्याचे कार्यदेखील पवित्र कार्य आहे. त्यामुळे डॉक्टर झाल्यावर शिक्षकी पेशा स्विकारल्यामुळे मला दुप्पट पवित्र पेशा मिळाल्याचे समाधान मिळाले. मी जे.जे. हॉस्पिटलमध्ये डोके, मानेच्या कॅन्सर सर्जरीवर वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. तसेच दरवर्षी एक याप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्यातील ईएनटी डॉक्टरांना बोलावून परराष्ट्रातील काही डॉक्टर्ससह ६ दिवसांचे वर्कशॉप्स घेऊ लागलो. १० ते १२ वर्षे मी असे वर्कशॉप्स घेत होतो. हे प्रशिक्षण मिळवलेले डॉक्टर्स स्वतंत्ररित्या आता ऑपरेशन्स करू लागले आहेत. आमच्या कार्याची जाण ठेवून कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (एनजीओ) या संस्थेने एम.एस. केलेल्या डॉक्टरांना हेड नेक ऑनकॉलॉजीचे २ वर्षांचे ट्रेनिंग घेण्यासाठी २ फेलोशिप दरवर्षी सुरू केल्यात.
न्युरोसर्जरी करू लागल्यावर Base Scrull Surgery करायला सुरूवात केली. यासाठी मी कुठेही परदेशात प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो नव्हतो. अशीच एक "Base Scrull Surgery” करीत असताना साऊथ हॅम्पटन युनिर्व्हसिटीचे प्रा. बेरी इव्हान्स यांनी मला बघितले होते. मी एकटा ती सर्जरी करीत होतो. मदतीला कुणीही न्युरोसर्जन नव्हता.
प्रा. इव्हन्स यांनी मला ताबडतोब सिनीयर रजिस्ट्रारची जागा त्यांच्या विद्यापीठात देऊ केली. त्यासाठी यु.के.च्या बोर्डाच्या परीक्षेची अट माझ्यासाठी नव्हती. परंतु मी त्यांची ऑफर स्विकारली नाही कारण मला तिथे काम करायचे नव्हतेच. मला खरे पाहू केले तर Specialization of reconstructive Surgery of Head, Neck & ENT.' करायची होती. मी लेक्चरर असताना एमसीएच प्लॅस्टिक सर्जरीसाठी १९८४ मध्ये प्रयत्न केला. मला संचालकांनी ती जागा द्यायचे नाकारले. खरे पाहू केले तर मी एकटा त्यासाठी प्रयत्नशील होतो. मी मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांमार्फत प्रयत्न केले. त्यांनी माझे नाव मान्य करून पाठवले. परंतु तरीदेखील मला एमसीएच ला अॅडमिशन देण्यात आली नाही. मेडिकलच्या क्षेत्रात मागे मी नमूद केल्याप्रमाणे तुमचा कोणी गॉडफादर असल्याशिवाय केवळ मेरिटवर काही महत्त्वाच्या जागा अथवा स्पेशलाझेशनच्या कोर्सेसला प्रवेश मिळत नाही. हाच अनुभव मला ऑनररीची जागा मिळविण्यासाठी देखील झाला. १९८९ मध्ये शेवटी मला जी. टी. हॉस्पिटलमध्ये ते पद मिळाले.
मी नंतर Head, Face, Neck Vascular Tumors injuries ची air passage सर्जरी करू लागलो. नंतर मी व्हाईस बॉक्सचे ऑपरेशन्स नियमितरित्या करू लागलो. मी भरपूर काम करीत होतो. त्यामुळे भारतातच काय परदेशातदेखील माझे नाव झाले व ठिकठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख होऊ लागला. आयुष्यात मला कोणतीही गोष्टसहजासहजी मिळालेली नाही. प्रत्येक वेळी ती मिळविण्यासाठी मला लढा द्यावा लागला. काही वर्षे परदेशात गेलो होतो. परंतु नंतर मी ठाण्याच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ईएनटी विभागप्रमुख म्हणून काम करू लागलो. तसेच त्यांच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवू लागलो. तिथे एक फार मोठी केस माझ्याकडे आली. मी त्या रुग्णाबद्दलचे मला सांगणाऱ्या मित्राला पेपर बघितल्यावर ऑपरेशन करता येईल असे सांगितले. त्या रुग्णाला डोक्याला ट्यूमर झालेला होता. परंतु त्याला २-२ ।। वर्षे इकडून तिकडे डॉक्टरांकडे फिरवण्यात आले. भरपूर खर्च केला त्या रूग्णाने. शेवटी पुन्हा तो सर्व पेपर्स, एमआरआय रिपोर्टस् घेऊन ठाण्याच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात घेऊन माझ्याकडे आला. मी त्याला सांगितले, ऑपरेशन किचकट आहे. पेशंट ऑपरेशन टेबलवरदेखील जाऊ शकतो अथवा यश लाभले तर तो जगेल देखील. पूर्ण विचार करून मला सांगा. तो रुग्ण १ तासानंतर लगेच मला भेटला. खर्चाबद्दल त्याने विचारले, मी त्याला सांगितले की, १.४० लाख रूपये खर्च येईल. तो तयार झाला. तो म्हणाला की, 'डॉक्टरसाहेब, तुम्ही माझे कागदपत्र ज्या पद्धतीने सिरीयसली बघितलेत ते बघून माझी खात्री पटली की, तुम्हीच फक्त मला वाचवू शकाल. दुसरी गोष्ट मला दुसऱ्या डॉक्टरांनी २६ लाख रूपये खर्च येईल असे सांगितले होते. डॉक्टर तुम्ही मला केवळ २ महिन्याचे आयुष्य वाढवून द्या. मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. माझे बाजारातून १।। कोटी रूपये येणे आहे. मी ते वसूल करून माझ्या कुटुंबाची तेवढ्या अवधीत सोय करू शकेन. मी त्याचे ऑपरेशन केले. सकाळी ८ ते रात्री ११ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ऑपरेशन चालू होते. त्याने मला काही पैसे देऊ केले. मी सांगितले, ‘तुम्हाला मदत करायची असेल तर माझ्या ईएनटी युनिटसाठी मशिन्स घेऊन करा.’ ऑपरेशनच्या नंतर १ वर्षाने तो भेटायला आला. म्हणाला की, डॉक्टर माझा पहिला वाढदिवस आहे. अशा कितीतरी केसेस आयुष्यात आल्या वयस्कर मंडळी पाया पडू लागतात तेव्हा वाईट वाटतं. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी हसू अपार समाधान देऊन जातं.
आता मी ठाण्याच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधून निवृत्त झालोय. एक भव्य हॉस्पिटलचे माझे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. उत्तम ऑपरेशन थिएटर, रूग्णांसाठी स्वतंत्र खोल्या, जनरल वॉर्ड, माझ्या विषयाची अपटुडेड लायब्ररी, ७ । । टन क्षमतेचे इन्व्हर्टर (ऑपरेशन थिएटर व सर्व खोल्यांमध्यील एअर कंडिशनर्ससाठी) असे अद्ययावत हॉस्पिटल मी उभे केले आहे. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सहभागी होणाऱ्या व मला वेळोवेळी योग्य त्या सूचना करणाऱ्या माझ्या सहधर्मचारिणीच्या वियोगात माझं स्वप्नशिल्प मी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर जे काही करता आले त्यासाठी मी परिस्थितीशी झुंज देतच आलो आहे. परंतु कधीतरी बेसावधक्षणी मन विषण्ण होतं आणि वाटू लागतं जी मूल्यं मी आयुष्यभर जपलीत त्याचं मला काय फळ मिळालं. कट प्रॅक्टीसला मी कायम विरोध करीत आलो. सध्याच्या व्यवहारी जगात त्यामुळे मला खूप आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. आता शासनाने त्याविरुद्ध पाऊले उचललेली आहेत. डॉक्टरी पेशा हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा आहे. परंतु आजुबाजुच्या जगातील काही उदाहरणे ऐकल्यावर लक्षात येतं आपण या जगात जे वागलो ते चुकीचे का आहे? ही सल कधी कधी मला छळते. परंतु माझे विचार पक्के आहेत व माझी वाटचाल कटप्रॅक्टीसच्या विरुद्धची राहणार आहे.
-डॉ. भागवत चौधरी
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेला हा लेख
मुंबई फुगत चालली होती. तेथील लोंढे मोठ्या संख्येने वसई-विरारला धडकत होते. स्वस्त घरांच्या आमिषाने भारतभरातील लोकांची वसईकडे रीघ लागली होती. पिण्याचे शुद्ध पाणी ही मानवाची आद्य गरज आहे. शासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले होते. भरपूर पाण्याचे खोटे आश्वासन देऊन बिल्डर लोकांना फसवीत होते.
'घी देखा लेकीन बडगा नही देखा', अशी त्यांची अवस्था होत होती. नव्या वसाहतीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. त्यांना टँकरच्या अशुद्ध आणि अनियमित पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. शिवाय, त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागत होते. वाढणाऱ्या वस्तीला पिण्याचे पाणी पुरविण्याची कुठलीही योजना शासनाकडे नव्हती आणि अशी योजना राबविण्याची ग्रामपंचायतीची क्षमता नव्हती. त्यावर बिल्डरांनी सोपा उपाय शोधून काढला. पश्चिम वसई हा बागायती पट्टा असून, तेथील विहिरींचे पाणी पिण्यासाठी व शेतीबागायतीसाठी वापरले जात होते. बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली.
१९८५ च्या दरम्यान निर्मळ या गावातून अतिरिक्त पाण्याचा उपसा होत होता. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या. पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढू लागले. काही सजग नागरिकांनी आंदोलन छेडून टँकर्सना बंदी घातली. त्यावेळी वसई-विरार विभाग माफिया गँगच्या दहशतीखाली वावरत होता. उपशामुळे स्थानिकात असंतोष आहे, ह्याची जाणीव टँकरमालकांना होती. अशावेळी त्यांचा एकमेव आधार होता - माफिया गँग. त्या गँगला त्यांच्याकडून नियमित हप्ते जात होते. पोलिस व्यवस्था पूर्णपणे निष्प्रभ ठरली होती.
पाण्याचे शास्त्रीय विश्लेषण
बागायती पट्ट्यातून दिवसरात्र कोटी, सव्वा कोटी लिटर्स पाण्याचा उपसा होत होता. समुद्र आणि खाड्या जवळ असल्यामुळे गोड्या पाण्यात खारट पाणी मिसळत होते. त्यामुळे पाण्याची चव बदलत होती. मात्र हे सर्व शास्त्रीय तपासणीने सिद्ध होणे आवश्यक होते. १९८७) साली मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाने आगाशी विभागातील विहिरींच्या पाण्याचे सर्वेक्षण करून, पाणी दुषित झाल्याचा निर्वाळा दिला. (एम.पी. पाध्ये गोगटे-के, सीता, इंडियन जिओग्राफर्स खंड ९, क्र. २ जुलै १९८७) तो अहवाल आमच्या दप्तरी होता.
जागतिक जलतज्ज्ञ डॉ. विल्यम बार्बर ह्यांनी भारताला अनेकदा भेटी दिल्या होत्या.
भारताच्या किनारपट्टीतील पाण्याचे त्यांनी शास्त्रीय विश्लेषण केले होते. त्यांनी सरकारला इशारा दिला होता की पाण्याचा उपसा थांबविला तरी, पाण्याची गुणवत्ता मूळ पदावर येण्यासाठी ३० ते ४० वर्षे लागतील! 'ग्राऊंड वॉटर बजेटिंग' (भूगर्भातील पाण्याचे नियोजन) ही संकल्पना त्यांनी रूढ केली. भारताचे पाणी शेतीच्या जागेत येऊ नये म्हणून
समुद्रकिनाऱ्यावर बांध घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, 'खस' नावाच्या
लव्हाळ्यासारख्या वनस्पतीची लागवड करावी. कारण ती भूगर्भातील आर्द्रतेचे रक्षण करीत असते, असा उपाय त्यांनी सुचविला ('द टाइम्स ऑफ इंडिया' १.५.१९८९)
तालुक्यातील विहिरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी 'हरित वसई संरक्षण समिती'ने अहमदनगरच्या 'ॲक्शन फॉर फूड प्रॉडक्शन' (AFPRO) या संस्थेला बोलाविले. त्यांनी तालुक्यातील २१ निवडक विहिरींच्या पाण्याचे नमुने (Ramdom Survey)
प्रयोगशाळेत तपासले. त्यांच्या मानांकानुसार २१ पैकी फक्त चार विहिरींचे पाणी पिण्यास योग्य होते, कारण त्याच्यातील क्षारांचे प्रमाण (Total dissolved Solids) ५०० पी.पी.एम.
(Parts per million) च्या खाली होते. बाकी विहिरीत १५०० किंवा त्यापेक्षा जास्त क्षार होते. पाण्यात कोलीफार्म बॅक्टेरियांचे प्रमाण वाढले होते, तसेच फ्लॉरॉईड कॉन्सन्ट्रेशनने धोक्याची पातळी ओलांडली होती. (अफ्रोचा २९.०१.१९९१चा अहवाल). त्यानंतर
१२ एप्रिल १९९३ या वर्षी पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक वेळी पाण्याचा दर्जा खालावत असलेला आढळला.
महिलांचे आंदोलन
आम्ही 'हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून पाण्याच्या सर्वेक्षणाचे अहवाल तहसिलदारांना सादर केले आणि टँकर्सवर बंदी आणण्याची मागणी केली. त्यांनी २३.४.९१ रोजी आम्हांला पत्र पाठवून कळविले की, संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळात टँकर बंदी करण्याचे आदेश त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत! बिल्डर लॉबी व समाज विघातक शक्ती ह्यांचा दबाव तहसीलदारावर होता. त्यामुळे त्यांनी अर्धवट आदेश काढला. टँकर मालकांनी दिवसाच्या फेऱ्या वाढविल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळे वाढले. परिणामी अपघात वाढले. पाण्याच्या बेसुमार उपशामुळे विहिरी कोरड्या पडत होत्या, शेती ओस पडत होती, गरीब शेतकरी हवालदिल झाले होते. पाण्याचा पोत बिघडला होता. त्यामुळे गृहिणी हैराण झाल्या होत्या.
'हरित वसई समिती'मध्ये महिलांचा चांगला सहभाग होता. आम्ही 'पाणी बचाव
महिला आंदोलन' संघटना सुरू केली. महिलांनी पाणी आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. माफियाचा वरदहस्त लाभल्यामुळे टँकर लॉबी उन्मत्त झाली होती. त्यांनी तहसीलदारांचा आदेश धाब्यावर बसवून, पाणी उपसा सुरूच ठेवला. महिलांनी टँकर अडविण्यास सुरूवात केली.
स्त्रियांना भीती, धाक, दहशत दाखविण्याचे प्रयत्न झाले. पोलिस व शासकीय अधिकारी त्यांना अटक करण्याची भाषा करू लागले. त्यामुळे महिला अधिकच चवताळल्या. त्यांनी पोलिसांना सांगितले, “कलेक्टर आल्याशिवाय आम्ही जागेवरून उठणार नाही.” महिला आपल्या निर्णयावर ठाम होत्या. 'टँकर अडविले जाणे' म्हणजे स्थानिक एकछत्री सत्तेला दिलेले आव्हान होते. हे लोण सर्वत्र पसरत गेले तर बिल्डिंग व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, हे माफियाने ओळखले.
शासनाचे उचललेले पाऊल
आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुंडांनी हल्ला केला. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत झळकल्या. ठाण्याचे लोकहितदक्ष कलेक्टर श्री. शांताराम सगणे ह्यांच्या आदेशानुसार वसई तालुक्यातील विहिरींच्या पाण्याचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. बहुतेक विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा अहवाल आला कलेक्टरांनी आदेश देऊन अनेक विहिरींच्या पाण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले. आंदोलनाला काही प्रमाणात यश आले.
बिल्डर ही एक चतुर जमात आहे. सारे लोक झोपी गेले असता, त्यांचे टँकर्स चोरून पाण्याचा उपसा करू लागले. काही बिल्डरांनी जमिनीखालून पाईप लाईन टाकून पाण्याचा उपसा चालूच ठेवला. अजूनही काही ठिकाणी पाणी उपसा चालूच आहे. या अनिर्बंध उपशाला बिल्डरांप्रमाणे काही धनलोभी शेतकरीही जबाबदार आहेत. चार पैसे मिळतात म्हणून ते पाण्याची विक्री करतात. काही बिल्डर्स हिरव्या पट्ट्यातील आहेत. त्यांनी खुले आम आपल्या मालकीच्या जमिनीतून उपसा सुरू ठेवला आहे.
पाण्याच्या अतीउपशामुळे पाण्याची पातळी (वॉटर टेबल) खाली जात आहे. क्षारांचे प्रमाण वाढत आहे. दूषित पाण्याच्या सेवनामुळे पोटाच्या आजारात वाढ झाली आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढळून, निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. पाणी बचाव आंदोलनाला १०० टक्के
यश मिळाले नाही ही सल मनात आहे.
फा. फ्रान्सिस दिब्रिटो
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
१५ ऑगस्टला सकाळी मोरुचा बाप मोरुला उठवायला आला. “अरे मोरु ऊठ, आज स्वातंत्र्यदिन. बघ सगळीकडे कशी देशभक्तीपर गाणी लागली आहेत. चल लवकर आटपून झेंडावंदनाला जा. स्वातंत्र्यदिन आपण उत्साहाने साजरा करायला हवा.”
माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो,
मला बरेचदा व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्राम अथवा इतर सामाजिक कार्यक्रमांत तरुणाई बरोबर संवाद साधण्याचा योग येतो. मलादेखील अशा संवादाच्या प्रसंगाची ओढ असते. कारण ही तरुणाई काय विचार करते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, अडचणी काय आहेत आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा काय आहेत ह्याचा वेध ह्या निमित्ताने मला घेता येतो. गेल्या सुमारे चार दशकांच्या काळात नोकरीसंदर्भात मी हजारो तरुणांचे इंटरव्यू घेतले आहेत माझ्या संस्थेसाठी योग्य उमेदवार निवडणे हा जरी हेतू असला तरी त्या प्रोसेसमध्ये मला उमेदवार असलेल्या तरुण-तरुणींची मानसिकता समजण्यासाठी त्याचा उपयोग झाला. ह्या माझ्या प्रदीर्घ अशा काळात मला काय अनुभव आले आणि त्यातून आजच्या पिढीला स्वतःच्या उत्कर्षासाठी काय करता येईल, ह्याचा लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हे करताना आपली प्रगती का होत नाही, ह्याबद्दल ही तरुणाई काय कारणे देते, ते आधी बघू या.
वरील सर्व किंवा काही कारणे देऊन आपल्या आयुष्यातल्या प्रगतीचा मार्ग किती अडथळ्याचा अथवा किती अशक्य आहे अशी मनोधारणा करून घेणाऱ्यांसाठी मी उदाहरणासह मार्ग सुचवणार आहे.
सर्वात प्रथम, मी पुढे जाऊ शकणार नाही ही पराभूत विचारसरणी मनातून काढून टाका. जगात प्रत्येकाला अडचणी असतात. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग अवघड असू शकतो पण अशक्य नक्कीच नसतो. दुसरे असे की, जगात पूर्णपणे निरुपयोगी अथवा टाकाऊ काहीही नसते. असे उदाहरण देता येईल की, पूर्णपणे बंद पडलेले घड्याळ चोवीस तासात दोनदा तरी बरोबर वेळ दाखवते. ह्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण तात्पर्य असे की, स्वत:मध्ये काही गुण नाही त्यामुळे मला आयुष्यात घवघवीत यश मिळणार नाही, ही भ्रामक समजूत काढून टाका.
शैक्षणिक क्षेत्रात मिळणारे देदीप्यमान यशच केवळ प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाते ही कल्पनासुद्धा भ्रामक आहे. तुम्हाला माहीत आहे काय की, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला विजय मिळवून देणारे चर्चिल, प्रसिद्ध कवी गुलजार आणि असे किती तरी जण शिक्षण घेत असताना नापास झालेले होते. पण ते हिंमत हरले नाहीत. नंतर ते किती उंचीवर पोहचले ते सगळ्या जगाने पाहिले आहे.
सांगण्याचे तात्पर्य, आयुष्यातल्या अवघड परिस्थितीत छोट्या मोठ्या अपयशाने निराश होऊन, खचून जाऊ नका. तुम्हांला प्रारंभिक सूचनांनंतर हलाखीच्या परिस्थितीतून उच्चपदी पोहचलेल्या एका व्यक्तीची मी एक सत्य यशोगाथा सांगणार आहे. ती लक्षपूर्वक वाचा. त्यामुळे तुमच्या मनातली निराशा दूर होऊन मोठ्या आत्मविश्वासाने तुम्ही यशाच्या वाटेकडे वाटचाल करू लागाल ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
नासिक जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील यशा नावाच्या मुलाची ही गोष्ट. वडिलांची पेन्शन तुटपुंजी. शेतीचं उत्पन्न जेमतेम. पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यात कसाबसा चाले. घरात खायला पुरेसे असले तरी पैशाची चणचण नेहमीच असे. महिनाअखेरीस पेन्शन मिळण्यासाठी रेव्हेन्यू स्टॅपसाठी दहा नवे पैसे सांभाळून बाजूला काढून ठेवावे लागत. यशा आणि त्याच्या भावंडांचे शिक्षण नादारीत चालले होते. शाळेतर्फे कधी तरी आयोजित केलेल्या सहलींसाठी द्यायला पैसे नसल्याने अशा सहलींना त्यांना कधीच जाता आले नाही. वह्या-पुस्तकांचा खर्च कसाबसा होत असे. आर्थिक अडचणींमुळे बरोबरच्या सुखवस्तु घरातल्या मुलांकडून बरेचदा अपमानाच्या प्रसंगांना यशाला सामोरे जावे लागले.
शालान्त परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करावे, हा त्याच्यासमोर प्रश्नच होता. कारण गावात कॉलेज नव्हते. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे पैशाअभावी अशक्य होते. पंचवीस किलोमीटरवरच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी लागणारा दररोजचा एसटीचा खर्चदेखील कुटुंबाला परवडणारा नव्हता. बरोबरीच्या मित्रांचे कॉलेजचे सत्र सुरू झाले. पण यशा तसाच रिकामा राहिला. भविष्याबद्दल काही विचार तरी कसा करणार? सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग कसे करणार? डोळ्यांसमोर अंधकार दिसत असला तरी यशा निराश झाला नाही. आज जरी आपल्याला पुढची वाट दिसत नसली तरी उद्या नक्कीच ह्यातून मार्ग निघेल अशी सर्व कुटुंबाची अपेक्षा होती. गावात राहून काही करण्याचा मार्ग दिसत नसल्याने यशाला लग्न झालेल्या मुंबईतल्या बहिणीकडे पाठवण्याचे ठरले. वडिलांनी घरातली पायलीभर करडई अंबादास तेल्याच्या घाण्यावर नेऊन विकली आणि यशाला मुंबईपर्यंत पाठवण्याचे पैसे कसेबसे उभे राहिले. यशा मायानगरीत पोहचला त्यावेळेस बहिणीच्या चाळीतल्या घरामुळे डोके टेकायला जागा मिळाली. मनात दुर्दम्य इच्छाशक्ती, कुठलेही काम करण्याची मानसिकता आणि घरातले चांगले संस्कार ह्याचीच फक्त शिदोरी यशाकडे होती. बहिणीवर-मेहुण्यांवर आपला बोजा पडू नये म्हणून मिळेल ती नोकरी पत्करण्याच्या हेतूने यशा मेहुण्यांच्या ओळखीने भांडुपच्या एका छोट्या वर्कशॉपमध्ये इंटरव्यू द्यायला गेला. इंटरव्यू घेणाऱ्या साहेबांनी विचारले, 'मुलुंडच्या घरापासून कुठल्या बसने आलास? बसचा नंबर काय होता?' यशाला सांगता आले नाही. तेव्हा त्यांनी 'उद्या नोकरीला लागलास तर काय तुझ्या मेहुण्यांना घेऊन येणार काय?' असे खडसावून विचारले. 'तुझ्याकडे सामान्य ज्ञान नाही, चांगली तब्येत कमावली नाहीस' असे शेरे मारले. यशा अपमानित झाला. खचला मात्र नाही. उलट त्याच्यातली सुप्त महत्त्वाकांक्षा ज्वालामुखीसारखी उफाळून आली. त्याने मनोमन ठरवले, आजपासून मी अथक कष्ट करीन. दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेईन.
त्याच कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागल्यावर यशा झपाटल्यासारखा कामाला लागला. त्याने कधी शारीरिक कष्ट केले नव्हते. पण पडेल ते काम तो करीत असे. आपल्या कामाव्यतिरिक्त सहकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करून दीड वर्षांच्या कालावधीत फिटरचेही काम त्याने शिकून घेतले. प्रयत्नाने त्याला इंजिनीअरिंग ड्रॉइंगपण समजायला लागले. त्यासाठी त्याने रस्त्यावर रद्दीत मिळणारी त्या विषयावरची पुस्तके विकत घेतली. मोठ्या कंपनीत तांत्रिक काम करणाऱ्या मेहुण्यांची मदत घेतली. नियमित फिटरच्या अनुपस्थितीत तो फिटरचे काम करू लागला. वर्कशॉपपासून तीन किलो मीटरवर असणाऱ्या भांडुपस्टेशनपासून रेडिएटरसाठी लागणारा कच्चा माल हातगाडीवरून ढकलत आणण्याचे काम यशाने न लाजता, न कंटाळता केले. आयुष्यात पहिल्यांदाच कष्टाची कामे करूनही संध्याकाळ त्याने वाया घालवली नाही. त्याने पी.डब्ल्यू.डी.वायरमनचा कोर्स केला. राहायला मुलुंडला, वर्कशॉप भांडुपला आणि कोर्स ठाण्याला. अशी त्रिस्थळी यात्रा रोजची सुरू झाली. पगार म्हणून रोज साडेतीन रुपये मिळत. रेल्वेपासाव्यतिरिक्त एकही पैसा खर्च करणे यशाला परवडणारे नव्हते. त्यामुळे रेल्वेखेरीज त्याचा इतर प्रवास पदयात्रेने होत असे.
यशाला पी. डब्ल्यू डी. चे वायरमनचे लायसेन्स मिळाले आणि त्याच सुमारास त्याच्याच ओळखीच्या एकाच्या सल्ल्यावरून तो क्रॉम्प्टन ह्या मोठ्या कंपनीत टेम्पररी म्हणून नोकरीस लागला. तिथे त्याला फिटरच्या कामाचीही संधी मिळाली. आयुष्यात पहिल्यांदाच तिन्ही पाळ्यांमध्ये काम करायची सवय लागली. काही महिन्यांतच त्या कंपनीत संप झाला आणि यशा पुन्हा बेरोजगार झाला. ह्या काळातही तो स्वस्थ मात्र बसला नाही. त्याच्या गावात तयार होणाऱ्या हिमरू शाली मुंबईत आणून त्याने त्या ठाणे, मुलुंड भागात घरोघरी जाऊन विकल्या. त्यात त्याला थोडीफार कमाई झाली.
ह्याच काळात यशाने वर्तमानपत्रात स्मॉल स्केल इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियनच्या तीन महिन्यांच्या कोर्सची जाहिरात वाचून तिथे प्रवेश घेतला. दिवसा कोर्स आणि संध्याकाळी, सुट्टीच्या दिवशी हिमरू शाली विकणे ह्यात तीन महिने गेले. तळोजा इथल्या इंडियन अल्युमिनियम कंपनीत भर्ती चालू असल्याचे कोर्सच्या सहाध्यायी मित्राकडून कळताच त्याने अर्ज केला. तिथे त्याला फर्नेस ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली.
