वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रंगांच्या रेणूमध्ये उर्जेचा प्रवेश होतो. ही उर्जा हाताळण्याची शक्ती त्यामध्ये असावी लागते. अन्यथा ही उर्जा रंगाच्या रेणूंमधील रासायनिक बंधने तोडायला कारणीभूत ठरते आणि असे बंधने तुटलेले रंगाचे रेणू प्रकाश शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग फिके होत जातात.
April 6, 2023
अहमदनगरमध्ये विकृतांचे एक वासनाकांड पाच वर्षांपूर्वी उघडकीस आले. या वासनाकांडातील 20 दोषींना अलीकडेच न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सामाजिक संस्था आणि सर्वसामान्यांच्या पाठिब्यामुळे उच्चभ्रू आणि धनदांडग्या आरोपींविरुद्धची ही लढाई जिकणे शक्य झाले. अनैतिक मानवी वाहतूक आणि बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये हा निकाल मैलाचा दगड ठरला.
September 27, 2010
केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते.
July 13, 2019
माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?
देव : विचार ना.
माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?
देव : अरे काय झालं पण ?
माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .
देव : बरं मग ?
माणूस : मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .
देव : मग?
माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .
देव : (नुसताच हसला )
माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .
देव : बरं मग
माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?
देव : आता नीट ऐक .
आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .
तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .
कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते सँडविच वर निभावलं.
तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.
संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .
माणूस : देवा मला क्षमा कर .
देव : क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला
आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो. मग प्रार्थनेच्या वेळी डुलक्या का येतात ? तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. ...
आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो.....
देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? तोच तर हलवतो सगळी सूत्र......
माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच...
आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.
'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही
देह सर्वांचा सारखाच. फरक फक्त विचारांचा....
June 13, 2017

रेल्वेवाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि जलद अशी अखंडपणे सुरू राहण्यासाठी रेल्वेमधले कर्मचारी व तंत्रज्ञ हे जसे महत्त्वाचे दुवे असतात, अगदी त्याच तोलामोलाचं महत्त्व रेल्वेमधल्या आधुनिकीकरणालाही आहे. काळ बदलला, रेल्वेप्रवाशांची गर्दी वाढली, रेल्वेचा विस्तार वाढला, तसं दर टप्प्यावर रेल्वेनं बदलांना, नव्या तंत्रांना आपलंसं केलं. या प्रवाहात रेल्वेला खऱ्या अर्थानं वेग आणण्यात विद्युतीकरण हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरला.
विजेवर चालणारं पहिलं रेल्वेइंजिन ‘एडिंबरो ते ग्लासगो' या दरम्यान सन १८३९ साली धावलं. पुढे १८७९ मध्ये बर्लिन येथील प्रदर्शनात विजेवर चालणाऱ्या रेलगाडीचं प्रात्याक्षिकही दाखविण्यात आलं.
भारतात मात्र विद्युतीकरणासाठी १९२५ साल उजडावं लागलं. १९२५ मध्ये मुंबईच्या 'हार्बर लाईन'वर मुंबई ते कुर्ला ९.५ मैलांचं अंतर पहिल्या विद्युत गाडीनं कापलं आणि पुढे १९२८ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली हे बी.बी.सी.आय.वर, तर १९२९ साली जी.आय.पी.वरील कल्याणपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झालं. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग रेल्वेनं काळाचा विचार करता फार लवकर सुरू केला. रेल्वे यार्ड, स्टेशन, सिग्नल्स, रेल्वेचे डबे, या सर्व ठिकाणी अखंडपणे विजेचा पुरवठा मिळाल्यानं रेल्वेची सेवा उत्तम दर्जाची झाली. विजेवर चालणाऱ्या लोकल गाड्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केल्यामुळे मुख्यत: मुंबई व कलकत्ता ही शहरं कल्पनेच्या पलीकडे पसरत गेली.
धुराच्या इंजिनासाठी कोळसा महाग पडत असे, शिवाय गाडीला वेग मिळण्यास वेळ लागायचा. घाटात गाडी चढणं कठीण जात असे. त्यामुळे हळूहळू अनेक मार्गांचं विद्युतीकरण होत गेलं आणि धुराची इंजिनं इतिहासजमा होत गेली.
२१ व्या शतकात यांत आणखीही बदल होणार आहेत. काळापुढे चालणारी रेल्वे लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे डी.सी. (Direct Current)-ए.सी. (Alternating Current) परिवर्तन पूर्ण करेल. त्यानंतर या बदलामुळे दर दिवशी १ कोटी रुपयांची विजेची बचत होणार आहे. नवीन 'बंबार्डियर' गाड्या धावण्यासाठी हे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसपासून लांब पल्ल्याच्या गाड्या यानंतर ए.सी. पद्धतीनं चालणार आहेत.
या सर्व कामासाठी मधून मधून रेल्वेचे मेगा ब्लॉक घडविणं आवश्यक ठरणार आहे. पूर्वी डी.सी.चं ए.सी.मध्ये रूपांतर करण्यात रेल्वेलाईनच्या बाजूनं अनेक ट्रान्सफॉर्मर लागत. त्याकरता जास्त लोक कामावर ठेवावे लागत व हे रूपांतर करण्यात वीज वाया जात असे. आता ए.सी. आल्यानंतर कामावर कमी लोक लागतील. पश्चिम रेल्वेवरचं काम पूर्ण झाल्यावर मुंबईची संपूर्ण लोकल व इंजिन वाहतूक ए.सी. मार्गानं होईल. दिल्ली, कलकत्ता, मद्रास येथे मुंबई इतक्या लोकल कधीच नव्हत्या. तिथे ए.सी.मधील रूपांतर आधीच झालेलं आहे. भारतीय रेल्वेने ही एक मोठी यशाची पायरी गाठली आहे.
आता जवळजवळ डी.सी. ते ए.सी. काम संपूर्ण भारतभर पूर्ण होत आलं
आहे. प्रथम डी.सी. करंट येत असताना बरीच यंत्रे व मनुष्यबळ रेल्वेलाईनच्या बाजूस ठेवावे लागे, हा सर्व खर्च आता वाचणार आहे; शिवाय, विजेची बचत झाल्याने त्यातही पैसे वाचणार आहेत. हळूहळू भारतभर सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण चालू आहे. याचा खर्च डिझेल इंजिने चालविण्यापेक्षा कमीच आहे व वेगात काहीच फरक पडत नाही आणि हवेत प्रदूषण तर अजिबातच होत नाही. पण याकरता मुबलक वीजपुरवठा असणे आवश्यक आहे; त्याकरता लागणारी वीज जल, कोळसा आणि सौरऊर्जेमार्फत मिळवावी लागेल.
-डॉ. अविनाश वैद्य
August 9, 2022
३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित
‘लेकुरे उदंड जाली’ या म्युझिकल नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.
या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.
मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.
वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. मा.श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.
‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.
दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.
शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –
‘मी बोलले तर होते वाईट,
पण आहे का यांना त्याचे काही,
तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
यांना माणसांची पारखच नाही..’
असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता. येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता.
नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.
प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 2, 2016
संदर्भ - वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय
तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.
जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.
याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.
जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.
काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.
पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.
आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.
नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.
म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
15.12.2016
December 15, 2016
देशभक्ती म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत.
October 5, 2018
मुगलएआझम या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहाबाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण – फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.
मुगल-ए-आझम बनवण्यासाठी के.असिफ यांना असंख्य अडी अडचणी येत राहिल्या. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली. प्रदर्शीत झाल्यावर मात्र या चित्रपटाने अक्षरश: इतिहास घडवला. तिकीट खिडकीवरचे सर्व उच्चांक या चित्रपटाने मोडीत काढले. या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते. चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की, निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय, अशी स्थिती अनेकदा निर्माण होई. यामधील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० उंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता.
मधुबालाने घातलेले साखळदंड खरेखुरे होते. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली. सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी सुमारे १ तासाची होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शीशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता. अभिनय, कलावंताची निवड, भव्य सेटस्, रंगभूषा, वेषभूषा,अप्रतिम संगीत व गाणी, दमदार संवाद, युद्धाचे भव्य प्रसंग यातील अनेक सैनिक हे भारतीय खरेखुरे सैनिक होते. पार्श्व संगीत, पटकथा, सिनेमाटोग्राफी…दिग्दर्शन……सर्वच बाबतीत हा चित्रपट हिन्दी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरला…. यात वापरण्यात आलेली प्रत्येक वस्तू खरी होती. दागिने, साड्या,तलवारी, तोफा, साखळदंड, संगीत साहित्य, शीस महल….सर्व काही अस्सल होते. अमान(झिनत अमानचे वडील), कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिझवी यांनी त्यातील बहुतांशी संवाद उर्दूत लिहले होते. त्याकाळी व आजही हे संवाद समजायला अवघड वाटत असले तरी चित्रपट बघताना कुठेही बाधा येत नाही.
एका गाण्यात एकाचवेळी पार्श्वगायनासाठी १०० लोकांनी कोरस दिला होता….कलकत्त्याच्या एकाच सिनेमागृहात हा चित्रपट वर्षभर चालला होता. चित्रपट गृहाच्या बाहेर लावलेले भलेमोठे पोस्टर्स व बॅनर्स बघायला प्रचंड गर्दी होत असे. त्याकाळात १५ मिलीयनचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने ५५ मिलीयनचा व्यवसाय केला. नंतर २००५ मध्ये हा चित्रपट रंगीत प्रिंट मध्ये कनव्हर्ट करून पुन्हा प्रदर्शीत करण्यात आला…. अवघे ४९ वर्षे जगलेल्या के.असिफ यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या २६ वर्षाच्या काळात फक्त साडेतीन चित्रपट तयार केले.
त्यांचा “लव्ह अण्ड गॉड” हा अर्धवट चित्रपट १९८६ ला प्रदर्शीत झाला होता…या चित्रपट निर्मितीची पण वेगळी कथा आहे.(लैला मजनूची कथा) …आणि त्यांनी ज्या तरूणाला आपल्या चित्रपटात संगीतकार म्हणून बोलावण्याचे वचन दिले होते तेही पूर्ण केले. ते म्हणजे संगीतकार नौशाद अली…. खरं तर मुगल-ए- आझम हा काही ऐतिहासिक चित्रपट नव्हता. अनारकली हे इतिहासातील एक संदीग्ध पात्र आहे.
अनेक इतिहासकार अनारकली ही गोष्टीतली होती असे मानतात कारण ती असल्याचे पूरावे सापडत नाहीत....पण अस्सल ऐतिहासिक वाटावा अशी पार्श्वभूमी यात होती. त्यामुळे अनारकली ही खरोखरीच होती असे या चित्रपटामुळे ठाम समजूत आजही आहे.
‘मुगल ए आझम’ या चित्रपटाचं त्याकाळी हिंदी व्यतिरिक्त अन्य दोन भाषांमध्ये डबिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शकांना हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि इंग्रजी भाषेमध्येही या चित्रपटाची निर्मिती व्हावी असं वाटतं होतं. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगण्यात येतं.
‘मुगल ए आझम’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅटमधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले होते.
चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली होती, तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र होते. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर (पृथ्वीराज कपूर) आणि जोधाबाई (दुर्गाबाई खोटे) यांचे चेहेरे छापले होते. कॅटमधील दोन जोकरवर ‘मुघल ए आझम’ असे छापले आहे.
मकरंद करंदीकर
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘मुगल ए आझम’ चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=CZDJcpJK2XY
‘मुगल ए आझम’ चित्रपटातील गाणी.
https://www.youtube.com/watch?v=6SpZEB_mIxQ
August 5, 2021
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो. तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला – दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.
पथ्यपाणी
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.
सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.
कानाचे यंत्र
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संतोष जळूकर
December 30, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti