दुधाचा जो उल्लेख या सूत्रात केलाय, ते नक्की देशी गाईचेच आहे का ? अशी विचारणा काल काही गोप्रेमींनी, काही राजीव दीक्षितजीच्या अनुयायांनी केली. मला कोणाच्याही व्यक्ती भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे चुकतंय त्याची दुरूस्ती केल्याशिवाय पूर्ण आरोग्याची प्राप्ती होणार नाही, हे लक्षात घ्यावे.
काय झालंय, ज्याला त्याला प्रत्येकाला आपण सांगतोय तेच बरोबर असे वाटतेय. आणि मूळ सूत्र बाजुलाला पडते. वाग्भटजींना नेमकेपणाने काय सांगायचे आहे, तो मुळ मुद्दा मुळ ग्रंथातून कोणीच वाचलेला नसतो. केवळ राजीवजी दीक्षित सांगतात, म्हणजे ते बरोबरच, असा हेका धरून नाही, चालणार !
सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की, मी आज जे लिहितोय, बोलतोय, विचार करतोय, तो फक्त आणि फक्त राजीवजींच्या प्रभावामुळेच. जर राजीवजी माझ्या आयुष्यात आले नसते तर आजचा मी, असा घडलोच नसतो. मी एवढा भाग्यवान आहे, की प्रत्यक्ष राजीवजींबरोबर मी स्वतः सहा वर्षे काम केले आहे. राजीवजी माझे सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावहारिक, बौद्धिक गुरू आहेत. वर्ध्यापासून अगदी राजस्थान, गुजराथ, कर्नाटक सर्वत्र त्यांच्याबरोबरीने फिरलोय. आजादी बचाओ आंदोलनाच्या स्थापनेपासून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असे. राजीवजी हे होमियोपॅथीमधले उत्तम निष्णात होते. तशी पदवीसुद्धा त्यांच्याकडे होती. आमच्या चर्चेमधून देशी स्वदेशी विदेशी बद्दल जेव्हा चर्चा व्हायची, तेव्हा होमियो औषधे परदेशातूनच आयात करावी लागतात, त्यापेक्षा स्वदेशी आयुर्वेदातील सूत्रांचा आपण आपल्या भारतीय पद्धतीने का विचार करू नये, हा विचार राजीवजींना पटला, आणि या चर्चेनंतर त्यांना वाग्भट हा ग्रंथ पुणे येथील जागतिक आयुर्वेद परिषदेच्या वेळी सप्रेम भेट दिला. त्यानंतर आमची दूरध्वनी वरून काही विषयावर चर्चा व्हायची. तेव्हा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा असतो, हे मला शिकायला मिळाले. आम्ही ग्रंथ अभ्यासला तो केवळ परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी. पण राजीवजींनी भारतीय पद्धतीने हेच भारतीय ग्रंथ कसे अभ्यासायचे हे शिकवले.
फक्त या आयुर्वेदीय ग्रंथाची शैली ही केवळ शब्दशः भाषांतर अशी नसल्याने काही वेळा नेमकेपणाने भाषांतर केले तर अर्थ बदलतात आणि अर्थाचे अनर्थ होतात. श्लोकांचे इन बिटवीन द लाईन्स अर्थ वेगळे होतात, ते अर्थ अगोदरच्या आणि नंतरच्या श्लोकांच्या आधारे, तर्काने लावायचे असतात, हे पण राजीवजीना पटले होते. पण दुर्दैवाने त्यांच्या चेन्नई येथील व्याख्यानानंतर ! तोपर्यंत त्यांच्या आरोग्यावरील वाग्भटजींच्या व्याख्यानांच्या सिडीज प्रसारीत सुद्धा झाल्या होत्या. आणि नंतर, नियतीनेपण ही चुक सांगायला आणि सुधारायला संधीच दिली नाही. आज भारतामधे होत असलेला सकारात्मक बदल पहायला आणि पुढे मार्गदर्शन करायला राजीवजी हवेच होते पण........
या पणपाशी नियतीने आम्हाला थांबायला सांगितले.
.
.
.
.
.
वाग्भटजी पूर्वी देखील अनेक शास्त्रकार होऊन गेले, चरक सुश्रुत यांनी लिहिलेल्या ग्रंथातील काही सोपी आणि व्यावहारिक सूत्रे वाग्भटजीनी संकलीत केली. त्यातील चरकाचार्यांनी प्रमेह प्रकरणामधे सांगितलेले हे अत्यंत महत्वाचे सूत्र. मधुमेह होऊ नये या करीता सांगितले गेलेले हे सूत्र आता विस्ताराने बघूया. कोणतेही पूर्वग्रहदूषित न ठेवता या सूत्राचा नव्याने अभ्यास करूया. राजीवजींनी जी दृष्टी दिली ती आपल्यामधे उतरवण्याचा प्रयत्न करूया, पुनः एकदा इतिहासातील वैभवशाली भारत अभ्यासूया, आणि भारताला आरोग्यसंपन्न भारत बनवूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
मूळ सूत्र असे,
आस्यासुखं स्वप्नसुखम् दधिनी
ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम ।।
पय म्हणजे दूध. म्हणजे देशी गाईचे दूध असा अर्थ होतो. जिथे जिथे दूध असा उल्लेख येतो, ते दूध म्हणजे गाईचे. आणि गाय देशी. जिथे घृत असा उल्लेख येतो, तिथे गाईचे तूप, दही, ताक, लोणी, मूत्र, शेण याच्या बाबतीत जाणावे असे एक सूत्र ग्रंथामधे आधी येऊन गेले आहे. परत परत आम्ही सांगणार नाही. असे वाग्भटजी म्हणतात. जिथे बदल अपेक्षित असेल तिथे आमच्याकडून नेमकेपणाने सांगितले जाईल. अन्यथा दुग्धादि सर्व गाईचेच जाणावे.
जसे कोणत्याही कार्यक्रमामधे सुरवातीला जो प्रास्ताविक करतो, त्यानेच व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाचे पद आणि नाव यांचा उल्लेख करायचा असतो. अगदी थोडक्यात त्याची प्रतिष्ठा सांभाळायची असते. पण एकदा खुर्चीवर बसलेल्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मा.खासदार आमदार, अमुक बॅकेचे चेअरमन, तमुक गावचे सरपंच, मा. पोलीसपाटील असे सांगून झाले की, नंतर व्यासपीठावर स्वागतासाठी येणाऱ्या, किंवा अन्य प्रमुख वक्ते, अध्यक्ष, चेअरमन, आणि आभार प्रदर्शन करणाऱ्यांनी फक्त आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सज्जनहो, असे म्हणून आपला विषय पुढे सुरू करावयाचा असतो. येणारा प्रत्येक वक्ता जर स्टेजवर बसलेल्या सर्वांची नावे घेऊ लागला तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे होते. तसेच......
म्हणजे इथे जो पय असा उल्लेख केला आहे तो गाईचे दूध असाच होतो. आणि त्याकाळी गाईंचा वर्णसंकर न झाल्याने या सर्व गाई देशीच होत्या. हो आणखी एक गोष्ट. मूळ सूत्रात पय असे न म्हणता पयांसि असा शब्द वापरला आहे, याचा अर्थ केवळ गाईचेच नव्हे तर म्हैस, शेळी, मेंढी, या अन्य सर्व दुधांचे अतिसेवन हे मधुमेहाचे कारण आहे.
ज्याचे अन्न फक्त दूधच आहे असे बालक सोडून अन्य पालक वर्गाने याचा विचार करावा.
आजच्या पुरते खूप झाले. आज एवढे लक्षात ठेवूया,
चहातले दूध चालते, पण दुधाचा चहा नको.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.01.2017
आपल्या सर्वांच्या परिचयाची आणि ब-याचं मंडळीच्या आवडीची हि हिरवीगार भाजी.ताजी टवटवीत असताना दिसते देखील सुरेख नाही का?
आपण ह्याचे बरेच पदार्थ खाण्या करीता बनवतो.पालक पनीर तर ब-याच जणांच्या आवडीचे,आलूपालक,पालकाची भजी,पालकाचे सूप,पालकाची शेव इ.
पण हाच पालक काही आजारांमध्ये आपण घरचा वैद्य म्हणून देखील वापरू शकतो बरे का!
पालकाचे लहान हातभर उंचीचे क्षुप असते.आणी ह्याची पाने भाजीसाठी वापरतात.हा चवीला गोड,कडू व थंड असतो.त्यामुळे तो शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.
चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहूयात ना!
१)ज्या आजारांत ताप येतो जसे घसा फुलणे,फुफ्फूसांत कफ भरणे,श्वासनलिकेस सुज येणे ह्यात ह्याच्या पंचांगाचा काढा वापरतात.
२)१/४ कप पालकाच्या पंचांगाचा रस+४ चमचे ब्राम्हीचा रस+ १ चमचा साखर हे मिश्रण रोजरात्री जेवल्यावर साधारण २ १/२ तासांनी व झोपायच्या पुर्वी १/२ तास नियमीत घेतल्यास मानसिक थकवा कमी होतो व बुध्दीची धारणा शक्ती वाढते.
३)घशात जळजळ होत असल्यास पालकाच्या पानांच्या रसांच्या गुळण्या कराव्यात.
४)खोकला येऊन कफसुटत नसल्यास पालकाच्या पानांचा चहा १ कप+१ चमचा मेथी पूड+१/२ चमचा मध हे मिश्रण काही दिवस घ्यावे.
५)ज्यांना वारंवार चमचमीत खाऊन शरीरात पित्त वाढते आणी अंगाचा दाह,हातपायांची जळजळ,पोटात आग होणे अशा तक्रारी होतात त्यांनी १/४ कप पालकरस + शहाळ्याचे पाणी १/२ कप हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावे फायदा होतो.
पालकाच्या अतिवापराने युरीकअॅसीड वाढते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण करण्यासाठी चांगले कपडे घालायचे असतात, हा उद्देश नाहीच आहे. शरीर आणखी आकर्षक कसे दिसेल यासाठीच आज ते कपडे घालतात. त्यातूनच रॅम्पवाॅक कॅट वाॅक, फॅशनशो आणि स्त्री शरीराचा बाजार इ. प्रकार पुढे येत गेले.
जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.
वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.
पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.
दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.
कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.
जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
पायांना भक्कम आधार हवा,
पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
21.09.2016


ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व चमकदार असतात.
ज्योतिष्मती चवीला तिखट,कडू असून अतिउष्ण असते.तसेच हि प्रभावाने मेध्य असून तीक्ष्ण व स्निग्ध असते.ज्योतिष्मती चवीला कडू,तिखट व उष्ण तीक्ष्ण असल्याने कफनाशक आहे.तसेच स्निग्ध असल्याने वातनाशक आहे व पित्तकर आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)ज्योतिष्मती वातनाशक व वेदना स्थापक असल्याने संधिवात,कंबरदुखी ह्या विकारामध्ये हिच्या तेलाने मालिश करतात.
२)पांढऱ्या कोडा मध्ये डागांवर ज्योतिष्मती तेल लावल्यास त्वचेचा रंग प्राकृत होण्यास मदत होते.
३)ज्योतिष्मती उष्ण गुणाने व प्रभावाने साधक पित्ताची वाढ करून मेध्य कार्य करते त्यामुळे ग्रहणशक्ती व स्मृती वाढते.
४)मासिकपाळी अनियमित असल्यास ज्योतिष्मती तेल दुधासोबत देतात.
५)खरजेवर ज्योतिष्मती बिया गोमुत्रात वाटून लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar

आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव.
हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील असतात.पण हिच फळे खाताना जर आपण काही नियम पाळले तर मला वाटते आपण सेवन करत असलेल्या फळांचा आपल्या शरीराला अपाय न होता फायदाच होईल.
फळं खात असताना आपण हि खुण गाठ मनाशी घट्ट बांधावी कि ती कायम पोट रिकामी असताना एक आहाराचा भाग म्हणून खावी.कारण बरीच मंडळी भरपेट जेवण झाल्यावर फळे कापून खातात,हे असे करणे म्हणजे रोगाना आयते आमंत्रण होय.कारण जेवल्यावर फळे खाण्याने त्याचा विपरीत परिणाम खाल्लेल्या अन्नाच्या पचनावर होऊन रक्तातील ट्रायग्लिसराईड्स देखील वाढतात हे माझ्या वाचनात आले होते जे मला पटले.त्याचा विस्तार येथे करणे अयोग्य होईल.
दुसरा प्रकार म्हणजे हिच फळे दुध,दही,पनीर,चक्का,आयस्क्रीम ह्या सोबत खाणे जसे फ्रूट सलाड विथ कस्टर्ड,शेक्स इ वारंवार खाणे म्हणजे त्वचा रोग,सर्दी,दमा,खोकला,सायनस ह्याला आयतेच निमंत्रण होय.
तसेच काही मंडळींना फळांचा रस पिण्यात भारी रस असतो.पण गरज नसताना असे करणे म्हणजे आपल्या पचन शक्तीवर अतिरिक्त ताण देणे होय.कारण जेव्हा आपण सबंध फळ खातो तेव्हा आपल्या पोटात त्याचा चोथा ज्यास फायबर म्हणतात ते जाते,पण रस काढायला व त्यातून पोट भरायला भरपूर फळे वापरावी लागतात.त्यामुळे सहाजीकच जास्त साखर व पर्यायाने उष्मांक शरीरात गेले कि नाही.त्यामुळे मी तर कायम फ्रूट ज्युसच पिते पण वजन मात्र कमी होत नाही अशी तक्रार करणार्याॅनी हे लक्षात घ्यावे.
तसेच सकाळी नाश्त्याला इतर पदार्थ खाऊन असे पाश्चात्यांन प्रमाणे ज्युस पिणे म्हणजे पोटाचे विकार,अपचन,व वजन वाढीला आयतेच आमंत्रण आहे हे लक्षात असु द्यावे.
म्हणूनच फळे खा पण ते खायचे नियम पाळून बरे का!
ह्या विभागाची माहिती देण्यापुर्वी मला आपणांस हे सांगणे आवश्यक वाटले कारण आपल्या पैकी बरेच जण ह्या अशा चुका फळे खाताना हमखास करत असतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
बदललं, सारंच बदललं.
ते गोरे इंग्रज काय येऊन गेले,
तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले
पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले.
२६. कवल. म्हणजे गाल फुगवून तोंडात पाण्याची चुळ धरून ठेवणे. वेगवेगळ्या औषधी काढ्यांची, तेलाचे कवल अवस्थेनुसार प्रकृतीनुसार गुण दाखवतात, याविषयी लेखन झाले आहे. हा अस्सल भारतीय दैनंदिन उपचार होता. हा उपचार आता केवळ ‘चुळ भरणे’ एवढ्या स्तरावर आला आहे.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक पाच
पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका - भाग 2
घरातला तुरडाळ ठेवलेला डबा आठवतोय ? जेव्हा डब्यातील तुरडाळ संपतेय, तेव्हा मार्केट मधून तुरडाळ आणली जाते. तेव्हा डब्यात तळाला थोडी तुरडाळ शिल्लक असते. या शिल्लक असलेल्या तुरडाळीवर नवीन तुरडाळ ओतली जाते. असं जेव्हा वारंवार होईल, तेव्हा काय होतं ? तळातील जुनी तुरडाळ तशीच ठेवून जर त्यावर नवीन तुरडाळ ओतली गेली तर काय होईल ? जुनी तुरडाळ काही दिवसांनी खराब होईल. तिला दुर्गंध येऊ लागेल, अशी दुर्गंध येणारी डाळ डब्यात तशीच राहिली तर वरून पडणारी चांगली तुरडाळदेखील काही दिवसात दुर्गंधित होऊ लागेल आणि काही दिवसांनी डब्यातील सर्व तुरडाळ वास येणारी होईल.
असं होऊ नये म्हणून काय करावे ?
जी तुरडाळ तळात राहिलेली असते, तिला आधी एका ताटामधे काढून घ्यावी. नवीन तुरडाळ डब्यात भरावी. आणि डब्यात सर्वात वर जुनी तुरडाळ भरावी. त्यामुळे ती पहिल्यांदा वापरली जाईल. फुकट जाणार नाही.
बेकरीवाल्याकडची बरणीतील शेव संपत आली की तो बेकरीवाला, ती बरणीतील तळातली शेव आधी वेगळी काढून मगच नवीन शेवेचं पाकीट बरणीत रिकामे करतो. आणि वर जुनी शेव परत भरतो, जेणेकरून पहिली शेव सहज संपून जावी.
पहिलं संपल्याशिवाय दुसरं भरलं तर पहिलं पण फुकट जाते आणि दुसऱ्या पदार्थाचा आनंदही निघून जातो.
अगदी तस्संच पोटामधे देखील होत असावं. आधी न पचलेल्या अन्नावर वरून कितीही सात्त्विक अन्न घातले तरी ते सर्व अन्न फुकट जाईल. कारण न पचलेलं अन्न म्हणजे आम. या आमामधे चांगले अन्न एकत्र झालं की, सर्वच अन्न "आममय" होईल.
त्यामुळे पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न आत टाकलं तर नुकसान ठरलेलंच ! म्हणून पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.
नासलेल्या दुधात कितीही चांगले दूध ओतले तरी सर्व दूध नासणारच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
02.05.2017
देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.
Copyright © 2025 | Marathisrushti