वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मलेरिया व बर्किट लिम्फोमा - ( एक प्रकारचा कॅन्सर ) यांचा संबंध
बर्किट लिम्फोमा हा एक प्रकारचा जबड्याच्या खालच्या बाजूचा कॅन्सर असून तो अफ्रिकेत व मुख्यतः लहान मुलांमध्ये ९ ते १२ वर्षे या वयोगटात आढळतो . आता जगातील दुसऱ्या काही भागातूनही अशा केसेस नोंदल्या गेल्या आहेत .
प्रसिद्ध सर्जन डॉ . बर्किट व त्यांचे दोन सहकारी डॉ . क्लीफ नेल्सन व डॉ . टेड विल्यम यांनी अफ्रिकेत १० आठवड्यामध्ये १०,००० मैलाचा प्रवास केला व ५७ हॉस्पिटलस्ना प्रत्यक्ष भेट दिली . साधारण १ ९ ६० सालाच्या सुमारास हा सर्व प्रवास त्यांनी २०३५ डॉलर्स खर्चून केला . यामधून निष्कर्ष असा निघाला की बर्किट लिम्फोमाची भौगोलिक स्तरावरील उपस्थिती ही मलेरिया रोगाच्या भौगोलिक विभागातील उपस्थितीशी तंतोतंत जुळणारी होती . हा लिम्फोमा एखाद्या विषाणूमुळे होत असावा व त्यासाठी डास त्याचा वाहक असावा असे वाटत होते . विविध प्राण्यांमध्ये विषाणूंमुळे कर्करोग होतो हे सिद्ध झालेले आहे . परंतु माणसांतही विषाणू हे कर्करोग निर्माण करू शकतात हे सिद्ध झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली होती . १ ९ ६४ मध्ये Epstein व Barr यांनी या कॅन्सरच्या गाठींमधून विषाणू अलग केला .
याठिकाणी मलेरियाचा संबंध असा आला की सतत होणाऱ्या मलेरियामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व त्यामुळे संरक्षण देणाऱ्या T. Lymphocytes निष्प्रभ ठरतात . T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ झाल्याने बर्किट लिम्फोमा होतो . तसेच मलेरियाचे परोपजीवी CIDRI नावाचे प्रथिन तयार करतात ज्यामुळे Ebstein Barr Virus वाढण्यास मदत होते . हे विषाणू T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ घडवितात व त्यामुळे लिम्फोमा होतो . या परिस्थितीत E B Virus मलेरिया व बर्किट लिम्फोमा असे संगनमत घडून येते .
अर्थात प्रत्येक मलेरिया रुग्णाला हा कर्करोग होण्याची अजिबात शक्यता नाही .
अफ्रिकेतील एक अनुभव
अफ्रिकेतील काही भागात एका विशिष्ट प्रकारच्या परोपजीवांमुळे ( Onchocer ciasis , River blindness ) हा डोळ्याचा रोग होतो . त्यासाठी Ivermectin or Mectizan हे प्रभावी औषध दिले जाते . असे आढळून आले आहे की हे औषध घेतलेल्या रुग्णांना ज्यावेळी डास चावतात तेव्हा ते डास लवकर मरतात . यावरून काही शास्त्रज्ञांना असे वाटते की हे औषध माणसाला दिल्यास ते डासांसाठी मृत्यूला कारण ठरू शकेल . साधारणत : नवीनच तयार ( young ) झालेल्या डासांमध्ये मलेरियाच्या परोपजीवींची पुरेशी वाढ झालेली नसते परंतु या परोपजीवींची पूर्णपणे वाढ होऊन परिपक्व ( old ) झालेल्या डासांकडून मलेरिया रोगाचा प्रसार होण्यास जास्त मदत होते . अशा औषधाने डासांचे आर्युमान कमी केल्यास मलेरिया प्रसारावर आळा घालता येईल .
ह्या अचाट प्रयोगात कायम स्वरुपाचे यश मिळविण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत . हे औषध सरसकट सर्वांना देणे कितपत योग्य ठरेल याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत .
मनुष्य घेतो गोळी -डास घेतो चावा आणि मृत्यु होतो डासाचा !
( From The American Journal of tropical Medicine July 2011 , Quote Indian Express -13/07/2011 )
दुर्गंधित मोज्यांचा मलेरिया या रोगाच्या निर्मूलनासाठी होणारा उपयोग
एखाद्या उघड्या जागेवर वापरलेल्या जुन्या मोज्यांचा ढीग करून त्यातून निघणाऱ्या दुर्गंधाकडे डास आकर्षिले जातात असे आढळून आले आहे . अशा तऱ्हेने फसवणूक करून ह्या डासांना एकत्रित केल्यानंतर त्यांच्यावर डासांसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी रसायनाचा फवारा मारल्यास ते डास मरतात . अशा आकर्षण पद्धतीने डास एकत्रित होण्याचे प्रमाण वाढविता येते असा दावा टांझानिया इफाकारा संस्थेचे प्रमूख डॉ . फ्रेड्रॉस ओकुमु यांनी केला आहे .
प्रगत देशात मलेरियाचे प्रमाण कमी होत आहे परंतु विकसनशील देशात हे प्रमाण वाढतच आहे . डच वैज्ञानिक डॉ . बार्ट नोल्स यांनी प्रथम वरील सिद्धांत मांडला . ते स्वतः एका काळोख्या खोलीत नग्नावस्थेत उभे राहिले व त्यांनी दाखवून दिले की डास पायाच्या वासाकडे सर्वांत जास्त आकर्षिले जातात .
ओकुमु यांनी आठ रसायने एकत्रित करून पायमोज्यांना येणाऱ्या वासासारखे रसायन तयार केले आहे . शिवाय डासांना मारण्यास योग्य असे विषारी द्रव्यही प्रयोगशाळेत बनविले आहे . त्यांचा दावा आहे की ९ ५ टक्के डास या पद्धतीने मरतात . या संशोधनासाठी डॉ . ओकुमु यांना बिल गेट फाऊंडेशन कडून आठ लाख अमेरिकन डॉलर्सची भरघोस मदत मिळालेली आहे .
हे रासायनिक सापळे माणसांच्या घरांच्या फार जवळ ठेवणे योग्य नाही कारण तेथे आकर्षित झालेले डास माणसांनाही चावण्याची शक्यता जास्त असेल . त्याचप्रमाणे ते मनुष्य वस्त्यांपासून फार दूर ठेवले तरी तेथे फारसे डासांचे वास्तव्य नसल्याने प्रयोग उपयोगी ठरणार नाही . आज या रासायनिक सापळ्यांची किंमत ४ ते २० डॉलर्सच्या दरम्यान आहे . मानवी जीवन वाचविण्यासाठी ही दुर्गंधीयुक्त मोज्यांची योजना कितपत यशस्वी होऊ शकेल असा प्रश्न शास्त्रज्ञांपुढे आहे .
-डॉ. अविनाश वैद्य
November 4, 2022
विष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे.
September 17, 2023
जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.
तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.
कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’
त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’
त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.
मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’
आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
आता कबीरजी चकित झाले होते.
सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.
कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’
जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.
कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.
जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’
कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.
एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.
-- WhatsApp वरुन
July 8, 2017
प्रत्येकाने आपले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ठरलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम होणे हे तर उत्पादकतेचं प्रमुख परिमाण आहे. आपापले काम वेळेवर पूर्ण करणे हे केवळ संस्थेच्या हिताचेच नव्हे तर आपले जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी, वेळेचा सदुपयोग करून अनेक व्याप सांभाळण्यासाठी उपयुक्त आहे. गेलेला क्षण परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षण सत्कारणी लावावा लागतो. त्यासाठी आवश्यक आहे ती कामांची क्रमवारी ठरवणे.
October 14, 2018
समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले.
October 22, 2021
मानवजातीच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. हा प्रसंग जेव्हा टेलिव्हिजनवर दाखविण्यात आला, तेव्हा जगातील १/५ लोकांनी तो बघितला. अपोलो-११ या यानाने १६ जुलै १९६९ रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली.
July 20, 2021
वे’रुळ व एलोरा किंवा अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती जरी इ. स. १ ते इ. स. १४ च्या दरम्यान झाली असली तरी त्या आपल्याला आता आता म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानवर होतं त्या काळात जगाला वेरुळ कळाल्या. डोंगररांगांमध्ये ही निर्मिती झाली. जळगावजवळ अजिंठा तीन डोंगरांमध्ये अजिंठा लेण्यांत चित्रकला साकारली. या व अशा प्रकारच्या लेण्या या महान राष्ट्रात… ‘महाराष्ट्रात’ सुमारे एक हजारांवर आहेत.
April 29, 2024
अरेरेरे… काय दिवस आलेत राव…! ज्या हातांनी पोरांना केमिस्ट्रीचे फॉर्म्युले शिकवून डॉक्टर-इंजिनिअर बनवायचं स्वप्न दाखवलं, त्याच हातांत आज सीबीआयने कायद्याच्या बेड्या ठोकल्या. ज्या डोक्याने ‘गोल्ड मेडल’ जिंकलं, त्याच डोक्याने अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडला. शिवराज मोटेगावकर! लातूर पॅटर्नचा स्वतःला ब्रँड म्हणवून घेणारा, १ हजार कोटींच्या साम्राज्यावर सुबत्ता भोगणारा हा माणूस आज मान खाली घालून पोलिसांच्या गाडीत बसलाय. पण राग या गोष्टीचा नाही की एक मोठा माणूस जेलमध्ये गेला;
March 26, 2026
अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्णांच्या अतिमहत्त्वाच्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्या वापरामुळे रुग्णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्येकांना जीवदान मिळाले आहे.
March 31, 2019
गुगल वर सर्च केल्यास १५०० वर्षांपूर्वी वगैरे चहाचा शोध चिनी लोकांनी लावला , मग इ.स.१८०० मध्ये इंग्रजांनी कलकत्त्याच्या चौका चौकात लोकांना फुकटात चहा वाटत भारतियांना चहाचे व्यसन लावलं वगैरे वाचायला मिळते…
December 16, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti