वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा करतात.हे एक व्रतसुद्धा आहे. व्रतामध्ये श्रावण शुद्ध चतुर्थीला एकभुक्त राहून पंचमीचे दिवशी पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढून त्यांच्यासोबत नागपत्यांचे सुद्धा चित्र काढतात. त्यानंतर संकल्प करून नागाची पूजा करतात. नागाला दूध -लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.
नागपंचमीला अखिल भारतीय महत्त्व आहें. भारतात सर्वच भागात नागपंचमीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी प्रत्येक पंचमीला अनंत, वासुकी वगैरे बारा नागांची पूजा करून वर्षभर व्रत करण्याचा प्रघात आहे.
पौराणिक कथेप्रमाणे नागाची उत्पत्ति कश्यप व कडू यांचेपासून झाली आहे. या दंपतीला जी सर्पसंतती झाली त्यातील प्रमुख आठ सर्प आहेत. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक ,पद्म, महापद्म, शंख व कुलिक यांनाच उरष्टनाग असे म्हणतात.
भारतीय संस्कृतीत वृक्ष, वेली, झाडे, प्राणी वगैरे सर्वांनाच देवत्व दिले आहे. याचे कारण या सर्व गोष्टी मानवाला उपकारक आहेत. काही वेळा माणूस भीतीने सुद्धा आपल्यापेक्षा वरचढ असणाऱ्या गोष्टींची पूजा करतो. सर्प हे शेती व्यवसायाला देखील उपकारक ठरतात. (उंदीर वगैरे खाऊन) या दोन्ही कारणांनी नागपूजन आले असावे.
-- विद्याधर करंदीकर
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात .
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , कर्म योग्यांना आणि तपोनिधींना या दिवशी व्रतस्थपणे आदरांजली वाहायला हवी. हे व्रत म्हणजे कश्यप, अत्री , भारद्वाज , विश्वामित्र , गौतम , जमदग्नी आणि वसिष्ठ या थोर सप्तर्षीची व अरुंधतीची पूजा आहे . उपवास करून केवळ हाताने पिकवलेली कंदमुळेच या दिवशी खावयाची असतात .
हे व्रत सात वर्षे सलग करावे असे शास्त्र सांगते . हि पूजा शुचितेचीअसल्याने आपल्या देहिक , मानसिक व बौद्धिक आचरणाच्या पातळीवरील अशुचीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक व सामाजिक दोष या व्रतामुळे दूर होतात असे मानले जाते.
ऋषीपंचमीला केल्या जाणार्या खास भाजीची कृती पहा...
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
जीवनात मन:स्वास्थ्य मिळणे फारच आवश्यक आहे. मन:स्वास्थ्य बिघडले तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही.
मन:स्वास्थ्य बिघडले की जीवनात असंख्य समस्या निर्माण होतात. याच्या उलट मन:स्वास्थ्य असेल तर माणसांना समाधानी जीवन प्राप्त होते.
मन:स्वास्थ्य आपोआप निर्माण होत नाही किंवा मिळत नाही. भरपूर पैसा मिळविला किंवा मिळाला म्हणजे मन:स्वास्थ्य मिळेल असा बहूसंख्य लोकांचा भ्रम असतो.
उलट पैसा अधिक मिळू लागला म्हणजे मन:स्वास्थ्य अधिक बिघडत जाते असा बहुसंख्य लोकांचा अनुभव असतो.
विशिष्ट प्रक्रियेने मनाला स्थिर करता आले तरच मन:स्वास्थ्य मिळू शकते.
मनासारखे करीत न रहाता मनाला ' सारखे ' केल्याने माणसाला मन:स्वास्थ्य प्राप्त होते.
-- सदगुरु श्री वामनराव पै
खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन
मंत्रपुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती पुढीलप्रमाणे :
(या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल.)
प्रत्येक श्लोक व श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः
श्लोक - १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्
तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:
अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः
अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची) पूर्ति प्रदान करो.
श्लोक ३ (प्रथमार्ध) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।
अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.
श्लोक ३ (द्वितियार्थ)
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति।
अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
श्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।
अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.
संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्या आहेत.
रविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.
पराधिनता पाप है जान लेहु रे मीत
रविदास दास पराधीन तो कौन करे है प्रीत
सामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे. अशी त्यांची शिकवण होती.
रविदासांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती. स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणार्यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही असा इशाराही ते देतात. सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार छानपणे मांडले आहे.
एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा
रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा
सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात.
समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद खालील ओळीतूनही दिसून येतो.
ऐसा चाहो राज्य में, जहां मिले सबन को अन्न
छोट बडो सब सम बसे रविदास रसे प्रसन्न
रविदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. इथे महाराष्ट्रातल्या गोरा कुंभाराशी ते नाते जोडतात. गोरा कुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते. रविदासही काम करता करताच ईश्वरभक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले. परंतु, आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. 'मन चंगा तो कठोती में गंगा' मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे.
जनार्दन गव्हाळे, खामगाव, जिल्हा बुलढाणा, विदर्भ.
भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे.
जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.
वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.
समुद्र मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे(येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात.
याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थवृक्षा खाली रडत बसली.
एकदा विष्णू तिथून जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.
या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. गौरीचे आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
अष्टमीच्या दिवशी गौरीपूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘जेष्ठा गौरी व्रत’ असे मानतात.
गौरी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. जेष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो..
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात.
प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास
गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.
पुजन माहिती....
श्रीमहालक्ष्मीचे आवाहन
गौरीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं.
देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. गौरींचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात. गौरींना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.
गौरी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून गौरींच्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात.
दुसर्या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.
तिसर्या दिवशी तिला खीर-कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात.
अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणेल!
वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.
सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.
म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!
गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.....
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.
कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.
नवरात्रीत नियमितपणे केले जाणारे काही विधी
मालाबंधन
नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपा प्रमाणे मालाबंधन करावे.
महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी.
दीपप्रज्वलन
म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृतव्हावा आणि तेजानेतेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे.यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवसअखंड दीप चालू ठेवावा.
तेल संपल्या मुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही.
दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जपकरावा, तिची प्रार्थना करावी,क्षमा याचना करावी.
फुलोरा
नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे.
यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात.
हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी,सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा.
देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो.
पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो.
त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असेखरकटे बांधून ठेवू का?
ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे.
त्यापेक्षा डब्यातठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्यदाखवितो म्हणजे काय करतो ? समर्पण भावनेनेअर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.
होम
नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. ब-याच ठिकाणी अजबली देतात. ‘अज’ म्हणजे बोकड. खाणे आणि हिंडणे या खेरीज बोकडाचा काय उपयोग? रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते.याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्याने बुद्धिला मांद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठेकचरा खातो, त्या पासूनच त्याचा रक्ताची निर्मिती होते.
असे मांस खाल्याने अनेक रोगांना अनेक रोगांना निमंत्रण मिळते.
म्हणूनच पूर्वीच्या ऋषिमुनींनी द्रष्टेपणानेहोमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली.याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात.
नवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीचआपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत.
त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”,तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी”ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे.तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोपआहे.
इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.देवीच्या-सेवा :श्री सुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत.
कुंकूमार्चन
देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदी पासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते.ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे.म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे,त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्यदेते. कुंकूमार्चन श्री यंत्रावर करतात.
एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले.
प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.
पुजा संपल्यावर श्रीगुरु दत्ताञेय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार.
तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले. 'शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।। शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।।' करुणा ञिपदीचे हे बोल ऐकून श्रीगुरु दत्ताञेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.
तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".
तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, " इथे सत्ता कोणाची ? " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, " देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". त्यावर श्री गुरु दत्ताञेय म्हणाले, "अरे तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता. त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले ?" त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.
या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.
टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळ्ये त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.
??आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते.
ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.............
Copyright © 2025 | Marathisrushti