आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग तीन
यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.
अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.
या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.
एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.
औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.
एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.
एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.
एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.
पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......
या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.05.2017
पाण्याची शुद्धाशुद्धता
पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे.
त्यासाठी शास्त्रकार ग्राम्य उदक असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व प्रकारच्या पाण्यात दोष असतात. दोष फक्त नलोदकात असतात, असे नाही.
अनेक आजार अशुद्ध पाणी पिऊन होत असतात, हे केवळ आधुनिक विज्ञान सांगते असे नाही तर, अतिप्राचीन आयुर्वेदात देखील, ज्या काळात दुर्बीणी, सूक्ष्मदर्शित्रे बहुधा नव्हती,( असं आपणाला आज वाटतं. ) त्या काळात आज न सांगितले गेलेले व्याधी पण सांगितले आहेत, हे नवल !
एवढेच नव्हे तर प्रदेशानुसार पाण्याचे गुण आणि दोषही सांगितलेले आहेत. जसे पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्राच्या दिशेत वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी हितकर असते, पण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी दोषयुक्त असते. ज्या नद्यांचे पाणी खळाळत वाहाणारे, दगडांवर आपटत इकडेतिकडे तुषार उडवित येणारे असते, ते पाणी पचायला हलके असते.
याउलट ज्या प्रदेशातील नद्या संथ वाहातात, पाणी हलताना पण दिसत नाही, अश्या नद्यांचे पाणी पिऊ नये. विषयाची व्याप्ती अधिक होऊ नये यासाठी हे फक्त माहितीसाठी सांगतो.
पाणी शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखावे या विषयी ग्रंथकार म्हणतात, जे पाणी साठवण्यासाठी दगडाचे कुंड किंवा डोणी असेल तर चांगले. किंवा दगडाच्या खोलगट भागात साठलेले पावसाचे पाणी उत्तम असते.
पण पहिल्या पावसाचे पाणी नकोच, असेही शास्त्रकार सांगायला विसरत नाहीत. त्यात वातावरणातील अशुद्धी जास्त प्रमाणात असतात. पहिले एक दोन पाऊस पडून गेल्यावर म्हणजे पाऊस चांगला सुरू झाल्यावर वातावरणातील दोष कमी होत जातात. पाण्यानेच ते धुवुन टाकले जातात.
सकाळी पाणी भरावे. दिवसभर वापरावे आणि सायंकाळी संपवून टाकावे. सूर्य असेपर्यंत पाण्यात दोष निर्माण होण्याचे प्रमाण कमी असते. नंतर मात्र त्यात जंतुसंसर्गामुळे दोष निर्माण होतात.
स्वच्छ वस्त्राने गाळून घेतलेले, सोन्याच्या वा मातीच्या किंवा काचेच्या पात्रात जमवलेले पाणी चांगले. तांब्याच्या किंवा पितळीच्या कल्हई केलेल्या भांड्यात पाणी ठेवलेले असेल तर त्यातील अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव मरतात, असे आजचे एक संशोधन सांगते.
पण तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवणे आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी वापरणे चुक आहे. ते पाणी कळकते. पाण्याची चव पण बदलते.त्या पाण्यावर सूर्य किरणे पोचत नाहीत अश्या पाण्याने व्याधी वाढतात.
आजचे वाॅटर प्युरीफायर किती भरवंशाचे आहेत, हे सांगता येत नाही.
आजच्या जाहिरीतीच्या जमान्यात सचीन सांगतोय ते बरोबर कि हेमामालीनी ? कोणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे.
धातुंचा पाण्याबरोबर संयोग होतो. साहचर्याचा परिणाम म्हणून ज्या धातुच्या भांड्यात पाणी ठेवणार, भले पाणी उकळले नसेलही, त्या धातुचे गुण अवगुण पाण्यात उतरणार हे नक्की आहे.
बरं आमच्या घरात लोखंडी नळात रात्रभर साठून रहाणारे आणि प्लॅस्टिकच्या टाकित साठवलेले पाणी तर आम्ही टाळू शकतच नाही.
आता आली का पंचाईत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.12.2016
हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही.
गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही औषधी उपयोग आहेत ते आता आपण पाहूयात.
१)१/२ चमचा तमालपत्र चुर्ण+४ चमचे लिंबाचा रस + १/२ ग्लास कोमट पाणी हे मिश्रण जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे घेतल्यास अन्नपचन नीट व्हायला मदत होते.
२)ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी १/२ चमचा तमालपत्र पूड +१/४ चमचा हिंग+ २ चमचे लिंबाचा रस+१ चमचा आल्याचा रस हे मिश्रण गरम पाण्या सह घ्यावे.
३)वारंवार जुलाब होत असल्यास १/२ चमचा तमालपत्र चुर्ण+१/२ चमचा सुंठ पूड गरम पाण्यासोबत घ्यावी.
४)ज्या स्त्रीयांना वारंवार गर्भपात होण्याची सवय असते त्यांनी १/२चमचा तमालपत्र पूड + ६ चमचे केळफूलाचा रस हे मिश्रण सलग तीन महीने घ्यावे पण क्रूपया वैद्यांचा सल्ला देखील घ्यावा हि विनंती.
५)सर्दी,डोकेदुखी,नाक चोंदणे ह्यात तमालपत्र पूड हुंगावी कफ पातळ होऊन पडतो.
तमालपत्र अधिक मात्रेत घेतल्यास पित्ताचा त्रास आणी शरीरातील धातू क्षीण होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.
आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.
जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.
म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.
वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.
हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.
जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.
पण कोणाला ?
ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021.
पानामधले महत्त्वाचे घटक झाले. पान, चुना, कात आणि सुपारी. हे सर्व पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. यातील प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण हे पदार्थ जेव्हा चावले जातात, एकमेकात मिसळले जातात, आणि सर्वात महत्त्वाचे, चघळले जात असताना, त्यात लाळ मिसळली जाते, तेव्हा या सर्वांचे मुलभूत गुणधर्म थोडे बदलून सौम्य होतात.
नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय.
छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो.
आम्ही घरीच येतो आठ वाजता
आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
उन्हाळा आला रे आला कि थंडगार कलिंगड खाल्ल्यावर खरेच अगदी आल्हाददायक वाटते.उन्हाची झळ हि काहि काळा पुरती का होईना बरीच कमी होते. ह्याला उन्हाळ्यातील थंडाव्याची झुळूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही,नाही का!
मस्त चाट मसाला घालून,किंवा मिरपुड व मीठ घालून देखील ह्याच्या फोडी रूचकर लागतात बरं का.कधी कधी तळपत्या उन्हातून आल्यावर ह्याचा ग्लासभर लाल लाल रस पिणे म्हणजे अमृत तुल्यच होय.हो पण हा रस फक्त उन्हाळ्यात क्वचित घेतल्यास चालू शकतो बरे अन्यथा फळ खाणे उत्तम.
कलिंगडाचा वेल असतो,ह्याच्या काळी व पांढरी अशा दोन जाती आहेत.काळी गोल असते तर पांढरी लांबट असते.पांढऱ्या जातीची कलिंगडे मोठी व गोड असतात.कलिॅगड हे फळ चवीला मधुर,थंड,कफकर व वात पित्तनाशक आहे.
चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूया:
१)पौष्टिक म्हणून कलिंगडाच्या बिया मगज ६ ग्राम+६ ग्राम खडीसाखर एकत्र करून खावी.
२)उन्हाळ्यात १ कप कलिॅगड रस+१/२ चमचा जीरे+१ चमचा खडीसाखर तीन वेळा घ्यावे शरीरातील उष्णता कमी होते.
३)१ ग्लास कलिंगड रस+२ चमचे लिंबू रस+ १ चमचा खडीसाखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे त्याने मळमळ,तोंडाचा बेचव पणा,छातीत जळजळ,उल्ट्या ह्या तक्रारी कमी होतात.
४)कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग+ कापूर+ चंदन हे मिश्रण अंगास लावल्यास अंगाची आग कमी होते.
५)बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास १ ग्लास कलिंगड रस+ १ चमचा आवळकाठी चुर्ण जेवणापुर्वी १ तास घ्यावे व मग जेवावे.
कलिंगड सेवनाचा अतिरेकाने जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
वाग्भट सूत्र स्थान 5 मधे ग्रंथकार असे म्हणतात, आकाशातून थेट खाली येणारे पाणी हे सर्वोत्तम. याला गांगेय जल, ऐंद्र जल, अंतरीक्ष जल किंवा दिव्य जल असे म्हणतात.
जमिनीतून पण पाणी वर येते, जसे विहिरीतून येणारे. याला भूमीतून येते म्हणून भूमीज किंवा भौमजल म्हणतात.
या दोन्ही प्रकारच्या पाण्याला कोणतीही विशिष्ट चव नसते, रंग नसतो, वास नसतो, पण तरीही ते जीवनदान देणारे आहे, म्हणून त्याला जीवन म्हटले आहे.
बाह्यरूपावर एखाद्याचे गुणमुल्य ठरत नसते, त्याच्या उपयोगितेवर त्याची किंमत ठरत असते. हे आत्महत्या करू इच्छिणाऱ्या मंडळींनी जरा लक्षात घ्यावे. जर असे विचार येत असतील तर झरा, नदी, धबधबा, समुद्र, तलाव, कारंजा यांच्याजवळ जावे. काठावर शांत बसावे, पाण्याचे उडणारे तुषार अंगावर झेलावेत, मनसोक्त पाण्याशी खेळावे, आणि मनातली सारी जळमटं धुवुन टाकावीत.
"मी हा असा, मला काही जमत नाही, माझ्यात काहीही गुण नाहीत, माझी इथे आवश्यकता नाही, माझी कोणाला गरज नाही, माझ्यामुळे कोणाचेही काहीही अडत नाही, मग मी जगायचे तरी कशाला", असे नकारार्थी विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांनी या खळाळत वाहाणाऱ्या पाण्याकडे पहावे. पाणी असा विचार करतं का ? मी कशाला वाहायचे ? माझं पुढे काय होणार आहे. गटारातून समुद्रातच जाणार. तिथेही माझी वाफच होणार. ना मला रूप ना गंध, ना आकार. मग माझ्या जिंदगानीचा काय उपयोग होणार ?
पण हेच पाणी कोणत्याही अपेक्षाशिवाय वाहात असते. "ज्याला हवे असेल तो माझ्या काठावर येतो आणि अमृतकण घेऊन जातो, हेच माझं मोठेपण" असा सकारात्मक अहंकार बाळगून हे जल इतरांना तृप्त करण्यासाठी समुद्रात विलीन होऊन जाते.
मनाला प्रसन्न आणि शुद्ध करण्यासाठी देखील हे जीवन काम करते. जेव्हा प्रकुपित पित्तामुळे राग अनावर होतो, अंगाची आग होते, मनाचा तोल जातो, तेव्हा पाण्याचा एक घोट लगेचच शांतपणा आणतो. प्रवासाचा शीण आलेल्या पाहुण्यांचे पहिले स्वागत पाणी देऊनच केले जात असते. प्रवासाचा थकवा एक घोट पाण्याने लगेच निघून जातो ना !
घरात वारंवार होणाऱ्या भांडणात हे पाणी आग कमी करणारे ठरू शकते. बाहेरून दमूनभागूनचिडून आलेल्या पतीला अथवा पत्नीला, घरात आधी हजर असणाऱ्यांने, दारात पाऊल पडताक्षणी जर पाण्याचा एक ग्लास नेऊन हातात दिला तर ??? सारा थकवा, सारी दुःख, सारा राग, नाहीसा झाल्यासारखा वाटेल.
प्रत्येकाला, वेळेत घरी यावंस वाटेल, मला पाणी विचारणारं कोणीतरी माझी वाट बघतंय, ही भावनाच कौटुंबिक संबंध घट्ट करत असते.
म्हणूनच याला जीवन ऐसे नाव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.12.2016
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
Copyright © 2025 | Marathisrushti