(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सहावा – आत्मसंयमयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय.

  • दामोदर अष्टकम – मराठी अर्थासह

    दामोदराष्टक स्त्तोत्र, कृष्ण द्वैपायन व्यासांनी रचलेल्या पद्म पुराणात सत्यव्रत ऋषी व शौनक ऋषी यांच्या संवाद रूपात आहे. श्रीकृष्णाचे अत्यंत रसाळ चरित्र श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात येते. त्याच्या बालपणीच्या अनेक कथा सुप्रसिद्ध आहेत. त्यातीलच अध्याय ९ व १० मधील एक कथा – श्रीकृष्णाच्या खोड्यांना आवर घालण्यासाठी यशोदेने त्याच्या कमरेला दोर बांधून दुसरे टोक उखळाला बांधले. बालकृष्णाने उखळासकट हालचाल करून दोन अर्जुन वृक्ष पाडले व त्या तरूंमध्ये अडकून पडलेल्या कुबेराच्या मणिग्रीव आणि नलकूवर या दोन पुत्रांना मुक्ती दिली. [यामुळेच श्रीहरीला दामोदर (दाम- दोरी, उदर- पोट) असे नाव पडले]. या कथेवर आधारलेले, भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व समजण्यास सोपे आहे.

    नमामीश्वरं सच्चिदानंदरूपं
    लसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानं |
    यशोदाभियोलूखलाद्धावमानं
    परामृष्टमत्यं ततो द्रुत्य गोप्या ॥१॥

    मराठी- जो सदैव आनंदस्वरूप आहे, ज्याची कर्णभूषणे तेजस्वी असून, जो गोकुळात देदीप्यमान आहे, यशोदेला घाबरल्यामुळे जो लाकडी उखळापासून दूर पळत असता ज्याला गोपीने वेगाने धाऊन पटकन पकडले अशा ईश्वराला मी नमस्कार करतो.

    यशोदाभये ऊखळा संग धावे
    झणी गोपिका धावुनी त्या धरावे ।
    डुलांची प्रभा, गोकुळी दिव्य झाला
    सदा मानसी मोद वंदू तयाला ॥०१॥

    रुदन्तं मुहुर्नेत्रयुग्मं मृजन्तम्
    कराम्भोज-युग्मेन सातङ्क-नेत्रम् |
    मुहुः श्वास-कम्प-त्रिरेखाङ्क-कण्ठ
    स्थित-ग्रैव-दामोदरं भक्ति-बद्धम् ॥२॥

    मराठी- सारखा रडत, आपल्या दोन्ही करकमलांनी दोन्ही डोळे पुसणारा, ज्याच्या डोळ्यात भीती दाटलेली आहे, सारखा श्वास वरखाली झाल्याने ज्याचा शंखाप्रमाणे (सुकुमार) कंठ थरथरत आहे, ज्याच्या गळ्यातील माळ हालत आहे, अशा भक्तिरूपी दोराने बांधून ठेवलेल्या दामोदराला (मी नमस्कार करतो)

    रडे सारखा नेत्र दोन्ही करांनी
    पुसे, भीति नेत्री, थरारे दमांनी ।
    गळा शंखजैसा, रुळे कंठ माला
    गुणे भक्तिच्या बांधिले श्रीहरीला ॥०२॥ (गुण- दोरी)

    इतीदृक् स्वलीलाभिरानंद कुण्डे
    स्व-घोषं निमज्जन्तम् आख्यापयन्तम्
    तदीयेशितज्ञेषु भक्तिर्जितत्वम
    पुनः प्रेमतस्तं शतावृत्ति वन्दे ॥३॥

    मराठी- अशा तर्‍हेच्या आपल्या लीलेच्या आनंदाच्या डोहात गोकुळवासियांना डुबकी देणार्‍या, त्याचा सर्वशक्तिमानपणा(च) जाणणार्‍यांना (आपण) भक्तीने जिंकले जातो असे सांगणार्‍या (दामोदरा) ला मी पुनः पुनः शंभर वेळा प्रेमाने नमस्कार करतो.

    अशा मोद डोही स्वलीला स्वरूपी
    डुबी देतसे गोकुळी गोप गोपी ।
    वदे तज्ञ लोकां करी भक्ति राजी
    मला, वंदने शेकडो त्यास माझी ॥०३॥

    वरं देव ! मोक्षं न मोक्षावधिं वा
    न चान्यं वृणेऽहं वरेशादपीह
    इदं ते वपुर्नाथ गोपाल बालं
    सदा मे मनस्याविरास्तां किमन्यैः ॥४॥

    मराठी- हे देवा, मला मुक्ती नको, मोक्षाचे ठिकाण वैकुण्ठाची आवड नाही किंवा इतर कोणता वरही आवडत नाही. वरदायकाकडून एवढीच अपेक्षा की हे देवा तुझी ही सानुल्या गवळ्याची आकृती सदैव माझ्या मनी राहो, दुसरं काय!

    नको मुक्ति, वैकुण्ठ वाटे नकोसे
    नसे दान दूजे वराचे हवेसे ।
    तुझी गोप बालाकृती नित्य राहो
    मनी मानसी अन्य काही न लाहो ॥०४॥

    इदं ते मुखाम्भोजम् अत्यन्त-नीलैः
    वृतं कुन्तलैः स्निग्ध-रक्तैश्च गोप्या
    मुहुश्चुम्बितं बिम्बरक्ताधरं मे
    मनस्याविरास्तामलं लक्षलाभैः ॥५॥

    मराठी- हे तुझे काळ्याभोर लालसर बटांनी वेढलेले, यशोदेने वारंवार चुंबिलेले, बिंबफळाप्रमाणे (तोंडल्याप्रमाणे) लालबुंद ओठ असणारे वदनकमळ माझ्या मनी वसो. मग इतर लाभांची काय कथा?

    बटा लालशा-कृष्ण चर्यारविंदा
    मुखा सारखी माय चुंबी यशोदा ।
    वसो ओठ बिंबाजसे मानसी या
    नफे अन्य लाखो तसे जात वाया ॥०५॥

    नमो देव दामोदरानन्त विष्णो
    प्रभो दुःख-जालाब्धि-मग्नम्
    कृपा-दृष्टि-वृष्ट्याति-दीनं बतानु
    गृहाणेष मामज्ञमेध्यक्षिदृश्यः ॥६॥

    मराठी- हे देवा, दामोदरा, अनन्ता, विष्णो, दुःखरूपी समुद्रात जाळ्यात अडकलेल्या माझ्यावर, हे (सर्वांवर) कृपा करणार्‍या प्रभो, आपल्या दयाळू दृष्टीची वृष्टी करून, तू माझ्यासारख्या अत्यंत दीन दुबळ्याच्या नजरेसमोर दिसत रहा.

    असे दुःख दर्यात जाळ्यात हा मी
    हरी तू कृपाशील सर्वांस स्वामी ।
    कृपादृष्टि टाकून दीनावरी या
    दिठीच्या समोरी रहा तूच माझ्या ॥०६॥

    कुबेरात्मजौ बद्ध-मूर्त्यैव यद्वत्
    त्वया मोचितौ भक्ति-भाजौ कृतौ च
    तथा प्रेम-भक्तिं स्वकां मे प्रयच्छ
    न मोक्षे ग्रहो मेऽस्ति दामोदरेह ॥७॥

    मराठी- स्थिर आकृतीमध्ये बंदिस्त झालेल्या कुबेराच्या दोन मुलांची तू ज्याप्रमाणे सुटका केलीस आणि आपल्या भक्तांमध्ये रूपांतर केलेस, तशा तर्‍हेचे तुझे प्रेम आणि भक्ती मला दे. हे दामोदरा, मला या जगात मुक्तीची कामना नाही.

    जसे वृक्ष बंधातुनी मुक्त केले
    कृपे सोम पुत्रांस त्वां भक्त केले । (सोम- कुबेर)
    तसे प्रेभ भक्ती मला दे अनंता
    जगी कामना मुक्तिची या न भक्ता ॥०७॥

    नमस्तेऽस्तु दाम्ने स्फुरद्-दीप्ति-धाम्ने
    त्वदीयोदरायाथ विश्वस्य धाम्ने
    नमो राधिकायै त्वदीय-प्रियायै
    नमोऽनन्त-लीलाय देवाय तुभ्यम् ॥८॥

    मराठी- हे परमेश्वरा, जे सर्व विश्वाचे घर आहे (जेथून सर्व विश्वाची (निर्मिती करणार्‍या ब्रह्म्याची) उत्पत्ती झाली) , त्या तुझ्या पोटाला बांधलेल्या त्या चमकदार तेजस्वी दोराला माझा नमस्कार. तुझ्या प्रिय राधेला माझा नमस्कार. ज्याच्या लीलांना खंड नाही अशा देवा, तुला माझा नमस्कार.

    जगाधार पोटा तुझ्या वेढणारी
    अशी वंदितो दिव्य तेजाळ दोरी ।
    नमस्कार वृंदेस कृष्ण प्रियेला
    नमूं श्रीहरी चालता नित्य लीला ॥०८॥

    -- धनंजय बोरकर.

    ९८३३०७७०९१.

  • विठ्ठला कोणता झेंडा, घेऊ हाती !

    हे कलियुग आहे कलीचा वाऱ्याप्रमाणे ही माणसे वागतात पण सत्य कुठे लपत नाही संत थोर होत त्यांचे विचार आचार वेगळी होत आता या जनतेने कसे वागावे हे तुम्हीच ठरवा यू हवे हल्ली सगळीकडे वातावरण फार वाईट आहे जग बुडी ची वेळ आली आहे इथून पुढच्या काळात तरी प्रत्येकाने सगळ वागावे यातच भलेपणाचा आहे. माणसासारखे वागा माणूस म्हणून जागा आपलं सर्वांना म्हणा

  • दत्ता दिगंबरा

    दत्तप्रभूंची विविध रूपे अवतार पाहायला मिळतात. आजही कुठल्या ना कुठल्या रूपात ते आपल्याला भेटतात .आपल्या मनीषा पूर्ण करतात. योग्य मार्ग दाखवतात पण हे रूप ओळखण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी साधनेची, निष्ठेची, भक्तीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नितांत श्रद्धेची व सबुरीची गरज आहे.

  • || सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर ।।

    गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर यांच्या जीवनचरीत्रावर आधारीत आहे. गुरुतत्त्वाचे हे ३४ वे पुष्प नानांच्या चरणी समर्पीत करीत आहे.

    मध्यप्रदेशातील तराणे या गावी यांचा जन्म झाला. यांचे पूर्वज खानदेशांतील घाटनांदराया गावी होते. वासुदेव भटजी जोशी (वाघे) या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात नानांचा जन्म झाला. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या संगतीत त्यांनी उपासना सुरू केली. गुरुचरित्राचे सप्ताह लहानपणीच केले. दत्ताचे लाडके लेकरू म्हणून लोक यांना ओळखू लागले. या मार्तंडाची दत्तप्रभुंवर मोठी निष्ठा होती.

    “हा मार्तंडनामे पुन्हा । श्रीएकनाथांचा अवतार म्हणा । हृदयी रमता दत्तराणा । आवडीने
    जयाचिया।” असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते.

    सन १९१४ मध्ये इंदूरचे शंकरराव डाकवाले यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. परंतु संसार नीटपणे झाला नाही. पत्नीचे निधन झाल्यावर तराणेकर यांनी काशीची यात्रा केली. मथुरा, शेगाव इत्यादी तीर्थयात्रा केल्या. ते बद्रिकेदारलाही गेले होते. अनेक योगी लोकांची, सत्पुरुषांची नानांनी दर्शने घेतली. त्यांच्यावर गुळवणी महाराजांचा प्रभाव मोठा होता. नानांनी अनेक ठिकाणी यज्ञ केले. वास्तव्य उत्तरार्धात इंदूर येथे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परीवाराची निर्मिती झाली. त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना, मंत्रपाठ आणि जप यांचे विकसित रूप आहे. नानांच्या परिवाराने या मार्गांची जोपासना केली आहे. प्रासादिकमंत्र, स्तोत्र व प्रार्थना यांना महत्त्व आहे.

    परमपूज्य नाना महाराज यांच्या घराण्यात दत्तभक्तीची परंपरा उत्कटधारा तशी पिढ्यान
    पिढ्यापासून होती. असे म्हणतात की सद्गुरु भूमीवर अवतरण्यासाठी ८० पिढ्यांचे दत्त भक्तीचे पुण्य हवे. हे पुण्य परम सद्गुरुच्या पुनर्जन्माच्या माध्यमातून प्रगत होत असते.

    बालवयातच प. पू. नानांना दत्तसाधनेची इच्छा व ओढ वाटू लागली. घराजवळच श्रीदत्तप्रभूंचे मंदिर असल्यामुळे श्रीदत्तप्रभूंच श्रीगुरु म्हणून मिळावेत ही तळमळ हृदयामध्ये ठेवून जप तप व श्रीदत्तप्रभूंचे स्मरण नित्य अविरत होऊ लागले. एवढ्या बालवयातच श्रीदत्तप्रभुंच्या भेटी साठी काहीही करण्याची प. पू. नानांची साधना परिश्रम पाहून घरामधील वडिलधारी मंडळी आश्चर्यचकित होत असत. प. पु. नानांचे अतीव श्रीदत्तप्रभू प्रेम सगळ्यांना भारावून टाकत असे. प. पू. नानांमहाराजानी जे अनुभवलेले ते अद्भुत होते. राम लक्ष्मण यांच्या मूर्तीतून दोन तेजस्वी दिव्यमूर्ती बाहेर आल्या व दोघे ब्रज भाषेत संवाद करत खेळ खेळू लागले.

    प. पू. नाना महाराजांना गिरनारी श्री अवधूत नाथ दर्शन, मथुरेत श्रीकृष्ण दर्शन व अनेक देवातांचे दिव्य दर्शन होऊन त्यानी श्रीगुरुंची प्रीती अनुभवली. शेवटी श्रीगुरुभक्तीसाठी मनोनिग्रह हेच प्रमुख साधन आहे व अध्यात्मिक वाटचालीत श्रीगुरुंची करुणात्रिपदी व श्रीगुरूंचा जप हेच नित्य आचरणात असले पाहिजे, तीच मुख्य साधना पद्धती आहे. हा प.
    पू. नानामहाराजांचा आग्रह आहे! स्थूलदेह जरी नसला तरी सुक्ष्म देहामध्ये आज प. पू. नानामहाराज भक्तासाठी कार्यरत आहेत, नाना महाराजानी स्थूलदेह धारण करण्या अगोदर सुध्दा ते गुरुतत्त्व स्वरूपात होतेच स्थूल देह धारण केल्यावर सगुण स्वरूपात गुरुतत्त्व कार्य केले व आज त्यानी जरी देह त्याग केला असला तरी ते गुरुतत्त्व स्वरूपात आहेतच, या तत्वाचा कधीच लय होत नाही. दत्त भक्तांना साधनेसाठी आपले मार्गदर्शन देण्यासाठी अधीर आहेत. या कलियुगात श्रीगुरुंमुळेच दत्तभक्त तारून जाणार आहेत.

    शेवटी एवढेच, श्रीदत्तमहाराजांची आवडीची ओळ गुणगुणाविशी वाटते, “भजा भजा हो
    श्रीगुरूंसी.” मध्यप्रदेशातील “इंदौर" चे महान योगी सद्गुरु श्री नानामहाराज तराणेकर यांच्या साधकावस्थेतील ही कथा नाना महाराज तराणेकर. श्री नाना महाराजांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी श्रीगुरुचरित्राची कठोर पारायणसाधना करून “परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीं” कडून गुरुमंत्राची दिक्षा मिळवली. त्यानंतर अखंड गुरुमंत्राच्या जपाने ते तेज:पुंज बनले. श्री टेंबे स्वामींकडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा घेऊन त्यांनी परिक्रमाही पूर्ण केली. या परिक्रमेत त्यांना देवदेवतांची अनेक दिव्य दर्शने घडली. त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमण आरंभले. बद्रीनाथ, केदारनाथ येथे श्री शिवदर्शन घेतल्यावर त्यांनी नागराज हिमालयात जाण्याचे ठरवले. हिमालयाची यात्रा करताना देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव लाभले. त्यातीलच हा एक अनुभव.

    नानामहाराज हिमालयात भ्रमंती करत असतांना एके दिवशी एका ठिकाणी त्यांना एक गुहा दिसली. गुहेत थोडा विश्राम करावा या हेतुने ते गुहेजवळ गेले. परंतू जवळ जाताच गुहेच्या मुखाशी त्यांना दोन वाघ दिसले. वाघ नानामहाराजांना पहाताच गुरगुरू लागले. परंतू त्याच गुहेत आत मध्ये एक सात - आठ फुट उंच, गोरेपान, तेजस्वी योगी समाधी लावून बसले होते. या योग्याने त्या दोन्ही वाघांना, नानामहाराजांना आतमध्ये येऊ देण्याची आज्ञा केली. तसे ते वाघ एकदम शांत झाले. योग्याने नानामहाराजांना जवळ बोलावले. महाराज आत गेले. योगी व महाराज यांच्यात बरेच बोलणे झाले. योग्याने महाराजांना योगसाधनेतील अनेक गोष्टी सांगितल्या. योगाचे अनेक प्रकारही शिकवले. त्याचबरोबर आपण महाभारत काळापासून समाधी लावून बसल्याचे व साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिक्षा देऊन योगसाधनेचा आदेश दिल्याचे सांगितले. नंतर योग्याने महाराजांना पुढील प्रवासाबद्दल विचारले महाराजांनी आपल्याला गंगातटी गंगा नदीचे दर्शन घ्यायला जायचे असल्याबद्दल सांगितले. तेव्हा योग्याने त्यांना आपले (म्हणजे त्या योग्याचे) पाय पकडून डोळे घट्ट मिटून घेण्यास सांगितले. "मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नको अन्यथा कोठेतरी मध्येच पर्वतांमध्ये पडशील” असे सांगितले. त्याप्रमाणे श्री नाना महाराजांनी त्या योग्याचे पाय पकडले व डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षणांनी योग्याने डोळे उघडण्यास सांगितले, त्याप्रमाणे महाराजांनी डोळे उघडताच ते गंगा नदीच्या घाटावर उभे होते. योगी त्यांना तिथे सोडून केव्हाच अदृष्य झाले होते.

    श्री समर्थ नाना महाराज सांगतात की आजही नागराज हिमालयात असे अनेक योगी महात्मे हजारो वर्षापासून समाधी अवस्थेत आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांचे आस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. म्हणून ते नाहीतच असे म्हणणे कितपत योग्य? राग, प्रेम, अहंकार या भावनादेखील प्रयोगशाळेत सिद्ध केल्या जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्व आपण नाकारतो का? या गोष्टीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा.

    प. पू. नाना महाराज सांगतात, भक्ती कशी करावी? तुमची भक्ती ही ज्ञान युक्त असावी. ज्ञानाने अनुभव व माहिती यातील फरक समजतो. भक्ती आपण कोणाची व का करतो हे समजून घ्यावे. स्तुती करतांना त्यात असणारे शब्द व वाक्य याचा अर्थ समजून, जाणून भक्ती करावी फक्त ज्ञानयुक्त भक्तीने शिष्य गुरुंची योग्यता समजू शकतो.

    मनुष्य देवाची भक्ती करतो पण देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. भक्ति मनापासून करतो पण मागत असतो. देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर ही मागणी देवाजवळ करतो. काही वेळेला देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली नाही तर देवाचे करणे सोडून देतो. त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अशी मनुष्याची मानसिकता आहे. देवाची भक्ती करीत असतांना मनुष्याच्या वासना निघून गेल्या पाहिजेत. कारण मनुष्याचे दु:खाचे मूळ कारण म्हणजे वासना आहेत. मनाचे सतत लाड पूरविणे व त्यासाठी कोणाचाही घात करायला मागे पढे न पाहणे. त्या वासनांचा त्याग होण्यासाठी भक्ति करायची असते. पण भक्ती करून मनुष्य काही वेळेला देवांवर विश्वास ठेवत नाही. त्याचा त्याच्यावरच विश्वास नसतो. मग देवांवर विश्वास कसा ठेवेल. प्रथम देवाजवळ काहीही मागू नये. कारण तुम्ही जे काही मागाल ते देव पूर्ण करतो. त्यामुळे तुमच्या भक्तीची पुण्याई कमी होते. तर भक्ती ही निष्काम भावनेचीच पाहिजे. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजी घेतो व पैसे देतो. त्यातच आपला व्यवहार पूर्ण होतो. मग आपल्याजवळ त्या माणसाचे काहीही घेणे उरत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने भक्ती करीत असतांना देवा जवळ काही मागितले की देव त्याला सर्व देतो पण स्वत: देव त्याच्या जवळ राहत नाही. तर देवाला मिळविण्यासाठी त्याच्या कडून काहीही मागू नका. प्रथम त्याच्यावर विश्वास ठेवा की तू मला संकटात मदत करणार. म्हणजेच प्रत्येक संकटात मला धैर्य देणार. मला संकट जिंकायला मदत करणार. म्हणजे मला जिद्द आत्मविश्वास देणार ह्यावर विश्वास ठेवावा. देव स्वत: तुम्हाला कधीही भेटणार नाही. पण तुम्हाला जगण्यासाठी बल, कौशल्य, आत्मविश्वास, जिंकण्याची जिद्द मात्र देइल. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचे कर्म त्याला अर्पण करा. त्याच्या जवळ काहिही न मागता “देवा, तुझे नाम सतत माझ्या मुखात राहू दे हे मागा." कारण जेव्हा आपण देवा तुझे नाम मुखात राहू दे अस मागतो.

    तेव्हा आपण देवाच्या हृदयाला मागतो त्याचे अस्तित्व मागतो. मग का नाही आपल्या भक्तिला भुलून तो आपल्याला मदत करणार. त्यासाठी निष्काम भावनेची भक्ति करा. त्याला प्रेम द्या, मग पहा, तुम्ही त्याला सोडले तरी तो तुम्हाला सोडणार नाही व मनात एकच भावना ठेवा की देवा तुझे अस्तित्व आहे. मला तू प्रत्येक संकटात मदत करणारच अशी भावना ठेवा.

    मनुष्याने नुसती भक्ती केली व काहिही काम केले नाही व मनात एकच आशा ठेवली की देव सर्व करेल माझे व प्रयत्न केले नाही तर त्या वेळेस देव मदतीला येणार नाही. देवाच्या नामाची भक्ति करा व कष्ट करा. स्वतःवर व देवांवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला कोणत्याही रुपात भेटेल. आपल्या प्रारब्धाचे भोग तो कमी करेल. जीवनात आनंद देईल पण त्यासाठी फक्त विश्वास हा तिहेरी शब्द मनात पाहिजे. कारण विश्वास ह्या शब्दात त्याच्या विषयी प्रेम व त्याचे अस्तित्व आहे.

    परमपूज्य श्री नानामहाराज यांच्यावर आधारीत असलेला अंक आपल्याला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

    संपर्क: श्री समर्थ नाना महाराज प्रासादिक संस्थान पारमार्थिक ट्रस्ट,
    इंदोर. त्रिपदी परिवार, नानासाहेब तराणेकर,
    मार्ग ८१/१, स्नेहलता गंज,
    इंदोर ४५२००३
    दुरध्वनी: ०७३१-२५४५०२४

    -– श्री संतोष शामराव जोशी

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १० वा, (अंक ३४)

  • श्रीगंगाष्टकम् – मराठी अर्थासह

    श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे.

  • आनंदाचे उगमस्थान

    आपल्यापैकी प्रत्येकालाच सुखाची आकांक्षा असते. सुख-साधने सर्वांनाच हवी. असतात, परंतु सर्व सुखसाधने सर्वांनाच कुठे ‘मिळतात? याचे कारण एकच असते ते म्हणजे आनंदाचा उगम कुठे आहे, हेच आपणास ठाऊक नसते. एखादी वस्तू कुठे मिळेल हेच माहीत नसेल तर ती मिळणार तरी कशी? आनंदाच्या शोधात आपण इकडे-तिकडे भटकतो.

  • नारळी पौर्णिमा

    श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात. या सणाचे महत्त्व विशेष करून समुद्रकाठच्या भागात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात.

    -श्री करंदीकर गुरुजी

  • श्री क्षेत्र औदंबर

    श्री नृसिंह सरस्वती कारंजा या आपल्या जन्म स्थानावर मातेला वचन दिल्याप्रमाणे आले व. इ. स. १४१६ या वर्षी आपल्या उत्तर यात्रेस निघाले काशी येथे त्यानी मुक्काम केला. इ. स. १३८८ या वर्षी त्यानी वृध्द कृष्ण सरस्वती यांच्या कडुन संन्यास दीक्षा घेतली व आपली नवखंड यात्रा पूर्ण केली.

    क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गौतमी तथा गोदावरी तटाक यात्रा करीत ते वासर ब्रह्मेश्वर या ठिकाणी आले. सरस्वती गंगाधर यांचे वंशज सायंदेव या आपल्या निजि शिष्याची त्यांची भेट झाली. त्याना १५ वर्षानी गाणगापुरास भेटेन असे सांगून नृसिंह सरस्वती परळी वैद्यनाथ या क्षेत्रावर एक वर्ष गुप्त रूपानी राहीले. त्या वेळी त्यांचे निजि शिष्य सिध्द हेच त्यांच्या जवळ होते. आणि त्या नंतर त्यानी आपली कृष्णा तटाक यात्रा प्रारंभ केली. इ. स. १४२५ या वर्षी ते क्षेत्र परळी वैद्यनाथ या ठिकाणी होते तर इ. स. १४२६ या वर्षी नृसिंहसरस्वती औदुंबर या क्षेत्रामध्ये भुवनेश्वरीच्या सानिध्यात आले.

    क्षेत्र औदुंबर म्हणून या क्षेत्राचे नाव नंतर पडले पूर्वी भिल्लवडी म्हणुन हा परिसर ओळखला जात होता. घनदाट आरण्य व त्यातून वाहणारी कृष्णानदी झाडीतूनच वहात होती. करहाटक म्हणजे कऱ्हाडला कोयना नदीशी कृष्णेचा संगम झाला उगमापासून प्रवास करीत कृष्णा दक्षिण वाहिनी तर कोयना उत्तर वाहीनी होती. संगम झाल्यावर दोनही नद्या पश्चिम वाहीनी झाल्या पुढे त्या पुन्हा दक्षिण वाहीनी होवून नरसिंगपूर (शेणोली) या ठिकाणी बहे बेटाशी आल्या या बहे बेटावर रामायण काळात रामचंद्र नित्य कर्म करीत असताना व्यत्यय नको म्हणुन हनुमंतानी कृष्णेचा प्रवाह रोखून धरला ते हनुमंताचे मंदीर बेटावर आहे. पराशर ऋषीच्या ध्यानातील नृसिंह मूर्ती नरसिंगपूर या ठिकाणी जमीनी खाली भुयारात विराजमान आहे. पुढे कृष्णा औदुंबर तथा भिल्लवडी या गावाच्या दिशेने वाहू लागली खरेतर दंडकारण्याचा हा भाग होता. माता भुवनेश्वरी मात्र या जंगलात एकांत स्थानी भिल्लवडीस येवून राहिली होती.

    शिवपुराणा नुसार भगवान शिवाचे दहाअवतार सांगितले आहेत. प्रत्येक अवतारात महाशक्ती सती पार्वती पण शिवा बरोबर प्रकट होत होती. शिवाचा तिसरा अवतार भुवनेश म्हणुन होता. त्या वेळी भुवनेश्वरी म्हणुन पार्वतीने अवतार धारण केला ती ही माता भुवनेश्वरी प्राचीनकाला पासुन कृष्णा तटाकी वास करून होती नृसिह सरस्वती येण्या पूर्वी भिल्ल वडी क्षेत्र भुवनेश्वरी देवीचे क्षेत्र म्हणून होते.

    भिल्लवडी कृष्णा तीरी । शक्ती असे भुवनेश्वरी ।
    तेथे तप करीती जरी । ते चि इश्वरी ऐक्यता ।। गु.च.अ. १५

    शक्ती पीठ असा उल्लेख भुवनेश्वरी देवीचा गुरु चरित्रात आला आहे. त्या मुळे ही एक पवित्र तपोभूमी आहे. या क्षेत्राचे माहात्म्य वृद्धिगंत करावे या हेतूने व इश्वरी कार्य म्हणून नृसिंह सरस्वतीनी या ठिकाणी आपला मुक्काम चार महीन्यासाठी ठेवला ते भुवनेश्वरी मंदीराच्या समोरील कृष्णा काठावर औदुंबर वृक्षाखाली त्यांनी साधना केली त्या पवित्र दत्त पादुका ज्याला “विमल पादुका" असे म्हणतात. त्या औदुंबर वृक्षाखाली आहेत त्या मुळे भिल्लवडी या क्षेत्राचे नाव पुढे क्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध झाले. कृष्णा काठावरील अत्यंत पवित्र असे हे क्षेत्र आहे. या ठिकाणी कृष्णा नदीचा डोह असून त्यात मगरीचा वावर होता आता वर्दळ वाढल्याने त्या कमी झाल्या पण औदुंबर व अन्य वृक्षाची छाया या कृष्णेच्या पात्रात पडते एक शांत पवित्र व सिद्ध असे हे क्षेत्र आहे. अनुपम अनुभव आहे.

    ब्रह्मानंद स्वामी या नावाचे एक सिद्ध पुरूष इ.स. १८२६ च्या सुमारास गिरनार हून या ठिकाणी आले व नृसिंहसरस्वतीनी पावन केलेली ही तपोभूमी त्यानी साधने साठी निवडली. एक मठी उभी करून त्यानी तपसाधना केली व योग साधना केली. अखेरीस त्यानी आपली शेवटची यात्रा याच क्षेत्रात संपवून समाधी घेतली. ब्रह्मानंदस्वामी यांचे बरोबर “मेरूशास्त्री' या नावाचे एक विद्वान व्यक्ती होती. ते ब्रह्मानंद स्वामीचे शिष्य होते व त्यांच्या सहवासात होते. त्यानी हटयोग प्रदीपिका या योगशास्त्रावरील संस्कृत ग्रंथावर ज्योत्स्ना या नावाची टीका लिहली.

    ब्रह्मानंद स्वामीचे एक शिष्य सहजानंद स्वामी म्हणुन होते. त्यानी औदुंबर येथील प्रशस्त घाटाचे बांधकाम केले. प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यानी पण औदुंबरला भेट दिली होती.

    ब्रह्मानंद स्वामीच्या मठात पुढे श्रीनारायणानंद तीर्थ या नावाचे एक सतपुरूष वास्तव्याला होते. त्यांची खूप प्रसिध्दी होती व प. पु. टेंबे स्वामीनी त्यांचे दर्शन घेतले होते. त्यांची कृपा प्राप्त करुन घेतली होती. स्वामी नारायणानंद तीर्थ सेवा ट्रस्ट म्हणून एक संस्था कार्यरत आहे.

    गुरुचरित्रातील १७ वे आध्यायात आलेली कथा प्रसिद्ध आहे. कोल्हापुरातील एका विज्ञान विप्राचा पुत्र मूढ होता त्याने उपवास करून आपली जिव्हा भुवनेश्वरी देवीच्या चरणी वाहिली. मातेने त्याला नृसिंह सरस्वतीच्या कडे पाठविले. नृसिंहसरस्वतीनी त्याला जिव्हा परत करून वेदविद असा विद्वान ब्राह्मण होशील असा आशिर्वाद दिला. ते हे क्षेत्र औदुंबर आहे. स्थान माहात्म्य म्हणुन गुरु चरित्रात ही कथा सविस्तर पणे आली आहे. दत्तात्रेयाचा हा अवतार नृसिंहसरस्वती म्हणून कारंजा, नृसिंह वाडी व गाणगापूर या ठिकाणी असला तरी त्याचे प्रीय स्थान म्हणून क्षेत्र औदुंबर आहे व त्यांचा नित्य वास या ठिकाणी असतो. त्या मुळे मंदीर परीसरातील ओवऱ्या मध्ये गुरुचरित्राची पारायणे करण्यासाठी दत्तभक्तांची मांदीयाळी असते.

    दत्तपादुकावर चंदन लेपन करणे हे औदुंबर क्षेत्रातील दत्त पादुकांचे विशेष असे स्वरूप आहे. शिवाय चैत्र महीन्यात कृष्णाबाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंहसरस्वती जन्मोत्सव दत्त जयंती असे अनेक कार्यक्रम असतात. नित्य आरती पूजा अन्नदान या गोष्टी असतात.

    संत जनार्दन स्वामी व संत एकनाथ याना या ठिकाणी दत्त दर्शन झाले होते. याच ठिकाणी नृसिंह सरस्वतीनी औदुंबर वृक्षाचा महीमा सांगितला होता. माझा नित्य वास या वृक्षामध्ये आहे. या वृक्षाची नित्य पूजा व वृक्षाखाली गुरु चरित्र पारायण करेल अशा भक्ताला निश्चीत पणे अनुभूती येईल व शतगुणानी फल प्राप्त होईल.

    अशा या औंदुंबर क्षेत्रात चारमहीने राहून नृसिंह सरस्वती वारणासंगम या ठिकाणी आले सांगली जवळ हरीपूर या ठिकाणी वारणा तथा वारूणी नदी व कृष्णा नदीचा संगम आहे संगमेश्वर महादेवाचे स्थान व अश्वत्य वृक्ष आहे. काही काळ वास्तव्य करू नृसिंहसरस्वती पुढे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे गेले. भुवनेश्वरी व दत्तात्रेय यांचे पवित्र व सिद्ध असे हे स्थान तपोभूमी म्हणजे क्षेत्र औदुंबर होय.

    कृष्णानदीच्या पात्रात पवित्र तीर्थे आहेत. प्रत्यक्ष भुवनेश्वरी माता तसेच अनेक सिध्दानी या ठिकाणी वास्तव्य करून तीर्थ क्षेत्रे निर्माण केली आहेत. दुधामधाचा हा प्रदेश आहे या परिसरात ताकारी, दुधारी, दह्यारी अशी गावे आहेत गोधन व कृष्णा नदीचे पवित्र जल असा हा प्रदेश म्हणजे औदुंबर क्षेत्र होय. औदुंबर वृक्ष वन म्हणवे इतकी औदुंबराची झाडे या ठिकाणी आहेत.

    -- श्री गणेश हरी कुलकर्णी, (डोंबिवली)

    साभार - गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १० वा, (अंक ३४)

  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय बारावा – भक्तियोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी भक्तियोग नावाचा बारावा अध्याय….