इंडाल कंपनीची ही नोकरी सहाशे डिग्री तापमानाच्या भट्टीवर काम करण्याची होती. वर्षभरात यशा परमनंट झाला. आयुष्यात स्थैर्य आल्यासारखे यशाला वाटले पण पुढे शिकण्याची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. इथूनच सरस्वतीच्या तपस्येचा त्याचा एक दीर्घ प्रवास सुरू झाला. यशाने कंपनीव्यवस्थापनाला आपले शिक्षण पूर्ण करू देण्यासाठी सहकार्याची विनंती करून कायम रात्रपाळी मागून घेतली. मुलुंड कॉमर्स कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. रात्रभर भट्टीवर काम, दिवसा कॉलेज. मुंब्रा ते तळोजा ह्या कंपनीच्या बसप्रवासात, कामातून सवड मिळाली तर यशा तो वेळ अभ्यासात घालवी. अशी चार वर्षे काढल्यावर तो उत्तम मार्कांनी बी. कॉम. उत्तीर्ण झाला. ह्याच सुमारास पर्सोनेल डिपार्टमेंटमध्ये क्लार्कची जागा निघाली आणि बाहेरच्या उमेदवारांबरोबर इंटरव्यू देऊन यशा निवडला गेला. दोन वर्षांनंतर ठाणा कॉलेजमध्ये संध्याकाळचे शिक्षण घेऊन एल.एल.बी. ही पदवी मिळवली. ह्या दोन वर्षांत कामगारांसाठी वाचनालय सुरू करण्याची कंपनीला सूचना करून त्याने त्यात पुढाकार घेतला. 'तलोजादर्शन' ह्या मासिकात कामगारविषयक कायदे, सुरक्षेसंबंधी लेखन आणि शब्दकोडी असे नियमित लेखन केले. 'कायझन' ह्या कामात सुधारणा करण्यासंबंधात असलेल्या योजनेत भाग घेऊन बक्षिसे मिळवली. खरे तर, जिथून सुरुवात केली तिथून आत्तापर्यंत बऱ्यापैकी प्रगती झाली होती. तिथेच काम करून यशा निवृत्त होऊ शकला असता. आता तर त्याचे लग्नही झाले होते. पण यशाला पुढच्या वाटा खुणावत होत्या.
यशाने मुंबई विद्यापीठाचे पर्सोनेल मॅनेजमेंटमधले पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचे ठरवले. पण त्यात अनंत अडचणी होत्या. एक तर हा कोर्स पूर्ण वेळ होता. घरच्या जबाबदारीने नोकरी सोडणे शक्य नव्हते. यशाने ह्यातून सुवर्णमध्य काढला. व्यवस्थापनाला विनंती करून परत एकदा सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर फर्नेस ऑपरेटर म्हणून काम सुरू केले. दिवसा परेल येथील कॉलेजमध्ये शिक्षण सुरू झाले. शिक्षणाचा हा टप्पा आतापर्यंतच्या प्रवासातला सर्वात खडतर टप्पा होता. राहायला मुलुंड कॉलनीत, स्टेशनपासून सहा किलोमीटर दूर. कॉलेज परेलला. रात्री नोकरी तळोजाला. त्या काळात दररोज साडेसहा तास प्रवास, साडेपाच तास कॉलेजमध्ये आणि रात्री आठ तास सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर नोकरी. घरी संध्याकाळचे फक्त चार तास मिळत. पण ध्येयावर अभेद्य निष्ठा, कठोर परिश्रमाची तयारी ह्या बळावर यशाने परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले!
गेली सुमारे तीस वर्षे यशा वेगवेगळ्या कंपन्यांत पर्सोनेल डिपार्टमेंटच्या विविध पदांवर यशस्वीरीत्या काम करत आहे. गेली सुमारे २१ वर्षे तो एका प्रसिद्ध अमेरिकन कंपनीत कार्यरत असून गेल्या पंधरा वर्षांत डायरेक्टर प्लँट पर्सोनेल ह्या पदावर कार्यरत आहे.
वाचक मित्रांनो, यशाच्या जीवनप्रवासाची, त्यातल्या चढउतारांची ही इतकी समग्र माहिती मला कशी, असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना? तो यशा दुसरा-तिसरा कोणी नसून मीच आहे!
माझ्याविषयी तुम्हांला आणखी थोडे सांगायचे आहे. ह्या प्रदीर्घ प्रवासात मी माझ्यासाठी काही नियम ठरवले, ते तुम्हांला सांगावेसे वाटतात. ते कदाचित तुम्हांला मागदर्शक ठरू शकतील.
मित्रांनो, ह्या यशाच्या वाटेवरच्या प्रवासासाठी तुम्हांला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
-माधव सावरगांवकर
15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti