पाय आणि मांडी दुमडुन
जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत.
दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे टेबलखुर्ची मध्ये नसते.
टेबलखुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते, तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहाजिकच पोट टेबलाच्याही खाली जाते.(....... आणि पोट दिसतच नसल्याने किती पुढे आले आहे, हे पण कळत नाही.) त्यामुळे टेबलावरील वाढलेले ताट आणि टेबलाखाली वाढलेले पोट यातील अंतर कमी होते. ताटातील घास अंगावर सांडण्याची भीती बिलकुल असत नाही.
टेबलावर वाढलेले ताट आणि उघडलेले तोंड, यामधे फक्त काही इंचाचे अंतर उरते. ताटातील घास अगदी सहजपणे, विनासायास तोंडात जातो.
पण जेव्हा मांडी दुडली जाते, तेव्हा मात्र ताटातील घास अंगावर सांडू नये म्हणून, ताटापर्यंत पुढे वाकावेच लागते. जेवत असतानाच पोट हलते, दुडते, थोडेफार चिरडते, चेपले जाते, यामुळे आतड्यातील आतील भिंतीला चिकटलेले अन्न सुद्धा घसरते, हलते, खाली पडते.
अशा तर्हेने आतड्याच्या भिंतीवरून खाली पडलेले अन्न, पचनाच्या, घुसळण्याच्या प्रक्रियेमधे आणले जाते.
अन्न पोटात जात असताना अन्नाचा एक थर पोटात गेला आहे. मधे मधे पाणी पडत, पुनः अन्न. असे थरावर थर रचले जातात. जेवायला मधेमधे पुढे वाकल्याने पोट थोडे आवळले जाते. पोटातील अतिरिक्त वायु बाहेर पडतो. अन्न आणि पाणी यांचे पोटातील संचरण योग्य प्रमाणात होते. पुढे अन्न घुसळायला याची मदत होते.
पुढे वाकून जेवल्याने उजव्या बाजुला असलेले यकृत आणि डाव्या बाजूला असलेले, स्वादुपिंड, अग्न्याशय हे अवयव पण हलकेच दाबले जातात. या ग्रंथींवर थोडासा दाब निर्माण झाल्याने त्या ग्रंथीच्या आतील पाचकस्राव आणि इन्शुलीन, सहजपणे ग्रंथीच्या बाहेर पाझरतात, पचन आपोआपच सुधारते. आंबा पिळल्यानंतर कसा रस गळतो !!
पुढे वाकून जेवल्याचे असे काही फायदे लक्षात आले आहेत.
......आणि अन्नासमोर नतमस्तक होण्यात लाज ती कसली ?
कोणाही समोर जर आपण केव्हाही नतमस्तक झालो तर समोरून आशीर्वादाचा हात सहजपणे वर उचलला जातो.
आणि इथे तर समोर, साक्षात अग्निनारायण.! जेवताना जर त्यांच्यासमोर नतमस्तक झालो, तर अग्निनारायणांना "तथास्तु" म्हणावेच लागेल. नाही का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
19.09.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 17 - पुष्प पाचवे
वेगवेगळी फुले उमलली
रचूनी त्यांचे झेले.
बुके शब्दाला प्रतिशब्द म्हणजे झेले असे लक्षात येते. परडी देवासाठी, गजरा घरातल्या देवीसाठी आणि झेला इतर माणसासाठी !
देवासाठी फुले काय पाने काय एकच !
भगवंत सांगताहेत,
पुष्पं पत्रं फलम् तोयम्, मला काहीही चालेल. फक्त भक्तीभावाने अर्पण करा. हे देवासाठी ठीक आहे. पण फुलांऐवजी पानाचा गजरा सौ. देवीसाठी ठीक राहील का ? तिथे पुष्पार्थे अक्षताम् समर्पयामी म्हणून कसं चालेल ? माणसासाठी मात्र तेथे पाहिजे जातीचे !
पानावरून आठवले. देवाला जशी फुले वाहातात, तशी पाने देखील अगदी मंत्र म्हणून वाहिली जातात. याला पत्री वाहणे म्हणतात. याचे मंत्रदेखील किती आरोग्य पूरक आहेत पहा,
एकदंताय नमः अर्क पत्रम समर्पयामी ।
गजकर्णाय नमः तुलसीपत्रम समर्पयामी ।
लंबोदराय नमःबदरीपत्रम समर्पयामी ।
नावे गणेशाचीच. पण गर्भित अर्थ वैद्यांसाठी आहेत.
दंतांसंबंधी काही व्याधी असतील तर रूईचे पान किंवा पान जाळून त्याची राख मंजनामधे वापरण्यासाठी सूचक आहे का ?
गजकर्ण या रोगासाठी किंवा कर्णासंबंधी व्याधीकरीता तुलसीपत्र.
ज्याचे उदर लंब आहे अश्यासाठी खरखरीत बदरीचे पान. हे आरोग्य सूचक नव्हेत काय ?
पानेदेखील तोडायची नाही, खुडायची. पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने आवारामधे कोणती झाडे कुठे आहेत, ते वर्षातून एकदा तरी कळते. आयुर्वेद किंवा आरोग्याची ओळख ही अशी शाळेत जाण्यापूर्वीपासूनच होती.
विष्णुसाठी तुळस प्रिय आहे, गणेशाला दुर्वा, तर शंकराला बेल. बेल नसला तर प्रतिद्रव्य म्हणून निर्गुंडी, मारूतीला रूई, नंदीला आघाडा, अशी पत्रांची योजना कुणी का केली असेल, का केली असेल ?
शेयशायी विष्णुंचा निवास सागरात आहे, पाण्यात आहे. सतत पाण्याशी संबंधीत आजारापासून सुटका होण्यासाठी पाणी लगेचच शोषून घेणारी तुळस हा त्याचा "अॅण्टीडोट" म्हणून सांगितले गेले असेल का ? रक्तबीज राक्षसाला गिळल्यानंतर, गणेशजींच्या मनाचा, तनाचा दाह कमी करणारी दुर्वा, हे पित्तज व्याधींचे प्रतिक समजता येईल का ?
कृपानिधी भोलेनाथ शंकर तर असलं तर सूत नाहीतर भूतराज ! कधी समाधी तर कधी समाधी भंग होऊन तांडव सुरू होईल ते सांगता येत नाही, अशा क्षणात रक्तदाब वाढणाऱ्या व्यक्तींसाठी बेलाची उपाय योजना असेल का ? नंदी म्हणजे बैल. पशूंचा प्रतिनिधी. जसे माणसासाठी गुळवेल, तसे आघाडा हे पशुचिकित्सेमधील एक प्रमुख औषध आहे.
देवतांसाठी ज्या फुलापानांची योजना केली आहे, त्याचा हेतु काय असेल ?
कधीतरी आयुर्वेदाभिमुख होऊन, वेगळी नजर वापरून, अध्यात्मामधील आरोग्याच्या छुप्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
आपल्या संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. त्या तश्याच जपायला हव्यात, नाहीतर एक दिवस जर्मनीतून एखादा प्रतिमॅक्समुल्लर धोतर नेसून यायचा आणि षोडशोपचार पूजा सांगणारा पुरोहित व्हायचा !
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
10.06.2017
१)गाईच्या दुधाचे दही:
चवीलागोड,आंबट,उष्ण,स्निग्ध,बलकारक, पुष्टिकर,भुक वाढविणारे व अजीर्णात उपयुक्त आहे.
२)म्हशीच्या दुधाचे दही:
चवीला गोड,आंबट,पचायला जड,स्त्राव उत्पन्न करणारे,स्निग्ध,वातनाशक,कफकर,रक्तदुषित करणारे,शुक्र व वजन वाढविणारे आहे.
३)शेळीच्या दुधाचे दही:
मल अर्थात संडासलाघट्टकरणारे,हलके त्रिदोषनाशक,भुक वाढविणारे,वजन वाढविणारे आहे.
आता आपण दह्याचे काही घरगुती उपचार पाहूयात:
१)कुळीथाचे अजीर्ण झाले असता ताजे दही कपड्यात बांधून टांगून ठेवावे व त्याचे निथळणारे पाणी प्यावे.
२)भुक लागते पण तोंडावर चव नाही असे असल्यास भोजन करताना मध्ये मध्ये दही+सैंधव+ खडी साखर हे मिश्रण घ्यावे.
३)पातळ जुलाब होत असल्यास दही+तूप+सैंधव हे मिश्रण भातात मिसळून खावे.
४)दह्यावरची साय २ चमचे+१ चमचा त्रिफळा चुर्ण+१ चमचा मध हे मिश्रण रोज रात्री घेतल्यास डोळ्यांना हितकर आहे.
५)कृश शरीराच्या व्यक्तींनी वैद्यांचा सल्ला घेऊन आठवड्यातून दोन वेळेस दुपारच्या जेवणात दही व खडी साखर हे मिश्रण घ्यावे.
दही अतिप्रमाणात खाल्ल्यास कफ व पित्ताचे विकार होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आस्यासुखं स्वप्नसुखम दधिनी
ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम।।
मधुमेह होऊ नये यासाठी काय करू नये, यासाठी आपण बघत असलेल्या या श्लोकाचे सार काय ?
प्रमेह होऊ नये म्हणून
अंगाला घाम आणून ।
शरीरातील क्लेद काढून
राहून सदैव दक्ष ।
आहारावर असावे लक्ष ।। 1।।
प्रमेह होण्यासाठी मधुर रसाबरोबरच न पचलेल्या आहारातून निर्माण झालेल्या कफाचा विकृत चिकटपणा म्हणजे क्लेद कारणीभूत असतो. जो तयार होऊ नये यासाठी सदैव दक्ष राहीले पाहिजे.
केली जर मेहनत
प्रमेह होईल नत ।
शरीरा येई लघुत्व
शंका मनी आणू नये ।।2।।
मेहनत केली तर मधुमेह नाहीसा होतो.
शरीराच्या हालचाली जेवढ्या जास्ती तेवढा शरीराला हलकेपणा येतो.
फिरायचे फिरोन करावे
बसायाचे बैसोन लिहावे ।
बसणे ठिकाणी झोपणे
ऐसे करणे बरे नव्हे ।। 3 ।।
जे काम फिरून करता येण्याजोगे असते, ते बसून करू नये, जे बसूनच करायचे असेल ते झोपून करू नये.
दीवास्वाप टाळावे
टेबलावरी लवंडावे ।
पांघरूण घेऊन झोपावे
हे क्लेदाचे कारण ।। 4 ।।
दुपारची झोप अजिबात नको. अपवाद ग्रीष्म आणि शरद ऋतु.
झोपायचे असल्यास जेवणाअगोदर एक डुलकी टेबलखुर्चीत बसून काढावी.
कष्टाची कामे करोन
झोपावे निश्चिंत होवोन ।
फुका कारणे लोळोन
क्लेद माजतो अंगासी ।।5।।
झोप तेव्हाच लागते, जेव्हा मेहनत करून थकवा आलेला असतो. जेवणानंतर येणारा अशक्तपणा हा क्लेद वाढवणारा असतो.
आळसे सुख मानो नये
सुखाचा अतिरेक करो नये ।
दुःखाचे दुःख मानो नये
अंतिम सुखी होण्यासी ।।6।।
झोपेचे सुख हे थकवा घालवण्यापुरते असावे. झोप पूर्ण होऊनही लोळत राहाण्याचे सुख घेण्याचा प्रयत्न करू नये.
शरीराला सुखाचा अतिरेक झाल्यास आयुष्य दुःखाचा अतिरेक सहन करावा लागतो. म्हणून देहे दुःख ते सुख मानीत जावे, आत्ता थोडासा त्रास वाटला तरी अंतिम सुख म्हणजे आरोग्य मिळेल.
आपुले औषध स्वये करिती
ते कुऱ्हाडीचा दांडा होती ।
पथ्यापथ्य वैद्यास पुसती
तयांसी नाव विवेक ।। 7।।
मिडीयाच्या माध्यमातून अनेक सल्ले घरगुती औषधे वाचनात येत असतील तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी म्हणून प्रत्येकाचे औषध वेगळे या नियमानुसार सर्व सल्ले आपल्यासाठीच असतात असे नाही. त्यातील ज्याचा अधिकार आहे, अशा वैद्यांना जरूर विचारावे.
वेगान न धारयेत
तहान नसता पाणी घेत ।
वृक्कासी व्यर्थ ताण देत
हेची प्रमेहासी आमंत्रण ।।8।।
पाणी गरजेनुसारच प्यावे.
तहान नसताना पाणी पिऊ नये.
सक्काळी सकाळी पाणी नको. रात्री झोपताना मुळीच नको. दात असताना ज्युस नको. अति खाण्याची हौस नको.
दूर रहावे चार हातं
फवारणी आणि खतं ।
पिकवाव्या स्वकष्टातं
फळे आणि भाज्या ।।9।।
रासायनिक फवारणी केलेली फळे आणि पालेभाज्या खाणे म्हणजे पोटावर अत्याचार करणे होय.
बांधून ठेविली कोंबडी
खाल्ली तिची तंगडी ।
पडली रोगाची उडी
वरच्या वरी ।।11।।
खुराड्यात माजवलेल्या पशुपक्ष्यांचे मांस खाऊ नये, याऐवजी स्वतःचे अन्न स्वतः शोधून खाणाऱ्या प्राण्याची निवड करावी.
सूरव्यास साक्षी ठेवून
जे करिती भोजन ।
सुखे होई परिवर्तन
खाल्ल्या अन्नाचे ।।12।।
जे प्राणी सुर्यास्तानंतर खातात, त्यांचे मांस खाऊ नये. किंवा सूर्य नसताना जे खाल्ले जाते, त्याचे रूपांतर क्लेदात होते.
क्लेद राक्षस जाणावा
अन्नासी सूर्य दाखवावा ।
क्लेदासी ठार मारवावा
सूर्या करवी ।।13।।
धान्य किमान एक वर्ष जुने करून वापरावे, त्यासाठी कडकडीत उन्हात ते आधी वाळवावे. नाहीतर भाजून वापरावे.
मत्स्य कूर्म अथवा खेकडा
जलाधिपति प्रमेहासी वाकडा ।
असे अन्न त्वरीत सोडा
जे क्लेदासी कारण ।।14 ।।
ज्या अन्नात पाणी किंवा जलांश जास्ती आहे ते अन्न टाळावे, जे पाणथळ जागी रहातात किंवा पाण्यातच जगतात, त्यांच्या अंगी मुळातच पाणी जास्त असल्याने असे प्राणी क्लेद वाढवतात.
मधुर ते ते सर्व सोड
म्हणजे फक्त नव्हे गोड ।
पचायला होती जड
या नाव मधुर ।। 15।।
गोड पदार्थ म्हणजे फक्त गुळ आणि साखरच नव्हे तर पचायला जे जड ते सर्व मधुमेहाचे कारण आहेत.
गव्हाचा होतो गाजावाजा
मधुर रसाचा आहे राजा ।
प्रमेहाची मिळेल सजा
चटणी भाकरीत आहे मजा ।।16।।
समुद्र किनारी गहू नको. कुकरचा चिकट भात नको. चटणी भाकरी सोलकढीशिवाय जेवण नको. गरजेपेक्षा जास्त नको.
सेवा केल्यावीण खाणे
म्हणजे नरकात जाणे ।
कशाला मग दूध पिणे
ताक तूप असताना ।।17।।
श्रमाचे काम न करता भरपेट जेवणे, गाईची प्रत्यक्ष सेवा न करता पैसे देऊन विकतचे दूध दही खाणे, त्यापासून बनलेल्या चाॅकलेट, मिठाया यांच्यावर ताव मारणे हे प्रमेहाला बोलावणे आहे. जसे, दुध आणि दही हे पदार्थ वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत. वैद्यांना माहिती नसल्यास हा श्लोक वाचून दाखवावा. आणि अर्थ सांगावा. पण दुध आणि दही यांचा मोह वेळीच सोडावा.
अग्नीचा विसर पाडोन
कधीही केले अन्नसेवन ।
होणार नक्की अपचन
ऐसे न करावे ।। 18।।
भुक नसताना जेवणे, घड्याळ सांगते म्हणून जेवणे, सूर्यास्तानंतर जेवणे, ज्या अन्नाने आपल्याला त्रास होतो, हे माहिती असून जेवणे, पहिले खाल्लेले पचले नसताना परत जेवणे, आग्रहाचे जेवणे इ. प्रमेहाचे कारण आहे.
यंत्रावर विसंबून
मन भावना मारून ।
इंद्रियांना गुंडाळून
आणि त्याला विसरून
रोगी होईल जीवन ।।19 ।।
याकरीता,
अखंड असावे सावधान
खातापिता ठेवावे भान ।
आयुष्य जगावे छान
औषधाविना कायमचे ।।20।।
इति अल्पमति प्रमेहसंप्राप्ती समाप्ती
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.02.2017
आवळा ह्याला आयुर्वेदा मध्ये आमलकी किंवा धात्री असे म्हणतात.धात्री अर्थात आई किंवा माता जी आपल्या अपत्यांचे भरण पोषण करते.आणी आयुर्वेदामध्ये आवळ्याला देखील असेच महत्त्व आहे कारण हा आवळा आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी व आपले पोषण वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यास करतो ह्यात वाद नाही.
आयुर्वेदामध्ये आवळ्याला रसायन औषधी असे देखील म्हटले जाते.कारण रसायन औषधी ह्या आपल्या शरीरातील सात ही धातुंचे योग्यप्रकारे निर्माण व पोषण करणारे औषध म्हणजे रसायन.ह्या औषधाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच रसायन औषध नित्य सेवन केल्याने शरीर लवकर वृध्द होत नाही अर्थात आपण ती च्यवनप्राशची ॲड पाहिली असेल ना ६० साल के बुढे या ६० साल के जवान त्यात तो वृद्ध च्यवनप्राश खाऊन कसा पटापट जीने चढतो तर एक तरूण व्यक्ती अगदी जीने चढताना अगदी दमून जातो.हेच दाखवते कि च्यवनप्राश हे रसायन औषध सेवन केल्याने म्हातारपण लांब रहाते आपल्या पासून.कारण च्यवनप्राश मध्ये देखील प्रमुख घटक हा आवळाच असतो.
आवळ्यामध्ये विटामीन सी अर्थात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.तसेच हा आवळा आपण नियमीत पणे आपल्या दैनंदिन जीवनात सेवन केल्यास तो आपल्या आरोग्याचे रक्षण हमखास व अगदी उत्तमरित्या करतो.
आपण नेहमी आवळ्याचे लोणचे करतोच.तसेच आवळ्याच्या कॅंण्डी देखील आता मिळतात अर्थात हा साखरेच्या पाकात शिजवलेले आवळे होय.तसेच आवळ्याचा च्यवनप्राश,आवळ्याचा रस,आवळ्याचे सरबत,आवळा चुर्ण,आवळ्याचा मुरंबा,आवळ्याचा पाक,आवळा सुपारी अशा नानाविध रूपांमध्ये तो बाजारात उपलब्ध आहे.त्यातील आपल्याला सोयीस्कर रूपांमध्ये त्याचे सेवन आपण करावे.
आवळा हा त्वचेची काळजी घेतो,रक्ताची शुद्धी करतो,श्वसन संस्थेचे आरोग्य राखतो,पचनसंस्थेचे आरोग्य नीट ठेवतो,प्रजनन संस्था देखील सांभाळतो,हाडांची काळजी घेतो असा वेगवेगळ्या पातळींवर एकटा खिंड लढविणारा हा आवळा काही खास औषधींपैकी एक आहे. ह्याच्या बद्दल लिहावे तेवढे थोडे आहे.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो,
आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ?
आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात,
खरं वाटत नाही.
पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ?
आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय.
नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ?
कालच्या आरोग्यटीपेवरील काही व्यक्त काही अव्यक्त टीका ....
आपण आपल्या धारणाच बदलून टाकल्या आहेत. म्हणजे जे मूलतः भारतीय विचार होते, ते कालबाह्य म्हणून टाकून दिले आणि ज्या लोकांना संस्कृती म्हणजे काय ? जेवावे कसे, हे माहिती नव्हते, त्यांना हे सर्व आपण भारतीयांनी शिकवले. आज त्यांचा अनुनय आपण करतोय ? ते सांगतात, त्यावर पूर्णसत्य म्हणून विश्वास ठेवतोय. कालाय तस्मै नमः । दुसरं काय ?
या लेख मालेतून आपण भारतीय आरोग्य ( आजच्या काळात किती श्रेष्ठ आहे हे ) जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण आधीच ठरवलेले आहे. त्यादृष्टीने सर्व लेखन चाललेले आपल्या लक्षात येत असेल.
आज आमची धारणा अशी झाली आहे, की जे जे पाश्चात्य ते ते चांगले. पण हे आमच्या लक्षात येत नाही, की त्यांच्या धारणा, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, हा भारतीय जीवनपद्धतीपेक्षा कितीतरी भिन्न आहे.
आजच्या शिक्षणपद्धतीमधला हा दोष आहे की आमचे ते सर्व वाईट आणि पाश्चात्यांचे सर्व योग्य असे शिकवले जाते. हे पण पटणारे नाही काही जणांना.
टाय बांधला की माणूस सुसंस्कृत, सुशिक्षित वाटतो. हे खरंही असेल पण तो खरंच तसा होतो का ? मग शेंबुड सुद्धा पुसता येत नाही अशा शाळेत जाणाऱ्या पोरांना टाय बांधायची आवश्यकताच काय आहे ? ( टायचा उपयोग शेंबुड पुसण्यापेक्षा आणखी चांगला काय असू शकेल ? ) केवळ दिसण्यापेक्षा आतून तसे भारतीय असणे आवश्यक वाटते.
मी मोदींची भलावण करतोय असं नाही, पण टाय न लावतादेखील भारतीय पोशाखात आपले व्यक्तिमत्व खुलवता येऊ शकते. विचार भारतीय असला की सगळं शक्य असतं.
पण काय भुललासी वरलीया रंगा... ही आमची स्थिती झाली आहे. भारताबद्दलचे प्रेम सोडता येत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचा मोह टाळता येत नाही. न घर का ना घाट का अशी अवस्था आपली झाली आहे.
त्याची कित्ती उदाहरणे सांगू. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती पाश्चात्य विचारांनी वागतोय, सहज हिशोब करीत बसलो होतो, तेव्हा असे लक्षात आले की तब्बल 127 ठिकाणी आम्ही आमच्या मूळ परंपरा, रितीरिवाज, भाषा, पोशाख, चालीरिती बदललेल्या आहेत, ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत चालला आहे.
म्हणून मी सुरवातीलाच म्हटले, मूळ भारतीय आरोग्यापासून आपण खूप लांब चाललो आहोत.
पालेभाज्यांच्या पार्श्वभूमीवर डोक्यात येणारे उलटसुलट विचार आजच्या ग्लोबलायझेशनच्या फास्ट ट्रॅक युगात रूचणारे नाहीत, पटणारे मुळीच नाहीत पण काय योग्य होते, आणि आपण काय करीत होतो, ज्यामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहात होते.
कुठेही शास्त्रीय आधार न सोडता, व्यवहारात काय चालले आहे, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
मी संपूर्णपणे भारतीय बनण्याचे ठरवलेले आहे. आत्ता सुरवात झालेली आहे. वेळ गेलेली नाही. आजपासून अजून पन्नास वर्षे शिल्लक आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.10.2016
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हो हाच तो भोपळा ज्यात बसून वाघाला चुकवून म्हातारी लेकिच्या घरी धष्टपुष्ट व्हायला गेली होती बरं का!ह्या लाल भोपळ्यांचे घारगे,वडे,भाजी,कोशिंबीर,भजी,चटणी सगळेच कसे रूचकर लागते.
हा भोपळा मोठा असला तरी वेलींवर उगवतो बरं का.जसे स्वयंपाकात ह्याचा भरपूर उपयोग होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हा वापरू शकतो.
लाल भोपळा हा चवीला गोड,तुरट व थंड असून शरीरातील पित्त व वात हे दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.
चला ह्याचे औषधी उपयोग पाहू:
१)अतिभूक लागून वारंवार काही तरी खावेसे वाटते तेव्हा भोपळ्याची उकडून केलेली भाजी किंवा तूपात तळलेले वडे खावे.
२)तोंडास रूची नसणे व अन्न नकोसे होणे ह्यात लाल भोपळ्यांचे दह्यात केले भरीत जीरे व तूपाची फोडणी व सैंधव घालून खावे.
३)धावपळ दगदग ह्यामुळे त्रास होत असल्यास १ कप भोपळ्याचा रस+१ चमचा साखर+ १/४ चमचा सैंधव घालून प्यावे.
४)भोपळ्याच्या बिया सोलून आतील मगज तूपात तांबूस परतून त्यात साखर घालून लहान लहान लाडू करावे व ते अशक्तपणा मध्ये तसेच लहान मुलांना खायला द्यावेत.
५)आजारी व्यक्तीला भोपळा उकडून वाटून त्यात साजूक तूप व जि-याची फोडणी देऊन केलेले सूप द्यावे.
भोपळा खायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गॅसनामा
गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.
फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "
हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.
या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.
गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !
हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.
वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.
या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.04.2017
लंबी सफर का घोडा
शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्थूल आणि सूक्ष्म हालचाल निरंतर होत असते. जिथे हालचाल आहे तिथे झीज आहे. ही झीज तर होणारच असते, ती अगदी कमीत कमी व्हावी याची काळजी घेणे हे आपले काम !
कोणत्याही गाडीकडे बघा. त्याच्या बेअरींगची झीज होऊ नये याकरीता ग्रीसींग करणे, गंजू नये यासाठी त्याला ऑईलपेंट लावणे, केबल्स लवकर खराब होऊ नये म्हणून ऑईलींग करणे, त्या गाडीला धुणे, त्याच्या इंजिनमधील तेल पाणी बघणे, हे आपण करत असतोच. याला आजच्या भाषेत "मेंटेनन्स" म्हणतात. नियमितपणे, आठवणीने याचा "मेंटेनन्स" करणे महत्त्वाचे, म्हणजे गाडी वारंवार गॅरेजमधे न्यावी लागत नाही.
ज्या गाडीचा मेंटेनन्स नीट नाही, ती गाडी, त्या गाडीचे अवयव लवकर खराब होतात. मग गाडी हळुहळू आवाज करू लागते. वारंवार गॅरेजमधे न्यावी लागते. तो सांगतो, या गाडीतल्या इंजिनमधील ऑईलची लेव्हल कमी झाली आहे, ऑईल बदलले पाहिजे, ब्रेक ऑईल संपले आहे, घालायला पाहिजे. चेनमधील ग्रीस संपले आहे, गियर केबल, क्लच केबल याना तेल सोडले पाहिजे.
आपण टीव्हीवर जाहीराती पहातो, त्यातही ट्रकच्या इंजिन मधील ऑईलच्या जाहीराती मुद्दाम पहा. ज्या इंजिनमधील तेल कमी, किंवा हलक्या दर्जाचे, त्या इंजिनचे 'मायलेज' कमी. मग तो ट्रक लंबी सफर का घोडा बनू शकणार नाही. त्यामुळे आमच्या कंपनीचे अमुक तेल वापरा ते इंजिनमधील कचरा दूर करील वगैरे......
तसेच शरीराचे देखील आहे.
दैनंदिन जीवनात या तेलाचे अनन्य साधारण महत्व असते. शरीरावर जेवढी म्हणून छिद्रे आहेत, त्या सर्व छिद्रामधून दररोज तेल आत सोडावे. जसे नाक, कान, डोळे, मलद्वार मूत्रद्वार, योनीमार्ग, आणि सर्व घर्मछिद्रे यांना तेलाचे पूरण होणे आवश्यक असते. तर आतील सर्व स्थूल अवयव आणि सूक्ष्म इंद्रिये यांचे पोषण होत असते.
शिलाई मशीनला जशी छिद्रे असतात. त्या छिद्राच्या जवळ लिहिलेले असते. "ऑईल." याचा अर्थ या छिद्रातून तेलाचे काही थेंब या मशीनमधे किमान आठवड्यातून एकदा तरी, सोडावेत, म्हणजे ही मशीन न झिजता उत्तम काम करेल.
जेव्हा हे मशीन कामाला येते, तेव्हा त्याला डाॅक्टरांच्या गॅरेजमधे नेले जाते. ते सांगतील की ही झीज नैसर्गिक आहे, वाढत्या वयामुळे हे असेच होणार, हे दुखणे आता गृहीत धरायचे, आता कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची वेळ सुरू झाली हा सांधा झिजलाय बदलून टाकू, इ. इ. जे एकदा आपण गृहीत धरले की औषधे आयुष्यभरासाठी सुरू झाली किंवा कापाकापी आली.
पण हेच मशीन जर वैद्यांकडे नेले तर वैद्य सांगतील, यातील तेल संपले आहे, तेल भरले पाहिजे, तेलाची बस्ती देऊया, शिरोधारा देऊया, अभ्यंग करूया, स्नेहन स्वेदन करूया, कर्णपूरण करूया, नस्य, मन्याबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, तेलधारा सोडूया. इ.इ.
केरळीय पंचकर्म करणाऱ्या वैद्यांकडे नेले तर तेल डोणीत ठेवूया, पंधरा लीटर तेलाने चार जणांकरवी मालीश करूया, पिझिंचिल, आदि पूरक पंचकर्म करूया, इ.इ.
चला या निमित्ताने आयुर्वेदात सांगितलेल्या या सर्व उपचारांची नावे तरी कळली !
एक लक्षात येतंय का पहा, आयुर्वेदात चिकित्सा स्वरूप उपचारामधे, तेलाचा सढळ आणि मुक्तहस्ते वापर करायला सांगितलेला आहे. इथे कंजुषगिरी करून चालत नाही. जेवढे तेल इंजिनला आवश्यक आहे, तेवढे ते दिलेच पाहिजे. जर तुम्ही दररोज "मेन्टेनन्स" करणार नसाल तर कधीतरी पंचकर्म करायला तर हवेच !
लंऽऽबी रेस का घोडा जो बनना है !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.04.2017
आहारातील या ग्लोबल बदलाचे परिणाम रोग स्वरूपात भोगावे लागणार आहेत हे नक्की. बदलाचे परिणाम आपणा सर्वाना समोर दिसत आहेत. सुदृढ, काटक, कोकणी माणसाची पोटे सुटु लागली. बुद्धीजीवी, बैठे काम करणारा श्रमजीवी शेतकरी, मधुमेहासारख्या आजाराच्या फाईल्स, मोठ्या अभिमानाने डाॅक्टरांच्या टेबलवर आपटून टाकू लागला.
Copyright © 2025 | Marathisrushti