(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • याला जीवन ऐसे नाव भाग २२

    पाणी शुद्धीकरण भाग दोन

    पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, "पाणी शुद्ध कसे करा" हे मात्र सांगितले जात नाही. "इट इज नाॅट अवर बिझनेस" असं म्हटलं की विषय संपत नाही राव !

    आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे केले जातेय का ? कसे करायचे हे सुस्पष्ट सांगितले जातेय का ?

    परदेशी टेक्नाॅलाॅजी वापरून पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग, त्यातील पारदर्शकता अजूनही स्पष्ट होत नाही. एखादी कंपनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जावून एकमेकांच्या जाहीरातींशी जणुकाही स्पर्धाच करत असतात. मग त्यातील खरेखोटेपणा कसा तपासणार ?

    शेवटी जो दुसऱ्यावरी अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला हेच खरे !

    पाणी शुद्ध करण्यासाठी अस्सल भारतीय पद्धतींचा अभ्यासच होत नाहीये, या निमित्ताने आपण एक जल शुद्धीकरण मोहीम राबवूया. या मोहिमेअंतर्गत आपल्या प्राचीन अथवा आजही ज्या पद्धतीने जलशुध्दीकरण केले जात होते, त्या पुनः एकदा प्रकाशात आणूया. पुढील पिढीला या पद्धतींची ओळख तर करून देऊया.

    जसे पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातील गढुळपणा कमी होतो, पण तळात हा गढुळ भाग साठून रहातो. नंतर गाळून वरील स्वच्छ पाणी वेगळे करता येते.

    आपल्याला माहिती असलेली पाणी शुद्धीकरणाची एखादी पारंपारिक स्वदेशी पद्धत सांगा. त्यातील दोष त्रुटी कमतरता शोधून काढू. त्या दूर कशा करता येतील यावर चर्चा करू. मत मांडायला तज्ञच असले पाहिजे असे नाही.

    शाळेतदेखील आपल्याला पाणी शुद्ध करायच्या काही कृती शिकवल्या होत्या. शाळा आठवून पहा......

    नाहीतर आजी आजोबांना विचारा. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधा. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी, कोणीतरी विचारल्याने त्यांना पण आनंद होईल. आपल्याही मताला आज कुणीतरी तिसरी पिढी विचारणारी आहे, असं त्यांनाही वाटेल.

    ज्यांनी आपल्या जीवनातले अनेक चढउतार पाहिलेले आहेत, यशस्वीपणे पार केलेले आहेत, त्यांना 'या जीवनाच्या' शुद्धीकरणासाठीचा एखादा पर्याय सहज सुचेल. विचारून तर बघा.
    "आजी आजोबा घरातील पाणी कसे शुद्ध करीत होते".....

    घ्या वही पेन, द्या मुलांच्या हातात! सांगा आजीआजोबांची मुलाखत घ्यायला !! करूदेत शब्दबद्ध !!!

    जीवनाचा सर्वात मोठा भाग, ज्या 'जीवनावर' आहे, त्या अशुद्ध जीवनाकडे इतक्या उदासीनपणे बघून चालणार नाही.
    जीवनाचे शुद्धिकरण झालेच पाहिजे!!!

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    29.12.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग छापन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 12

    वस्त्र अलंकार झाल्यावर तिलक धारण केला जातो. देवाला भ्रूमध्य स्थानी चंदनतिलक केला जातो.भ्रूमध्य हे स्थान आज्ञाचक्राचे आहे. या चक्राला तिलक लावणे म्हणजे आज्ञाचक्राला संरक्षण देणे होय. जणुकाही फिल्टरच ! जे योग्य असतील तेवढीच सकारात्मक स्पंदने आत पाठवणे आणि नको असतील ती नकारात्मक स्पंदने बाहेर ठेवणे, अशी दोन कामे हा मंगल तिलक करत असतो. दक्षिण भारतात तर तिलक लावल्याशिवाय पुरूषदेखील घराबाहेर पडत नाहीत.

    उगाळलेले चंदन, रक्तचंदन, अष्टगंध, केशर, कुंकू, हळद, गोपीचंदन इ. लेप या आज्ञाचक्रावर लावले जातात. देवतांना चंदनतिलक लावताना अनामिकेने, म्हणजे करंगळीजवळच्या मरंगळीने लावावे. स्वतःला किंवा दुसऱ्याला लावताना मधल्या बोटाने भ्रूमध्यावर लावावे.

    भ्रूमध्य हेच स्थान आत्म्याचे स्थान सांगितले जाते. म्हणजे इथे लावलेले लेप ही एक प्रकारची प्रत्यक्ष स्वपूजा किंवा आत्मपूजाच आहे.

    मी हिंदु आहे, हे न सांगताच समजले पाहिजे, हे ओळखण्यासाठी हा तिलक काम करत असतो. इतर कोणत्याही धर्मात असा मंगल तिलक दररोज लावला जात नाही. पण आज सर्व धर्मसमभावाच्या गोंडस संस्कारांनी, "मी हिंदु आहे" असे अभिमानाने सांगायची पण लाज वाटू लागली आहे.

    भारतीय सौभाग्यवती महिलांचे "मांग मे सिंदूर भरना" अगदी अनिवार्यच असते. आता तर सिरीयल्स पाहून महाराष्ट्रीयन भगिनीदेखील मांग मे सिंदूर भरने लगी है ।
    प्रश्न नवयुवतींचा आणि समस्त पुरूष वर्गाचा आहे. पुरूषांना कपाळी केशरी गंध आणि महिलांना हळदीकुंकु लावणे म्हणजे मागासलेपणाचे आणि बुरसटपणाचे वाटते. काही वर्षांपूर्वी टिकली तर टिकली होती, आता तीपण टिकत नाही. त्याचे शास्त्र आणि त्यामागील भारतीय दृष्टीकोन वेळीच न समजल्याचे हे दुष्परिणाम आहेत. आता तरी जागे होऊया. संस्कृतीचे पालन करूया.

    देवासाठी "चंदनं समर्पयामी" आणि देवीसाठी "हरिद्राकुंकुमम् सौभाग्यद्रव्यम समर्पयामी" हे जसे सांगितले आहे तसेच आपल्या देहासाठीदेखील आहे, हे दोघांनीही लक्षात ठेवूया. पालकांनी आपली थोडी कडक भूमिका आपल्या घरातील देव आणि देवींना, समजावून सांगितली तर षटचक्र दूषित झाल्यामुळे बिघडलेले काम क्रोध आदि रिपु सहजपणे जिंकता येतील.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.06.2017

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १४

    संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ची जाहीरात आपण बघतो.
    अंडी खा, अशी जाहीरात का करावी लागते ?
    कारणही तसेच आहे.अंडे हे शाकाहारीच आहे, असेही सांगितले जाते.
    अंडे चांगले की वाईट, अंडे आरोग्य वाढवते की कोलेस्टेरॉल? यापैकी कशाचाही संदर्भ न देता, अंडे हे शाकाहारीच आहे, त्यात जीव नसतो, अशी जाहीरात करणे हा बुद्धी भेद करण्याचा दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.

    असे ऐकीवात आहे की, दरमहा बाहेर पडणारा रजाचा स्राव म्हणजे म्हणे अफलीत अंडे. म्हणून त्याच्यात जीव नसतो. जसं ए1 ए2 दुधाबद्दल, साबुदाण्याबद्दल, अजूनही काही जणांच्या मनात संभ्रम आहेत, तसेच काहीसे अंड्याबद्दल आहेत. पण हे नक्की की, अंडे हे शाकाहारी नाहीच. त्यात रक्त आणि मांस असतेच. कोणतेही ब्राॅयलर उत्पादक व्यापारी आपल्या प्राॅडक्टविषयी संभ्रम निर्माण करणारी किंवा काॅन्ट्राडिक्टरी माहिती कशी जाहीर करतील ?

    आयुर्वेदात जे अंडे औषधामधे वापरायला सांगितले आहे ते, जंगलात फिरणाऱ्या किंवा आपले अन्न आपल्याच पायांनी उकरून खाणाऱ्या गावठी पक्ष्यांचे सांगितले आहे. ब्राॅयलर नाही. त्याची कारणमीमांसा मागील आरोग्य टीपेमध्ये केलेली आहे.

    जे खाऊ शकतात, त्या कुपोषित बालकांसाठी मात्र अंडी हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत होऊ शकतो.

    कोंबड्याची कृत्रिम पैदास वाढवली, पण दुर्दैवाने जेवढी विक्री व्हायला हवी, तेवढी झाली नाही. अगदी 1970 पासूनचा विचार केला तरी दहा वर्षात अंड्याची किंमत फक्त दुप्पट झाली, हे नुकसान खूप मोठं होतं.अंडी हा नाशवंत माल वेळीच माल खपला नाही तर सरळ नुकसान पुनः अंड्याच्या प्रवासात नासधुस , फुटणे इ नुकसान होणे स्वाभाविकच. म्हणून हा तोटा टाळण्यासाठी अंडी उत्पादकांना खोटी का होईना पण जाहीरात करणे भाग पडले.

    मोठाले भांडवल घातल्यावर त्यात नुकसान होऊ नये म्हणून व्यवसायात नीती, संस्कृती, सभ्यता, संस्कार, प्रेमभाव, जीवदया, सर्व नियम अगदी धाब्यावर बसवले जातात, मग व्यवसाय कोणताही असो. खरं आहे ना ?

    हा व्यापाराचा नियमच आहे. तिथे नातेगोते, ओळखपाळख, मित्र मैत्री, यामधे 'बिझनेस' सोडून काही पाहू नये असं म्हणतात. आताच्या पाश्चात्य कंपन्यांच्या कोणत्याही मल्टीलिंक मार्केटिंगच्या ट्रेनिंगमध्ये हेच शिकवले जाते. तेच भारतीय कंपन्याही शिकल्या आणि व्यापारवृद्धी केली जाऊ लागली. अगदी शिक्षण क्षेत्रापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत हे पहायला मिळते. असो.

    मुख्य विक्री मांसाची हे तत्व बाजूला होऊन मग अन्य अवयवांच्या विक्रीतून तूट भरून काढणे सुरू झाले. आणि बाय प्राॅडक्टची जागा मुख्य व्यवसायाने कधी घेतली हे कळलेसुद्धा नाही.

    मांस उद्योगामधे सर्वात मोठा खर्च पाण्यावर केला जातो. पाण्याची किती मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो त्याची नुसती आकडेवारी पहा.
    एक किलो भाजीपाला पिकवण्यासाठी शंभर दिवसात एकशेवीस लीटर पाणी लागते.
    एक किलो फळे तयार करायला दीडशे लीटर, आणि एक किलो मांस निर्माण होण्यासाठी तब्बल पाच हजार लीटर पाण्याची गरज भासते.

    एका बाजूने होळीच्या सणाला नजरेत भरणारी लाकुडतोड, रंगपंचमीच्या निमित्ताने वापरले जाणारे पाणी, दसरा, वटपौर्णिमेच्या निमित्ताने तोड होत असलेली बहुवर्षायु झाडे यांच्या तुलनेत दररोज होणारा हा पाण्याचा अपव्यय लक्षात नको का घ्यायला ? निदान महाराष्ट्रात तरी, जिथे पाण्याअभावी माणसेच तडफडून मरत आहेत !

    अन्न (किंवा मांस ) ताजे असावे, हा अतिसामान्य नियम झाला, पण मोठाल्या कत्तलखान्यातून वेगळे केलेले मांस दुसरी कडे नेण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा लागते. त्यासाठी वीजेचा खूप वापर होतो. या वीजेमधे भार नियमन चालत नाही. भारतात ही कोल्ड चेन मेन्टेन ठेवणं शक्य आहे ? काय वाटतं ?
    नक्कीच नाही.
    मांस तसेच पुढे पाठवले जाते. यातून खूप मोठा जंतुसंसर्ग होऊ शकतो.

    उत्तम प्रतीची कोल्डचेन मेंटेन केलेले मांस परदेशात पाठवले जाते. पण त्यासाठी खर्च खूप जास्त येतो. कारण त्यासाठी वीज, पाणी जास्त खर्च होते. भारतात ते परवडत नाही.

    विमानाने जाणाऱ्या मांसासाठी खर्च होणारे पाणी, वीज मात्र भारताकडून ! त्याच्यासाठी करावे लागणारे भारनियमन भारतीयांनीच सोसायचे. मांस प्रकल्पातून तयार होणारा जैवीक कचरा, त्याची दुर्गंधी, भारतीयांनी सहन करायची.. ...
    का म्हणून ???

    या अवाढव्य प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी, रक्त, मांस मिश्रीत कचरा नदीमधे तसाच सोडला जातो.
    म्हणजे एकुणच या मोठ्याल्या प्रकल्पातून देखील निसर्गावर आक्रमणच केले जाते.

    कधीतरी या गोष्टीचा विचार करावाच लागेल.
    हा विषयच वादग्रस्त आहे. म्हणून चर्चा करणेच टाळावे, लिखाण थांबवावे, असे करणे पण योग्य होणार नाही. त्यामुळे हे सर्व लिहावे लागत आहे. नाहीतर हे असेच चालायचे, यात बदल होणे भारतात तरी शक्य नाही, असे म्हणून मौन धरणे पिंडाला पटत नाही. जे योग्य आहे, तिथे ते न बोलणे, हेदेखील पाप लागणारे आहे.
    मी पापपुण्यावर विश्वास ठेवणारा श्रद्धाळू माणूस असल्याने लिहिण्याचे धाडस केले, एवढेच !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    14.10.2016

  • किचन क्लिनीक – फळभाज्या

    आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा.

    आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो हे एकुन आता तरी आपल्याला नवल वाटणार नाही हे मला पक्के माहित झाले आहे.

    चला तर आता पहिल्या भाजी पासुन सुरूवात करूया ना.बरं मग हि पहिली भाजी कोणती बरे,चला एक क्लु देते रामदेव बाबांच्या योग शिबिरे व योग व्याख्यानांमुळे ह्या महाशयांना बरीच प्रसिध्दी लाभली आहे.

    आता कसे बरोब्बर ओळखलेत तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधीभोपळा किंवा ज्याला आपण कोकणदुधी म्हणतो तोच हा बरं का!

  • किचन क्लिनीक – तुपाचे प्रकार व गुण

    १)गाईचे तुप:

    बुद्धि,कांती,स्मृती,धारणाशक्ती वाढविते,स्त्रोतसांचे शोधन करते,वातनाशक,स्वर चांगला ठेवते,पित्तनाशक,पुष्टीदायक,भुक वाढविते,वृष्य,आयुष्यकारक,गोड असून सर्व तुपांत श्रेष्ठ आहे.हे विषनाशक,डोळ्यांना हितकर,रसायन असून आरोग्यदायक आहे.

    २)म्हशीचे तुप:

    धारणाशक्तीवाढविणारे,सुखदायक,
    कांतीवर्धक,कफवातनाशक,शक्तिवर्धक शरीरवर्ण सुधारणारे,मुळव्याध नाशक,भुक वाढविणारे व डोळ्यांसाठी हितकर आहे.

    ३)शेळीचे तुप:

    भुक वाढविते,डोळ्यांनाहितकर,बलवर्धक,
    खोकला,दमा कमी करणारे,पचायला अत्यंत हल्के असते.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • विडा घ्या हो नारायणा – भाग ३

    पान खाण्याचा एक विशिष्ट नखरा आहे. “पान लावणे” ही एक खास कला आहे. दर्दी खवैय्याला यातील नजाकत बरोब्बर समजते. आपल्याला हवी असलेली, किंचित पिवळसर झाक असलेली दोन पाने चंचीतून निवडून, हलकेच झटकून सफाईदारपणे पुसत, नखानी त्याचे टोक आणि त्याचा हिरवा देठ खुडुन, दातांनी एकदाच त्याचा चावा घेत देठ टाकून द्यावा. नखांनी पानावरच्या शिरा हलकेच काढाव्यात. या शिरा काढताना पानाला भोक पडता नये, एवढे सराईत झाल्याशिवाय चारचौघात पान खायला सुरवात करू नये. नाहीतर त्याएवढा लाजीरवाणा प्रसंग दुसरा नाही.

  • विडा घ्या हो नारायणा भाग ११

    कोणतेही शुभकार्य करत असताना देवाला देखील मानाचा विडा द्यायची श्रद्धा आहे. त्यामागे असलेले आरोग्याचे तेरा संदेश मात्र ओळखता यायला हवेत. पाश्चात्य बुद्धीने विचार केलात तर मात्र तीन तेरा वाजलेच म्हणून समजा !

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 7

    आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ?

    दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे.
    काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण घ्यावे. म्हणजे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.

    आधी पोटोबा मग विठोबा
    आधी स्वार्थ मग परमार्थ
    या म्हणी केव्हा तयार झाल्या असतील ? कोणत्या परिस्थितीमधे तयार झाल्या असतील, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. एका पिढीपूर्वीची मुलाखत घेतली तर याचा उलगडा होत जाईल.

    ती माणसे सांगतात, आमच्यावेळी सूर्यास्ताचे अग्निहोत्र झाले की लगेचच दिवसाउजेडी एकाने देवाकडे, अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा, ( घरात येणारी लक्ष्मी काळोखातून कशी येणार ? म्हणून अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा. ) तर दुसरीने स्वयंपाकघरात दिवा लावून पाटपाणी घ्यायचे. आधी स-अवकाश भोजन करून नंतर सावकाऽश भजन करीत बसायचे...... मग परमार्थ !

    तेव्हा सारवलेल्या जमिनीवर ताट पाट मांडून खाली बसून, मांडी घालून पंगत वाढून जेवायचे. घरात कुटुंब नियोजन नव्हते, गोकुळ होते. दहा पंधरा माणसे एकमेकांशी बोलायची, शुभंकरोती एका सुरात म्हटली जायची,पाढे पावकी निमकी, सर्व श्लोक स्तोत्रे यांची उजळणी व्हायची.

    चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या घरातील परिस्थिती आठवली तर टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे रेडीओ आणि सिनेमा थिएटर. थिएटरमधे जाऊन हौस म्हणून सिनेमा पहाणे त्या तिकिटासाठी तब्बल दोन ते अडीज रूपये खर्च करणेदेखील परवडत नव्हतं. एवढा श्रीमंत काळ आपण अनुभवला आहे.

    त्याआधीची फक्त वीसेक वर्षे आता आठवून पहा. म्हणजे आपल्या बाबांच्या लहानपणीचा काळ सुखाचा......

    रेडिओ ही अत्यंत प्रतिष्ठेची चीज होती, गावातील एखाद्या घरीच तो असायचा, बिनाका गीतमाला ऐकायला दर्दी गर्दी जमायची, तेव्हाच्या काळातील जेवणाच्या वेळा आठवून बघा, त्या काळातील ज्येष्ठ माणसांना आजही विचारून पहा. तेपण सांगतील, " आमच्या तारूण्याच्या सुवर्ण युगात आमची जेवणे दिवसाउजेडी संपायची. लाईटपण नव्हता तेव्हा. रात्री साडेआठ नऊ वाजता झोपी जात होतो."

    विज्ञानयुग आले, विद्युतीकरण झाले, प्रगती झाली, विकास झाला. कोपऱ्यात टीव्ही आला. करमणुकीचे साधन बदलले, दूरदर्शनवर बातम्या देणारी माणसे, त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या माशा देखील पहाता यायला लागल्या. मालिका पहायला वेळ कमी पडू लागला. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात कुकर आला, मिक्सरपण आला. मनोरंजन ही गरज बनली. खाना खान्यातला (म्हणजे स्वयंपाकघरातला) वेळ दिवाणखान्यात जाऊ लागला.
    गोजिरवाण्या घरात लाजीरवाण्या सिरीयल सुरू झाल्या. बातम्यांपेक्षा जाहीरातीमधे जास्ती वेळ जाऊ लागला. आणि हळुहळू सगळंच बदललं. सुखाच्या कक्षा वाढत गेल्या आणि.....
    विठोबा मागं गेला आणि पोटोबा पुढे आला........

    कसं बदलत गेलं? कोण बदलत गेलं ? कोणी बदललं हे सगळं? कधी कळलंच नाही.

    मुठीत घट्ट धरून ठेवलेल्या वाळूसारखं दोन्ही बाजूने ते बाजूला कधी पडत गेलं लक्षातही आलं नाही. आरोग्याची मूठ कधी रिकामी झाली, ते कधी समजलं देखील नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02.03.2017

  • किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

    सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.

    पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:

    १)गाईचे ताक:

    भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.

    २)म्हशीचे ताक:

    दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.

    ३)शेळीचे ताक:

    अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
    मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.

    आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:

    १)वातविकारात:

    आंबट ताक सैंधव घालून प्यावे.

    २)पित्तविकारात:

    गोड ताक साखर घालून प्यावे.

    ३)कफविकारात:

    लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • सोनोग्राफी (कलर डॉप्लर)

    आधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात.