वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महाराष्ट्रात आता 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.
महाराष्ट्र सरकारची वेबसाईट www.aaplesarkar.maharashtra.gov.in वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत.
या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....
• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.
सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.
-- यशोधन कामत
उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे.
अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला.
ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते. हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नातलगांना 10 लाख, कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यावरही 10 लाख, कायमचे (पार्शल) अपंगत्व आल्यास 7.5 लाख, जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख आणि अपघातस्थळापासून आपल्या घरी जाण्यास प्रवासासाठी 10 हजार रुपये मिळतील.
वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे मित्रांनो यापुढे रिझर्वेशन करताना आपण ही बाब नक्की ध्यानात ठेवा इतरांनाही सांगा
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
(सुरेश भट)
मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
(सुरेश भट)
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
(सुरेश भट)
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
(सुरेश भट)
केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !
उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे , उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
(सुरेश भट)
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
(सुरेश भट)
डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी
वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
(मंगेश पाडगावकर)
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
(सुरेश भट)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
(सुरेश भट)
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
माझा घराजवळचा एक नेहमीचा भाजीवाला आहे. मारवाडी आहे. एका किराणामालाच्या दुकाना बाहेर आपलं दुकान थाटलंय. सकाळी सात ते रात्री अकरा त्याचं दुकान चालू असतं. भाजी घेऊन पैसे देऊन झाले की पिशवीत आलं, लिंबं, कढीपत्ता काहीतरी प्रेमानं आणि आग्रहानं भरून देतो...
आज संध्याकाळी त्याला विचारलं की 'शेटजी, सुट्ट्या नोटांचं काय करताय तुम्ही?'... तर म्हणाला की मोठ्या शेटशी (म्हणजे त्याच्या मागचा किराणामालाचा दुकानदार) टाय-अप केलंय... इथून भाजी विकत घ्या आणि त्यांच्याकडे कार्डनी पेमेंट करा...!
मी खुष झालो. भाजी घ्यायला लागलो. तेवढ्यात मोठ्या शेटनी ओरडून सांगितलं की 'सर्वर डाऊन आहे. कार्ड पेमेंट चालत नाहीयेत'. मी थांबलो. भाजीवाल्या मारवाड्याला विचारलं 'काय करू?'
तो म्हणाला, 'आप जो चाहिये लेके जाओ. पैसा बाद में देना.'
तो तसं म्हणाला तरी मलाच धजवेना. मी अगदी गरजे पुरती एक दिवसाचीच भाजी घेतली. शंभराच्या आतलीच. खिशातली एकमेव शंभराची नोट काढून त्याला द्यायला लागलो तर म्हणला, 'रहने दो सहाब ये नोट इमर्जन्सी के लिए. मुझे बाद मे देना पैसा. मै भी यहीं हूं और आप भी यहीं होगे'
मी नाईलाजानं ती नोट पुन्हा खिशात ठेवली... त्याला म्हणालो, 'लिहून ठेव'... तर म्हणाला, 'तुम्हीच लक्षात ठेवा आणि जमतील तेंव्हा द्या...'
कट टू
पलिकडच्याच एका वाईन शॉपमध्ये शुक्रवार संध्याकाळ निमित्त झुंबड उडली होती. तिथे कार्ड घेतात, पण 'सर्वर डाऊन' मुळे कार्डं घेतली जात नव्हती. खिशात नव्या किंवा सुट्या नोटा नसलेले लोक दुकानदाराशी हमरीतुमरीवर येत होते... अन दुकानदार कधी शांतपणे तर कधी मग्रूरपणे 'कॅश टाका अन दारू घ्या' हे गिऱ्हाईकांना ऐकवत होता...
कट टू
घरी आलो. इस्त्रीवाला आधीचे कपडे घेऊन आला होता. त्याचे दोनेकशे रुपये झाले होते. खिशात शंभराच्य दोन नोटा नव्हत्या. 'काय करुया?' असं त्यालाच विचारलं. 'पाचशे झाले की चेक द्या' असं तो म्हणाला आणि पुढचे कपडे घेऊन गेला...
******
या सगळ्या काल संध्याकाळी घडलेल्या १००% सत्य घटना...
आता यांना द्यायचाच तर काहीही Spin देता येईल
*******
पहिला Spin: भाजीवाले, इस्त्रीवाले आणि बहुसंख्य छोटे व्यावसायिक देशभक्तिपोटी आर्थिक झळ सोसत आहेत...
दुसरा Spin: भाजीवाले, इस्त्रीवाले आणि बहुसंख्य छोट्या व्यावसायिकांची भीषण ससेहोलपट होत आहे...
तिसरा Spin: काही दुकानं, विशेषतः दारूची वगैरे, इथे भीषण वादावादी, हमरी-तुमरी आणि भांडणं होत आहेत....
********
माझा Spin: अस्मानी संकटं आणि सुल्तानी संकटं सांगून येत नाहीत... पण ही संकटं आलीच तर एकमेकांना मदत करतात तीच खरी माणसं.... तीच खरी नाती....
अशी किती माणसं आपण जोडली आहेत?.... अशी किती नाती आपण रुजवली आणि फुलवली आहेत....?
*********
खिशात 'आज' पुरेशा नोटा नसतानाही मला जगण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी मिळू शकतात... त्या केवळ मी जोडलेल्या माणसांमुळे आणि नात्यांमुळे...
मी जगातला सर्वांत जास्त श्रीमंत माणूस आहे!!
Forwarded post
ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षो उल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी या पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर हा दिवस दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. ड्रायफ्रूट्स रममध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच. बेल्जियम, जर्मनी, फिनलंड या देशांत नाताळसाठी खास बिअर बनवली जाते, तर नॉर्डिक देशात "ग्लोग' हे पारंपरिक ख्रिसमस ड्रिंक बनवले जाते. रेड वाईनमध्ये थोडा संत्र्याचा रस व लवंग, दालचिनी, सुंठ आणि वेलदोडा असे मसाले घालून ग्लोग बनवले जाते. इस्टर्न युरोपमध्ये नाताळच्या जेवणासाठी बारा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. याचे कारण म्हणजे बारा हा आकडा श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो तसेच तो आकडा वर्षाच्या सगळ्या महिन्याचे प्रतिनिधित्व करतो. हे जेवण संपूर्ण शाकाहारी असून त्यात पारंपरिक पद्धतीनुसार व त्या सीझनमध्ये मिळणारी फळे व भाज्या वापरून बनवलेले पदार्थ असतात. त्यामध्ये बीटचे सूप, भाज्या भरलेले डंपलिंग्ज, खसखस घातलेली केक, जिंजर ब्रेड, कोबीचे रोल्स, हे पदार्थ प्रामुख्याने असतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
ख्रिसमससाठी काही खास पदार्थ
ख्रिसमस केक
ब्लॅक फॉरेस्ट केक
ख्रिसमस जिंजर कुकी
खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्
हनी बनाना ब्रेड
सोया नानकटाई
कॉर्न नानकटाई
रम केक
पोटॅटो ब्रेड
पायनापल पेस्ट्री (बिना अंडय़ाची)
सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस?
यातुन सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते.आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
बर्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलंं, याचं भानही रहात नाही.
कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपणा विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रक्रुतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं;अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बर्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.
यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं नितांत गरजेचं आहे. इतरधावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं सार्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका,तेक्षण तेव्हाचे तेव्हाच जगू घ्या, लुटून घ्या.
आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय,हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते, त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती आसते,वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही आसतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठुन समरसुन जगावं.
स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर "निरोगी कसं जगावं"हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?
एक शायर म्हणतो......
उम्र-ए-दराज से
माँगकर लाये थे चार दिन,
दो आरजु में कट गये,
दो इंतजार में.....
बघा,आपलं असं होऊ नये......
-- आनंद रास्ते
‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर.
चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची.
सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी.
‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘
हा समर्थ संदेश अखेरच्या श्वासापर्यंत पाळला तो शंभूराजांनी.
‘आम्ही हिंदू सांप्रत सत्वशून्य झालो आहोत’ अशी चीड व्यक्त करतानाच वेद- स्मृती यांनी नेमून दिलेली क्षत्रिय वर्णनिहाय कर्मे करणे आम्हाला औरंगजेबसारख्या यवनाधमामुळे शक्य होत नाही असे शंभूराजे; रामसिंगला लिहितात.
हिंदू मंदिरे पाडून जिथे अन्यपंथीय प्रार्थनास्थळे उभारली आहेत; ती पाडून पुन्हा मंदिरे उभारण्याचे आदेश देतात शंभूराजे.
गोव्यात पोर्तुगीज पाद्र्यांनी चालवलेल्या धर्मांतरणाच्या अनन्वित अत्याचारांना ‘जशास तसे उत्तर’ देतात ते शंभूराजे.
‘धर्माशिवाय जगणे म्हणजे साक्षात मरण आहे’ असं बुधभूषण या ग्रंथात शंभूराजे लिहितात.
‘माझ्या मुलुखातून कोणीही माणूस धर्मांतर करवून बाटवता येणार नाही’ असे कलम शंभूराजे तहात घालतात.
शिवराय- शंभूराजे यांना 'सेक्युलर' ठरवणाऱ्या निधर्मीवादी आणि हिंदुद्रोही बांडगुळांनो; संपूर्ण शंभूचरित्र तपासून पहा. असे खंडीभर पुरावे सापडतील......
शंभूराजे म्हणजे साक्षात रुद्र आहेत. ज्यांच्या तृतीय नेत्राच्या तेजाने अवघे हिंदुत्व उजळून निघाले.
‘धर्मवीर’ ही उपाधी कोणाला शोभून दिसत असेल तर ती शंभूराजांनाच.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(व्याख्याते: शंभूराजांची राजनीती; संपर्क: 0251-2863835)
मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द "येळ्ळ अमावस्या" म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.
या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली "भज्जी", खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.
काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.
एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.
मेयर या शब्दासाठी महापौर हा प्रतिशब्दबनवला आणि रुजवला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी.
मोदींनी हजार व पाचशे च्या नोटा बंद करून काळा पैसा संपवण्याचा जो विडा उचलला आहे, त्याला काही बँकेतील अवलादी अधिकारीच हरताळ फासत आहेत हे आता उघड झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात बरेच बँक कर्मचारी तुरुंगात जाऊन, कोर्टाच्या वाऱ्या करताना दिसतील, तसेच आयुष्यात जे काही मिळवले आहे, त्यावर ही पाणी सोडावे लागून, अब्रू मात्र वेशीवर टांगलेली दिसेल.
सरकार कोणतीही चांगली योजना आणते, त्यात भ्रष्ट अधिकारीच योजनेचा बट्टयाबोळ वाजवण्यास पुढाकार घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, पण या वेळेस मात्र, घर फिरले कि घराचे वसे हि फिरतात, अशीच काहीशी गत या अधिकाऱ्यांची झाली आहे. चोरांना मदत करताना, आपले उखळ कसे पांढरे करून घेता येईल, हे पाहताना, आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते याचा थोडाही विचार या नतद्रष्ट लोकांच्या मनाला शिवला नाही, आता भोगा कृत्याची फळे.
या आधी सुद्धा, असे बरेच बँक अधिकारी भ्रष्टाचाराच्या गंगेत अंघोळ करून बाहेर आले आहेत. NP अर्थात नॉन परफॉर्मिंग संपत्तीला कुवत नसताना भरमसाठ कर्ज देणे, आणि हे सिक युनिट बंद पडते, किव्वा पाडले जाते, नंतर हप्ते थांबतात, आणि दिलेल्या कर्जाची वसुली होणे अशक्य होते, अश्या अनेक घटना गेल्या काही वर्षात उदयास आल्या आहेत. विजय मल्ल्या हा कानफाट्या झाला, परंतू असे अनेक प्रतिमल्ल्या आजही समाजात ताठ मानेने फिरत आहेत, फक्त आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही.
आज अशातल्याच काही महाभागानी वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला, परंतू तो अंगलट आला आहे.
-- विजय लिमये
Copyright © 2025 | Marathisrushti