हे सर्व शरीर, मन, आत्मा, इंद्रीय व्यापार, संसार, प्रपंच, परमार्थ हे सर्व कशासाठी? असे चिंतन करताना जाणवते की, आपण या सृष्टीकर्त्यांच्या हातातील एक बाहुले आहोत. जसं रंगमंचावर एकेका कलाकाराचा प्रवेश होत असतो, त्याचा संवाद संपला की तो दुसऱ्या बाजूने रंगमंचावरून मागे जातो. पुनः तिस ऱ्या बाजूने पुनः प्रवेश घेतो. समोर काही पात्रे नाचत असतात. त्यांच्या बरोबर काही वेळ काही संवाद करायचे आणि पुनः निघून जायचे असते.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस
बाबा सांगतात...
हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे.
संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे.
प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे "मित मधु भाषण" असावे.
श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, थोडे सत्य ! जिथे जसे आवश्यक असेल तसे. प्रसंगोचित.
कसे बोलावे, याची इतिहासातील काही उदाहरणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
विदुराने सांगितलेली विदुरनीती,
औरंग्याच्या दरबारातील शिवरायांनी दरबाराचा मान कसा राखायचा असतो, याबाबत राजा औरंगजेबाची त्याच्याच दरबारात केलेली कानउघाडणी,
शिवरायांच्या वकीलाने अफजलकडे जाऊन केलेली यशस्वी बोलणी,
रावणाच्या दरबारात जाऊन, सीतामाईना सोडून द्यावे अश्या अर्थाचे अंगदाचे बोलणे,
मुक्ताबाईनी ज्ञानेश्वरांना सांगितलेले ताटीचे अभंग, किंवा चांगदेव पासष्टी,
रामरायांनी वनवासात जाऊ नये याकरीता भरताने केलेली विनवणी आणि त्यावर श्रीरामांनी केलेले खंडन,
युद्ध नको म्हणून सांगायला श्रीकृष्ण कौरवांकडे गेला, ती प्रसिद्ध कृष्णशिष्टाई.
आणि अर्जुनाने युद्ध करावेच यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता
ही सर्व उत्तम संवादाची उदाहरणे आहेत. मुद्दाम सांगण्याचे कारण आता ही उदाहरणे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली आहेत. ती मुळातून आपण अभ्यासावी आणि मुलांना शिकवावी.
संवाद शब्दांनी वाढतो. मनात काय आहे, हे सुरांवरून कळते. काय करायला हवे हे देहबोलीतून कळते. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून समाधान मिळते.
या सर्वांचा आरोग्याशी संबंध काय, असे मनात येणं साहाजिकच आहे.
पुनः एकदा सांगतो, आपल्याला फक्त शारीरिक संतुलन म्हणजे आरोग्य, या संकुचित कोशातून बाहेर यायचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यासाठी हे गुण अंगी असावेच लागतात.
आपल्याला काय होतंय, हे जर रूग्णाला सांगताच आले नाही तर, वैद्याला रुग्णाच्या वेदना समजणार तरी कश्या ? जर आपल्याला काय होतंय हे सांगता येत नसेल तर घरी असताना शांतपणे एका कागदावर अथवा वहीत लिहून काढावे. त्यावर तारीख, वेळ लिहावी, शक्य असेल तर त्रास होण्याअगोदर चार पाच दिवस आपण काय काय खाल्ले होते, कुठे फिरलो होतो, त्याचा त्रास झाला होता का, इ. गोष्टी पण लिहून ठेवाव्यात. जर ही सर्व माहिती आपल्याला, वैद्यांना नीट सांगता आली, तर वैद्यांना निदान करणे सोपे होते.
आपल्यालाच नंतर भविष्यात ही आरोग्यवही, (खरंतर अनारोग्यवही) उपयोगी ठरणारी असते.
रुग्णापेक्षा वैद्यांकडे ही संभाषण चातुर्य असले पाहिजे. योग्य प्रश्न विचारून रुग्णाला काय होते आहे, हे त्याच्याच तोंडून वदवून घेणं ही वैद्याची कला आहे.
(म्हणजे रुग्णाला पोपट बनवायचे !! )
विशेषतः पथ्य अपथ्य ठरवताना, रुग्णाचा आधीचा इतिहास समजावून घेणं, वैद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ज्या भाषेत वैद्य शिकलेला आहे, त्यापेक्षा रुग्णाची भाषा कोणती आहे, त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचा रोग समजावून सांगता यायला हवा. त्याच्या बरोबर संवाद साधता यायला हवा. आजच्या भाषेत सांगायचे तर रुग्णाचे कौन्सिलिंग म्हणजे संवाद ! बरं हा संवाद साधत असताना आपली देहबोली म्हणजे हावभाव पण महत्त्वाचे असतात.
औषधांपेक्षा शब्द हे जास्ती गुणकारी असतात. कारण औषध फक्त पोटापुरते शरीरापुरते असते. शब्द हे त्यापलीकडील मनापर्यंत पोचतात. स्थूलापेक्षा सूक्ष्म हे जास्ती क्षमतेचे असते.
मनापेक्षा सूक्ष्म आत्मा. त्याच्याशी होणाऱ्या या आत्मसंवादाला शब्दांची पण गरज नसते. तिथे, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ही अनुभुति असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
पाणी शुद्धीकरण भाग नऊ
या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?
ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा....
आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं.... एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची...
गंमत होती सर्व ...
गेली ती सारी गंमत.....
"एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा," लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
" यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं...." माझं तिरकस उत्तर.
त्यावर ती म्हणाली,
" आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं."
तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
" पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
कुठेही उगवतं,
म्हणून त्याचं
कसंही निभावतं "
खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?
जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?
एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !
आजच्या भाषेत "इम्युनिटी" कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !
हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.01.2017
तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही.
भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही.
एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात अन्यत्र असतात.
रस्सा असो वा मिसळ.
त्यावर तरंगणाऱ्या तर्रीचा तिखट तर्रेबाजपणा कमी करण्यासाठी आंबट लिंबू वापरले जाते. भेळेचा भडकपणा कमी होण्यासाठी त्यावर चिंचखजुराच्या पाण्याचा शिडकावा केला जातो. चटणीमधे कैरी किंवा साॅसमधे टोमॅटो असतोच. या आंबटपणामुळे तिखटपणा थोडासा का होईना कमी केला जातो.
जेवण झाल्यावर बोटांना लागलेले तेल काढण्यासाठीच जेवताना ताटात उरलेल्या लिंबाची फोड पिळून बोटांना चोळली जाते, ती यासाठीच ! प्रत्येक रस एकमेकांना खूप मदत करीत असतो.
तशी आंबट, गोड आणि खारट यांची छुपी युती असते. सामील होणार नाही, पण बाहेरून पाठींबा जाहीर केलेला असतो. तसंच कडू तिखट तुरट चवींची मैत्री जरा जास्तच आहे. एक गट जेव्हा सत्तेत चलती नाण्याच्या बाजुला असतो, तेव्हा बाकीचे तीन विरोधी पक्षात बोंबाबोंब करत बाके बडवायला बसलेले असतात. कुरघोडी करण्यात यांचा हात कोणीच धरू शकणार नाही.
तिखट झालेल्या रसभाजीमधला तिखट तोरा कमी करण्यासाठी काय करावे ?
रसभाजीमधे पाणी वाढवून तिखटपणा कमी होईल पण भाजीची मूळ चव पण बिघडून जाते, यासाठी आंबट चव मदतीला धावत येते. झणझणीत झुणक्यामधे देखील आमसोलाचे आंबट घातल्याखेरीज भाकरीलापण बरे वाटत नाही. तळलेल्या मिरच्यावर मीठ घालून लिंबू पिळून घेतले की.. व्वा, क्या बात है ! हे आपण व्यवहारात पण पहातो. मिरच्यांचा खर्डा मात्र काही वेळा या आंबटाशिवाय लांब जाऊन भांडून फटकून बसल्यासारखा असतो.
आंब्बट्ट म्हटले तरी दोन्ही डोळे एकदम बंद होतात.
आंबटगोड हा युती शब्द उच्चारला की फक्त एक डोळाच बंद होतो.
आणि तिखटात आंबट नाही घातले, तर मात्र दोन्ही डोळे हेऽ एऽवढे उघडतात.
तिखट लोणच्याची, कधी गोडाशी मैत्री होऊच शकत नाही. तिथे तिखट-आंबट युतीच कामी येते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.11.2016
अ)दूधापासून तयार केलेले लोणी:
१)वारंवार पातळ भसरट संडास होत असल्यास १० ग्राम लोण्याचा समावेश दोन्ही वेळच्या जेवणात करावा.
२)ज्यांना वारंवार नाकाचा घोळणा फुटण्याची सवय असते त्यांनी जेवणानंतर १ मोठा चमचा लोणी समभाग साखर घालून खावे व त्यावर तासभर पाणी पिऊ नये.
३)डोळ्यांची आग होत असल्यास,वाचताना डोळे दुखत असल्यास,डोळे कोरडे वाटत असल्यास १ चमचा लोणी,१ चमचा मध,व १ चमचा त्रिफळा चुर्ण हे मिश्रण चाटण करून खावे मात्र त्यावर पाणी व इतर खाद्य पदार्थ खाऊ नये.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेसदतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? -भाग एकतीस
बाबा सांगतात...
देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये आणि कठोर शब्दांनी बोलू नये.
गाय या शब्दाने सर्व गोवंश घ्यावा. पूजा म्हणजे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा नाही. तर त्यांना योग्य तो मान द्यावा. गोवंश हा मानवाच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत असतो. केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य देखील सांभाळत असतो. म्हणून गोवंश संवर्धन झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी जो गोवंश राखला जात होता, तो हळूहळू कमी होत जातोय. ही धोक्याची घंटा आहे. म्हणून गोवंश संवर्धनाबरोबरच गोवंश रक्षणदेखील करायला हवे. अस्सल भारतीय गो वंश आज भारतातच उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त भारतीय गोवंश हा औषधीगुणांनी युक्त आहे. अन्य हायब्रीड पशू हे फक्त गायींसारखे दिसतात, पण औषधी गुणांनी शून्य. उलट अपाय करणारे अनेक रोग वाढवणारे एक विषारी प्रथिन त्यांच्या दुधामधे दिसते. म्हणून हायब्रीड दूध जसे, जर्सी, हाॅस्टन, एच एफ इ. अजिबात वापरू नये.
आयुर्वेदात गाईचे दूध आणि दही औषधी म्हणून सांगितले आहे. ते औषध म्हणूनच वापरावे. पण दह्या दुधाचा आहारात समावेश झाला की ते मधुमेहासारख्या आजारांना वाढवते, हे पण लक्षात ठेवावे. अगदी देशी गाईंचे दूध आवर्जुन पिणाऱ्या आणि पोरांना बळेबळे पाजवणाऱ्या माता पिता पालकांनी हे लक्षात घ्यावे, की दूध हे कष्टाचे काम करणाऱ्या श्रमजीवी वर्गासाठी आहे. खुर्चीत बसून, मान खाली घालून, केवळ बटनांशी चाळा करीत, काम करणाऱ्या काटकोनी बुद्धीजीवींना नाही. आहारात जे अत्यंत आवश्यक आहे,असे ताक, लोणी आणि तूप मात्र आम्ही कटाक्षाने टाळू लागलो आहोत. हा बुद्धीभेद कोण करतंय, या विषयी सविस्तरपणे मागे लिहिले होतेच.
वृद्धांना योग्य तो सन्मान द्यावा. इथेदेखील सर्व जाती धर्माचे वृद्ध असेच अपेक्षित आहे आणि योग्य तो सन्मान करावा हे अनादि कालापासून सांगितले जात आहे, याचे स्मरण करून देतो. पाश्चात्य संस्काराचा परिणाम म्हणून जी मानसिकता बदलत गेली, त्याचा परिणाम म्हणून, वृद्धांचा समावेश असलेली एकत्र कुटुंब व्यवस्था लयाला गेली आणि प्रत्येकाचे छोटेखानी कुटुंब जन्माला आले. ते सुद्धा हम दो हमारा एक. आता तेही नाही. आणि जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आश्रम ! भारतीय संस्कृतीला अत्यंत लाजीरवाणे असलेले हे वृद्धाश्रम भारतात झपाट्याने वाढताहेत हे चांगले लक्षण नाही. आता दत्तक वृद्ध घ्यायची नवीन परंपरा सुरू झाली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
कृपया या वाक्यातून यातून सोयीस्कर अर्थ काढू नये. जेव्हा हे वृद्धाश्रम बंद होतील आणि पुनः एकत्र कुटुंब व्यवस्था सुरू करण्याची भारतीय मानसिकता निर्माण होईल तो सुदिन !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही.
मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत.
डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. आहार परिपूर्ण होण्यासाठी हे पदार्थ आवश्यकच आहेत.
आहारातील सहा चवींपैकी तीन चवी या डाव्या बाजुलाच आहेत. आंबट, खारट, कडू. जेवताना या चवींचा वापर युक्तीने करायचा असतो. यातील एकही चव कमी होता नये, तरच आहार परिपूर्ण होतो. हे लक्षात ठेवावे.
या प्रत्येक चवीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. ते जेवताना जपले पाहिजे. एखादा पदार्थ बंद केला तर तो आहार पूर्ण होणार कसा ? पुनरूक्ती दोष स्विकारून लिहितो,
मधुमेह झाला तर गोड बंद केले जाते.
पित्त वाढले तर आंबट, तिखट बंद.
रक्तदाब वाढू नये म्हणून खारट बंद.
आवडत नाही, म्हणून कडू पण बंद.
राहिली फक्त तुरट चव. ज्यातून पोषण काही होत नाही.
मग आपले जेवण परिपूर्ण कसे बनणार ?
आणि पॅथाॅलाॅजीचे रिपोर्ट पण परिपूर्ण कसे येणार ? एखादी चव इकडेतिकडे झाली कि त्याचा परिणाम रिपोर्टमध्ये दिसणार. त्याची पूर्तता करायला एखादी गोळी कायमची सुरू होणार.
त्यापेक्षा आपले नेहेमीचे जेवणच संतुलित ठेवावे. हा सोपा उपाय.
एखाद्या चवीचा पदार्थ काय गुणाचा, अवगुणाचा आहे, हे शास्त्रकारांनी ग्रंथात वर्णन केले आहे.
म्हणजे खारट पदार्थांनी केस गळतात, कडू चवीने धातुक्षय होतो, गोड पदार्थ खाल्ले की चरबी वाढते इ.इ.
याचा अर्थ ती चव अवगुणीच आहे, ती कायमची बंद करा, असे मात्र नक्कीच नव्हे.
तात्पुरत्या बिघडलेल्या दोषांवर विजय मिळवण्यासाठी त्याचे सर्व गुणअवगुण परिचित असावे लागतात, म्हणून त्यांना साम्यावस्थेत, म्हणजेच पूर्वपदावर आणण्यासाठी काय युक्त्या योजाव्यात, याचे दिशादर्शन वैद्यांना होते. म्हणून ग्रंथ शिकायचे असतात. त्यांना प्रमाण मानायचे असते, पण व्यवहारात मात्र स्थळ काळ वेळेनुसार यात बदल करण्याचे सर्व अधिकार ग्रंथकारांनी वैद्यांकडे दिलेले आहेत.
एखादा मुलगा वांड असतो, एखादा अवगुण त्याच्यात असतो, म्हणून आई बाबा त्याला झिडकारत नाहीत, तर युक्तीने त्याचा अवगुण कसा कमी करता येईल, हे पहातात. काहीवेळा प्रेम करून, काहीवेळा समजावून, कधीतरी थोडीफार शिक्षा करून, तो अवगुण काढण्याचा प्रयत्न करणे याला जीवन ऐसे नाव !
इथे तर कोणीच परिपूर्ण नाही. जेवणात आणि जीवनात देखील ! कुठेतरी कोणीतरी कमी अधिक असणारच.
परिपूर्ण तर नवीन सुन पण नाही, आणि अनुभवी सासु पण नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे गुण अवगुण जाणणे, एकमेकांच्या चवी समजून घेणे, हे घर सांभाळण्यासाठी, अत्यंत आवश्यक आहे. तरच उत्तम संसार होतो.
मनापासून प्रेम करणारी, पण बाहेरून तत्वांसाठी भांडणारी, अवखळ फटकळ बहिण भावासाठी बाहेरून आंबट, पण आतून मधुर असते, पण नणंद या भूमिकेतून तिखट वाटते. मेहुणीचे मात्र तसे नसते हो, ती सदाबहार मधुर असते.
तसेच या चवींचे आहे.
कोण जास्त तिखट आहे, कोण कडू बोलतंय, हे इतरांनी समजून गोडपणा वाढण्यासाठी, काय करायचं हे ठरवावं लागतं. आमटी तिखट असली तर त्याला बॅलन्स करणारा आंबट आणि गोड पदार्थ वाढवावा, की झाले. तिखट आमटी टाकून देण्याची आवश्यकता नाही.
हे ज्या घरातील सासु सुनाना कळते ते घर सुदृढ होते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.11.2016
एकदा मिक्सर सुरू झाला की झाकण मधेच उघडायचं नाही, मधेच झाकण उघडलं की आतील सर्व बाहेर उडते. तस्संच एकदा पचन सुरू झाले की आत टाकणे बंद करायचे. एकदा भोजनान्ते पिबेत तक्रम् झाले, तोंड धुतले, मुखवास खाल्ला की नंतर अधे मधे काही खायचे नाही की प्यायचे नाही.
पातेल्यात समजा भात करायला ठेवलाय, पाणी उकळायला सुरवात झालेली आहे, तांदुळ आत घातले आहेत, अर्धवट शिजलेले आहेत, आणि मधेच आणखी दोनतीन पाहुणे आले. त्याच्यासाठी वाढीव भात करायचा झाला तर, अर्धवट शिजत असलेल्या भातात परत तांदुळ टाकायचे का ?
असं केलं तर भात नीट होणार नाही. बिघडून जाईल.
पीठाच्या चक्कीमधे वरून धान्य घातले आहे. पीठ पडायला सुरवात झाली आहे, आणि अचानक लोड शेडींग सुरू झाले, चक्की बंद झाली.
तर काय होते ?
जे धान्य आतमधे होते ते जैसे थे अवस्थेत रहाते. पुनः जेव्हा लाईट येतील, तेव्हा परत चक्की सुरू होईल, पण धान्याचे काही कण, न भरडताच पुढे जातात आणि पीठ चाळून घ्यावे लागते.
तसेच पचन एकदा सुरू झाले, मिक्सर एकदा सुरू झाला की मधे थांबवणे नाही. कोणत्याही कारणाने मधेच आतला मिक्सर थांबला/ थांबवला की पचनावर परिणाम होतोच.
म्हणून आज्जी म्हणायची, अरे जेवताना मधेच उठू नये. भरल्या ताटावरून उठून जाऊ नये एकदा जेवायला सुरवात केली की, सर्व लक्ष जेवणातच हवे. मन जेवताना तिथेच हवे. नाहीतर आतमधे काय हवं नको, हे समजणार कसं ?
आज आपण जेवण कसे जेवत आहोत, याचा या निमित्ताने विचार व्हावा. आजच्या काळाचा विचार केला तरीसुद्धा जेवताना शांतपणे, पूर्ण लक्ष जेवणातच ठेवून, पूर्ण आनंद घेऊन जेवणे एवढे अशक्य कोटीतले आहे का ? टीव्हीवर मॅच नाहीतर मालिका मल्लिका पहात जेवणे, गप्पागोष्टी करत जेवणे, मोबाईल वर चॅट करत जेवणे, वाॅटसप पहाता पहाता जेवणे, जेवण अर्धवट टाकून उठणे, जेवताना अभ्यास करणे, जेवणानंतर स्वीट डिश, आईस्क्रीम खाणे, हे असे केल्याने पचन बिघडते.
स्टार्ट टू फिनिश जेवण एका स्ट्रोकमधेच झाले पाहिजे.
विदाऊट ब्रेक, विदाऊट जाहिराती कार्यक्रम पहायलादेखील आपल्याला किती आनंद मिळतो ना !
मग अस्सच जेवण, विदाऊट ब्रेक, विदाऊट कमर्शियल अॅड, झालं तर पचवणाऱ्याला किती आनंद होईल ना ?
पण नाही.
"मला जेवतानाचाच वेळ बोलायला मिळतो, जेवत असताना समजा अर्जंट काॅल आले तर काय करायचं ?" हे असे लंगडे समर्थन आपले आपण करून घेत असतो, आणि त्याचा आनंद, आपण हिरावून घेत असतो.
म्हणजे, पोट माझे आहे, मी काय हवे ते करेन, त्या पोटाने मी जे (अत्याचार ) करतो ते सहन केलेच पाहिजे, या मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे.
ही इंद्रिये हे अवयव, हे मन, त्याने या जन्मापुरते आपल्याला सांभाळायला दिलेले आहे. ते नीटच सांभाळले पाहिजे. त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ....
नाहीतर तो देईल त्या शिक्षा भोगायला तयार असले पाहिजे..
वुई आर ओन्ली अ केअर टेकर ऑफ थिस बाॅडी ! वुई हॅव टु........
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.03.2017
जेवताना जेवणात केस सापडणे म्हणजे जेवणाऱ्या व्यक्तीचा अपमान समजला जाई. एवढे निशिद्ध समजले गेलेले केस सौंदर्य स्पर्धांमुळे जरा जोरातच फडफडायला लागले. केस जेवणात पडू नये म्हणून डोक्यावर टोपी घातलेली दाखवली की झाले. केस बांधून, छान वेणी घालून पोरगी आली म्हणजे ती बावळट झाली. असा गैरसमज कधी झाला आम्हाला कळलेच नाही.
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
Copyright © 2025 | Marathisrushti