वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 31
नैवेद्यम् समर्पयामी-भाग पाच
गणेशजी आपल्याकडे येतात. काही जणांकडे दीड दिवस, काही जणांकडे पाच, सात, अकरा, एकवीस दिवस मुक्कामी असतात. जणुकाही घरातलाच एक घटक होऊन जातात. विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावतात. ते (तेज) घरातून जाऊ नयेत, असे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाटत असते.
गणेशजी आपल्या घरातील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तीच बनून गेलेले असतात. सर्वगुणसंपन्न असलेली ही सगुण देवता आपल्या अवतीभवती आहे, याचा विलक्षण आनंद यावेळी आपल्या मनात असतो. केवळ एका ज्ञातीचे हे दैवत नसून समस्त समाजाला देशभक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवणारे हे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील दैवत. जेव्हा गणेशजी येतात, मनातली सर्व सुख दुःख प्रत्येक जण त्यांना सांगत असतात. कोणावर जबरदस्ती नाही, कडक सोवळे ओवळे नाही. घरातली सर्वजण अगदी मनोभावे यथासांग, यथा मिलितोपचार द्रव्यांनी षोडशोपचार पूजा करत असतात.
या निमित्ताने नवीन खरेदी, बाजारात खरेदीला गर्दी, एका घरातील पैसा बाहेर येतो, दुसऱ्याच्या घरात जातो. चलन हलते फिरते राहाते, पैसा फिरला तर देशाचा आर्थिक विकास होतो, हा अर्थशास्त्रातला नियम. सणांच्या माध्यमातून भारतात हा नियम केवळ पुस्तकात राहिलेला नाही तर व्यवहारात उतरवला गेलाय. त्याचा परिणाम म्हणून भारतात इंग्रज येऊन गेल्यानंतर परिस्थिती दुष्काळी असली तरी आर्थिक मंदीची लाट तशी कधी जाणवली नाही, ती या अशा सणांमुळे आणि त्यातल्या कर्मकांडामुळे !
पाच फळं, पाच भाज्या, पाच पक्वान्न, सणाच्या निमित्ताने का होईना, खरेदी होते, सण म्हणून वेगवेगळे पदार्थ. एकत्रित भोजन, एकत्रित भजन, एकमेकांच्या सहवासात येत असतो. घराला जणुकाही देवालय बनवून टाकलेलं असतं. घराघरातील गणेशतत्व जरी एकच असले तरी प्रत्येकाच्या घरी जावून, प्रत्येक घरातील प्रत्येक गणेशाचे दर्शन होते. एक निमित्त असते, लोकसंग्रह वाढवायचे ! नातेसंबंध वाढवायचे, पौष्टिक खायचे, आरोग्य सुधारायचे !
सकाळी लवकर उठून गणपतीची मनोभावे केलेली पूजा, आरती, शंख, घंटा यातून निर्माण होणारे ध्वनी, झांज, टाळ, तबला, पेटी, पखवाज, घुमट इ. अनेक वाद्यांचे गजर, शब्दलहरी, मंत्रलहरी, त्यांचे नाद, सूर, ताल, लय यांनी घरातील वायुमहाभूताची, आकाश महाभूताची शुद्धी होत असते.
काही आठवतंय पहा,
प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशजीना पहिला नमस्कार.
आपण जेवायला बसलो की गणेशजीना नैवेद्याचे पान पहिल्यांदा. "तुमच्यामुळे आम्हाला मोदक मिळती खायाला, गणपती बाप्पा मोरया" असं म्हणत गणपतीसाठी केलेले सर्व मोदक आपणच खाऊन टाकायचे....
हे पंचपक्वान्नाचे ताट नैवेद्य म्हणून दाखवून परत सगळ्यांनी समान वाटून घ्यायचे. कोणताही भेदाभेद नाही. कोणाशीही भेदभाव नाही.
पण....
हा असा भरलेल्या ताटाचा नैवेद्य फक्त दुपारी दाखवला जातो.( नाव गणेशाचे खातो आपणच ! )
आणि रात्रीची पेटपूजा ?
?????
नैवेद्याला काय असते ?
आठवावं लागतंय ना !
जशी षोडशोपचार पूजा सकाळी केली जाते, तशी सायंपूजा केली जात नाही. सायंकाळी केली जाते, त्या पूजेला सायंपूजा असे म्हणतात.
सायंकाळी फक्त पंचोपचार आणि आरती ! आणि नैवेद्याला काय असतं ?
फक्त एखादा लाडू, किंवा लाह्यांचं गुळखोबरं घातलेलं पंचखाद्य, किंवा एखादा मोदक किंवा एखादी करंजी किंवा नेव्हरी. ( गोवा, कोकण भागात करंजीला नेवरी म्हणतात.)
बास्स बास्स बास् !
संध्याकाळी झालेल्या या पूजेनंतर गणेशजींचा हा जो नैवेद्य असतो, इथे आरोग्य दडलेलं आहे.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायानुसार आपणही तेवढे आणि तसेच अन्न खायचे असते.
सकाळ दुपार भरपूर जेवायचे आणि सायंकाळी कमी, रात्रीचे तर नाहीच, हा नियम पुनः एकदा सिद्ध होतो.
सकाळी झालेल्या पूजेनंतर पंचपक्वान्न खाल्ली तरी चालतात. आणि सायंकाळी मात्र एखादाच लाडू किंवा लाह्या सदृश्य काही तरी भाजलेलं, फुलवलेलं, पचायला एकदम हलकं असंच अन्न घ्यावं हा त्यामागील आरोग्य संकेत . समजून घेणाऱ्या समंजसांना हा समज समजतो. बाकी सगळे बुद्धीवादी, भक्ती सोडून ज्ञानाची सालपटं काढत रहातात, आणि आपण मात्र लंबोदर होतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.06.2017
युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत.
कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा या संबंधी लेखन करणाऱ्या सुप्रसिध्द श्रीमती शारदा द्विवेदी व सुप्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ राहुल मेहरोत्रा यांनी लिहिलेल्या fort walks या पुस्तकाचा ‘फोर्टमध्ये फिरताना’ या नावाने भालचंद्र हर्डीकर यांनी अनुवाद केला आहे. रहस्यकथेपेक्षाही उत्कंठावर्धक असे हे पुस्तक नुसतेच वाचनीय नव्हे तर संग्रहात असावे असे आहे.
शुद्ध मराठीचा आग्रह हा दुराग्रह होऊ नये, कारण त्यामुळे कदाचित सामान्य माणूस भाषेपासून दूर पळण्याचा धोका आहे. आजची तरुण पिढी अशुद्ध मराठी लिहिते असा नेहमीच आरोप केला जातो. पण असे का याचा विचार कोणी केलाय का?
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 30
नैवेद्यम् समर्पयामी-भाग चार
आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. त्याच्यासाठी मस्त स्वयंपाक तयार केलेला आहे. पाने घेऊन ठेवलेली आहेत. पण पाहुणेच आलेले नाहीत, तर पाने उगाच वाढून ठेवायची काय ?
देवाच्या पूजेची सर्व आरास तयार झालेली आहे. पूजेला दाखवायचा नैवेद्य तयार आहे. सर्व पूजा साहित्य तयार आहे. यजमान तयार आहेत, पण देवाची प्रतिष्ठापना जर झाली नसेल तर नैवेद्य दाखवून घ्यायचा का ? आणि मखरात देवच नसेल तर नैवेद्य दाखवायचा तरी कुणाला ?
नैवेद्य कधी दाखवायचा ?
देव आला असेल तर.
अहं वैश्वानरो भूत्वां प्राणीनाम् देहमाश्रितम, म्हणजे पोटातील भूक, वैश्वानर, जाठराग्नी, तो मीच, असं प्रत्यक्ष भगवंत सांगताहेत. याचाच अर्थ असा की, पोटात देव उपस्थित झाल्याशिवाय त्याला नैवेद्य दाखवायचा काय ?
सरळ सरळ सांगायचे तर, भूक लागल्याशिवाय अजिबात जेवू नये. देव प्रकट झाल्याशिवाय नैवेद्य तरी कोणाला दाखवायचा ना ? पाहुणे आल्याशिवाय वाढायचे तरी कोणाला ?
नैवेद्याचे हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवले तरी बास आहे. ज्याला जसे समजून घ्यायचं असेल तसं समजून घ्यावे समजून घ्यायचंच नसेल तर सोडून द्यावे. इथे फुकटचा निरर्थक वाद घालायला वेळ आहे कोणाला ?
देवाला समजून घेण्यासाठी मुळात एक वेगळी दृष्टी, काही वेगळी समज असली पाहिजे. देव का सांगितला गेलाय, देव कुठे असतो, तो कुणाला दिसलाय का ? सगुण रूपातला देव समजला की नंतर निर्गुणातला समजून घ्यायचा असतो. सगुण निर्गुण एकु गोविंदु रे, असं माऊली म्हणतात. पण सगुण समजून घेतला की नंतर निर्गुण समजणे सोपे होते.
काही गोष्टीमधे आपल्याला "क्ष" गृहीत धरावा लागतो, ते उत्तर मिळेपर्यंत. ते उत्तर एकदा मिळाले की नंतर हा गृहीत धरलेला "क्ष" विसरून जायचा असतो. हा " क्ष" म्हणजेच आमचा देव.
ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मार्गाने शिकावे. सगुण रूपात भक्ती योगाने जाणून घ्यावा, ज्यांना कर्मयोगाने समजून घ्यायचा असेल तर तसा समजून घ्यावा. ज्यांना ज्ञानमार्गाने जाणून घ्यायचा असेल तर तसा निर्गुण रूपातील अभ्यासावा. पण कुत्सित बुद्वीने देव म्हणजे बुवाबाजी, देव मानणे म्हणजे समाजाला काही वर्षे मागे नेणे असले आरोप करून केवळ शाब्दीक बुडबुडे काढणे म्हणजे शक्तीचा अपव्यय आहे.
देवपूजा वगैरे सगळं बामनाचं काम. त्यांनी समद्या जन्तेला फशीवलंय. येड्या देवाच्या नादी लावलंय, समाजाला मागे नेण्याचं काम केलंय, वगैरे ज्यांना बोलायचं असेल ते खुशाल बोलू द्यावे. देव ही संकल्पना समजून घेण्यासाठी तशी शुद्ध वैज्ञानिक बुद्धी हवी, ते येरागबाळ्याचे काम नव्हे. आज कोणीही उठतो, देवाची निंदा नालस्ती करतो.
देवाला नैवेद्य अर्पण करायचा तेव्हा मनात भाव असा हवा की मी जणुकाही सगुणरूपातील देवाला घास भरवतो आहे. भाव जर नामदेवांचा असेल तर देव जेवल्याशिवाय राहात नाही, ही उच्चकोटीची भक्ती आहे. ही तळमळ, तो भाव आपण निर्माण करू शकत नाही, म्हणून देव आपल्या हातून जेवत नाही. भाव तसा देव असतो, हे समजून घ्यायचे असते. बुद्धिवादी नास्तिक लोकांना ही भक्ती म्हणजे बुवाबाजी वाटते. ढोंग वाटते. आणि मनात विकल्प येतात. चार दोन बड्या लोकांनी देवाला नावे ठेवली, त्यांचे आपण अनुयायी आहोत, समाजसुधारक आहोत, असे वाटणे हा निव्वळ भ्रम आहे.
जर विज्ञानाचा तिसरा डोळा उघडला तर भक्तीमागील कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही दिसू लागतील.आणि त्यामागे लपलेले आरोग्य सूर्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.06.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 29
नैवेद्यम् समर्पयामी-भाग तीन
नैवेद्य करताना सोवळ्यातच करावा, असा दंडक आहे.
नेमके सोवळे म्हणजे काय हो ? पीतांबर ? रेशमी वस्त्र? की धूतवस्त्र ? की आणखीनच काही ? आणि काय आवश्यकता आहे या सोवळ्याची ? त्याच्यावर काय फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे काय ?
कधीच नव्हती, कधीच नाही, कधीच नसावी.
सोवळे म्हणजे शुद्धता. स्वच्छता.
आपण जे स्वच्छतेचे नियम पाळतो ते जरा कडक केले तर शुद्धता मिळते. नेहेमीच्या वापरातील कपडे आणि सोवळ्यातील कपडे, वेगवेगळे ठेवण्याचे हेच एकमेव कारण. आपण बाहेर हवे तसे फिरतो. बाह्य वातावरणातील जीवजंतु आपल्या अंगाखांद्यावर, हातापायावर बसतात, आपल्याबरोबर ते आपल्या घरात येतात. स्वयंपाकघरात येतात. अन्नापर्यंत पोचतात. आणि अन्नातून आपल्या पोटातही जातात. जीवजंतुंचा, अन्न आणि आहार ते आपले शरीर अवयव, हा प्रवास जेवढा टाळता येईल, तेवढा टाळला जावा, यासाठी हे सोवळे ! काय चूक आहे असे सोवळे पाळण्यात ?
बाहेरून घरात आल्यावर हात पाय धुवुन कपडे बदलून घरात यावे असा कडक नियम एकेकाळी ब्राह्मण घरात होता. मी जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करतोय. काही कर्मठ ब्राह्मण घरात तर बाहेरून आल्यावर कपडेच काय, जे बरोबर आणलेले सामान, वस्तु,भेटी, पिशव्या, भाजी, जेवढे धुता येईल तेवढे सर्व धुवुन घेतले जायचे. का ? कशासाठी? एवढा कर्मठपणा आवश्यक होता का ? उलट गत कालापेक्षा आताच्या कालात असा कर्मठपणा घरात आणला तरी पन्नास टक्के आजार कमी होतील. आमच्या सौभाग्यवती नोटादेखील धुवुन घेतात, कारण विचारले तर सांगतात, "लोक नोटा मोजताना थुंकी लावून मोजतात, या नोटा खाटीकखान्यातून आल्या असतील तर मांस लागलेले असेल, मासळी बाजारातून आल्या असतील तर रक्त लागलेलं असेल, रस्त्यावर ही नोट पडलेली असेल तर तिथली घाण लागलेली असेल, म्हणून मी त्या नोटा धुते." काय चुकले तिचे ? ( मनात म्हटलं दोन हजाराची नोट फक्त धुवु नकोस, रंग जातो म्हणे !जोक अपार्ट,) पण हे सोवळे नव्हे काय ?
बाजारभर फिरायचे आणि घरात, अगदी स्वयंपाकघरात देखील तसेच त्याच बूटांनी फिरायचे ? बूट काढले तर साॅक्सची घाण म्हणे घरात येते. एवढे सोवळे कळते तर स्वच्छता कोणी ठेवायची ? बूट साॅक्स, बाहेरचे कपडे यावर जी घाण आहे ती घराबाहेर ठेवावी. हातपाय धुवून आत यावे, एवढे सुद्धा समजत नाही ?
आणि स्वयंपाकघरात तर आंघोळ केल्याशिवाय जायचेच नाही, समजा चुकुन गेलात तर कशालाही स्पर्श करायचा नाही. हे पण सोवळेच. देवघरातील गोष्टच वेगळी!
देवघरात पूर्वीच्या काळी वर्षाच्या बेगमीची लोणची, सांडगे कुरडया, पापड, मुरांबे, गुलकंद आदि "आयसोलेट " करून ठेवलेले असायचे ! हे पण सोवळेच ! तिथे तर आणखीनच कडक सोवळे. नेहेमीच्या धुतलेल्या वस्त्राने पण तिथे जायचे नाही. आंघोळ झाली की तडक देवघरात जाऊन तिथेच ठेवलेले सोवळे नावाचे वस्त्र नेसायचे. त्यानंतर कश्याकश्यालाही स्पर्श करायचा नाही. आणि देवपूजा नैवेद्य सर्व कर्मकांड पार पडायचे. हे सर्व कर्मकांड ब्राह्मण घरात इमाने इतबारे व्हायचे ! काय ही स्वच्छता, हे सोवळे चुकीचे होते ?
या देवासाठी नैवेद्याचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच व्हायला हवा, असा दंडक चुकीचा होता का ? जे जे देवासाठी ते ते देहासाठी या नियमानुसार, जर देवाला शुद्ध आणि सात्विक लागते तेच आपणाला सुद्धा.
आणि काय हो,
आज डाॅक्टर मंडळी सांगतात, कुत्रा मांजर या प्राण्यांपासून लांब रहा, त्याना "टच" करू नका, त्यांच्या अंगावरील केसापासून तुम्हाला अॅलर्जी होईल, दमा चाळवेल, तेव्हा तुम्ही मान्यच करता ना कि या प्राण्यांच्या अंगावरील जे काही अदृश्य जीवजंतु, "अॅलर्जिक सबस्टन्स " आपणाला पुढे जाऊन त्रास निर्माण करू शकेल, त्यापासून सावध राहिलेले बरे. ही "प्रिकाॅशन" घेणे म्हणजेच सोवळे.
ऑपरेशन थिएटरमधे एखाद्याचे शस्त्रकर्म करायचे असेल तर तिथे कोणाला प्रवेश असतो ? नन अदर दॅन डाॅक्टर अॅण्ड सिस्टर्स. फक्त नर्स आणि डाॅक्टरच तिथे जाऊ शकतात. का ? आम्ही का नाही जाऊ शकत ? तर आपण त्या ऑपरेशन थिएटरमधील नर्स आणि डाॅक्टरांसारखा "स्टरलाईझ्ड ऑटोक्लेव्हड" पोशाख घातलेला असत नाही, हे एक कारण असते.
अरे, म्हणजे आज "ऑपरेशन थिएटर" मधे देखील सर्व डाॅक्टर सोवळ्यातच असतात म्हणा की !
हो.
हे सर्व डाॅक्टर्स ऑपरेशन थिएटरमधे सोवळे नेसलेले अगदी कर्मठ ब्राह्मणच असतात, मग त्यांची जात काही का असेना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.06.2017
मित्रांनो, खालचा लेख काहीसा मोठा आहे, पण शिक्षणाबद्दल आस्था असणारांनी जरूर वाचावा ही विनंती. लाईक्स, कमेंट नाही दिल्यात तरी चालेल, पण एकदा वाचावा ही नम्र विनंती..
विषय अर्थातच नुकत्याच लागलेल्या इयत्ता १० वी किंवा एसएससीच्या निकालाचा आहे. या विषयावर गेल्या पाच-सहा दिवसांत इतकं उलट-सुलट लिहीलं, बोललं गेलंय, की आता त्याचा कंटाळा येऊ लागलाय. खरी मेख इथंच आहे, आपल्याला कंटाळा किंवा आनंद अगदी तत्परतेने वाटतो पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर ‘असं का व्हावं’ असा शांतपणे विचार करावासा वाटत नाही.
आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे आहेत.
ठराविक आकाराचे व रंगाचे स्वस्तिक शरीरावर योग्य ठिकाणी लावल्यास आरोग्य सुधारते असे अनुभव आले. लाल स्वस्तिक छातीवर ठेवले असता कफ कमी होतो. थंडीच्या दिवसांत लाल स्वस्तिकावर बसले असता थंडी कमी वाजते. पिवळे स्वस्तिक माकाहाडला लावले असता संडासला साफ होते आणि वात कमी होतो. फिक्यानिळ्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी, पित्ताचा त्रास कमी होतो. गर्द निळे स्वस्तिक बेंबीवर लावले असता पचन शक्ती वाढते. हिरवे स्वस्तिक उन्हाळ्यात टोपीमध्ये ठेवले असता उन्हाचा त्रास कमी होतो. अशा प्रकारे अभ्यास करवून घेऊन "आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके" असे पुस्तक २००७ साली परमेश्वराने माझ्याकडून लिहून घेतले. ते वाचून अनेकांनी स्वतः स्वस्तिके तयार करून वापरली तर अनेकांनी माझ्याकडून स्वस्तिकाचे सेट नेऊन ती स्वस्तिके वापरली आणि त्यांना फायदा झाला.
स्वस्तिके शरीरातील सात चक्रांना किंवा अवयवांना आजाराप्रमाणे किमान दोन तास ते दिवसभर लावावीत. स्वस्तिकाची रंगीत बाजू शरीराला लागली पाहिजे.
स्वस्तिकाला जे अधिकचे चिन्ह आहे. त्याची लांबी विषम संख्येत असावी. म्हणजे एक इंच, तीन इंच, सात इंच इ. स्वस्तिकांच्या भुजांची रुंदी लांबीच्या १० ते १२ टक्के असावी. स्वस्तिकाचे रंग इंद्रदानुष्याच्या रंगाशी मिळते हवेत. सध्या बाजारात उपलब्ध व्हायोलेट रंगात तांबडा रंग कमी आहे.तो जांभळा हवा. स्वस्तिक हे कागदावर (शक्यतो पांढरा), सफेद कापडावर, थार्मोकोलवर, पांढर्या प्लास्टिक शीटवर काढले तरी चालते. स्वस्तिक निट आखून घेऊन काढणे चांगले. यासाठी वाॅटर कलर, ऑईल पेंट, बाटिक पेंट, छपाई चे रंग व कोणत्याही प्रकारचे रंग चालतात. माझेकडे कार्ड पेपरवर छापून व लॅमिनेट करून घेतलेली स्वस्तिके तयार आहेत व ती चांगली उपयोगी पडत आहेत.
स्वस्तिक तयार करणे
स्वस्तिकाची लांबी व रुंदी पाच इंच पाहिजे. रेषांची जाडी अर्धा इंच. पांढरे कागदावर स्वस्तिक वाँटर कलरने काढून पुठ्याला चिकटवावे. नंतर प्लँस्टिकच्या पिशवी ठेवून वापरावे.लाल स्वस्तिक कुंकवात पाणी व थोडा डिंक किंवा फेवीकाँल घालून काढावे . तसेच पिवळे हळद वापरून काढावे.नंतर पुठ्यावर चिकटवून प्लँस्टिकच्या पिशवीत ठेवून वापरावे
अरविंद जोशी B.Sc.
९४२१९४८८९४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !
का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.
देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.
नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.06.2017
Copyright © 2025 | Marathisrushti