या दीर्घ कथासंग्रहात , रानवा , लेक टॅपिंग आणि चंद्रखुणा अशा तीन दीर्घ कथा आहेत . त्या सर्वांची पार्श्वभूमी कोकणची आहे .
रानवा
प्रत्येक आंदोलन हे राजकीयपक्षाना आपापली किंमत वसूल होई पर्यंत महत्वाचं वाटत असतं. प्रत्येकाची बोली असते.टार्गेट असतं. ते पूर्ण होईपर्यंत आंदोलन ताणलं जातं. गुहागर, लोटेमाळ, जयगड, रत्नागिरी, जैतापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात येणारा रिफायनरी प्रकल्प…कुठेही जा, प्रत्येक जण आंदोलनाच्या माध्यमातूनओरबाडून खात असतो. आणि यात बळी कुणाचा जातो तर कार्यकर्त्यांचा, गावकऱ्यांच्या जमिनीचा आणि भावनांचा, त्यांच्या अस्तित्वाचा . त्यांच्याबद्दल कुणाच्याही मनात दुःख नाही.इथला निसर्ग, इथली माणसं, इथली संस्कृती, इथला एकोपा ,इथली जलचर, भूचर असणारी प्राणी सृष्टी.. सगळं शोषून घेऊन पुन्हा दुःखावर डागण्या देणाऱ्या आणि शोषलं जाणाऱ्या सर्वांची ही कहाणी .
लेक टॅपिंग
कोयना जलाशयाच्या तळाशी साडेसात मीटर व्यासाचा , सहा मीटर जाडीचा खडक फोडून छिद्र पाडून पाण्याचा अंतर्गत ओघ वळवण्यासाठी साठी करावी लागणारी व्यवस्था म्हणजे लेक टॅपिंग . जलाशयाला खालून छिद्र पाडणे सोपे नाही . वरचा खडक , त्यावर पाण्याचा प्रचंड दाब सहन करत स्फोटाची तयारी करायची .आणि हे काम करताना कौटुंबिक , सामाजिक , राजकीय आणि नैसर्गिक ताणतणावाना तोंड द्यायचं .तेही अत्यंत शांतपणाने . हे सोपं नव्हतं . इंजिनिअर असणारा एम आर , पत्रकार सुशांत , त्यांचे नातेवाईक आणि परिस्थितीचा कठीण खडक . या सर्वांतून मार्ग काढून चिपळूण जवळच्या कोयना भागातील शिवसागर जलाशयाच्या लेक टॅपिंगची हकीगत सांगणारी ही कथा .
चंद्रखुणा
कोकण रेल्वेचं काम सुरू असताना खचलेल्या बोगद्यात अडकलेल्या शंकरला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कामगारांची, शंकराच्या बायकोची गौरीची, मुर्दाड कंत्राटदारांची, त्यांना धडा शिकवणाऱ्या गावकऱ्यांची आणि शासनव्यवस्थेतील त्रुटींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची ही कहाणी .
अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश कसे मिळते कोकणच्या विकासाच्या चंद्रखुणा कशा कुठे जाणवतात हे सांगणारी ही कहाणी . या संग्रहाला रानवा हे शीर्षक मुद्दाम ठेवलं . रानवा म्हणजे ज्या भूमीवरच्या निसर्गाला माणसाचा स्पर्श झालेला नाही अशी भूमी.
निसर्गाचं स्वप्न म्हणजे रानवा !
सृष्टीचं चैतन्य रूप म्हणजे रानवा !
अखंड, अविरत चैतन्य म्हणजे रानवा !
…आणि मानवाच्या अस्तित्वाने उद्ध्वस्त झालेलं रूप म्हणजे रानवा !
पर्यावरणीय विकासाचा लेखाजोखा अधोरेखित करणाऱ्या या तीन दीर्घकथा.
स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटना, सामाजिक अडसर, अभिव्यक्तीची आणि जगण्याची होणारी मुस्कटदाबी , राजकारण्यांचा , त्यांच्या कार्यकर्त्यांचा , त्यांच्या गुंडांचा वाढता हस्तक्षेप , बोथट होणारी संवेदनशीलता आणि तरीही अशा स्थितीत दुर्दम्य, सकारात्मक आशावाद घेऊन जगणारी माणसं, हा या कथांचा विशेष !
पर्यावरणीय विचार हा सकस आणि समृद्ध होण्यासाठी घातलेली साद म्हणजे हा भाषिक आविष्कार…
राजकारण्यांचं , सामान्य माणसांचं आणि हो , निसर्गाचं सुद्धा मानस समजून घ्यायचं असेल तर रानवातील कथा वाचायला हव्यात . हे पुस्तक , बुकगंगा वर उपलब्ध आहे .
———-
– डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .