(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • किचन क्लिनीक – केळे

    हे सर्वांचे आवडते व अत्यंत चविष्ट व पौष्टिक फळ आहे.ह्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत वेलची,हिरवी,सालदाटी,मांईडोळची,आंबटी इ.त्यातल्यात्या वेलची अर्थात ह्याला रसबाळी देखील म्हणतात उत्तम मानली जातात.

    गरीब,श्रीमंत,वृद्ध,लहान मुल असे सगळ्यांचेच पोषण करणारे हे फळ.ह्याचे पासून शिखरण,पाकातली केळी,गुळातला केळीचा हलवा,केरळ मध्ये तर केळी घालून केलेला बदामी हलवा देखील मिळतो,शेक,केळ्याचे पंचामृत असे अनेक प्रकार केले जातात व ते फार रूचकर लागतात.

    हि केळी चवीला गोड थंड शरीरातील वात व पित्त दोष कमी करणारी व कफ वाढवणारी असते.ह्याच सुंदर हिरवा वृक्ष असतो जो अत्यंत पवित्र मानला जातो व सत्यनारायण पुजेला तो वापरतात.

    चला मग आपल्या ह्या लाडक्या फळाचे औषधी उपयोग पहायचे ना:

    १)सुज आली असता सुजलेल्या भागावर गव्हाचे पीठ व पिकलेले केळे एकत्र कालवून गरम करून बांधावे.

    २)वारंवार भस्मक रोगा सारखी भूक लागत असल्यास केळीच्या शिकरणात तूप घालून खावे.

    ३)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास पिकलेले केळे+आवळकाठी चूर्ण+ त्याच्या दुप्पट साखर घालून हे मिश्रण दिवसातून एकदा खावे.

    ४)दम्यामुळे फुफ्फुसे कम कुवत झाली असल्यास एका पिकलेल्या केळ्यात रात्री ३ लवंगे टोचून ठेवावीत व ते रात्रभर झाकून ठेवावे सकाळी अनशापोटी लवंगासह ते केळे खावे व वरून १/२ कप कोमट पाण्यात २ चमचे मध घालून प्यावे ह्याने फुफ्फुसे बळकट व लवचीक होतात.

    ५)सुका खोकला वारंवार येत असल्यास पिकलेले केळे+१ चमचा मध + १/२ चमचा काळी मिरपुड हे मिश्रण काही दिवस सकाळ संध्याकाळी घ्यावे.

    केळी खायचा अतिरेक केल्यास भुक न लागणे व सर्दी होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेचाळीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस

    बाबा सांगतात...

    हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे.

    संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे.
    प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे "मित मधु भाषण" असावे.
    श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, थोडे सत्य ! जिथे जसे आवश्यक असेल तसे. प्रसंगोचित.

    कसे बोलावे, याची इतिहासातील काही उदाहरणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
    विदुराने सांगितलेली विदुरनीती,
    औरंग्याच्या दरबारातील शिवरायांनी दरबाराचा मान कसा राखायचा असतो, याबाबत राजा औरंगजेबाची त्याच्याच दरबारात केलेली कानउघाडणी,
    शिवरायांच्या वकीलाने अफजलकडे जाऊन केलेली यशस्वी बोलणी,
    रावणाच्या दरबारात जाऊन, सीतामाईना सोडून द्यावे अश्या अर्थाचे अंगदाचे बोलणे,
    मुक्ताबाईनी ज्ञानेश्वरांना सांगितलेले ताटीचे अभंग, किंवा चांगदेव पासष्टी,
    रामरायांनी वनवासात जाऊ नये याकरीता भरताने केलेली विनवणी आणि त्यावर श्रीरामांनी केलेले खंडन,
    युद्ध नको म्हणून सांगायला श्रीकृष्ण कौरवांकडे गेला, ती प्रसिद्ध कृष्णशिष्टाई.
    आणि अर्जुनाने युद्ध करावेच यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता
    ही सर्व उत्तम संवादाची उदाहरणे आहेत. मुद्दाम सांगण्याचे कारण आता ही उदाहरणे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली आहेत. ती मुळातून आपण अभ्यासावी आणि मुलांना शिकवावी.

    संवाद शब्दांनी वाढतो. मनात काय आहे, हे सुरांवरून कळते. काय करायला हवे हे देहबोलीतून कळते. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून समाधान मिळते.

    या सर्वांचा आरोग्याशी संबंध काय, असे मनात येणं साहाजिकच आहे.
    पुनः एकदा सांगतो, आपल्याला फक्त शारीरिक संतुलन म्हणजे आरोग्य, या संकुचित कोशातून बाहेर यायचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यासाठी हे गुण अंगी असावेच लागतात.

    आपल्याला काय होतंय, हे जर रूग्णाला सांगताच आले नाही तर, वैद्याला रुग्णाच्या वेदना समजणार तरी कश्या ? जर आपल्याला काय होतंय हे सांगता येत नसेल तर घरी असताना शांतपणे एका कागदावर अथवा वहीत लिहून काढावे. त्यावर तारीख, वेळ लिहावी, शक्य असेल तर त्रास होण्याअगोदर चार पाच दिवस आपण काय काय खाल्ले होते, कुठे फिरलो होतो, त्याचा त्रास झाला होता का, इ. गोष्टी पण लिहून ठेवाव्यात. जर ही सर्व माहिती आपल्याला, वैद्यांना नीट सांगता आली, तर वैद्यांना निदान करणे सोपे होते.
    आपल्यालाच नंतर भविष्यात ही आरोग्यवही, (खरंतर अनारोग्यवही) उपयोगी ठरणारी असते.

    रुग्णापेक्षा वैद्यांकडे ही संभाषण चातुर्य असले पाहिजे. योग्य प्रश्न विचारून रुग्णाला काय होते आहे, हे त्याच्याच तोंडून वदवून घेणं ही वैद्याची कला आहे.
    (म्हणजे रुग्णाला पोपट बनवायचे !! )

    विशेषतः पथ्य अपथ्य ठरवताना, रुग्णाचा आधीचा इतिहास समजावून घेणं, वैद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ज्या भाषेत वैद्य शिकलेला आहे, त्यापेक्षा रुग्णाची भाषा कोणती आहे, त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचा रोग समजावून सांगता यायला हवा. त्याच्या बरोबर संवाद साधता यायला हवा. आजच्या भाषेत सांगायचे तर रुग्णाचे कौन्सिलिंग म्हणजे संवाद ! बरं हा संवाद साधत असताना आपली देहबोली म्हणजे हावभाव पण महत्त्वाचे असतात.

    औषधांपेक्षा शब्द हे जास्ती गुणकारी असतात. कारण औषध फक्त पोटापुरते शरीरापुरते असते. शब्द हे त्यापलीकडील मनापर्यंत पोचतात. स्थूलापेक्षा सूक्ष्म हे जास्ती क्षमतेचे असते.

    मनापेक्षा सूक्ष्म आत्मा. त्याच्याशी होणाऱ्या या आत्मसंवादाला शब्दांची पण गरज नसते. तिथे, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ही अनुभुति असते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेरा

    पचन सुरू असताना शक्यतो दुसरे कष्टांचे काम करू नये. सवय नसेल तर नकोच. जर काम करायचे असेल तर जेवण नको. भरल्यापोटी अति श्रमाचे काम करणे म्हणजे पचन बिघडवणे. लमाणी लोकांची गोष्ट वेगळी. त्यांना पहिल्यापासूनच अति कष्टाच्या कामाची सवय असते.

    पचन होत असताना त्यात पित्ताशयाकडून येणारे पित्त, स्वादुपिंडातून पाझरणारे स्राव इ. मदतीला असतात. हे पचनाचे काम करताना अन्य दुसरी अनावश्यक कामे बंद करणे अपेक्षित असते.

    आता खरे पाचन सुरू होते. आपल्याला हवे तसे आपण संस्कारीत करून घेतले, दात जीभेला जे हवे तसे भरडून आत उतरवले, इथपर्यंत पचनावर आपला ताबा असतो. जे काही अपेक्षित बदल आहेत ते इथपर्यंतच. एकदा घश्याखाली अन्न उतरले की आपला अंमल संपला. डिपार्टमेंटच बदलले. आता त्याला हवे तसे योग्य ते बदल तो करू लागतो. आधीच ठरवलेल्या फाॅर्म्युल्याप्रमाणे योग्य ती पाचक द्रव्ये तिथे आणली जातात. नीट घुसळली जातात. सर्व रस एकजीव होतात. अग्निनारायण मदतीला असतोच. रंजक पित्त, पाचक पित्त, समान वायु, बोधक कफ हे मदत करीत असतात. त्या सर्वांचं एक मिश्रण तयार होते, आणि हळुहळू पुढे सरकू लागते. पोटाच्या म्हणजे जठराच्या अगदी सुरवातीला आणि शेवट असलेले दोन्ही दरवाजे बंद केले जातात. एकदा मिक्सर सुरू झाला की दरवाजे मधे उघडू नयेत.

    आणि पोटाचे स्नायु उलट सुलट फिरू लागतात. म्हणजे मधेच उलट मधेच सुलट. अगदी पुरण यंत्राप्रमाणे, जेव्हा पुरण खाली पडायचे बंद होते तेव्हा मधेच दोन तीन वेळा उलट फिरवले की कसे, जाळीला चिकटून बसलेले पुरण कसे सोडवले जाते, तसे.
    किंवा इमारतीला स्लॅबसाठी आवश्यक असलेले सिमेंट, वाळू, खडी, पाणी जसे अगोदरच ठरलेल्या प्रमाणात, त्या मोठ्या मिक्सरमध्ये घालून फिरवले जाते, आणि योग्य वेळानंतर दुसऱ्या बाजूला ओतले जाते, एक वेगळेच मिश्रण तयार झालेले असते.

    अगदी तस्सच पोटात अन्नरस तयार झालेला असतो. त्यात अजूनही काही स्राव मिसळणे बाकी असते. हे पचन जिथे चालते त्या अवयवाचे नाव ग्रहणी असे आहे. पोट आणि लहान आतडे यांच्यामधे अर्धकंसाच्या ( आकाराचा हा अवयव असतो.

    या अवयवाच्या दुष्ट होण्यामुळे किंवा अन्य दोषांच्या परिणामामुळे ग्रहणी नावाचा आजारही होतो, जो आजार चिकित्सेसह फक्त आयुर्वेदात वर्णन केला आहे.
    कोण म्हणतं नावात काही नाही म्हणून ???

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    28.03.2017

  • आहारसार भाग ७

    केवळ फवारणी करणार्‍या शेतकऱ्याला जर कॅन्सर होतोय तर हे धान्य खाणार्‍यांना तो होईल की नाही, हे नीट विचार करून पहावे. ही समस्या फक्त भारतातीलच आहे असे समजू नये. पूर्ण जगात या रासायनिक शेतीचे कॅन्सर रूपी राक्षसी परिणाम दिसताहेत.या रासायनिक खत आणि विषारी औषधे निर्माण करणार्‍या भांडवलदार कारखानदारांची लाॅबी एवढी मजबूत आहे, की कोणत्याही देशातील सरकार उलथवून टाकण्याची यांची ताकद आहे.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 7

    आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ?

    दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे.
    काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण घ्यावे. म्हणजे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.

    आधी पोटोबा मग विठोबा
    आधी स्वार्थ मग परमार्थ
    या म्हणी केव्हा तयार झाल्या असतील ? कोणत्या परिस्थितीमधे तयार झाल्या असतील, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. एका पिढीपूर्वीची मुलाखत घेतली तर याचा उलगडा होत जाईल.

    ती माणसे सांगतात, आमच्यावेळी सूर्यास्ताचे अग्निहोत्र झाले की लगेचच दिवसाउजेडी एकाने देवाकडे, अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा, ( घरात येणारी लक्ष्मी काळोखातून कशी येणार ? म्हणून अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा. ) तर दुसरीने स्वयंपाकघरात दिवा लावून पाटपाणी घ्यायचे. आधी स-अवकाश भोजन करून नंतर सावकाऽश भजन करीत बसायचे...... मग परमार्थ !

    तेव्हा सारवलेल्या जमिनीवर ताट पाट मांडून खाली बसून, मांडी घालून पंगत वाढून जेवायचे. घरात कुटुंब नियोजन नव्हते, गोकुळ होते. दहा पंधरा माणसे एकमेकांशी बोलायची, शुभंकरोती एका सुरात म्हटली जायची,पाढे पावकी निमकी, सर्व श्लोक स्तोत्रे यांची उजळणी व्हायची.

    चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या घरातील परिस्थिती आठवली तर टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे रेडीओ आणि सिनेमा थिएटर. थिएटरमधे जाऊन हौस म्हणून सिनेमा पहाणे त्या तिकिटासाठी तब्बल दोन ते अडीज रूपये खर्च करणेदेखील परवडत नव्हतं. एवढा श्रीमंत काळ आपण अनुभवला आहे.

    त्याआधीची फक्त वीसेक वर्षे आता आठवून पहा. म्हणजे आपल्या बाबांच्या लहानपणीचा काळ सुखाचा......

    रेडिओ ही अत्यंत प्रतिष्ठेची चीज होती, गावातील एखाद्या घरीच तो असायचा, बिनाका गीतमाला ऐकायला दर्दी गर्दी जमायची, तेव्हाच्या काळातील जेवणाच्या वेळा आठवून बघा, त्या काळातील ज्येष्ठ माणसांना आजही विचारून पहा. तेपण सांगतील, " आमच्या तारूण्याच्या सुवर्ण युगात आमची जेवणे दिवसाउजेडी संपायची. लाईटपण नव्हता तेव्हा. रात्री साडेआठ नऊ वाजता झोपी जात होतो."

    विज्ञानयुग आले, विद्युतीकरण झाले, प्रगती झाली, विकास झाला. कोपऱ्यात टीव्ही आला. करमणुकीचे साधन बदलले, दूरदर्शनवर बातम्या देणारी माणसे, त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या माशा देखील पहाता यायला लागल्या. मालिका पहायला वेळ कमी पडू लागला. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात कुकर आला, मिक्सरपण आला. मनोरंजन ही गरज बनली. खाना खान्यातला (म्हणजे स्वयंपाकघरातला) वेळ दिवाणखान्यात जाऊ लागला.
    गोजिरवाण्या घरात लाजीरवाण्या सिरीयल सुरू झाल्या. बातम्यांपेक्षा जाहीरातीमधे जास्ती वेळ जाऊ लागला. आणि हळुहळू सगळंच बदललं. सुखाच्या कक्षा वाढत गेल्या आणि.....
    विठोबा मागं गेला आणि पोटोबा पुढे आला........

    कसं बदलत गेलं? कोण बदलत गेलं ? कोणी बदललं हे सगळं? कधी कळलंच नाही.

    मुठीत घट्ट धरून ठेवलेल्या वाळूसारखं दोन्ही बाजूने ते बाजूला कधी पडत गेलं लक्षातही आलं नाही. आरोग्याची मूठ कधी रिकामी झाली, ते कधी समजलं देखील नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02.03.2017

  • आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ९

    इथे मूळ सूत्राच्या अर्थापेक्षा, त्यातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छीतो. इथे जेवणाच्या दोन वेळा अगदी स्पष्टपणे सांगितल्या गेल्या आहेत. प्रातः आणि सायम्. सकाळ आणि संध्याकाळ. काळाचा विचार करता त्या काळी सकाळी आणि संध्याकाळी जेवणे हे अगदी सामान्य होते. त्यामुळे त्यावर आणखी विशेष भाष्य पुढील टीकाकारांना करावेसे वाटले नसेल.

  • आजचा आरोग्य विचार – भाग दहा

    झोपण्यापूर्वी पुनः एकदा दंतधावन करावे, असे फक्त आजचेच विज्ञान सांगते असे नाही तर भारतीय संस्कृती सुद्धा सांगते.
    रात्री झोपताना कोणत्याही घरगुती अथवा कंपनीमेड दंतमंजनाने दात जरूर घासावेत. खळखळून चुळा भराव्यात आणि परत काहीही तोंडात न टाकता झोपावे.

  • प्रमुख आहार सूत्र – भाग २

    पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध देखील !
    यांच्यातील काही साम्य.
    दोन्ही घटक आहारीय. म्हणजे आहारातील मुख्य. एक बालकांचे एक इतरांचे.
    यांच्याशिवाय आहार पूर्ण होतच नाही.
    दोघांविषयी जनमानसात प्रचंड गोड गैरसमज.
    आणि महत्वाचे म्हणजे मधुमेहाचे हे दोन मोठे मित्र !
    मधुमेह होण्यामधे आणि वाढवण्यामधे.

    पाणी हे जसे मधुमेह वाढवायला मदत करते तसे ते रक्तदाब वाढवायलाही मदत करते. तसेच दूध हे देखील मधुमेहाला वाढवते.

    पाणी आणि दूध दोघे एकमेकामधे असे काही एकजीव होऊन जातात. की पाण्यात दुध की दुधात पाणी समजाणार सुद्धा नाही.

    असो.

    मोठ्या शहरामधे तर आपल्या घरात येणारे प्लॅस्टिकच्या पिशवीतील दूध, हे दूधच आहे की नाही, हे शोधण्यासाठी फार कष्ट करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. एकवेळ पाणी शुद्ध करता येईल. पण दूध शुद्ध करणे हे महाकठीण काम. दूध शुद्ध करण्यासाठी गोवंश शुद्ध करण्यापर्यंतचा प्रवास करावा लागेल.

    जिथे जिथे दूध असा उल्लेख आयुर्वेदात येतो, तिथे ते गाईचेच वापरावे. हे जेव्हा लिहिले होते त्या काळात गाईमधे "हायब्रीड" हा प्रकार नव्हता. जे दूध उपलब्ध होते, ते सर्व शुद्ध देशी भारतीय वंशाचेच होते.

    सरकारी यंत्रणेने दुधाचा महापूर योजने अंतर्गत विदेशी वळू आणून आमच्या अस्सल देशी गाई नासवल्या. खरंतर दुधासाठी नव्हे तर भरपूर मांस मिळवण्यासाठी, विदेशी माजवलेले वळूंचे वीर्य आणले गेले हे खरे सत्य आहे. ( खोटे सत्य असते काय ? हो. भारतात असते. सांगायचे एका कारणासाठी. असते दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे खोटे सत्य. "सत्य" शब्द देखील असा नासवलाय, की आता तो वापरतानादेखील खुलासा करावा लागतोय. हे दुर्दैव.

    आणि आता तर विदेशी गोवंशाचा हैदोसच सुरू आहे. औषधाला देखील देशी गाय उपलब्ध राहिलेली नाही. दूध, दही, लोणी, ताक, तूप या आहारातील सर्वात श्रेष्ठ अश्या दैनंदिन वापरातील पदार्थांविषयी खात्रीने सांगावे असा एकही पदार्थ आज उपलब्ध नाही.

    कोणत्या तोंडानी वैद्यांनी सांगावे, दूध प्या म्हणून ? आणि या या अश्या विदेशी गाईचे दूध प्यावे म्हणून? जे अत्यंत विषारी आहे. एकाही मिडीयाने याची दखल घेतलेली नाही. प्रत्येकाचे लागेबांधे कुठेतरी आहेत. दूध हे दुध राहिलेले नाही. जोपर्यंत आपण आपले पूर्ण शुद्धिकरण करत नाही, तोपर्यंत दुधापासून थोडं लांबच राहिलेलं बरं.
    नाहीतरी दुध मधुमेहामधे वर्ज्यच सांगितलेले आहे.
    एवढं स्पष्ट लिहून देखील काही जण प्रश्न विचारतील, मग आम्ही दूध पण प्यायचे नाही का ?
    आता काय सांगावे ?

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.01.2017

  • आहारातील बदल भाग ५४ – चवदार आहार -भाग १५

    रस्साभाजी मधे रस्सा महत्वाचा !
    ग्रेव्ही महत्वाची. त्यातले पदार्थ बदलले की परिणाम बदलणार .
    जसं कोणत्याही भाजीतले पाणी हे वात वाढवणारे असते. पण पाण्याशिवाय, केवळ परतून किंवा वाफेवर, ज्या भाज्या बनवल्या जातात, त्या वात वाढवत नाहीत.

    पण पाणी घालून शिजवलेल्या भाज्या वात वाढवतात.

    जसं बटाटा हा वात वाढवतो. म्हणजे बटाटावडा करताना बटाटा जसा शिजवला जातो तसा पाण्यात शिजवला तर वात हमखास वाढणार. बटाट्याच्या काचऱ्या केल्या तर त्याला पाणी लागत नाही. म्हणून वात तेवढा वाढणार नाही. बटाटे चिरून, थोड्याश्या तेलात परतून मग पाणी घालून शिजवले तरी त्याचे गुण बदलतात.
    पण हाच बटाटा बार्बिक्यु सारखा थेट अग्निवर भाजला तर पचायला शिजवल्यापेक्षा, काचऱ्यांपेक्षाही हलका होतो.

    भरली वांगी वांग्यामधे मसाला भरून केली जातात. पण भाजली जात नाहीत, फक्त शिजवली जातात, म्हणून पचायला जड होतात.
    वांगी बटाटा रस्सा हा फोडी परतून नंतर पाणी, मसालाग्रेव्ही घालून केला जातो. भाजल्यामुळे पचन थोडे सुलभ होते.
    वांग्याच्या काचऱ्या नुसत्याच परतल्या जातात, पाणी घातलेच जात नाही, म्हणून वांग्याच्या काचऱ्यांची भाजी पचायला हलकी. तर भरताचे वांगे शिजवण्याऐवजी भाजलेच जाते. पचायला आणखी हलके. वांगे एकच. मसाला जवळपास तोच. पण संस्कार बदलले की गुणधर्म बदलतात.

    पदार्थ जरी तिखट चवीचा असला तरी, तो पदार्थ बनवताना कसा बनवला जातोय, हे महत्वाचे.
    म्हणून रसभाजी, सुकी भाजी, परतून भाजी आणि बार्बिक्यु या सर्व तिखट पदार्थांचे परिणाम वेगवेगळे होतात.
    हा आहे संस्काराचा परिणाम.

    ग्रेव्ही करताना जे पदार्थ वापरले जातात, ते सुद्धा वेगवेगळे परिणाम दाखवतात. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही, नारळाची ग्रेव्ही, काजूची ग्रेव्ही, ही क्रमशः पचायला जड होत जाते.

    कोकणात रसभाजीला, चणाडाळीच्या पीठाचे अळण लावतात. अळण म्हणजे भाजीला घट्टपणा येण्यासाठी, भाजीतला रस आळण्यासाठी घातला जाणारा पदार्थ.
    काही ठिकाणी तांदुळाचे पीठ पण वापरतात.

    पाणी आणि भाजी शिजवल्यावर एकजीव होऊन जावीत, एकमेकांशी फटकून वागू नयेत, वाढलेल्या ताटात वेगळे वळण काढू नये, यासाठी हे अळण.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    15.11.2016

  • आहारसार भाग २

    आजच्या भाषेत बाजारी टिकावू खाद्यान्न, बेकरी फूड, हाॅटेलचे खाद्य, डबाबंद खाद्यपदार्थ, अर्धतयार अन्न, म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं तर किंडर, जेम्स सारखी चाॅकलेटस्, लेज, कुरकुरे, दो मिनट नूडल्स, पेप्सीकोक, मॅक आणि पिझ्झा हट्टचे अन्न इ.इ. हे सर्व तयार करताना कसली तेलं, पीठं पाणी वापरतात, कसं समजणार ? हे सर्व परान्न.