मोहरीचे तेल हे बंगाल,व उत्तर भारतामध्ये स्वयंपाका करिता वापरले जाते.हे तेल चवीला कडवट,उष्ण असते व ते भुक वाढविते,पचायला हल्के,तीक्ष्ण गुणाचे,कफ व वातनाशक,पित्त वाढविणारे,संडासला बांधुन ठेवणारे अर्थातच घट्ट करणारे,लघ्वीचे प्रमाण कमी करणारे आहे.हे तेल शरीरातील मेदाचा नाश करते.ह्या तेलाचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यास शरीरातील शुक्रधातू नष्ट होतो.
त्वचेला खाज येणे,कोड,तसेच काही कफ वात प्रधान त्वचाविकारात ह्या तेलाचा आपण वापर करू शकतो.
मोहरीचे तेल हे अत्यंत उष्ण असल्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशांत हे तेल लोकांना सहज पचते.पण हेच मोहरीचे तेल जर आपण देशावर किंवा कोकण गोवा प्रांतात वापरू लागलो आपणच काय पण बंगाली किंवा युपी स्थित लोक जरी ह्याच तेलाचा वापर भरपूर प्रमाणात आपल्या स्वयंपाकात करू लागले तरी त्यांच्या अंगात पित्त दोषाची फाजील वाढ होऊन त्यामुळे पित्ताचे व रक्ताचे विकार त्यांना सतावतील ह्यात दुमत नाही.
म्हणूनच कोणतेही तेल वापरताना देश अर्थात आपण रहात असलेल्या प्रदेशाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो तेलाचा वापर करत असताना आपल्या प्रदेशात कोणत्या तैल बिया पिकतात ह्याचा विचार करूनच त्यांच बियांचे तेल वापरावे.कारण त्या तेलबियांचे पासुन काढलेले तेल आपल्याला आपल्या प्रदेशाचा वापरायला चांगले असते.जसे कोकण,गोवा खोबरेल,देशावर शेंगदाणा,उत्तर भारत,बंगाल सरसों का तेल अर्थात मोहरीचे तेल.
मोहरीचे तेल वापरण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास वाढेल.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार. हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो .हा कंद देखील जमीनीखालीच उगवतो.
आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. ह्यात आंबट सोडुन बाकीचे पाच ही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, लसणाचे बी गोड असते, लसणाचा कंद तिखट असतो, आणि लसणाची पाने कडू चवीची असतात.
चला तर मग ही लसूण आपले बारीक सारीक आजार बरे करून आपल्याली तब्येत ठणठणीत कशी ठेवते ते पाहूयात.
१)नायटा हा त्वचेचा विकार होऊन आपण त्रस्त झाला आहात का? नुसता लसणीचा रस त्या नायटयावर लावा काय बिशाद आहे त्याची पुन्हा डोके वर काढायची!
२)ज्या लहान मुलांना वांरवार सर्दी होऊन छातीत कफ साचतो साधा सोपा उपाय लसणाच्या पाकळयांची सुरेख माळ करा आणि घाला तुमच्या चिमूकल्याच्या गळ्यात त्याच्या उग्र आणि गरम वाफेनेच छाती मधला कफ कमी होईल.
३)लसुण ही डोळयांचे आरोग्य देखील उत्तम राखते बरे का. त्या करीता लसणाचा रस हा तुप व मधासोबत घ्यावा.
४)सारखा सारखा पोटात गॅस होऊन छातीत दुखत असल्यास १/२ चमचा लसुण रस + १ चमचा आल्याचा रस हे मिश्रण घ्या व त्यांवर थोडे कोमट पाणी प्या बघा गॅस कुठल्या कुठे पळुन जाईल.
५)सांध्यांना सुज येऊन सांधे दुखत असल्यास दिवसातून तीन वेळा दुखणा-या सांध्यांना लसणाचा रस लावून थोडा वेळ अर्थात १५ मिनिटे ठेवा आणि मग धुवा ह्या उपायाने निश्चित फायदा होईल.
६)ज्या व्यक्तींना वारंवार जंतांचा त्रास होतो त्यांच्या जेवणात लसणीचा वापर असावा.
तसेच लसूण ही योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास त्वचा, केस आणि ह्रदयाचे आरोग्य चांगले राखायला मदत करते ह्यात काहीच शंका नाही.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पाणी शुद्धीकरण भाग एक
दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे.
दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून तयार होणारे विष "जीवन" दूषित करतात.
आजच्या काळात वेगवेगळ्या रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी, अधिकृत आणि अनधिकृत कत्तलखान्यातून बाहेर पडणारे रक्त, मल, मांस, युक्त दुषित आणि कुजलेले पाणी, गावागावातून नदीमधे टाकला जाणारा उकीरड्यावरील जैववैविध कचरा, तसेच प्रत्येक घराघरातून बाहेर पडणारे साबणयुक्त रसायनमिश्रीत सांडपाणी........ कित्ती मोठ्ठी यादी होईल...
हे सर्व दूषित पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित करत आहेत.
भीती निर्माण करण्यासाठी नव्हे तर रोगाची कारणे शोधून काढून ती कारणे आपल्या जीवनशैलीतून कमी करता आली तर, किंवा काढता येतील तेवढी काढण्यासाठी या रोगांची यादी देतोय.
हे रोग फक्त अशुद्ध पाणी पिऊनच होतात असे नव्हे तर रोग होण्याच्या कारणामधे इतर कारणांबरोबरच दूषित पाणी हे देखील एक महत्वाचे कारण दुर्लक्ष करून चालणार नाही.
आठ प्रकारचे उदर रोग, वारंवार तहान लागणे, पोट फुगणे, वेगवेगळे तापाचे प्रकार, खोकला, भूक नाहीशी होणे, डोळे येणे, वेगवेगळे त्वचारोग, खाज येणे, गलगंड इ. अनेक रोग ग्रंथकार वर्णन करतात. त्याचबरोबर मुळव्याध, आदि गुदरोग, स्त्रीयामधील प्रदर आदि रोग, हत्तीरोग, रक्ताल्पता, शिरोरोग देखील नदीतील अशुद्ध पाणी, शुद्धी संस्कार करण्याअगोदर प्यायल्याने निर्माण होतात.
आजच्या भाषेत व्हायरल फिवरचे अनेक प्रकार नावं बदलून आपल्यासमोर रोज येत आहेत, अगदी चिकुनगुनीयापासून स्वाईन फ्लु, इबोला पर्यंत सर्व प्रकार पाण्याशी संबंधीत आहेत.
दूषित पाणी ज्या भागात आहे, त्या भागात हे आजार जास्त प्रमाणात पसरले आहेत. हे पण व्यवहारात दिसते.
या दूषित पाण्याखेरीज, अन्य ठिकाणचे जल, वापरासाठी नसेल तर याच दूषित जलावर योग्य ते शुद्धीसंस्कार करून नंतर ते वापरावे, म्हणजेच "रिसायकल" करून वापरावे, इथपर्यंत स्पष्ट आदेश देणारी आयुर्वेदाची दृष्टी, दूरदृष्टीची नाही, असे कसे म्हणू शकतो ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
28.12.2016
योगरत्नाकर या ग्रंथामधील हा आणखी एक श्लोक पहा.
सायं प्रातर्मनुष्यानां अशनं श्रुतिचोदितम्।
नान्तरा भोजनं कुर्यात् अग्निहोत्र समो विधि:।।
शास्त्रात इतक्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे.
सायंकाळी आणि सकाळी या दोन वेळा जेवले पाहिजे. जसे सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र चुकत नाही, तसंच भोजन हे पण एक प्रकारचे अग्निहोत्रच आहे. या वेळेला जेवण्याचा नियम अजिबात चुकवू नये.
"काल भोजनम् आरोग्य कराणाम् श्रेष्ठः। "
म्हणजे योग्य वेळी घेतलेले भोजन हे आरोग्य मिळवण्यासाठी योग्य असते. आपण काय जेवतोय, यापेक्षा किती वाजता खातोय, या वेळेला महत्त्व आहे.
हे सगळं ठीक आहे हो, पण आजच्या काळात हे तर्कसंगत वाटत नाही. पूर्वीच्या गोष्टी सांगून हे असं स्वप्नरंजनात जाणं आणि तिथे रमणं, हे वय वाढल्याचं लक्षण वाटते. असं काहीजण म्हणतात. विशेषतः वैद्यांनी म्हटले की यांच्या पराभूत मानसिकतेला काय म्हणावं कळत नाही.
आयुर्वेद समजून घेण्याच्या प्रक्रियेत चुक झाली की अश्या शंका निर्माण होतात. आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेताना रंजक आणि रोचक भाषेत न शिकवल्यामुळे शिक्षणाबद्दलचे प्रेम वाढत तर नाहीच उलट कमी होते, एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी वेगवेगळी रूपके वापरायची असतात, हे अजूनही शिक्षकांच्या लक्षात येत नाहीये. आपली जेवणाची वेळ सकाळ आणि सायंकाळ असावी हे एकच वाक्य आपण कितीतरी वर्षापासून तसे ऐकतंच आलोय, पण बदल झाला का ?
नाही. पण कालचक्राची गती फिरल्यामुळे हेच वाक्य पुनः पुनः पटवून द्यावे लागत आहे. आणि हे सांगण्यासाठी जर भारतीय संस्कृती प्रमाण मानली तर आपला गौरवशाली इतिहास देखील लक्षात येईल आणि मुख्य म्हणजे आयुर्वेद समजून घेतला जाईल ना ! पण पटतच नाही.
समजा आपण एका रस्त्यानं जातोय, आणि काळाच्या ओघात रस्ता चुकलो. आणि अगदी एकशे ऐशी अंशात चुकलो, तर काय करायचं ?
आता एवढं आलोच आहोत तर पुढेच जायला पाहिजे ना. असा विचार करून चालेल का ?
जिथून रस्ता चुकला आहे, तिथपर्यंत मागे आलंच पाहिजे. आणि परत योग्य दिशेने प्रवास सुरू केला पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयाच्या दिशेकडे वाटचाल करू.
'काळ खूप पुढे गेला आहे. आता परत मागे फिरता येणे शक्यच नाही, प्रवाहाच्या दिशेत गेलंच पाहिजे,' अशी नकारात्मक मानसिकता असेल तर काऽही शक्य नाही. जिवंत मासेच प्रवाहाच्या विरोधात पोहू शकतात, आणि मेलेले प्रवाहात वाहात जातात.
आणि आपला आपल्या शास्त्रावर, आपल्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर, अशक्य ते शक्य करतील स्वामी या उक्तीप्रमाणे, जे रोग कधीही बरे न होणारे असे पाश्चात्य मानसिकतेचे लेबल लावलेले रोग आपण मुळातून उखडून टाकू शकतो.
आरोग्यटीप लिहिण्याचा मुळ उद्देश भारतीय आयुर्वेद आणि त्यातील आरोग्य समजून घेणे हा असल्याने ते मी करणारच. त्याच पद्धतीने तो समजून घ्यावा लागेल. जी चुक आधीच्या पिढीने केली ती आता परत करायची नाही.
आता या टीपेमधे स्वामी समर्थांना आणि अग्निहोत्राला कशाला आणलं ? असा प्रश्न विचारू नका.
रुग्ण बदलायला तयार असतात. वैद्यांनी सांगितलेले सर्व मनापासून करतात, विश्वास ठेवून केले की परिणाम दिसतात. असा माझा अनुभव आहे. अर्थात त्या विश्वासाने वैद्यांनी पण सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यांनी आपल्यामधे सकारात्मक बदल केले पाहिजेत, असे वाटते. मी सांगतो म्हणून अजिबात नको. शास्त्रात काय सांगितले आहे, ते तरी परत एकदा अभ्यासूया.
अर्थात गरज आहे ती, आपलं चुकलंय, हे समजण्याची. आणि मान्य करायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
03.03.2017
संदर्भ - वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय
तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.
जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.
याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.
जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.
काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.
पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.
आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.
नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.
म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
15.12.2016
कोणतेही शुभकार्य करत असताना देवाला देखील मानाचा विडा द्यायची श्रद्धा आहे. त्यामागे असलेले आरोग्याचे तेरा संदेश मात्र ओळखता यायला हवेत. पाश्चात्य बुद्धीने विचार केलात तर मात्र तीन तेरा वाजलेच म्हणून समजा !
आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ?
आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे.
आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते.
शिल्लक काय रहाते ?
जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते.
मागे साधे मीठच उरते !
जे खरंतर औषधी आहे.
आणि आम्हाला ऐशी पैसे किलोने मिळते. !!
मग आयोडीनयुक्त मीठ खाऊन फायदा कुणाचा ?
आणि आजचा सर्व्हे असा सांगतो, की भारतात अति उंचावर असणाऱ्या काही डोंगराळ प्रदेशामध्येच आयोडीनची कमतरता भासते. अन्य ठिकाणी आयोडीनची गरजच नाही. अन्य ठिकाणी समुद्रमीठातून, रंगीत फळामधून, रंगीत भाज्यांमधून, कडधान्याच्या वरील सालीतून, मासे,इ. समुद्री प्राण्यांमधून, सर्व प्रकारच्या लाल औषधामधून, कोकम, चिंच, शेंगदाणे, या आहारीय पदार्थातून, आपल्याला रोजच्यारोज आयोडीन मिळतेच. वेगळे आयोडीन घेण्याची तशी गरजच नाही.
हं, गरज आहे, मल्टीनॅशनल कंपन्यांची !
या ना त्या मार्गाने पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत.
मध्यंतरी काही जागरूक नागरीकांनी या विरोधात आवाज उठवला होता,
पण पुनः ये रे माझ्या मागल्या....
मोरारजी आणि जाॅर्ज फर्नांडिस यांच्या काळात...विदेशी, घातक, रसायनयुक्त कोल्ड्रींक्सवर बंदी आणली गेली.
नंतर ???
पुनः हातमिळवणी झाली. जाहीराती झाल्या, स्टार मंडळीनी त्यात सहभाग घेतला, राजकीय समीकरणे बदलली, त्यांचे अधिकृत आर्थिक प्रशिक्षण झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने विक्री वाढू लागली. तसेच, आयोडीनयुक्त मीठाचे झाले. नंतर काय ? ठेंगा
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.11.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 15-पुष्प तिसरे
फुल हा नाजूक आणि नाशीवंत अवयव ! त्याचे आयुष्यही एखाद्या दिवसाचेच!!! त्यामुळे फूल टिकणेही कठीण. टिकवणेही कठीण. पण त्यापासून मिळणारा मध मात्र टिकतो.
फुले देवाला वाहाताना देठ काढून वाहतात. जे द्यायचे ते उत्तम गुणाचे. जसे देहाला तसेच देवाला. आपणही अन्नाचा दर्जा, प्रत, पाहूनच माल खरेदी करतो. धान्य निवडतो, त्यावर संस्कार करतो, निवडणे, आसडणे, पाखडणे, घोळणे, चाळणे, धुणे, सुकवणे, वाळवणे, चिरणे, खोवणे, तळणे, भाजणे, उकडणे, वाफवणे, शिजवणे, परतणे, इ.इ. यापैकी कोणता तरी संस्कार करतो आणि नंतरच वापरतो. हा फरक आहे पशु पक्षी आणि मानवामधील. जी बुद्धी आहे, ती वापरली तरच पचन सुलभ होते.
देवाला देताना सुद्धा जे जांगले असेल तेच द्यावे. देवाला दिलेले परत आपल्याकडेच येत असते. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार देवाला नैवेद्य उत्तम पदार्थांचा दाखवला तर तो परत आपल्याचकडे येणार आहे. कारण तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपणच सेवन करणार असतो.
फुले सुद्धा निवडूनच अर्पण करावीत. किडकी, शिळी, मनात राग ठेवून ओरबाडलेली फुले देवाला सुद्धा चालत नाहीत.
फुले, पाने, ओरबाडायची तर नसतातच, पण तोडायची पण नसतात, तर खुडायची असतात. खुडणे हा संस्कार फक्त फुलांसाठी. खुडताना नखांचा वापर केला जातो. तोडण्यासाठी बोटे वापरली जातात. ( आणि माणसे तोडण्यासाठी शब्द !) डोलणारे फूल एकदा फांदीवरून तोडले की फांदीपासून कायमचेच वेगळे होत असते. ते परत जोडता येत नाही. ( माणसांचे मात्र तसे नाही. "क्षमस्व" मनापासून म्हटले तर तोडलेली नाजूक माणसे देखील जोडली जातात. पण मनापासून साॅरी म्हणायला आलं पाहिजे. काही माणसांना मनापासून "साॅरी" सुद्धा म्हणता येत नाही. तोंडदेखलेपणाने "साॅरी" म्हणतात, हे मोठ्या मनाने ऐकून घेणाऱ्याच्या सहज लक्षात येते. समर्थांनी नमस्कार करण्याचे फायदे दासबोधातील एका समासामधे छान वर्णन केलेले आहेत. असो ! )
फुल खुडताना अगदी हलकेच खुडायचे असते. नखांनी हळुवारपणे खुडायचे असते. फांदी, पान यांना अजिबात धक्का न लावता. खुडल्यामुळे फुलांच्या देठातील रस आपल्या नखात शिरत असतो. मेंदी लावल्यावर कसं नख रंगतं, म्हणजे मेंदीचा रस जर नखातून आरपार जिरतो तर फुलांचा रस देखील नखातून शरीरात जातो. (दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासली असता केसांचं आरोग्य चांगलं राहाते, असे प.पू. स्वामी रामदेवबाबा म्हणतात.) म्हणजेच नखे हा देखील शरीरात औषध देण्याचा एक मार्ग आहे. व्यवहारात हे लक्षात येत नाही.
वेगवेगळ्या फुलामधे वेगवेगळे अर्क असणार, वेगवेगळी फुले खुडली की, ते सर्व प्रकारचे अर्क आपल्या नखातून शरीरात शोषले जाणार. शरीराच्या दृष्टीने काही उपयोगी असतील काही निरूपयोगी. ते शरीर ठरवेल. आपलं काम शरीरात अन्न पोचवणे ! त्यातून काय निर्माण करायचं, कसं निर्माण करायचं, किती टाकायचं किती वापरायचं, हे तो ठरवेल ! आपण आपलं नेहेमीचं काम, धर्म म्हणून करावं. फळाची अपेक्षा न ठेवता ! फळ तर मिळणारच असते. हाच तर त्याचा नियम आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.06.2017
सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.
तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti