(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २५

    यदा यातनादेहसंदेहवाही
    भवेदात्मदेहे न मोहो महान्मे |
    तदा काशशीतांशुसंकाशमीश
    स्मरारे वपुस्ते नमस्ते स्मराणि ‖ २५ ‖

    मानवाच्या अंतिम अवस्थेचे विविधांगी वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज त्यातील एकेका पैलूला आपल्यासमोर ठेवत आहेत.
    येथे देहासक्ती बद्दल बोलताना आचार्य श्री म्हणतात,

    यदा - ज्यावेळी, अर्थात जेव्हा माझा अंत समय येऊन पोहोचलेला असेल त्यावेळी,
    यातनादेह- आचार्यश्रींनी योजिलेला हा शब्द किती अद्वितीय आहे.
    ते आपल्या शरीराला यातना देह म्हणत आहेत. अर्थात या देहात जीवाला असंख्य यातनाच भोगाव्या लागतात.
    ऊन, वारा, पाऊस इत्यादी बाह्य आणि कामक्रोधादी आंतरिक यातनांनी हा देह सतत ग्रस्त आहे.
    संदेहवाही - संदेह धारण करील. म्हणजे असा हा देह आता टिकेल की नाही? याचा संदेह स्वतः त्या जीवाला आणि जमलेल्या सगळ्यांना वाटेल त्यावेळी.
    यातनादेह हा शब्द शास्त्रात आणखी एका अर्थाने वापरतात. यमलोकांमध्ये किंवा स्वर्गामध्ये गेल्यानंतर केलेल्या पाप-पुण्याच्या फळांना भोगण्यासाठी जे देह प्राप्त होतात. त्यांना भोगदेह म्हणतात.
    पापाचा विचार आधी येत असल्याने नरकातील देहाचा विचार केला. त्याला यातना देहच म्हणतात.
    तो देह मिळण्याची संभावना तयार होईल अर्थात मृत्यूची वेळ येईल तेव्हा,
    भवेदात्मदेहे न मोहो महान्मे - मला माझ्या या देहाच्या बाबतीत अत्यंत बळकट आसणारा मोह होऊ नये. अर्थात मी यामध्ये अडकू नये.
    तदा - त्यावेळी,
    काश - काश नावाचे पुष्प,
    शीतांशु - ज्याची अंशु म्हणजे किरणे शीत आहेत असा, चंद्र.
    संकाशम्- समान पांढरेशुभ्र असणारे,
    ईश - हे भगवान शंकरा !
    स्मरारे - हे कामदेव विनाशका,
    वपुस्ते नमस्ते स्मराणि- हे भगवंता मी त्या आपल्या चंद्रधवल शरीराचे स्मरण करो. आपल्याला वंदन असो

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २६

    यदापारमच्छायमस्थानमद्भि-
    र्जनैर्वा विहीनं गमिष्यामि मार्गम् |
    तदा तं निरुंधंकृतांतस्य मार्गं
    महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ ‖ २६ ‖

    यमलोकात गेल्यावर प्राप्त होणाऱ्या यातना देहाचा विचार आल्यानंतर स्वाभाविकच आचार्यश्री त्या यमलोकाचा प्रवासाचा विचार आपल्या समोर मांडतात.
    किती कष्टदायक आहे हा मार्ग? आचार्य श्री म्हणतात,

    यदा - ज्यावेळी, त्या यमराजाचे दूत माझे प्राण हरण करून नेतील,
    अपारम् - प्रचंड लांब असणाऱ्या, त्यामुळे चालून-चालून कष्ट देणाऱ्या,
    अच्छायम् - मार्गात सावली देणारे वृक्ष इत्यादी नसल्याने छाया विरहित. उन्हाच्या त्रासाने अधिकच क्लेशदायी होणाऱ्या,
    अस्थानम् - मध्यंतरी विश्राम करण्यासाठी कोणतेच आराम स्थान नसलेल्या,
    अद्भिर्जनैर्वा विहीनं - पाणी किंवा माणसांनी विहीन असणाऱ्या, अर्थात शारीरिक तृप्तता मिळावी यासाठी आवश्यक असणारे जल किंवा मानसिक शांती मिळावी यासाठी आवश्यक असणारे जन यापैकी कोणतेही साधन नसणाऱ्या,
    गमिष्यामि मार्गम् - मार्गाने मी जेव्हा जाईल.
    तदा - त्यावेळी
    तं निरुंधं
    कृतांतस्य मार्गं - त्या कृतांत म्हणजे यमराजाच्या मार्गाला बाजूला सारून,
    महादेव - हे भगवान महादेवा !
    मह्यं मनोज्ञं प्रयच्छ - मला मनोहारी असा, आपल्या परम वैभवशाली आणि आनंददायी कैलास लोकाचा मार्ग प्रदान करावा.

    शास्त्रात एका बाजूला वर वर्णन केल्याप्रमाणे कोणतेही सुख साधन नसलेले, उलट सर्व दुःखदायक गोष्टी असणारे यम नगरीचे वर्णन आहे. तर दुसरीकडे सकल सौख्यदायक कैलासाचे वर्णन. आचार्य यमलोकाचा मार्ग सोडून त्या मार्गावर नेण्याची प्रार्थना करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २७

    यदा रौरवादि स्मरन्नेव भीत्या
    व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् |
    तदा मामहो नाथ कस्तारयिष्यत्यनाथं पराधीनमर्धेंदुमौले ‖ २७ ‖

    सर्वसामान्य संसारी जीवांची अंतिम समयी जी भयावह अवस्था निर्माण होते त्याचे आचार्यश्री आपल्यासाठी वर्णन करीत आहेत. त्यावेळी आपला उद्धार व्हावा यासाठी खरे तर आपल्या करिता प्रार्थना करीत आहे. आपल्याकरिता यासाठी म्हटले की ही आचार्यश्रींनी अवस्था नाही. ते आपल्या अवस्थेची कल्पना करीत म्हणत आहेत,

    यदा - ज्यावेळी
    रौरवादि - रौवर इत्यादी ८४ प्रकारच्या नरकांचे, शास्त्रात वर्णन केलेल्या तेथे प्राप्त होणाऱ्या भीषण अशा यातनांच्या
    स्मरन्नेव - स्मरणानेच
    भीत्या - घाबरून जाऊन,
    व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् - हे भगवान महादेवा मी येथे घोर अशा मोहामध्ये जाईल. अर्थात बेशुद्ध पडेल.
    या वर्णनात अत्र म्हणजे येथेच हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तिथे गेल्यावर तर भयानक यातना आहेतच पण येथे त्यांचे केवळ स्मरण देखील शेवटी जीवाचा थरकाप करते. त्यामुळे शेवटी तो बेशुद्ध पडतो.
    सामान्यतः मृत्यूच्या पूर्वी जीव बेशुद्ध पडतो. अनेकांना थरकाप सुटतो. घाम फुटतो. मलमूत्र त्याग देखील होतो. त्याचे कारण हेच असते. आयुष्यभर केलेल्या पापांचे स्मरण होऊन आता त्यामुळे मला कशा नरकयातना होणार? या कल्पनेनेच तो जीव कासावीस होतो. त्याचे वर्णन करून आचार्य म्हणतात,
    तदा - त्यावेळी
    मामहो नाथ - हे माझ्या स्वामी मला, कस्तारयिष्यति - कोण तारणार? आपल्या शिवाय माझे आहे तरी कोण?
    मी कसा आहे तर,
    अनाथं - मला आपल्याशिवाय कोणीही नाही.
    पराधीनम् - मी पूर्णतः पराधीन, हतबल आहे.
    अर्धेंदुमौले - हे मस्तकावर चंद्रकोर धारण करणाऱ्या भगवंता, याप्रसंगी माझे रक्षण करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २८

    यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः
    कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् |
    तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं
    न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖

    याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना.
    "अंत भला तो सब भला" ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक.
    आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत.
    ते म्हणतात,

    श्वेतपत्रायत - हे श्वेत, विशाल छत्रधारी भगवान शंकरा !
    श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे छत्र हे सम्राट् पदाचे लक्षण. केवळ सम्राटाने पांढरे छत्र वापरण्याचा राजकीय शिष्टाचार असतो.
    देवांचे देव असणाऱ्या महादेवांना सम्राट् स्वरूपात आचार्य श्वेतपत्रायत म्हणत आहेत. त्यांना प्रार्थना आहे की,
    यदा- ज्यावेळी, अंतिम समयी.
    अलंघ्यशक्तेः- ज्यांच्या शक्तीला म्हणजे सत्तेला कोणीही ओलांडू शकत नाही अशा,
    कृतांताद्भयं - कृतांत अर्थात यमराजाचे भय, मला सतावेल, भक्तिवात्सल्यभावात् - आपल्या भक्तवत्सल स्वभावाने, माझ्यावर असणाऱ्या आपल्या सहजसुलभ कृपेने,
    तदा पाहि मां - त्यावेळी आपण माझे रक्षण करा.
    पार्वतीवल्लभ- हे पार्वती वल्लभा, पार्वती हे स्थिरतेचे प्रतीक आहे. पर्वत अविचल असतो. त्या पर्वताची पुत्री ती पार्वती. तशीच शांत, स्थिर ती पार्वती. तशीच हवी श्रद्धा.
    तशी दृढ, अटल श्रद्धा म्हणजे पार्वती. अशा पार्वतीचे वल्लभ अर्थात अशा श्रद्धेने प्रसन्न होणारे,
    अन्यं
    न पश्यामि पातारमेतादृशं मे - मला आपल्या समान माझा अन्य कोणीही रक्षण कर्ता दिसत नाही.

    आपणच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझे अंतकाळीच्या यमपीडेपासून रक्षण करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २९

    इदानीमिदानीं मृतिर्मे भवित्री-
    त्यहो संततं चिंतया पीडितोऽस्मि |
    कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा
    नमस्ते गतीनां गते नीलकंठ ‖ २९ ‖

    या विश्वाचे स्वरूप अनिश्चित आहे. येथे कोणत्याच गोष्टीचे निश्चित पूर्वानुमान करता येत नाही.
    मात्र या अनिश्चित जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे हे जग कधीतरी सोडावे लागणार आहे. मृत्यू एवढे एकच अटळ सत्य आहे.
    त्यात आनंदाची गोष्ट एकच आहे की तो नेमका केव्हा येणार? हे आपल्याला निश्चित माहीत नाही. पण त्या आनंदाला एक वेगळी चिंतेची किनार आहे की तो कधी येणार हे माहिती नसल्याने, तो केव्हाही येऊ शकतो याची भीती जीवाला अखंड त्रास देते.
    याच वास्तवाला आधार करीत आचार्य श्री म्हणतात,

    इदानीमिदानीं - आत्ता अगदी आत्ताच,
    मृतिर्मे भवित्रीति - माझा मृत्यू होऊ शकतो.
    अहो संततं चिंतया पीडितोऽस्मि - या चिंतेने मी सतत पीडित आहे.
    अर्थात कोणत्याही क्षणी माझा मृत्यू येऊ शकतो हा विचार सतत मनात येत असल्याने माझ्याजवळ असलेल्या, मी आज व अत्यंत परिश्रमाने मिळवलेल्या, सर्व सुख साधनांचे देखील पूर्ण सुख मला अनुभवता येत नाही.
    कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा - माझा मृत्यू कसा होणार नाही? याची भीती मला सतत असते. अर्थात तो होऊ नये असे मला वाटते. मात्र त्याच वेळी तो टाळणे मला शक्य नाही हे समजत असल्याने भीती वाटते.
    नमस्ते गतीनां गते नीलकंठ - हे भगवान नीलकंठा आपल्याला नमस्कार असो. अशा वेळी आपणच माझ्या गतीची गती अर्थात अंतिम अवस्था आहात.

    येथे भगवंताला नीलकंठ हे विशेषण वापरणे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या काळजीच्या पलीकडेची गोष्ट भगवान करतात ते म्हणजे विषप्राशन.
    मात्र विष पिऊन देखील मृत्यूची भीती त्यांच्या हृदयात जागृत होत नाही. कारण ते विष त्यांनी कंठातच अडवले आहे.
    विषप्राशन करून देखील अमर असणाऱ्या भगवंताला त्या मृत्यूचा भीतीपासून वाचवण्याची ही प्रार्थना आहे. तोच वाचवू शकतो कारण तो स्वतः वाचला आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३०

    अमर्यादमेवाहमाबालवृद्धं
    हरंतं कृतांतं समीक्ष्यास्मि भीतः |
    मृतौ तावकांघ्र्यब्जदिव्यप्रसादाद्भवानीपते निर्भयोऽहं भवानि ‖ ३० ‖

    महाभारतामध्ये आलेल्या विश्व प्रसिद्ध अशा यक्ष धर्मराज संवादात यक्षाने एक प्रश्न विचारला आहे की या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? त्यावर उत्तर देताना श्री धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की जगामध्ये असंख्य लोकांना रोज मरतांना पाहून देखील पाहणारा स्वतःला अमर समजतो यापेक्षा मोठे आश्चर्य नाही.
    श्री धर्मराजांचे उत्तर अत्यंत यथार्थ आहे. पण हा झाला अविवेकी माणसाचा विषय.
    याउलट विवेकशील व्यक्ती नेमक्या याच गोष्टीने व्यथित होतो.
    त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

    अमर्यादम् - कोणत्याच प्रकारची मर्यादा अर्थात बंधन नसलेले,
    एवाहम् - अशा त्या यमराजांना मी
    आबालवृद्धं- बालकापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना
    हरंतं कृतांतं - धरून नेणाऱ्या यमराजांना, समीक्ष्यास्मि भीतः - पाहून मी घाबरून जातो.
    मृतौ - या मृत्यूच्या विषयात, तावकांघ्र्यब्ज- आपल्या चरणकमलांच्या,
    दिव्यप्रसादाद्- दिव्य प्रसादामुळे
    भवानीपते - ही भवानी पती भगवान शंकरा !
    निर्भयोऽहं भवानि - मी निर्भय होवो.

    भगवान यमराज खऱ्या अर्थाने समदर्शी आहेत. बालकापासून वृद्धापर्यंत, गरीबा पासून श्रीमंता पर्यंत, मूर्खा पासून पंडिता पर्यंत, कुरुपा पासून विश्वसुंदरी पर्यंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता ते सगळ्यांना नेतात. हे पाहिल्यावर ते मला तरी कसे सोडतील? हा विचार माझ्या मनात येऊन मी त्रस्त होतो.
    अशावेळी आपली चरणकमले हेच माझ्या दुःख निवृत्तीचे एकमेव स्थान आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – 31

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – 32

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – 33

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३४

    अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि प्ररोहै-
    रवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः |
    अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै-
    रचंद्रार्धचूडैरलं दैवतैर्नः ‖ ३४ ‖

    भगवान श्री भोलेनाथच्या ठायी असणाऱ्या अनन्य शरणतेला व्यक्त करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्री शंकरांच्या विविध वैभवांचे वर्णन करीत आहेत. या वैभवांनी युक्त असे भगवान शंकर माझे दैवत आहे ही सांगण्याची त्यांची पद्धत मोठी मनोज्ञ आहे. ते म्हणतात,

    अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि- ज्यांच्या मस्तकावरील डोळ्यामधून अग्नीच्या लाटा उसळत नाहीत, प्ररोहैरवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः - ज्यांच्या डाव्या अंगावर अद्वितीय सौंदर्यवती शक्ती विराजित नाही,
    अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै:- ज्यांच्या अंगावर भूषण स्वरूपात सर्प रुळत नाहीत,
    अचंद्रार्धचूडै:- ज्यांच्या मस्तकावर चंद्रकोर विलसत नाही
    अलं दैवतैर्नः - असे कोणतेही माझे दैवत नाही.

    अर्थात अशी गुणवैशिष्ट्ये ज्यांच्या ठिकाणी नाहीत अशा कोणत्याही दैवतेला मी शरण जात नाही. हे सांगण्याच्या निमित्ताने आचार्य श्री वेगळ्या शब्दात भगवान श्री शंकराची वैभव मालिका आपल्यासमोर सादर करीत आहेत.
    तृतीय नेत्रातून निघणारा अग्नी, मांडीवर बसलेली देवी पार्वती अंगावर रुळणारे सर्प आणि मस्तकावरील चंद्र या भगवान शंकराच्या सगळ्या गोष्टी वंदनीय आहेत. त्यांच्याशिवाय भगवान शंकरांची कल्पनाही करवत नाही.
    या सगळ्या गोष्टींचे वैशिष्ट्य सांगण्याच्या निमित्ताने आचार्यश्री पूजना मध्ये असणाऱ्या ' सांगं सपरिवारं सशक्तिकम्' या दृष्टीचा विचार आपल्या समोर ठेवत आहेत. त्यासोबतच भगवान शंकरांच्या ठायी असणारी एकनिष्ठता अधोरेखित करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड