झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच.
हे जंगली फळ असल्याने ह्याला जंगलची काळी मैना म्हणतात.घनदाट काळ्या झुडपात हि पिकतात साधारणपणे डोंगराळ भागात.करवंदांची फळांच्या पुड्या घेऊन लोक हायवेच्या कडेला किंवा बाजारात बसतात.
करवंदे कच्ची असताना टणक,हिरवी,आंबट तुरट चवीची व उष्ण आणी पित्तकर व वातनाशक असतात.तर पिकलेली करवंदे जांभळी चवीला आंबट गोड व थंड आणी कफपित्त नाशक असतात.कच्ची करवंदे लोणचे करायला वापरतात.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या करवंदांचे लोणचे भुक वाढविते,खाल्लेल्या अन्नात पाचक स्त्राव मिसळून त्याचे चांगले पचन करविते.
२)पोटात पित्त वाढून आग होत असल्यास पिकलेली गोड करवंदे खावीत आराम पडतो.
३)गांधीलमाशी किंवा विषारी किडा चावल्यास करवंदे कुचकरून त्याची चटणी दंश झालेल्या भागी चोळावी.
४)पोपटामध्ये वात धरून पोट फुगले व दुंखु लागल्यास मुगाचे कढण करावे व त्यात ५ कच्ची करवंदे व १ मोठा चमचा दही घालून प्यावे फायदा होतो.
५)तोंडास रूची नसणे,तोंड बेचव होणे ह्यात ८-१० करवंदे चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावा तोंडाची चव सुधारते.
कच्ची करवंदे जास्त खाल्ल्यास पोटात आग होते तर पिकलेली करवंदे जास्त खाल्ल्यास पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपली पचन प्रक्रिया कशी चालते, ही समजून घेण्यासाठी, हे क्रियाशारीर सोपे करून, ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तवाशी याचा डिट्टो संबंध असेलच, असे नाही. आपल्याला कुठे लेखी परीक्षा द्यायची नाहीये.
लाळेचे काम फक्त तोंडापुरतेच मर्यादित असते. नंतरची पचनाची जबाबदारी लाळेची नाही. मुळात अल्कलाईन नेचरची म्हणजे अल्कली ( क्षार ) गुणधर्म असलेली ही लाळ जेव्हा पोटात जाते, तेव्हा पोटात वाढलेल्या पित्ताला कमी करते आणि लाळेचे अस्तित्व संपते.
म्हणजे जेवढी लाळ जास्त तेवढेच तोंडातून सुरू होणाऱ्या पचनाला मदत होते. म्हणून जेवढे चर्वण जास्त तेवढे पुढे पोटातील पचन सुलभ होते.
भारतीय परंपरेमधे जेवणानंतर मुखशुद्धी खाल्ली जाते, ती याच कारणासाठी! घाई घाईने जेवताना, चावताना जी लाळ कमी पडते, त्याची पूर्तता या मुखवासाने पूर्ण केली जाते. मुखवास ही वेगळी टीप होईल. इथे फक्त उल्लेख आलाय म्हणून सांगितले.
जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा तोंडाची चव निघून जाते, भूक कमी होते. या शरीराकडून निर्माण होणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. ताप आल्यावर शरीरातील अग्निची स्थिती बदलते. कोष्ठातील अग्नी, कोष्ठ सोडून बहिर्गम होतो, तेव्हा भूक लागत नाही. अशावेळी जर आपण अन्न सेवन केले तर ते पचतच नाही. म्हणजेच ताप आल्यावर भूक न लागणे, ही शरीराकडून आपोआपच केली जाणारी प्रक्रिया पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी केलेली एक प्रतिबंधात्मक उपाययोजनाच आहे.
अशावेळी भूक नसताना जेवणे हे रोगाला निमंत्रण देणे असते. आयुर्वेदानुसार भूक लागणे हा एक वेग आहे. शरीराकडून केली जाणारी प्रक्रिया आहे. तिला वेळीच ओळखून सन्मानाने, आदर राखत न जेवणे हे हितकर असते. यालाच शास्त्रीय भाषेत, ज्वरादौ लंघनम् कुर्यात ! असे म्हटलेले आहे. म्हणजे तापाच्या सुरवातीला एखादा दिवस लंघन करावे. उदरगुहेचा द्वारपाल असलेल्या तोंडात जोपर्यंत लालास्राव निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आतमधे कोणालाही सोडायचे नाही. आत (पोटा) मधे अग्नीची पुनः स्थापना झाली की, त्याच्याकडून संदेश येतो, "आता जेवायला हरकत नाही", तेव्हाच जेवावे. (प्रकृतीनुसार हे लंघन कसे करावे, हे बदलते असते. इथे वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. )
लाळ जेवढी गिळता येईल तेवढी गिळावी. काही जणांना खूपच लाळ सुटते, त्यांनी तुरट चवीचा वापर जेवणानंतर अवश्य करावा. झोपेत लाळ गळण्याचा संबंध कृमीशी असू शकतो, किंवा खून दमलेल्यामुळेदेखील जेव्हा झोप लागते, तेव्हा तोंडातून लाळ गळते, हा रोग नाही. केवळ दंतमंजन वापरले तरी हे लक्षण कमी होते.
शरीराकडून काही प्रतिक्रिया या रोगसूचक असतात, तर काही नैमित्तिक असतात. जेवणानंतर तासाभरात ढेकर येणे स्वाभाविक असते. पण दिवसभर ढेकरा येणे हे पचन बिघडल्याचे लक्षण आहे.
बोटाला जरा कुठेही जखम झाली की लहानपणी लगेच बोट तोंडात जायचे, त्याला लाळ लागायची, ओठांनी जखम दाबून धरली जायची आणि जखम बरी देखील व्हायची. सर्व प्राणीमात्र आपले शरीर जीभेने म्हणजे लाळेनेच स्वच्छ करतात.
मी असं अजिबात म्हणत नाही की, आपणही आपले शरीर असेच चाटत बसावे. पण लाळेमधल्या या शक्तीवर अजून संशोधनाला वाव आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.03.2017
या सदरात आपण दोन छोटे स्पेशल तपास पाहणार आहोत. यात एच.एस.जी. अथवा हिस्टेरोसालपिंगोग्राफी ही गर्भाशयाची नलिका तपासणारी चाचणी परीक्षा होय.
हे सर्वांचे आवडते व अत्यंत चविष्ट व पौष्टिक फळ आहे.ह्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत वेलची,हिरवी,सालदाटी,मांईडोळची,आंबटी इ.त्यातल्यात्या वेलची अर्थात ह्याला रसबाळी देखील म्हणतात उत्तम मानली जातात.
गरीब,श्रीमंत,वृद्ध,लहान मुल असे सगळ्यांचेच पोषण करणारे हे फळ.ह्याचे पासून शिखरण,पाकातली केळी,गुळातला केळीचा हलवा,केरळ मध्ये तर केळी घालून केलेला बदामी हलवा देखील मिळतो,शेक,केळ्याचे पंचामृत असे अनेक प्रकार केले जातात व ते फार रूचकर लागतात.
हि केळी चवीला गोड थंड शरीरातील वात व पित्त दोष कमी करणारी व कफ वाढवणारी असते.ह्याच सुंदर हिरवा वृक्ष असतो जो अत्यंत पवित्र मानला जातो व सत्यनारायण पुजेला तो वापरतात.
चला मग आपल्या ह्या लाडक्या फळाचे औषधी उपयोग पहायचे ना:
१)सुज आली असता सुजलेल्या भागावर गव्हाचे पीठ व पिकलेले केळे एकत्र कालवून गरम करून बांधावे.
२)वारंवार भस्मक रोगा सारखी भूक लागत असल्यास केळीच्या शिकरणात तूप घालून खावे.
३)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास पिकलेले केळे+आवळकाठी चूर्ण+ त्याच्या दुप्पट साखर घालून हे मिश्रण दिवसातून एकदा खावे.
४)दम्यामुळे फुफ्फुसे कम कुवत झाली असल्यास एका पिकलेल्या केळ्यात रात्री ३ लवंगे टोचून ठेवावीत व ते रात्रभर झाकून ठेवावे सकाळी अनशापोटी लवंगासह ते केळे खावे व वरून १/२ कप कोमट पाण्यात २ चमचे मध घालून प्यावे ह्याने फुफ्फुसे बळकट व लवचीक होतात.
५)सुका खोकला वारंवार येत असल्यास पिकलेले केळे+१ चमचा मध + १/२ चमचा काळी मिरपुड हे मिश्रण काही दिवस सकाळ संध्याकाळी घ्यावे.
केळी खायचा अतिरेक केल्यास भुक न लागणे व सर्दी होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. !
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुखांची अनुभूतीच जणू.
ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने ३-६ इंच लांब भालाकार,स्निग्ध,चमकदार असतात.फुले हिरवी सफेद सुगंधित असतात.फळ १/२-११/२ इंच लांब ,अंडाकार असते.हे कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर जांभळे होते त्याच्या आत मोठी टणक बी असते.
जांभुळ हे चवीला तुरट,गोड,आंबट असते व थंड गुणाचे असते.त्यामुळे ते शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करते व वात दोष वाढविते.
जशी हि जांभळे खायला छान लागतात तसेच ह्यांचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.
१)अंगाची आग होत असल्यास जांभळाचा शिरका (अर्थात जांभळाचा आंबवलेला रस) तीळ तेलात मिसळून अंगाला लावावा.
२)डायबेटिस मध्ये रक्त व लघवीतील साखर नियंत्रणात ठेवायला जांभळाच्या बियांचे चुर्ण सकाळी व रात्री १-१ चमचा रिकामी पोटी घ्यावे.
३)जाभळाच्या कच्च्या फळाच्या रसात मीठ घालून गुळण्या केल्यास दातहलणे,हिरड्या सैल होणे,तोंड येणे,तोंडातून रक्त स्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
४)जुलाब होत असल्यास अथवा संडास मधून आव पडत असल्यास जांभळाच्या कच्च्या फळाचा रस १/२ कप + १ ग्लास ताक हे मिश्रण थोडे थोडे दिवसातून ३-४ वेळा प्यावे.
५)भुक न लागणे,तोंडाला चव नसणे,ह्यात पिकलेल्या जांभळाचा रस १ कप+ १ मोठा चमचा आल्याचा रस +१/४ चमचा काळी मिरीपूड हे मिश्रण २१ दिवस जेवणापुर्वी घ्यावे.
जांभळे खाण्याचा अतिरेक केल्यास बध्दकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शेंगभाज्या
आता पर्यंत आपण पुष्कळ फळ भाज्या पाहिल्यात आता आपण एक वेगळा भाज्यांचा गट पाहूयात ज्यांना आपण शेंगभाज्या म्हणतो.
शेवग्याची शेंग
तर प्रथम पाहूयात आपण सर्वांच्याच आवडीची शेंग भाजी ती म्हणजे शेवगा.ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी,आमटी,लोणचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात.कधीकधी ह्या कोवळ्या शेंगा तळून खायला देखील रूचकर लागतात.
ह्या शेंगा शेवग्याच्या भल्या मोठ्या उंच वृक्षावर लागतात.ह्या शेंगा चवीला तिखट,कडू व उष्ण असतात आणी त्या शरीरातील कफ व वात दोष कमी करतात व पित्त दोष वाढवितात.
जसा ह्यांचा उपयोग रुचकर स्वयंपाक करायला होतो त्यांच प्रमाणे ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.कसा ते पहायचे ना:
१)२ कोवळ्या शेंगा तुकडे करून १/२ लिटर पाण्यात उकळून आटवून १/२ ग्लास शिल्लक ठेवावे त्यात १ चमचा मध व १/४ चमचा सुंठपूड घालावी व हे पाणी सकाळी व संध्याकाळी ४ वाजता प्यावे असे केल्याने सांधेदुखी,ठेच लागून झालेली दुखापत,कंबरदुखी ह्यात आराम मिळतो.
२)अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तींच्या जेवणात शेवग्याच्या शेंगांची आमटी अथवा भाजी ठेवावी.
३)मासिक पाळी उशीरा येणे,ओटीपोटात दुखणे,स्त्राव कमी होणे अशा तक्रारी असणा-या स्त्रीयांना शेवग्याच्या शेंगांचा सूप त्यात जिरे घालून द्यावा.
४)कृमिंचा त्रास असणा-या व्यक्तिंना शेवग्याच्या जून शेंगा वाफवून रोज सकाळी ती खायला द्यावी व नंतर त्यावर तासाभराने २५मिली एरंडेल तेल प्यायला द्यावे.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
साधी कणिक मळून झाली की हाताला किती चिकटून रहाते ? काढायची ठरवली तरी येत नाही. एवढी चिकट आहे. पोटातही तशीच चिकटून रहाणार. असे थरावर थर बसत गेले की ट्रॅफिक जाम होणारच !
पाणी शुद्धीकरण भाग आठ
पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात.
अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे आयुर्वेद मानतो. काही औषधे सूर्यप्रकाशात तर काही चंद्रकिरणात करायला सांगितली आहेत. काही वनौषधी विशिष्ट नक्षत्र असताना काढायला सांगितले आहे.
तसेच काही धातुंचा संपर्क पाण्यातील अशुद्धी दूर करतो. शुद्धीकरणासाठी सर्वश्रेष्ठ धातु आहे, सोने. विषहर असा त्याचा गुणधर्मही सांगितलेला आहेच. पाणी पिताना, साठवताना सोन्याच्या भांड्यात साठवावे, हे आज सर्व सामान्यांनाच नव्हे तर उच्च श्रीमंत असलेल्याना सुद्धा जमणारे नाही. ( आणि आता तर एका परिवाराकडे अमुक तोळेच ठेवण्याचे चालले आहे म्हणे ! असो ! ) सोन्याचे पाणी स्वभावाने उष्ण गुणाचे तर चांदीच्या भांड्यातील पाणी थंड गुणाचे आहे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी उत्तम गुणाचे आहे, पण ते सूर्य उगवल्यानंतर भरावे आणि सूर्यास्तापर्यंत संपवावे. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कळकते. चव बदलते, क्वचित हिरवट छटादेखील येते.
मातीचे मडके जे पूर्ण भाजलेले असते, त्या मातीतील अशुद्धी दूर झालेल्या असतात. अशा मातीच्या मडक्यात उकळून, गाळून भरलेले पाणी ठेवले तर नक्कीच चांगले असेल.
शुद्धीकरणाचे मापदंड आज व्यवहाराच्या पातळीवर तपासलेच पाहिजेत. शक्यता आणि वास्तवात खूप अंतर असते. गृहीत धरून नाही चालणार काही गोष्टी !
धातु जर शुद्ध स्वरूपात मिळत असतील तर त्यात ठेवलेल्या पाण्याची शुद्धी होईल, नाहीतर आगीतून फुफाट्यात....
प्रत्येक गोष्टीची शुद्धी करण्याची पद्धत आणि मापदंड वेगळे असतात. तांदळाची शुद्धी पाण्याने धुण्यात होते. तर सोन्याची शुद्धी अग्नीत जाळल्याने होते. बिब्बा शुद्ध करायचा झाल्यास दुधातच उकळावा लागेल. आपल्याला एखाद्या पदार्थाची शुद्धी का आणि कोणत्या प्रकारची शुद्धी अपेक्षित आहे, हे ठरवून ती, त्या पदार्थाला अनुकुल अशी प्रक्रिया करावी लागेल.
केवळ ग्रंथात सांगितले नाही, म्हणून हे शुद्धीकरण आम्हाला मान्य नाही असे म्हणून कसे चालेल ? काही "अनुक्त" विचारात ठेवावे लागतील.
दूध हे आरोग्यासाठी चांगले असते, ही एका जमान्यातली ग्रंथोक्त गोष्ट झाली. पण कुठचे ? कसे ?
आज उपलब्ध असलेले दूध, आणि दुधात घातले जाणारे (शुद्ध?) पाणी. यांची शुद्धी तपासायची झाल्यास ?
शुद्धीकरण करणे किती कठीण आहे ना ? पन्नास दिवस सुद्धा पुरणारे नाहीत. पन्नास साठ वर्षातील अशुद्धी दूर करायला फक्त पन्नास दिवस पुरतील ? निदान पन्नास साठ महिने तरी लागतीलच !
दुध कुठुन येते ती गाय आणि तिचा विदेशी वंश तपासणे आणि तो कायमचा दूर करणे हेच खरे शुद्धीकरण !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
04.01.2017
Copyright © 2025 | Marathisrushti