वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं.
राज्यात पोलीसांच्या सशस्त्र मानवंदनेचा बहुमान असलेली केवळ दोन मंदिरे आहेत. पैकी पंढरपूरचे विठ्ठल देवस्थान हे पहिले आणि त्यानंतर रोह्यातील ग्रामदैवत असलेले धावीर महाराज हे दुसरे मंदिर होय. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखीला पोलीसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
“जवा आगळं काशी” अर्थात काशी पेक्षा देखील एक जव भर अधिक महत्त्व असलेले स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र स्थित ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान परळी वैजनाथ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११-१४ मार्चचा सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंकेचा दौरा, प्रदीर्घ काळापासून उपेक्षित हिंदी महासागरातील देशांशी संबंध वाढविण्याचे पाऊल आहे. सेशेल्सची एकूण लोकसंख्या ८७ हजार आहे.११५ लहान-लहान बेटांनी बनलेल्या सेशेल्सचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४५५ वर्ग किलोमीटर आहे.
भारतात असताना, शाळा कॉलेजच्या लॅब्जमधे गाणी ऐकण्यासाठी रेडिओ, टेपरेकॉर्डर वगैरे गोष्टी स्वप्नात देखील येणं शक्य नव्हतं. पुढे NDDB च्या गुजराथमधील फार्मवर, गायींमधे भृणप्रत्यारोपण (Embryo Transfer) च्या लॅबमधे काम करताना आम्ही “साब” झालो होतो. त्यामुळे सायबासारखं वागणं भाग होतं. “साब” लोक बिहारपासून राजस्थानपर्यंत आणि पंजाबपासून केरळापर्यंत वेगवेगळ्या राज्यातले होते. त्यामुळे गाण्याची आवड निवड जुळणं अवघड होतं. नवरात्रीच्या दोन तीन आठवडे आधीपासून, फार्मच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर, चहाच्या टपरीवर, गरब्याची गाणी तारस्वरात ऐकू येऊ लागत, ती पार नवरात्र संपेपर्यंत चालू राहत. तेवढाच काय तो लॅबचा आणि संगीताचा ओढून ताणून संबंध.
कनेक्टिकटला UCONN (युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट) च्या लॅबमधे आलो तो जणू बीजींग किंवा शांघायला गेल्यासारखं वाटायला लागलं. माझे Ph. D. चे गाईड डॉ. यॅंग हे स्वत: चायनीज. त्यांची चायनीज पत्नी आमच्याच डिपार्टमेंटमधे असोसिएट प्रोफेसर. डॉ. यॅंगच्या लॅबमधे M.S., Ph.D., Post Doc students मिळून १४-१५ जणांचा ग्रूप होता. त्यातले दहाजण चायनीज. त्यामुळे लॅबमधे First Language चायनीज आहे की काय असा प्रश्न पडायचा. त्यात भर म्हणून पार्श्वभूमीवर कायम चायनीज संगीत चाललेलं. एकही शब्द समजण्या़चा प्रश्नच नव्हता. नुसतं शांत, एकसुरी संगीत कानावर पडत रहायचं.
सहा महिन्यांनी, आयोवा राज्यातल्या Trans Ova Genetics ह्या कंपनीमधे माझ्या संशोधन प्रकल्पावर काम करायला येऊन दाखल झालो. येथे लॅबमधे सगळे गोरे अमेरिकन्स. काम भरपूर आणि कामाचा उरकही चांगला. इथेदेखील दिवसभर लॅब्ज, ऑफिस, कॅंटीन वगैरे सर्व ठिकाणी एखादं रेडिओ स्टेशन चालूच असायचं. ते बंद करायची पद्धतच नाही. त्यामुळे कधी संध्याकाळी, रात्री कामासाठी लॅबमधे, ऑफिसमधे जायचं असलं की दार उघडलं की अंधारात एकदम हे संगीतच कानावर पडून दचकायला व्हायचं. पुढे मग त्याची सवय झाली. एकूणच अमेरिकन लोकांना काम करताना शांततेचं वावडं असावं.
माझा आणि इंग्लिश संगीताचा संपर्क जुजबी म्हणण्याइतपत देखील नव्हता. लहानपणी दुपारी ११ ते ११॥ वाजता रेडिओवर मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम असायचा. आजी घरातली कामं करता करता रेडिओ ऐकायची. शाळेची तयारी करता करता गाणी कानावर पडत रहायची. पुढे रात्रीच्या वेळचे, “बिनाका गीतमाला”, “बेला के फूल”, हे कार्यक्रम, त्यातल्या जुन्या सुंदर गाण्यांमुळे आवडीचे झाले होते. गाण्यातली माझी आवड जुन्या वळणाची. मराठीतली जीवाची माणसं म्हणजे सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, अरूण दाते, माणिक वर्मा आणि सुमन कल्याणपुर. गजाननराव वाटवे, मालती पांडे आणि ज्योत्स्ना भोळेंचं नाव खूप ऐकून होतो, पण प्रत्यक्ष त्यांची गाणी फारशी ऐकायला मिळाली नाहीत. नाट्यसंगीतातलं कळत फारसं नाही पण ऐकायला मात्र आवडतं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर ही दिग्गज मंडळी आवडीची. हिंदीमधे १९५० -१९६० ची दशके म्हणजे संगीताचा सुवर्णकाळ. मुकेश, तलत मेहमुद, हेमंत कुमार, महमद रफी, मन्ना डे, किशोर कुमार, लता, आशा, गीता दत्त हे गायक, गायिका आणि शंकर जयकिशन, सचिन दा, नौशाद, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, ओ.पी.नय्यर, सलील चौधरी, रोशन, खय्याम हे संगीतकार जीवाचे. त्यामुळे अमेरिकेला येताना मी मराठी आणि हिंदी जुन्या गाण्यांच्या कॅसेट्सचा मोठा खजिनाच बरोबर आणला होता. वेळ मिळेल तेंव्हा या चायनीज आणि अमेरिकन संगीताच्या तावडीतून सुटून एखादं मुकेश किंवा सुधीर फडक्यांचं गाणं ऐकलं की मन भूतकाळांत जायचं. या सार्या पार्श्वभूमीवर मी कंट्री म्युझिक कान देऊन ऐकायला लागीन आणि हळूहळू त्याची गोडी लागून मी त्याच्या प्रेमात पडेन असं कधीच वाटलं नव्हतं.
-- डॉ. संजीव चौबळ
जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती.
खरंच काही न करता आयतं काही मिळालं नां की त्याची किंमत रहात नाही माणसाला. स्वातंत्र्याचंही तसंच झालंय. आम्ही इतिहासात डोकावून पाहायला तयार नाही आणि त्यातून शिकायला तर नाहीच नाही. कारण आजच्या राज्यकर्त्याजवळ या जिवंत इतिहासाकडे निस्वार्थ भावनेने पाहायला वेळ नाही. मग आपल्या इतिहासाची नाळ आजच्या जीवनाशी जुळायची कशी? एव्हढाच प्रश्न आहे.
येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात….

आज दीपपूजनाचा दिवस...
सनातन हिंदू संस्कृती जपणा-या प्रत्येक घरात आज, 'तेज' आपल्यापर्यंत आणणा-या दिव्यांना पुजलं जातं...
काही घरात आज दिवे स्वच्छ धुवून केवळ पुजले जातात तर काही ठिकाणी हेच दिवे स्वच्छ धुवून पुन्हा एकदा लावले जातात ..पद्धती वेगळ्या मात्र भावना सारखीच...
मानवाची उत्क्रांती झाली, निसर्गात असलेल्या किमयांचा एक एक करून मानवाला शोध लागू लागला...त्याचे वेगवेगळे उपयोग मानव करू लागला...
मात्र अग्नी आपल्यापुढे कुठल्या रूपात प्रदीप्त झाल्यावर त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात हे मानवाला समजायला अनेक वर्षांचा काळ लोटला...
उदाहरणार्थ होळीची पूजा करताना आपल्यामधे एक ऊर्जा संचारते..काही काळ होळीसमोर उभं राहिल्यावर अंगात शक्ती संचार झाल्याचा अनुभव आपण नक्कीच घेतला असणार. वाईट शक्तीला भस्म करून वातावरणात प्रचंड सकारात्मकता पसरवण्याचं सामर्थ्य होळीत आहे.
हेच जर का आपण चिते समोर उभे असू तर गेलेल्या देहाला सद्गती मिळावी ,त्याची वाईट कर्म अग्नीत भस्म होऊन पावित्र्य घेऊन त्याने पुढल्या प्रवासाला निघावं ही भावना आपल्यात निर्माण होते..मन काहीसं उदास असलं तरी त्यातही नकारात्मकता जाणवत नाही. मात्र होळीइतकी ऊर्जाही जाणवत नाही.
देवघरातल्या दिव्यासमोर बसलं की मात्र जो परिणाम आपल्यावर होतो तो या सगळ्याहून वेगळा..मला नेहमी असं जाणवतं की देवघरातला दिवा लावला, मग तो समई च्या रूपात असो ,लामण दिवा असो, निरांजन असो किंवा अगदी पणती असो....हा दिवा लागताच एक दिवा आपल्या आतही प्रज्वलित होतो..आपल्याला आतून शांत करणारा , दिवसभरातले विचार बाजूला सारून मन निर्विकार करणारा..मन शुद्ध करणारा..म्हणूनंच सायंकाळच्या वेळेला दिवेलागणीची वेळ म्हणतात. आपल्या हिंदू संसकृतीत याला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवसभराची कामं, धावपळ सगळ्यातून आपण काही मिनिटं स्वतःकरता काढणं अत्यावश्यक असतं...रोजच्या रोज मनाचं हे शुद्धीकरण होऊन पुन्हा दुसर्या दिवशी एक स्वच्छ मन (mindset) घेऊन आपण दिवसाची सुरूवात करावी हा मोठा विचार यामागे केलेला आहे..
काळाच्या ओघात दिवेलागण, शुभंकरोती म्हणणं मागे पडलेलं दिसतं...
आता मात्र आपण हे न चुकता करावं व आपल्या पुढल्या पीढीलाही हे करण्याकरता प्रेरित करावं.. तरंच हे संस्कार पिढ्यांपिढ्या हस्तांतरित होऊन टिकून राहतील..
ll शुभम् भवतू ll
ll तेजस्वी भव ll
-गौरी सचिन पावगी
Copyright © 2025 | Marathisrushti