वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पोटाचे प्रश्न माणसाला अस्वस्थ करतात.शांत झोपू देत नाहीत. प्रत्येक जीवाला जसे जगण्यासाठी अन्न लागते तद्वतच मानवासही ते लागते.समाज पोटाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्या व्यवस्थेप्रमाणे कार्यकर्तृत्व करण्याचा माणूस प्रयत्न करतो. कमीअधिक प्रमाणात पोटाचे प्रश्न सुटतातही . तसे भाकरीच्या प्रश्नावर अनेकदा राजकारण होते. चळवळी उभ्या राहतात. समाजकारण होते.क्रांती होते. परिवर्तन होते.' भाकरी मिळत नसेल तर केक खा' असे ऐतिहासिक वाक्य प्रसिद्ध आहे. अन्न , वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. या कष्टाचे प्रमाण सर्वांसाठी सारखेच नसते.काहींना कितीही कष्ट केले तरी उपजिवीका भागविणे कठिण जाते तर काहींना कमी कष्टात सहजसाध्य असे अमाप मिळते.यामुळे असमानता निर्माण होते.
शेतकरी वर्ग हा वर्षानुवर्षे याच गर्तेत अडकून पडलेला. निसर्गाच्या लहरीपणावर त्याची मदार असते. जमिनीत बियाणं रूजविण्यापासून सुरू होणारा, पीक आडतीवर नेईपर्यंतचा प्रवास अनाकलनिय असतो.जमिन तयार करणे. महागडी बियाणे खरेदी करणे, रासायनिक खत खरेदी करणे. पिकांना पाणी देणे, निगा राखणे . ते आडतीवर जाते तेव्हा पडलेले भाव . या सर्व व्यवस्थेचे प्रश्न गहन तर आहेत. त्याचबरोबर ते पिढी बरोबर आलेले आहेत . कृषक समाजाच्या व्यथा आजच्या काळात तीव्र बनल्या आहेत. आधुनिकीकरणांमुळे ग्रामजीवन उध्वस्तेकडे वाटचाल तर करत नाही ना ? याचा विचार करण्याची गरज आहे. जमिनीचे झालेले तुकडे .नापिकी होत असल्याने आलेले नैराश्य. त्यातून होणारी आत्महत्या . निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रश्न. उध्वस्त झालेले कुटूंब. कष्टाच्या मोबदल्यात न मिळणारी मिळकत . आरोग्य आणि शिक्षणाचे निर्माण झालेले प्रश्न.याचा विचार होणार की नाही? सारं रान पडिक आणि बांध कोरण्याची प्रवृती कधी नष्ट होईल? अंतर्गत मतभेदामुळे उत्पन्न झालेले मनभेद. भावाभावात , गावागावात आणि जावाजावातील वाद कधी संपणार ? जातीभेदातून आणि मातीभेदातून निर्माण झालेले वाद. सुरक्षा व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक . प्रशासन व्यवस्थेची सापत्न वागणूक . समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन . या बाबी चिंतनीय आहेत. वरिष्ठ नोकरी , मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. असे काहिसे बदललेले चित्र पहावयास मिळते. सणउत्सवाच्या परंपरा असतील किंवा लग्न विधींसारखे प्रसंग असतील.आत्मप्रौढीतून भरमसाठ होणारा खर्च .यातून बहुजनांचे अहितच साधले जाते.प्रत्येक हुशार, चाणाक्ष घटकांकडून शेतकरी वर्गाची अडवणूक, पिळवणूक आणि छळवणूकच होते. तद्वतच साहित्य , लेखन यांमध्येसुद्धा कृषक समाजाचे दुःख वेदना मांडले जात नाही. वेदनांचे प्रतिबिंब आवश्यक त्या प्रमाणात दिसत नाही. जिथे मांडले जाते. त्याची दखल घेतली जात नाही.शेती आणि शेतजीवन आज अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. मुलांचे शिक्षण, धान्यादी मालाचे भाव, रोजगार , उत्पन्न यांची सांगड घालणे कठिण आहे.भोंदूबाबा, कैवारी भेटतात ते फक्त मतदान रूपाने. पाच वर्षाच्या पारायणासाठी ! तेही लूप्त - अलूप्त स्थितीत.भावना आणि घोषणा यांच्या भोवती फिरत असलेली सल घेऊन. मग प्रश्न उभा राहतो की सालाबादप्रमाणे हेही वर्ष असेच ! असे वर्षानुवर्षे चालत आलेले रहाटगाडगे , दुःखाची धग, प्रश्नाची सल लेखनात उतरली पाहिजे. त्या लेखनाची दखल घेतली जावी. समाजमन तसे घडावे. शेतकरी शोषणाचा आलेख लेखकांनी मांडावा ते गरजेचेही आहे. ते बोलीतही आले पाहिजे . कृतीतून आचरणात आले पाहिजे. आमच्या एका कवितेतून तो आशय आला आहे.
बाप रगत ओकतो,दुष्काळा पोटात घेतो
कणगीला आभावल्ली,धान्य बरकत्ता मागतो
बाप रगत ओकतो, हुकलेली सालचंदी
कापूनशी कणसांचा, मळा वाटे चोरामंदी
बाप रगत ओकतो, बरडाच्या गराड्यात
म्हशी कळप वळीतो,खाट्या भाकड काळात
बाप रगत ओकतो, जगण्याच्या आशेपोटी
लेकराच्या तोंडावरी, मूठभर मासासाठी
बाप रगत ओकतो, भेगा भूईच्या सांधतो
खरबड्या हातातली, माया गाली फिरवितो
बाप रगत ओकतो, धोतराच्या तडूपाला
उमेदीने जगण्याच्या, नवा आशावाद दिला
बाप रगत ओकतो, काटी शेताला लावतो
मात्रे खळ्याचे स्वतःस, रास जगाला चारतो
जगाच्या पाठीवर शेतकरी असा वर्ग आहे की जो जगाचे हीतच साधतो. पण त्या बदल्यात त्यास अपेक्षित फलश्रुती मिळत नाही . हे दुर्दैव म्हणावे लागेल.जगाचा पोशिंदा माझा बाप खडकावर राबताना आसवं तरळतात . त्या आसवांची किंमत पृथ्वीवरील इतर कोणत्याही तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. सतत इतरांचा विचार करणारा शेतकरी बाप खंगलेला, भंगलेला आणि दुष्काळास पोटात सामावून नव्या आशावादी उमेदीने जगणारा आहे.तो जगला तर देश जगेल. तो उभा राहण्यासाठी पाठबळाची गरज आहे.
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
प्रत्येकजण आपल्याला आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला कि उत्तर आपोआप समोर येते..!
महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार.
सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे.
जेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझं जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !
१५ – २० वर्षांपूर्वी च्या काळातील आरती मधे बाळ गोपाळांचा सहभाग .. प्रसादाची धमाल वगैरे आठवली … आणि आता बाळगोपाळांपेक्षा वयस्कर जास्त दिसतात … प्रसाद संपत नाही … मुले परदेशी शिकायला … नोकरी साठी आहेत … किंवा कामावर आहेत .. सुट्टी होती पण काम राहिले होते …
खरं तर दगडातून एखाद्या विशिष्ट देवतेची मूर्ति बनवावयाची असेल तर दगडाला छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने भरपूर घाव सोसावे लागतातच. बनवणाऱ्या मुर्तीकाराला,तो कितीही मोठा कलाकार असू देत,पण आपण देवतेची मूर्ती बनवत आहोत हे माहीत असूनही तो त्या दगडावर घाव घालतोच ना?
आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्यांचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा? सेलच्या जाहिराती, नियुक्तीसाठी जाहिराती, फसवणूक जोपासणार असतील तर आदर्शांचे अग्रलेख कशासाठी? दिशाभूल करणार्या गोष्टी भूल देवून केल्या जात आहे. एकीकडे वैधानिक इशारा द्यायचा आणि दुसरीकडे मृत्यू स्वस्त करायचा असे किती दिवस चालणार?
महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत.
दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात शेवटच्या टोकावर आहे. यालाच आम्ही वऱ्हाड म्हणतो. पूर्वी इंग्रज लोक बेरार म्हणत होते. जिल्ह्याचा दक्षिण भाग मराठवाड्याला लागून आहे. जालना आणि हिंगोली हे जिल्हे आहेत. इकडे पश्चिमेकडून जाईचा देव असलेला मराठवाड्यातील औरंगाबाद आणि खानदेशातील जळगाव जिल्हा लागून आहे. उत्तरेकडून मध्यप्रदेश राज्य आहे. पूर्वी आमचा बुलडाणा जिल्हाही याच राज्यात म्हणजे मध्यप्रदेशात होता. तेव्हा आमच्या सीपी अँड बेरार या प्रांताची राजधानी नागपूर होती. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषा एक नाही. घाटावरचे म्हणजे, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार तालुक्यातील लोकांवर मराठवाड्यातील भाषेचा प्रभाव आहे. त्याला आम्ही घाटावरची भाषा म्हणतो. तर इकडे मलकापूर, नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यातील लोकांवर खानदेशी बोलीभाषेचा प्रभाव आहे. त्यांच्या बोलण्यात वेगळीच ढब आहे. तर खामगाव, शेगाव, संग्रामपूरचा भाग घाटाखाली असून अकोल्याला लागून आहे. त्यामुळे इकडचे लोक प्युअर वऱ्हाडी बोलतात. बरेच वर्षे आमचा खामगाव विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभेतच समाविष्ट होता. आता कुठे बुलडाणा झाला आहे. तर तिकडचे मलकापूर आणि नांदुरा हे तालुके आता जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत. त्यांचे बहुतांश व्यवहार जळगाव खांदेशशी आहेत. तर बुलडाणा, माेताळा तालुकाही भावनिक, सांस्कृतिकदृष्ट्या तिकडेच जोडलेला आहे. एकंदरित चित्र जर पाहिले तर जिल्ह्यातल्या जिल्ह्यातही अनेकांचे नातेसंबंध नाहीत. दीडशे किमी अंतरावर अमरावती जिल्ह्याशी अनेकांचे नातेसंबंध असू शकतात. पण घाटाखालचे आणि घाटावरचे असे नाते अलिकडच्या काळापर्यंतही जुळू शकलेले नाहीत. शहरांनी ही सीमा कधीचीच ओलांडली आहे. विषय ग्रामीण भागाचा आहे. कारण बुलडाणा जिल्हा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातच आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर खामगाव तालुक्यातील बऱ्याच ग्रामस्थांनी कधी जिल्ह्यातील सिंदखेडराजा पाहिलेले नाही. आणि घाटावरच्या लोकांनी कधी जळगाव जामोद, संग्रामपूर पाहिले नसावे. असा हा विरोधाभास आहे. हे फक्त ग्रामीण लोकांनाच लागू पडते अशातला भाग नाही. तर पोलिस विभागालाही लागू होऊ शकते अशी परिस्थिती आतापर्यंत होती. कारण इकडे तामगाव पोलिस स्टेशनचा कर्मचारी कधी किनगावराजा पोलिस स्टेशनला बदलीवर जाण्यास तयार होत नव्हता. तर डोणगावचा कर्मचारी इकडे जळगाव जामोद किंवा बोराखेडी पोलिस स्टेशनला येण्यास तयार नव्हता. तसे पाहिले तर जिल्हा तीन भागात विखुरलेला आहे. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ यामुळे कुणाचे विचार वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे आहेत, तर कुणाचे विरोधात आहेत.
राजकारणी लोकांनी सुरुवातीपासूनच विदर्भाचा मुद्दा ताटकळत ठेवला आहे. जे आतापर्यंत विदर्भ राज्य व्हावे असे बाेंबलत होते, ते भाजपच्या काळात मूग गिळून चूप बसले आहेत. त्यांना विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता आवाज तर करता येतच नाही. पण पाठिंबाही देता येत नाही. यात बहुधा काँग्रेसीच अधिक आहेत. आपल्याला काँग्रेसवर टीका करायची नाही. पण भाजप विदर्भाची मागणी करत असताना विदर्भातील जनतेच्या सोयीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे मुद्दा रेटून धरण्यात गैर आहे काय?
याउलट परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची आहे, जे आतापर्यंत विदर्भातील लोकांचा केवळ द्वेषच करत आले, ते अजूनही द्वेषच करत असून अखंड महाराष्ट्राची भाषा बोलत आहेत. विदर्भाचे वेगळे राज्य झाल्यास महाराष्ट्र काय नकाशातून गायब होणार आहे काय ? उत्तर भारतात एका हिंदी भाषेचे अनेक राज्य आहेत. आपल्या मराठी भाषेचे दोन राज्य झाली तर आभाळ कोसळणार आहे काय ? उलट आतापर्यंत देशात एकच मराठी भाषिक राज्य होते, आता दोन होतील.
दुसरे असे की, लोकांना आपल्या गावात गट ग्रामपंचायत असली तर स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी असे वाटते. ग्रामपंचायत असेल तर त्याचे रुपांतर नगरपंचायतीत किंवा नगरपालिकेत व्हावे असे वाटते. एखादे मोठे गाव असेल तर तेथे तालुका व्हावा यासाठी मागणी केली जाते. खामगावसारखे मोठे शहर असेल तर जिल्हा व्हावा, अशी मागणी केली जाते. पण एखादा प्रांत जर मोठा असेल तर त्याचे राज्य व्हावे असे म्हटले की, बऱ्याच जणांच्या पोटात दुखते.
ग्रामपंचात, तालुके, जिल्हे आणि राज्याची निर्मिती ही प्रशासनाच्या सोयीसाठी केली जाते, हे शहाण्यांच्या लक्षात येत नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काळानुरुप बदल होणे आवश्यक आहे. छोटी राज्ये ही भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड ही नवी राज्ये निर्माण झाली. हे सर्वांच्या सोयीसाठी. तसेच विदर्भाचे राज्य व्हावे, हे सुद्धा सर्वांच्या सोयीसाठी. पण उर्वरित महाराष्ट्रातील लोकांचा किंवा विदर्भातील लोकांचा विरोध कशासाठी होतोय ? हेच कळायला मार्ग नाही.
- जनार्दन गव्हाळे,
खामगाव, जिल्हा बुलढाणा,
विदर्भ.
मोबाईल 9168147080
ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास….. ग्रुप वरील सदस्यांच्या भिन्नकभिन्न मानसिकतेचा सांगोपांग विचार, एक शोध, अनेक बोध..
Copyright © 2025 | Marathisrushti