(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नैवेद्य भाग ७

    नैवेद्य दाखवताना शरीर आणि मन शुद्ध हवे, हेच खरं. भाव महत्वाचा !

    जेवणाला सुरवात करताना दारात आलेल्या याचकाला कधीही उपाशी, विन्मुख पाठवू नये. त्याला यथाशक्ती जे असेल ते द्यावे. इथे अतिथीची कधीही जातपात बघीतली जात नाही हे विशेष ! ही संस्कृती !

    आपल्याला वाढलेल्या अन्नातून सर्व पदार्थांचा मिळून एक घास होईल एवढे अन्न काढून बाजूला ठेवावे. हा घास गोमातेसाठी असतो. याला गोग्रास असे म्हणतात.
    ( आता काही जणांना गाईला माता म्हणण्यावरच आक्षेप असतो, त्यांनी काय करावे ? जसा संकल्प तसे फळ मिळते. असो.)

    घरातील कुत्रा, मांजर, पोपट, गाय बैल, इ.पाळीव प्राणी यांना प्रथम एक घास भोजन द्यावे.
    एवढेच नव्हे तर कावळ्याला सुद्धा घास बाहेर नेऊन ठेवावा.

    आणि भोजन संपल्यावर एक घास, संस्कार न होता मृत झालेल्या पितरांच्या नावे ताटाबाहेर ठेवावा. आपल्या पूर्वजांनी, आपण पोट भरत असताना इतरांचाही किती सूक्ष्मरीत्या विचार केला आहे ना !

    पान वाढायला सुरवात केली की त्रिसुपर्ण नावाचे अन्नाची, अग्नीची स्तुती करणारे एक स्तोत्र आहे, ते म्हणावे. येत नसल्यास अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे, तेही येत नसल्यास एखादा श्लोक म्हणावा. किंवा नामस्मरण करावे.

    सज्जनगडी भोजनप्रसादासाठी बसल्यावर श्रीराम जयराम जयजय राम असा मंत्र म्हणवून घेतात. राम नामाने विषहरण होते. म्हणून भोलेनाथांनीपण जो जप केला तो करावा. ( कदाचित ) प्रत्यक्ष अन्नामधील विष नष्ट होणार नाही, पण मनातील विचारांचे विष मात्र नक्कीच कमी होते, असा अनुभव आहे.

    मंत्र म्हणत असताना वातावरण सात्विक होत जाते. मनातील रज, तम दोष नाहीसे होत जातात, हे सेवन केले जाणारे अन्न मला शतायुषी निरोगी बनविणारे आहे, असा संकल्प करावा.

    कालानुरूप या अन्नामधे निर्माण झालेले दोष, देवाच्या नामस्मरणाने आणि आपण केलेल्या संकल्पाने नाहीसे होतात आणि अन्न शुद्घ होते. असा भाव मनात आणावा. म्हणजे जे दोष आपण टाळू शकत नाही त्याची तीव्रता कमी होते.

    काहीजणांना ग्रंथात जसे वर्णन केले आहे, तसे शास्त्रोक्त भोजन मिळणे, योग्य वेळी मिळणे, सहा चवींच्या सर्व गुणांनी संपन्न मिळणे, योग्य व्यक्तीने उजव्या हातानेच गरमगरम वाढणे, दुरापास्त आहे. अशांनी काय करावे, यासाठी संकल्प करावा. कालानुरूप बदल म्हणजे हे असे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    13.09.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 6

    आवाहनानंतर आसन हा उपचार येतो. पाहुणे घरात आले की त्यांना जसे बसायला खुर्ची अथवा आसन देतो, तसे देवताना बसायला आसन कल्पिलेले आहे. घरात आलेला पाहुणा हा देवाप्रमाणे आहे, त्याची उठाबस देवाप्रमाणे व्हायला हवी.

    आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून, दारात उभ्या असलेल्या पांडुरंगाला, उभे राहाण्यासाठी वीट हे आसन म्हणून देणाऱ्या भक्त पुंडलिकाचे आम्ही वंशज आहोत. आणि आमचा पांडुरंग देखील हेच आसन घेऊन भक्तासाठी अठ्ठावीस युगे, त्या निस्सीम भक्ताची आठवण म्हणून, अजूनही तस्साच वीटेवरी उभा आहे.!

    प्रवासाने दमल्यावर, रसक्षय झाल्यावर, घटकाभर का होईना तेवढीच विश्रांती घ्यावी, म्हणजे पुनः ताजेतवाने होऊन काम करता येते, हे सांगणारे हे आसन !
    हे "आसन" विसरून कसे चालेल ?

    आतिथ्य स्विकारल्यानंतर त्या पाहुण्यांना
    खुशाली विचारावी, आरोग्य कसे आहे, काही पथ्यपाणी आहे का याची विचारपूस करावी. त्याच्या आरोग्याची काळजी देखील आपणच वहायला हवी.
    यालाच अतिथी देवो भव संस्कृती म्हणतात.

    नंतर हात पाय धुवायला पाणी द्यावे आणि सांगावे, "हात पाय धुवून घ्या !" सांगितल्याशिवाय समजणारच नाही. म्हणून हा उपचार. हल्ली सांगून देखील कोणी ऐकत नाही, हा भाग वेगळा !

    बाहेरून जेव्हा घरात येतो, तेव्हा अनेक प्रकारचे जीवजंतु आपण आपल्या सोबत, आपल्याच अंगाखांद्यावरून, आपल्याच घरात, आणत असतो. हे जीवजंतु घराबाहेरच रहावेत, यासाठी खरंतर आंघोळ करूनच घरात यायला हवे, गुडघेस्नान तरी व्हावे. म्हणजे निदान हात पाय तरी धुवावेत, गेल्या वीस एक वर्षापूर्वी पर्यंत ही प्रथा, अनेक कर्मठ घरात सुरू होती. यासाठी घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला न्हाणीघर असायचे. पण बदलत्या काळाचा महिमा म्हणत, ऑर्थ्रोडाॅक्सचे लेबल लावीत, ही अत्यंत चांगली आरोग्यदायी प्रथा नष्ट होत चालली आहे. भारतीय संस्कृतीतील, या प्रथेमागील विज्ञान शोधून काढून ते पुढील पिढीला सांगणे योग्य नव्हे काय ? ( विज्ञान हा शब्द देखील संस्कृती रक्षकांनी वापरायचा नाही म्हणे, तो फक्त बुद्धिवादी लोकांनीच वापरायचा, असे काही नाही. )

    चांगले शिकले सवरलेले बुद्धीवादी लोकच जर घरात बाहेरून येऊन, तसेच बूट घालून अगदी थेट स्वयंपाकघरापर्यंत वावरू लागले तर, आरोग्य तरी कसे घरात राहील ?

    आंग्ल भाषेत एक म्हण आहे. "प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर." म्हणजे सावध तो सुखी. रोग झाल्यावर उपचार शोधत बसण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे केव्हाही चांगलेच. पाय धुवून घरात यावे, म्हणजे अनेक रोगजंतुपासून आपला बचाव होतो, असे सांगितले तर कदाचित पटेल. यासाठीच अनेक देवालयामधे, गुरुद्वारांमधे प्रवेश करताना, पाय पाण्यात बुडवून जावे लागते.

    "स्वस्थवृत्त" म्हणजे रोग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी आणि "रोगनुत" म्हणजे रोग झाल्यावर करायचे उपचार, असे दोन मोठे भाग, आयुर्वेद शिकत असताना पुरेपुर अनुभवता आले, अभ्यासता आले.

    हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री अॅण्ड एन्जाॅएबल, बट डिसीज मॅनेजमेंट इज व्हेरी काॅस्टली अॅण्ड पेनफुल !
    सैराट झाल्यापासून आंग्ल भाषेमधे सांगितले तर लवकर कळते.

    खरं आहे ना ?

    मग बाहेर नाचून घरात आल्यावर, फक्त एका तांब्याभर पाण्याने हातपाय धुणे हा देवपूजेतील उपचार स्वतःतल्या ईश्वराच्या आतिथ्यासाठी योग्य होणार नाही काय ?
    चला, पुनः सुरवात तर करू !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.06.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग १८

    जलाचे दोन प्रकार आकाशातून खाली येणारे आणि जमिनीतून वर येणारे.
    त्यातील आकाशातून खाली येणारे पाणी हे जास्त श्रेष्ठ सांगितले आहे.

    पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी स्वच्छ भांड्यात धरणे आवश्यक आहे. जमिनीला स्पर्श झाला की, त्यातील अशुद्धी पाण्यात मिसळायला सुरवात होते.

    पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात ही पाण्याची पहिली शुद्धी आणि ढगाला थंड हवा लागली की त्याची दुसरी शुद्धी. परत पाणी बनते, आकाशातून खाली येते. स्वच्छ आणि शुद्ध असते. परत खाली येताना वायु प्रदूषणामुळे वातावरणातील काही अशुद्धी त्यात मिसळल्या जातात, म्हणून हे पाणी आता शुद्ध करून घ्यावे लागेल. अन्यथा हे पाणी जर प्रदूषण रहित भागातील असेल तर या आकाशीय जलावर कोणत्याही शुद्धी संस्कारांची गरज नाही. देवलोकातील लोकांना जसे अमृत तसे हे अव्यक्तरस आकाशजल मनुष्यांसाठी जीवन आहे, असे ग्रंथकार म्हणतात.

    जसे प्रत्येक ठिकाणी उगवणारा सूर्य तोच असतो, पण प्रत्येक गावातील सूर्योदयाची वेळ गावानुसार वेगवेगळी असते. तसेच आकाशातून पडणारे जल तेच असते, पण ते जेव्हा खाली येत असते, तेव्हा ते स्थानिक दोषांनी युक्त होते. शहरी भागात ही अशुद्धी जास्ती असते. पण ग्रामीण भागात ही अशुद्धी कमी आढळते.

    जमिनीवर पडले की ते मातीत मुरते. मातीतले गुण त्या पाण्यात येतात. या नियमानुसार कोकणात समुद्र काठाला रहाणाऱ्या लोकांना समुद्रातील पाण्यात असलेल्या अतिरिक्त क्षारांचा सामना करावा लागतो. तर हिमालय कि गोद मे आयोडीनची कमतरता जाणवते. कारण तेथील पाण्यात नैसर्गिक अनुपलब्धतेमुळे आयोडीन मिळतच नाही.

    जंगल असलेल्या ठिकाणी पाणी पडले तर ते पचायला हलके होते, तर चिखलमय, दलदल असलेल्या प्रदेशातील पाणी रोग निर्माण करणारे होते. विहिरीतील पाणी हितकर असते. पण तलाव नदी, सरोवर यातील पाणी अहितकर असते.

    जसे जमिनी बद्दल सांगितले आहे तसे ऋतुबद्दल पण सांगितले आहे. ग्रीष्म आणि शरद या ऋतुमध्ये पडलेले आकाशीय जल हितकर असते. इतर ऋतुमधे पडलेले जल रोग वाढवणारे असते.

    दिवसा नभातून पडलेले जल जास्त चांगले असते, तर रात्री पडणारे जल त्यामानाने वाईट असते.

    जेवताना मधे मधे प्यायलेले पाणी पथ्यकर म्हणजेच सर्वांना हितकर असते. पण जेवणाच्या सुरवातीला आणि शेवट घेतलेले पाणी अहितकारक असते, असे शास्त्रकार सांगतात.

    पाणी हे शेवटी पाणी असते. ते कुठे पडते यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असते.

    पाण्याचा थेंब मातीवर पडला तर भूमीत विरून जातो, पण तोच एक थेंब विशिष्ट शिंपल्यात पडला तर त्याचाच मोती बनून जातो.

    शेवटी पात्र महत्वाचे !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    25.12.2016

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – हादगा (अगस्त्य)

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – हादगा (अगस्त्य)

    ह्याचे २०-३० फुट उंचीचे भराभर वाढणारे झाड असते.ह्याला शरद ऋतुमध्ये फुले येतात म्हणून ह्याला अगस्त्य ऋषिंच्या नावाने अगस्त्य असे ही म्हणतात.

    हि भाजी चवीला कडवट असते व थंड असते त्यामुळे ती शरीरातील कफ व पित्त दोष कमी करते.

    हि भाजी जशी स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा उपयोग आपण घरगुती उपचारांमध्ये देखील करू शकतो.

    १)जखमेवर हादग्याच्या पानांची चटणी बांधावी म्हणजे जखम लवकर भरत.

    २)ठेच लागुन सुज आली असल्यास ठेचाळलेल्या भागावर हाद्ग्याच्या पानांचा रस लावावा.

    ३)जुना खोकला कमी होत नसल्यास हादग्याच्या पानांचा रस २ चमचे + मध १ चमचा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्यावे.

    ४)वारंवार जंत होणे,अंगावर पांढरे डाग उठणे,पोट दुखणे,भुक न लागणे,जुलाब होणे ह्या तक्रारी करीता हादग्याची भाजी जेवणात काही दिवस नियमीत घ्यावी.

    ५)डांग्या खोकल्यात हाद्ग्याच्या पानांचा रस ४ चमचे+ कांद्याचा रस २ चमचे हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस १५दिवस घ्यावे.

    हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – भाग ११

    आयुष्यभर औषधे घ्यावी लागू नयेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी जे करावं लागतं ते करायची तयारी मात्र नसते.

    आणि असा समज करून दिला जातो, की एकदा डायबेटीस झाला की कायमचा चिकटला. ही निराशा मनातून काढून टाकली पाहिजे. हा आजार जर मनोशारिरीक असेल तर औषध फक्त शरीरात जाऊन काय करणार ? जर रोगाचे एक मूळ मनात असेल तर तिथपर्यंत पोचायला नको का ?
    मन कुठे आहे ते अजून माॅडर्न (?) मेडीसीनला समजलेलंच नाही. मन ह्रदयात आहे. आणि आज शोधलं जातंय मेंदूमधे. कसं सापडणार ?
    जाऊदे !

    प्रमेह होण्याचं मुख्य कारण दूध, दही, पाणी, अति, गोड, कफ वाढवणारे पदार्थ खाणे, हे तर आहेच पण यापेक्षादेखील खाल्लेलं पचवता न येणं किंवा पचवण्यासाठी काहीही कष्ट न करणे हे प्रमुख कारण आहे. मेहनत करा. म्हणजे मेह म्हणजे प्रमेह म्हणजे मधुमेह नत म्हणजे नाहीसा होईल.

    प्रमेह वाढण्याचं मुख्य कारण बदललेली जीवनशैली आहे. बैठे काम वाढलंय, सुखाचा अतिरेक झालाय. आम्ही खातोय खूप. खाऊन खाऊनच अशक्तपणा येतोय. मग पचवणार कधी ? त्यात कफ वाढवणारे सर्व पदार्थ निसर्गनियमाने मधुर रसाचे आणि पचायला जड असणारेच असतात.

    आमची वृत्तीच अशी झालीय की, आता दूध बंद करायचं, मग अशक्तपणा येणार, त्यासाठी परत टाॅनिक घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा विचार करू लागलोय, की अमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय माझं रक्त वाढणारच नाहीये, तमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय प्रोटीन्स मिळणारच नाहीत. कॅल्शियमसाठी हे खाल्लंच पाहिजे. ह्रदयासाठी हे, किडनीसाठी ते. असा विचार करणं योग्य नाही.

    शरीराचे तुकडे करून तपासणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असल्यावर प्रश्न पडतो. संपूर्ण शरीराचा, मन आत्मा, इंद्रियासह विचार कोण डाॅक्टर किंवा वैद्य कधी करणार ? पायाला काटा लागल्यावर डोळ्यातून पाणी येणारं आपलं शरीर, प्रत्येक डाॅक्टरनी शरीर असं काही वाटून घेतलं आहे की, काही वर्षांनी वरच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा आणि खालच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा शोधावा लागेल. उजवा डोळा एक जण तपासेल, तर डावा डोळा दुसराच !
    जोक अपार्ट. चिकित्सा करताना संपूर्ण शरीराचा विचार करावा, असं आयुर्वेद मानतो.

    एवढे व्हिटॅमिन्स हवेतच, एवढे कॅल्शियम हवेच, हे नियम बनवले की कायदे आले. कायदा बनला की, पुरावे आले. पुरावे दाखवायची वेळ आली तर मन कसं दाखवणार ? आणि इंद्रियांचं काय करणार ? मग त्याला कोण विचारणार ? त्याला म्हणजे आत्म्याला !

    आयुर्वेद शास्त्र शरीराचे असे तुकडे पाडून विचार करतच नाही. अखंड शरीर, मन, इंद्रिय आणि आत्म्यासह चिकित्सा करण्यासाठी घ्यावे, असे शास्त्रकार म्हणतात.

    ही प्राथमिक माहिती समजल्याशिवाय प्रमेहाविषयी आयुर्वेदात सांगितलेली सूत्रे नीट लक्षात येणार नाहीत, म्हणून हे आधी आणि परत परत सांगावे लागत आहे. कारण आज आरोग्य हे चौकटीतल्या नियमांना बांधले गेले आहे. रक्तदाब एवढाच पाहिजे. रक्तातील साखर एवढीच हवी. वजन एवढेच हवे, कॅल्शियम एवढे हवेच ! कमी पडत असेल तर सरळ लेबल चिकटवले जाते, तू रोगी !
    ....... आणि आयुर्वेद म्हणतो.....
    ........ इथे प्रत्येकाचे नियम वेगळे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.01.2017

  • आहाररहस्य १६

    जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.

  • थिंक ग्लोबली, इट लोकली….

    आज आयुर्वेद व्यासपीठ या नामवंत संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात तब्बल चारशे व्याख्यानांचा एक झंझावात उठत आहे. आयुर्वेद क्षेत्रातील ही एक मोठी क्रांतीकारी घटना असेल.

    गेली सात आठ महिने सुरू असलेली कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी, सर्व तालुक्याच्या ठिकाणी काम करीत असलेल्या वैद्यांशी संपर्क, प्रत्यक्ष पत्र व्यवहार, आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी व्यासपीठच्या सर्व कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली.
    ती सुद्धा स्वतःच्या खिशातील पैसे आणि वेळ संपवून.

    सर्व ठिकाणी एकाच पद्धतीचे व्याख्यान घेतले जावे यासाठी प्रथमच ऑनलाईन वक्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील तब्बल साडेतीनशे वैद्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या घेतला.

    काही वैद्य तर आज पहिल्यांदाच, स्टेजवरून जाहीर कार्यक्रमात बोलणार आहेत...

    पण मनात ठाम विश्वास निर्माण झालाय,
    निर्धार पक्का केलाय....
    समाज मन बदलवून टाकण्याचा....
    आरोग्य क्षेत्रात जे चुकीचे पायंडे पडत चालले आहेत ते बदलवण्याचा !

    कोणाच्याही वैयक्तिक हितासाठी नसलेल्या या सेवाभावी कार्यक्रमाचे नियोजन पाहून ' महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन ' ने या कार्यक्रमात आपला बहुमोल सहभाग दर्शविला. जो सर्व वैद्यांना प्रेरणा देणारा ठरलाय.

    एकाच दिवशी एकाच विषयावर एकच संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पोचत आहे.
    ही आयुर्वेद क्षेत्रातील एक महान घटना आहे. असे मला वाटते.
    आपल्या जवळच्या ठिकाणी आपणाला या व्याख्यानाला उपस्थित रहाता आले तर अवश्य पहावे. आपल्या नातेवाईक मित्र मंडळींना सांगावे.

    एकच संदेश आज समाजात जाणार आहे तो म्हणजे इथे प्रत्येकाचे वेगळेपण जपले जाते.
    इथे म्हणजे आयुर्वेदात !
    आजच्या ग्लोबलाइज्ड युगात वावरतानादेखील प्रत्येकाचं अस्तित्व जपणं महत्वाचं आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, स्वभाव वेगळा, विचार वेगळा, हाताचे ठसे वेगळे, केसांची आणि डोळ्यांची रचनाही वेगळी. रोग होण्याची कारणे जरी एक असली तरी त्याची प्रकट होणारी लक्षणे मात्र वेगवेगळी निर्माण होतात. मग सर्वांना औषध एकच कसे चालणार ? वेगवेगळेच हवे. असा विचार फक्त आणि फक्त आयुर्वेदच करू शकतो.

    आज जग फार झपाट्याने जवळ येत आहे. माणसे लांब गेली तरी त्यांचे विचार जवळ येत आहेत.
    प्रदेश दूर दूर असले तरी पदार्थ मात्र कमीत कमी वेळात एका ठिकाणहून दुसरीकडे पोचताहेत. रेल्वे, विमान इ सोयीमुळे तयार अन्नपदार्थ देखील इकडून तिकडे पोचताहेत.

    यामधला बिझनेस आणि राष्ट्रीय एकात्मता या एक दोन गोष्टी जमेच्या धरल्या तर बाकी आरोग्याचे एकुण तीन तेराच वाजतात.

    हं.
    हा विचार पटायला, आपली वैचारिक पचनशक्ती वाढवण्यासाठीच आजचा हा धन्वन्तरी जयंतीनिमित्त आयोजित केलेला महामहोत्सव !

    थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली या फ्रेझमधे थोडा बदल करून म्हणावेसे वाटते,
    थिंक ग्लोबली बट इट लोकली.

    वैश्विक जरूर व्हा, पण आपला आहार आपण रहातो त्या प्रदेशातीलच घ्या, जो आपल्या प्रकृतीला पोषक असेल. हा महत्वाचा संदेश आज समाजात पोचवला जात आहे.

    येणारी धन्वन्तरी जयंती हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करून, आयुष विभागानेही दुधात साखरच घातली आहे.

    इट लोकली सांगणारं आयुर्वेद, आज व्यासपीठच्या माध्यमातून अॅक्ट ग्लोबली करतंय हे मात्र नक्कीच !

    -- वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
    23.10.2016

  • आहारातील बदल – शाकाहार भाग १५

    जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही.
    जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.
    जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये.
    आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ?

    एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने एक पाणी भरायला येणारी बाई येत होती. त्या बाईच्या मनात त्या नाण्याविषयी मोह उत्पन्न होऊ नये म्हणून साधू धावतच त्या नाण्याजवळ आला आणि त्या नाण्यावर पाय देऊन सहजपणे उभा राहिला.
    ती बाई तिथून पलीकडे गेली, पुनः साधु पारावर बसला. पाणी भरून येताना ती बाई जशी जवळ आली तशी साधु पुनः उठला आणि रस्त्यावर येऊन नाण्यावर पाय ठेवून उभा राहिला. असं तीनचार झाल्यावर त्या बाईच्या मनात आलेला विचार तिने बोलून दाखवला. त्यावर प्रामाणिकपणे त्या साधूने बाईला सांगितले. तिथे एक सोन्याचे नाणे आहे, ते नाणे पाहून ते घेण्याचा मोह तुला उत्पन्न होऊ नये म्हणून, मी धावत येऊन त्या नाण्यावर उभा रहात होतो.

    त्यावर ती बाई म्हणाली,
    "त्यात एवढं काय आहे, ते नाणं गेले चार पाच दिवस तिथंच पडलेलं होतं. सगळ्यांना दिसतही होतं. पण पडलेलं घ्यायचं असतं हे आज प्रथमच आपण येऊन शिकवलंत महाराज. जे आपलं नाही, ते आपण घेऊ नये. हे गावातील सर्वांनाच माहिती आहे. म्हणून कुणालासुद्धा ते दिसून घेण्याचा मोह झालाच नव्हता. पण महाराज, आता मात्र आपण आलात आणि त्या नाण्यावर उभे राहिलात, तेव्हा मला शिकवलंत की, असं काहीजण घेतात ते !"

    जे नाण्याचे झाले ते ग्लोबलायझेशनच्या काळात आमचे प्रत्येक वस्तू आणि अन्नप्रकाराचे होतेय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपला बिझनेस दिसतोय. चकचकीत वेष्टण आणि जाहीरातबाजीला भुलुन, सारासार विवेक बाजुला होतोय. तसं पौष्टिक भाजी भाकरी भाताऐवजी चपाती जवळची वाटू लागली आहे. कोकणातील भाकरी तांदळाची किंवा नाचण्याची आणि बाकी सर्व ठिकाणी ज्वारी बाजरी मका हे विसरू नका.

    मोह निर्माण होण्याआधी वैराग्याचे धडे मिळाले तर अधिक चांगले.

    निरोगी कसे रहायचे असते, ते रोगी होण्याअगोदर समजले तर सोपे होईल ना !

    आपणला हे सांगत नाहीये, आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगतोय.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    31.10.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ

    विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.

    औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.

    औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
    औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
    ...... श्रद्धय हरिकिर्तनम।

    मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.

    अकाल मृत्यु हरणम्
    सर्व व्याधी विनाशनम्,
    विष्णुपादोदकं तीर्थे
    जठरे धारयाम्यहम् ।

    असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.

    हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)

    आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.

    "मेरे लिए दुवा करो,"
    "प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.

    केवळ औषध काम करत नाही.
    हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
    यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    02362-223423.
    27.04.2017

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ९

    जिथे जे उपलब्ध आहे, तिथे ते स्वस्त मिळते. ज्यांच्यावर मालकी हक्क आहे, ते विकत घ्यावे लागत नाही.
    प्राण्यांना मारण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जाते, त्याला खर्च जास्ती येतो. मांसपशुपक्षी तयार करण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी, मांस टिकवून ठेवण्यासाठी वेगळी रचना करावी लागते, जी खूप महाग होते, निसर्गाच्या विरोधात होते.

    भाज्या धान्य उत्पादन करण्यासाठी जी शक्ती वापरावी लागते ती निसर्गाच्या विरोधात नसते, उलट हे निसर्ग पूरक काम असते. अन्नधान्य फळं मिळवण्यासाठी लावलेली झाडे वगैरे आपल्याला प्राणवायुच पुरवतात. कार्बन शोषून घेतात. वातावरणाचे रक्षण करीत असतात. निसर्गाला पूरक कार्य चाललेले असते.

    मालकाच्या विरोधात जाऊन केलेले काम आणि मालकाचा फायदा होईल असे केलेले काम. यात मालकाला कोणते काम अधिक आवडेल ?

    पोट भरण्यासाठी शाकाहार हा स्वस्त आणि मस्त होतो. आज हाॅटेलमधे मिळणाऱ्या कोणत्याही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या डिश पहा. जगात कुठेही जाऊन शोधा, मांसाहारी डिश महाग आहेत.
    असे का ?
    त्यांचे निर्माणमूल्य जास्ती आहे म्हणून !
    ज्या वस्तू कोणाचे नुकसान न करता तयार होतात, त्या स्वस्त बनतात.

    एक परिक्षण असे सांगते की, एक किलो मांस तयार करण्यासाठी किमान सत्तर किलो चारा वा खाद्य पशुंना खावे लागते. हे खाद्य ज्या जमिनीवर तयार केले जाते, त्याच जमिनीवर जर धान्य उत्पादन केले गेले तर दरदिवशी किमान सत्तर जणांचे एका वेळेस पुरेल एवढे भोजन तयार होऊ शकते.

    मांसाहार करायचा असेल तर पूर्णपणे परावलंबी रहावे लागते. निसर्गदत्त मांस देणारे प्राणी कमी होत आले आणि खायला दुसरे अन्न निसर्ग देत नाही, अशा विपरीत स्थितीमधे माणसाला कृत्रिमपणे प्राण्यांची पैदास करावी लागली. निसर्गाच्या विरोधात जाऊन, निसर्गावरच त्यांच्या पोषणाचा अनावश्यक भार टाकून, कृत्रिमपणे तयार केलेल्या प्राण्यांचे मांस माणसाचे पोषण कसे बरे करील ? आज जे मांस उत्पादन कारखाने दिसत आहेत ती केवळ पैसा मिळवण्याचे साधन झाले आहे. पण यातून कधीही शांती मिळत नाही. म्हणून ही शांती अनुभवण्यासाठी भारतामधे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे.

    मांसाहार करणाऱ्या प्रदेशात शांती कुठुन मिळणार ? आडातच नाही तर पोहोऱ्यात तरी कुठुन येणार ?
    त्यांची सुरू असते फक्त धडपड,
    जगण्यासाठी.
    सतत अस्वस्थपणे....
    केवळ स्वतः जगण्यासाठी !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    9.10.2016