(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • एल निनो आणि त्याचे परिणाम !

    दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला देशात पावसाच्या आगमनाला सुरुवात होत असते. वेधशाळेच्या अंदाजानुसार त्याआधी सगळ्या प्रिंट मिडिया आणि वृत्तवाहिन्यांतून पावसाच्या आगमनाचे अंदाज वर्तवण्यात येत असतात. पण असे लक्षात येऊ लागले की अंदाज कुठेतरी चुकत आहेत! या सगळ्याला कुठलेतरी वातावरणातील बदल जबाबदार आहेत किंवा दैनंदिन जीवनात आपल्या हातून घडण्याऱ्या चुकीच्या कृतींचे पडसाद असतील. उदा. झाडे तोडणे त्या जागी नवीन झाडे न लागणे, त्यांचे संवर्धन न करणे, कारखान्यांतून आणि इतर गोष्टींतून वातावरणात प्रदुषित आणि विषारी वायूचे उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर होणे इत्यादी. काही प्रमाणत एल निनोचाही यात सहभाग असतो.

  • अंतराळात मानवी मोहिमेच्या दिशेने इस्रो अग्रेसर

    इस्रो जगाच्या अवजड आणि अब्जावधी डॉलर्सच्या प्रक्षेपण बाजाराच्या नव्या जगात पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. यासाठी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटामध्ये अग्निबाण प्रक्षेपण केंद्रात भूस्थैतिक उपग्रह प्रक्षेपण यान एमके-3 विकसित केले जात आहे. हा अग्निबाण आतापर्यंतच्या सर्वात अवजड उपग्रहांना वाहून नेण्यास सक्षम असेल असे सांगण्यात आले.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 37

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग अकरा

    नैवेद्य सेवन करून झाल्यावर हात तोंड धुवुन झाल्यावर आणखी एक अनोखा उपचार केला जातो. तो म्हणजे चंदन लावणे.
    "करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी" असा मंत्र म्हणून देवाच्या हाताला चंदन लावले जाते.

    हे चंदन, चंदन या झाडाच्या खोडापासून उगाळलेलं असावं. चंदनाची पावडर, गोपीचंदन, कुंकू पाण्यात कालवून गंध तयार करणे, अष्टगंध पाण्यात कालवणे, यापेक्षा चंदन उगाळून ते वापरणे हे देवाला आवडते. देवाला म्हणजे आपल्या देहातील अंतःस्थ देवाला !

    जेवढे जास्त उगाळावे तेवढा चंदनाचा सुवास आणि औषधी गुणधर्म बाहेर येत जातात.

    चंदन कपाळाला लावले जाते, ते औषध म्हणून ! अतिशय थंड गुणाच्या या चंदनाची उटी अंगाला लावणे, ही पद्धत दक्षिण भारतात आजही आहे दक्षिण भारतातल्या सर्व देवालयामधून चंदन उगाळणारी खास माणसे असतात आपल्याकडे जसा तीर्थप्रसाद देतात, तसा दक्षिणेकडे उगाळलेले चंदनाची गोळी प्रत्येकाच्या हातावर देतात, ती प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावावी, असा संकेत आहे. स्त्री आणि पुरूष असा भेद न करता हे चंदन लावले जाते. फक्त महाराष्ट्रात उभा टिळा लावतात, तर दक्षिणेत आडवा. एवढाच फरक. पण चंदन तेच. काम तसेच. औषधी गुण तेच.

    जेवणानंतर हाताला जेवणातील पदार्थांचा वास राहिलेला असतो. किंवा काही तेलकट पदार्थ हाताला चिकटतात. ते निघून जावेत, असं हे कर्मकांड. आजही आपल्याकडे जेवण झाल्यावर पानात राहिलेली लिंबाची फोड अथवा मीठाची चिमूट जेवल्या हाताला चोळून घेतात. ती याचसाठी. लिंबाच्या रसामुळे बोटांना लागलेला रस्सा, भज्यांचे तेल, लोणच्याचा अंश, आदि भोजनांश सहजपणे निघून जावेत. हात स्वच्छ व्हावेत. उगाळलेल्या चंदनाची जागा फक्त ताटातील लिंबाच्या फोडीने घेतली इतकेच ! कालानुरूप फरक पडतो तो हा असा !

    जेवणानंतर हाताला लागलेला मसाला आदि जरी अगदी विषारी नसले तरी दाह करणारे असतात. जसे पाटावरवंट्यावर मिरच्या वाटल्यानंतर बोटांची होणारी आग किंवा दाह केवळ पाण्याने धुऊन जात नाही, त्यासाठी तेल गुळ असे पदार्थ वापरावे लागतात. तसंच जेवणानंतर हाताला जो मसाल्याचा सूक्ष्म अंश असतो, तो जावा, यासाठी हे चंदन लेपन. हे कपाळावर नसून हाताला बोटाला आहे, हे लक्षात घ्यावे.

    जे जे देवासाठी ते ते देहासाठीच असते, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यातील कर्मकांडे ही मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात. ही शोधण्याची दृष्टी तोच देत असतो, यालाच देवाची कृपा म्हणतात. तोच कर्ता करविता मी निमित्तमात्र !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    30.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा

    नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.

    शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
    याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.

    सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
    एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.

    हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )

    नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.

    या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    29.06.2017

  • प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं आवश्यक आहे.

    काल-परवाच एक व्हीडीओ पाहिला. एका लहान मुलीला तिची आई हवीय. तिला भुकही लागलीय. पण ती ज्या शाळा नामक पिंजऱ्यात आहे, त्या पिंजऱ्याची टिचर नामक रिंगमास्टर तिला इंग्रजीतून प्रश्न विचारतेय. ती लहान मुलगी अगदी असहाय होऊन रडतेय, तर ती रिंगमास्टर तिला दम देऊन हसायला सांगतेय. काळीज पिळवटून जाणं काय असतं, ते हा व्हीडीओ पाहून कळतं आणि मनाचा संताप संताप होतो.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठ्ठ्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 35

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग नऊ

    देवाचे जेवण पूर्ण झाल्यावर ताम्हनात तीन पळ्या पाणी सोडायला सांगितले जाते. जर भटजींनी म्हटलेले मंत्र नीट ऐकलेत, तर यातील अर्थ लक्षात येतील. नाहीतर एकाबाजूने भटजी मंत्र म्हणताहेत, आणि दुसऱ्या बाजूला पूजा करताना यजमान मोबाईल वर बोलाताहेत, आणि यजमानीण आपला मेकअप करतेय, असे असेल तर हे केवळ कर्मकांड होते आहे असे समजावे. मग कावळे काव काव करायला टपलेले आहेतच. "अशी कर्मकांडे करण्यात वेळ कशाला घालवा ? जो नाहीच आहे त्याला नैवेद्य तरी कशाला दाखवा." वगैरे वगैरे.

    तर भटजी असं म्हणतात, तीन वेळा ताम्हनात पाणी सोडा.
    नैवेद्यान्तरेण आचमनीयम् समर्पयामि ।
    हस्तप्रक्षालनम् समर्पयामि ।
    मुखप्रक्षालनम् समर्पयामि ।

    जेवणानंतर एक वेळा आचमन करावे. देवाचे नाव घेऊन एक पळी पाणी तळहातावर घेऊन पिणे म्हणजे आचमन करावे.

    खरंतर प्रत्येक घासच देवाचे नाव घेत तोंडात घालायचा असतो. निदान तसा भाव तरी ठेवायचा. "आतले अन्न पचवायला मी आता देवाला सांगितलेले आहे, आता मला काळजी नाही, त्यातील गुणदोष तो बघेल."
    खाताना भीती नसावी आणि खाल्ल्यानंतर आठवण न यावी. या दोन्ही गोष्टी देवाच्या स्मरणाने साध्य होतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, "तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता. ( फक्त माझे स्मरण करत अन्न गिळायचे...) म्हणजेच केलेले कर्म तू मला अर्पण करणे. मी तुला त्याचे योग्य ते फळ, वेळ आल्यावर देणार आहे. यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे पचन सुलभ होते.

    आचमन करण्याने, अन्ननलिकेला आतील बाजूला लागलेले अन्न पुढे ढकलून अन्न नलिका धुतली जाते. एवढंच पळीभर पाणी जेवणानंतर घ्यावे, हा पण एक सोयीस्कर अर्थ.

    जेवणानंतर देवाचे हाय धुवायला पाणी दिले जाते, तोंड धुवायला, चूळ भरायला, त्याच्या हातावर पाणी घातले जाते. केवढी एकरूपता साधली जाते. आपल्याकडे जेवायला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा आपण असाच उपचार करावा. ( केवळ व्हीआयपी पाहुण्यांना नको )

    त्याही आधी जेवल्यानंतर हात धुवायचे असतात आणि खळखळून चूळ भरायची असते, एवढे तरी सांगितले गेलंय.? कोणासाठी सांगितले असेल हे कर्मकांड ? देव जो स्वतः निर्लेपी, निर्मोही, निर्गुण निराकार आहे त्याच्यासाठी ???
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी.

    वीतभर वाटीत बोटं बुचकळली आणि टीचभर पेपरला तोंडं पुसली की झालं हस्तमुख प्रक्षालन ! काय चाललं आहे ? कुठे भारतीय संस्कारातील दोन्ही हात स्वच्छ धुणे, खळखळून चुळा भरणे आणि कुठे पाश्चात्य प्रकारातील वाटीभर पाण्यात फक्त एका हाताची बोटे बुडवणे आणि ओठावरून कागद फिरवणे ?

    नियमितपणे जर पाण्याने खळखळून चुळा भरल्या जात असतील तर दात किडत पण नाहीत, चुळ भरण्याने दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून जातात. आणि दाताला किड लागण्यापासून वाचवले जातात, म्हणून काही खाल्ल्यानंतर तोंड धुवावे, हात धुवावेत, हे देवपूजेच्या माध्यमातून दररोज सांगितले जाई.

    पाश्चात्य देशात हस्त, मुख प्रक्षालन कसे करावे हे माहितीच नव्हते, वेळ मिळेल तेव्हा, पावासारखे सुके पदार्थ फिरत फिरत खायचे, आमटी भाजी, चटणी लोणचे असे ओले पदार्थच त्यांच्या ताटात न आल्याने, हाताला अन्न चिकटत नव्हते. त्यामुळे तोंड, हात धुणे हा संस्कार त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हता.

    अन्न हातानी मुरडणे, कालवणे, एका हातानी त्याचे घास करणे, एका हातानीच खाणे, खाल्ल्यानंतर हात उष्टे होतात, म्हणून ते धुणे, हे त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हते. त्याचा परिणाम म्हणून या सर्व पाश्चात्य लोकांना दात आणि हिरड्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निवारणासाठी दंततज्ञ !! आपल्या गावात, तीस वर्षापूर्वी किती डेन्टीस्ट होते, आणि आता गावामधे दंततज्ञ किती आहेत ? ओझरता सर्व्हे केलात तरी, यांची वाढलेली संख्या लक्षात येते. या दातांच्या रोगाची मूळ कारणे कुठे आहेत, कशात आहेत, याचा एकदा शोध घेतला पाहिजे.

    ज्या पाश्चात्य देशात एकेकाळी दात घासणे, चुळ भरणे, गुळण्या करणे कधी माहितीच नव्हतं, त्यादेशातील लोकांनी, ज्या भारत देशातील वयोवृद्धांचे बत्तीस दात स्मशानामधे सुद्धा मोजून घेतले जात... अश्या आमच्या भारत देशातील लोकांचे, "मौखिक आरोग्य कसे चांगले राहील?" यावर चर्चासत्रे घ्यावीत, यापेक्षा मोठा विनोद नाही.

