(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री वेंकटेश मंगलाशासनम् – मराठी अर्थासह 

    स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय.

  • शक्तिपात योगमार्गातील अधिकारी प.पू. श्री नारायणकाका

    ११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली.

  • निरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा

    गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु…

  • निरंजन – भाग १७ – आस्तिकता

    आस्तिकता म्हणजे परमेश्वराच्या भव्यदिव्य अखंड अस्तित्वावर असलेला विश्वास आणि निस्वार्थ अशी भक्ती…. अक्कलकोट मधलीच एका गोविंद नावाच्या देव-दैव न मानणार्‍या नास्तिक इसमाची ही गोष्ट..

  • निरंजन – भाग १८ – निंदा

    एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्‍याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २०

    यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
    वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
    वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖

    प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
    एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
    ते म्हणतात,

    यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
    कालवाह - म्हणजे भगवान यमराजांच्या
    द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः - भीषण अशा प्रकारचा आवाज.
    तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
    वृषाधीशमारुह्य - वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
    देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
    वत्स - हे भक्ता !
    मा भीरिति - घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
    प्रीणय त्वम् - आपण मला प्रसन्न करा.
    ही तुलनाच मोठी रम्य आहे.

    आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
    माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
    आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २१

    यदा दारुणाभाषणा भीषणा मे
    भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः |
    तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं
    कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖

    जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त असतात, चार कामे जास्त असतात त्या दिवशी नेमकी सोडलेली गोष्ट म्हणजे देवपूजा असते.
    नेमकी हीच भूमिका घेऊन आचार्यश्री म्हणतात ज्यावेळी माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट माझ्यासमोर येईल त्यावेळी माझ्या उपासनेत खंड पडायला नको. तरच ती उपासना खरी .
    सगळ्यात मोठे संकट कोणते? तर मृत्यू. त्याचे चिंतन करताना आचार्य म्हणतात,

    यदा - ज्यावेळी
    दारुणाभाषणा - अत्यंत भयदायक भाषण म्हणजे आवाज करणारे,
    भीषणा - अत्यंत भयानक असणारे,
    कृतांतस्य दूताः - यमराजांचे दूत,
    मे- माझ्या,
    भविष्यंत्युपांते- भविष्यात जवळ येतील.
    तदा- यावेळी
    मन्मनस्- माझे मानस,
    त्वत्पदांभोरुहस्थं- जे तुझ्या चरण कमलावर लागलेले आहे.
    कथं निश्चलं स्यान्- निश्चल कसे राहील?
    नमस्तेऽस्तु शंभो - हे शंकरा! आपणास वंदन असो.

    असा मृत्यू जेव्हा समोर येतो त्यावेळी सामान्य अवस्थेत वरपांगी चालू असलेली साधना, उपासना नष्ट होते.
    त्यावेळी देखील मन स्थिर राहण्यासाठी ते भगवंताच्या चरणी कायमचे स्थिर व्हायला हवे. मगच ते अंतिम समयी स्थिर राहते. मग मोक्ष प्रदान करते. आचार्यश्री यासाठी प्रार्थना करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २२

    यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो
    लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः |
    तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते
    जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖

    मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे.
    अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली जातात. इतके सगळे करून काय उपयोग? असा परम अविवेकी प्रश्न, बौद्धिकतेचा आव आणून मांडला जातो.
    जिथे सामान्य व्यथेची ही अवस्था तेथे मृत्युसमयीच्या व्यथे बद्दल काय बोलावे? मात्र आचार्यश्री त्यावेळी कृपा करण्याबाबत प्रार्थना करीत आहेत.

    यदा - ज्यावेळी
    दुर्निवारव्यथ- दूर करण्यास असंभव असणाऱ्या, अंतिम पीडेने,
    अहं- मी, ग्रसित झालो असल्याने,
    शयानो- झोपलो असताना, खाटेला खिळलो असताना,
    लुठन्- लोळत असताना, वेदनेने तडफडत असताना,
    निश्वसन्- धाप लागली असताना,
    नि:सृताव्यक्तवाणिः - अव्यक्त वाणी काढत असतांना, माणसाच्या अंतिम समयी त्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात. पण बोलण्याची शक्ती संपली असल्याने, तोंडातून केवळ घर् घर् असा आवाज निघतो त्यावेळी अर्थात अंतिम घरघर लागली आहे अशा अवस्थेत,
    तदा- त्यावेळी जह्नुकन्या - राजा जह्नुची कन्या अर्थात देवी गंगा.
    जलालंकृतं - तिच्या जलाने अलंकृत झालेले,
    ते- आपले
    जटामंडलं- जटेचा विस्तार,
    मन्मनोमंदिरे स्यात् - माझ्या मंदिरात स्थिर असावा.

    अर्थात त्या वेळी मी त्याचेच ध्यान करीत असावे. आपलेच ध्यान करीत असावे.
    ती पीडा शरीराला असावी. मनात आपले चिंतन असावे. अशी अद्भुत प्रार्थना आचार्य करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २३

    यदा पुत्रमित्रादयो मत्सकाशे
    रुदंत्यस्य हा कीदृशीयं दशेति |
    तदा देवदेवेश गौरीश शंभो
    नमस्ते शिवायेत्यजस्रं ब्रवाणि ‖ २३ ‖

    भगवान श्रीशंकर महाकाल आहेत. कालकाल आहेत. त्यामुळे अंतिम समयी भगवान स्मशानवासी भोलेनाथाचे स्मरण भारतीय संस्कृतीचे एक कथन आहे.
    भगवान शंकर हे जीवाचे तारक आहेत. जीवाच्या उद्धारासाठी तारक मंत्र तेच प्रदान करतात. त्यामुळे अंतिम समयी त्यांना शरण जाण्याची भूमिका आचार्य मांडत आहेत.
    त्या अंतिम समयाचे वर्णन करताना ते म्हणतात,

    यदा- ज्यावेळी
    पुत्रमित्रादयो- पुत्र मित्र इत्यादी माझे नातेवाईक,
    मत्सकाशे- माझ्याजवळ येऊन,
    रुदंति- रडत असतील,
    अस्य हा कीदृशीयं दशेति - अरे अरे काय ही याची दशा? असे म्हणत माझ्या मरणासन्न अवस्थेत चे वर्णन करीत असतील,
    अर्थात माझ्या त्या जराजर्जर अवस्थेला पाहून, त्या बाह्य अवस्थेलाच माझी वास्तव अवस्था समजत ज्यावेळी ते शोक करीत असतील,
    तदा - त्यावेळी
    देवदेवेश- हे देवाधिदेव !
    गौरीश शंभो- भगवान गौरीनाथा शंकरा,
    नमस्ते शिवाय- नमः शिवाय , हा महामंत्र
    इत्यजस्रं ब्रवाणि - मी अखंड जपत असावा.

    आचार्यश्री म्हणत आहेत की अंतिम समयी देहाची परिस्थिती ही गलितगात्रच असणार आहे. पण तशी "परिस्थिती" असताना देखील माझी "मनस्थिती" वाईट असू नये.
    जमलेले नातेवाईक बाहेर माझ्याबद्दल काहीही म्हणोत , मी आत मध्ये नमःशिवाय हेच म्हणत असावे. अंतरंगी आपल्या स्मरणाने शांती असावी. चिंतनात आपले नामस्मरण असावे.
    बाहेरून पाहणाऱ्या नातेवाईकांना माझी अवस्था कशी ही दिसत असली तरी अंतरंगामध्ये मी चा नातेवाईकांशी नाही तर आपल्या चरणांशी गुंतलेला असो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २४

    यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मान्
    अयं श्वास एवेति वाचो भवेयुः |
    तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं
    पुरारे भवंतं स्फुटं भावयेयम् ‖ २४ ‖

    अंतिम तारक असणाऱ्या भगवान शंकरांच्या त्याच स्वरूपाला वेगवेगळ्या अंगाने आळवतांना आणि आपल्यासमोर स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी माणसाच्या अंतिम समयीच्या अवस्थेचे विविध पैलू आधारभूत मानले आहेत.
    आचार्यश्री म्हणतात,

    यदा पश्यतां माम्- ज्यावेळी मला पाहणारे, अर्थात त्या अंतिम समयी माझे जे नातेवाईक माझ्या आजूबाजूला जमलेले असतील, माझ्या कडे पहात असतील,
    असौ वेत्ति नास्मान्- हा आपल्याला ओळखत नाही.
    अयं श्वास एवम्- बस हाच शेवटचा श्वास,
    इति वाचो भवेयुः - असे बोलत असतील.
    अर्थात एखाद्या मरणासन्न व्यक्तीच्या अंतिम समयी जेव्हा त्याचे नातेवाईक त्याच्या जवळ उभे राहतात त्या वेळी तो त्यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही.ही जवळपास अंतिम अवस्था असते. यावेळी बाकीचे लोक फक्त त्याचे श्वास मोजत असतात. शेवटचे काही श्वास राहिले असे म्हणत असतात.
    तदा - त्यावेळी
    भूतिभूषं - भूती म्हणजे विभूती अर्थात भस्माने विभूषित असणारे,
    भुजंगावनद्धं- सर्प वेष्टित अशी
    पुरारे - हे त्रिपुरासुराच्या विनाशका !
    भवंतं - आपले
    स्फुटं - स्फुट या शब्दाचे संस्कृत भाषेत मुक्त, व्यापक, स्वच्छ, अस्तित्व, क्षमतायुक्त असे वेगवेगळे अर्थ आहेत. तसेच दृश्य, संवेद्य असाही अर्थ आहे. लक्षार्थाने स्फुट म्हणजे मूर्ती.
    आपले सगुण-साकार स्वरूप. स्फुट चे वर दिलेले सर्व अर्थ भगवंताच्या मूर्तीला, सगुणरूपाला लागू पडतात.
    भावयेयम् - मी त्या मूर्तीचे ध्यान करो.

    घरदार, नातेवाईक इतकेच काय तर श्वास देखील मागे पडून मला आपल्या चरणी स्थान मिळावे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड