वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
९८) श्री भ्रमराम्बाष्टकम्-७धन्यां सोमविभावनीयचरितां धाराधरश्यामलां
मुन्याराधनमेधिनीं सुमवतां मुक्तिप्रदानव्रताम्।
कन्यापूजनसुप्रसन्नहृदयां काञ्चीलसन्मध्यमां
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।७।।
धन्यां - धन्य असलेली. धन्यता ही जीवनातील अशी एक सुंदर अवस्था आहे की जेथे काहीही मिळवायचे बाकी नसते. कृतार्थ. सार्थक. आई जगदंबा तशी आहे. सोमविभावनीयचरितां- सोम म्हणजे चंद्र. विभावनीय अर्थात सुंदर. चरित अर्थात चारित्र्य. आचरण.
आई जगदंबेची प्रत्येक लीला चंद्राप्रमाणे शुभ्र, प्रसन्न ,आल्हाददायक आहे.
धाराधरश्यामलां- धारा म्हणजे पर्जन्यवृष्टी. त्यात धारांना धरणारा तो धाराधर म्हणजे मेघ. त्याप्रमाणे सावळ्या वर्णाची असलेली.
भारतीय संस्कृतीत मेघ:शाम हा सौंदर्याचा रंग वर्णिला आहे.
मुन्याराधनमेधिनीं- मुनी म्हणजे ऋषिमुनी. त्यांचे आराधना म्हणजे साधना. तर मेधिनी म्हणजे भूमी.
अर्थात ऋषीमुनींच्या उपासनेचे आधारस्थान.
सुमवतां- सुम म्हणजे पुष्प. विविध फुलांनी अलंकृत असलेली.
मुक्तिप्रदानव्रताम्- साधकांना मुक्ती प्रदान करणे हे जिचे व्रत अर्थात अत्यंत आवडते कार्य आहे अशी.
कन्यापूजनसुप्रसन्नहृदयां- कन्यांचे पूजन केल्यामुळे जिचे मन अत्यंत प्रसन्न होते अशी. काञ्चीलसन्मध्यमां- कांची म्हणजे मेखला, कंबरपट्टा. त्याने मध्यमा म्हणजे कंबर शोभून दिसणारी.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा भ्रमरांबेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
कर्पूरागरुकुङ्कुमाङ्कितकुचां कर्पूरवर्णस्थितांकृष्टोत्कृष्टसुकृष्ट कर्मदहनां कामेश्वरीं कामिनीम् ।
कामाक्षीं करुणारसार्द्रहृदयां कल्पान्तरस्थायिनीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ८॥
कर्पूर- कापूर
आगरु- काळे चंदन
कुङ्कुम- कुंकू
अङ्कितकुचां- यांनी वक्षस्थल व्याप्त असलेली. या सगळ्यांची उटी आई जगदंबेने शरीराला लावली आहे. कर्पूरवर्णस्थितां- कापरा प्रमाणे शुभ्र पांढऱ्या रंगाची.
कृष्टोत्कृष्ट- कृष्ट म्हणजे निम्न तर उत्कृष्ट म्हणजे अप्रतिम.
सुकृष्ट- सुयोग्यरीत्या केलेले,
कर्मदहनां - कर्माला जाळून टाकणारी.
कर्माची रचना एखाद्या बीजाप्रमाणे असते. बीज ज्या प्रकारचे असते वृक्ष त्या प्रकारचा निर्माण होतो. तसे कर्म जसे असते तसे फळ प्राप्त होते. मात्र जर हे बी भाजले आणि नंतर पेरले तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे एकदा आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की मग कोणत्याही कर्माचे फळ अर्थात बंध लागत नाहीत.
कामेश्वरीं - सर्व कामना अर्थात इच्छांची अधिष्ठात्री.
कामिनीम् - भक्तांच्या, साधकांच्या सकल कामना पूर्ण करणारी.
कामाक्षीं- काम म्हणजे इच्छा. अक्षी म्हणजे निवास. सकल कामनांचे निवास अर्थात मूळ स्थान. करुणारसार्द्रहृदयां- कारुण्य रसाने जिचे हृदय भरलेले आहे अशी. कल्पान्तरस्थायिनीं-
भगवान श्री ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी या संपूर्ण विश्वाचा जो लय होतो तो पर्यंतच्या काळाला कल्प म्हणतात. त्यावेळी सर्वकाही नष्ट होते. मात्र त्यावेळी सुद्धा नष्ट होणारी आदिशक्ती कल्पान्तरस्थायिनी संबोधिली जाते.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
गायत्रीं गरुडध्वजां गगनगां गान्धर्वगानप्रियांगम्भीरां गजगामिनीं गिरिसुतां गन्धाक्षतालंकृताम् ।
गङ्गागौतमगर्गसंनुतपदां गां गौतमीं गोमतीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ९॥
एकच अक्षर किंवा शब्द वारंवार वापरण्याला साहित्यात अनुप्रास अलंकार असे म्हणतात. मागील श्लोकात आचार्यश्रींनी क चा उपयोग करून तर या श्लोकात ग चा उपयोग करून अनुप्रास साधला आहे.
गायत्रीं - ज्याचे गायन केल्याने साधक तरुन जातो, त्या मंत्राला गायत्री म्हणतात. सर्वच मंत्रांचे गायन अर्थात आनंद पूर्ण उच्चारण करावे.
गरुडध्वजा- गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांची सहधर्मचारिणी.
गगनगा- गगन म्हणजे आकाश. त्यातून ग म्हणजे गमन करणारा अर्थात भगवान सूर्य. तशी तेजस्वी. त्याच्या प्रकाशाच्या मागे असणारी चैतन्यशक्ती. ज्ञानशक्ती.
गान्धर्वगानप्रिया- देवतांचे जे विविध प्रकार आहेत, त्यापैकी गायन प्रवीण असणाऱ्या देवतांना गंधर्व असे म्हणतात. हाहा, हूहू, तुंबरू अशा अनेक गंधर्वांचे वर्णन शास्त्रात आहे. त्या गंधर्वांच्या द्वारे केल्या जाणारे गायन अत्यंत प्रिय असणारी.
गम्भीरा- अत्यंत गहन. सहजा सहजी पार न लागणारी. अपार. अथांग. अनाकलनीय.
गजगामिनी- हत्तीप्रमाणे शांत, गंभीर तथा आकर्षक गतीने चालत जाणारी.
गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. त्यांचा राजा तो हिमालय. त्याची कन्या. पार्वती. गन्धाक्षतालंकृताम् - मस्तकावर गंध आणि त्यावर अक्षता धारण केलेली.
गङ्गा- गंगा म्हणजेच गमनशीला . गमन अर्थात गती हा चैतन्याचा विषय. त्यामुळे गंगा म्हणजे चैतन्यमयी.
गौतमगर्गसंनुतपदां - गौतम, गर्ग इ. ऋषिमुनींनी चरण वंदना केलेली.
गां- गोमाता स्वरूप असलेली.
गौतमीं - महर्षी गौतमांवर आलेले गोहत्येचे बालंट दूर करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे प्रगटलेली गोदावरी स्वरूप असलेली.
गोमतीं- दक्षिण भारतात गोमती नदी स्वरूप असलेली.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा भ्रमराम्बेचे मी भजन करतो.
जय भ्रमराम्बा !
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिःलक्ष्मीस्वयंवरण मंगलदीपिकाभिः ।
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम् ॥ १ ॥
आई जगदंबेच्या या नितांतसुंदर स्तोत्राचा पहिल्या चरणात आलेल्या कल्याणवृष्टी या पहिल्याच शब्दाच्या आधारे या संपूर्ण स्तोत्रालाच कल्याणवृष्टिस्तव या नावाने ओळखले जाते.
आई जगदंबे की दृष्टी सकल कल्याणाचे अधिष्ठान आहे, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिः- आई सकल कल्याणाची वृष्टी करणारी तुझी ही दृष्टी अमृताने भरलेली आहे.अर्थात ज्याच्यावर हा दृष्टिपात होतो त्याला अमृत प्राप्त होते. अमृत स्वर्गात असते. म्हणजे जणूकाही त्या साधकाला या जगातच स्वर्गीय आनंद प्राप्त होतो.
लक्ष्मीस्वयंवरण- आईच्या दृष्टीचे वैभव म्हणजे ती ज्याच्यावर पडते त्याच्याकडे लक्ष्मी स्वतःच धावत येते. जगात बाकी सगळ्यांना लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतात. मात्र आई जगदंबेच्या कृपा पात्र साधकाला या जगातील सर्व सुखे आपोआप
बसल्याजागी मिळतात. हे आचार्य कथन किती सुंदर आहे?
मंगलदीपिकाभिः- आईची दृष्टी मंगलाची दीपिका आहे. दीप प्रत्येक गोष्टीला प्रकाशित करतो. तो नसला तर समोर असलेली गोष्ट ही अंधारात दिसत नाही. तो असला की सर्वत्र लख्ख दिसू लागते. तशी आईची कृपादृष्टी प्राप्त झाली की सर्वत्र मंगलच मंगल दिसू लागते. अमंगलाचा अंधार दूर होतो.
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ- हे आई जगदंबे एकदा तुझा चरणकमलांची सेवा करण्याला सुरुवात केली की मग त्या सेवेने,
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम्- त्या भाग्यवान जणांच्या मनामध्ये असलेले काय होत नाही? अर्थात त्यांच्या मनात जे जे येईल ते पूर्ण सफलच होते.
अशी आईची सेवा करणाऱ्या साधकाला आचार्य भाग्यवंत म्हणत आहेत.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆत्वद्वन्दनॆषु सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ ।
सान्निद्ध्यमुद्यदरुणायुतसॊदरस्य
त्वद्विग्रहस्य परया सुधयाप्लुतस्य ॥ २ ॥
अत्युत्तम साधकाची मानसिक अवस्था कशी असते? याचे नेमके वर्णन करताना आचार्यश्री या श्लोकात म्हणतात,
एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆ- हे आई माझी एवढीच स्पृहा म्हणजे इच्छा आहे. कोणती ते सांगताना आचार्यश्री म्हणतात,
त्वद्वन्दनॆषु - तुझ्या वंदन समयी, अर्थात नमस्कार करीत असताना, सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ- डोळ्यात येणाऱ्या अश्रूंनी माझे नेत्र स्थगित होतील, अर्थात यामुळे मला दिसणे बंद होईल.
ज्यावेळी असा साधक आईची चरण वंदना करण्यासाठी वाकेल त्यावेळी डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंनी त्याला ती चरणकमले देखील दिसणार नाहीत. त्यावेळी त्याची प्रार्थना आहे की,
उद्यत् - उगवणाऱ्या
अरुण- सूर्य सारथी, प्रभातीचा लालिमा.
अयुत- कोट्यावधी
सॊदरस्य- समान.
अर्थात प्रभाती पसरलेल्या अरुणोदय कालीन लालिम्याच्या कोट्यावधी पट अधिक तेजस्वी असलेल्या,
परया सुधयाप्लुतस्य- परम म्हणजे श्रेष्ठ सुधा म्हणजे अमृताने अर्थात आनंदाने प्लुत म्हणजे परिपूर्ण भरलेल्या.
त्वद्विग्रहस्य सान्निध्यम् - तुझ्या विग्रह म्हणजे स्वरूपाचे, सान्निध्य म्हणजे जवळीक, मला प्राप्त होवो.
अर्थात ज्या वेळी मी वंदन करेल आणि माझ्या डोळ्यातील अश्रूंनी तुझी चरणकमले मला दिसणार नाही, त्यावेळी हे आई जगदंबे ! मला दिसत नसले तरी, तुझ्या शिवाय मला कोणीही नाही हे, तुला दिसत असल्याने तू दूर जाऊ नकोस.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्तिब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः ।
एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ
यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति ॥ ३ ॥
आई जगदंबेचे वैभव सांगतांना आचार्य श्री येथे एका वेगळ्याच गोष्टीचा उपयोग करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात ते म्हणतात,
ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्ति
ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः-
इथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ पाहण्यापेक्षा या सगळ्याचा एकत्रित भावार्थ पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
कृत-त्रेता -द्वापार- कली ही चार युगे एक हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस अर्थात एक कल्प होतो. असे भगवान ब्रह्मदेवांचे आयुर्मान शंभर वर्ष असते.
ब्रह्मदेव इत्यादिक सर्व देवता, अशा कालगणनेच्या आरंभी निर्माण होतात आणि त्या काल मर्यादेनंतर त्यांचाही लय होतो.
अर्थात या सगळ्यांना उत्पत्ती आणि नाश आहे त्यामुळे आचार्य त्यांना ईशत्वनामकलुष अर्थात नावापुरतेच ईश्वर, शाश्वत नसलेले, असे म्हणत आहेत.
कति वा न सन्ति- अर्थात् कितीतरी आहेतच ना? असे म्हणत, अशा स्वरूपात स्वतःला ईश्वर म्हणणारे ब्रह्मदेवां सारखे कितीतरी देव आहेतच ना? असे आचार्य म्हणताहेत.
अर्थात अशा कितीतरी देवता या परमसत्य, चिरंतन नाहीत हे सांगून ते म्हणतात,
एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ- हे आई या जगामध्ये कायम सिद्धी संपन्न तो एकच आहे,
यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति- ज्याने एकदा तुझ्या चरणी वंदन केले आहे.
अर्थात बाकी देवता शाश्वत नसल्याने त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने देखील तशीच अशाश्वत आहेत. आई फक्त तुझ्या चरणाशी आला तोच शाश्वत सुख प्राप्त करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनंकारुण्यकन्दलित कान्तिभरं कटाक्षम् ।
कन्दर्पकॊटिसुभगास्त्वयि भक्तिभाजः
सम्मोहयन्ति तरुणीर्भुवनत्रयॆऽपि ॥ ४ ॥
खरी बुद्धिमत्ता ती जी इतरांना बुद्धी संपन्न करते. खरे वैभव ते जे इतरांना वैभवसंपन्न करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य तेच की ज्याच्या संपर्काने इतरांना सौंदर्य प्राप्त होते. आई जगदंबेचे सौंदर्य तसेच आहे. तिच्या नेत्र कटाक्षांचे हे आगळे वैभव सांगताना, पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनं-
त्रिपुरसुन्दरि- हे त्रिभुवनसुंदरी !
तावकीनं- तुझी
लब्ध्वा- प्राप्त करून
सकृत्- एकदाच, सहजपणे.
कारुण्यकन्दलित- कारुण्याने परिपूर्ण भरलेली, कारुण्य ओसंडून वाहत असलेली,
कान्तिभरं -तेज:पुंज
कटाक्षम् - नेत्र कटाक्ष.
अशाप्रकारची आई जगदंबेची दृष्टी प्राप्त झाल्यावर होणारा अद्वितीय लाभ आचार्यश्री सांगत आहेत. त्या दृष्टीचे सौंदर्य सांगताना ते म्हणतात,
कन्दर्पकॊटिसुभगा- कंदर्प म्हणजे मदन. सौंदर्याचे आपल्यासमोर असलेले सगळ्यात मोठे परिमाण. त्याच्या कोट्यावधी पट सुंदर अशी ती, कन्दर्पकॊटिसुभगा.
त्वयि भक्तिभाज:- तुझ्या भक्तीला पात्र असणारी.
तरुणी- अन्य समस्त सुंदरी.
सम्मोहयन्ति- मोहित करतात.
भुवनत्रयॆऽपि- तीनही लोकांना.
अर्थात आई जगदंबेच्या वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असलेली कृपादृष्टी प्राप्त झाल्याने त्या सौंदर्याने क्षमता प्राप्त झालेल्या स्वर्गीच्या रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरा संपूर्ण त्रिभुवनाला मोहित करतात.
त्यांच्या नजरेतील ती मोहन शक्ती मूलतः आदिशक्तीची आहे.
तिच्या भक्तीने इतरांना ती शक्ती प्राप्त होते हे आईचे खरे वैभव आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ - महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः - अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानःक्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः ।
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य ॥ ६ ॥
आई भगवतीच्या साहचर्याचा अद्भुत वैभवशाली परिणाम सांगताना आचार्यश्री समुद्रमंथन प्रसंगाचा संदर्भ घेतात.
अमृताच्या प्राप्तीसाठी झालेल्या या समुद्रमंथनात त्या मेरू पर्वताच्या भोवती गुंडाळलेल्या वासुकी सर्पाने ती पीडा सहन न झाल्याने भयानक गरळ ओकले.
जोपर्यंत हे कोणी घेणार नाही तोपर्यंत दुसरे काहीही निर्माण होणार नाही अशी आकाशवाणी झाली. त्यामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर भगवान शंकरांनी ते विषप्राशन केले. वास्तविक त्याने त्यांचा विनाश झाला असता. पण !
या पण चे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात,
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानः
क्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः- पूर्वी ज्यावेळी भगवान शंकरांनी समुद्रमंथनात निर्माण झालेले हालाहल नावाचे विषप्राशन केले त्यावेळी त्या भयानक विषाचा आवेग त्यांना का मारू शकला नाही?
आरंभीच्या दोन चरणात असा प्रश्न निर्माण करून पुढील दोन चरणात आचार्यश्री त्याचे उत्तर देतात. ते म्हणतात,
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य - हे आई जगदंबे ! कायम अमृताने भरलेल्या तुझ्या शीतल शरीराच्या अर्ध्या अंगाचा आश्वासक संगच नसता .
भगवान शंकरांचे स्वरुप अर्धनारीनटेश्वर आहे. श्रीशंकर आणि आदिशक्ती अभिन्न आहेत.
भगवान शंकर त्या विषाने संपले नाही कारण त्यांच्यासोबत अमृतमय असलेला आई जगदंबेचा अर्धा देह आहे.
त्या विश्वविनाशक विषाचा परिणाम आईच्या अमृतमय स्पर्शांनी नष्ट झाला.
हे आचार्य श्रींचे कथन कमालीचे मनमोहक आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti