जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही.
जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.
जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये.
आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ?
एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने एक पाणी भरायला येणारी बाई येत होती. त्या बाईच्या मनात त्या नाण्याविषयी मोह उत्पन्न होऊ नये म्हणून साधू धावतच त्या नाण्याजवळ आला आणि त्या नाण्यावर पाय देऊन सहजपणे उभा राहिला.
ती बाई तिथून पलीकडे गेली, पुनः साधु पारावर बसला. पाणी भरून येताना ती बाई जशी जवळ आली तशी साधु पुनः उठला आणि रस्त्यावर येऊन नाण्यावर पाय ठेवून उभा राहिला. असं तीनचार झाल्यावर त्या बाईच्या मनात आलेला विचार तिने बोलून दाखवला. त्यावर प्रामाणिकपणे त्या साधूने बाईला सांगितले. तिथे एक सोन्याचे नाणे आहे, ते नाणे पाहून ते घेण्याचा मोह तुला उत्पन्न होऊ नये म्हणून, मी धावत येऊन त्या नाण्यावर उभा रहात होतो.
त्यावर ती बाई म्हणाली,
"त्यात एवढं काय आहे, ते नाणं गेले चार पाच दिवस तिथंच पडलेलं होतं. सगळ्यांना दिसतही होतं. पण पडलेलं घ्यायचं असतं हे आज प्रथमच आपण येऊन शिकवलंत महाराज. जे आपलं नाही, ते आपण घेऊ नये. हे गावातील सर्वांनाच माहिती आहे. म्हणून कुणालासुद्धा ते दिसून घेण्याचा मोह झालाच नव्हता. पण महाराज, आता मात्र आपण आलात आणि त्या नाण्यावर उभे राहिलात, तेव्हा मला शिकवलंत की, असं काहीजण घेतात ते !"
जे नाण्याचे झाले ते ग्लोबलायझेशनच्या काळात आमचे प्रत्येक वस्तू आणि अन्नप्रकाराचे होतेय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपला बिझनेस दिसतोय. चकचकीत वेष्टण आणि जाहीरातबाजीला भुलुन, सारासार विवेक बाजुला होतोय. तसं पौष्टिक भाजी भाकरी भाताऐवजी चपाती जवळची वाटू लागली आहे. कोकणातील भाकरी तांदळाची किंवा नाचण्याची आणि बाकी सर्व ठिकाणी ज्वारी बाजरी मका हे विसरू नका.
मोह निर्माण होण्याआधी वैराग्याचे धडे मिळाले तर अधिक चांगले.
निरोगी कसे रहायचे असते, ते रोगी होण्याअगोदर समजले तर सोपे होईल ना !
आपणला हे सांगत नाहीये, आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगतोय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.10.2016
प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो.
सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही.
आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच.
आणि नखं सुद्धा कापलेलीच असावीत, हे पण गृहीत धरलेले असते. नाहीतर नखातील घाण जेवताना पोटात जाते, त्याने पोट दुखते, हे इयत्ता दुसरी अ मधे आपण शिकलेलो आहोतच !
हेच भारतीयत्व !
बाळाला भरवताना सुद्धा चमचा वापरू नये. बाळाला सुद्धा या ज्ञानेंद्रियांचा अनुभव घेऊ देत ना ! घास किती गरम आहे हे आईच्या हाताला सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर घाई घाईत चमच्याने जर त्या बाळाला काही गरम भरवलं तर बाळाचं काही खरं नाही. जमाना जरी चमच्यांचाअसला तरी "हात" असताना, वेगळ्या चमच्यांची काय गरज ?
भात किती मुरडला पाहिजे, ते चमच्यापेक्षा बोटानाच कळेल ना. आता चायनीज राईस बाहेर मुरडायचा नसतो, हे मॅनर्स समजल्यानंतर चाजनीज राईस खायला चमचा ठीक आहे. पण नूडल्सना मात्र स्टीकच लागणार.
कोकणातल्या ताज्या शेवया खाताना हाताच्या पाची बोटांचा युक्तीने वापर करता यायलाच हवा. शेवया नारळाच्या रसात बुडवून अंगावर न सांडता, सर्व शेवया बाहेर न लोंबता, थेट तोंडात घालवण्याची ती मजा स्टीकने खाण्यात नाही.
दक्षिण भारतीय लोक इडली सांबार खाताना सुद्धा काटे चमचे वापरत नाहीत. इडली हातानी कुस्करून, सांबारात बुचकळून, भुरके मारत खातात.
पंजाबी लोकांना पराठा कधी चमच्याने खाताना बघितलंय ? दोन्ही हातानी धरून त्याला उभा आडवा फाडून दह्यात बुडवूनच खातात.
शेवग्याची शेंग चमच्याने कशी खाणार ? तर्जनी आणि करंगळी मधे उभी धरून थम्स अप करीत, सगळा गर अंगठ्यावर कोरून कोरूनच खायचा, त्यापेक्षा तो शेंगेचा तुकडाच तोंडात कोंबायचा आणि त्या तुकड्याचे पार रसग्रहण करून चोथा चिपाड करूनच बाहेर काढायचा, हा शेंग खाण्याचा उत्तम प्रकार.
आमरसात पुरी बुडवताना तिच्या दोन बाजू तर्जनी आणि अंगठ्यात पकडून पुरीला आमरसाच्या वाटीत अशी आंघोळ घालून बाहेर काढावी की जशी विहिरीत कळशी.
समोसा, वडापाव खाताना काय चमच्याने खायचा ? मस्त दोन्ही हातांनी धरून जणुकाही माऊथ ऑर्गन वाजवतो आहोत, असा भास दुसऱ्याला होईल अशा शिस्तीत राहूनच वडापाव खाल्ला पाहिजे.
आहारीय पदार्थ पचवण्यासाठी तो तोंडात जाण्याआधी ताटातच पचवून घ्यायला सुरवात झालेली असते, हे समजलं म्हणजे झालं.
जो पदार्थ जसा खायचा तसा खाल्ला तरच त्यातून इंद्रियाना आनंद मिळतो, नाहीतर करकोच्याला ताटलीतून आणि कोल्ह्याला बाटलीतून खीर "सर्व्ह" केल्यासारखं होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
17.03.2017


ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व चमकदार असतात.
ज्योतिष्मती चवीला तिखट,कडू असून अतिउष्ण असते.तसेच हि प्रभावाने मेध्य असून तीक्ष्ण व स्निग्ध असते.ज्योतिष्मती चवीला कडू,तिखट व उष्ण तीक्ष्ण असल्याने कफनाशक आहे.तसेच स्निग्ध असल्याने वातनाशक आहे व पित्तकर आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)ज्योतिष्मती वातनाशक व वेदना स्थापक असल्याने संधिवात,कंबरदुखी ह्या विकारामध्ये हिच्या तेलाने मालिश करतात.
२)पांढऱ्या कोडा मध्ये डागांवर ज्योतिष्मती तेल लावल्यास त्वचेचा रंग प्राकृत होण्यास मदत होते.
३)ज्योतिष्मती उष्ण गुणाने व प्रभावाने साधक पित्ताची वाढ करून मेध्य कार्य करते त्यामुळे ग्रहणशक्ती व स्मृती वाढते.
४)मासिकपाळी अनियमित असल्यास ज्योतिष्मती तेल दुधासोबत देतात.
५)खरजेवर ज्योतिष्मती बिया गोमुत्रात वाटून लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar

जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.
केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच !
दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत नाही. मग बंगालमधे प्रमेहाचे प्रमाण जास्ती असेल का ? शोधावे लागेल, पण बंगाल या प्रांतात परंपरेने दुधाचे रोशगुल्ले, पनीर इ.पदार्थ वंशपरंपरेने खाल्ले जात असल्यामुळे ते तिथे सात्म्य झाले असावेत.
या पदार्थांमधे वापरली जाणारी साखर ही पण प्रमेहाची सख्खी मैत्रिणच जणु ! आज आधुनिक विज्ञान पण तेच सांगते, साखर हे पांढरे विषच आहे. त्याच्या फारसे पाठी न लागलेले बरे !
अर्थात एकदा हे पदार्थ खाऊन प्रमेह होणार नाही, पण दिवसातून एकदा खाल्ले तर मात्र नक्कीच होईल. त्यातून कफाची प्रकृती आणि पाणथळ दलदलयुक्त प्रदेशी रहाणाऱ्यांना अधिकच सावध रहायला हवे. त्यात भूक कमी असली तर बघायलाच नको. त्यामुळे सावध तो सुखी हेच खरे. सावधपणा पण एवढा नको की मनातून खूप घाबरत घाबरत खाल्ले जात आहे. तरीसुद्धा साखर वाढलेलीच राहाते.
दूध हे मधुर रसाचे वर्णन केले आहे. मधुर रसाच्या गुणांचे वर्णन करताना वाग्भटजींनी सूत्रस्थान अध्याय दहामधे, मधुर रस अति सेवन करणाऱ्या मंडळींना सावधपणे प्रमेहाचा धोका असतो, असा उल्लेख पण करून ठेवलेला आहे.
सद्यो शुक्रकरःपयम् म्हणजे अंतिम धातु (जो शुक्र) उत्पत्ती करणाऱ्या पदार्थात दूध हे सर्व श्रेष्ठ सांगितलेले आहे. उत्तम तर्पक, रसधातुपोषक, वातपित्त कमी करणारे पण कफ दोष वाढवणारे, शीत गुणाचे आणि पचायला जड असते. निरसे दूध, म्हणजे तापवायच्या अगोदरचे दूध पचायला अत्यंत जड असून, अभिष्यंद म्हणजे कफाचा स्राव निर्माण करणारे असते. पण दूध काढल्या काढल्या( म्हणजे धारोष्ण ) घेतल्यास अमृताप्रमाणे असते. पण खूप तापवले असता, पचायला जड होते. (उदा. बासुंदी) हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. अग्निचा संस्कार बदलला की गुण बदलतात. इतर सर्व पदार्थ अग्निने पचायला हलके होतात तर दूध मात्र अग्निच्या संस्काराने जाड होत जाते, परिणामी पचायला जड होते. बासुंदीचे उदाहरण लक्षात ठेवावे. जसजसे दूध तापवत जावे, तसतसे, ते आटते. घट्ट होते. शेवट खवा बनतो, त्यात आणखी साखर घातली तर पेढा ! त्याच्याही पुढे संस्कार करून दुधाची पावडर बनवतात. आणि नंतर चाॅकलेट आणि मिठाया बनतात. म्हणजे हे अंतिम पदार्थ पचायला किती जड होत जातील याची कल्पना करावी. एका चाॅकलेट बारने काय होणार आहे असे म्हणून, एखादे जरी तोंडात टाकले तरी तो सारा ऐवज, लिटरभर दुधाचा असू शकतो.
पोटावर अत्याचार करणे, म्हणजे यापेक्षा वेगळे काही नाही.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.01.2017
आहारातील या ग्लोबल बदलाचे परिणाम रोग स्वरूपात भोगावे लागणार आहेत हे नक्की. बदलाचे परिणाम आपणा सर्वाना समोर दिसत आहेत. सुदृढ, काटक, कोकणी माणसाची पोटे सुटु लागली. बुद्धीजीवी, बैठे काम करणारा श्रमजीवी शेतकरी, मधुमेहासारख्या आजाराच्या फाईल्स, मोठ्या अभिमानाने डाॅक्टरांच्या टेबलवर आपटून टाकू लागला.
गोडाचा शिरा म्हणा,खीर म्हणा,मिठाई,मुरांबा, कोणताही गोड पदार्थ घ्या हिचा मनमोहक सुगंध त्या पदार्थाला आला नाहीतर त्या गोडधोड पदार्थाची सगळी मजा आणी लज्जतच निघून जाते बुवा. तर अशी सुंदर नाजूक सुवासिक वेलची अथवा वेल दोडा.विडा,चहा ह्यांना देखील एक वेगळीच रंगत देऊन जाते नाही का?
गरम मसाल्यातील हा पदार्थ ह्याचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरतो ती वेलची म्हणजेच ह्या क्षूपाची फळे होय.चवीला थोडी तिखट गोड आणी थंड अशी ही वेलची आपल्या शरीरातले वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवते.
हिचा उपयोग फक्त गोडधोड पदार्थातच होतो असे नाही तर घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो बरं का!आश्चर्य वाटले का?
चला तर मग पहायचे ना ह्या इवल्याशा वेलदोड्याचे औषधी गुण:
१)संडास मधून आव पडत असल्यास वेलचीपूड लोण्यात मिसळून द्यावी.
२)चक्कर येणे,मळमळणे,डोके दुःखी ह्यात १/२ चमचा वेलची पूड+१/२ चमचा जीरे चूर्ण+ ४ चमचे लिंबाचा रस+१ चमचा साखर हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
३)उचकी लागत असल्यास १ चमचा वेलचीची राख+ २ चमचे मध हे चाटण वारंवार चाटावे.
४)वेलचीच्या साली+रिठे पाण्यात उकळावे आणी हे मिश्रण आंघोळी पुर्वी अथवा दिवसातून २-३ वेळेस अंबाला लावावे ह्याने अंगाची खाज कमी होते.
५)खोकला येत असल्यास १/२ चमचा वेलची पूड मधासोबत मिसळून दिवसातून तीन वेळेस घ्यावे.
वेलची खाण्याचा अतिरेक केल्यास आतड्यांना अतिरिक्त चालना मिसळून पोटदूखी आणी संडासला पातळ होणे ह्या तक्रारी सूरु होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
।।गुहाग्रजाय नम:
अपामर्गपत्रंसमर्पयामि।।
ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात.
ह्याचे उपयुक्त अंग आहेत मुळ,पाने,पंचांग,तंण्डूल /बिया.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात:
ह्याची चव तिखट,कडू असून हे उष्ण असते.गुणाने हल्के,रूक्ष,तीक्ष्ण असते.
कफ व वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊयात:
अंगास खाज येत असल्यास आघाड्याचा काढ्याने स्नान करावा.
आघाड्याच्या क्षाराचा लेप हा किरल्या/ कुरूप पायांवर येणारे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
दंतरोग अर्थात दातांच्या दुखण्यात आघाड्याच्या काढ्याच्या गुळण्या करतात.
आघाड्याचा क्षार हा अम्लपित्त कमी करतो.
मार लागुन सुज आल्यास आघाड्याच्या पानांचा लेप लावतात.
अति भुक लागत असल्यास ज्याला आपण भस्मक रोग म्हणतो त्यात आघाड्याच्या बियांची खार उपयुक्त आहे.
सर्दी,खोकला,दमा ह्यात आघाड्याचे चुर्ण मधासोबत चांगले काम करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात.
आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच!
अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा केवळ डोळ्यानीच तो ऑपरेट करणे, असे अॅप सुद्धा आले आहे, एका हाताचे एक बोटसुद्धा हलवायला नको. फक्त डोळे फिरवायचे की कर्सर हलतो. हे आस्यासुख.!
उभे राहून काम करण्यापेक्षा किंवा फिरत फिरत काम करण्यापेक्षा बसून काम करावे असे वाटणे. बसताना सुद्धा खाली जागा नीट समतल असावी, एखादी बैठक असावी, असे वाटणे. सतरंजी मिळाली की सतरंजीपेक्षा आणखी मऊ आरामशीर आसनावर बसावे, एकदा बसले की उठू नये असे वाटणे, बसलो तर टेकून बसावेसे वाटणे, टेकून बसलो तर टेकायला मऊ तक्क्या असावासा वाटणे, तक्का मिळाला तर उशी हवीशी वाटणे,बसायला जागा मिळतेच आहे तर खुर्ची का नको ? मग ही खुर्ची काटकोनीच कशाला, त्यापेक्षा विशालकोनी बरी. हे आस्यासुख !!
आरामखुर्चीवर बसल्यावर पुढे पाय समांतर टेकण्यासाठी टेबल हवे, असे वाटत रहाणे, पण मागे काय चालले आहे हे समजत नाही, त्यासाठी ही आरामखुर्ची गोल फिरणारी हवी ..... आरामखुर्चीवरच बसायचे मग नुसतीच कापडवाली आरामखुर्ची कशाला, फोमचीच वापरूया..... हे आस्यासुख !
चालण्यापेक्षा सायकल बरी, सायकल पेक्षा स्कूटी बरी, स्कूटीपेक्षा स्कूटर, त्यापेक्षा बाईक, ही बाईक एक पाय झाडून सुरू करण्यापेक्षा एक बोट दाबून सुरू झाली तर बरी !!!!! हे आस्यासुख !!
कमरेत वाकून जमिनीवरचा केर केरसुणीने काढण्यापेक्षा उभे राहून व्हॅक्युम क्लीनरने केर ओढून घेणे, उकीडवे बसून लादी पुसण्यापेक्षा माॅबने किंवा दांडा लावलेल्या स्पंजने लादी अलगद पुसुन घेणे, किंवा आपण काम न करता, चक्क त्या कामासाठी बाई लावणे, हे आस्या सुख !!!
सुख हे केवळ बसण्यामधूनच मिळते. बसण्यामधले पुरेपुर सुख मिळवण्यासाठी धडपड सुरू होणे असाही आस्यासुखचा अर्थ आहे.
सुखार्था सर्व भूतानाम् मताः सर्वा प्रवृत्तयः, असे वाग्भटजी म्हणतात. सर्व प्राणी मात्रांची सुखाकडेच प्रवृत्ती असते, पण प्रमेहामधे, ती जरा जास्तच या कॅटेगरीमधे मोडते.
याचा अर्थ असा नव्हे की सुखाची कामना, इच्छा करूच नये. सुख मिळावेसे वाटणे, ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आणखी आणखी, त्यापेक्षा जास्ती सुख मलाच मिळावे. हा हावरटपणा किंवा सुखाचा अतिरेक हे दुःखाचे कारण ठरू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.02.2017
अंजीर हे फळ ओले अथवा सुक्यामेव्यात जगभर प्रसिध्द आहे.तसेच बऱ्याच लोकांचे हे आवडते फळ आहे.ह्याचे काळे व लाल असे दोन प्रकार आहेत.आता तर ड्रायफ्रूट मिठाई मध्ये अंजीर हमखास वापरतात,तसेच सुक्या अंजिराचे शेक देखील केले जाते.
अंजिराचे १२-१५ फुट झाड असते व त्याला वसंत ऋतुमध्ये फळे लागतात व ग्रीष्म ऋतुमध्ये ती पिकतात.ह्याची पाने आकाराने मोठी व काळपट हिरवी असतात.
अंजीर चवीला गोड,थंड व वात पित्तनाशक आहे व थोड्या प्रमाणात कफ वाढवितो.
आता आपण त्याचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)तोंडातील जीभ,दात,हिरड्या ह्यांचे आरोग्य टिकवायला अंजीर चावून खावे.
२)लघ्वीची जळजळ,उग्रवास,खरपडणे ह्यात अंजीर खावा फायदा होतो.
३)लहान मुलांचे पोट फुगून संडासला खडा होतो कारण पोटात मळ सुकतो अशा वेळेस सुका अंजीर पाण्यात कोळून ते पाणी त्याला पाजावे.
४)अशक्तपणा,वजन कमी होणे,सुका खोकला,संध्याकाळी बारीक ताप येणे,ह्यात २ अंजीर +१ चमचा ज्येष्ठमध चुर्ण हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी त्या व्यक्तीला द्यावे व नंतर २ तास काही खायला व प्यायला देऊ नये.असे ३ आठवडे करावे.
५)बऱ्याच लहान मुलांना जेवणामध्ये काही तरी गोड लागते अशा वेळी त्यांना जेवणात अंजीराचा पाक करून द्यावा ह्याने त्यांचे पोषण देखील होते.
अंजीर खायचा अतिरेक केल्यास भुकमंदावणे,जुलाब होणे अशा तक्रारी उद्भवतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti