आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया.
आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे.
देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच कोणत्या तरी कंपनीच्या अहवालानुसार, कोणत्या तरी प्रयोगशाळेचा दाखला देऊन, काही अन्न पदार्थ आपल्या पोटी मारले जातात. आपणही कोणताही विचार न करता ते पदार्थ जणुकाही आपल्यासाठीच बनवले आहेत, अशारितीने त्यांना अंगिकारतो.
एवढं सांगताहेत, ते आधी वापरून तर बघू, पासून सुरू होत जाणारी आमची गुलामगिरी आमच्या रक्तात एवढी भिनते की नंतर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जातात, मग त्या पदार्थातील दोष दिसेनासे होतात. पण ते पदार्थ मात्र आपला प्रभाव आतून दाखवतच असतात.
जसे सोयाबीन. मुळात डुकरांना माजवण्यासाठी पाश्चात्य देशात या सोयाचा वापर केला जायचा. याची तशी काही आवश्यकता आहे, असे अजिबात नाही. पण भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावरून केला जाऊ लागला. आणि भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कुपोषितांच्या सोईसाठी या सोयाची आयात केली गेली. त्याच्या शेतीसाठी अनुदान देणे सुरू झाले. जिथे सोयाची शेती केली जाते, तिथे अन्य पिके कुपोषित राहातात. तेथील जमिनीतील पाण्याचा स्तर इतर जमिनीपेक्षा अधिक खाली जातो. पण लक्षात घेतो कोण ?
मुळात अभारतीय असलेला हा धान्य प्रकार आमच्या स्वयंपाकघरात असा काही घुसवला गेला आहे, की आमचे पूर्वजांनी हे सोयाबीन आम्हाला न दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे, असे काही वेळा वाटते. नेहमीच्या पोळीच्या पीठात एक मुठ करता करता सोयाच्या दुधापर्यंत, आणि चंक्सच्या रूपात, गरीबांचे चिकन इथपर्यंत त्याची घुसखोरी झालेली आहे.
त्याला सक्षमपणे पर्याय असणारे उडीद, मसूर, चवळी, राजमा सारखे भारतीय पर्याय उपलब्ध असताना या सोयाचे मिडीयाने एवढे कौतुक केले की, स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा, सवतीचे पोर आम्हाला आमचेच वाटू लागले.
सोयाबीन हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अश्या कितीतरी अभारतीय गोष्टी आम्ही सहजपणे स्विकारल्या आहेत.
मुळात मेकाॅलेच्या विचारसरणीचा आमच्यावर एवढा प्रभाव पडत चालला आहे, की भल्या भल्यांना देखील आपण दिवसेंदिवस अभारतीय होत चाललो आहोत, हे लक्षातही येत नाही. आमच्या मनातील भारतीयत्व पद्धतशीरपणे विसरायला भाग पाडणारा तो दुष्ट मेकाॅले आमच्या शिक्षणपद्धतीतून अजुनही जिवंत आहे.
स्वत्व गमावल्यामुळे सर्वस्व जाण्याची वेळ लवकरच येते, या न्यायाने आपण जर वेळीच जागे होऊन भारतीय पद्धतीने विचार करणे सुरू केले नाही तर आपण कृतीच्या स्तरावर पण अभारतीय होत जाऊ, अशी प्रामाणिक भीती वाटते.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.01.2017
मूलतः भारतीय नसलेले, व्यसन होत जाणारे, पित्तासारखे व्याधी वाढवणारे, देशाचा पैसा देशाबाहेर पाठवणारे चहाकाॅफी सारखे विदेशी पेय पिऊ नये.
आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई.
मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. चवीला कडू तिखट आणि बरीच उष्ण त्यामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी करते.
चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना.
१) पुष्कळ खोकला येऊन कफ सुटत नसेल तर १/४ चमचा मोहरी+१ चमचा खडीसाखर हे मिश्रण तोंडात ठेऊन त्याचा रस गिळावा आराम पडतो.
२) दात किडल्या मुळे दुखत असल्यास मोहोरीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात दात दुःखी थांबते.
३) मोठ्या व्यक्तींना जप कायम पोटात जंत होण्याची तक्रार असेल तप मोहरीचे चूर्ण १/२ चमचा गरम पाण्यात सोबत घ्यावे व नंतर त्यांवर ५-६ चमचे एरंडेल तेल प्यावे त्याने शौचा मधून जंत पडतात.
४) कुठल्याही अवयवावर सूज आली असेल तर पादेलोण अर्थात काळे मीठ व मोहरी समप्रमाणात एकत्र वाटावी व त्या मिश्रणाचा लेप सूज आलेल्या भागी करावा सूज उतरते.
५) जास्त चालणे अथवा एका जागी फार काळ बसून राहील्याने जर सांधे दूखुन मुंग्या येत असतील तर मोहरी एरंडेल तेलात वाटावी व ते मिश्रण त्या भागावर चोळावे रक्तप्रवाह सुधारतो आणि ही तक्रार कमी होते.
मोहरीच्या अतिवापराने एॅसीडीटी, हातपायांची जळजळ, अंगावर पुरळ उठणे, डोके दुखणे, संडास, लघवी अथवा नाकातून रक्तस्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून.
तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात:
१)दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये.
२)दही गरम करून खाऊ नये कारण गरम दही हे आयुर्वेद विषवत मानते.
३)अदमुरे दही तर मुळीच खाऊ नये हा पण जर संडासला घट्ट होण्याची सवय अथवा त्रास असेल तेव्हा काही दिवस उपचाराचा भाग म्हणून आपण ह्याचे सेवन करू शकता पण नियमीत नाही.
४)दही हा पदार्थ आपल्या आहारामंध्ये रोज खाऊच नये.
५)दही नुसते कधीच खाऊ नये तर त्यामध्ये सैंधव,खडी साखर असे काही तरी घालून खावे.
६)उन्हाळा,वसंत ऋतू,व शरद ऋतुमध्ये दही खायचे नाही कारण ते शरीरास अपाय कारक ठरू शकते तसे पाहता निसर्ग नियमच असा आहे की ह्या ऋतूत दही चांगले विरजत देखील नाही.
७)संडास मधून आव पडणे,डोके दुखी,सर्दी,पडसे,त्वचारोग,अम्लपित्त,संडासला आगहोणे,लघ्वीचीजळजळ,रक्तदोष,कोड,
अंगावर सूज येणे,रक्तस्राव,पांडूरोग,चक्कर येणे ह्या तक्रारी असल्यास दही खाऊ नये.
८)दही हे मासे,अंडी,मांस,फळे,भाज्या,कडधान्य ह्यात मिसळून कधीच खाऊ नये कारण असे केल्यास शुक्रदोष,डोळ्यांचे विकार,त्वचा रोग,रक्त विकार,अंगावर किंवा आतील अवयवांना सूज येणे,रक्तविकार होऊ शकतात.
म्हणूनच दही खा पण जरा जपून.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
हे चवीला कडू असले तरी आहे मात्र फारच पौष्टिक बरे का.ह्याच्या कडू चवीमुळे ब-याचं मंडळींना हे आवडत नाही.पण ह्यात असणा-या औषधी गुणांमुळे प्रत्येकाने ही भाजी खायलाच हवी.
ज्यांना हि भाजी आवडते ते ह्याची तळलेली कापं,भजी,चटणी,भाजी असे विविध प्रकार करून खातात.
कारल्याचा वर्षायू वेल असतो.व आपण खातो ते कारले म्हणजे ह्या वेलीला लागणारे फळ होय.कारले हे चवीला कडू तिखट असते व उष्ण असून त्रिदोषघ्न असते.
ह्याचा उपयोग जसा स्वयंपाकात केला जातो तसाच घरगुती उपचारात देखील आपण कारले वापरू शकतो.
१)संडास मधून आव पडत असल्यास कारल्याचा रस तीळ तेलात मिसळून प्यावा.
२)ज्यांना कृमी होण्याची सवय असते त्यांनी १/४ कप कारल्याचा रस+१/४ चमचा वावडींगाचे चुर्ण सकाळी उपाशी पोटी प्यावे व त्यावर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.
३)छातीत कफ साचून खोकला येत असल्यास १/२ कप कारल्याचा रस +२ चमचे मध+१/४ चमचा मिरीपूड हे मिश्रण घ्यावे.
४)ज्या इसब व खरूज ह्यात स्त्राव होतो त्यात कारल्याचा रस व हळद एकत्र करून लावावी.
५)अंगात बारीक ताप,अंगदुखी,तोंडास पाणी सुटणे,भुक न लागणे ह्यात कारल्याचे बारीक तुकडे+दालचिनी+काळी मिरी+वेलची रात्रभर पाण्यात भिजत घालून दुस-या दिवशी दिवसभर हे पाणी थोडे थोडे प्यावे.
कारले खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून संडास व लघ्वी साफ न होणे व अंगमोडून येणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
परिणाम
मांसाहाराचा परिणाम कसा कुठे होत जातो आणि निसर्ग चक्र कसे बिघडते ते पहा.
भारतात मांसाहार सुरू झाल्यानंतर पशुधन झपाट्याने कमी होत गेले. कुक्कुटपालन सोडले तर शेळ्या मेंढ्या डुकरे, गाई म्हशी रेडे, यापैकी कोणत्याही प्राण्यांची शास्त्रीय पैदास केली जात नाही. शहरी लोकसंख्या वाढली, दुर्दैवाने मांसाहारी वाढले. पण ही तथाकथित कृत्रिम गरज भागवण्यासाठी लागणारे पशूधन वाढवण्यासाठी मात्र काही झाले नाही.
परिणाम ?
पशुधन झपाट्याने कमी होत गेले.त्याचा परिणाम शेतीवर झाला. कृषीप्रधान भारत अशी ओळख असणाऱ्या देशाच्या भन्नाट मतीकर कृषीमंत्र्यांना सांगावे लागले, की कृषी करणे सोडून द्या. कृषी करण्यापेक्षा धान्यापासून दारूच तयार करणे जास्त फायदेशीर आहे. शेतकरी आत्महत्या करू लागले. अशी वेळ का यावी ? याचे उत्तर कुठे आहे ? कोणाकडे आहे ? हे एवढ्यावरच थांबलेले नाही.
एक आकडेवारी सांगते की, भारतातील मांसाहार कमी झाला आहे, पण प्रत्यक्षात कत्तलखान्यांची संख्या वाढली आहे. भारताला स्वातंत्र मिळाले तेव्हा एका तासात तीन या प्रमाणात पशुहत्या होत होती, ते प्रमाण आता मिनीटाला चौवीसपेक्षा जास्त झाले आहे.
परिणाम ?
एकावन्न साली दर हजारी असलेले 340 गोधन कमी होऊन दोन हजार साली फक्त 110 उरले आहे. गायच कापली गेल्यामुळे पुढचा वंश देखील वाढायचा थांबला. फक्त गायच नव्हे तर, शेळ्या मेंढ्या म्हैशी रेडे यांची तीच गत आहे.
परिणाम?
पशुपालन व्यवसाय हा शेतीपूरक न बनता, मांस ऊत्पादक होऊ लागला.
भारतातील नैसर्गिक रित्या पोसलेल्या पशुंच्या मांसाला, बाहेरील देशात खूप मागणी आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील धनिकांचे जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हवाईमार्गे मांसनिर्यात सुरू झाली.
आधुनिक कत्तल कारखान्यांमधे भरपूर पैसे देऊन, विकत घेतलेले चविष्ट लुसलुशीत मांस कसे मिळेल यावर भर दिला जातो.
परिणाम ?
यासाठी कमी वयाची वासरे, तरूण धष्टपुष्ट गायबैल, म्हैस रेडे, वा शेळ्या मेंढ्या यांची कत्तल करण्याकडे जास्त भर दिला जातो. वयस्कर, भाकड, नको झालेले पशुधन या आधुनिक कत्तलखान्यांना नको असते.
परिणाम ?
स्वाभाविक पैदाशीच्या वयातील पशुधनावर कत्तलीचे संकट येऊन कोसळते.
भारतातील पशुधन वाचावे म्हणून लोकांनी शाकाहारी बनावे, असं सांगण्याचा कोणताही हेतु नाही. फक्त परिणाम कोणत्या स्तरापर्यंत पोचतात त्या परिणामांची ही एक झलक आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
10.10.2016
रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे.
उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जेवणाची वेळ पाळली तर औषध घ्यायच्या वेळा पाळायची वेळ येत नाही.
जेवण नेमके कोणत्या वेळी घ्यावे, असा शोध मी ग्रंथात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला थेट उत्तर मिळाले नाही.पण एक श्लोक मात्र मिळाला आणि विचारांना दिशा मिळाली.
अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 11-63 मधे शास्त्रकार म्हणतात,
प्रातराशे तु अजीर्णे अपि,
सायमाशो न दूष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु
प्रातराशो हि दूष्यति ।।
म्हणजे दिवसा सेवन केलेले अन्न सम्यक रितीने जर पचले नाही, आणि जर सायंकाळी भोजन केले तर विशेष हानी होत नाही.
पण सायंकाळी घेतलेले भोजन जर सकाळी पचले नसेल आणि सकाळी पुनः अन्न सेवन केले तर मात्र हानी अवश्य होते.
अजीर्ण होऊ नये म्हणून हा श्लोक उद्धरीत केला आहे. आता शास्त्रकारांनी ज्या कारणासाठी हा श्लोक तिथे सांगितला होता, त्याचे कारण वेगळे होते. अजीर्ण केव्हा होते, कसे होते हे सांगताना हा श्लोक सांगितला आहे.
आता या श्लोकातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रातः आणि सायम् प्रातःकाल आणि सायंकाळ. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ.
इथे दुपारी आणि रात्री असे शब्द वापरलेले नाहीत. याकडे विशेष लक्ष द्यावे. यावरून असे लक्षात येते, की आपल्या दोन वेळा जेवायच्या. सकाळी आणि सायंकाळी.
हे काही आपल्याला जमणारे नाही बुवा, असं म्हणून, सोडून द्यायचा हा विषय नाही. कारण औषधाशिवाय निरोगी जगायचं असेल तर कुछ ना कुछ करना तो पडेगा ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.02.2017
केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक अवयवावर होतो, हे पण लक्षात घेतले जात नाही.
ज्यांना जमिनीवर बसताच येत नाही, त्यांनी काय करावे ?
आधी ज्यांना जमिनीवर बसता येतंय, त्यांनी जमिनीवर बसायची सवय अजिबात मोडू नका.
आज जमिनीवर मांडी घालून बसूच नका, असा पाश्चात्य बुद्धीचा ऊफराटा सल्ला सर्वच अस्थिरोगतज्ञ देत असतात. असा मांडी न घालण्याचा सल्ला कदाचित बरोबर असेलही, पण, अगदी क्वचित हाताच्या बोटावर मोजायच्या अवस्थेत ! म्हणून सर्वांनीच जमिनीवर मांडी घालून बसणे सोडावे, असे थोडेच आहे ?
जशी संस्कृति तसे आचरण. पाश्चात्य संस्कृतीमधे मांडी घालून बसणे हा संस्कार त्यांच्या लहानपणापासूनच नाही, मग अगदी कितीही उच्चविद्याविभूषित झाले तरी, खाली बसायचे असते, हे त्यांना माहीतच नसते.
पाश्चात्यांचे एकवेळ समजू शकतो, पण ज्यांच्या आयुष्याची निम्मी वर्ष जमिनीवर, पाय दुमडून जेवण्यात आणि उकीडवे बसून मलविसर्जन करण्यात गेली, अश्या आमच्या भारतीय वैद्यक तज्ञांनी, असे सल्ले आपल्या फाईल्सवर छापील स्वरूपात आणल्यावर, बदललेल्या शिक्षणपद्धतीने, भारतीय संस्कृतीचे किती नुकसान झाले, हे लक्षात येते.
भारत हा माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत ...
माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन....
या प्रतिज्ञेचा एवढ्या लवकर विसर पडावा, याचेही आश्चर्य वाटते. या आमच्या भारतीय परंपरा हळुहळू आमच्या जीवनपद्धतीतून नाहीश्या होत चालल्या आहेत. एवढे पाश्चात्य विचारांचे आपण होत चाललो आहोत, हे आमच्या लक्षातही येत नाहीये.
सहज या परंपरांचा हिशोब करीत बसलो असताना असे लक्षात आले की, सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किमान एकशे सत्तावीस ठिकाणी आपण अभारतीय पद्धतीने वागतोय, ज्यांचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे.
पण आमची विचारसरणीच अशी काही बदलली गेली आहे, की अश्या एकशे सत्तावीस गोष्टी, मूलतः भारतीय नाहीत, हे आमच्या अस्सल भारतीय मनालादेखील पटत नाही.
त्यातीलच एक म्हणजे जमिनीवर बसणे.
जमिनीशी, या मातीशी थोडा तरी संपर्क हवाच ना ? !
वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर "अर्थिंग" हवेच ! अनेक विचारांची, माणसे आपल्याला दररोज भेटत असतात. आपल्याला नको असलेले विचार ते आपल्याला बोलून दाखवतात. काही विचार आपल्याला, आपल्या अंतर्मनातून काढून टाकायचे असतात, पण ठरवले तरी काढता येत नाहीत, अशावेळी हे "अर्थिंग" उपयोगी होते, असा माझा अनुभव आहे.
आकाशात कितीही भरारी घेतली तरी आपले पाय मात्र जमिनीवरच हवेत, असे म्हटले जाते, ते काही अगदीच शब्दशः घ्यायचे नसते, असे नसते. पाय शक्यतो जमिनीवरच हवेत, म्हणजे "शाॅक" लागण्याची भीती नसते.
असो.
जमिनीशी असलेली ही भारतीय नाळ, जेवताना जर जुळली तर फार बरे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
20.09.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 17 - पुष्प पाचवे
वेगवेगळी फुले उमलली
रचूनी त्यांचे झेले.
बुके शब्दाला प्रतिशब्द म्हणजे झेले असे लक्षात येते. परडी देवासाठी, गजरा घरातल्या देवीसाठी आणि झेला इतर माणसासाठी !
देवासाठी फुले काय पाने काय एकच !
भगवंत सांगताहेत,
पुष्पं पत्रं फलम् तोयम्, मला काहीही चालेल. फक्त भक्तीभावाने अर्पण करा. हे देवासाठी ठीक आहे. पण फुलांऐवजी पानाचा गजरा सौ. देवीसाठी ठीक राहील का ? तिथे पुष्पार्थे अक्षताम् समर्पयामी म्हणून कसं चालेल ? माणसासाठी मात्र तेथे पाहिजे जातीचे !
पानावरून आठवले. देवाला जशी फुले वाहातात, तशी पाने देखील अगदी मंत्र म्हणून वाहिली जातात. याला पत्री वाहणे म्हणतात. याचे मंत्रदेखील किती आरोग्य पूरक आहेत पहा,
एकदंताय नमः अर्क पत्रम समर्पयामी ।
गजकर्णाय नमः तुलसीपत्रम समर्पयामी ।
लंबोदराय नमःबदरीपत्रम समर्पयामी ।
नावे गणेशाचीच. पण गर्भित अर्थ वैद्यांसाठी आहेत.
दंतांसंबंधी काही व्याधी असतील तर रूईचे पान किंवा पान जाळून त्याची राख मंजनामधे वापरण्यासाठी सूचक आहे का ?
गजकर्ण या रोगासाठी किंवा कर्णासंबंधी व्याधीकरीता तुलसीपत्र.
ज्याचे उदर लंब आहे अश्यासाठी खरखरीत बदरीचे पान. हे आरोग्य सूचक नव्हेत काय ?
पानेदेखील तोडायची नाही, खुडायची. पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने आवारामधे कोणती झाडे कुठे आहेत, ते वर्षातून एकदा तरी कळते. आयुर्वेद किंवा आरोग्याची ओळख ही अशी शाळेत जाण्यापूर्वीपासूनच होती.
विष्णुसाठी तुळस प्रिय आहे, गणेशाला दुर्वा, तर शंकराला बेल. बेल नसला तर प्रतिद्रव्य म्हणून निर्गुंडी, मारूतीला रूई, नंदीला आघाडा, अशी पत्रांची योजना कुणी का केली असेल, का केली असेल ?
शेयशायी विष्णुंचा निवास सागरात आहे, पाण्यात आहे. सतत पाण्याशी संबंधीत आजारापासून सुटका होण्यासाठी पाणी लगेचच शोषून घेणारी तुळस हा त्याचा "अॅण्टीडोट" म्हणून सांगितले गेले असेल का ? रक्तबीज राक्षसाला गिळल्यानंतर, गणेशजींच्या मनाचा, तनाचा दाह कमी करणारी दुर्वा, हे पित्तज व्याधींचे प्रतिक समजता येईल का ?
कृपानिधी भोलेनाथ शंकर तर असलं तर सूत नाहीतर भूतराज ! कधी समाधी तर कधी समाधी भंग होऊन तांडव सुरू होईल ते सांगता येत नाही, अशा क्षणात रक्तदाब वाढणाऱ्या व्यक्तींसाठी बेलाची उपाय योजना असेल का ? नंदी म्हणजे बैल. पशूंचा प्रतिनिधी. जसे माणसासाठी गुळवेल, तसे आघाडा हे पशुचिकित्सेमधील एक प्रमुख औषध आहे.
देवतांसाठी ज्या फुलापानांची योजना केली आहे, त्याचा हेतु काय असेल ?
कधीतरी आयुर्वेदाभिमुख होऊन, वेगळी नजर वापरून, अध्यात्मामधील आरोग्याच्या छुप्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
आपल्या संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. त्या तश्याच जपायला हव्यात, नाहीतर एक दिवस जर्मनीतून एखादा प्रतिमॅक्समुल्लर धोतर नेसून यायचा आणि षोडशोपचार पूजा सांगणारा पुरोहित व्हायचा !
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
10.06.2017
Copyright © 2025 | Marathisrushti