आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला.
शेंगभाज्या
आता पर्यंत आपण पुष्कळ फळ भाज्या पाहिल्यात आता आपण एक वेगळा भाज्यांचा गट पाहूयात ज्यांना आपण शेंगभाज्या म्हणतो.
शेवग्याची शेंग
तर प्रथम पाहूयात आपण सर्वांच्याच आवडीची शेंग भाजी ती म्हणजे शेवगा.ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी,आमटी,लोणचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात.कधीकधी ह्या कोवळ्या शेंगा तळून खायला देखील रूचकर लागतात.
ह्या शेंगा शेवग्याच्या भल्या मोठ्या उंच वृक्षावर लागतात.ह्या शेंगा चवीला तिखट,कडू व उष्ण असतात आणी त्या शरीरातील कफ व वात दोष कमी करतात व पित्त दोष वाढवितात.
जसा ह्यांचा उपयोग रुचकर स्वयंपाक करायला होतो त्यांच प्रमाणे ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.कसा ते पहायचे ना:
१)२ कोवळ्या शेंगा तुकडे करून १/२ लिटर पाण्यात उकळून आटवून १/२ ग्लास शिल्लक ठेवावे त्यात १ चमचा मध व १/४ चमचा सुंठपूड घालावी व हे पाणी सकाळी व संध्याकाळी ४ वाजता प्यावे असे केल्याने सांधेदुखी,ठेच लागून झालेली दुखापत,कंबरदुखी ह्यात आराम मिळतो.
२)अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तींच्या जेवणात शेवग्याच्या शेंगांची आमटी अथवा भाजी ठेवावी.
३)मासिक पाळी उशीरा येणे,ओटीपोटात दुखणे,स्त्राव कमी होणे अशा तक्रारी असणा-या स्त्रीयांना शेवग्याच्या शेंगांचा सूप त्यात जिरे घालून द्यावा.
४)कृमिंचा त्रास असणा-या व्यक्तिंना शेवग्याच्या जून शेंगा वाफवून रोज सकाळी ती खायला द्यावी व नंतर त्यावर तासाभराने २५मिली एरंडेल तेल प्यायला द्यावे.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शेवग्याच्या पाल्याची एक मजेशीर दंत कथा मला माझ्या सासुबाईंनी सांगितली आहे ती तुम्हाला आधी सांगते.एकदा शेवग्याची भाजी लग्न होऊन काही दिवस झाल्यावर माहेरी जायला निघाली,तिला तिच्या नव-साने त्याचदिवशी घरी परतयायला सांगितले होतेनाहीतर माहेरी येऊन तुझी हाडे मोडीन असे तो म्हणाला पण हि बिच्चारी त्या दिवशी माहेरी राहिली, रागाने तिचे यजमान तिच्या माहेरी गेले आणि बदडून बदडून तिची हाडे खिळखिळी केली.म्हणूनच शेवग्याच्या पाल्याची भाजी ज्या दिवशी काढतो त्याच दिवशी चिरून ठेवावी लागते जर तुम्ही दुस-या दिवशी चिरायला गेलात तर तिचे पान अन् पान मोकळे झालेले असते(फ्रिज देखील कामी येत नाही बरं का)
तर अशी हि शेवग्याची भाजी पुष्कळ जणांची आवडीची पण हि चांगली भाजी आषाढ व श्रावंण महिन्यात चांगली मिळते.हिचे मोठे २०-२५ फूट उंच झाड असते.व हिची पाने बारीक असतात.
हि चवीला तिखट,कडू असते व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ दोष कमी करते.
हि भाजी चांगली पथ्यकर व औषधी गुण युक्त आहे बरं का! त्यामुळे घरगुती उपचारात वापरतात.
चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना आपण:
१)सुजेवर शेवग्याच्या पानांचा लेप लावावा.
२)डोके दुखीमध्ये शेवग्याच्या पाल्याचा रस त्यात मिरे खलून डोक्यावर लेप करावा.
३)जखम होऊन चिघळली असेल व त्यात पू झाला असेल तर शेवग्याच्या पाल्याची चटणी त्या जखमेवर लावावी(क्रुपया हा उपाय मधुमेहामुळे चिघळलेल्या जखमेवर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये हि विनंती).
४)गळवांवर शेवग्याच्या पाल्याच्या रसात शेवग्याचे बी उगाळून लावावे.
५)काही व्यक्तींना ऋतू बदलला कि सर्दी,खोकला,होतो त्यांनी सकाळी उपाशी पोटी शेवग्याचा रस ४ चमचे +मध १ चमचा+१ काळी मिरी हे मिश्रण ४२ दिवस द्यावे.
अतिप्रमाणात शेवग्याची भाजी खाल्ल्यास घाम येतो,पोटात आग होते,चक्कर येते व घशाला कोरड पडते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शाकाहारी प्राण्यांचा जबडा आगदी आ वासून उघडत नाही. (अपवाद पाणघोडा ) थोडासाच उघडतो, पण यांचा खालील जबडा वर खाली तर होतोच, पण आजुबाजुला पण हलतो. रवंथ करायचे असते ना. तुकडे करून गिळायचे असतील तर जबडा मोठ्ठा उघडावा लागतो, पण छोटे छोटे घास करीत चावून बारीक करायचे असल्याने खालचा जबडा आणि वरचा जबडा विशिष्ट पद्धतीने एकमेकांवर घासावा लागतो, तेव्हाच अन्न भरडले जाते, बारीक होते. पण मांसाहारी प्राण्यांचा खालचा जबडा फक्त वर आणि खालीच हलतो.
त्यामुळे मांसाहारीना भक्ष्य परत आत ढकलण्यासाठी मानेची हालचाल करावी लागते. मानेला हिसका देऊन, मान थोडीशी मागे नेऊन, तोंड पुढे आणावे लागते, तेव्हाच ते भक्ष्य आत ढकलले जाते. मगर कशी खाते आठवून पहा. पकडलेल्या हरणाला, दातांनी आवळून मारल्यावर, त्याला पुनः वर उडवून खायची सवय असते. जबडा मोठा असला तरी भक्ष्याला गिळताना, त्यांच्यावरील दातांची पकड थोडी सैल करून, काही क्षणांसाठी त्याला सोडावे लागते, म्हणून एकदा भक्ष्याला धरल्यावर मरेपर्यंत काही काळ भक्ष्यावरील आपली दातांची पकड सैल होऊ देत नाही.
पण घोडा गाढवाला चारा खाताना मान हलवावी लागत नाही, की चारा उडवून खावा लागत नाही.
शाकाहारी प्राण्यांच्या दाढा खूप मजबूत असतात. पसरट असतात. हत्तीसारख्या प्राण्यांच्या दाढा, एका मोठ्या वीटेएवढ्या आकारात असतात. दोन्ही जबड्यात वर खाली समान संख्येत असतात.
शाकाहारी प्राणी जेवताना समुहाने आणि शांतपणे जेवतात. त्यांची वृत्ती स्थिर असते. गाय बैल म्हैशी चरताना एकत्रच चरत असतात. आपले अन्न फक्त आपल्यालाच मिळावे, असे यांना वाटत नाही. दुसऱ्यांना मिळू नये, अशी भावना अजिबात नसते. शांतपणे एकमेकांवर डूक न धरता खातात.
नजर शांत असते. खुनशी नसते. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण बघू शकतो. निरागस दिसतात. जेवत असताना सुद्धा नजर बदलत नाहीत. चोरून, घाबरून खाल्ल्यासारखे करत नाहीत. भरभर खातील पण वचावचा खाणार नाहीत.
सर्व शाकाहारी प्राणी मस्त आंघोळ करतात. पाण्याचा द्वेष, तिटकारा करीत नाहीत. अंगावर पाणी घातले तरी पळून जात नाहीत. कुत्र्यांना आंघोळ घालताना काय नाकीनऊ येतात, ते ज्यांचे त्यांनाच ठावूक.
हत्तींचे स्नान आठवून पहा. कसे पाण्यात मस्त डुंबतात आणि म्हैशी, पाणघोडे चिखलात कसे लोळतात. मुळात पाण्याची, आंघोळीची आवड असणे महत्वाचे, जी शाकाहारी प्राण्यांच्या रक्तात जन्मापूर्वी पासूनच असते.
यांच्या अंगाला घाण वास येत नाही. थोड्या कमी जास्त प्रमाणात घाम येतो, सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन पण होते.
शाकाहारी प्राणी अंग स्वच्छ करायला सारखे चाटत बसत नाहीत. की यांना अंगाचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी जीभ बाहेर काढून, सारखी सारखी शीतकारी, शीतली करावी लागत नाही. बघीतलंय कधी बैलाला, कुत्र्यांसारखं फासण्या मारताना. ( फासण्या मारणे म्हणजे तोंड उघडे ठेवून जोरजोरात श्वासोच्छ्वास करणे )
आवाजामधे पण किती सौम्यता असते ना, भसाडा आवाज मुळीच नसतो. गाईच्या हंबरण्यात देखील हम्माऽऽऽ, मां असते. माया असते, वात्सल्य ऐकू येते. एक प्रकारचा गोडवा असतो. आवाज ऐकून भीती तर नक्कीच वाटत नाही.
एकदा खाल्लेतरी पचन पूर्ण झाल्यावर साधारणपणे आठ ते सोळा तासात परत भूक लागते. पुनः खावे लागते. भूक लवकर लागली तरी, अन्न पचायला मात्र वेळ जास्ती लागतो. खाल्लेल्या अन्नामधे विशेष अहितकर काहीच नसल्याने अन्न पोटात पुढे पुढे ढकलून त्याज्य भाग बाहेर काढायला बारा सोळा तास लागले तरी विशेष नुकसान होत नाही. यांची आतडी लांबीला जास्ती असतात. पाचक स्राव कमी अधिक प्रमाणात टप्प्यानुसार पाझरत जातात.
ईश्वराने यांना खायला भरभर शिकवले, पण पचवायला मात्र पुरेपुर वेळ दिला.
भगवान के घर देर है पर अंधेर नही !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
28.09.2016
आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे पहाणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे बावन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग दहा
आपण पूर्वाभिभाषी असावे, असे वाग्भटजी म्हणतात. म्हणजे स्वतःहून इतरांशी बोलायला जाणे. समोरून ओळखीचा कोणी येताना दिसला की, आपणच त्याला हाय, हॅलो, राम राम नमस्कार, नमस्ते, कसं काय, अशा शब्दांनी बोलायला सुरवात करावी. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण त्याचे वाटू लागतो.
आपल्याला यापूर्वी मदत केलेली व्यक्ती, ओळख झालेली व्यक्ती, उपयोगी ठरणारी व्यक्ती, डोक्यावरून पाणी नेणारी स्त्री, ज्येष्ठ नागरीक, ओझे घेऊन जाणारा, खूप जोरजोरात चालणारा, किंवा विद्वान व्यक्ती समोर आल्यास त्यांना स्वतः बाजूला होऊन रस्ता मोकळा करून द्यावा.
आज अॅम्ब्युलन्स, शालेय वाहाने, शववाहिका, पोलिसांच्या गाड्या, यांना रस्ता मोकळा करून द्यावा. त्यांना कोणतीही असुविधा आपल्यामुळे होऊ नये असे पाहावे.
आपली गाडी एखाद्या ठिकाणी पार्क करत असताना, दुसऱ्याला त्याची गाडी आत बाहेर करायला त्रास होऊ नये, याचा विचार करून आपले वाहन कुलुपबंद करावे, अन्यथा आपल्यामुळे इतरांचा खोळंबा होऊ शकतो, याची जाण ठेवावी. याने वाद वाढून आपल्या सोसायटीमधील माणसे देखील दुरावतात. हे लक्षात घ्यावे.
माणसं जोडण्याची ही कला आहे. ती जोपासली पाहिजे. कारण ऐनवेळी मोबाईल पेक्षा माणसेच उपयोगी होतात. ती आधी पासूनच जोडून ठेवावीत.
मी बरा माझे काम बरे, ही वृत्ती आता सोडून दिली पाहिजे. मला काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशतात, असे म्हणून चालणार नाही. सतर्कता हवीच. आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेतलं नाही तर बाजूच्या घराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.
मान दिला की मान मिळतो, मान मिळवण्यासाठी मान थोडी खाली झुकवावी लागली तरी चालते. लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे, ही अपेक्षा सोडून दिली की लोकमान्य होता येते, असे लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०९.२०१७
जगण्याची साधी सोप्पी तत्वे - भाग ९६
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग ५२
बायकांनी नमस्कार करायची पद्धत वेगळी. पुरूषांची वेगळी. पुरूषांचा नमस्कार साष्टांग. जमिनीवर पडून आठ अंगांचा स्पर्श जमिनीला करून पुनः उठायचे. नमस्कार जरी देवाला घालत असलो तरी फायदा आपल्यालाच होतो ना ! शरीराला आणि मनाला देखील.
नमस्कार म्हणजे लीनता. शरणागत भाव. माझ्यापेक्षा ज्ञानाने, तपाने, बुद्धीने, वयाने, सामर्थ्याने, अभ्यासाने, जे अधिक आहेत, त्यांच्या समोर नतमस्तक होताना मनातील दोष निघून जातात.
ज्याच्याकडे चाकरी करतोय, त्यांना मालक म्हणून केलेला नमस्कार वेगळा. त्यातील भाव वेगळा. मालकाने दिलेल्या पैशामुळे माझा चरितार्थ चालणार आहे, म्हणून याला नमस्कार करायला हवा. मालकाला खुश ठेवण्यासाठी, मालकाचा अहं सुखावण्यासाठी केलेला हा नमस्कार मनापासून केलेला नसतो.
राजकारणातल्या नमस्काराची रीतच वेगळी. न बोललेलंच बरं. हे नमस्कार म्हणजे नुसती चमचेगिरी ! पक्ष बदलला की व्यक्तीनिष्ठा बदलली. की नमस्कार बदलला.
नमस्कार करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे सॅल्युट. एनएसएसेस चे कॅडेटस, एनसीसी छात्र, स्काऊट गाईडचे कब, बुलबुल्स, मिलीट्रीमधले सैनिक, पोलीस जो नमस्कार करतात, ते सॅल्युट प्रकारामधे येतात. पण नेपाळी गुरखा जो नमस्कार करतो, त्यातला सॅल्युट भाव वेगळा आणि तिरंग्याला जेव्हा कडक सॅल्युट ठोकतो, तो भाव वेगळा. माझा नमस्कार कोणासाठी आहे तेवढा त्यातील भाव वेगळा. काहीवेळा तोंडदेखलेपणा किंवा ड्यूटी म्हणून तर काही वेळा मजबूरी म्हणून ! साहेबाची गाडी येत असते, तेव्हा त्या गाडीला देखील सॅल्युट ठोकावा लागतो.
राजाला करत असलेला मुजरा हा देखील नमस्काराचाच एक प्रकार. कमरेत नव्वद अंशात वाकत, हात जमिनीपासून आपल्या कपाळापर्यतदोन तीन वेळा वरखाली करणे हा राजाला दिलेला सन्मानाचा नमस्कार आहे.
गुरूला करत असलेला नमस्कार फारच वेगळा. गुरूच्या उजव्या पायाला आपल्या उजव्या हाताने आणि डाव्या पायाला आपल्या डाव्या हाताने, आपले हात एकमेकांवर स्वस्तिकासारखे करून केलेला नमस्कार जगात दुसरीकडे कुठेच आढळणार नाही. या नमस्कारातील भाव वेगळा.
एका हाताने कधीही नमस्कार करू नये, असे हिंदु धर्म सांगत असूनही कपाळाला, छातीला आणि दोन्ही खांद्यांना स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत हिंदुमधे आली. हे केवळ हिंदु धर्माचा अभ्यास नसल्यामुळेच. हिंदु पद्धतीने नमस्कार करण्यामधे देखील शास्त्र आहे. पण आमच्या शालेय अभ्यासक्रमातूनच हे डिलीट केल्यामुळे केवळ हिंदु घरात जन्माला आलोय म्हणून हिंदु. पण इतर धर्मातील लहान लहान मुलांना त्यांनी नमस्कार कसा करावा, का करावा, हे त्या त्या धर्मानुसार, प्रत्येक घरात शिकवले जाते.
आणि बायकांचा नमस्कार कमरेमध्ये वाकून ! नुसतं वाकायचं नाही तर वाकून डाव्या पायाच्या करंगळीपासून उजव्या पायाच्या करंगळीपर्यंत नमस्कार अवस्थेमधे हात वर खाली हलवत अर्धगोलाकार वळायचे ! पोट दाबले जाते, गर्भाशयातील दोष पिळले जातात, कंबर हलवली जाते, खांदे हलवले जातात, पाठीचा कणा, वाकवला जातो, मनगटे सैल करून घेतली जातात, असा नमस्कार केला तर, किती उत्तम व्यायाम आहे हा !
"एक काम धड नीटपणे करता येत नाही" असं म्हणत दोन्ही हातानी टाळी वाजवत बायकोनं कोपरापासून केलेल्या नमस्काराला काय नाव द्यावं हो ? ही कदाचित जागतिक लेव्हलची शंका असेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
16.07.2017
आजची आरोग्यटीप
प्रशंसनीय पाणी भाग चार
आपण म्हणता, पाणी कमी प्यायचे, पण.....
काही जणांना शंका येतेय, आम्हाला मुतखड्याचा त्रास आहे, मग काय करायचे ?
आम्हाला उष्णतेचा त्रास आहे मग आम्ही काय करायचे ?
हो. नक्कीच पाणी गरजेप्रमाणे प्यायचे. धने जिरे घातलेले पाणी, गोड ताजे ताक, पिकलेल्या नारळाचे पाणी, बारली धान्याचे पाणी, लाह्या शिजवलेली खीर, वेगवेगळी सरबते, रसदार फळे, इ. अनेक उत्तम पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत.
आणि हे पर्याय सुद्धा लिमिटेडच प्यायचे हा. नाहीतर याचेच अजीर्ण व्हायचे. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच हे वापरले तर अधिक चांगले !
उष्णता किंवा मुतखड्यासाठी कोल्ड्रींक्स पिणे किंवा बियर मारणे(?) ही कल्पना अभारतीय आहे. जिथे ऋतुनुसार बाराही महिने फळे मिळतील, अशा भारतात विषारी कार्बन डाय ऑक्साईड घातलेली पेय किंवा मद्यार्क अक्षरशः ढोसली जाताहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्यायचंय ते पाणी. कोल्ड्रींक्सही नको, किंवा हाॅटड्रिंक्स !
गरजेएवढे पाणी घेतले तर किडनींना सुद्धा तेवढीच विश्रांती! नाहीतर जास्त ढोसलेल्या पाण्याचा निचरा करता करता, तिचा बिचारीचा जीव अगदी मेटाकुटीला येत असेल.
पाणी कमी प्यायला हवं असं नाही. पण जास्ती नको. एवढंच सांगायच आहे. पाण्याविषयी इतके गैरसमज, एवढ्या कमी काळात वाढतील असं वाटलं नव्हतं.
सावकाश जेवावे, असे आपण म्हणतो, ते कृतीने अपेक्षित नाही तर अवकाशाने अपेक्षित आहे. पोटाचे चार भाग कल्पिले तर त्यातील दोन भाग घन अन्नाने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग अवकाश म्हणजे मोकळा ठेवावा. तरच पुढे अन्न छान घुसळले जाते. घुसळण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि आकाश महत्वाचे आहे.
मधे मधे पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घासाला पाणी प्यायलेच पाहिजे असेही नाही हं. इतके पाणी प्यावे की पोटाला अन्न चिकटूनही राहाणार नाही किंवा एकदम पुढे वाहूनही जाणार नाही. दोन भाग घन आहारात एक भाग पाणी हे प्रमाण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवले की झाले.
हे पाणी सुद्धा मधेमधे घातले तर अन्नरस नीट तयार होतो.
पारंपारिक देवपूजेमध्ये नैवेद्य दाखवताना पाणी ताटाभोवती फिरवायला सांगतात. कृती नीट आठवून पहा. मधेच पाणी खाली सोडायला सांगतात.
मधे पाणी कशासाठी ?
मध्ये पानीयं समर्पयामी. याचा भाव असा आहे की नैवेद्य दाखवताना देवासाठी मधेमधे पाणी प्यायला द्यावे. जे देवासाठी करतो ते उत्तमात उत्तम असते.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा नियम मान्य केला तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.01.2017
आपण सेवन करत असलेल्या त्रिफळा चुर्णामध्ये देखील हरडा व बेहड्या सोबत आवळा असतो.
आवळ्याचे २०-२५ फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने चिंचेच्या पानांप्रमाणे असतात व ह्याला पिवळी फुले गुच्छ स्वरूपात येतात.फळे गोलाकार,मांसल पिवळसर हिरवी व आत टणक बी असणारी असतात.
ह्याच्यात खारट सोडुन बाकी पाच ही चवी असतात व त्यात आंबट चव प्रमुख असते.हा थंड गुणाचा असून तो तिन्ही दोषांचे शमन करतो.
आता आवळ्याचे घरगुती उपयोग पाहूया:
१)ज्या बायकांना अंगावर पांढरे जाते त्यांनी आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून सलग तीन दिवस घ्याव्या.
२)खरूज झाल्यास आवळ्याचे चुर्ण जाळून त्याची राख करावी व ती तीळ अथवा निंब तेलामध्ये कालवून लावावी.
३)घसा बसला असल्यास गाईच्या दुंधात आवळ्याचे चुर्ण मिसळून द्यावे.
४)अम्लपित्तामध्ये आवळ्याचे चुर्ण केळीच्या कांद्याच्या रसामध्ये मिसळून द्यावे.
५)नाकाचा घोळणा फुटून रक्तस्राव होत असल्यास व डोके वारंवार दुखत असल्यास आवळ्याचे चुर्ण तुप व साखर घालून खावे.
६)पित्याच्या विकारामध्ये आवळ्याचे ५ ग्राम चुर्ण कल्हई केलेल्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवावे व सकाळी हे त्यात ५० मिली गाईचे दुध मिसळून ते प्यावे.
७)१ चमचा आवळा रस+ २ चमचे ओल्या हळदीचा रस सकाळी उपाशी पोटी घेतल्यास मधुमेहामध्ये फायदा होतो.
८)१ चमचा आवळा रस+ ४मोठे चमचे नारळाचे दुध रोज दुपारी जेवणापुर्वी घेतल्यास कृमिंचा त्रास कमी होतो.
९)१ चमचा आवळा रस+२ चमचे केळफूलाचा रस रोज २ महीने घेतल्यास बायकांचे अंगावर पांढरे जाणे,मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
१०)१ चमचा आवळा चुर्ण १ कप ताज्या ताकामध्ये मिसळून रोज जेवणानंतर घेतल्यास हाता पायाची आग होणे,संडासच्या जागी होणारी आग ह्या तक्रारी कमी होतात.
आवळा किती ही चांगला असला तरी तो अति खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
कपाळावर मिरी वाटणे हा वाक्प्रचार तर सगळयांनाच माहीत असणार त्यात काही नवल नाही.मसाल्या मधला अजून एक पदार्थ ज्याला मसाल्या मध्ये मानाचे स्थान आहे ती म्हणजे मिरी.
आपल्या रोजच्या जेवणात आमटी मध्ये,गरम मसाला बनवताना मिरीचा सर्रास वापर केला जातो.असा हा तिखट झणझणीत पदार्थ जेवणाला एक वेगळीच लज्जत आणतो.
मिरीचा वेल असतो आणी त्या वेलीला उगवणारी ही फळे चांगली तयार झाल्यावर उन्हात वाळवून ठेवली जातात.ही चवीला तिखट असतात आणी ब-या पैकी उष्ण असतात.हि शरीरातील कफ आणी वात दोष कमी करते पण पित्त मात्र वाढवते.
चला आता मिरीचे काही घरगुती औषधी उपयोग पाहूयात.
१)घसा बसला असल्यास जेवणानंतर १/४टिस्पून मिरपुड तूपात मिसळून खावी चांगला फायदा होतो.
२)सर्दी होऊन डोके देखील जड झाले असल्यास १/४ चमचा मिरपुड मधासोबत मिसळून घेणे आराम मिळतो.
३)पोटात दुखत असल्यास १/४ चमचा मिरपुड आणी २ चिमूट भाजलेला हिंग हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
४)मार लागून रक्त साखळले असल्यास मिरी पाण्यात वाटून त्याचा लेप त्या जागी लावला असता तिथली सूज आणी वेदना देखील कमी होते.
५)मिरीचे चूर्ण किडलेल्या दाढेत ठेवले असता तिथला ठणका कमी व्हायला मदत होते.
अतिवापराने छातीत जळजळ,पोटात आग होणे तसेच संडास,लघवी ,व नाकातून रक्त स्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti