पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात.
उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल.
फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात प्रथम मोहोरी तडतवणे महत्वाचे असते. मोहोरीनंतर नंबर येतो हिंग किंवा मिरच्यांचा ! गरम तेलात हिंग फुलतो आणि शुद्ध होतो. हिंग वापरताना शक्यतो खडा हिंग आणावा. म्हणजे भेसळ कमी मिळते. आणून तो तूरडाळीमधे ठेवला तर डाळीला वास पण छान येतो आणि टिकते देखील.
सध्या पतंजलीचा हिंग चांगला आहे.
फोडणी करून झाली की त्यात
जी भिजवलेली कडधान्ये आहेत, ती घालावीत म्हणजे तेलाचा तडका आणि भडका कमी होतो नंतर हळद, उसळीचा मसाला, मिरचीपूड इ. घालावी, म्हणजे त्यातील औषधी गुण टिकून रहातील. नंतर थोडेसे परतून मग पाणी घालून शिजवावे.
यातील मसाले हे भूक निर्माण करतात, पचन घडवून आणतात किंवा वासाने सुद्धा पाचक स्राव वाढवतात. तिखट मिरची पूड नको असल्यास, आले, मिरी या मसाल्याचा वापर करावा.
पदार्थ शिजून झाला कि नंतर त्यात मीठ घालावे म्हणजे कमी पुरते. आणि उडून जात नाही.
युक्ती वापरून मसाल्याचा तीक्ष्ण उष्ण तिखट गुण कमी जास्त करावा. यासाठी प्रदेशानुसार नारळ किंवा शेंगदाणे कूट वापरावे.
कोणताही अन्नपदार्थ शिजवताना, त्यावर झाकण ठेवू नये, त्याला सूर्य, चंद्र, वारा, यापैकी कोणाचातरी स्पर्श व्हावा, असे विधान आहे. आणि पदार्थ शिजत असताना त्यातील काही घटक उडून जाणे देखील अपेक्षित असते. झाकण ठेवले तर आतील अन्नाला गरजेपेक्षा जास्त उष्णता लागते आणि जीवनसत्व नष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते. झाकण ठेवून शिजवले असता, इंधन वाचेल पण पदार्थ अपेक्षेपेक्षा जास्ती लवकर शिजतो. आणि गडबड होते.
अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वयात येणे धोकेदायकच असते ना !!!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
13.11.2016
गॅसनामा
गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.
फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "
हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.
या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.
गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !
हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.
वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.
या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.04.2017
पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते.
तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते.
ह्याचे १०-१२ फूट उंच वृक्ष असतो व ह्या झाडाला फांद्या नसतात.पाने ताडाच्या पानांप्रमाणे छत्राकार,विस्तृत व विभक्त खणांची असतात.फुले हिरवी,पांढरी व एकलिंगी असतात.फळ एक कोष्ट,लंबगोल,कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर असते त्याच्या आत बिया असतात ज्या चाॅकलेटी रंगाच्या व पाणीदार अशा पिकलेल्या फळात तर कच्च्या फळात पांढऱ्या असतात.
कच्चे फळ हे चवीला तिखट,कडवट असते ते उष्ण असते व कफ वात शामक असून पित्तकर असते.
तर आता आपण प्रथम कच्च्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या पपईचा चीक गजकर्णावर लावावा फायदा होतो.
२)मुळव्याधीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक लावल्यास ३ दिवसांनी मोड कमी होतो.
३)कच्ची पपई वाटून हातपायांवर बांधून झोपल्यास हातपायांची आग व भेगा कमी होतात.
४)कच्च्या पपईचे तुकडे मांस शिजवताना त्यात धालावे म्हटजे मांस लवकर शिजते व सुपाच्य होते.
५)कृमींवर मोठ्या माणसांना १ चमचा पपईचा चीक+साखर हे मिश्रण घ्यावे व लहान मुलांना हा चीक १-२ थेंब साखरे सह द्यावा.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अकरावा भाग खास
विशेष आहे अभ्यास ।
धरूनी सर्व शास्त्रास
नैसर्गिक उपवास ।।
आस्यासुख या शब्दावरून आठवले, आस्य या शब्दाचा एक अर्थ तोंड, मुख असा सुद्धा होतो.
म्हणजे आपण आस्य सुख या शब्दाने जीभेचे चोचले पुरवणारे सुख जे कफ वाढवणारे असते, ते सुख प्रमेहाचा हेतु असते, असे म्हणायलाही हरकत नाही.
जेव्हा ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जीभेचे फार चोचले नव्हते, त्यामुळे ग्रंथकारांना हा मुद्दा फार भर देऊन सांगावासा वाटला नसेल. पण आजच्या काळात मात्र हे जिह्वालौल्य खूपच वाढलेले आहे. याचे अतिसुख प्रमेहाचे कारण ठरेल. याचेच नव्हे तर कोणत्याही गोष्टीतील अति सुख किंवा अति दुःख हे सुद्धा रोगाचे कारण आहे.
शिवलीलामृतामधे देखील वर्णिलेलं आहे.
अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतिपूर्ण ।
अतिभोगं अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय।।
जिह्वा सुख म्हणजे मला जे आवडतं तेवढंच मी खाणार, बाकीचे नाही. मग ते हितकर असो, वा नसो. काही वेळा आपल्याला आवडत नसलं तरी एखादा पदार्थ आपल्याला खावा लागतो. त्यात आवड निर्माण करून खाल्ले तरच तो पचतो, नाहीतर नाही. आयुर्वेदातील बहुतांश औषधे न आवडणाऱ्या चवींची असतात. पण अंतिमतः सुख देणारी असतात, त्यामुळे कितीही वाईट तोंड करून प्यायला खायला लागली तरी हितकरच असतात, आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदीय औषधे कायमची घ्यावी लागत नाहीत. रूग्णाला खायला काय आवडतेय यापेक्षा, वैद्य जाणतो, रूग्णाचे हित कशामधे आहे. म्हणून पथ्य संकल्पना फक्त आयुर्वेदातच आहे !
आता या पथ्य अपथ्यामधे रुग्ण, वैद्याचे डोके खातो, हे वेगळं हं !
असो.
माझे हित कशात आहे, हे वैद्याला विचारून आपला आहार ठरवला तर मरेपर्यंत औषधांची गरज उरत नाही. यासाठी थोडा संयम पाहिजे मनावर. आणि मनावर संयम ठेवण्यासाठी जीभेवर....
म्हटलंच आहे ना,
जेणे जिंकिली रसना....
जिंकल्या साऱ्या वासना.
जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय सुद्धा !! वाक् इंद्रिय आणि रसनेंद्रीय !
एकाचे काम बाहेर टाकणे, जसे शब्द.बोलणे.
एकाचे काम आतमधे घेणे जसे अन्नपाणी. गिळणे.
नियंत्रित खाणे आणि विचारपूर्वक बोलणे हाच संयम. म्हणून या आत बाहेर वळवळणाऱ्या जीभेवर संयम ठेवला तरच सर्व इंद्रियावर संयम येतो. पटलं ना !
मला सर्व मिळतंय मग मी खाल्लं तर काय बिघडलं? मी भोगून संपवेन, प्रत्येक वेळी त्यागच करायला हवा असं कुठाय ? असा विचार करणं चुकीचं आहे.
माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवून खाणं, हे हितकर असते.
हे ज्याला समजले त्याला जीवन उमजले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.02.2017
तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव.
हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव.
अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव !
कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, स्थिरता, जडपणा, घट्टपणा. शत्रू म्हणजे विकृत कफाचे हे सर्व गुण क्षणार्धात नाहीसे करणारा, हा तिखट गुण.
कफामुळे जिथे जिथे शरीरात हे अवगुण दिसतात, तिथे तिथे त्याच्या उलट काम करणारा हा तिखट गुण.
गळ्याचे आजार, पितांब येणे, सर्व त्वचारोग, अंगाला येणारी सूज, सांध्यांना येणारी सूज, ह्रदयात येणारी सूज, पोटात साठून राहिलेला आम यांना हलवून टाकणारी, पोटावर साठलेली फाजील चरबी या सर्वांना नष्ट करणारी ही तिखट चव.
स्वभावाने उष्ण, तीक्ष्ण, भूक वाढवणारी, रूची देणारी, अन्नमार्गाचे संपूर्ण शोधन करणारी, बंधनांचा नाश करणारी, अल्प प्रमाणात वाढलेल्या आमाचे शोषण करून घेणारी ही तिखट चव !
प्रमाणापेक्षा जास्त वापरली गेली तर तहान, चक्कर येणे, कंठशोष होणे, शिरा आकुंचन पावणे, कंप सुटणे, पोटात दुखणे, वेदना निर्माण होणे, ही लक्षणे निर्माण होतात.
पातेल्याला असलेला चिकटपणा काढण्यासाठी, जोर लावून, खरडून खरडून, तळापासून उपाय केला तर कसे पातेल्याला चरे पडतील, तसे होईल.
म्हणजे काहीवेळा तसे करणे देखील, सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखे आवश्यकपण असते.
पाचशे हजारांच्या नोटा साठवून साठवून त्याचे रूपांतर जेव्हा विकृत आमामध्ये होते, तेव्हा त्याचा साठा हलवण्यासाठी काहीतरी जालीम तिखट निर्णय घेण्यासारखे आहे. मुळापासून सुपडा साफ. मग नाकातोंडातून पाणी येणारच !
मीठी चाय खिलानेवाला तिखा जो ठहरा. जैसे चाय मे अद्रक.
एक चायवाला भी इस विकृत आम को हटा सकता है !
पण आयुर्वेद मतानुसार
निःसुखत्वम सुखायच.
आता तिखट वाटेल, थोडा त्रास होईल, पण अंतिमतः सर्वांनाच सुख देणारे असेल अशी ही तिखट चव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.11.2016
आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ?
आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे.
आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते.
शिल्लक काय रहाते ?
जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते.
मागे साधे मीठच उरते !
जे खरंतर औषधी आहे.
आणि आम्हाला ऐशी पैसे किलोने मिळते. !!
मग आयोडीनयुक्त मीठ खाऊन फायदा कुणाचा ?
आणि आजचा सर्व्हे असा सांगतो, की भारतात अति उंचावर असणाऱ्या काही डोंगराळ प्रदेशामध्येच आयोडीनची कमतरता भासते. अन्य ठिकाणी आयोडीनची गरजच नाही. अन्य ठिकाणी समुद्रमीठातून, रंगीत फळामधून, रंगीत भाज्यांमधून, कडधान्याच्या वरील सालीतून, मासे,इ. समुद्री प्राण्यांमधून, सर्व प्रकारच्या लाल औषधामधून, कोकम, चिंच, शेंगदाणे, या आहारीय पदार्थातून, आपल्याला रोजच्यारोज आयोडीन मिळतेच. वेगळे आयोडीन घेण्याची तशी गरजच नाही.
हं, गरज आहे, मल्टीनॅशनल कंपन्यांची !
या ना त्या मार्गाने पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत.
मध्यंतरी काही जागरूक नागरीकांनी या विरोधात आवाज उठवला होता,
पण पुनः ये रे माझ्या मागल्या....
मोरारजी आणि जाॅर्ज फर्नांडिस यांच्या काळात...विदेशी, घातक, रसायनयुक्त कोल्ड्रींक्सवर बंदी आणली गेली.
नंतर ???
पुनः हातमिळवणी झाली. जाहीराती झाल्या, स्टार मंडळीनी त्यात सहभाग घेतला, राजकीय समीकरणे बदलली, त्यांचे अधिकृत आर्थिक प्रशिक्षण झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने विक्री वाढू लागली. तसेच, आयोडीनयुक्त मीठाचे झाले. नंतर काय ? ठेंगा
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.11.2016
प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो.
सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही.
आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच.
आणि नखं सुद्धा कापलेलीच असावीत, हे पण गृहीत धरलेले असते. नाहीतर नखातील घाण जेवताना पोटात जाते, त्याने पोट दुखते, हे इयत्ता दुसरी अ मधे आपण शिकलेलो आहोतच !
हेच भारतीयत्व !
बाळाला भरवताना सुद्धा चमचा वापरू नये. बाळाला सुद्धा या ज्ञानेंद्रियांचा अनुभव घेऊ देत ना ! घास किती गरम आहे हे आईच्या हाताला सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर घाई घाईत चमच्याने जर त्या बाळाला काही गरम भरवलं तर बाळाचं काही खरं नाही. जमाना जरी चमच्यांचाअसला तरी "हात" असताना, वेगळ्या चमच्यांची काय गरज ?
भात किती मुरडला पाहिजे, ते चमच्यापेक्षा बोटानाच कळेल ना. आता चायनीज राईस बाहेर मुरडायचा नसतो, हे मॅनर्स समजल्यानंतर चाजनीज राईस खायला चमचा ठीक आहे. पण नूडल्सना मात्र स्टीकच लागणार.
कोकणातल्या ताज्या शेवया खाताना हाताच्या पाची बोटांचा युक्तीने वापर करता यायलाच हवा. शेवया नारळाच्या रसात बुडवून अंगावर न सांडता, सर्व शेवया बाहेर न लोंबता, थेट तोंडात घालवण्याची ती मजा स्टीकने खाण्यात नाही.
दक्षिण भारतीय लोक इडली सांबार खाताना सुद्धा काटे चमचे वापरत नाहीत. इडली हातानी कुस्करून, सांबारात बुचकळून, भुरके मारत खातात.
पंजाबी लोकांना पराठा कधी चमच्याने खाताना बघितलंय ? दोन्ही हातानी धरून त्याला उभा आडवा फाडून दह्यात बुडवूनच खातात.
शेवग्याची शेंग चमच्याने कशी खाणार ? तर्जनी आणि करंगळी मधे उभी धरून थम्स अप करीत, सगळा गर अंगठ्यावर कोरून कोरूनच खायचा, त्यापेक्षा तो शेंगेचा तुकडाच तोंडात कोंबायचा आणि त्या तुकड्याचे पार रसग्रहण करून चोथा चिपाड करूनच बाहेर काढायचा, हा शेंग खाण्याचा उत्तम प्रकार.
आमरसात पुरी बुडवताना तिच्या दोन बाजू तर्जनी आणि अंगठ्यात पकडून पुरीला आमरसाच्या वाटीत अशी आंघोळ घालून बाहेर काढावी की जशी विहिरीत कळशी.
समोसा, वडापाव खाताना काय चमच्याने खायचा ? मस्त दोन्ही हातांनी धरून जणुकाही माऊथ ऑर्गन वाजवतो आहोत, असा भास दुसऱ्याला होईल अशा शिस्तीत राहूनच वडापाव खाल्ला पाहिजे.
आहारीय पदार्थ पचवण्यासाठी तो तोंडात जाण्याआधी ताटातच पचवून घ्यायला सुरवात झालेली असते, हे समजलं म्हणजे झालं.
जो पदार्थ जसा खायचा तसा खाल्ला तरच त्यातून इंद्रियाना आनंद मिळतो, नाहीतर करकोच्याला ताटलीतून आणि कोल्ह्याला बाटलीतून खीर "सर्व्ह" केल्यासारखं होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
17.03.2017
काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “मेडिकल इमेजिंग” या मराठी पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. या विषयावरील ते पहिलेच मराठी पुस्तक होते. मात्र छापील पुस्तकाच्या मर्यादांपासुन दुर होउन जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी या पुस्तकाला लेखमालेच्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होईल हे पटल्यामुळे ही लेखमाला सुरु करत आहे. “मराठीसृष्टी”सारख्या लोकप्रिय पोर्टलवरुन या लेखमालेतील लेख इंटरनेटशी जोडलेल्या हजारो मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यास उपयोग होणार आहे.
ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम का, मी लहानच तुकडे बारीक करणार. मला नाही ते काम आवडत, मला आपलं एवढंच जमेल, असं कोणताही दंतप्रकार म्हणत नाही. मोठे तुकडे आपोआपच सुळ्यांनी फोडले जातात. फोडलेले तुकडे दाढांकडे येतात, ते बारीक करून झाले की, परत इकडे तिकडे फिरवून काही शिल्लक राहिले नाही ना, याची चाचपणी मधे मधे जीभ करत असते, काही काम बाकी राहिले असेलच तर दात आहेतच. दातांना घट्ट धरून ठेवायला हिरडी आहेच. म्हणजे दात घट्ट हवेत तर हिरड्याही तेवढ्याच मजबूत पाहिजेत. नाहीतर ज्या घराचा पाया कमकुवत असतो, ती घरे कितीही सुंदर टाईल्सनी सजवलेली असली तरी छोटा भुकंप सगळं घर उद्ध्वस्त करून टाकतो, तसं एखादा खडखडा लाडू किंवा चिक्की चा तुकडा देखील, सगळे दात खाली पाडू शकतो.
एकमेकांना पूरक असलेले हे इंजिनियरींग आधी नीट शिकले तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही समस्या सोडवता येतील, असे वाटते.
कोणतेही अन्नावशेष बाहेर पडू नये यासाठी गाल आहेत. ज्यांचे गाल कॅन्सर सारख्या आजाराने काढावे लागलेत, त्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या की गालाचे महत्व समजते. केवळ गालावर खळी पुरते गाल लक्षात ठेवायचे नाहीत.
ज्या विधात्याने हे सर्व निर्माण केले तो केवढा मोठा स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल ना !
बारीक झालेले अन्न घश्यातून आत खाली जाऊ शकेल अशी खात्री झाली की, जीभ आपले काम करते. आणि अन्न खाली उतरवले जाते.
ढकलून दिले जात नाही, तर सापाच्या तोंडातून जसे अंडे हळुहळू आत सरकवले जाते, तसा अन्नाचा गोळा आत लहरीप्रमाणे सरकवला जातो.
अगदी अलगद लहरेदार !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.03.2017
Copyright © 2025 | Marathisrushti