वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.
दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना डॉक्टरांच्यामते जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
तोंडाच्या आजारांशी संबंधीत विशेषज्ज्ञ सोनाली बस्सींच्या मते गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.
जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वाग्भट सूत्र स्थान 5 मधे ग्रंथकार असे म्हणतात, आकाशातून थेट खाली येणारे पाणी हे सर्वोत्तम. याला गांगेय जल, ऐंद्र जल, अंतरीक्ष जल किंवा दिव्य जल असे म्हणतात.
जमिनीतून पण पाणी वर येते, जसे विहिरीतून येणारे. याला भूमीतून येते म्हणून भूमीज किंवा भौमजल म्हणतात.
या दोन्ही प्रकारच्या पाण्याला कोणतीही विशिष्ट चव नसते, रंग नसतो, वास नसतो, पण तरीही ते जीवनदान देणारे आहे, म्हणून त्याला जीवन म्हटले आहे.
बाह्यरूपावर एखाद्याचे गुणमुल्य ठरत नसते, त्याच्या उपयोगितेवर त्याची किंमत ठरत असते. हे आत्महत्या करू इच्छिणाऱ्या मंडळींनी जरा लक्षात घ्यावे. जर असे विचार येत असतील तर झरा, नदी, धबधबा, समुद्र, तलाव, कारंजा यांच्याजवळ जावे. काठावर शांत बसावे, पाण्याचे उडणारे तुषार अंगावर झेलावेत, मनसोक्त पाण्याशी खेळावे, आणि मनातली सारी जळमटं धुवुन टाकावीत.
"मी हा असा, मला काही जमत नाही, माझ्यात काहीही गुण नाहीत, माझी इथे आवश्यकता नाही, माझी कोणाला गरज नाही, माझ्यामुळे कोणाचेही काहीही अडत नाही, मग मी जगायचे तरी कशाला", असे नकारार्थी विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांनी या खळाळत वाहाणाऱ्या पाण्याकडे पहावे. पाणी असा विचार करतं का ? मी कशाला वाहायचे ? माझं पुढे काय होणार आहे. गटारातून समुद्रातच जाणार. तिथेही माझी वाफच होणार. ना मला रूप ना गंध, ना आकार. मग माझ्या जिंदगानीचा काय उपयोग होणार ?
पण हेच पाणी कोणत्याही अपेक्षाशिवाय वाहात असते. "ज्याला हवे असेल तो माझ्या काठावर येतो आणि अमृतकण घेऊन जातो, हेच माझं मोठेपण" असा सकारात्मक अहंकार बाळगून हे जल इतरांना तृप्त करण्यासाठी समुद्रात विलीन होऊन जाते.
मनाला प्रसन्न आणि शुद्ध करण्यासाठी देखील हे जीवन काम करते. जेव्हा प्रकुपित पित्तामुळे राग अनावर होतो, अंगाची आग होते, मनाचा तोल जातो, तेव्हा पाण्याचा एक घोट लगेचच शांतपणा आणतो. प्रवासाचा शीण आलेल्या पाहुण्यांचे पहिले स्वागत पाणी देऊनच केले जात असते. प्रवासाचा थकवा एक घोट पाण्याने लगेच निघून जातो ना !
घरात वारंवार होणाऱ्या भांडणात हे पाणी आग कमी करणारे ठरू शकते. बाहेरून दमूनभागूनचिडून आलेल्या पतीला अथवा पत्नीला, घरात आधी हजर असणाऱ्यांने, दारात पाऊल पडताक्षणी जर पाण्याचा एक ग्लास नेऊन हातात दिला तर ??? सारा थकवा, सारी दुःख, सारा राग, नाहीसा झाल्यासारखा वाटेल.
प्रत्येकाला, वेळेत घरी यावंस वाटेल, मला पाणी विचारणारं कोणीतरी माझी वाट बघतंय, ही भावनाच कौटुंबिक संबंध घट्ट करत असते.
म्हणूनच याला जीवन ऐसे नाव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.12.2016
आता शहाळ्याचे काही घरगुती उपाय पाहुयात:
१)जुलाब होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात १/४ कप संत्र्याचा रस ४ चमचे लिंबू रस व १/४ चमचा सैंधव घालून प्यावे हे मिश्रण ओ.आर.एस ची भूमिका बजावते.
२)लघ्वीला जळजळ होत असल्यास व लघ्वी कमी होत असल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे.
३)लहान मुलांना जंतांचा त्रास होऊन उल्टी होत असल्यास १/४ कप शहाळ्याचे पाणी+१/२ चमचा ओवा व १ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण पाजावे ह्याने वारंवार होणाऱ्या उल्ट्या थांबतात.
४)कर्करोगा सारख्या आजारात जेव्हा तीक्ष्ण औषधे दिली जातात तेव्हा शरीरातील विषार लघ्वी मधून बाहेर टाकण्यासाठी शहाळ्याचे पाणी उत्तम.
५)मानसिक श्रम अधिक होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात २ चमचे मध घालून ते मिश्रण संध्याकाळी घ्यावे.
६)१ कप शहाळ्याचे पाणी त्यात १/२ चमचा हळद व ४ चमचे चुन्याची निवळी घालून त्या मिश्रणाच्या घड्या भाजलेल्या त्वचेवर ठेवाव्या.
७)कोवळ्या शहाळेयाची मलई चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात व चेहऱ्याच्या मांसपेशींना बळ मिळते.
८)मोठी शस्त्रक्रिया होऊन जेव्हा प्रथमच आहार सुरू करतात तेव्हा रूग्णाला आधी शहाळ्याची मलई द्यावी.
९)पोटात जळजळ होऊन भुक लागते त्यावेळेस शहाळ्याची मलई खावी फायदा होतो.
१०)सर्दी होण्याची सवय नसल्यास लहान मुलांना शहाळ्याची मलई पातळ करून भरवावी ती शक्तीर्धक असते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
चिंचेचा उपयोग आपल्या स्वयंपाकात बऱ्याच प्रमाणामध्ये केलजातो.आमटी,भाजी,चटणी,
पाक,सरबते,तसेच आता तर इमली जेली देखील मिळू लागली आहे.चाट चे पदार्थ तर चिंच खजुर चटणी शिवाय कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
अगदी बाई गरोदर असेल तर तिला देखील चिंचा खाव्याशा वाटतात का विचारले जाते.
चिंचेचा मोठा वृक्ष असतो साधारण पणे आवळ्याच्या पानां प्रमाणे बारीक पाने असतात.तसेच त्याला लागलेली कच्ची चिंच हिरवी मातकट रंगांची टणक असते व पिकल्यावर ती पुर्ण मातकट रंगांची होते व आतील बी टणक व त्यावर कठीण आवरण असणारी होते.
कच्ची चिंच आंबट,उष्ण,पित्त,रक्त,कफ दुषित करणारी असून वातनाशक आहे.
पिकलेली चिंच आंबट,गोड,उष्ण,वात,कफनाशक व पित्तकर आहे.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:
१)तोंडास घाण वास येणे,जीभेवर साका जमणे,तोंडास चव नसणे ह्यात जेवणा सह कच्ची चिंच व सैंधव घालून केलेला ठेचा खावा.
२)अजीर्ण होऊन मळमळ होणे,उल्टी होणे ह्यात पिकलेली चिंच सैंधव लावून तोंडात धरून चघळावी.
३)लघ्वीची जळजळ,पोटात वात धरणे ह्यात २ चमचे चिंचेचा कोळ+१ चमचा मध+१चमचा साखर हे मिश्रण घ्यावे.
४)किटक चावलेल्या ठिकाणी चिंचोका भाजून अग्र नुसता उगाळून दंश भागी लावावा.
५)१ कि चिंच २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावी व सकाळी कोळून गाळून त्यात २ किलो साखर घालावी व पाक करावा.हे तयार सरबत ४ चमचे १ ग्लास पाण्यात मिसळून रात्री घेतल्यास बद्धकोष्ठाचा त्रास कमी होते.
चिंच अतिमात्रेत खाल्ल्यास अम्लपित्त होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती, तसेच कडूपित्तावर अत्यंत गुणकारी औषधे आहेत. ‘व्यक्ती तितक्याथ प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येकामध्ये ऍसिडिटीची वेगळी लक्षणे आढळतात. काहींना ऍसिडिटीमुळे पोटात जळजळते तर काहींना छातीत जळजळते. काही व्यक्तींना मळमळते, उलटी होते तर काहींना उलट्या कधीच होत नाहीत, नुसतेच मळमळते. काही व्यक्तींची ऍसिडिटी काहीतरी खाल्ल्यावर कमी होत, तर काहींना उपाशीपोटी बरे वाटते. ऍसिडिटीमुळे काही व्यक्तींची मान दुखू लागते, पित्त डोक्या त चढत आहे असे वाटते. काहींना आंबट घशाशी येते तर काहींना कडू पित्त होते. पित्त झाल्यावर काही व्यक्तींच्या पोटात बारीक दुखते तर काहींना अगदी आग पडल्यासारखी वाटते. काही रुग्णांमध्ये ऍसिडिटीमुळे गरगरते, चक्कर आल्यासारखी वाटते. पित्त वाढल्यामुळे काही व्यक्तींचे डोके जड झाल्यासारखे वाटते, दुखते तर काहींना खूप ढेकरा येतात. अतिविचार, अतिकाळजी करणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताचा त्रास वरचेवर होतो. या प्रत्येक लक्षणासाठी विशिष्ट, वेगळे औषध होमिओपॅथीत उपलब्ध आहे. होमिओपॅथिक औषधे ही चवीला गोड व घ्यायला अत्यंत सोपी असतात. ही औषधे उपाशीपोटी घेतली तरी चालतात. या औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट स होत नाहीत.ऍसिडिटी हा असा विकार आहे, की त्याला नुसते वरवरचे उपाय करून ते बरा होत नाही, मुळापासून त्यावर उपाय करावे लागतात. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन करणे हे होमिओपॅथिक औषधांचे वैशिष्ट्य असल्यामुळे होमिओपॅथीमुळे ऍसिडिटी पूर्णपणे बरी होऊ शकते. सततच्या ऍसिडिटी मुळे आतड्याला जखम होऊन ‘अल्सर’ होऊ शकतो. अल्सरकडेही दुर्लक्ष केले तर पोटदुखी होऊन तो आतल्या आत फुटून सेप्टीक होऊ शकते. त्यामुळे साध्या वाटणाऱ्या ऍसिडिटीकडे वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार करून घेणे हे केव्हाही हिताचे असते.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
अमेरिकेतल्या अस्वलांमधे ग्रीझली बेअर्स आणि ब्लॅक बेअर्स हे दोन प्रकार. ग्रीझली अस्वलं कॅनडामधे आणि अमेरिकेच्या वायव्येकडच्या राज्यांमधे प्रामुख्याने आढळतात. कॅनडा आणि अमेरिकेमधली सीमा रेषा ही उघडीच असल्यामुळे या सीमेलगतच्या भागात ग्रीझलीज मोकळेपणाने दोन्ही देशांमधे ये जा करत असतात. एकंदर ग्रीझलीजची संख्या सुमारे ६०,००० असावी असा अंदाज आहे. त्यांतील बहुतेक कॅनडातच आहेत तर अमेरिकेच्या वायोमींग, मॉंटेना, आयडॅहो, वॉशिंग्टन या राज्यांमधे मिळून १५०० ग्रीझलीज असावेत.
काळ्या अस्वलांच्या मानाने ग्रीझलीज आकारमानाने खूपच मोठे असतात. ४००-५०० किलो वजनाच्या या ग्रीझलीजना काळ्या अस्वलांप्रमाणे सराईतपणे झाडावर झरझर चढता येत नाही. अशा प्रकारे पलायनाचा मार्ग खुंटल्यामुळे संकटाची थोडीशी जरी शंका आली तरी ग्रीझलीज आक्रमक बनतात. विशेषत: लहान बच्चे बरोबर असले तर मादी फारच आक्रमक बनते. ग्रीझलीजच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणार्या लोकांपैकी सुमारे ६०% मृत्यू हे अशा चवताळलेल्या माद्यांमुळे होतात. ग्रीझलीज शक्यतो माणसांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. ग्रीझलीजच्या परिसरात कॅंपींग करण्यासाठी जाणार्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते. ग्रीझलीजचे घ्राणेंद्रीय फारच तीक्ष्ण असते, आणि कॅंपच्या जवळपास निष्काळजीपणाने टाकलेलं खाद्य किंवा डबे म्हणजे संकटाला निमंत्रणच ! एकदा का ते कॅंप्सच्या जवळ यायला चटावले की ते धीट बनतात आणि माणसावर हल्ले करायला मागे पुढे पहात नाहीत. बर्याचदा अशा ग्रीझलीजना गोळी घालून ठार मारण्याशिवाय पार्क रेंजर्सपुढे काही उपाय रहात नाही. त्यामुळे अशा कॅंपसमधे दोन झाडांच्यामधे उंचावर एक दोरी लावून त्यात शिंकाळ्यासारखं खाद्य बांधून ठेवण्याची पद्धत असते.
शक्यतो काळी अस्वलं, ग्रीझलीजच्या प्रदेशात फिरकत नाहीत परंतु पाईन नट्स, एकॉर्नस, बेरीज असा काही शाकाहारी आहार दोघांच्याही आवडीचा असल्यामुळे, त्याच्या शोधार्थ ग्रीझलीज कधी कधी काळ्या अस्वलांच्या प्रदेशात प्रवेश करतात. कधी ग्रीझलीज आणि काळ्या अस्वलांची आमने सामने गाठ पडलीच तर ग्रीझलीजच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमतेमुळे, काळी अस्वलं घाबरून पळ काढतात. वायोमींग राज्यातल्या यलोस्टोन नॅशनल पार्क या जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानामधे ग्रीझलीज आणि लांडगे ह्या कट्टर शत्रूंची अनेकदा एकमेकांशी गाठ पडते. बहुतेक वेळा लांडग्याच्या कळपाने एखाद्या एल्कची शिकार केलेली असते आणि शिकारीच्या वासानं एखादं ग्रीझली ऐनवेळी तिथे येऊन टपकतं. मग लांडग्यांचा कळप आणि ग्रीझलीचा, उंदीर-मांजराचा खेळ चालतो. ग्रीझलीच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे, लांडगे ग्रीझलीवर समोरासमोर हल्ला करण्याचं धाडस करत नाही. कधी गनिमी कावा करून एखादा लांडगा ग्रीझलीचं लक्ष विचलीत करतो आणि तोवर बाकीचे लांडगे भक्षाचे लचके तोडून पळ काढतात. तर कधी कधी दोन तीन लांडगे एकत्र येऊन ग्रीझलीच्या पुठ्ठ्यावर पाठीमागून हल्ले करून त्याला बेजार करून सोडतात. ग्रीझलीचा आहार शाकाहारी, मांसाहारी असा संमिश्र असतो. मूस, हरीण, एल्क, बायसन, करीबू अशा प्राण्यांची शिकार करण्यात ग्रीझलीचा हातखंडा असतो. कधी कधी काळ्या अस्वलांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडायला देखील ते मागे पुढे पहात नाहीत. ग्रीझलीजना मासे देखील फार आवडतात, त्यामुळे नद्या, ओढ्यांच्या उथळ भागात उभं राहून, पंजाच्या फटक्याने सामन, ट्राउट, बास जातीचे मासे मारून ते खातात. ग्रीझलीजना मेलेल्या प्राण्यांचं मांस खाण्याचं देखील वावडं नसतं.
थंडीचा मोसम जवळ येऊ लागला की ग्रीझलीज भरपूर खाऊन शरीरामधे चरबीचा संचय करून घेतात. थंडीच्या ऐन कडाक्यात ६००० फुटांवर, उत्तरेकडच्या डोंगर उतारांवर, खोबणी, बीळांमधे जाऊन ग्रीझलीज झोपी जातात (hibernation). थंडीचे हे काही महिने ते पूर्णपणे झोपूनच काढतात. परंतु काही ठिकाणी मात्र जिथे वर्षभर अन्न मिळतं, तिथे ग्रीझलीजना असं थंडीमधे झोपी जावं लागत नाही.
ग्रीझलीजचा संचार कॅनडा आणि अमेरिकेच्या उत्तरेकडच्या राज्यांपुरता सिमीत असला तर त्यामानानं काळी अस्वलं सर्वत्र आढळतात. अलास्कापासून खाली मेक्सिकोपर्यंत आणि अटलांटिक पासून पॅसिफिकपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार असतो. तपकिरी रंगाची अस्वलं (त्यात ग्रीझलीज देखील आले) ही युरेशियातून आलेली तर काळ्या अस्वलांचा उगम सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी अमेरिकेतच झाला. काळी नर अस्वलं १५०-१७५ किलो वजनाची असतात (काही थोराड नर चक्क ३००-३५० किलो वजनाचे असतात) तर माद्या १००-१५० किलो वजनाच्या असतात. काळी अस्वलं साधारणपणे जंगलात आणि झाडाझुडपांच्या गर्दीमधे रहाणं पसंत करतात. परंतु कधी कधी शेतांच्या कडेला, माळरानात देखील ही आढळतात.
हिवाळ्यात, झाडांच्या मोठ्या ढोल्यांमधे, मोठ्या दगडांच्या किंवा ओंडक्यांच्या खाली, नद्यांच्या सुकलेल्या पात्रांमधे तयार झालेल्या खबदाडीमधे, बीळांमधे, ती झोपी जातात. पेनसिल्व्हेनियामधे डोंगराळ, दाट झाडींच्या भागामधे काळी अस्वलं खूप आहेत. काही वेळा स्थानिक वर्तमानपत्रांमधे त्यांच्या बातम्या यायच्या. काही वेळा या डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमधे, एखाद्या घराच्या डेक खाली, अडगळीमधे जागा शोधून, एखादं काळ अस्वल झोपी गेलेलं हिवाळ्यात आढळून यायचं. मग वनखात्याचे लोक येऊन त्याला गुंगीचं औषध देऊन पकडायचे आणि दूर जंगलात सोडून यायचे. कधीतरी कोणाच्यातरी आवारामधे अस्वलांचे ठसे दिसणं, बागेच्या कुंपणांच्या खांबांवर, झाडांच्या बुंध्यांवर त्यांच्या नखांचे ओरखाडे दिसणं हे देखील बरेचदा व्हायचं. आडवाटेच्या रस्त्यानं जाताना तर बरेचदा एखादं एकांड अस्वल किंवा मादी आणि एखाद दुसरं पिल्लू दुडक्या चालीने रस्त्याच्या कडेच्या गवतातून चालताना दिसायचे.
स्प्रिंग सीझनमधे नव्यानेच जन्मलेले बछडे बिळांतून, ढोल्यांतून बाहेर पडून हिंडा फिरायला लागतात. बछड्यांच्या जवळपासच त्यांची आई देखील असते आणि संकटाची चाहूल लागताच ती बछड्यांना झाडावर चढायला लावते. पहिला हिवाळा संपेपर्यंत बछडे सततच आई बरोबर असतात आणि साधारणपणे दीड वर्षांचे झाले की स्वतंत्रपणे हिंडू लागतात. काळ्या अस्वलांचा आहार देखील संमिश्र असतो. छोटी फळं, बिया, यांच्याच बरोबरीने कीटक, वाळवी, मुंग्या, मधमाश्या वगैरे देखील त्यांच्या आहारात असतात. खारी, उंदीर सश्यांसारख्या छोट्या प्राण्यांबरोबरच हरणाची छोटी शावकं देखील ते मारतात. मरून पडलेल्या प्राण्यांचं मांस देखील त्यांना वर्ज्य नसते. ग्रीझलीज प्रमाणे काळ्या अस्वलांना देखील सामन, ट्राउट हे मासे पकडून खायला आवडतं. ग्रीझलीजच्या मानाने काळी अस्वलं मनुष्यवस्तीच्या बरीच जवळ येतात. कॅंप साईट्सवर येऊन तंबूंच्या आसपास पडलेलं खाणं धुंडाळणं हा त्यांचा आवडता उद्योग असतो. गावांमधे येऊन कचर्यांचे डबे शोधायला किंवा शेळ्या, मेंढ्या, वासरांवर हल्ले करायला देखील हे मागे पुढे पहात नाहीत.
अमेरिकेतल्या वन्यप्राणी जीवनाच्या मानाने भारतातले वन्यप्राणीजीवन कैकपटींनी अधिक वैविध्यपूर्ण आणि रोमांचक आहे, यात काही वाद नाही. गीरच्या जंगलात उरलेले थोडेफार एशियन वंशाचे सिंह, एशियन हत्ती, वाघ, काझीरंगाच्या जंगलातले गेंडे, उडत्या घारी, कच्छच्या वाळवंटातली वन्य गाढवे, हिमालयात आढळणारे स्नो लेपर्डस, नाना प्रकारचे पक्षी, साप, ….. किती नावे घ्यावीत? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या अद्भूत नैसर्गिक ठेव्याची आपण अक्षम्य अशी हेळसांड करत आहोत. जंगले नष्ट होत चालली आहेत. कित्येक पशूपक्षांच्या जाती नष्ट झाल्या आहेत, होत आहेत. जंगलांच्या आसपास रहाणार्या खेडुतांची जीवनप्रणाली आणि वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने यांच्यातील संघर्ष वाढतच जात आहे. शेती, नागरी वस्त्या आणि तथाकथित आधुनिकता आपले पाश फैलावून, निसर्गाचा आणि त्याच्याशी निगडीत नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करत आहे.
अमेरिकेची इतर अनेक बाबतीत नक्कल करण्याचा प्रयत्न करणारे आपण, त्यांच्याकडून, निसर्ग आणि वन्यप्राणीजीवनाच्या संवर्धनाच्या बाबतीत काहीतरी शिकणार आहोत का?
-- डॉ. संजीव चौबळ
"दंगल" चित्रपटानिमित्त हा खास लेख
आजच "दंगल" हा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती पै.कु. गीता फोगट च्या जीवनावर सत्यकथा असलेला दंगल चित्रपट रिलीज झाला. गीता चा सर्व जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.प्रत्येक पालकांनी पहावा असा हा चित्रपट आहे.
आजच्या घडीला महाराष्ट्रात पण अनेक गीता,बबिता संघर्षमय जीवन जगताना दिसून येतात.
बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातून आलेली पै.कु.सोनाली तोडकर हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले,कोल्हापूर च्या रेश्मा माने हीने सुवर्णपदक जिंकले.
मुरगुड कोल्हापूर च्या स्वाती व नंदिनी या एकदम गरीब घरच्या मुली जीची आई दुसऱ्याच्या घरी धुणे भांडी घासून मुलींना राष्ट्रीय पैलवान करून दाखवले.
पुण्याच्या वंदना खेनंत या महिलेने 15/15 तास ट्रेव्हेल कंपनीत ओव्हरकाम करून आपली एकुलती एक मुलगी निशा ला पैलवान बनवले.
या सर्वांच्या कथा ही दंगल पेक्षा कमी नाहीत. अनेक समस्यां घेऊन आज महिला कुस्ती कासवाच्या गतीने महाराष्ट्रात पुढे जात आहे.
एकीकडे मुलांसाठी तालमी सहज उपलब्ध होतात पण मुलींच्या तालमी शोधून पण सापडणे मुश्किल.
आळंदी देवाची येथील मा.दिनेशजी गुंड सरांची जोग महाराज कुस्ती केंद्र,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांची राष्ट्रकुल कुस्ती केंद्र कोल्हापूर, NIS कोच अश्विनी बोऱ्हाडे यांची राजगुरूनगर येथील केंद्र,NIS कोच संदीप पाटील सर यांचे साई कुस्ती केंद्र आमशी, मुरगुड चे दादा लवटे सर यांचे कुस्ती केंद्र असे काही बोटावर मोजण्या एवढ्या महिला कुस्ती केंद्रे शिल्लक आहेत
आज शासकीय दरबारी महिला कुस्ती वाढावी म्हणून एकही योजना नाही,पुरुषप्रधान संस्कृतीला चिटकून असणारे पालक मुलींना कुस्ती हा खेळ करियर साठी निवडू देत नाहीत तिथे गीता व बबिता यांच्या वडिलांनी म्हणजेच पै.महावीर फोगट यांनी आपल्या मुलींना पैलवान बनवले,नोकरी मिळवून देऊन तिचे आयुष्य सोन्याचे केले ही बाब नक्कीच महाराष्ट्रातील पालकांनी ध्यानात घ्यावी व आपल्या मुलींना आता तरी जुनाट रुढीप्रमाणे घरी न ठेवता कुस्ती कडे पाठवावे....अगदी त्या पदक जिंकत नाहीत तोवर जर पालकांचे लक्ष असेल तर मुली त्यांच्या घराचे,गावाचे,देशाचे नाव उज्वल करतील यात शंका नाही.
महिला कुस्तीसाठी पुर्वी लिहलेला लेख व महत्वाचे मुद्दे मांडत आहे..
कुस्ती सारख्या पुरुष प्रधान खेळात सुद्धा स्त्रियांनी इतिहास निर्माण केला आहे.
आज कित्येक महिला मल्ल आपल्या झुंझार खेळीने जन माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदीपयमान मल्लपरंपरा आहे.
मात्र महिला या खेळात येण्याचा ओढा तसा फारसा नाही.
पण ज्या ज्या मुली आज कुस्ती सारखा खेळ आपल्या करियर चा विषय म्हणून निवडत आहे त्यांना खरच आज सरकारी पाठबळाची गरज आहे.
महाराष्ट्रातील अनेक महिला खेळाडू आहेत ज्यांना जर शासकीय नोकरीत समावून घेतले तर त्या कुस्ती कडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यात यश मिळवतील.
कुस्तीमध्ये करियरसाठी महिलांना सुवर्णसंधी
कुस्ती मध्ये महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसतात.
साहजिकच महिला कुस्तीगीरांनी संख्या कमी आहे म्हणून आजच्या घडीला त्यांना कुस्ती मध्ये करियर ची संधी आहे.
जिथे मुलांना अनेक फेऱ्या अनेक दिगग्ज मल्लांच्यासोबत खेळाव्या लागतात तिथे केवळ काही फेऱ्या नंतर राज्य,राष्ट्रीय पातळीवर मुली जाऊ शकतात.
या गोष्टीची पालकांनी जरूर दखल घ्यावी असे वाटते.
महिला कुस्तीगीराना कुस्ती खेळातील प्रमुख समस्या
कुस्ती हा खेळ तसा मनगट मस्तीचा,नाजूक रुसव्या फुगव्याना इथे काही अर्थ नसतो.
त्यामुळे ज्या मुलींना कुस्ती हा करियर चा खेळ निवडावा असे वाटते त्यांनी आधी हे लक्षात ठेवावे की हा पुरुषांचा खेळ पुरुष बनूनच खेळावा लागेल.
झोकून देऊन व्यायाम करावा लागेल,सकस आहार घ्यावा लागेल,योग्य झोप घ्यावी लागेल व यासह वस्तादनाचा मार सुद्धा खावा लागेल.
या सर्व गोष्टींची तयारी करुन मगच हा खेळ निवडा कारण एकदा तुम्ही हा विषय निवडला आणि कालांतराने यातून निवृत्ती घेतली तर तुमचे पूर्वीचे आयुष्य जसेच्या तसे मिळेल याची खात्री नाही,कारण कुस्ती मध्ये जास्त ऊर्जेचा आहार,प्रामाणिक कष्ट यामुळे शरीर पुरुषाप्रमाणे टणक बनू लागते,सौन्दर्यावर परिणाम दिसतो.
त्यामुळे कुस्ती करत असताना योग्य गुरु,मार्गदर्शक ची निवड करणे हे सुद्धा महत्वाचे असते.
कारण कुस्ती निवृत्तीनंतर तुम्हाला लग्न करुन संसार सुद्धा करणे हा संस्कृतीचा भाग असतो.
तुमचे सौन्दर्य सुद्धा टिकणे हे तुम्ही खात असलेल्या खुराकावर अवलंबून असते.
कुस्ती नंतर वजन बेफाम वाढू शकते,यासाठी आहार,व्यायाम शास्त्र यांची माहिती असणारा गुरु जरूर असावा.
ही अट पुरुषांना लागू नाही कारण पुरुषांची कुस्ती कारकीर्द वयाच्या 11 वर्षांपासून ते 15 वर्ष असते,तिथून पुढे कितीही वर्ष तो त्याच्या कर्तृत्वावर आपला फॉर्म टिकवू शकतो,मात्र मुलींची कुस्ती कारकीर्द 5 ते 8 वर्ष इतकीच असते आणि यानंतर वैवाहिक जीवन.
त्यामुळे महिला मल्लानी या गोष्टीची जरूर काळजी घ्यावी.
पण एकदा तुम्ही या वर्तुळातून बाहेर आलात तर समाजातील अनेक मुलींना सुर्यासारखा तेजस्वी आदर्श नक्कीच निर्माण कराल.
आज गीता फोगट सारखी महिला पैलवान DYSP सारख्या क्लास वन पदावर केवळ कुस्तीमुळे पोहोचली आहे ,अनेक मुली पोलीस दलात आहेत.
त्यामुळे कुस्ती मध्ये महिलना नक्कीच सुवर्णसंधी आहे.
अभ्यासू महिला "कोच" ची आवश्यकता
महिला कुस्ती मध्ये कोच महिला असणे सर्व दृष्टीने आवश्यक आहे असे मला वाटते.
जिथे महिला कुस्ती सेंटर आहे तिथे केवळ महिलाच कोच असणे हि गरजेची बाब आहे.
पण,अनेक ठिकाणी सराव करताना महिला मल्लच नसल्याने नाईलाजाने मुलांच्या सोबत सराव करणे मुलींना भाग पडत आहे.
ही जशी फायद्याची बाब आहे तशीच तोट्याची सुद्धा आहे.
तोटा एवढ्या साठी की ज्या वयात मुली कुस्ती कडे येतात ते वय म्हणजे त्यांच्या मनात अनेक भावभावनांचा गुंता सुरु होण्याचे वय असते त्यामुळे सहाजिकच नकळत त्यांच्या हातून चुका घडण्याची शक्यता असते व त्या चुका पुढे जाऊन जटील समस्यां बनतात.
पालकांनी जो दृष्टिकोन ठेवून त्यांना कुस्ती मध्ये घातले असते ते ध्येय दूरच राहते व इतर समस्यां सोडवता सोडवता नाके नऊ येते आणि का हि चूक केली असे वाटू लागते.
अश्या अनेक महिला पालकांच्या तक्रारी मला येतात पण त्यावर उघडपणे भाष्य करणे ना पालकांना शक्य आहे ना मला.
यावर केवळ एकच उपाय कि मुलींना याची जाणीव अगोदर करून द्यावी असे मला वाटते.
त्यासाठी त्यांची मने समजून घेणारी महिला कोच त्या त्या सेंटर वर उपलब्ध करून देणे हि काळाची गरज बनली आहे.
आज अनेक सेंटर अशी आहेत जिथे पुरुष कोच नी अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान घडवल्या,मात्र प्रत्येक ठिकाणी असे होईलच असे नाही.
या सर्वांचा अभ्यास करून महिला कुस्तीगीरांनी कुस्ती निवृत्तीनंतर कुस्तीच्या दीर्घ आभ्यासाकडे जरूर लक्ष द्यावे.
NIS सारख्या शासकीय कोर्स मध्ये करियर ची सुवर्णसंधी आहे.
पुण्याची पै.कु. अश्विनी बोऱ्हाडे ही NIS पतियाळा पंजाब येथे कुस्तीचा दीर्घ अभ्यास करुन महाराष्ट्राच्या महिला कुस्तीसाठी भव्य कामगिरी करण्याची स्वप्ने पाहू शकते तशी प्रत्येक महिला कुस्तीगीरांनी आपआपल्या परीने यासाठी योगदान देणे गरजेचे आहे तर भविष्यात महाराष्ट्रातून अनेक महिला कुस्तीगीर घडतील अशी खात्री वाटते..!
अश्विनी बरोबर मुंबई ची कौशल्या वाघ देखील पंजाब मध्ये NIS डिप्लोमा पूर्ण करत आहे.
महाराष्ट्राच्या सर्व महिला मल्लाना कुस्ती-मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा..!
तुमच्या सारख्या महिला हे महाराष्ट्राचे खरे भूषण आहे.
-- पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
Www.facebook.com/
झाडांच्या बियांचं दिव्यत्व या लेखात स्पष्ट केलं आहे.
गोल-गोल होते रिंगण, कोण जिंकले, कोण हरले, प्रश्न होता बिकट. …
आज ४६ वर्षे झाली ’नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला.
२३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, मा.वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर मा.सतीश दुभाषी, मा.उपेंद्र दाते, मा.यशवंत दत्त, मा.चंद्रकांत गोखले, मा.दत्ता भट, मा.मधुसूदन कोल्हटकर, मा.राजा गोसावी, मा.गिरीश देशपांडे मा.नाना पाटेकर यांनी नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकर रंगवले आहेत.
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडके फाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती. मराठी रंगभूमीवर आपल्या कथा आशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर आला आहे. नाना पाटेकर निर्मित आणि अभिनीत ‘नटसम्राट’ हा चित्रपट. हा चित्रपट १ जानेवारी २०१६ ला प्रदर्शित झाला आहे. आपल्या अभिनयाने अनभिषक्त सम्राटाची पदवी मिळवलेला अभिनेता नाना पाटेकर या सिनेमात प्रसिद्ध आप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत दिसले आहेत. या नाटकातील एका वाक्याने अवघ्या मराठी जनमानसावर आपला ठसा उमटवला आहे. ते वाक्य म्हणजे 'कुणी घर देता का घर...’
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti