वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, परंतु त्यांना 'विक्री कौशल्या'चं उत्तम ज्ञान असतं. कोणत्या वस्तूंची रेल्वेप्रवाशाला गरज आहे याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला असतो. ते खरे ‘सपनोंके सौदागर' असतात. गाडीतील प्रवाशांना आपल्याजवळील माल दाखविताना त्यांचा बोलण्यातील चतुरपणा, उत्तम भाषेत बोलण्याचा सराव, एखादं लक्षवेधी वाक्य, कधीकधी हातातील सामानाचा एकमेकांवर घासून काढलेला आवाज या सर्वांच्या परिणामी अगदी डुलकी घेणारा प्रवासीसुद्धा जागा होऊन उत्सुकतेनं माल पाहण्यास सुरुवात करतो. प्रवाशांमधील सामान नक्की विकत घेणारे कोण व नुसते पाहून, हाताळूनही न घेणारे कोण याचं ज्ञान त्यांना जणू उपजतच असतं. सतत चालत्या गाडीतून फिरावयाचं, परतण्यासाठी उतरून पुन्हा परतीची गाडी पकडावयाची. सकाळपासून सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत धंदा करायचा. त्या प्रमाणात पोलिसांना हप्ता द्यायचा व उरलेल्या कमाईत संपूर्ण कुटुंब पोसायचं असा यांचा जीवनक्रम-दिनक्रम असतो. यांच्यापैकी बहुतेकांनी शाळा, कॉलेज सोडून दिलेलं असतं; परंतु वाममार्ग आचरण्याऐवजी हा कष्टाचा धंदा त्यांनी पत्करलेला असतो.
शांत चित्ताने चार-पाच तासांचा प्रवास करीत असताना संपूर्ण बाजारपेठ तुमच्या पायाशी आणणारे फेरीवाले साधारणपणे गोड बोलत, न कंटाळता, माल दाखवितात. यांच्याजवळ कंगवे, शिवणकामाचं साहित्य, स्त्रियांसाठी अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं, पुस्तकं, मासिकं, लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं, काय काय म्हणून बघण्यास मिळतं! पुष्कळदा डब्यात विकावयास येणाऱ्या अशा काही वस्तू असतात, ज्या बाजारात सहजासहजी दिसतही नाहीत. 'दाम कम', 'वापरा आणि फेकून द्या' हे तत्त्व धरूनच मालाची विक्री केली जाते.
रेल्वेमध्ये एकाचवेळी मिळणारी खाण्याच्या पदार्थांची विविधतासुद्धा दुसरीकडे कुठेही मिळण्याची शक्यता कमीच असते. रेल्वेच्या पॅन्ट्रीकारपेक्षा वेगळे खाद्यपदार्थ निवडून पुरवले जात असतात. त्यांत प्रत्येक प्रांतातील स्टेशनची खासियत निरनिराळी असते. लोणावळा म्हणजे चिक्की, कर्जतचा बटाटेवडा, शेगावची कचोरी, दिल्लीची आलूरस्सा-पुरी किंवा आगऱ्याचा पेठा... प्रवासीदेखील या सर्व गोष्टींची आतुरतेनं वाट पाहत असतात. चटपट भेळ ते कुल्फी, नाना त-हेची शीतपेयं, भारतभर मिळणारा चहा आणि दक्षिणेतली कॉफी... हजारो, लाखो प्रवाशांच्या चवींचे चोचले पुरविले जातात ते केवळ रेल्वेफेरीवाल्यांच्या सुविधेमुळे! त्यावरच फेरीवाल्यांची हजारो कुटुंबं सुखाने जगतात. या विक्रीव्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल चालते. त्यांचे ना बुक ऑफ अकांऊट, ना त्यांना जागेचे भाडं आणि सर्वच व्यवहार रोख, उधारीचा सवालच नाही. रात्री डेक्कनक्वीनमधून पुण्याला नियमित जाणारे प्रवासी घरच्यांकरता रेल्वेत विकत मिळणारी कुल्फी हमखास घरी नेतात.
अतिपूर्वेकडील राज्यांत व दक्षिणेत चक्क चादरी, शाली व साड्यासुद्धा विक्रीस येतात. गुजरात व कर्नाटकच्या प्रवासात लहान मुलांसाठी उत्तम खेळणी मिळतात.
बेकारी वाढत आहे, तसं फेरीवाल्यांचं प्रमाण जास्त होत आहे. त्यांच्या बेसुमार वाढीनं प्रवास करणं नकोसं वाटतं. मध्येच कधीकधी रेल्वे अधिकारी धाडी घालतात व एखाद्या भागातील विक्रेते तात्पुरते नाहीसे होतात; परंतु अखेर सगळेच एकमेकांवर अवलंबून असतात. कायद्याचा बडगा दाखविणारे रेल्वेअधिकारी, पोलीस व फेरीवाले यांच्यातील परस्परसंबंध हे एक अजब रसायन असतं.
डब्याडब्यातून फिरत सिनेमांतील गाणी-भजनं गाऊन पैसे मिळविणारे, नुसते भीक मागणारे हा आणखी एक निराळाच वर्ग असतो. निव्वळ सहानुभूती मिळवून हे लोक पोट भरतात.
बरेच अंध-फेरीवाले विविध त-हेच्या वस्तू विकण्याचं कामही करतात. दयेपोटी प्रवासी त्यांना जास्त पैसे देतात, परंतु त्यांच्या अंधपणाचा फायदा घेऊन वस्तू चोरणारे वा कमी पैसे देणारे ग्राहकही बरेच असतात. अंध मुली, तरुण स्त्रिया यांची छेड काढली जाते; पण पोलिसांना त्यांच्याकडून हप्ते मिळत नाहीत या निरुपयोगी लोकांच्या तक्रारींकडे पोलीसही लक्ष देत नाहीत. त्यांचं सामान फेकून दिल्यावर ते उचलणंही त्यांना शक्य नसतं.
एकदा अतिपूर्वेकडील गाडीच्या दुसऱ्या वर्गाच्या वातानुकूलित डब्यात एकावेळी ६० फेरीवाले घुसले. त्यांतील काही गुंडच होते. टी.सी. व प्रवासी सर्व जण स्वस्थपणे बसून, हवालदिल झालेले! गाडीत एकमेव पोलीस, आणि त्याला बोलाविल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होईल ही भीती; त्यामुळे टी.सी. काहीच करू शकला नाही. नंतर याविरुद्ध बऱ्याच तक्रारी नोंदविल्या गेल्या. तृतीयपंथीयांचा त्रासही असतोच. हे सगळे सहानुभूतीपूर्वक अनुभवतानाही मधूनमधून फेरीवाल्यांवर मर्यादा आणणं गरजेचं आहे हे जाणवत राहतं. त्याची अंमलबजावणी करणं कठीण आहे हे खरं असलं, तरी गाडीमध्ये प्रवाशांच्या गरजेपेक्षा फारच अधिक गोष्टी विकावयास येतात ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.
डॉ. अविनाश वैद्य
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता.
चित्तरंजन प्रकल्पामुळे रेल्वेला लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींत भारत स्वावलंबी झाला. परदेशी गंगाजळीत मोलाची भर पडली आणि एक आदर्श, नव्याने बांधलेलं अद्ययावत शहर म्हणून चित्तरंजनची भारतभर ख्याती झाली.
स्टेशनवर शिरतानाच प्रवाशांना जी पहिली व्यक्ती भेटते ती म्हणजे लाल शर्ट व त्यावर पितळी बिल्ला असलेला हमाल. त्यांचं दुसरं नाव आहे 'कुली'; परंतु ते नाव त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्या संस्थेनं हमालांना ‘पोर्टर' ते म्हणावं अशी सातत्यानं मागणी केलेली आहे.
'कुली' या शब्दाचा हिंदीतील अर्थ 'दिवसभर काबाडकष्ट करणारा कामकरी' असा आहे. गुजरातमध्ये त्या नावाने एक जमात आहे. उर्दू, तुर्की भाषांत गुलामांचं नाव 'कुली' असे, तर चीन देशामध्ये 'अतिशय कष्टाचं काम करणारी दुर्लक्षित जमात' असा उल्लेख आहे.
१६ व्या शतकात संपूर्ण अशिया, आफ्रिका या खंडांत हजारोंच्या संख्येनं विविध कामांवर कुली मेहनतीची कामं करीत. चिनी कुलींच्या मदतीनं अमेरिका व कॅनडात संपूर्ण रेल्वे बांधणी पूर्ण होऊ शकली. ब्रिटिशांनी त्यांचा उपयोग चहा व रबराच्या मळ्यांत केला होता.
भारतात रेल्वे सुरू झाली आणि पाठोपाठ जड बोजे उचलण्यासाठी स्टेशना-स्टेशनांवर हमालांचं आगमन झालं. भारतात ब्रिटिश व त्यांचं अनुकरण करणारे उच्चभ्रू भारतीय प्रवासी हे रेल्वेच्या प्रवासात घरातील असंख्य वस्तू नेत असत. होल्डॉल, पोत्यात घातलेली स्वयंपाकाची भांडी, पाणी नेण्याकरता फिरकीचे तांबे नाहीतर खुजे, अनेक कप्पी डबे, भल्याथोरल्या पत्र्याच्या ट्रंका, हे सामान वाहून नेण्यासाठी हमालांची गरज असे. पुढे जसजशी प्रवाशांची गर्दी वाढू लागली, तसतशी डब्यात बसण्यासाठी जागा मिळविणं अशक्यप्राय झालं आणि ती समस्या हमाल मंडळी मोठ्या शिताफीनं सोडवू लागली. गाडीच्या डब्यांची संख्या वाढू लागली तेव्हा आपला डबा शोधणं शिकलेल्या माणसालासुद्धा कठीण जाऊ लागलं. धार्मिक यात्रा वाढल्या, प्रवासी कंपन्या आल्या आणि हमालांचं भाग्य फळफळलं. विशेषत: मधल्या स्टेशनातून गाडीच्या डब्यात शिरण्यासाठी हमालांची नितांत गरज भासू लागली. यार्डातून गाडी मुख्य स्टेशनात शिरतानाच रिकाम्या गाडीच्या डब्या-डब्यातून 'लाल डगलेवाले जागांचा ताबा घेऊ लागले. जो प्रवासी जास्त पैसे देणार त्याच्या सेवेसाठी हमालांची गर्दी होऊ लागली. हमाल ही स्टेशनवरची एक अति महत्त्वाची व्यक्ती बनू लागली.
गाडी स्टेशनामध्ये शिरते न शिरते तोच हमाल डब्याचा ताबा घेऊ लागले. आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सामानासकट घोडागाडी, टॅक्सी, ऑटारिक्षापर्यंत नेऊन सोडू लागले. फार पूर्वी तर प्रवाशाचं घर किंवा हॉटेल स्टेशनच्या आसपास असल्यास हमाल अगदी थेट निवासस्थानापर्यंत सामान पोहोचविण्यासही मदत करू लागले. कामाची व्याप्ती इतकी वाढत गेली, की लाल डगलेवाल्यांची संख्या अपुरी पडू लागली. बेकायदेशीर हमालांची दुसरी फौज तयार होऊ लागली. बेकायदा हमालांना रेल्वेची मान्यता नव्हती. त्यांच्याजवळ क्रमांक असलेला बिल्ला नसे. लाल डगलेवाल्या बिल्लाधारी हमालांची शिफारस रेल्वेच्या प्रत्येक उद्घोषणेतून केली जाई. अधिकृत हमालांकडून सामानाच्या पळवापळवीचा प्रसंग घडल्यास त्यांना क्रमांकावरून पकडणं शक्य होत असे, परंतु पुढेपुढे हमालांची गरज इतकी वाढली, की अधिकृत व अनधिकृत अशा दोघांनाही पुरेसं काम आणि दाम मिळत होता.
गाड्यांचे क्रमांक, डब्यांची जागा, गाडी किती उशिरानं येणार, यांचं ज्ञान हमालाइतकं दुसऱ्या कोणाला असणं शक्यच नाही. तिकिटावर नमूद केलेल्या डब्याजवळ सर्व सामानासह हमाल जाणार याविषयी मनात कधीही शंका बाळगण्याचं कारण नाही. गाडीला उशीर असेल तर तो सामान ठेवून कुठेतरी गायब होतो, पण गाडीचं इंजिन स्टेशनमध्ये शिरताना तो वेळेवर आपल्याजवळ येणार हे शंभर टक्के नक्की असतं. हमाली ठरविणं, त्यांच्याशी भाव करणं ही मात्र एक कला आहे, त्याचे उपजत ज्ञान पट्टीच्या प्रवाशाकडेच असतं. बहुसंख्य प्रवासी शेवटी घासाघीस करीत त्याच्यापासून लवकर मोकळे होतात. तुमचं सामान पळविण्यात त्याला कधीही स्वारस्थ नसतं. तुमच्याकडून भरकन पैसे घेऊन तो दुसरं गि-हाईक शोधण्याच्या मार्गी लागतो.
रेल्वेबोर्ड हमालांकरता काही शिबिरं भरवीत असतं. असं एक शिबीर अलाहाबाद स्टेशनावर साठ हमालांकरता घेण्यात आलं होतं. गावातील सर्व धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती त्यांना देण्यात आली, जी त्यांनी आपल्या प्रवाशांना द्यावी हा त्यामागे उद्देश होता. त्या माहितीचा फायदा घेऊन प्रवासी त्या वेळात भेट देण्याबाबत मनातल्या मनात काही स्थळं पक्की करू शकतो. प्रवाशांनादेखील गावातील हॉटेल्सची उत्तम माहिती हमालांकडून मिळते.
लहानपणापासून शाळेत 'हमाल' या विषयावर बरेचदा निबंध लिहावयास सांगत. त्यात हमाल म्हणजे लुच्चा, फसविणारा अशी प्रतिमा उभी केली जात असे. काही वेळा पोटापाण्याकरता ते दादागिरी करतात, पैशांबाबत फसवतात ते हे खरंही आहे, पण असं असलं तरी त्यांच्याही अनेक समस्या आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत बोजे उचलण्याचं काम केल्यावर त्यांना कसेबसे महिना ५ ते ६ हजार रुपये मिळतात. काही वेळा चाळीस किलो वजनदेखील उचलून घेऊन जावं लागतं. जेवण करण्यासाठी धड जागा नसते. रिकाम्या प्लॅटफॉर्मवरील नळाजवळ डबा खायचा. इंजिनांची व गाड्यांची ये-जा चालूच असताना जिथे डबा खाल्ला तिथेच कुठेतरी वामकुक्षी करायची, हे प्राक्तन हमालांना चुकत नसतं.
काही हमाल रात्रपाळी करतात. स्टेशनवरील या हमालांच्या गटावर मुकादम असतात. हे मुकादम हिशोब ठेवतात, हमालांसाठी पतपेढी चालवितात.
स्टेशनजवळील मंदिरात वा मशिदीत ते आपले सण साजरे करतात.
नवी दिल्ली, हावरा स्टेशन, येथे हमालांची संख्या हजारावर असून, अनेक नवीन गाड्या सुरू झाल्यानं या जागा हमालीच्या धंद्यास उपयुक्त आहेत. प्रत्येक राज्यातील राजधानी एक्सप्रेस दिल्ली मुक्कामी येतात, त्यामुळे हमालांचा धंदा चांगला होतो; परंतु छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्ही.टी.) स्टेशनवरील हमालांची परिस्थिती मात्र हलाखीची आहे. दूर पल्ल्याच्या अनेक गाड्या आता दादर व कुर्ला टर्मिनस येथून सुटत असल्यानं या स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत आणि त्यामुळे इथल्या हमालांची मिळकतही कमी झाली आहे.
गर्दीच्या समुद्रातून वाट काढत प्रवाशांना गाडीच्या डब्यापर्यंत पोहोचविण्याचं कौशल्य असणाऱ्या, उन्हा-पावसात राबणाऱ्या या समाजघटकाच्या आर्थिक व आरोग्यसमस्येकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करतात. ते रेल्वेचे कर्मचारी म्हणून गणले जात नसल्याने नोकरीचे कोणतेही फायदे त्यांना मिळत नाहीत. फक्त वर्षातून एकदा गावी जाण्यासाठी साध्या आरक्षण नसलेल्या डब्यातून प्रवास करण्याचा पास त्यांना मिळतो.
आता काळ बदलला आहे. स्ट्रोल बॅग्जमुळे (चाकं असलेल्या) प्रवासी आपलं सामान स्वत:च खेचून नेतात. पर्यायानं सर्वच हमालांना एकसारखं काम व पैसे मिळतील याची शाश्वती नसते. यावर उपाय म्हणून सर्व हमालांना मिळणारी मिळकत एकत्र केली जाते. तत्पूर्वी, त्यांतील ४० टक्के रक्कम स्वत:ची मिळकत म्हणून बाजूला ठेवली जाते व नंतर बाकीची रक्कम सर्वांमध्ये विभागली जाते. या कामाकरता एक मुकादम नेमलेला असतो. हे सर्व लोक पैशांच्या व्यवहाराबाबत प्रामाणिक असतात. मुंबई सेंट्रल स्टेशनवर असा उपक्रम राबविला जातो. मुंबईतील बरेचसे हमाल वारकरी संप्रदायाचे आहेत. ते स्टेशन परिसरात अनेक उत्सव साजरे करतात. सर्वच हमाल अशिक्षित आहेत असं नाही, तर काही जण पदवीधरदेखील आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून ते स्टेशनवर हमाली करतात व पुढे रेल्वेशी रोजचा संबंध आल्यानं एखादे वेळी रेल्वेत नोकरी मिळेल या आशेवरही ते हमालीचं काम करतात. पाठीचा मणका, गुडघे, विविध सांधे यांच्या आजारानं त्यांतील अनेक जण ग्रस्त असतात, पण वैद्यकीय सेवेसाठी त्यांची रेल्वे हॉस्पिटलमध्ये सोय होत नाही. बरेच वेळा त्यांना स्वत:चेच पैसे खर्चावे लागतात. एकंदरीत हमालांच्या समस्यांकडे गांभीर्याने कोणाचेच लक्ष नाही. पत्र्याच्या ट्रंका, होल्डॉल, पाच कप्पी पितळी डबे, फिरकीचे तांबे, खुजे, इतिहासजमा झाले आहेत आणि काही वर्षांत लाल डगलेवाला हमाल काळाच्या पडद्याआड जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं झालं, तर भारतीय रेल्वेचा एकेकाळचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ अस्तंगत होईल.
लाल डगल्याच्या रेल्वे हमालाचा होणारा कायापालट रेल्वेहमाल वा कुली' म्हणजे डोक्यावर, खांद्यांवर सामानाचे ओझे उचलणारा प्रवाशांचा आज्ञाधारक सेवक हे त्याचे रूप हळूहळू पालटणार असून, त्याला ‘सामान सहाय्यक' असे नाव असेल व त्याच्या दिमतीला विमानतळासारख्या ट्रॉलीज असतील. त्याला नवीन त-हेचे कपडे दिले जातील, ज्यांवर विविध कंपन्यांच्या जाहिराती असतील. पंतप्रधान मोदींच्या मते आज क्रिकेटच्या स्टंपवर, खेळाडूंच्या टी-शर्टवर जाहिरात असते, तर या साहाय्यकांनाही तसेच कपडे द्यावे. त्यांमधून रेल्वेला उत्पन्न मिळेल आणि हे 'सामान सहाय्यक' स्टेशनवर प्रवाशांच्या दिमतीला हजर राहतील; शेवटी या 'सामान सहायकां'चा दरही ठरवावाच लागेल, कारण प्रवासी हुज्जतीला कंटाळतो.
-डॉ. अविनाश वैद्य
”मेरी इश्क के लाखो झटके “ गाण्याच्या वेळी काही स्टेप शर्मिला टागोरला येत नव्हत्या. त्यावेळी शेजारच्या सेटवर सरोजखान डान्स डायरेक्ट करत होत्या त्यांना गुलजारनी विनंती करून या गाण्याच्या स्टेप बसवायला सांगितल्या.
भारतातील बऱ्याच मुख्य स्टेशनांच्या अगदी एका टोकाला एखादा प्लॅटफॉर्म किंवा यार्डाची एखादी दुर्लक्षित बाजू अशी असते, जिथे रेल्वे डब्यांचा फारसा वावर नसतो; परंतु अशा जागी एखादा जुना मोडकळीस आलेला डबा कायमचा रुळांवर असतो. ५ ते २० वर्षे वयोगटातील अनेक मुलं-मुली या डब्यालाच आपलं घर मानून तिथे मुक्काम ठोकतात. यांतील बऱ्याच मुलांना घरातून हाकलून दिलेलं असतं. काही वेळा घरच्या जाचाला कंटाळून नाइलाजानं काही जण रेल्वे प्लॅटफॉर्मचा आश्रय घेतात.
१९६४ साली त्यांचा वोह कौन थी प्रदाशित झाला व तुफान चालला. म्हणून त्यांनी पुन्हा सस्पेन्स चित्रपट काढायचे ठरवले.त्यांना मराठी चित्रपट पाठलाग इतका आवडला होता कि त्यांनी त्याचे राईटस राजा परांजपे कडून विकत घेऊन मेरा साया काढायचे ठरवले.
भारतीय रेल्वेच्या १४५ वर्षांच्या इतिहासात इ.स. २००० नंतर आलेली अभूतपूर्व क्रांती म्हणजे लोकल गाड्या व इंजिनं चालविण्यासाठी महिला ड्रायव्हर्सची झालेली नेमणूक! आज एकूण ५० महिला या अशा विविध तऱ्हेच्या गाड्या चालवतात. इंजिनाच्या खिडकीत उभं राहून स्टेशनवर गाडीचालक म्हणून होणारं त्यांचं आगमन निश्चितच कौतुकास्पद आहे.

१८९० ते १९१० च्या दरम्यान चोवीस तास वा त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास करण्यासाठीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या. त्यावेळी प्रवासात जेवणाची, खाण्यापिण्याची सोय प्रवासी स्वत:च करत असत. चार ते पाच-कप्पी पितळी वा अॅल्युमिनियम डबे, फिरकीचे तांबे, खुजे अशा जय्यत तयारीनिशी प्रवासी मंडळी दूरच्या प्रवासास निघत. ब्रिटिश उच्च अधिकारी पहिल्या वर्गानं प्रवास करत. त्यांना ताजं जेवण लागत असल्यानं त्यांच्या गाडीला एक वेगळा खानपान बनविण्याचा डबा जोडण्यात येऊ लागला. तिथे बर्फ ठेवण्याचीही सोय असे. पुढे पहिल्या वर्गाचे प्रवासी आपल्या डब्यांतून पॅन्ट्रीकारमध्ये जाऊन नाश्ता व जेवण करत. तिथे बसण्यास हॉटेलसारखी टेबलं-खुा असत. त्या काळात दोन डब्यांतून प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी जोडणारी व्यवस्था (Vestibule) नव्हती, त्यामुळे या खानपानाच्या डब्यापर्यंत प्रवाशांना पोहोचता यावं म्हणून लांब पल्ल्याची गाडी मधल्या लहान स्टेशनवर तीन ते पाच मिनिटं थांबत असे व प्रवासी तेवढ्या वेळात आपल्या डब्यातून उतरून पॅन्ट्रीकारपर्यंत जात असत. फ्रंटीयर मेल, ग्रँड ट्रंक एक्सप्रेस या अशा गाड्या होत्या. मुंबई-दिल्ली मार्गावर गाडी विरारला थांबे.
हळूहळू जेवणाची मागणी वाढत गेल्यानं, जेवणाची ताटं प्रवाशांच्या जागेवर आणून देण्याची सोय झाली. ज्या गाड्यांना पॅन्ट्रीकार लागत असे त्यांची नोंद टाईम टेबलमध्ये ‘पी.' पॅन्ट्री म्हणून होते, पण पॅन्ट्री डबे सर्व गाड्यांना नसतात; त्यामुळे प्रवाशांच्या जेवणाच्या सोयीसाठी वाटेतील मोठ्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेची कँटीन्स सुरू झाली. तिथे गाडी २० ते ३० मिनिटं थांबत असे. तेवढ्या वेळात अनेक प्रवासी या कँटीनमध्ये भरभर जात व जेवण उरकत. यामध्ये गाडीचा वेळ फुकट जाऊ लागल्यानं, जेवणाची ताटं ऑर्डरप्रमाणे गाडीच्या प्रत्येक डब्यात पोचवण्याची सोय झाली. या सोयी जरी उपलब्ध होत्या, तरीही घरातून डबे नेण्याचं प्रमाणही बरंच होतं.
अति-लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अॅल्युमिनियम फॉईलमधून जेवणाची बंद पाकिटं येण्यास सुरुवात झाली. अनेक प्रकारचं व चविष्ट खाणं देण्यासही सुरुवात झाली. राजधानी, शताब्दी, दुरान्तो या गाड्यांमध्ये उत्तम जेवणाची सोय असते आणि त्याचा खर्च तिकिटातच घेतला जातो.
खानपान विषयक रेल्वेची भावी योजना
रेल्वेकडून भारतभर २५० भव्य स्वयंपाकघरं उभारली जाणार आहेत. तिथे दिवसाला जेवणाची व नाष्ट्याची सहा लाख पाकिटं अतिशय आधुनिक पद्धतीनं बनविली जातील. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर रेल्वेची कडक नजर असेल. स्वयंपाकघरासाठी स्टेशनजवळ एक रुपया चौरस फुटाच्या दरानं कंत्राटदाराला जागा दिली जाईल.
निर्जंतुक आरोग्यदायी अन्नपदार्थ (हायजेनिक) बनविण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जाईल. प्रवासी मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा आपल्या आवडीचं जेवण मागवू शकेल व ते त्याला त्याच्या जागेवर मिळेल. रेल नीर'नं (बिसलरी) तर क्रांतीच केली आहे. या योजनेमुळे वर्षाला अंदाजे २००० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यास कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाईल. काही काळापूर्वी कोकण रेल्वेवरील मंगलोर येथील कंत्राटदाराला याबाबत एक लाख रुपये दंड ठोठावून तो वसूलही करण्यात आला आहे.
पितळी कप्प्यांचे डबे, फिरकीचे तांबे बघता-बघता इतिहासजमा झाले आणि आता खानपान क्रांतीचं नवं युग आलं आहे. रेल्वे सर्वच बाबतींत अत्याधुनिक होत असल्याचा प्रत्यय खानपान-पुरवठ्याबाबतही येत आहे.
आता-आतापर्यंत डेक्कन क्वीनला असणारा ‘डायनिंग कार' हा डबा नुकताच गाडीला लावणं बंद करण्यात आलं, कारण अशा त-हेचे डबे आता भारतातील कोणत्याच गाडीला जोडले जात नसल्यानं त्यांचं उत्पादन थांबविलं गेलं आहे. पण या गाडीचा तो एक मानाचा डबा होता याची दखल घेत तशा त-हेचा डबा मुंबई रेल्वे वर्कशॉपमध्ये बनविण्यात येणार असून, तो 'डेक्कन क्वीन'ला पुन्हा जोडला जाणार आहे. असे आहे 'दख्खनच्या राणी'चे महत्त्व! डायनिंग कार: डेक्कन क्वीन
-डॉ. अविनाश वैद्य
पडोसन २९ नोव्हेंबर १९६८ रोजी प्रदर्शित झाला.निर्माता होते मेहमूद आणि एन.सी. सिप्पी.मूळ बंगाली चित्रपट पाशेर बरी (१९५२) या चित्रपटाचा रिमेक होता. तेलगु मध्ये त्याचा दोनदा रिमेक झाला. पान्किती अमेयी या नावाने.
Copyright © 2025 | Marathisrushti