देवदर्शनासाठी जायची सुद्धा लाज वाटू लागली. विज्ञान म्हणे देवाला मानत नाही. आपण देवाला मानले तर उगीचच आपणाला आर्थोडाॅक्स म्हटले जाईल, कदाचित याची लाजही वाटू लागली.
जीभेला लागताक्षणी डोळे बंद करायला लावणारी, आणि अंगावर रोमांच उभे करणारी, आंबट पदार्थाबरोबरीची ही एक समाजमान्य चव. लवण म्हणजे खारट चव !
नावडतीचे मीठ अळणी, म्हणणारा हा डाव्या हाताचा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.
मीठाशिवाय आमटी भात, भाजी ही कल्पनाच करवत नाही. चव वाढवायला हा लवणरस फार मदत करतो मीठाशिवाय पेरू, मीठाशिवाय आवळा, चिंच, बोरे. छे ! मजा येणारच नाही. भेळ पाणी पुरीचा धंदा तर या लवणरसाच्या जीवावरच चालतो.
सेंदेलोण, पादेलोण, काळे मीठ, बीड लवण, समुद्र मीठ, सर्व प्रकारचे क्षार, हे सर्व लवणरसाचे प्रतिनिधी आहेत. या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. सर्वसाधारणपणे लवण म्हणजे खारट चव ही उष्ण गुणाने आपले परिणाम दाखवते. त्यामुळे वात शमन व्हायला मदत करते.
शरीरात जिथे आखडलेपणाची भावना असते, तिथे हा लवणरस शिथीलता निर्माण करू शकतो. म्हणजे व्यवहारात कुठे लचकले, मुरगळले वगैरे तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेतो ना, तो या गुणामुळे.
लवण रस हा आयुर्वेद मतानुसार क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करणारा, गुणाने स्निग्ध असून आणि मलमूत्र वाताला शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा आहे.
याच्या उष्ण गुणामुळे स्नायु शिरा मांसपेशी मधील कडकपणा कमी होतो, आणि स्नायुमधे हलकेपणा निर्माण केला जातो.
गुण स्वभावाने तीक्ष्ण, भेदक, घाम निर्माण करणारा, आणि अंगचे पाणी न वापरता हवेतील पाणी स्वतःकडे खेचून घेण्याच्या (अव)गुणामुळे जखम चिघळवण्याची प्रक्रिया वाढवणारा असतो.
रक्तदाब वाढू नये, यासाठी मीठ जेवणातून बंद करायचा सल्ला आज दिला जातो, तो मीठाच्या याच अवगुणामुळे. (पण हाच अवगुण युक्तीने वापरला तर फायद्याचा देखील होतो. हे रक्तदाब आणि मीठाच्या पाण्याची आंघोळ या आरोग्यटीपेत यापूर्वी लिहिले आहेच.)
खालित्य म्हणजे केस गळवणारा, पलित्य म्हणजे केस पांढरे करणारा, कुष्ठ म्हणजे विविध त्वचारोग निर्माण करणारा, वली म्हणजे त्वचेवर सुरकुत्या आणणारा, सांगितला आहे.
सैंधव मीठाशिवाय बाकी सर्व मीठाचे भाऊबंद डोळ्यांसाठी हितकर नाहीत. म्हणजेच ज्यांना डोळ्यांच्या समस्या असतील, त्यांनी साध्या मीठाऐवजी सैंधव मीठ जेवणात वापरावे.
(आयोडीनयुक्त मीठ हा केवळ बिझनेस आहे, भारतातील एक दोन अतिउंच प्रदेश सोडले तर भारतात कुठेही आयोडीनयुक्त मीठ वापरण्याची आवश्यकताच नाही. हा वेगळा विषय होईल. )
एखाद्या पदार्थातील मीठ कमी झाले असेल तर टीका न करता, तो पदार्थ खावा. जास्ती झाला असेल तर वगळावा. काही जणांना तर वरून मीठ भुरभुरून घ्यायला पण खूप आवडते.पण हे पुढे त्रासदायक ठरू शकते.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायाने कितीही चविष्ट असले तरी ते ताटात वाढून घ्यायचे नसते. नैवेद्याच्या ताटातून गायब असलेला हे मीठ, एवढे नक्कीच शिकवून जाते, पानात वाढलेले हे मीठ, देवालासुद्धा चालत नाही.
समुद्रातूनच तयार झालेल्या, या लक्ष्मी, चंद्र, धन्वंतरि, विष, अमृत, पारीजात, कामधेनु, यांच्या या सहोदराला, पंधरावे रत्न म्हटले तरी चुक होणार नाही. पण त्याला नैवेद्याच्या पानात स्थान नाही, हे कटु सत्य पचवावेच लागेल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.11.2016
सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के,
कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.
पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:
१)गाईचे ताक:
भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.
२)म्हशीचे ताक:
दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.
३)शेळीचे ताक:
अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.
आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:
१)वातविकारात:
आंबट ताक सैंधव घालून प्यावे.
२)पित्तविकारात:
गोड ताक साखर घालून प्यावे.
३)कफविकारात:
लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग सहा !
काही फळांचे "सीझन" असतात. काही फुलांचा "हंगाम" असतो. काही वनस्पतींची "बेगमी" विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर "निसर्ग" म्हणतात.
आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ?
जांभळे, करवंदे, जाम, फणस ही फळेदेखील याच महिन्यात मिळतात. गुलमोहराचा बहर आत्ताच सुरू असतो. असे का होत असावे ?
निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे.
केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकाला इथे विशिष्ट जागा, आजच्या भाषेत "स्पेस" आहे.
निसर्गातील प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व निसर्गानेच तयार करून दिलेले आहे. सहा महिन्यांचा आदान काल आणि सहा महिन्यांचा विसर्ग काल त्यानेच बनवलेला आहे. पण आपण ते युक्तीने वापरत असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे शक्तीचे हे मैत्रीपूर्ण आदान प्रदान, कोणाच्याही, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू आहे. आणि असेच पुढे देखील सुरू राहणार आहे.
ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेत स्वतःचा बचाव कसा करायचा ही युक्ती आहे.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचा आस्वाद तेव्हाच घ्यावा. गरज असेल तर औषधी स्वरूपात टिकवून ठेवावा, औषधी स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आसव अरीष्ट, अवलेह, गुटी, वटी, गुलकंद इ. स्वरूपात कोणत्याही रासायनिक टिकाऊ द्रव्याशिवाय टिकवून ठेवायच्या पद्धती देखील अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.
व्यापारी वृत्ती आली आणि त्यातील औषधी गुण कमी होत गेले. हवं तसं ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळे देखील काही दिव्य औषधी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन, संगोपन होणे तेवढेच गरजेचे आहे.
जे द्रव्य नाशीवंत आहे, त्यावर प्रोसेस करून ते द्रव्य टिकवले जाईलदेखील, पण त्यातील औषधी गुणधर्म कमीच होतो, नैसर्गिक अधिवासामधे उगवलेली शतावरी, गुळवेल या सारख्या वनस्पती आणि कल्टीव्हेटेड वनस्पती यांच्या गुणांमधे नक्कीच फरक पडतो.
औषध म्हणून वापरायचे असल्यामुळे चालेल. पण जीभेचे चोचले म्हणून, फक्त तीन महिन्यात मिळणारा आंबा, "रस" या स्वरूपात टिकवून ठेवून, पावसाळ्यात खाल्ला तर त्रास नक्कीच होणार.
निसर्ग म्हणतो, तुम्हाला मी आंबे तयार करून पाठवलेले होते. तेव्हा तुम्हाला खायला वेळ नव्हता, तोच आंबा पुढे "अ-काली" खाल्ला तर, अकारण अग्निमांद्य निर्माण करून घेणार. जी गोष्ट आंब्याची तीच अन्य सर्व अन्नपदार्थांची ! इन्स्टंट फास्ट फूड आणि टू मिनटस मे रेडी पदार्थांची !
पाश्चात्य देशात, त्या देशांची ती गरज आहे, त्यांना निसर्ग अनुकूल नाही.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे ही मंडळी राहत असतात. चौवीस तास बर्फ, अवेळी पाऊस, चुकुन सूर्य दिसला तर आनंद होऊन, "गुड माॅर्निंग" म्हणणारे ते देश ! अन्य शेती व्यवसाय करायचा म्हटला तरी त्यांना ते शक्य होणारे नसते. म्हणून निसर्गाला पूरक परिस्थिती निर्माण करीत अन्नधान्यांचा साठा करावा लागणे, ही त्यांची गरज आहे.
आमच्याकडे " एव्हरी डे इज गुड माॅर्निंग " असताना, सिझनल फळे, फुले, भाज्या इ.इ. सर्व उपलब्ध होत असताना, ज्युस काढून पुनः त्यात विषारी किटकनाशके घालून, टिकवून, निसर्गाच्या विरोधात जाऊन, अवेळी खाऊन, रोग वाढवून, पुनः त्यासाठी अनैसर्गिक औषधे खायची !
ही हौस भारीच म्हणायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.05.2017
गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य.
भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं की तांडवच सुरू. म्हणजे लगेचच पित्त वाढण्याचा प्रकार. मन बिघडले तरी तळपायाची आग लगेच मस्तकात जाणार ! थोडक्यात आजच्या भाषेत "यांचा ना क्षणात रक्तदाब वाढतो" आता बरे आहेत, तर पुढच्या क्षणाला काय होईल याचा नेम नाही, असे शंकर प्रत्येक घरात, प्रत्येक पार्वतीच्या वाट्याला आलेले असतात. (काही घरातील शंकर पार्वती अपवाद सोडून) अशा शंकररावांसाठी बेल हे ऊत्तम औषध आहे. मन बिघडल्यामुळे होणाऱ्या पित्ताचा दाह कमी होण्यासाठी बेलाची पाने हे छान औषध आहे.
भोलेनाथांची पिंडी बेलाच्या पानांनी याच कारणासाठी झाकून ठेवतात. रेडीएशनमुळे होणारे उपद्रव कमी होण्यासाठी देखील बेल काम करेल.
कारण एक अभ्यास असा सांगतो, की जिथे शंकरांची जागृत ज्योतीर्लिंगे आहेत, तिथे खाली अणुसाठे असण्याची शक्यता आहे. ते झाकण्यासाठी पिंडाकार डोम !!! जगामधे जिथे जिथे अणुभट्ट्या आहेत, तिथे तिथे पिंडीच्या आकारासारखे छत असते. (/ डोम असतात.)
हे त्याच्यातील साम्य.
महत्वाचे आहे ते म्हणजे पित्ताचा दाह कमी करणे.
आजचे संशोधन हेच सांगतेय की बेलपत्राचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातोय.
यासाठी बेलाची चार पाने एक कप थंड पाण्यामधे सात आठ तास भिजवून ( आयुर्वेदीय परीभाषेत हिम करून ) ते पाणी पिण्यासाठी वापरावे. असे तीन महिने केल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो. असा अनुभव आहे.
तसेच पित्तशमनाचे काम दुधाचा अभिषेक पण करतो. नागोबालादेखील दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्यक्षात नागोबा दूध पित नाही, हे काय पूर्वजांना माहीत नव्हते ? नागोबाच्या लाह्या या उत्तम शोषक गुणाच्या आहेत. न पचलेले अतिरिक्त पाणी, आमसदृश्य विष शोषून घ्यायला लाह्याएवढे दुसरे चांगले औषध नाही.
प्रतिकपूजेमधे हे सर्व गृहीत धरलेले आहे.
देवाला वाहिलेली सर्वप्रकारची पाने फुले या पण औषधीच आहेत. या पानाफुलांनी, देवाला केलेल्या दुधाचा किंवा पाण्याच्या अभिषेकाने, हे पाणी किंवा दूध न रहाता, तीर्थ बनते. यातही या पानाफुलांचा औषधी अर्क उतरलेला असतो. म्हणजे हा तीर्थ प्रसाद औषधच झाले ना ?
आणि हा तीर्थ प्रसाद दररोज घ्यायचा. मग वेगवेगळ्या औषधांची गरज भासेल ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
10.09.2016
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकोणपन्नास
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग सात
न हुं कुर्याच्छवं पूज्यं प्रशस्तान मंगलानि च !
कोणाच्याही मृत शरीर म्हणजे शवाकडे पाहून तिरस्कार युक्त हुऽऽ असे तुच्छता पूर्वक संबोधू नये.
मरणानंतर वैर संपते, नंतर त्याच्या शवाची हेटाळणी किंवा विटंबना होऊ नये. श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर त्याचे केलेले और्ध्वदेहिक प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला वधल्यानंतर त्याचे थडगे बांधले. दुर्दैवाने पश्चात या थडग्याचे रूपांतर वातानुकूलित महालामधे केले गेले, हे उदात्तीकरण न्यायालयाने देखील अव्हेरले आहे. या उलट पाकिस्तानी सैनिकांनी अनेक वेळा भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची केलेली विटंबना आपणाला आठवण असेलच. इथे भारतीय संस्कारांचे महत्त्व लक्षात येते.
प्रसिद्ध व्यक्ती, विद्वान व्यक्ती, कुठेही दिसल्या तरी त्यांना नमस्कार करावा. एवढेच नव्हे तर सिद्ध वनस्पती दिसताच त्या वनस्पतीना देखील नमस्कार करावा. सिद्ध म्हणजे ज्यांचे औषधी गुणधर्म प्रसिद्ध आहेत अशा वनस्पतीना मनोमन वंदन करावे.
वेली वनस्पतीना देखील भावना असतात, त्यांना देखील स्पंदने कळतात. प्रत्यक्ष डोळे नसले तरी आजुबाजुला काय आहे, याची माहिती त्या घेत असतात. त्याचा आधारही आपल्या तंतु प्रतानाद्वारे घेतात. आपल्या आवाजाला, बोलण्याला, स्पर्शाला त्या प्रतिसाद देतात. माणसाच्या सहवासाने चाफा बहरतो, लाजरी स्पर्श झाला की लाजते, राहत्या घराजवळील काजु अधिक फळ देतो. हे तर प्रत्यक्षात दिसते.
आपला जन्म ज्या नक्षत्रावर झालेला असतो, त्या नक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो. म्हणजेच आपला तो वृक्ष आराध्य असतो. आपले रक्षण करणारा आपला वृक्ष आपल्याला माहिती हवाच. जेव्हा कुठेही उत्तर सापडत नाही, तेव्हा हा वृक्ष आपले आरोग्य रक्षण करायला मदत करतो.
नक्षत्र वृक्ष या कन्सेप्ट अनुसार काही ठिकाणी नक्षत्र उद्यान, हर्बल गार्डन, सुरू झालेल्या आहेत.
नक्षत्र कोणतेही असो. वनस्पतीचे संरक्षण तर झालेच पाहिजे. त्यासाठी वनस्पतींची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजुबाजुला असंख्य वनस्पती दिसतात, त्यांची नावे औषधी गुणधर्म आपणालाच माहिती असत नाहीत. हे गुणधर्म जर समजून घेतले तर अनेक छोट्या छोट्या आजारामधे आपण त्या वापरू शकतो. आणि हे ज्ञान फक्त आयुर्वेदच देऊ शकतो.
या वनस्पतीचे संरक्षण व्हावे, यांची ओळख पुढील पिढीला व्हावी, एखादी वनस्पती आपल्या जवळपास कुठे आहे याची आपल्याला माहिती असावी, यासाठी देवाच्या नावाने पत्री पूजा वाहाण्याचे कर्मकांड आपल्या धर्मात सांगितलेले आहे. वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, आवळी भोजन, कुष्मांड नवमी, शमी आपट्यासाठी दसरा, दुर्वांसाठी गणपती, बेलासाठी महादेव, देवीसाठी कमळ, विष्णुंसाठी तुळस, मारूतीरायासाठी रूईची माळ, अशा अनेक वनस्पतीसाठी अनेक सण आणि देवता निश्चित करून ठेवण्यामागील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. म्हणजे या प्रथा आणि कर्मकांडे का सुरू झाली याची उत्तरे सहज मिळतील.
प्रत्येक वनस्पतीकडे आदराने पहावे, तिच्यातील औषधी गुणाचे ज्ञान मिळवावे, तिचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी या वनस्पतीना देवतेसमान दर्जा देणारे आमचे ऋषी खरंच "ग्रेट" होते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०७.०९.२०१७
संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था.
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 4
ज्या पाण्याला गती नाही, त्या पाण्यावर शेवाळ धरते. बुळबुळीतपणा वाढतो. साठण्याची प्रक्रिया वाढली कि, कुजण्याची क्रिया सुरू होते. कुजणे म्हणजे बुडबुडे येणे. असे आपोआप बुडबुडे येणारे पाणी पचायला जड असते. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे जंतुनिर्मिती. जंतु पाण्याशिवाय वाढू शकतच नाहीत.
म्हणजेच जिथे जंतु असतात, तिथे फरमेंटेशन सुरू असते. जिथे फरमेंटेशन असते तिथे पाणी असते. जे पाणी स्थिर असते तिथे जंतुसंसर्ग आणि फरमेंटेशन सुरू होते. म्हणजेच स्थिर असलेले पाणी पिऊ नये. स्थिर पाण्यात शेवाळ धरते असे म्हणतात. प्रत्यक्षात तसेच दिसते. समुद्राच्या किंवा नदी, धबधब्याच्या हलणाऱ्या पाण्यात शेवाळ धरत नाही. पण तलावाच्या काठाला शेवाळ आढळते.
फेस आलेले पाणी पिऊ नये असेही ग्रंथकार म्हणतात. शुद्ध पाण्यात फेस येत नाही. याचा अर्थ ज्या पाण्यात फेस किंवा बुडबुडे दिसतात त्या पाण्यात काहीतरी अशुद्ध द्रव्य नक्कीच मिसळली गेली असणार. म्हणून हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.
पाणी तापवून प्यावे. एकदाच तापवावे. वारंवार तेच पाणी गरम करू नये. अतिथंड पाणी देखील पिऊ नये. हे ग्रंथकर्ते सांगताहेत, त्या काळात फ्रिजपण नव्हते आणि कोल्ड्रींक्सही नव्हती.
कार्बन डाय ऑक्साईड सारखे विषारी वायु, जे आपण उच्छ्वासावाटे बाहेर सोडतो, जे शरीरात राहिले तर शरीराचे नक्की नुकसान होणार असते असे आजचे विज्ञान पण सांगते, ते कार्बोनेटेड वाॅटर आपण गरज म्हणून पितोय कि गंमत म्हणून ????
शास्त्रकार द्रष्टे होते, त्यांना माहिती होते, आमची पुढची अतिबुद्धिमान पिढी पाण्याबरोबर जीवघेणे खेळ खेळत आपले आयुष्य पणाला लावू पहात आहे.........
निदान त्यांच्या पुढील पिढीच्या सुरक्षित आरोग्यासाठी तरी चार ओळी खरडून ठेवाव्यात, म्हणून जस्ट टाईमपास म्हणून लिहिले असावे कदाचित. एकतर त्यांच्या दौतीतली शाई संपत नसावी, किंवा बोरूच्या टोकाला, केवळ धार काढावी म्हणून बहुतेक लिहून ठेवण्याचे कर्म त्यांना सुचले असणार !
ही कोल्ड्रींक्स हे विष आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले असताना, त्यात बुडबुडे दिसताना, त्यांच्या पिण्यामुळे दात, हिरड्या, जीभ यांना झिणझिण्या येत असताना, पिल्यानंतर जीवघेणी ढेकर येत असताना, आपल्याला त्याची गरज नसताना, हे फेसयुक्त अतिथंड पाणी प्यायची काय हौस आहे, काही कळत नाही.
विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरं काय ?
शास्त्रकारांनी याच श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे,
फेनिलं, जन्तुम्, अतप्तम्, दन्त अग्राह्यम्, अति शैत्यतः न पिबेत् !
पण लक्षात कुणी घ्यायचे ?
शास्त्रावर विश्वास नाही, शास्त्रकारांवर विश्वास नाही.
आधुनिक विज्ञान सांगते तेही व्यवहार्य वाटत नाही.
अंगवळणी पडले आहे, एवढे सवयीचे गुलाम झालो आहोत ?
एवढं माहित असून पिणार असाल तर प्या. आणि भोगा आपल्या कर्माची फळे !
दुसरं काय म्हणणार ना ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
23.12.2016
।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।।
भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.
औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.
आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :
जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो.
केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.
केस व हाडांचा आयुर्वेदा मध्ये जवळचा संबंध आहे. केस हा अस्थिधातूचा मल मानला जातो. त्यामुळे जर माका केस बळकट करतो तर त्याचे कार्य हे आपल्या हाडांची बळकटी करायला देखील होणारच ना!
माका हा यकृत, प्लिहा ह्या अवयवांचे कार्य सुधारतो त्यामुळे रक्ताची कमतरता, भुक न लागणे, अजीर्ण, ह्यात ह्याचा चांगला उपयोग होतो.
त्वचा रोगात ज्या मध्ये स्त्राव येतो जसे गजकर्ण, इसब, ह्यात देखील ह्याच्या सेवनाने लाभ होतो.
ज्यांची दृष्टी क्षीण आहे त्यांनी ह्याचे नियमीत सेवन केल्यास दृष्टी सुधारते. त्यामुळेच ह्याला नेत्र्य असे म्हटले आहे.
माक्याचे बीज हे वाजीकर आहे अर्थात कामशक्ती वाढविते.
असा हा माका आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९६०६९९७०४
हे फळ जरी भारतीय नसले तरी त्याने आपल्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचे स्थान त्याने प्राप्त केले.असा कुठलाही पदार्थ नाही ज्या मध्ये आपण ह्याचा वापर करत नाही भाजी असो,आमटी असो,उसळ असो किंवा भाजी असो टाॅमेटो घातला की त्या पदार्थांची चव भलताच वाढते.
तसेच आता टाॅमेटो चटणी,सलाड,साॅस,केचअप तसेच बरेच चाटचे पदार्थ ह्यात हा हमखास वापरला जातो.तर असे लाल बुंद टोमॅटो सुप करायला देखील वापरतात.
खरोखरच ही भाजी दिसायला फारच आकर्षक असते.तो कच्चा खायला देखील छान लागतो.आणी मुख्य म्हणजे आपण ह्याची लागवड आपल्या बागेत करू शकतो.कारण ह्याचे झुडूप असते व त्याला हि फळे लागतात.
कच्चा टोमॅटो हिरव्या रंगांचा असतो चवीला आंबट असून थंड गुणाचा व तिन्ही दोष दुषित करणारा असतो.तर पिकलेला टोमॅटो हा लाल रंगांचा व थंड गुणाचा असून वातपित्तनाशक व कफकर असतो.
चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूयात:
१)मांसाहार केल्यावर त्या सोबत पिकलेला टोमॅटो खावा म्हणजे छातीत होणारी जळजळ,तहान लागणे,पोटातील जड पणा कमी होतो.
२)नीट पथ्य पाळून ज्या व्यक्तीला शरीरातील अनावश्यक चरबी कमी करायची असेल त्यांनी रोज पिकलेला टोमॅटो १००-२०० ग्राम खावा.
३)कोरडा खोकला,दम,थकवा,छातीत दुखणे ह्यात १ कप टोमॅटोचा रस+१ चमचा हळद पुड+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण रोज सकाळी प्यावे.
४)अजीर्ण,पोटफुगणे,चिकट पातळ संडास होणे,भुक न लागणे ह्यात १ कप टोमॅटो रस+१/४ चमचा मिरपुड+४ चिमूट हिंग+१/४ चमचा काळे मीठ हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे व दुपारी हलके जेवावे व रात्री उपवास करावा.असे १-३ आठवडे करावे फायदा होतो.
५)मन व शरीराचा थकवा,झोप शांत न येणे,तोंड कडू होणे,उल्टी होईल असे वाटणे ह्यात १ ग्लास टोमॅटो रस त्यात २ चमचे खडी साखर घालून रोज संध्याकाळी ४-५ च्या दरम्यान प्यावा ह्याने शरीर व मन ताजे तवाने व्हायला मदत होते.
६)गर्भवती स्त्रीने रोज खडीसाखर घालून टोमॅटोचा रस प्यावा त्यामुळे पोट साफ रहाते,थकवा कमी होतो व बाळंतपणा नंतर दुध चांगले सुटते.
कच्चा टोमॅटो कधीच खाऊ नये तसेच टोमॅटो वापरावा पण बिया काढुन.कारण जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर तो टोमॅटोच्या बियांनी वाढतो.
अतिमात्रेत टोमॅटो खाल्ल्याने पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti