(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • विडा घ्या हो नारायणा – भाग ४

    पान जरूर खावे. आजचा तंबाखू सोडला तर पान हे व्यसन नक्कीच नाही. त्यातील घटक किती प्रमाणात असावेत अशी काही लिखित संहिता नाही. जसं आजकाल सांगितले जाते, दररोज तांदुळ अमुक ग्रॅम, अमुक ग्रॅम वजनाची भाजी भाकरी, एवढे मिली आमटी, एवढी मिग्रॅम चटणी. वगैरे. आपल्या इथे प्रत्येकाचे नियम वेगळे…..

  • आहारातील बदल भाग ३

    कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.

    समर्थ म्हणतात,
    पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
    उगाच ठेवी जो दूषण
    तो दुरात्मा दुराभिमान
    मत्सरे करी ।।

    आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.

    जसे काम तसे तसा आहार.
    कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
    लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
    " तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",

    तर तो म्हणेल,
    "काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.

    आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
    केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.

    म्हणजे
    काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
    रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
    ऊन्हात काम आहे की एसी मधे.
    ऊद्याची चिंता आहे की नाही.
    शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
    परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
    गरज म्हणून की हौस म्हणून.
    जीभेसाठी की पोटासाठी.
    जीवासाठी की जातीसाठी.
    हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
    मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
    या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
    विचार वेगळा करावा लागेल. लागतो.

    इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.

    मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
    माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    24.09.2016

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग बारा

    केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.

    म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
    भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !

    थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.

    हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.

    त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.

    आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.

    तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
    त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
    यालाच म्हणतात,
    चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
    भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
    माझे काही चुकलंय का ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.02.2017

  • विडा घ्या हो नारायणा – भाग ५ 

    चुन्याबरोबर सहजपणे मिसळला जाणारा आणि आपला रंग चुन्याला देणारा कात हे आयुर्वेदातील एक अप्रतिम “लाईफसेव्हींग ड्रग” आहे. खैराच्या झाडाच्या जून सालींचा काढा करून खैराच्याच लाकडाने ढवळत त्या काढ्याचा केलेला खवा म्हणजे कात होय. पूर्णतः नैसर्गिक. उत्तम रक्तस्तंभक. रक्तशुद्धी करणारा. अनेक त्वचारोगांवर वापरला जाणारा हा कात.

  • वदनी कवल भाग १

    वदनी कवल घेता
    नाम घ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते
    नाम घेता फुकाचे
    जीवन करी जिवित्वा
    अन्न हे पूर्ण ब्रह्म
    उदर भरण होणे
    जाणिजे यज्ञकर्म

    हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया.

    मुखी घास घेता करावा विचार.
    कशासाठी हे अन्न मी सेवणार
    घडो माझे हाती नित्य देशसेवा
    म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा

    असा परिवर्तित श्लोक देखील म्हटला जातो. हे श्लोक सामुहीकरीत्या म्हटले जातात.
    समुहाने किंवा एकत्रितरीत्या हे श्लोक म्हणण्याचा एक वेगळा अर्थ अपेक्षित आहे.

    आपण सारे एक आहोत,
    सहनाववतु सहनौ भुनक्तु
    यामधे देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे.
    एकत्र बसून भोजन करणे, हे एकमेकांची शक्ती वाढवणारे आहे.

    आजकालच्या प्रथेनुसार एकत्र जरी आलो तरी, बसून भोजन काही होत नाही. ते यथाकालोद्भव उभ्याउभ्याच होते. डाव्या हाताने कधीही वाढू नये, वाढून घेऊपण नये. पण डाव्या हाताने घेतल्याशिवाय बुफेभोजन होतच नाही. याकरीता, ( फार फार वर्षा) पूर्वी (सौ.) अन्नपूर्णा सर्वांना वाढून नंतरच आपण जेवायला बसत असे. जे काही हवे ते एकदाच घेऊन नंतरच ती जेवत असे. वाढपी लोकांची संगत हीच तिची पंगत. पण तिच्या चेहर्‍यावर इतरांना वाढण्याचे समाधान झळकत असे.

    सर्व पदार्थ वाढून पूर्ण झाल्यावर, अन्नशुद्धी वाढली जाई.
    अन्नशुद्धी म्हणजे लोणकढे तूप.
    हे तूप (आडव्या चमच्याने) वाढून झाले की, आता आणखी पदार्थ ताटात येणे शिल्लक नाही, असा जणुकाही इशाराच जेवणार्‍यांना मिळत असे.
    म्हणजे अन्नशुद्धी वाढून होईपर्यंत, समोर वाढलेल्या ताटाला हातही लावायचा नाही. असा अलिखित नियमच होता त्यावेळी.

    कोशींबीर वाढून होईपर्यंत लोणचे संपलेले, भाजी येईपर्यंत कोशींबीर संपवलेली. याला सहभोजन म्हणत नाहीत.

    आता पंगतही कालबाह्य झाली आहे.

    एका ओळीत मांडलेली केळीची हिरवीगार पाने, त्यावर रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं आणि गच्च भरलेलं ताट, उदबत्यांचा सुवास,
    एका सुरात, एका तालात म्हटलेले श्लोक, हा सर्व माहोल पाहून आधीच अग्निनारायण अवतीर्ण झालेले असत. आणि वाट बघत बसलेले असत फक्त गजराची !

    जय जऽय रघुवीर समर्थ ऽऽऽ
    हरऽऽहर महाऽऽदेव

    आणि नंतर आक्रमणाला जी सुरवात होई, ती अग्निनारायणाने अगदी तथास्तु म्हणेपर्यंत.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    04.09.2016

  • किचन क्लिनीक – नारळ भाग ३

    आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात:

    १)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.

    २)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे.

    ३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात.

    ४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात कोकम,मिरची,लसूण,मीठ घालून सोलकढी करतात जेवणानंतर शेवटी भातात मिसळून खाता ही पाचक असते.

    ५)ओले खोबरे व गुळ हे मिश्रण बल व बुद्धीवर्धक आहे.

    ६)किसलेले खोबरे व खोबरेल तेल एकत्र शिजवून त्याचा पोटीस हा सुज व मार लागलेल्या जागी बांधला असता वेदना कमी होतात.

    ७)ओल्या नारळाचा रस व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण लघ्वी कमी होत असल्यास प्यावे ह्याने लघ्वी सुटायला मदत होते.

    ८)नारळाचे पाणी १ लिटर भर घ्यावे व काकवी सारखे होई पर्यंत आटवावे मग त्यात जायफळ,सुंठ,मिरी,वेलची,जायपत्री ह्यांची पुड घालून बाटलीत भरून ठेवावे हे मिश्रण पोटदुखी किंवा पोटात आग होत असल्यास १० मिली दिवसातून २ वेळेस सकाळ संध्याकाळी २ आठवडे घ्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • विडा घ्या हो नारायणा – भाग ३

    पान खाण्याचा एक विशिष्ट नखरा आहे. “पान लावणे” ही एक खास कला आहे. दर्दी खवैय्याला यातील नजाकत बरोब्बर समजते. आपल्याला हवी असलेली, किंचित पिवळसर झाक असलेली दोन पाने चंचीतून निवडून, हलकेच झटकून सफाईदारपणे पुसत, नखानी त्याचे टोक आणि त्याचा हिरवा देठ खुडुन, दातांनी एकदाच त्याचा चावा घेत देठ टाकून द्यावा. नखांनी पानावरच्या शिरा हलकेच काढाव्यात. या शिरा काढताना पानाला भोक पडता नये, एवढे सराईत झाल्याशिवाय चारचौघात पान खायला सुरवात करू नये. नाहीतर त्याएवढा लाजीरवाणा प्रसंग दुसरा नाही.

  • याला जीवन ऐसे नाव भाग २

    आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला जन्मापासूनच त्याची सर्व माहिती असते. त्यामुळे निदान करायला किंवा अपथ्य, चिकित्सा सांगायला सोपे होते.

    मी असं सांगतो, एकच नियम पाळावा, की (वैश्विक नियम सोडून) कोणताच नियम पाळू नये. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सली अॅक्सेप्टेड. जगन्मान्य !

    आपण आता सर्वसामान्य जगन्मान्य नियम काय असतात ते पाहू.

    1. पाणी कधी प्यावे ?
    तहान लागेल तेव्हा. गरज असेल तेव्हा.
    2. पाणी किती प्यावे ?
    तहान भागेपर्यंत. गरजेपुरते.

    याला म्हणतात, वैश्विक नियम. जगात कुठेही जा. हाच नियम पाळायचा. म्हणजे कोणताही शास्त्राधार शोधण्याची आवश्यकताच पडणार नाही.

    एवढे साधे प्रश्न आणि एवढी साधी उत्तरे असताना, आपण नियम करून खूप गोंधळ निर्माण करून ठेवतो. जे सोप्पं आहे ते, अवघड करून सांगितले, तरच ते शास्त्र आणि ते जाणणारा कोणीतरी मोठ्ठा विद्वान वगैरे वाटतं. असं काही जणांना वाटतं म्हणून जरा अघळपघळ करून सांगितले तर ऐकणाऱ्यालाही जरा बरे वाटते ना !

    ताप आहे असं सांगण्याऐवजी पायरेक्झिया ऑफ अननोन ओरीजीन, वगैरे भाषेत सांगितले तर रूग्णालापण आपणाला कोणता तरी मस्त मोठा आजार झालाय असे वाटते. मग नंतर बिल भरताना फार कटकट वाटत नाही. असो.

    पाणी पिण्याचे हे दोन नियम मोडले नाहीत, तर पाण्यापासून होणारे रोग निकाली निघतील. (आणि हे एवढ्या पटकन, समजले तर ही लेखमाला पण लवकर बंद होईल.)

    याला शास्त्राधार काय ? असंही कोणाच्या तरी मनात येईल. त्यालाही उत्तर देतो.

    ही गरज कोण ठरवणार ?
    तहान लागली की नाही, हे कसं समजणार ?

    सोप्प आहे.

    यासाठी त्याला काही काळ गृहीत धरावा लागेल. उत्तर मिळेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतर वाटलं तर विसरून जायचं. गणितामध्ये नाही का आपण एक्स गृहीत धरंत. तसं. एक्सचं उत्तर मिळालं, की त्याला विसरून जायचं.

    आपली तहान भूक, झोप, ढेकर,जांभई, अश्रु, मलमूत्र विसर्जन इ. क्रियांची जाणीव आपणाला कोण करून देतो ? जर त्याने ही जाणीव करून दिली नसतीच तर ? म्हणजे तो आतून काहीतरी सांगतोय, हे असं कर. हे तू असं केलंस तर बरं वाटेल, वगैरे.
    कोण आहे तो?

    तोच तो निर्गुण निराकार...... आत्मा !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    09.12.2016

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

    आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.

    यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.

    मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.

    नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.

    रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.

    मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.

    आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.

    हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.

    जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.

    प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.

    निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
    याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.

    अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
    .....आणि वैद्यांनी सुद्धा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.02.2017

  • किचन क्लिनीक – भेंडी

    सर्वांच्याच आवडीची हि भाजी सुकीभाजी म्हणूनका,भरली भेंडी म्हणा,आमटी,तळलेले भेंडी,भरली भेंडी,आपण गोव्यात करतो ते भेंडीचे खतखते हे सर्वच प्रकार अगदी रूचकर लागतात ह्या भाजीचे.

    जसा हिचा उपयोग आपण स्वयंपाकात करतो तसाच उपयोग घरगुती उपचारात देखील करू शकतो.

    ह्या भेंडीचे तीन हात उंच झाड असते व त्याला हि फळे लागतात. भेंडी चवीला तुरट,आंबट,गोड अशा मिश्र चवीची असतात व उष्ण असतात.त्यामुळे हि वात व पित्त दोष कमी करतात व कफ वाढवितात.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)शरीराची आग होत असल्यास तीन भेंडी ३ ग्लास पाण्यात उकळून ३/४ ग्लास उरवावा व त्यात २ चमचे खडीसाखर व १/४ चमचा सैंधव घालून हे पाणी जेवणा सोबत थोडे थोडे प्यावे.

    २)अति चालून हातपायांची आग होणे व ते दुखणे ह्यात २०० ग्राम भेंडी फोडुन १/२ लिटर पाण्यात भिजत घाला व दोन तासांनी सदर पाण्यात कपडा भिजवा व दुखणी-या भागांवर गुंडाळा.

    ३)चेह-याची त्वचा रूक्ष झाली असल्यास दोन कोवळ्या भेंड्याबारीक वाटा व त्याचा लेप चेह-यांवर लावा व १५ मिनीटांनी तो लेप कोमट पाण्याने धुवा.

    ४)गळवे पिकण्यासाठी भेंडी व हळद एकत्र वाटून पोटीस बांधावा.

    ५)सांधेदुखी व सांध्यामधून करकर आवाज येत असल्यास २ भेंडी कापून २ तप पाण्यात उकळावी व ते पाणी दररोज प्यावे.

    अतिमात्रेत भेंडी खाल्ल्यास पुष्कळ जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४