(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १८

    स्तुवन्ति ये स्तुतिभिरमिभिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।१८।।

    स्तुतिभिरमिभि: - या स्तुतीच्याद्वारे, या स्तोत्राचा आधारे.

    अन्वहं- अनु म्हणजे प्रत्येक आणि अह म्हणजे दिवस. अर्थात प्रत्येक दिवशी. नित्यनियमाने.

    स्तुवन्ति ये- जे स्तुती करतात.

    स्तवन नित्यनियमाने हवे. अडचण आल्यावर नाही.

    त्रयीमयीं- त्रयी शब्दाचा एक अर्थ आहे तीन वेद. त्या ज्ञानाने युक्त असणारी. त्रयी शब्दाचा दुसरा अर्थ आहे, सत्व,रज आणि तम यांची साम्यावस्था. त्रयी शब्दाचा तिसरा अर्थ आहे, स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ यांचा समूह.

    या सगळ्यांमध्ये परिपूर्ण व्यापलेली ती त्रयीमयी.

    त्रिभुवनमातरं- तीनही भुवनांची, तेथील समस्त जीवांची माता.

    रमाम्- संपूर्ण विश्वाला रममान करणारी.

    अशा आई महालक्ष्मीची जे भक्त या स्तोत्राच्या द्वारे स्तुती करतात.

    भवन्ति ते- ते होतात.

    गुणाधिका- अधिक गुणसंपन्न. अर्थात विश्वातील समस्त जीवांपेक्षा अधिक गुणशाली. गुरुतरभाग्यभागिनो - गुरु तर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. अशा भाग्याचे, भाजन अर्थात पात्र.

    अर्थात त्यांना सर्वाधिक श्रेष्ठ असे भाग्य प्राप्त होते.

    बुधभाविताया:- बुध अर्थात ज्ञानी लोक. भावित अर्थातच कौतुक केलेले.
    अर्थात आई जगदंबा, महालक्ष्मीच्या कृपेने या स्तोत्राचे पठण कर्ते विद्वान लोकांच्या कौतुकाला पात्र ठरतात.

    भिक्षा मागायला गेल्यानंतर एका दरिद्री वृद्ध स्त्रीच्या परिस्थितीने गलबलून गेलेल्या पूज्यपाद आचार्यश्रींनी आई महालक्ष्मीची प्रार्थना केल्यानंतर ते ज्या गरीब वृद्ध महिलेच्या अंगणात उभे होते. तेथे असणाऱ्या आवळ्याच्या झाडांवरून सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. त्या स्त्रीचे दारिद्र्य कायमचे दूर झाले.

    अशी कथा या स्तोत्राच्या सोबत वर्णन केली जाते.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – १

    प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दंबिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् ।
    आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ़्यं
    मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम् ।।१।।

    आई जगदंबेचे एक नितांत सुंदर नाव आहे ललिता. कोमल, मनोज्ञ, चित्ताकर्षक असा या शब्दाचा अर्थ. आई जगदंबेचे स्वरूप तसेच आहे.
    शाक्त उपासनेतील दशमहाविद्या मध्ये देवी त्रिपुरसुंदरी स्वरुपात ललितांबेचे अर्चन केले जाते.
    त्या ललितांबेचे स्तवन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,

    प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दम् - मी सकाळी आई ललितांबेच्या वदन अरविंद अर्थात मुखकमलाचे स्मरण करतो.
    यातील स्मरण शब्द अधिक सुंदर आहे. आई जगदंबेचे दर्शन घ्यायचे तर किमान देवघरापर्यंत जावे लागेल. पण स्मरणासाठी त्याची आवश्यकता नाही. अगदी आंथरुणात पडल्यापडल्या पडता, डोळे न उघडतात देखील स्मरण शक्य आहे. अर्थात प्रत्यक्ष कोणतीही शारीरिक क्रिया करण्याच्याही पूर्वी आईचे स्मरण हा प्राधान्याचा विषय आहे. हा भाव.

    कसे आहे आईचे मुखकमल?