    ........पण आज जमाना बदल गया है। यालाच "कलियुग" असे नाव. दुसरं काय म्हणणार ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    28.06.2017

  • सख्यांसह ‘मुंबई हेरीटेज फेरी’

    मी मुंबई एकट्यानं किंवा एक-दोघांना सोबत घेऊन खुप फिरलो. एकट्यानं तर किती भटकलो, त्याची गणतीच करता येणार नाही. पहिल्या पहिल्यांदा कुतुहलाने आणि मग अभ्यासासाठी. एकेका ठिकाणी कितीही वेळा गेलो, तरी दरवेळी नव्यानेच काही तरी सापडायचं तरी किंवा तेच ठिकाणं नव्याने उलगडायचं तरी..

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 34

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग आठ

    नैवेद्य दाखवताना देवाला घास भरवायचे. त्याचा मंत्र आहे, "नैवेद्यम् समर्पयामी." असे म्हणून घास भरवायचे. थोडं थांबून देवाला पाणी प्यायला द्यायचे. त्याचा एक मंत्र असा आहे. "नैवेद्यम् मध्येपानीयं समर्पयामी ! " असे म्हणून देवाला थोडे भरवून झाल्यावर मधेच, ताम्हनामधे एक पळी पाणी सोडावे. आणि पुनः देवाला सहा घास भरवायचे.
    हे झाले कर्मकांड.

    यात देहासाठी काय आहे ?
    हे सर्व जेवायचे कसे पाणी कसे प्यावे याचे शुद्ध आयुर्वेदीय नियम आहेत. जे जे देवासाठी ते ते देहासाठी.

    आयुर्वेद मतानुसार पाणी जेवताना मधेमधेच प्यावे म्हणजे प्रकृती सम रहाते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने बारीक व्हायला होते,
    आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाड व्हायला होते. अर्थात आपण कसे पाणी प्यावे, हे आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजेच वैद्य सल्ला महत्त्वाचा ! उगाच आपले आपल्यावर प्रयोग करू नयेत.

    पण सर्वसाधारणपणे पाणी जेवताना मधे मधेच प्यावे, हा नियम आहे हे लक्षात ठेवावे. यासाठी हा नियम देवपूजेमध्ये देखील समाविष्ट केला गेलाय. "मध्ये पानीयं समर्पयामी....."

    पाणी कोणी किती कसे आणि का प्यावे, याविषयी सविस्तर टीपा मागील वर्षीच येऊन गेल्या आहेत. पुनरूक्ती दोष टाळतो. फक्त एक उदाहरण सांगतो, नारळाचे दूध किंवा नारळाचा रस काढायचा असेल तर, नारळ वाटतानाच त्यामध्ये पाणी घालावे लागते. अन्यथा रस चांगला निघत नाही.
    स्लॅब घालताना वाळू, सिमेंट, खडी, मिक्सरमध्ये एकत्र फिरवतानाच त्यात पुरेसे पाणी मिसळले जाते. अन्यथा लोखंडाच्या फ्रेममध्ये हे मिश्रण योग्य रितीने पसरलेच जाणार नाही. तसेच पाणी जेवता जेवता मधे मधे, स्वतःला आवश्यक असेल तेवढे, जरूर प्यावे. म्हणजे पुढे अन्नरस चांगला तयार होतो. कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, डायेटीशियन बोलली म्हणून, टीव्ही वर दाखवले म्हणून, अथवा कोणीतरी पाश्चात्य बुद्धीचा डाॅक्टर सांगतो म्हणून आपण आपल्या भारतीय भोजन परंपरा अजिबात बदलू नयेत. पारंपारिक आहार तसाच घ्यावा. आहाराचे जे अगदी साधे सोपे नियम आहेत, ते उगाच क्लीष्ट करून, शरीरामधे ताण वाढवणारे, चुकीचे नियम, चुकीच्या समर्थनासह करून, सोपे साधे जीवन कठीण करून, रोग वाढवून घेणे आहे.
    त्यामुळे पाणी फक्त जेवतानाच प्यावे. तहान नसताना, अन्य वेळी अजिबात नको. अन्य वेळी जे पाणी प्यायचे ते फक्त तळहाताच्या मधे राहील एवढे पळीभरच प्यायचे असते, हा नियम देखील देवपूजेतील आचमनातून आपण शिकलो आहोत.

    "मग बाकी सर्वजण पाणी जास्ती प्या" असं का सांगतात? ते त्यांनाच माहिती !!! आपल्याला तहान लागली की, स्वतःला तहान असेल तेवढे पाणी, आपणच ठरवून प्यायचे असते. एवढे लक्षात ठेवावे. बाकी विषय संपला.

    तर देवपूजा करणे हे सर्व जीवनावश्यक नियम समजावून सांगणे आहे. हे दररोज सांगावे लागतात. नाहीतर आपली चंचल बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हे सर्व उपचार दररोजच्या पूजेमधेच समाविष्ट करून टाकले.
    सततम् क्रिया अभ्यासः । एखादी क्रिया सतत केली गेली की ती अंगवळणी पडते.

    आजीआजोबा, आईबाबा यांनी जे नियम ठरवले ते तसेच पाळायचे असतात. स्वतःच्या पाश्चात्य बुद्धीने त्यात बदल केला की, पुढील पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे भरपूर पाणी प्या, म्हणून एका वडील पिढीने सांगितल्यामुळे आताच्या पुढील पिढीमधे पाण्यामुळे होणारे प्रमेह, रक्तदाब, संधीवात, इ.इ. रोग वाढलेले दिसतात. हे "जनुकीय" बदल नाहीत तर जीवनशैलीतील बदल आहेत, जे आपण बदलवू शकतो. ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका जर सहवास आणि साहचर्याने जर पुढील पिढी करीत राहिली तर जनुकीय बदल न होता, चुकीची जीवनशैलीजन्य रोगांची संख्या मात्र वाढतेय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर पहातोय.

    आपणाला हे सर्व बदलायचे आहे. रोग कमी करायचे आहेत. डायबेटीस रक्तदाब पीसीओडी थायराॅईड यावरील गोळ्या एकदा सुरू झाल्या की, त्या कायम स्वरूपात घ्याव्याच लागतात, हे धादांत खोटे गृहीतक, रोगाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकायच्या आहेत, जीवनशैलीतील दोष काढून टाकून, निरोगी, निरामय, निर्रौषध, जीवनशैली परत स्थापन करायची आहे. यासाठीच ही माझी देवपूजा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग शहात्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 33

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग सात

    मुळातच चंचल असलेला वात वाढू नये, यासाठी आधीच वाताला शांत करून घ्यायचे. विरोधकांना कसे चहापानाला बोलावतात तसे ! यासाठी त्या प्रत्येकाचे नाव घेऊन पुकारा करायचा..
    प्राणाय स्वाहा
    अपानाय स्वाहा
    व्यानाय स्वाहा
    उदानाय स्वाहा
    समानाय स्वाहा
    ब्रह्मणे स्वाहा

    अन्न गिळण्याचे काम करणारा वात म्हणजे प्राण, ढेकर काढून पोचपावती देणारा वात म्हणजे उदान, अन्नाला आतमध्ये नेऊन मिक्सरमध्ये फिरवणारा, अग्निला प्रज्वलीत करणारा तो समान, अन्नाला पुढे पुढे ढकलत नेणारा अपान आणि तयार पोषकांशाचे रक्तात रूपांतर झाल्यावर ही उर्जा, ह्रदयामार्फत सर्व शरीरात आत बाहेर फिरवणारा तो व्यान. असे हे पाच भाऊ, भांडण न करता, नेमून दिलेले काम चोख बजावत असतात. पित्त आणि कफ हे दोघेही पंगु. स्वतःची गती नाही. वात येऊन ढकलणार, तेव्हा या पित्त आणि कफाचे काम पूर्ण होणार. म्हणून पित्त कफापेक्षा व्रात्य वाताला जिंकण्यासाठी या आहुत्या फक्त वातालाच !

    सर्व सामर्थ्यवान ब्रह्मरूप असलेल्या वाताला माझा नमस्कार असो. मी सेवन करीत असलेल्या भोज्य चोष्य लेह्य पेय अशा चारही प्रकारचे अन्नाचे पचन नीट होवो. आणि त्यापासून ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये मन, शरीरातील आणि बाहेरील सर्व अवयव यांचे उत्तम प्रकारे पोषण होवो, या सेवन करीत असलेल्या आहाराने, मला माझे धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त करणे, या पुरूषार्थाच्या प्राप्तीसाठी उत्तम बुद्धि आणि शारीर मानस आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होवो, अशी प्रार्थना या पाच प्रकारच्या वातांकडे करावी.

    असे म्हणून वाढलेल्या पानाभोवती पाणी फिरवायचे हे झाले कर्मकांड.

    आता देवाला सांगायचे,
    "हं, करा सुरवात ! होऊ दे सावकाश !"
    तो आपल्या हाताने स्वतःच कुठला जेवतोय.?
    मग आपण मानसभावाने त्याला एकेक घास भरवायचा. जणुकाही समोर देव बसलेलाच आहे, तसा भाव ठेवीत भरवावे. बाळ नीट पोटभर जेवला म्हणजे स्वतः न जेवता आईचे पोट भरते तसे आहे. मध्ये मध्ये थोडावेळ थांबावे. त्याला घास चावायला गिळायला वेळ द्यावा. बकाबक, घाईघाईने जेवणाऱ्या (गिळणाऱ्या) मंडळींना ह्रदयरोग होतात, असेही वाचनात आले आहे.

    जेवण म्हणजे "जाणिजे यज्ञकर्म " असं समर्थ रामदास स्वामी देखील सांगत आहेत. जो यज्ञ असतो, त्यात आहुती घालताना देखील सावकाश अर्पण करायची असते. नाहीतर अग्निच्या ज्वाला तयार न होता, नुसता धुरच होईल. ऐसे न व्हावे.

    तोंडात घेतलेला घास आपण किती वेळ इकडे तिकडे फिरवतो, यावर आज थोडे लक्ष द्यावे. सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस वेळा, अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे पंचवीस वेळा आपण घास चावतो. आणखी फक्त पाच सात वेळा जास्ती चावावा, म्हणजे घास बत्तीस वेळा सावकाश चावायचा, दात बत्तिस असतात, प्रत्येक दाताला त्याचे काम द्यावे म्हणजे पचन व्यवस्थित होते. अर्धे पचन तोंडातच करून घेतले की पोटातील पुढील अवयवांवरचा ताण आपोआपच कमी होतो.

    सर्व काही चालले आहे ते पोट भरण्यासाठीच ना. मग तिथे घाई कशाला ? घाई घाईने जेवून पोट बिघडवून घ्यायचे आणि जास्त काम करून मिळवलेले पैसै तब्येत ठीक होण्यासाठी परत डाॅक्टरना देऊन टाकायचे ? म्हणजे पैसे कोणासाठी मिळवायचे ?
    या निमित्ताने याचा पुनः एकदा विचार करावा लागेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    26.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचाहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा

    देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
    कशासाठी?
    वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )

    एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
    असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )

    सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !

    अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
    काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !

    बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !

    काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.

    चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.06.2017