वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतात सहा ऋतू दिसून येतात. त्या प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्याला साधक व बाधक असे वातावरण असते. त्याचा परिणाम वा दुष्परिणाम एक, दोन किंवा अनेक अवयवांवर होत असतो; परंतु ऋतूप्रमाणे आहार-विहार केल्यास व त्या त्या ऋतूतील त्रासदायक गोष्टी टाळल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. काही ऋतूंच्या आगमनाचे बदल हे महिन्यांप्रमाणे राहिलेले नाहीत; पण ऋतूंची विशिष्ट अशी लक्षणे आहेत. ती लक्षणे समजावून घेता येऊ शकतात. त्याप्रमाणे आपल्या आहारात-विहारात बदल केल्यास, ते अधिक लाभदायक ठरेल
पुष्पमंडितवर्षा ऋतू
मराठी महिने श्रावण - भाद्रपद
जुलै - ऑगस्ट
आहार मधुर, आम्ल-लवण रसाचे स्निग्ध पदार्थ, पचायला हलके उष्ण पदार्थ घ्यावेत. भूक कमी असल्याने एक वेळा जेवावे. या ऋतूत अपचनामुळे विविध व्याधी संभवतात.
पालेभाज्या व फळभाज्या पडवळ, भेंडी वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलके, दोडके, कारले, सुरण यांचा उपयोग करावा.
धान्य, उसळी मूग, गहू, ज्वारी, कडवे वाल, जुने वाल, तांदूळ, राजगिरा वापरावे. लसूण, कांदा, आले, दूध, तूप, कोथिंबीर, पुदिना, हिंग यांचा वापर जास्त करावा. कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे, बीट हे वापरावे.
बलवर्धक आहार या ऋतूत अग्नी वाढवून नंतरच दूध, तूप यांनी युक्त विविध प्रकारच्या खिरी खाव्यात. बेसनलाडू, टोमॅटोचे सूप, विविध भाज्यांचे सूप, उकडीचे मोदक, आवळ्याचा-कैरीचा मोरंबा यांचा उपयोग करावा.
वर्ज्य पालक, कोबी सर्व पालेभाज्या, चणे, मटार, बटाटे, काकडी, आंबा, खव्याचे पदार्थ, सरबते, मका अधिक तळलेले पदार्थ, सुके मासे, थंड पाणी टाळावे. उपवासासाठी शेंगदाणे, भगर अत्यंत कमी प्रमाणात वापरावे. अळूची भाजी व सातूचे पीठ खाऊ नये.
पाणी पाणी दूषित असल्याकारणाने उकळूनच प्यावे. 1 चमचा मध व त्यानंतर पाणी असे या ऋतूत सर्वांनी घ्यावे. शरीरातील पाणी आजारामुळे कमी झाल्यास लिंबू सरबत गरम पाण्यातून वारंवार घ्यावे.
पाचक पेय या ऋतूत शरीरातील शक्ती तरतरी व भूक उत्तम ठेवण्यासाठी पाचक पेयाचा प्रयोग करावा.
व्यायाम स्थूल व मेदरोग असलेल्यांनी घरी नियमित 20 / 30 मिनिटे बैठका इ. सारखा व्यायाम करावा, व्यायामानंतर मध व पावसाचे पाणी (साठविलेले असल्यास) घ्यावे.
रात्रीचर्या ऋतूमध्ये बल कमी असते व शुक्रक्षय झाल्यास अधिक अशक्तपणा येतो; परंतु ब्रह्मचर्य आजच्या युगात पाळणे कठीण असल्याने व समागमाने मन प्रसन्न होत असल्याने, या सुखोत्पादक प्रवृत्तीसाठी आपल्या शक्तीनुसार वाताचा प्रकोप होणार नाही, असे बघून समागम करावा.
स्वास्थ्यकारक औषधे ऋतूतील अपचनाचा त्रास टाळण्यासाठी वर्णन केलेले पाचक पेय घ्यावे. तापाच्या प्रतिबंधासाठी पारिजातकाची पाने काढ्यात टाकावीत. आमपाचकवटी भास्करलवण चूर्ण, लघुसूतशेखर यांचा प्रयोग पोटाच्या विकारांसाठी करावा. लघुमालिनी वसंत गर्भिणीने घ्यावी.
पंचकर्म ज्यांचे जीवन धकाधकीचे, सतत फिरतीचे, अवेळी खाण्याचे असे आहे, त्यांनी तूप, तेल, दूध यांपैकी कोणतीही बस्ती अवश्या घ्यावी. बस्तीपूर्वी सर्वांगाला औषधी तेलाचे स्नेहन व औषधीयुक्त काढ्याची वाफ घ्यावी. बस्ती घेतल्यास वर्षभर वातविकार टाळता येतात. तसेच वजन वाढविणे, वजन कमी करणे, मणक्यां ना व सांध्यांना निरोगी करणे, शरीरातील वातनाड्या उत्तम ठेवणे ही कार्ये होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- वैद्य विक्रांत जाधव /सा.सकाळ
ज्या लोकांची पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे पोट साफ नियमित कशी करावी.
सकाळी उठताच सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू आणि शेंदी मीठ मिसळून प्यावे. त्यामुळे बाउल मुव्हमेंट नियमित ठेवण्यास मदत होईल.
तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यायला हवे. तसेच ज्या फळांमध्ये गर असतो, त्यांचे थेट सेवन करा.
भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करा.
१०० मि.लि. पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकळा आणि भोजन करण्याच्या एक तास आधी ते पाणी प्या. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खा.
भोजनानंतर गूळही खा. त्यामुळेही पचन व्यवस्थित होते.
दररोज सॅलडचे सेवन करायला हवे. त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असावा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हवे.
दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे; जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनाचेही प्रमाण वाढवा.
तंतूमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यासदेखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
आवळा ह्याला आयुर्वेदा मध्ये आमलकी किंवा धात्री असे म्हणतात.धात्री अर्थात आई किंवा माता जी आपल्या अपत्यांचे भरण पोषण करते.आणी आयुर्वेदामध्ये आवळ्याला देखील असेच महत्त्व आहे कारण हा आवळा आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी व आपले पोषण वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यास करतो ह्यात वाद नाही.
आयुर्वेदामध्ये आवळ्याला रसायन औषधी असे देखील म्हटले जाते.कारण रसायन औषधी ह्या आपल्या शरीरातील सात ही धातुंचे योग्यप्रकारे निर्माण व पोषण करणारे औषध म्हणजे रसायन.ह्या औषधाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच रसायन औषध नित्य सेवन केल्याने शरीर लवकर वृध्द होत नाही अर्थात आपण ती च्यवनप्राशची ॲड पाहिली असेल ना ६० साल के बुढे या ६० साल के जवान त्यात तो वृद्ध च्यवनप्राश खाऊन कसा पटापट जीने चढतो तर एक तरूण व्यक्ती अगदी जीने चढताना अगदी दमून जातो.हेच दाखवते कि च्यवनप्राश हे रसायन औषध सेवन केल्याने म्हातारपण लांब रहाते आपल्या पासून.कारण च्यवनप्राश मध्ये देखील प्रमुख घटक हा आवळाच असतो.
आवळ्यामध्ये विटामीन सी अर्थात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.तसेच हा आवळा आपण नियमीत पणे आपल्या दैनंदिन जीवनात सेवन केल्यास तो आपल्या आरोग्याचे रक्षण हमखास व अगदी उत्तमरित्या करतो.
आपण नेहमी आवळ्याचे लोणचे करतोच.तसेच आवळ्याच्या कॅंण्डी देखील आता मिळतात अर्थात हा साखरेच्या पाकात शिजवलेले आवळे होय.तसेच आवळ्याचा च्यवनप्राश,आवळ्याचा रस,आवळ्याचे सरबत,आवळा चुर्ण,आवळ्याचा मुरंबा,आवळ्याचा पाक,आवळा सुपारी अशा नानाविध रूपांमध्ये तो बाजारात उपलब्ध आहे.त्यातील आपल्याला सोयीस्कर रूपांमध्ये त्याचे सेवन आपण करावे.
आवळा हा त्वचेची काळजी घेतो,रक्ताची शुद्धी करतो,श्वसन संस्थेचे आरोग्य राखतो,पचनसंस्थेचे आरोग्य नीट ठेवतो,प्रजनन संस्था देखील सांभाळतो,हाडांची काळजी घेतो असा वेगवेगळ्या पातळींवर एकटा खिंड लढविणारा हा आवळा काही खास औषधींपैकी एक आहे. ह्याच्या बद्दल लिहावे तेवढे थोडे आहे.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.
माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.
आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.
नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.
नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.
तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!
चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:
शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.
नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
वजन कमी करण्याठी योग हा सर्वात महत्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो. या आसनं मुळे नेहमीच वजन कमी करण्यात मदत होत असते. ही आसने करताना योगशिक्षकांची मार्गदर्शन घेऊनच करावीत.
वक्रासन
पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळच उभे करा व दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवा. दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याच्या व उजवा हात उजव्या खांद्याखाली सरकवा. श्वाचस घेत घेत हळुवार खांदे वर उचला. मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कंबर वर उचला. श्व सन संथ चालू ठेवा.
फायदे
आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो. त्यामुळे पाठीचा कणाही नेहमी पुढच्या दिशेने अधिकाधिक वाकविला जातो. त्याच्या अगदी नेमकी उलट अवस्था या आसनात होते. त्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढायला या आसनाचा निश्चिलत उपयोग होतो. पोटाचे, मांड्यांचे, पोटर्यां चे स्नायू कार्यक्षम होतात.
दक्षता
पाठीच्या कण्याचे विकार असणार्याक रुग्णांनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करू नये.
भुजंगासान
जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा. दोन्ही पाय जुळवून घ्यावेत, तुमची दोन्ही पाउले आणि टाचा एकमेकाला हळूवारपणे स्पर्श होतील याची खात्री करून घ्या. हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताची कोपरं शरीराला लागून व समांतर असावेत. एक दिर्घ श्वास घेऊन हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्यात. आता, हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा. लक्षात ठेवा: तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखेच वजन असू द्यात पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सजग राहून श्वास घेत राहा. जास्तीतजास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. आता डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा.
लक्षात ठेवा: तुमचे कान तुमच्या खांद्यांपासून दूर आहेत का? खांद्यांना आराम द्या. हाताची कोपरं थोडे वाकवले तरी चालतील. सरावाने तुम्हाला कोपरं सरळ ठेऊन आसनस्थिती सुधारता येईल.
तुमचे पाय अजूनही जुळलेले आहेत ना याची खात्री करा. चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत श्वास घेत राहा. आसनस्थितीत प्रमाणाबाहेर जास्त वेळ राहू नका व सहन होईल एवढाच ताण द्या.
श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.
फायदा:- खांदा व मानेला मोकळे करते. पोट पुष्ट करते. संपूर्ण पाठ व खांदे सशक्त बनवते. पाठीच्या मधल्या व वरील भागांना लवचिक बनवते. छाती विस्तारते. रक्ताभिसरण सुधारते. थकवा व तणाव कमी करते. श्वसनमार्गाचे विकार जसे दमा असलेल्या लोकांना फारच उपयुक्त. (परंतू खोकल्याची उबळ आली असता हे आसन करू नये).
भुजंगासन केंव्हा करू नये
गरोदरपणात, छातीचे अथवा मनगटाचे हाड मोडल्यास, किंवा नुकतीच एखादी पोटाची शस्त्रक्रिया, जशी हर्निया, झाली असल्यास हे आसन करू नये. तुम्हाला कार्पेल टनेल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर भुजंगासन करू नका. जुन्या आजारात किंवा पाठीच्या कण्याच्या विकारात हे आसन फक्त योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
धनुरासन
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात.
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात. पाठीला किंवा कण्याला गंभीर विकार झाले असतील तर हे आसन करू नये. अल्सर, कोलायटीससारखे पोटांचे विकार असलेल्यांनी हे आसन टाळावं. छातीवर झोपावं. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत आणि सहा ते सात इंच एकमेकांपासून दूर करावेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोटयाजवळ पकडावं. आता श्वास घ्यावा आणि हातांनी पाय व पायांनी हात ओढून वर उचला. संपूर्ण शरीर वर उचला आणि ताणलं जाऊ द्या.
पाय वर उचलताना पोटऱ्या मांडयापासून लांब नेण्याचा प्रयत्न करा. शरीराची आकृती ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत किमान १० ते ३० सेकंद राहा. श्वास संथगतीने सुरू राहू द्या.
या स्थितीत असताना हाताची पकड जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच शरीराचा सगळा भार पोटावर येईल. पूर्वावस्थेत येताना, श्वास सोडत सोडत, गुडघे, खांदे, हनुवटी हळूहळू जमिनीवर टेकवा. गुडघ्यात पाय हळूहळू सरळ करा, गुडघे सरळ केल्यावर पूर्वस्थितीला या. थोडया वेळ शरीर शिथिल करा.
फायदा:- या आसनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. तसंच पाठीचा वक्रदोष नष्ट होतो. कमरेची आणि मानेची दुखणी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. तसंच पाठीचा मणका विशेषत: कुठल्याही दिनचर्येच्या कामात धनुष्याप्रमाणे असा ताणला जात नाही, तो या आसनामुळे ताणला जातो. म्हणून मणक्याची गादी सरकणं, मणके झिजणं आणि कमरेचे स्नायू जखडणं या व्याधींवर अत्यंत लाभदायी म्हणजे हा आसन प्रकार आहे.
पश्चिमोत्तानासन
पश्चिम या शब्दाचा अर्थ पाठीकडची बाजू असाही होतो. या आसनात पायाच्या घोट्यापासून मस्तकापर्यंतचा पाठीचा भाग ताणला जातो. म्हणून याला ‘पश्चिमोत्तानासन’ असं सार्थ नाव दिलेलं आहे.
सपाट जमिनीवर पाय पसरून बसावं. पायाचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडून ठेवावेत. मान सरळ आणि समोर असावी. कमरेत वाकून हात पावलांकडे न्यावेत. दोन्ही हातांच्या तर्जनींना हुकाप्रमाणे आकार द्यावा व त्या त्या बाजूकडील पायांचे अंगठे अडकवावे.
कमरेपासून वरचे शरीर व हात ढिले करावेत. म्हणजे शरीर पुढे व खाली झुकू शकेल. कोप-यामध्ये हात वाकू लागतील. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. मात्र डोकं गुडघ्याला टेकवू नये किंवा पायदेखील वर करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे झुकावे. संथ श्वास चालू ठेवावा.
थोडा वेळ याच स्थितीत बसावं. हळूहळू हाताची पकड सोडत पूर्वस्थितीत यावं.
फायदे
शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात. पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात. खुरटलेली उंची वाढवण्यास या आसनाचा उपयोग होतो.
पोटावर, विशेषत: ओटीपोटावर घनदाब निर्माण झाल्याने तेथील मेद कमी होतो. तरुण वयात निर्माण होणारे वीर्यदोष व तरुण स्त्रियांना जाणवणारा मासिक पाळीच्या अतिरिक्त स्त्रावाचा त्रास या आसनाच्या सरावानं नाहीसा होतो. सायटिका, पाठीची व कमरेची इतर दुखणी या आसनाच्या योग्य व नित्य अभ्यासाने दूर होतात. पचनक्षमता सुधारते.
चक्कीभ चलनासन
योगचं हे आसन पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते. पहिल्यांदा जमीनवर तुम्ही आरामत बसा, या दरम्यान तुमचे पाय सरळ पसरवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून असले पाहिजेत, याचं भान ठेवा आणि गुडघ्यांना न वाकवता गोलाकार आकारात फिरवा. दहा वेळेस या आसनाला घड्याळ्याच्या दिशेने फिरवा आणि काही वेळाने घड्याळ्याच्या विरूद्ध दिशेने फिरवा, आणि नंतर सोडून द्या.'
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 4
ज्या पाण्याला गती नाही, त्या पाण्यावर शेवाळ धरते. बुळबुळीतपणा वाढतो. साठण्याची प्रक्रिया वाढली कि, कुजण्याची क्रिया सुरू होते. कुजणे म्हणजे बुडबुडे येणे. असे आपोआप बुडबुडे येणारे पाणी पचायला जड असते. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे जंतुनिर्मिती. जंतु पाण्याशिवाय वाढू शकतच नाहीत.
म्हणजेच जिथे जंतु असतात, तिथे फरमेंटेशन सुरू असते. जिथे फरमेंटेशन असते तिथे पाणी असते. जे पाणी स्थिर असते तिथे जंतुसंसर्ग आणि फरमेंटेशन सुरू होते. म्हणजेच स्थिर असलेले पाणी पिऊ नये. स्थिर पाण्यात शेवाळ धरते असे म्हणतात. प्रत्यक्षात तसेच दिसते. समुद्राच्या किंवा नदी, धबधब्याच्या हलणाऱ्या पाण्यात शेवाळ धरत नाही. पण तलावाच्या काठाला शेवाळ आढळते.
फेस आलेले पाणी पिऊ नये असेही ग्रंथकार म्हणतात. शुद्ध पाण्यात फेस येत नाही. याचा अर्थ ज्या पाण्यात फेस किंवा बुडबुडे दिसतात त्या पाण्यात काहीतरी अशुद्ध द्रव्य नक्कीच मिसळली गेली असणार. म्हणून हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.
पाणी तापवून प्यावे. एकदाच तापवावे. वारंवार तेच पाणी गरम करू नये. अतिथंड पाणी देखील पिऊ नये. हे ग्रंथकर्ते सांगताहेत, त्या काळात फ्रिजपण नव्हते आणि कोल्ड्रींक्सही नव्हती.
कार्बन डाय ऑक्साईड सारखे विषारी वायु, जे आपण उच्छ्वासावाटे बाहेर सोडतो, जे शरीरात राहिले तर शरीराचे नक्की नुकसान होणार असते असे आजचे विज्ञान पण सांगते, ते कार्बोनेटेड वाॅटर आपण गरज म्हणून पितोय कि गंमत म्हणून ????
शास्त्रकार द्रष्टे होते, त्यांना माहिती होते, आमची पुढची अतिबुद्धिमान पिढी पाण्याबरोबर जीवघेणे खेळ खेळत आपले आयुष्य पणाला लावू पहात आहे.........
निदान त्यांच्या पुढील पिढीच्या सुरक्षित आरोग्यासाठी तरी चार ओळी खरडून ठेवाव्यात, म्हणून जस्ट टाईमपास म्हणून लिहिले असावे कदाचित. एकतर त्यांच्या दौतीतली शाई संपत नसावी, किंवा बोरूच्या टोकाला, केवळ धार काढावी म्हणून बहुतेक लिहून ठेवण्याचे कर्म त्यांना सुचले असणार !
ही कोल्ड्रींक्स हे विष आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले असताना, त्यात बुडबुडे दिसताना, त्यांच्या पिण्यामुळे दात, हिरड्या, जीभ यांना झिणझिण्या येत असताना, पिल्यानंतर जीवघेणी ढेकर येत असताना, आपल्याला त्याची गरज नसताना, हे फेसयुक्त अतिथंड पाणी प्यायची काय हौस आहे, काही कळत नाही.
विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरं काय ?
शास्त्रकारांनी याच श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे,
फेनिलं, जन्तुम्, अतप्तम्, दन्त अग्राह्यम्, अति शैत्यतः न पिबेत् !
पण लक्षात कुणी घ्यायचे ?
शास्त्रावर विश्वास नाही, शास्त्रकारांवर विश्वास नाही.
आधुनिक विज्ञान सांगते तेही व्यवहार्य वाटत नाही.
अंगवळणी पडले आहे, एवढे सवयीचे गुलाम झालो आहोत ?
एवढं माहित असून पिणार असाल तर प्या. आणि भोगा आपल्या कर्माची फळे !
दुसरं काय म्हणणार ना ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
23.12.2016
कोकमाची झाडे आपल्याला कोकण गोवा प्रांतामध्ये पुष्कळ पाहायला मिळतात.असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये कि कोकमा शिवाय कोकणी व गोयंकार माणसाचा स्वयंपाक पुर्ण होऊ शकत नाही.
कोकमाची फळे हि सुकवून त्याची सोले स्वयंपाक व औषधात वापरतात.आमटी,काही भाज्या,तिवळ,नारळाचा रस घालून केलेली सोल कढी,आगळ,कोकम सरबत इ अनेक प्रकारे आपण कोकमाचा वापर करतो.
ह्याचा सदाहरीत,पातळ नाजूक फांद्या असलेला वृक्ष असतो.ह्याची पाने आयताकार अथवा भालाकार असतात वरून गडद हिरवी व खालून फिकट रंगांची असतात.फळ गोलाकार १-१/२ इंच व्यासाचे असते.फळाच्या आत ५-८ मोठ्या बिया असतात.
कोकम चवीला कच्चा असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड लागतो हा उष्ण असून कफवातनाशक अाहे.
आता ह्याचे घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)कोरड्या उल्ट्या,तोंड कडू होणे,तोंडास चव नसणे ह्यात ७-८ आमसुलाचा एका वाडग्यात पाणी घालून भिजत घालावी व कुचकरून ते पाणी गाळावे व त्यात १ चमचा खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे.
२)अंगावर पित्त उठत असल्यास अंगाला कोकमाचे पाणी लावावे व पोटात देखील हे पाणी प्यावे.
३)कोकमाच्या बियांपासून काढलेले मेण हे पायांच्या भेगा भरून काढायला उपयोगी आहे.
४)करपट ढेकर येणे,भुक न लागणे,जेवण न पचणे,पाणी सुद्धा प्यावेसे न वाटणे ह्यात कोकमाचे पाणी काळीमिरी व मीठ घालून जेवणानंतर प्यावे त्याने पचन सुधारते.
५)ज्यांना मुळव्याध,अम्लपित्त,भगंदराचा त्रास आहे व त्यांना जेवणामध्ये चिंच वापरतां येत नाही त्यांनी कोकम वापरावा.
६)कोकमाच्या तेलाचा उपयोग जखमभरून काढायला केला जातो.
कोकम खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
झाडांच्या बिया आपण नेहमीच पाहतो. पण त्यांतील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. त्यांत बंदिस्त असलेल्या सांकेतिक आनुवंशिक आज्ञावल्या निसर्गाला वाचता येतात.
अमेरिकेतला कायोटी हा एक रानटी कुत्र्याच्या जातकुळीतला प्राणी आहे. त्याला प्रेअरी वुल्फ असे देखील नांव आहे. अफ्रिकेतले वाईल्ड डॉग्ज (जंगली कुत्रे) किंवा पूर्वी आपल्या महाराष्ट्रात आढळणारे कोळ्सुंदे, हे अशाच रानटी कुत्र्याच्या जातकुळीतले प्राणी. कायोटी हा उत्तर आणि मध्य अमेरिकेत सर्वत्र आढळतो. ग्रे वुल्फ हा युरोपीयन – रशियन वंशाचा आहे; तर कायोटी हा पूर्णपणे अमेरिकेतच उगम पावलेला आहे. यांच्या बर्याच जाती – उपजाती आहेत. डोंगराळ भागातले कायोटी अंगाने थोडे मोठे आणि करडॆ असतात तर रुक्ष माळरानावरचे कायोटी अधिक मातकट, पिवळसर रंगाचे असतात.
कायोटी सहसा जोड्यांनी फिरताना आढळतात. परंतु त्यांचे छोटे कळप मात्र पाच-सहा जणांचे मिळून झालेले असतात. त्यांना बीळं करून त्यात रहायला आवडत. यांचा शक्यतो रात्री संचार असतो, पण क्वचित दिवसादेखील दर्शन देतात. आम्ही पेनसिल्व्हेनियाला असताना आमच्या यू.एस रूट ६ चा मार्ग म्हणजे सारा झाडी झुडपांनी भरलेला टेकड्यांचा प्रदेश. एकदा संध्याकाळी ७-७॥ वाजता लॅबमधून घरी परत येत असताना त्या सामसूम रस्त्यावर अचानक रस्त्याच्या एका बाजूच्या झाडीतून कायोटीची एक जोडी बाहेर आली आणि झपझप चालत रस्ता ओलांडून दुसर्या बाजूला नाहीशी झाली. मी गाडी थांबवून आसपास बघायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा काही पत्ता लागला नाही.
कायोटीचे मोठे प्रतिस्पर्धी म्हणजे लांडगे. जिथे लांडग्यांचं प्रमाण कमी होतं तिथे कायोटींची संख्या वाढते. अर्थात लांडग्यांपेक्षा कायोटी हे मनुष्यवस्तीच्या अधिक जवळ राहू शकतात. जानेवारी ते मार्च हा त्यांच्या मीलनाचा काळ असतो, आणि दोन महिन्या नंतर साधारणपणे पाच-सहा पिल्लं जन्मतात. कायोटींचं मुख्य खाद्य म्हणजे उंदीर, खारी, ससे, प्रेअरी डॉग्स (बीळात रहाणारे घुशीसारखे छोटे प्राणी) वगैरे. कधी कधी ते साप, सरडे, पक्षी किंवा हरणाची देखील शिकार करतात. थंडीच्या दिवसांत जेंव्हा भक्ष मिळणं कठीण असतं तेंव्हा कायोटींना फळं, पालेभाज्या, कंदमुळांवर देखील गुजराण करावी लागते. पश्चिमेकडच्या राज्यांमधे शेळ्या मेंढ्या, लहान वासरे यांच्यावर देखील त्यांचा डोळा असतो. त्यामुळे शेतकर्यांना, रॅंचर्सना डोळयात तेल घालून आपल्या जनावरांचं रक्षण करावं लागतं.
पूर्वी कायोटी फक्त पश्चिमेकडच्या राज्यांमधे आढळायचे. परंतु हळू हळू त्यांनी स्वत:ला मनुष्यवस्तीशी जुळवून घेतलं आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपासून त्यांचे क्षेत्र वाढतच चाललं आहे. पूर्वी लांडग्यांचं क्षेत्र सर्वदूर पसरलेलं होतं, परंतु जसजशी मनुष्यवस्ती वाढू लागली तसतसं लांडगे खोल जंगलात, डोंगरांत जाऊन दडू लागले आणि मनुष्यवस्तीच्या दबावापुढे त्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. याचा फायदा घेऊन कायोटींनी आपलं क्षेत्र वाढवत नेऊन सर्वत्र आपला कबजा करून टाकला. आता तर ते मनुष्यवस्तीच्या अधिकाधिक जवळ सरकू लागले आहेत. कधी कधी गावांतल्या कचर्याच्या पेट्यांजवळ त्यांचं दर्शन होऊ लागलं आहे. त्यांचं धारिष्ट्य एवढं वाढलं आहे की दूरच्या उपनगरांमधेच नव्हे तर मोठ मोठ्या शहरांमधे देखील ते आढळू लागले आहेत. एका अहवालानुसार शिकागो शहर आणि त्याच्या उपनगरांमधे मिळून सुमारे २००० कायोटी आहेत. वॉशिंग्टन डी.सी. आणि न्यूयॉर्क सारख्या प्रचंड शहरांमधे देखील कायोटींचे वास्तव्य आहे. दिवसा ते शहरांमधल्या मोठमोठ्या बागांमधे किंवा दाट झाडींच्या ठिकाणी लपून रहातात आणि रात्री भक्षाच्या शोधार्थ बाहेर पडतात. अशा मोठ्या शहरांमधे शक्यतो ते उंदरांसारख्या प्राण्यांवर, पाळीव कुत्र्या मांजरांवर तसेच रस्त्यावर मरून पडलेल्या प्राण्यांवर गुजराण करतात.
क्रमशः ....
-- डॉ. संजीव चौबळ
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 3
जसं काळोख्या जंगलातील पाणी निषिद्ध सांगितले आहे, तसेच आपल्या घरातील असा प्रदेश म्हणजे शीतकपाट. या फ्रीजमध्ये देखील असाच काळाकुट्ट काळोखच दडलेला असतो.
शीतकपाटामधे ना सूर्यप्रकाश, ना चंद्रकिरण ना वाऱ्याची झुळुक. हे कारण देखील ग्रंथकार देताहेत. अशा ठिकाणी असलेले अन्न पाणी घन आणि गुरू गुणाचे बनते, असे स्पष्टपणे सांगताहेत.
या ठिकाणचे अन्नपाणी, वात आणि कफ दोष वाढवणारे बनते. हे पाणी तात्काळ पित्तशमन करेलही, पण अग्निच्या विरोधी काम होईल, आणि थंड गुणांनी वातही वाढवेल. वाढलेला वात पुनः पित्ताला अन्य ठिकाणी जायला मदत करतो. एकंदरीत हे पाणी गडबड करणारेच ठरते. दाताला झिणझिण्या आणणे, हिरड्या शिणशिणणे, लालास्राव कमी करणे, संकोच घडून आल्याने चवही बदलून जाते. सर्वात महत्वाचे आम, क्लेद, चिकटपणा वाढवणारे असते.
आता करा यादी.
फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या,
दूधाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या,
पालेभाज्यांच्या जुड्या,
दोन चार दिवसाची मळून ठेवलेली कणिक,
पाकीटातील मांसाचे तुकडे,
आईस्क्रीमचे गोळे,
दह्याचे पातेले,
शिल्लक राहिलेली कोशिंबीर, सॅलेड,
डबाबंद रसगुल्ले, गुलाबजाम, श्रीखंड,
ज्युस, इ.इ. हे सर्व ....????
सूर्येंदुपवनम् अदृष्टम् न भक्षयेत.....
फ्रीजमधीलच नव्हे तर, जे जे अन्नपदार्थ, पाणी, सूर्येंदुपवनम् अदृष्टम असतील ते ते सर्व, या वैश्विक नियमानुसार निषिध्दच ना !
शेवटी ज्या अन्न पाण्यावर सूर्य, चंद्र, वारा यांचा स्पर्श नसेल, ते अन्न पाणी खाण्या पिण्यासाठी अयोग्यच ठरेल. मग ते निबाड जंगलातील एखाद्या तलावातील असूदेत, बोअरवेलचे असूदेत, किंवा टाकीत साठवलेले पाणी, रेन वाॅटर हारवेस्टींगच्या माध्यमातून गोळा करून घराच्या खाली तळघरातील टाकीचे असू दे. किंवा घरातील शीतघराचे ! !
असे साठलेले पाणी वात आणि कफ दोष वाढवणारे असल्यामुळे याच गुणाने निषिध्द ठरेल.
शास्त्रकारानी आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला आहे. शास्त्रकाराते वाट पुसतु असं माऊली पण म्हणतात. ज्या मार्गाने गेल्यावर, आपले भले होईल त्या मार्गाने जाणेच संयुक्तिक होईल ना !
आजची काळाची गरज,
हे असंच चालायचं,
काळानुसार बदलायला नको काय ?
आजचे विज्ञान, शोध मान्य करायचे नाही का ?
एकदा वैश्विक नियम पाळायचे ठरवले तर बाकी
या साऱ्या लंगड्या पळवाटा आहेत, असे वाटत नाही काय ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
Copyright © 2025 | Marathisrushti