वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे हृदय असते, ते बंद पडले तर संगणक कामच करू शकत नाही.
September 5, 2023
शेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे
October 5, 2018
स्टेट बँकेत 1984 साली नगर जिल्ह्याचा श्रीरामपूर शाखेत कॅश ऑफिसर म्हणून माझी बदली झाली. शाखा बऱ्यापैकी मोठी, जवळपास सहा-सात साखर कारखाने असलेली ही शाखा. अर्थातच कॅशचे व्यवहार मुबलक प्रमाणात व्हायचे. त्यातून त्या वेळेस चिल्लरची (अगदी 10-20 पैशापासून 1 रुपयापर्यंत) कमतरता खूप जाणवायची.
April 30, 2023
ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे 'ऑन वे' या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.
‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.
घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 19, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक
जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ?
सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद आहे. " आमच्याकडे कापसाची शेतं लावली आहेत, आणि घरात तेल जास्ती झालंय म्हणून नाही दिवा लावत आपण. तर जे अनाकलनीय आहे, ते तुझ्या दिव्यत्वाच्या प्रकाशानं उजळून जाऊ दे ! अज्ञानाचा जो अंधःकार आमच्या मनात आहे, तो तुझ्या प्रकाशाने निघून जाऊ दे, अशी प्रार्थना असते दिव्याकडे ! "
आपल्याकडे अजून तरी देवघर नावाचा, कोनाडा का होईना, शिल्लक असलेल्या जागेत थोडी जागा राखीव ठेवलेली असते. त्यात रात्री मधेच उठल्यानंतर आपल्याला दिसावे, म्हणून देवाच्या डोक्यावर एक दिवा टांगून ठेवलेला असतो. इलेक्ट्रीक झिरोचा किंवा आता एलईडीचा ! न जाणो रात्री देव आलाच तर ? म्हणून म्हणायचं दिवा लावला देवापाशी......
जे जे देवासाठी ते ते देहासाठी, असा विषय आपण बघत असल्याने या दिव्याचा देहरक्षणासाठी काय उपयोग आहे ? बरं हे इलेक्ट्रीकचे दिवे आत्ताचे ! त्यापूर्वी काय होते ? तेलाचे दिवे आणि तूपाचे निरांजन. काय एवढा फरक आहे इलेक्ट्रीकच्या दिव्यात आणि तेल तूपाच्या दिव्यात ?
आता हेच पहा ना, रस्त्यावर रात्रभर जळणारे जे हायमास्क दिवे आहेत, त्यावर किती छोटे छोटे किटक पिंगा घालत असतात ? पिंगाच तो. नुसते गोल गोल फिरत राहायचे. काम काही नाही. फायदा शून्य.
या किटकांना प्रकाशाचे प्रचंड आकर्षण असते. जिथे प्रकाश दिसेल तिथे अक्षरशः झडप घालतात. झोकून देतात. हा निसर्गाचा नियम आहे. पतंगाला ओढ प्रकाशाची. हे छोटे छोटे किटक घरात आले तर नुसता उच्छाद असतो. डोक्यात, कानात, डोळ्यात, नाकात, टीव्ही च्या स्क्रीनवर, ट्यूबलाईटवर, बेडवर, पिण्याच्या पाण्यात, आमटी भाजीत, जेवणाच्या ताटातसुद्धा ! काही केल्या जात नाहीत. आला असेल अनुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी ! ह. हेच तर मला सांगायचंय. हे किटक या दिव्यांवर मस्त खेळत असतात. आणि आपल्याला छान खेळवत असतात.
या किटकांचा त्रास घालवण्यासाठी एक जालीम उपाय आहे. देवापुढे दिवा लावणे. हा दिवा इलेक्ट्रीकचा नको. तेलाचा किंवा तुपाचा हवा. काय होईल ? या दिव्याच्या पेटत्या ज्योतीकडे हे क्षुद्र किटक आकर्षित होतात. आणि या ज्योतीत जळून जातात. चक्क मरतात. हा निसर्ग आहे. किटक मरणे ही चांगली गोष्ट झाली ना. नाहीतर त्यांचा बल्बवर चाललेला पिंगा बघत रहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.
जे आपण करू शकत नाही, ते छोटी पेटती पणती करते. उपद्रवी किटकांना मारते. कायमचे !
जसे हे काही उपद्रवी किटक डोळ्यांना दिसतात, तसे काही सूक्ष्म जीवही असतात, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, ते सूक्ष्म जीव देखील या पेणत्या पणतीच्या ज्योतीवर जणुकाही आत्महत्याच करतात. काम तमाम ! वातावरण शुद्ध ! निर्जंतुक !
दिवा देवासाठी, आरोग्य आपल्यासाठी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.06.2017
June 17, 2017
मलेरियाचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणे असून त्यासोबत इतर अनेक लक्षणे रुग्णात आढळतात , जी रोगाचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात . बरेच वेळा रोगाची सुरवात सामान्यपणे आढळणारा फ्लू अथवा Viral Fever असावा त्याप्रमाणेच होते . डोके दुखणे , थकवा वाटणे , पोटात बारिकसे दुखणे , स्नायू व सांधे दुखणे , भूक मंदावणे व अन्नावरील वासना उडणे , उलट्या होणे आणि शरीर गलितगात्र होणे अशा प्रकारच्या लक्षणांनी सुरवात होते .
मलेरियाच्या तापामध्ये साधारणत : एक विशिष्ट पद्धत दिसून येते . अ ) अंगात कणकण वाटणे व अंग थंड पडणे - ही परिस्थिती २० मिनिटे ते १ तासापर्यंत टिकते ब ) नंतर प्रचंड हुडहुडी भरते जी दोन , तीन ब्लॅन्केटस् अंगावर घेऊनसुद्धा थांबत नाही . मलेरियामध्ये हुडहुडी हे फार महत्त्वाचे लक्षण आहे . यात थंडी भरून येताना रुग्णाची जी दमणूक होते तो अनुभव विलक्षण असतो . तो आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतो . या बरोबर ताप वाढत जाऊन अगदी १०४ ° ते १०५ ° पर्यंत चढू शकतो . याचा काळ १ ते ४ तास टिकतो . अकस्मात होणारी तापामधील वाढ बरेचदा रात्रीपेक्षा दुपारी माध्यान्हीच्या कालानंतर जास्त असते . क ) नंतर दरदरून घाम येण्यास सुरवात होते . हा काळ साधारण २ ते ३ तास राहतो . एकूण तापाचा कालावधी ६ ते १२ तास असतो .
मलेरिया परोपजीवींच्या गटानुसार उदा . P. Vivax व P. Falciparum यामध्ये तापाची पद्धत वेगवेगळी असते . तापाचे कालचक्र ४८ किंवा ७२ तासानंतर पुन्हा परत सुरू होऊ शकते . त्यावरुन कोणत्या पद्धतीचा मलेरिया आहे याचे ढोबळ निदान करता येते .
Plasmodium Vivax Malaria ( Benign )
बहुतेक वेळा या प्रकारच्या परोपजीवांमुळे होणारा मलेरिया तुलनेने कमी
धोकादायक असतो . गंभीर स्वरूपाचे परिणाम सहसा आढळत नाहीत . परंतु Vivax गटाचे परोपजीवी ( Schizonts ) या स्थितीत असताना यकृतामध्ये ( Liver ) सुप्तावस्थेत राहतात . योग्य संधी मिळताच ते रक्तात शिरतात व पुन्हा मलेरियाचा ताप येऊन सोबत लक्षणेही दिसू लागतात . तो केव्हाही पुन्हा उद्भवू शकतो . याला ( Relapse ) परत येणारा ताप म्हणतात . त्यावेळी मात्र डास न चावताच हा ताप रुग्णाला परत आलेला असतो .
Plasmodium Falciparum Malaria
बरेच वेळा ताप येण्याची पद्धत वरील वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणे अजिबात नसते . या ठिकाणी काही वेळा रुग्णाला ताप १०० ° ते १०१ ° एवढाच असतो . काही वेळा सातत्याने दोन दिवस सतत ताप अंगात राहतो . थंडी किंवा हुडहुडी वाजण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते . परंतु अशा रुग्णात मलेरियाच्या परोपजीवांचे प्रमाण जास्त असेल वा निदान बरोबर न झाल्याने औषधोपचार उशीरा चाल झाले असतील तर , किंवा हे परोपजीवी मलेरिया विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या औषधांना प्रतिसाद न देणारे असतील तर मात्र हा रोग गंभीर स्वरूप धारण करू शकतो . खेदाची गोष्ट अशी की काही वेळा रुग्ण दगावूही शकतो .
Falciparum मुळे घातक स्वरूपातील होणारे मलेरियाचे ( Pernicious Malaria ) मुख्य तीन प्रकार आढळतात .
१ ) मेंदूत पसरणारा मलेरिया : ( Cerebral Malaria )
मेंदूमधील रक्ताच्या केशवाहिन्यातील ( Blood Capillaries ) तांबड्या रक्तपेशीत मलेरियाचे परोपजीवी पसरतात त्यामुळे मेंदूतील पेशींवर जबरदस्त आघात होतो . अशा रुग्णांना गुंगी वा सुस्ती येणे अशा लक्षणाने सुरवात होते . काही तासात रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जातो . मानेच्या तसेच हातापायांच्या वेड्यावाकड्या हालचाली होतात . लहान मुलांमध्ये आकडी येते . काही वेळा लकव्यासारखी लक्षणे दिसू लागतात . ( Paralysis ) मलमूत्रावरील ताबा जाऊ शकतो . मेंदूमधील Hypothalamus भागावर परिणाम झाला तर ताप १०६ ° ते १०७ ° पर्यंत जाऊ शकतो . मृत्यूची शक्यता अशा वेळी जास्त असते .
२ ) Algid Malaria : शरीरातील सर्व रक्तवाहिन्या अशक्त झाल्याने रक्तप्रवाह हळूहळू थांबतो . नाडी मंद चालते व रक्तदाब कमी होत जातो . काही वेळा कॉलरा सारखे रेच ( हगवण सुरू होते , व त्यातून रक्त पडते .
३ ) Septicaemic Malaria : यामध्ये हृदय , रक्तवाहिन्या , फुप्फुसे , मुत्रपिंड इत्यादी सर्व अवयव हळूहळू निकामी होत जातात .
४ ) Black Water Fever : ( काळपट पिंगट रंगाची लघवी होणारा ताप ) रक्तातील हिमोग्लोबिन पासून बनलेले haemozoin हे काळपट रंगाचे कण व तांबड्या रक्तपेशींचे झालेले तुकडे हे सर्व लघवीमार्फत शरीराबाहेर पडू लागतात . अशा वेळी लघवीचा रंग Port wine किंवा कोकाकोलासारखा दिसत असतो. अनेकदा हे असे होण्याचे नक्की कारण उमजत नाही . काही वेळा मलेरियाच्या तापामुळे वाजणारी प्रचंड थंडी अथवा औषधांचा होणारा विचित्र परिणाम यामुळे हे घडून येत असावे . रुग्णास ताप असूनसूद्धा परोपजीवी रक्तात दिसत नाहीत . त्यामुळे रोगाचे निदान करणे कठीण जाते . कधी कधी मुत्रपिंडे निकामी झाल्यास रोग गंभीर स्वरूप धारण करतो .
मलेरियाचे रुग्ण तपासताना मुख्यतः खालील गोष्टी आढळतात .
१ ) फिकेपणा ( Anaemia )
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते . ते काही वेळा धोकादायक पातळी पर्यंत कमी होते . ( Hb - 4G % or less ) प्रचंड थकवा वाटणे . काम करण्याची शक्ती अजिबात नसणे यामुळे रुग्ण निपचीत पडतो .
२ ) कावीळ : ( Jaundice )
काही रुग्णात मलेरिया बरोबर रक्तातील कावीळीची ( Bilirubin ) पातळी अधिक झालेली आढळते .
३ ) प्लीहा वाढणे : ( Enlarged Spleen )
ज्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन मलेरियाची लक्षणे असतात , अशी रुग्णांमध्ये प्लीहा वाढलेली आढळते व त्यामुळे पोटही सुजलेले दिसते . क्वचित प्रसंगी अशा वाढलेल्या प्लीहेस इजा झाल्यास ती फाटते व पोटाच्या आत रक्तस्राव होऊन रुग्ण दगावतो.
या वैद्यकीय ज्ञानाचा गैरफायदा भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालात काही ब्रिटीश अधिकारी घेत असत . कामावर घेतलेले मजूर अनेकदा अशक्त असत . त्यांना नीट काम न केल्यास लाथा बुक्के मारून तुडवले जाई . अशा परिस्थितीत जर एखादा मजूर दगावला , तर खुनाचा आळ येऊ नये यासाठी ते अधिकारी बेलाशकपणे असे कारण सांगत , ' मजूराला मलेरियाचा त्रास होता . तो प्लीहा फुटल्याने मरण पावला ' .
४ ) काही रोग्यांमध्ये प्लीहा व यकृत दोन्हीमध्ये वाढ होते .
माणसाच्या शरीरात मलेरिया परोपजीवी शिरण्याचे विविध मार्ग
१ ) अॅनॉफेलीस मादी डास मनुष्याला चावल्यानंतर त्यामुळे होणारा मलेरियाचा रोग हा एक नेहमीचा व महत्त्वाचा मार्ग आहे .
२ ) ज्या अॅनॉफेलीस मादी डासाच्या लाळेत Sporozoites अवस्थेतील परोपजीवी आहेत , अशा डासांमधील लाळ सशक्त माणसांना टोचून त्यांच्यात मलेरियाचा रोग निर्माण केला जातो काही ठिकाणी संशोधनाच्या दृष्टिकोनातून प्रयोग म्हणून असा प्रयत्न केला गेला आहे .
३ ) रक्तपेढीत अनेक लोकांचे रक्त घेतले जाते . त्यापैकी एखादा रक्तदाता मलेरियाचा रुग्ण असू शकतो . त्यावेळी त्याच्या रक्तात असणाऱ्या परोपजीवींचा प्रवेश तेथून पुढे ज्या रुग्णाला ते रक्त दिले जाईल त्याच्या शरीरात सरळपणे होतो व तेथे ते वाढून नंतर रुग्णाला नाहकपणे मलेरियाचा त्रास भोगावा लागतो . या कारणास्तव रक्तदात्याचे रक्त हे मलेरियाच्या परोपजीवांपासून मुक्त असल्याची खात्री रक्ताची तपासणी करून ठरविणे हे बंधनकारक आहे.
४ ) आईच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत असते . या गर्भाशयाला जोडून लागूनच Placenta म्हणजे वार असते ज्यातून बाळाचे पोषण केले जाते . सामान्यपणे आईच्या रक्तात जर कोणतेही जंतू किंवा इतर प्रकारचे परोपजीवी असतील तरी त्यांना थोपविण्याची क्षमता वारेमध्ये असते , अशा प्रकारे बाळाचा बचाव केला जातो . परंतु वारेच्या वाढीच्या प्रक्रियेत काही दोष निर्माण झाला असेल व अशा वेळी आईला मलेरियाचा रोग झाल्यास त्याचे परोपजीवी बाळाच्या रक्तात शिरून त्या बाळाला मलेरिया होऊ शकतो .
५ ) व्यसनाधीन लोकांच्या एकत्रित गटामध्ये एखाद्याला मलेरियाचा रोग झालेला असेल तर धुंदी येण्याकरिता तेथे वापरल्या जाणाऱ्या एकाच इंजेक्शनच्या सुईमधून मलेरियाचे परोपजीवी इतरांमध्ये पसरू शकतात .
वरील नमूद केलेल्या २ ते ५ या मार्गांनी पसरणारा मलेरियाचा रोग फार क्वचितच आढळतो .
औषधी उपाय म्हणून मलेरियाच्या परोपजीवींचा उपयोग ८० ते ९ ० वर्षांपूर्वी वैद्यकीय शास्त्रात केल्याची उदाहरणे आहेत . त्याचा मनोरंजक इतिहास थोडक्यात असा आहे .
Syphilis ( गुप्तरोग ) या रोगाचे रुग्ण त्याकाळी फार मोठ्या संख्येने आढळून येत . या रोगामध्ये काही रुग्णांना मेंदूत बाधा होत असे . त्याला Neurosyphilis वा general Paralysis of Insane असे म्हणत . असे लक्षात आले होते की या रोग्यांना जर नंतर मलेरिया झाला असेल तर ताप गेल्यानंतर Neurosyphilis मुळे होणारी लक्षणे नाहिशी होत व रोगी त्यामधून बाहेर येत असे . या निरीक्षणाचा उपयोग एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जात असे .
Neurosyphilis असलेल्या रुग्णांना मच्छरदाणीत झोपवीत . ज्या मादी डासांच्या लाळेत मलेरियाचे परोपजीवी आहेत अशांना आत सोडीत . हे डास त्यांना चावल्यावर ह्या रूग्णांना मलेरियाचा ताप येत असे . ताप येण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यत रुग्णाला वेगळे झोपविण्यात येत असे . त्यावेळी रोग्याला मलेरियासाठी वापरले जाणारे कोणतेही औषध देण्यात येत नसे . ताप उतरल्यानंतर काही दिवसात Neurosyphilis मुळे होणाऱ्या लक्षणात बराच उतार पडत असे हा प्रकार काट्याने काटा काढावा यासारखा होता.
मलेरियाच्या परोपजीवांमुळे शरीरात निर्माण होणारी घातक विषारी द्रव्ये ( Malarial Toxins )
रुग्णामध्ये मलेरियाचा ताप वाढत असताना मलेरियाच्या परोपजीवींविरुद्ध रक्तातील तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशी , तसेच अभयत्व देणाऱ्या पेशी ( immune cells ) यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू होते . त्यावेळी अनेक विषारी द्रव्ये निर्माण होतात या द्रव्यांमुळे शरीरातील विविध संस्थांवर कमी जास्त स्वरूपाचे परिणाम घडतात . ही रासायनिक प्रक्रियेची शृंखला नियमबद्धपणे घडत असते .
शरीरात तयार होणारी प्रमुख विषारी द्रव्ये
१ ) Cytokinine २ ) Tumor Necrosis Factor ( TNF ) 3 ) Phospholipids and Phosphoglycans
शरीरात घडून येणारे महत्त्वाचे परिणाम
१ ) हिमोग्लोबिन ( Hb ) व तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णाला धोक्याच्या पातळीपर्यंत नेणारा Anaemia होतो .
२ ) तापामध्ये अचानक होणारा चढ उतार
३ ) Plasmodium Falciparum मुळे मेंदूच्या पेशींमध्ये होणारे बदल .
४ ) शरीरातील संपूर्ण रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होऊन त्यांचे कार्य मंदावते व शक्तीपात होतो . ( Endotoxin Vascular Shock )
५ ) अचानकपणे जास्त प्रमाणात स्रवणाऱ्या Insulin मुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत कमी होते .
वारंवार होणारा मलेरिया
मलेरियाचा ताप एकदा येऊन गेल्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा आपला प्रताप त्याच रुग्णाला दाखविला नसता तर कदाचित मलेरिया या रोगाची समस्या ऐवढ्या तीव्रतेने जाणवली नसती . परंतु एकदा होऊन गेलेला मलेरिया पुढील ३ ते ४ वर्षांत एकदाच नव्हे तर चार ते पाच वेळा पुन्हा होण्याची शक्यता असते . वैद्यकीय इतिहासात काही रुग्णांत ४ ते ५ वर्षांच्या कालावधीत ३० ते ३५ वेळा मलेरिया झाल्याचे आढळून आल्याची नोंद आहे . हा रोग होण्याच्या आपत्तीची टांगती तलवार काही रुग्णांवर कायम असते . त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम घडून येतात . या वारंवार होणाऱ्या मलेरियाच्या रोगाची मुख्य कारणमिमांसा अशाप्रकारे आहे .
१ ) मानवी शरीरात साधारणपणे जंतू , परोपजीवी , विषाणू यांची लागण झाल्यानंतर कायम स्वरूपाची प्रतिबंधकारक शक्ती तयार होत असते . त्यामुळे त्या रोगांचा वारंवार उपसर्ग होण्याची शक्यता फार कमी असते . परंतु मलेरियाच्या परोपजीवांच्या बाबतीत मात्र पहिल्या तापानंतर शरीरात तयार होणाऱ्या प्रतिबंधकारक शक्तीची पातळी फारच कमी असल्याने यानंतर पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या तापाला रोखण्यास ती असमर्थ ठरते .
परोपजीवांच्या प्रत्येक अवस्थेची प्रतिजने ( Antigens ) भिन्न असल्यामुळे त्याला प्रतिबंधक ठरणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) पुरेशा संख्येने तयार होत नाहीत . अर्थातच पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांशी मुकाबला करणे प्रतिपिंडांना कठीण जाते आणि परोपजीवी मग शरीराचा ताबा घेतात .
२ ) काही काही रुग्णांनाच डास परत परत चावा घेतात . त्यामुळे तो रुग्ण पहिल्या तापातून बरा होतो न होतो तोच नवीन परोपजीवांची फौज त्याच्या शरीरात शिरते .
३ ) काही कारणाने औषधाचा डोस पूर्ण न करता उपचार अर्धवटच सोडून दिले जातात . तर अशा वेळी पहिलाच ताप उलटण्याची शक्यता असते .
४ ) Plasmodium Vivax या प्रकारच्या मलेरियाच्या तापामध्ये यकृतामध्ये ( Liver ) सुप्तपणे राहणारे परोपजीवी ६० ते १८० दिवसात परत आपले डोके वर काढतात व अशावेळी डास परत न चावताही मलेरियाचा ताप येण्यास सुरवात होते .
५ ) सामान्यत : Plasmodium Falciparum उलटण्याची शक्यता नसते . परंतु पहिल्याच तापातील रक्तात फिरणारे Falciparum चे प्रतिसाद न देणारे काही परोपजीवी औषधांना पूर्णपणे दाद न देणारे असतील तर अगदी २५ ते ३० दिवसात पुन्हा ताप येण्यास सुरवात होते . एखाद्या घरातील काहीच लोकांना वारंवार मलेरिया होतो , तर काही जणांना या रोगाची लागण कधीच होत नाही असे का या जटील प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे .
मलेरियाची लक्षणे व चिन्हे या प्रकरणात मलेरियाचे रुग्ण सामान्यतः कोणत्या प्रकारचे आढळतात याचे विवेचन केले आहे . कित्येकदा रुग्णात दिसणारी लक्षणे डॉक्टरांना बुचकळ्यात टाकणारी असतात . अशा परिस्थितीत प्रयोगशाळेतील रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या उपयुक्त ठरतात . अशा तऱ्हेच्या केसेस हॉस्पिटल व खाजगी डॉक्टर मंडळींसमोर आल्यावर रुग्णावर त्वरीत उपाययोजना करणे अत्यावश्यक असते . अशा पद्धतीच्या प्रत्यक्ष घडलेल्या केसेस् नाव व जागा बदलून पुढील वेगवेगळ्या प्रकरणात वेळोवेळी समाविष्ट केलेल्या आहेत .
ह्या सर्व केसेस् वाचल्यानंतर वाचकांना मलेरिया हा रोग प्रसंगी कशा रितीने गंभीर स्वरूप धारण करू शकतो यावर प्रकाश टाकण्याचा लेखकाचा उद्देश आहे .
केस नंबर १
श्रीमती निर्मला जोशी वय ५६ , पतीच्या निधनानंतर दादरमध्ये एकट्याच राहत होत्या . नोव्हेंबर महिन्यात दिवाळी निमित्त नाशिकमध्ये १५ दिवस व नंतर १० दिवस मध्यप्रदेश येथील कान्हा जंगल , पंचमढी या भागात फिरून दादरला परतल्या . घरात एकट्याच , आल्यावर प्रवासाचा शीण व पुढे अंगात कणकण , पाठोपाठ १०१ ° पर्यंत ताप चढला . फॅमिली डॉक्टरांनी नेहमीची औषधे दिली . थंडी वाजणे , हुडहुडी भरणे ही लक्षणे नव्हती . ठाण्यात राहणाऱ्या मुलीने आईला आपल्या घरी नेण्याचा आग्रहच धरला . ठाण्यात गेल्यावर ताप व सोबत उलट्या चालू झाल्याने १ दिवसानंतर काविळीची शंका आली . सकाळपासून निर्मलाबाईंची असंबद्ध बडबड मुलीला बुचकळ्यात पाडणारी होती . त्यांना ब्लड प्रेशर , डायबेटीस किंवा इतर कोणताही आजार नव्हता . दुपारनंतर चक्कर आली आणि अर्ध्या तासात त्या बेशुद्ध झाल्या . मुलीची तारांबळ उडाली . डॉक्टरांना घरी बोलावले . निर्मलाबाईंचे ब्लड प्रेशर अतिशय कमी झालेले परंतु ताप जास्त नव्हता . ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले पुढील ४ ते ५ तासात पूर्णपणे शुद्ध हरपली . ( Semi Comatose ) तत्परतेने I.C.U मध्ये हलविण्यात आले . ५ तासात रक्ताच्या तपासणीमधून P. Falciparum Positive असल्याचे समजले हळूहळू काविळीचे प्रमाण वाढत होते . Blood Creatinine धोक्याच्या पातळीकडे वेगाने जात होते . मलेरियावरील अद्ययावत औषधे देण्यात येत होती . ३ दिवसात काहीही फरक नव्हता किंबहुना केस हाताबाहेर जाते की काय अशी शंका वाटू लागली . मुलींना त्याप्रमाणे कल्पनाही देण्यात आली होती जोशीबाईंच्या मूत्रपिंड व यकृतावर गंभीर परिणाम झाला होता . चौथ्या दिवसापासून मात्र मुंगीच्या पावलाने सुधारणा दिसू लागली . १० दिवसांनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली . अतिशय अशक्तपणा होता . घरी परतल्यावर रक्ताच्या पुन्हा केलेल्या तपासणीत परत P. Falciparum चे परोपजीवी दिसल्याने तज्ञांच्या सल्यानुसार परत एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . ताबडतोब मलेरियावरील औषधे सुरू करण्यात आली . अशक्तपणा हळूहळू कमी होत महिन्याभरात तब्येत सुधारली . कोणताही दुष्परिणाम राहिला नाही . त्यानंतर आता गेली १० वर्षे आनंदी आयुष्य जगत आहेत . या साऱ्या धक्कादायक अनुभवातून जोशीबाईंना दादर सोडून ठाण्यात वास्तव्यास जाणे सोईस्कर वाटले व त्या ठाणेकर झाल्या . या केसमध्ये डासांपासून मिळालेला प्रसाद हा दादरचा नसून नाशिक किंवा कान्हाच्या जंगलामधून मिळाला असावा अशी दाट शंका घेण्यास वाव आहे .
केस नं . २
सौ . मानसी पटवर्धन वय वर्षे ६१ , दादर मध्ये वास्तव्य , आठ दिवसासाठी परदेशी मलेशियाच्या सहलीस गेल्या . पहिले दोन दिवस समुद्रावरील खेळ , गार वारा बाधल्याचे निमित्त होऊन खूप थंडी भरून ताप आला . सोबत उलट्या त्यात अन्नावरची वासनाही गेली . १० वर्षांचा जुना डायबिटीस , खाणे बरोबर जात नसल्याने डायबिटीस वरील औषधे बंद केली . परदेशातील सहलीचे दोन दिवस त्रास तसाच सहन केला . पण अतिशय अशक्तपणा वाटू लागला लघवी कमी होण्यास सुरवात झाली. दुसऱ्या दिवसापासून तांबडी काळपट ( Port wine ) रंगाची लघवी होण्यास सुरवात झाली. दुपारपासून बोलण्यात असंबद्धता व गरगरणे सुरू झाले . बलवत्तर नशीब असल्याने मानसीताईंच्या परिचयातील एक डॉक्टर कोलालंपूर येथेच स्थायिक असल्याने ताबडतोब त्याच्या मदतीने हॉस्पिटलच्या I.C.U. मध्ये हलविले . Blood Pressure एकदम खाली आलेले व रक्तातील साखर ३५० मि . ग्रॅ . झालेली होती . E.C.G. नॉर्मल होता . बोरिवलीमधील मानसीताईंच्या पॅथॉलॉजिस्ट असलेल्या मुलाने मलेशियामधील डॉक्टरांशी संवाद साधला व फॅलसिफेरमची शक्यता व्यक्त केली . आमच्या देशात मलेरिया नाही असे मानणारे मलेशियामधील डॉक्टर ती शक्यता नाकारीत होते . शेवटी तिथेच दुसऱ्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले . त्यांनी भारतातून आलेला रुग्ण ही बाजू लक्षात घेऊन , मलेरियाच्या रक्त तपासणीसाठी ते दुसऱ्या ठिकाणी प्रयोगशाळेत पाठविले . तोपर्यत बोरिवलीचा मानसीताईंचा मुलगा मलेशियात आईजवळ जाऊन पोहोचला . दोन दिवसातच रक्ताचा रिपोर्ट Falciparum Positive असा आला . ताबडतोब योग्य औषधे देण्यात आली . आठ दिवसात तब्येतीला आराम पडला . रक्ताचा रिपोर्ट Negative आला . मानसीताई सुखरुपपणे मुलासोबत मुंबईला पोहोचल्या . या केसमध्ये P. Falciparum मलेरिया मधील Black Water Fever हे निदान केलेले असून यामधे लघवीचा बदललेला Port wine रंग हे महत्त्वाचे लक्षण आहे .
केस नंबर ३
श्री . मधुसुदन जोशी वय वर्षे ८२ , मधुमेहाचे गेले ३० वर्षांचे जुने दुखणे औषधांमुळे ताब्यात आहे . वयोमानानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा वाढता त्रास , त्यामुळे मधून मधून लघवीचे Infection होत असे . दादर मध्ये वास्तव्य होते . घराला लागूनच नवीन ३५ मजली इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे चालूच आहे . आजूबाजूला प्रचंड धूळ व डासांचा उपद्रव . त्यामुळे वारंवार खोकला , दम्याचा त्रास व तापही येत असे . लघवी व छातीचे Infection यावरच Antibiotics दिली जात होती . एकदा हुडहुडी भरुन ताप चढत असताना रक्त घेतले . त्यात Plasmodium Vivax चे परोपजीवी आढळले . लघवीचा रिपोर्ट नॉर्मल होता . Lung Infection मुळे रक्तातील पांढऱ्या पेशींच्या Polymorphs मध्ये वाढ झाली होती . आता पूर्वीच्या औषधांबरोबर मलेरिया विरुद्धची औषधेही देण्यास सुरवात केली . आठ दिवसात आराम पडला . ३ महिन्यानंतर पुन्हा तसाच ताप येण्यास सुरवात झाली . रक्ततपासणीत परत P. Vivax चे परोपजीवी मिळाले . परत मलेरिया विरुद्ध औषधांचा मारा करावा लागला . गेल्या दीड वर्षात ४ वेळा अशाच प्रकारे ताप येत आहे व मलेरियाचे रक्तातून निदान झाल्यावर पुन्हा पुन्हा त्यावरील औषधे द्यावी लागत आहेत . वाढत्या वयोमानामुळे व Antibiotics च्या वारंवार लागणाऱ्या वापरामुळे आता जोशीबुवांच्या शरीरातील प्रतिबंधक शक्ती कमी झालेली आहे . वारंवार होणारा Vivax मलेरिया जोशी आजोबांना खचितच त्रासदायक होत आहे.
--डॉ. अविनाश वैद्य
October 19, 2022
१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका)
तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला 'ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग' म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ १०० वर्षांपूर्वी याची बांधणी झालेली आहे. या कामाचे नकाशे १८५१ सालापासून आखण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामास १८७० साली सुरुवात झाली व ४० वर्षांनी काम पूर्ण झालं. यासाठी अंदाजे दहा हजार कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. या मार्गावर ६९ बोगदे, ५८ पूल आणि २१ अतिशय कठीण वळणं आहेत. गलेरा हे सर्वांत उंचावरील स्थानक बोगद्याच्या आतच आहे. १०,२८० फूट उंचीवरील पूल दोन अजस्त्र शिलांमधील बोगद्यांच्या मध्यात असून, त्यांच्या खाली प्रचंड खोल घळ आहे.
२. सैतान वा भुताच्या नाकासारखी बांधलेली रेल्वे (इक्वेडोर - दक्षिण अमेरिका)
हा जगातील सर्वांत कठीण, खडतर रेल्वेमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गायाक्विल शहर आणि राजधानी क्वीट यांना जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या आखणीस २५ वर्षे लागली आणि १८९९ मध्ये काम सुरू झालं. त्यानंतर २० ते २५ वर्षांनंतर हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाला. वाटेतील एका सरळसोट अजस्र शिळेमधून अनेक वळणांचा मार्ग खोदण्यात आला आहे. चढण १:१८ हिशोबाने छाती दडपून टाकणारी आहे. सर्वांत उंच जागेस EI Noriz del Diablo (The Devil's nose) म्हणतात. १२ कि.मीटरचा उतरणीचा रस्ता १९९७ च्या भूकंपात उद्ध्वस्त झाला होता.
३. क्विंगानी तिबेट हेवी रेललाईन
(या मार्गाची माहिती तिबेट रेल्वे प्रकरणात दिलेली आहे.)
४. यिवान रेल लाईन तिबेट (यिचाँग टू चाँगींग-वांझाऊ)
३७७ कि.मी. लांब असलेला हा सर्वांत कठीण व अतिशय महाग रेल्वे प्रकल्प आहे. एक कि. मी. बांधण्यासाठी ९ मिलियन डॉलर्स या हिशोबाने या रेल्वे प्रकल्पाचा खर्च एकूण ३.४१ बिलियन डॉलर्स झाला आहे. ५० हजार कामगार या कामासाठी ७ वर्षं झटत होते. या मार्गावर २५३ पूल व १५९ बोगदे आहेत.
५. आल्प्स ट्रान्झिट रेल (स्वित्झर्लंड)
(न्यू रेल लिंक थ्रू आल्प्स माउंटन्स)
या मार्गाचं काम सन २०१६ पर्यंत पूर्ण होईल अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे. यासाठी १३ बिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. सर्व रुळांचं जाळं खोल जमिनीखाली, बोगद्याच्या शेकडो मीटर खाली आहे. हे बोगदे १९१० सालात बांधलेले होते. जगातील सर्वांत लांब बोगदा ५७ कि.मीटर असून, गोथार्ड या नावाने या रेल्वे मार्गावर असणार आहे.
November 11, 2022
थिओब्रोमा ककॅओ नावाच्या झाडाच्या फळांमधील बिया म्हणजे कोकोच्या बिया. या झाडाच्या खोडामधून फळे येतात. चॉकोलेट हे चॉकोलेट लिकर, साखर आणि लेसिथिन व कोको बटर एकत्र करून बनवलं जातं.
August 17, 2023
फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing the palm (मस्का लावणे) अशा अर्थाची एक इंग्रजी म्हणदेखील आहे. ग्रीज हे पेट्रोलियम बेस ऑइल (प्राथमिक स्वरूपाचे, निर्वात उर्ध्वपातनानेn मिळालेले वंगणतेल) आणि विविध प्रकारचे साबण यांचे मिश्रण होय.
February 15, 2023
मी मलाच अनेक वेळा प्रश्र केला “मी कोण आहे”? बरेच आढेवेढे घेऊन त्याने उत्तर दिले ‘अरे तुच तो तु स्वतः ओळखले नाहिये का तुला तुच . नाही ना मी आपला मीच…. माझं नाव भास्कर म्हणजे मी भास्कर…….
December 20, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti