आता काय करू?
कोकणात गहू वापरायचा नाही तर
आता काय करू ?
आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे
आता काय करू ?
गहू सोडता येणार नाही.
आता काय करू ?
सुखाची एवढी सवय झाली आहे
आता काय करू?
जसा प्रदेश, तसा आहार
जसा आहार, तशी शरीरयष्टी
जशी शरीरयष्टी, तसे काम
जसे काम, तसा आहार.
ही एक साखळी आहे.
यातील एखादा दुवा बदलता येणार नाही.
जसा देश पंजाब, गहू मुख्य आहार.
गहू मुख्य आहार म्हणून मिळते बलदंड शरीरयष्टी.
पंजाबी जाट मजबूत शरीर, तसे झेपते काम.
कामच एवढे प्रचंड मेहनतीचे,
की आहार गव्हाचाच हवा
आणि
प्यायला लस्सी आणि खायला खवा.
मला गहू आवडतो, मला परवडतो, मी सात्म्य केलाय, आता मी तो खाणार, असे म्हणून कोकणाचे रूपांतर, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड प्रदेशात थोडेच होणार आहे ? समुद्र आपली जागा किंवा गाज थोडीच बदलू शकणार बदलणार आहे? ( गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज )
किंवा एकवेळ गहू खाऊन खाऊन सात्म्य केला म्हणून आपले कामाचे स्वरूप थोडेच बदलणार आहे ?
ऊलट जेवढे कमी करता येईल, तेवढे काम आपण कमीच करत आहोत. विज्ञानाच्या सहाय्याने बौद्धिक काम वा शारीरिक श्रम कमीच करत करतोय.....
पण मनःशांती मात्र हरवतोय.
त्यासाठी कमी वेळात जास्त पैश्यासाठी धडपडतोय.. साधने मिळवतोय.
पूर्वी मधुमेह हा बुद्धिजीवी वर्गाचा आजार होता. पण आता कष्टकरी वर्गातही दिसतोय.
आज विज्ञानाने कुकर शेतकऱ्याच्या घरात आणून दिला आणि मागोमाग मधुमेह सुद्धा ! शेतकऱ्याच्या शेतात बैलजोडीच्या जोता ऐवजी टॅक्टर आला.
मागे पैसा वाढला, आणि पुढे पोटही .........
सुखाच्या जेवढे जवळ जातोय, तेवढे सुखापासून आपण लांब जातोय, एक सुख मिळवण्याच्या प्रयत्नात महत्वाचे सुख आपण विसरत जातोय. ते म्हणजे आरोग्य.
म्हणून एक सूत्र आमचे ग्रंथकार सांगतात, पळवाटा शोधू नका.
निःसुखत्वम सुखायच......
आत्ता थोडासा सुखाचा त्याग करा, जे अंतिमतः सुखकर असेल.
हे सर्व ज्याच्यासाठी करतोय ते आरोग्यच, (किंवा पुढची पिढी ) जर माझ्या हातून, अगदी देखल्या डोळा, निसटून जात असेल तर, एवढी धडपड करायची तरी कशाला ?
वेगवेगळे आजार आज अगदी दरवाज्यात रांगेत उभे आहेत. एका चुकीच्या वेळी दरवाजा उघडायची खोटी...
तो आत आलाच म्हणून समजा....
पुढच्या पिढी या बंद दरवाज्यापासून अनभिज्ञ आहे.
त्यांनी दरवाजा जवळपास उघडलेला आहे, समोर संकट दिसतंय आणि ही पिढीपण ओरडून तेच विचारतेय,
आता काय करू?
आयुर्वेद दीनपणे साजरा करण्याची वेळ न येवो, या आयुर्वेददिनाच्या शुभेच्छांसह..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.10.2016
October 28, 2016
ह्याचे बहुवर्षायू २-८ फुट उंचीचे क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली असतात.ह्याचे मुळ औषधी मध्ये वापरतात तर ह्याच्या पानांची भाजी करतात.हि भाजी अत्यंत पथ्यकर व रुचकर लागते.
हि पाने सुध्दा औषधी गुणांची असल्याने घरगुती उपचारात वापरतात.हि चवीला कडू तिखट असते व थंड गुणाची असल्याने शरीरातील तिन्ही दोष कमी करते.
हि भाजी शक्यतो कोवळी असतानाच करावी जुन पाने वापरू नये व हि भाजी नीट निवडूनच करावी कारण पानांच्या खाली बारीक अळ्यांचे बस्तान असण्याची दाट शक्यता असते.
चला आता हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जखम भरून येण्यास भारंगीच्या पानांचा लेप जखमेवर लावावा.
२)सर्दी खोकल्या मध्ये भारंगीची पाने+ सुंठ+ मिरी+गुळ घालून काढा करावा व प्यावा.
३)भारंगीची भाजी शिजवून त्याचे पाणी प्यायले असता पोटातील कृमिंचा नाश होतो.
४)तापामध्ये भारंगीची व गुळवेलीची पाने एकत्र शिजवून काढा करावा व तो मध घालून घ्यावा.
५)अंगाचा दाह होत असल्यास भारंगीच्या पानांची चटणी वाटून तिचा लेप तळहातावर व पायांवर करावा.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास जुलाब होतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 30, 2016
खरं आहे हे ! आज जी विकतची काही मऊ मऊ पांघरुणे मिळतात, त्यात कृत्रिमरीत्या तयार केलेली फर वापरली जाते. त्यात जे रंग डाय करण्यासाठी वापरले जातात, ते पण अॅलर्जी वाढवतात, असे लक्षात येत आहे. सहज हातात धरून झटकली तरी ही फर वाऱ्यावर उडताना नुसत्या उघड्या डोळ्यांना दिसते.
February 8, 2018
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !
जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.
एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.
तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.
प्रकृती म्हणजेच निसर्ग !
सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.
बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.
रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.
ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.
हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
कारण,
शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.05.2017
May 12, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 35
नैवेद्यम् समर्पयामी - भाग नऊ
देवाचे जेवण पूर्ण झाल्यावर ताम्हनात तीन पळ्या पाणी सोडायला सांगितले जाते. जर भटजींनी म्हटलेले मंत्र नीट ऐकलेत, तर यातील अर्थ लक्षात येतील. नाहीतर एकाबाजूने भटजी मंत्र म्हणताहेत, आणि दुसऱ्या बाजूला पूजा करताना यजमान मोबाईल वर बोलाताहेत, आणि यजमानीण आपला मेकअप करतेय, असे असेल तर हे केवळ कर्मकांड होते आहे असे समजावे. मग कावळे काव काव करायला टपलेले आहेतच. "अशी कर्मकांडे करण्यात वेळ कशाला घालवा ? जो नाहीच आहे त्याला नैवेद्य तरी कशाला दाखवा." वगैरे वगैरे.
तर भटजी असं म्हणतात, तीन वेळा ताम्हनात पाणी सोडा.
नैवेद्यान्तरेण आचमनीयम् समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनम् समर्पयामि ।
मुखप्रक्षालनम् समर्पयामि ।
जेवणानंतर एक वेळा आचमन करावे. देवाचे नाव घेऊन एक पळी पाणी तळहातावर घेऊन पिणे म्हणजे आचमन करावे.
खरंतर प्रत्येक घासच देवाचे नाव घेत तोंडात घालायचा असतो. निदान तसा भाव तरी ठेवायचा. "आतले अन्न पचवायला मी आता देवाला सांगितलेले आहे, आता मला काळजी नाही, त्यातील गुणदोष तो बघेल."
खाताना भीती नसावी आणि खाल्ल्यानंतर आठवण न यावी. या दोन्ही गोष्टी देवाच्या स्मरणाने साध्य होतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, "तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता. ( फक्त माझे स्मरण करत अन्न गिळायचे...) म्हणजेच केलेले कर्म तू मला अर्पण करणे. मी तुला त्याचे योग्य ते फळ, वेळ आल्यावर देणार आहे. यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे पचन सुलभ होते.
आचमन करण्याने, अन्ननलिकेला आतील बाजूला लागलेले अन्न पुढे ढकलून अन्न नलिका धुतली जाते. एवढंच पळीभर पाणी जेवणानंतर घ्यावे, हा पण एक सोयीस्कर अर्थ.
जेवणानंतर देवाचे हाय धुवायला पाणी दिले जाते, तोंड धुवायला, चूळ भरायला, त्याच्या हातावर पाणी घातले जाते. केवढी एकरूपता साधली जाते. आपल्याकडे जेवायला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा आपण असाच उपचार करावा. ( केवळ व्हीआयपी पाहुण्यांना नको )
त्याही आधी जेवल्यानंतर हात धुवायचे असतात आणि खळखळून चूळ भरायची असते, एवढे तरी सांगितले गेलंय.? कोणासाठी सांगितले असेल हे कर्मकांड ? देव जो स्वतः निर्लेपी, निर्मोही, निर्गुण निराकार आहे त्याच्यासाठी ???
जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
वीतभर वाटीत बोटं बुचकळली आणि टीचभर पेपरला तोंडं पुसली की झालं हस्तमुख प्रक्षालन ! काय चाललं आहे ? कुठे भारतीय संस्कारातील दोन्ही हात स्वच्छ धुणे, खळखळून चुळा भरणे आणि कुठे पाश्चात्य प्रकारातील वाटीभर पाण्यात फक्त एका हाताची बोटे बुडवणे आणि ओठावरून कागद फिरवणे ?
नियमितपणे जर पाण्याने खळखळून चुळा भरल्या जात असतील तर दात किडत पण नाहीत, चुळ भरण्याने दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून जातात. आणि दाताला किड लागण्यापासून वाचवले जातात, म्हणून काही खाल्ल्यानंतर तोंड धुवावे, हात धुवावेत, हे देवपूजेच्या माध्यमातून दररोज सांगितले जाई.
पाश्चात्य देशात हस्त, मुख प्रक्षालन कसे करावे हे माहितीच नव्हते, वेळ मिळेल तेव्हा, पावासारखे सुके पदार्थ फिरत फिरत खायचे, आमटी भाजी, चटणी लोणचे असे ओले पदार्थच त्यांच्या ताटात न आल्याने, हाताला अन्न चिकटत नव्हते. त्यामुळे तोंड, हात धुणे हा संस्कार त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हता.
अन्न हातानी मुरडणे, कालवणे, एका हातानी त्याचे घास करणे, एका हातानीच खाणे, खाल्ल्यानंतर हात उष्टे होतात, म्हणून ते धुणे, हे त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हते. त्याचा परिणाम म्हणून या सर्व पाश्चात्य लोकांना दात आणि हिरड्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निवारणासाठी दंततज्ञ !! आपल्या गावात, तीस वर्षापूर्वी किती डेन्टीस्ट होते, आणि आता गावामधे दंततज्ञ किती आहेत ? ओझरता सर्व्हे केलात तरी, यांची वाढलेली संख्या लक्षात येते. या दातांच्या रोगाची मूळ कारणे कुठे आहेत, कशात आहेत, याचा एकदा शोध घेतला पाहिजे.
ज्या पाश्चात्य देशात एकेकाळी दात घासणे, चुळ भरणे, गुळण्या करणे कधी माहितीच नव्हतं, त्यादेशातील लोकांनी, ज्या भारत देशातील वयोवृद्धांचे बत्तीस दात स्मशानामधे सुद्धा मोजून घेतले जात... अश्या आमच्या भारत देशातील लोकांचे, "मौखिक आरोग्य कसे चांगले राहील?" यावर चर्चासत्रे घ्यावीत, यापेक्षा मोठा विनोद नाही.
........पण आज जमाना बदल गया है। यालाच "कलियुग" असे नाव. दुसरं काय म्हणणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
28.06.2017
June 28, 2017
पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो,
आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ?
आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात,
खरं वाटत नाही.
पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ?
आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय.
नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ?
कालच्या आरोग्यटीपेवरील काही व्यक्त काही अव्यक्त टीका ....
आपण आपल्या धारणाच बदलून टाकल्या आहेत. म्हणजे जे मूलतः भारतीय विचार होते, ते कालबाह्य म्हणून टाकून दिले आणि ज्या लोकांना संस्कृती म्हणजे काय ? जेवावे कसे, हे माहिती नव्हते, त्यांना हे सर्व आपण भारतीयांनी शिकवले. आज त्यांचा अनुनय आपण करतोय ? ते सांगतात, त्यावर पूर्णसत्य म्हणून विश्वास ठेवतोय. कालाय तस्मै नमः । दुसरं काय ?
या लेख मालेतून आपण भारतीय आरोग्य ( आजच्या काळात किती श्रेष्ठ आहे हे ) जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण आधीच ठरवलेले आहे. त्यादृष्टीने सर्व लेखन चाललेले आपल्या लक्षात येत असेल.
आज आमची धारणा अशी झाली आहे, की जे जे पाश्चात्य ते ते चांगले. पण हे आमच्या लक्षात येत नाही, की त्यांच्या धारणा, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, हा भारतीय जीवनपद्धतीपेक्षा कितीतरी भिन्न आहे.
आजच्या शिक्षणपद्धतीमधला हा दोष आहे की आमचे ते सर्व वाईट आणि पाश्चात्यांचे सर्व योग्य असे शिकवले जाते. हे पण पटणारे नाही काही जणांना.
टाय बांधला की माणूस सुसंस्कृत, सुशिक्षित वाटतो. हे खरंही असेल पण तो खरंच तसा होतो का ? मग शेंबुड सुद्धा पुसता येत नाही अशा शाळेत जाणाऱ्या पोरांना टाय बांधायची आवश्यकताच काय आहे ? ( टायचा उपयोग शेंबुड पुसण्यापेक्षा आणखी चांगला काय असू शकेल ? ) केवळ दिसण्यापेक्षा आतून तसे भारतीय असणे आवश्यक वाटते.
मी मोदींची भलावण करतोय असं नाही, पण टाय न लावतादेखील भारतीय पोशाखात आपले व्यक्तिमत्व खुलवता येऊ शकते. विचार भारतीय असला की सगळं शक्य असतं.
पण काय भुललासी वरलीया रंगा... ही आमची स्थिती झाली आहे. भारताबद्दलचे प्रेम सोडता येत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचा मोह टाळता येत नाही. न घर का ना घाट का अशी अवस्था आपली झाली आहे.
त्याची कित्ती उदाहरणे सांगू. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती पाश्चात्य विचारांनी वागतोय, सहज हिशोब करीत बसलो होतो, तेव्हा असे लक्षात आले की तब्बल 127 ठिकाणी आम्ही आमच्या मूळ परंपरा, रितीरिवाज, भाषा, पोशाख, चालीरिती बदललेल्या आहेत, ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत चालला आहे.
म्हणून मी सुरवातीलाच म्हटले, मूळ भारतीय आरोग्यापासून आपण खूप लांब चाललो आहोत.
पालेभाज्यांच्या पार्श्वभूमीवर डोक्यात येणारे उलटसुलट विचार आजच्या ग्लोबलायझेशनच्या फास्ट ट्रॅक युगात रूचणारे नाहीत, पटणारे मुळीच नाहीत पण काय योग्य होते, आणि आपण काय करीत होतो, ज्यामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहात होते.
कुठेही शास्त्रीय आधार न सोडता, व्यवहारात काय चालले आहे, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
मी संपूर्णपणे भारतीय बनण्याचे ठरवलेले आहे. आत्ता सुरवात झालेली आहे. वेळ गेलेली नाही. आजपासून अजून पन्नास वर्षे शिल्लक आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.10.2016
October 20, 2016
हि वनस्पती प्रामुख्याने पावसाळयात उगवते.आमच्या गोव्यात देखील हि भाजी ह्या ऋतू मध्ये आवडीने अर्थात गोवेकरी घोस्ताने (कोकणी शब्द)खातात.
हि भाजी शिजवल्यावर रूचीकर लागते मग तुम्ही तेलात परतून करा,मुग,चणा अथवा तूरडाळ घालून फक्त गुळ खोबरे घालून शिजवून करा किंवा मग त्यात फणसाच्या सुकवलेल्या आठळया घालून करा.अगदी लज्जतदार लागते हि भाजी.मला आता मी पाककृतीचेच सदर लिहित असल्या सारखे वाटले.
हिचे वर्षायू उग्र गंधयुक्त क्षुप असते.
हि चवीला तिखट,व उष्ण असते म्हणूनच शरीरातील कफ व वात दोष कमी करते.
जशी खायला हि लज्जतदार लागते तशीच हि आपण घरगुती उपचारांमध्ये देखील हिचा उत्तम वापर करू शकतो.
चला तर मग पहायचे ना हिचे औषधी उपयोग:
१)गजकर्णा मध्ये टाकळ्याच्या रस कडुनिंबाच्या पाल्याचा रस एकत्र मिसळून त्यांवर लावावे.
२)अंगावर पांढरे डाग पडत असल्यास व खाज येत असेल तर टाकळ्याची भाजी व भाजणीची भाकरी खावी.
३)त्वचा तेजवान व मुलायम दिसायला टाकळ्याच्या पाल्याचा रस बेसनात मिसळून नियमितपणे चेह-यांवर लावावा.
४)खरूजेवर रोगग्रस्त भागावर टाकळ्याचा रस चोळावा व नवीन पाल्याची चटणी तिथे बांधावी.ती सोडल्यावर त्या भागावर हळदपूड चोळावी चांगला फायदा होतो.
५)गळू फूटण्यासाठी टाकळ्याचा पाला वाटून केलेली चटणी बारीक वाटून त्याची गोळा गळूवर ठेवावी व दर बारा तासांनी हि गोळी बदलावी.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 22, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 25-दीपं दर्शयामी-भाग दोन
शुभं करोति कल्याणम
आरोग्यम सुख संपदा ।
शत्रुबुद्धी विनाशाय
दीपज्योती नमोस्तुते ।।
ही दिव्याची प्रार्थना तर आपली सर्वांचीच पाठ आहे. पाठ आहे, म्हणजे अर्थ माहिती असेलच असे नाही. कधी विचारही केला नसेल एवढा ! या पाठात एक बदल होत चाललाय, तो लक्षात आणून देतो, धनसंपदा नाही, सुखसंपदा ! आरोग्य तर मिळतेच पण सुख देखील मिळते. आपण भारतीय कधी धनाच्या मागे नव्हतो, पण सुखाच्या मागे कायम होतो. सुख मिळविण्यासाठी धन हवेच असे नाही, पण सुख हेच धन असे मानणारी आपली भारतीय संस्कृती !
मी दिव्याला नमस्कार करतो कारण, हा शुभ आहे, पवित्र आहे, शुद्ध करणारा आहे, कल्याणकारक आहे. आरोग्यकारक आहे, सुखकारक आहे. आपल्याच मनातील, शत्रुप्रमाणे असणारे वाईट विचार नष्ट करणारा आहे.
दिव्या दिव्या दीपत्कार
कानी कुंडले मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांपाशी
देहलीदीपक न्याय नावाचा एक न्याय सांगितलेला आहे. उंबरठ्यावर लावलेला एक दिवा आतील देवापर्यंत आणि बाहेरील तुळशीपर्यंत प्रकाश देत राहतो. आतून बाहेरून प्रकाश देणारा हा अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. असं संत सोहिरोबानाथ देखील म्हणतात.
घरातली पीडा बाहेर जावो,
बाहेरची लक्ष्मी घरात येवो,
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो.
ही सर्वांचे शुभ करणारी कल्याणकारी प्रार्थना दिव्याला उद्देशून म्हटली जाते.
दीपज्योती परब्रह्म
दीपज्योति जनार्दनः
दीपो हरतु मे पापं
संध्यादीपं नमोस्तुते ।
मनात निर्माण होणाऱ्या वाईट विचारांचे पाप नष्ट होण्यासाठी रोज सायंकाळी घरात दिवा लावावा. सायंकाल हा संधीकाल आहे. दिवस आणि रात्री मधला. पाप आणि पुण्ण्या मधला ! चांगलं आणि वाईट यामधला ! हा संधीकाल असतो सत्व आणि तमामधला ! सकारात्मकता आणि नकारात्मकता यामधला ! वनस्पतींचे श्वसन बदलण्याचा ! हे "चेंज ओव्हर" होत असताना सर्वच स्तरावर संतुलन राखणं महत्त्वाचे असते. आणि हेच काम दिवा करत असतो.
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं
ज्योतिषांप्रभुरव्ययः
आरोग्यम देही पुत्रांश्च
सर्वान् कामांश्च देही मे
प्रत्यक्षात सगुण रूपातील देव म्हणजे अग्नी. निसर्गात सूर्य नारायणाच्या रूपात तर शरीरात जाठराग्नीच्या रूपात असतो. जसं निसर्गाचं रक्षण करतो, तसंच हा अग्नी आरोग्याचे रक्षण करणारा आहे. केवळ रक्षण करणाराच नव्हे तर वंश वाढवणारा आहे. सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. फक्त विश्वास ठेवून, श्रद्धेने करणाऱ्याला फळ मिळते.
केवढा अर्थ भरलाय या प्रार्थनेमध्ये !
कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून केली जाते. का ? कशासाठी ? काय एवढं मोठ्ठं होणार तेलाचा दिवा लावून ?
स्वतः जळत असताना, स्वतःच्या जळण्याचे दुःख न करता, मेणबत्तीसारखे जळताना, सारखं अश्रु गाळत न रडता, आपल्या जळण्यामुळे सारं जग प्रकाशमान होतंय या आनंदात, फक्त प्रकाश मागे ठेवायचा असतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.06.2017
June 18, 2017
कावळ्याचिमणीची गोष्ट
गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू केले होते. त्यात एक क्षुद्र किटक, कोळी सुद्धा होता. भक्ष्याला पकडण्यासाठी तयार केलेलं जाळं तुटलं तरी जिद्द न हरता, परत परत तो तयार करीत होता. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते शिकावं हे दत्तगुरूनी शिकवलं होतं. तसं हा कावळा पक्षी माझा गुरू झाला. खूप काही शिकवून गेला.
एकदा रात्री साडे दहा वाजता दवाखान्यातून घरी येत असताना, घरासमोरच रस्त्यावर एका बाजूला एक मांजर गाडीखाली सापडून मरण पावले होते. खूप वाईट वाटलं. पण....
दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडलो, तेव्हा त्या मृत मांजराभोवती तीन चार कावळे बसून त्याला खात होते. माझी गाडी त्यांच्या जवळून गेल्यावर ते उडून गेले. मी पुढे गेल्यावर परत तिथे आले. माझे काम संपवून जेव्हा अर्ध्या पाऊण तासाने परत आलो तेव्हा जवळपास अर्धेअधिक मांजर त्यांनी फस्त केले होते.
गाडीतून उतरताना बुद्धीने विचार केला....
काल रात्रीपासून ते मांजर तिथे पडून होते, रात्रीची शांत निवांत वेळ खाण्यासाठी योग्य होती, वाहानांचा, माणसांचा कोणाचाही त्रास नव्हता, मग या कावळ्यांनी रात्रीच या मृत मांजराला का खाल्ले नाही ??????
तेव्हा, त्याने आखून दिलेला नियम आठवला आणि लक्षात आले. रात्रीचे खायचे नसते.
जे काही खायचे ते सूर्योदय झाल्यावर खावे. पोटभर खावे. भीती न बाळगता खावे आणि महत्त्वाचे म्हणजे खाल्ल्यानंतर काय खाल्ले होते, ते अजिबात आठवू नये. म्हणजे खाल्लेले सर्व सहज पचून जाते. खाल्लेल्या अन्नाविषयी मनात नकारार्थी भावना तयार व्हायच्या अगोदरच आहार पचून गेला पाहिजे.
सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये, हे त्याच दिवशी संध्याकाळी चिमण्यांनीदेखील मला शिकवले. एका दुकानात सौ. बरोबर गेलो होतो. ती आत मधे खरेदी करताना मी गाडीत बसलो होतो. आणि दुकानाच्या बाहेर जमिनीवर पडलेले धान्य खाण्यासाठी येणाऱ्या चिमण्यांच्या थव्याकडे कुतुहलाने पाहात होतो.
सायकल वाला आला, चिमण्या भुर्रऽऽऽ,
रिक्शा आली पुनः चिमण्या भुर्रऽऽऽ
माणसं गेली तरी चिमण्या भुर्रऽऽऽ
कितीतरी वेळ असा पोटभरतीचा खेळ चालला होता. त्यांचा चिवचिवाट ऐकून बरं वाटत होतं.
तेवढ्यात सौ.चा निरोप आठवला, काळोख पडायच्या आत पिठाच्या चक्कीवरून दळण आणायचे आहे. म्हणून अगदी जवळच असलेल्या चक्कीवरून दळणाची पिशवी आणून गाडीत ठेवली. एव्हाना दुकानाबाहेर दिवे पण लागले होते आणि त्या संधीप्रकाशात मी परत चिमण्या शोधायला लागलो, पण एकही चिमणी दिसेना. चिमण्यांनी फुललेला बाजुचा गुलमोहर देखील अबोल झाला होता. एक विषण्णता मनात दाटून आली. सायकलवाला पण नव्हता, रिक्शावाला पण नव्हता, माणसांची वर्दळ पण थांबली होती, पण सर्व चिमण्या मात्र निमूटपणे परत फिरल्या होत्या......घराकडे अपुल्या....
कारण एकच होतं. तो "दिनकर" अस्ताला गेला होता.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.03.2017
March 1, 2017
मल, मूत्र, ढेकर, शिंका, अश्रु, तहान, भूक इ. तेरा वेग सांगितलेले आहेत. यांना कधीही अडवू नये. जेव्हा हे वेग आतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा जबरदस्तीने यांना अडवून धरू नये. लगेचच त्यांना मोकळे करावे.
September 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti