जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.
उतु नको मातू नको
घेतला वसा टाकू नको.
चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते..... अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको... आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.
उष्टे खाऊ नये.
एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.
घटाघट पाणी पिऊ नये.
पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.
उगाच आरश्यात पाहू नये.
नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?
परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, "अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?" त्यावर तो उत्तरला, "मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? "
आता याला काय उत्तर देणार. ?
माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.
बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.
केसांना हात लावू नये.
हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.
केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.
आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०८.२०१७
एकदा मिक्सर सुरू झाला की झाकण मधेच उघडायचं नाही, मधेच झाकण उघडलं की आतील सर्व बाहेर उडते. तस्संच एकदा पचन सुरू झाले की आत टाकणे बंद करायचे. एकदा भोजनान्ते पिबेत तक्रम् झाले, तोंड धुतले, मुखवास खाल्ला की नंतर अधे मधे काही खायचे नाही की प्यायचे नाही.
पातेल्यात समजा भात करायला ठेवलाय, पाणी उकळायला सुरवात झालेली आहे, तांदुळ आत घातले आहेत, अर्धवट शिजलेले आहेत, आणि मधेच आणखी दोनतीन पाहुणे आले. त्याच्यासाठी वाढीव भात करायचा झाला तर, अर्धवट शिजत असलेल्या भातात परत तांदुळ टाकायचे का ?
असं केलं तर भात नीट होणार नाही. बिघडून जाईल.
पीठाच्या चक्कीमधे वरून धान्य घातले आहे. पीठ पडायला सुरवात झाली आहे, आणि अचानक लोड शेडींग सुरू झाले, चक्की बंद झाली.
तर काय होते ?
जे धान्य आतमधे होते ते जैसे थे अवस्थेत रहाते. पुनः जेव्हा लाईट येतील, तेव्हा परत चक्की सुरू होईल, पण धान्याचे काही कण, न भरडताच पुढे जातात आणि पीठ चाळून घ्यावे लागते.
तसेच पचन एकदा सुरू झाले, मिक्सर एकदा सुरू झाला की मधे थांबवणे नाही. कोणत्याही कारणाने मधेच आतला मिक्सर थांबला/ थांबवला की पचनावर परिणाम होतोच.
म्हणून आज्जी म्हणायची, अरे जेवताना मधेच उठू नये. भरल्या ताटावरून उठून जाऊ नये एकदा जेवायला सुरवात केली की, सर्व लक्ष जेवणातच हवे. मन जेवताना तिथेच हवे. नाहीतर आतमधे काय हवं नको, हे समजणार कसं ?
आज आपण जेवण कसे जेवत आहोत, याचा या निमित्ताने विचार व्हावा. आजच्या काळाचा विचार केला तरीसुद्धा जेवताना शांतपणे, पूर्ण लक्ष जेवणातच ठेवून, पूर्ण आनंद घेऊन जेवणे एवढे अशक्य कोटीतले आहे का ? टीव्हीवर मॅच नाहीतर मालिका मल्लिका पहात जेवणे, गप्पागोष्टी करत जेवणे, मोबाईल वर चॅट करत जेवणे, वाॅटसप पहाता पहाता जेवणे, जेवण अर्धवट टाकून उठणे, जेवताना अभ्यास करणे, जेवणानंतर स्वीट डिश, आईस्क्रीम खाणे, हे असे केल्याने पचन बिघडते.
स्टार्ट टू फिनिश जेवण एका स्ट्रोकमधेच झाले पाहिजे.
विदाऊट ब्रेक, विदाऊट जाहिराती कार्यक्रम पहायलादेखील आपल्याला किती आनंद मिळतो ना !
मग अस्सच जेवण, विदाऊट ब्रेक, विदाऊट कमर्शियल अॅड, झालं तर पचवणाऱ्याला किती आनंद होईल ना ?
पण नाही.
"मला जेवतानाचाच वेळ बोलायला मिळतो, जेवत असताना समजा अर्जंट काॅल आले तर काय करायचं ?" हे असे लंगडे समर्थन आपले आपण करून घेत असतो, आणि त्याचा आनंद, आपण हिरावून घेत असतो.
म्हणजे, पोट माझे आहे, मी काय हवे ते करेन, त्या पोटाने मी जे (अत्याचार ) करतो ते सहन केलेच पाहिजे, या मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे.
ही इंद्रिये हे अवयव, हे मन, त्याने या जन्मापुरते आपल्याला सांभाळायला दिलेले आहे. ते नीटच सांभाळले पाहिजे. त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ....
नाहीतर तो देईल त्या शिक्षा भोगायला तयार असले पाहिजे..
वुई आर ओन्ली अ केअर टेकर ऑफ थिस बाॅडी ! वुई हॅव टु........
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.03.2017
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6
एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.
.......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.
एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
असो.
.......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?
संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
"बरं झालं ना मग."
"एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
म्हणाली,
"मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"
बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.
आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
औषधे कोणाला द्यायची ?
जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????
शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
Please correlate clinically.
कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.
म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !
सुटले कोडे मिळाले उत्तर!
आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.02.2017
स्त्रीत्व डोक्यावर घेतलेल्या पदरावर आणि हातभर बाह्या आणि कपाळभर कुंकवावर सुद्धा अवलंबून आहे. हेच स्त्रीत्व आहे, असं कुठं म्हटलंय ?
स्त्रीचा पोशाखावरून ती सुसंस्कृत आहे की नाही कसं ओळखणार ? हे खूपच लांबच सांगितलय,
बाह्य गोष्टीमधून लक्षात येणारं स्त्रीत्व हे लक्षात येईनासं झालंय. आणि हेच पीसीओडीचं कारण आहे, हे मला सुचवायचं होतं. कसं ते आता सविस्तर पाहू.
भारतीय आचार विचार आणि पीसीओडी हा विषय आणि आयडीयल वूमनहूड हे दोन स्वतंत्र विषय आहेत.
पाॅलीसिस्टीक ओव्हेरीयन डिसीज असं नाव धारण करणाऱ्या रोगाचे मूळ स्त्रीत्व नष्ट होत जाण्यामधे आहे. दरमहा जे डिंब तयार होऊन बाहेर पडते, ते बाहेर न पडता, बीजांडामधेच रहाते, म्हणजे पीसीओडी असं वरवर भासते. त्याचे मूळ कारण मात्र बदलत चाललेल्या जीवनशैलीमधे आहेत. त्याच्या काही कारणांचा अभ्यास केला तर, सुखाचा अतिरेक, कफ वाढविणारा आहार, बैठे काम, वाकण्याची सर्व कामे बंद होणे, जेवणाच्या अनियमित वेळा, आणि मुख्य म्हणजे आपण स्त्री आहोत हेच विसरून जाणे.अशी सर्वसाधारण कारणे लक्षात येतात.
याची लक्षणे कोणती ?
दरमहा मासिक पाळी न येणे, जाडी वाढणे, घाम खूप येणे, दाढी मिश्यांच्या ठिकाणी केस येणे, आवाज घोगरा होत जाणे, प्रवृत्ती पुरूषी होत जाणे, स्त्रीयांचे वैशिष्ट्य मानलेल्या, स्त्रीयांच्या मुलभुत गुणात असलेला नाजूकपणा कमी होत जाणे, बोलण्या चालण्यात, हावभावात पुरूषांप्रमाणे आक्रमकपणा येणे, ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहेत.
यावरून काय लक्षात येते ?
स्त्रीत्व संपत जाणे, म्हणजेच पीसीओडी.
रोग होण्याची तीन प्रमुख कारणे सांगितलेली आहेत. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. हे आधी लक्षात ठेवले पाहिजे.
दरमहा येणारी मासिक पाळी ही जिला कटकट वाटते, तिला पीसीओडी हा आजार लवकर होतो, भरीत भर म्हणून ती दरमहा येणाऱ्या रजःस्रावाला " प्राॅब्लेम " असे संबोधते. याचा अर्थ कटकट. दरमहा रजःप्रवृत्ती यायलाच हवी अशी भावना तयार झाल्याशिवाय मन, इंद्रिये, विषय, शरीर, अभिव्यक्ती ही साखळी पूर्ण होतच नाही. जर ती "कटकट" या अर्थी डोक्यात गेली असेल तर तिची अभिव्यक्ती कशी होणार ? आणि का व्हावी ?
मुळात हा आजार भारतीय नाही, तर पाश्चात्य विचारसरणीची देणगी आहे, असे मी म्हटले तर माझे काय चुकले ?
भारतीय असा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे हा आजार भगिनींना केव्हापासून सुरू झाला तर जेव्हा नैसर्गिक मासिक चक्राचा विचार पाश्चात्य पद्धतीने होऊ लागला, तेव्हापासून ना !
भारतीय विचारानुसार याला 'मासिक धर्म' असे संबोधले आहे. केवळ भारतीय धर्मशास्त्रातच नव्हे तर आयुर्वेदात देखील यावेळी शरीरातील टाकावू द्रव्ये बाहेर टाकली जातात. जो आर्तव गर्भधारणा न झाल्याने रज स्वरूप बनला आहे, त्याला शरीरातून बाहेर टाकणे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. केवळ गर्भाशयातूनच नव्हे तर घामातूनही ही शुद्धी होत असते. तिचा स्पर्श, घाम, श्वास इ. मधून मलाचे निष्क्रमण होत असते, म्हणून तिने अन्नपदार्थांना स्पर्शू नये असे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर अशोकासारख्या औषधी झाडांना देखील तिने त्या चार दिवसात स्पर्शही करू नये. असे सांगितलेले आहे. हे काही स्त्रीला कमी लेखण्यासाठी नव्हे तर तिला सक्तीची विश्रांती देण्यासाठी होते, हे लक्षातच घेतले जात नाहीये.
यावेळी तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था अत्यंत कोमल असते. तिला विश्रांतीची अत्यंत गरज असते. म्हणून तिला "अस्पर्शा" (अस्पृश्य नाही.) सांगितले आहे. हा तिचा सन्मानच आहे. अन्य कोणत्याही देशात अशी विश्रांती स्त्रीला या चार दिवसात देण्यात येत नाही. हा आहे स्त्रीयांकडे आणि तीच्या दरमहा होणाऱ्या शुद्धीकडे पाहाण्याचा शुद्ध भारतीय दृष्टीकोन.
यात काय विकृत मानसिकता दिसते कळतच नाही ?
पाश्चात्य बुद्धीच्या विचारवंतांनी जेव्हा स्त्री पुरूष समानतेचे खुळ डोक्यात भरवले, तेव्हापासून मासिक पाळीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तिटकारा सुरू झाला.
स्त्रीयांनी घराबाहेर पडूच नये, वगैरे वादात मी जातच नाहीये.
स्त्री पुरूष कर्तृत्वाने समानच आहेत, यात कोणालाही शंका नाही.
माझ्यावर स्त्रीत्व लादून, त्या पुरूष देवानेही अन्यायच केला आहे, ( इथे सोयीस्कररीत्या देव आठवतात. एरवी देव म्हणजे अंधश्रद्धा किंवा भोंदुगिरी वाटते, काहीजणांना.) असे म्हणून कसे चालेल ? स्त्रीला पुनर्निर्माण यंत्रणा म्हणजे अख्खं मातृत्व बहाल केलंय, सहनशक्ती दिलीय, हे मातृत्वच धोक्यात येतंय हे लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करतोय. बाकी काही नाही.
पाश्चात्य विचार हा भोगवादी आहे.
पैसे मिळवण्यासाठी स्त्री शरीराचा वापर कोणी सुरू केला ? दाढीच्या जाहिराती मधेदेखील सुंदर ललना दिसू लागल्या. इथे त्यांना सोयीस्कररीत्या स्त्री पुरूष समानता हवी. फक्त नवऱ्याने मिळवलेल्या मिळकतीवर हौस मौज करता येणार नाही, त्यासाठी घरात येणारा पैसा वाढला पाहिजे. पैसे जास्ती मिळतील, तर आणखीन चार सुखाच्या गोष्टीची खरेदी करता येईल, म्हणून घरातील (लक्ष्मी स्वरूप मानलेल्या ) स्त्रीयांनी दुसऱ्यांच्या दारात जाऊन चाकरी करून मिंधेपणा स्विकारण्यात धन्यता मानली. ???
ही काय भारतीय मानसिकता आहे ?
त्याही पुढे जाऊन त्या विशिष्ट दिवसात, हव्या तश्या उड्या मारायच्या, हवे तसे डोंगर चढायचे, सायकली चालवायच्या, टेनिस, बॅडमिंटन, खेळायचे, अशा जाहिरातीतून दाखवली जाणारी स्त्री चालते ? आरोग्याचा विचार करून पहा, हा त्या दिवसात स्त्रीयांवर होत असलेला अत्याचार नाही का ?
हा काय भारतीय विचार आहे ?
स्त्रीत्वाचा पराकोटीचा तिटकारा जेव्हा मनात घर करतो, तेव्हा मनामधे दोष उत्पन्न होतो. वाताचा प्रकोप होतो आणि अवरोध निर्माण होतो.
आयुर्वेदीय भाषेत पीसीओडीची संप्राप्ती वर्णन करायची झाल्यास, चुकीच्या जीवनशैलीमुळे तीनही दोष बिघडतात. कफ आणि वात वाढतो आणि पित्त कमी होते. विकृत कफ दोषामुळे, आम निर्माण आणि अग्निदुष्टी, पित्त क्षय, निरंतर हेतु सेवनाने अपान वायुची दुष्टी, आणि बदललेली मानसिकता यामुळे आणि व्याधी स्वभावामुळे दोष गर्भाशयात संचित होतात. बीजांडामध्ये स्थानसंश्रय करतात. अवरोध निर्माण होतो. अवरोधाने पुनः वातप्रकोप होतो.
या अवरोधामुळे तयार बीज पुढे सरकतच नाही.
एका बाजूने हेतु सेवन सुरू राहिले तर केलेल्या पंचकर्माचा आणि इतर शमन शोधनाचा तसा काहीही परिणाम होत नाही. आणि व्याधी दुष्चिकित्स्य बनतो. झाला तरी तात्पुरता होतो, पुनः ये रे माझ्या मागल्या !
चिकित्सा करताना "हेतुसेवन बंद करणे" ही पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट रहाते. या व्याधीतील वर वर्णन केलेल्या अनेक हेतुंमधील एक हेतु, जो मला जास्ती महत्त्वाचा वाटतो तो आहे, विचार बदलवणे.!
"मला दरमहा मासिक पाळी आलीच पाहिजे. त्याने माझी शरीर शुद्धी होत आहे. जे माझ्या स्त्रीत्वाचे वैशिष्ट्य आहे, ते स्त्रीत्व मी जागृत करीत आहे" असा सकारात्मक विचार अंतर्मनात पक्का झाल्याशिवाय, बाहेरून केवळ हार्मोन्स बदलवणारी औषधे घेत रहाणे, हा वरवरचा तात्पुरता उपाय आहे. त्यात मेटफाॅरमिन सारखी मधुमेहावरील औषधे कायम स्वरूपात घेणे, हे किती धोकादायक आहे ? आहे का मान्य हे ?
रोगाच्या मुळापर्यंत जाऊन विचार केला तर कळेल, स्त्रीत्व जागृत करणं किती महत्त्वाचे आहे ते !
स्त्रीत्व जागृत करण्यासाठीच, हातात काचेच्या बांगड्या घालणं, पायात वाजणारे पैंजण घालणे आणि डोक्याला ठसठशीत कुंकु लावणे असा उपाय मी चिकित्सा स्वरूप सुचवतो, यापेक्षा काही ( रूग्णाच्या भाषेत जालीम ) उपाय असल्यास जरूर सांगावा. नक्कीच उपयोगी होईल.
कुंकु लावल्याने काय एनर्जी मिळते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. हे फक्त स्त्रीयांनीच लावायचे असं नाही, स्त्री पुरूष दोघांनीही लावायचे आहे. आमचे विचारच पाश्चात्य होत असल्यामुळे आम्हाला त्याचे महत्त्वच कळेनासे झाले आहे.
हातात काचेच्या बांगड्या घालण्यात कमीपणा कसला ? पण नाजुकपणा नक्कीच येईल. काम करताना, थोडं सांभाळून काम करावं लागेल, बांगडी फुटुन हाताला लागण्याचा धोका असल्यामुळे रागावर संयम येईल, मनावर संयम येईल. मग पुरूषांनी पण हातात बांगड्या का घालू नयेत असाही प्रश्न येईल. पण एक लक्षात ठेवूया. पुरूषी हात नाजुक कामासाठी नाहीतच. ते राकट आहेत.
पायात वाजणारे पैंजण घातल्याने पण तेच होईल, पाय हलला तरी त्यात नाजुकपणा असेल, माझी चाल स्त्रीचीच असली पाहिजे अशी भावना सतत मनात जागृत रहायला हवी, हे महत्त्वाचे !
पुनः एकदा सांगतो, इथे कुठेही स्त्रीला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिला तर माता, लक्ष्मी, शक्ती रूपात आपण पहातोय !
पण आज आम्ही कशाही वागू, स्वच्छंद जगू, पुरूषी दास्य आम्ही मानत नाही, आम्ही कसेही कपडे घालू, पुरूषांनी आपली दृष्टी बदलणे गरजेचे आणि आवश्यक आहे, हा जो सूर स्त्री मुक्तीवाल्यांचा दिसतो, तो भारतीय नाही.
मुळात स्त्रीला एका रथाची दोन चाके मानणारी आपली संस्कृती, रमन्ते तत्र देवता हे मानाचे सर्वोच्च पद बहाल करणारी आपली संस्कृती,
कुमारी अवस्थेपासून, तारूण्य आणि वृद्धावस्थेपर्यंत पुरूषांनीच तिचे रक्षण केले पाहिजे असे ( खरंतर पुरूषांवर अधिक जबाबदारी ) सांगणारी आपली संस्कृती.
तिचा अनादर होईल असा विचारही आपण कधी करत नाही. स्त्रीकडे वासनामय दृष्टीने पहावे, असं कोणत्या भारतीय धर्म ग्रंथात लिहिलंय सांगा बरं. अगदी मनुस्मृतीमधे देखील स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत पवित्र आहे. (जी मंडळी मनुस्मृतीवर टीका करतात, त्यांनी ती मुळातून वाचलेलीच नसते. कोणत्या तरी श्लोकांची तोडफोड करून आपल्याला हवे असतील तसे सोयीस्कर अर्थ काढून विकृतरीत्या सांगितले गेल्यामुळे आम्हाला आमच्याच ग्रंथाचे मूळ अर्थ समजलेले नाहीत.
मनुस्मृतीचा पूर्वग्रहदूषित न ठेवता अभ्यास करायचा असेल तर स्वामी वरदानंद भारती, ( पूर्वाश्रमीचे वैद्य अनंत दामोदर आठवले ) यांनी मनुस्मृतीवर लिहिलेली टीका, जी राधादामोदर प्रतिष्ठानने प्रकाशित केलेली आहे, ती जरूर वाचावी.)
कुंकु, बांगड्या, पैंजण हे सर्व केल्याने काय होईल ?
आपण भारतीय पद्धतीने विचार करायला सुरवात करू.
आरशात पाहिले तरी, हात हलला तरी, पाय हलवला तरी लगेच लक्षात येईल, की मी स्त्री आहे, मासिक पाळी नियमितपणे होण्यासाठी मला चिकित्सा म्हणून हा उपाय सांगितला आहे. ही मानसिकता जेव्हा लक्षात येईल तेव्हाच कायमस्वरूपी रोग जाईल. रोगाच्या या मानसिक हेतुकडे दुर्लक्ष करून कसे चालेल बरे ?
भारतीयत्वापासून आपण लांब गेल्याने, असे गैरसमज वाढत चालले आहेत, या महिलादिनाच्या निमित्ताने ही माहिती आपल्यापर्यंत पोचवता आली.
ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांनी घ्यावं, सोडून द्यायचंय त्यांनी सोडून द्यावं.
जय नारी शक्ती !
जय भारतीय विचार !!
जय आयुर्वेद !!!
वैद्य सुविनय दामले, कुडाळ सिंधुदुर्ग.
आपल्या पैकी ब-याच मंडळींना कच्च्या केळ्याची भाजी व केळफूलाची भाजी नक्कीच आवडत असणार.कच्च्या केळीचे काप,भाजी,भजी,चिप्स अगदी छान लागतात तर केळफूलाची भाजी,कटलेट देखील रूचकर लागतात बरं का.
जसे ह्या दोघांचा स्वयंपाकात उपयोग होतो तसाच ह्याचा युक्तीपुर्वक वापर केल्यास आपण ह्याचा घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो.
कच्चे केळे हे तुरट गोड थंड गुणाचे असून शरीरातील कफ पित्त कमी करते तर केळफूल हे चवीला कडू तुरट असून उष्ण असते व हे शरीरातील वात कफ हे दोष कमी करते.
आता ह्यांचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जुलाब होत असल्यास कच्च्या केळीचा चीक तांदुळाच्या पेजेसह प्यावा.
२)संडासमधून आव पडत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून द्यावा.
३)अपचन,अम्लपित्त ह्यात कच्च्या केळीच्या पिठाच्या चपात्या कोरड्याच खाव्यात
४)मधुमेही रूग्णांना कच्च्या केळीची व केळफूलाची भाजी पथ्यकर आहे.
५)कच्च्या केळीच्या सालीची राख एरंडेल तेलात मिसळून पायाला पडणा-या कात्र्यांवर लावावे.
६)मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून खायला द्यावा.
कच्ची केळी व केळीचे बोंड खायचा अतिरेक केल्यास संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा.
आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो हे एकुन आता तरी आपल्याला नवल वाटणार नाही हे मला पक्के माहित झाले आहे.
चला तर आता पहिल्या भाजी पासुन सुरूवात करूया ना.बरं मग हि पहिली भाजी कोणती बरे,चला एक क्लु देते रामदेव बाबांच्या योग शिबिरे व योग व्याख्यानांमुळे ह्या महाशयांना बरीच प्रसिध्दी लाभली आहे.
आता कसे बरोब्बर ओळखलेत तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधीभोपळा किंवा ज्याला आपण कोकणदुधी म्हणतो तोच हा बरं का!
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 7
नंतरचा उपाय अर्घ्य.सुगंधीत पाण्याने हात धुवायला अर्घ्य वापरले जाते. पाण्यात चंदन, अक्षता, दुर्वा, इ. वस्तू घालून हे पाणी देवाला हात धुण्यासाठी दिले जाते.
काही खाण्यापिण्यापूर्वी हात पाय धुवायचे असतात, एवढे समजले तरी पुरेसे आहे. नंतरचा उपचार आचमन. ज्याविषयी आधी लिहून झालेले आहे.
स्नान आणि अभिषेक केल्याशिवाय पूर्ण शुद्धी होतच नाही. गंगा आदि सप्त नद्यांचे पवित्र पाणी आंघोळीकरीता आहे, अशी कल्पना करून आपणही स्नान करावे. स्नानाने शरीराची शुद्धी तर होतेच पण मनाची शुद्धी देखील होते. स्नान करीत असताना लक्ष स्नानाकडेच असावे, तरच स्नानाने मानसिक शुद्धी होईल.
पंचामृत स्नान, भस्म स्नान, इ. प्रकारावरील सविस्तर आरोग्यटीपा यापूर्वी आपण वाचलेल्याच असतील.
स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणायला सांगितलेली आहेत. मंत्राचे विशिष्ट स्वरामधे उच्चारण केले असता, त्यातून निर्माण होणारी स्पंदने, लहरी यांनी वातावरण सात्विक बनते. घंटा, शंख इ. मुळे निर्माण केल्या नादामुळे काही जंतु मरतात, असेदेखील वाचल्याचे स्मरते. मंत्र स्वतः म्हटले तर उत्तमच, पण केवळ ऐकले तरी आरोग्याची प्राप्ती होते, असाही एक संदर्भ मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीचा मिळतो. गायत्री मंत्राच्या योग्य उच्चाराने, कॅन्सर सारख्या रोगाच्या पेशींची वाढ थांबते, असेही लक्षात येत आहे. मात्र मंत्राचे उच्चारण निर्दोष हवे, स्पष्ट हवे, जीभेला पहिल्यापासूनच तशी सवय हवी तरच ते उच्चार जमतात, नाहीतर अर्थाचे अनर्थ होऊ शकतात, म्हणूनच समाजातील काहीजणांनाच ते काम नेमून दिलेले होते. जर उच्चारात जरा चुक झाली तरी निर्माण होणाऱ्या लहरींची स्पंदने बदलतात, आणि अर्थ चुकतो. चिता आणि चिंता, खून आणि खूण, जहाज, चमचा, श आणि ष यातील उच्चारात फरक पडून चालत नाही.
काही वेळा शब्द उच्चारणाऱ्याला त्या शब्दांचा अर्थ माहिती असत नाही, पण ज्याला तो अर्थ समजला पाहिजे, त्याला जर योग्य उच्चारात एखादे वाक्य ऐकवले तर, या वाक्यातून जे समजायला हवे होते ते त्याला सहज कळते.
जसे, "आज सांच्याक तुका चाराक सावतांथुय च्यॅयक बोल्लयला आसा" हे मालवणी वाक्य, मालवणी न कळणाऱ्या माणसाला काहीच अर्थबोध घडवणार नाही. पण ज्याला अर्थ कळणार नाही त्याने, जर हे वाक्य नीट उच्चारासह पाठ केले, आणि ज्याला मालवणी भाषा समजते, त्याच्यासमोर जाऊन उच्चारले तर ? ....
........त्या मालवणी माणसाला कळेल की, " मला सायंकाळी चार वाजता सावंत यांच्याकडे चहा प्यायला बोलावले आहे."
कळले का मंत्रामधील उच्चाराचे महत्त्व ?
जे जे देवासाठी, ते ते देहासाठी.
जरा जरी फरक झाला तरी नुकसान हे ठरलेले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.06.2017
पंजाब मध्ये प्रमुख आहार घटक असलेले हे धान्य कधी आपण कोकण गोवा प्रांतीय मंडळींनी आपलेसे केले हे आपले आपल्यालाच
समझले नाही.
तरी आता आपल्या प्रदेशामध्ये देखील बरीच मंडळी वेगवेगळ्या स्वरूपात ह्याचे सेवन करताना पण पहातो.जसेरवा,सांजा,पिठ,खीर,पुरी, चपाती,पराठा,लाडू इ.
म्हणूनच ह्या गव्हाचे गुण धर्म आपण ह्या सदरात पाहुया.
गहू चवीला गोड,थंड,पचायला जड,स्निग्ध,सारक,वात पित्त नाशक,कफकर,बलकारक,वजन वाढविणारे,मोडलेले हाड सांधायला मदत करणारे असतात.
आता ह्याच गव्हापासून निर्मित वेगवेगळे पदार्थ व त्यांचे गुणधर्म आपण पाहुया:
१) गव्हाचा मंड:
उष्ण,मल बांधून ठेवणारा,गोड,पित्तनाशक आहे.
२) रोटगे:
गोड,बल्य,कफकर,वातपित्तनाशक,सारक,वजनवाढविणारे,वातानुलोमक,धातुवर्धक,रुचिकर असतात.
३) रोटगे (शेणीच्या थाळीत आग करून धुर नाहीसा झाल्यावर त्यात घालून भाजलेले रोटगे):
पौष्टीक,धातुवर्धक,पचायला हल्के,भुक वाढविणारे,कफनाशक,बल्य.
४) भाकरी:(तव्यावर भाजून मग निखाऱ्यावर भाजलेली):
पचायला जड,बलकर,रुचिकर,पौष्टीक,
धातुवर्धक,कफकर,वातनाशक.
५) सांजापोळी:
पचायला जड,शुक्रवर्धक,कफकर,वातपित्तनाशक
बल्य,वजन वाढविणारी.
६) घारगे:
पचायला जड,वृष्य,बलकारक,रुचिकर,पुष्टीकर,कफकर,वातपित्तनाशक.
७) घिवर:
पचायला जड,धातुवर्धक,हृदयाला बल देणारे,धातुवर्धक,वात पित्तनाशक,कफकर.
८) लाडू:
गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,वात पित्तनाशक,कफकर,शुक्रधातु वाढविणारे,बलकारक.
९) शीरा:
गोड,पचायला जड,कफकर,वात पित्त नाशक,बल्य,वजन वाढविणारे,श्रम हारक.
१०) गव्हाची खीर:
पचायला जड,कफकर,वजनवाढविंणारी, वातपित्तनाशक,वृष्य,धातुवर्धक,शुक्रवर्धक, हृदयाला हितकर आहे.
गव्हाचे पदार्थ खायचा अतिरेक केल्यास कफाचे विकार,स्थौल्य येऊ शकते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
मांसाहारी प्राण्यांची आणि शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. मांसाहारी म्हणजे कार्निवोरस, जे फक्त मांसच खातात. शाकाहारी म्हणजे हर्बीवोरस. ज्यांचे मुख्य अन्न, शाक म्हणजे पालाच आहे.
शाकाहारी प्राण्यांच्या जवळपास जाणारी आणखी एक जमात अस्तित्वात आहे, तिला फ्रूगीवोरस म्हणतात. ही जमात फळे, धान्य, धान्याच्या बीया आणि पाला हे सर्व खाते. पण ज्यांचे मुख्य अन्न, धान्य आणि बीया हे आहे. हे फ्रूगीवोरस हर्बीवोरसच्या जवळचे असतात. पण थोडा फरक असतो.
हर्बीवोरस प्राण्यांचे पचन थोडे वेगळे असते. यांची आतडी ही इतर दोन प्रकारांपेक्षा मोठी असतात. शरीराच्या उंचीच्या किंवा लांबीच्या सर्वसाधारणपणे बावीस ते चौवीस पट मोठी असतात. पाल्यामधे असलेले घटक पचवण्यासाठी ही आतडी मोठी असणे, पचन सावकाश होणे, आवश्यक असते. त्यामुळे या प्राण्यांनी भराभरा खाल्लेले अधिक रेषायुक्त पाल्याचे अन्न सावकाश पुढे सरकते, आणि नंतर पुनः हे अन्न तोंडात आणून रवंथ केले जाते. पाल्यामधे अल्प प्रमाणात असलेला पिष्टमय पदार्थ पचवायला आवश्यक लाळ यांच्या तोंडात तयार होते. यामधे पिट्यूलीन हे एन्झाईम असते.
हे एन्झाईम फ्रूटीवोरस जमातीमधे त्याही पेक्षा जास्त आढळते. यांची आतडी ही हर्बीवोरसपेक्षा थोडी लहान पण कार्निवोरसपेक्षा मोठ्ठी असतात. शरीराच्या तुलनेत आतडी साधारणपणे बारा पट मोठी असतात. आणि कार्निवोरसची आतडी शरीराच्या लांबीच्या तुलनेत फक्त चार पट एवढी लहान असतात. अन्न लवकरात लवकर पचून बाहेर पडून जावे, यासाठीची त्याने केलेली रचना आहे.
यांच्या लाळेमधील पिट्यूलीन मात्र जास्त असते, कारण यांचा मुख्य आहार धान्य, बीया, फळे इ. म्हणजे पिष्टमय पदार्थ आहे.
या फ्रूटीवोरसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एकदा अन्न चावून, बारीक करून, वरून खाली ढकलले की, पचनाची जबाबदारी संपली. पचनासाठी नंतर विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत.
जसे, वाघ सिंहा सारखे मांसाहारी प्राणी खाल्लेले मांस पचवण्यासाठी गडाबडा लोळतात, किंवा अजगर झाडाला विळखा घालून अंगाचे बऱ्याच वेळा आकुंचन प्रसरण करतात. तसे फक्त पाला खाणारे हर्बीवोरस करत नाहीत, पण यांना पचनाला मदत करण्यासाठी रवंथ मात्र करावेच लागते.
ही त्याने स्वतःची बुद्धीमत्ता वापरून केलेली रचना आहे.
बाय डिफाॅल्ट प्रोग्राम ने फिक्स झालेली.
यातील एकही प्राणी आपली जीवनपद्धती बदलत नाही. म्हणून यांचे अस्तित्व आजही टिकून आहे.
या तीनही प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचा आतून बाहेरून विचार केल्यास, स्वभावगुणांचा विचार केल्यास, निर्माण होणाऱ्या स्रावांचा विचार केल्यास, बुद्धी नावाची चीज जरा जास्ती दिली आहे, तो माणूस नावाचा प्राणी कोणत्या गटात येतो. हे आपणच ठरवावे.
कोणाला काय आणि किती द्यायचे हे देणारा ठरवित असतो.
त्याच्याकडे जे आहे, त्यापेक्षा अधिक तर कोणीच देऊ शकत नसतो.
देणाऱ्या पेक्षा घेणारा हा जर, स्वतःला जास्ती बुद्धिमान समजायला लागला, तर देणारा,
"भोग आपल्या कर्माची फळे" असे म्हणत असतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
30.09.2016
तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ?
त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल.
यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर तपासता येत नाही हेच खरे.
तेच प्रत्येक चवींच्या बाबतीत आहे. वापरून बघितली की, अभ्यास केला की, यांची अनुभूती घेता येते.
या सर्व चवींचे ज्ञान जीभ या ज्ञानेंद्रियानी होत असते. हे एकमेव इंद्रीय उभयात्मक आहे. म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे.
रसना म्हणजे आत चवीची अनुभुति देणे म्हणून रसनेंद्रिय आणि निर्माण झालेला शब्द बाहेर फेकणे म्हणून वागेंद्रीय.
आत बाहेर दोन्ही कामे करते. म्हणून या जीभेवर संयम आणता आला की, सर्व साध्य झाले. ज्याने जिंकीली रसना, त्याने जिंकिली वासना.
सर्व इच्छांवर संयम आणण्यासाठीदेखील ही तुरट चव मदत करेल.
संयमात ठेवणे हा गुण झाला, पण काहीवेळा तो दोषही होतो. जिथून विष बाहेर काढायचे आहे तिथून ही तुरट चव बाहेर पडायलाच देत नाही. स्रोतसांचे आकुंचित झाल्यामुळे बाहेर पडणारे स्राव कमी होतात. न पचलेले अन्न देखील आत मधे पडून राहाते. आम जागचा हलत नाही, तो तुरट चवीच्या याच स्तंभ गुणामुळे ! त्याचा परिणाम म्हणून पोटदुखी, मलावष्टंभ.
रक्तवाहिनीचा गरजेपेक्षा जास्त संकोच झाला तर रस रक्त विक्षेपणात अडथळे येणे, ह्रदयात वेदना होणे, ह्रदयाची ताकद कमी होणे, ही लक्षणे दिसतात.त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होऊन यकृत, किडनी इ. मधे पण अवरोध जमा होऊ लागतो. म्हणून थकवा येणे, ग्लानी येणे, उत्साह जाणे, रक्तदाब वाढणे, तोंड सुकणे, आवाज बसणे यासारखी लक्षणे निर्माण होतात. चेहेरा वाकडा होणे, एक बाजू लुळी पडणे, हे वाताचे आजार देखील याच तुरट चवीच्या अतिसेवनाने होतात. हे विसरता नये.
पोषण करणाऱ्या नलिकांचा संकोच झाल्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो. वजन खूप कमी होते, प्रतिकार करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदच संपून जाते. याला देखील हीच तुरट चव जबाबदार आहे.
आपणाला कायम एकच बाजू दिसत असते. दुसऱ्याची चुक आणि आपली बरोबर.
दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय ठेवली तर भूमिकेला योग्य न्याय देता येतो. आपले काय चूक नि काय बरोबर. आणि ते का. हे शोधले की सापडते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.11.2016
Copyright © 2025 | Marathisrushti