मुळ्याची भाजी आवडीने खाणारे लोक तसे कमीच आढळतात.आपण भाजी करताना पाल्यासोबत मुळा देखील वापरतो.पंजबी डिश मुलीके पर्राठे जाम फेमस आहे बुवा पण मला अजुनही तो खायचा योग आला नाही,मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची लिंबू पिळून केलेली कोशिंबीर देखील सुरेख लागते बरं का.
तर असा हा मुळ्याचा पाला आपण भाजी करायला तर वापरतोच पण ह्याचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते ही पाहणे गरजेचे आहे.
मुळ्याचे झुडूप असते व मुळा जो पांढरा असतो जमिनीखाली उगवतो तर पाल्याला उगवणा-या शेंगामध्ये बिया असतात.मुळ्याचा पाला हा कडू,खारट व गोड अशा मिश्र चवीचा असमतोल तो शरिरातील कफ आणी वात दोष कमी करतो.
आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)लघ्वीला कमी व बुळबुळीत होत असेल तर मुळ्याच्या पाल्याचा रस १/४ कप सकाळी अनशापोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावा.
२)छोटा मुतखडा असल्यास मुळ्याच्या पाल्याचा रस १/२ कप + १ चमचा धणे पुड नियमीत ६ महिने घ्यावे तो खडी विरघळतो.
३)शौचास काळपट पांढरे होणे,भुक न लागणे,अंग जड होणे अशा तक्रारी मध्ये १/४ कप मुळ्याच्या पानांचा रस+१/४चमचा कळी मिरीपूड रोज दिवसातून ४ वेळेस काही दिवस घ्यावी.
४)संडासला साफ होत नसेल तर मुळ्याच्या पाल्याची भाजी नियमीत जेवणात असावी.
५)वारंवार सर्दी खोकला होत असल्यास २ चमचे मुळ्याच्या पाल्याचा रस+२ चिमूट मिरपुड+ १/४ चमचा मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस काहि दिवस घ्यावे.
मुळ्याचा पाला खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास व वारंवार संडासला होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गणपती आणि कार्तिकेयाची गोष्ट सर्वानाच माहिती आहे. फक्त आठवण करून देतो. सर्वात मोठी प्रदक्षिणा कार्तिकेयाने आपल्या शक्तीने प्रत्यक्ष घातली होती. संपूर्ण पृथ्वीला बाहेरून प्रदक्षिणा ! आणि बुद्धीमान गणेशाने प्रदक्षिणा घातली होती, आपल्या मातापित्यांनाच. आणि मोदकावर आपला हक्क सांगितला होता.
मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!
काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.
स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !
असो.
एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.
मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर "होय" असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.
मी "थांबवू" शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.
हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.
जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.
जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.
मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.
आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.
आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.
पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.
( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !
मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.
शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.
पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.
या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची "पिळवणूक" होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.
अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.
भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही.....
एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.
म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.
आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.
आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !
भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.
हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.
गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?
हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
बघा विचार करून..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 3
संकल्प केल्याशिवाय कोणत्याही कामाची सिद्धी नाही. आपण अमुक पूजा का करीत आहोत, याचा संकल्प प्रथम करावा लागतो. जसे, श्री सत्यनारायणाची पूजा करताना मी सत्याने वागेन, सत्याचाच स्विकार करेन, सत्याचीच साथ करेन, सत्य कधीही सोडणार नाही, नेहेमीच माझे धोरण, संभाषण सत्याचेच असेल. ( कारण सत्य बोललेले कधीही लक्षात ठेवावे लागत नाही.) पण संकल्प केल्याप्रमाणे आचरण आपण ठेवले नाही. सत्य बाजूलाच जाईल आणि पूजा हे फक्त कर्मकांड होईल. असे होऊ नये. यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो.
कोणत्याही पूजेतील संकल्प लक्षात घेतला की, त्यातील स्वार्थ परमार्थ लक्षात येईल.
"अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्यः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं, द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च कल्पोक्त फलाप्त्यर्थं अमुक देवताप्रीत्यर्थं यथा मिलितोपचारद्रव्यैः षोडशोपचार पूजां अहं कर्म करिष्ये ।"
या संकल्पामधे "आयु आणि आरोग्य" असे दोन शब्द दिसताहेत.
आरोग्य कोणाचे ?
समस्त कुटुंबाचे, सर्व परिवाराचे, एवढेच नव्हे तर घरातील द्विपद म्हणजे पोपटासारखे पाळीव प्राणी, चतुष्पद म्हणजे चार पायाचे प्राणी, जसे, गाय बैल, म्हैशी, वासरे यांचे क्षेम असावे, या सर्वांचे आयुष्य आणि आरोग्य वृद्धींगत व्हावे, यासाठी मी जे द्रव्य उपलब्ध आहे त्यातून ही सोळा उपचारांची पूजा करीत आहे.
केवढा विशाल दृष्टीकोन आहे या संकल्पामागे ! आणि मागायचेच आहे तर त्यात कंजुषी कशाला? आणि देणारा समर्थ असेल तर फक्त स्वतःपुरते कशाला मागायचे ? सर्वांसाठी सगळेच मागायचे !
माऊलींनी पण पसायदानातून मागणे मागताना, विश्वाच्या कल्याणासाठी, जो जे वांछील तो ते लाहो, असंच भरगच्च मागितलं आहे.
देनेवाला छप्पर फाड के देने के लिए बैठा है तो दुबळी (फाटकी ) माझी झोळी घेऊन का जावे ?
मागताना लाजू नये, आणि देताना माजू नये असे म्हणतात. एक दिवस देणाऱ्याचे (देते ) हात व्हावे. प्रत्येक वेळी मागतच रहायला हवे असे नाही. कधीतरी "देणारा" देखील व्हावं. त्यातला आनंद आणखीनच वेगळा !
आनंद मिळण्यासाठी थोडे कष्ट, थोडी कर्मकांडे देखील करावेच लागतात ना !
अहो, एटीएम मधून आपलीच रक्कम मिळायला सुद्धा थोडा वेळ लागतोच ना, थोडी वाट पहावी लागतेच. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच ! थोडा इंतजार तो करना पडेगा . काही वेळा पासवर्ड चुकतो, काहीवेळा मशीन बंद असते, काहीवेळा चुकीची रक्कम टाकली जाते, काही वेळा खात्यामधे पुरेशी रक्कम नसते, तर काही वेळा सर्व गणित जुळवून देखील उत्तर चुकीचे येते.
त्याची कृपा होण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागते. तो कृपाघन कृपा करणारच, असा भाव ठेवला तर अपेक्षित फळ मिळणार हे नक्कीच.
औषधे देखील पोटात जाऊन, हवा तिथे अपेक्षित गुण दिसायला थोडा वेळ लागतोच ना, तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.05.2017
आता पुढील गट आहे तैल बियांचा.ह्या गटात ज्या घटकांपासून तेल काढले जाते अशा द्रव्यांचा समावेश केलेला आहे.
तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान असलेल्या तीळा बद्दल माहिती पाहूया.
तीळ चवीला गोड,तुरट,तिखट,कडू असून तीळ उष्ण असतात.ते स्निग्ध,पचायला जड असून वातनाशक व कफ पित्त वाढविंणारे असतात.
तीळ हे दातांना बळकट करतात,बाळंतीण स्त्रीचे दुध वाढवतात व शुक्रवर्धक,बुद्धिवर्धक,केसांचे व हाडांची बळकटी वाढविणारे असतात.
आता तीळापासून तयार केल्या जाणाऱ्या व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)चिक्की,तीळगुळ,तिळाचे लाडू:
चवीलागोड,पचायलाजड,स्निग्ध,बल्य,
बुद्धिवर्धक,वातनाशक,पित्तनाशक,कफकर,उष्ण,धातुपोषक आहे.
२)तिळाची चटणी:
तिखट,गोड,स्निग्ध,पचायलाजड,बलकारक,
उष्ण,भुक वाढविणारी,रूचकर,पाचक,जखम भरायला मदत करणारे,पित्तकर,वात कफनाशक,लघ्वीचे प्रमाण कमी करणारी,मल बांधून ठेवणारी आहे.
३)गुळपोळी:
चवीला गोड,तुरट,पचायला जड,वात पित्तनाशक,
कफकर,स्निग्ध,बाळंतीणीचे दुध वाढविणारी,शुक्रधातू वाढविणारी,बुद्धि व कांती वाढविणारी आहे.
४)तिळ तेल:
चवीला गोड,तुरट,कडू,उष्ण,वातकफनाशक,पित्तकर,मेदकमी करायला सहाय्यक,केस व दातांना हितकर,
बलकारक,जड,त्वचेची कांती वाढविते.
तिळ अति मात्रेत सेवन केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पाण्याचा सारांश
पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
तहान असेल तेवढेच प्यावे.
तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.
सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.
पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.
पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.
अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?
अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.
प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.
तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.
सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.
ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.
पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.
फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !
आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.
सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.
पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.01.2017
नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोनी मंडल काढले जाते. पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पानाच्या पत्रावळी वापरल्या जात असत.
जेवायला सुरवात केल्यावर पान हलू नये, यासाठी कदाचित हे पाण्याचे मंडल असेल.
जमिनीवर असलेले सूक्ष्म जीवजंतु ताटाखालून वर येऊ नयेत म्हणून पानाखाली पाण्याचे मंडल. जणु काही मिनी सारवणे
आता सारवणे म्हणजे काय असा प्रश्न पुढची पिढी विचारेल.
गाईचे शेण पाण्यात कालवून, हाताने जमिनीवर एक कोटींग करणे, अशी काहीतरी व्याख्या करावी लागेल. गेले ते दिवस......
जमिन गेली सारवणे गेले, त्याजागी फरशी आणि टेबलखुर्ची आली, पण फरशीवरचे आणि ताटाखालचे जीवजंतु मात्र तसेच आहेत. काही वर्षांनी पाश्चात्य जेव्हा सांगतील please spray or sprinkle sterile water under your dish, before starting your food......
तशी एखादी शुद्ध नलोदकाची स्र्पे बाॅटल ऑनलाईन विकत मिळेल, मग आम्हाला त्याचे महत्व लक्षात येईल.
जमिन असो वा टेबल फरशी
पत्रावळ असो वा बोनचायना डिशी
ताटाखाली पाणी फिरवशी
जीवजंतुना दूर ढकलशी.
(बोनचायनावरून आठवले, जनावरांच्या हाडांपासून बनवतात, असे ऐकले होते....?)
एकदा जेवायला सुरवात केली की पान हलवायचे नाही, हा नियम होता. पानावरून आपणही हलायचे नाही, म्हणजे उठायचे नाही, असाही शिरस्ता होता.
आजकाल फिरतफिरत, ताट मांडीवर घेत, नवीन पदार्थ घेण्यासाठी आपले ताट शेजारी जेवणार्याच्या ताटावरून उचलणे, इ.इ. जेवणाचे सर्व मोबाईल प्रकार आठवले, म्हणून लिहिले. आपल्या उष्ट्या हातावरील, ताटातील जीवजंतु, आपण सर्वत्र पसरवतोय हे लक्षातच येत नाही.
(भाऊ, उष्टे म्हणजे काय हो ? )
जेवताना जेवढे सोवळे रहाता येईल तेवढे सोवळे रहावे. मुद्दामच सोवळेअसा शब्दप्रयोग केला, तो शब्द रूढार्थाने समजायला सोपा आहे.
नैवेद्य सोवळ्यातच वाढावा. आणि जंतुसंसर्ग टाळावा.
सोवळे म्हणजे धूतवस्त्र. स्वच्छ धुतलेले कपडे घालून जेवावे, जेवणापूर्वी हात पाय धुवावेत, हे स्वच्छतेचे साधा सोपा नियम कालबाह्य ठरू लागला आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.
स्वच्छतेचा हा नियम लक्षात घेऊन,
सोवळ्यावर विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी आहे, सोवळे हा काही आम्ही पाळायचा प्रांत नाही, असे म्हणून सोडून देणार काय ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
12.09.2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आळस मोठ्ठा देऊ नये
"आलस्यंही मनुष्याणां महारिपु" सर्वात मोठा शत्रू आळस आहे. कारण तो दिसत नाही. जो आपल्या आतमधेच आहे तो बाहेरून कसा दिसणार ? हाच मधुमेहाचा सर्वात फास्ट फ्रेंड आहे.
आपण कुठे कुठे आणि कधी आळशी होतो, ते एकदा तपासून पहावे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या यंत्रांनी आपल्याला एवढे आळशी बनवले आहे, हे कधी लक्षातही आले नाही. स्कूटरच्या जमान्यात गाडीला कीक मारून ती स्टार्ट करणे हा मोठाच व्यायाम होता. त्यात ती बजाजची स्कूटर सुरू असली तर वेगळ्या व्यायामाची गरजच नव्हती. कारण बजाज स्कूटर सकाळी सुरू करणे हे सगळा आळस घालवायचे मस्त साधन होते. तिला अगदी जमिनीवर आडवी पडून पुनः उभी केल्याशिवाय सुरुच होत नव्हती. तसंही करून सुरू झाली नाही तर चढावावर उलटी ढकलत न्यायची, आणि उतारावरून सेकंड गियर मधे गडगडत सोडून द्यायची. आणि गाडी सुरू झाल्याचा सगळ्यात जास्ती आनंद, ती ढकलण्यात घामाघूम होईपर्यंत, मदत करणाऱ्याला व्हायचा. (म्हणजे ढकलण्याऱ्याच्या कॅलरीज जाळायला देखील बजाज किती मदत करीत होते ना ! केवढा व्यायाम व्हायचा ? आता हा व्यायाम देखील संपला.
एक बटन दाबले की चक्क गाडी सुरू होते.
एक बटन दाबले की घरात विहीरीचे पाणी येते.
एक बटन दाबले की धान्याचे चक्क पीठ होते.
एक बटन दाबले की देवाकडे दिवा पण लागतो आणि
एक बटन दाबले तर चटणी वाटून तयार.
एक बटन दाबले की ताकावर लोणी पसरते.
एक बटन दाबले की कणिक तिंबून मिळते.
एक बटन दाबले की मेसेज सेंड.
एक बटन दाबले की पैसे ट्रान्स्फर
आणि एवढे श्रम वाचवून उरलेला वेळ जिममधे खर्च करायचा, त्यासाठी परत पैसे मोजायचे.
पूर्वी दहा रूपये वाचवण्यासाठी दहा मिनीटे चालायचे श्रम घेतले जायचे. एक स्टाॅप अगोदर उतरायचे. आता दहा मिनिटे वाचविण्यासाठी दहाच काय शंभर रूपये सुद्धा खर्च करायची तयारी !
किती बदललो ना आपण ?
कधी बदलत गेलो कळलं देखील नाही.
आळस द्यायचाच नाही का ? द्यावा.
चारचौघात आळस दिला की आई ओरडणारच.
तोंडाचा आऽ करू नको असंही आई म्हणायची. तोंडात माशी जाईल असंही सांगायची.
आळस द्यायचाच झाला तर तोंडावर हात ठेवून आळस द्यावा. जांभई द्यावी. आपल्या तोंडातील सर्व जीवजंतु आपल्याच तोंडातील दुर्गंधीसह बाहेर पसरतात. जशी जांभई तशीच ढेकर, तशीच शिंक. शिंकेचा वेग तर जबरदस्त असतो. तो हाॅर्स पाॅवरमधे देखील मोजला जातो. एवढ्या जोरात खोकलो, शिंकलो तर केवढा जंतुसंसर्ग आपण करत असतो ना !
तसं जांभई देणं ही शरीराकडून निर्माण होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आयुर्वेदानुसार एक वेग आहे. आणि वेगाचा अवरोध कधी करू नये हा नियम. वेग निर्माण झाला की पूर्तता करायचीच. म्हणजे जांभई आली तर ती द्यायचीच. पण तोंडावर हात, रुमाल ठेवून द्यावी. अगदी पाश्चात्य पद्धतीने साॅरी असे देखील म्हणावे.
पण मोठ्ठा आऽऽ करून सर्वांसमक्ष आपले किडक्या बत्तीशी दातांचे समग्र दर्शन बाहेरच्या विश्वाला कशाला द्यायचे ना ?
एक तो कान्हा होता, ज्याने मुखकमल उघडल्यावर यशोदेला विश्वरूप दर्शन झाले होते. ......
आपण "तो" कान्हा नाही एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
हिला नओळखणारी व्यक्ती भारतात तरी सापडणे नाही.आपण हाॅटेल मध्ये गेलो जेवून आटपले की बिल देताना (कदाचित त्याची चुटचुट लागू नये म्हणून असेल)प्रत्येक हाॅटेल मध्ये मुखशुध्दी करिता सुंदर प्लेट मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात (भाजून,साखरेचे रंगीत कवच असणारा,सुवासिक इ)हिला समोर ठेवले जाते.
तर अशी हि सुंदर सुवासीक बडीशेप गरम मसाला बनवताना त्यात देखील वापरली जातेच.शिवाय मुखशुध्दीकरीता देखील उपयुक्त आहेच.तसेच ब-याच घरांमधून काढा बनवताना त्यात देखील हिचा उपयोग केला जातो.त्यामूळे हिचे देखील घरचा वैद्य म्हणून उपयोग ब-याच जणांना माहीत असणार हे नक्की.
बडीशेपेचे लहान क्षूप असते आणी त्याला उगवणारी फळे म्हणजे बडीशेप होय.ह्याची चव गोड,कडू,तिखट अशी मिश्र स्वरूपाची असते.आणी हि गुणाने थंड असते.म्हणूनच ती शरीरातील वात आणी पित्त दोष कमी करते.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:
१)सुज आली असता बडीशेपेचा पोटीस सूज आलेल्या ठिकाणी बांधावा सूज उतरते.
२)वारंवार खोकला येत असल्यास बडीशेप चुर्ण खडीसाखरे सोबत मिसळून खावे आराम पडतो.
३)संडासला आव पडत असल्यास सुंठ व बडीशेप समप्रमाणात घ्यावी व तूपात भाजावी आणी बारीक पूड करून दिवसातून तीन वेळा गरम पाण्यासोबत घ्यावी त्वरित आराम मिळतो.
४)उल्टया होत असल्यास बडीशेप चूर्ण मोरावळयाच्या पाकासोबत चाटावे.
५)लघ्वीला जळजळ होत असेल तर बडीशेपेचा काढा करून घ्यावा.
६)पोटात वारंवार जंत होण्याची सवय असेल व त्यामुळे त्रास होत असेल तर बडीशेप चुर्ण मधात मिसळून सकाळी व रात्री रिकाम्या पोटी घ्यावे .
बडीशेप जास्त खाल्ल्यास संडासला साफ होणार नाही तसेच बडीशेप अतीप्रमाणात खाणा-या व्यकतींच्या शरीरातील धातूंना क्षीणता येते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।
Copyright © 2025 | Marathisrushti