वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती, तसेच कडूपित्तावर अत्यंत गुणकारी औषधे आहेत. ‘व्यक्ती तितक्याथ प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येकामध्ये ऍसिडिटीची वेगळी लक्षणे आढळतात. काहींना ऍसिडिटीमुळे पोटात जळजळते तर काहींना छातीत जळजळते. काही व्यक्तींना मळमळते, उलटी होते तर काहींना उलट्या कधीच होत नाहीत, नुसतेच मळमळते. काही व्यक्तींची ऍसिडिटी काहीतरी खाल्ल्यावर कमी होत, तर काहींना उपाशीपोटी बरे वाटते. ऍसिडिटीमुळे काही व्यक्तींची मान दुखू लागते, पित्त डोक्या त चढत आहे असे वाटते. काहींना आंबट घशाशी येते तर काहींना कडू पित्त होते. पित्त झाल्यावर काही व्यक्तींच्या पोटात बारीक दुखते तर काहींना अगदी आग पडल्यासारखी वाटते. काही रुग्णांमध्ये ऍसिडिटीमुळे गरगरते, चक्कर आल्यासारखी वाटते. पित्त वाढल्यामुळे काही व्यक्तींचे डोके जड झाल्यासारखे वाटते, दुखते तर काहींना खूप ढेकरा येतात. अतिविचार, अतिकाळजी करणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताचा त्रास वरचेवर होतो. या प्रत्येक लक्षणासाठी विशिष्ट, वेगळे औषध होमिओपॅथीत उपलब्ध आहे. होमिओपॅथिक औषधे ही चवीला गोड व घ्यायला अत्यंत सोपी असतात. ही औषधे उपाशीपोटी घेतली तरी चालतात. या औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट स होत नाहीत.ऍसिडिटी हा असा विकार आहे, की त्याला नुसते वरवरचे उपाय करून ते बरा होत नाही, मुळापासून त्यावर उपाय करावे लागतात. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन करणे हे होमिओपॅथिक औषधांचे वैशिष्ट्य असल्यामुळे होमिओपॅथीमुळे ऍसिडिटी पूर्णपणे बरी होऊ शकते. सततच्या ऍसिडिटी मुळे आतड्याला जखम होऊन ‘अल्सर’ होऊ शकतो. अल्सरकडेही दुर्लक्ष केले तर पोटदुखी होऊन तो आतल्या आत फुटून सेप्टीक होऊ शकते. त्यामुळे साध्या वाटणाऱ्या ऍसिडिटीकडे वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार करून घेणे हे केव्हाही हिताचे असते.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
स्वामी चिदानंद आणि अम्मा या काळाने आमच्या पदरात टाकलेल्या विभूती आहेत. त्यांच्या सान्निध्यात सगळं सार्थक होतं. पण अम्मा “भेटतात”, कुशीत घेतात-मातृरूपाने ! विश्वभर त्या Hugging Saint म्हणून प्रसिद्ध आहेत.
श्री गणेशा नमुनी तुला
नंतर नमितो कुलस्वामिनीला
मातापूरवासिनी रेणूकेला
कृपा प्रसादे ।१।
तुझा महिमा असे थोर
दुःख नष्ट होती सत्वर
कृपा करिसी ज्याचेवर
पावन होत असे ।२।
गणेश जन्मकथा सांगतो
तयाचा महिमा वर्णितो
आनंदीभाव समर्पितो
तुम्हासाठी ।३।
सर्व दुःखे दुर कराया
तुम्हांसी सुखे द्यावया
जन्म घेती गणराया
तुम्हां करिता ।४।
असतील देव अनेक
देवाधीदेव महादेव एक
सर्व विश्वाचा अधिनायक
तयामध्ये कैलासपती ।५।
शिवपत्नी पार्वती
रही कैलास पर्वतीं
माता जगताची ती
उमादेवी ।६।
उमाशंकर मिळून
सर्व जगाते सांभाळून
कैलासावरी राहून
पालनपोषण करताती ।७।
एके दिनी सकाळी
पार्वति निघाली अंघोळी
पुष्पे घेऊन निरनीराळी
पुजेसाठी ।८।
आनंदी उमादेवी
शिवप्रतिमा मनी वसवी
अंतःकरणी ती रमवी
रुप सदाशिवाचे ।९।
स्नानास निघाली पार्वती
पूजासाहित्य बाहेर ठेवती
मनी विचार करि
प्रेमभरे ।१०।
बेसोनी स्नानघराबाहेर
मनींते बहूत विचार
विचारांना देती आकार
आनंद रुपे ।११।
हाळद घेतली हातीं
चंदन मिश्रीत गोळी करी ती
बाळरुप प्रतिमा बनविती
तयापासून ।१२।
जगन्माता पार्वती
विश्वाची श्रेष्ठ शक्ति
कोतुके बाळ पाहे ती
हर्षभरे ।१३।
सचेतन केला बाळ
प्रेमे आलिंगुनी जवळ
घालितसे पुष्पमाळ
कंठी ज्याचे ।१४।
बाळाचे तेज निराळे
सुवर्णापरी रुप आगळे
तयाचा महिमा कुणा न कळे
पार्वतीविणे ।१५।
धावूं लागला छोटा बाळ
आनंदून गेली उमा सकळ
शिरी बांधली पुष्पमाळ
पार्वतीने ।१६।
बाळासंगे खेळली
स्नानाची तिज आठवण झाली
सांगतसे माय माऊली
बाळाते जवळी घेवूनी ।१७।
तू एक काम करावे
दारापाशी बसून राहावे
आंत कुणा येवू न द्यावे
आज्ञा माझी ।१८।
आनंदे लागला बागडूं
कुणासंगे ही लढू
परत जाण्या भाग पाडू
ह्या विचारी ।१९।
आज्ञा केली मातेने
पाळीन मी आनंदानें
रोकीन तयाते बळजबरीनें
बाळ बोले ।२०।
छोटे शस्त्र हाती देऊनी
पार्वती सांगे समजावूनी
वाट तयाची रोकूनी
धराविसी ।२१।
पार्वती गेली स्नानासी
बैसवुनी बाळा द्वारासीं
द्वारपाल तो बनलासी
बाळ माझा ।२२।
बाळ आनंदे फिरु लागला
तिकडून शिव आला
स्नानगृही जाऊ लागला
बाळ रोके त्यासी ।२३।
हांसु लागला बाळ बघोनी
कौतूक तयाचे करुनी
प्रेमभरे जवळ घेऊनी
सदाशिवे ।२४।
शिव चालला स्नानगृहात
बाळ त्याला रोखीत
तुम्ही न जावे आंत
सांगे बाळ ।२५।
प्रथम त्याचे कौतूक केले
आंत सोडण्या विनविले
वाकून बाळ आलिंगले
विश्वनाथे ।२६।
कोप आला शिवासी
पाहूनी बाळ हट्टासी
त्याच्या विरोधासी
बघुनिया ।२७।
बाळ असूनी लहान
मुर्ति गोंडसवानी छान
जगन्मातेची शक्ति अंगिकारुन
प्रतिकार करु लागला ।२८।
बाळाअंगी पार्वतीचे बळ
म्हणून झाला निश्चयी अवखळ
कांही सुचेना तये वेळ
विश्वेश्वरासी ।२९।
असे तो जगनेमातेचे बाळ
तयामध्ये विश्वाचे बळ
कठीण वाटली शिवे ती वेळ
तयासी पाहूनी ।३०।
बाळ हट्टाने पेटून
शिवाचा करिती अपमान
द्वारी त्याना रोखून
अडवितसे ।३१।
राग येवू लागला मनीं
समज न येई बाळा सांगुनी
संताप आला तत्क्षणी
क्रोधाग्नी पेटला ।३२।
हांती घेऊनी त्रिशूळ बनता बाळाचा काळ
शिरच्छेद केला तत्काळ बाळाचा ।३३।
बाळ पडला धारातीर्थी
धडावेगळे शरीर होती
तत् क्षणीं निश्चेष्ट पडती
जमिनीवर ।३४।
पार्वती आली बाहेरी
नजर आता बाळावरी
दुःख होतसे मनावरी
मृत बाळ बघूनिया ।३५।
एकदम निराश झाली
सारी स्वप्ने धुळीस मिळाली
हूरहूर मनी लागली
पार्वतीस ।३६।
शोक न तिजला आवरे
मृत बाळ बघूनी गोजिरे
ज्या पाही ती प्रेमभरे
पार्वती देवी ।३७।
खिन्न मनाने बैसली
दुःखाश्रु पडती खाली
अत्यंत निराश झाली
उमादेवी ।३८।
शिव झाले शांत
बघूनी उमेचा आकांत
तियेसी देवूनी हात
उठवितसे ।३९।
बघूनी शिवाचे शांत रुप
गेला होता त्यांचा कोप
सोडूनी द्यावे मनातील ताप
पार्वती बोले ।४०।
माझ्या बाळा जीवदान द्यावे
त्याच्या बालहट्टा क्षमावे
विनवितसे जीवेभावे
पार्वतीदेवी ।४१।
स्तुती केली ईश्वराची
पूजा करुनी शिवाची
विनंती करिसी त्याची
बाळप्राणा ।४२।
बघूनी पार्वतीभक्ति
पावला उमापती
बाळासी जीवदान देती
सदाशिव ।४३।
आज्ञा केली शिवगणा
कैलासतील जावे वना
दिसेल प्राण्याचे शिर आणा
प्रथम दर्शनी ।४४।
गेले आनंदे शिवदूत
शिर मिळवण्या वनांत
बघितला छोटा ऐरावत
सरोवरी बागडतसे ।४५।
गजराजाचे शिर छाटले
घेवूनी शिवदूत आले
शिवचरणी अर्पिले
ऐरावत शिर ।४६।
उठवोनी बाळ शरीर
घेऊनी गजराजाचे शिर
ठेवती तयाचे वर
बाळाचे शरिरी
शिवशक्ति प्राण घातले
पूर्ववत् ते सचेतन पावले
मानवी देही दिधले
गजराज शिव ।४७।
नवीन बाळ जन्मास आले
गजशिर मानव देह दिधले
माता-पित्यास वंदन केले
बाळ राजे ।४८।
शिवपार्वतीचे बाळ जाहले
गजानन तयाचे नांव ठेवले
शिवदूतें कौतूक केले
गणेशाचे ।४९।
शिवपार्वतीची अपूर्व शक्ति
गणेशाते मिळती
दोन्ही तेज एकरुप होती
गणेशामध्ये ।५०।
महादेव आशिर्वाद दिधला
गणेशाते श्रेष्ठ ठरविला
प्रथम पुजा मान तयाला
सर्व देवांमाजी ।५१।
प्रथम पुजा श्री गणेशाची
कार्ये होतील सार्थ नंतरची
हीच असेल प्रथा पूजेची
आज्ञा केली शिवे ।५२।
सर्व संकटे निवारसी
कार्ये नेती सिद्धीसी
दुःखापासून मुक्त करिसी
गणेश कृपें ।५३।
विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती
कार्ये निर्विघ्न पार पडती
सुख समृद्धी घरी नांदती
त्यांचे आशिर्वादे ।५४।
तू होशील ज्ञानदेवता
सकळजण तुज वंदिता
प्रसन्न होऊनी ज्ञान देता
विद्वान होतील ।५५।
श्री गणेश जन्मसोहळा
सर्वाना भासे आगळा
आकाशातून वाहती पुष्पमाळा
सर्व देव मिळूनी ।५६।
पुष्पांची वृष्टी केली
पृथ्वीमाता पावन झाली
तिच्यावरील दुःखे शमली
श्री गणेशामुळे ।५७।
गणेश दैवत सुख समृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करिसी सर्वांचे
प्रथम मान तुला ।५८।
गणेश दैवत सुखसमृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करीसी सर्वांचे
प्रथम पुजामान तुला ।५९।
वंदन तुज गणराया
सर्वांचे भले कराया
सर्व समभाव मनीं यावया
कृपा करावी ।६०।
रोज एकदा स्त्रोत्र म्हणूनी
एकविस दुर्वा लाल फूल वाहूनी
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूनी
गणेशा पूजावे ।६१।
नित्यनियमे पठन करावे
चतुर्थीला एकविस आवर्तने
भक्तिभाव मनीं ठेवणे
भक्तासि पावतसे ।६२।
भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थीला
श्री गणेशाचा जन्म जाहला
आनंदे सण उत्सावूं लागला
सकळजन ।६३।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
२- ०८०८८३
३ ऑगस्ट २००३ ला सहज म्हणून सादर केलेला एक कार्यक्रम , संदीपच्या कविता आणि गाणी आणि मी आणि संदीपने केलेली गाणी , असा एक प्रयोग करून तर बघूया इतक्या सहज सुचलेली ही कल्पना . एक प्रयोग झाला. हाउसफुल्ल !! उत्तम दाद मिळाली . आम्हालाही मजा आली . बास्स्स ... आनंदाने आपापल्या घरी गेलो ... !!
लगेच त्याचं BROUCHURE छापून सगळ्या जगभरातल्या मराठी माणसांना सांगूया कि असा असा एक कार्यक्रम सुरु झाला आहे , असं काहीही मनातच आलं नाही . आपली गाणी , कविता लोकांना आवडल्या आणि आपल्यालाही मजा आली एवढाच काय तो निष्कर्ष . त्यात तेव्हा कॉलेजकुमार असलेला आदित्य आठल्ये तबल्यावर , नितीन चंद्रचूड ह्यांचा साऊंड आणि मी आणि संदीप , असे एकूण चार जण , एवढी मोठी टीम!!:)
जवळजवळ महिनाभराने संदीपशी फोनवर बोलणं झालं तेव्हा, अजून एकदा करूया का रे ? मजा आली होती त्या दिवशी , बघूया आले तर आले लोक, नाहीतर आपण काँट्रीब्युशन काढून करू एक प्रयोग" असं बोलणं झालं, पुन्हा हाउसफुल्ल !!
मग तिसरा ... मग चौथा ...तुम्ही दाद देत राहिलात आणि आम्ही गात राहिलो .
मग पुण्याबाहेर पहिला, कोल्हापूर मग सांगली ... मुंबईचा एक संगीतकार मला जळक्या ( ज्याला मुंबईत पुणेरी म्हणतात ) टोन मध्ये म्हणाला होता , हा कार्यक्रम पुण्यात वर्ल्ड फेमस आहे ना ? मी हसलो होतो ...
१७ देशात कार्यक्रम झाले अगदी ,अमेरिकेत ४० हुन अधिक शहरात हाऊसफुल .... भारतात अनेक शहरात ... महाराष्ट्रात अगदी छोट्या गावांपासून ते शुक्रवार, शनिवार रविवार. ठाणे, दादर, पार्ले असे हाउसफुल्ल कार्यक्रम ...कोकण ,विदर्भ , मराठवाडा , नाशिक, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, बंगलोर, बडोदा, दिल्ली, इंदोर,भोपाळ ... सगळीकडे तेच प्रेम,तोच उत्साह
शंभर शंभर वेळा आयुष्यवर बोलू काही बघणारे अनेक रसिक आहेत .आम्ही शब्द विसरलो तर गाणं पूर्ण करतील असे अनेक मित्र जोडले गेले. संपूर्ण थिएटर आमच्याबरोबर गातांना ऐकण्याचा योग वर्षानुवर्षे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आहे .
१०० वा ... मग झी मराठीवर प्रक्षेपित झालेला ५०० वा ... मग ... १००० ... ११११... आणि आता १४०० च्या जवळ आलेली प्रयोगांची संख्या ...
मधल्या काळात अत्यंत गुणी गिटार वादक, रितेश ओहोळ या कुटुंबात सहभागी झाला आणि आता कार्यक्रमाचा अविभाज्य भाग झाला. अजूनही तबल्याला आदित्य आठल्ये आणि साऊंड नितीन चंद्रचूड ह्यांचाच आहे , कॉलेजकुमार आदित्य आता `बाबा ` झाला आहे
शुभंकरला कडेवर घेऊन कार्यक्रमाला गेलो होतो तो दिवस आठवतो, आणि आता शुभंकर अनेक कार्यक्रमात गायला. त्याच्या गाण्याच्या फर्माईशी मला येतात , एकटी एकटी घाबरलीस ना, करून करून काळजी माझी गायलाच हवं असं रसिक म्हणतात . एक मोठा प्रवास ! १८ वर्ष !!
सातत्याने नवीन गाणी, कविता ... अगदी ... दिवस असे कि, हे भलते अवघड असते, अताशा असे हे , नामंजूर ... सांग सख्या रे .. पाऊस असा रुणझुणता, मोर्चा नेला नाही, मेघ नसता वीज नसता, तुझे नि माझे नाते काय ? ... इथपासून दिवा लागू दे रे देवा आणि संदीपच्या अनेक नवनवीन कविता ,अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ` मी आणि माझा आवाज ` ह्या पुस्तकातील कविता आणि आम्ही नुकतंच केलेलं , रुक जा जालीम आखरी बार पर्यन्त ... अग्गोबाई पासून दूर देशी गेला बाबा पर्यन्त आणि दमलेल्या बाबा पासून ऐसे काही व्हावे मन शांत निजावे ... प्रत्येक रचनेला तुम्ही आशीर्वाद दिला.
खूप रसिक, संयोजक, वाहन चालक, ध्वनिसंयोजक , सगळ्यांचे हात मनापासून ह्यात सहभागी झाले म्हणून हा प्रवास इतका सहज सुंदर झाला .
अजूनही ह्या कार्यक्रमाचं BROUCHURE नाहीये . कोणी AGENCY नाही. कार्यक्रम तुम्ही रसिकांनी मोठा केला ... तो तुमचा होता आणि तुमचाच राहील .
- सलील कुलकर्णी.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव.
जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी
भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी,
प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण,
आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन.
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.
आपला भारत देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला अधिक प्राधान्य दिलं जातं.
आयुर्वेदासारखी अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. अशीच एक भाजी आहे शेवग्याची शेंग. शेवगा हे फक्त झाड नाही तर ती निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. शेवग्याचं झाड पूर्वी प्रत्येक अंगणात असे कारण शेवगा खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे हे पूर्वीच्या लोकांनी ओळखलं होतं. ही साधी पण पौष्टिकभाजी शंभर वर्षांहून अधिक काळ भारतीय पाककृतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. शेवग्याच्या शेंगा आपल्या आसपास अगदी सहज उपलब्ध होतात. पण आपण महागडी औषधे विकत घेतो. मात्र औषधी गुणधर्मांनी व आयुर्वेदिक औषधीय गुणधर्मांनी युक्त असलेल्या शेंगा मात्र खाण्याच पण टाळाटाळ करतो.
शेवग्याची भारतात सर्वत्र व म्यानमार, श्रीलंका येथे मोठया प्रमाणावर लागवड होते. दक्षिण कॅलिफोर्नियातही तो अनेक वर्षे लागवडीत आहे.
आपल्या अवतीभवती अश्या अनेक भाज्या आहेत परंतु त्याचे फायदे आपल्याला माहिती नाहीत. निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. थंडीच्या दिवसांमध्ये शेवग्याची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. तसेच या शेवग्याच्या शेंगा बऱ्याच वेळा सांबार मध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. शेवग्याच्या शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा मध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स आढळतात.
शेवगा :
(शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ; सहिजन स्टिक ट्री, लॅ. मोरिंगा ओलिफेरा, मो. टेरिगोस्पर्मा;) ही मॉरिंगेसी कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. ती मूळची भारताच्या वायव्य भागातील असून जगातील उष्ण तसेच उपोष्ण प्रदेशांत लागवडीखाली आहे.याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.
खोड मऊ व ठिसूळ असते. साल जाड, त्वक्षीय व भेगाळलेली. कोवळ्या भागांवर बारीक लव असते. शेवगा पानझडी वृक्ष असून १०–१२ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर सु. ४५ सेंमी. असून ते मऊ व ठिसूळ असते. साल जाड, त्वक्षीय (बुचासारखी) व भेगाळलेली असते. फांद्या पांढरट-राखाडी रंगाच्या असतात. पाने संयुक्त, सु. ४५ सेंमी. लांब, त्रिपिच्छकी व लंबगोल असून सर्व पिच्छके व पिच्छिका समोरासमोर असतात. फुलोरे स्तबक प्रकारचे असून फांद्यांच्या टोकांना येतात व त्यावर सुगंधी पांढरी फुले येतात. वनस्पतीची लागवड केल्यानंतर तिला सहा महिन्यात फुले येतात. फळे (शेंगा) लोंबती, २०–४५ सेंमी. लांब असून त्यांना तीन कडा असतात. कोवळेपणी त्रिकोणी, हिरवी, मऊ, बारीक असून त्यावर नऊ खोबणी (कंगोरे) असतात. पक्व शेंगा आपोआप तडकून बिया वाऱ्याने पसरविल्या जातात.
शेंगांमध्ये अनेक करड्या व गोलाकार बिया असून त्यांना पातळ कागदासारखे तीन पंख असतात. शेंगा पिकल्या की आपोआप तडकून त्यातील बिया वाऱ्याने पसरतात. शेवग्याच्या एका झाडापासून वर्षाला ७००-१००० शेंगा मिळतात.
शेवगा वृक्षाच्या वाढीसाठी ह्यूमसयुक्त व भुसभुशीत जमीन चांगली असते. मोरिंगा प्रजातीत शेवगा ही एकमेव वनस्पती आहे. शेवग्याच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात शेती, बाग तसेच शहरांमध्ये लागवडीखाली शेवग्याचे वृक्ष दिसून येतात.
उष्णकटिबंधीय हवामान त्याला चांगले मानवते. बिया व कलमे लावून नवीन लागवड करतात शेंगा चांगल्या मिळण्याच्या दृष्टीने छाट कलमे लावणे श्रेयस्कर असते. त्यांना लवकर मुळे फुटून काही महिन्यांत झाडे मोठी होतात. रोपे लावूनही लागवड करतात. ती डोक्याएवढ्या उंचीची झाल्यावर छाटतात व त्यामुळे अधिक फांद्या फुटतात आणि त्या उंचीला कमी राहतात.
शेवग्याची लागवड ५ x ५ मी.अंतरावर करतात. सुरूवातीच्या काळात त्यात आंतरपीक घेतात. त्याला फारसे पाणी लागत नाही व खते देत नाहीत मात्र नियमित व योग्य प्रमाणात खते व जोरखते आणि आंतरमशागत केल्यास उत्पन्न वाढते. एका झाडाला सु. १,००० शेंगा येतात.
दक्षिण भारतात जाफना (शेंग ६०-९० सेंमी. लांब), चवकारी चेरी मुरूंगा (शेंग ९०-१२० सेंमी. लांब) व चेम मुरूंगा (लाल टोकाच्या शेंगा) हे प्रकार आढळतात. संशोधनाने वर्षात एकापेक्षा जास्त बहार येणारे, बिगर हंगामी व जास्त उत्पन्न देणारे चवदार प्रकार विकसित करण्यात आले आहेत. त्यांपैकी कोईमतूर-१, कोईमतूर-२, पीकेएम्-१, पीकेएम्-२ व कोकण रूचिरा हे प्रकार महाराष्ट्रात लागवडीत आहे. अवर्षणगस्त भागात लागवडीस तो योग्य आहे. याची आता निर्यातही होऊ लागली आहे.
शेवग्यावर फारसे रोग व किडी पडत नाहीत. तमिळनाडूत डिप्लोडिया या कवकामुळे (हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) खोड कूज हा रोग होतो. दोन प्रकारच्या अळ्या व खोडाला भोक पाडणारी कीड यांचाही उपद्रव होतो. केसाळ सुरवंटामुळे (यूप्टिरोटी मॉलिफेरा) पाने गळून जातात. त्यावर फिश ऑइल रोझीज सोप द्रावण फवारतात. तसेच नूर्डा बलायटिॲलिस या सुरवंटामुळे झाड निष्पर्ण होते. नूर्डा मोरिंगीची अळी कळ्यांचे नुकसान करते. महाराष्ट्रात सायक्लोपेल्टा सिक्विफोलिया ही कीड आढळते.
आयुर्वेदानुसार शेवग्याचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया इ. भाग उपयुक्त आहेत. मुळांचा रस दमा, संधिवात, प्लीहा आणि यकृतवृद्धी, मुतखडा यांवर उपयोगी असतो. मुळांच्या सालींचा रस कानदुखीवर वापरतात. त्याची साल कोकणात नारूसाठी वापरतात. पाने व
फुले कृमिनाशक, वायुनाशी मानली जातात. शेंगा आतड्याच्या कृमींवर प्रतिबंधक आहेत. शेवग्याचा पाला शेळ्यामेंढ्याही खातात.
वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.
शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.
शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा २५ पट जास्त लोह आढळते. दुधापेक्षा १७ पट जास्त कॅल्शियम असते. यासह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन्सचे भांडार आढळते. यात अँटीबायोटिक, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. तसेच शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, बी आणि खनिजे- लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक असतात आणि त्या फायबर आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत. त्यामुळे हे सर्व गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पाने पौष्टिक असून त्यांत अ-जीवनसत्त्व असते, तसेच टोमॅटो, मुळा, गाजर व वाटाण्यापेक्षा अधिक क-जीवनसत्त्व असते.
शेंगेत पुढील प्रतिशत घटक आढळतात : ८६.९ जलांश, २.५ प्रथिन, ०.१ मेद, ३.७ कार्बोहायड्रेटे, ४.८ तंतू व २.० खनिजे. याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे, आयोडीन, ऑक्झॅलिक #अम्ल, केरोटिन, निकोटिनिक अम्ल व ॲस्कॉर्बिक अम्ल यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
शेवग्याच्या शेंगांतून शरीराला मिळतात ही महत्त्वाची जीवनसत्त्वे:
शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या या जीवनसत्वांबद्दल तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहित तर जाणून घ्या शेवग्याच्या शेंगांचे आरोग्यासाठी असलेल्या अनेक लाभांविषयी!
शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण सर्वांनीच कधी न कधी खाल्ली असेल. ही भाजी फार कमी वेळा आहारात बनवली जाते. याची चव विशेष नसली तरी ती ज्या पद्धतीने बनवली जाते ती पद्धत त्याला विशेष चव देते. पण तुम्हाला माहित आहे का या शेवग्याच्या शेंगांचे खूप सारे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. हो हे खरंय. शेवग्याच्या शेंगा ही अशी भाजी आहे जी उन्हाळ्यात जास्त मिळते. हि भाजी शरीरासाठी थंड असून यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. यात खास जीवनसत्त्व असतात जे आपल्या शरीरातील जीवनसत्वांच्या वाढीसाठी अति गरजेचे मानले जातात. विशेषकरून उन्हाळ्यात या भाजीचे सेवन करणे गुणकारी ठरते. चला तर आता जाणून घेऊया की शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या जीवनसत्त्व आणि पौष्टिक तत्वांची पूर्तता होते.
शेवग्याची पाने कशी वापरावीत? :
शेवग्याच्या पानांमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी शेवग्याच्या पानांचे पाणी आवर्जून प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात शेवग्याची थोडी पाने टाकून ते पाणी उकळा. पाणी उकळून अर्धे झाल्यावर ते थंड करून घ्या. नंतर ते पाणी गाळून घ्यावं आणि प्यावं. रक्तदाब वाढलेला असेल तेव्हा सलग दोन दिवस हे पाणी प्या. त्यानंतर रक्तदाब कमी झाल्यानंतर हे पाणी दोन दिवसांच्या अंतरानं घ्या. या काळात दररोज आपला रक्तदाब तपासा ज्यामुळं रक्तदाब किती कमी झाला आहे, हे समजेल. त्यानंतर आठवड्यातून एकदा हे पाणी पिणं योग्य ठरेल.
आयुर्वेदात म्हटले जाते अमृत:
शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पाने, साल, फुले, फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात, जे 300 हून अधिक रोगांवर औषध आहे.
फळे, फुले, पाने सर्व फायदेशीर:
चव आणि पौष्टिकतेने समृद्ध शेवगा हे केवळ आरोग्यदायी अन्नच नाही तर त्याची फुले, पाने आणि फळे खूप फायदेशीर आहेत. याच्या नियमित सेवनाने माणूस नेहमी तंदुरुस्त आणि तरुण राहू शकतो. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ही भाजी विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. शेवग्यात अँटीफंगल, अँटी-व्हायरस, अँटी-डिप्रेसंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. खनिजांनी समृद्ध शेवगा कॅल्शियमचा एक गैर-दुग्ध स्रोत आहे. यामध्ये पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. जीवनसत्त्व 'ब' कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्व 'क', जीवनसत्त्व 'अ',
आहारात शेवग्याचा समावेश कसा करावा?:
शेवग्याची शेंग आणि पाने तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतात. त्याची पाने पावडर किंवा रस स्वरूपात सेवन केले जाऊ शकते. शेवग्याच्या झाडाची पाने पाण्यात उकळून त्यात मध आणि लिंबू मिसळून प्यावे. हे सूप आणि करीमध्ये वापरले जाऊ शकते. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज 2 ग्रॅम शेवग्याचा योग्य डोस घ्यावा. औषधी गुणधर्मांनी समृद्ध शेवगा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज शेवग्याचे सेवन करावे.
शेवग्यामद्धे कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए,सी आणि बी कॉम्प्लेक्स असते. जे शेवग्याच्या शेंगा, हिरवी पाने आणि कोरड्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.
दक्षिण भारतात शेवग्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. शेंगांतील गर व बिया स्वादिष्ट व औषधी असतात. पाने व फुले भाजीसाठी वापरतात. शेळ्यामेंढ्याही ती खातात. बिया भाजून शेंगदाण्याप्रमाणे खातात. ही शेवग्याची पाने सर्व हिरव्या भाज्यांमध्ये अद्वितीय आहेत कारण त्यात प्रति 100 ग्रॅम 9.8 ग्रॅम प्रमाणात प्रोटीन्स असतात. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, सी, के आणि बीटा कॅरोटीन सारखी आवश्यक व्हिटॅमिन असतात. पानांचा रस रक्तातील अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढवण्यासाठी पितात. ह्याची पिवळी फुलं सुध्दा औषधात वापरतात.
शेवगा ही उच्च पौष्टिक मूल्यांसाठी एक अत्यंत अमूल्य भाजी आहे. शरीरातील चैतन्य आणि लैंगिक शक्ती सुधारण्यासाठी शेवग्याच्या शेंगां खाणे हा चांगला उपाय आहे.
शेवग्याच्या फुलांचे फायदे:
• शेवग्याच्या फुलांमध्ये प्रथिने आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि पोषण असते.
• युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे. यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा बनवून प्या.
• स्तनपान देणाऱ्या महिलांनी वाळलेल्या शेवग्याची फुले वाळवून त्याचा काढा प्यावा.
• रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात भाजी, चहा किंवा कोणत्याही प्रकारे शेवग्याच्या फुलांचा समावेश करा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हानिकारक फ्री रॅडिकल्सचा प्रभाव रोखण्यास मदत करतात.
• पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी शेवग्याच्या फुलांचे सेवन करणेही चांगले. या फुलांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत राहते.
• शेवग्याची फुले वजन कमी करण्यास देखील मदत करतात. या फुलांमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकते.
• शेवग्याच्या फुलांचे सेवन केल्याने केस गळणे थांबते. कोरडेपणा दूर होतो आणि चमक वाढते.
• पुरुषांमध्ये शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या फुलांचे सेवन देखील केले जाऊ शकते.
• फुलांच्या सेवनाने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
• शेवग्याच्या फुलांचा रस प्या, त्याची भाजी खा किंवा सूप प्या. जास्त फायदा हवा असेल तर डाळीत घालून शिजवा. डोळ्यांसाठी शेवगा चांगला आहे. डोळ्यांची दृष्टी कमी होत असेल तर शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले यांचा अधिकाधिक वापर करावा.
शेवग्याच्या पानांचे फायदे :
शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स याशिवाय अॅस्कॉर्बिक अॅसिड, फॉलिक आणि फेनोलिक असतात, जे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.
• शेवग्याच्या पानांमध्ये एस्कॉर्बिक अॅसिड, फॉलिक आणि फेनोलिक आढळतात आणि 40 पेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्याच्या पानांच्या अर्कांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे इंसुलिन लेव्हल कमी करण्यास मदत करतात. ते इन्सुलिनची पातळी संतुलित करतात, ज्यामुळे मधुमेही रुग्णांना फायदा होतो.
• शेवग्याच्या पानांचा वापर केल्याने हृदयाचे वाईट कोलेस्टेरॉलच्या प्रभावापासून संरक्षण होते. या पानांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. शेवग्याच्या पानांमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. पोटॅशियम व्हॅसोप्रेसिनचे नियमन करते, हा हार्मोन जो रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम करतो.
• कर्करोगाची लक्षणे कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. शेवग्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट असतात जे कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सचे प्रभाव कमी करण्यास मदत करतात.
• शेवग्याच्या पानांच्या रसामध्ये सिलीमारिन सारखे घटक असतात जे यकृत एंझाइमचे कार्य वाढवतात. 100 ग्रॅम शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये किमान 28 मिलीग्राम लोह असते, जे इतर पदार्थांपेक्षा खूप जास्त असते, त्यामुळे अशक्तपणा दूर होतो. त्यात लोह, जस्त, ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि इतर पदार्थ असतात जे मेंदूचे आरोग्य वाढवण्यास मदत करतात. ओमेगा- 3 स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
ही डॉक्टरांची फार्मसी आहे. म्हणूनच लोक ड्रमस्टिकला सुपरफूड म्हणतात.
शेवगा खाल्ल्याने कोणते फायदे होतात
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे:?-
1) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
2) शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.
3) नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
4) शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.
5) शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते.
6) शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते.
7) शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते.
8) ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारामद्धे शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा.
9) शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात.
10) शेवग्याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ यांचा उपयोग औषधनिर्मितीसाठी केला जातो.
11) पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो.
12) शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
13. असे म्हणतात की शेवग्याची भाजी खाल्ल्याने आपल्या पोटामध्ये जंत होत नाहीत. पोट
दुखत असेल तर ही शेवग्याची भाजी खा त्यामुळे पोटातील कृमी नष्ट होतात आणि
भविष्यातही अशाप्रकारे पोटात कृमी निर्माण होत नाहीत.
14. आजकाल अनेक तरुण तरुणींच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स येतात. पिंपल्सची समस्या आहे.
त्यावर ही भाजी खाल्ली तर रक्त शुद्धीकरण होऊन हा त्रास नाहीसा होतो.
15. शेवगा ही उच्च पौष्टिक मूल्यांसाठी एक अत्यंत अमूल्य भाजी आहे.
शरीरातील चैतन्य आणि लैंगिक शक्ती सुधारण्यासाठी शेवग्याच्या शेंगां खाणे हा चांगला उपाय आहे. ह्यात कामोत्तेजक गुणधर्म आहेत जे कामवासना सुधारण्यात आणि उपचार करण्यात मदत करतात. अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसाइन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ड्रमस्टिक्स किंवा शेवग्याच्या शेंगा मध्ये आश्चर्यकारक कामोत्तेजक गुणधर्म असतात आणि टेस्टोस्टेरॉनचा स्तर सुधारतो.
16. गर्भावस्थे दरम्यान स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील. शेवग्याच्या शेंगा देखील त्यातील एक आहे, जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे. यात कॅल्शियम, फास्फोरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असत. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने प्रसूती मध्ये होणार्या समस्येपासून आराम मिळतो आणि प्रसूती नंतर देखील प्रसूतीचा होणारा त्रास कमी होतो.
17. गर्भावस्थेत उलटी, मॉर्निंग सीकनेस आणि प्रसवमध्ये होणार्या त्रास शेवग्या खाल्ल्याने कमी केला जाऊ शकतो.
18. शेवगा उष्ण असला तरीसुद्धा अनेक प्रकारचे कफविकार वात विकार यांमुळे बरे होतात ज्या लोकांना घशामध्ये खवखव होते श्वास घेताना त्रास होतो, कफ आहे, क्षयरोग आहे अस्थमा आहे तर अशा लोकांनी या शेंगा नक्की खाव्या. कारण या शेंगांमध्ये असे काही गुणधर्म आहेत की ते आपल्या श्वसनमार्गातील विषारी घटकांना कमी करतात आणी परिणामी घशामध्ये होणारी खवखव कमी होते. कफाचा व श्वास घेताना होणारा त्रास कमी होतो.
19. शेवग्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. हे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करते. यासोबतच यामधील व्हिटॅमीन सी इम्यून सिस्टम बूस्ट करण्याचे काम करते.
20. शेवग्याच्या शेंगांचे सूप पचनक्रिया मजबूत बनवण्याचे काम करते. यामधील फायबर्स बध्दकोष्ठची समस्या होऊ देत नाही.
21. दम्याची समस्या असल्यावर शेवग्याचे सूप पिणे फायदेशीर असते.
22. सर्दी-खोकला आणि कफ या पासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर घरगुती औषधीच्या रुपात केला जातो.
अँटिऑक्सिडंटने समृद्ध
• शेवगा मध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात. ही संयुगे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात.
• जर शरीरात मुक्त रॅडिकल्स वाढले तर ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढू शकतो, जो हृदयविकार, टाइप 2 मधुमेह यांसारख्या रोगांचे कारण आहे.
• यात क्वेर्सेटिन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते, जे रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
हाडांचे आरोग्य सुधारते
• शेवग्या मध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस या तीन आवश्यक खनिजांचा एक उत्तम स्रोत आहे. मुलांच्या आहारात ड्रमस्टिकचा समावेश केल्यास त्यांची वाढ आणि विकास होण्यास मदत होते. याशिवाय हाडांची घनता वाढते म्हणजेच हाडे जाड आणि मजबूत होतात. यामुळे वृद्धापकाळात ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
• रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
• शेवग्या मध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सर्दी-खोकला यांसारखे संसर्ग लवकर होत नाहीत. हे दमा, खोकला किंवा कोणत्याही प्रकारच्या श्वसन संसर्गाशी लढण्यासाठी देखील मदत करते.
• आतड्याचे आरोग्य सुधारते
• शेवग्या मध्ये थायामिन (व्हिटॅमिन बी 1), रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी 2), नियासिन आणि व्हिटॅमिन बी 12 सारखे आवश्यक जीवनसत्त्वे असतात, जे पाचक रसांचे स्राव उत्तेजित करण्यास मदत करतात. हे कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि चरबी तोडण्यास आणि त्यांना पचण्यायोग्य स्वरूपात रूपांतरित करण्यास मदत करते. फायबर समृद्ध असल्याने ते आतड्यांतील मायक्रोबायोमसाठी चांगले आहे. हे खाल्ल्याने पोट साफ राहते.
• शेवग्या मध्ये नियाझिमिनिन आणि आयसोथिओसायनेट ही बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने रक्ताभिसरण चांगले राहते.
• किडनीसाठी फायदेशीर
• शेवग्या मध्ये मुबलक प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट किडनीतून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. जर ड्रमस्टिकचा आहारात नियमित समावेश केला तर ते मूत्रपिंड आणि मूत्राशयातील दगडांवर उपचार करण्यास मदत करते. ड्रमस्टिकच्या सेवनाने किडनीचे एकंदर आरोग्य देखील सुधारते.
• कर्करोगाचा धोका कमी होतो
• आहारात शेवगा चा नियमित समावेश केल्याने भरपूर अँटिऑक्सिडंट्स मिळतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि नियाझिमायसिनचे भरपूर प्रमाण कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स कमी करून ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करतात.
• शेवगा यकृताच्या आरोग्यासाठी उत्तम
• यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. हे आपल्या शरीरात 500 लहान-मोठी कार्ये करते. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे. यकृताच्या या कार्यात ड्रमस्टिक खूप उपयुक्त ठरते. ड्रमस्टिक ग्लूटाथिओनच्या उत्पादनात मदत करते. याशिवाय, हे यकृताचे विविध औषधांमुळे होणा-या संभाव्य नुकसानापासून देखील संरक्षण करते. हे यकृतासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करते.
• तुम्ही ड्रमस्टिक बीन्सपासून करी बनवू शकता, त्याची पाने आणि मुळांची पावडर बनवू शकता आणि सेवन करू शकता.
कसे बनवावे शेवग्याच्या शेंगांचे सूप?
शेवग्याच्या शेंगांचे लहान-लहान तुकडे करा. दोन कप पाणी घेऊन हे मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळत असताना यामध्ये कापलेल्या शेवग्याच्या शेंगा टाका. तुम्ही यामध्ये शेवग्याची पानंही टाकू शकता. पाणी अर्धे राहिल तेव्हा शेवग्याच्या शेंगाच्या मधील गर काढून घ्या आणि वरचा भाग वेगळा करा. यामध्ये थोडे मीठ आणि मिरपूड मिसळून प्या.
शेंग खाण्याचे तोटे:
•काही लोकांना शेंग खाण्यामुळे ऍलर्जी होऊ शकते.
•जास्त प्रमाणात शेंग खाल्ल्याने पोटदुखी, वायू आणि अतिसार होऊ शकतो.
ह्या सर्व कारणामुळे शेवग्यास सुपर फूड म्हटले जाते.
डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
२५.०५.२०२४
२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा व्हावा यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर जागतिक रंगभूमी दिन २७ मार्च १९६२ पासून जगभरात साजरा होऊ लागला. कलेचा सामुदायिक आविष्कार अभिव्यक्त होण्याची पद्धत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आजतागायत बदलत गेली आहे. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ हा शब्द आणि मराठीत आपण रंगभूमी हा समानार्थी शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाटय़संहिता, नाटय़दिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सार्या गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, पोलिश, अमेरिकन, चिनी, जपानी आणि भारतीय रंगभूमी यांचे एकमेकांशी आदानप्रदान झालेले नाही. रंगभूमीतील कलाविष्काराचे जागतिकीकरण व्हावे यासाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. भारतात तर संस्कृतमध्ये कालिदास, भास, भवभूती असे एकापेक्षा एक मोठे दिग्गज नाटककार होऊन गेले. भारतात बहुभाषिक रंगभूमी आणि तिचा आविष्कार वेगवेगळ्या कलेच्या प्रांतात प्रकटलेला आहे. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तनपरंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके, लळित, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाटय़कला जन्मास आली. रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली. त्यात मराठीत किर्लेस्कर देवल यांच्या काळापासून ते तेंडुलकर, शिरवाडकर, गिरीश कर्नाड ते आजच्या एलकुंचवार, आळेकरांपर्यंत रंगभूमीवर झालेल्या उल्लेखनीय बदलाची रंगभूमीला नोंद ही घ्यावीच लागते. पूर्वी राजे, राणी, विद्वान आणि धनिक यांचा आश्रय रंगभूमीला मिळत असे. आजही विद्वान आणि धनिक रसिकांचा विविध माध्यमातून नाटय़कलेला लोकाश्रय लाभत आहे. महाराष्ट्रातील संगीत नाटक रंगभूमी हा देखील एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार मानला जातो. प्रतिभावंत नाटककार व दिग्दर्शक, कल्पक तंत्रज्ञ, आधुनिक तांत्रिक-यांत्रिक सुविधा, सुजाण अभिरुचिसंपन्न रंगभूमीवरील वरील वेगवेगळे प्रकार वा रूपे उदयास आली, असे म्हणता येईल. नाटय़प्रयोग व त्याचा प्रेक्षक यांच्या परस्पर संबंधांविषयीच्या वैशिष्टय़पूर्ण संकल्पनाही प्रयोगशील रंगकलेमागे दिसून येतात. अलीकडे तर पथनाटय़े होऊ लागली आहेत आणि त्यांच्या रूपाने रंगकला जशी बंदिस्त रंगमंदिरातून बाहेर पडली, तशीच ती विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षकविषयक कल्पनांतूनही बाहेर पडली आहे. रंगभूमीचे हे प्रकार किंवा प्रयोग हे अखंडपणे होत राहतील. रंगभूमीवरील नाटकांमधून कला आणि सांस्कृतिक आविष्कार जो होत आहे त्याच्या स्पंदनांचा आणि संस्कृतीच्या स्पंदनांशी किंवा आंदोलनाशी तिचा अतूट संबंध आहे. नागर रंगभूमी व लोकरंगभूमी (फोक थिएटर) यांच्यातील सीमारेषाही पुसट होऊ लागल्या आहेत. तेंडुलकरांचे `घाशीराम कोतवाल’सारखे नाटक किंवा गिरीश कर्नाड यांची नाटके या दृष्टीने आधुनिक रंगभूमी आणि लोकरंगभूमी यांच्या विधायक समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमी ही केवळ कला नव्हे, तर समाजातील ती एक कलात्मक व विकसनशील संस्था आहे हे लक्षात ठेवले, तर रंगभूमीच्या अभ्यासाच्या अनेक बाजू लक्षात येऊ शकतात आणि विश्वरंगभूमीच्या दृष्टीनेही भर पडू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गोवंश हत्याबंदी कायदा केल्याविषयी युती शासनाचे अभिनंदन : आता महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमावा ! - वारकरी प्रबोधन महासमिती
नुकताच युती शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा संमत केला. या कायद्याची मागणी वारकर्यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होती. काँग्रेस शासनाच्या काळात मुंबई-नागपूर अधिवेशनावर भव्य निषेध मोर्चे, जेल भरो आंदोलन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची पूजाबंदी अशा विविध तर्हेने प्रयत्न केले आहेत. अखेर या लढ्याला १९ वर्षांनी यश आले. त्याविषयी प्रथम युती शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन ! गोवंश हत्याबंदी कायद्यापाठोपाठ आता महाराष्ट्र शासानाने विशेष गोसंवर्धन खाते तयार करून या क्षेत्रातील एका अभ्यासू तज्ञ व्यक्तीला गोवसंर्धन मंत्री म्हणून नेमावे, अशी मागणी श्रीवारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांनी समस्त वारकर्यांच्या वतीने शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात हजारो कत्तलखाने काढून दरवर्षी कोट्यवधी देशी गायींची कत्तल होत आहे. देशी गोवंश नष्ट केला जात आहे. देश वाचावा, अशी वारकर्यांची भूमिका आहे. गाय, बैल वाचविले, तर शेती आणि शेतकरी वाचेल आणि देश वाचेल. अस्सल देशी गायीपासून पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेले गोमूत्र, शेणापासून यार केलेले पंचगव्य, गोवर्या, तसेच दुध, दही, तूप मिळते. या सर्व गोष्टी हिंदु धर्मांत पवित्र मानल्या आहेत. यामुळे गीता, गंगा आणि गाय यांचे रक्षण झाले पाहिजे. स्वत: भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायीच्या सेवेसाठी या देशात अवतार घेतला आहे.
राज्यात गोपालन करणार्या अनेक संघटना आणि गोप्रेमी व्यक्ती आहेत. शासनाने त्यांना सर्व सहकार्य करावे. गायी सांभाळणार्यांना आर्थिक साहाय्य करावे. गोशाळांसाठी वनखात्याच्या उपलब्ध असलेल्या जमिनी द्याव्यात. गायीचे अनन्यसाधारण महत्त्व शेतकर्यांना लक्षात यावे, यासाठी एक शासकीय समिती स्थापन करून राज्यभर शिबिरे घ्यावीत. ज्याप्रमाणे सांस्कृतिक मंत्रालय आहे, कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री आहे, तसेच गोसंवर्धन खाते तयार करावे आणि राजस्थानच्या धर्तीवर गोसंवर्धन मंत्री नेमावा, अशा आमच्या मागण्या आहेत. त्याचा शासनाने विचार करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपला नम्र,
रामेश्वर शास्त्री महाराज, अध्यक्ष,
श्रीवारकरी प्रबोधन महासमिती
संपर्क क्र.: ९८२२४४३६९०
Copyright © 2025 | Marathisrushti