(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • पक्षीपरिचय ३४

  • पक्षीपरीचय ३

  • पक्षीपरिचय १९

  • पक्षीपरिचय ३५

  • भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ वर्षांनी, म्हणजे १९५२ च्या सुमारास सी.एस्.आय्.आर्. या संस्थेने पंचांग सुधारणा समिती या नावाने एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉ. मेघनाद साह भौतिकशास्त्रज्ञ तर होतेच परंतु ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. पंचांग सुधारणा समितीने आपल्या देशासाठी एक दिनदर्शिका सुचवावी असे या समितीला सांगण्यात आले.

    कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही पध्दतीत चांद्रमहिने विचारात घेतात. या महिन्यांची सुरुवातही कोणी पौर्णिमेला करतात तर कोणी अमावस्येला करतात. काही प्रांतात तर सौर महिने विचारात घेतात. आपले सण,वार,धार्मिक उत्सव विशिष्ट ति्थीला असतात, म्हणजेच ते चंद्रभ्रमणावर अवलंबून असतात. तिथी आणि महिन्यांशी सणांची बांधिलकी असते. उदा. दसरा, त्या दिवशी आश्र्विन शुध्द दशमी तिथीच तर गोकुळाष्टमी म्हणजे श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच असायला हवी.

    महिन्यांची कालगणना चंद्रभ्रमणावरुन केली तर १२ महिन्यांचे वर्ष संपल्यावर होणार्‍या एकूण दिवसांची संख्या ३५४ होते, त्यामुळे चांद्रवर्षाचा ऋतुंशी मेळ राहत नाही. ऋतू हे सूर्यभ्रमणावर अवलंबून आहेत आणि म्हणूनच सूर्याचे वार्षिक भ्रमण विचारात घेणारी दिनदर्शिका व्यवहारात सोयीची पडते. आपले दैनंदिन व्यवहार दिवस व रात्र यांच्या अनुषंगाने घडत असल्यामुळे सरासरी २४ तासांचा दिवस ही कल्पना सोयीची होते. जानेवारी व डिसेंबर ही सध्या प्रचारात असलेली दिनदर्शिका सौर दिनदर्शिकाच आहे. धार्मिक सण आणि उत्सव इत्यादिंसाठी आपण चंद्राची दिनदर्शिका विचारात घेत असलो, तरी दैनंदिन व्यवहारात आपण सूर्याचीच दिनदर्शिका वापरतो.

    राष्ट्रीय दिनदर्शिका :

    डॉ. मेघनाद साहा यांच्या समितीने वरील गोष्टींचा विचार करुन सौर दिनदर्शिकां सुचविली आहे. मात्र ती जानेवारी ते डिसेंबर अशा बारा महिन्यांची नाही. त्यातील महिन्यांची नावे, वर्षारंभाचा दिवस इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत आणि वेगळेपण का व कसे ते आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या १२ महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत, फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव 'अग्रहायण' असे आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षाचा पहिला दिवस (लीप वर्ष सोडून) २२ मार्च हा असतो. या तारखेला राष्ट्रीय दिनदर्शिका १ चैत्र या नावाने संबोधते. राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वैशाखापासूनचे महिने पुढील तारखांना सुरु होतात. वैशाख (२१ एप्रिल), ज्येष्ठ (२२ मे), आषाढ (२२ जून), श्रावण (२३ जुलै), भाद्रपद (२३ ऑगस्ट), आश्र्विन (२३ सप्टेंबर), कार्तिक (२३ ऑक्टोबर), अग्रहायण (२२ नोव्हेंबर), पौष (२२ डिसेंबर), माघ (२१ जानेवारी), फाल्गुन (२० फेब्रुवारी).

    वर्षाचा क्रमांक शालिवाहन शकाप्रमाणे घेतात. या महिन्यांचे दिवस एक आड एक ३० किंवा ३१ असे घेत नाहीत. वैशाख ते भाद्रपद या सलग ५ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ असून उरलेल्या ७ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३० घेतात. अशा तर्‍हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते. सूर्य उत्तर गोलार्धात असण्याचा काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील कालावधीपेक्षा थोडा जास्त आहे, त्यामुळे वैशाख ते भाद्रपद या सलग महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ घेण्याची शिफारस समितीने केली.

    जे इंग्रजी वर्ष लीप वर्ष असते त्या वर्षी सुरु होणारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वर्षही लीप वर्ष घेतात. मात्र त्या वर्षी चैत्र महिन्याचेही ३१ दिवस घेतात आणि अशा लीप वर्षाची सुरुवात २२ मार्चला न होता २१ मार्च रोजी करतात.

    राष्ट्रीय दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक :
    वरील विवेचनावरुन राष्ट्रीय दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये आणि त्याची शास्त्रीय बैठक आपल्या लक्षात येईल. चैत्र, आषाढ, आश्र्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडीत आहे. चैत्र आणि आश्र्विन महिन्यांच्या सुरुवातीस (अनुक्रमे २२ मार्च आणि २३ सप्टेंबर) सूर्य वैषुविकवृत्तावर असतो. दिवस आणि रात्र समान असतात. आषाढ महिन्याच्या १ दिनांकापासून (२२ जून) दक्षिणायन सुरु होते, तर पौष महिन्याची म्हणजे उत्तरायणाचीही सुरुवात असते. (२२ डिसेंबर) इंग्रजी महिन्याची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडीत नाही. वैशाख ते भाद्रपद या महिन्यांचे प्रत्येकी ३१ दिवस घेण्यामागील भूमिकाही आपण पाहिली.

    राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वर्ष २२ मार्चला सुरु होत असल्यामुळे ते आर्थिक वर्षाशीही जुळते आहे. हा त्याचा व्यावहारिक लाभही आहे.

    राष्ट्रीय दिनदर्शिकेची भारतीय नागरिकांकडून उपेक्षा :
    राष्ट्रीय दिनदर्शिका २२ मार्च, १९५७ या दिवसापासून भारत सरकारने अधिकृतपणे स्वीकारली. हा दिवस राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाने १ चैत्र १८७९ असा होता. तेथपासून आजतागायत ही दिनदर्शिका शासकीय स्तरावर अस्तित्वात आहे. वर्तमानपत्रांमध्ये आजचे पंचांग या नावाखाली जी माहिती येते, त्यामध्ये या दिनांकाचा उल्लेख असतो. म्हणजे या दिनदर्शिकेच्या स्वीकृतीला आणि वापराला ५४ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारात लोकांकडून ही दिनदर्शिका वापरली जात नाही त्यांनी ती स्वीकारली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कित्येक लोकांना तर अशी काही दिनदर्शिका आहे हे माहीतच नाही. ही भारताची अधिकृत दिनदर्शिका असून सरकारी पातळीवर (अजूनतरी) ती वापरली जाते याचे लोकांना आश्र्चर्य वाटते. राष्ट्रीय दिनदर्शिकेची ही दुर्दशा नव्हे का? राष्ट्रीय दिनदर्शिका समाजात अजूनही रुजू शकते. शासन आणि समाज यांची इच्छाशक्ती तशी असायला हवी.

    राष्ट्रीय दिनदर्शिका दैनंदिन जीवनात वापरली जायला हवी असेल तर पुढील गोष्टी करता येतील :
    कार्यालयीन वेतनपत्रके राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या महिन्यांप्रमाणे तयार करावीत. उदा. चैत्र पेड इन वैशाख.... वैशाख पेड इन ज्येष्ठ.... याप्रमाणे वेतन मिळाले म्हणजे आपोआपच दिनदर्शिका गरजेची होईल.

    जानेवारी महिन्यात जेव्हा नवीन दिनदर्शिका येतात तेव्हा त्यातील भारतीय महिने व दिनांक ठळक छापण्याची सक्ती करावी. इंग्रजी दिनांक व महिने बारीक अक्षरात छापावेत. संक्रमण अवस्थेच्या एक दोन वर्षात हे करावे लागेल. नंतर चैत्र, वैशाख असेच महिने असलेल्या दिनदर्शिका निघू लागतील.

    केंद्र सरकारने रेल्वेचे तसेच सर्वसामान्य अंदाजपत्रक सादर करताना या दिनांकाचा उल्लेख करुन ते सादर करावे. काही बॅंका, संस्था, कंपन्या आपली स्वत:ची दिनदर्शिका छापतात. त्यांनी राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे दिनदर्शिका काढाव्यात. धनादेशावर किंवा अन्य ठिकाणी राष्ट्रीय दिनदर्शिकेची तारीख लिहून व्यक्तिगत पातळीवर या दिनदर्शिकेच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी. राष्ट्रीय दिनदर्शिका अंमलात यावी असे ज्यांना वाटते, अशा लोकांनी इतरांचे याबाबत प्रबोधन करावे.
    आपल्या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्याशी याबाबत चर्चा करावी आणि हा प्रश्न शासकीय स्तरावर उपस्थित करण्यास सांगावे.

    राष्ट्रीय दिनदर्शिका दैनंदिन जीवनात वापरात येण्यासाठी अशी मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेबाबत सर्व पालळ्यांवर एवढे औदासिन्य असल्यामुळेच तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक गोष्टी, सण, वार इ. प्रत्येकजण आपापल्या धर्माप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे साजरे करु शकतील. राष्ट्रीय दिनदर्शिकेमुळे या गोष्टींना बाधा येणार नाही.

    राष्ट्रीय दिनदर्शिका आणि इंग्रजी दिनदर्शिका या दोन्ही दिनांकांचा निश्र्चित संबंध असल्यामुळे त्यांचे एकमेकांत रुपांतरण सहज शक्य आहे. थोडक्यात, शास्त्रीय पायावर आधारलेली राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या व्यवहारात आणणे राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या व्यवहारात आणणे राष्ट्रीय अस्मितेला धरुन आहे. उशीर झाला असला तरी हि चूक सुधारता येईल. त्यासाठी कटिबध्द होऊया !

    (इच्छुकांनी व अभ्यासकांनी तसेच राष्ट्रीय वृत्ती जोपासणार्‍यांनी लेखकाशी संपर्क करावा.)

    -- हेमंत मोने

    फोन : ९८२०३१६३१५

    इ-मेल : hvmone@gmail.com

  • खऱ्या शिवथरघळीच्या शोध

    छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट

    सिवतर तालुका,मौजे पारमाची,कोंड नलवडा,

    'नलावडे कोंड'बाबतचे दूर्लक्ष वादाचे कारण

    समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत 1 जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या खऱ्या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक 13 मध्ये पान क्र.22 वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे.

    इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुसऱ्या प्रकरणात पान क्रमांक 11 पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87 नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. 1675 ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.

    सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा, मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर फारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके1597 भाद्रपद वद्य 8 रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी 12 वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुसऱ्या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिसऱ्या कारभाऱ्याच्या हातची आहेत.

    या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे 12 वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.

    आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा खऱ्या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

  • मुलांवर निट लक्ष ठेवा.. वेळेपुर्वीच जागृत व्हा

    पालकहो...
    मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा..

    आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय... सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की...

    मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात... गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही... म्हणजे पहा ना... प्रत्येक गोष्टींच वेळापत्रक ठरलेल असत.. भले ठिकाणे वेगवेगळी असु शकतील.. अॉफीस.. कार्यालय... नौकरी... शाळा... टुशन... अस काही...

    पण यातील काही ठिकाणे वगळता... यातील शाळा व टुशन यांच्या वेळा बहुदा सर्वंच ठिकाणी एकसारख्याच असतात...

    पण मंडळींनौ..., या दरम्यान शाळेतील वा टुशनमधील विद्यार्थी खरच नेमक्या ठिकाणी असतात का हो....?

    कदाचित् .... या बद्दल अनेकजण वा नेहमीप्रमाणे (आंधळेप्रेम) आमचा आमच्या मुलामुलीवर भरपुर वा अतोनात विश्वास आहे... अस मनातल्या मनात म्हणाले सुध्दा असतील... छान..हरकत नाही...

    पण मी अशा वेळेतही काही शाळेय मुलामुलींना अशा काही ठिकाणी पाहत असतो की... जेथे सामान्य पणे येणाऱ्या वा जाणाऱ्या जनतेची... लोकांची... नजरच जाऊ शकत नाही... कारण आपण कोणाच्याही नजरेत येऊ नये अशीच भिती या मुलामुलींच्या चेहऱ्यावर असतेच...

    मग ही शाळेच्या पोशाखात, शाळेच्या वेळामध्ये... शाळेत शिकायच सोडुन बाहेर नेमकी का...? कशासाठी...? कोणासोबत...? कशाला...? बाहेर फिरत असतात हेच नेमक कळत नाही... कदाचित् लहान व अपरिपक्व वयामध्ये यांना बहुदा मजा वाटत असेलही... अशावेळी ह्यांची पालकांना व शिक्षकांना वेळप्रसंगी ठामपणे खोट बोलण्याची हिम्मतच वाढत असते.. पण या खोटेपणाचा दुरगामी परिणाम यांना माहीतच नसतो...

    अशावेळी मोठमोठ्या कॉफी शॉप्स... महागड्या हॉटेलमध्ये.... साध्या टॉकीझ मध्ये... मोठ्या मॉल मध्ये... गजबजलेल्या रस्त्याच्या पासुन निर्जन ठिकाणी... मंदिराच्या कोपऱ्यात.... बागेत एकदच गर्दीपासुन लांब... बसस्टॉपवर.... अशा अनेक ठिकठिकाणी ही शाळेय मुलमुली शाळेय गणवेशात वेगळ्याच विश्वात हरवलेली असतात....

    मंडळींनौ .... मी अस म्हणत नाही...की तुमचेच पाल्य असेल...? पण फक्त कळकळीची नम्र विनंती की... तुम्हीपण जागृत रहा.... कारण या लहान कोवळ्या वयामध्ये यांना आयुष्याची फारसी जाणीव नसते हो... याच वयामध्ये थोडीफार एक्साईटमेंट करायला जातात... व काही समाजकंटक अशावेळी नेमका याच अजाणतेचा जाणीवपुर्वक गैरफायदा घेतातच... मग काही विद्यार्थ्यां वाममार्गाला लागताल. (तबांकु... मावा... सिगारेट... नशा...) अशापैकी काहीही... हिरोप्रमाणे वागण हेच यांना माहीती असत... व मुली ..कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतय.. महागड्या हॉटेलमध्ये जेवण वा स्नँक्स खाऊ घालतायत... आलिशान गाड्यातुन सफर करवतात... आपल्या सौंदर्यांयाची मनभरुन तारीफ करातायत... बारिक.. सारिक.... गोष्टींच .. हसण्याच... बोलण्याच... चालण्याच... लाजण्याच... बेधडक स्वभावाच.... आवाजाच... कौतुक करत असत म्हणुनही ह्या कोवळ्या वयात मुली साहजिकच हरळुनच जातात... मग नेमका हाच गैरफायदा समाजकंटकही घेतात...

    पण आपला पाल्य शाळेतच गेलाय... या गोडगैरसमजुतीत असतात.. पण ही टेक्नोसेव्ही पिढी कदाचित् जरा लवकरच पुढे जायच्या घाईत आहेत... या नादात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्हायरस घुसु नये... याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यायलाच हवीच तेही ॲन्टीव्हायरस होऊन... हीच विनंती....

    आपला हितचिंतक
    --विवेक जोशी

  • वर्तनशैली – बुफे जेवण

    अलिकडे सर्रास लग्न, साखरपुडा, बारसं, वाढदिवस, यासारख्या असंख्य कौटुंबिक समारंभात जेवणावळी वा पंगत या हद्दपार होत असून बुफेने अलगद घुसखोरी केली आहे. बुफेचा उद्देश हा आवडीचं पण नेमकंच खाणं हा असला तरी बरेचदा प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले अनेकविध पदार्थ आणि त्यांची मनमोहक रुपं यांच्या गोतावळ्यात बुफेचा गुंता हा वाढतोच. बुफेसाठी वास्तवात हवेशीर, मोकळी, मुबलक जागा हवी पण प्रत्यक्षात फारच थोड्यावेळी असे हॉल, लॉन उपलब्ध होतात. अपुर्‍या, कोंदट, छोट्या बंदिस्त ठिकाणी कुठेही एक टेबल लावून जेवणाची, ताटांची व्यवस्था करून बुफे म्हणजे या, घ्या अन् भरभर कसरत करून खा अन् फुटा असा काहीसा भाव या बुफे पद्धतीतून व्यक्त होत राहतो. वास्तवात कुठल्याही समारंभाला पाहुण्यांचे अगत्याने स्वागत अन् आग्रहाचे भोजन, आपुलकीने विचारपूस अन् परिचितांशी, हक्कांन ऐसपैस बसत झालेल्या गप्पागोष्टी या अपेक्षित असतात पण येथे नेमके उलटे होते.

    बुफेत जेवणे ही एक कलाच आहे. मुलं, वयोवृद्ध यांची तर फारच पंचाईत हते. एका हातात अवाढव्य पदार्थांची रेलचेल असलेले ताट धरून, मिळेल त्या जागेत, उभ्याने जेवणे ही एक कसरत बनते.

    पाश्चिमात्य जगात एकतर भारतीय जेवणाइतकी विविधता पदार्थात नाही. अन् जे पदार्थ बनतात ते जास्त करून एकाच प्रकारात येतात त्यामुळे ते पदार्थ एकाच डिशमध्ये घेवून खाणे सोपे असते.

    या उलट आपले भारतीय जेवण चटणी, कोशिंबीर, पापड, भात, आमटी, सुकी ओली रस्सा भाजी, स्वीट म्हणून पक्वान्न त्यातही काही घट्ट काही पातळ काही मध्यम जसे श्रीखंड, पुरणपोळी, काला जामुन, गुलाबजाम, बासुंदी, रसमलाई, रसगुल्ला, जिलबी अशा अनेकासाठी ताटली (प्लेट), वाटी (बाऊल) असा सारा मामला एकत्र डिशमधे वाढून खाणं म्हणजे शुद्ध वेडेपणा होय.

    मनुष्यस्वभाव हा अधिरा असतो. घरी प्रत्येक जण नेमकेच जेवतो. पण बाहेर समारंभाला बुफेत मात्र अनेकविध पदार्थांची आकर्षक रेलचेल, तत्सम साउथ इंडियन, पंजाबी तडका, गुजराथी, चाट, बंगाली स्वीट्स, राजस्थानी अशा पदार्थांसाठी स्टॉल लावलेले त्यामुळे त्यातील पाककृती बनताना पाहताच भुरळ पडते. मग काय खाऊ काय नको असं होणं स्वाभाविकच ! पण या ठिकाणी संयम हवा. भले आधी पूर्ण एक चक्कर मारावी. मेनुचा आपल्या आवडीचा ताळमेळ बघावा, मग कुठल्या प्रांताची सैर करायची हे ठरवून त्याप्रमाणे खाद्य मोहीम आखावी.

    बुफे जेवताना आपली वर्तनशैली सुयोग्य हवी. सर्वसामान्यत: आपण भारतीय लग्न असेल वा अन्य समारंभ, यजमानांना भेटून, अभिनंदन करून, भेटवस्तू देऊन मग जेवणाकडे वळतो.

    अशावेळी सर्वप्रथम प्रसाधनगृह वा तत्सम हात धुण्याच्या ठिकाणाचा शोध घेऊन हात स्वच्छ धुवावेत. कारण ते आपल्या हिताचे असते. नियोजित ठिकाणी जाईपर्यंत आपण अनेक ठिकाणी हात टेकवलेले असतात आणि अस्वच्छ हातानी पोटात काही जाणे म्हणजे अनारोग्य होय.

    काही वेळेला आपल्या समवेत वा हॉलमध्ये अनोळखी, अपरिचित अशा अपंग, वयोवृद्ध व्यक्ती असतात. अशावेळी आपण वा अन्य तरुण मंडळींनी पुढाकार घेवून अशांची टेबलखुर्चीसाठी व्यवस्था करावी. टेबल नसेल तर किमान 2 खुर्च्या आमने सामने ठेवून मांडामांड करुन देत त्यांची बसण्याची, पर्यायाने जेवणाची त्यातल्यात्यात सुलभ व्यवस्था करून द्यावी.

    अशा व्यक्तींना हात धरून प्रसाधनगृहात नेऊन वॉशबेसीनवर हात धुवून द्यावेत. अनेकदा चित्रविचित्र नळांमुळे या व्यक्तींचा गोंधळ होत असतो.

    वयोवृद्धांच्या, अपंगांच्या आवडीनुसार पदार्थ वाढून आणावेत. सोबत पाण्याचा पेला ज्यामुळे त्यांना भोजनाचा आनंद घेता येतो.

    त्यांचे भोजन झाल्यावर केटररच्या माणसांना सांगून त्यांचे खरकटे ताट धुण्याच्या टबात ठेवावे वा आपण स्वत: ठेऊन यावे.

    बुफेत जेवतांना, पदार्थ वाढून घेतांना भले अनेकदा जावे लागले तरी चालेल पण एकदम सर्व काही पानात वाढून घेणे टाळावे ज्यामुळे बुफेतील अनेकविध पदार्थांचा मनमुराद आस्वाद सर्वजण सहजतेने घेऊ शकू.

    मर्यादित वाढून घेतलेल्या पदार्थांमुळे तिखटाचे गोडात, भातात सांडलेली बासुंदी, ग्रेव्हीत भिजलेली भजी, पुरी असा सांडलवणपणा न होता एका हातात पेलवेल इतपतच जेवण जेवणे शक्य होईल. पदार्थाचा विचका होणार नाही पोटाला मानवेल आणि हातापायाला झेपेल अन् मानेवरही ताण येणार नाही.

    सर्वात महत्वाचे, हॉलमध्ये फिरताना आपला पोशाख, इतरांचे पोशाख स्वच्छ राहतील. परस्परांच्या अंगाला खेटलो तरी ओशाळी परिस्थिती उद्भवून सॉरी म्हणण्याची तसदी पडणार नाही.

    उन्हाळ्यात बेताने खावे. पदार्थ पानात अधाशाप्रमाणे वाढून न घेता चिमुकला वाढून चाखून बघावा. आवडला, मानवला तर भरपूर घ्यावा. अन्यथा अनेकदा नवनवे पदार्थ आकर्षित वाटले तरी चवीला, आपल्या स्वादाला, न भावणारे असल्याने मग पानात घेतलेत म्हणून खा वा सरळ टाका असा घोळ टाळण्यासाठी आधी थोडासा पदार्थ टेस्ट करा मग पानात घ्या. अन्नाची नासाडी ही टाळायला हवी. आजच्या भारतातील 30% हून अधिक जनता ही अर्धपोटी आहे याची जाणीव ठेवावी.बुफेत लहान मुलांना अनेकदा स्वतंत्र ताट दिलं जातं. वास्तवात त्याची काहीच गरज नाही. आपल्या घरच्याप्रमाणेच आपल्या ताटातून मुलांना भरवता येते. मुलांचे थोडेसे खाणे, त्यांच्या आवडीनिवडी, काही पदार्थांना हातही न लावणे, तिखट गोड आवडी, त्यांचा हट्टीपणा याची मोठ्यांना, त्यांच्या पाल्यांना जाणीव असते. अशावेळी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आणि यजमानांचा ताटाचा खर्च वाचण्यासाठी जागरुक रहावे.

    बुफेसाठी वापरण्यात येणारी मेलॅमीन भांडी, यात ताटवाटी चमचे हे बहुतकरून ओशट, कळकट असतात त्यातून जेवणे म्हणजे हतबलता. यासाठी केटररला आधीच विश्वासात घेऊन स्वच्छतेची हमी घ्यायला लावावी. स्वादिष्ट, रुचकर पदार्थांचे गुणधर्म कायम राहण्यासाठी वेळप्रसंगी अधिक खर्चाची तरतूद ठेवावी. यासाठी केटररने सहकार्य करावे. स्टीलची ताटे ही पूर्वी पंगतीत असत पण तेव्हा ते ताट हातात धरून जेवायला लागत नसे. आता उभ्याने, मर्यादित जागेत भोजनाचा खटाटोप असल्याने एवढी जड ताटे हातात धरणे अशक्यच पण त्यासाठी तडा गेलेली,रंग उडालेली, मळकी घाणेरडी ताटे हा पर्याय होऊ शकत नाही.

    स्वच्छतेसाठी प्रत्येकानेच आग्रही असायला हवे. खोलगट कप्प्याच्या पत्रावळी हा उत्तम पर्याय होऊ शकतो. यातच पानांच्या वा पातळ प्लॅस्टिकच्या अशा प्रकारांचा स्वीकार झाला तर वापरा आणि टाका अशा सुलभ पद्धतीमुळे सुग्रास भोजनाचा चिंतामुक्त आनंद लुटता येईल. बुफेत सर्वसामान्यत: 'घेशील किती दोन करांनी खात रहा एक तोंडानी'अशी स्थिती असते. अनेकविध पदार्थांची, मनमुराद लूट, 'मर्यादित काही नाहीच अगडबंब सारे' या न्यायाने अनेक बुफे पाटर्यांमधून वाजवीपेक्षा जास्त अन्नपदार्थ तयार होऊन ते अन्नाची नासधुस होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

    भारतात आजच्या घडीला 23 कोटी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही.

    एकाच वेळी अनेक पदार्थांचे सेवन म्हणजे अपचन, पर्यायाने आजारपण अन् डॉक्टरला निमंत्रण !

    आपल्या सर्व धर्मांमध्ये अन्नाचे किती आणि काय महत्व आणि सेवन यावर किती अन्न आवश्यक ते कथन केले आहे. वास्तविक आपले दोन तळ हात जोडले की जेवढा आकार होतो तेवढेच पोट असते. जैनमुनी किंवा बौद्ध यांच्या प्रमाणेच शंकराचार्यांनीही 'करतल भिक्षा' म्हणजेच आपण प्रत्येकाने किती खावं हे भाष्य केले आहे. ज्याचे पालन अशा सर्व बुफेच्या सणासमारंभातून सर्वांनी व्यक्तिगत सामुहिक स्तरावर केलं तर ते चांगलं होईल. ज्यामुळे जगातील कोणीही कुपोषित भुकेला न राहता सर्वांसाठी अन्न उपलब्ध राहील. घराबाहेरच्या जगात प्रत्येक माणूस कसा वागतो, राहतो, बोलतो हे महत्वाचे आहे. काही वर्षांपूर्वीच्या अभ्यासक्रमात नागरिक शास्त्र हा एक विषय असायचा. एक नागरिक म्हणून आपली काय कर्तव्ये आहेत, समाजात कसे रहावे, वावरावे याविषयीचे धडे त्यात असायचे. विषय सोपा, चांगले गुण मिळतात म्हणून त्यात प्राविण्य मिळवलं जायचं. कमी अभ्यासाचा पण जास्त फायद्याचा म्हणून त्याचा गवगवा असायचा. वास्तविक हा विषय केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता माणूस हा कितीही मोठा झाला तरी आणि जगाच्या पाठीवर कुठेही फिरला तरी या विषयाचे आकलन आणि व्यवहारात त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण शिष्टाचार, तुमची वर्तनशैली यावरच देशाची प्रगति वा अधोगति होत असते. म्हणूनच एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाची वर्तणूक सभ्य आणि नियमबद्ध हवी.

    अशा अनेक प्रकारच्या वर्तनशैलीचा आपण सर्वांनी विचार करून ती आत्मसात केली तर सार्वजनिक जीवनातला आपला वावर हा उपद्रवी न होता सुखकर आणि आनंददायी होऊ शकतो.

    समता गंधे
    ५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
    गोरेगांव (पूर्व), मुंबई
    ४०००६३०२२-२८७४५६८१

  • काहीतरी आगळे वेगळे

    उतार वयात ‘काहीतरी आगळे वेगळे’ करण्याचे धाडस करणे म्हणजे एकप्रकारचा मूर्खपणाच असे अनेकांचे मत असते. माझे वय 70 रनींग तर माझ्या सौभाग्यवती अपर्णाचे वय रनींग 64. हे वय खरे म्हणजे आराम करण्याचे, तब्येतीची काळजी घेण्याचे, हरि हरि म्हणत स्वस्थ बसण्याचे. अशा वेळी थायलंडमध्ये बॉंकॉक येथे जाऊन 3 आठवड्यांचा ‘इंग्रजी कसे शिकवायचे’ या सारखा एक कोर्स अटेन्ड करणे म्हणजे येडपटपणाच! ‘वयाच्या 70 व्या वर्षी तुला मास्तरची नोकरी कोण देणार?’ माझ्या एका मित्राने कुचेष्टेने विचारले. ‘तीन आठवडे आणि ते सुद्धा बॉंकॉकला! ते सुद्धा ज्याचा काही उपयोग नाही असा कोर्स करण्यासाठी? भारतामध्ये सुद्धा के कोर्सेस होत असताना थायलंडला कशाला जायचे? ही तर पैशांची उधळपट्टी आहे. तुला जर पैसे जास्त झाले असतील तर दानधर्म कर!’ माझ्या एका मित्राची संतप्त प्रतिक्रीया. पण ‘ऐकावे जनाचे व करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे आम्ही दोघांनी हा कोर्स बँकॉकला जाऊनच करायचे ठरवले व त्याबद्धल आम्हाला अजीबात ‘रिग्रेट’ होत नाही.

    15 जानेवारीपासून, म्हणजे मकर संक्रांतीच्या शुभमुहुर्तावर याची सुरवात झाली. आधी आम्हाला या कोर्सला प्रवेश मिळेल की नाही ठाऊक नव्हते. पण या कोर्सला वयाचे, शिक्षणाचे व अनुभवाचे कसलेही बंधन नाही त्यामूळे ऍडमीशन मिळाली. बँकॉकच्या एका उत्तम हॉटेलात तीन आठवडे रहाण्याची सोय, ब्रेकफास्ट व लंचची सोय हे आकर्षण होते. पण तीन आठवडे बँकॉकला रहाणे जमेल की नाही, तेथील ‘फूड’ सोसवेल की नाही असे काही प्रश्न होतेच. तरी सुद्धा आम्ही हे धाडस करायचे ठरवले व एका सुरेख अनुभवाचा आनंद घेऊन परत आलो.

    अमेरिकन टेसॉल इन्स्टीट्युट (ATI)तर्फे ‘टेसॉल’ (TESOL-Teaching English to the speakers of other languages) व ‘टीएफएल’ (TFL- Teaching English as Foreign Language) असा 3 आठवड्यांचा 120 तासांचा कोर्स घेण्यात येतो. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी आमचे बँकॉकला आगम झाले. जेएल बँकॉक या हॉटेलमध्ये आमची रहायची सोय करण्यात आली होती. प्रथमदर्शनी हे हॉटेल तसे सामान्यच वाटले पण तेथे रहायला सुरवात केल्यावर ते एक उत्कृष्ट हॉटेल असल्याचे लक्षात आले. तेथील रेस्टॉरन्टमध्ये ब्रेकफास्ट व लंचमध्ये अनेक उत्तम उत्तम पदार्थ खायला मिळाले. भरपूर पडथाई चापली. असो.

    दिनांक 8 फेब्रुवारीला आम्ही सर्व हा कोर्स अटेन्ड करणारे पहिल्यांदा भेटलो व ‘हे विश्वची माझे घर’ असल्याचा प्रत्यय आला. आम्ही एकुण 9 जण होतो. त्यामध्ये 4 जण भारतातले (आम्ही दोघे व हॅरी पुण्याचे तर सीमा बंगलोरची), पिटर स्वीझर्लंडचा, अनुम पाकिस्तानची, नाओमी जपानची, केनेथ टर्कीमध्ये सेटल झालेला पण मूळचा अमेरिकेतला, विन्सम मुळची दक्षीण आफ्रेकेतली पण आता चीनमध्ये काम करत असलेली असे निरनिराळ्या देशातले व निरनिराळ्या वयोगटातले होतो. हॅरी सर्वात तरूण म्हणजे 23 वर्षांचा तर मी वयाने सर्वात जास्त 70 वर्षांचा! पण या 21 दिवसांच्या सहवासाने आम्ही सर्व जण जणुकाही उकरूप होऊन गेलो. वयाची व तसेच स्त्री-पुरुष अशी बंधने आपोआप गळून पडली व आम्ही सर्व उकमेकांचे घनिष्ट मित्र झालो. नंतर आम्हाला बेल्जियम मधला फिलिप पण येऊन मिळाला. सर्वजण मला ‘उल्हास’ या एकेरी नावाने बोलवत होते त्यामूळे बरे वाटत होते. (नाहीतर आपल्याकडे ‘उल्हासराव, अपर्णाताई’ व जोशीचे ‘जोशीबुवा’! या ठिकाणी नो राव, नो ताइ, नो बुवा). धमाल मस्तीबरोबरच शिक्षण पण चालुच होते. आमच्यासारख्या वयस्कांना हे तरूण कसे सामावून घेतात याची धास्ती होती पण ती दूर झाली व सर्वांचे छान सहकार्य मिळाले. शिक्षण क्षेत्रात किती आधुनीक बदल होत आहेत याची जाणीव झाली.

    येथील प्रत्येक दिवस हा नवीन असायचा. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचे. वेळ तर इतका बिझी जायचा की श्वास घ्यायला फुरसत नसायची. उतार वयात नवीन गोष्टी शिकणे काहीसे अवघड असते पण अशक्य मात्र नसते याचा प्रत्यय आला. कुहुरिमा बसू ही आमची ट्रेनर होती. उत्तम ट्रेनर कसा असावा याची ती एक आदर्श उदाहरण आहे. अत्यंत शांतपणे, संयमीतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने व अचूक निरिक्षण या पद्धतीने तिचे ट्रेनींग चालायचे. दुसरी अलौकीक व्यक्ती भेटली म्हणजे पाक ही थाई तरुणी. ती लोकल कोऑर्डीनेटर आहे. पाक म्हणजे उत्साहाचा झराच. सदैव हसणारी म्हणून आम्ही तिचे नांव ‘स्माइलींग पाक’ असेच ठेवले होते. अत्यंत कार्यक्षम व सदैव मदतीला तयार. तिचा 3 वर्षांचा गोड मुलगा बॉम्बे याच्याशी पण आमची दोस्ती झाली.

    आम्हाला एकुण 3 शनीवार व 3 रवीवार सुट्टीचे मिळाले. पहिल्या शनीवारी आमची ‘आयुथ्या’ या ठिकाणी ट्रिप काढण्यात आली. ती अविस्मरणीय ठरली. तर दुसर्याच रवीवारी बँकॉकमधील चॅटु चॅट या आशिया खंडातील, 8000 दुकाने असलेल्या, सर्वात मोठ्या मार्केटला भेट दिली.

    थाई शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिकवणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. वयाच्या 70 व्या वर्षी मी आयुष्यात पहिल्यांदाच मुलांपुढे ‘मास्तर’ म्हणून उभा राहीलो होतो व ती सुद्धा अशी मुले की त्यांची भाषा मला समजत नाही की माझी भाषा त्यांना कळत नाही. पहिल्यांदा 3 री ते 6 विच्या मुलांसाठी दोन लेसन्स घेतले व नंतर एका ज्युनीअर कॉलेजमध्ये 17 वर्षांच्या ‘टिन एजर्स’ साठी दोन लेसन्स घेण्याची संधी मिळाली. आधी खूप दडपण आले होते. पण ‘गुड मॉर्निंग टिचर’ या मुलांच्या उस्पुर्त स्वागताने सगळे दडपण पळून गेले. यावेळी माझे 1ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण ज्या शाळेत झाले-पुण्याचे बाल शिक्षण मंदीर- या शाळेची व या शाळेतील चिंचोरे गुरुजी, पेंडसे गुरुजी, जोशी गुरुजी (सुप्रसिद्ध गायक यशवंतबुवा जोशी), खारकर बाई यांची प्रकर्षाने आठवण झाली. या थाई मुलांचा प्रतिसाद अभुतपूर्व असा होता. मी शिकवलेले त्यांना किती कळले ठाऊक नाही पण त्यांचा प्रतिसाद उत्तम होता. ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे परमपुज्य साने गुरुजींनी म्हणून ठेवले आहे ते किती बरोबर आहे हे कळले. मला वाटते की उतारवयाचे किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात घालवायचे असेल तर खुशाल एखाद्या शाळेत जाऊन मुलांना शिकवावे किंवा गोष्टी सांगाव्यात. या सारखा दुसरा आनंद नाही.

    शेवटचा दिवस होता ग्रॅज्युएशन सेरेमनी म्हणजेच सर्टिफिकेट देण्याचा समारंभ. या ठिकाणी धमाल मस्तीबरोबर काही भावूक क्षण पण होते. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.

    अशा प्रकारच्या अनेक सुखद आठवणींचा खजीना घेऊन आम्ही परत आलो आहोत. आता आमच्यातील मरगळ संपुष्टात आली आहे. एक नवीन उर्जा निर्माण झाली आहे. एक नवीन दृष्टी मिळाली आहे. इंग्रजी शिकवण्याचे जे नवील कौशल्य आम्ही प्राप्त केले आहे याचा उपयोग करायची संधी मिळेल की नाही सांगता येत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी याचा उपयोग व्हावा अशी इच्छा आहे.

    बघुया पुढे काय घडते ते!

    तुम्हाला काय वाटते?

    (ही पोस्ट म्हणजे ATI-TESOL ची पब्लिसिटी किंवा प्रमोशन करण्यासाठी लिहीली आहे असा गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये. कारण हा मुळ उद्देश नाही व ATI त्याची गरज पण नाही. ही पोस्ट फक्त आलेला अनुभव शेअर करण्यापुरतीच मर्यादीत आहे व वाचकांनी ती ‘प्रॉपर स्पिरिट’ मध्ये घ्यावी ही नम्र विनंती आहे.)

    -- उल्हास हरी जोशी

  • सुरक्षित बँकिंग

    //

    बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. दयानंद नेने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट. अतिशय वाचनीय.