(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • आजचा आरोग्य विचार – भाग एकोणीस

    अजून कोणी पाणी वाचवा मोहिमे अंतर्गत कागदच वापरा योजना सुरू करा योजनेची घोषणा केलेली नाही. पण पाश्चात्य देशात मात्र या कागद वाचवा योजनाच चालतात. तिथे जेवल्यानंतर सुद्धा वाटीभर पाण्यात हात बुचकळून कागदाला बोटं पुसायची पद्धत. मग नंतरच काय विचारता ?

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठ्ठावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग तीन !

    निसर्ग कोणासाठी थांबत नाही.
    निसर्गाने निर्माण केलेले प्राणी सहसा आजारी पडत नाहीत. कर्मभोगाप्रमाणे जे आजार होत असतात, ते निसर्गच बरे करत असतो. त्यासाठी वापरायची औषधे ही नैसर्गिकच असावीत.
    कृत्रिम औषधे वापरून कृत्रिम आजार वाढविण्यात येत आहेत, असे म्हटले तरी अतिशोयोक्ती होणार नाही.

    निसर्ग शक्तीमान आहे. निसर्गाचे जसे एक मन आहे, तसेच निसर्गाचा एक आत्माही आहे. परम आत्मा! त्याची काही कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये पण असतील. या सर्वांच्या आधारे निसर्ग आपला गाडा हाकत असतो.

    मनुष्य ही निसर्गाची छोटी प्रतिकृती आहे. जसे निसर्गामधे घडत असते, अगदी तस्सेच शरीरात देखील घडत असते. जसा निसर्गामधे सूर्य तसा शरीरात अग्नि किंवा पित्त, उष्णता. जसा निसर्गामधे चंद्र तसा शरीरात कफ किंवा थंडावा, ओलावा. जसा निसर्गामधे वारा तसा शरीरात वायु, गती, हालचाल, चंचलता.

    जे बदल निसर्गात होत असतात, त्याचा परिणाम थेट शरीरावर होत असतो. बाहेर उष्णता वाढली की शरीरावर घाम यायला सुरवात होते आणि त्वचा ओली ठेवून आतील रक्त आदि थंड ठेवले जातात. साहाजिकच उन्हाळ्यात लघवीला कमी होते.

    याउलट हिवाळ्यात लघवीला जास्ती वेळा जावे लागते, आणि घाम येतच नाही. त्वचेचे, घर्मछिद्रांचे आकुंचन केले जाते. आतील उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी जणुकाही दरवाजे बंद केले जातात.

    हे सर्व बदल कोण करते ? कोण ठरवतं आता आकुंचन आता प्रसरण ? कोण ठरवतं काय खावे प्यावे ? इच्छा कोण निर्माण करतं ? ह्रदय यकृत मेंदूकडून काम करवून घेणारी एक यंत्रणा समांतरपणे काम करीत असते. याचे नियंत्रण कोणाकडे असते ? या प्रश्नांची उत्तरे आजही अर्वाचीन शास्त्राकडे नाहीत.

    उपनिषदे, वेद, पुराणे यामधे याची उत्तरे दडलेली आहेत. याला आपण निसर्ग म्हणू, ईश्वर म्हणू. अशी एक अत्यंत सूक्ष्म शक्ती की, जिच्या सुप्त इच्छेपुढे आपले विचार कस्पटासमान आहेत. या शक्तीचेच विराट रूपातील दर्शन म्हणजे अर्जुनाला झालेले विश्वरूप दर्शन होय !

    म्हणजे मी अर्जुन झालो तर मला सुद्धा असे दर्शन होईल का ? याचे उत्तर हो. असेच येईल. फक्त अर्जुनाचे सर्वच्या सर्व गुण आपल्यात आले पाहिजेत. ती उत्कट भक्ती, ती शक्ती, ती मैत्री, ती भावविभोरता, ती जिज्ञासा, ते वैराग्य, तो कर्मयोग, ते बंधुप्रेम, त्या प्रतिज्ञा, तो संयम, ते शौर्य, ती वीरता, ते चातुर्य, तो संन्यास, सारं काही असलं की भगवंत ( म्हणजे निसर्ग ) अनुकुल होऊन आपल्या सर्व शक्तींनी युक्त होऊन विराट रूप दर्शनासाठी आपल्यासमोर उभे ठाकतात.

    जाणून घेण्याची शक्ती नसली की काही जणांना तो प्रलय वाटतो तर काही जणांना ते तांडव वाटते.
    अक्राळविक्राळ रूपातील नरसिंहाला शांत करण्यासाठीचा, प्रल्हादाचा एक भक्तीकटाक्ष जरी आपल्यात आणता आला तरी निसर्ग आपल्याला अनुकुल होईल आणि निरामय आरोग्य निश्चितच मिळेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.05.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३८

    पाण्याची प्रशंसता भाग तीन

    जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.
    जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.
    जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.

    कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.

    नारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना ! हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे !

    असेच व्यवहारात देखील दिसते.
    जेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.

    पण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.

    मग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी ?
    हे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.

    जेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.

    जे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.

    पाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून ! स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना !

    तीळगुळ घ्या आणि 'तुम्ही' गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. 'मी' बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.
    जर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,
    "तीळगुळ घ्या, 'मी' गोड बोलेन." असं वचन देतोय मी ! कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.01.2017

  • किचन क्लिनीक – पपई

    पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते.

    तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते.

    ह्याचे १०-१२ फूट उंच वृक्ष असतो व ह्या झाडाला फांद्या नसतात.पाने ताडाच्या पानांप्रमाणे छत्राकार,विस्तृत व विभक्त खणांची असतात.फुले हिरवी,पांढरी व एकलिंगी असतात.फळ एक कोष्ट,लंबगोल,कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर असते त्याच्या आत बिया असतात ज्या चाॅकलेटी रंगाच्या व पाणीदार अशा पिकलेल्या फळात तर कच्च्या फळात पांढऱ्या असतात.

    कच्चे फळ हे चवीला तिखट,कडवट असते ते उष्ण असते व कफ वात शामक असून पित्तकर असते.

    तर आता आपण प्रथम कच्च्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)कच्च्या पपईचा चीक गजकर्णावर लावावा फायदा होतो.

    २)मुळव्याधीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक लावल्यास ३ दिवसांनी मोड कमी होतो.

    ३)कच्ची पपई वाटून हातपायांवर बांधून झोपल्यास हातपायांची आग व भेगा कमी होतात.

    ४)कच्च्या पपईचे तुकडे मांस शिजवताना त्यात धालावे म्हटजे मांस लवकर शिजते व सुपाच्य होते.

    ५)कृमींवर मोठ्या माणसांना १ चमचा पपईचा चीक+साखर हे मिश्रण घ्यावे व लहान मुलांना हा चीक १-२ थेंब साखरे सह द्यावा.

    (क्रमश:)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • तेल तुपाचे भूत

    अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कोलेस्टरॉलची मर्यादा पुन्हा नव्यानं ठरवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टसह अन्य नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकन आहारतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी कोलेस्टरॉलच्या चांगल्या-वाईट व्याख्या ज्या ठरवल्या होत्या त्याचाही पुनर्विचार केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी पोषक आहारतज्ज्ञांच्या एका समितीने ‘न्यूट्रिशन आॅफ कर्न्सन’ अर्थात काळजीयुक्त पोषणाची चर्चा गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या संदर्भात केली होती. आणि हा सारा विषय अमेरिकेत सामाजिक स्वास्थ्याच्या चिंतेचा विषय म्हणून गांभीर्यानं चर्चेत आला होता. आता मात्र एक नवी समिती म्हणतेय की धडधाकट प्रौढ व्यक्तींमध्ये कोलेस्टरॉल हा काही चिंतेचा विषय ठरत नाही, त्याचा थेट संबंध लगेच हृदयविकाराशी जोडू नये..ही बातमी अमेरिकेतली असली, तरी या गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या व्याख्यांचा जगभरातल्या माणसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. तेल-तूप खाण्याच्या सवयींवर आणि आहाराच्या पद्धतींवर तर आपल्याकडेही कोलेस्टरॉलची तलवार टांगलेली दिसतेच..या साऱ्याचा कसा विचार करायचा?

    या संदर्भातलीच ही एक विशेष चर्चा..


    कोलेस्टरॉल या शब्दाची केवढी धास्ती अनेकांच्या मनात. तेल-तूप खाताना सतत त्या धास्तीचीच तलवार डोक्यावर. आपल्या आहाराचा विचार असा पाश्चिमात्य पद्धतीनं का करता? त्यांचे चष्मे का वापरता? ते चष्मे बदलले की इकडे लोकांच्या मनातली धास्ती, भीती, भय सारंच बदलतं. आहाराशी खेळ होतो तो वेगळाच.

    आयुर्वेद सांगतो, आपण जिथे राहतो त्या प्रदेशातील धान्य, तेल, फळ इ. नियमित वापरावे. हा युनिव्हर्सल नियम अवलंबावा. आपला पारंपरिक आहार शक्यतो बदलू नये. उत्तर प्रदेशचे भैया कोणते तेल वापरतात? मोहरी / सरसू / राई. कारण त्या थंड हवेला मोहरीसारखे उष्ण तेल आवश्यक आहे. पण मुंबईत राहून मोहरीचे तेल खाल्ले तर पित्त वाढणार. मी मनसे सांगतोय. यात मनसेचा संबंध नाही.

    कोकणातल्या जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या घरात गावठी घरच्या नारळाचे तेल असतेच. एवढी खोबरेलाची मुबलकता आहे. परंपरेने जेवणामध्ये खोबरेल तेल वापरले जात होते. मग रोग का वाढले?

    उत्तम वंगण, उत्तम एनर्जी सोर्स, उत्तम उपलब्धता, उत्तम निर्मितीमूल्य, एवढी संपत्ती असूनही उपभोगशून्यस्वामी कसा बनला? कोणी एवढं विरक्त बनवलं त्याला?

    उत्तर काय असेल?

    आजची औषधनिर्माण व्यवस्था. द्राक्ष -ऊस-साखर यांच्या उत्पादकांप्रमाणे खोबरेल तेलाला कोणी गॉडफादर नाही. प्रत्येकाच्या घरात तयार होणारे खोबरेल जर त्यांनी जेवणामध्ये वापरायचे ठरवले तर इतर तेलांची विक्र ी खूप प्रमाणात घटेल! म्हणजेच तेलसम्राटांच्या लॉबीला धक्का! त्यामुळे सुरू झाली जीवघेणी स्पर्धा! हो, जीवघेणीच. कारण, आरोग्याच्या मुळावरच घाव होता हा! पद्धतशीरपणे खोबरेल तेलाला हृदयरोग आणि कोलेस्टरॉलच्या दहशतीत मारले जातेय. आणि भोग भोगतोय तो सामान्य माणूस!

    जे आरोग्य पूर्वी होतं ते सगळं बंद करून पाश्चात्त्य तज्ज्ञांच्या विचारांना भुलून (घाबरून) स्वत्व गमावलं की काय होतं, ते आता अनुभवता येतंय.

    काहीजण सन्माननीय अपवाद आहेत. काही बालरोगतज्ज्ञदेखील आता अगदी जन्मलेल्या बाळांना खोबरेल तेलाचे काही थेंब किंवा गावठी गायीचे तूप भरवायला सांगत आहेत. आईच्या दुधात असलेले सोडियम मोनोक्लोनीक अ‍ॅसिड हे प्रथीन खोबरेल तेलातही असतं म्हणे! ही जमेची बाजू आहे.

    पाश्चात्त्य कुकरी शोमध्ये सॅलेड्स, भाज्या इ.वर वरून आॅलिव्ह आॅइल घेताना आपण बघतो. म्हणून आपण आॅलिव्ह आॅइल घ्यायचं नाही. कारण आॅलिव्ह आपल्याकडे पिकत नाहीत. अशावेळी आपल्या भागात पिकणारे तेल उपयोगी ठरते. त्यातही खोबरेल तेल. पण हे तेल कच्चे वापरायचे. ही आपली पद्धत आहे. (आपली-तुपली/पाश्चात्त्य-पौर्वात्य हा भेद का? असा व्रात्यपणा मी का करतोय? ‘स्वत्वाची’ जाणीव होण्यासाठी!)

    पण आपण तसं करत नाही. भलतंच करतोय. मग आता काय करायचं? गाडी रिव्हर्स घ्यायची? चुकीच्या रस्त्याने जर गाडी गेली असेल, पुढे वळायला जागाच नसेल तर गाडी मागे घेण्याला पर्याय नसतो.

    आरोग्याची गाडी चुकीच्या रस्त्याने चालली आहे. अगदी १८० अंशात!

    चपलेचा अंगठा तुटला तर चप्पलच बदलून टाका, तसंच गुडघ्यासारखा एखादा अवयव काम करेनासा झाला तर तो दुरुस्त करण्याऐवजी सरळ बदलूनच टाका असं सांगणारी आजची ‘वैद्यकीय’ यंत्रणा. अशा यंत्रणेकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार? आणि गाडी मागे घ्यायला कमीपणा कसला? या मागे जाण्यातच खरंतर पुढे जाणं दडलेलं आहे.

    म्हणून तेलांचा विचार करतानाही तेच. जेवणात पूर्वीसारखे कच्चे गावठी खोबरेल तेल वापरायला सुरुवात करूया. आणि निरोगी राहूया.

    आज डॉक्टर मंडळी कोलेस्टरॉलच्या भीतीने जेवणातील तेल कमी किंवा बंदच करायला सांगतात. वाताच्या चिकित्सेतील सर्वात महत्त्वाचे औषध जर तेल म्हणजे स्नेह आहे आणि तोच जर ‘जेवणातून’ काढून टाकला तर वाताचा कोरडेपणा, रूक्षपणा कधीच कमी होणार नाही. कोरडेपणा, रूक्षपणा, वेदना कमी होण्यासाठी ‘जेवणात स्नेह’ हा हवाच! ‘स्नेह’ जेवणात आणि जीवनातसुद्धा !

    कोणी कोणते तेल वापरावे ?

    आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, जमीन, पाणी इ. आपल्या प्रकृतीला अनुकूल असते. त्या जमिनीमध्ये जे पिकते, उगवते तेच वापरावे.

    जसे कोकणात खोबरेल, शेंगतेल, तीळतेल श्रेष्ठ आहे. कोकणात करडईचे, स्थानिक तेल खावं. जे पिकत नाही ते खाऊ नये.

    तेल शक्यतो कच्चेच वापरावे किंवा फार गरम करू नये (जसे चायनीज बनवताना वाफा येईपर्र्यंत तेल तापवतात. हा दोष आहे.) आपण गरम गरम भाकरीवर, चटणीमध्ये कालवून वा तेल-मीठ-मसाला-भात कालवून घेताना कच्चेच तेल वापरावे. पापड भाजून वरून तेल, मसाला, कांदा, टोमॅटो घालून खाल्ला तरी चालेल.

    तूप

    तूप चवीला गोड नसेल, पण गुणांनी गोड. आणि जे गुणांनी गोड असते ते शुगर वाढवेलच असे नाही.

    तूप हे एकमेव द्रव्य असे आहे जे भूक शिल्लक ठेवून पोषण करते. नाहीतर बाकीचे गोड पदार्थ खाल्ले की भूक कमी होत जाते. तसं तुपाचं होत नाही.

    ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’, ‘तूप खाल्ल्याशिवाय रूप दिसत नाही’ अशा म्हणीदेखील व्यवहारात रूढ आहेत. चांदोमामा चांदोमामा भागलास का, तूप रोटी खाऊन जा.. आठवतंय ना हे बडबडगीत....

    जर तूप वाढले गेले नाही तर चांदोमामासुद्धा जेवत नाही, उपाशीच राहतो. हे शब्दांचे अर्थ समजण्याअगोदर शिकवले जातेय. (पण लिंबोणी, करवंदी, वाडा, चिरेबंदी, तूप, माशी याचे अर्थ कुठे माहीत असतात आता पोरांना?)

    आई-आजी सांगत असे, भाकरी कोरडी खाऊ नये, पोटात दुखतं. लोणी, तूप, तेल काहीतरी लावून खावी ! आधी प्रॅक्टीकल मग थिएरी, हीच भारतीय परंपरा.

    एवढे महत्त्व आपल्या भारतीय परंपरांमध्ये सांगितले गेले असूनदेखील अज्ञानामुळे, अनाभ्यासामुळे, शास्त्र माहीत नसल्यामुळे तुपासारख्या अमृतापासून आपण वंचित राहतोय. समर्थ याला करंटेपणा म्हणतात. आहे पण उपभोगायचे नाही. (लॉटरी लागलीय, पण तिकीट हरवून टाकायचे.) कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवत, तुपासारख्या अमृताला लाथाडून टाकायचे हा करंटेपणाच नव्हे काय?

    घृत म्हणजेच तूप. तूप म्हणजे गायीचेच.

    आणि गाय म्हणजे देशी, गावठी, भारतीय बनावटीचीच ! या भारतीय स्वदेशी वंशाच्या ए 2 दुधाची माहिती सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक गटातून फिरते आहे. तर त्यापुढचा टप्पा तूप. तुपाचे गुण काय वर्णावे?

    भल्याभल्यांना माहीतच नाही, साजूक तूप म्हणजे काय !

    पाच वेळा अग्निसंस्कारित असते हे नाजूक साजूक तूप.

    १. दोहन संस्कार - दूध हातानी पिळून काढले जाते. (यंत्राने नाही. यंत्राने काढलेल्या निरशा दुधाचे तपमान बदलते.)

    २. मंदाग्नीवर तापवणे - दूध जेवढे सावकाश आणि मंद अग्नीवर तापवले जाते, तेवढी साय जास्त जाड येते.

    ३. किण्वन - गोड दुधाचे रूपांतर आंबट दह्यात करणारी प्रक्रि या.

    ४. मंथन संस्कार - दह्याचे लाकडी रवीने, हाताने घुसळून लोणी आणि ताक वेगळे तयार करणारा संस्कार.

    ५. पुन:अग्नी - मंदाग्नीवर लोणी कढवून साजूक तूप करणे.

    अशा पाच अग्निदिव्यातून शुद्ध होऊन बाहेर पडलेल्या साजूक तुपाचे परीक्षण केलेलेच नसावे. अन्य पाश्चात्त्य पद्धतीच्या अतिशीत संस्कारातून तयार झालेल्या बटरने कोलेस्टरॉल का वाढू नये? तेच मिक्सरवर केलेले ताक आणि हाताने दही घुसळून केलेले ताक यांच्या गुणातील फरक किती सांगावेत?

    मी स्वत: एक प्रयोग केलाय. एकाच दिवशी, एकाच वेळी, एकच तपमान असलेल्या दुधाला विरजण लावून दुसऱ्या दिवशी अर्धे दही मिक्सरमध्ये घुसळले. उरलेले दही हातानी रवीच्या साहाय्याने घुसळले. मिक्सरमधील दही एकाच दिशेत, एकाच गतीत फिरले. फक्त चार मिनिटात लोणी ताकावर पसरले. आणि रवीने किमान सतरा ते अठरा मिनिटं घुसळावे लागले. दोन्ही तळहात घासले गेल्याने लालबुंद झाले. आणि लोण्याचा गोळा ताकावर डोलायला लागला. दोन्ही ठिकाणी तयार झालेले लोणी स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यातच बुडवून ठेवले. तासाभराने या लोण्यांचे तूप कढवले. मिक्सर वापरून तयार केलेले तूप झाले बुळबुळीत आणि टिकले फक्त तीन महिने, तर स्वकष्टाने, घाम गाळून, माझे रक्त घुसळवून तयार केलेल्या लोण्याचे तूप तीन वर्षं टिकले. (नंतर खाऊन संपवले.)

    कणीदार, रवाळ, करड्या रंगाची साय असलेले आणि वास तर अजूनही माझ्या नाकात दरवळतो आहे. असे नाजूकपणे केलेले साजूक तूप शंभर वर्षे टिकते, त्याला पुराण घृत म्हणतात. तेच एक हजार वर्षं ठेवले तर प्रपुराण घृत म्हणतात. याचे गुणधर्म वेगवेगळे वर्णन केलेले आहेत.

    स्वत:ला शंभर वर्षे आयुष्य असणारे तूप खाणे बंद करा असे सांगत, एक दिवसाचे आयुष्य असणारी पालेभाजी खायचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांवर आमचा जास्त विश्वास!

    कलियुग. आणि दुसरं काय?

    वापरलेल्या तेलाचे काय करायचे?

    सतत एकाच तेलात तळल्याने, वारंवार गरम केल्याने तेल औषधी गुणांनी संपते. पण युक्तीने वापरल्यास औषधी बनू शकते. हेच कढईतील जळके तेल बाहेरून मालीश करण्यासाठी छान काम करते. माझ्या रुग्णांना कमीत कमी पैशात हे तेल कसे उपलब्ध होते? यासाठी हॉटेलमधील / वडापाव स्टॉलवरील तेल (किंवा घरातील सुद्धा) त्यात थोडा कापूर घालून वापरायला सांगतो.

    काय आहेत फायदे?

    मीठ, मोहरी, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे, आले, हळद, कढीपत्ता इ. औषधी द्रव्यांनी संस्कारित आणि सतत लोखंडी कढईत उकळत असलेले लोहसिद्ध तेल (खरपाकी स्नेह) असते. छान गुण दिसतो त्याचा. आणि इतरांनाही जरा चांगल्या नवीन तेलातील भजी, वडे मिळतात हा अतिरिक्त फायदा.

    खोबरेल तेल

    खोबरेल तेल म्हणजे कोकणातलं अमृत. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे या भौगोलिक परिसराला कोकण म्हणूया. येथील एक महत्त्वाचे पीक म्हणजे नारळ. नारळ वापरल्याशिवाय कोकणी जेवण नव्हे, तर अन्य कोणतीच गोष्ट पूर्ण होणारच नाही. येथील ती परंपराच आहे. मग जेवणात असो किंवा देवाला मानाच्या ठेवायच्या नारळापासून, देवाला प्रसाद, पाहुण्यांची लग्न आदिची आमंत्रणे, ओटी भरणे, लग्नातले अहेर, मानपानापासून अगदी करणी, ओवाळणी, दृष्ट काढणे इ. अनेक कामांसाठी नारळ हा हवाच.

    अमृतफळ अशासाठी म्हणतोय, या कल्पवृक्षात अलौकिक औषधी गुण दडलेले आहेत. केस चांगली वाढ होण्यासाठी, गळणारे केस कमी होण्यासाठी, कोंडा, खरबा इ. कमी होण्यासाठी नित्यनियमाने केसांच्या मुळांना खोबरेल तेलाएवढे चांगले औषध शोधूनही सापडणार नाही. त्यात कापूर पावडर टाकून केसांच्या मुळांना लावले की उवा, लिखांचा नायनाट होतो. शांत झोप येण्यासाठी डोके, तळपाय, डोळे यांना लावावे आणि कानात खोबरेल घालावे. अंघोळीपूर्वी पूर्ण अंगाला तेलाचे अभ्यंग करावे म्हणजे अंघोळीच्या थंड पाण्याने होणारा वातप्रकोप होत नाही.

    हिवाळा, पावसाळ्यात जरा कोमट करून लावावे. उन्हाळ्यात तसेच वापरले तरी चालते. हल्लीच्या मराठी सिरियलमधूनदेखील डोक्याला मायेने खोबरेल तेल लावण्याचे प्रसंग मुद्दाम दाखवले जाताहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.

    तात्पर्य, रोज रात्री डोक्यावर खोबरेल तेल घालावेच. याला शिरोअभ्यंग म्हणतात.

    रोज तेलाचे मालीश करावे असं म्हटलं तर जसं हाताला अत्तर लावतात तेवढंच तेल पूर्ण अंगाला पुरवून पुरवून लावणारी मंडळी आम्ही पाहतो. असे कंजुषी तेल वापरून बलाढ्य वात कमी होण्याची अपेक्षा कशी करता?

    दरवाजाच्या बिजागरातून घर्षणाचा आवाज येत असेल तर तेलाचे काही थेंब सोडले तर आवाज थांबतो. आपले सांधेदेखील या बिजागरांप्रमाणेच काम करतात. त्यांना पण तेल हवे असते. शिवणाच्या मशीनलादेखील त्यातील अवयवांची झीज होऊ नये यासाठी आत तेल सोडण्यासाठी विशिष्ट ठिकाणी छिद्रे ठेवलेली असतात. अशी छिद्रे शरीरालादेखील आहेत. तोंड, कान, नाक, त्वचा, गुदद्वार, मूत्रमार्ग, प्रजनन पथ इ. यातून तेल आत सोडावे. म्हणजे या यंत्राची कार्यक्षमता वाढते. लोखंड गंजू नये म्हणून ‘आॅइलपेंट’ लावतातच ना ! मग शरीर गंजू नये म्हणून तेल लावायला हवेच. इंजिनमधले आॅइल संपू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पाहिले जाते. डोळ्यात तेल घालून पहारा देणे हा वाक्प्रचार आहे हा! यासाठीच अंगाला रोज तेल लावायचा सल्ला खरे आयुर्वेदतज्ज्ञ देतात. अंगाला रोज किमान सात चमचे तेल जिरवावे.

    दोन हात दोन चमचे!!! दोन पाय दोन चमचे

    पोट छाती एक चमचा !!! पाठ कंबर एक चमचा

    डोके आणि कान एक चमचा. याहून अधिक चालेल. पण कमी नको.

    नित्यनियमाने केलेले अभ्यंग म्हणजेच तेल मालीश किती गुणकारी आहे ! भरपूर काम केल्यानंतर आलेला थकवा नाहीसा करणे, अंगावर म्हातारपण दिसू लागणे म्हणजेच त्वचेला सुरकुत्या पडणे, डोळ्यासाठी आरोग्यदायी, डोळे, शरीर तजेलदार दिसणे, शरीरसंघटन मजबूत होणे, चांगली शांत झोप येणे, त्वचेला लकाकी चकाकी दिसणे, जिमसारखं फक्त बाहेरून सिक्सपॅक न होता आतून निरोगी होणे, यासाठी एकच उपाय अभ्यंग आणि अभ्यंगच.

    आज जर्मनी, रशिया इ. बाहेरील अनेक देशांत भारतीय वैद्यक परंपरेतील तेल लावण्यावर संशोधन करावेसे वाटत आहे, ते त्यांच्या पद्धतीने संशोधन करताहेतदेखील!

    पण आमचे वैद्यक तज्ञ्ज्ञ म्हणतात, ‘छे हो, असं तेल लावून काय होणारे ? बाहेरून तेल लावणे म्हणजे वेस्ट आॅफ टाइम, वेस्ट आॅफ मनी आहे.’

    राहून राहून एक आश्चर्य मात्र वाटते की, जर त्वचेला बाहेरून लावून आतमध्ये काही शोषलेच जात नसेल तर आज नव्याने उपलब्ध केलेली वेगवेगळी जेल, आॅईन्टमेंट, क्र ीम्स कशी काम करतात?

    म्हणजे ‘ते’ तज्ज्ञ जे सांगतात ते सर्वच्या सर्व बरोबर आणि आयुर्वेदाच्या परंपरेतील वैद्य हजारो वर्षांपासून जे सांगतात ते म्हणजे कालबाह्य काय?

    नारळ

    कोकणात प्रत्येक जेवणात नारळ असतोच. कोकणातले आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तांदुळ! जिथे जिथे तांदुळ वापरला जातो तिथे तिथे नारळही वापरला जातो. आता हेच बघा ना! तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आत सारण नारळाचे! घावने केले कि ओल्या नारळाची चटणी आणि नारळाचा रस! आंबोळ्या केल्या की ऊसळीचे वाटण नारळाशिवाय पूर्ण होणारच नाही. शेवया केल्या की नारळाचा रस हवाच!

    तांदळाची गरम गरम भाकरी आणि सुक्या नारळाची चिंच गुळ घातलेली लसणाची चटणी. क्या बात है!

    तांदळापासून बनवलेल्या पोह्यांवरसुध्दा नारळ. दडपेपोहे नारळाशिवाय कधी होतील का? आणि रात्रीचा शिळा भात, त्यावर घातलेले कच्चे खोबरेल, त्यात भर म्हणून वर नुकत्याच फोडलेल्या ओल्या नारळाचे खोवलेले खोबरे आणि मीठ मसाला व्वाह!

    या चवीपुढे बिर्याणी गेली उडत.

    तांदळाच्या पीठाच्या कढीपत्ता आणि लसूण घालून केलेली ऊकड. ती एका बोटाने खायची आणि या उकडीवर कच्चे खोबरेल कधी घेऊन बघितलंय? पाची बोटांनी खावीशी वाटते!

    ओटी भरताना देखील नारळ आणि तांदुळ जणु काही एकत्रच खेळत असतात.

    एवढे सख्य आजपर्यंत अन्य कोणत्याही पदार्थांमधे दिसलेले नाही. पोटात गेल्यावर एकमेकांना पचवून टाकतात ना! म्हणून एवढे सख्य !!!

    असे अनेक पदार्थ ग्रंथात वर्णन केले आहेत, ज्यांना आजच्या भाषेत एकमेकांचे एण्टीडोट म्हटले तरी चालेल. जसे गरम गरम भातावर डाळीचे वरण, या वरणावर साजूक तूप- त्यावर ताजे कापलेले लिंबू, त्यावर चिमूटभर भुरभुरवलेले मीठ हे पदार्थ एकमेकांचे पचन करण्यास मदत करणारे आहेत.

    -- वैद्य सुविनय दामले.

    कुडाळ सिंधुदुर्ग.

    सखी पुरवणी दै. लोकमत दि. 1 मे 2017 मधे आलेला लेख.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सेहेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1

    हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.

    या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे.
    कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात.
    त्यातील काही गोष्टींचा आपण विचार जरूर करूया, जे आपण दैनंदिन जीवनामधे आचरणात आणत असतो. ते शोधण्यासाठी काही गोष्टींचा परत अभ्यास करूया.

    आपण जे जे काही देवासाठी म्हणून करत असतो, ते खरं तर आपल्यासाठीच, आपल्या आरोग्यासाठीच असते. हा नियम ग्रंथोक्त (म्हणजे ग्रंथात वर्णन केलेला ) नाही. पण काही प्रथा कशा निर्माण झाल्या असतील, याचा घेतलेला हा मागोवा आहे. यात काही चुकत असल्यास जरूर सांगावे.

    जसे देवपूजा करणे, देवपूजेसाठी काही उपचार केले जातात. पंचोपचार, षोडशोपचार इ.इ. यांचा काही विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असणार आहेच, पण आरोग्याच्य दृष्टीने काही छुपे, गर्भित अर्थ आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करूया. जे नास्तिक आहेत, त्यांना या कर्मकांडामागील विचार पटला तर पटला.

    केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ते हरये नमः श्रीकृष्णाय नमः पर्यंत ही चौवीस नावे घेतली जातात. ही नावे घेतली असताना ईश्वर प्रणिधान हे एक कर्म असते. नामस्मरण हा महत्त्वाचा हेतू असतो. हे नामस्मरण करत असताना भटजी एक पळीभर पाणी प्यायला सांगतात. याचा अर्थ काय आहे ?

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा विचार पटला की उत्तर मिळत जाईल.

    देवपूजेची सुरवात या मंत्रानी होते. तेव्हा हे मंत्र म्हणताना घसा सुका असतो. हे मंत्र केवळ भटजींनी म्हणायचे नसतात, तर यजमानांनी सुद्धा म्हणायचे असतात. हे मंत्रोच्चार उच्चार करत असताना, त्यांच्या उच्चारांनी शरीरात एक उर्जा तयार होत असते. तसे या उच्चारामुळे आरोग्य देखील मिळते, असे मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीमधे लिहिलेले आहे.

    या मंत्राच्या स्पंदनांचा, त्यातून वाढलेल्या उर्जेचा, त्याचा घशाला त्रास होऊ नये, हा एक हेतु. एकुण चौवीस वेळा ही नावे उच्चारली जातात. सत्यनारायणाची तर एक हजार नावे सांगितलेली आहेत. ही नावे कालानुरूप, कार्यानुरूप, गुणवाचक, काही कर्मवाचक आहेत. नावे ( मग त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, आकाशातला बाप म्हणा नाहीतर अन्य काही,) नावे कितीही असली तरी तो एकच आहे. हे त्यातून समजून घ्यायचे असते.

    यातील पहिली तीन नावे म्हणत असतानाच एकेक पळी पाणी प्यायला सांगितले जाते. एकेक पळीच का ? तिथे एकेक ग्लास किंवा एकेक पंचपात्री भरून का सांगितले नाही.

    जे पाणी तहान नसताना प्यायचे असते, ते पळीभरच प्यायचे असते. केवळ घसा ओला होण्यापुरते ! नाहीतर हे अतिरिक्त पाणी अग्निमांद्य निर्माण करणारे ठरेल, हा आयुर्वेदातील दृष्टीकोन देखील इथे परत एकदा सिद्ध होतो.
    ............. हरये नमः श्रीकृष्णाय नमः !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    26.05.2017

  • आहारातील बदल भाग ४२ – चवदार आहार -भाग ३

    आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे.

    पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच.

    भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत.
    एकेकाळी भारत हाच सर्व जगाला मसाले पुरवित होता. भारताचा इतर देशात असलेला व्यापार हा मसाल्याच्या पदार्थामुळे दरवळत होता. काही परदेशी नागरीकांना तर भारतातील मसाले देणारी झाडं ही जादूची झाडं वाटंत.

    काय कमाल आहे ना ईश्वराची, एकाच जमिनीमधे आंबट चिंचेचे झाड, तुरट सुपारीचे झाड, या हलणाऱ्या डुलणाऱ्या सुपारीच्या झाडाला, जणुकाही ते वाऱ्याने पडू नये म्हणून, घट्ट बिलगून राहिलेली तिखी मिरीची वेल. या पोफळीच्या सावलीत, मातीला अगदी कुशीत वाढणारी मंद वासाची वेलची, कळीरूपातच वापरली जाणारी लवंगाची मध्यम आकाराची झाडे, तर काहीसे मोठे होणारे आणि एकाच झाडाच्या सालीतून मिळणारी दालचिनी आणि पानातून मिळणारे तमालपत्रे, असे दोन वेगळे फ्लेवर देणारे दालचिनीचे झाड. फळ फोडून आतला सुवास देणारे जायफळ, आणि भूगर्भातच तयार होणारी काहीशी कडवट चवीची पिवळी धम्मक हळद,

    हे सर्व वेगवेगळ्या वासाचे, वेगवेगळ्या रंगाचे, चवीचे पदार्थ, एकाच पाण्यावर पोसले जातात. पण, कडु तिखट आणि तुरट ( कटु तिक्त कषाय ) या वेगवेगळ्या औषधी गुणांनी भरलेले
    (असतात. (एकही मसाला, मधुर अम्ल लवण रसाचा नाही.)
    माती, पाणी, सूर्यप्रकाश हवा एकच असते, पण विविधता किती दिसते. खरंच गाॅड इज ग्रेट !

    या लोणच्यात हिंगासारखे काही पाश्चात्य मसालेपण येऊन बसलेत. पण या विविधतेला एका बरणीत सामावून घेणारे हे भारतीय लोणचे.

    हळद, मेथी, हिंग, मीठ, मिरची, मोहोरी, तेल हा मुख्य मसाला, काही फोडींना लावला की झाले लोणचे तयार. पण ते टिकाऊ होण्यासाठी, बाहेरचा जंतुसंसर्ग टाळला जावा, यासाठी सर्व फोडी बुडतील एवढे तेल आणि त्यांना सर्व बाजूनी दाबून टाकणारा एक गोल दगड, आणि चिनी मातीच्या, फिरकीच्या झाकणाच्या बरणीत दादरा बांधून, आमच्या देवघरात वर ठेवलेली लोणच्याची बरणी, माझ्या अजूनही लक्षात आहे.

    हे लोणचे त्यातील या वेगवेगळ्या मसाल्यामुळे एवढे औषधी बनले आहे, की ते औषध म्हणूनच पानात वाढून घ्यावे, एवढेच त्याचे प्रमाण. डाव्या बाजुचा पदार्थ तिथेच रहावा, तो उजव्या बाजूला आला की साईडइफेक्ट सुरू.

    मग ते लोणचे कैरीचे असूदेत नाहीतर लिंबू मिरचीचे. नाहीतर गाजरा कारल्याचे ! औषधी गुण जवळपास तेच. फोडींनुसार बदलणारे. पण मसाला तोच.

    काही लक्षात येतंय का ?

    हा सर्व मसाला म्हणजे मधुमेहावरील औषधांचे मिश्रणच आहे. आणि फोडी जर आवळ्याच्या किंवा ओल्या हळदीच्या असतील तर ???

    जैसे घी मे शक्कर.

    इन दोनोंका आजके जमाने मे दिखनेवाला साईड इफेक्ट, याने कोलेस्टेरॉल और डायबेटीस.
    दोनों के उपर काम करनेवाली एकही दवा !
    पिकल, लोणचे, अचार माझ्या पानात हवा.!!

    पण....
    हे अचार बाजारी नको. आणि आचारी सुद्धा !
    बाजारी लोणच्यात चार दोष दिसतात.
    एक कृत्रिम रंग, दोन हानीकारक प्रिझर्वेटीव, तीन सरकीचे तेल, आणि चार, व्हिनीगर मधे बुडवून ठेवलेल्या फोडी. हे दोष टाळण्यासाठी आणि औषधी फायदे मिळवण्यासाठी उपाय एकच,
    हे लोणचे घरीच घातलेले हवे. आईच्या किंवा आज्जीच्या हातचे.

    पण घरात वेळ मोडून करणार कोण ?
    इथेच तर लोणच्याचा लोच्या आहे ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    03.11.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा

    विज्ञान शाप की वरदान-भाग तीन

    यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
    शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.

    अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.

    या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.

    एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.

    औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.

    एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
    एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.

    एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.

    एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.

    पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......

    या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.05.2017

  • आयसोटोप स्कॅन (न्युक्लिअर मेडिसिन)

    या तपासात पेशंटच्या शिरेमधून किरणोत्सर्गी पदार्थ (अथवा आयसोटोप) इंजेक्ट केला जातो. तो विविध इंद्रियांमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन्स एमिट करतो व कॉम्प्युटर या फोटॉन्सची इमेज बनवतो.

  • विडा घ्या हो नारायणा – भाग १०

    धार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे.