(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३४

    निषेधार्ह पाणी भाग दोन

    नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
    पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
    ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।

    वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्....पाण्याचा अतिरेक टाळा.
    यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी "न" ने केली होती. या श्लोकाची सुरवात पण "न" ने केली आहे.

    या उल्लेखित रोगांनी जे अशक्त झालेले रोगी आहेत, त्यांनी पाणी टाळावे.

    अशक्त होण्याचे कारण यांची चयापचय प्रक्रिया बिघडलेली असते. शरीरातील दोषांच्या तरतम भावाने निर्माण झालेली रोगाची अवस्था, समान करण्यासाठी शरीर देखील काही तरी प्रयत्न (compensation) करीत असते.

    सर्व रोग होण्यामागे मन्द झालेला अग्नी हेच कारण असते. अग्नी मंद झाला की, पाचनकर्म बिघडते. खाल्लेल्या अन्नाचे शरीराला अपेक्षित असलेले रूपांतरण, जे अग्निमहाराज करत असतात, ते बिघडते. पाचन बिघडले की, अन्नाचे पुढील शोषण पोषण बिघडते.

    मोठ्या टोपात भात शिजवायचा असेल तर गॅस बारीक असून चालणार नाही. बर्नर मोठाच हवा तरच तांदुळ शिजतील, नाहीतर टोपात जे काही तयार होईल, त्याला भात असे म्हणता येणार नाही.

    एक सुभाषित आठवतेय का, विद्येविना मति गेली....
    तसं आहे, हे सर्व अनर्थ एका अग्निने केले. ज्या अग्निचा पाणी हा शत्रू आहे. म्हणून पाणी कमी (गरजेपुरतेच) प्यावे.असं वाग्भटजी सांगताहेत.

    कोणताही रोग व्हायला लागला कि शरीर खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाची चव बिघडवून टाकते. चव बिघडली की, पाणी पण बेचव लागते. आणि खाण्या पिण्याची इच्छाच नाहीशी होते. शरीर जे सांगतेय, ते दीर्घकालीन विचार केला तर नेहेमी फायद्याचेच असते.

    वाहातुक पोलीस शिटी मारून, बोलावून कसे सांगतो,
    "पुढे अपघात झाला आहे. तातडीचे काम सुरू झाले आहे. इथून पुढे वाहाने नेऊ नका.अगदी स्कूटी सुद्धा जाणार नाही. जरा त्रास झाला तरी चालेल, पण आपली गाडी या मार्गाने नेऊ नका. वळवा. आणि परत मागे न्या. वाटलं तर दूरच्या पर्यायी मार्गाने जा"
    तसं पोटात जेव्हा गडबड सुरू झालेली असते, तेव्हा "त्याचा" इंद्रियरूपी ट्रॅफिक अंमलदार मनामार्फत आतून सूचना देतो, "आतमधे किरकोळ दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोणालाही, कोणत्याही कारणासाठी आत पाठवू नका. अगदी पाण्याला सुद्धा ! उगाच त्रास करू नका, त्रास देऊ नका. उगाच जबरदस्ती करू नका. थांबा थोडी विश्रांती घ्या.आणि द्या."

    शरीराची ही अवस्था लंघन करण्याची असते. ही विशिष्ट अवस्था ओळखता यायला हवी. यावेळी फक्त जिभेवर संयम ठेवता यायला हवा. की पुढचे सगळं ट्रॅफीक जाम टाळता येते. नाहीतर टाळक्याला ताप होतो.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

  • याला जीवन ऐसे नाव अंतिम भाग ४०

    पाण्याचा सारांश

    पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
    तहान असेल तेवढेच प्यावे.

    तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
    काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.

    सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
    पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.

    पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.

    पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.

    अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?

    अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.

    प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.

    तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.

    सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
    संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
    मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.

    ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.

    पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.

    फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !

    आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.

    सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
    भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.

    पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.01.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – मेथी

    ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे.

    अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच हि चवीला कडू तुरट आणि थंड असते,त्यामुळे शरीरातील पित्त व कफ कमी करते.

    हिचे देखील घरगुती उपचारांमध्ये बरेच उपयोग आहेत बरं का!चला तर मग आता ते पहायचे ना?

    १)ज्या मंडळींना शौचास साफ होत नाही त्यांनी मेथीची भाजी जेवणात घ्यावी.

    २)गळवांवर हिच्या पानांचा लेप लावावा म्हणजे वेदना व सूज कमी होते.

    ३)संडासला आव पडत असल्यास ५ चमचे पानांचा रस खडीसाखर घालून घ्यावा.

    ४)वारंवार लघ्वीला होत असल्यास १/४ कप मेथी पाल्यांचा रस+१/२ चमचा कात+३ चमचे खडीसाखर हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.

    ५)डोक्यात कोंडा झाल्यास आंघोळी पुर्वी पाच मिनिटे केसांच्या मुळांना मेथीच्या पानांचा रस लावावा व नंतर साबण न वापरता केस धुवावेत.केस मऊ व चमकदार होतात.

    ६)चेहरा तेलकट होत असल्यास मेथीच्या पाल्याचा लेप चेह-यांवर लावून १/२ तास ठेवावे व कोमट पाण्याने धुवावे.

    मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ व वारंवार होऊ शकते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आजचा आरोग्य विचार – भाग दोन

    हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले.

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १३

    घुसळण्याची' प्रक्रिया महत्वाची. दही 'घुसळण्याच्या' प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते.

    या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो.
    जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप धावले की पाय गरम होतात, विचार खूप झाले तर डोस्कंही गरम होते, वृक्ष एकमेकांना घासले की प्रत्यक्ष वडवानलच तयार होतो. घर्षणाचा अग्निशी अगदी जवळचा संबंध असतो, हे तर आपण व्यवहारातही बघतो.

    हा अग्निच रूपांतरणाची प्रक्रिया घडवण्यासाठीचे मुख्य कारण आहे. जेवढा अग्नी जास्ती, तेवढे रूपांतरण जास्ती.

    रूपांतरण म्हणजे बदल. किंवा आपण असेही म्हणू शकतो, की जिथे जिथे बदल होतो तिथे तिथे अग्निचे कार्य सुरू असते. बदल म्हणजे अग्नी.

    तांदुळ आणि पाणी एकत्र करून बदल होत नाही, तर त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचे रूपांतर भातामधे होते, नाहीतर एकतर मऊभात अन्यथा खरपूस खमंग !

    कुठेही गेलात तरी अग्नीचे कार्य लक्षात घ्यावेच लागते.
    हा अग्नी प्रमेहामधे विचारात घ्यावा लागतो. क्लेद कमी करण्यामधे अग्नी महत्वाचा. म्हणजे प्रमेहाचा मुख्य शत्रु जो क्लेद, तो नष्ट करणारा अग्नी, हा प्रमेहाचा शत्रू ठरतो. प्रमेहाचा शत्रू तो आपला मित्र !

    दही घुसळण्याच्या प्रक्रियेत अशीच अप्रत्यक्ष उर्जा तयार होते.
    आता दही घुसळणे कसे करतो यावर त्यातील क्लेदाचे रूपांतरण होणे अवलंबून आहे. ही युक्ती आहे.
    हाताने लाकडी रविने दही घुसळणे, ताकमेढीला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने उलटसुलट रवि घुमवणे, आणि मिक्सरमधून दही फिरवणे, आणि चमच्याने दही ढवळणे, या कृतीवर तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता ठरत असते. चमच्याने दही कालवण्यामुळे केवळ त्यातील वायु बाहेर पडेल, त्याची वडी मोडेल, एवढेच काम होईल, पण 'क्लेद' कमी होणार नाही. क्लेद कमी होण्यासाठी आणखी उष्णतेची गरज असते.

    हो. हो. हो. दही गरम करता येईल का असं अजिबात मनातही आणू नका. ओहोऽऽऽ.
    दही गरम करायचे नाही. कधीही नाही. अगदी पंजाबी ग्रेव्हीमधे पण नाही.

    कोणत्याही गोष्टीत इन्स्टंट, शाॅर्टकट उपयोगी नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेळ जाणं अपेक्षित असते, तेवढा वेळ देणं अपेक्षितच असते. नाहीतर एक वर्षाच्या पोरग्यानं बाबांचा शर्ट घातला आणि बूटात पाय घातले तरी तो 'बाप' होत नाही ना !

    तसंच दह्याचंही आहे. त्याचे रूपांतर ताकात करताना काही काळ जाणं अपेक्षित असतं. सावकाश आणि सतत घुसळणं,
    हो, हातानं रवीनं घुसळणं वेगळं, रवी दोरीला बांधून घुसळणे वेगळे, मिक्सरमधून फिरवण्याची तऱ्हा वेगळीच ! आणि लस्सी करणं वेगळं. प्रत्येकावर होणारी अग्नीची प्रक्रिया वेगळी !
    इथं प्रत्येकाचं वेगळेपण वेगळं....
    त्याचंच नाव आयुर्वेद !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.01.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    शास्त्रकारांनी निरोगी राहण्यासाठी कसं वागायचं हे सांगितले. व्यवहारात देखील आपले आईवडील आपल्याला काही उपदेशपर गोष्टी सांगत असतात. ते हितोपदेश म्हणजे आरोग्याचा बटवा असतो.

    मुलीला आई चार गोष्टी दररोज सुनावत असते.
    "अस्सं वाग, अस्स कर. अस्स करू नकोस, तू ना, आमची अगदी इज्जतच काढणार आहेस." वगैरे वगैरे.
    आणि मुलींनाच जास्त ओरडा खावा लागतो. तेव्हा आई हा प्राणी तिचा जगातला एक नंबरचा शत्रू असतो.
    " तू सारखं सारखं तेच तेच तेच तेच सांगत राहू नकोस, झाली कटकट सुरू, तू मला सांगतेस, त्या दाद्याला का सांगत नाहीस, सगळ्या चुका काय माझ्याच असतात काय,"
    आणि हे भांडण शेवटी...
    " मी मुलगी आहे, म्हणून काहीही ऐकून घ्यायचं काय ? "
    या वाक्यावर येऊन थांबत असतं.
    प्रत्येक घरात अगदी हे असंच चाललेलं असतं.

    हे खरं पण आहे. "मुलीवर लग्नानंतर लक्ष ठेवण्यासाठी तिथे मी नसणार, मुलाचं काही चुकलं, तर जे काही होईल, ते माझ्या डोळ्यासमोर होईल. मुलगी म्हणजे परक्याचं धन वगैरे, मी माझ्या मुलाला कधीही बदलवू शकते" अशा सरासर खोट्या आणि भ्रामक विश्वातून आई कधीच बाहेर येत नाही.

    आणि नंतर जे व्हायचं तेच होतं. जी आई कधीकाळी शत्रू नंबर वन होती, मुलीला ती लग्नानंतर मात्र सद्गुणांचा पुतळा वगैरे भासू लागते. ( मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण जे अवतीभवती दिसतं ते सांगतोय, एवढंच. )

    सांगायचंय काय तर,
    लग्नानंतर मुलीला, आईनं केलेले हितोपदेश आठवू लागतात.
    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईची सुरू असलेली बडबड आठवून डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागतात.

    मनात म्हटलं जातं,
    "तू त्यावेळी सांगितले होतेस,
    तेव्हा मला तुझा राग येत होता,
    जीवाचा अगदी त्रागा होत होता.

    तू सांगायचीस,

    उतू नये मातू नये,
    घेतला वसा कधी टाकू नये.

    एकमेकांचे उष्टे खाऊ नये.
    घटाघट पाणी पिऊ नये.
    उगाच आरश्यात पाहू नये.
    केसांना हात लावू नये.
    पदार्थ उघडा ठेऊ नये.
    दुधावर फुंकर घालू नये.
    पिंपात तांब्या बुडवू नये.
    पातेलं खरडून वाढू नये.
    ताटाच्या बाहेर सांडू नये.
    पंगतीत ढेकर देऊ नये.
    मधेच पंगतीतून उठू नये.
    शिरा ताणून बोलू नये.
    उगाच वाद ओढवू नये.
    शब्दाने शब्द वाढवू नये.
    उंबऱ्याच्या मर्यादा विसरू नये.
    माहेरचे कौतुक सांगू नये.
    कुणाचे वर्म काढू नये.
    वर्मावर बोट ठेऊ नये.
    मोठ्यांचा मान मोडू नये
    लहानाशी खेळणं सोडू नये
    दुसऱ्याचे दोष पाहू नये
    दिलेले दान कळू नये.
    धर्मशाळेत जेवू नये.
    अंथरूणातून सूर्य पाहू नये.
    गादीवर जास्त लोळू नये.
    आळस मोठ्ठा देऊ नये.
    तोंडाचा आऽ करू नये.
    पाय पसरून बसू नये.
    पाचकळ बाचकळ बोलू नये.
    फिदीफिदी उगा हसू नये
    भोकाड मोठे पसरू नये.
    हट्टीपणा बरा नव्हे.
    फुकाचे बोल बोलू नये.
    कर्मकांड टाकू नये.
    प्रयत्न कधी सोडू नये.
    मनात विकल्प आणू नये.
    भूतकाळा आठवू नये.
    भविष्याचा विचार करू नये.
    वर्तमानाशिवाय राहू नये.

    विसरू नये देवाला
    विसरू नये कर्माला
    विसरू नये संस्काराला
    विसरू नये राष्ट्राला

    पण आता हे पटायला लागलंय,
    तू सांगत होतीस, ते बरोबर असं आता वाटायला लागलंय.
    तू मला तेव्हापासून बडवत होतीस,
    ताईला नाही तर एका आईला घडवत होतीस.

    तुझा एकेक शब्द आता मला आठवू लागलाय.
    माझ्या मुलीच्या कानात तो रोज जाऊ लागलाय.

    माझ्या मुलीबरोबर तेच भांडण मी करायला लागलीय.
    तुझ्या नातीला आता मी तेच सांगायला लागलीय.

    अगदी तुझा ठेका मला जमायला लागलाय.
    'ह्यांना' सुद्धा तो जाणवायला लागलाय.

    तू सांगितलेला प्रत्येक शब्द काळजात रुतून बसलाय.
    आता माझ्या जीभेतून बाहेर येऊ लागलाय.

    हितोपदेश तुझा आता आठवू लागलाय
    मला "आई" बनवू लागलाय.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०८.०८.२०१७

  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – घेवडा

    दत्तगुरूंची हि आवडीची भाजी म्हणून हिचा उल्लेख गुरुचरित्रात देखील आढळते.तसेच गुरुचरित्र वाचनाचे उद्यापन करतात तेव्हा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य केला जातो.अशी हि भाजी ब-याच जणांना आवडत असली तरी फारशी खाल्ली जात नाही त्यामुळे थोडी उपेक्षितच म्हणावी लागेल.

    हि भाजी फार चविष्ट लागते.तशी चवीला तुरट गोड व थंड असून हि शरीरात वात दोष वाढविते व कफ व पित्त दोष कमी करते.

    चला हिचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)घसा बसणे कोरडा खोकला ह्यात घेवड्याच्या शेंगांचा रस मध व ज्येष्ठमध घालून प्यायला द्यावा.

    २)घेवड्याच्या शेंगांचे सूप करून सर्दी,घसादुखणे अशा तक्रारींमध्ये मिरपुड घालून प्यावा फायदा होतो.

    ३)आजारपणातुन उठल्यावर तोंडाला रुची नसल्यास घेवड्याची भाजी फुल्क्यांसह खावी.

    ४)पायदुखणे,गुडघे दुखी,पाय मुरगळणे ह्यात घेवड्याचा पाला व सुंठ एकत्र वाटून गरम करून लेप लावावा.

    घेवडा अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटफुगते व गॅसेसचा त्रास होतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • याला जीवन ऐसे नाव भाग ६

    वेगान् न धारयेत
    न प्रवृत्तयेत
    वेगांचे धारण करू नये अगर मुद्दाम प्रवर्तन करू नये.
    म्हणजे शास्त्रकार असे सांगतात की, शरीराकडून आतून जे सांगितले जाईल तेवढे त्या वेळी करावेच. आणि जर केले नाही तर त्रास होणार हे शंभर टक्के सत्य आहे.

    तहान, भूक, उलटी, संडास, लघवी इ. असे एकुण तेरा वेग आहेत, ज्यामधे त्याला विसरून चालत नाही.

    जसे, उलटी होते, शिंक येते, लघवी होते, ही शरीराच्या चांगल्यासाठीच असते. पण उलटी होत नसताना उगाच सुके ओकांबे काढणे म्हणजे निव्वळ दमछाक करून घेणे आहे.

    शिंक आल्यावर जरूर शिंकावे. पण उगाचच टा. पा. (टाईमपास) म्हणून नाकात काड्या घालतात, ते नाकाला हुळहुळ निर्माण करण्यापलीकडे काही करत नाही.

    तशीच तहान लागणे आणि पाणी पिणे हे करावेच. तसेच तहान लागली नसताना पाणी पिणे म्हणजे किडनींची निव्वळ दमछाक होते. जेव्हा शरीराला पाण्याची गरज लागेल तेव्हा, शरीर तहान हे लक्षण निर्माण करतेच. तहान कळलीच नाही तर घश्याला कोरड पडेल, लघवीला पिवळसर होईल, लालसर होईल, जळजळ होईल, अर्थात अशावेळी सुद्धा साधे पाणी पिऊ नये तर, धने जिरे घालून उकळलेले पाणी थोडे थोडे घोटघोट प्यावे.

    तहान लागणे आणि सारखी तहान लागणे, यातील सूक्ष्म फरक समजला पाहिजे. मधुमेहासारख्या आजारात जी वारंवार तहान लागते ती, रोग स्वरूपात असते. ती पाणी पिऊनदेखील थांबत नाही, भागत नाही, अशावेळी तो वेग नसून रोग आहे असे समजावे. ( ज्यावेळी पाणी पिऊन त्याचे समाधान होते, त्यावेळी तो शरीराकडून निर्माण झालेला वेग असतो. आणि तहान लागून पाणी पिऊनही जेव्हा त्याचे समाधान होत नाही, असे जेव्हा तोआपल्याला सांगतो, तेव्हा "आता वैद्याला दाखवून घ्या" असे तो, आपल्याला सूचित करतो. हे समजले पाहिजे.)

    जसे कफ झाला असता उलटी होणे वेगळे आणि रोग म्हणून उलटी होणे वेगळे आणि तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वमन म्हणजे पंचकर्मातील उलट्या करवणे वेगळे !

    यातील फरक, पुस्तक वाचून किंवा वाॅटसप मेसेज वाचून कळणार नाही. याकरीता पूर्वीचा आपला स्वतःचा किंवा तज्ञ वैद्याचा अनुभव महत्वाचा आहे.

    हे सर्व करवून घेणारा तो असतो.

    दैनंदिन दिनचर्येतील त्याचे महत्व, त्याचे अस्तित्व, त्याचा आपल्याशी होणारा सुसंवाद,
    हे समजून घेणाऱ्याला, नक्कीच समजून येईल. हे जो समजून घेईल, त्याला दुःख कधीच होणार नाही.
    कारण तो म्हणजे फक्त सत् चित् आनंद !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    13.12.2016

  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग १

    अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात.
    झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ?
    मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा शब्दच मुळात केलेला नाही. म्हणजे वनस्पतींना खातोय म्हणजे जीवहत्या वगैरे काही नाही. अखिल मानवजातीला योग्य पूरक अशी रचना निसर्गाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही.

    आता आणखी एक लघुशंका.. प्रण्यांपासून मिळते म्हणून, दूध पण मांसाहारी म्हणे.
    वाद घालायचेच ठरवले तर अश्या शंका ठीक आहेत. पण मुळात मांसाहारी या शब्दामधेच त्याची मर्यादा स्पष्ट होते. ज्यामधे मांस आणि त्यातील रक्त असते, तसेच ते मांस ज्याला चिकटलेले असते ते हाड, किंवा अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे झाल्यास आयुर्वेदात जे धातु म्हणून वर्णन केले आहेत, तत्या रक्तापासून पुढील धातुंचे सेवन करणे म्हणजे मांसाहार ! असा ढोबळ विस्तार करता येईल. यात दूध येत नाही. पण अंडी येतात.
    असो.

    व्याख्यांच्या मर्यादेच्या जाळ्यात न अडकता, आपण माणसासाठी, आयुष्य वाढण्यासाठी, वाढलेलं आयुष्य संपूर्ण पणे निरोगी निरौषधी जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघतोय ना? मग निरर्थक वादात कशाला शिरा ?

    तुटे वाद संवाद तो हितकारी....

    आयुर्वेदात हितकर आणि अहितकर या शब्दाचा खूप विस्तृतपणे अर्थ टीकाकारांनी सांगितला आहे.
    आयुर्वेदाच्या उपयोगितेचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात,

    हिताहितम् सुखं दुःखम् ।
    आयुस्तस्य हिताहितम्
    मानंच्च तच्च यत्रोक्तं,
    आयुर्वेद स उच्चते।।

    अखिल मानवजातीला योग्य काय अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय, सुखकर काय दुःखकर काय, या सर्वांची चर्चा किंवा अभ्यास, विचार ज्या शास्त्रात केला जातो, त्यालाच आयुर्वेद म्हणतात.

    पशु खातात केवळ पोट भरण्यासाठी
    मूर्ख खातात केवळ चव वाढण्यासाठी
    संत खातात साधना करण्यासाठी
    आणि बुद्धिमान खातात,
    शक्ती, आयु, आरोग्य मिळवण्यासाठी...

    आपण जो आहार खातो, त्याचा आपले आचार विचार, चिंतन, मनन, व्यवहार, स्वभाव, यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. म्हणूनच जैसे अन्न तैसे मन असे म्हटले जाते.

    शरीराचे स्वतःचे एक अर्थशास्त्र असते. अत्यंत आवश्यक असेल त्याची पूर्तता पहिल्यांदा केली जाते. त्यानंतर कमी महत्वाच्या गोष्टींकडे शरीर लक्ष देते.

    जसे अत्यंत गरीब व्यक्तीला प्रथम पोट भरण्यासाठी अन्न हवे असते. मग कपडे, घर, मनोरंजन, स्वादिष्ट भोजन वगैरे. शरीराच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावरच मनाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. मन संतुष्ट झाल्यानंतरच आत्मा प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.

    शरीराच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेनंतर ऊरलेली उर्जा, मनाच्या संतुष्टीसाठी वापरली जाते. त्यातून शिल्लक असलेल्या उर्जेतून आत्म्याच्या गरजांकडे लक्ष दिले जाते, ज्यांची साधना, उपासना, आराधना योग्य असेल त्यांना या आत्म उर्जेचा लाभ मिळतो. तेव्हाच तो ध्यान समाधी यावर लक्ष केंद्रित करू शकतो.

    म्हणजेच ही उर्जा मिळवण्याची सुरवात ही आहारापासून आहे. म्हणून हा आहार जेवढा सात्विक असेल तसे चित्तावरचे संस्कार शुद्ध होत जातात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    16.10.2016

  • आहारातील बदल भाग ५२ – चवदार आहार -भाग १३

    पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात.

    उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल.

    फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात प्रथम मोहोरी तडतवणे महत्वाचे असते. मोहोरीनंतर नंबर येतो हिंग किंवा मिरच्यांचा ! गरम तेलात हिंग फुलतो आणि शुद्ध होतो. हिंग वापरताना शक्यतो खडा हिंग आणावा. म्हणजे भेसळ कमी मिळते. आणून तो तूरडाळीमधे ठेवला तर डाळीला वास पण छान येतो आणि टिकते देखील.
    सध्या पतंजलीचा हिंग चांगला आहे.

    फोडणी करून झाली की त्यात
    जी भिजवलेली कडधान्ये आहेत, ती घालावीत म्हणजे तेलाचा तडका आणि भडका कमी होतो नंतर हळद, उसळीचा मसाला, मिरचीपूड इ. घालावी, म्हणजे त्यातील औषधी गुण टिकून रहातील. नंतर थोडेसे परतून मग पाणी घालून शिजवावे.

    यातील मसाले हे भूक निर्माण करतात, पचन घडवून आणतात किंवा वासाने सुद्धा पाचक स्राव वाढवतात. तिखट मिरची पूड नको असल्यास, आले, मिरी या मसाल्याचा वापर करावा.

    पदार्थ शिजून झाला कि नंतर त्यात मीठ घालावे म्हणजे कमी पुरते. आणि उडून जात नाही.

    युक्ती वापरून मसाल्याचा तीक्ष्ण उष्ण तिखट गुण कमी जास्त करावा. यासाठी प्रदेशानुसार नारळ किंवा शेंगदाणे कूट वापरावे.

    कोणताही अन्नपदार्थ शिजवताना, त्यावर झाकण ठेवू नये, त्याला सूर्य, चंद्र, वारा, यापैकी कोणाचातरी स्पर्श व्हावा, असे विधान आहे. आणि पदार्थ शिजत असताना त्यातील काही घटक उडून जाणे देखील अपेक्षित असते. झाकण ठेवले तर आतील अन्नाला गरजेपेक्षा जास्त उष्णता लागते आणि जीवनसत्व नष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते. झाकण ठेवून शिजवले असता, इंधन वाचेल पण पदार्थ अपेक्षेपेक्षा जास्ती लवकर शिजतो. आणि गडबड होते.

    अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वयात येणे धोकेदायकच असते ना !!!

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    13.11.2016