(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 23-धूपं समर्पयामी-अंतिम भाग चार

    कालच्या टीपेवरून एका गटात एक खोचक सूचना सुचवली गेली, "आपण म्हणताय त्याप्रमाणे अग्निहोत्र जर एवढे प्रभावी असेल तर सर्व हाॅस्पीटल्स, सूतिकागृहे, दवाखाने इ. मधे दररोज अग्निहोत्र केले तर डाॅक्टर, औषधे यांची काही गरजच उरणार नाही. अज्ञान दूर सारा, विज्ञान स्विकारा." उगाच नको ते सांगत राहू नका, या अर्थी त्यांना सांगायचे होते. विज्ञानाच्या नावाखाली आज काही पुरूषाधम वेडेकर मंडळींना भारतीय शास्त्रांचा, त्यातील सूत्रांचा खरा अर्थ कधी कळलाच नाही, ज्यांना अज्ञान विज्ञान शब्द सुद्धा, शुद्ध स्वरूपात लिहिता येत नाही, अश्या "ज्ञानी" व्यक्ती केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलत रहातात. पण असे बोलून आपण आपल्याच अज्ञानी जाती बांधवांचे नुकसान करून घेत आहोत, आणि आपले हसे करून घेत आहोत, हे पण यांच्या लक्षात येत नाही. असो. नुसता धूर काढत असतात झालं. तसा नुसताच धूर उदबत्यांमधून पण येतो.

    उदबत्ती हे धूपन चिकित्सेतील शेवटचे टोक. ही पूर्ण चिकित्सा नाही आणि फायदे देखील पूर्ण नाहीत. तरी पण काही अंशी धूर तयार होतो, म्हणून विचार करायचा.

    अगरबत्ती करायला बांबू वापरला जातो. भारतात बांबू कधीही जाळला जात नाही. तो शाकारणीसाठी, बांधकामासाठी किंवा तिरडी बांधण्यासाठी वापरला जातो. तिरडीवरचा बांबू आणि बांबूच्या कामट्या देखील सरणात जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. बांबू जाळल्याने जो वायु तयार होतो, तो स्वास्थ्याला हानीकारकही आहे, असेही वाचनात आले होते. अश्या बांबूचा वापर अगरबत्ती करण्यासाठी केला जाणे चुकीचे आहे.

    भारतीय परंपरेमधे केवळ धूप द्रव्य, हवन सामग्री एकत्र करून अग्नीवर अर्पण करायची पद्धत. या धूपद्रव्याला, बांबूच्या काड्यांचा आधार देणे भारतीय नाही, या बांबूच्या काड्यांना दुसरा समर्थ पर्याय निवडावा, असे मला वाटते. अन्य तज्ञांनी, आयुर्वेद वैद्यांनी वा अन्य वनस्पती शास्त्रज्ञांनी यावर आणखी प्रकाश टाकावा.

    अगरबत्ती मधे जी सुगंधी द्रव्ये वापरली जातात, ती पूर्णपणे नैसर्गिक असावीत. पण आज ज्या उदबत्या मिळतात, त्यात कृत्रिम वास येणारी रसायने वापरली जातात, जे योग्य नाही. परिणामी त्यापासून तयार होणारी विभूती ही देखील औषधी ठरत नाही. उदबत्ती अथवा अगरबत्ती मधे मुख्यतः उद अथवा अगर हे दोन पदार्थ वापरलेले असतात. याऐवजी जर गाईचे शेण गोमूत्र आणि गाईचे तूप, धूप, गुग्गुळ आणि नैसर्गिक सुगंध असलेली तेल द्रव्ये वापरली गेली तर त्याचे औषधी गुणधर्म मिळतील, नाहीतर फायद्यापेक्षा तोटेच जास्ती होतील.

    आता तर डाॅक्टर सुद्धा धुराची अॅलर्जी असं सुद्धा सांगायला लागलेत, देवळात जाऊ नका, धुराकडे नेऊ नका, त्यातील काही धूर औषधी आहेत, हे विसरून कसे चालेल ? नको ते धूर सोडायला सुरवात झाल्यावर हवे ते औषधी धूर सुद्धा बदनाम होऊ लागले आहेत.

    जी गोष्ट अगरबत्तीची तीच कछुआ जलाओ मच्छर भगाओ ची ! मग कंपनी कोणती का असेना, त्यात वापरलेल्या रसायनांनी डासांपेक्षा, माणसांचाच जीव गुदमरून जातो. लहान मुलांना तर या डासांच्या काॅईल्स खूपच हानीकारक आहेत. जी गोष्ट काॅईल्सची तीच वाफ निर्माण करणाऱ्या डब्यांची, किंवा कागदाला चिकटवलेल्या विषारी द्रव्यांच्या ठिपक्यांची. एका झटक्यात, फटक्यात प्रतिकारशक्तीच गायब होऊन जाते.

    सिगरेट ओढून स्वतःच्या छातीचा खोका करायचाच, शिवाय जो ओढत नाही, त्यालाही या विषारी धुराचा प्रसाद द्यायचा, डास मारण्यासाठी राॅकेल अर्धवट जाळून केला जाणारा विषारी धूर, गाड्यांमधे चुकीच्या प्रतीचे इंधन वापरून होणारा विषारी धूर, केमिकलचे कारंजे उडवणाऱ्या एमआयडीसीतील चिमण्यांमधील विषारी धूर, यामुळे होणारे प्रदूषण, याकडे कोणाचे लक्षच नाहीये.

    विषारी धुरापासून होणारे हे "स्लो पाॅयझनिंग" आहे, हे कोणाच्या लक्षात येत नाहीये का ? धूपन चिकित्सा बदनाम करणाऱ्या आणि नुसता विषारी धूर ओकणाऱ्या या मंडळींपासून सावधान.

    भारतीय पद्धतीप्रमाणे सर्व रुग्णालयामध्ये जर, सूर्योदय सूर्यास्त या वेळा पाळून अग्निहोत्र सुरू केले तर, रुग्णांची संख्या, आणि वाढते साथीचे रोग निश्चितच कमी होतील.......
    म्हणून तर ही "रिस्क" कोणी घेत नाही ना ! एवढी मोठी सोन्याची कोंबडी देणारी मेडीकल इंडस्ट्री कोणाला नको आहे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.06.2017

  • किचन क्लिनीक – फळभाज्या

    आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा.

    आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो हे एकुन आता तरी आपल्याला नवल वाटणार नाही हे मला पक्के माहित झाले आहे.

    चला तर आता पहिल्या भाजी पासुन सुरूवात करूया ना.बरं मग हि पहिली भाजी कोणती बरे,चला एक क्लु देते रामदेव बाबांच्या योग शिबिरे व योग व्याख्यानांमुळे ह्या महाशयांना बरीच प्रसिध्दी लाभली आहे.

    आता कसे बरोब्बर ओळखलेत तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधीभोपळा किंवा ज्याला आपण कोकणदुधी म्हणतो तोच हा बरं का!

  • नवी अस्पृश्यता

    सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग दहा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सोळा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आप्त म्हणजे ज्याला आपली निरपेक्ष काळजी आहे.
    अशी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात, ज्यांना आपली काळजी वाटते. पण ही माणसे कधीच समाजासमोर येत नसतात. पडद्यामागून आशीर्वाद देण्याचे काम करत असतात.

    अशा मंडळींना संत असे म्हणतात. यांनी त्यांचे चांगले विचार स्वतःमध्ये एवढे रूजवलेले असतात, की त्यांच्या संपर्कात जे येतील, त्यांनाही चांगला विचार करणे भाग पडते. या संपर्काला सत्संग म्हणतात.

    यांना ओळखायचे कसे ? हे आपल्या सान्निध्यात आले की, यांची वंदावी पाऊले..., ...तोची दिवाळी दसरा, असे आपल्याला वाटले पाहिजे ते संत.

    ग्रंथकार असे म्हणतात, की सतत यांच्या सेवेत राहिले म्हणजे आरोग्य मिळते. यासाठी आप्त-उपसेवित असा शब्द शास्त्रकार वापरतात.

    सेवा असोत वा उपसेवा म्हणजे इथे कुणाचे पाय चेपणे, त्यांच्या घरची बाजाररहाटादि कामे करणे, त्यांची सतत चमचेगिरी करणे नव्हे, ही असली कामे तर राजकारणी लोकांचे फंटर देखील करत असतात. किंवा पेड सर्व्हंटदेखील करत असतात. सेवा या शब्दाचा त्याहीपेक्षा वेगळा अर्थ इथे अपेक्षित आहे.

    आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या अशा संत लोकांमधील आप्त असण्याचे गुण शोधणे, आणि सतत ते गुण आपल्या अंगी आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे म्हणजे सेवा.

    संत म्हणजे प्रत्येक वेळी भगवे कपडे, गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, कमंडलू घेतलेले, सर्वसंग परित्याग केलेले, घर दार सोडून, बायको मुलांना टाकून, हरिहरि करत असतात असे नाही. तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक. ऐसी मती जयाची स्थिर असे सज्जन लोक हे पण आप्तच असतात.

    अशी मंडळी प्रसिध्दीपरान्मुख असतात. आतून बाहेरून वेगळे नसतात. सतत सकारात्मक विचारात असतात. त्यांचे विचार त्रिकालाबाधीत स्थिर असतात, बोलणे कमी आणि कृती जास्त असते.

    बाह्यलक्षणावरून यांना ओळखता येत नाही. त्यासाठी तशीच संतदृष्टी असावी लागते. तरच ते आपल्या आत प्रकट होतात. आणि चांगले विचार करायला लावतात. कारण ते आपले असतात. आप्त असतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०५.०८.२०१७

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा.

    सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
    त्यामुळे काय होते ?
    आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.

    पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.

    ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.

    आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.

    अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?

    खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.

    नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    03.05.2017

  • आहारातील बदल भाग ५९ – चवदार आहार -भाग २१

    कोणालाही मनापासून न आवडणारी पण, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देत असल्यामुळे वैद्य मंडळीना आवडणारी चव म्हणजे कडू.

    खरंच आहे. रोग नावाने कितीही मधुर वाटला तरी, प्रत्येक औषधात दडून बसलेली कडू चव मात्र रूग्णाचे जीवन गोड बनवते. या कडू चवीचा वापर युक्तीने जो वैद्य करतो, तो यशवान, गुणवान आणि परिणामी धनवान बनतो.

    जसा कडू रस आपल्याला तो आवडत नाही, तसा पोटातील कृमींनाही तो आवडत नाही. त्यामुळे कृमींना बाहेर काढण्यासाठी कडू चवीची औषधे वापरावी लागतात.

    कडू चवीची औषधे आईच्या दुधातील दोष दूर करतात. म्हणजे आईच्या दुधातून बाळाच्या पोटात जाऊन बाळाचे आजार कमी करू शकणारी, एवढी शक्ती असलेली ही कडू चव आहे.

    आंबट, तिखट, गोड चवींप्रमाणे चविष्ट नसल्यामुळे खाण्याची इच्छा कमी करणारी असते. त्यामुळे साहाजिकच प्रमेहनाशक परिणाम दाखवते. आणि पचनशक्तीवरचा ताण आपोआपच कमी होत असल्यामुळे पाचन वाढवणारी ठरते.

    कफ आणि पित्तनाशक गुणाची ही कडू चव तहान ताप मूर्च्छानाशक आहे. गळा, तोंड घशाची शुद्धी करणारी आहे. तसेच आमातून निर्माण होणारा चिकटपणा (क्लेद ) कमी करणारी, चरबी, मल मूत्र यांचे शोषण करून शुद्धीकरण करणारी, पचायला हलकी, आणि स्वभावाने थंड गुणाची आहे.

    विशेषतः तापावर गुणकारी, रक्तदोष कमी करणारी, शरीरातील आजारानंतर राहिलेली उष्णता किंवा औषधांचे दुष्परिणाम कमी करणारी आहे.

    व्यवहारात कारले, मेथी, हळद, औषधांमधे कडू किराईत ही जार कडू आहेत.

    कडू उपाय तात्कालिक बरा न वाटणारा असला तरी उज्वल आरोग्यासाठी तो आवश्यक आहे.

    अतिप्रमाणात वापरल्यास पित्त वाढते, साखर कमी होते, त्यामुळे थरथर होणे, शरीर आतून बाहेरून रूक्ष होणे, घसा कोरडा पडणे, बारीक होणे अशी लक्षणे दिसतात.

    कडू म्हटलं तरी चेहेऱ्याच्या सर्व शिरा आखडून घेतल्या जातात. कडू चव, चवीला रूचकर नसली तरी, तोंडाची गेलेली चव परत आणण्यामधे मात्र एक नंबर आहे.

    गेलेले धन परत आणण्यासाठी आणि बाहेर जाणारे धन बाहेर जाण्यापासून, वाचवण्यासाठी जसा एखादा कडू निर्णय घ्यावा लागतो, तसे रोग मुळातून घालवण्यासाठी कडू औषध देणे हा जालीम उपाय होतो.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    21.11.2016

  • आहारसार भाग ८

    रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच.
    ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे.

    गरज आहे ती शुद्धीकरणाची !
    अंतर्बाह्य शुद्धीकरण !
    अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत.

    जेवढे आपापल्या परिने शुद्ध रहाता येईल तेवढे रहायचे.
    जेवढे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न मनापासून करून अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा.
    एवढंच आपल्या हाती.

    समुद्रासारखं व्हायचं.
    समुद्र आतमधे काहीही घाण सामावून घेणारच नाही. जे काही आत नको असेल, ते ते सर्व बाहेर किनारपट्टीवर आणून टाकायचे !

    अगदी अनावश्यक विचार सुद्धा !
    मनापासून केलं तर नक्कीच यश मिळते,

    खाताना जेवढे शुद्ध सात्विक खाता येईल तेवढे खायचे.
    म्हणून तर आपण अन्नावर वेगवेगळे संस्कार करतो, ते त्यातील विष निघून जाण्यासाठीच. !

    धान्यांच्या बाबतीत, वारवणे म्हणजे वारा देणे, निवडणे, आसडणे, पाखडणे, चाळणे, घोळणे, धुणे, हे झाले प्राथमिक शुद्धी संस्कार.
    नंतर चिरणे, कापणे, फोडणे, वाफवणे, उकडणे, शिजवणे, तळणे, परतणे, गाळणे, फुलवणे, फुगवणे, आंबवणे, भाजणे, बेक करणे, हे सर्व संस्कार आपण अन्नावर दररोज अगदी सहजपणे करत असतो.
    कशासाठी ?
    अन्न सहज पचावे, याकरता सोयीचे व्हावे म्हणून केलेले जाणारे हे शुद्धी संस्कार !

    प्रत्येक पदार्थातील विष वेगळे. त्यामुळे त्याची शुद्धी वेगळी. जसे मोहोरी धुण्यासाठी माझी आई मोहोरी पाण्यात घोळून धुवायची.
    एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन एक वाटी एका हातात, त्या पाण्यात धरून ती हलवत रहायची. दुसर्‍या हाताने मूठमूठ मोहोरी घेत त्या वाटीत वरून हलकेच सोडायची. म्हणजे मोहोरीतले बारीक दगड पाण्यात घोळल्यामुळे, वाटीत आपोआपच तळाला बसायचे. वरची शुद्ध मोहोरी पातेल्यात यायची. दगड वाटीत जमा व्हायचे.
    आणि नंतर पातेल्यातील मोहोरी वाळवायची.

    काही पदार्थांची शुद्धी होऊच शकत नाही, म्हणजे जर्सी गाईच्या दुधाची शुद्धी कशी करणार ?
    दूध ऊकळून किंवा सुंठ, आले मिरी बाळशेप इ. औषधे घालून देखील या दुधाची शुद्धी होणारच नाही. अशावेळी या पदार्थाना आपल्या आहारातून कायमचे हद्दपार करणे, हाच सर्वोत्तम उपाय ठरतो.

    अशी शुद्धी जर प्रत्येक पदार्थाची करायची ठरवले तर अन्नशुद्धी फार कठीण नाही.

    पण वेळच नाही हो, कसं जमणार, जागाच नाही, माहितीच नाही, आईने शिकवलेच नाही, करायचं कुणी, अश्या वैचारिक द्वंद्वात सतत राहिल्यामुळे आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण हे असलं कालबाह्य काही करायची आमची मानसिक आणि शारिरीक तयारी नाही, असं म्हणून कसं चालेल ?

    कुछ (100 बरस ) पाने केलिए
    कुछ खोना पडता है !
    जिंदगी पाने केलिए
    गंदगी को हटाना जरूरी होता है !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    26.08.2016

  • आजचा आरोग्य विचार – भाग अकरा

    सकाळी उठल्यावर सर्वात पहिले आपले तळहात पहावेत. जे हात कष्ट करून पैसे मिळवणार आहेत, या हातानीच लेखन करून सरस्वतीला प्रसन्न करणार आहोत, तर शत्रूशी लढून स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबातील सर्वांचे संरक्षण करून शांती प्रस्थापित करणारी पार्वती, ह्याच हातामधे विराजमान असते, याची सकाळी सकाळी आठवण करून, नेहेमीच कर्म करायला प्रवृत्त करणारा, हा भक्ती मार्गातील एक ज्ञान पूर्ण श्लोक.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे  – भाग चार

    “शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “

  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – फरसबी

    हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात.

    २-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते त्यामुळे ती शरीरातील वात दोष वाढविते व कफपित्त हे दोष कमी करते.

    चला तर आता हिचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)गजकर्णा मध्ये फरसबीच्या पाल्याचा रस व लसणीचा रस एकत्र करून लावावा.

    २)खोल चरणा-या जखमेमध्ये फरसबीच्या पाल्याच्या रसात कापुस बुडवून वात करावी व दर दिवशी अशी नवीन वात त्या जखमेत ठेवावी साधारण पणे ३ आठवड्यात जखम भरते.

    ३)डोळ्यांची शक्ती वाढवायला इतर उपचारांसह रोज रात्री कोवळ्या फरसबीची भाजी जेवणात ठेवावी.

    ४)ज्या मधुमेह झालेल्या व्यक्तिच्या लघ्वीतून साखर जात असेल त्याला कोवळ्या फरसबीच्या शेंगा उकडून त्याला हळदींची फोडणी देऊन खायला द्यावी.

    फरसबी खायचा अतिरेक केल्यास पोटात दुखणे व संडासला घट्ट होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४