वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आले आणि “मेक इन इंडिया ” च्या गीतात मिले सुर मेरा तुम्हारा झाले. 2030 साली लोकसंख्येचा भारतीय भस्मासुर चीनच्या ड्रॅगनासूराला मात देत १४६ कोटीची उड्डाणे करणार. यातील 100 कोटी हात “ कार्यासज्ज ” म्हणजे 16 ते 59 वयोगटातील असतील. म्हणजे भारत उत्पादनाचे जागतिक केंद्र बनेल. प्रगत राष्ट्रांच्या गुंतवणुकीचा धबधबा भारतावर कोसळू लागेल. अशी स्वप्ने पण पडू लागलीत.भारतात गुंतवणुकीसाठी आव्हान करण्यासाठी मोदीजीचे परदेश दौर्यांची मालिका सुरू झाली॰
एवढ्यात एक कटू सत्य ध्यानात आले एसेस्सी “ड्रॉप आऊट ” चा दर बघता यातील 60 कोटी हात “अल्पशिक्षित” आणि “कौशल्य हीन” असतील. यावर उतारा शोधण्यासाठी नीती आयोगाचे विचार मंथन झाले आणि दोन स्तरांवर अॅक्शन घेण्याचा निर्णय झाला. एक कौशल्य विकासासाठी “स्कीलिंग इंडिया” आणि उद्योगांच्या वाढी साठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणून ब्रिटिश काळच्या कायद्यांचे सुलभीकरण म्हणजे “ ईझ ऑफ डूइंग बिझिनेस ”.
कौशल्य विकासाठी गरज आहे औद्योगिक प्रशिक्षण सौंस्थांची – त्यासाठी लागणार जमीन, यंत्रसामुग्री, प्रशिक्षक आणि या सर्वांसाठी लागणारे भांडवल.भांडवल आणले तरी यातील कुठलीच गोष्ट एका रात्रीत आणता येण्यासारखी नाही.
मात्र हे प्रशिक्षणाचे अकुशलाला “ रोजगार योग्य ” बनविण्याचे “राष्ट्रकार्य ”लघु उद्योजक सहज करीत आहेत. कुठलेही ITI प्रशिक्षित तरुण लघु उद्योगाकडे येत नाहीत. त्यामुळे आठवी नापास, तिसरी नापास अशा तरुणांना अकुशल कामगार म्हणून घ्यायचे, प्रशिक्षित करायचे, अनुभव द्यायचा आणि शेवटी अशा कुशल कामगाराच्या वेतन वाढीच्या अपेक्षा परवडत नाही सोडून गेला की पुनश्च हरी ओम. पुन्हा नवीन चौथी नापास तरुणाला कामावर घ्यायचे..... हा “ प्रशिक्षण यज्ञ ” वर्षानुवर्षे अव्याहत चालू आहे.
आज सुलम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुमारे 5 कोटी लघु उद्योजक 11.5 कोटी हातांना रोजगार देत आहेत.तसेच यापैकी फक्त 3.6 लाख उद्योग EMII नोंदणी घेणारे आहेत. म्हणजे सुमारे 4.95 कोटी उद्योगातून काम करणारे सुमारे 10 कोटी कामगार केवळ “ व्हाउचर ” वर रोजगार घेऊन काम करतात व त्यांना कुठलेही कायद्याचे किंवा अपघातपासून विमा संरक्षण नाही. याचे मुख्य कारण सुलम उद्योगांना जाचणारी “इन्स्पेक्टर राज” ची साधार भीती.
केंद्राने लहान लहान अधिसूचना काढून बरेच सुलभीकरण केले पण कामगार ब्रिटिश काळच्या कायद्यात करावयाचे आमुलाग्र बदल केल्या शिवाय “इन्स्पेक्टर राज” पासून मुक्ति मिळणे शक्य नाही. केंद्रीय कामगार मंत्री मा. बंडारू लक्ष्मण यांनी रजिस्टर्स आणि रिटर्न्स सुलभीकरण कायदा 2011 ची अधिसूचना, व स्माल फॅक्टरीज बिल 2014, वेज कोड, कामगार संबंध कोड अशी तीन कायदे सुधार त्रिसूत्रिची प्रारूपे सर्व भागधारकांसमोर म्हणजे कामगार संघटना, व्यवस्थापन संघटना व सरकार अशा त्रिपक्षीय चर्चेला आणली. आपल्या कामगार चळवळीची धार बोथट होईल या भीती पोटी, भाजप प्रणीत भारतीय मजदूर संघा समवेत सर्व कामगार संघटनांनी कुठल्याही बदलाला सरसकट आणि तीव्र विरोध दर्शविला॰ त्यामुळे सुलभीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसली.
मात्र महाराष्ट्र सरकारने राजस्थानच्या धरतीवर कुठलेही आमुलाग्र बदल न करता कायद्याच्या चौकटीत राहून अनेक लहान अधिसूचना काढून सुलभी कारण जोरात पुढे नेले.कारखाना बंद करण्यासाठी परवानगीची मर्यादा 300 वरुन 100 वर आणणे,सुलम उद्योगांना जाचक माथाडी कायद्यातून मुक्ति, पर्यावरण विषयक अडसरांचे सुलभीकरण, काल मर्यादेत परवानगी, एकंदर परवानग्यांची संख्या 76 वरुन 40 वर आणणे, स्वप्रमाणित विवरणपत्रे इ. अनेक बदल अधिसूचित करून “मैत्री” या संकेत स्थळावर पारदर्शक पद्धतीने टाकलेत हे खरोखरी स्तुत्य आहे.तसेच या निर्णयांचे परिणाम जमिनीवर दिसू लागले आहेत.
परंतु कौशल्य विकास व सुलभी करण यांची सांगड घालण्यासाठी एक अत्यंत प्रभावी पण सोपा उपाय म्हणजे – सुलम उद्योगाला प्रशिक्षण संस्थेचा दर्जा देत त्यांच्यातील सुप्त विभवाचा वापर करणे. या साठी 15 ते 20 वर्षे वयाच्या अकुशल – अल्पशिक्षित ( एसएससी ड्रॉप आऊट ) तरुणांची आधार कार्डा वरून “प्रशिक्षणार्थी” म्हणून नोंदणी करणे. सुलम उद्योगांना त्यांच्या कर्मचारी संख्येच्या 30 % नोंदणीकृत प्रशिक्षणार्थीना तीन वर्षासाठी, किमान वेतनाच्या अनुक्रमे 70, 80 व 90 टक्के स्टायपेंड व अपघात विमा करून कामावर घेण्याची मुभा देणे. या शिवाय शिकण्याची इच्छा असलेल्या प्रशिक्षणार्थीना “नरेगा” योजनेतून महिना रु. 3000 शिष्यवृत्ती देऊन औद्योगिक संघटनांच्या मदतीने त्यांच्या आवडीच्या व्यवसायाचे संबंधित व्यवसायचे तंत्रशुद्ध शिक्षण द्यावे व एनसीटीव्हीटी परीक्षेला बसवावे. तीन वर्षा नंतर व्यवस्थापनाला प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी कामावर घेणे बंधनकारक नसावे. यामुळे सुलम उद्योगाची, कामगार संख्या वाढून फॅक्टरी अॅक्ट लागू होण्याची व प्रशिक्षणार्थी कसाही असला तरी त्यास कामावर कायम करावे लागण्याची अनामिक भीती नाहीशी होईल. तसेच अनेक असंघटित सुलम उद्योगात अकुशल तरुण कामगारांना अपघात विमा संरक्षण,व्यावसायिक प्रशिक्षण, औद्योगिक अनुभव व NCTVT प्रमाणपत्राची खात्री अशी बहुआयामी संधि उपलब्ध होईल.
सर्वघटकीय लाभ असणारी ही सूचना अमलात आणल्यास अच्छे दिन “ सुपरफास्ट ” ची “हायपर फास्ट ” होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित.
पुरुषोत्तम आगवण
राष्ट्रीय उपाध्यक्ष
चेंबर ऑफ स्माल इंडस्ट्री असोसिएशन्स
भ्र.ध्व. ९८२००८९३११


पुण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक श्री समीप कुलकर्णी यांनी चक्क एका हॉलिवूड चित्रपटासाठी सतारवादन केले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पुण्याचेच श्री मिलिंद दाते हे आहेत.


जागतिक शांतता ही एखाद्या देशात घडणारे खून,चोर्या, दरोडे आणि बलात्कार याच्याशी निगडीत नाही. जेंव्हा जगातील कोणत्याही भागात आतंकवादी कारवाया होतात तेंव्हा जागतिक शांतता भंग पावते. पहिल्या आणि दुसर्या महायुध्दाच्या वेळी जागतिक शांतता मोठ्या प्रमाणात भंग झाली होती. त्यापूर्वी म्ह्णजे हजारो वर्षापूर्वीपासून जागतिक शांतता कधीही प्रस्थापित झालेली नव्ह्ती. दिडशे वर्षापूर्वीपर्यत जागतिक शांतता ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. अलिकडच्या काळात जेंव्हा यांत्रिकी प्रगती अत्यंत वेगाने झाली तेंव्हा जग एका क्लिकच्या अंतरावर इतके जवळ आले तेंव्हापासून जागतिक शांतता ही संकल्पना अस्तित्वात आली. शेकडो वर्षापूर्वी भगवान गौतमबुध्दांनाही हिच जागतिक शांतता अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नाना बर्यापैकी यशही आले होते. पण नंतरच्या काळात त्यांचे ते स्वप्न धुळीला मिळाले. आजही जर जागतिक शांतता प्रस्थापित करायची असेल तर जगाला भगवान बुध्दांच्याच विचारांची कास धरावी लागेल त्याला पर्याय नाही. पण आता जागतिक शांतता भंग करण्याला प्रामुख्याने करणीभूत ठरत आहे तो म्ह्णजे धर्मवाद ! जोपर्यत मनुष्य धर्माच्या बंधनातून बाहेर येत नाही तोपर्यत जागतिक शांतता निर्माण होण केवळ अशक्य आहे. जगभरात अशांतता निर्माण करून आतंकवाद मजविण्यास आजच्या घडीला इस्लामिक आतंकवाद आघाडीवर आहे त्यात आता भर म्ह्णून की काय हिंदू आतंकवादही डोकं वर काढताना दिसत आहे. इसाई आतंकवाद प्रत्यक्षात नसला तरी तो संपत्ती, बळ आणि सत्तेच्या जोरावर आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न करताना संपूर्ण जगभरात दिसतोच आहे तो ही जागतिक शांतता निर्माण करण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे.
जगभरातील जवळ - जवळ 195 देशातील जवळ्पास 121 देशात थोड्याफार फरकाने आतंकवादाने डोक वर काढलेले आहेच. हे पहाता जागतिक शांतता प्रस्थापित होणे हे जवळ - जवळ अशक्य आहे. आतंकवादात भारताचा सहावा क्रमांक आहे तर जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्या चीनचा 25 वा क्रमांक आहे. याचा अर्थ आजच्या घडीला चीन आतंकवादाशी लढण्यात भारतापेक्षा अधिक यशस्वी झाला आहे. आतंकवाद हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे कारण जर खर्या अर्थाने जागतिक शांतता प्रस्थापित करायची असेल तर भारतालाच महत्वाची भूमिका बजावावी लागेल. सध्या आशिया खंड हाच खर्या अर्थाने आतंकवादाचा अड्डा झालेला आहे . आणि त्याच्या केंद्रस्थानी काश्मिर आहे. जोपर्यत काश्मिर मधे शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यत जागतिक शांतता ही एक कवी कल्पनाचं म्ह्णावं लागेल. जागतिक शांतता तशी कधी खर्या अर्थाने प्रस्थापित झालेली नव्हतीच. आणि ती होण्याची शक्यता तशी धुसरच आहे. संपूर्ण जगात जेंव्हा शांतता असेल तेंव्हा कदाचित मानव प्राणी या जगातून नाहीसा झालेला असेल. आता जगातील जवळ पास दोन डजन देशांनी अणूबॉम्बची निर्मिती केलेली आहे. दररोज जगातील कोणत्याना कोणत्या देशात आतंकी हामले होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडत असतात. आपल्या देशातील जनताही आतंकवादाच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. भारत पाकिस्तानच्या सीमा भागात राहणारे लोक तर साक्षात मृत्यूच्या सावटाखालीच जीवन जगत असतात. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात भारत महत्वाची भुमिका बजावण्यात सक्षम असतानाही भारताला आपली शक्ती आतंकवादा विरोधात लढण्यात वाया घालवावी लागत आहे.
आज जगभरातील जवळ जवळ सर्वच राष्ट्रे अणूबॉम्ब् बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेतच त्यासोबत आपली सैनिकी ताकद वाढविण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. भारतही अधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे. वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि कधीही तिसर्या महायुध्दाची ठिणगी पेटेल या भितीने आप - आपली सैनिकी ताकद वाढविण्यास प्रयत्नशील आहेत. भारतही त्यात मागे नाही. आशिया खंडात याबाबतीत आता स्पर्धा सुरू झालेली आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. पूर्वी म्ह्टलं जायचं तिसरं महायुध्द तेलासाठी लढलं जाईल, आता म्हटलं जातय पाण्यासाठी होईल, कालांतराने म्ह्टल जाईल मुलभूत गरजांसाठी लढलं जाईल. जोपर्यत जगात तिसरे महायुध्द होण्याची शक्यता दृष्टीक्षेपात आहे तोपर्यत जगात शांतता नांदणे शक्य नाही. भारतातील काश्मिरवर संपूर्ण जगाचा डोळा आहे पण भारत पाकिस्तानसाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न झालेला आहे. भारत पाकिस्तान मधे झालेल्या युध्दांना काश्मिर हे एकमेव कारण आहे. अमेरीकेने आपल्या ताकदीच्या जोरावर इराकवर ताबा मिळविला खरा पण तेथे शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेली नाही. आजही तिथून सातत्याने आतंकी हमल्याच्या बातम्या येतच असतात.
जर जागतिक शांतता निर्माण करायची तर जगभरातील 121 देशातील आंतकवादाचा नायनाट करावा लागेल पण ते करणे सर्व देशांना मिळूनही शक्य होईल की नाही याबद्दल शंकाच आहे कारण काही देशच आतंकवादाचे अड्डे स्वतःहून झालेले आहेत. भारत आणि चीन मधील वाढती लोकसंख्या मुलभूत गरजा पूर्ण होण्याचा अभाव, काही अंशी आतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठरतोय त्यासोबत प्रत्येक देशातील धार्मिक राजकारणही त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक देशातील अल्पसंख्यांक स्वतःला त्या देशात असुरक्षित समजतात कधी कारण असताना तर कधी विनाकारणही ! त्यांची ही असुरक्षिततेची भावनाही जागतिक आंतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठरतेय ! कोणत्याही देशातील अंतर्गत आतंकवादही आता डोकं वर काढू लागलेला आहे. ज्याचा बंदोबस्त करणं तर अधिक अवघड असतं. अंतर्गत आतंकवादा समोर तर बलाढय देशांनाही मान तुकवावी लागते. या जागतिक आतंकवादामुळेच संपूर्ण जग पहाण्याच्या आपल्या स्वप्नाला कित्येकांना मुरड घालावी लागते.
जागतिक शांतता जर खरोखरच प्रस्थापित झाली तर मनुष्याच्या जगण्याला एक योग्य दिशा मिळेल. त्याचं जीवन अधिक सुसज्ज आणि आनंदी होण्याला मदत मिळाली असती. जागतिक शांतता ही फक्त अहिंसेच्या मार्गानेच अस्तित्वात येऊ शकते असं वर वर वाटत असल तरी बर्याचदा शस्त्रास्त्राच्या धाकाने शांतता प्रस्थापित झाल्याचे पहाण्यात येते. मनुष्याच्या मुलभूत गरजा पूर्ण न होणे आणि भौतिक साधनांचा हव्यास मनुष्यास स्वस्थ बसू देत नाही. त्यातुनही आतंकवाद जन्माला येतो. तो आतंकवाद काहींच्या स्वार्थाने फोफावतो आणि जगातील शांतता नष्ट करून अशांतता निर्माण करतो. जगात अशांतता निर्माण करण्यासाठी तरूणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. शक्तीशाली राष्ट्रे ताकदीच्या जोरावर काही काळ जगात शांतता निर्माण करू शकतात. जागतिक शांततेवर गेली कित्येक वर्षे चर्चा होत आहे. त्यातून एकीकडे अहिंसेचा मार्ग समोर येत असताना दुसरीकडे हिंसेचा मार्ग अवलंबिला जात आहे. जागतिक शांतता प्रत्यक्षात येण तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा जगातील प्रत्येक माणसांच्या हृद्यात अहिंसेचा उगम झालेला असेल.
जागतिक शांतता ही फक्त देशा-देशात युध्दे न होऊ देणे इतकी सिमित करावी लागेल आणि तस होतय म्ह्णजे जागतिक शांतता आहे असं म्ह्णायला हरकत नाही असं म्ह्णून समाधान मानावे लागेल. भौतिक साधनांच्या अधिक वापरामुळे, वाढत्या मानसिक त्रासामुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे माणूस अधिक उग्र होत चाललेला आहे. त्याची सहनशक्ती कमी होत चालली आहे. वाढते जागतिक तापमान पर्यावरणाचा र्हास अनैसर्गिक गोष्टींची निर्मिती ही आतंकवादास पोषख ठरत आहे. कोठेतरी वाचनात आलेली एक गोष्ट आहे सिकंदर जेंव्हा जग जिंकत भारतात आला तेंव्हा आपल्या सैन्यासह तो प्रचंड आवाज करत जात असताना एका झाडाखाली शांत बसलेला एक साधू क्षणभरही विचलीत झाला नाही. ते पाहून सिकंदर त्याच्या जवळ गेला आणि त्याला हलवून जागं केल आणि म्ह्णाला,’ माझ्या सैन्याच्या इतक्या प्रचंड आवाजानेही तू क्षणभरही व्यतीत झाला नाहीस, हे कसं शक्य आहे ? त्यावर त्या साधूने त्याला उलट प्रश्न केला ? तू कोण आहेस, कोठून आलास आणि आता कोठे चालला आहेस ? त्यावर तो म्ह्णाला,’मी सिकंदर, जग जिंकण्यासाठी निघालोय जग जिंकत जिंकत आता हा देश जिंकायला आलोय ! त्यावर तो साधू म्ह्णाला,’ मग संपूर्ण जग जिंकल्यावर काय करणार आहेस ? त्यावर तो म्ह्णाला,’ काही नाही ! एका झाडाखाली शांत बसेन. त्यावर तो साधू शांतपणे ह्सत त्याला म्ह्णाला,’ सध्या मी तेच करतोय !
सांगायच तात्पर्य इतकच प्रत्येक मनुष्याला त्याच्या मर्यादा कळत नाहीत, जीवनाचं रह्स्य उमजत नाही आणि जीवनाच्या अंतीम ध्येयापर्यत पोहचण्याची इच्छा त्याच्या अंर्तआत्म्यात निर्माण होत नाही तोपर्यत जागतिक शांतता ही स्वप्नासारखी होती, स्वप्नासारखी आहे आणि स्वप्नासारखीच रहाणार आहे.
निलेश दत्ताराम बामणे
(कवी,लेखक आणि संपादक- मासिक ‘साहित्य उपेक्षितांचे’)
पत्ता- वेदान्त कॉम्प्युटर
श्रम साफल्य सो., स्मिता इंटरप्रायझेसच्या शेजारी,
संतोष नगर बसस्टॉप जवळ, संतोष नगर,
गोरेगांव ( पूर्व ) मुंबई-400 065
मो. 9029338268, 8652065375
Email – nileshbamne10@gmail.com



Copyright © 2025 | Marathisrushti