शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.
शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.
शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.
२)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.
३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.
४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.
५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अन्नाला ओलेपणा क्लिन्नपणा येण्यासाठी महत्त्वाचे काम करते ती लाळ. डोळ्यात ज्याप्रमाणे पाणी स्रवत असते, तशी लाळ तोंडात स्रवत असते. लाळेच्या बुळबुळीतपणामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते, आतड्यांना अन्न घासले जात नाही.म्हणून हा ओलेपणा एक प्रकारे वंगणाचे काम करत असतो.
लाळेमधे टायलीन नावाचे हे एक प्रकारचे विकर म्हणजे एन्झाइम आहे. पचनाला मदत करणारी अन्य घटकद्रव्ये यात सामावलेली असतात. जेवढी लाळ जास्ती तेवढे पचन सुलभ. त्यामुळे प्रत्येक घास जेवढा अधिक वेळ चावला जाईल, तेवढीच जास्त लाळ तयार होते.
शाळेत चौथीमधे असताना एक प्रयोग केलेला आठवतोय, भाकरीचा तुकडा जेवढा चघळला जाईल, जेवढी लाळ मिसळली जाईल, तेवढी भाकरी गोड होत जाते. पिष्टमय पदार्थांचे पचन करण्यासाठी लाळ मदत करते, असे अनुमान प्रयोगवहीत लिहिलेले होते.
आज व्यवहारात मधुमेहाच्या अपथ्यामधे पिष्टमय पदार्थ सांगितले जातात. पिष्टमय पदार्थ पचले नाहीत तर मधुमेहासारखे आजार बळावतात, म्हणून मधुमेहामधे आपली लाळ हे आपले औषध ठरू शकते. घाईघाईने खाल्ल्यामुळे लाळ अन्नामधे चांगली मिसळली जात नाही. आणि पचन बिघडते.
लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींची तोंडे नीट उघडी असतील तर लाळेचे स्रवण चांगले होते. गव्हापासून बनलेल्या मैद्याच्या लगद्याने लाळेची काही छिद्रे बंद होतात. याकरीता मैद्यापासून बनलेले पदार्थ रोज रोज खाणे बंद करायला हवेत.
लाळ सुटण्यासाठी आंबट तिखट हे पदार्थ मदत करतात. चिंच म्हटली तरी तोंडात चिंच झरकन पाझरते. आवडीचे पदार्थ असतील तर तोंडाला पाणी सुटते. नारळाचा तुकडा, चार शेंगदाणे, दोन चिमूट बडिशेप, लवंग, वेलची, मसालापान यापैकी काहीही जेवणानंतर चघळल्यामुळे लाळ तयार होते आणि पचन सुधारते.
तंबाखू, गुटका, मावा सारखे सतत काहीतरी चघळत राहाणे चुकीचे. हे लक्षात ठेवावे.
नाहीतर आपण सोयीस्कर अर्थ काढण्यात पटाईत !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.03.2017
गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू.
कशासाठी ?
जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते.
कमळ कधी उमलते ?
कमळ कधी मावळते ?
सूर्योदय झाला की उमलते, आणि सूर्यास्त झाला की मावळते. सूर्यफुलाचे नावच मुळी सूर्यावरून ठेवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही घड्याळ नाही, तरीदेखील त्याला बरोबर कळते, दिवस आणि रात्र. कधी कसे वागायचे, कधी कसे फुलायचे, कधी कसे वळायचे ते !
सूर्योदयाला सुरू झालेला आपला दिवस सूर्यास्ताला संपतो. (निशाचर प्राणी अपवाद आहेत.)
मनुस्मृतिमधील निद्रा प्रकरणामधे देखील "सूर्यामुळे दिवस होतो आणि सूर्यामुळे रात्रही होते, असे सांगितलेले आहे. रात्र ही झोपण्यासाठी, विश्रांतिसाठी. तर दिवस हा दैनंदिन कामे करण्यासाठी आहे.
केवळ आपली पृथ्वीच नव्हे तर सर्व ग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यापासूनच शक्ती, उर्जा मिळवित असतात. सूर्याच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे ज्ञान आमच्या ऋषीमुनीना होते. आणि ते त्यांनी लिहूनदेखील ठेवले आहे.
सगुणरूपातील एकमेव देवता म्हणजे सूर्य. रामदास स्वामीनी सर्व तरूणांना सूर्यनमस्काराचे, व्यायामाचे महत्व पटवून दिलेलेच होते.ते स्वतः दररोज शेकडो समंत्र सूर्यनमस्कार घालीत असत.
भोजनाच्या संदर्भात आणखी एक श्लोकात सांगितले आहे,
सायंकृते प्रभाते जीर्यती,
प्रभातकृते सायं जीर्यती.
सकाळी जेवलेले अन्न सायंकाळी पचते, तर सायंकाळी घेतलेले अन्न सकाळी पचते.
सायंकाळी आणि सकाळी असेच शब्द या श्लोकामधे आहेत. दुपार आणि माध्यान्ह असे शब्द नाहीत. याचा अर्थ जेवायचे कधी तर सकाळी आणि सायंकाळी.
काही जण म्हणतील, या जेवायच्या वेळा त्याकाळात ठीक होत्या. आजच्या काळात त्या सुसंगत नाहीत. काळ बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला नको का ?
ज्या ठिकाणी सूर्य सहा सहा महिन्यात दिसतंच नाही, अशा ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी कोणता नियम पाळायचा ?
जिथे सूर्य नाहीच दिसत त्याठिकाणी अन्य नियम वापरू शकतो. पण जिथे सूर्य दिसतोय तिथे तर या जेवणाच्या वेळा पाळायला सुरवात करूया. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आम्ही पहिल्यांदा शंका घेणार. "कसं शक्य होणार ? हे असं लवकर जेवणं जमणारच नाही." सुरवातीलाच नकारघंटा वाजवली की पुढे सगळं चुकतंच जात ना. मग काही करावसं वाटत नाही.
या वेळा पाळणे तर्कसंगत नाही, व्यवहार्य नाहीत. हे एकवेळ मान्य करूया. पण पचन होण्यासाठी लागणारी उर्जा कुठुन आणणार ?
विज्ञानाने बाकी सगळी सोंग आणता येतील पण सूर्याचा प्रकाश आणि त्याची शक्ती तर आणू शकणार नाही ना. शेवटी कुठेतरी निसर्गाला शरण जायलाच हवं ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.03.2017
पाणी शुद्धीकरण भाग नऊ
या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?
ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा....
आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं.... एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची...
गंमत होती सर्व ...
गेली ती सारी गंमत.....
"एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा," लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
" यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं...." माझं तिरकस उत्तर.
त्यावर ती म्हणाली,
" आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं."
तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
" पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
कुठेही उगवतं,
म्हणून त्याचं
कसंही निभावतं "
खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?
जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?
एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !
आजच्या भाषेत "इम्युनिटी" कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !
हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.01.2017
मधुमेहाचा कडू चवीशी खूप जवळचा संबंध आहे. विपरीत नावामधे पण आहे आणि गुणानेदेखील दिसतो.
गोड पदार्थ आळस, जडत्व निर्माण करतात. कडू पदार्थ हलकेपणा आणतात.
गोड पदार्थांनी वजन वाढते, तर कडू पदार्थामुळे वजन कमी होते.
गोडाने चिकटपणा वाढतो. कडू पदार्थामुळे चिकटपणा कमी केला जातो.
गोड पदार्थ कफ वाढवतो. कडू कफ कमी करतात.
गोड पदार्थ शक्तीदायक असतात, तर कडू शक्ती वाढवत नाहीत.
गोड पदार्थ जास्त खाल्ले तर त्वचा तुकतुकीत होते. कडू जास्त खाल्लं तर त्वचा कोरडी आणि खरखरीत होते.
गोड जास्त खाल्ले तर मधुमेह होतो. तर कडू चवीने मधुमेह कमी होतो.
कडू चवीचे महत्वाचे औषध म्हणजे गुळवेल. स्वामी रामदेव बाबांनी या वनस्पतीला घराघरात पोचवले. प्रत्येक पदार्थांमधे जसे अपवाद असतात, तशी ही गुळवेल आहे. सर्व कडू पदार्थ हे प्राधान्याने वात वाढवणारे आणि शुक्राला अहितकर असतात. पण गुळवेल मात्र या दोन्ही गुणांच्या विपरीत आहे. ती वातही वाढवत नाही आणि शुक्राला अहितकरपण नाही. म्हणूनच गुळवेलीला अमृता म्हटले आहे.
सुंठ, पिंपळी आणि लसूण याखेरीज सर्व तिखट पदार्थ देखील कडू चवी प्रमाणेच वातकारक आणि शुक्राला अहितकर आहेत.
हे सर्व पदार्थ युक्ती वापरूनच वापरायचे असतात. रूग्णाची प्रकृती, वय, अवस्था, गरज, ऋतु, इ. अनेक गोष्टींचा विचार वैद्यसमुह करत असतो. म्हणून केवळ पुस्तकात वाचून औषधे वापरायची ठरवली तर ते चुकीचे होते.
काही वेळा आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमज असतात. त्यातीलच प्रत्येकाच्या तोंडात असलेला एक म्हणजे, आयुर्वेदीय औषधांना साईड इफेक्ट नसतात.
हो हा गोड गैरसमज आहे.
"साईड इफेक्ट नाही, त्यामुळे बिन्दास लेने का !" असं कसं म्हटलं जातं ? काही कळत नाही.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
तेव्हा सांभाळून !!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
23.11.2016
मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!
काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.
स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !
असो.
एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.
मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर "होय" असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.
मी "थांबवू" शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.
हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.
जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.
जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.
मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.
आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.
आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.
पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.
( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !
मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.
शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.
पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.
या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची "पिळवणूक" होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.
अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.
भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही.....
एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.
म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.
आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.
आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !
भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.
हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.
गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?
हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
बघा विचार करून..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग.
२६. कवल. म्हणजे गाल फुगवून तोंडात पाण्याची चुळ धरून ठेवणे. वेगवेगळ्या औषधी काढ्यांची, तेलाचे कवल अवस्थेनुसार प्रकृतीनुसार गुण दाखवतात, याविषयी लेखन झाले आहे. हा अस्सल भारतीय दैनंदिन उपचार होता. हा उपचार आता केवळ ‘चुळ भरणे’ एवढ्या स्तरावर आला आहे.
नियम एक.
कोणताच नियम पाळू नये. भाग दोन.
दूध म्हणजे विष नाही, दही म्हणजे विष नाही, गुळ म्हणजे विष नाही, पाणी म्हणजे विष नव्हे, पण हे पदार्थ प्रमेहामधे रोगाचे कारण सांगितलेले आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे पदार्थ बंद करायला हवेत असं नाही. आपली प्रकृती आपली पचनशक्ती जर कफाकडे जाणारी, कफ वाढवणारी असेल, तर या पदार्थांचा वापर करताना युक्तीचा वापर करायला हवा. हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. हे पदार्थ खाल्ले आणि काहीच व्यायाम केला नाही तर मात्र गडबड होणार हे नक्की.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खावे, दोन मुख्य जेवणे या वेळेत झाली, की त्याचे पचन सूर्य करतो, पचन सोपे होते, हा नियम झाला, पण एखादे वेळी दोनापैकी एक जेवण झालेच नाही, आणि सूर्यास्तानंतर खूप भूक लागली तर काय करावे ?
मस्त जेवावे.
फक्त अशा वेळी लक्षात ठेवावे की, सूर्यासारखा, पचनाला मदत करणारा अग्नी हा अत्यंत महत्त्वाचा घटक शरीराला पचनासाठी वापरता येणार नाही, तेव्हा फार लोड येईल असे खाऊ नये. जे काही खाऊ ते चापून खाण्याऐवजी हातचे राखून खावे, मटण चिकन, श्रीखंड, गुलाबजाम असे पचायला जड होणारे जेवण तर अजिबात नको. ही युक्ती हवी.
असे जड जेवण घेतले तर त्याचे पचन पूर्ण होण्यासाठी तसाच व्यायाम, तसेच कष्ट, तशीच मेहनत करायला हवी. नाहीतर सगळेच ओमफस्स !
संकष्टीला दिवसभर उपवास करून रात्री उशीरा चंद्रोदय झाल्यावर मोदकाचे जेवण जेवावे, या संकल्पनेमधे आपण नियम मोडलाच. पण दिवसभर उपाशी आहोत, स्वतः ठरवून, जाणून बुजुन, व्रत म्हणून, मनाला संयम घालून दिवसभर उपवास करून रात्री जेवलात तर ते क्षम्य ठरू शकते. पण ते सुद्धा महिन्यातून एक वेळ नियमाला हा अपवाद आहे. आम्ही अपवादाचा नियम केला की, सत्यानाश !
चातुर्मास करताना, या चार महिन्यात "देव झोपतो", अशी आपली संकल्पना आहे. या चार महिन्यात देवच जर झोपला, तर शरीराचे सर्व व्यवहार आपल्यालाच पहावे लागणार आहेत, उगाच काही मोठे निर्णय घेण्याची चूक करू नये, याचे भान राखून आपण आपले व्यवहार करावेत, ही युक्ती आहे. हे आपल्या लक्षात असावे, म्हणून चातुर्मासामधे काही विशिष्ट व्रते सांगितली जातात. एखाद्या वेळी एखादा उपवास चुकुन मोडला, म्हणून लगेच, " आता उपास मोडलाच आहे, भजी खाऊन घेऊया" असा विचार करणे ही चुक आहे.
तारतम्य बाळगणे, योग्य अयोग्याचा विचार करणे ही युक्ती असते. एखादी कृती दुसरा करतोय मग मी का नको ? असा विचार करणे चूक आहे असे नाही, पण त्यासाठी मला, जशाच्या तसा "दुसरा" बनणे आवश्यक आहे.
व्यायामाचे तेच आहे. व्यायाम जरूर करावा, पण कोणी करू नये, हे पण शास्त्रात सांगितलेले आहे.
प.पू. रामदेव स्वामी महाराज शीर्षासन करून हातावर चालतात, मग मला का नाही जमणार असे एखाद्यानं ठरवले आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? नाक तोंड फुटेल बाकी काही नाही. यासाठी तसा अभ्यास, तसे सातत्य, पहिल्यापासून हवे, तर जमेल. नाहीतर नाही.
शेवटी नियम हे आपल्याला मर्यादा समजावी म्हणून सांगितलेले असतात. तसेच्या तसे ते तंतोतंत पाळणे आणि सगळे नियम धाब्यावर बसवणे, दोन्ही चुकच !
युक्ती वापरली की, सगळ्याचा उपभोग घेता येतो. त्याचा हेतु योग्य असला की झालं.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.04.2017
पाणी शुद्धीकरण भाग एक
दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे.
दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून तयार होणारे विष "जीवन" दूषित करतात.
आजच्या काळात वेगवेगळ्या रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी, अधिकृत आणि अनधिकृत कत्तलखान्यातून बाहेर पडणारे रक्त, मल, मांस, युक्त दुषित आणि कुजलेले पाणी, गावागावातून नदीमधे टाकला जाणारा उकीरड्यावरील जैववैविध कचरा, तसेच प्रत्येक घराघरातून बाहेर पडणारे साबणयुक्त रसायनमिश्रीत सांडपाणी........ कित्ती मोठ्ठी यादी होईल...
हे सर्व दूषित पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित करत आहेत.
भीती निर्माण करण्यासाठी नव्हे तर रोगाची कारणे शोधून काढून ती कारणे आपल्या जीवनशैलीतून कमी करता आली तर, किंवा काढता येतील तेवढी काढण्यासाठी या रोगांची यादी देतोय.
हे रोग फक्त अशुद्ध पाणी पिऊनच होतात असे नव्हे तर रोग होण्याच्या कारणामधे इतर कारणांबरोबरच दूषित पाणी हे देखील एक महत्वाचे कारण दुर्लक्ष करून चालणार नाही.
आठ प्रकारचे उदर रोग, वारंवार तहान लागणे, पोट फुगणे, वेगवेगळे तापाचे प्रकार, खोकला, भूक नाहीशी होणे, डोळे येणे, वेगवेगळे त्वचारोग, खाज येणे, गलगंड इ. अनेक रोग ग्रंथकार वर्णन करतात. त्याचबरोबर मुळव्याध, आदि गुदरोग, स्त्रीयामधील प्रदर आदि रोग, हत्तीरोग, रक्ताल्पता, शिरोरोग देखील नदीतील अशुद्ध पाणी, शुद्धी संस्कार करण्याअगोदर प्यायल्याने निर्माण होतात.
आजच्या भाषेत व्हायरल फिवरचे अनेक प्रकार नावं बदलून आपल्यासमोर रोज येत आहेत, अगदी चिकुनगुनीयापासून स्वाईन फ्लु, इबोला पर्यंत सर्व प्रकार पाण्याशी संबंधीत आहेत.
दूषित पाणी ज्या भागात आहे, त्या भागात हे आजार जास्त प्रमाणात पसरले आहेत. हे पण व्यवहारात दिसते.
या दूषित पाण्याखेरीज, अन्य ठिकाणचे जल, वापरासाठी नसेल तर याच दूषित जलावर योग्य ते शुद्धीसंस्कार करून नंतर ते वापरावे, म्हणजेच "रिसायकल" करून वापरावे, इथपर्यंत स्पष्ट आदेश देणारी आयुर्वेदाची दृष्टी, दूरदृष्टीची नाही, असे कसे म्हणू शकतो ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
28.12.2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस
बाबा सांगतात...
बाबा म्हणजे आप्त म्हणजेच ग्रंथकार सांगतात,
सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा आणि दुर्जनापासून लांब रहावे.
हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य आणि असंबद्ध भाषा, दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, आणि शास्त्र विरूद्ध विचार ही दहा प्रकारची पापकर्मे होत. यांचा काया, वाचा आणि मनेकरून त्याग करावा.
या सर्व उपदेशात्मक उपचारांना हितोपदेश असे म्हटलेले आहे. जसे योग शिकताना, अष्टांग योगामधील यम नियम प्रथम पाळायचे असतात, त्यानंतरच त्यापुढील आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अंगांचा विचार करावा. तसेच आयुर्वेद शिकताना प्रथम हितोपदेश शिकावा, आचरावा, कृतीत आणावा. म्हणजे पुढील उपचार शिकणे सोपे असते.
आजच्या काळात हे नियम पाळणे शक्य आहे का, असे म्हणून नियम टाळणे तर नक्कीच समर्थनीय नाहीत. काळानुरुप यात बदल अवश्य करावेत, पण ग्रंथातील मूळ सूत्र सोडू नये.
ही दहा पापकर्म सांगितलेली आहेत.
ही अशा प्रकारची कर्मे करू नयेत. असं सांगण्याचं कारण, कथनी और करनी मे यदी एकता नही है तो मन मे खोट जरूर पैदा होती है । जे आत असेल तेच बाहेर येते.
विहिरीत किंवा टाकीमधे जे पाणी असते, बाहेर काढल्यावर तेच पाणी येणार ना. आपल्याला जर चांगले पाणी हवं असेल तर जिथून घेणार तो मूळ स्रोतदेखील चांगलाच हवा. म्हणजेच मन स्वच्छ असेल तर मनात काही पापभावना नसतील तर शरीरातील दोष देखील जरा अपथ्य झालं तरी संतुलीत रहातात. कारण या मनाचा संबंध थेट हार्मोन्सशी आहे. मन स्थिर आणि उच्च विचारांनी प्रेरीत असेल तर अंतःस्रावी ग्रंथींची कामे देखील स्थिर आणि उच्च दर्जाची होतात.
या प्रत्येक शब्दावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. कधी कोणाची शाब्दीक हिंसा देखील करू नये, कठोर बोलू नये, हे गांधीनी पण सांगितले होते. पण भविष्यातील सोय पाहून, सर्वधर्म समभावच्या नावाखाली काही ठिकाणी गांधींनी सोयीस्कर दुर्लक्ष देखील केले होते. या असत्याचाच राग पुढे व्यक्त झाला असे आफळेबुवांच्या एका किर्तनात ऐकले होते. नरो वा कुंजरो वा असे म्हणून धर्मराजाने देखील असत्य भाषण केले होते, ज्यामुळे त्याचा रथ पुढे स्वर्गापासून दोन बोटे लांब राहीला होता. नुकसान झालेच होते. याच असत्यामुळे गांधीना आपला प्राण गमवावा लागला होता, हे सत्य लक्षात घ्यावे.
भविष्यात आपल्याला जे संभाव्य आजारपण येणार आहे, त्याचा आतापासूनच नीट विचार करावा. यासाठी आपल्याला उपयोगी होणाऱ्या मंडळींना प्रेमाने जिंकून घ्यावे. ही माणसे तुटु नयेत, यासाठी प्रयत्नशील रहावे. प्रयत्न करूनही काही फायदा होत नसेल तर समजावणे सोडून द्यावे. भविष्यात येणाऱ्या आजारपणात, आपत्तीत जी माणसे उपयोगी ठरतील अशांना हाताशी धरावे.
केवळ आपलेच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीचे हित कशात आहे, हे ओळखून पावले उचलावीत.
या हितोपदेशांचा आजच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Copyright © 2025 | Marathisrushti