(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ९

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १०

    त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति
    प्रसीद स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् |
    न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि - स्ततो
    मे दयालो सदा सन्निधेहि ‖ १० ‖

    भक्ताच्या आणि भगवंताच्या आगळ्यावेगळ्या नात्याचे विवेचन करताना आचार्यश्री म्हणतात,
    त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति - माझ्यासारख्या प्रपन्न अर्थात संसारातील दुःखांनी त्रस्तझाल्यानंतर शरण येणाऱ्यांसाठी सुख,शांती, समाधानाच्या प्राप्तीचे आपल्यासारखे अन्य स्थान नाही.
    प्रसीद - त्यामुळे आपल्याला शरण आलेल्या माझ्यावर प्रसन्न व्हा.
    स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् - मी आपले स्मरण केले असल्याने माझे दैन्य दूर करा. माझ्या दुःखाचे शमन करा.
    येथे आचार्य मधील भक्त भगवंतालाच वेगळ्या अर्थाने वेठीला धरतो. तो भगवंताला म्हणतो तुला हे दुःख दूर करणे भाग आहे. कारण त्यात माझाच नाही तुझा देशील फायदा आहे.
    न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि:- जर तू असे केले नाही तर तुझ्या 'भक्तवात्सल्य' भावाची हानी होईल. लोक तुला यापुढे भक्तवत्सल म्हणणारच नाहीत. त्यामुळे तुझ्या त्या भक्तवत्सल विशेषणाचा आब राखण्यासाठी का होईना, माझे रक्षण कर कारण मी तुझी भक्ती करीत आहे. त्यामुळे भक्ताचे संरक्षण करणे, त्याचे दुःख निवारण करणे हे जणू काही , हे भगवंता तुझे कर्तव्यच आहे.
    ततो मे दयालो सदा सन्निधेहि - त्यामुळे हे दयासिंधू मला कायम आपल्याजवळ ठेव.
    कारण हे भगवंता तुझ्या चरण कमला पाशी केवळ आणि केवळ आनंद आहे. तिथे माझे दुःख आपोआपच दूर होईल. त्यामुळे मला संनिध म्हणजे चरणकमलां जवळ स्थान दे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ११

    अयं दानकालस्त्वहं दानपात्रं
    भवानेव दाता त्वदन्यं न याचे |
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं
    कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖

    भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत.
    ते म्हणतात,
    अयं दानकाल:- हा दानाचा काळ आहे. कारण आत्ता मी आपल्यासमोर याचक स्वरूपात उभा आहे. मला आत्ता आपल्या कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणी मागणारा असेल, आणि त्याला ज्या वेळी आवश्यकता असेल तीच दानाची खरी वेळ. या हिशोबात ही दानाची वेळ आहे.
    त्वहं दानपात्रं- मी दानास पात्र आहे. दान नेहमी पात्र व्यक्तीलाच द्यावे. ज्याच्याजवळ एखादी गोष्ट नसते तो ती गोष्ट प्राप्त करण्यास पात्र आहे. हे भगवंता माझ्यावर आपली कृपा झालेली नाही. त्यामुळे मी कृपेला पात्र आहे.
    भवानेव दाता- आपण दाता आहात. आपल्याजवळ देण्याची क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दातृत्वाची भाव अर्थात देण्याची इच्छा देखील आहे.
    त्वदन्यं न याचे - आपल्या शिवाय अन्य कोणालाही मी मागत नाही.
    आता इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नंतर आपण मला कृपेचे दान देणार नाही तर कुणाला देणार?
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं- मला आपली स्थिर भक्तिप्रदान करा. भगवंताच्या चरणी नेमके काय मागायचे? हेच आचार्यश्री येथे सांगत आहेत. त्या चरणाशी व्यवहारातील सामान्य गोष्टी नव्हे तर भगवंताच्या भक्तीची मागणी हीच एकमेव योग्य मागणी आहे.
    कृपाशील - हे कृपाशील अर्थात कृपा हा ज्यांचा स्वभाव आहे अशा भगवंता.
    शंभो - हे कल्याणकारका !
    आपण माझ्यावर अशी कृपा केली की,
    कृतार्थोऽस्मि तस्मात- त्यामुळे मी कृतार्थ होईल. मग माझ्या आयुष्यात करण्यासारखे काहीही उरणार नाही. माझे जीवन सफल होईल.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

    पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
    कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
    द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
    त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖

    कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
    ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
    पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
    तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
    त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
    अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
    कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
    मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
    द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
    सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
    त्वदंगीकृताः
    शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १३

    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश |
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖

    काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो.
    वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते.
    अशीच काहीशी रचना या श्लोकात आचार्यश्री करतात. ते म्हणतात,
    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश - हे भगवान गिरिजापती ! मी कधीही कोणाचा लेशमात्र देखील द्रोह करू शकत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसे प्रसन्न व्हाल? हेच मला समजत नाही.
    वास्तविक कुणाचाही द्रोह न करणाऱ्यावरच भगवान प्रसन्न होणार. मात्र येथे आचार्यश्री उलट बोलत आहेत. इतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात,
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा - तुम्ही प्रसन्न होता ते पण कोणावर? तर जे पत्नी कन्या किंवा पित्याशी द्रोह करतात.
    पत्नीशी बेईमानी करणारा रावण, कन्येचा अपमान करणारा दक्ष आणि वडिलांची इच्छा नाकारून तप करणारी पार्वती, यांना भगवान प्रसन्न झाले. अशा विविध कथा पुराणांमध्ये आपणास वाचावयास मिळतात.त्या पौराणिक कथांचा आचार्य संदर्भ घेतात. त्यांच्यावर भगवान शंकरांनी कृपा केली होती.
    तुम्ही अशा द्रोहींना प्रसन्न होता. यात भगवंताची वरपांगी निंदा वाटते.
    मात्र त्यांना म्हणायचे आहे की अशा सगळ्यांवर, अशा अशास्त्रीय कृती करणाऱ्यांवर देखील आपण कृपा करता ,मग माझ्यासारख्या स्वच्छ व्यक्तीचा अव्हेर कसा कराल?
    यांच्या उद्धारात निंदा नाही तर त्यांचाही उद्धार करण्याइतके आपण उदार आहात अशी स्तुतीच आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १४

    स्तुतिं - हे भगवान शंकरा आपली स्तुती अर्थात स्तवन कसे करावे?
    ध्यानं- आपल्या दिव्य स्वरूपाचे ध्यान कसे करावे?
    अर्चां - आपले अर्चन अर्थात पूजा इ. कसे करावे?
    यथावद्विधातुं - याचे नेमके शास्त्रीय विधान काय आहे?
    भजन् अप्यजानन्- हे न जाणता देखील आपले भजन करीत,
    महेशावलंबे - हे भगवान महेशा !मी आपला आश्रय घेत आहे.
    अर्थात काहीही समजत नसूनदेखील मी आपल्या चरणी शरण आलो आहे. कारण या चरणांनी अनेकांना वाचवल्याचे मी वाचले आहे. जसे,
    त्रसंतं सुतं त्रातुमग्रे
    मृकंडो:- अल्पायुत्वाने त्रस्त झालेल्या, मृकंड ऋषींचे सुत ,महर्षी मार्कंडेय यांचे संरक्षण करण्यासाठी अग्रेसर झालेल्या,
    यमप्राणनिर्वापणं त्वत्पदाब्जम् - यमराजां पासून प्राण वाचवणार्‍या आपल्या चरणकमलांना, मी शरण येत आहे.
    मृकंड ऋषींना संतती नसल्यामुळे त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. तुझा पुत्र, अल्पायु पण ज्ञानी किंवा दीर्घायू पण मूर्ख होईल असे दोन पर्याय श्रीशंकरांनी त्यांच्यासमोर ठेवले. ऋषींनी पहिला पर्याय निवडला. त्या आशीर्वादाने झालेल्या मार्कंडेय ऋषींनी सप्तर्षी आणि श्रीब्रह्मदेवांच्या कृपाप्रसादाने महामृत्युंजय मंत्र प्राप्त केला. पुढे त्यांनी केलेल्या महामृत्युंजय मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांच्या मृत्यू समयी , प्रसन्न झालेल्या भगवान श्रीशंकरांनी, नियतीच्या नियमाप्रमाणे मार्कंडेय ऋषींचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमराजांपासून आपल्या या अल्पायुषी भक्ताचे प्राण वाचवून त्यांना चिरंजीव पद दिले. अशी कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते. या कथेचा संदर्भ घेत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या शरणागतीची कारण मीमांसा करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १५

    शिरो दृष्टि हृद्रोग शूल प्रमेहज्वरार्शो जरायक्ष्महिक्काविषार्तान् |
    त्वमाद्यो भिषग्भेषजं भस्म शंभो
    त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय ‖ १५ ‖

    जगद्गुरूंच्या अफाट संदर्भ विश्वाची चुणूक दाखवणारा हा श्लोक. आरंभीच्या दोन चरणात त्यांनी विविध रोगांची सूची सादर केली आहे.
    शिरो - डोक्याशी संबंधित रोग,
    दृष्टि- दृष्टीशी संबंधित रोग,
    हृद्रोग- हृदयाशी संबंधित रोग,
    शूल - आयुर्वेदात वर्णिलेले वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, आमज, वातश्लैष्मिक, पित्तश्लैष्मिक तथा वातपैत्तिक हे आठ प्रकारचे शूल म्हणजे आतून काटा टोचल्याप्रमाणे वेदना देणारे रोग,
    प्रमेह- यौवनांगाशी संबंधित रोग, प्रदर रोग,
    ज्वर- आयुर्वेदात वर्णिलेले वातजन्य, पित्तजन्य किंवा रसगत, रक्तगत, मांसगत, मज्जागत इ. सर्व प्रकारचे ताप,
    अर्श- मूळव्याध, गुदद्वाराशी संबंधित रोग,
    जरा- म्हातारपण, त्यामुळे येणारे रोग,
    यक्ष्म- फुफ्फुसे तथा श्वास यंत्रणेत होणारे क्षयरोग,
    हिक्का- पोटात समान आणि कंठात उदान वायु च्या प्रकोपाने निर्माण होणारे उचकी, ठसका इत्यादी रोग,
    विषार्तान् - विषाच्या परिणामाने होणारे रोग,
    अशा प्रकारच्या अनेक रोगाने माणूस ग्रस्त होतो. अशा सर्व रोगांनी त्रस्त असणाऱ्या जीवांसाठी,
    त्वमाद्यो भिषग्- आपणच आद्य म्हणजे श्रेष्ठ भिषग् म्हणजे वैद्य आहात.
    भेषजं भस्म शंभो- हे शंभो ! या सर्व रोगांवर आपल्या दृष्टीने भस्म हेच औषध आहे.
    अर्थात आपल्या चरणकमलांवरील भस्मानेच हे सर्व रोग दूर होतात.
    त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय - हे भगवंता माझे शरीर हलके करण्यासाठी मला या रोगां मधून दूर कर.
    रोग झाले की शरीर जड होते. त्यामुळे शरीर हलके कर अर्थात मला निरोगी कर. तसेच शेवटी या जड शरीरापासून मोकळे करून मुक्ती प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १६

    दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये
    विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् |
    भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो
    ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖

    भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान श्री शंकरांच्या समोर सांगत आहेत. ते म्हणतात,
    दरिद्रोऽस्मि- मी दरिद्री आहे. आपल्या दये शिवाय माझ्याजवळ काहीही नाही.
    अभद्रोऽस्मि- मी अभद्र आहे. अनेक अमंगल विचारांनी माझे मन युक्त आहे.
    भग्नोऽस्मि - मी भग्न आहे. आयुष्यातील इतका सगळा चांगला काळ सत्कर्मा मध्ये न लावल्याने, हाती फार काही उरले नाही म्हणून आतून दुभंगलो आहे.
    दूये- मी दु:खी आहे. हे भगवंता तू मला दिव्य मानवी जीवन दिले. पण मी ते कृतार्थ केले नाही याचे दुःख आहे.
    विषण्णोऽस्मि- मी विषण्ण आहे. ही संधी गमावल्याची विषण्णता आहे.
    सन्नोऽस्मि- मी सुन्न झालो आहे. काय करावे ते मला कळत नाही आहे.
    खिन्नोऽस्मि चाहम् - मी खिन्न आलो आहे.
    आता माझा उद्धार कसा होईल? या विचाराने माझी बुद्धी कुंठित झाली आहे.
    आपल्या सगळ्यांच्या वतीने आपली अवस्था मांडतांना आचार्यश्री ही भूमिका मांडत आहेत.
    अर्थात असे असले तरी,
    भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो- हे भगवान हो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात.
    ममाधिं न वेत्सि- मग माझे हे अगतिकतेचे दुःख आपल्याला कसे कळणार नाही?
    प्रभो रक्ष मां त्वम् - हे प्रभो! आपण माझे रक्षण करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १७

    त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र
    क्षणं क्ष्मा च लक्ष्मीः स्वयं तं वृणाते |
    किरीटस्फुरच्चामरच्छत्रमालाकलाचीगजक्षौमभूषाविशेषैः ‖ १७ ‖
    ज्यावेळी एखाद्या शरणागत भक्ताला भगवंताची कृपा होते त्यावेळी त्याला कोणकोणते अद्वितीय लाभ होतात ते सांगतांना जगद्गुरु श्रीशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र- हे त्र्यक्ष अर्थात तीन नेत्र असणाऱ्या भगवान शिवशंकरा ! आपल्या नेत्राचा कटाक्ष जेथे पडतो. अर्थात ज्या कोणावर ही कृपादृष्टी प्राप्त होते. त्याला,
    क्षणं - क्षणात म्हणजे तत्काल. अल्पावधीतच,
    क्ष्मा च - पृथ्वी अर्थात पृथ्वीचे साम्राज्य आणि
    लक्ष्मीः - अर्थात सर्व प्रकारचे वैभव.
    स्वयं तं वृणाते - स्वत:च वरते. अर्थात या सर्व गोष्टी त्याच्याकडे आपोआपच चालत येतात. कोणत्याही प्रयासाशिवाय त्याला प्राप्त होतात.
    त्या देखील कशा? तर-
    किरीट- मुकुट अर्थात शिरोभूषण,
    स्फुरच्चामर- लखलखीत रत्नजडित सोन्याच्या दांडीने युक्त चवऱ्या, त्यांनी वारा घालणाऱ्या दासी, अर्थात अनेक प्रकारचे सेवेकरी,
    छत्र- मस्तकावरील छत्र. सर्व प्रकारच्या तापापासून, त्रासापासून मुक्ती,
    माला- मोत्याच्या माळा, सौंदर्य आणि शीतलता,
    कलाची- बाहुभूषणे.
    गजक्षौमभूषा- आभूषणांनी सुसज्जित असणारे , अंबारीयुक्त असे हत्ती.
    विशेषैः - या सगळ्या विशेष आभूषणांसह.
    अर्थात राजवैभवाशी संबंधित सगळ्याच लहान सहान गोष्टी देखील त्याला सहज प्राप्त होतात. परिपूर्ण वैभवाने युक्त असे स्वानंद साम्राज्य त्याला प्राप्त होते. आतला आनंद प्राप्त होतो.
    बाहेरून आता त्याला काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १८

    भवान्यै भवायापि मात्रे च पित्रे
    मृडान्यै मृडायाप्यघघ्न्यै मखघ्ने |
    शिवांग्यै शिवांगाय कुर्मः शिवायै
    शिवायांबिकायै नमस्त्र्यंबकाय ‖ १८ ‖

    शिवशक्ती हे अभिन्न ऐक्य. अर्धनारीनटेश्वर स्वरूपात त्यांचे एकरूपत्व वंदिले जाते. भवं भवानीसहितं नमामि ! अशा स्वरूपात आपण या युगुलाला वंदन करतो. प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री देखील असे युग्मवंदन करीत आहेत.
    हे वंदन करीत असताना देखील आचार्यश्री दोघांच्याही बाबतीत समान स्वरूपाची विशेषणे वापरत आहेत. जणूकाही त्यातूनही ते या दोघांच्या एकरूपत्वाचेच निर्देशन करीत आहेत.
    भवान्यै भवायापि - आई भवानीला आणि भव असणाऱ्या आपणाला,
    मात्रे च पित्रे - मातेला आणि पितृ स्वरूप आपल्याला,
    मृडान्यै मृडायापि- मृडाणीला आणि मृड असणाऱ्या आपणास, भगवान शंकरांना मृडअसे म्हणतात. या संस्कृत धातूचा अर्थ संतुष्ट करणे असा आहे. संपूर्ण विश्वाला संतुष्ट करणारी भगवान शंकर मृड तर देवी पार्वती मृडाणी रूपात वंदिली जाते.
    अघघ्न्यै मखघ्ने - अघ म्हणजे पापाचा, कलंकाचा विनाश करणाऱ्या आईला आणि मख म्हणजे यज्ञाचा विनाश करणार्‍या आपल्याला, भगवान शंकरांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विनाश केला होता. त्या पौराणिक कथेचा येथे संदर्भ आहे.
    ते दक्षयज्ञाचा विनाश करणारे आहेत असे वर्णन केल्यामुळे समानता दाखवण्यासाठी आई जगदंबेच्या पाप विनाशक रूपाला आचार्य वंदन करतात.
    शिवांग्यै शिवांगाय- जिचे अंग,शरीर म्हणजे मूर्ती अतीव शिव म्हणजे पवित्र आहे अशा शिवांगी आणि शिवांग अशा आपल्याला,
    शिवायै
    शिवाय- शिव म्हणजे मंगल,पवित्र असणाऱ्या,
    अंबिकायै त्र्यंबकाय - अंबिका जगज्जननी ला आणि त्र्यंबक अशा आपणाला हात,
    नमस्कुर्म:- आम्ही वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड