आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ?
एक.
दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर....
दोन अडीज मोसंबी.
यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत.
आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही !
पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ?
एक ग्लास अगदी सहज.
आग्रहाने, स्पेशल कोणी आणून दिला तर...
दोन ग्लास पण नक्कीच पिऊ....
मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या गझलेच्या भाषेत सांगायचे तर ....
मला तर तो "रस" नकोच होता
मला तर तो "रस" नकोच होता,
पण
तू दिलेला रस
रस घेऊन
घेतला नाही तर....
.
..
...
तुझा विरस होणार होता
आणि नंतर तुझा,
माझ्यातला "रस" कमी होणार होता....
म्हणून प्यावा लागला.
मोसंब्याचा दोन ग्लास रस येण्यासाठी किती मोसंबी लागतात ?
तब्बल सात ते आठ.
माझी रसनेंद्रियांची तृप्ती फक्त एक नाहीतर दोन मोसंबी खाऊन होणारी होती, तिथे सात आठ मोसंब्यांचा ऐवज जर पोटात ओतला गेला तर ?
पचेल का तो ?
नाही ना.
मग ??
आधीच आहे अप्सरा
बटेने झाकला चेहरा
केसात माळला गजरा
चेहराही मंद हसरा
त्यात जरासा नखरा
हाऽय हाऽय्ऽ
काय हा नजारा
फेसाळलेला रस काढलेला
ग्लास समोर भरलेला
त्यात आल्यालिंबाचा रस पिळला
पुनः वरून चाट मसाला भुरभुरवला
गरज नसताना स्ट्राॅ ही घातलेला
एवढासा ग्लास तो किती नटवला
बाकी चवींनी एवढा का सजवला ?
पचायला जड होणारा पचवायला.
स्नेहन, प्रीणन, तर्पण, बृंहण, दीपन, पाचन, व्यवायी, विकासी, आणि ह्रद्य
असे सारे गुण एकाच वेळी, एकाच ग्लासात व्यक्त व्हायला लागले तर रसाजीर्णच व्हायचे. !
फळे हवीत चावून खायला
एवढंस मर्म सांगायला
एवढं हवं होतं का घोळवायला.
असं ज्युस पिणे म्हणजे, स्वतःचा बंगला असताना, बंगल्यात अप्सरा असताना, बंगला अप्सरा सोडून, झोपडीतील खत्रूड मड्डमेवर प्रेम केल्यासारखंच नाही का ?
तोंडात स्वतःचे बत्तीस दात समोर हयात असताना, आणि तिला फसवून (जीभेला) डायरेक्ट घश्यात ज्युस ओतणे, हा शुद्ध अन्याय आहे.
चव निर्माण करणाऱ्यावर,
चव घेण्यासाठी "मी" आहे,
असे सांगणाऱ्या "मी" वर !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.12.2016
December 1, 2016
हे पाणथळ जागी उगवणारे व नेहमी हिरवेगार असणारे १-२ मी उंचीचे क्षुप आहे.ह्याचे कंद जमीनीत असतात.आल्याच्या कंदा प्रमाणे ते वाढते.ह्याला ५-६ पर्व असतात जे मधल्या बोटा एवढे जाड व रोमयुक्त तांबूस रंगाचे व सुगंधी असतात.पाने हिरवी चमकदार व उसाच्या पानाप्रमाणे लांब,व कडा लाटा युक्त असतात.फुल पिवळट पांढरे मंजिरीस्वरूप असते.
वचा चवीला कडू तिखट असून हि उष्ण गुणाची हल्की,तीक्ष्ण,रूक्ष व प्रभाव मेध्य असलेली आहे.वचा कफवातनाशक व पित्तकर आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊया:
१)वेदना व सुज ह्यात वेखंडाचा लेप करतात.
२)लहान मुलांमध्ये वेखंड मेध्य कार्य करते अर्थात बुद्धिची ग्रहण व स्मरणशक्ती सुधारते.
३)मानसिक आजारात वेखंड हे तुप अथवा मधासह देतात.
४)खोकला,दमा ह्यात वेखंड सैंधव व कोमट पाण्यासह दिल्याने उल्टीतून कफ बाहेर पडतो.
५)वेखंड कृमीनाशक म्हणून देखील उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32
नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा
देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
कशासाठी?
वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )
एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )
सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !
अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !
बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !
काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.
चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.06.2017
June 25, 2017
तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत जसे ह्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे लागली कि ते अपशकुन मानला जातो,बऱ्याच घरात हा आणणे शिजविणे निषिद्ध असते.तसेच दृष्टबाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ धरा बाहेर बांधतात.
एवढे चांगले फळ पण किती शापित बिच्चारे नाही का हो!बरे ह्याचा उपयोग खायला देखील केला जातो बरं का.आग्रा फेमस पेठा कोहळ्यापासून बनवितात,आपण उन्हाळयात करतो त्या वड्या कोळ्याच्याच,खीर देखील करतात,काहीजण ह्याचा खवा देखील करतात.आणी हे सगळे पदार्थ पौष्टिक असतात बरं का.
कोहळ्याचा वर्षायू वेल असतो.ह्याची पाने ४-६ इंच लांब व हृदयाकृती असतात,पाने पिवळी २ इंच व्यासाची असतात.फळ अंडाकृती १-११/२ फूट लांब व वर सफेद पावडरचे आवरण असणारे असते.
हा चवीला गोड,थंड व वात पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
चला आता ह्याचे औषधी व घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप करावा.
२)अम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.
३)बुद्धि व धारणाशक्ती वाढवायला पिकलेल्या कोहळ्याच्या १/४ कप रसात १/२ चमचा ज्येष्टमध उगाळून घालावे व हे मिश्रण रोज सकांळी अनशापोटी प्यावे.
४)४ चमचे कोहळ्याचा रस+ ४ चमचे आवळा रस रोजसकाळीघ्यावाह्यानेथुंकी ,नाक,लघ्वी,
मुळव्याध ह्यातून होणारा रक्त स्त्राव कमी होतो.
५)डोळ्यांची आग होत असल्यास व डोळे लाल होत असल्यास कोहळ्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.
६)वजन वाढवायला ४ चमचे कोहळ्याचा रस +गव्हाचे सत्व १/२ चमचा+ खडी साखर १ चमचा रोज सकाळी अनशापोटी घ्यावे व वर १२ सुर्यनमस्कार घालावेत.
कोहळा अति खाल्ल्यास शरीर स्थूल होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
शिरा ताणून बोलू नये
"अरे मला ऐकायला येतंय, उगाच शिरा ताणून बोलू नये. डोके दुखायला लागेल. गळ्याच्या शिरा किती फुगतायत बघ." ही आईची नेहेमीचीच शिरा ताणून ओरड सुरू असते.
शिरा ताणून बोलायची सवय वाईटच. आपण मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपण खरं बोलतोय, किंवा दुसऱ्याला ते पटतंय, असं वाटणं, हा निव्वळ भ्रम आहे.
बोलताना मनावरचा संयम वाणीमधे दिसला पाहिजे. मनातील रागादि रिपु वाणीतून प्रकट होता नये. तावातावाने बोलल्यामुळे डोक्यातील सर्व सूक्ष्म इंद्रिये ताणाखाली येतात. अनावश्यक दाब तयार होतो. जो दाब बोलून गेल्यानंतरदेखील काम करीत राहातो. असं वारंवार झालं तर नुकसान होणारच !
उगाच वाद ओढवू नये
म्हणजे आ बैल मुझे मार. समोरचा स्वभावाने कसा आहे, हे आपल्याला जर नीट कळलेले असेल तर, त्याच्याशी कसे बोलावे, त्याच्याशी कसे वागावे, याचा विवेक करता यायला हवा. जेवढे शब्द जपून वापरता येतील, तेवढे जपून वापरावेत, नाहीतर अर्थाचे अनर्थ होतात. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या नावाखाली एक काव्य वाॅटसपवर प्रसारीत होत आहे, शब्द तासून बोलावा.वगैरे... खरं आहे ते !
बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून मग शांतपणे बोलावे.
पण गरज असेल तेव्हा न बोलणे हा अवगुण देखील आहे. काहीवेळा आपल्या बोलण्यातील धार दाखवून पण द्यायला लागते. समर्थ म्हणतात,
ठकासी पाहिजे ठक
खटनटासी खटनट
हुंब्यासी हुंबा
लावूनी द्यावा.
आपण कोणाशी वाद करायला जाऊ नये, पण वाद करायला कोणी आलाच तर शिंगावर घेण्याची तयारी पण हवी.
आई नेहेमी सांगते. शाळेत "उगाच" भांडू नकोस. त्या वाक्याचा अर्थ आता कळतोय. जर भांडायची वेळ येईल, तेव्हा उगाच गप्प पण बसू नकोस. असंही तिला सांगायचं असतं.
वाद घालण्याची पण एक कला असते. आयुर्वेद महाविद्यालयात पदार्थविज्ञान या विषयात, "तंत्रयुक्ती" नावाचा एक प्रकार शिकायला मिळतो. याचा नीट अभ्यास केला तर, आपले म्हणणे समोरच्या व्यक्तींना समजावून सांगता येते. आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना पदार्थविज्ञान हा खरंतर "ऑप्शनला" टाकलेला विषय. हे असले विषय कशाला घेतले सिलॅबसमधे य्यार ! असं म्हणून या विषयाची जागा त्याला दाखवून दिलेली असते, पण पुढे व्यवहारात रुग्णाला आपले म्हणणे समजून सांगायला, पदार्थविज्ञान हाच विषय काम करतो, हे आता लक्षात येतेय.
काही गोष्टींचे महत्त्व कळण्यासाठी, काही काळ जाणं आवश्यक असतं. असंही आई म्हणायची, तेही खरंच आहे म्हणा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१३.०८.२०१७
August 13, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग दोन !
यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....
आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.
आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.
आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !
फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !
वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.
माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.
मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.
राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.
रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.05.2017
May 7, 2017
वेगान् न धारयेत
न प्रवृत्तयेत
वेगांचे धारण करू नये अगर मुद्दाम प्रवर्तन करू नये.
म्हणजे शास्त्रकार असे सांगतात की, शरीराकडून आतून जे सांगितले जाईल तेवढे त्या वेळी करावेच. आणि जर केले नाही तर त्रास होणार हे शंभर टक्के सत्य आहे.
तहान, भूक, उलटी, संडास, लघवी इ. असे एकुण तेरा वेग आहेत, ज्यामधे त्याला विसरून चालत नाही.
जसे, उलटी होते, शिंक येते, लघवी होते, ही शरीराच्या चांगल्यासाठीच असते. पण उलटी होत नसताना उगाच सुके ओकांबे काढणे म्हणजे निव्वळ दमछाक करून घेणे आहे.
शिंक आल्यावर जरूर शिंकावे. पण उगाचच टा. पा. (टाईमपास) म्हणून नाकात काड्या घालतात, ते नाकाला हुळहुळ निर्माण करण्यापलीकडे काही करत नाही.
तशीच तहान लागणे आणि पाणी पिणे हे करावेच. तसेच तहान लागली नसताना पाणी पिणे म्हणजे किडनींची निव्वळ दमछाक होते. जेव्हा शरीराला पाण्याची गरज लागेल तेव्हा, शरीर तहान हे लक्षण निर्माण करतेच. तहान कळलीच नाही तर घश्याला कोरड पडेल, लघवीला पिवळसर होईल, लालसर होईल, जळजळ होईल, अर्थात अशावेळी सुद्धा साधे पाणी पिऊ नये तर, धने जिरे घालून उकळलेले पाणी थोडे थोडे घोटघोट प्यावे.
तहान लागणे आणि सारखी तहान लागणे, यातील सूक्ष्म फरक समजला पाहिजे. मधुमेहासारख्या आजारात जी वारंवार तहान लागते ती, रोग स्वरूपात असते. ती पाणी पिऊनदेखील थांबत नाही, भागत नाही, अशावेळी तो वेग नसून रोग आहे असे समजावे. ( ज्यावेळी पाणी पिऊन त्याचे समाधान होते, त्यावेळी तो शरीराकडून निर्माण झालेला वेग असतो. आणि तहान लागून पाणी पिऊनही जेव्हा त्याचे समाधान होत नाही, असे जेव्हा तोआपल्याला सांगतो, तेव्हा "आता वैद्याला दाखवून घ्या" असे तो, आपल्याला सूचित करतो. हे समजले पाहिजे.)
जसे कफ झाला असता उलटी होणे वेगळे आणि रोग म्हणून उलटी होणे वेगळे आणि तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वमन म्हणजे पंचकर्मातील उलट्या करवणे वेगळे !
यातील फरक, पुस्तक वाचून किंवा वाॅटसप मेसेज वाचून कळणार नाही. याकरीता पूर्वीचा आपला स्वतःचा किंवा तज्ञ वैद्याचा अनुभव महत्वाचा आहे.
हे सर्व करवून घेणारा तो असतो.
दैनंदिन दिनचर्येतील त्याचे महत्व, त्याचे अस्तित्व, त्याचा आपल्याशी होणारा सुसंवाद,
हे समजून घेणाऱ्याला, नक्कीच समजून येईल. हे जो समजून घेईल, त्याला दुःख कधीच होणार नाही.
कारण तो म्हणजे फक्त सत् चित् आनंद !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
13.12.2016
December 13, 2016
1अपानवायु आणि ढेकर, 2मल, 3मूत्र, 4शिंक, 5तहान, 6भूक, 7खोकला, 8जांभई, 9उलटी, 10अश्रू, 11शुक्र, 12झोप आणि 13श्रमामुळे लागणारा दम, यांना वेग असे म्हटलेले आहे. यातील कोणाचेही अवरोध करू नये, किंवा मुद्दाम प्रवर्तन करू नये.म्हणजे निर्माण करू नये.
या प्रत्येक रोगाचा अवरोध केल्यामुळे काय काय लक्षणे दिसतात, ते वाग्भट या शास्त्रकारांनी अध्याय चार मध्ये वर्णन केले आहे.
या अध्यायाचे नावच मुळी रोगानुत्पादनीय असे आहे. म्हणजे रोग होऊ नये यासाठी आपण काय करावे, याचे वर्णन या अध्यायात केले आहे.
शरीरातील या वेगांचा अवरोध कधीही करू नये. जर असा अवरोध वारंवार होत असेल तर त्याची चिकित्सा काय करावी ते सुद्धा सांगितले आहे.
त्यातील तहान या वेगाचा अवरोध केल्यामुळे,( म्हणजे तहान लागली असता पाणी न पिल्यामुळे ) शोष, अंग ठणकणे, बहिरेपणा, मूर्च्छा, भ्रम, आणि ह्रदयरोग हे विकार होतात. चुकुन असे झाले तर त्याची चिकित्सा म्हणून शीत उपचार करावेत, असे ग्रंथकार म्हणतात. शीत उपचार म्हणजे थंड उपचार. जसे थंड गुणाचे चंदन, केशर, कांदा, वेखंड, धने जिरे इ. लेप लावणे, या द्रव्यांचे रस किंवा पाणी थोडेथोडे पिणे, थंड पाण्याचा अंगावर शिडकावा करणे, थंड वारा घालणे, गुलाब, वाळा इ. सुवासिक फुलांचा आणि मुळांचा सुगंध घेणे, अश्याच गुणांच्या तेलाचे मालीश करणे किंवा विधीवत बस्ती घेणे इ. उपचार करावेत.
आजच्या काळाचा विचार करता, चिकित्सातत्व तेच ठेवून तहान या वेगाचा अवरोध झाल्यामुळे वर वर्णन केल्याप्रमाणे जो त्रास होतो, त्याला प्रथम उपचार म्हणून अगदी असेच उपचार करतात. जसे सलाईन लावणे, कोल्ड स्पजींग, कोलन वाॅटरने पुसुन काढणे, आईस वाॅटर एनिमा, एसी खोलीमधे ठेवणे, इ.इ.
यासाठी आपली तहान आपल्याला समजली पाहिजे. पोटावर जबरदस्ती, अत्याचार होऊ नयेत. जेव्हा तहान लागते तेव्हा, तहान लागते तेवढेच पाणी वा तत्सम द्रवपदार्थ प्यायलाच पाहिजे. आणि जेव्हा भूक लागते तेव्हा, जेवण म्हणजे घन आहार त्याच वेळी पोटात गेला पाहिजे. असे केले नाहीतर काय होते, ते सुद्धा अभ्यासून लिहून ठेवले आहे. भावप्रकाश या ग्रंथात ग्रंथकार म्हणतात,
तृषितस्तु न चाश्नियात्क्षुधितो न पिबेज्जलम् |
तृषितस्तु भवेद्गुल्मी क्षुधितस्तु जलोदरी ||
सार्थ भावप्रकाश
तहान लागली असता पाणी न पिता जेवण्याने गुल्म, म्हणजे पोटात गोळा होणे हा रोग होतो, तर भूक लागली असता, न जेवता रिकाम्या, भुकेल्या पोटी पाणी पिण्याने जलोदर किंवा असायटीस म्हणजे पोटात पाणी साठून रहाणे हा रोग होतो.
कोणता रोग का होतो, याची कारणे शोधून काढून, अनुमान करून, ते वारंवार अभ्यासून, पुढच्या पिढीसाठी सर्व लिहून ठेवणाऱ्या, या सर्व ऋषींना साष्टांग दंडवत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.12.2016
December 14, 2016
एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?.....
गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?...
आमची अर्धी लाकडं गेली मसणात.....
काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून....
आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?......
जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?......
विज्ञानावर, त्याच्या नवनवीन शोधांवर, या आयुर्वेदीक वैदूंचा अजिबात विश्वास म्हणून नाही. भोंदूगिरी सगळी.....
असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आत खदखदत आहेत, हे कळतंय....
आजची टीप त्यांच्यासाठी...
आयुर्वेद सांगतो, निरामय जीवन जगावं. औषधांशिवाय जगावं, दिलखुलास जगावं, आपण निरोगी रहावं, इतरांना निरोगी होण्यास मदत करावी.
औषध कसं असावं यावर आयुर्वेद सांगतो, एक औषध घेताना अन्य कोणत्याही स्वरूपाचा बिघाड शरीरावर दिसू नये, आजच्या भाषेत सांगायचे तर कोणतेही साईड इफेक्ट, म्हणजे दुष्परिणाम नकोत. ज्या कारणासाठी औषध घ्यायचं ते कारण नाहीसे झालं की, औषध बंद व्हायला हवं.
पण आज काय होतंय ? आणि काय चाललंय ? हे सर्व आपल्याला दिसतंय.....
जगण्यासाठी, मरेपर्यंत औषधंच औषध!
त्यापेक्षा जीवनशैलीमधेच थोडेफार बदल केले, विचारामधे थोडी सकारात्मकता आणली की झालं.
काही आजार वंशपरंपरेने येतात, असे सांगितले जाते, हे पण अर्धसत्य आहे. जसे घरात एकाला "ह्रदयरोगी" असा शिक्का बसला की, त्याचे अख्खे घराणे वाताचे रोगी बनून जाते.
कारण ?
डाॅक्टरनी सांगितलेले चुकीचे पथ्यापथ्य.
भीतीने असेल किंवा आमच्यासाठी कुठे वेगळं करत रहाणार, या कारणाने असेल, पण, त्या एकाच्या जेवणातले तेल, तूप, नारळ, शेंगदाणे, आदि सर्व स्निग्ध पदार्थ बंद केल्यामुळे, सगळ्याच्याच जेवणातील स्नेह आटून जातो. (जेवणातील आणि जीवनातील सुद्धा !) आणि अख्खं घराणं चुकीच्या आहाराची शिकार होते. हे तसंच्या तसं पुढच्या पिढीत काॅपी पेस्ट होतं आणि नवीन (वंश /देश )परंपरा सुरू होते.
आपल्या घरात तर अशी चुकीची परंपरा सुरू तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे, यासाठी आपली वंश परंपरा, देश परंपरा नीट तपासून पहायला हवी. इतिहास आणि पुराणे वारंवार नव्याने अभ्यासायला हवीत.
ही नव्याने निर्माण होणारी चुकीची आहार परंपरा आपल्याला थांबवायची, बदलवायची आहे.
आणि मुख्य म्हणजे आपली (दोन किंवा एक) मुले. ज्यांच्या खांद्यावर आपण आपले भविष्य ठेवणार आहोत, ते सक्षम नकोत का व्हायला ? आम्ही ज्या चुका केल्या, किंवा करतोय त्याची चुकीची फळे त्यांना भोगायला लागू नयेत, मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, संधीवात, स्थौल्य, पीसीओडी, थायराॅईड सारखे पसरत जाणारे आजार आपल्या घरात येऊ नयेत, यासाठी आपणच वेळीच सावध होऊन, बदलायला हवे.
मुलं आपलं अनुकरण करत असतात. काही गोष्टी न शिकवता आपल्याकडून शिकत असतात. याचे भान पालक म्हणून आपण ठेवायलाच हवे. माझ्या आई वडिलांच्या लहानपणी असलेली सकाळी सायंकाळी जेवायची वेळ एका पिढीने बदलली, आणि चुकीच्या रोगांची मालिका सुरू झाली. असे लक्षात येतेय. म्हणून आपणच जर आपल्या घरातील जेवायची वेळ बदलवायचे सकारात्मक नियोजन केले तर (तथाकथित) पिढीजात आजारापासून आपण आपल्या भविष्याला वाचवू शकतो.
अजूनही वेळ गेलेली नाही.
मी बदललो...
माझे घर बदलले....
असंच प्रत्येकाच्या घरी होत राहिलं तर...
लक्षात येईल.....
मेरा देश बदल रहा है..
सारा देश बदल रहा है......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.03.2017
March 8, 2017
अ) गाईंचे दुध:
१)गुळवेलीच्या काढ्यात गाईंचे दुध घालून काढा आटे पर्यंत दुध उकळावे व ताप येत असणाऱ्या व्यक्तींचा पिण्यास द्यावे.
२)पोटात काही गंभीर आजारामुळे पाणी झालेल्या रूग्णाला इतर औषधांसोबतच नियमीत गाईचे दुध पाजावे फायदा होतो.
३)पोटात आग होणे,पोट दुखणे,काही खाल्ल्यावर बरे वाटणे ह्या तक्रारीमध्ये कोमट दुध,खडी साखर व गाईचे तूप हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस थोडे थोडे प्यावे.
४)वारंवार संडास मधून आव पडून त्रस्त झालेल्या व्यक्तीला १ कप गाईचे दुध+१ कप पाणी+१/२ चमचा सुंठ घालून हे मिश्रण फक्त दुध शिल्लक राही पर्यंत उकळावे व त्यास थोडे थोडे पाजावे.
५)संडासला घट्ट होत असल्यास १ वाटी दुध+ १ मोठा चमचा तूप किंवा लोणी चपाती किंवा भाकरी सोबत खावे.
गाईचे दुध प्यायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti