वाग्भट सूत्र स्थान 5 मधे ग्रंथकार असे म्हणतात, आकाशातून थेट खाली येणारे पाणी हे सर्वोत्तम. याला गांगेय जल, ऐंद्र जल, अंतरीक्ष जल किंवा दिव्य जल असे म्हणतात.
जमिनीतून पण पाणी वर येते, जसे विहिरीतून येणारे. याला भूमीतून येते म्हणून भूमीज किंवा भौमजल म्हणतात.
या दोन्ही प्रकारच्या पाण्याला कोणतीही विशिष्ट चव नसते, रंग नसतो, वास नसतो, पण तरीही ते जीवनदान देणारे आहे, म्हणून त्याला जीवन म्हटले आहे.
बाह्यरूपावर एखाद्याचे गुणमुल्य ठरत नसते, त्याच्या उपयोगितेवर त्याची किंमत ठरत असते. हे आत्महत्या करू इच्छिणाऱ्या मंडळींनी जरा लक्षात घ्यावे. जर असे विचार येत असतील तर झरा, नदी, धबधबा, समुद्र, तलाव, कारंजा यांच्याजवळ जावे. काठावर शांत बसावे, पाण्याचे उडणारे तुषार अंगावर झेलावेत, मनसोक्त पाण्याशी खेळावे, आणि मनातली सारी जळमटं धुवुन टाकावीत.
"मी हा असा, मला काही जमत नाही, माझ्यात काहीही गुण नाहीत, माझी इथे आवश्यकता नाही, माझी कोणाला गरज नाही, माझ्यामुळे कोणाचेही काहीही अडत नाही, मग मी जगायचे तरी कशाला", असे नकारार्थी विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांनी या खळाळत वाहाणाऱ्या पाण्याकडे पहावे. पाणी असा विचार करतं का ? मी कशाला वाहायचे ? माझं पुढे काय होणार आहे. गटारातून समुद्रातच जाणार. तिथेही माझी वाफच होणार. ना मला रूप ना गंध, ना आकार. मग माझ्या जिंदगानीचा काय उपयोग होणार ?
पण हेच पाणी कोणत्याही अपेक्षाशिवाय वाहात असते. "ज्याला हवे असेल तो माझ्या काठावर येतो आणि अमृतकण घेऊन जातो, हेच माझं मोठेपण" असा सकारात्मक अहंकार बाळगून हे जल इतरांना तृप्त करण्यासाठी समुद्रात विलीन होऊन जाते.
मनाला प्रसन्न आणि शुद्ध करण्यासाठी देखील हे जीवन काम करते. जेव्हा प्रकुपित पित्तामुळे राग अनावर होतो, अंगाची आग होते, मनाचा तोल जातो, तेव्हा पाण्याचा एक घोट लगेचच शांतपणा आणतो. प्रवासाचा शीण आलेल्या पाहुण्यांचे पहिले स्वागत पाणी देऊनच केले जात असते. प्रवासाचा थकवा एक घोट पाण्याने लगेच निघून जातो ना !
घरात वारंवार होणाऱ्या भांडणात हे पाणी आग कमी करणारे ठरू शकते. बाहेरून दमूनभागूनचिडून आलेल्या पतीला अथवा पत्नीला, घरात आधी हजर असणाऱ्यांने, दारात पाऊल पडताक्षणी जर पाण्याचा एक ग्लास नेऊन हातात दिला तर ??? सारा थकवा, सारी दुःख, सारा राग, नाहीसा झाल्यासारखा वाटेल.
प्रत्येकाला, वेळेत घरी यावंस वाटेल, मला पाणी विचारणारं कोणीतरी माझी वाट बघतंय, ही भावनाच कौटुंबिक संबंध घट्ट करत असते.
म्हणूनच याला जीवन ऐसे नाव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.12.2016
आसमान से टपके खजुर में अटके हि म्हण सर्वांनाच माहित असणार.तर हा खजुर आपल्या सर्वांचाच आवडता पण ह्याचे खरे राष्ट्रीयत्व अरब देश आहे बरं का.म्हणजेच काय तर हा परदशी पाहुणा आपल्या देशात आला आणी आपलाच बनून गेला.
अत्यंत रूचकर फळ आपण सुक्यामेव्यात पण ह्याचा चांगलाच फडशा पाडतो नाही का.अत्यंत पौष्टिक देखील आहे हा.खजुराची चटणी अगदी कशावर ही छान लागते,खजुर बर्फि,खजुर घातलेली शेवयांची खीर,किंवा पक्वान्नांमध्येच कशाला नुसता देखील हा सुरेख लागतो.
ह्याचा सुपारीच्या झाडा सारखे दिसणारे झाड असते.ते बरेच उंच असते आणी त्याला हे खजुर लागतात. खजुर चवीला गोड असतात,थंड असतात व हे शरीरातील वात व पित्त दोष कमी करतात.
चला आता ह्याचे घरगुती उपाय पाहूयात:
१)संडासला साफ होत नसल्यास २-३ खजुर रात्री पाण्यात भिजत घालावेत व सकाळी ते पाण्यात कुचकरून ते पाणी प्यावे.
२)जुनी जखम बरी होत नसेल कर त्यावर खजुराचे पोटीस बांधावे व खजुर तुपासह खावा.मात्र हि जखम मधुमेहामुळे झाली नसावी.
३)४ खजुर+ १ चमचा शिंगाडा पीठ तुपावर परतावे व खाऊन त्यावर दुध प्यावे.ह्याने रक्त कणांची वाढ होते.
४)लहान मुलांना दात येत असताना होणाऱ्या जुलाबात मधासह खारीक उगाळून द्यावी.
५)डोके दुखत असल्यास खारकेचे बी उगाळून कपाळास लावावे.
६)घामोळ्यांवर खजुराचे बी उगाळून लावावे.
७)खजुराचे बी कुटून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व ते पाणी पिण्यासाठी वापरावे ह्याने अंगातील उष्णता कमी होते व वारंवार लागणारी तहान देखील.
८)खजुराच्या बिचा लेप उगाळून तो पापण्यांवर लावल्याने डोळे लाल होणे,डोळ्यांची आग होणे कमी होते.
खजुर अतिखाल्ल्यास भुक मंदावणे,अजीर्ण व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
काय हा पडवळ्या सारखा दिसतो लांबच लांब असा ठोमणा शरीरयष्टिने कृश व उंच व्यक्तीला मारला जातो.हि भाजी जर रात्री कुणी काळोखात जमिनीवर पाहिली तर साप आहे असे समजून किंचाळल्याशिवाय रहाणार नाही.असे लांबच लांब असे हे पडवळ.
ह्याची चटणी,कोरड,भाजी,भजी असे विविध प्रकार आपण करून खातो.आणि हे सगळेच पदार्थ अगदी चविष्ट लागतात बरं का.
ह्या पडवळाचे वेल असमतोल आपण ज्याची भाजी करून खातो ते पडवळ हे त्या वेलिचे फळ असते.औषधासाठी वापरतात ते पडवळ कडू असते पण स्वयंपाकात आपण गोड पडवळ वापरतो.त्यामुळे आपण गोड पडवळाचे औषधी उपयोग पाहूयात.
पडवळ हे चवीला गोड व थंड असते व हे शरिरातील तिन्ही दोष कमी करते.आता ह्याचे औषधी उपयोग पहायचे ना:
१)भूक न लागल्यास पडवळ उकडून वाटावे व सुप बनवा त्यात १/५ चमचा हिंग+१ चमचा जिरेपूड +१/२ चमचा ओवा घालून ३-४ दिवस प्या.
२)व्यवसाया निमित्त कायम ज्यांचा संपर्क उष्णतेशी येतो त्यांच्या आहारात कायम पडवळाची भाजी असायला हवी.
३)जाडी कमी करायची आहे पण उपाशी राहणे जमत नाही का?पडवळ २०० ग्राम+कुळीथ २० ग्राम एकत्र शिजवून सूप करून त्यात जिरे,दालचिनी,ओवा ह्यांची पूड मिसळून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तींच्या आहारात पडवळाची भाजी नियमीत ठेवावी.
५)अंगात उष्णता,हातापायांची आग होणे,चक्कर येते,संडासला साफ न होणे अशा तक्रारी मध्ये १०० ग्राम पडवळ+१० ग्राम काळ्या मनुका+२० ग्राम आवळकाठी यांचा काढा करून द्यावा.
कोवळा पडवळ खाण्याचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी व्यवहारात पहातोय.
ज्यांच्या खाण्यात गहू आहेत, त्यांनी भरपूर श्रम करणे अपेक्षित आहे. पचायला जड असलेला गहू श्रम केल्याने पचू शकेल. कष्टकरी वर्गाने गहू खावा आणि कष्टाची कामे करावीत. तर त्यांना आवश्यक असलेली उर्जा पण मिळते आणि काम केल्याने अनावश्यक साखर जाळली पण जाते.
मेह नत (म्हणजे नाहीसा) होण्यासाठी, मेहनत कर, हा मधुमेहावर उत्तम उपाय आहे.
पण आम्ही बुद्धिमान वर्ग, बुद्धी गहाण टाकल्याप्रमाणे, सुटबूट घालून, एसीत बसून टेबल खुर्चीवर काम करणार, किबोर्ड वरची चार दोन बटणे बडवणार आणि डब्यातून दिलेली बटाट्याची नाहीतर कोबीची भाजी आणि गव्हाची पोळी खाणार ! आणि ती पचण्यासाठी परत वरून औषधांचा मारा करणार, फरक पडला नाहीतर डाॅक्टरला बोल लावणार, मग कसे जमणार ?
ज्यांना गहू सोडणे अजिबात जमणारच नाही, त्यांनी गहू दोन वर्षे जुना वापरावा. यासाठी तो सणसणीत उन्हे देऊन वाळवून ठेवावा. सध्याच्या काळात 'वाळवण' करून धान्याची बेगमी करणे हा प्रकारच कालबाह्य झाला आहे.
जर हे पण शक्य नसेल तर बाजारातून गहू आणून, निवडून, दोन तीन वेळा पाण्याने धुवुन, ऊन्हात वाळवून, लोखंडी कढईत मंद विस्तवावर भाजून साठवून ठेवावा. आणि नंतर दळून आणावा. आणलेले पीठ सुध्दा थोडे गरम करून मग मळायला घ्यावे. पीठात भरपूर तेल घालावे, म्हणजे पीठातील चिकटपणा थोऽडाऽ फार कमी व्हायला मदत होते. एवढे केले तरी गव्हाला, पैकीच्या पैकी मार्क मिळतील, असे नाही.
ही पळवाट सांगून ठेवतोय.
मुख्य वाट तांदुळाची धरावी, नाहीतर खिशाला चाट पडेल आणि आरोग्याची वाट लागेल. शंभर वर्षाची वाटचाल करायची असेल तर योग्य वाट ओळखावी लागेल. वाटलं नव्हंत, गहू एवढा वाटलाव्या असेल !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.10.2016

जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात.
जटामांसीचे गुणधर्म आता आपण जाणून घेऊयात:
हि चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की,स्निग्ध असते.हि प्रभावाने मानसदोष कमी करते.
आता आपण जटामांसीचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जटामांसी थंड असल्याने पाण्यात वाटून हिचा लेप लावल्यास दाह कमी होतो.
२)घामाच्या दुर्गंधीमध्ये जटामांसीचा लेप शरीरावर करावा.
३)जटामांसी चवीला तुरट व थंड असल्याने केसांची मुळे बळकट करते तसेच सुगंधी असल्याने केश्य म्हणून तेलात वापरतात.
४)जटामांसी निद्राजनन असल्याने झोपेच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.
५)जटामांसी चवीला कडू व हल्की असल्याने गर्भाशय शुद्ध करते व मासिक पाळी नियमीत करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.
आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार नाही.
आपल्या शरीराला बरोबर कळते, आपल्याला पाणी किती हवे आहे ते. तेवढी तहान शरीर निर्माण करते. तेवढं पाणी जरूर प्यावं.
आपण जिथे रहातो, तेथील हवामानानुसार आपली तहान कमी जास्त होत असते. जमिनीनुसार धान्यातील द्रव्य, भाज्यांमधील क्षार बदलत असतात.
वाळवंटी प्रदेशात रहाणारा उंट एकदाच पाणी पिऊन घेतो. तेथील वनस्पतींना पाणी उत्सर्जित करणारी पाने कमी असतात. काटे जास्त असतात. त्यानेपानांचे देठ पाणी साठवण्यासाठी योग्य असे जाडजूड केलेले असतात. !
तेथील अरब लोक पायघोळ पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतात, जे उष्णता फेकून देणारे असतात.
इथे प्रत्येकातला तो वेगळा आहे. म्हणून प्रत्येकाची तहान वेगळी आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. जे उन्हात काम करतात, त्यांना पाणी जास्त लागेल. जे सावलीत काम करतात, त्यांना पाणी कमी लागेल, जे एसी मधे काम करतात, त्यांना पाणी लागणारच नाही.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत.
एक नियम पाण्याविषयी सांगितला जातो. तो म्हणजे 30 मिली पर केजी बाॅडी वेट. म्हणजे एक किलो वजनाला सर्वसाधारणपणे 30 ते 40 मिली पाणी प्यावे. नियम केला कि तो युनिव्हर्सल असावा. आणि नियम पाळण्यासाठी करावा. टाळण्यासाठी नको.
पण हा पण नियम, नियम म्हणून पाळू नये. कारण, मी सत्तर किलो वजनाचा आहे. सकाळ पासून सायंकाळच्या सातपर्य॔त एसी मधे बसून काम करतोय. आणि त्याचवेळी सत्तर किलो वजनाचा एक हमाल रस्त्यावर ओझे वाहातोय.30मिली /किग्रॅ. या नियमानुसार या हमालाने फक्त 2100 मिलीच पाणी प्यायचे, आणि गरज नसताना मी पण एवढे एकवीसशे मिली प्यायचे ?
हे दोन्ही चुकच आहे.
इथे प्रत्येकाची गरज वेगळी आहे.
मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातील वैश्विक नियम मात्र इथे आरोग्यशास्त्रातील पाण्यालादेखील तंतोतंत लागू पडतो !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.12. 2016
मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!
काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.
स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !
असो.
एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.
मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर "होय" असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.
मी "थांबवू" शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.
हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.
जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.
जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.
मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.
आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.
आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.
पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.
( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !
मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.
शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.
पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.
या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची "पिळवणूक" होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.
अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.
भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही.....
एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.
म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.
आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.
आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !
भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.
हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.
गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?
हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
बघा विचार करून..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग.
आता काय करू?
कोकणात गहू वापरायचा नाही तर
आता काय करू ?
आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे
आता काय करू ?
गहू सोडता येणार नाही.
आता काय करू ?
सुखाची एवढी सवय झाली आहे
आता काय करू?
जसा प्रदेश, तसा आहार
जसा आहार, तशी शरीरयष्टी
जशी शरीरयष्टी, तसे काम
जसे काम, तसा आहार.
ही एक साखळी आहे.
यातील एखादा दुवा बदलता येणार नाही.
जसा देश पंजाब, गहू मुख्य आहार.
गहू मुख्य आहार म्हणून मिळते बलदंड शरीरयष्टी.
पंजाबी जाट मजबूत शरीर, तसे झेपते काम.
कामच एवढे प्रचंड मेहनतीचे,
की आहार गव्हाचाच हवा
आणि
प्यायला लस्सी आणि खायला खवा.
मला गहू आवडतो, मला परवडतो, मी सात्म्य केलाय, आता मी तो खाणार, असे म्हणून कोकणाचे रूपांतर, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड प्रदेशात थोडेच होणार आहे ? समुद्र आपली जागा किंवा गाज थोडीच बदलू शकणार बदलणार आहे? ( गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज )
किंवा एकवेळ गहू खाऊन खाऊन सात्म्य केला म्हणून आपले कामाचे स्वरूप थोडेच बदलणार आहे ?
ऊलट जेवढे कमी करता येईल, तेवढे काम आपण कमीच करत आहोत. विज्ञानाच्या सहाय्याने बौद्धिक काम वा शारीरिक श्रम कमीच करत करतोय.....
पण मनःशांती मात्र हरवतोय.
त्यासाठी कमी वेळात जास्त पैश्यासाठी धडपडतोय.. साधने मिळवतोय.
पूर्वी मधुमेह हा बुद्धिजीवी वर्गाचा आजार होता. पण आता कष्टकरी वर्गातही दिसतोय.
आज विज्ञानाने कुकर शेतकऱ्याच्या घरात आणून दिला आणि मागोमाग मधुमेह सुद्धा ! शेतकऱ्याच्या शेतात बैलजोडीच्या जोता ऐवजी टॅक्टर आला.
मागे पैसा वाढला, आणि पुढे पोटही .........
सुखाच्या जेवढे जवळ जातोय, तेवढे सुखापासून आपण लांब जातोय, एक सुख मिळवण्याच्या प्रयत्नात महत्वाचे सुख आपण विसरत जातोय. ते म्हणजे आरोग्य.
म्हणून एक सूत्र आमचे ग्रंथकार सांगतात, पळवाटा शोधू नका.
निःसुखत्वम सुखायच......
आत्ता थोडासा सुखाचा त्याग करा, जे अंतिमतः सुखकर असेल.
हे सर्व ज्याच्यासाठी करतोय ते आरोग्यच, (किंवा पुढची पिढी ) जर माझ्या हातून, अगदी देखल्या डोळा, निसटून जात असेल तर, एवढी धडपड करायची तरी कशाला ?
वेगवेगळे आजार आज अगदी दरवाज्यात रांगेत उभे आहेत. एका चुकीच्या वेळी दरवाजा उघडायची खोटी...
तो आत आलाच म्हणून समजा....
पुढच्या पिढी या बंद दरवाज्यापासून अनभिज्ञ आहे.
त्यांनी दरवाजा जवळपास उघडलेला आहे, समोर संकट दिसतंय आणि ही पिढीपण ओरडून तेच विचारतेय,
आता काय करू?
आयुर्वेद दीनपणे साजरा करण्याची वेळ न येवो, या आयुर्वेददिनाच्या शुभेच्छांसह..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.10.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक
नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे.
भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत "ड्रम किंवा बॅरल" तयार करत असत. त्यासाठी पण निसर्गाने दिलेले ( इकोफ्रेंडली ) गवतच वापरले जायचे. बांबूच्या काठ्या आणि गवत यांचा वापर करून धान्य साठवण्याच्या इकोफ्रेंडली टाक्या तयार केल्या जायच्या. आरोग्याला हानीकारक प्लॅस्टिकच्या ड्रमचा वापर, अन्न धान्य टिकवण्यासाठी ? ना रे बाब्बा ना !
धान्य एक वर्ष जुने का करायचे, कसे करायचे, त्याचे फायदे आणि तोटे काय हे प्रश्न ओघाने आलेच. त्याची उत्तरे आपणही शोधण्याचा प्रयत्न करावा.
जुना गुळ, जुने तांदुळ, जुनी कडधान्ये पचायला हलकी असतात. जुनी माणसे मात्र पचायला जरा जडच असतात. संस्कृतमधे सांगायचं तर "गुरू" असतात. "गुरू" असतात, ते पचायला जरा जडच असतात ना !
आयुर्वेदातील काही औषधे जमिनीमधे पुरून ठेवून, धान्याच्या राशीत पुरून ठेवून, नंतर ठराविक कालावधीनंतर बाहेर काढून वापरावीत. असे सांगितलेले आहे. म्हणजे त्यातील चांगल्या गुणांमधे वाढ होते, तर "आमा" सारखे दोष कमी होतात.
फळे पिकल्यानंतरच खावीत, कच्ची खाऊ नयेत. अधमुरे म्हणजे अर्धवट दही खाऊ नये, अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये, अर्धवट वैद्याचा सल्ला मानू नये, अर्धवट ज्ञानावर फुशारकी गाजवू नये, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये इ.इ. .... म्हणजेच पक्के फळ खावे, पूर्ण लागलेले दही खावे, पूर्ण शिजलेले अन्न खावे, पूर्णपणे शास्त्रीय ज्ञान घेतलेल्या वैद्याकडूनच सल्ले घ्यावेत, आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच इतरांना सांगावे, ( अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकट होवोनी नासावे, हे बरे नव्हे । - इति, समर्थ रामदास स्वामी ) औषधे वापरताना देखील पूर्ण मात्रेतच वापरावीत. तर आणि तरच योग्य आणि चांगला फरक दिसतो, नाहीतर त्रासच होतो. नारळ देखील पूर्ण पिकल्यानंतरच वापरावा, कच्चे शहाळे पचायला जड होते. आरोग्य मिळवण्यासाठी जग किती विचित्र आणि उलटे चालले आहे.
प्रत्येकालाच घाई आहे, पुढे जायची, वेगानं जायची, जमाना पण इन्स्टंटचाच आहे. भाज्या सुद्धा अर्धवट शिजवून तयार विकत मिळतात. टू मिनट नूडल्स सारख्या, फक्त वर गरम पाणी ओता, की भाजी सुद्धा तयार ! तेवढा सुद्धा वेळ नाही आमच्याकडे, असे वर म्हणायचे !
धान्य वापरण्यापूर्वी काही काळ तसाच जाणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यातील काही दोष काळाच्या प्रभावामुळे आपोआपच कमी होतात. म्हणजेच "काळ" हे पण मोठे प्रभावी औषध आहे.
ठराविक "काळ" निघून गेला की, मनातील राग, घुसमट देखील कमी होत जाते ना, तसेच धान्याचे देखील आहे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.05.2017
Copyright © 2025 | Marathisrushti