वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।
बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.
मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.
विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.
श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.
एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.
आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.
हारावलीव हरिनीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.
कल्याणमावहतु मे - मला कल्याण प्रदान करणारी होवो."
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 14, 2020
रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. 'प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते', 'ते लाचखाऊ असतात' असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.
प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना 'मामा' म्हटलं जाई.
या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:
१. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.
२. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.
३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.
४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.
ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.
५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.
६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.
७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.
८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.
९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.
१०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.
११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.
१२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.
बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत' अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.
मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.
डॉ. अविनाश वैद्य
July 23, 2022
या योजना काळात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी २.१ टक्क्यांनी वाढ घडवून आणण्याचे उद्दिष्ट होते, परंतु ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊन राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी ३.६ टक्के म्हणजे एकूण योजना काळात १८ टक्के इतकी वाढ साध्य झाली. ही योजना हेरॉल्ड डोमार याच्या प्रतिमानावर आधारित होती.
April 1, 2022
संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !
अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !
' कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .'
ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
प्र .ल. वाट बघत होते .
' आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .'
माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .
' दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?'
मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
' एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?'
' ते त्यालाच विचारा .'
त्यांनी विषय संपवला .
आम्ही हॉटेलवर आलो .
रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
' जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .'
' अहो पण ...'
मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .
त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
पण त्या कथेवर नाटक ?
मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .
प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .
हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .
शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .
त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .
' नाटकाचे नाव काय ठेवणार ? '
प्रकाशजीनी विचारलं .
अरे , चल उचल !
' असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .'
ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
' हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . '
-- आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस ...अनेक गोष्टी .
'खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..'
त्यांना मी एक प्रत दिली .
ते त्या रात्री मुंबईला गेले .
नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
अचानक संपर्क थांबला .
मीसुद्धा व्यग्र होतो .
आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
' प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे ...'
मला धक्काच बसला .
अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .
नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .
त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .
एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .
पण मी नाराज नाही .
कारण माझी संहिता दमदार आहे .
कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
आणि ... आणि बरंच काही आहे त्या संहितेत .
मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .
केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;
"...श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! "
आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.
- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
८९५१९०६७०१
-------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
August 18, 2025
दत्त संप्रदायाची काशि म्हणुन गाणगापूर या तीर्थाचे महत्व सांगितले आहे. श्री नृसिहंसरस्वतीनी आपल्या ८० वर्षाचे कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले. औदुंबर क्षेत्र (भिल्लवडी) व पंचगंगा संगम नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ही दोन स्थाने म्हणजे नृसिहसरस्वतीची विशेष प्रीति असलेली ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिह सरस्वती दोघेही कृष्णानदीचे भक्त होते. साक्षात हरीतनु कृष्णा नदी म्हणजे विष्णु, शिव व ब्रह्माचे दृष्य स्वरूप आहे. ईश्वर अवताराचा हेतू एक गूढ गोष्ट आहे. अत्यंतप्रीय अशा कृष्णा नदीस सोडुन नृसिंहसरस्वती हे भीमा अमरजा संगमावर गाणगापूर या क्षेत्रावर वीस वर्षाचा कालखंड राहिले. अखेरीस निजानंद गमनास जाताना पुन्हा श्रीशैल्य कर्दळी वनात जाण्यासाठी कृष्णा तीरावर आले.
अत्यंत प्राचीन व पवित्र अशा गाणगापूर क्षेत्राचे महत्व वाढवावे या परिसरातील तीर्थाची शुध्दता करावी. त्याचे पावित्र्य वाढवावे. तसेच या भागातील भक्तांना मुक्ती द्यावी. त्यांची पीडा हरण करावी हा हेतू गाणगापूर क्षेत्री वास्तव्य करण्याचा होता. इतकेच नाही तर
नृसिंहसरस्वती नी भक्तांना वचन दिले आहे. आम्ही नित्य गाणगापुरी असणार आहोत. मठात आमचे वास्तव्य असेल. इष्ट भक्ताना आम्ही दर्शन देउन त्यांच्या कामना पूर्ण करु असा शब्द नृसिंह सरस्वती यानी दिला आहे.
दत्त संप्रदायात गाणगापूर क्षेत्र म्हणजे सर्वस्व आहे. नरसाबाची वाडी व गाणगापूर ही दोन स्थाने वारी सारखी आहेत दत्त भक्त नित्य दर्शनास या ठिकाणी येत असतात.
नृसिंहसरस्वतीनी विचार केला व अमरेश्वराचा (विश्वनाथाचा) निरोप घेवून गुप्त व्हावे असा निर्णय केला. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या ६४ योगिनी प्रकट झाल्या. आम्हाला सोडून कुठे जाता असा प्रश्न त्यांनी केला. नृसिंहसरस्वतीनी त्यांची समजूत काढली व संगितले.
ऐसे स्थान मनोहरु | सहज असे कलपतरु ।
म्हणोनी सांगताती गुरु । चौसष्ट योगिनीसी । । ९४।।
गु.च. अ. १९
ऐसा निरोप देऊन । श्रीगुरु निघाले तेथून ।
जेथे होते गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य । । ९५ ।।
गौप्य राहोनि औदुंबरी । प्रकटरुपे गाणगापुरी ।
राहिले गुरु प्रीतिकरी । प्रख्यात झाले परियेसा ।। ९६ ।।
सरस्वती गंगाधरानी नृसिहंसरस्वती यांचा गाणगापूरचा प्रवास अशा तऱ्हेने वर्णन केला आहे. गुरुरुपानी औदुंबरी असे म्हणत असताना नृसिंहवाडी येथील संगमावरील औदुंबर वृक्ष तसेच औदुंबराचे स्थान पण अभिप्रेत आहे.
नृसिंहसरस्वती प्रथम भीमा अमरजा संगमावर आले. अश्वत्थ वृक्षाजवळ राहिले गाणगापूरचा राजा होता त्यान त्यांना गावात येण्यास सांगितले व मठ बांधून दिला गाणगापूर हे अशाप्रकारे एक मोठे संस्थानच होते. ब्राह्मणाची अनेक घरे होती. नित्यकर्म उपासना होमहवन इत्यादी गोष्टी गाणगापुरात होत असत.
नृसिह सरस्वतीची किर्ति थोड्याच दिवसात पसरली. गाणगापूर मुक्कामी नृसिंह सरस्वती यानी अनेक चमत्कार केले. अनेकांची व्याधी दर केली. स्वत:ला गर्विष्ठ समजण्याऱ्या विप्रांचा त्यानी गर्व हरण करुन मुक्तता केली. भिक्षारनास अनुकुल असे क्षेत्र गाणगापूर होते.
गाणगापूर या क्षेत्राचे वर्णन प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती यानी केले आहे. एकदा नामधारक सिध्दाना विचारतो भूमीवर अनेक प्रख्यात तीर्थे असताना नृसिंहसरस्वती या गाणगापूर क्षेत्रात कां म्हणून राहिले. तेव्हा नृसिंह सरस्वती यानी सर्व भक्ताना दिपवाळीच्या पर्वकाळी त्रिस्थळीचे स्नान करण्यास सांगितले. असे म्हणुन गया, प्रयाग आणि वाराणसी या यात्रेस निघावे अशी आज्ञा केली.
नृसिंहसरस्वतीनी गाणगापूर परिसरातच सर्व तीर्थे आहेत असे सांगून गाणगापूर क्षेत्राची माहिती दिली. सर्व पवित्र तीर्थाचे महत्व सांगितले.
१) भीमा गमरजा संगम:
गाणगापुरातील भीमा व अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे. या संगमात ठारकूल हे तीर्थ आहे. या ठिकाणी भीमानदी ही उत्तर वाहिनी आहे. भीमा अमरजा या दोन नद्या ह्मणजे गंगा व यमुनाच आहेत. या तीर्थाचे महत्व खूप आहे काशीपेक्षा या ठिकाणी स्नान केल्यास शतपटीने पुण्य प्राप्त होते. असे सांगून नृसिंहसरस्वतीनी अमरजा नदीचे आख्यान भक्तांना सांगितले.
जालंधर पुराणातील ही कथा आहे. जालंधर नावाच्या महापराक्रमी राक्षसाने समस्त पृथ्वी जिंकली. इंद्राचा पराभव करून सर्व देवताना पळवून लावले. देव दैत्या मध्ये घनघोर युध्द झाले. अनेक देवतांचा वध झाला इंद्र शिवाकडे गेला व सर्व वृतांत सांगितला. इंद्र म्हणाला आम्ही दैत्याना मारतो पण त्यांचे रक्त भूमीवर सांडत असताना प्रत्येक रक्त बिंदू मधून राक्षस निर्माण होतात. राक्षस सैन्य वाढतच जाते. तीन ही लोक सर्व राक्षसानी व्याप्त झाले आहेत.
इंद्राचे हे वचन ऐकून महादेव कृध्द झाले. दैत्यांचे निर्दाळन करण्या साठी स्वत: निघाले. इंद्र म्हणाला आपण सर्व दैत्य माराल पण मृत देवाना जीवन प्राप्त करून देण्याची व्यवस्था करावी. महादेव संतुष्ट झाले. अमृत वचन बोलून संजीवन उदकाने भरलेला एक घट इंद्राला दिला. इंद्राने ते उदक देवतांच्या वर शिंपडले. सर्व देवता जाग्या झाल्या. घरात अमृत शिल्लक होते. ते घेवून जात असताना अचानक भूमीवर पडले. अमृताच्या प्रभावाने भूमीवर एक नदी निर्माण झाली. त्या नदीचे नाव संजीवनी असे पडले. मृत्युपासून सुटका करण्याऱ्या या नदीचे नाव अमरजा असे पडले. यामुळे नृसिह सरस्वती म्हणाले या नदीत जे स्नान करतात त्यांना काळ मृत्यू अपमृत्यु होत नाही. स्नान करणारा शतायुषी होतो. त्यांची पातके नष्ट होतात. अशी ही अमृत नदी या संगम स्थानात भीमेशी मिळाली आहे. म्हणून हे तीर्थ प्रयाग तीर्था प्रमाणे आहे. कार्तिक व माघ महिना हा या स्नानास पर्वर्णी काळ आहे. ग्रहण सांगता सोमवती आमावास्या, पुण्य तिथी, एकादशी या वेळी या नदीत स्नान करणे अत्यंत पुण्यप्रद आहे.
२) मनोरथतीर्थ:
सगमाच्या पुढे अश्वत्य वृक्षाचे समोर मनोरथ म्हणून तीर्थ आहे. मनोरथ म्हणजे कामना पूर्ती करणारे असे हे तीर्थ आहे. कल्पवृक्ष समान या तीर्थाचे फल आहे. कारण अश्वत्थ हा कल्पवृक्ष या ठिकाणी आहे. गुरुचरित्रात अश्वत्य महिमा सविस्तर पणे आला आहे. या तीर्थात स्नान करणे हे कामना पूर्ती करणारे असे हे काम्यक तीर्थ मनोहर तीर्थ म्हणुन आहे. गाणगापुर क्षेत्राचा विशेष म्हणून हे तीर्थ आहे. नृसिहसरस्वती सदैव या ठिकाणी वास करून असतात. या तीर्थाची विशेष खूण म्हणजे गरुड तसेच गिधाडे ही या ठिकाण दृष्टीस पडतात.
३) संगमेश्वर:
कल्प वृक्षाची पूजा करून मनोहर तीर्थात स्नान करून संगमेश्वर या ठिकाणी शिवमंदिर आहे. नंदीला नमस्कार करून या शिवाला प्रदक्षिणा करावी. शैल्य पर्वतावरील मल्लीकार्जुन समजून याची अर्चना करावी. त्या योगे इंद्रपदाची प्राप्ती होते. असे महत्व या शिवालयाचे आहे.
४) वाराणसी तीर्थ:
संगमेश्वर पूजा करून १/२ कोस अंतरावर नागेशी म्हणुन एक गाव आहे. या ठिकाणी वाराणसी हे तीर्थ आहे. नृसिंह सरस्वतीनी या संदर्भात एक प्राचीन आख्यान सांगितले.
पूर्वी भारद्वाज गोत्राचा एक ब्राह्मण होता. विरक्त असुन नित्य शिवोपासना करीत होता. सर्व संग त्याग करून देहाची पर्वा न करीता तो हिंडत असे. शिवानी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले होते. त्या विप्रास लोक वेडा समजत कारण त्याचे वागणे सामान्य लोका प्रमाणे नव्हते. त्याला दोन भावंडे होती एकाचे नाव ईश्वर तर दुसऱ्याचे नाव पांडुरंगेश्वर असे होते. ते आपल्या या वेडसर भावाला विचारित नसत.
एकदां दोघे काशीला जाण्यास निघाले. त्यानी या वेडसर बंधूला येतोस का म्हणून विचारले. ब्रह्मज्ञानी असा तो वेडसर म्हणाला तुम्ही काशीला जावूं नका विश्वेश्वर माझ्या जवळच आहे. चला मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवितो. असे म्हणून विप्राने स्नान केले.
विश्वेश्वर प्रसन्न झाला. तेव्हां तो विप्र म्हणाला आम्हास आपले नित्य दर्शन व्हावे. इश्वर प्रसन्न झाला. प्रत्यक्ष काशीक्षेत्र प्रकट झाले. मनकर्णिका कुंड तयार झाले. त्यातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. या ठिकाणी भीमा उत्तरवाहिनी आहे. बाण या स्वरूपात शिवलिंग प्रकट झाले. कुंडातून भागिरथी प्रकट झाली. ज्या प्रकारे काशी विश्वेश्वराची लक्षणे वाराणसी मध्ये आहेत, त्या प्रकारे लक्षणे प्रकट झाली. भीमा नदीचा व मनिकर्णिका कुंडातून प्रकट गंगेचा संगम झाला. दोनही बंधूना आपल्या बंधूची महती व समजली . ते त्याला ज्ञानी समजू लागले. तो म्हणाला आता काशीला कां जात आहात. सर्वानी काशी म्हणून या ठिकाणी अर्चना करावी. असे प्रत्यक्ष शिवानी मला सांगितले आहे. मला भ्रांत म्हणा किंवा गोसावी म्हणा. असे म्हणून त्या विप्राने बंधूना पंढरपुरास जाण्यास सांगितले. पुंडलिकाची आराधना करावी असे सांगितले. त्यांचे आराध्ये असे उपनाव झाले. प्रतिवर्षी काशीला न जाता येथेच यावे असे सांगितले.
नृसिंहसरस्वती म्हणतात असे हे काशीतीर्थ तया वाराणसीतीर्थ आहे. तुम्ही कोणताही संशय न धरता या ठिकाणी स्नान करा व मुक्त व्हा.
५) पापविनाशिनितीर्थ:
गाणगापूर क्षेत्रातील हे महान तीर्थ आहे. नावा प्रमाणे या तीर्थात स्नान केले असताना पाप विनाश होतो. नृसिंह सरस्वतीची बहीण रानाईस त्यानी या तीर्थात स्नान करण्यास सांगितले. तिचे कुष्ठ दूर झाले. वैडुर्य (बिदर) नगराचा यवन राजाला पण या तीर्थावर येण्यास नृसिंहसरस्वतीनी सांगितले होते. त्याच्या स्फोटकाची निवृत्ती झाली. तो पुण्य प्रद होवून मुक्त झाला.
रत्नाईचे कुष्ठ निवारण सर्वाना प्रत्यक्ष पाहिले असे हे पाप विनाशिनी तीर्थ गाणगापूर क्षेत्राचे महत्वाचे तीर्थ आहे.
६) कोटीतीर्थ:
जंबूद्वीपी जितकी तीर्थे । एकेक महिमा अपरितितो । तितुकिया वारु कोटीतीर्थे । विस्तार असे सांगता ।। ८७ ।। गु.च. अ. ४८
कोटी तीर्थाचे असे अपार महत्व आहे. पर्वकाळी स्नान करावे. दानादी कार्य करावे असे महत्व या तीर्थाचे आहे. कोटीगुणानी दान फळ प्राप्त होते. असे हे कोटी तीर्थ.
७) रुद्रपादतीर्थ:
कोटी तीर्थापुढे असलेले हे रुद्रपाद तीर्थ आहे. गयातीर्थाचे महत्व चा ठिकाणी आहे. वेणीदान, पितृकर्म आदी गया तीर्थाचे विधिया ठिकाणी केल्यास कोटी गुणाने लाभ होतो व कोटी जन्माचे पाप नष्ट होते. इतके महत्वाचे हे तीर्थ आह.
८) चक्रतीर्थ:
हे चक्र तीर्थ आतिविशेष आहे. या तीर्था जवळ केशवाचे सांनिध्य आहे. या ठिकाणी स्नान केल्याने ज्ञान वृध्दी होते. अस्थि विसर्जन केल्या असतां त्या चक्रांकित होतात. मृताला मोक्ष प्राप्त होतो. द्वारकेच्या गोमती नदी मध्ये अस्थी चक्रांकीत होतात. त्या पेक्षा चौपट गुणानी युक्त असे हे तीर्थ आहे. नृसिंहसरस्वतीनी सर्वाना या तीर्थात स्नान करण्यास सांगितले.
९) मन्मथतीर्थ: -
गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात कल्लेश्वर म्हणून महादेवाचे स्थान आहे. याचे महात्म्य गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्र इतके आहे. मन्मथ तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराचे दर्शन घ्यावे. त्याची पूजा करावी. प्रजा वृध्दी व अष्ट ऐश्वर्याची प्राप्ती भक्ताला प्राप्त होते. असे हे पुण्यप्रद तीर्थ आहे. श्रावण महीन्यात अभिषेक करावा कार्तिक महिन्यात दीपाराधना करावी अनंत पुण्य प्राप्त होईल अशा प्रकारे संगम व अष्टतीर्थाचे माहात्म्य प्रत्यक्ष नृसिंहसरस्वती, दत्तात्रेय यानी सांगितले आहे. गाणगापूर क्षेत्र हे अशाप्रकारे एक पवित्र स्थान आहे.
गाणगापुरातील मठ तर पवित्राहुन पवित्र स्थान आहे. या ठिकाणी नृसिहसरस्वती २० वर्षाचा प्रदीर्घ काळ वास्तव्य करुन होते. त्यांच्या निर्गुण पादुका या मठा मध्ये आहेत. सरस्वती गंगाधर म्हणतात.
कल्पवृक्षाने पूजोन। यावे आमुचे जेथे स्थान ।
पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी
मनोभावे ।। २९ ।। गु.च. अ. ५१
प्रात: स्नान कृष्णातीरी। पंचनदीसंगम औदुबरी।
अनुष्ठान बरवे त्याक्षेत्री। माध्यानी येतो
भीमातीरी ।।१६ ।। गु.च. अ ५१
नृसिंहसरस्वती निजानंदास जाते वेळी त्यानी सर्वाना सांगितले, आम्ही नित्य मठात वास करून आहोत. दुपारी भीमातटी भिक्षेसाठी नृसिहसरस्वती येत असतात. म्हणुन गाणगापूरला भिक्षेचे अत्यंत महत्व आहे. सर्व भक्त भिक्षा करीत असतात.
आत्मलिंग शाळिग्राम जपमाळा सर्व साधने आजही गाणगापूरला नृसिंहसरस्वतीच्या रूपात मठात ठेवल्या आहेत. निर्गुण पादूका प्रत्यक्ष दत्तचरण आहेत. खरेतर गाणगापूर हे तीर्थ दत्तचरणा साठी प्रख्यात आहे.
संपूर्ण वर्षभर अनेक उत्सव होत असतात. अन्नदान धर्मिक कार्ये, नित्य आरत्या पालखी व इतर कार्यक्रम या तीर्थावर होत असतात.
गाणगापूर या तीर्थाचे आणखी एक विशेष म्हणजे पिशाच्य बाधा, मनारुग्ण, समंध पीडा या परिसरात दत्तात्रेयाच्या संनिध्यामुळे या ठिकाणी अशा शक्ती येत नाहीत पितृदोष, पिशाच दोष याचे निराकरण या ठिकाणी होते. बाराही महिने निरनिराळे उत्सव होत असल्याने गाणगापूर हे क्षेत्र नित्यदर्शन करण्यासाठी प्रसिध्द आहे. पर्व काळ विशेष समारंभ या वेळी विशेष फल असते. तरी केव्हांही गाणगापुरला गेले तरी नित्यमंगल असे हे क्षेत्र आहे. संगमावर नित्य गुरुचरित्र पारायणा साठी दत्तभक्त येत असतात. अश्वत्थ वृक्षा खाली ते पारायण करतात.
गाणगापूरात संगमाजवळ एक टेकडी आहे. भस्माचा डोंगर म्हणून ती प्रसिध्द आहे. भगवान परशुरामाने या ठिकाणी अनेक यज्ञ केले त्या यज्ञभस्माचा हा पर्वत आहे असे सांगितले जाते. गाणगापूरचा प्रसाद म्हणून हे भस्म लोक बरोबर नेत असतात. प्राचीन काळा पासून अनेक विभूतीनी भीमा अमरजा संगमावर तपसाधना केली आहे. म्हणून गाणगापूर हे क्षेत्र तपोभूमी म्हणून पण प्रख्यात आहे. तपोभूमी दत्तभूमी पुण्यभूमी अशी ही भूमी म्हणजेच गाणगापूर क्षेत्र किंवा गंधर्वपूर क्षेत्र हे प्रसिध्द आहे.
एका कानडी आरती मध्ये भीमानदी व गंधर्वपूर याचा उल्लेख आला आहे.
भक्तजनर कल्पवृक्षागे मंगल ।
भक्तिदुं भजिसुव मोक्षागे मंगल ।
भीमा गंधर्वपूर वासगे मंगल ।
भीमा शंकर गुरुवेषागे मंगल ।
स्वामी नृसिह सरस्वतीगे,
गुरु मूर्तिगे यतिवर्यागे मंगल ।
कामीत कामफल तृप्तिगे मंगल ।
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रात गाणगापूर क्षेत्र, गंधर्वपूर या विषयी जी माहिती आली आहे ती पाहण्याचा प्रयत्न करू या.
पीठिकापुरात म्हणजे पीठापूर क्षेत्रांत त्रेता युगात सवितृकाठक चयन यज्ञ (होम) भारद्वाज महर्षीनी केला होता. तेव्हा त्या यज्ञाचे भस्म हे पर्वता सारखे जमून बसले. काही काळाने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. राम अवतारात मारूती द्रोणागीरी पर्वत घेवून जात असताना त्याचा काही भाग गंधर्व पुरात म्हणजे गाणगापूर क्षेत्रात पडला. गाणगापुरातील भस्माच्या टेकडीचा जो उल्लेख आहे त्याचा संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात अशा प्रकारे आला आहे. भीमा अमरजा संगमाचा उल्लेख जालंदर पुराणात गंधर्वपूर असाच आहे. गंधर्वाचा वास हा हिमालय, कैलास मानस या परिसरात वर्णन केला आहे. रावणाचा भाऊ कुबेर हा कैलास मानस परिसरातच वास्तव्याला आहे पूर्वी हा गंधर्वराज दाक्षिण पंथावर श्री लंके मध्ये होता. रावणाने त्याला पिटाळून लावले. या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतला तर काही गंधर्व राजे या तपस्थली मध्ये राहिले व त्या मुळे त्यास गंधर्वपूर असे नाव पडले असे अनुमान काढता येते. अन्यथा गाणगापुर व गंधर्वपूर याचा संदर्भ लागत नाही. पण प्राचीन काळात भरत वर्षामध्ये गंधर्व, सिध्द, साध्य, पण इत्यादी विभूतीचा संचार होता. दत्तात्रेय यांच्या अवताराचा विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या सिध्द, साध्य, योगी याना दत्तात्रेयानी मार्ग दर्शन केले आहे. दक्षिण पथावरील कर्नाटक राज्यातील हे गंधर्व पूर गाणगापूर क्षेत्र म्हणूनच प्रसिध्द आहे. दत्त संप्रदायाचे प्रमुख असे हे तीर्थ क्षेत्र आहे.
गाणगापूर क्षेत्राच्या संदर्भात विशेष गोष्ट म्हणजे नृसिहसरस्वतीना वासर ब्रह्मेश्वर येथे सायंदेव भेटले होते. नृसिंह सरस्वतीचे ते निजि शिष्य होते. निजानंदगमनाच्या वेळी जी चार प्रसाद पुष्पे पाठविली होती त्या पैकी एक पुष्प सायंदेवाना मिळाले. होते. हे सायंदेव कडगंचीला रहात होते. नृसिंहसरस्वतीनी त्याना १५ वर्षांनी गाणगापुरला भेट सांगितले. त्या प्रमाणे सायंदेव गाणगापुरला म्हणून आले. त्यांच्या कुटूंबावर नृसिंहसरस्वतींची कृपा झाली. त्यांच्या वंशात सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला. ज्यानी गुरुचरित्र या ग्रंथाची रचना केली. ते सायंदेव गाणगापूरच्या क्षेत्रातच नृसिंहसरस्वतीच्या सहवासात राहिले. कानडी भाषेत त्यानी रचना केली गाण्गापुरात कानडी भक्तांचा वावर असला तरी महाराष्ट्रातून अनेक भक्त गाणगापुरला जात असतात. अशाप्रकारे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यातील दत्त भक्तांना गाणगापूर हे अत्यांत जवळचे व महत्वाचे तीर्थ आहे. कृष्णाकाठ सोडून २० वर्षे गाणगापुरास राहण्याचा श्री नृसिंहसरस्वती यांचा मानस या दोन भाषिक संस्कृतीला एकत्र करण्याचा होता. असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. सर्व समावेशक व समन्वय हाच हेतू या अवताराचा होता.
–श्री गणेश हरी कुलकर्णी
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ८ वा, (अंक ३२)
September 19, 2022
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे, की गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते. तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हणले जाते.
December 25, 2020
भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी एक परम वैभवशाली लीला म्हणजे हलाहल प्राशन.
September 3, 2020
शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे.
March 23, 2019
कार्यसंस्कृतीवर परिणाम होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. अर्थात त्यांवर सहजासहजी एकमत होत नाही. प्रदूषित कार्यसंस्कृतीची व्याख्या संस्थेनुसार बदलत जाते आणि ती व्याख्या मतमतांतरे निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. मात्र धोक्याचे इशारे एकसारखे असतात.
April 18, 2022
जागतिक शांतता ही एखाद्या देशात घडणारे खून,चोर्या, दरोडे आणि बलात्कार याच्याशी निगडीत नाही. जेंव्हा जगातील कोणत्याही भागात आतंकवादी कारवाया होतात तेंव्हा जागतिक शांतता भंग पावते. पहिल्या आणि दुसर्या महायुध्दाच्या वेळी जागतिक शांतता मोठ्या प्रमाणात भंग झाली होती. त्यापूर्वी म्ह्णजे हजारो वर्षापूर्वीपासून जागतिक शांतता कधीही प्रस्थापित झालेली नव्ह्ती. दिडशे वर्षापूर्वीपर्यत जागतिक शांतता ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. अलिकडच्या काळात जेंव्हा यांत्रिकी प्रगती अत्यंत वेगाने झाली तेंव्हा जग एका क्लिकच्या अंतरावर इतके जवळ आले तेंव्हापासून जागतिक शांतता ही संकल्पना अस्तित्वात आली. शेकडो वर्षापूर्वी भगवान गौतमबुध्दांनाही हिच जागतिक शांतता अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नाना बर्यापैकी यशही आले होते. पण नंतरच्या काळात त्यांचे ते स्वप्न धुळीला मिळाले. आजही जर जागतिक शांतता प्रस्थापित करायची असेल तर जगाला भगवान बुध्दांच्याच विचारांची कास धरावी लागेल त्याला पर्याय नाही. पण आता जागतिक शांतता भंग करण्याला प्रामुख्याने करणीभूत ठरत आहे तो म्ह्णजे धर्मवाद ! जोपर्यत मनुष्य धर्माच्या बंधनातून बाहेर येत नाही तोपर्यत जागतिक शांतता निर्माण होण केवळ अशक्य आहे. जगभरात अशांतता निर्माण करून आतंकवाद मजविण्यास आजच्या घडीला इस्लामिक आतंकवाद आघाडीवर आहे त्यात आता भर म्ह्णून की काय हिंदू आतंकवादही डोकं वर काढताना दिसत आहे. इसाई आतंकवाद प्रत्यक्षात नसला तरी तो संपत्ती, बळ आणि सत्तेच्या जोरावर आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न करताना संपूर्ण जगभरात दिसतोच आहे तो ही जागतिक शांतता निर्माण करण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे.
जगभरातील जवळ - जवळ 195 देशातील जवळ्पास 121 देशात थोड्याफार फरकाने आतंकवादाने डोक वर काढलेले आहेच. हे पहाता जागतिक शांतता प्रस्थापित होणे हे जवळ - जवळ अशक्य आहे. आतंकवादात भारताचा सहावा क्रमांक आहे तर जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्या चीनचा 25 वा क्रमांक आहे. याचा अर्थ आजच्या घडीला चीन आतंकवादाशी लढण्यात भारतापेक्षा अधिक यशस्वी झाला आहे. आतंकवाद हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे कारण जर खर्या अर्थाने जागतिक शांतता प्रस्थापित करायची असेल तर भारतालाच महत्वाची भूमिका बजावावी लागेल. सध्या आशिया खंड हाच खर्या अर्थाने आतंकवादाचा अड्डा झालेला आहे . आणि त्याच्या केंद्रस्थानी काश्मिर आहे. जोपर्यत काश्मिर मधे शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यत जागतिक शांतता ही एक कवी कल्पनाचं म्ह्णावं लागेल. जागतिक शांतता तशी कधी खर्या अर्थाने प्रस्थापित झालेली नव्हतीच. आणि ती होण्याची शक्यता तशी धुसरच आहे. संपूर्ण जगात जेंव्हा शांतता असेल तेंव्हा कदाचित मानव प्राणी या जगातून नाहीसा झालेला असेल. आता जगातील जवळ पास दोन डजन देशांनी अणूबॉम्बची निर्मिती केलेली आहे. दररोज जगातील कोणत्याना कोणत्या देशात आतंकी हामले होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडत असतात. आपल्या देशातील जनताही आतंकवादाच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. भारत पाकिस्तानच्या सीमा भागात राहणारे लोक तर साक्षात मृत्यूच्या सावटाखालीच जीवन जगत असतात. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात भारत महत्वाची भुमिका बजावण्यात सक्षम असतानाही भारताला आपली शक्ती आतंकवादा विरोधात लढण्यात वाया घालवावी लागत आहे.
आज जगभरातील जवळ जवळ सर्वच राष्ट्रे अणूबॉम्ब् बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेतच त्यासोबत आपली सैनिकी ताकद वाढविण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. भारतही अधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे. वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि कधीही तिसर्या महायुध्दाची ठिणगी पेटेल या भितीने आप - आपली सैनिकी ताकद वाढविण्यास प्रयत्नशील आहेत. भारतही त्यात मागे नाही. आशिया खंडात याबाबतीत आता स्पर्धा सुरू झालेली आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. पूर्वी म्ह्टलं जायचं तिसरं महायुध्द तेलासाठी लढलं जाईल, आता म्हटलं जातय पाण्यासाठी होईल, कालांतराने म्ह्टल जाईल मुलभूत गरजांसाठी लढलं जाईल. जोपर्यत जगात तिसरे महायुध्द होण्याची शक्यता दृष्टीक्षेपात आहे तोपर्यत जगात शांतता नांदणे शक्य नाही. भारतातील काश्मिरवर संपूर्ण जगाचा डोळा आहे पण भारत पाकिस्तानसाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न झालेला आहे. भारत पाकिस्तान मधे झालेल्या युध्दांना काश्मिर हे एकमेव कारण आहे. अमेरीकेने आपल्या ताकदीच्या जोरावर इराकवर ताबा मिळविला खरा पण तेथे शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेली नाही. आजही तिथून सातत्याने आतंकी हमल्याच्या बातम्या येतच असतात.
जर जागतिक शांतता निर्माण करायची तर जगभरातील 121 देशातील आंतकवादाचा नायनाट करावा लागेल पण ते करणे सर्व देशांना मिळूनही शक्य होईल की नाही याबद्दल शंकाच आहे कारण काही देशच आतंकवादाचे अड्डे स्वतःहून झालेले आहेत. भारत आणि चीन मधील वाढती लोकसंख्या मुलभूत गरजा पूर्ण होण्याचा अभाव, काही अंशी आतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठरतोय त्यासोबत प्रत्येक देशातील धार्मिक राजकारणही त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक देशातील अल्पसंख्यांक स्वतःला त्या देशात असुरक्षित समजतात कधी कारण असताना तर कधी विनाकारणही ! त्यांची ही असुरक्षिततेची भावनाही जागतिक आंतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठरतेय ! कोणत्याही देशातील अंतर्गत आतंकवादही आता डोकं वर काढू लागलेला आहे. ज्याचा बंदोबस्त करणं तर अधिक अवघड असतं. अंतर्गत आतंकवादा समोर तर बलाढय देशांनाही मान तुकवावी लागते. या जागतिक आतंकवादामुळेच संपूर्ण जग पहाण्याच्या आपल्या स्वप्नाला कित्येकांना मुरड घालावी लागते.
जागतिक शांतता जर खरोखरच प्रस्थापित झाली तर मनुष्याच्या जगण्याला एक योग्य दिशा मिळेल. त्याचं जीवन अधिक सुसज्ज आणि आनंदी होण्याला मदत मिळाली असती. जागतिक शांतता ही फक्त अहिंसेच्या मार्गानेच अस्तित्वात येऊ शकते असं वर वर वाटत असल तरी बर्याचदा शस्त्रास्त्राच्या धाकाने शांतता प्रस्थापित झाल्याचे पहाण्यात येते. मनुष्याच्या मुलभूत गरजा पूर्ण न होणे आणि भौतिक साधनांचा हव्यास मनुष्यास स्वस्थ बसू देत नाही. त्यातुनही आतंकवाद जन्माला येतो. तो आतंकवाद काहींच्या स्वार्थाने फोफावतो आणि जगातील शांतता नष्ट करून अशांतता निर्माण करतो. जगात अशांतता निर्माण करण्यासाठी तरूणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. शक्तीशाली राष्ट्रे ताकदीच्या जोरावर काही काळ जगात शांतता निर्माण करू शकतात. जागतिक शांततेवर गेली कित्येक वर्षे चर्चा होत आहे. त्यातून एकीकडे अहिंसेचा मार्ग समोर येत असताना दुसरीकडे हिंसेचा मार्ग अवलंबिला जात आहे. जागतिक शांतता प्रत्यक्षात येण तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा जगातील प्रत्येक माणसांच्या हृद्यात अहिंसेचा उगम झालेला असेल.
जागतिक शांतता ही फक्त देशा-देशात युध्दे न होऊ देणे इतकी सिमित करावी लागेल आणि तस होतय म्ह्णजे जागतिक शांतता आहे असं म्ह्णायला हरकत नाही असं म्ह्णून समाधान मानावे लागेल. भौतिक साधनांच्या अधिक वापरामुळे, वाढत्या मानसिक त्रासामुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे माणूस अधिक उग्र होत चाललेला आहे. त्याची सहनशक्ती कमी होत चालली आहे. वाढते जागतिक तापमान पर्यावरणाचा र्हास अनैसर्गिक गोष्टींची निर्मिती ही आतंकवादास पोषख ठरत आहे. कोठेतरी वाचनात आलेली एक गोष्ट आहे सिकंदर जेंव्हा जग जिंकत भारतात आला तेंव्हा आपल्या सैन्यासह तो प्रचंड आवाज करत जात असताना एका झाडाखाली शांत बसलेला एक साधू क्षणभरही विचलीत झाला नाही. ते पाहून सिकंदर त्याच्या जवळ गेला आणि त्याला हलवून जागं केल आणि म्ह्णाला,’ माझ्या सैन्याच्या इतक्या प्रचंड आवाजानेही तू क्षणभरही व्यतीत झाला नाहीस, हे कसं शक्य आहे ? त्यावर त्या साधूने त्याला उलट प्रश्न केला ? तू कोण आहेस, कोठून आलास आणि आता कोठे चालला आहेस ? त्यावर तो म्ह्णाला,’मी सिकंदर, जग जिंकण्यासाठी निघालोय जग जिंकत जिंकत आता हा देश जिंकायला आलोय ! त्यावर तो साधू म्ह्णाला,’ मग संपूर्ण जग जिंकल्यावर काय करणार आहेस ? त्यावर तो म्ह्णाला,’ काही नाही ! एका झाडाखाली शांत बसेन. त्यावर तो साधू शांतपणे ह्सत त्याला म्ह्णाला,’ सध्या मी तेच करतोय !
सांगायच तात्पर्य इतकच प्रत्येक मनुष्याला त्याच्या मर्यादा कळत नाहीत, जीवनाचं रह्स्य उमजत नाही आणि जीवनाच्या अंतीम ध्येयापर्यत पोहचण्याची इच्छा त्याच्या अंर्तआत्म्यात निर्माण होत नाही तोपर्यत जागतिक शांतता ही स्वप्नासारखी होती, स्वप्नासारखी आहे आणि स्वप्नासारखीच रहाणार आहे.
निलेश दत्ताराम बामणे
(कवी,लेखक आणि संपादक- मासिक ‘साहित्य उपेक्षितांचे’)
पत्ता- वेदान्त कॉम्प्युटर
श्रम साफल्य सो., स्मिता इंटरप्रायझेसच्या शेजारी,
संतोष नगर बसस्टॉप जवळ, संतोष नगर,
गोरेगांव ( पूर्व ) मुंबई-400 065
मो. 9029338268, 8652065375
Email – nileshbamne10@gmail.com
December 22, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti