वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते .
आणि अचानक मेनका च्या संपादकांचा - राजाभाऊ बेहरे - यांचा फोन आला . " मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही उशीर झाला तरी कथा पाठवा . "
बेहरे यांना नकार देणं शक्यच नव्हतं .
मी म्हटलं , " मी विनोदी लेखन कधी केलं नाही , पण प्रयत्न करतो . आवडली नाही कथा तर साभार परतीचा पर्याय मला आवडेल . "
पलीकडून हसण्याचा आवाज आला .
आणि नेहमीप्रमाणे मी डोक्याला हात लावून बसलो .
भिडस्त स्वभावामुळे कुणाला नकार देता येत नव्हता . आणि इथे राजाभाऊंचा शब्द होता .
त्यांना नकार देणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता .
कारण माझी पहिली कादंबरी मेनका प्रकाशनामार्फत त्यांनीच प्रकाशित केली होती . त्यासाठी पुन्हा पुन्हा लेखन करायला लावून माझ्यातल्या लेखकाला आकार देण्याचे काम केले होते . ती कादंबरी मी तीन वेळा लिहिली होती . विषय आवडल्यामुळे त्यांनी लेखनाचा आग्रह धरला होता . त्यांची माझी साधी ओळखही नव्हती . कादंबरीचे पहिले हस्तलिखित तयार झाल्यावर कुणाला पाठवावे म्हणून विचारात असताना , रत्नागिरीच्या स्टँडवर एका बुकस्टॉल वर मेनकाचा अंक दृष्टीस पडला . त्यावरचा पत्ता लिहून घेतला आणि घरी हरचिरीला आल्यावर ते हस्तलिखित त्यांना पोस्टाने पाठवून दिले . पंधरा दिवसांनी ते साभार परत आले . सोबत चुका दाखवणारे आणि पुन्हा लेखन करा असा आग्रह धरणारे पत्र होते . मी ते बाड फाडून नव्याने लेखन केले . तेही पंधरा दिवसात परत आले . मी निराश झालो . पण बेहेरेंचं एका महिन्याने पत्र आलं , कादंबरीचं लेखन कुठपर्यंत आलं याची विचारणा करणारं .
मग मात्र मी सगळ्या चुका लक्षात घेत , नवीन शैलीत लेखन केले , आणि कादंबरी पाठवून दिली . मनाशी पक्का निश्चय केला , की आता हस्तलिखित परत आले तर कधीही लेखन करायचे नाही .
पण अहो आश्चर्यम !
कादंबरी स्वीकारल्याचे , ती मेनका मासिकात क्रमशः प्रसिद्ध करण्याचे , त्यानंतर पुस्तक काढण्याचे , मानधनाचे करारपत्रच त्यांनी पाठवून दिले होते .
तेव्हा मी हरचिरी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होतो .
आई अण्णांना खूप आनंद झाला होता . अर्थात मलाही गगन ठेंगणे वाटत होते .
त्या एका पत्राने माझे सगळे आयुष्यच बदलून गेले .
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध केल्या . मेनका , रविवारची जत्रा यासारख्या अंकातून त्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली . महाराष्ट्रात जिथे जिथे एस टी स्टँड होते त्या त्या ठिकाणी त्यांची मासिके आणि साप्ताहिके खूप विकली जात होती . त्यामुळेच मला खूप मोठा वाचकवर्ग लाभला . फॅन मेल च्या पत्रांनी माझ्याकडच्या फाईल्स भरून जाऊ लागल्या .
हरचिरीला आमच्याकडे अगदी क्वचित पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता आठवड्यातून तीन तीनदा येत होता .
आई अण्णांना त्याचेही खूप अप्रूप वाटत होते . त्यांचाही वेळ चांगला जाऊ लागला होता . किंबहूना माझ्यापेक्षा अण्णांच आता पोस्टमन ची वाट बघू लागले होते .
या प्रसिद्धीचा आणखी एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे अन्य दिवाळी अंकांसाठी लेखन पाठवण्याची विनंती करणारी पत्रे येऊ लागली होती .
महाराष्ट्र टाइम्स , कालनिर्णय , लोकसत्ता , अंतर्नाद , किस्रीम अशा अनेक अंकांसाठी मी लेखन करू लागलो . ( त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीनच . )
--- पण जत्रा साठी विनोदी कथा लिहिणे , आव्हानच होते .
त्याचवेळी मुंबईला नातेवाईकांकडे लग्न होते आणि जाणे गरजेचे होते . एसटी ने जाण्यापेक्षा मी रेल्वेने जायचे ठरवले .
त्याकाळात दादर पॅसेंजर ही माझी अतिशय आवडती ट्रेन होती .
मी अनेक वेळेला त्यातून प्रवास केलेला आहे .
रत्नागिरीहून जाताना किंवा दादरहून येताना प्रचंड गर्दी असायची . पण बसायला जागा मिळत असे . अर्थात थोडी घुसखोरी करायला लागायची . पण मजा यायची .
त्या गाडीत एकदा चढायला मिळाले की वेगवेगळ्या चवींचा चहा , खाण्याचे विविध पदार्थ , विविध वस्तू विकणारे विक्रेते , पाणी , कोल्ड्रिंक्स असं काही काही मिळायचं . तेही स्वस्तात .
गाडीत खाण्यासाठी घरून काही नेलेलं मला आठवत नाही . एक मात्र आठवतंय , रत्नागिरीहून जाताना चिपळूण किंवा खेड स्टेशनवर एक म्हातारे गृहस्थ , गरमागरम उपमा विकायला यायचे . तो मात्र मी आवडीने घेत असे . स्टीलच्या स्वच्छ डब्यात ते उपमा घेऊन यायचे आणि गोड हसत विकायचे . अनेकांना त्यांच्या उपम्याने वेड लावले होते . डबा रिकामा झाला की पुढच्या स्टेशनला ते उतरून जायचे . त्यांच्या उपम्याची चव अजून आठवते .
पण खरी मजा यायची ती प्रवाशांच्या गप्पा ऐकण्यात .
अगदी घरात असल्यासारखे प्रवासी मोठमोठ्यांदा बोलायचे , गप्पा मारायचे . बायकासुद्धा बडबडत असायच्या . सासरच्या व्यथा , माहेरच्या आठवणी , मुलांची प्रगती असं सगळं त्या एकमेकींना सांगायच्या .
मला त्या सगळ्यांच्या गप्पांचा हेवा वाटायचा . कोण काय म्हणेल , मॅनर्स याचा विचारही लोक करत नसत . सगळी बोगी म्हणजे गप्पांचा पार वाटायचा .
खरं सांगायचं तर दादर पॅसेंजर मधून प्रवास करण्याचा माझा हेतू स्वच्छ होता . एक म्हणजे आपल्याकडे कोण बघतंय की काय याचा विचार न करता आवडेल तो पदार्थ विकत घेऊन हादडता येत होता आणि गप्पा ऐकता येत होत्या .
आणि खोटं कशाला बोलू , मला कथांसाठी त्या गप्पांतून कथाबीजं सुद्धा मिळत होती . व्यक्तिरेखा सापडत होत्या . मानवी भावभावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता . ( त्याविषयी पुन्हा केव्हातरी )
तर त्या ट्रेन ने प्रवास करताना कोकणी बाण्याचे काही प्रवासी इलेक्शनवर जोरजोरात वाद घालत होते . नेहमीच्या सवयीनं शिव्या , कुळाचा उध्दार, उमेदवारांचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे रंगत होते .
त्या गप्पा ऐकताना अचानक कुणी तरी म्हणाला , ' आजच्या काळात निवडून यायचे असेल तर साध्या सरळ माणसाला मुश्किल होऊन जाईल , त्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सुद्धा इतर भ्रष्ट उमेदवारांसारखे वागावे लागेल .'
अर्थात हे म्हणताना तो ज्या शिव्या वापरत होता त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत .
पण मला ते वाक्य खूप काही देऊन गेले .
आणि जत्रा दीपावली अंकासाठी , शीर्षकासह कथा मनात आकार घेऊ लागली .
त्यावर्षी चिमणरावांची निवडणूक ही विनोदी कथा मी लिहिली आणि राजाभाऊंना पाठवली . त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि नंतर वाचकांनाही .
आज दादर पॅसेंजर ही ट्रेन आठवली त्या ट्रेनने सुद्धा मला लेखक होण्यात किती मोलाची कामगिरी बजावली आहे . याचे स्मरण झाले .
आणि कोकण रेल्वेला सलाम करावासा वाटला !
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २५ जुलै २०२५
८९५१९०६७०१
---------------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
August 12, 2025


कोणत्याही व्यक्तीत येणारे शारीरिक आणि मानसिक गुणावगुण हे मातापित्यांच्या अनेक पिढ्यांकडून येतात हे आपल्या पूर्वजांच्या बरोबर लक्षात आले होते. हा निष्कर्ष त्यांनी अनुभव आणि निरीक्षणावरून काढला. विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्यपिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोसोम्समुळे येतात.
February 26, 2018
या वर्षी भाऊबीजेला माझ्या बहिणींनी पतंजली च्या विविध साबणांचे एक कीट मला भेट दिले होते. मी ते साबण वापरतोय. मी जगभरातले साबण वापरले आहेत परंतु पतंजली चे साबण मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप आवडले आहेत. मुलतानी मातीचा साबण तर अप्रतिम.
हे साबण भारतीय आहेत. परंतु ते फक्त भारतीय आहेत म्हणून नव्हे तर त्यांचा दर्जा जगातील अतिशय उत्तम आहे. फक्त भारत नव्हे तर जगभर पतंजलीचे उत्पादने लोकप्रिय होतील. आधी वापरताना भीती वाटत होती पण आता इतर विदेशी कंपन्यांचे साबण कपाटात पडून आहेत.
मी काही पतंजली ची जाहिरात करीत नाही पण मला जे योग्य वाटते ते सर्वांना सांगायला काय हरकत आहे. अनुभव घेवून मगच निर्णय घ्या.
साबणाचा अनुभव घेतल्यावर सुनेनी पतंजलीचे बिस्किटे काल आणली आहेत. अजून चव घेतली नाही. त्याबद्दल नंतर सांगेन.
भारतीय जे जे चांगले आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. बाहेरच्या देशात जेव्हा भारतीय उत्पादने दिसतात तेव्हा मनस्वी आनंद होतो.
चिंतामणी कारखानीस --
29 December 2015
December 29, 2015
मन इतके चंचल आणि कोडगे असते की एकदा आलेला अनुभव किंवा अपमान विसरून जातो. परत तेच घडते तरी शहाणपण येत नाही. ते समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीत कसे निभावून न्यायचे.
December 24, 2021
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच-भाग दोन !
यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....
आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.
आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.
आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !
फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !
वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.
माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.
मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.
राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.
रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.05.2017
May 20, 2017
भगवान जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्री विष्णूच्या वंदना साठी रचलेल्या विविध स्तोत्रांचे रसग्रहण आपण आजपासून करणार आहोत. यात आरंभी असणाऱ्या या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्रा मध्ये आचार्य श्री म्हणतात,
October 2, 2020
गणपती आणि गाणपत्य संप्रदायाचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे कै. जयंतराव साळगावकर ! त्यांनी हे सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर मालवणमध्ये बांधले आहे.
येथे गणपतीचा थाट पूर्णपणे वैभवशाली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. रिद्धी सिध्दीही नेहेमी पाहायला मिळतात त्यापेक्षा वेगळ्या आहेत . गणपतीच्या दोन्ही बाजूंना मूषक जोडी, दोन बाजूंना लामणदिवे,अत्यंत देखणी प्रभावळ आणि राजेशाही चौरंग ही आणखी काही वैशिठ्ये ! गाभारा प्रशस्त आहे.
त्यामानाने मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो. भविष्यात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या अमाप वाढू शकते. त्यादृष्टीने मात्र मोठ्या वाहनांसाठी वाहनथांबा, शिस्तबद्ध दुकाने, प्रसाधनगृहे, थोडे रुंद रस्ते यांचे नियोजन आत्ताच करायला हवे.
April 13, 2017
आंबेहळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते.
September 15, 2017
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Hot & cold food list
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .
आयुर्वेदातून संकलन
March 2, 2017
महाभारतातल्या महायुद्धाच्या कथा ऐकल्या. कौरव व पांडव ह्या दोन भावंडामध्ये झाल्या होत्या. ह्या अंगावर रोमांच उभे करतात. जर सुक्ष्म निरक्षण केले तर ते शस्त्र व अस्त्र यांचा उपयोग करुन लढले गेलेले युद्ध होते.
थोड्याच लोकाबद्दल योध्याबद्दल विरा बद्दल त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नावे सांगीतली गेली. त्यांची रणांगणातील यश वा अपयश प्राप्त म्हणून ओळखली गेली. परंतु ह्या युद्धांत अनेक अनेक विर पराक्रमी लढवये लढले. बलीदान पावले. त्यांची नांवे आपणासाठी तरी अंधारतच राहीली. फक्त श्री कृष्णला त्या प्रत्येकाबद्दल ज्ञान होते. जाणीव होती. केवळ त्या युद्धांत श्री कृष्णाची प्रत्यक्ष असण्याची भूमिका असल्यामुळे, जे तेथे त्याच्या नजरेदेखत धारातिर्थी पडले, त्यांच्याही आत्म्याना सद् गती मिळाली असावी, हे समजणे चुक ठरणार नाही.
आगदी अधूनिक पद्धती प्रमाणे त्या युद्धांत डावपेच खेळले गेले. प्रतीस्पर्ध्यातील नैपुण्य, योग्यता, अचुकपणा, शस्त्रांचा वापर, अस्त्रांचा मारा, इत्यादींचा अभ्यासपूर्वक विचार होत होता. शस्त्र म्हणजे धनुष्य बाण, गदा, तिरकमटा, भाला, तलवारीसारखे हत्यार, इत्यादी आयुधे होती. ही साधी परंतु धारदार शस्त्रे होती. पूर्वी आश्रम आणि गुरुकडून ज्ञानसाधना होत असे. त्यांत मंत्रविद्या शिकवली जाई. मंत्रशक्ती प्रभावाने निरनीराळ्या उर्जाशक्तीना आवाहन करुन आपल्या जवळच्या शस्त्रामध्येच त्या अवतरीत केल्या जात. त्याचा त्याप्रमाणे परिणाम होत असे. उदा. बाणावर अग्नीचा मंत्र म्हणून, दिव्य अग्नीअस्त्र निर्माण केले जाई. परिणाम स्वरुप अग्नीचा वनवा वा ज्वालांचा हा हा कार होत असे. त्याच वेळी त्या अग्नीच्या वनव्याचा प्रतीकार पर्जन्यास्त्र वा पवनास्त्र ह्या संकल्पनेने केला जाई. जेवढे महान गुरुज्ञान व तपस्वीता, पावित्र्य थोर, तेवढी मंत्र साधना व तपोबल श्रेष्ठ असे. अस्त्रयुद्धाचे महत्व येथेच ठरते.
दोन अत्यंत महत्वाची अस्त्रे महाभारत युद्धात वापरली गेली. एक ब्रह्मास्त्र व दुसरे नारायणास्त्र. दोन्हीही प्रचंड शक्तीची विध्वंसक. परंतु केवळ श्री कृष्णाच्या दिव्य भव्य ज्ञानशक्ती, चातूर्य, व दूरद्दष्टीमुळे त्या दोन्हीही अस्त्राना निकामी केले गेले. त्यांच्या प्रचंड विध्वंसक शक्तीवर रोक लावला गेला. तेही फारसे कांहीही न करता साध्य केले गेले. हा विषयाचा वृतांत उद् भोदक ठरेल. करमणूक करणारा वाटेल.
" ब्रह्मास्त्र " हे नांव उचारताच प्रत्येकजण हादरुन जातो. घाबरतो. बेचैन होतो. जसे अधूनिक काळातील अँटम बॉंब ( Atom Bomb ). ह्याची सर्वाना कल्पना आहे. १९४६ साली अमेरीकेने त्याचा प्रथम वापर केला. तो जपानच्या हिरोशीमा व नागासाकी ह्या भागांवर.केवळ एका शस्त्राने प्रचंड भयानक व कल्पनेच्या बाहेर हानी पोहंचवीली. निसर्गात एक उत्पात माजला. घरदारे, मानवप्राणी, अनेक जीवजंतू, ह्याचा क्षणांत नाश झाला. विचार करता येणार नाही, असा हाहा कार त्या शस्त्राने केला. जमीनीचे अपरीमीत नुकसान झाले. झाडे झुडपे यांची वाढ बराच काळ खुरटली. जमिनीचा सुपीकपणा नष्ट झाला. अनेक लहान मोठे प्राणी नामशेष झाले. केवढा हा भयावह परीणाम. त्या एका अधुनिक शस्त्राचा.
२
" ब्रह्मास्त्र " हे आगदी ह्याच पद्धतीप्रमाणे होते. मात्र ते अस्त्र होते व त्याची विध्वंसक क्षमता आजकालच्या कोणत्याही बॉंबपेक्षा अनेक पटीने जास्त होती. ब्रह्मास्त्राची योजना व त्यावरील ताबा एकदम वैयक्तीक होता. त्याचा आधार पवित्रता, एकाग्रता, ज्ञान, असा उच्य दर्जाच्या साधनेमध्ये होता. माणसाची योग्यता जर इतक्या वरच्या स्थरावर साध्य झाली, तरच त्याला ब्रह्मास्त्र शिकण्याचा व बाळगण्याचा हक्क अपोआप मिळे. त्यामुळे ते अस्त्र कुणीही घेईल वा वापरेल हे मुळीच नव्हते. आजकालचे Atom Bomb, Hydrogen Bomb, अटॉमिक शस्त्र हे कुणालाही ज्ञान घेऊन, चोरुन, लुबाडून, अर्थसहाय्य देऊन, सहज प्राप्त होऊ शकते. तसेच ह्याचा कुणीही उपयोग करु शकतो. आगदी माथेफीरु, बदमाश, वा आतंकवादी. ते जे असेल ते कुणालाही मिळणे अशक्य नाही. ब्रह्मास्त्राचे असे मुळीच नव्हते. त्याचमुळे योग्यताप्राप्त अशी मोजकी व्यक्तीरेखा होऊन गेल्या की ज्याना ब्रह्मास्त्राचे ज्ञान व उपयोग करण्याची क्षमता प्राप्त झाली होती. केवळ मंत्र तंत्र पाठ करुन हे शक्य नव्हते. त्यासाठीची बैठक ही महानता, दिव्यता, भव्यता अंगी असल्याशिवाय शक्यच नव्हते.
ब्रह्मास्त्राला आणखी एक गुणधर्म होता. ब्रह्मास्त्राच्या विध्वंसक परिणामाना जर रोकणे जरुरी असेल तर, त्यावर फक्त एकच उपाय होता. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रानेच विरोध करणे. येथे अस्त्राची योजना अशी होती की टाकल्या गेलेल्या ब्रह्मास्त्रावर जर विरोधी दिशेने कुणी फक्त ब्रह्मास्त्रच फेकले तर दोन्ही अस्त्र आपसांत एक होऊन, कोणताही उत्पात न करता निकामी होऊन जात. विचार केल्यास ही अप्रतीम योजना होती. त्या काळी दिव्य उर्जा असलेली अस्त्रे होती. त्याचप्रमाणे त्याना निकामी करण्याचे ज्ञान अस्तित्वात होते. ही अत्यंत भाग्याची देण म्हणावी लागेल. समोरा समोरचा विर लढवय्या दोन्ही प्रकारचे ज्ञान बाळगुन होता. तो दिव्य अस्त्र टाकणे अथवा विरुद्ध दिशेने स्वतः वर टाकलेले अस्त्राला निकामी करणे. ज्याना हे ज्ञान अवगत नव्हते, तेच त्या अस्त्राचे बळी पडत. मात्र त्यासाठी गरज होती ती त्या अस्त्राची जाण व धारणा असलेल्या व्यक्तीची.
कौरव आणि पांडव यांच्या युद्धांत ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु त्याच वेळी दोन्ही पक्षातील कांही महान व्यक्तीना त्याचे ज्ञान अवगत असल्यामुळे, ब्रह्मास्त्राला निकामी करणेही शक्य झाले. कौरवाना स्वतःला ब्रह्मास्त्राचे ज्ञान मुळीच नव्हते. कारण तेथे संबंध होता पावित्र्याचा, एकाग्रतेचा. मात्र त्यांच्याबरोबर होते भिष्माचार्य, द्रोणाचार्य, ज्याना ब्रह्मास्त्र विद्या अवगत होती. अर्जून. कर्ण यानाही हे ज्ञात होते. कौरवाकडून प्रथम ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु सतर्क असलेल्या पांडवाना श्रीकृष्णाने त्वरीत मार्गदर्शन केले. दोन्हीकडील ब्रह्मास्त्रामुळे कसलाही विध्वंस वा हानी न होता ती नामशेष केली गेली.
दुसरे अस्त्र " नारायणास्त्र " . ह्या अस्त्राची तिवृता व विध्वंसक क्षमता ही देखील प्रचंड होती. कदाचित् ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त असेल. कौरवांच्या सुदैवाने त्या अस्त्राचे ज्ञान फक्त भिष्माचार्यानाच होते. पांडवाकडील कुणालाही नारायणास्त्राचे ज्ञान नव्हते. अर्थात श्री कृष्णाला ते संपूर्णपणे माहीत होते. आणि तो पांडवांच्या बाजूने होता. परंतु पांडवांच्या दु्र्दैवाने श्री कृष्णाची युद्धपूर्व अट त्यानाच जाचक ठरणारी होती.
३"मी युद्धांत तुम्हास साथ देईन. चार शब्द युक्तीचे सांगेन.
परंतु हाती शस्त्र वा अस्त्र केंव्हांही घेणार नाही. "
शेवटी झालेही तसेच. जेव्हां कौरवानी बघीतले की ब्रह्मास्त्र हे निकामी झाले, त्याक्षणी दुर्योधनाने पितामह भिष्माचार्य याना विनंती केली की त्यांनी शेवटचा उपाय म्हणून "श्री नारायणास्त्र " याचा वापर करावा. भिष्माचार्यानी ते मंत्रुन पांडव सेनेवर टकले.
काय घडले असते ? कारण प्रचंड विध्वंसक व हानीकारक क्षमताप्राप्त ते अस्त्र होते. हा हा कार माजला असता. पांडवाकडे तशाप्रकारचे अस्त्र नव्हते. ह्याच ठिकाणी, ह्याच क्षणी उपयोग झाला तो श्री कृष्णाच्या युक्तीच्या चार गोष्टींचा.
न घरी शस्त्र करी मी / सांगेन गोष्टी युक्तीच्या चार //
"श्री नारायणास्त्र " ह्याचे संपूर्ण ज्ञान फक्त श्री कृष्णाला अवगत होते. त्याच्या विध्वंसक क्षमतेची त्याला कल्पना होती. त्याच प्रमाणे त्या अस्त्राचा एक विशेष गुणधर्म होता.
" जो त्या अस्त्राला विरोध करेल, त्याच क्षणी त्या विरोधामधली सर्व उर्जा शक्ती आपोआप नारायणास्त्र खेचून घेईल. नारायणास्त्राची आपली उर्जा व विरोधकाची उर्जा एकत्र होऊन ते नारायणास्त्र जमा झालेल्या शक्तीनीशी विरोधकाचा नाश करेल.
श्री कृष्णनी येणाऱ्या नारायणास्त्र याचा वेध घेतला. त्याच क्षणी त्यानी अर्जूनाला आणि इतर सर्व सेनेला सुचना केली की सर्वानी त्या नारायणास्त्राला नतमस्तक व्हावे. आपली हत्यारे टाकून द्यावी. कोणताही विरोध वा उलट हल्ला करु नये. सर्वानी त्याक्षणी ते मानले. कुणीही त्या नारायणास्त्राला कसलाही विरोध केला नाही. "विरोधकांची उर्जा शक्ती हानन " हीच जर नारायणास्त्राची संकल्पना होती. तर त्याला कोताही विरोध न करता, It was Total Surrender to Narayanastra करीत त्याला मान्यता व अभिनादन केले गेले. ज्या तेजाने नारायणास्त्र चालून आले ते सर्व पांडव सैनाच्या वरुन कसलाही आघात न करता निघून गेले. नामशेष झाले. जणू ह्या अस्त्राने श्री कृष्णालाच एक प्रकारे अभिनादन केले होते.
अशा तऱ्हेने दोन दिव्य, भव्य प्रचंड उर्जायुक्त, विध्वंसक अस्त्रे ही नामशेष केली गेली. योग्य त्या धोरणामुळे व श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 29, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti