(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    04.04.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३५

    निषेधार्ह पाणी भाग तीन

    नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
    पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
    ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।

    वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत.

    आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते कधी येतात ? ऋतु सहा असतात, हे तरी आठवते आहे का ? "लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय." असे आपण म्हणाल. "शरद पोंक्षे माहिती आहे, हा शरद ऋतु कोण?" असं पोरगं विचारेल. विचारून पहा, गंमत म्हणून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या पोरांना. ऋतु म्हणजे काय हेच माहिती नसेल. शरद ग्रीष्म दूर राहिले.

    आताच्या दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतुचा कालावधी. आणि एप्रिल मे चा सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतु समजावा.
    जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याची सूर्याच्या सरळ आणि तीक्ष्ण किरणांनी परत वाफ व्हायला लागलेली असते. वातावरणात उष्णता वाढलेली असते. तसेच शरीरात देखील पित्ताचा प्रकोप सुरू झालेला असतो. हा काळ म्हणजे रोगांचे माहेरघरच. म्हणूनच सुभाषितकार गंमतीने या शरद ऋतुला वैद्यांची माता म्हणतात. आजच्या भाषेत, अनेक रोगांचा 'सिझन' सुरू होतो. वैद्यांचे आर्थिक भरणपोषण सुरू होते.

    आणि दुसरा उल्लेखित ग्रीष्म ऋतु. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली नेऊन पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारा, तोंडचे पाणी पळवणारा, अंगातून पाण्याचे लोट घामाच्या रूपात बाहेर काढणारा हा ऋतु अगदी पाऽणीऽ पाणीऽऽ करायला लावतो. यावेळी वाग्भटजी म्हणतात, या दोन ऋतुंखेरीज पिबेत स्वस्थोऽपि अल्पशः

    या दोन ऋतुमधे पण पाणी पिताना जरा काळजी घ्यावी. ग्रीष्मात तर पाण्याची पातळी खूपच कमी झालेली असते. जिथे टॅकरने पाणी पुरवठा होतो, तिथे पाण्यात अनेक अशुद्धी मिसळलेल्या असतात. अन्य भागात देखील पाणी जाड होते. ते शुद्ध केल्याशिवाय वापरू नये.

    जसं वातावरणात उष्णता वाढलेली असते, तशी शरीरातील दोषांची स्थिती बदललेली असते. तिन्ही दोष आपले मूलस्थान सोडून बाहेरच्या दिशेत गेलेले असतात. जठरातील अग्निचे बल देखील प्राकृत नसते. त्यामुळे आधीच व्याधींनी आलेला अशक्तपणा असताना, पाण्यासारखा अग्निविरोधी घटक पोटात ढकलणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी अवस्था होते. या रोगग्रस्तांनी तर पाणी पिऊ नयेच. पण ज्यांना आपल्याला रोग होऊ नयेत, अशी इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिताना साधे पाणी पिऊच नये. उकळलेले पाणी पिताना देखील चार वेळा विचार करून कमीच प्यावे, विचारपूर्वक प्यावे. गरजेपुरते प्यावे. सुसंस्कारीत जल प्यावे. व्याधीनुसार, दोषांच्या अवस्थेनुसार, वैद्य सल्ल्यानुसारच प्यावे. हवेच असेल तर ते सुद्धा काही तरी औषधी घालूनच !

    मनुष्य खूपच अशक्त असेल तर प्राणधारण होईल इतके पाणी थोडे थोडे पाणी जरूर प्यावे, कारण पाणी हे जीवन आहे.

    पण कोणीतरी सांगतो आहे म्हणून, कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, अमुक गुरूजींनी सांगितले म्हणून, मला वाटले म्हणून, चॅनेलवर ऐकले म्हणून, वाॅटसमधील मेसेजमधे वाचले म्हणून, आमचे डाॅक्टर सांगतात म्हणून, आईने सांगितले म्हणून, नॅचरोपॅथीचा उपाय म्हणून, या योगतज्ञाने सांगितले म्हणून, जिममधल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले म्हणून, मैत्रिणीने सांगितले म्हणून, स्कीन हेल्दी रहाण्यासाठी माझ्या ब्युटीशियनने सांगितले म्हणून, मूतखडा होऊ नये म्हणून, वैदूने सांगितले म्हणून, मुळव्याध भगंदरवाल्याने सांगितले म्हणून, अगदी बायकोने सांगितले तरीसुद्धा......
    अ ति
    पा णी
    पि ऊ
    न ये

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

  • आयसोटोप स्कॅन (न्युक्लिअर मेडिसिन)

    आयसोटोप स्कॅन (न्युक्लिअर मेडिसिन)

    या तपासात पेशंटच्या शिरेमधून किरणोत्सर्गी पदार्थ (अथवा आयसोटोप) इंजेक्ट केला जातो. तो विविध इंद्रियांमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन्स एमिट करतो व कॉम्प्युटर या फोटॉन्सची इमेज बनवतो.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा.

    सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
    त्यामुळे काय होते ?
    आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.

    पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.

    ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.

    आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.

    अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?

    खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.

    नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    03.05.2017

  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – कोथिंबीर

    आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि वाढते.

    कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात.हि चवीला तुरट,कडवट व गोड असते व गुणाने थंड असते.म्हणुनच हि शरीरातील तिन्ही दोष शांत करते.

    जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.

    १)तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.

    २)डोकेदुखी मध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.

    ३)कामाच्या दरम्यान जर चेहर्याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्यावर ठेवाव्या थंडावा मिळतो.

    ४)वारंवार उल्ट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.

    ५)ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यांवर करावा.

    ६)हाता पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढुन हातापायांच्या तळव्यांना चोळावा.

    कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – फरसबी

    हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात.

    २-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते त्यामुळे ती शरीरातील वात दोष वाढविते व कफपित्त हे दोष कमी करते.

    चला तर आता हिचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)गजकर्णा मध्ये फरसबीच्या पाल्याचा रस व लसणीचा रस एकत्र करून लावावा.

    २)खोल चरणा-या जखमेमध्ये फरसबीच्या पाल्याच्या रसात कापुस बुडवून वात करावी व दर दिवशी अशी नवीन वात त्या जखमेत ठेवावी साधारण पणे ३ आठवड्यात जखम भरते.

    ३)डोळ्यांची शक्ती वाढवायला इतर उपचारांसह रोज रात्री कोवळ्या फरसबीची भाजी जेवणात ठेवावी.

    ४)ज्या मधुमेह झालेल्या व्यक्तिच्या लघ्वीतून साखर जात असेल त्याला कोवळ्या फरसबीच्या शेंगा उकडून त्याला हळदींची फोडणी देऊन खायला द्यावी.

    फरसबी खायचा अतिरेक केल्यास पोटात दुखणे व संडासला घट्ट होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • विडा घ्या हो नारायणा – भाग बारा

    सहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३९

    प्रशंसनीय पाणी भाग चार

    आपण म्हणता, पाणी कमी प्यायचे, पण.....
    काही जणांना शंका येतेय, आम्हाला मुतखड्याचा त्रास आहे, मग काय करायचे ?
    आम्हाला उष्णतेचा त्रास आहे मग आम्ही काय करायचे ?

    हो. नक्कीच पाणी गरजेप्रमाणे प्यायचे. धने जिरे घातलेले पाणी, गोड ताजे ताक, पिकलेल्या नारळाचे पाणी, बारली धान्याचे पाणी, लाह्या शिजवलेली खीर, वेगवेगळी सरबते, रसदार फळे, इ. अनेक उत्तम पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत.
    आणि हे पर्याय सुद्धा लिमिटेडच प्यायचे हा. नाहीतर याचेच अजीर्ण व्हायचे. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच हे वापरले तर अधिक चांगले !

    उष्णता किंवा मुतखड्यासाठी कोल्ड्रींक्स पिणे किंवा बियर मारणे(?) ही कल्पना अभारतीय आहे. जिथे ऋतुनुसार बाराही महिने फळे मिळतील, अशा भारतात विषारी कार्बन डाय ऑक्साईड घातलेली पेय किंवा मद्यार्क अक्षरशः ढोसली जाताहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्यायचंय ते पाणी. कोल्ड्रींक्सही नको, किंवा हाॅटड्रिंक्स !

    गरजेएवढे पाणी घेतले तर किडनींना सुद्धा तेवढीच विश्रांती! नाहीतर जास्त ढोसलेल्या पाण्याचा निचरा करता करता, तिचा बिचारीचा जीव अगदी मेटाकुटीला येत असेल.

    पाणी कमी प्यायला हवं असं नाही. पण जास्ती नको. एवढंच सांगायच आहे. पाण्याविषयी इतके गैरसमज, एवढ्या कमी काळात वाढतील असं वाटलं नव्हतं.

    सावकाश जेवावे, असे आपण म्हणतो, ते कृतीने अपेक्षित नाही तर अवकाशाने अपेक्षित आहे. पोटाचे चार भाग कल्पिले तर त्यातील दोन भाग घन अन्नाने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग अवकाश म्हणजे मोकळा ठेवावा. तरच पुढे अन्न छान घुसळले जाते. घुसळण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि आकाश महत्वाचे आहे.

    मधे मधे पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घासाला पाणी प्यायलेच पाहिजे असेही नाही हं. इतके पाणी प्यावे की पोटाला अन्न चिकटूनही राहाणार नाही किंवा एकदम पुढे वाहूनही जाणार नाही. दोन भाग घन आहारात एक भाग पाणी हे प्रमाण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवले की झाले.

    हे पाणी सुद्धा मधेमधे घातले तर अन्नरस नीट तयार होतो.

    पारंपारिक देवपूजेमध्ये नैवेद्य दाखवताना पाणी ताटाभोवती फिरवायला सांगतात. कृती नीट आठवून पहा. मधेच पाणी खाली सोडायला सांगतात.
    मधे पाणी कशासाठी ?
    मध्ये पानीयं समर्पयामी. याचा भाव असा आहे की नैवेद्य दाखवताना देवासाठी मधेमधे पाणी प्यायला द्यावे. जे देवासाठी करतो ते उत्तमात उत्तम असते.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा नियम मान्य केला तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    15.01.2017

  • आहारातील बदल भाग ८ – शाकाहारी भाग तीन

    काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.

    जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.

    जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.

    पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.

    शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.

    जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.

    कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !

    मातेच्या स्तनात पय निर्माण "तो" करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.

    जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
    जगणेच संपले असते.

    जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत.....
    पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
    अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!

    "HE" is simply great !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    29.09.2016