(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस – अ

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा - भाग दोन

    खड्ड्यात पाणी आपोआप ओढले जाते.
    पण केव्हा ?
    जर तो खड्डा रिकामा असेल तरच ! जर तो पाण्याने भरलेला असेल तर ? पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्यात आणखी पाणी कसे ओढून घेतले जाईल ?

    अगदी तसेच पोटाचेही होते. सकाळी उठल्यापासून जी काही खायला सुरवात होते, ती रात्री झोपेपर्यंत ! अगदी ओव्हरफ्लो. अगदी पुलंचा अतिशोयोक्ती अलंकार वापरायचा झाला तर.....
    ......एवढे श्रीखंड हाणले की, "नको आता. पुरेऽऽ" एवढे शब्दही त्याच्या तोंडून उच्चारवेनात. त्याच्या घशात बोट घातले असते तर, बोटाला पोटातले श्रीखंड लागले असते.......इथे पोटात खड्डा कुठचा ? मिठी नदीचा जणुकाही महापूरच लोटतो.

    अतिशोयोक्ती सोडून देऊया, पण अगदी आकंठ जेवल्यावर जी सुस्ती येते, ते सुख पुढे जाऊन, दुःखाचे कारण बनणारे असते.

    बरं त्यानंतर काही किरकोळ काम करावे, त्याने पोट थोडे फार हलेल, तर तेही नाही. एवढे टम्म जेवल्यावर पोट हलायची बातच नाही. अंथरूण पसरून, पांघरुण घेऊन, पाय ताणून दिले, की पोटात पचनासाठी आलेल्या भगवान विष्णुंनी करायचे तरी काय ?
    ( संदर्भ - अहं वैश्वानरोभूत्वाम्.....पचाम्यति चतुर्विधम )
    ते बिचारे ताटकळत वाट बघताहेत, "आता याची कुस बदलेल, मग तिथल्या कुशीखाली दबले गेलेले अन्न, मला पचनासाठी घेता येईल".
    पण कुठचे काय ! दोन तास झाले तरी, पोट हलायची बातच नाय. खड्डा कसा पडणार ? बिचारे भगवान वाट बघून निघूनही जातात. मग काय होणार ?
    बरं असं एखादा दिवस झाले तर ठीकाय, पण असं दररोज व्हायला लागलं तर काय करणार ?

    दरवाज्याला कुलुप बघून भांडी कामवाली बाई जशी परत निघून जाते, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नेहेमीच्या वेळेवर परत येते, तोपर्यंत बाथरूममधल्या, तसेच पाणी खात पडलेल्या भांड्यांमधे पुनः रात्रौची भांडी अस्ताव्यस्त अडकून पडलेली असतात., 'तिची' वाट बघत ! बाथरूममधे अगदी पाय टाकायला पण जागा उरलेली नसते.

    तसंच पोटातल्या अन्नाचं होतं. वेळेत पचन झालं नाही. जर हा खड्डा तयार झाला नाही तर काय होणार ? हा खड्डा, ही रिकामी जागा तयार होणं महत्त्वाचे असते.

    मुख्य नदीतील पाणी जर ओहोटीच्या वेळी समुद्रात गेले तरच, नदीला जोडल्या गेलेल्या छोट्या छोट्या ओहोळातील पाणी, कचरा, घाण इ. अडकलेले पदार्थ पुनः नदीच्या पात्रात ढकलले जातील तसे, मुख्य स्रोतसातील अन्न पुढेपुढे ढकलत जाऊन, तिथे जागा झाल्याशिवाय आजूबाजूच्या छोट्या स्रोतसातील चांगले वाईट स्राव मुख्य स्रोतसामधे कसे पोचणार ?

    तसेच पोटातही, खड्ड्याची जागा होणे, जागे राहून, अन्नाला, आणि अन्न पचनासाठी आलेल्या इन्शुलीन सारख्या स्रावांना, जागा करून देणे महत्त्वाचे असते. जर आत जागाच नसेल तर, "पॅन्क्रीयाज" मधे तयार झालेले "इन्शुलीन" आत जागा नाही या एका कारणास्तव, कुलुप असलेल्या दरवाजासमोर वाट पहाणाऱ्या कामवालीसारखे, काहीच करू शकत नाही. बिचारे पोटात उतरूच शकत नाही. आणि परत आपल्या स्वस्थानी जाते. तिचे अधिपती भगवान विष्णु स्वरूपी मेंदू महाराजांना ही बातमी कळते, ते देखील "दखल घेतली", असं म्हणण्या पलीकडे काही करू शकत नाहीत.

    अशी जागा, असा खड्डा जर तयार नसेल तर......??
    तर पालक विष्णुंचा कोप होऊन ते एक दिवस म्हणतील, "जावा खड्ड्यात! "

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    04.05.2017

  • आहारातील बदल भाग ५ – मांसाहारी भाग दोन

    मांसाहार करणारे प्राणी रक्ताला थंड ठेवण्यासाठी एक युक्ती करतात. जीभ बाहेर काढून ते श्वसनावाटे शरीरातील आर्द्रता वाढविण्यास मदत करतात. कुत्रा, वाघ, सिंह हे मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून जणुकाही शीतली, सीतकारी (हे पू. हठयोगी निकम गुरूजींनी शिकवल्याप्रमाणे प्राणायामाचे प्रकारच जणु) करत असतात.

    मांसाहारी प्राण्यांच्या अंगाला घाम येत नसल्याने त्यांना शरीर थंड राखण्यास अशी जीभेने मदत करावी लागते. त्यामुळे हे प्राणी सतत आपले अंग चाटत असतात. अंग चाटत राहील्यामुळे जो ओलेपणा मिळतो, ती जणुकाही त्यांची आंघोळच असते.

    म्हणून त्याचा दुसरा परिणाम असा होतो की, अंगाला खूप ऊग्र दर्प असतो.
    वाघ सिंहाच्या पिंजऱ्याच्या जवळपास गेलो तरी हा दुर्गंध लक्षात येतो. कुत्र्यांना कितीही डेली सोप लावा. वास काही जात नाही.

    हे प्राणी स्वभावतःच क्रूर असतात. त्यांचे विचकणारे दात बघितले तरी भीती वाटते. बांधलेला कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला, त्याचे ते अक्राळविक्राळ रूप बघीतले तर काय हिंमत पुढे जायची ?

    मांसाहारी प्राण्यांची पिल्ले जेव्हा जन्म घेतात, तेव्हा पहिले अकरा दिवस पर्यंत त्यांचे डोळे बंदच असतात. नंतर उघडतात. वाघ असो वा वाघाची मावशी. सिंह असो वा कुत्रा, नियम तोच. पहिले अकरा दिवस जन्मआंधळे !

    या मंडळीकडे दया माया प्रेम वात्सल्य अगदी "न" के बराबर ! प्रचंड अहंकार रोम रोम मे समाया हुआ ! गरूड, सिंह यांनी शिकार केल्यावर लगेचच फोटोमधली पोझ आठवतेय का त्यांची ? त्यांच्या डोळ्यातले भाव वाचता आलेत कधी ?
    प्रचंड मस्ती, गुर्मीत असल्याप्रमाणे ( आजुबाजुला कोणी नसले तरी ) मान उंचावून पहाताना,
    "बघा, अखेर केली की नाही शिकार ! माझ्यासारखा शिकारी मीच ! "
    अशी त्यांची देहबोली दिसते. अपवाद असतील पण अगदी क्वचित. मांजराने उंदराला पकडल्यावर, त्याला खाण्यापूर्वी, मांजराच्या चेहेऱ्याकडे बघीतलंय कधी ? आता मुद्दाम लक्ष ठेवा.

    हे मांसाहारी प्राणी एवढे क्रूर असतात की, आपला वंश पुढे वाढला पाहिजे, या नैसर्गिक नियमाचाही त्यांना विसर पडतो. आणि....आणि.....त्यांच्या मादीने नुकत्याच जन्म दिलेल्या, आपल्याच रक्तापासून तयार झालेल्या, कोवळ्या जीवांचीच शिकार करून, भविष्यात त्यांच्या कामविश्वात तयार होणारा, त्याच्याच ताकदीचा एक मोठ्ठा शत्रु, आधीच नष्ट करून टाकतात, खाऊन टाकतात. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, पुढे निर्माण होणारे आपले हितशत्रु कायमचे संपवून टाकण्याची यांची कंसवृत्ती दिसते. यासाठी त्याच्यातील आईला, तिच्या पिल्लांना, फार जपावे लागते. कारण इथे शत्रु, अपनेवाले, अपनेही घरवाले होते है ! कितीही मांसाहारी असली तरी एक आई, "असं" कधीच करू शकत नाही.

    बरं यांचे आणखी एक वैशिष्ट्य दिसते, यांना भूक लागली की, त्यांना शिकार करण्यासाठी दिसतात, ते फक्त शाकाहारी प्राणीच ! पोट भरतात, फक्त शाकाहारी प्राण्यांच्या जीवावरच ! निसर्गाचा नियमच आहे हा ! चुक काहीच नाही.
    वाघ सिंह शिकार करतील, हरीण ससे आणि हत्तीचीच ! पण कोल्हे आणि लांडग्यांची नाही.

    वरील सर्व नियम मांसाहारी प्राण्यांना लागू होतात की नाही, ते पुनः एकदा तपासून पहा.

    या निसर्गदत्त देणग्या, या प्राण्यांना ईश्वराने दिलेल्या आहेत.
    मी मांसाहारी आहे, हाच माझा धर्म, एवढंच शिकून तो इथे आलेला असतो. कोणत्याही धर्मग्रंथांचा अभ्यास तो नंतर करत बसत नाही.
    जगण्यासाठी, ( आजच्या भाषेत, बाय डिफाॅल्ट प्रोग्रामने आलेले ) हेच ईश्वर निर्मित नियम पाळणे, ही त्यांची गरज आहे. यातील एक गुण जरी कमी पडला तरी त्यांचे जीवन संपूनच जाईल.
    म्हणून परत परत म्हणावेसे वाटते,
    ईश्वर महान आहे !
    यु आर ग्रेट !!
    तुस्सी ग्रेट हो !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    26.09.2016

  • याला जीवन ऐसे नाव भाग ८

    संदर्भ - वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय

    तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.

    जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
    सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
    लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
    साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
    थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
    किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
    दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.

    याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.

    जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.

    काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.

    पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.

    आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.

    नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.

    म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    15.12.2016

  • आजचा आरोग्य विचार – भाग पंचवीस

    केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक अवयवावर होतो, हे पण लक्षात घेतले जात नाही.

  • आहारसार भाग ८

    रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच.
    ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे.

    गरज आहे ती शुद्धीकरणाची !
    अंतर्बाह्य शुद्धीकरण !
    अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत.

    जेवढे आपापल्या परिने शुद्ध रहाता येईल तेवढे रहायचे.
    जेवढे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न मनापासून करून अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा.
    एवढंच आपल्या हाती.

    समुद्रासारखं व्हायचं.
    समुद्र आतमधे काहीही घाण सामावून घेणारच नाही. जे काही आत नको असेल, ते ते सर्व बाहेर किनारपट्टीवर आणून टाकायचे !

    अगदी अनावश्यक विचार सुद्धा !
    मनापासून केलं तर नक्कीच यश मिळते,

    खाताना जेवढे शुद्ध सात्विक खाता येईल तेवढे खायचे.
    म्हणून तर आपण अन्नावर वेगवेगळे संस्कार करतो, ते त्यातील विष निघून जाण्यासाठीच. !

    धान्यांच्या बाबतीत, वारवणे म्हणजे वारा देणे, निवडणे, आसडणे, पाखडणे, चाळणे, घोळणे, धुणे, हे झाले प्राथमिक शुद्धी संस्कार.
    नंतर चिरणे, कापणे, फोडणे, वाफवणे, उकडणे, शिजवणे, तळणे, परतणे, गाळणे, फुलवणे, फुगवणे, आंबवणे, भाजणे, बेक करणे, हे सर्व संस्कार आपण अन्नावर दररोज अगदी सहजपणे करत असतो.
    कशासाठी ?
    अन्न सहज पचावे, याकरता सोयीचे व्हावे म्हणून केलेले जाणारे हे शुद्धी संस्कार !

    प्रत्येक पदार्थातील विष वेगळे. त्यामुळे त्याची शुद्धी वेगळी. जसे मोहोरी धुण्यासाठी माझी आई मोहोरी पाण्यात घोळून धुवायची.
    एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन एक वाटी एका हातात, त्या पाण्यात धरून ती हलवत रहायची. दुसर्‍या हाताने मूठमूठ मोहोरी घेत त्या वाटीत वरून हलकेच सोडायची. म्हणजे मोहोरीतले बारीक दगड पाण्यात घोळल्यामुळे, वाटीत आपोआपच तळाला बसायचे. वरची शुद्ध मोहोरी पातेल्यात यायची. दगड वाटीत जमा व्हायचे.
    आणि नंतर पातेल्यातील मोहोरी वाळवायची.

    काही पदार्थांची शुद्धी होऊच शकत नाही, म्हणजे जर्सी गाईच्या दुधाची शुद्धी कशी करणार ?
    दूध ऊकळून किंवा सुंठ, आले मिरी बाळशेप इ. औषधे घालून देखील या दुधाची शुद्धी होणारच नाही. अशावेळी या पदार्थाना आपल्या आहारातून कायमचे हद्दपार करणे, हाच सर्वोत्तम उपाय ठरतो.

    अशी शुद्धी जर प्रत्येक पदार्थाची करायची ठरवले तर अन्नशुद्धी फार कठीण नाही.

    पण वेळच नाही हो, कसं जमणार, जागाच नाही, माहितीच नाही, आईने शिकवलेच नाही, करायचं कुणी, अश्या वैचारिक द्वंद्वात सतत राहिल्यामुळे आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण हे असलं कालबाह्य काही करायची आमची मानसिक आणि शारिरीक तयारी नाही, असं म्हणून कसं चालेल ?

    कुछ (100 बरस ) पाने केलिए
    कुछ खोना पडता है !
    जिंदगी पाने केलिए
    गंदगी को हटाना जरूरी होता है !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    26.08.2016

  • उशीर/वाळा

    आपण सर्वच जण वाळा ह्या वनस्पतीला ओळखतो.पुर्वीच्या काळी राजे महाराजे ह्यांना वाळ्याच्या पंख्यानी वारा घालत असत. तसेच वाळ्याचे सरबत हे देखील बऱ्याच जणांना आवडते.चला तर आता ह्या वाळ्याची आपण पुर्ण ओळख करून घेऊयात.

    वाळ्याचे तृणमूल असून काण्ड १-१.५ मी उंच व सुगंधी असते.ह्याची बेटं असतात.ह्याची पाने २५-५० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असतात.हि सरळ असून वरच्या भागात गुळगुळीत व पृष्ठ भागी रोमश असतात.फुलाचा देठ १०-३ सेंमी लांब असून मुळ सुगंधी असते ते वाळल्यावर सुगंध वाढतो.

    ह्याचे उपयुक्तांग मुळ असून वाळा चवीला कडू,गोड व थंड गुणाचा व हल्का आणी रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर अाहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)त्वचारोग व अतिघाम येणे ह्यात वाळ्याचा लेप करतात.

    २)वाळा अतिसारात आमपाचक म्हणून चांगले कार्य करतो.

    ३)वाळा तापामध्ये देण्यात येणाऱ्या षडंगोदकात वापरतात.

    ४)वाळा दाहनाशक असल्याने दाहात साखरे सह वापरतात.

    ५)वाळा मुत्रल असल्याने मुत्रदाह व लघ्वीच्या त्रासात तांदुळाचे धुवण व साखरे सह वापरतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ११

    अकरावा भाग खास
    विशेष आहे अभ्यास ।
    धरूनी सर्व शास्त्रास
    नैसर्गिक उपवास ।।

  • आजचा आरोग्य विचार – भाग तीन

    भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग चार

    कमळ दिवसा उमलते, सायंकाळी मावळते.

    समांतर पर्णविन्यास असलेल्या गुलमोहोर, चिंच, लाजरी इ. वनस्पतींची पानेदेखील दिवसा उघडतात आणि सायंकाळनंतर बंद होतात.

    वनस्पतीमधील फोटो सिंथेसिस ही अन्न निर्मितीची प्रक्रिया या सूर्यावरच अवलंबून असते, हे पण आपण शाळेत शिकलोय.

    पक्ष्यांचा चिवचिवाट, कोंबड्यांचे आरवणे, कावळ्यांची कावकाव सूर्योदयानंतर सुरू होते.

    ब्राह्म मुहूर्तावर उठून आपले आह्निक आवरून दिवसाच्या कामकाजासाठी सज्ज व्हावे, असे आयुर्वेदातही लिहिले आहे.

    सर्व शुभकार्ये दिवसाचीच होतात. दिवसा सकारात्मक उर्जा कार्यशील असते. रात्री नसते. सत्वगुण दिवसाचा असतो तर रात्र ही तमोगुणी असते.

    उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे. म्हणजे सकारात्मक उर्जा मिळते, तर सूर्य अस्ताला जाताना त्याला पाहू नये, नकारात्मक शक्ती वाढते, हे पण भारतीय दर्शनशास्त्रामधे लिहिले आहे.

    आरोग्यम् भास्कराद इच्छेत, म्हणजे आरोग्य हे सूर्यावर अवलंबून आहे. आरोग्याचा स्वामी सूर्य आहे. चांगल्या आरोग्यासाठी सूर्यापासून आपल्याला उर्जा मिळत असते.

    सर्व आहारीय पदार्थ गोळा करण्याचा कालावधी पण सूर्योदयाला सुरू होतो, त्याचप्रमाणे औषधी संग्रह करायला सुद्धा दिवसच सांगितलेला आहे.

    हे सर्व नियम निसर्गाने ठरवलेले आहेत. माणूस हा पण त्याच निसर्गातील एक घटक आहे. त्यामुळे या निसर्ग नियमांना आपणही बांधील आहोत, हे कदापि विसरून चालणार नाही.

    यावरून पुनः पुनः हेच सिद्ध होते, की दिवस हा कामे करण्यासाठी तर रात्र ही विश्रांती घेण्यासाठी आहे. त्यात ढवळाढवळ करू नये.

    हे नियत काम नियत वेळी करणे हेच आरोग्य, हे नियम पाळणाऱ्या सर्वांना नियत आयु मिळते. हे पण आपण व्यवहारात पहातो.

    पर्णाळी पाहोन उचले ........
    .....आणि पुरूष भ्रमिले

    याला काय म्हणावे, असे समर्थ देखील विचारत आहेत. पानावरून चालणारी अळी पुढे पाय टाकताना, पुढे आधार आहे का, हे चाचपून बघते आणि मगच पाय पुढे टाकते, म्हणून पानावरून ती खाली पडत नाही, एवढा सावधपणा एवढ्याश्या अळीमधे सुद्धा आहे, आणि मनुष्यप्राणी (दासबोधामधे देखील 'पुरूष' हा शब्द लिंगवाचक नसून, स्त्री आणि पुरूष या दोघांनाही एकत्रित म्हणून वापरला आहे. गैरसमज नसावा. ) मात्र आपल्या सुरक्षेसाठी जे जे उपाय सांगितले आहेत ते सर्व नियम पुरूष आपणहून मोडतो, आणि नंतर दैवाला दोष देत बसतो.

    अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.05.2017

  • प्रमुख आहार सूत्र – भाग ६

    केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच !

    दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत नाही. मग बंगालमधे प्रमेहाचे प्रमाण जास्ती असेल का ? शोधावे लागेल, पण बंगाल या प्रांतात परंपरेने दुधाचे रोशगुल्ले, पनीर इ.पदार्थ वंशपरंपरेने खाल्ले जात असल्यामुळे ते तिथे सात्म्य झाले असावेत.

    या पदार्थांमधे वापरली जाणारी साखर ही पण प्रमेहाची सख्खी मैत्रिणच जणु ! आज आधुनिक विज्ञान पण तेच सांगते, साखर हे पांढरे विषच आहे. त्याच्या फारसे पाठी न लागलेले बरे !

    अर्थात एकदा हे पदार्थ खाऊन प्रमेह होणार नाही, पण दिवसातून एकदा खाल्ले तर मात्र नक्कीच होईल. त्यातून कफाची प्रकृती आणि पाणथळ दलदलयुक्त प्रदेशी रहाणाऱ्यांना अधिकच सावध रहायला हवे. त्यात भूक कमी असली तर बघायलाच नको. त्यामुळे सावध तो सुखी हेच खरे. सावधपणा पण एवढा नको की मनातून खूप घाबरत घाबरत खाल्ले जात आहे. तरीसुद्धा साखर वाढलेलीच राहाते.

    दूध हे मधुर रसाचे वर्णन केले आहे. मधुर रसाच्या गुणांचे वर्णन करताना वाग्भटजींनी सूत्रस्थान अध्याय दहामधे, मधुर रस अति सेवन करणाऱ्या मंडळींना सावधपणे प्रमेहाचा धोका असतो, असा उल्लेख पण करून ठेवलेला आहे.

    सद्यो शुक्रकरःपयम् म्हणजे अंतिम धातु (जो शुक्र) उत्पत्ती करणाऱ्या पदार्थात दूध हे सर्व श्रेष्ठ सांगितलेले आहे. उत्तम तर्पक, रसधातुपोषक, वातपित्त कमी करणारे पण कफ दोष वाढवणारे, शीत गुणाचे आणि पचायला जड असते. निरसे दूध, म्हणजे तापवायच्या अगोदरचे दूध पचायला अत्यंत जड असून, अभिष्यंद म्हणजे कफाचा स्राव निर्माण करणारे असते. पण दूध काढल्या काढल्या( म्हणजे धारोष्ण ) घेतल्यास अमृताप्रमाणे असते. पण खूप तापवले असता, पचायला जड होते. (उदा. बासुंदी) हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. अग्निचा संस्कार बदलला की गुण बदलतात. इतर सर्व पदार्थ अग्निने पचायला हलके होतात तर दूध मात्र अग्निच्या संस्काराने जाड होत जाते, परिणामी पचायला जड होते. बासुंदीचे उदाहरण लक्षात ठेवावे. जसजसे दूध तापवत जावे, तसतसे, ते आटते. घट्ट होते. शेवट खवा बनतो, त्यात आणखी साखर घातली तर पेढा ! त्याच्याही पुढे संस्कार करून दुधाची पावडर बनवतात. आणि नंतर चाॅकलेट आणि मिठाया बनतात. म्हणजे हे अंतिम पदार्थ पचायला किती जड होत जातील याची कल्पना करावी. एका चाॅकलेट बारने काय होणार आहे असे म्हणून, एखादे जरी तोंडात टाकले तरी तो सारा ऐवज, लिटरभर दुधाचा असू शकतो.

    पोटावर अत्याचार करणे, म्हणजे यापेक्षा वेगळे काही नाही.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    22.01.2017