(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • जेवणाची बैठक कोणती ?भाग २

    पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ?
    त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे.

    आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय गुडघ्यातून दुडुन काटकोनात सरळ. आणि पुनः डाव्या हाताने डावा उभा पाय घट्ट आवळून धरायचा.

    मग ते वाती वळायला असो, किंवा दळण दळायला, तांदुळ निवडायला असो वा भाजी नीट करायला, मुलांचा अभ्यास घ्यायला असो वा नामजप करायला, धार्मिक कार्य असो वा वो चार दिन !
    आसन मांडी एकच.

    आज वागणंच एवढं सैल झालं आहे की,
    " बसणं जरा सैल केलं, तर काय एवढं बिघडलं ? " असं, फक्त मांड्या घट्ट आवळून घेणारी (काही वेळा तर पायाकडील रक्तपुरवठाच कमी करणारी ) टाईट्ट जीन्स घालून, खुर्चीवर बसून, पाय अधांतरी हलवत, शरीराला झुलवत विचारणार्‍या, काही कमी नाहीत.

    स्त्री पुरूष समानतेच्या काळात असं लिहिणं आणि विचार करणं देखील समस्त स्त्री वर्गावर अन्याय्य आहे, समस्त स्त्री वर्गाला आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे अपमानास्पद आहे. तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करतो. असं म्हणणाऱ्यांनी फक्त एक दोन गोष्टींचा जरूर विचार करावा, की,
    गेल्या तीस चाळीस वर्षांत स्त्रीयांची जाडी, पुरूषांच्या तुलनेत, वाढली की कमी झाली ? आणि,
    स्त्रीविशिष्ट आजार वाढले की कमी झाले ?

    ......नक्कीच वाढलेले आहेत.
    .....जाडी वाढलेली आहे.
    ... .वागण्यातला सैलपणा ( की सैराटपणा ? ) वाढलेला आहे.

    आसन मांडी बदलणे, हे त्यातील एक कारण असावे.

    असं घट्ट बसल्याने गर्भाशय, मूत्राशय, पक्वाशय, डावी किडनी, डिसेंडींग कोलोन, स्वादुपिंड, प्लीहा, आमाशय, ह्रदय, डावे फुफ्फुस आणि पूर्ण पाठीचा कणा हे सगळं पोट, आतून एवढं आवळून घेतलं जाई, की, पोटाची काय हिम्मत होईल, .... बाहेर यायची ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    18.09.2016

  • आहाररहस्य १२

    आहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले. देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले.

  • नमस्कार – भाग ४

    नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंचवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा - भाग तीन

    पाण्याला गती असते ती वरून खालच्या दिशेत. पाणी म्हणजे सगळे द्रव पदार्थ. पंप लावल्या शिवाय किंवा कोणते यंत्र लावल्याशिवाय जलमहाभूत उर्ध्व दिशेत काम करीत नाही.

    हीच पाण्याची गती शरीरात अन्नाला पुढे सरकवायला मदत करीत असते. जेवताना पाणी पिणे यासाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा / जलमहाभूताचा आणखी एक गुण म्हणजे सखल जागी हे पाणी खेचले जाते.

    समजा आपल्या घराच्या सभोवती पाणीच पाणी साठलेले असेल, तर त्याचा परिणाम म्हणून घरामधे ओल येते, जी आपल्याला त्रास देते. ही ओल नको असेल तर काय करावे लागेल ?

    घराबाहेर जमलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करणे. यासाठी जिथे खोलगट भाग आहे तिथून या पाण्याला मार्ग तयार करून द्यावा. पाणी शांतपणे तिथून निघून जाईल. जिथे उंचवटा येईल, तिथे पुनः ते अडकून अवरोध निर्माण करेल. तिथे पुनः मार्ग मोकळा करून द्यावा. असं करत करत रस्त्यावरील मुख्य गटारापर्यंत हे पाणी ढकलावे लागेल. एकदा का हे पाणी मुख्य गटारात गेले की आपले काम संपले.

    तस्संच शरीरात होतं. आपण हे ओळखून त्या अतिरिक्त पाण्याला मुख्य स्रोतसात आणण्यासाठी मदत करायची की झाले.

    मुख्य स्रोतस म्हणजे मुखापासून गुदापर्यंत ! ही एकच पोकळी आहे. आकाश महाभूत. यामधे नैसर्गिकरीत्या काही जलमहाभूत पाझरत असते. साहाजिकच त्याची गती अधोगती असते. वरून खाली असा हा प्रवाह असतो. या आकाश महाभूतात्मक आतड्यांमधे आपण खाल्लेल्या पृथ्वी महाभूतात्मक अन्नातील चिकटून राहीलेला काही भाग तिथे असलेल्या अतिरिक्त जलमहाभूतामुळे अवरोध निर्माण करतो. तिथेच चिकटलेल्या मळाला मागाहून येणारे चांगले अन्न पाणी चिकटत जाते.

    वायु महाभूतामुळे आतड्यांची योग्य हालचाल जर होत असेल तर यातील जल महाभूत अडचणीतून, अडथळ्यातून वाट काढत पुढे पुढे जात रहाते.

    पाण्याचा निचरा वृक्कावाटे केला जातो, तर घन भाग मलावाटे शरीराबाहेर टाकला जातो. या दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवावे. उगाचच जास्ती पाणी पिऊन ते काही मलावाटे जात नाही. ते किडनीतूनच बाहेर काढले जाईल.

    शरीराची गरज नसताना अधिक पाणी घेतले तर आतमधे नुसता चिखल होईल. आणि या रबडा झालेल्या चिखलातून पुनः पाणी वेगळे करून ते मूत्रावाटे बाहेर काढणे, हे आणखी कठीण काम होऊन बसते.

    यासाठी हेच लक्षात ठेवावे, पाण्याला शरीराबाहेर पडून जाण्यासाठी जे नैसर्गिक उतार किंवा सखल भाग हवा, तो करून द्यावा. कपालभाती, नौली, नमनमुद्रा, मंडुकासन, शशांकासन, सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, बटरफ्लाय, यासारख्या आसनांनी, यौगिक क्रियांनी आतड्यातील आमाचे अडथळे दूर होत जातात, खड्डे पडत जातात, अतिरिक्त पाण्याला पुढे जायला योग्य रस्ता करून दिला जातो.

    आमरूपी चिखलातून पाणी वेगळे करीत गेलो, की पचन सुधारतेच ! पचन म्हणजेच अग्नि.
    शुद्ध तेजमहाभूत !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.05.2017

  • आहारातील बदल-शाकाहार भाग १३

    सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी.
    काय शाकाहार, काय मांसाहार
    काय असेल ते खाऊन घ्या गपचुप.
    शेवटी पोट भरण्याशी मतलब ना !

    सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ?

    हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी सण साजरे करायचे आहेत, ते सुद्धा संस्कृतीमध्ये सांगितले आहेत तसे, बुद्धी वापरून.
    सणांची रचना ही ऋतुनुसार केली आहे. मराठी महिन्यानुसार केली आहे.

    आद्य शंकराचार्यांनी सर्वसामान्य माणसांना निरोगी जगणे सोपे व्हावे, यासाठी काही कर्मकांडे घालून दिली. या प्रत्येक कर्मकांडाचा थेट संबंध आरोग्याशी आहे. प्रत्येक हिंदु सणामधे काहीनाकाही गोडधोड केले जाते. सर्व पदार्थ शाकाहारीच असतात. अगदी क्वचित ते सुद्धा कुळानुसार, प्रदेशानुसार देवतेनुसार मांसाहाराचा नेवैद्य असेल,

    प्रत्येक सण साजरे करण्यामध्ये जे आरोग्य दडलेले आहे, ते बुद्धीने शोधले को सापडते.

    आता हेच पहा ना, आजच्या नरकचतुर्दशीला दिवसाची सुरवात करायची तीच सातीवण नावाच्या औषधी झाडाच्या सालीचा रस पिऊन.
    चुकलं.
    प्रत्येक झाड हे औषधीच असते. झाडाच्या मागे औषधी असे विशेषण लावण्याची पण आवश्यकता नाही. किंबहुना जगात जे म्हणून द्रव्य स्वरूपात आहे, ते सर्व माणसासाठी, शतायुषी होण्यासाठी, औषधीसाठी वापरता येऊ शकते.

    तर आजच्या दिवशी या सातवीण वृक्षाच्या सालीला फार महत्व आहे. या वृक्षाला नमस्कार करून, दिवा लावून, प्रदक्षिणा घालून, प्रार्थना करून काही साल काढून, वाटून रस काढताना त्यामधे, सैंधव, जिरे, ओवा, मिरी, लिंबाचा रस घालून घ्यायचा प्रघात आहे. यामुळे दिवाळीचा फराळ अघळपघळ झाला तरी फार काळजी नसते. हा फराळ सहज पचून जातो. आज हा रस घ्यावाच !

    "हे, ईश्वरी अंशाने आणि औषधी गुणाने युक्त असलेल्या वृक्षदेवते, आज तुझ्या औषधी गुणाचा आम्हा मनुष्याला फायदा व्हावा, यासाठी तुझ्या सालीचा काही भाग आम्ही निःस्वार्थ भावनेने, औषधी रूपात करणार आहोत, त्यासाठी तू तुझ्या सर्व औषधी गुणांनी युक्त होऊन आमच्यावर कृपा कर. औषधासाठी का होईना, तुझ्या अंगावर आम्हा वैद्यांना शस्त्र वापरावे लागत आहे, यासाठी तू आम्हाला क्षमा कर."

    केवढा अर्थ भरला आहे या प्रार्थनेत !
    प्रार्थनेत शक्ती असते.
    जशी प्रार्थना असते, तसे फळ मिळते.
    प्रार्थना जेवढी भावपूर्ण होते, तेवढा गुण जास्त येतो.

    अखिल मानवाच्या कल्याणासाठी, कोणत्याही अपेक्षांशिवाय, आपल्या औषधी अंगाचा वापर मुक्तपणे करू देणाऱ्या या वृक्षदेवतांप्रती, या निमित्ताने शतशः नमन !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    29.10.2016

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग एक

    आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन !

  • आहारसार भाग ३

    भरपूर जेवल्याने भरपूर ताकद येते हा जसा गैरसमज आहे, तसा कमी जेवल्याने ताकद कमी होते, हा पण गैरसमजच आहे. विशिष्ट वयात विशिष्ट आजार होणं, हे सर्वसामान्य आहे पण, तरूणांचे अकाली आजार आणि अकाली मृत्यु चटका लावून जातात. वृद्धत्व आणि मृत्यु लवकर येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. हे चुक नाहीच. वृद्धत्व सुद्धा अनुभवले पाहीजे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग १३

    न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
    सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
    फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
    वाग्भट सूत्रस्थान 5-5/6

    "चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार अशा प्रकारचे पाणी कधीही पिऊ नये."

    हा झाला ग्रंथातील एक श्लोक आणि त्याचा शब्दशः अर्थ. छापील उत्तरासारखं. आता ग्रंथकारांना नेमकं काय म्हणायचंय ते पाहू.

    अशा ठिकाणचे पाणी पिऊ नका, ज्या जलाशयामधे तळात खूप चिखल, गाळ साठलेला आहे. अशा जलाशयातील झरे या चिखलामुळे बंद झालेले असतात. झरे बंद झाल्यामुळे पाण्याचा पाझर आणि पुनर्रभरण नीट होत नाही, पाण्याचा उसपा आणि साठा याचे संतुलन बिघडते. आणि पाणी पचायला जड होते. हा चिखल किंवा गाळ जलाशयाच्या तळामध्ये असतो आणि शेवाळ, पाने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असतात. पाण्याचा पृष्ठभाग जर पूर्णपणे झाकला गेला असेल तर सूर्याचे प्रकाशकिरण तळागाळापर्यंत पोचू शकत नाहीत. सूर्याचे औषधी किरण जर पाण्यात पडले नाहीत तर पाण्यातील अशुद्धी दूर होत नाही, म्हणून असे आच्छादन असलेले पाणी देखील पचायला जड होते.

    खालून चिखल वरून शेवाळ, पाण्यात पडलेल्या पानासारख्या कचऱ्याचे आच्छादन आणि मधे वाढणाऱ्या काही तृण वनस्पती यामुळे पाणी साठून रहाते. पाण्याचा नैसर्गिक वाहाणे हा गुण कमी होतो. पाणी गरजेपेक्षा जास्ती स्थिर होते. जिथे स्थिरपणा ( स्टॅग्नेशन)येते, जिथे गती कमी होते, तिथे पाण्यातील बुळबुळीतपणा वाढतो. शेवाळ जास्ती वाढते. पाण्यातील हालचाली मंद होतात. पाण्याची गुरूता, घनता हे गुण आणखीनच वाढतात.

    गाळातील चिखल आणि वरील आच्छादन यामुळे पाण्याची घनता बदलते. आजच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास पाण्याची पीएच बदलते. त्याची अम्लता किंवा क्षारीयता बदलते. असे पाणी पचायला घन आणि गुरू होते. श्लोकातील दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दांकडे विशेष लक्ष दिले की शास्त्रकारांची सूक्ष्म दृष्टी लक्षात येते.

    पाण्यात हा बदल नैसर्गिक स्थितीमुळे झालेला असतो. त्याच्या इच्छेनुसार झालेला असतो.

    जरूरी नाही, कि प्रत्येक वेळी मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्रदूषण होते. आणि जे जे सर्व नैसर्गिक म्हणजे निसर्गदत्त, निसर्गाने दिलेले आहे, ते सर्व उत्तम गुणाचे आणि मानवाच्या आरोग्याला हितकरच असेल !!??
    यासाठी त्याने मानवाला बुद्धी दिली आहे. ही बुद्धी, योग्य ठिकाणी वापरून आपले कल्याण कशामधे आहे, याचा विवेक मानवाने करावा अशी त्याची इच्छा असते. त्याच्या इच्छेनुसार, आपली बुद्धी हवी तिथे वापरता येणे, याला विवेक म्हणतात, सारासार विचार करणे !!!

    हे योग्य हे अयोग्य असा विचार करणे ज्याला जमले तो निरोगी राहिलाच म्हणून समजा !

    सूत्रस्थान 5-5/6 भाग एक. ( क्रमशः )

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    20.12.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग चार

    काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे... चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?

    बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.

    भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?

    औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !

    येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

    असो.

    एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.
    आणि...
    ....... आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण........
    .....
    ....
    ...
    ..
    .
    आपण जगलो पाहिजे.

    विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी "हॅवाॅक" निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !

    हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना "अति" कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !
    इलाज नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.04.2017

  • वरूण – वायवर्ण

    वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे.