(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मास्टर-द-ब्लास्टर

    भवानीचे दहा बारा ट्रक त्याची सगळी काळी संपत्ती घेउन बॉर्डर क्रॉस करुन पळत असतात. पण मास्टरला हे कळते आणि तो दोन तीन तासांचा प्रवास पाच मिनीटात तर कव्हर करतोच..पण बरोबर आपल्या मैत्रीणीला घेउन येतो..जी असते तिरंदाजी चँपीयन.

  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग १

    जीवनात काही गोष्टी योगायोगाने अशा काही घडत जातात, की मागे वळून पाहताना त्या खरंच घडल्या होत्या यावर विश्वास बसत नाही. तशीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे रेल्वेने युरोपची भ्रमंती!

    सन १९८० मध्ये माझा एक मित्र वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेला. त्यानं जर्मनीला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि त्यातूनच एका अविस्मरणीय रेल्वेप्रवासाची आखणी कागदावर उतरली. युरोपमधील अंदाजे १७ देश (ग्रीस ते थेट नॉर्वे, स्वीडन) एकसंध असून त्यांमधील १ लाख मैल लांबीचं रेल्वेचं जाळं प्रवाशांना या सर्व देशांच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेतं. युरोप सोडून परदेशांतील पर्यटकांना या संपूर्ण मार्गावरील रेल्वेचा पास माफक किंमतीत मिळतो. हा पास अगदी १५ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंत मिळतो. महत्त्वाचं म्हणजे सलग तेवढे दिवस वापरून संपवावा लागतो. हा प्रवास फर्स्ट क्लासनं होत असल्यामुळे कोणतीच धकाधक नसते. इंग्लंडची भूमी ही बाकी युरोपीय देशांपासून मध्यात येणाऱ्या ब्रिटिश समुद्रधुनीमुळे वेगळी होत असल्याने व त्यातही ब्रिटिशमंडळी इतरांपासूनचा आपला वेगळेपणा आवर्जून टिकवत असल्याने अर्थातच हा युरेलचा परंतु पास लंडनमध्ये वा इंग्लंडमध्ये फिरण्यासाठी उपयोगी पडणार नव्हता; (आपल्यापुढचा) इंग्लंडसाठी वेगळं तिकीट काढण्याचा पर्याय खुला असतोच.

    आम्ही तीन मित्रांनी हा प्रवास करावयाचा व जर्मनी गाठायचेच असा बेत पक्का केला. युरोप रेल नकाशे, युरेल पास नियम, युरेल टाईम टेबल 'युरोप ऑन १५ डॉलर्स अ डे' अशी विविध पुस्तकं मिळवणं; याशिवाय प्रत्यक्षात युरेलने प्रवास केलेल्या व्यक्तींशी चर्चा करणं, अशा प्रकारे सहा महिने खपून आमची जय्यत तयारी झाली. कोणती गाडी कोणत्या स्टेशनवर घ्यायची, कोठे राहायचं अशा प्रवासासंबंधी अनेक प्रश्नांच्या उत्तरांची नोंद प्रत्येकाजवळील कागदावर तयार होत होती. आम्हाला भारत सरकारच्या नियमाप्रमाणे ५०० डॉलर्स मिळणार होते. त्यांतील ३२० डॉलर्स ही रक्कम २१ दिवसांच्या युरेल पासासाठी वापरल्यावर, खिशात उरणार फक्त १८० डॉलर्स. त्यांतूनच इतर खर्च भागवायचा, म्हणजे अगदी अटीतटीचा सामना होता. पोटाला चिमटा घ्यायचा, जास्त वेळ गाडीत घालवायचा. त्यातही काही प्रवास रात्रभराच्या गाडीने करावयाचा, पण प्रेक्षणीय स्थळं मात्र पुरेपूर पदरी पाडून घ्यायची ह्या हिशोबाने योजना कागदावर १०० टक्के यशस्वीरीत्या आखली गेली. या पासचं वैशिष्ट्य असं, की कोणतीही गाडी कुठेही पकडता येत होती. मनाला वाटेल तिथे उतरण्याची परवानगी होती. आरक्षण करणंही अजिबात आवश्यक नव्हतं. फक्त ज्या देशांमधून आमचा गाडीचा मार्ग निवडला होता त्या प्रत्येक देशाचा 'मल्टिपल एन्ट्री व्हिसा' मुंबईतून ३ महिन्यांच्या मुदतीसाठी घ्यावा लागला होता.

    आमचा प्रवासाचा मार्ग साधारण याप्रमाणे आखला गेला

    मुंबई ते अॅमस्टरडॅम (हॉलंड) विमानाने प्रवास

    १. अॅमस्टरडॅम ते लंडन (इंग्लंड) - ह्या प्रवासाला युरेलचा पास चालणार नव्हता.
    २. लंडन ते पॅरिस (फ्रान्स) - येथेही युरेल पास चालणार नव्हता. (पॅरिसहून पुढच्या प्रवासासाठी युरेलचा पास वापरण्यास सुरुवात.)
    ३. पॅरिस ते जिनिव्हा (स्वित्झर्लंड) - ४ दिवस स्वित्झर्लंड देश रेल्वेनं पालथा घालायचा.
    ४. जिनिव्हा ते इन्सबुक (ऑस्ट्रिया)
    ५. जर्मनी
    ६. इटली
    अशा रीतीनं ५ देश युरेलनं व दोन देश वेगळी स्वतंत्र तिकिटं काढून पाहावयाचे ठरले.

    -- डॉ. अविनाश वैद्य

  • नुक्कड’ची पस्तीस वर्षे

    ही सारी पात्रं रसरशीत जिंवतपणा काय असतो हे दाखवणारी होती. कितीही अडचण असो, एकमेकाच्या सहाय्याला धावणारी, दुसऱ्याच्या सुखात आपलं दुःख विसरुन सहभागी होणारी, एकमेकांच्या दुःखात मात्र जवळ करणारी ही सारी नुक्कड मंडळी. याच्या टायटल साँग मधेच एक वाक्य होतं..’अजब तमाशा है ये नगरी, दुख मे हसते गाते है..अपने बर्बादीका यारो ये तो जश्न मनाते है..’ बस्स..यातच नुक्कडचे सार आहे.

  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग २

    अॅमस्टरडॅम ते लंडन हा पहिला प्रवास रेल्वे-बोट-रेल्वे' असा होता व त्यातही साध्या वर्गाचं तिकीट काढलं होतं. अॅमस्टरडॅम रेल्वे स्टेशन अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं आहे. तेथील स्वच्छता, टापटीप व तुरळक गर्दी या गोष्टीही मनात आणि नजरेत भरतात. १५ ते २० प्लॅटफॉर्म्सवर अनेक गाड्या निघण्याच्या प्रतीक्षेत होत्या. आमच्या डब्यात मात्र प्रवाशांची बरीच गर्दी होती.

    जेमतेम बसण्याची सोय झाली होती. बाजूचे प्रवासी आपापसात गप्पागोष्टी करत आपापले डबे उघडून काहीतरी खात होते. गाडी चांगली ताशी १२० मैल वेगानं पळत होती. बाजूनं सर्वत्र हिरवीगार वनश्री. कालवे, टुमदार कौलारू घरं... नजर तृप्त न होती तर नवल! ३ तासांत आमची गाडी एका बंदराला लागून असलेल्या प्लॅटफॉर्मवर रात्रीच्या अंधारात उभी राहिली. परिसरात काळोख, दूरवर एक अजस्त्र बोट. त्यावरती मिणमिणते दिवे, हवेत प्रचंड गारवा. कुडकुडत, बॅगा. खेचून नेत अखेरीस त्या बोटीवर जाऊन आम्ही स्थानापन्न झालो. बोटीचा तळमजल्याचा प्रचंड मोठा दरवाजा 'आ वासून' पसरलेल्या जबड्यासारखा. त्यामधून मोटारी, ट्रक्स चढविले जात होते. पूर्वी तर रेल्वेचे काही डबेही बोटीतून नेले जात. मधल्या केबिनच्या तिकिटाची किंमत जास्त असल्याने आम्ही मोकळ्या डेकवर उभं राहणंच पसंत केलं. केबिनमधील प्रवासी ढारादूर झोपलेले. रात्री ११ ची वेळ. डेकवर उभे राहून समोर अथांग सागर पाहताना मन उचंबळून आलं होतं. ब्रिटिश भूमीवर पाय ठेवण्यासाठी उत्सुक झालो होतो. दूर समुद्रात अनेक बोटींचे दिवे लुकलुकत होते. थोड्याच वेळात तळाचा अवाढव्य दरवाजा बंद झाला. बोटीचे साखळदंड सुटले आणि ब्रिटिश खाडीतील प्रवासास सुरुवात झाली. काही प्रवासी आपल्या स्लीपिंग बॅगमध्ये निद्रिस्त झाले होते. रात्री १ वाजेपर्यंत कुडकुडत, झोंबऱ्या वाऱ्याला तोंड देत, झोप घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि जरा डोळा लागतो तर पहाटे ३ वाजता इंग्लंडचं बंदर आलं. खाली उतरलो मात्र आणि चेक पॉईंटवर प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागलं, कारण इंग्लंडमधील व्हिसा मिळवताना भारतीय प्रवाशांना फार अपमानाची व तिरस्काराची वागणूक दिली जात असे. परंतु अखेरीस गंगेत घोडे न्हाले. पासपोर्टवर व्हिसाचा स्टँप लागला. व्हिसा मिळतो का नाही असा अटीतटीचा प्रसंग ओढविण्याची चिन्हे होती.

    बाहेर पडल्यावर लंडनला जाणारी ट्रेन उभीच होती. डब्यात बेताची गर्दी, धीरगंभीर चेहेऱ्याचे ब्रिटिश प्रवासी, सगळ्यांची अळीमिळी गुपचिळी. अखेरीस डुलक्या घेत साहेबाच्या लंडन शहरातील व्हिक्टोरिया स्टेशनला पाय लागले. पहिल्या युरोप प्रवासाची सुरुवात सुखाची झाली होती.

    लंडन शहर पाहण्याचा ५ दिवसांचा एकूण कार्यक्रम ठरला होता. लंडन ट्यूबरेल्वे-कम-बस असा एकत्रित पास काढून हा कार्यक्रम पार पाडला. जमिनीखाली तीन तीन थरांवर स्टेशनं; सरकते जिने; पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या आणि पांढऱ्या लाईनचे विविध मार्गांचे डबे, आपोआप उघडझाप करणारे गाड्यांचे दरवाजे, त्यांचा वेग, वेळेचा नियमितपणा... प्रथम भांबावूनच गेलो, पण लक्षात आलं, की चुकायचं ठरवलं तरी चुकणं अशक्य. दुसऱ्या महायुद्धात रात्री बाँब हल्ल्यापासून बचावाकरता याच भुयारी रेल्वे फ्लॅटफॉर्मवर हजारो लंडनवासी आश्रयास येत. त्यावरील अनेक सिनेमे पाहिले होते. आज प्रत्यक्ष त्या जागी गाड्या बदलत होतो. ४ दिवसांत संपूर्ण लंडन पाहून घेतलं. लंडनच्या ट्यूबरेल्वे प्रवासात मनसोक्त भटकल्याने तृप्ती झाली होती.

    लंडन-डोव्हर-कॅले-पॅरिस हा प्रवास परत रेल्वे-बोट-रेल्वे हाही तितकाच अविस्मरणीय! प्रसिद्ध इंग्लिश खाडी ओलांडून पुन्हा युरोपमध्ये प्रवेश केला. राहून राहून 'द लाँगेस्ट डे' या प्रसिद्ध युद्धपटाची आठवण येत होती, कारण याच कॅले बंदराजवळ दोस्तराष्ट्रांचे लक्षावधी सैनिक छोट्या बोटींतून उतरले होते.

    पॅरिस नॉर्ड स्टेशनपासून आमच्या मौल्यवान युरेल पासची सुरुवात करण्याकरता एका खिडकीपाशी गेलो. पासपोर्ट तपासणी पूर्ण केल्यावर आमच्या तिघांच्या पासवर तो चालू झाल्याची तारीख व २१ दिवस ज्या तारखेला पुरे होणार ती तारीख नोंदविली गेली. नेमका माझ्या पासवर ऑफिसने गडबडीत चुकीचा महिना छापला. माझं नशीब बलवत्तर म्हणून चूक तिथल्या तिथे लक्षात आली. खाडाखोड न होता पुन्हा महिन्याचा क्रमांक व्यवस्थित लिहिला गेला. तरीही मनाला प्रवासभर मधूनच धाकधूक वाटे. कोणी त्यावरून अडविणार तर नाही ना? तसं झालंच, तर तिघांचा एकच गोंधळ व पास मुंबईत मिळाल्याने तो पुन्हा पॅरिसमध्ये मिळणारच नाही. असो. तशी वेळ मात्र आली नाही. आता पुढचे २१ दिवस लाल रंगाचा पास व पासपोर्ट यांचं आमच्या जीवनात अविभाज्य स्थान झालं होतं. त्यांची तपासणी पुढील प्रवासात असंख्य वेळा झाली.

    पॅरिस नॉर्ड ते व्हर्सायिल्स असा पहिला प्रवास फर्स्टक्लासमधून सुरू केला. डबा उत्तम सुखसोयींनी परिपूर्ण होता. पुढेही प्रत्येक नवं स्टेशन येण्यापूर्वी डब्यात घोषणा ऐकून व इतरही अनेक सोयी-सुविधा पाहून आम्ही थक्क झालो होतो. पुढचे २१ दिवस अशाच आलिशान डब्यांमधून आमचा प्रवास सुखद होणार होता. पॅरिसमधील वास्तव्यात पॅरिस नॉर्ड स्टेशन तर आम्हाला सरावानं अगदी घरासारखं वाटलं. राहण्याची जागा स्टेशनजवळ व आमच्या मोठ्या बॅगा स्टेशनवरील लॉकर्समध्ये सुरक्षित, अशी सर्व चोख व्यवस्था झाल्याने शहर फिरताना एक छोटी बॅग गळ्यात अडकवून संपूर्ण शहर पॅरिस ट्यूब-रेलने आरामात फिरून पाहता आलं. लंडन ट्यूबपेक्षा पॅरिस-ट्यूबरेल्वे निश्चित वरच्या दर्जाची होती. डब्यातील व प्लॅटफॉर्मवरील दिव्यांचा झगमगाट डोळ्यांत भरणारा आणि प्रवासीही रंगेल, मजा करत फिरणारे दिसत होते. पॅरिस शहराचा विस्तार बराच मोठा आहे, परंतु ट्यूब-रेल शहराच्या कानाकोपऱ्यांतून पोहोचलेली असल्यामुळे शहर सहजपणे पालथं घालता येतं.

    -- डॉ. अविनाश वैद्य

  • तब्बुचे ‘ते’ तीन रोल

    नव्वदच्या दशकाच्या शेवटी एक मस्त हॉलीवूडपट आला होता.
    'What Women Want?' नावाचा.
    पाहिलाय तुम्ही? हेलेन हंट...? मेल गिब्सन..?
    अरे..नाही पाहिला?
    नो प्रॉब्लेम..!!
    केदार शिंदेंचा 'अगबाई अरेच्चा' पाहिलाय ना? हां...येस्स..
    तर, अगबाई अरेच्चा आणि What Women Want एकाच थिमवर होते. अर्थात कथा आणि ट्रिटमेंट पूर्ण वेगळी होती.
    दोन्हीत एकच विषय हाताळला होता..
    'बायकांना आयुष्यात नक्की काय हवं असतं...
    आणि ते जर एखाद्या पुरुषाला कळू लागलं तर...?
    त्याला बायकांचे विचार ऐकूच येउ लागले तर...?'

    ह्या चित्रपटाचा उल्लेख इथे एवढ्यासाठीच की महिला दिना निमीत्त 'ओ वुमनिया' साठी काय लिहावे असे विचार करताना मला हाच विचार मनात आला. स्त्रिया कधी कधी एका विशीष्ट unpredictable पद्धतीने वागतात ते का वागतात? स्त्रीयांच्या अंतरमनाचा एका uncommon पद्धतीने वेध घेणारे अलिकडे बनलेले सिनेमे कोणते? त्यावर जसा विचार करु लागलो तसे मला जाणवले 'अरे...फार दूर जायची गरज नाहीये..'
    एकाच अभिनेत्रीने साकारलेल्या तीन भूमिकांमधे मला हा समान धागा सापडला.
    ती अभिनेत्री म्हणजे तब्बु..!!

    अगदी खरं सांगायचं तर तब्बु माझी फेवरेट हिरोईन वगैरे नाहीये.
    पण या तीन सिनेमातल्या तिच्या भूमिकांचा मी मोठा चाहता आहे.
    ते का हेच मी या तीन सिनेमांच्या अनुषंगाने मांडणार आहे.
    चला तर त्या तीन भूमिका कोणत्या ते पाहूत.

    टेक १. मकबूल:

    निम्मी..

    मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज करणाऱ्या म्हाताऱ्या जहांगीर खान उर्फ अब्बाजीच्या मनावर राज करणारी त्याची रखेल, निम्मी.
    जहांगिरच्या मुलासारखा असणाऱ्या,त्याच्याकडेच वाढलेल्या मकबुल मियांच्या, प्रेमात बुडालेली निम्मी..
    जहांगिरने आपल्याला घरातच आसरा दिलाय पण आपल्याला बिवी चा दर्जा दिला नाही म्हणून मनोमन तडफडणारी निम्मी..
    जहांगिरला उद्या आपल्यापेक्षा चांगली स्त्री मनात भरली तर तो आपल्याला खड्यासरशी दूर सारेल हे जाणून असलेली निम्मी.
    निम्मीला हे असे आयुष्य नकोय. तिला आपला मान हवाय...
    तिला सत्ता हवीय..निर्णय घेण्याची ताकत हवीय.
    तिच्या प्रेमात असलेल्या मकबूलला मग ती आपला मोहरा बनवते.
    आधी आडून आडून आणि मग उघडपणे मकबूलची महत्वाकांक्षेला हवा देत अब्बाजी विरुद्ध जायला कचरणाऱ्या मकबूलला अब्बाजीलाच संपवून टाकायला तयार करते.

    मकबूल अब्बाजीला संपवतो व आपल्या सत्तेच्या विरुद्ध जाउ शकणाऱ्या इतर सहकाऱ्यांचा काटा काढतो. मकबूल आता अंडरवर्लडचा बादशाह होतो.
    पण शेवटी निम्मीने केलेल्या कर्माची टोचणी तिला निट जगू देत नाही. पोटात वाढणारे बाळ मकबूलचे की अब्बाजीचे या प्रश्नाने तिची तगमग होत राहते. आपल्याच शय्येला, दग्याने, अब्बाजीची मृत्युशय्या करताना चेहऱ्यावर उडालेले रक्त तिला उठता बसता दिसू लागते. तिच्या बाळाच्या जन्मानंतरही अब्बाजीचे काल्पनिक भूत तिची पाठ सोडत नाही. इकडे ज्या मकबूलला आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी तिने सग्या सोयऱ्यांशी दुश्मनी घ्यायला लावली ते लोक एकत्र येतात आणि मकबूलचा डाव उधळून लावतात. शेवटी निम्मीच मकबूलच्या विनाशास कारण ठरते.

    का केलं तिने असे...? काय मिळाले तिला हे करुन ?
    हे असे प्रश्न शेवटी अनुत्तरीत राहतात.
    खरे तर मकबूल हा शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ' वर आधारीत सिनेमा.
    इंग्रजी साहित्य विश्वात 'लेडी मॅकबेथ' हे पात्र प्रचंड महत्वाकांक्षी स्त्रीचे प्रारुप समजले जाते. इथे निम्मी ही 'लेडी मॅकबेथ' म्हणून आपल्यासमोर येते..पण दिग्दर्शक विशाल भारद्वाजने एका भारतीय स्त्रीचे प्रेम,समर्पण, अभिमान, व्देष, पश्चाताप हे सर्व रंग
    निम्मीमधे इतक्या सुंदरपणे मिसळलेत की निम्मी ही भारतीय सिनेमामधल्या काही सर्वोत्तम व्यक्तीरेखांमधे गणली जावी अशी झाली आहे. तिला समजून घेणे अशक्य नाही पण अवघड नक्कीच.. काय बरोबर ना?

    टेक २. दृष्यम

    आय.जी. मीरा देशमुख

    मीराचे व्यक्तीमत्व हे दुभागलेले आहे..
    एकीकडे ती एका राज्याची पोलीस प्रमुख..
    दुसरीकडे एका वयात येणाऱ्या मुलाची हळवी आई..
    एकुलता एक मुलगा..आईबापाने लाडाने वाढवलेला..
    त्यामुळेच वहावलेला हा तीचा मुलगा..
    काही चुकीचे काम करतो..व त्यामुळे मारला जातो..
    पण पूर्ण पोलीस यंत्रणा वापरुनही तो सापडत नाही..
    एका कालावधीनंतर तो कायमचा गेलाय ही भावना बळावते..
    मीरा एक कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी असली तरी एक आईही आहेच ना..
    मुलगा कायमचा हरवलाय हे कळल्यावर ती उन्मळून पडते..
    पण मग ज्यांनी तो हिरावून घेतलाय असा संशय आहे त्या कुटुंबाच्या ती पाठीमागे लागते...
    जंग जंग पछाडते...साम दाम दंड भेद सर्व वापरते..
    उद्देश हाच..की खूनी सापडायला हवा आणि मुलाचे प्रेत मिळायला हवे. त्या कुटुंबाला गुन्हा कबूल करयला लावण्यासाठी ती त्यांच्यावर टोकाची, अगदी अतिरेकी जबरदस्ती करते. त्या कुटूंबावर आत्यंतिक दबाव टाकताना मीरा त्या कुटुंबातल्या त्या दोन लहान मुलींनाही सोडत नाही.

    मीरा..एक आई..जी आपल्या मुलासाठी व्याकुळ आहे..पण तरीही त्याच्याच वयाच्या मुलीवर ती स्वतः हात उगारते..मारझोड करते. कोवळ्या वयाच्या मुलीला आपला सहकारी लाथ मारायला जातो तरी ती आडवत नाही...

    हे असे कसे शक्य आहे..? मीरा इतकी निष्ठुर, निर्दयी कशी वागू शकते? आपल्या पोलीसी खाक्या आणि एक सहृदयी आई यांची गल्लत कशी होउ देते? असे प्रश्न पडतात.

    दृश्यमच्या पहिल्या भागाच्या शेवटी हरुन, थकून, पार कोलमडून गेलेली हिच मीरा आता दुसऱ्या भागात पुन्हा नागिनी प्रमाणे चवताळून त्याच कुटूंबाच्या पुन्हा मागे लागते.

    एक स्त्री म्हणून बदलत जाणारी मीराची ही रुपे खरे की हा एक आभास, एक दृष्यम..? की शेवटी एक सिनेमॅटीक इलेमेंट फक्त?
    नाही..मीरा देशमुखला समजून घेणंही इतक सोप नाहीये..
    मला तरी असं वाटतं...
    आणि तुम्हाला..?

    टेक ३- अंधाधुन

    सिमी सिन्हा

    खरे तर सिमीच्या आयुष्यात इतके मोठे वादळ यायची गरजच नव्हती. पण ते येतं..आणि तिच्या आयुष्याची ऐशी की तैशी होते.
    "त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम, देवौ ना जानाति कुतो मनुष्यः"
    असे संस्कृत श्लोक खूप प्रचलीत आहे. (याचा अर्थ स्त्रीला समजून घेणं..तिचे चरित्र समजून घेणं हे मनुष्य तर सोडा, देवांनाही शक्य नाही)
    आता हे कोणी generalize करायला गेले तर सर्व स्त्री वर्ग त्याला थोडेच सोडेल..? चांगलं फोडून काढेल ना. पण सिमीच्या कॅरॅक्टरला हा श्लोक अगदी बरोबर समर्पक बसतो.

    आणि पुन्हा फिरुन आपण लेखाच्या सुरवातीच्या प्रश्नावर येतो तो म्हणजे 'What women want?'.
    सिमी सिन्हाचे अंधाधुन मधले हे पात्र उलगडताना मला राहून राहून हाच प्रश्न पडतो..ती असे का वागली?
    छान प्रेम करणारा पती...तोही पुर्वाश्रमीचा हँडसम फिल्म ॲ‍क्टर..
    रहायाला सुंदर लोकॅलिटीतला आलिशान फ्लॅट..
    हाय सोसायटीमधे उठबस..
    ना मुलांचे झेंगाट मागे ..ना कसल्या liabilities..
    एक सावत्र मुलगी..तिही दूर राहते..
    असे सर्व असताना..
    आपल्या पतीला फसवत ती आपल्या प्रेमीला घरी बोलवत असते..
    आपल्या लग्नाच्या वाढदिवशी देखील ती व्यभिचारात गुंग असते..
    अचानक घरी येउन तिला तिचा पती रंगेहाथ पकडतो..
    आणि तिचा इन्स्पेक्टर प्रियकर तिच्या नवऱ्याला सरळ शुट करतो...
    सामान्य भारतीय स्त्री अशा परिस्थितीत भेदरुन जाइल..
    panic होईल..
    पण सिमी अतिशय थंडपणे सर्व परिस्थिती सांभाळते..
    इतक्या थंडपणे..की सिनेमा पाहताना आपण जागेवर फ्रीज होतो..

    (तो प्रसंग आठवा जेंव्हा ती अंध आकाशच्या घरी येते तेंव्हा अचानक तो भितीदायक मास्क तोंडावर चढवते. छातीचा ठोकाच चुकला माझा तो प्रसंग पाहताना).

    सिमी ज्या थंडपणे काही गोष्टी करते तो तिचा थंडपणा खरंच थिजवणारा आहे. ती पुढे आता काय करणार आहे हा विचार करुन आपल्याला एसी मधेही घाम फुटतो. तिच्या प्रत्येक नवीन मुव्हला आपण मनात दाद देतो. कारण शेवटी Antagonist ताकतवर असेल तर Protagonist चा विजय अधिक सुखावणारा असतो..नाही का?

    खरे तर या तिन्ही भूमिकांमधे सर्वात जटील, complex भूमिका ही सिमीचीच असावी...सतत रंग बदलणारी..सतत सतर्क असणारी..शत्रुवर बाजी पलटवणारी.. तुम्हालाही ती तशी वाटते का?

    तर अशी ह्या तब्बूच्या तीन भूमीका.
    तीन पूर्णपणे वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका.
    तितक्याच ताकतीने तब्बूने त्या निभावल्या आहेत.
    इतक्या.. की आज त्या तीन भूमिकांमधे तुम्ही इतर कोणाचाच विचार करु शकत नाही..
    म्हणून तर तब्बू माझी 'आवडती अभिनेत्री' आहे..
    जरी ती माझी 'फेवरेट हिरोइन' नसली तरी..
    दोन्हीत फरक आहे...
    ओह वुमनिया..!!
    पटतय ना..?

    -- सुनिल गोबुरे.

  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ३

    स्वित्झर्लंडला जाणारी पुढील गाडी लिऑन या दुसऱ्या स्टेशनवरून सुटणारी असल्याने संध्याकाळच्या भर गर्दीत ट्यूबनं पॅरिस नॉर्ड येथून सर्व मोठ्या बॅग्ज नेण्यासाठी महा कसरत करावी लागली. मुंबईत याबाबतीत विचार करणंसुद्धा शक्य नाही, परंतु या देशात गाडीतून उतरणं फारच सोपं होतं. लिऑन स्टेशनला अनेक प्लॅटफॉर्मूस, त्यातही इन्डिकेटरवरील गाड्यांची नावं फ्रेंच भाषेत असल्याने आम्हाला ती नीटपणे वाचता येत नव्हती. प्लॅटफॉर्मवर भरपूर गर्दी, शेवटी पॅरिस-जिनिव्हा गाडीचा प्लॅटफॉर्म मिळाला. या गाडीला युरोपातील अनेक देशाच्या महत्त्वाच्या शहरांचे डबे लागलेले होते. त्यातील एका डब्यावर पाटी होती जिनोवा. हे तर इटलीतील प्रसिद्ध नाव. परंतु आमची वाट वेगळी होती. त्यामुळे पुन्हा पुन्हा खात्री करून जिनिव्हा ह्या स्वित्झर्लंडमधील महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या जिनोव्हा या डब्यात अखेरीस स्थानापन्न झालो. अशा गाड्यांत बसताना फार काळजी घ्यावी लागते, कारण मध्यरात्री तुमचा डबा अलगदपणे बाजूला केला जातो व दुसऱ्या गाडीला जोडला जातो. सकाळी उठाल आणि बघाल तर दुसऱ्याच देशात असाल. गाडीला जरी गर्दी होती, तरी आमचा रुबाब होता. आम्ही फर्स्टक्लासचे पास होल्डर, त्यामुळे डबा प्रशस्त. अगदी पाय पसरून झोपण्यासारखी मऊ मऊ सीट. गाडी सुसाट वेगाने रात्रभर पळत होती, तरी पण मध्यरात्री उठवून व्हिसा मात्र बघितला जात होता. त्या व्हिसावरील छप्पा बरोबर नसेल तर तुमची खैर नाही!

    सकाळी जाग आली आणि स्वच्छ काचेच्या भव्य खिडकीतून स्वित्झर्लंडच्या स्वर्गभूमीचं दर्शन झाले. हिरव्यागार वेगळ्या वेगळ्या छटांमुळे मोहून टाकणाऱ्या पर्वतरांगा. त्यांच्यावरील हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झाल्यावर मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचू लागली. स्वित्झर्लंडमधील प्रवेशच एका निसर्गरम्य प्रदेशात आल्याची जाणीव करून देत होता. गाडीचा वेग जरी तुफान वाटला, तरी पोटातील पाणी जरासुद्धा हलत नव्हतं. जिनिव्हा स्टेशन कोणालाही प्रेमात पाडणारं आहे. स्टेशनवर उतरताच सुरेल संगीताचे मंद सूर कानांवर पडत होते. आता पुढील चार दिवस येथून सुटणाऱ्या गाड्यांमधून संपूर्ण स्वित्झर्लंडची सहल होणार होती.

    युरोपमधील रेल्वे प्रवासाची एक गंमत म्हणजे वाटेत येणारं स्टेशन फार मोठं असेल, तर प्रशस्त प्लॅटफॉर्मवर गाडी शिरते आणि लगेचच पुढचं इंजिन सुटतं आणि दुसऱ्या बाजूस नवीन इंजिन लागतं. गाडीचा प्रवास आता विरुद्ध दिशेने होतो. विशेष म्हणजे हे सर्व सव्यापसव्य वॉकी टॉकीवर काही मिनिटांत पुरं होतं. प्रवाशांची एकंदर संख्या तुलनेनं फारच कमी असते व तेथील डब्यांचे दरवाजे बंद करण्यासाठी कर्मचारी असतात. ती व्यवस्था पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. रेल्वेने संपूर्ण स्वित्झर्लंड पाहण्याचं नियोजन आम्ही मुंबईतच केलं होतं. त्याबरहुकूम त्या त्या गाड्या मिळत होत्या. आमचा सखोल अभ्यास कामी आला होता. दिवसाचे १५/१५ तास आम्ही गाडीतून प्रवास करून रात्री झोपण्यापुरते 'पेन्शॉन' मध्ये राहत होतो. वयस्कर जोडपी आपल्या घरांतील एखादी खोली प्रवाशांना उपलब्ध करून देत असतात. त्या जागांना 'पेन्शॉन' म्हणतात.

    आमच्या रेल्वेप्रवासनियोजनात स्वित्झर्लंडला सर्वांत जास्त महत्त्व होतं. या देशातला पहिला मोठा प्रवास जिनिव्हा-स्पिटझ-धुन सरोवर-बर्न- जिनिव्हा रेल्वे ते बोट-ते रेल्वे असा तब्बल पाच तासांचा होता. त्यातही तो युरेल पासमधील नियमात बसणारा असल्यामुळे पैशांची कटकट नव्हती. हा मार्ग म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची सतत बदलणारी उधळण होती. आकाशाला भिडणारी आल्प्स पर्वताची हिमशिखरं, संथ, नितळ-निळ्या पाण्याची विशाल सरोवरं, क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, त्यांत बांधलेली आखीव-रेखीव टुमदार घरं, मध्यातून जाणारे मातकट रंगाचे सुरेख रस्ते, घरासमोरील गॅलऱ्यांत गच्च भरलेली फुलझाडं, शेतांत चहूबाजूंनी पाणी उडविणारे पंप, कुरणांत चरणारी धष्टपुष्ट गाईगुरे आणि औषधाला सुद्धा न आढळणारी इतकी कमी माणसे, असा निसर्गसौंदर्याचा बदलता अखंड चलतपट गाडीसोबत पळत होता. डब्याच्या उत्तम काचेच्या मोठ्या आकाराच्या खिडकीतून तहानभूक विसरावयास लावणारा हा निसर्गाचा नजारा पुढे सतत ४ दिवस नेत्रांना सुखवत होता. धुन सरोवराच्या बोटीला वरती मोकळा डेक व इतर अद्ययावत सोयी होत्या. वर स्वच्छ निळं आकाश, मध्येच पांढऱ्या ढगांचे पुंजके, आसमंतात पसरलेली नीरव शांतता... तासभरात निसर्गाच्या या गूढरम्य रूपानं मन विस्मयचकित झालं. मी माझा नव्हतोच. एका नेत्रसुखद दुनियेतील हा प्रवास कधीच संपू नये असं वाटत होतं. या परिसराचं सौंदर्य पाहून हरखून गेलेल्या एका प्रसिद्ध लेखकाने असं लिहून ठेवलं आहे, की 'हा सर्व प्रवास जर तुमचे मन मोहून टाकू शकला नाही तर यापेक्षा अप्रतिम, अद्वितीय दृश्य तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेही पाहावयास मिळणार नाही; तेव्हा धुन सरोवर पाहून तुम्हाला मनःशांती मिळाली नसेल, तर तुम्ही तुमच्या प्रवासात घेतलेल्या सामानाची वळकटी बांधा व मुकाट्याने आपल्या घरची वाट धरा. हाच एक उपाय आहे.' खरोखरच या स्वप्ननगरीतून पाऊल निघता निघत नाही.

    माऊंट पिलॅटस् हे ७८०० फूट उंचवरील बर्फाच्छादित छान पठार आहे. येथे जाणारी कॉगव्हिल सिंगल कम्पार्टमेंट रेल्वे म्हणजे रेल्वेबांधणी तंत्रज्ञानाचा एक अफलातून आविष्कार आहे. ४०० फूट उंचीवरून सुरू होणारी ही गाडी ७८०० फुटांवर २३ ते ४५ अंश ग्रेडियन्टमध्ये उभीच्या उभी वर आकाशाला भिडत आपला प्रवास ४५ मिनिटांत पुरा करते. गाडीची चाकं रुळांना घट्टपणे पकडू शकतील अशा प्रकारची रुळांची वेगळ्याच पद्धतीची रचना आहे. प्रवासात मधूनच पावसाची सर येत होती. बर्फाचे भुरभुरते कण, मध्येच दाट धुकं, दोन्ही बाजूला गर्द हिरवीगार झाडी, त्यामधून गाईंच्या गळ्यांत बांधलेल्या घंटांचा किणकिण असा मनाला आल्हाद देणारा नाद... आणि आता अगदी एक क्षणात कुशल नर्तकीसारखी आपली गाडी अर्धवर्तुळाकार फिरते, थबकते; आपण पटकन तिच्यामधून उतरतो व तीच गाडी परतीच्या प्रवासाला सज्ज होते. वर पठारावर प्रचंड गार वारे वाहत असतात. बर्फ व धुक्यात प्रवासी दिसतही नाहीत असा भोवताल असतो. थोड्याच वेळाच परतीचा प्रवास चालू होतो. हा अविस्मरणीय रेल्वे प्रवास कायमचा स्मृतीत राहणार याची निश्चिती असते.

    या देशातील रेल्वेचं जाळं हे युरोपमधील सर्वांत उत्तम दर्जाचं आहे. असंख्य गाड्या धावत असतात. त्यामुळे कुठेही प्रतीक्षा करावी लागत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे या देशातील अगदी कानाकोपऱ्यापासून ते हिमशिखरांपर्यंत सर्वत्र जाण्यासाठी गाड्यांची सोय आहे. काही मार्गांवरील बोगदे ५-५ मैलांचे असून, गाड्यांचा वेग ताशी १५० मैलांपर्यंत आहे. रेल्वेप्रेमिकांनी एकदा तरी स्विस रेल्वे अनुभवायलाच हवी.

    -- डॉ. अविनाश वैद्य

  • “बुनियाद-टेलिव्हिजन सिरीजचा शोले”

    कासवाच्या गतीने वाढणाऱ्या भारतीय टेलिव्हिजन क्षेत्राला खरा बुस्टर मिळाला तो ऐंशीच्या दशकात. १९८२ मधे दिल्लीतील एसियाड गेम्स च्या निमीत्ताने क्रिडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, १९८३ मधे एकदिवसीय क्रिकेटमधे भारतीय टीमचा विश्व विजय, आणि १९८४ मधे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लाइव्ह टेलेकास्ट झालेला त्यांचा अंत्यसंस्काराचा सोहळा, या सर्व घटनांमुळे भारतात घरोघरी टेलिव्हिजनचा प्रसार झपाट्याने होउ लागला होता. टिव्ही हा फक्त स्टेटस सिंबल न राहता लोकांना आता ती गरजेची वस्तु वाटू लागली होती.

    त्याचवर्षी, म्हणजे १९८४ मधे, दिल्ली दूरदर्शन वरुन प्रसारित पहिली टेली सिरीज, 'हमलोग' ने बरीच लोकप्रियता मिळवली. हमलोग १९८५ मधे संपली तेंव्हा भारतभरातून लोकांनी खूप भावनीक प्रतिक्रिया दिल्या. ते पाहून दूरदर्शनला टेली सिरीज मधे एक मोठे भविष्य दिसू लागले. त्यांनी जी.पी. सिप्पी, रामानंद सागर, बी.आर.चोप्रा सरख्या दिग्गज फिल्म निर्मात्यांना दूरदर्शन साठी कार्यक्रम बनवायला पाचारण केले.

    त्याच काळात, जी पी सिप्पींनी आपल्या मुलाला, दिग्ग्ज दिग्दर्शक रमेश सिप्पीला, दूरदर्शनची ही ऑफर सांगितली व एक टिव्ही सिरीज करण्याची इच्छा बोलून दाखवली. शान, शक्ती व सागर याखारख्या सलगच्या काही अपयशी (किंवा कमी यशस्वी म्हणूत) चित्रपटांनंतर रमेश सिप्पींनाही काहितरी वेगळं करायचे होते. त्यांना वडिलांची ही आयडिया आवडली व त्यांनी काही सामाजिक परदेशी डेली सोप्सचा अभ्यास केला. याच दरम्यान हम लोगचे लेखक मनोहर श्याम जोशींची त्यांनी भेट घेतली. त्यांच्याही डोक्यात काही मोठं, भव्य लिहायचं होतंच. सिप्पी कुटूंब मुळचे पंजाबी. देशाच्या विभाजनाच्या वेळी भारतात स्थायीक होताना फाळणीचे चटके बसलेले हे कुटूंब होते. रमेश सिप्पी तेंव्हा लहान असले तरी त्यांनीही फाळणीची झळ सोसली होतीच. त्यातूनच त्यांना आपल्या या सिरीयलचे बीज मिळाले 'स्वातंत्र्य पूर्व काळात पाकिस्तानात लाहोर मधे स्थायीक असलेला पण फाळणीमुळे विस्थापीत होउन भारतात आलेल्या कुटुंबाचा तब्बल तीन पिढ्यांचा इतिहास' हा या सिरीजचा मुख्य विषय होता. अशा तऱ्हेने 'बुनियाद' या टिव्ही सिरियल च्या संकल्पनेचे बिजरोपण झाले.
    मनोहर श्याम जोशींनी लेखनाची व रमेश सिप्पींनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली. आता प्रश्न कलाकारांचा होता. रमेश सिप्पी जरी फिल्म इंड्स्ट्रीत मोठे नाव असले तरी प्रतिथयश अभिनेते अभिनेत्रींना या सिरीज साठी घेण्यात काही अडचणी होत्या. पहिली म्हणजे तारखा. सलग एक वर्ष आठवड्यातून दोन दिवस याचे भाग प्रक्षेपण होणार असल्याने प्रत्येक आठवड्याला शूटींग करणे क्रमप्राप्त होते. सिनेमात काम करणारे व जम बसलेले कलाकार अशा तारखा देउ शकत नसल्याने साहजिकच यात अभिनय करु शकणार नव्हते. दुसरे म्हणजे फिल्म अभिनेत्यांना एक मुळचे वलय असते, एक इमेज असते. रमेश सिप्पींना या इमेज मधे आधीच अडकलेले कलाकार त्यांच्या सिरीयलमधे नको होते.

    बराच विचार करुन रमेश सिप्पी, मनोहर श्याम जोशी व कार्यकारी निर्माते अमीत खन्ना यांनी एक जुगार खेळायचा ठरवला. त्यांनी ठरवले की सर्व कलाकार हे नवीन, non-established कलाकार घ्यायचे, जेणेकरुन त्यांच्या आधीच्या रोल्स मधील इमेज या सिरीयलला मारक ठरणार नाही. पण कलाकार कसलेले हवे होते कारण जवळ जवळ पन्नास वर्षांचा स्पॅन दाखवताना काही कलाकार तरुण ते अगदी म्हातारे असा प्रवास करणार होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व FTII मधून बाहेर पडलेले व अजून स्वतःला सिद्ध करायला धडपड करणारे कलाकार एकत्र आणून या वरील त्रयीने बुनियादचा 'पाया' घातला.

    तेंव्हाच्या दूरदर्शनच्या नियमाप्रमाणे पायलट एपिसोड दाखवून रिवाजाप्रमाणे एकूण १०५ एपिसोड्स साठी दूरदर्शन कडून परवानगी मिळाली. शुटींग सुरु झाले. १९८६ च्या मे महिन्यात पहिला एपीसोड 'ऑन एअर' गेला.

    लाहोरमधे एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला लाला गेंदामल (सुधीर पांडे) त्यांच्या मुलांसह व्यवसायात उतरुन खूप प्रगती करतात. त्यांचा मोठा मुलगा लाला रलियाराम (गिरीजा शंकर) वडिलांच्या पावलांवर पाउल ठेउन व्यवसायात जम बसवतो. त्यांचा धाकटा मुलगा लाला हवेलीराम (आलोकनाथ) याला मात्र वडिलांच्या व्यवसायात काडीमात्र इंटरेस्ट नसतो. तो तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय अशा गदर पार्टी व आर्य समाजाच्या कामात लक्ष घालत असतो, जे त्याच्या वडिलांना व भावाला अजिबात आवडत नसते. अशात गदर पार्टीचे काम करणाऱ्या भाई आत्माराम (गोगा कपूर) यांच्या बरोबर काम करताना त्याची भेट आत्माराम यांची भाची लाजवंती उर्फ लाजोजी (अनिता कंवर) हिच्याशी होते. तिचा अभ्यास कच्चा असतो म्हणून तो तिला शिकवत असतो आणि शिकवता शिकवता दोघे प्रेमात पडतात.

    त्यांचे हे प्रेम प्रकरण फक्त हवेलीराम ची धाकटी बहिण व लाजोची मैत्रीण विरावाली (किरण जुनेजा) हिलाच ठाउक असते.

    आपल्या रुतब्याच्या खालच्या घरातील मुलगी घरात आणने अर्थातच हवेलीरामच्या घरच्यांना पसंत नसते. सतत नवऱ्याचे व सासु सासऱ्यांचे कान भरणारी रलियाराम ची बायको शन्नो (आशा सचदेव) आपल्या दीराच्या विरुद्ध आधीच कागाळ्या करत असतेच. त्यात अगदी आर्यसमाजी साध्या पद्दधतीने लाजोजी बरोबर लग्न करुन हवेलीराम तिला घरी घेउन येतो आणि एकच गहजब होतो. घरच्यांच्या मनाविरुद्ध गेल्याने संतप्त बाप व भावाचा रोष पत्करावा लागतो व शेवटी हवेलीराम बायकोसहीत घराबाहेर पडतो. मधल्या काळात विरावाली एका फसलेल्या प्रेम प्रकरणात गरोदर राहते व एका मुलाला जन्म देते. हवेलीराम व लाजोजी त्या मुलाला आपले नाव देतात व वाढवतात.

    हवेलीराम आपल्या मास्टरजीच्या नोकरी वर लाजोजी बरोबर संसार सुरु करतो. त्यांना दोन मुले कुलभूषण (दिलीप ताहिल) व रोशनलाल (मजहर खान) होतात. याशिवाय विरावालीचा मुलगा सतबीर (कंवलजीत) देखील त्यांचा तिसरा मुलगा म्हणून त्यांच्याकडे वाढतो. थोरला कुलभूषण चांगला शिकतो, सरकारी ऑफीसर बनतो. त्याची सतत तक्रार करणारी बायको लोचन उर्फ सुलोचना (सोनी राजदान), कुलभूषनला आधीच त्याच्या घरच्यांपासून दूर करते. कुलभूषनची दोन मुले आजी आजोबांची लाडकी असतात पण लोचनचा ओढा स्वतःच्या माहेरकडे जास्त असतो. रोशनलाल आधीपासूनच थोडा कामचुकार व लबाड आसतो तर सतबीर मात्र अगदी सरळमार्गी निपजतो. रोशन व सतबीर अजून कॉलेज शिकत असतात.

    याच वेळी देश स्वतंत्र होतो आणि देशाची फाळणी होते. लाहोर पाकिस्तानचा भाग होतो आणि मग जातीय दंगे सुरु होतात. जीव वाचवण्यासाठी मास्टर हवेलीरामच्या कुटुंबाला नेसत्या वस्त्रानिशी लाहोर सोडून निघावे लागते. त्याआधी हवेलीराम संकटात सापडलेल्या आपल्या मोठ्या भावाला रलियारामची खबर घ्यायला घरच्यांना न जुमानता जातो. प्रचंड दंगे होत असताना हवेलीराम हे धाडस करतो पण त्या दंग्यांमधे तो कुठेतरी नाहीसा होतो. आपल्या नवऱ्यासाठी, मास्टरजींसाठी मागे थांबायचा आग्रह करणारी लाजोजी, शेवटी स्वतःच्या मुलांच्या आग्रहाखातर नवऱ्या शिवाय लाहोर सोडून मुले, सून व नातंवडांसह भारतात येते. सुरवातीचा बराच काळ त्यांना दिल्लीत रेफ्युजी कँपमधे काढावा लागतो.

    रेफ्युजी कँपमधे राहतानाही लाजोजी व मुले हवेलीरामचा शोध घेत राहतात. शेवटी शेवटी मुले या मतावर येतात की आपले वडील लाहोरच्या दंग्यांमधे मारले गेले. पण लाजोजीला मात्र एक आशा असते. तिचे मास्टरजी तिला शोधत परत येतील. खूप शोध घेतल्यावर आपली स्मरणशक्ती हरवलेला मास्टर हवेलीराम त्यांना सापडतो. पण तो आता लाजोजींना ओळखत नसतो.
    हवेलीरामची स्मरणशक्ती परत येते का?
    हवेलीरामचे कुटूंब आपले गतवैभव परत मिळवते का?
    कुलभूषन बायकोच्या इच्छेविरुद्ध आपल्या कुटुंबात परततो का?
    रोशनला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव कधी होते?
    सतबीरला आपल्या जन्माचे रहस्य व आपले आई वडील कोण हे कळते का व कधी?
    या सर्व प्रश्नांची उत्तरे हळूवारपणे उलगडणारा नात्यांचा प्रवास म्हणजे बुनियाद.

    हवेलीराम व लाजवंतीच्या एकमेकांवरील उत्कट प्रेमाचा अविस्मरणीय प्रवास म्हणजे बुनियाद.
    भारतात टेलिव्हिजन सिरीजचा 'पाया' घट्टपणे रोवणारी मालिका म्हणजे बुनियाद.

    रमेश सिप्पी, मनोहर श्याम जोशी व अमित खन्ना यांनी खेळलेला आणि प्रचंड यशस्वी ठरलेला जुगार म्हणजे बुनियाद.
    ज्याकाळी बुनियाद प्रसारित झाले त्याकाळी मंगळवारी व शनीवारी रात्री अर्धा तास रस्ते ओस पडत होते. फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान मधेही ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. त्याकाळी उत्तर भारतात टिव्ही आसलेल्या घरांमधे या सिरीयलची व्हिवरशीप तब्बल ९३% होती असे आकडे सांगतात. १९८६ च्या पहिल्या प्रसारणानंतर आजवर बुनियादचे तब्बल सहा वेळा पुनःप्रक्षेपण झालं आहे..आणि प्रत्येकवेळा तिला अतिशय छान प्रतिसाद मिळत गेला आहे.

    याचे मुख्य कारण म्हणजे या सिरीयलचा, याच्या विषयाचा भारतीय मनाशी झालेला कनेक्ट. फाळणी हा विषय तसा भारतीय सिनेमांमधे नेहमीच दुर्लक्षितच राहिला आहे. कदाचित याची कथावास्तु इतकी स्फोटक आहे व व्यापक आहे की या विषयात हात घालायला फार कोणी धजले नाही. एम.एस. सथ्यूंचा 'गर्म हवा' आणि अलिकडे दिपा मेहताचा 'Earth' सोडले तर फार भाष्य या विषयावर झालेले नाही. पण टेलिव्हिजन साठी विशेषतः दूरदर्शन वर मात्र या विषयावरील दोन मालिकांनी फाळणीचा तो दुर्दैवी काळ, ती ठसठस, त्या यातना भारतीय जनतेसमोर आणल्या. एक, गोविंद निहलानींचा 'तमस' आणि दुसरी 'बुनियाद'. एक वर्षाच्या पूर्ण प्रसारणात बुनियादने आपली प्रेक्षकांवरील पकड अजिबात ढिली होउ दिली नाही याचे हे प्रमुख कारण असावे.

    बहुतांश नवीन कलाकार असूनही त्यांच्याकडून अगदी तगडे काम करुन घेण्यात दिग्दर्शक रमेश सिप्पी व सहदिग्दर्शक ज्योती स्वरुप यशस्वी ठरले.या सर्वच कलाकारांनी त्या काळच्या वेशभुषा, बोलण्यातला तो पंजाबी ढंग, संयत अभिनय, चपखल संवाद व आदाकारी यामुळे या सिरीयलला एका चांगल्या उंचीवर नेउन ठेवले होती.

    या सिरीयलची त्याकाळी इतकी क्रेझ झाली होती की यातले सर्व प्रमुख कलाकार, विशेषतः आलोकनाथ, अनिता कंवर या प्रमुख कलाकारांना एखाद्या बॉलीवूड सेलेब्रिटीचे स्टेटस प्राप्त झाले होते. मालिकेतले इतर कलाकारांनाही बॉलीवूडची दारे आपोआप खुली झाली. आलोकनाथ, दिलीप ताहील, गोगा कपूर, सोनी राजदान हे नंतर खूप साऱ्या चित्रपटांमधून झळकले. बाकीचे कलाकार देखील अनेक वर्षे विविध मालिंकामधून झळकत राहिले. काहीजण आजही झळकत आहेत. सोनी राजदान ने महेश भट्टशी लग्न केले तर किरण जुनेजोने दिग्दर्शक रमेश सिप्पीशीच संसार थाटला.

    या सिरीयलमधे नंतर प्रवेश करणारी पात्रे, जशी लाला ब्रिजभान (विजयेंद्र घाटगे), जय भूषन (अभिनव चतुर्वेदी- याची त्यावेळी मुलींमधे खूप क्रेझ होती), जयची बायको मंगला (कृत्तीका देसाई), रोशनची बायको रज्जो (नीना गुप्ता), शामलाल (विनोद नागपाल) या सर्वांनी देखील या सिरीयलमधे आपापल्या भूमिकांनी जान आणली.

    आज तीस वर्षांनंतरही वरील सारी पात्रे त्या पिढीतल्या सर्वांच्या स्मरणात आहेत, हीच या मालिकेच्या लोकप्रियतेची पावती आहे.

    ह्या सिरीयलचे सारे एपिसोड यू ट्युबवर आहेत आणि हे सारे १०५ भाग पुन्हा पुन्हा पाहणारे प्रेक्षक आजही आहेत. बुनियाद पाहून मोठी झालेली पिढी आज चाळीशीत किंवा पन्नाशीच्या पुढे असेल. पण ज्या सिरीयलने आपल्याला एकत्रित टिव्ही समोर बसून आठवड्यातून दोनदा एका परिवाराची कहाणी पहायची सवय लावली ती पहिली सिरीयल बुनियादच होती हे सर्वचजण नक्की मान्य करतील.

    म्हणूनच बुनियदचे भारतीय टेलिव्हीजनच्या इतिहासात तितकेच महत्व आहे जितके शोले चे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आहे. या दोन्हीचे निर्माते- दिग्दर्शक ही बाप मुलाची जोडी एकच असावी हाही मोठा योगायोगच आहे..नाही का?

    -- सुनिल गोबुरे.

  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ४

    जर्मनीमधील ट्युबिन्गन या छोट्या गावात जाण्याकरता स्वित्झर्लंडमधील झुरीक या स्टेशनवरून छोटी, धुराच्या इंजिनाची गाडी होती. दोन तासांचा प्रवास सुखाचा होता. जर्मन सरहद्दीवरील एका स्टेशनवर पाटी लिहिलेली वाचली आणि क्षणभर धडकीच भरली. 'तंबाखू व तत्सम पदार्थ बाळगण्यास बंदी असून तसे आढळल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.' मुंबईहून निघताना आमच्या एका मित्राने जर्मनीतील एका मैत्रिणीस भेट म्हणून अस्सल भारतीय तंबाखूचं भलं मोठं पाकीट दिलेलं होतं. जर्मन शिस्तीबद्दल लहानपणापासून बरंच वाचलेलं होतं. ताबडतोब सामानातून पाकीट काढून गाडीतून दूर फेकलं. नशीब, कोणी पाहिलं नाही! आम्ही जिथे जाणार होतो ते ट्युबिन्गन स्टेशन अगदी तळेगावसारखं छोटेखानी होतं, पण व्यवस्था व स्वच्छता उत्तम होती, गावात जाण्यासाठी बाहेर बसेस उभ्या होत्या. भाषेची अडचण बरीच जाणवत होती. पण अखेरीस मित्राच्या घरी डेरेदाखल झालो. ९ महिने पत्रांद्वारे केलेली आखणी फलद्रूप झाली होती. आमच्या आनंदाला उधाण आलं होतं.

    जर्मन रेल्वे व हिटलर यांचं अजोड नातं होतं. त्याच्या अमदानीत जर्मन रेल्वे ही जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे म्हणून प्रसिद्ध होती. दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या अतिजलद इंटरसिटी एक्सप्रेस या प्रथम जर्मनीमध्ये सुरू झाल्या होत्या.

    ट्युबिन्गनहून थेट बर्लिन गाठावं म्हणून रात्री स्टेशनवर आलो. तो दिवस होता शनिवार शनिवार व रविवारी ही गाडी बर्लिनला जात नाही. पण हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. टाईमटेबलच्या अभ्यासातील मोठी चूक प्रथमच झाली, पण त्यामुळे आमचं बर्लिन पाहणं हुकलं याची हुरहूर मनाला कायम राहिली. हिटलरची कर्मभूमी बघावी असं अनेक वर्षे मनातून वाटत होतं, पण योग नव्हता व तो परत येण्याची शक्यताही नव्हती. कार्यक्रमात ताबडतोब बदल करून स्टुटगार्डमार्गे पहाटे चार वाजता म्युनिकला उतरलो. रात्री गाडीत छान झोप लागत होती, परंतु साखरझोपेतून उठावंच लागलं कारण, गाडी शेवटी तेथेच थांबणार होती. रविवार पहाट. सुनंसुनं भव्य रेल्वे स्टेशन. भयाण शांतता. आम्ही तिघे विश्रामगृहात पेंगत होतो. एक वृद्ध प्रवासी बाजूला पेंगत होता. उजेड होण्याची वाट पाहत. बाहेर रस्त्यावर तर अस्वस्थ करणारी सामसूम होती. फक्त एखादी ट्राम जाताना दिसे. अर्धातास पायपीट करून अखेर आम्ही 'पेन्शॉन' शोधलं.

    रेल्वे टाईमटेबलमध्ये युरोपमधील काही अविस्मरणीय ठरतील असे प्रवासमार्ग मुद्दामहून नमूद केलेले होते. त्यांतील म्युनिक-साल्सब्रुग-इन्सब्रुक असा साधारण तीन तासांचा प्रवास म्हणजे स्वर्गभूमी ऑस्ट्रियाचा प्रवास होता. स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या दोन देशांच्या पदरी निसर्गानं सौंदर्याचं माप भरभरून घातलं आहे. संपूर्ण गाडीचा रंग लालचुटूक व पांढरा आणि आमचा पहिल्या वर्गाचा डबा तर एखाद्या महालासारखा वाटत होता. डब्याच्या एका बाजूला आरामात उभं राहता येईल असा कॉरिडॉर, त्या बाजूला खिडक्यांच्या उत्तम, पारदर्शक, अतिशय लांब-रुंद काचा, मध्यात कसलाच अडसर नाही. तिथे उभं राहिल्यावर आपण डोंगरदऱ्यांतच उतरलो आहोत असा आभास होत होता. बसण्यासाठी उत्तम कुशन सीट्स होत्या आणि तिथे बसून दुसऱ्या बाजूचा निसर्गसुद्धा दिसत होता. त्यातही दोन्ही बाजूंकडील निसर्गपट इतका वेगळा, की प्रत्येक बाजूकडे नजर भिरभिरत होती. काही वेळा गाडीचा डबा डोंगरकपारीच्या इतका जवळून जात असे, की कपारींमधून उसळणारे पाण्याचे ओहोळ काचेवर धडकत. वाटेत अनेक लहान-मोठे बोगदे होते. त्यांमधून बाहेर आल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार कुरणं दिसत होती. निसर्ग इथे अगदी शांतपणे पहुडलेला होता. गाडीही तितक्याच शांतपणे मार्ग आक्रमत होती. मध्येच गाडीची लय वाढे आणि एखाद्या खिंडीतून जाताना कानांवर पडणारा आवाज अंतर्मनापर्यंत भिडत राही. आम्ही तिघेही इतके मंत्रमुग्ध झालो होतो, की एकमेकांशी बोलूही शकलो नाही. निसर्गाची नानाविध रूपं मनावर लाटांसारखी स्वार होत होती. तीन तास कधी संपले हे कळलंच नव्हतं. त्याच गाडीने परतीच्या प्रवासात पुन्हा तितकाच भरभरून आनंद दिला होता. मन स्तब्ध झालं होतं. शब्दांना जागाच नव्हती.

    जर्मनीतील अतिशय वेगवान इंटरसिटी एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे जर्मन रेल्वेची शान आहे. ह्या गाडीने प्रवास करणं केवळ युरेल पासमुळे शक्य झालं मध्य-जर्मनीतील मॅनहाईम व हायडेलबर्ग ही दोन अतिशय जुनी शैक्षणिक केंद्रांची शहरं म्हणून प्रसिद्ध आहेत. तिथे जाण्यासाठी थेट म्युनिकपासून ही गाडी होती. मॅनहाईम येथील हॉस्पिटलमध्ये काही दिवस मी उच्च शिक्षण घेण्याचं पत्रोपत्री पक्कं केलेलं होतं, परंतु तिथे पोहोचण्याच्या तारखा काही कारणाने बदलाव्या लागणार होत्या. तेव्हा त्या जागी प्रत्यक्ष जाऊनच आधी एकदा भेटावं असं विचाराअंती ठरविलं. निव्वळ युरेलचा पास व तेथील अति-जलद गाडीमुळे हे शक्य होणार होतं. म्युनिकहून सकाळी साडेसहा वाजता निघालो ते थेट २५० मैलांवर असलेल्या मॅनहाईम येथे साडेतीन तासांत पोहोचलो. गाडीत अनेक प्रवासी सुटाबुटांत, ऑफिसला कामासाठी निघालेले. आपल्या कामात मग्न. दहा वाजून दोन मिनिटांनी गाडी पोहोचणार असणार असेल, तर अक्षरश: त्या मिनिटाला तिथे हजर होती. वाटेत जर्मनीतील अनेक कारखाने, छोटी टुमदार गावं मागे पडत होती. आतून गाडीच्या वेगाची कल्पनाच येत नव्हती. मॅनहाईमधील सर्व कामं आटोपून, भरपेट जेवण घेऊन माझी स्वारी परतीची गाडी घेऊन थेट म्युनिकला संध्याकाळी साडेसहापर्यंत पोहोचली. चांगलं ५०० मैलांचं अंतर पार केलं होतं. थकवा तर अजिबात नव्हता. धूळ हा प्रकार विसरावयास झाला होता.

    -- डॉ. अविनाश वैद्य

  • ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ९ – शुष्क पठारा वरील जंगलातील बहुउपयोगी वृक्ष – बाभूळ

    बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे.

  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ५

    म्युनिक ते रोम असा पुढचा लांब पल्याचा १६ तासांचा प्रवास होता. गाडीला इटालियन डबे. जर्मन रेल्वेच्या मानाने यथातथाच. प्रत्येक डब्यात प्रचंड गर्दी, गडबड, गोंधळ. स्वच्छतेच्या बाबतीत आपलेच भाऊ. जागोजागी कागदाचे कपटे पडलेले होते. बरेचसे इटालियन प्रवासी डब्यात होते. त्यांच्याकडे पाहून पुस्तकामध्ये वाचल्याप्रमाणे त्यांच्यावर भरवसा न ठेवणं इष्ट असं खात्रीनं वाटत होतं. त्यामुळे पाकीट व पासपोर्ट जपण्याकडे जास्त लक्ष द्यावं लागत होतं. बरोबर एक अमेरिकन प्रवासी युरेलने संपूर्ण इटली फिरण्यासाठी आला होता. तो अमेरिकन रेल्वेवरील इंजिन ड्रायव्हर होता आणि फुशारक्या मारण्यात तो एकदम वस्ताद दिसला. 'इटालियन कसे मूर्ख आहेत, मी त्यांना पासबाबत गंडवून १५ दिवस जास्त प्रवास कसा पदरात पाडून घेतला, हे कौतुक त्याचं त्याच्याचकडून ऐकल्यानंतर मनात म्हटलं, 'इटालियन परवडतील, पण तू तर त्यांच्याहून वस्ताद निघाला आहेस!'

    संध्याकाळचे सहा वाजले होते व गाडी अतिशय वेगाने एका बोगद्यातून जाऊ लागली. कानांत घुमणाऱ्या गाडीच्या विशिष्ट आवाजाची लय थांबतच नव्हती. जवळपास २० मिनिटं बोगद्यातून चाललेला प्रवास संपतच नव्हता. तेव्हा आमचं युरेल बायबल म्हणजे टाईम टेबल काढलं. त्यावरून कळलं ते असं, की तो युरोप रेल मार्गावरील सर्वांत लांबीचा बोगदा. आता स्वित्झर्लंड ओलांडून आम्ही थेट उत्तर-इटलीत प्रवेश केला होता. रात्री गाडीचे डबे अगदी आपल्याकडील डब्यांप्रमाणे हलत होते. प्रवाशांची ये-जा चालू होती. रोम येण्याच्या आधीचा अर्धा तास म्हणजे जणू कल्याण-मुंबई रेल्वेमार्गावरून जात असल्यासारखं वाटत होतं. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस दाटीदाटीने बांधलेली मजली-दोन मजली जुनाट घरं, कचऱ्याचे ढीग, गॅलरीत वाळत घातलेल्या कपड्यांच्या रांगा. हे सर्व पार करत रोम (रोमा) स्टेशनात प्रवेश केला. या स्टेशनची भव्यता मात्र डोळ्यांत भरणारी आहे. अनेक फ्लॅटफॉर्मूस, जाणाऱ्या व येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या, खचाखच गर्दी, मध्यात मार्बल टाईल्सच्या फरशा असलेला भव्य हॉल, अनेक चौकशीखिडक्यांवर शहराची माहिती देणाऱ्या चुणचुणीत मुली, असा सगळा माहौल होता. त्या मुलींनी आमच्या खिशाला परवडेल अशी राहण्याची जागा मिळवून दिली.

    युरोपमधील प्रत्येक मोठ्या स्टेशनवर चलन बदलून देण्यासाठी खास जागा असतात. जिथे जाऊ त्याप्रमाणे आपल्याजवळील डॉलर वा पौंड बदलून त्या देशाचं चलन घ्यावं लागे. एकूणच, गणिताच्या मदतीने गुणाकार, वगैरे करून पुन्हा चलन ओळखून भरभर हाताळण्यास वेळ लागत असे. इटालियन चलन लिरेच्या १००० पासून ते १ लाख लिरेपर्यंतच्या नोटा या सर्व अतिशट जुनाट होत्या. त्यात भामटेपणा भरपूर. बाहेर पडताना तारेवरची कसरतच होती. त्यात हे सर्व चलन त्याच देशात संपवावं लागतं, कारण त्याला दुसऱ्या देशात निव्वळ कागदाची किंमत.

    स्टेशनबाहेरचा भव्य चौक सामानासकट पार करताना कौशल्य पणाला लावावं लागत होतं. चोहोबाजूंनी मोटारींचे ताफेच अंगावर आल्यासारखे वाटत होते. घामाच्या धारा लागलेल्या, हॉटेलमध्ये पंखाही नव्हता. हुश्श करत तसेच स्थानापन्न झालो. ट्रेनमधलं खाणं इतकं टाकाऊ दर्जाचं होतं, की ते वाटेत अक्षरशः टाकून दिलं. पोटात कावळे कोकलत होते. पिझ्झाहटचं छोटं दुकान दिसलं आणि तत्काळ प्रवेश केला. इटलीत आल्यावर आम्हाला पाहायचा होता पिसाचा झुलता मनोरा. 'रोमा'हून पिसाचा झुलता मनोरा गाठण्याकरता पूर्ण वातानुकूलित गाडी होती. आम्ही स्टेशनवर पोहोचलो, तो गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली. शेवटी, खिडकीच्या खाली सामान ठेवलं व त्यावर बैठक मारली. खिडकी मात्र लांबच लांब. त्यांची उत्तम काच. संपूर्ण प्रवास समुद्राच्या कडेकडेने. काही वेळा लाटा अगदी रुळांना भिडत होत्या. या एकमेव प्रवासात तिकीट तपासनीस आलाच नव्हता, नाहीतर आतापर्यंतच्या युरोप प्रवासात रेल-पास व पासपोर्ट अनेक वेळा दाखवावा लागला होता.

    पिसा ते व्हेनिस हा प्रवास फ्लॉरेन्समार्गे होता. वाटेतील बेलॅगोना स्टेशनावर अतिरेक्यांनी स्फोट घडविल्याने गाड्यांचा प्रचंड गोंधळ उडाला होता. स्टेशनात प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे वाहत होते. मरणाचा उकाडा होता, त्यातच पंख्यांची वानवा होती. व्हेनिसला पोहोचेपर्यंत रात्रच झाली. चांगले ६ ते ७ तास उशिरा पोचलो. व्हेनिस हे कालव्यांचे शहर. स्टेशन येण्याच्या आधी १० मिनिटं रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंनी पसरलेला शांत समुद्र. स्टेशन छोटेसं पण सुबक.बाहेर पडतो तो कालव्यांचं जाळं, त्यांमधून जाणाऱ्या गंडोला (Gondola) बोटी. तिथे बाकी दुसरी कोणतीच वाहनं नव्हती.

    व्हेनिस स्टेशनवर मी व माझे दोघे मित्र अशी आमची एकत्रित केलेल्या प्रवासाची सांगता होणार होती. मी एकटाच पुढे तीन गाड्या बदलून १८ तासांचा प्रवास करून थेट जर्मनीतील मॅनहाईमपर्यंत जाणार होतो. आम्ही तिघेही भावनिक झालो होतो. गेले ६ महिने सतत आम्ही ज्या प्रवासाचं स्वप्न पाहत होतो, जे विचार, ज्या योजना मनात घोळवत होतो, त्याची अखेरी आज सांगता झाली.

    यापुढचा माझा एकट्याचा व्हेनिस ते व्हेरेनोआ असा ३ तासांचा प्रवासही मस्त झाला. रात्री ९ च्या सुमारास मला व्हेरेनोआ स्टेशनवर उतरायचं होतं. स्टेशन निर्मनुष्य. मिणमिणते दिवे. मला तर अगदी भिवपुरी रोड स्टेशनची आठवण झाली. काळोख्या रात्री एका बाकड्यावर मी एकटाच पुढील येणाऱ्या गाडीची वाट पाहत होतो. सुरुवातीला एकांताची भीती वाटत होती. मग हळूहळू गेल्या महिन्याभरातील आठवणींमध्ये रममाण झालो. मध्यरात्री १ वाजता म्युनिकला जाणाऱ्या गाडीचं आगमन झालं. अंधारातच २ मिनिटांत योग्य तो डबा शोधत एकदाची बसण्यापुरती जागा मिळाली. डब्यातील इतर सर्व प्रवासी गाढ झोपी गेलेले. परत एकदा पासपोर्ट व रेल पास तपासण्याचे सोपस्कार झाले.

    सकाळी ८ वाजता म्युनिक स्टेशन आलं. आता हे स्टेशन माझ्यासाठी सरावाचं झालं होतं. आज युरेल पासचा दिवस संपला होता. रेलने युरोप पाहण्याचं स्वप्न प्रत्यक्षात सुरळीतपणे साकार झालं होतं. आयुष्यातील हे सुवर्ण दिवस आमच्या स्मृतीत चिरंतन राहणार होते.

    -– डॉ. अविनाश वैद्य