(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी

    इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी

    काही भयानक रोगांमध्ये ऑपरेशन ऐनवेळेला टाळून किंवा ऑपरेशन करताना होणारा रक्तस्त्राव कमी करुन अथवा कॅन्सर हाताबाहेर गेल्यावर भयंकर त्रास टाळण्यासाठी क्ष किरण शास्त्र रुग्णाच्या मदतीसाठी धावून आले आहे व याचे तज्ञ खास प्रशिक्षण घेतलेले ब्लॅक कॅट कमांडोसारखे कलाबाज असतात.

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग नऊ

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकावन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग नऊ

    ग्रंथकार किती सावध करत आहेत पहा. ते म्हणतात, एकट्याने बाहेर फिरायला जाताना विशेष काळजी घ्यावी. ते म्हणतात, पहाटेचा किंवा रात्रीचा अंधार पडलेला असताना आकाशात ढग जमून आले असताना, भर दुपारी सूर्य तळपत असताना, आवश्यकता भासल्यास मधे कुठे पाणी सुद्धा मिळण्याची शक्यता नाही, अशा रस्त्यावरुन, फार जलद गतीने किंवा एकदम धीम्या चालीने, शत्रुवृत्ती असलेल्या किंवा अनोळखी व्यक्ती समवेत, किंवा अधार्मिक व्यक्तीबरोबर, एकट्याने जाऊ नये. रुग्णाच्या घरी देखील जाताना सोबतीला बरोबर कोणीतरी न्यावा.

    आजच्या काळात या सूचना किती आवश्यक वाटतात ना ! सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सायंकाळी सुस्थितीत घरी परतेल, याची खात्री नसलेल्या बेभरवंशी काळात याची काळजी जास्तीच घ्यावी लागेल. अबल असलेल्या व्यक्तींना जास्त सावध रहावे लागते. ('अबला' म्हटलेलं नाही. ज्यांचे 'बल' कमी आहे, असे पुरुष देखील ! )

    या व्यक्तींना नेहेमीच सोबत कुठुन मिळणार ? अशा वेळी मोबाईल कामास येतो. आपत्कालीन प्रसंगी, मोबाईल बंद असला तरी, बॅटरी संपली असली तरी, कुणाचा नंबर पाठ नसला तरी, एकट्याने, अनोळखी जागी, रात्रीच्या अथवा पहाटेच्या वेळी, सुनसान राहोंपर, एखाद्या रिक्शेतून प्रवास करताना, खोटंखोटं फोनवर बोलायची सवय करून ठेवायला काहीच हरकत नाही. आपण कोण आहोत, कुठे जात आहोत, याचा पत्ता एखाद्या प्रवासी वाहतुक करणाऱ्या चालकाला लागू देऊ नये, याउलट चातुर्याने असे बोलणे करावे की, चालकाला जरासुद्धा शंका येऊ देऊ नये, की आपण घाबरलेलो आहोत. दगाफटक्याची शंका येईल तेव्हा चुकुनसुद्धा चालकाकडे माझा मोबाईल बंद पडलाय, आपल्या मदतीला कुणीपण येणार नाही, हे समजू देऊ नका. एवढी समयसूचकता आपल्यात हवीच.

    तरुण पिढीला तंत्रज्ञान माहिती आहे, पण समयसूचकता नाही, आणि जुन्या पिढीला अनुभवाने समयसूचकता प्राप्त झाली आहे, पण नवीन तंत्रज्ञान अवगत नाही.
    आपल्यातील ड्राॅ बॅक आपणच शोधून काढले पाहिजेत, कारण ते आपल्यालाच माहिती असतात. स्मार्ट फोन वरील नवीन यंत्रणा जुन्या पिढीने शिकून घेतलीच पाहिजे. त्यातील गुगल मॅप, जीपीआरएस, इमर्जन्सी काॅल करणे, मेसेज टाकणे, या गोष्टी नवीन पिढीकडून शिकून घेतल्या पाहिजेत.

    आपत्कालामधे केवळ एखाद्या व्यक्तीमुळेच प्राणभय असेल असे नाही तर क्षुद्र किटक, वा हिंस्त्र पशु पक्षी, नैसर्गिक आपत्ती यापासून देखील आपल्याला आपले जीवरक्षण करायचे असते.

    यासाठी एखादे लहानसे शस्त्रदेखील आपल्याबरोबर असावे. अगदी लायटर, खिळा, टाचणीसुद्धा उपयोगी ठरू शकते. फक्त त्यावेळी ते नवीन पिढीला कसे वापरायचे ते सुचले पाहिजे. यासाठी जाणकार मंडळीबरोबर त्यांचा इतिहास जाणून घ्यावा. मनात त्याची रंगीत तालीमही करून ठेवावी.

    पानीपतच्या लढाईत विश्वासराव हरवल्यानंतर माणसामाणसावरचा विश्वास कमी होत चाललाय. यासाठी आपण सावध रहाणे हे जास्त हिताचे असेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०९.०९.२०१७

  • किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

    सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.

    पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:

    १)गाईचे ताक:

    भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.

    २)म्हशीचे ताक:

    दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.

    ३)शेळीचे ताक:

    अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
    मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.

    आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:

    १)वातविकारात:

    आंबट ताक सैंधव घालून प्यावे.

    २)पित्तविकारात:

    गोड ताक साखर घालून प्यावे.

    ३)कफविकारात:

    लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग ६२-चवदार आहार -भाग २४

    कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला !

    मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद असेल नाहीतर मेद असेल, रस धातू असेल नाहीतर स्तन्य असेल. हे दोष विशेष शरीरातील स्रोतसांना चिकटून राहिले तरच दुष्टी निर्माण होते.
    कडू चवीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमध्ये खर म्हणजे खरखरीतपणा, दोन पेशींना एकमेकांपासून वेगळे करण्याचा गुण, याला शास्त्रकार विशद असे म्हणतात. आणि रूक्ष म्हणजे कोरडेपणा हे महत्वाचे गुण असतात.

    मधुमेहामधे नेमके यांच्या विरूद्ध गुण शरीरात वाढलेले असतात, त्यामुळे गुणविपरीत औषध म्हणून कडू चवीची औषधे मधुमेहावर छान गुण दाखवतात.

    मधुमेहाशिवाय वाढलेली ढेरी कमी करणे, किंवा शरीराचा कोणताही भाग फाजीलपणे वाढणे, गळ्याच्या गाठी वाढणे, गर्भाशयात फायब्राॅईडची गाठ वाढणे,शरीरात आत बाहेर कुठेही अमर्याद स्वरूपात वाढणारी कर्करोगाची गाठ, डोळ्यांचे आजार, सांध्यांना येणारी सूज, रक्तातील चिकटपणा वाढल्यामुळे रिपोर्टमधे दिसणारे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, वगैरे पॅथालाॅजिकलल आजारदेखील या कडू चवीने कमी होतात. आमामुळे पोट गप्प होणे, बरेच दिवसांच्या बऱ्या न होणाऱ्या जखमा, ती अगदी साधी सर्दी देखील कडू चवीने कमी करता येते.

    तापावर हटकून उपयोगी पडते ती कडू चव ! म्हणून तापाची कारणे शोधता न आल्यास, कडू चवीची औषधे वापरली की ताप जातो. जसे महासुदर्शन काढा.

    औषध कोणतेही असूदेत, ताप उतरला पाहिजे. एवढेच रूग्णाला अपेक्षित असते. मग ते कडू चवीचे महासुदर्शन चूर्ण असू देत नाहीतर, कडू चवीची पॅरासिटेमोलची कडू जार गोळी. कडू म्हणजे ताप उतरवणारे हे साधे सोपे समीकरण आहे.

    पुस्तकात लिहिलं नसलं तरी या कडू चवीचा अतिरेकी परिणाम म्हणून वात आणि पित्त हे वाढतेच, हे आपण व्यवहारात बघतोच! हातच्या ( दिसणाऱ्या) वातपित्ताला ग्रंथाधार कशाला ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    24.11.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा.

    सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
    त्यामुळे काय होते ?
    आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.

    पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.

    ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.

    आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.

    अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?

    खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.

    नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    03.05.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग तीन

    भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात.

  • नैवेद्य भाग ३

    प्रत्येक देवाचा नैवेद्य वेगळा !
    ज्याचे जे वैशिष्ट्य तसा त्याचा नैवेद्य !
    जसे, गणपतीला तूप आणि मोदक.
    मोदकच का ?
    मोदकाचे सारण गुळ आणि खोबरे.
    गुळ आणि खोबरे आणि त्यावर साजूक तूप हा उत्तम बुद्धीवर्धक योग आहे.

    गुळामुळे रक्तपेशी वाढायलाही मदत होते. सर्वात पहिला रस धातु तयार होण्यासाठी, गेलेला थकवा लगेचच परत मिळवण्यासाठी, गुळ मदत करतो.
    रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये, प्रवासामुळे आलेला थकवा नाहीसा व्हावा, म्हणून एकेकाळी आपल्याकडे गुळपाणी द्यायची पद्धत होती. (आजकाल पाहुण्यांच्या समोर विषाने भरलेली काळ्या कोल्ड्रिंक ? ची ठंडा बाटली आदळली जाते. )

    अर्थात गुळ सेंद्रीय पद्धतीने बनवला गेला पाहिजे. आणि ऊस देखील रासायनिक खतांचा वापर न करता पिकवला गेला पाहिजे. तरच त्याचे अपेक्षित औषधी गुण दिसतील नाहीतर, गुण नको पण दुष्परिणाम आवर असे म्हणण्याची वेळ आज आली आहे.

    जसे पाण्याला जीवन असे म्हटले आहे. पण शुद्ध स्वरूपात असेल तर शिशाच्या किंवा गंजलेल्या टाकीतील पाणी, शिळे पाणी, क्लोरीनयुकत पाणी, सतत झाकून ठेवलेले पाणी हे जीवन कसे ठरेल ?
    असो. !

    खोबरं म्हणजे नारळ.
    याबद्दल अपशब्द बोलायचे कामच नाही. उत्तम स्नेह, उत्तम केश्य म्हणजे केसांचे पोषण करणारा, उत्तम मल विबंधनाशक, उत्तम तर्पक म्हणजे , रसधातूचे पोषण करणारा, कठीण कवचातला असल्याने कॅल्शियम सारखे घटक वाढवणारा, पचनाला मदत करणारा............... श्री सत्यनारायणाची कशी सहस्त्रनामे आहेत, तशी या नारळाची देखील, गुणावरून, कर्मावरून, शंभर नावे सहज करता येतील, कोणत्याही नावानी हाक मारा, तो पावणारच.

    त्याच्या पर्यायी नावात,
    स्वभिषक् म्हणजे स्वयंघोषित किंवा स्वतःचा स्वतः जणुकाही डाॅक्टर. (बोगस नव्हे )
    चिकित्सकारी म्हणजे चिकित्सक
    लोकांचा अरी. ( याचे नित्य सेवन केले असता, चिकित्सक लोकांकडे चिकित्सेसाठी जावे न लागल्यामुळे, यांच्या पोटापाण्यावर पाय आणणारा )
    डाॅक्टरशत्रु म्हणजे डाॅक्टरांचा जणुकाही शत्रुच ! ( याचे नित्य सेवन केले असता डाॅक्टरकडे जायची वेळच येत नाही, म्हणून डॉक्टर मंडळींचा शत्रु, म्हणून बहुधा अजिबात खाऊ नका, असा सल्ला देऊ लागलेत.....)
    वैद्यमित्र - रोग होऊ नये म्हणून, आणि झालेला रोग दूर व्हावा यासाठी धडपडणाऱ्या वैद्यांचा मित्र.
    अशी काही नावे तयार करता येतील. (पुलदेशपांडे जर कदाचित वैद्य असते तर त्यांनी अशी कल्पवृक्षफल शतनामावली तयार केली असती.)

    असा हा बुद्धीदात्या गणरायाचा बुद्धीदाता नैवेद्य. हाच नारळाचा नैवेद्य आमच्या बजरंगबलींना पण प्रिय आहे. कारण जसा हा बुद्धीदाता आहे, तसाच शक्तीदाता पण आहे.

    ज्याने निर्माण केले, त्याचे त्यालाच परत करायचे आणि त्याचा सूक्ष्म सारभाग आपल्याला घ्यायचा. हा नैवेद्य दाखवण्यामागील मुख्य हेतु.

    ज्याच्याकडे जे आहे, ज्याच्याकडे ते मागीतले की लगेच मिळते, अश्या देवतांकडून जर शक्ती आणि बुद्धी मागितली तर त्या देवतांकडची शक्ती आणि बुद्धी संपूनच जाईल ना ! म्हणून भक्तीमार्गी लोक गणपतीला, हनुमंतांना स्थूल रूपात नारळ अर्पण करतात, आणि सूक्ष्मप्रसाद रूपात बाप्पा तो शक्ती बुद्धीच्या रूपात परत करतात. आणि आपणच तो तो स्थूलातून खातो.
    हा माझ्यासारख्या भोळ्याभाबड्या भक्तांचा भाव.

    हीच श्रद्धा. हीच भक्ती.
    नैवेद्य दाखवताना मला उमजलेली !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    09.09.2016

  • याला जीवन ऐसे नाव भाग २२

    पाणी शुद्धीकरण भाग दोन

    पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, "पाणी शुद्ध कसे करा" हे मात्र सांगितले जात नाही. "इट इज नाॅट अवर बिझनेस" असं म्हटलं की विषय संपत नाही राव !

    आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे केले जातेय का ? कसे करायचे हे सुस्पष्ट सांगितले जातेय का ?

    परदेशी टेक्नाॅलाॅजी वापरून पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग, त्यातील पारदर्शकता अजूनही स्पष्ट होत नाही. एखादी कंपनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जावून एकमेकांच्या जाहीरातींशी जणुकाही स्पर्धाच करत असतात. मग त्यातील खरेखोटेपणा कसा तपासणार ?

    शेवटी जो दुसऱ्यावरी अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला हेच खरे !

    पाणी शुद्ध करण्यासाठी अस्सल भारतीय पद्धतींचा अभ्यासच होत नाहीये, या निमित्ताने आपण एक जल शुद्धीकरण मोहीम राबवूया. या मोहिमेअंतर्गत आपल्या प्राचीन अथवा आजही ज्या पद्धतीने जलशुध्दीकरण केले जात होते, त्या पुनः एकदा प्रकाशात आणूया. पुढील पिढीला या पद्धतींची ओळख तर करून देऊया.

    जसे पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातील गढुळपणा कमी होतो, पण तळात हा गढुळ भाग साठून रहातो. नंतर गाळून वरील स्वच्छ पाणी वेगळे करता येते.

    आपल्याला माहिती असलेली पाणी शुद्धीकरणाची एखादी पारंपारिक स्वदेशी पद्धत सांगा. त्यातील दोष त्रुटी कमतरता शोधून काढू. त्या दूर कशा करता येतील यावर चर्चा करू. मत मांडायला तज्ञच असले पाहिजे असे नाही.

    शाळेतदेखील आपल्याला पाणी शुद्ध करायच्या काही कृती शिकवल्या होत्या. शाळा आठवून पहा......

    नाहीतर आजी आजोबांना विचारा. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधा. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी, कोणीतरी विचारल्याने त्यांना पण आनंद होईल. आपल्याही मताला आज कुणीतरी तिसरी पिढी विचारणारी आहे, असं त्यांनाही वाटेल.

    ज्यांनी आपल्या जीवनातले अनेक चढउतार पाहिलेले आहेत, यशस्वीपणे पार केलेले आहेत, त्यांना 'या जीवनाच्या' शुद्धीकरणासाठीचा एखादा पर्याय सहज सुचेल. विचारून तर बघा.
    "आजी आजोबा घरातील पाणी कसे शुद्ध करीत होते".....

    घ्या वही पेन, द्या मुलांच्या हातात! सांगा आजीआजोबांची मुलाखत घ्यायला !! करूदेत शब्दबद्ध !!!

    जीवनाचा सर्वात मोठा भाग, ज्या 'जीवनावर' आहे, त्या अशुद्ध जीवनाकडे इतक्या उदासीनपणे बघून चालणार नाही.
    जीवनाचे शुद्धिकरण झालेच पाहिजे!!!

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    29.12.2016

  • ज्योतिष्मती / मालकांगोणी

    12EFE279-195D-48C5-9971-DDAFE159812B

    ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व चमकदार असतात.

    ज्योतिष्मती चवीला तिखट,कडू असून अतिउष्ण असते.तसेच हि प्रभावाने मेध्य असून तीक्ष्ण व स्निग्ध असते.ज्योतिष्मती चवीला कडू,तिखट व उष्ण तीक्ष्ण असल्याने कफनाशक आहे.तसेच स्निग्ध असल्याने वातनाशक आहे व पित्तकर आहे.

    चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)ज्योतिष्मती वातनाशक व वेदना स्थापक असल्याने संधिवात,कंबरदुखी ह्या विकारामध्ये हिच्या तेलाने मालिश करतात.

    २)पांढऱ्या कोडा मध्ये डागांवर ज्योतिष्मती तेल लावल्यास त्वचेचा रंग प्राकृत होण्यास मदत होते.

    ३)ज्योतिष्मती उष्ण गुणाने व प्रभावाने साधक पित्ताची वाढ करून मेध्य कार्य करते त्यामुळे ग्रहणशक्ती व स्मृती वाढते.

    ४)मासिकपाळी अनियमित असल्यास ज्योतिष्मती तेल दुधासोबत देतात.

    ५)खरजेवर ज्योतिष्मती बिया गोमुत्रात वाटून लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️ Dr Swati Anvekar

    9FFEFE59-9B31-414A-A21D-D8E96227606E

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2

    जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे.

    लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 'मला सवड झाली की देवपूजा' असं करू नये. नियमितपणा म्हणजेच देव. सूर्याने जर नियमितपणा सोडला तर ? आणि देवपूजा करताना श्रद्धेने आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने केली तरच शांती मिळते. नाहीतर ते केवळ कर्मकांड होते. तसे न व्हावे.

    आचमन झाल्यावर प्राणायाम केला जातो.
    काही मंडळी याला थोतांड म्हणतात. या कर्मकांडात काऽही काही अर्थ नाही, असे म्हणतात. प्राणायाम करणे हे पण एक कर्मकांडच आहे. त्याला देवपूजेमधे सर्वात पहिले स्थान दिले आहे, हे विसरून चालणार नाही.

    प्राणायाम कसा करावा, ते सुद्धा धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. जसे योगशास्त्रामधे वर्णन केलेले आहे, तशीच कृती धर्मश्स्त्रातील कर्मकांडामधे वर्णन केलेली आहे. हा केवळ योगायोग समजावा का ? नक्कीच नाही.
    ही सर्व शास्त्रे जगण्यासाठी आवश्यक ते मुलभुत नियम सांगायला बनवली गेली आहेत. समाजाचे धारण करतो, तो धर्म अशी व्याख्या देखील केलेली आहे.

    प्राणायाम करण्यापूर्वी आचमन सांगितलेले आहे हा क्रम देखील विसरून चालणार नाही. आधी प्राणायाम नंतर आचमन असे नाही सांगितलेले ! घसा, श्वसनमार्ग आचमन करून, जरासा ओला करून घ्यावा म्हणजे, नंतर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाने घश्यामधे कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होऊ नये. यासाठी हा क्रम महत्त्वाचा !

    आचमन झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. भरून घेतलेला श्वास फुफ्फुसामधे रोखून धरावा. म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद कराव्यात. आपली श्वास रोखून धरण्याची शक्ती संपली की, श्वास हळूहळू सोडून द्यावा. श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने सोडावा. आणि श्वास न घेता काही वेळ थांबावे. याला अनुक्रमे पूरक, अंतःकुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक म्हणतात. हे कर्मकांड का करायचे ? आणि देवपूजेमधे सुरवातीला महत्त्व दिले जावे, एवढे काय आहे या प्राणायामात ?

    असा प्रश्न विचारणारा, कदाचित अभारतीय असावा. एवढे याचे महत्त्व महर्षी पतंजलींपासून आजमितीपर्यंत सर्व योगतज्ञांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेले आहे. प्राण धारण करण्याची शक्ती वाढवणे, शरीर आतून शुद्ध स्वच्छ ठेवणे, मन आत्मा इंद्रिये यांना शुद्ध ठेवणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावरील विश्वास वाढवणे, यासाठी प्राणायाम करावा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी वेगळा वेळ आणि जागा फुकट घालवायवा नको. आणि आत्ता तर आपण जागतिक स्तरावर योगदिन साजरा करतो.
    त्यामुळे माहिती नसेल तर लवकरात लवकर हे ज्ञान मिळवावे.

    नियमितपणे प्राणायाम करावा, म्हणजे श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत, आणि निर्माण झालेल्या असल्या तरी त्या दूर होतात. एवढे समजले तरी आज पुरेसे आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.05.2017