(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३

    निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.

    माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.

    हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.

    त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.

    हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
    कसा कळणार ?
    मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
    आपुला संवाद आपणासी.....
    अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.

    पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
    म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
    त्याला विसरून कसे चालेल ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    10.12.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तीन

    स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त "हर हर महादेव" म्हणून आक्रमणाला सुरवात करायची, एवढे समजले तरी पुरे.

    ताटात जसजसा एक पदार्थ येत जातो, तस तसा डोळ्यांनी म्हणजे चक्षुरेंद्रियांनी, घ्राणेंद्रियांनी म्हणजे नाकाने वास घेत त्याची वार्ता आतमधे पोहचवलेली असते. बाकी सगळे अगदी तैय्यार असतात. प्रत्येक पदार्थ वेगळा वाढल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण अगदी उत्तम करता येते.

    मीठ वाढताना त्याची सूक्ष्म चव आपण अनुभवतो, लिंबू वाढताना, त्याच्या रसाचा फवारा आपल्या तोंडात उडायला सुरवात होते, पापड वाढताना त्याचा कुर्रकुर्र आवाज कानात नाद निर्माण करतो. भजी आल्यावर त्याचा खमंग वास चोंदलेलं नाक सैल करून टाकतो. लालबुंद रस्सा डोळ्यांनी बघताक्षणी पोटात भूक चाळवायला सुरवात झाली नाही, तरच नवल.

    (काहीजण एवढे चाळवतात, की वाढला पापड झाला गट्टम, कोशिंबीर पुढच्या पानात वाढायच्या अगोदर ही संपली सुद्धा. वाढली भाजी खाऊन टाकली. याला पंगत म्हणत नाही. त्याचेही काही भारतीय नियम असतात, तेही "मॅनर्स" पाळलेच पाहिजेत. थोडा संयम हा हवाच. तरच "सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम्, यातील सह ला महत्व आहे. ) असो.

    तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड त्याच्या आवाजाने, पुरणपोळी आपल्या स्पर्शाने, भजी आपल्या वासाने, चटणी आपल्या चवीने, आणि सुंदर रंगसंगतीने, असं छान वाढलेलं, पदार्थांनी भरलेलं ताट, बघताक्षणी डोळ्यांचेही पारणे फिटते. म्हणजे डोळ्यांनी ते पचवायला सुरवात केलेली असते.

    शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा या परिपूर्ण आहारात एकवटलेल्या असतात. केवळ कॅलरीज मोजून जेवणे, वजनी प्रमाणात जेवणे, याला चौरस आहार म्हणता येईल का, विचार करून पहावे.

    एकापेक्षा एक उत्तम पदार्थांचे एकमेकांमधे एकत्र झालेले वास. आणि आग्रह करून, प्रेमाने वाढणाऱ्यांचा सहवास यामुळे अग्निवृद्धी आपोआपच होत जाते. कधी एकदा ताटातले हे उत्तम पदार्थ पोटात जातात असे होऊन जाते.
    हे सर्व मीच अगोदर अनुभवणार अशी जणु काही स्पर्धाच लागते सगळ्या इंद्रियामधे.
    जो जे वांछील तो ते लाहो, अशी अनुभुति इंद्रिये घेत असतात, तो आनंद शब्दात वर्णन करणं अशक्यच आहे. याचा दृष्य परिणाम म्हणून हर हर महादेव चा गजर होण्याअगोदरचा कल्ला, पुढील पाच मिनिटांसाठी पूर्ण बंद झालेला असतो. निमूटपणे सर्वजण आतील प्रज्वलीत अग्निनारायणाला एकेका पदार्थाची आहुती देत असतात.

    पंचहाभूतात्मक आहार, पंचमहाभूतात्मक शरीरासाठी, पंचमहाभूतांच्या तन्मात्रांसह...

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    18.03.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणसाठ

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 15-पुष्प तिसरे

    फुल हा नाजूक आणि नाशीवंत अवयव ! त्याचे आयुष्यही एखाद्या दिवसाचेच!!! त्यामुळे फूल टिकणेही कठीण. टिकवणेही कठीण. पण त्यापासून मिळणारा मध मात्र टिकतो.

    फुले देवाला वाहाताना देठ काढून वाहतात. जे द्यायचे ते उत्तम गुणाचे. जसे देहाला तसेच देवाला. आपणही अन्नाचा दर्जा, प्रत, पाहूनच माल खरेदी करतो. धान्य निवडतो, त्यावर संस्कार करतो, निवडणे, आसडणे, पाखडणे, घोळणे, चाळणे, धुणे, सुकवणे, वाळवणे, चिरणे, खोवणे, तळणे, भाजणे, उकडणे, वाफवणे, शिजवणे, परतणे, इ.इ. यापैकी कोणता तरी संस्कार करतो आणि नंतरच वापरतो. हा फरक आहे पशु पक्षी आणि मानवामधील. जी बुद्धी आहे, ती वापरली तरच पचन सुलभ होते.

    देवाला देताना सुद्धा जे जांगले असेल तेच द्यावे. देवाला दिलेले परत आपल्याकडेच येत असते. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार देवाला नैवेद्य उत्तम पदार्थांचा दाखवला तर तो परत आपल्याचकडे येणार आहे. कारण तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपणच सेवन करणार असतो.

    फुले सुद्धा निवडूनच अर्पण करावीत. किडकी, शिळी, मनात राग ठेवून ओरबाडलेली फुले देवाला सुद्धा चालत नाहीत.

    फुले, पाने, ओरबाडायची तर नसतातच, पण तोडायची पण नसतात, तर खुडायची असतात. खुडणे हा संस्कार फक्त फुलांसाठी. खुडताना नखांचा वापर केला जातो. तोडण्यासाठी बोटे वापरली जातात. ( आणि माणसे तोडण्यासाठी शब्द !) डोलणारे फूल एकदा फांदीवरून तोडले की फांदीपासून कायमचेच वेगळे होत असते. ते परत जोडता येत नाही. ( माणसांचे मात्र तसे नाही. "क्षमस्व" मनापासून म्हटले तर तोडलेली नाजूक माणसे देखील जोडली जातात. पण मनापासून साॅरी म्हणायला आलं पाहिजे. काही माणसांना मनापासून "साॅरी" सुद्धा म्हणता येत नाही. तोंडदेखलेपणाने "साॅरी" म्हणतात, हे मोठ्या मनाने ऐकून घेणाऱ्याच्या सहज लक्षात येते. समर्थांनी नमस्कार करण्याचे फायदे दासबोधातील एका समासामधे छान वर्णन केलेले आहेत. असो ! )

    फुल खुडताना अगदी हलकेच खुडायचे असते. नखांनी हळुवारपणे खुडायचे असते. फांदी, पान यांना अजिबात धक्का न लावता. खुडल्यामुळे फुलांच्या देठातील रस आपल्या नखात शिरत असतो. मेंदी लावल्यावर कसं नख रंगतं, म्हणजे मेंदीचा रस जर नखातून आरपार जिरतो तर फुलांचा रस देखील नखातून शरीरात जातो. (दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासली असता केसांचं आरोग्य चांगलं राहाते, असे प.पू. स्वामी रामदेवबाबा म्हणतात.) म्हणजेच नखे हा देखील शरीरात औषध देण्याचा एक मार्ग आहे. व्यवहारात हे लक्षात येत नाही.

    वेगवेगळ्या फुलामधे वेगवेगळे अर्क असणार, वेगवेगळी फुले खुडली की, ते सर्व प्रकारचे अर्क आपल्या नखातून शरीरात शोषले जाणार. शरीराच्या दृष्टीने काही उपयोगी असतील काही निरूपयोगी. ते शरीर ठरवेल. आपलं काम शरीरात अन्न पोचवणे ! त्यातून काय निर्माण करायचं, कसं निर्माण करायचं, किती टाकायचं किती वापरायचं, हे तो ठरवेल ! आपण आपलं नेहेमीचं काम, धर्म म्हणून करावं. फळाची अपेक्षा न ठेवता ! फळ तर मिळणारच असते. हाच तर त्याचा नियम आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा

    नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.

    शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
    याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.

    सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
    एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.

    हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )

    नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.

    या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    29.06.2017

  • अपामार्ग/आघाडा

    ।।गुहाग्रजाय नम:
    अपामर्गपत्रंसमर्पयामि।।

    ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात.

    ह्याचे उपयुक्त अंग आहेत मुळ,पाने,पंचांग,तंण्डूल /बिया.

    आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात:

    ह्याची चव तिखट,कडू असून हे उष्ण असते.गुणाने हल्के,रूक्ष,तीक्ष्ण असते.
    कफ व वात दोष कमी करते व पित्त वाढविते.

    आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊयात:

    अंगास खाज येत असल्यास आघाड्याचा काढ्याने स्नान करावा.

    आघाड्याच्या क्षाराचा लेप हा किरल्या/ कुरूप पायांवर येणारे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

    दंतरोग अर्थात दातांच्या दुखण्यात आघाड्याच्या काढ्याच्या गुळण्या करतात.

    आघाड्याचा क्षार हा अम्लपित्त कमी करतो.

    मार लागुन सुज आल्यास आघाड्याच्या पानांचा लेप लावतात.

    अति भुक लागत असल्यास ज्याला आपण भस्मक रोग म्हणतो त्यात आघाड्याच्या बियांची खार उपयुक्त आहे.

    सर्दी,खोकला,दमा ह्यात आघाड्याचे चुर्ण मधासोबत चांगले काम करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – नारळ भाग २

    आता शहाळ्याचे काही घरगुती उपाय पाहुयात:

    १)जुलाब होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात १/४ कप संत्र्याचा रस ४ चमचे लिंबू रस व १/४ चमचा सैंधव घालून प्यावे हे मिश्रण ओ.आर.एस ची भूमिका बजावते.

    २)लघ्वीला जळजळ होत असल्यास व लघ्वी कमी होत असल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे.

    ३)लहान मुलांना जंतांचा त्रास होऊन उल्टी होत असल्यास १/४ कप शहाळ्याचे पाणी+१/२ चमचा ओवा व १ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण पाजावे ह्याने वारंवार होणाऱ्या उल्ट्या थांबतात.

    ४)कर्करोगा सारख्या आजारात जेव्हा तीक्ष्ण औषधे दिली जातात तेव्हा शरीरातील विषार लघ्वी मधून बाहेर टाकण्यासाठी शहाळ्याचे पाणी उत्तम.

    ५)मानसिक श्रम अधिक होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात २ चमचे मध घालून ते मिश्रण संध्याकाळी घ्यावे.

    ६)१ कप शहाळ्याचे पाणी त्यात १/२ चमचा हळद व ४ चमचे चुन्याची निवळी घालून त्या मिश्रणाच्या घड्या भाजलेल्या त्वचेवर ठेवाव्या.

    ७)कोवळ्या शहाळेयाची मलई चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात व चेहऱ्याच्या मांसपेशींना बळ मिळते.

    ८)मोठी शस्त्रक्रिया होऊन जेव्हा प्रथमच आहार सुरू करतात तेव्हा रूग्णाला आधी शहाळ्याची मलई द्यावी.

    ९)पोटात जळजळ होऊन भुक लागते त्यावेळेस शहाळ्याची मलई खावी फायदा होतो.

    १०)सर्दी होण्याची सवय नसल्यास लहान मुलांना शहाळ्याची मलई पातळ करून भरवावी ती शक्तीर्धक असते.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बाहात्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 29

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग तीन

    नैवेद्य करताना सोवळ्यातच करावा, असा दंडक आहे.
    नेमके सोवळे म्हणजे काय हो ? पीतांबर ? रेशमी वस्त्र? की धूतवस्त्र ? की आणखीनच काही ? आणि काय आवश्यकता आहे या सोवळ्याची ? त्याच्यावर काय फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे काय ?
    कधीच नव्हती, कधीच नाही, कधीच नसावी.

    सोवळे म्हणजे शुद्धता. स्वच्छता.
    आपण जे स्वच्छतेचे नियम पाळतो ते जरा कडक केले तर शुद्धता मिळते. नेहेमीच्या वापरातील कपडे आणि सोवळ्यातील कपडे, वेगवेगळे ठेवण्याचे हेच एकमेव कारण. आपण बाहेर हवे तसे फिरतो. बाह्य वातावरणातील जीवजंतु आपल्या अंगाखांद्यावर, हातापायावर बसतात, आपल्याबरोबर ते आपल्या घरात येतात. स्वयंपाकघरात येतात. अन्नापर्यंत पोचतात. आणि अन्नातून आपल्या पोटातही जातात. जीवजंतुंचा, अन्न आणि आहार ते आपले शरीर अवयव, हा प्रवास जेवढा टाळता येईल, तेवढा टाळला जावा, यासाठी हे सोवळे ! काय चूक आहे असे सोवळे पाळण्यात ?

    बाहेरून घरात आल्यावर हात पाय धुवुन कपडे बदलून घरात यावे असा कडक नियम एकेकाळी ब्राह्मण घरात होता. मी जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करतोय. काही कर्मठ ब्राह्मण घरात तर बाहेरून आल्यावर कपडेच काय, जे बरोबर आणलेले सामान, वस्तु,भेटी, पिशव्या, भाजी, जेवढे धुता येईल तेवढे सर्व धुवुन घेतले जायचे. का ? कशासाठी? एवढा कर्मठपणा आवश्यक होता का ? उलट गत कालापेक्षा आताच्या कालात असा कर्मठपणा घरात आणला तरी पन्नास टक्के आजार कमी होतील. आमच्या सौभाग्यवती नोटादेखील धुवुन घेतात, कारण विचारले तर सांगतात, "लोक नोटा मोजताना थुंकी लावून मोजतात, या नोटा खाटीकखान्यातून आल्या असतील तर मांस लागलेले असेल, मासळी बाजारातून आल्या असतील तर रक्त लागलेलं असेल, रस्त्यावर ही नोट पडलेली असेल तर तिथली घाण लागलेली असेल, म्हणून मी त्या नोटा धुते." काय चुकले तिचे ? ( मनात म्हटलं दोन हजाराची नोट फक्त धुवु नकोस, रंग जातो म्हणे !जोक अपार्ट,) पण हे सोवळे नव्हे काय ?

    बाजारभर फिरायचे आणि घरात, अगदी स्वयंपाकघरात देखील तसेच त्याच बूटांनी फिरायचे ? बूट काढले तर साॅक्सची घाण म्हणे घरात येते. एवढे सोवळे कळते तर स्वच्छता कोणी ठेवायची ? बूट साॅक्स, बाहेरचे कपडे यावर जी घाण आहे ती घराबाहेर ठेवावी. हातपाय धुवून आत यावे, एवढे सुद्धा समजत नाही ?

    आणि स्वयंपाकघरात तर आंघोळ केल्याशिवाय जायचेच नाही, समजा चुकुन गेलात तर कशालाही स्पर्श करायचा नाही. हे पण सोवळेच. देवघरातील गोष्टच वेगळी!

    देवघरात पूर्वीच्या काळी वर्षाच्या बेगमीची लोणची, सांडगे कुरडया, पापड, मुरांबे, गुलकंद आदि "आयसोलेट " करून ठेवलेले असायचे ! हे पण सोवळेच ! तिथे तर आणखीनच कडक सोवळे. नेहेमीच्या धुतलेल्या वस्त्राने पण तिथे जायचे नाही. आंघोळ झाली की तडक देवघरात जाऊन तिथेच ठेवलेले सोवळे नावाचे वस्त्र नेसायचे. त्यानंतर कश्याकश्यालाही स्पर्श करायचा नाही. आणि देवपूजा नैवेद्य सर्व कर्मकांड पार पडायचे. हे सर्व कर्मकांड ब्राह्मण घरात इमाने इतबारे व्हायचे ! काय ही स्वच्छता, हे सोवळे चुकीचे होते ?

    या देवासाठी नैवेद्याचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच व्हायला हवा, असा दंडक चुकीचा होता का ? जे जे देवासाठी ते ते देहासाठी या नियमानुसार, जर देवाला शुद्ध आणि सात्विक लागते तेच आपणाला सुद्धा.

    आणि काय हो,
    आज डाॅक्टर मंडळी सांगतात, कुत्रा मांजर या प्राण्यांपासून लांब रहा, त्याना "टच" करू नका, त्यांच्या अंगावरील केसापासून तुम्हाला अॅलर्जी होईल, दमा चाळवेल, तेव्हा तुम्ही मान्यच करता ना कि या प्राण्यांच्या अंगावरील जे काही अदृश्य जीवजंतु, "अॅलर्जिक सबस्टन्स " आपणाला पुढे जाऊन त्रास निर्माण करू शकेल, त्यापासून सावध राहिलेले बरे. ही "प्रिकाॅशन" घेणे म्हणजेच सोवळे.

    ऑपरेशन थिएटरमधे एखाद्याचे शस्त्रकर्म करायचे असेल तर तिथे कोणाला प्रवेश असतो ? नन अदर दॅन डाॅक्टर अॅण्ड सिस्टर्स. फक्त नर्स आणि डाॅक्टरच तिथे जाऊ शकतात. का ? आम्ही का नाही जाऊ शकत ? तर आपण त्या ऑपरेशन थिएटरमधील नर्स आणि डाॅक्टरांसारखा "स्टरलाईझ्ड ऑटोक्लेव्हड" पोशाख घातलेला असत नाही, हे एक कारण असते.

    अरे, म्हणजे आज "ऑपरेशन थिएटर" मधे देखील सर्व डाॅक्टर सोवळ्यातच असतात म्हणा की !

    हो.
    हे सर्व डाॅक्टर्स ऑपरेशन थिएटरमधे सोवळे नेसलेले अगदी कर्मठ ब्राह्मणच असतात, मग त्यांची जात काही का असेना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.06.2017

  • जेवणाची बैठक कोणती ?भाग १

    ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक विचार

    पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर बसणे हा प्रकारच माहीत नाही. उकीडवे बसणे तर दूर दूर की बात.

    ऊकीडवे बसून जेवायची आपली पद्धत होती. कालांतराने मांडी घालून (सुखासन ) बसायला सुरवात केली. ज्याला आपण आज भारतीय बैठक म्हणतो.

    गावाकडे अजूनही पुरूष मंडळी पंगतीमधे जेवताना, उकीडवे बसूनच जेवतात. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून बसणे, म्हणजे ऊकीडवे बसणे.
    उकीडवे बसल्याने दोन्ही मांड्या पोटावर दाबल्या जातात. जेवतानाच पोट दाबून जेवले गेल्याने अनावश्यक जेवण जात नाही. त्यामुळे तब्येत सडसडीत रहाते. पोट सुटत नाही. पोटात वात साठून रहात नाही. तयार झालेला गॅस लगेच बाहेर पडून जातो. पोट हलके होते.
    हा पोटातील गॅसचा दाब इतर अवयवांवर न पडल्यामुळे तेही खुश.

    समजा, दाटीवाटीने एका कोचवर (बाकावर) चार माणसे बसली आहेत. त्याच बाकावर आणखी दोघांना बसायला सांगितले तर ? कोंबून ठोसून बसलेच, तर पहिले चार जण, जे आरामात बसले होते, त्यांना आपल्या हालचालींवर निर्बंध आणावे लागतील. त्यांच्या हालचाली मर्यादित होतील.

    अगदी तसेच पोटातील अवयवांचे होते. यकृत, प्लीहा, अग्न्याशय, किडनी, आणि त्याच्याच वरच्या मजल्यावर रहाणारे ह्रदय, फुफ्फुसे, यांच्यावर आतड्यातील गॅसचा अतिरिक्त दाब सतत पडत रहातो.

    हा गॅस तयार होता होता जर बाहेर पडला तर त्रास होणार नाही. पण जर ही हवा आतच साठून राहीली तर, या सर्व अवयवावर अतिरीक्त दाब पडतो. आणि त्यांचे आयुष्य कमी होते.

    हा दाब किती असतो, कल्पना आहे ?
    अहो, याच दाबून ठेवलेल्या वाताच्या जोरावर, त्या जेम्स वॅटने म्हणे वाफेचे इंजीन चालवले होते.

    आता हा वाताचा दाब आत जर वाढला तर, या पैकी एका अवयवांवर दाब येणार हे निश्चित. मग त्या अवयवाने कधीतरी अचानक संप करून, त्याच्यावर पडणारा अतिरीक्त ताण कमी करण्याची मागणी केली तर, चुक आहे का ?

    अवयवांनी ही अशी मागणी करणे, म्हणजेच विशिष्ट रोगाची लक्षणे होत.
    म्हणजेच हा ताण अतिरिक्तरीत्या वाढू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अवयवांना संपावर जाण्यापासून रोखणे.

    हे सर्व एका आसनामुळे शक्य आहे, ते म्हणजे उकिडवे बसून जेवणे.

    आताच्या काळात जरा "मॅनरसलेस" वाटेल, पण त्याला पर्याय नाही.

    जसे आसन तसे मलविसर्जन.

    टेबलखुर्ची घेऊन जेवायला काटकोनात बसले की, मलविसर्जन पण काटकोनातच केले जाते ना ! कमोडवर बसून हो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    17.09.2016

  • आहारातील बदल भाग ५९ – चवदार आहार -भाग २१

    कोणालाही मनापासून न आवडणारी पण, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देत असल्यामुळे वैद्य मंडळीना आवडणारी चव म्हणजे कडू.

    खरंच आहे. रोग नावाने कितीही मधुर वाटला तरी, प्रत्येक औषधात दडून बसलेली कडू चव मात्र रूग्णाचे जीवन गोड बनवते. या कडू चवीचा वापर युक्तीने जो वैद्य करतो, तो यशवान, गुणवान आणि परिणामी धनवान बनतो.

    जसा कडू रस आपल्याला तो आवडत नाही, तसा पोटातील कृमींनाही तो आवडत नाही. त्यामुळे कृमींना बाहेर काढण्यासाठी कडू चवीची औषधे वापरावी लागतात.

    कडू चवीची औषधे आईच्या दुधातील दोष दूर करतात. म्हणजे आईच्या दुधातून बाळाच्या पोटात जाऊन बाळाचे आजार कमी करू शकणारी, एवढी शक्ती असलेली ही कडू चव आहे.

    आंबट, तिखट, गोड चवींप्रमाणे चविष्ट नसल्यामुळे खाण्याची इच्छा कमी करणारी असते. त्यामुळे साहाजिकच प्रमेहनाशक परिणाम दाखवते. आणि पचनशक्तीवरचा ताण आपोआपच कमी होत असल्यामुळे पाचन वाढवणारी ठरते.

    कफ आणि पित्तनाशक गुणाची ही कडू चव तहान ताप मूर्च्छानाशक आहे. गळा, तोंड घशाची शुद्धी करणारी आहे. तसेच आमातून निर्माण होणारा चिकटपणा (क्लेद ) कमी करणारी, चरबी, मल मूत्र यांचे शोषण करून शुद्धीकरण करणारी, पचायला हलकी, आणि स्वभावाने थंड गुणाची आहे.

    विशेषतः तापावर गुणकारी, रक्तदोष कमी करणारी, शरीरातील आजारानंतर राहिलेली उष्णता किंवा औषधांचे दुष्परिणाम कमी करणारी आहे.

    व्यवहारात कारले, मेथी, हळद, औषधांमधे कडू किराईत ही जार कडू आहेत.

    कडू उपाय तात्कालिक बरा न वाटणारा असला तरी उज्वल आरोग्यासाठी तो आवश्यक आहे.

    अतिप्रमाणात वापरल्यास पित्त वाढते, साखर कमी होते, त्यामुळे थरथर होणे, शरीर आतून बाहेरून रूक्ष होणे, घसा कोरडा पडणे, बारीक होणे अशी लक्षणे दिसतात.

    कडू म्हटलं तरी चेहेऱ्याच्या सर्व शिरा आखडून घेतल्या जातात. कडू चव, चवीला रूचकर नसली तरी, तोंडाची गेलेली चव परत आणण्यामधे मात्र एक नंबर आहे.

    गेलेले धन परत आणण्यासाठी आणि बाहेर जाणारे धन बाहेर जाण्यापासून, वाचवण्यासाठी जसा एखादा कडू निर्णय घ्यावा लागतो, तसे रोग मुळातून घालवण्यासाठी कडू औषध देणे हा जालीम उपाय होतो.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    21.11.2016

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 12

    सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप.

    आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ?
    सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन झाली की, आंघोळ वगैरे आटपून नाश्ता. काही जणांचा नाश्ता हा उपीट पोहे, तर काहींचा इडली, आंबोळी, तर काही जणांकडे चपाती भाजी तर काही जणांकडे पेज किंवा मऊ भात असतो. तर काही जण पावात टोमॅटो काकडी कांदा गुंडाळून खातात, तर काही जण चहात बुचकळून पाव खातात की झाला नाश्ता !

    बायकोनं पहाटे लवकर उठून केलेला आणि आठवणीने बरोबर दिलेला डबा. बहुतेक वेळा डब्यात चपातीभाजीच असते. आणि भाजी म्हणजे सुक्या बटाट्याची. सांडायची भीती नाही. रसभाजी न्यायची म्हणजे पुलंच्या धड्यातील कोचरेकर मास्तर व्हायची भीती.

    दुपारच्या वेळेत डबा खाणे म्हणजे, तिथल्या तिथे डब्यातल्या डब्यात दोन्ही हातानी चपाती ओढून तोडून भाजीबरोबर गिळायची. प्लॅस्टिकच्या बाटलीतले पाणी ढोसायचे, उरलेले पाणी हाताला लावून हात "शुद्ध" करायचे. वर फक्कड चहा मारायचा की झाले. चार पाच वाजता, कोणीतरी दिलाच तर वडापाव, समोसा सहज जातो. तब्येतीला बरा म्हणून ज्युसचा ग्लास पोटात रिकामा होतो. रंमत गंमत घरी येईपर्यंत आठ वाजतात.बूट साॅक्स फेकून दिले, शर्टची वरची दोन बटणं काढली की, सोफ्यावर आडवे राहात, पाय खुर्चीवर ताणून, चेहेऱ्यावर जमेल तेवढा दमल्याचा आव आणायचा आणि डोक्याला आठ्या घालत, अश्शी ताणून द्यायची, की बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की, साहेब कोणत्यातरी मोठ्या लढाईहून घायाळ होऊन परतलेले सैनिकच आहेत.

    तिथूनच पोरांवर ओरडत, पंख्याची गरगर सुरू करायची ऑर्डर द्यायची, आणि आपण आल्याची वर्दी स्वयंपाकघरात आपसूक जायची. गरमागरम चहा आयता हातात पडेपर्यंत, बाहेर गरम झालेलं डोकं घरातल्या कुणावर तरी राग काढून शांत व्हायचं.भरपूर भुक लागलेली असल्यामुळे चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत चकली चिवडा फरसाणाचा डबाच घेऊन बसायचं. मग कुठेतरी जरा जीव शांत व्हायचा.

    "टिव्ही समोर बसून खायचं नसतं" हे सकाळी पोरांना ऐकवलेलं वाक्य विसरून जात, चहा चकली पोटात विरून जाते. दिवसभराचा तथाकथित सगळा शीण, टीव्ही मालिकेतल्या सुंदऱ्यांनी आणि जाहीरातीतल्या चिचुंद्यांनी तासा दोन तासात घालवला, की टेबलावर ताट पाणी यायला सुरवात होते. "आता कसं शांतपणे जेवता येतं. एकत्र चर्चा होते." हीच वेळ असते मुलांसोबत त्यांच्याशी अभ्यासपूस करायची. म्हणजे पोरं सुद्धा वाढलेल्या ताटाखालचं मांजर होतात. दिवसभर सगळं वचावचा खाल्लेलं असल्यामुळे रात्रीचे जेवण कसं साग्र संगीत बनवलेलं असतं, पुनः गरमागरम चपाती भाजी, आमटी, भात, सॅलेड, भाजी, उसळ, तळलेली दोन चार कापं, लोणचं पापड. ताट असं गच्च भरलेलं. भरल्या पोटानं उठून, हात धुवत, दात कोरत, हालत डुलत स्वारी थेट शयनकक्षात. स्वयंपाकघरातली आवराआवरी करून बाईसाहेब तासाभरात पुनः दुधाचा ग्लास घेऊन प्रवेशतात. आणि दुधाचा ग्लास रिता करून आमचा दिवस संपतो. भरल्यापोटी कशी मस्त झोप लागते ना.

    हे एवढं खाताना आपण चार ते पाचवेळा तरी ढेकरा दिलेल्या असतात.

    या जीवनपद्धती मधे आम निर्मिती, क्लेदामधे रूपांतरण या क्रिया अगदी सहजपणे घडत असतात. पहिले अन्न पचायच्या आतच दुसरा अन्नाचा गोळा वरून आत पडत असतो.

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चारच वेळा आपण खाल्लंय असं गृहीत धरू.
    सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी नाश्ता आणि रात्री पुनः जेवण.

    आता आपण कायदा केला, सकाळी आणि सायंकाळी जेवावे. या कायद्याची सोयीस्कर पळवाट पाहून ठेवू.

    असं करता येतं काय पहा.

    टीव्ही बंद, घरात सौ. ला थोडी हाताखाली मदत करायची, भाजी चिरून देणे, टेबल साफ करणे, नारळ खोवून देणे, ताटपाणी घेणे, कपबश्या विसळणे, अशी कामे जरा चुकली तरी फारसा ओरडा खावा लागणार नाही, मुलांची शाळा अभ्यास जेवताना बिलकुल नाही.आणि जेवणाचे कौतुक करतच जेवायचं.

    सकाळी नाश्त्याऐवजी जेवण करूनच बाहेर पडायचं. दुपारी जेवणाऐवजी नाश्ता करायचा. सायंकाळी घरी आल्यावर परत जेवायचे. आणि रात्रौ झोपताना भूक लागली तरच नाश्ता करायचा ! तोही अगदी सुका. दूध नको, पाणी नको. कुठेतरी राजगिरा लाडू, लाह्या, पाॅपकाॅर्न, चुरमुरे, भडंग, सुका मेवा, चिक्की, काॅर्नफ्लेक्स इ. पचायला हलके असणारा पण इकडे तर पोट भरती करणारा......

    हा नियम नाही, पण नियमातील प्रॅक्टीकल पळवाट आहे. पण शास्त्र तत्वाला कुठेही बाधा येत नाही.

    म्हणजे सकाळी जेवण सूर्याबरोबर, दुपारचा नाश्ता सूर्याबरोबर, सायं भोजन सूर्याबरोबर ! आणि रात्रौचा नाश्ता "सौ" बरोबर !!
    ये हो गया हिसाब बराबर, सौ साल के लिए !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.03.2017