    बिम्बाधरं- बिंब अर्थात उगवता सूर्य किंवा पिकलेली गुंज. ज्याप्रमाणे लालबुंद असे अधर म्हणजे ओठ असणारी. जगातील सर्वाधिक आकर्षक रंग आहे लाल. त्यामुळे स्वाभाविक पहिली नजर गेली ती लाल रंगाचा ओठांकडे.
    पृथुल म्हणजे टपोरा, मोठा.मौक्तिक म्हणजे मोती. शोभिनासम् म्हणजे नासिका असणारी. अर्थात आई जगदंबेच्या नाकात मोठ्या मोत्याची नथ घातली आहे.
    सामान्यतः सकाळी या अवयवाचे स्मरण करू नये , नाव काढू नये असे संकेत आहेत. ते अपशकुनी मानले आहे .पण आई जगदंबेच्या बाबतीत सर्वच गोष्टी शुभच असतात.

    आकर्णदीर्घनयनं- कानापर्यंत जिचे नयन अर्थात पापण्या किंवा भुवया लांबलेल्या आहेत अशी. मणिकुण्डलाढ़्यं- त्या कानांमध्ये दिव्य रत्न युक्त कुंडलांनी शोभून दिसणारी.

    मन्दस्मितं- आईच्या मुखावर मंदस्मित झळकत आहे. मृगमद- मृगाच्या नाभीतून मिळणारी कस्तुरी. उज्ज्वलभालदेशम्- त्या कस्तुरीच्या तिलकाने जिचा भालप्रदेश अर्थात कपाळ उजळले आहे अशी.

    अशा अवयवांनी युक्त असलेल्या आईच्या मुखकमळाचे मी स्मरण करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – २

    प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं रक्तांगुलीय-लसदंगुलि-पल्लवाढ्याम्‌।माणिक्य-हेम-वलयांगद-शोभमानां पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमैषु-सृणीर्दधानाम्‌॥२॥

    आई ललितांबेच्या मुखकमलाचे स्मरण केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्य श्री आई जगदंबेच्या हस्त कमलाचे वैभव विषद करीत आहेत. ते म्हणतात,

    प्रातर्भजामि- मी सकाळी आराधना करतो, स्मरण करतो. ललिताभुजकल्पवल्लीं- आई ललितांबेच्या हाताचे. जे कल्पवल्ली प्रमाणे आहेत. अर्थात एकदा हा हात मस्तकावर असला की काय वाटेल ते प्राप्त होते. मनात येताच हवे ते मिळते.

    रक्तांगुलीय- लाल रंगाच्या अंगठ्या,

    लसद्- त्याने चकाकणारी,

    पल्लवाढ्याम्‌- जणू पालवी प्रमाणे अत्यंत सुंदर असणारी.

    अंगुली- बोटे.

    आई जगदंबेच्या हातातील बोटात लाल रंगाच्या अंगठ्या शोभून दिसतात. लाल सर्वाधिक हा आकर्षक रंग आहे. त्यामुळे अत्यंत आकर्षक अंगठ्या असाही अर्थ होतो.
    आईचा हात गोरापान असल्यामुळे त्यावर लाल रंग सुंदर दिसतो त्यामुळे लाल रंगाच्या, असाही अर्थ होतो.

    माणिक्य- माणिक नावाच्या लालबुंद रत्नांपासून बनविलेले,

    हेमवलय- सोन्याची कंकणे,

    अंगद- बाजूबंद, वाकी इत्यादी हातातील अलंकार.

    शोभमानां- या सगळ्यांनी आईचे हात शोभून दिसत आहेत. आई ललितेचे स्वरूप चतुर्भुज असते. या चार हातांमध्ये,

    पुण्ड्रेक्षु- लाल रंगाचा ऊस.

    चाप- धनुष्य

    कुसुमैषु- इषु म्हणजे बाण. फुलांचे बाण.

    सृणी:- अंकुश.

    दधानाम्‌- धारण करणाऱ्या, या हातांचे मी स्मरण करतो.

    आईला चार हात आहेत. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ आईच्या हातात आहेत.
    यात रसपूर्ण फल देणारा ऊस धर्माचे, पराक्रमाची माध्यम असणारे धनुष्य अर्थाचे, फुलांचे बाण हे कामाचे तर आत्म नियमनकारी अंकुश हे मोक्षाचे प्रतीक आहे.
    या चारही गोष्टी आईच्या हातात आहेत.

    आपल्या भक्तांना हे सर्व देते म्हणून त्या हातांचे स्मरण.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ३

    प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम्‌।पद्मासनादि-सुरनायक-पूजनीयं पद्मांकुश-ध्वज-सुदर्शन-लांछनाढ्यम्‌॥३॥

    यानंतर पूज्यपाद जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई ललितांबेच्या चरणकमलांचे वंदन करीत आहेत. त्यांचे वर्णन करीत आहेत.

    प्रातर्नमामि- मी रोज सकाळी वंदन करतो. ललिताचरणारविन्दम्- आई जगदंबेच्या, श्रीललितेच्या चरणकमलांना.

    कशी आहेत ही चरणकमले?

    भक्तेष्टदाननिरतम् - भक्तांना इष्ट म्हणजे योग्य ते प्रदान करणारे.
    यातील इष्ट शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इष्ट म्हणजे योग्य ,चांगले ,समर्पक. आई जगदंबेच्या चरणाशी योग्य तेच मिळते. आपल्याला हवे ती नाही. कारण अनेकदा आपल्याला जे हवे असते ते आपल्यासाठी योग्य नसते. मात्र आईला नेमके समजते की आपल्या बाळाला काय योग्य आहे? आई ललितांबेचे चरण साधकांना इष्ट ते प्रदान करतात.

    भवसिन्धुपोतम्‌- हे चरण साधकांच्या साठी, भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर, पार करण्यासाठी साधन असणारी, पोतं म्हणजे नाव,बोट ठरत असतात.

    पद्मासनादि- आईची ही चरणकमले कमळावरच स्थापित असतात.

    सुरनायक पूजनीयम्- सुर म्हणजे देवता. त्यांचे नायक अर्थात देवराज इंद्र. त्यांच्या द्वारे पूजन केल्या गेलेले.

    अशा त्या आईचा सुंदर चरणकमलांवर असणाऱ्या चिन्हांची सूची देतांना आचार्यश्री म्हणतात, पद्म- कमळ
    अंकुश,ध्वज,सुदर्शन अर्थात चक्र यांच्या लांछन- अर्थात चिन्हांनी

    आढ्यम्‌- अर्थात सर्वश्रेष्ठ ठरणारी ती आईची चरणकमले मी प्राप्त काळी वंदितो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ५

    प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति।
    श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥

    पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे.

    भगवंताचे नाम ही भक्ताची सर्वात आवडती गोष्ट. नामाच्या आधारे नामी पर्यंत पोहोचणे हे साधनेचे वर्म.

    प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री आई लालितेच्या विविध नावांचा विचार प्रस्तुत करीत आहेत.

    आरंभी स्मरण, त्यानंतर वंदन आणि आता नामोच्चारण.
    बौद्धिक स्तरावर स्मरण, मानसिक स्तरावर वंदन आणि शरीराच्या मुखाने सातत्याने नामोच्चारण अशी ही रचना.

    त्यासाठी आचार्य म्हणतात,

    प्रातर्वदामि- मी सकाळी बोलतो. नाम घेतो.

    वचसा- वाणीने.

    ललिते - हे आई ललितांबे !

    तव पुण्यनाम- तुझी पुण्यदायक नावे.

    कोणकोणती आहेत ही नावे? तर

    कामेश्वरी- सकल कामनांची ईश्वरी. अर्थात भक्तांच्या सकलं कामना पूर्ण करणारी.

    कमला- कमळामध्ये निवास करणारी. कमळाप्रमाणे उर्ध्वगामी वृत्ती असणारी. ती वृत्ती प्रदान करणारी.

    महेश्वरी- महेश्वराची सहलीलाचारीनी.

    श्रीशाम्भवी- शंभू अर्थात भगवान शंकर. शम् म्हणजे कल्याण. तर भू म्हणजे निर्माण होणे. ज्यांच्या चरणाशी जगाचे कल्याण निर्माण होते ते शंभू. त्यांची चैतन्यशक्ती ती शंभूची शांभवी.

    जगतां जननी - सकल विश्वाची जननी. आदिशक्ती. मूळमाया.

    परा- परा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ.

    परा हा एक वाणी चा प्रकार देखील आहे. चौथ्या प्रकारच्या या वाणीत साधकाला अखंड ओंकार नाद ऐकू येतो. तो ओंकार आईचे स्वरूप आहे .

    वाग्देवता- वाणीची देवता. जगातील सर्वच पशूंना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आवाज काढता येतो. त्यांना देखील ध्वनी आहे. पण त्यांना वाणी नाही. त्यांना आपल्या मनातील सर्व भावना पाहिजे तशा बोलता येत नाही. वाणी हे माणसाचे वैभव आहे. आई ललिता त्या वाणीची देवता आहे. सोप्या शब्दात ती आपल्याला मनुष्यत्व प्रदान करणारी आहे.

    त्रिपुरेश्वरी- या आई जगदंबा ललितेची उपासना श्री त्रिपुरसुंदरी रूपात केली जाते.

    त्रिपुर शब्दाचा अर्थ स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. तर देहाच्या बाबतीतला अर्थ स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. या सगळ्यांची स्वामिनी.

    सकाळी मी वाणीने तिचे भजन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (३) /११

    संस्कृत भाषेला ‘देववाणी’ कां म्हणत याच्या मागचा इतिहास आपण आधीच पाहिला आहे. तिचें वर्चस्व लादण्यासाठी तसें नांव ठेवलें गेलें नाहीं. ‘देव’ या टोळीची (clan) जी भाषा, तिला ‘देववाणी’ म्हणणें हें अगदी स्वाभाविक आहे.

  • आज कार्तिक शुद्ध एकादशी….!

    आज कार्तिकी एकादशी. सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
    हिंदू पंचांग नुसार कार्तिक मासे शुक्लपक्षी येणाऱ्या एकादशीला, म्हणजेच दिवाळीतल्या भाऊबीज सणानंतर बरोबर दहाव्या दिवशी पंढरीच्या विठ्ठल नामे आस्था ठेवून त्याच्याच जयघोषात, उपासांतर्गत प्रतिवर्षी आनंदाने साजरा करावयाचा सण म्हणजेच आज ३१ आक्टोबर ला अखंड भारतात साजरी होणारी "कार्तिकी एकादशी" होय.
    खरतर हिंदवी वर्षाच्या प्रत्येक मासी दोन एकादशी येतात.आणि ह्या दोन्ही दिवशी भगवान विष्णू निवासी वैकुंठाचे महाद्वार उघडे असते असे म्हणतात. आणि श्रीविष्णु तर आपले व ह्या सृष्टीचे पालनहार, म्हणूनच कित्येक भक्तजनां कडुन बाराही महिन्यातल्या ह्या दोन्ही दिवशी श्रीविष्णुची आराधना व उपासना करण्याची पध्दत आपल्या हिंदू धर्मात परंपरागते रुजवात आहे.परंतु फक्त आषाढातल्या आणि कार्तिकेतल्या आद्य एकादशीलाच फार महत्व असल्याने, या दोन्ही दिवशी कुणीही आत्मश्रध्देने केलेली श्रीविष्णुची उपासना त्या प्रत्येक व्यक्तीला अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात.
    ह्या दोन एकादशींचे महत्त्व काय असेल ..? आणि ह्याच दोन दिवशी खासत्वे मध्य व दक्षिण भारतातील कित्येक कित्येक लाखो लोक आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर गांवी येऊनच श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यात धन्यता मानतात. असे का..? काय असेल रहस्य ..??
    ऋग्वेदात तर असे लिहिलेले आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णु निद्रिस्त होवून चार महिन्यां नंतर म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशीच निद्रेतून उठतात. म्हणूनच त्यांच्या ह्या चार महिन्याच्या विश्रांतीलाच चातुर्मास म्हणण्याची प्रथा पूर्वापार रुजुवात आहे.
    ह्यामुळेच तर आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" आणि कार्तिक एकादशीला "देवउठनी/प्रबोधिनी एकादशी" असे पूर्वापार संबोधिले जाते. शरीर जरी निर्दिस्त असले तरी श्रीविष्णुंचा आत्मा कायम जागृत असल्याने मानवसृष्टी च्या जगत्पालनेत तसूभरही त्यांच्या कडुन दुर्लक्ष होत नाही. म्हणूनच ह्या चातुर्मासात त्यांच्या आत्मलहरीने संपूर्ण ब्रम्हांड व्यापले गेले असल्याने खासत्वे ह्या दिवसांत त्यांच्याप्रती आस्था ठेवून त्यांच्याच नांवे केलेली भक्ती/उपासना/आराधना अत्यंत फलदायी ठरते असे वेदवचनही आहे.
    उत्तर भारतातील जगन्नाथ पुरी, दक्षिणेकडील वेंकटरमणा तिरुपती,आणि मध्य भारतातील पांडुरंग पंढरी ही तर श्रीविष्णुंची स्वयंभू व ज्वलंत अशी युगानुयुगे मान्यता असलेली पवित्र देवस्थाने असल्याने त्यांच्या भेटी दरम्यान साक्षात भुलोकी वैकुंठ दर्शनाच्या अनुभूतीचा लाभ घडत असल्याने आजही वैष्णव भक्तजन लाखोंच्या संख्येत त्या त्या ठिकाणी जाऊन समक्ष भेटीत विष्णुंच्या दर्शनाचा लाभ घेतात. आणि त्यातूनही ह्या दोन एकादशीं दिवशी तरी प्रतिवर्ष वरील प्रत्येक देवस्थानी, वैष्णवजनांच्या प्रचंड गर्दीचा उच्चांक पार दाटत असतो हे विशेष.
    जगन्नाथ पुरी व वेंकटरमणा तिरुपती ही अतिश्रीमंत देवस्थाने असूनही VVIP व्यतिरिक्त त्यांच्या गाभाऱ्यात अगदी कुणालाही प्रवेश दिला जात नाही. फक्त उघड्या डोळ्यांनी श्रीविष्णुंचे नेत्रसुखद दर्शन घेण्याचा लाभ मात्र प्रत्येकाच्या नशीबी तेवढे घडतं हेच भाग्य म्हणायचं.परंतु आपल्या महाराष्ट्रातील पंढरपुरात मात्र सर्वच जातीधर्माच्या गरीब श्रीमंतांना तसेच लुळे पांगळे व आंधळ्यांना देखील गाभाऱ्यात प्रवेश असुन विठ्ठलाच्या पदस्पर्शाने सर्व भाविकांना जीवन धन्य व सार्थक झाल्याची अनुभूती प्राप्त होते हे खरोखरच प्रत्येक भाविकाचे अहोभाग्यच म्हणावं लागेल.
    त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने भुलोकी च्या मानवाला प्रत्यक्ष विष्णुदर्शनाचा स्पर्श-लाभ घडत असल्यानेच अखंड भारतात पंढरपूरलाच वैष्णवांकडून विशेष प्राधान्य दिले जाते हेच खरं उल्लेखनीय.तसे तर पंढरीच्या विठ्ठलाचा इतिहास आणि आषाढी एकादशीला पंढरीचे महत्त्व आहे. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत..!! या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का..?
    एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो...
    ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्याय भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून म्हणजेच स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.
    स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
    सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
    न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
    न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च ।
    एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशी हरिदिन म्हणजेच श्री विष्णूचा दिवस..!
    आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला,शेषशायी भगवान श्री विष्णु झोपीजातात म्हणूनच आषाढी एकादशीला "शयनी एकादशी" असे देखील म्हणतात.
    आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. या एकादशी दिनी पंढरपुरातल्या पांडुरंगाचे दर्शन घ्या आणि शेअर करून इतरांना देखील दर्शन घडवा. जय हरी विठ्ठल.
    जय जय राम कृष्ण हरी।
    जय जय राम कृष्ण हरी॥
    जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ॥

  • आंगणेवाडीची श्री भराडीदेवी

    मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.

    p-34368-bharadideviश्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.

    देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
    या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी...’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.

    मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.

    नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
    साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.

    जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.

  • आकाशदीप

    सर्वपित्रीत तृप्त झालेले पितर कोजागिरी ते अष्टमी या काळात पवित्र होऊन कराष्टमीपासून ध्रुवाकडे मार्गस्थ होतात. त्यांना मार्गदर्शनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सूर्यास्तानंतर एक प्रहारानंतर ते सुर्योदयापर्यंत घराबाहेर आकाश दिशेने एक तेलदिवा जळता ठेवतात तोच आकाशदीप.

    पृथ्वीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर कापायला आत्म्यांना दहा दिवस लागतात. सतत प्रकाशाने त्यांचे मार्गक्रमण सुकर व्हावे यासाठी या दिवसापासून दिपोत्सवास (दिपावली) प्रारंभ होतो.

  • असे गुरू ! , असेही गुरू !

    गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूपूजेसाठी किंवा गुरूस्मृती जागवण्यासाठी असतो. शतकानुशतकें आपल्या संस्कृतीत गुरूचें महत्व अधोरेखित केलें गेलेलें आहे.