हे थंड हवेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे फळ.ह्याला मराठी मध्ये नाश्पती असे म्हणतात.हे फळ बऱ्याच जणांना आवडते.
हे हिरवट पिवळ्या रंगाचे पेरूच्या आकाराचे फळ असते.ह्याची चव आंबट गोड असते व त्याला मंद मादक सुवास येतो.
हे फळ थंड गुणाचे असून वात पित्त नाशक असून थोडे कफकर आहे.
चला आता ह्याचे घरगुती उपचार पाहुया:
१)संडासला पिवळसर काळे,भसर,भरपूर वारंवार होत असेल तर अर्ध कच्चा पेअर खावे व इतर आहार घेऊ नये.
२)पोटात जळजळ,भुक मंदावणे,आव पडणे,पोट दुःखी ह्या तक्रारी असल्यास जेवणासह पेअरचे तुकडे खावे.
३)जीभेवर पांढरा थर,दात व हिरड्या शिवशिवणे,हिरड्या मधून रक्त वाहणे ह्यात कडक पेअर चावून खावे.
४)थकवा येणे,तोंड सुकणे,घशाला कोरड पडणे,शरीरातील उष्णता वाढणे ह्यात पेअरचा रस थोडे सैंधव मीठ घालून प्यावा.
अती पेअर खाल्ल्याने सर्दी,खोकला होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36
नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा
नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.
शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.
सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.
हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )
नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.
या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
29.06.2017
या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.
अग्नि महत्वाचा !
'अग्निमिळे' या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व !
पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा.
हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. (आणि तसं पाणी सूर्यास्तानंतर प्यायचेच नाही, अगदी उकळून गार झालेले पाणी देखील परत गरम करायचे नाही आणि रात्र उलटून गेली तर निषिध्दच ! )
सूर्याखेरीज आणखी कोणते अग्नि वापरले जातात. मोठ्या यज्ञामधे जी अग्निची स्थापना करतात, त्यासाठी लाकडी रवि लाकडी उखळात घर्षण करून अग्नि निर्माण केला जातो. स्वयमग्नि ! हा अग्नि अत्यंत शुद्ध असतो.
नंतर त्याची स्थापना करून इतर समिधा, लाकडे वगैरे इंधन वापरून वाढविला जातो.
एक अग्नि विवाहाच्या वेदीवर सप्तपदी करत असताना प्रज्वलीत केला जातो. या अग्निचे रक्षण पुढे समंत्र आयुष्यभर करायचे असते, जो मृत्युनंतर उरलेलं शरीर परत ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी, म्हणजेच दहन करण्यासाठी वापरला जातो. हा अग्नि अत्यंत पवित्र असतो. म्हणून अग्निला पावक असेही म्हणतात.
गारगोटीचा दगड वापरून अग्नि प्रज्वलीत केला जातो, तोही अग्निच, पण गरज म्हणून तयार केलेला. मंत्राशिवाय केवळ तंत्र वापरून.
एक अग्नी चुल पेटवण्यासाठी वापरतात. सध्याच्या जमान्यातील काडेपेटी वापरून म्हणजे गंधकाचा वापर करून. किंवा लायटर मधली चकमक वापरून ठिणगी तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेला अग्नि हा दुय्यम दर्जाचा मानला जातो.
अग्नि रक्षणासाठी जे इंधन वापरले जाते, तेही महत्वाचे. जसे तेल, तूप, राॅकेल, कापूर, स्पिरीट, जसे इंधन तशी काजळी, तशी अग्निची तीव्रता !
विडी किंवा सिगरेट पेटवायची असेल तर देवघरातल्या निरांजनावर पेटवली जात नाही. जसे काम तसा अग्नि. जसे काम तशी पवित्रता.
अग्नि कोणत्या कारणासाठी हवाय, त्याप्रमाणे अन्य साधने. आयुर्वेदात काही भस्म बनवताना भट्टी वापरायला लागते. ही भट्टी विशिष्ट लाकडे वापरून, विशिष्ट संख्येमध्ये रानशेणी वापरून बनवायला सांगितली आहे. रानशेणींची संख्या बदलली की पुटाचे नाव बदलले. त्या औषधावर होणारा परिणाम बदलला. हे सगळं अग्निवरच अवलंबून आहे ना !
घरात जी चुल पेटवली जाते, त्या चुलीमागे एक उपचुल असते. तिला वाईल, वैल असे म्हणतात. त्यावर मातीचे मडके ठेवून त्यात पाणी ठेवून दिले जाई. पुढे मुख्य चुलीवर काम करत असताना मागे जाणारा अग्नि फुकट दवडू न देता, त्यावर मडक्यात पाणी तापवून घेतले जाई. आमटी भाजीत जर पाणी हवे असेल तर हेच गरम पाणी वापरले जाई. हे पाणी दिवसभर त्या वैलावरच. चुल प्रत्यक्षात थंड झाली तरी देखील चुलीचे दगड गरम असत, तेवढी उष्णता हे पाणी धगधगीत ठेवायला पुरेसे असे. या पाण्याला एक मस्त वास येतो. धुराचा वास. स्मोक फ्लेवर ! जो वास तयार अन्नाला आपोआपच येत असे. (आमच्याघरी आजही चुल आहे. आम्हाला पेज अजूनही चुलीवरची मिळते.) हे वैलावरचे पाणी सतत कोमट असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचे काही कारणच नाही.
काळ बदलत गेला, तसे अग्नि निर्माण करण्याची पद्धत बदलत गेली. ओव्हन आला. विद्युत उर्जा वापरून हा अग्नि तयार केला गेला.
आतातर चुंबकीय पद्धतीने अग्नि मिळतो म्हणे. मायक्रोवेव्ह !! आणि इंडक्शन प्लेट. !!! अग्निचे तेज हे हे रूप दिसतच नाही. केवळ तापणे.
एका अग्निवर एका पद्धतीने शुद्ध करून घेतलेले पाणी परत दुसऱ्या अग्नीच्या संपर्काने शुद्ध करायचे नाही. गुण बदलतात.
वेळ नाही, या सबबीखाली अन्न शिळं करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि गरम करायला सुद्धा सवड नाही, म्हणून मायक्रोवेव्ह मधे ठेवून परत गरम करून खायचं. अशी ही पाश्चात्य पद्धत !
मायक्रोवेव्हमधे गरम केलेलं पाणी आणि चुलीच्या अग्निवर केलेलं पाणी यावर तौलनिक अभ्यास झाला. दोन वेगवेगळ्या कुंडीतील एकाच वयाच्या, एकाच प्रकारच्या रोपट्यांना विशिष्ट दिवस या दोन्ही प्रकारानी गरम करून गार झालेले पाणी घातले. काही दिवसांनी असे लक्षात आले, की मायक्रोवेव्ह मधील अग्निचे जे तरंग निर्माण होतात, ते घातक असतात, त्यांनी गरम केलेले "शुद्ध" पाणी पिऊन रोपटे मरून गेले.
आज पाश्चात्य तंत्र आमच्या स्वयंपाकघरात येऊन पोचले आहे. ज्याच्या निर्धोक उपयोगिते विषयी अजून मोठे प्रश्नचिन्हच आहे. तरी आम्हाला जाग येत नाहीये. एका बाजूने तंत्रज्ञान वाढते आहे, तर एका बाजूने रोग वाढताहेत. नवनवीन रोग अक्राळविक्राळ स्वरूपात समोर येताहेत. आणि अजून आम्हाला जाग येत नाही.
याला काय अर्थ आहे ?
आमचं वैलावरचं पाणी मात्र त्यासाठी समर्थ आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही.
जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.
जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये.
आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ?
एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने एक पाणी भरायला येणारी बाई येत होती. त्या बाईच्या मनात त्या नाण्याविषयी मोह उत्पन्न होऊ नये म्हणून साधू धावतच त्या नाण्याजवळ आला आणि त्या नाण्यावर पाय देऊन सहजपणे उभा राहिला.
ती बाई तिथून पलीकडे गेली, पुनः साधु पारावर बसला. पाणी भरून येताना ती बाई जशी जवळ आली तशी साधु पुनः उठला आणि रस्त्यावर येऊन नाण्यावर पाय ठेवून उभा राहिला. असं तीनचार झाल्यावर त्या बाईच्या मनात आलेला विचार तिने बोलून दाखवला. त्यावर प्रामाणिकपणे त्या साधूने बाईला सांगितले. तिथे एक सोन्याचे नाणे आहे, ते नाणे पाहून ते घेण्याचा मोह तुला उत्पन्न होऊ नये म्हणून, मी धावत येऊन त्या नाण्यावर उभा रहात होतो.
त्यावर ती बाई म्हणाली,
"त्यात एवढं काय आहे, ते नाणं गेले चार पाच दिवस तिथंच पडलेलं होतं. सगळ्यांना दिसतही होतं. पण पडलेलं घ्यायचं असतं हे आज प्रथमच आपण येऊन शिकवलंत महाराज. जे आपलं नाही, ते आपण घेऊ नये. हे गावातील सर्वांनाच माहिती आहे. म्हणून कुणालासुद्धा ते दिसून घेण्याचा मोह झालाच नव्हता. पण महाराज, आता मात्र आपण आलात आणि त्या नाण्यावर उभे राहिलात, तेव्हा मला शिकवलंत की, असं काहीजण घेतात ते !"
जे नाण्याचे झाले ते ग्लोबलायझेशनच्या काळात आमचे प्रत्येक वस्तू आणि अन्नप्रकाराचे होतेय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपला बिझनेस दिसतोय. चकचकीत वेष्टण आणि जाहीरातबाजीला भुलुन, सारासार विवेक बाजुला होतोय. तसं पौष्टिक भाजी भाकरी भाताऐवजी चपाती जवळची वाटू लागली आहे. कोकणातील भाकरी तांदळाची किंवा नाचण्याची आणि बाकी सर्व ठिकाणी ज्वारी बाजरी मका हे विसरू नका.
मोह निर्माण होण्याआधी वैराग्याचे धडे मिळाले तर अधिक चांगले.
निरोगी कसे रहायचे असते, ते रोगी होण्याअगोदर समजले तर सोपे होईल ना !
आपणला हे सांगत नाहीये, आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगतोय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.10.2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठ्ठावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
दिलेले दान कळू नये
दान करणे ही भारतीय संस्कृती चा पाया म्हटले तरी चालेल. पण या दानाचा सर्वात मोठा धोका म्हणजे अहंकार वृद्धी. मी दान दिले. यातील मी म्हणजे अहंकार. अहंकार हा नेहेमीच सूक्ष्म असतो. पण केव्हाही मोठे रूप घेऊ शकतो. हीच वेळ धोक्याची असते. म्हणून तर आई म्हणते, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळू नये. ते गुप्त असावे.
आणखी एक दान सत्पात्री असावे, असे बाबापण म्हणतात. ज्याला दान देणार तो त्यासाठी लायक आहे, की नाही, हे तपासून मगच दान द्यावे, नाहीतर त्याच्या पापात आपल्यालाही सहभागी व्हावे लागते. अगदी चौकातल्या देवळासमोरील भिकाऱ्यांना दान देताना, या दान मिळालेल्या पैशातून तो जर दारू पिणार असेल, आणि गुटका खाणार असेल तर असे दान पाप वाढवेल. म्हणून दान सत्पात्री असावे असे बाबा म्हणतात. एकदा दान दिले की आपला त्यावरचा हक्क संपला असे होत नाही. कर्माचा सिद्धांत इथेही काम करतो.
विशेषतः सामाजिक क्षेत्रात वावरताना एखाद्या संस्थेला जेव्हा दान द्यायची वेळ येते, तेव्हा तिचा विनियोग योग्य ठिकाणी होणार आहे का, हे आधी पहाणे जरूरीचे असते.
कोणावर कृपा, उपकार म्हणून मी दान देत नाहीये, तर "त्याने" देण्याची ऐपत दिली, म्हणून मी दान देऊ शकतोय. दान करताना हा भाव मनात असावा.
हेची दान देगा देवा, "तुझा" विसर न व्हावा, हा भाव मनात ठेवला तर अहंकाराची बाधा होण्याची भीती उरत नाही. असे तुकाराम महाराजांनी देखील मागितले आहे.
धर्मशाळेत जेवू नये
अनेक ठिकाणी ज्या अन्नछत्रातून जेवण मिळते, ते कोणासाठी असते ? तिथे आलेल्या भाविकांसाठी ज्यांची भोजनाची सोय त्यांना स्वतःला करणे शक्य नसते, अशाकरीता असते. ज्यांना शक्य असते, त्यांनी असे अन्नछत्रातील भोजन घेणे टाळल्यास, अत्यंत गरजू लोकांना तिथे जेवता येईल.
प्रसाद म्हणून अन्न स्विकारले जावे, पण पोट भरण्यासाठी म्हणून धर्मशाळेतील अन्नछत्रात जेवू नये.
समजा अशा ठिकाणी जेवल्यास, तिथे तेवढेच यथाशक्ती आर्थिक दानही द्यावे, म्हणजे दोष लागत नाही.
धर्मशाळा म्हणजे जिथे दान दिले जाते, त्यातून अन्नदान चालते. अशा ठिकाणी जेवल्याने, दान देणाऱ्याचा संकल्प जसा असेल तसे फळ मिळते. किंवा जेवण बनवणाऱ्याच्या मनातील संकल्प जसे असतात, तशी स्पंदने तयार होत असतात. आईने केले जेवण आणि बाईने केलेले जेवण यात फरक पडतोच ना !
म्हणून शक्यतो माहिती नसलेल्या ठिकाणी जेवायला जाऊ नये. आपली पत, प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता जिथे असेल, अशा ठिकाणी सुद्धा भोजन घेऊ नये.
दुसऱ्या अर्थाने पाहायचे झाल्यास, कोणाचे फुक्कटचे खाऊ नये. जे खायचं ते श्रम करून खावे. देणारा आहे, म्हणून त्याच्या जीवावर चैन किती दिवस करणार ना ! एक दिवस देणे बंद झाले की, पुढे काय, याची भ्रांत पडू नये. थोडक्यात परावलंबी राहू नये. स्वतः कष्ट करून खावे. असे आईला सांगायचं असतं.
आणि सार्वजनिक ठिकाणी जेवल्याने जंतुसंसर्गामुळे आजार वाढण्याची भीती असते ती वेगळीच.
म्हणजेच शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिणामांचा विचार केला तर, फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
थोडे तारतम्य बाळगून, विवेक वापरून, आई बाबांनी सांगितलेल्या या काही गोष्टीतून काही नवीन गोष्टी निश्चितच शिकता येतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१७.०८.२०१७
केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच !
दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत नाही. मग बंगालमधे प्रमेहाचे प्रमाण जास्ती असेल का ? शोधावे लागेल, पण बंगाल या प्रांतात परंपरेने दुधाचे रोशगुल्ले, पनीर इ.पदार्थ वंशपरंपरेने खाल्ले जात असल्यामुळे ते तिथे सात्म्य झाले असावेत.
या पदार्थांमधे वापरली जाणारी साखर ही पण प्रमेहाची सख्खी मैत्रिणच जणु ! आज आधुनिक विज्ञान पण तेच सांगते, साखर हे पांढरे विषच आहे. त्याच्या फारसे पाठी न लागलेले बरे !
अर्थात एकदा हे पदार्थ खाऊन प्रमेह होणार नाही, पण दिवसातून एकदा खाल्ले तर मात्र नक्कीच होईल. त्यातून कफाची प्रकृती आणि पाणथळ दलदलयुक्त प्रदेशी रहाणाऱ्यांना अधिकच सावध रहायला हवे. त्यात भूक कमी असली तर बघायलाच नको. त्यामुळे सावध तो सुखी हेच खरे. सावधपणा पण एवढा नको की मनातून खूप घाबरत घाबरत खाल्ले जात आहे. तरीसुद्धा साखर वाढलेलीच राहाते.
दूध हे मधुर रसाचे वर्णन केले आहे. मधुर रसाच्या गुणांचे वर्णन करताना वाग्भटजींनी सूत्रस्थान अध्याय दहामधे, मधुर रस अति सेवन करणाऱ्या मंडळींना सावधपणे प्रमेहाचा धोका असतो, असा उल्लेख पण करून ठेवलेला आहे.
सद्यो शुक्रकरःपयम् म्हणजे अंतिम धातु (जो शुक्र) उत्पत्ती करणाऱ्या पदार्थात दूध हे सर्व श्रेष्ठ सांगितलेले आहे. उत्तम तर्पक, रसधातुपोषक, वातपित्त कमी करणारे पण कफ दोष वाढवणारे, शीत गुणाचे आणि पचायला जड असते. निरसे दूध, म्हणजे तापवायच्या अगोदरचे दूध पचायला अत्यंत जड असून, अभिष्यंद म्हणजे कफाचा स्राव निर्माण करणारे असते. पण दूध काढल्या काढल्या( म्हणजे धारोष्ण ) घेतल्यास अमृताप्रमाणे असते. पण खूप तापवले असता, पचायला जड होते. (उदा. बासुंदी) हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. अग्निचा संस्कार बदलला की गुण बदलतात. इतर सर्व पदार्थ अग्निने पचायला हलके होतात तर दूध मात्र अग्निच्या संस्काराने जाड होत जाते, परिणामी पचायला जड होते. बासुंदीचे उदाहरण लक्षात ठेवावे. जसजसे दूध तापवत जावे, तसतसे, ते आटते. घट्ट होते. शेवट खवा बनतो, त्यात आणखी साखर घातली तर पेढा ! त्याच्याही पुढे संस्कार करून दुधाची पावडर बनवतात. आणि नंतर चाॅकलेट आणि मिठाया बनतात. म्हणजे हे अंतिम पदार्थ पचायला किती जड होत जातील याची कल्पना करावी. एका चाॅकलेट बारने काय होणार आहे असे म्हणून, एखादे जरी तोंडात टाकले तरी तो सारा ऐवज, लिटरभर दुधाचा असू शकतो.
पोटावर अत्याचार करणे, म्हणजे यापेक्षा वेगळे काही नाही.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.01.2017
ह्याचे ०.३३-१ मी उंचीचे तृण जातीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे काण्ड पातळ,गडद व हिरव्या रंगाचे असते हे भौमिक काण्डापासून उगवते व वरच्या भागात त्रिकोणी असते.पाने लांब व मुळा सारखी असतात.फुले ५-२० सेंमी लांब असतात.काण्डाचा भौमिकभाग सुत्रवत भौमिक काण्डात रूपांतरीत होऊन त्याला १ सेंमी व्यासाचे बाहेरून काळे व आत धुरकट किंवा पांढऱ्या रंगाचे सुगंधी कंद येतात.
ह्याचे उपयुक्तांग कंद असून मुस्ता चवीला कडू,तुरट व थंड गुणाचा असून हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्तनाशक व वातवर्धक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)मुस्ता त्वचा रोगात लेपासाठी उपयुक्त आहे.
२)मुस्ता आमपाचक असल्याने पोटाच्या विकारात उपयुक्त आहे.
३)ताप आल्यामुळे लागणाऱ्या तहाने मध्ये मुस्ता सिद्ध जल देतात.
४)मुस्ता हा स्तन्यवर्धक व स्तन्यशोधक आहे म्हणून ह्याचा लेप बाळंतीणीच्या स्तनांवर करतात.
५)मस्तिष्क दौर्बल्यामध्ये मुस्ता गोदुग्धासह देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी सांगायलाच हवे ना ! ते अतिशय कठीण काम अखेर वैद्यालाच करावे लागते.
दही दूध म्हणजे काही अगदी विष नव्हे! अगदी बंद करण्याची आवश्यकता नाही. पण प्रकृती, लक्षणे, स्थळ काळ इ. ठरवून यांचे सेवन करावं लागतं.वाताचे काही आजार सोडले तर दही अनेक रोगांचे माहेरघरच आहे. युक्ती वापरून दही खाता येते. जिथे कायदा सांगितला जातो, तिथे पळवाट असतेच. ती युक्ती शोधून काढणारा वैद्य महत्वाचा !
दही लागते म्हणजे नेमके काय होते ? काही उपकारक जंतु विरजण स्वरूपात आपण त्या दुधात सोडतो. त्या दह्याच्या पहिल्या अवस्थेला आपण अदमुरे दही म्हणतो. साधारणपणे सात ते आठ तासात ही अवस्था येते. अजून तीन चार तास गेल्यावर पक्के वडी स्वरूप दही जमते. आणखी चार पाच तास गेले म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ते चांगलेच आंबट होते. तिसऱ्या दिवशी आंबटपणाचा कहर होतो. त्यावरची साय सुद्धा आंबट दिसायला लागते. रंग बदललायला सुरवात झालेली असते. वास बदलतो. बुडबुडे यायला सुरुवात होते. हे सगळं वर्णन का करतोय ? तेच तर दही न खाण्यामागचे इंगित आहे.
ही जी प्रक्रिया दह्यामधे सुरू झालेली असते ती थांबतच नाही. अदमुऱ्या दह्याचे रूपांतर एव्हाना आंबट्टढ्ढाण्ण दह्यात झालेले असते. या प्रक्रियांचा विचार केला तर दुधापासून दह्यात रूपांतरण होणारी ही प्रक्रिया रासायनिक स्वरूपाची असते. म्हणजे एकदा दही बनवायला सुरवात झाली की, थांबायचे नाव नाही. कितीही थांबवायचं म्हटले तरी आता परत दुधात रूपांतर होणे नाही. गुण आणि कर्माने सुद्धा! चव तर होत्याची नव्हती होऊन जाते. दह्यावरची ही प्रक्रिया पोटात गेली तरी तश्शीच सुरू राहते. ते आणखीनच आंबट होते. दह्याचा हा आंबटपणा पित्ताला हमखास वाढवतो. आणि त्यातील बुळबुळीतपणा कफाला वाढवतो.
वायुचा विचार केला तर दह्यामधे बुडबुडे पण तयार झालेले दिसतात. दही घुसळल्यावर, दह्याची वडी / कवडी मोडल्यावर आतील हा वायु निघून जातो, म्हणून तयार झालेले ताक सुपाच्य असते. म्हणूनच नुसते दही घेणे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण असे न घुसळलेले दही तिन्ही दोषांचा प्रकोप करते.
नक्तं न भुञ्जात्
दही कधीच रात्रीचे घेऊ नये, कारण दह्यामधे सुरू असलेली किण्वन प्रक्रिया कारणीभूत होत असावी. वात वाढवायला ही प्रक्रिया मदत करणारी असते. आणि सर्वात महत्वाचे सूर्य असेपर्यंत, त्याच्या अग्निवर पचन पूर्ण करून घेतले गेले पाहिजे, मग जाठराग्निवर अतिरिक्त ताण निर्माण होत नाही.
असे हे स्वभावतः कफ आणि पित्त वाढवणारे,क्लेद निर्माण करणारे, दही प्रमेहामधे वर्ज्य सांगितले गेले नसते तरच नवल !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.01.2017
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
Copyright © 2025 | Marathisrushti