(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश

    जगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले आहे. या रोबोटचे नाव सोफीया असे असून सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.

  • निरंजन – भाग ४९ – घाव शिल्पकाराचे

    एका खेडेगावामध्ये गणपती बाप्पांचं एक खूप जुन्या काळातील मंदिर होतं. सर्व बाजूंनी कुठे कुठे थोडसं मंदिराचं बांधकाम ढासळलेलं होतं. पण तरीही लोकांची गर्दी तिथे खूप होत असे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये श्री गणेशांची मूर्ती देखील तितकीच पूर्वीची....

    एके दिवशी सर्व गावकऱ्यांनी मिळून गावामध्ये दरवर्षी होणाऱ्या सभेमध्ये, मुख्य पदाधिकाऱ्यांसमोर या मंदिराच्या बांधकामाबद्दल विषय मांडला. सर्वांनाच हा विषय योग्य वाटला. मंदिराचे बांधकाम हे झालं पाहिजे आणि त्याचबरोबर नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही व्हावी. या बद्दल सर्वांचच एकमत झालं आणि कामाला सुरुवात झाली.

    मंदिराचं बांधकाम एकीकडे सोपवण्यात आलं. तर दुसरीकडे एका शिल्पकाराकडे श्री गणेशांच्या मूर्तीचे काम देण्यात आले. या शिल्पकाराचं नाव होतं विदुर. विदुर हा शिल्प घडविण्यात अतिशय पारंगत होता. पाषाणातून एक जागृत आणि बोलक्या डोळ्यांची जिवंत प्रतिमा उभी करणं हे विदुरचं एक वेगळच वैशिष्ट्य.... पण हे वैशिष्ट्य साध्य करी ते केवळ ध्यानामुळेच... विदुर हा ध्यानस्थ गुरूंचा शिष्य होता. ध्यानगुरूंकडून विदुरने कित्येक वर्षे ध्यान-ज्ञान आत्मसात केले होते. म्हणून तो प्रत्येक शुभकार्यासाठी सहजरीत्या ध्यान लावी आणि त्यातून यश मिळवत असे. म्हणूनच प्रत्येक मूर्ती विदुर ध्यान लावून घडवत असे. त्याच्या या ध्यानामुळेच पाषाणाला ही जागृत अवस्था मिळे.

    या मंदिरात असलेली पूर्वीची श्रीगणेशांची मूर्ती देखील विदूरच्या पूर्वजांकडूनच कोरण्यात आली होती. म्हणूनच जशीच्या तशी हुबेहूब मूर्ती घडवणं हे विदुरलाच शक्य आहे. असा गावकऱ्यांचा ठाम विश्वास होता. पण विदुरला शिल्प कोरण्यासाठी इतर शिल्पकारांपेक्षा काहीसा अधिक कालावधी लागेल, याची सुद्धा गावकऱ्यांना जाणीव होती. आणि हे मान्यही होते. कारण मंदिर नव्याने उभं करण्यासाठीही तितकाच कालावधी लागणार होता.

    इथे नव्याने मूर्ती कोरण्यासाठी मोठ्या दगडाची आवश्यकता होती. म्हणून विदुरने काही दिवसातच मूर्ती घडविण्यासाठी लागणारा एक मोठा दगड शोधून काढला आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षा ठराविक पटीने लहान असा दुसरा दगड शोधून काढला. मोठा दगड हा साक्षात श्री गणेशाची मूर्ती घडविण्यासाठी होता तर लहान दगड हा मूषकाची मूर्ती घडविण्यासाठी होता.

    थोडाही वेळ न घालवता विदुर ने आपले काम हाती घेतले. मूषकाची मूर्ती बऱ्यापैकी लवकर होईल, या विचाराने विदुरने सर्वात प्रथम लहान दगड निवडला आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे लहान दगड समोर ठेवला. आणि त्यावर ध्यान लावले. ध्यान लावल्यानंतर विदुरने दगडाशी बोलून त्याला कोरण्यासाठी त्याची अनुमती मागितली. लहान दगडाने होकार दिला. विदूरने आपले काम सुरू केले. विदूर प्रत्येक मूर्ती घडवताना आपली नेहमीची एकच लहानशी चिनी आणि हातोडी वापरत असे. आपल्या हलक्या हाताने दगडाला कोरत असे. जेणेकरून त्या दगडांमध्ये प्राण आहेत.

    विदुरने सुरुवात करायला घेतली तोच त्या लहान दगडाला लगेच वेदना व्हायला लागल्या. विदुर थोडं थांबला आणि पुन्हा त्याने थोड्यावेळाने सुरुवात केली. पुन्हा त्या दगडाला वेदना व्हायला लागल्या. शेवटी विदुरला त्या दगडाने स्पष्ट सांगून टाकले की, "अरे बाबा, मला सोड, मला नको कोरूस. कोण या अवजारांचा घाव सोसेल, मला ते काही जमणार नाही, जिथून तू मला आणलंस. पुन्हा मला तिथेच नेऊन ठेव. मला या असहाय्य वेदना नकोत, मला जाऊदे परत त्याच जंगलात....!

    विदुरने हे सर्व शांतपणे ऐकले. आणि त्याने या लहान दगडाला एका बाजूला ठेवले. तो तसाच उठला आणि काहीही उत्तर न देता मोठ्या दगडाजवळ गेला. आपल्या रोजच्या सवयी प्रमाणे काही वेळ ध्यान लावले. शुभ संकेत ऐकले आणि आपल्या शुभ कार्याला सुरुवात केली. मोठा दगड खूप आनंदी होता. वेदना या सारख्याच होत्या. मोठा दगड हा आकाराने मोठा असल्यामुळे त्याला अधिक वेदना सहन कराव्या लागणार होत्या. पण यासाठी त्याची तयारी होती. या वेदनांचा त्याला स्वीकार होता. जमिनीतून मोत्यासारखे दाणे तेव्हाच उगवतात, जेव्हा ती जमीन नांगराचे घाव सहन करते. प्रत्येक ऋतूंचे परिणाम सहन करते. याची त्या दगडाला परिपूर्ण जाणीव होती म्हणून या दगडाला विदुरचे घाव सहन होत होते.

    कित्येक महिने या दगडावर कोरीव काम सुरू होते. पण त्या दगडाने आपली सहनशक्ती वेळेनुसार वाढवली होती. सहन करण्याची क्षमता वाढवली होती. बघता बघता इकडे मंदिर उभे राहिले. दीड वर्षे कधी निघून गेली कळलेच नाही. मंदिराचं बांधकाम फार सुंदर झालं होतं. आता गावातल्या सर्वांना यात स्थापित होणाऱ्या मूर्तीचं विशेष कुतूहल होतं. गावातल्या काही मुख्य लोकांनी काही जणांना विदूरच्या घरी मूर्ती घडविण्याचे शिल्पकाम कितपत पूर्ण झाले हे पाहण्यासाठी पाठवले. त्याचप्रमाणे चार-पाच जण तिथे मूर्ती कितपत पूर्ण झाली आहे हे पाहण्यासाठी आले. विदुरने त्यांचे आदरातिथ्य केले. आणि मूर्तीला दाखवून म्हणाला, "अजून चार-पाच दिवस मला द्या, काम पूर्ण होतच आले आहे." त्याच्या सांगण्याप्रमाणे गावकरी लोक होकार देऊन तिथून निघून गेले.

    विदुरने मूषकाची मूर्ती कोरली नव्हती, म्हणून श्रीगणेशांच्या मूर्तीच्या चरणी त्याने मूषकाचे रूप घडविले आणि चार-पाच दिवसातच मूर्तीला परिपूर्ण केले. पाच दिवसांनी विदुरच्या सांगण्याप्रमाणे गावकरी लोक विदुरच्या घरी आले. आणि सोबत गाडी देखील घेऊन आले. कारण श्री गणेशांची मूर्ती मंदिरापर्यंत वाजत-गाजत न्यायची होती. विदुरने मूर्ती गावकऱ्यांना सोपवली. गावकऱ्यांनी मूर्तीला पाहिले. सर्वांना मनोमन फार आनंद झाला. अगदी हुबेहूब पूर्वीच्या मूर्तीचेच स्वरूप घडविलेले होते. त्या सर्वांनी श्री गणेशांच्या मूर्तीला नमस्कार केला. आणि आदराने उचलून ती मूर्ती गाडीमध्ये ठेवली. मूर्तीच्या मागेच मूषक कोरण्यासाठी आणलेला लहान दगडही त्यांना दिसला. त्यांच्यातल्याच एकाने तोही उचलला. आणि मंदिरात याचा काहीतरी उपयोग करू, या विचाराने तोही गाडीमध्ये ठेवला.

    श्री गणेशांची मूर्ती मंदिरापर्यंत आली. गावकऱ्यांनी मिळून मूर्तीला गाभाऱ्यामध्ये स्थापित केले. मंदिराच्या पूजाऱ्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पूजा-अर्चना केली. आरती केली. सर्वांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. तोच त्यातल्या त्यात एकाच्या लक्षात आले की, आपण गाडीमधून आणलेला एक लहान दगड जर येथे ठेवला तर नक्कीच नारळ फोडण्यासाठी त्याचाही उपयोग होईल..... त्याने लगेचच जाऊन तो दगड मंदिरात आणला आणि बाजूला ठेवून दिला. आता प्रत्येक जण त्यावर नारळ फोडू लागला. या दगडाला आधीच वेदना सहन होत नव्हत्या आणि त्यात अजून या वेदना.... तो फार रडू लागला.

    हळूहळू भक्तांची गर्दी कमी झाली आणि मध्यान होताच पुजाऱ्यांनी गाभार्‍याचे दार लावून घेतले. तोच लहान दगडाने मोठमोठ्याने हंबरडा फोडला. तो खूप मोठ्याने रडू लागला. आणि श्री गणेशांच्या मूर्तीकडे पाहून तो म्हणाला. जर त्यावेळी मी ही त्या शिल्पकाराचे घाव सोसले असते, तर आज माझीही जागा वेगळी असली असती आणि मी इथे पडून राहिलो नसतो. माझी आरती झाली असती, ओवाळणी झाली असती, पूजा-अर्चना झाली असती, नैवेद्य दाखवला गेला असता, मलाही फुलांनी सजवले गेले असते, पण हे सर्व मी गमावले कारण तेव्हा मी सहन केले नाही. त्यामुळे आता या मोठ्या दुःखाला मला सामोरे जावे लागतेय.

    कधीकधी खूप कमी वेळ दुःख सहन करून, अनंत काळापर्यंतचा आनंद मिळवता येतो....

    -- स्वाती पवार

  • भारतातील आर्थिक समरसता (Economic Harmony)

    भारतात आर्थिक नियोजनाद्वारे विकास करताना सरकारची भूमिका आवश्यक ठरली. सरकारच्या आर्थिक विकासातील भूमिकेत आजवर भरपूर बदल घडून आज जरी आपण बाजार नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे आलो असलो तरी देखील शिक्षण, आरोग्य, शेती, कर रचना इ. विषयात सरकारची भूमिका अत्यंत सजग असणे अपेक्षित आहे. आर्थिक समरसता साधण्यासाठी आजवर आपल्या सरकारांनी  केलेल्या उपाय योजना आपण थोडक्यात पाहू.

  • सलिल चौधरी – प्रयोगशील संगीतकार!!

    चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात ३ घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ ३ ते ४ मिनिटांचे सादरीकरण. त्यामुळे, प्रयोग करायचे झाले तरी, शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथे तिन्ही स्वतंत्र व्यक्ती!! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील

  • २७ मार्च – आज आहे एक सुंदर दिवस ; जागतिक रंगभूमी दिन.

    आज आपण नाट्यगृहात, महोत्सवात, स्पर्धेत इ. ठिकाणी पाहणाऱ्या नाटकाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परांपरा आहे. पुरातन काळापासून ते आजच्या एकवीसाव्या शतकातील नाटकांच्या सादरीकरणात, शैलीत, तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत आले आहेत. जगातील सर्वात पुरातन नाट्यपरंपरा म्हणून ग्रीक आणि भारतातील संस्कृत रंगभूमीची ओळख आहे.

  • सप्टेंबर १७ – चार्‍ही डावात शतके आणि दुर्मिळ विजेतेपद

    १९६९ मधील पुनर्रचनेनुसार इंग्लिश प्रथम श्रेणी हंगामातील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली. तेव्हापासून एकाच हंगामात १,००० धावा आणि १०० बळी ही कामगिरी केवळ दोघांनाच साधली आहे.

    एकदिवसीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे अंतिम सामन्यातील विजय आताशा खूपच दुर्मिळ झाले आहेत. १७ सप्टेंबर १९९४ हा दिवस मात्र त्याला अपवाद मानावा लागेल.

  • मध्यरात्रीच्या अंधारातले कायदे!

    पाण्यावर पहिला हक्क शेतकर्‍यांचाच आहे आणि तो कायम राहायलाच हवा. सरकारला अत्यंत घाईघाईने, अगदी मध्यरात्री जल विधेयक पारित करून घेण्याची काहीच गरज नव्हती. सरकारची भूमिका पारदर्शक असती तर असले गनिमी कावे खेळण्याची आवश्यकता सरकारला का भासली? इतर अनेक विधेयके, ज्यांचा सामान्य जनतेशी अगदी जवळचा संबंध आहे ती महिनो न महिने रखडतात, तेव्हा सरकारची तत्परता कुठे जाते?

  • अंतर्मुखी सदा सुखी

    मनुष्याला जन्मताच ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रिया मिळाली. त्या द्वारे तो पाच तत्वानी बनलेल्या अनेक वस्तु, पदार्थ,.. ह्यांचा आनंद घेत असतो. पण मानवाला बाह्य सुखांची अशी सवय लागली आहे की आज ह्या सुखांच्या पाठीच त्याची धाव आहे. मृगतृष्णा समान जीवन झाले आहे. पाहणे, ऐकणे, खाणे, गंध आणि स्पर्श एक एक इंद्रियानी जितके आणि जसे सुख घेता येईल तसे मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु बाह्य सुखापेक्षा आंतरिक सुख किती मूल्यवान आहे ह्याची जाण आजच्या मनुष्याला नाही. म्हणून म्हटले आहे ‘अंतर्मुखी सदा सुखी.’

    अंतर्मुखी अर्थात चेहऱ्यावर (मुखावर) ज्या इंद्रिया आहेत नाक, कान, डोळे, मुख हे अंतरविश्वा मध्ये जितके रमण करतील तितके ते सुखी राहतील. डोळे सतत बाह्य विश्वातल्या व्यक्ति, वस्तु, पदार्थ.. ह्यांना बघण्यात व्यस्त आहे. जे आपण बघतो त्याचा प्रभाव आपल्या मनावर होतो. अजाणतेपणे एखादी व्यक्ति, वस्तु आपण बघितली तर ती स्वप्नामध्ये येऊन जाते तेव्हा जाणीव होते की त्याची मनावर छाप पडली आहे. सांगण्याचा भाव हा की डोळ्या द्वारे अनेक चांगल्या-वाईट गोष्टी मनामध्ये उतरतात. म्हणून सूरदास ने आपले डोळेच फोडले. बघितलेच नाही तर वाईट विचार येणार नाहीत हा त्यापाठीमागचा भाव होता. पण टेक ह्या डोळ्याचे कार्य काही वेळासाठी थांबवून पूर्ण लक्ष आपल्या अंतरविश्वाला बघण्यासाठी दिला तर नक्कीच झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा मार्ग व शक्ति मिळेल.

    आपले कां हे तर सतत काही ना काही ऐकण्याचा आनंद घेत असतात. जगभरच्या बातम्या, आजूबाजूच्या पंचायती.. ह्यांचा रस तर काही वेगळंच. वर्तमानात अशी अनेक साधने ही उपलब्ध झाली आहेत जी आपल्याला बघण्या व ऐकण्याची सामग्री पुरवत राहतात. आजचा मानव त्याच्यात किती व्यस्त झाला आहे. जे कामाचे आहे ते ऐकण्यापेक्षा वायफळ गोष्टी ऐकण्याचा आनंद घेत आहे. पण ह्या सर्व गोष्टी अंतर्मनावर किती दुष्परिणाम करत आहेत ह्याची जाणीव मनुष्याला नाही. हेच जर स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यासाठी काढला तर किती बर होईल?

    ‘वाचलता लाभम नाशम’ म्हटले आहे. जितके हे मुख वाचाळ होईल तितका नाश अर्थात स्वतःचे नुकणस होईल. मनुष्य बोलल्याशिवाय राहू शकत नाही. कधीतरी स्वतःला चेक करून पहा की न बोलता आपण किती तास राहू शकतो. ‘मौन’ चा अभ्यास किती करू शकतो. कधी कधी एखाद्यावर रागावलो की बोलणं सोडून देतो, ती वेगळी गोष्ट. पण जितके मुख बंद तितके मन आपले काम चालू करते. जे मुखाने बोलायचे आहे ते संकल्पा द्वारे बोलायला सुरुवात होते. पण तेच मन आणि मुख शांतीचा अनुभव करत असेल तर तितकेच आपण सुखी होऊ.

    डोळे, कान आणि मुख ह्यांचा वापर बाह्य जगासाठी न करता अंतरजगावर लक्ष केंद्रित केले तर व्यक्ति, वस्तु, पदार्थाच्या पाठीमागे धावणे बंद होऊन आंतरिक सुख शांतीचा अनुभव करण्यात मन रंगेल. व तितकीच आत्म्याची शक्ति ही वाढेल. हर्तमद्धे अनेक योगी होऊन गेले. त्यांची धाव अंतर जगाकडे होती म्हणून कधीच बाहेरच्या सुखावर त्याची नजर नव्हती. तसेच जीवनाची अनेक गुपिते त्यांनी जाणली, अनुभवली म्हणून निर्भय जीवन जगू शकले. आजचा मनुष्य सतत भयभीत होतो की जे मी कमावले ते माझ्यापासून कोणी हिसकावून तर नाही ना घेणार? पण जे मिळवले ते नष्ट तर होणारच आहे हा नियम आहे. तरीही चुकीच्या मार्गावर धाव का?

    आज कोरोंनाच्या महामारितून आपल्याला खूप काही शिकायचे आहे. जे डोळ्यासमोर घडतंय त्या सत्याचा स्वीकार करायचंय. मृत्यू अटळ आहे. परिस्थिती चा परिणाम निश्चित आहेत. जर स्वतःला आंतरिक शक्तींनी संपन्न केले असेल तर वाईट परिस्थिती मध्ये ही सुखी समाधानी शांत असल्याचा अनुभव करू शकू. म्हणून ह्या कर्मेंद्रियानी बाह्य जगाला बघा पण अंतर जगामध्ये त्याची छाप काय पडते त्याचे ही परीक्षण करा. जे चांगले आहे तेच आत्मसात करायचे आहे ही विचारांची गाळणी सतत वापरा. अनावश्यक बाबींना फेकून देण्याची सवय लावा. तरच ह्या मनुष्य जीवनाचा आनंद घेऊ शकू.

    -- ब्रह्माकुमारी नीता.

  • भारतीय रेल्वेच्या त्या ऐतिहासिक दिनी…

    १८५३ साली मुंबईत सुरू झालेल्या भारतातल्या पहिल्या रेल्वेने १६ एप्रिल २००३ रोजी दिडशेव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईत एक महत्त्वाचा सोहळा आयोजित केला होता. रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं.

    १६ एप्रिल १८५३ च्या त्या ऐतिहासिक दिवशी ज्या प्रकारच्या वाफेच्या इंजिनाने १४ डब्यांची गाडी बोरिबंदरहून ठाण्यापर्यंत गेली, त्याच प्रकारचं वाफेचं इंजिन लावून, तशाच प्रकारचे जुने दुर्मिळ डबे जोडून नेमक्या त्याच वेळी म्हणजे दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी गाडी सोडण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता सुरू कार्यक्रमाला झालेल्या तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर, रेल्वेमंत्री नितीशकुमार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, वेदप्रकाश गोयल, राम नाईक, दिग्विजय सिंग ओ. राजगोपाल, जयवंतीबेन मेहता व मुंबईचे महापौर महादेव देवळे उपस्थित होते.

    दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम मुंबई स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ व ८ वर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने खास तिकिटाचं प्रकाशन प्रमोद महाजन यांनी केलं. या प्रसंगी तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर, मनोहर जोशी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता, छगन भुजबळ इत्यादींची भाषणं झाली झाली.

    रेल्वेमंत्री नितीश कुमार म्हणाले, की जुने ऐतिहासिक डबे आणि अत्याधुनिक जर्मन डबे यांचा संगम साधलेली गाडी धावत असल्याने आजचा दिवस, १६ एप्रिल २००२ महत्त्वाचा आहे.

    तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आपल्या भाषणात म्हणाले, आपल्याला या कार्यक्रमाला राजभवनाहून बग्गीने आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार होता, मात्र दीडशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रेल्वेच्या प्रारंभाला तात्कालीन गव्हर्नर फॉकलंड हे कबूल करूनही आले नव्हते. तेव्हाही त्यांच्यासाठी बग्गीच ठेवली होती. मला इतिहासाची पुनरावृत्ती करायची नव्हती म्हणून बग्गीतून येण्यास नकार दिला.

    ठीक ३.३५ वाजता दीडशे वर्षांचा इतिहास जागवणारी ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसमधून निघाली, तेव्हा उपस्थितांचा निरोप घेता घेता तिची गतीही काहीशी मंदावत होती. त्यानंतर सुरू झाला अलोट जनसागराचा उत्साह. छत्रपती शिवाजी टर्मिनस सोडल्यानंतर मस्जिदबंदर, सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा आदी स्टेशन्सच्या दुतर्फा असंख्य मुंबईकर या गाडीकडे कौतुकाने पाहत होते. या प्रवासाची आठवण म्हणून रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी सर्व सन्माननीय नेत्यांना वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची एक देखणी प्रतिकृती भेट म्हणून दिली.

    दीडशे वर्षांपूर्वीच्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी तात्कालीन कंपनी सरकारने साष्टी बेटावरील आणि ठाण्यातील सरकारी कचेऱ्या बंद ठेवल्या होत्या. योगायोग असा की १६ एप्रिल २००२ रोजी केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या व कामगारविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील कामगार संघटनानी बंद पाळला होता. ती संधी साधून असंख्य कामगार कर्मचारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते.

    जसं एकेक स्टेशन मागे पडू लागलं तशी उत्साही जनतेची गर्दी एवढी वाढली, की रेल्वेचे इतर मार्ग गर्दीने व्यापून गेले. अनेक उत्साही लोकांनी रुळावरच ठाण मांडल्याने एरवी आपल्या कर्णकर्कश भोंग्याने लोकांना मार्गापासून दूर पिटाळणाऱ्या उपनगरी गाड्याही मंदावल्या.

    दादर स्टेशनवर तर मध्य रेल्वेचे सहाही प्लॅटफॉर्म गर्दीने ओसंडून वाहत होते. माटुंगा आणि शीवमध्ये असणाऱ्या वल्लभ संगीत विद्यालयाचे विद्यार्थी, रेल्वे वसाहतीमधल्या महिला आणि मुलं, धारावी झोपडपट्टीतील हजारो लोक होते. कुर्ला स्टेशनजवळ कसाईवाड्याला जोडणारा पूल, कुर्ला स्टेशन, घाटकोपर, विक्रोळी, कांजुर-मार्ग, भांडूप, मुलुंड या साऱ्या ठिकाणी गर्दीचा महापूर लोटला होता.

    ठाणे स्टेशनमध्ये तर उत्साही मंडळींनी प्लॅटफॉर्मवरील छतही व्यापून टाकलं होतं. तेव्हा रेल्वे सुरक्षादल व पोलिस यांची धावपळ उडाली होती. प्लॅटफॉर्म नंबर आठच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात आनंद भारती समाज संस्थेतर्फे पारंपरिक कोळी वेषात काही कोळी बांधव व भगिनी होडीत उभे राहून या रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.

    साडेचार वाजण्याच्या सुमारास दुरून कुठेतरी गाडीच्या शिट्टीचा व इंजिनाचा आवाज आला. साधारणपणे कोपरी उड्डाणपुलाच्या इथून हवेत काळ्या धुराचे लोट येताना दिसले आणि ती ऐतिहासिक गाडी आता काही क्षणातच ठाणे स्टेशनवर येणार याची खात्री झाली. बरोबर ४.४५ वाजता गाडी धाडधाड आवाज करत ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर आली. तसं उपस्थितांच्या टाळ्या, शिट्टया, आनंदाच्या व उत्साहाच्या आरोळ्या याने सारा परिसर दणाणून गेला.

    ५.४० वाजता सुरू झालेल्या या गाडीच्या परतीच्या प्रवासात जुनं दुर्मिळ वाफेचं इंजिन व डबे काढून घेण्यात आले आणि जर्मनीहून आयात केलेल्या आधुनिक डब्यासह डिझेल इंजिनने ही गाडी बरोबर ६.३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये आली आणि हा सोहळा पूर्ण झाला.

    -- टिम मराठीसृष्टी

  • अनिवार्य मतदानाची गरज अधोरेखित !

    मतदान केले नाही तर सगळ्या सोयी बरखास्त होतात, याचा एकदा अनुभव घेतला, की लोक अगदी मसणातून उठून मतदान करायला येतील. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकांचे तुलनात्मक विश्लेषण केल्यास मतदानाची अनिवार्यता किती गरजेची आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.