(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • किचन क्लिनीक – कोबी

    ह्या भाजीच्या बाबतीत तशा आपल्या प्रत्येकाच्याच भावना तशा मिश्र कारण हि तसेच आहे म्हणा हि भाजी आपल्या राष्ट्रात तयार होणारी भाजी नसून इंग्रजांनी आपल्या सोबत हिला येताना आणली होती.तशी हि भाजी काही वाईट नाही हं त्याच्या गो-या सायबा सारखी.हो अगदी तुम्ही हिला गच्चीत एखाद्या मोठ्या कुंडीत लावले तरी चांगली किचन गार्डनींगची हौस पुरी करता येईल तुम्हाला.

    ह्या कोबीची फुले दिसतात भारी देखणी व चवीला देखील सुरेख लागतात.अगदी सुकी भाजी,भजी,कोशिंबीर,लोणचे सगळेच छान लागते ह्या भाजी पासून बनविलेले.मी तर अगदी झुणका व पराठे सुद्धा बनवून खाते ह्याचे मस्त लागतात.अगदी कांदा नसताना कांदे पोहे खाणे जरा जड जाते ना मग काय कोबी घाला कांद्याच्या बदली व पहा कसे झकास लागतात पोहे ते.

    जसा ह्या भाजीचा वापर स्वयंपाकात होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हि भाजी वापरू शकतो.पण प्रथम तिचे गुण पाहूयात.कोबी हा चोवीस गोड थंड व शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करणारा असून वात दोष वाढवितो.

    आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)थकवा जाणवणे,दम लागणे,तोंडास कोरड पडणे,छातीत जळजळ ह्या ५० ग्राम कोबी पाणी न घालता कुकर मध्ये वांफवा व त्याचा रस काढा नंतर त्यात १ चमचा मध व १/२ चमचा जिरेपूड घालून सुर्योदयाच्या वेळी तो रस प्यावा व तासभर काही खाऊ नये.ह्या प्रयोगाने ह्रदयात बळ मिळते.

    २)पोट बिघडणे,शौचास भसर होणे,छातीत आग होणे,तोंडास पाणी सुटणे,वजन कमी होणे ह्या तक्रारीकडे १/२ कप कोबी रस+ १ चमचा मध+ १ चमचा गाजर रस हे मिश्रण जेवणा सह थोडे थोडे प्यावे.

    ३)थंडीत त्वचा रूक्ष होणे,फुटणे,खाजते ह्यात कोबीचा रस व कोथिंबीर रस एकत्र करून त्वचेवर लावावा.

    ४)लघ्वीची आग होणे,लघ्वी थोडी थोडी होणे,कंबर दुखणे ह्यात १ ग्लास कोबीरस +धणे पूड १ चमचा + २ चमचे खडीसाखर २-३ वेळा विभागून घ्यावे.

    ५)हिरड्यांतून पू रक्त येत असल्यास कोबीचा रस तोंडात धरून गुळण्या कराव्या व नंतर गाल व हिरड्यांना तीळ तेल लावावे.

    कोबी खायचा अतिरेक केल्यास पोटात वात धरू शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १६

    सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात.

    आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच!

    अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा केवळ डोळ्यानीच तो ऑपरेट करणे, असे अॅप सुद्धा आले आहे, एका हाताचे एक बोटसुद्धा हलवायला नको. फक्त डोळे फिरवायचे की कर्सर हलतो. हे आस्यासुख.!

    उभे राहून काम करण्यापेक्षा किंवा फिरत फिरत काम करण्यापेक्षा बसून काम करावे असे वाटणे. बसताना सुद्धा खाली जागा नीट समतल असावी, एखादी बैठक असावी, असे वाटणे. सतरंजी मिळाली की सतरंजीपेक्षा आणखी मऊ आरामशीर आसनावर बसावे, एकदा बसले की उठू नये असे वाटणे, बसलो तर टेकून बसावेसे वाटणे, टेकून बसलो तर टेकायला मऊ तक्क्या असावासा वाटणे, तक्का मिळाला तर उशी हवीशी वाटणे,बसायला जागा मिळतेच आहे तर खुर्ची का नको ? मग ही खुर्ची काटकोनीच कशाला, त्यापेक्षा विशालकोनी बरी. हे आस्यासुख !!

    आरामखुर्चीवर बसल्यावर पुढे पाय समांतर टेकण्यासाठी टेबल हवे, असे वाटत रहाणे, पण मागे काय चालले आहे हे समजत नाही, त्यासाठी ही आरामखुर्ची गोल फिरणारी हवी ..... आरामखुर्चीवरच बसायचे मग नुसतीच कापडवाली आरामखुर्ची कशाला, फोमचीच वापरूया..... हे आस्यासुख !

    चालण्यापेक्षा सायकल बरी, सायकल पेक्षा स्कूटी बरी, स्कूटीपेक्षा स्कूटर, त्यापेक्षा बाईक, ही बाईक एक पाय झाडून सुरू करण्यापेक्षा एक बोट दाबून सुरू झाली तर बरी !!!!! हे आस्यासुख !!

    कमरेत वाकून जमिनीवरचा केर केरसुणीने काढण्यापेक्षा उभे राहून व्हॅक्युम क्लीनरने केर ओढून घेणे, उकीडवे बसून लादी पुसण्यापेक्षा माॅबने किंवा दांडा लावलेल्या स्पंजने लादी अलगद पुसुन घेणे, किंवा आपण काम न करता, चक्क त्या कामासाठी बाई लावणे, हे आस्या सुख !!!

    सुख हे केवळ बसण्यामधूनच मिळते. बसण्यामधले पुरेपुर सुख मिळवण्यासाठी धडपड सुरू होणे असाही आस्यासुखचा अर्थ आहे.

    सुखार्था सर्व भूतानाम् मताः सर्वा प्रवृत्तयः, असे वाग्भटजी म्हणतात. सर्व प्राणी मात्रांची सुखाकडेच प्रवृत्ती असते, पण प्रमेहामधे, ती जरा जास्तच या कॅटेगरीमधे मोडते.

    याचा अर्थ असा नव्हे की सुखाची कामना, इच्छा करूच नये. सुख मिळावेसे वाटणे, ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आणखी आणखी, त्यापेक्षा जास्ती सुख मलाच मिळावे. हा हावरटपणा किंवा सुखाचा अतिरेक हे दुःखाचे कारण ठरू नये.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.02.2017

  • दवणा / दमनक

    ह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने कफवातनाशक आहे.

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग सात

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    ग्रंथकार म्हणतात, निरोगी राहायचे असेल तर नेहेमीच क्षमावान असावे. काही वेळा प्रश्न पडतो, क्षमावान असण्याचा आरोग्याशी संबंध कसा काय बुवा ?

    क्षमाशीलता हे वीराचे भूषण आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे, तोच म्हणू शकतो, " जा, तुला क्षमा केली ! "

    क्षमा याचना कधी केली जाते ? जेव्हा आपली चुक आपल्याला उमजते तेव्हाच. माझी चुकच नाही तर मी क्षमा कशाला मागू ? आणि क्षमा मीच का मागू ? हा प्रचंड अहंकार पाठी लागतो. एकदा का अहंकाराची कीड आत गेली तर तिला बाहेर काढणे खूप कठीण होते. म्हणून वेळीच सावध होऊन मनाला आवरावे.

    I am sorry.
    हे तीन शब्द मोठमोठ्या चुका माफ करून जातात. व्यवहारात अशी परिस्थिती अनेक वेळा येत असते. एक शब्दाचा कमीपणा स्विकारायला आपण तयार नसतो आणि काट्याचा नायटा होतो. ठिणगीचे रूपांतर आगीत, आणि आगीचे रुपांतर फुफाट्यात होते. जेव्हा समजते तेव्हा खूप काही गमावलेले असते. परस्परांवरील विश्वास ! मन दुखावते, माणसे दुरावतात. यासाठी हे तीन शब्द उपयोगी पडतात, आय अॅम साॅरी.

    जर मनात असूनही हे शब्द जर वेळीच ओठात आले नाहीत, तर वेळ निघून जाते. गैरसमज वाढत जातात. ताण निर्माण होतो. आणि अनेकानेक व्याधी जन्माला येतात.

    ज्याची क्षमा त्याच्याकडेच मागावी. तर ती माफ होते. आणि विनाअट मागावी. अट ठेवून माफी मागणे याला क्षमा म्हणत नाहीत, "जर माझ्या शब्दाने, कृतीने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माफी मागत आहे" ही अशी सशर्त क्षमा मागणे फक्त राजकारण्यांना जमू शकते. तो आपला प्रान्त नाही.

    आज व्यवहारात त्याचे परिणाम देखील दिसतात. साध्या पोटदुखीपासून जाडी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, पॅरालेसीस, कॅन्सर, हे शारिरीक. नैराश्य, चंचलता, निद्रानाश, चिडचिड इ. मानसिक तर खोटे बोलणे, चोरी करणे, पापकर्म करणे, व्यसन जडणे, असे आध्यात्मिक व्याधी जन्माला येतात.

    क्षमा करणारा मोठा असतोच, पण क्षमा मागायला सुद्धा दिलदारपणा असावा लागतो. मन तेवढं मोठ्ठं असावं लागतं. पण आपल्या मनात नसताना, पटलेलं नसताना, कधीही दुसऱ्याची क्षमा मागू नका, कारण जर मनाला पटलेले नाही आणि पटल्याचे नाटक जर करीत राहिलात तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, पण स्वतःला नाही.

    यातून तणाव जन्माला येतो. म्हणजेच ताण आणि तणाव वाढण्याचे कारण सत्पात्री क्षमा न मागणे आणि कुपात्री क्षमा मागणे हे आहे.

    षड्रिपू पैकी सर्वात मोठा जो अहंकार, याचा शत्रू क्षमा आहे. म्हणजेच अहंकाराचा नाश क्षमेने होतो. तेथे सुद्धा भेदभाव नको. समानता हवी.

    तुकोबाराया एका ठिकाणी म्हणतात,
    क्षमा करणे जे पुत्रांसी,
    तेची दासा आणि दासी ।
    याचा अर्थ सरळ आणि सोपा आहे.
    "तुला म्हणून साॅरी म्हणतो, नायतर...." ही वृत्ती नको, जी क्षमा असमानता दाखवते.

    अहो, साधं वाॅटसप गटात जे नियम अॅडमिननी केलेले असतात, ते चुकुन मोडले तर शिक्षा भोगावीच लागते ना ! आणि "साॅरी... चुकुन... " या दोनच शब्दात माफी देखील मिळते, हे तर आपण दररोज पाहातोच. तरीदेखील क्षमा मागायला आपल्याला कमीपणा वाटतो.

    वाढत्या रोगांची संख्या लक्षात घेतली तर फक्त तीन शब्दात ती निश्चितपणे कमी करता येईल.
    बस्स म्हणायचे.
    "आय अॅम साॅरी."
    "गलती मेरी है, मुझे माफ करो."
    "हं, जरा चुकलंच तेव्हा ! "

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०२.०८.२०१७

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १२

    पशुंना मारताना कधी बघीतलंय ?
    त्यांच्या डोळ्यात कधी डोळे घालून पाहिलंय ?
    डोळ्यात येणारे अश्रु, मृत्युची दिसत असलेली भीती, ज्यांचा नंबर आता कापण्यासाठी लागणार आहे, त्यांची होणारी घालमेल कधी दिसलीच नाही का ?

    कल्पना करून बघूया, त्यांच्या जागी आपण असतो तर ?
    आपल्या मनात मारणाऱ्याविषयी किती घृणा निर्माण झाली असती ?

    हे इमोशनल ब्लॅकमेलींग नाहीये, पण त्या पशुंच्या भावना बदलतात, त्यांच्या रक्तातील स्राव, हार्मोन्स बदलतात, अवयवांची कामे बदलतात, रक्ताचा पुरवठा बदलतो, दिशा बदलते, परिणाम बदलतो. हे सर्व नासा मधे सिद्ध झालेले फक्त सांगतोय.

    मांसाहार केल्याने मेंदुमधील न्युरोट्रान्स्मीटर बदलतात, त्याने भावना बदलतात, विचार बदलतात, कृती बदलते, परिणाम बदलतात. पशुंमधे जे बदल होत जात आहेत, त्याचा परिणाम, त्यांना खाणाऱ्या माणसांवर होताना दिसतोय, पण ज्यांची उत्तरे जाणुनबुजुन शोधायचीच नाहीत, असंच ठरवल्यावर काय बोलणार ना ?

    सगळ्या मेडीकल, स्लाॅटर, ट्रान्स्पोर्टस्, स्पोर्टस, चर्मोद्योग, काॅस्मेटीक्स या सारख्या बड्याबड्या इंडस्ट्रीज एका बाजुला आणि एका बाजूला मूठभर निसर्ग प्रेमी. विजय कुणाचा होणार ?

    भरडली जात आहे ती सामान्य अज्ञानी जनता, जिच्या जीवावर हे सर्व जीवाशी खेळ चालले आहेत.

    मधुमेह, रक्तदाब, पीसीओडी सारखे मनोशारीरिक आजार, ओव्हरवेटींग, मानसिक अस्वास्थ्य, कॅन्सर, कमी होत जाणारी रोग प्रतिकारक्षमता, या सारख्या अवस्था का निर्माण होताहेत ?

    कोणत्या दिशेत संशोधन चालले आहे? गेली कित्येक वर्षे यावर संशोधन चाललेले आहे,
    ते फक्त नवीन औषधे शोधून काढण्यासाठी.
    रोग घालवण्यासाठी नाही.

    हे सर्व रोग ज्या कारणाने नाहीसे होणारे आहेत त्यांच्याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष ?

    जर मधुमेह रक्तदाब आदि रोग कायमचे गेले तर ?

    सहज हिशोब केला....
    एका चार जणांच्या कुटुंबातील फक्त एका माणसाला, आयुष्यभर औषधे घ्यावा लागणारा एखादाच आजार, त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी झाला, तर त्याला आजच्या बाजारभावांचा विचार केला तरी, महिन्यातून फक्त एक दिवस जरी, कोणत्याही पॅथीच्या डाॅक्टरांकडे जावून यायचे म्हटले तरी, एका माणसाला, रिक्शा, बरोबर एक माणूस, तपासण्या, औषधे, डाॅक्टरची फी, स्वतःचा गेलेला वेळ, हे सर्व धरून कमीत कमी खर्च एक हजार रूपये नक्कीच.
    असे बारा महिन्यांचे एका आजाराचे, बारा हजार रूपये,
    असे पुढील आणखी कमीत कमी चाळीस वर्षे.
    म्हणजे बारा चोक अठ्ठेचाळीस. वर एक मोठे शून्य.

    चाळीसच वर्षे का ? कारण एवढी औषध खाऊन, शंभर वर्षे जगताच येणार नाही, ( औषधांवरच जगायचं असेल तर किंवा जीवनावरचा विश्वासच उडाल्याने, असे जगणेच नको असेही वाटू लागल्याने, सरासरी आयुष्य ऐशी वर्षे धरले आहे.)
    या उरलेल्या चाळीस वर्षांचे चार लाख ऐशी हजार म्हणजे सरासरी पाच लाख रूपये हे एका माणसाच्या इझी गोईंग आयुष्यासाठी खर्च होणार आहेत.
    आणि हे फक्त आरोग्यावरच.

    त्यातही बाकीच्या तीन माणसांचा,
    त्यांना होणाऱ्या संभावित आजारांचा,
    अपघातांचा,
    इमर्जन्सीच्या नावाखाली होणाऱ्या अपेंडिक्स ते बायपास ऑपरेशनचा खर्च धरलेला नाही. आयुष्यभर पै पै जपत जमा केलेली बचत एका दिवसात आपल्या बॅकेतून गायब होते. असो. (इमर्जन्सी साठीच आपला प्राॅव्हिडंट फंड वापरता येतो ना. असाही शहाणपणाचा सूज्ञ विचार करता येतो काही जणाना. )

    पुढील चाळीस वर्षात होणाऱ्या गुडघेबदली, मोतीबिंदू, हर्निया, प्रोस्टेट, गर्भाशय, या छोट्या पण लाख लाख मोलाच्या अवयवांचा विचार पण केलेला नाही.

    ही सर्व इंडस्ट्री कोणाच्या जीवावर पोसली जातेय ? जरा विचार करा.
    ......... मग कोणाला वाटेल सर्वजण निरोगी व्हावेत.?

    म्हणून रोग समूळ नष्ट व्हावेत, त्यांची कारणे शोधून काढावीत, या दिशेत संशोधन होतच नाही.
    खरं सांगतो, इथे तुमच्या आयुष्याची कोणाला काही पडलेली नाही.
    ज्याची त्याला प्यार झोपडी...

    असो.
    या सर्व रोगांचे मूळ जर आपल्या चुकीच्या आहारात असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे.

    योग्य वेळी घातलेला एक टाका पुढील नऊ टाके वाचवतो, अशा अर्थाची एक इंग्रजी भाषेतील म्हण रूढ आहे.
    इथे सुद्धा भारतीय म्हण दिली नाही.
    कारण भारतात आजकल किसीपे भरोसा भी नही कर सकते असं म्हणणाऱ्या विश्वासरावांची संख्या दुर्दैवाने वाढली आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    12.10.2016

  • किचन क्लिनीक – ताकाचे काही घरगुती उपचार

    १)वारंवार संडासला होत असल्यास तसेच जर संडास करताना जळजळ होत असेल तर लोणी न काढलेले ताक आहारात ठेवावे पण जर संडासला चिकट,बुळबुळीत,जड होत असेल तर लोणी काढलेले ताक आहारात ठेवावे.तसेच वैद्यांचासल्लाघेऊनत्यातसैंधव,बडीशेप,जिरे,
    ओवा,मिरी,असे काही द्रव्य त्यात घालावे.

    २)मुळव्याध झाली असता आहारामध्ये ताक वापरावे पण जर रक्त पडत असेल तर वैद्यांचा विशेष सल्ला घ्यावा.

    ३)अंगावर सुज येण्याची सवय असल्यास बिनसाईचे दही घुसळून लोणी काढावे व त्या ताकामध्ये मिरी,सुंठ,हिंग,लसूण असे पदार्थ घालून ते ताक जर सुजेवर दाबल्याने खड्डा पडत असेल तर त्या व्यक्तिला द्यावे.

    ४)तोंडला रूची नसल्यास जेवताना मध्ये मध्ये फोडणी दिलेली ताकाची कढि प्यावी.

    ताक प्यायचा अतिरेक केल्यास कफ व पित्ताचे आजार होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग ५९ – चवदार आहार -भाग २१

    कोणालाही मनापासून न आवडणारी पण, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देत असल्यामुळे वैद्य मंडळीना आवडणारी चव म्हणजे कडू.

    खरंच आहे. रोग नावाने कितीही मधुर वाटला तरी, प्रत्येक औषधात दडून बसलेली कडू चव मात्र रूग्णाचे जीवन गोड बनवते. या कडू चवीचा वापर युक्तीने जो वैद्य करतो, तो यशवान, गुणवान आणि परिणामी धनवान बनतो.

    जसा कडू रस आपल्याला तो आवडत नाही, तसा पोटातील कृमींनाही तो आवडत नाही. त्यामुळे कृमींना बाहेर काढण्यासाठी कडू चवीची औषधे वापरावी लागतात.

    कडू चवीची औषधे आईच्या दुधातील दोष दूर करतात. म्हणजे आईच्या दुधातून बाळाच्या पोटात जाऊन बाळाचे आजार कमी करू शकणारी, एवढी शक्ती असलेली ही कडू चव आहे.

    आंबट, तिखट, गोड चवींप्रमाणे चविष्ट नसल्यामुळे खाण्याची इच्छा कमी करणारी असते. त्यामुळे साहाजिकच प्रमेहनाशक परिणाम दाखवते. आणि पचनशक्तीवरचा ताण आपोआपच कमी होत असल्यामुळे पाचन वाढवणारी ठरते.

    कफ आणि पित्तनाशक गुणाची ही कडू चव तहान ताप मूर्च्छानाशक आहे. गळा, तोंड घशाची शुद्धी करणारी आहे. तसेच आमातून निर्माण होणारा चिकटपणा (क्लेद ) कमी करणारी, चरबी, मल मूत्र यांचे शोषण करून शुद्धीकरण करणारी, पचायला हलकी, आणि स्वभावाने थंड गुणाची आहे.

    विशेषतः तापावर गुणकारी, रक्तदोष कमी करणारी, शरीरातील आजारानंतर राहिलेली उष्णता किंवा औषधांचे दुष्परिणाम कमी करणारी आहे.

    व्यवहारात कारले, मेथी, हळद, औषधांमधे कडू किराईत ही जार कडू आहेत.

    कडू उपाय तात्कालिक बरा न वाटणारा असला तरी उज्वल आरोग्यासाठी तो आवश्यक आहे.

    अतिप्रमाणात वापरल्यास पित्त वाढते, साखर कमी होते, त्यामुळे थरथर होणे, शरीर आतून बाहेरून रूक्ष होणे, घसा कोरडा पडणे, बारीक होणे अशी लक्षणे दिसतात.

    कडू म्हटलं तरी चेहेऱ्याच्या सर्व शिरा आखडून घेतल्या जातात. कडू चव, चवीला रूचकर नसली तरी, तोंडाची गेलेली चव परत आणण्यामधे मात्र एक नंबर आहे.

    गेलेले धन परत आणण्यासाठी आणि बाहेर जाणारे धन बाहेर जाण्यापासून, वाचवण्यासाठी जसा एखादा कडू निर्णय घ्यावा लागतो, तसे रोग मुळातून घालवण्यासाठी कडू औषध देणे हा जालीम उपाय होतो.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    21.11.2016

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल
    कालचा भाग 1 आजचा भाग 2

    ज्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टस् वर आपण अवलंबून रहातो, त्या लॅब रिपोर्ट च्या मागील छापील बाजू कधी वाचून बघीतली आहे ? किंवा काही वेळा रिपोर्ट च्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.( सिगरेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं असतं.... "सिगरेट स्मोकिंग इज इन्युरस टु हेल्थ")

    मुद्दाम वाचा.
    मला त्यांचं कायम कौतुक वाटतं. सगळी कार्डस अगदी ओपन असतात. लपाछपीचा व्यवहार नाही. जे सत्य आहे ते अगदी लेखी लिहूनच देतात. नंतर मागाहून कोणी गडबड नको करायला, आम्हाला सांगितलेच नाही, माहितीच नव्हतं वगैरे.....

    आपले जे रक्त लघवी वगैरेचे रिपोर्टस दिले जातात, त्या रिपोर्टवर जे काही लिहिलेलं असते, ते फक्त ती चिठी लिहून देणाऱ्या डाॅक्टरसाठीच असते. त्याचा रूग्णाशी खरंतर काहीच संबंध असत नाही. रूग्ण हा त्या कागदाचा केवळ वाहक असतो. तो रिपोर्ट काय आहे, कसा आहे, बरोबर आहे की नाही, हे त्या पॅथाॅलाॅजीच्या असिस्टंटनी कधीही रूग्णाला सांगायचे नसते. सल्लेही द्यायचे नसतात. त्यामुळे त्या कागदावर खाली काही वाक्ये असतात...
    जसे,
    The analysis results are only answer to corrosponding sample.
    The reported results is for information and for interpretation of referring doctor only.

    याचा अर्थ असा होतो की, हा केवळ वैद्यकीय व्यावसायिकासाठी समजेल अशा वैद्यकिय भाषेत लिहिलेला कागद आहे. त्यात रूग्णांनी आपले डोके खर्च करू नये. त्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा वैद्यकिय जाणकारांनी त्या रिपोर्ट चे अर्थ नीट समजतील अशा भाषेत लावावेत, आणि आपल्या रुग्णांना सांगावेत. त्यासाठी योग्य तो मोबदला रूग्णांनी, त्यांना दिलेला असतो. (काही वाक्यांचे विस्तृत अर्थ खरंतर कंसातील आहेत, पण कंस न टाकता लिहिले आहेत.)

    Referring doctor.......who understand the meaning of reporting units, reference ranges, and limitations of technologies should interpret the results.

    "त्यांनीच याचे अर्थ लावावेत, ज्यांना या रिपोर्टमधील युनीट, रेफरन्स रेंज यांची पूर्ण माहिती, पूर्ण अभ्यास, ज्ञान आहे. तसेच रिपोर्ट करण्यासाठी जी मशीनरी वापरली गेली, त्या विशिष्ट कंपनीच्या मशीनरीचे, त्या मशीन मधील रिपोर्टींग करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमधील त्रुटींचे, अंतिम निष्कर्षावर जे परिणाम होतात, ते समजून घेऊन तसे रुग्णाला सांगितले जावे."

    हे सर्व ज्यांना माहिती नाही, त्यांनी जर, गलत तरीकेसे, अपने अंदाज से, इस रिपोर्ट को पढा और अपने तरीके से यदी समझ लेने की कोशीष की, और अगर गलतीसे कुछ उल्टा पुल्टा हो गया, तो इसके जिम्मेदार हम नही रहेंगे ।

    बरोबरच आहे ना. मोबाईल जरी आपल्या मालकीचा असला तरी, त्याचा बिघाड बघण्यासाठी, अतिहुशारी करून, नेट वरून वाचून, मोबाईल खोलून, दुरूस्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का ?

    आणि इथे तर प्रत्यक्ष स्वतःच्या जीवाशी खेळ असतो. म्हणून पॅथाॅलाॅजीचे तज्ञ डाॅक्टरदेखील या रिपोर्टचा योग्य तो अर्थ लावू शकत नाहीत, कारण त्यांनी रुग्णाला काही वेळा बघितलेला पण नसतो.

    अशा अर्धवट ज्ञानावर आरोग्याचे निष्कर्ष काढणे तर फार धोक्याचे असते.
    ना रे बाबा ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.02.2017

  • आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १८

    नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी.

    जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही.
    दिसायला बारीक सुरकुतलेली जरी दिसली, तरी जिभेवर चुरूचुर निर्माण करणारी चव काही औरच असते.

    त्रिकटू या आयुर्वेदीय प्रक्षेप द्रव्यातील सुंठ आणि पिंपळीच्या मधे बसलेली ही मिरी कच्चीच वापरली जाते, हे बहुधा पाश्चात्य मंडळींनी पाहिले, तेव्हापासून ते काळी मिरीची पावडर सूप सॅलेडमधे वापरू लागले. मिरची वापरण्याएवढी आपली योग्य प्रकृती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मिरचीची तहान त्यांनी मिरीवर भागवली बहुतेक !

    आजारपणातून उठल्यावर पहिला घासाच्या तूपभातावर मिरी हवीच. सकाळी दात घासण्याच्या दंतमंजनापासून, पापड आणि ऊसळीपर्यंत तर असतेच. पण अगदी आमरसाच्या वाटीत जावून तुपाच्या बरोबरीने विराजमान होणारी ही मिरी.

    सणसणीत उष्ण तीक्ष्ण गुणाची, उत्तम दीपक म्हणजे भूक वाढवणारी, पाचक म्हणजे पचन घडवणारी, घाम आणून ताप कमी करणारी, ह्रदयाला हितकर, उत्तम जंतुघ्न, कृमींचा नाश करणारी, स्रोतसांमध्ये असलेला आमाचा चिकट अडथळा स्वशक्तीने दूर करणारी, आतून जखम स्वच्छ करणारी, सर्दी खोकल्यापासून डायबेटीस आणि ह्रदयरोगापर्यंत अप्रतिम रिझल्ट देणारी, वात कफावर विजय मिळवणारी आणि पित्ताला वाढवणारी असते. सर्व रोगांचे मूळ असलेल्या, मंद अग्निला वाढविणारी असल्यामुळे, वैद्यप्रिया बनलेली आहे.

    जिथे पाणी, आंबटपणा, गोडपणा जास्त असतो, तिथे मिरी वापरली जाते. म्हणून कदाचित कोकणात जास्त वापरली जाते. कोकणात उत्पन्न होत असल्याने कोकणी प्रकृतीला सहजपणे मानवणारी, तसाच स्वभाव बनवणारी, पण अंतिमतः सुखकर ठरणारी, ही मिरी म्हणजे अगदी कोकणप्रिया. कोकणी महिलेला आपल्या गळ्यामधील मंगळसूत्रातील जणु काळे मणीच वाटावेत, एवढी प्रिय.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    18.11.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चौवीस

    मन मनास उमगत नाही

    इंद्रियातील सर्वात सूक्ष्म इंद्रिय म्हणजे मन. या मनाचा सहभाग पचनामधे महत्वाचा असतो. कशासाठी हे अन्न मी सेवणार ? असा विचार त्यावर चिंतन मनन केल्याशिवाय जेवू नये. यासाठी घास बत्तीस वेळा चावायचा. तेवढाच वेळ चिंतनाला मिळेल. लाळ चांगली मिसळेल पचन सुलभ होईल आणि महत्त्वाचे म्हणजे लक्ष जेवणातच राहील.

    खाताना भीती बाळगू नये, आणि खाल्ल्यावर आठवू नये.
    मी हे खाल्ले तर मला चालणार का ? मला अमुक पदार्थ पचेल का ? हे उष्ण आहे की थंड ? अशा शंका कुशंका मनात आणून खाल्ले तर हमखास त्रास होतो. आणि खाऊन झाल्यावर, "उगाच खाल्ले, त्यानेच त्रास झाला असणार ! असं आठवत खाल्लेल्या अन्नाला दूषणे दिली की पचन बिघडणारच !

    रोग असेल तेव्हा पथ्य नाहीतर प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ तपासूनच खाल्ला पाहिजे असं नाही. आयुष्य कसं मस्त मजेत जगावं. संसारातल्या सर्व सुखांचा आस्वाद घ्यावा. पण त्यांच्या आहारी जावू नये, एवढी खबरदारी जरूर घ्यावी.

    समर्थ म्हणतात,
    संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका।
    नेटका करीता, फिका होत जातो ।।
    त्यातील आसक्ती सोडावी म्हणजे गुंतुन राहू नये, मायेत अडकू नये, हे मला पाहिजेच या नादात वर्तमानातला आनंद हरवू नये. नसलं तरी चालेल, असलं तर आनंदच आहे, ही मनोवृत्ती आपल्याला प्रयत्नांनी, विवेक वापरून तयार करता येते.

    विशेषतः जेवताना मन प्रसन्न असलेच पाहिजे. तरच भावना आनंदाच्या तयार होतात, राग, असूया, मत्सर, द्वेष, भांडण, मनात ठेवून जेवलो तर मेंदूतले न्युरो ट्रान्समीटर बदलतात. आपल्याच मनातल्या भावना चांगल्या हव्यात असे नाही तर समोर सुद्धा चेहरा हसरा हवा. टीव्हीवर सुरू असलेली नकोत ती भांडणे, नको त्यांच्या अंत्ययात्रा, नकोत त्या विषयवासना चाळवणाऱ्या जाहीराती, आणि याच्या सगळ्या समोर आपण जेवणार ! कसं पचणार आणि कसं त्यातून चांगलं तयार होणार ?

    आज पाश्चात्य जगतातील अशांती भारतात येऊन पोचली आहे. न्यूनगंडाने भरलेली पिढी अनेक दुसऱ्या रोगाना जन्माला घालत आहे.
    'मला काय त्याचे, माझे घर तर जळत नाही ना, मग मी कशाला काळजी करू ? एवढे बेभरवंशी राहून चालणार नाही. ती आग स्वतःच्या घरात केव्हा भडकेल ते कळणार देखील नाही.

    वेळीच सावध व्हायला हवे. पाश्चात्य जगतात ही अशांती कशी आली, यावर चिंतन व्हायला हवे. मनाचा तोल कसा सांभाळावा, याच्या नीतीनियमांची चौकट, भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आहे. वेदवाञ्ग्मय, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता, नाथांचे भागवत, तुकारामांची गाथा, आणि समर्थ रामदास स्वामींचे मनोबोध या सर्वांचा पुनः एकदा नव्याने अभ्यास व्हायला हवा. मनाचे श्लोक पुनः एकदा पाठांतराला घेतले पाहिजेत.

    मनाच्या आजाराची चिकित्सा सूत्रे म्हणजे मनाचे श्लोक आहेत, हे जेव्हा जर्मन लोक आम्हाला सांगतील तेव्हा आम्हाला पटेल. नाहीतर आम्हाला 'रामदास स्वामी हा माणूस म्हणे आमच्या शिवरायांचा गुरू नव्हताच, यासारख्या बिनबुडाच्या भांडणात गुंतुन ठेवले जात आहे. वेळ जात नसलेली बिनडोक माणसे, नको ते वाद उकरून काढून, समाजमनाला कलुषित करून जातीय वादाचे भूत जागे करीत आहेत.

    या सर्वांपासून सावध रहाणे, आपल्या मनाला सुरक्षित ठेवणे, काळाची गरज आहे.
    " चला, चर्चा करूया मनाच्या आरोग्याची ! " असे, जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षीचे घोषवाक्य आहे. या निमित्ताने आपणच आपल्या मनाशी संवाद साधूया. आपल्या मनाशी संवाद साधायला आपले मन आपल्या जवळ तर हवे, कारण ते आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्याजवळ रहातच नाही. त्यामुळे ते आपल्यालाच उमगत नाही.
    मन मनास उमगत नाही,
    आधार कसा शोधावा ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.04.2017