आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा
आज काल काय झालंय.
दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी,
जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून !
आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती.
रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती !
वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती !
पैशांची किंमत झाली कमी आणि पैसे झाले जास्ती !
मनमोकळ्या गप्पा झाल्यात कमी आणि चॅटींगसाठी वेळ झालाय जास्ती !
टीव्ही वरील सर्व चॅनेल्सवरचे एकुणएक पिक्चर्स जणु काही आपल्यासाठीच बनवले आहेत. फुकट बघता येतात, म्हणून आयपीएल पण झाल्या. याच्या जोडीला "मनोरंजन" म्हणून काहीतरी हवेच ना, म्हणून दिमतीला हाय फाय सिरीयल्स आहेतच !
सिरीयल्सच्या मधल्या जाहिरातींच काय करणार ? विचारांना एका ठिकाणी स्थिर बसू न देणाऱ्या रिमोटने दुसरी चॅनेल्स बदलली तरी तिथेही जाहिरातीच ! एकुणच काय, तुमच्या खिशातले पैसे आमच्या खिशात, आमच्यातचे तुमच्यात ! म्हणून भारतात एकवेळ थंडीची लाट येईल, पण मंदीची लाट कधीच येणार नाही.
95 % जनतेला सिरीयल्स मधला झामझौल मोहक वाटतो. मोह निर्माण झाल्यावर त्यातून इर्षा जन्माला येते. माझ्याकडे पण हा सगळा ताकझाक हवा, असे वाटू लागते, त्यासाठी खिशात असलेले पैसे पुरणारे नसतात. म्हणून अधिकाधिक प्रयत्न सुरू होतात. ज्या झोपेसाठी रात्र आहे, त्या झोपेच्या वेळी अशा सिरीयल्स पाहून आपल्या झोपेचं खोबरं तर करतोच, पण नको ते मानस रोग पाठी लागतात. आणि दिवस पण खराब करून टाकतो.
म्हणजे रात्रही गेली आणि दिवसही गेला.
एवढंही पुरत नाही, म्हणून हायफाय वायफाय सुरू करून घेतलं. नको ते चॅटींग, रात्री अपरात्री सुरू झालं. डोक्यावरून पांघरुण पांघरून गप्पा रंगू लागल्या. या मॅच्युअर गप्पा अजाण पालकांना समजू नये, याचा ताण सुरू झाला. नेहमीच्या गप्पागोष्टी नकोश्या वाटू लागल्या. वेळ कसा जातोय, ते लक्षात येईनासं झालं. अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडू लागलं. हुशार मुलांची आणि बुद्धिमान मुलींची बुद्धी गहाण पडू लागली. जागरणं घडू लागली आणि नको ती स्वप्न पडू लागली.
रात्रीचर्या बिघडू लागली.
तरूण तरूणींच्या चेहेऱ्यावरील चर्या बिघडू लागली.
दिवस आणि रात्रीची कामं पुरती बदलून गेली आणि समाजाची घडी सगळी विस्कटून गेली.
यम नियम न पाळता, अनावश्यक आरोग्य नियम, यम बनू लागला आणि "यम" आपला पाश आवळू लागला.
जगण्याची भीती वाटू लागली आणि मरण येऊ नये म्हणून औषधे ही गरज बनली.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.05.2017
विडा हा एवढा औषधी गुणधर्माचा आहे, की हा जर कोणी खात असेल तर त्याला अन्य कोणते रोग होण्याचा चान्सच नाही. वेगळे व्हिटामिन्स नकोत, कॅल्शियम नको, पाचक नको, वेगळे रक्तशोधक नको, वेगळे अस्थिपोषक नको, वेगळ्या औषधाची गरजच नाही. विडा हेच स्वयम एक औषध आहे. फक्त त्याची खाण्याची एक पद्धत आहे.
पाय आणि मांडी दुमडुन
जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत.
दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे टेबलखुर्ची मध्ये नसते.
टेबलखुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते, तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहाजिकच पोट टेबलाच्याही खाली जाते.(....... आणि पोट दिसतच नसल्याने किती पुढे आले आहे, हे पण कळत नाही.) त्यामुळे टेबलावरील वाढलेले ताट आणि टेबलाखाली वाढलेले पोट यातील अंतर कमी होते. ताटातील घास अंगावर सांडण्याची भीती बिलकुल असत नाही.
टेबलावर वाढलेले ताट आणि उघडलेले तोंड, यामधे फक्त काही इंचाचे अंतर उरते. ताटातील घास अगदी सहजपणे, विनासायास तोंडात जातो.
पण जेव्हा मांडी दुडली जाते, तेव्हा मात्र ताटातील घास अंगावर सांडू नये म्हणून, ताटापर्यंत पुढे वाकावेच लागते. जेवत असतानाच पोट हलते, दुडते, थोडेफार चिरडते, चेपले जाते, यामुळे आतड्यातील आतील भिंतीला चिकटलेले अन्न सुद्धा घसरते, हलते, खाली पडते.
अशा तर्हेने आतड्याच्या भिंतीवरून खाली पडलेले अन्न, पचनाच्या, घुसळण्याच्या प्रक्रियेमधे आणले जाते.
अन्न पोटात जात असताना अन्नाचा एक थर पोटात गेला आहे. मधे मधे पाणी पडत, पुनः अन्न. असे थरावर थर रचले जातात. जेवायला मधेमधे पुढे वाकल्याने पोट थोडे आवळले जाते. पोटातील अतिरिक्त वायु बाहेर पडतो. अन्न आणि पाणी यांचे पोटातील संचरण योग्य प्रमाणात होते. पुढे अन्न घुसळायला याची मदत होते.
पुढे वाकून जेवल्याने उजव्या बाजुला असलेले यकृत आणि डाव्या बाजूला असलेले, स्वादुपिंड, अग्न्याशय हे अवयव पण हलकेच दाबले जातात. या ग्रंथींवर थोडासा दाब निर्माण झाल्याने त्या ग्रंथीच्या आतील पाचकस्राव आणि इन्शुलीन, सहजपणे ग्रंथीच्या बाहेर पाझरतात, पचन आपोआपच सुधारते. आंबा पिळल्यानंतर कसा रस गळतो !!
पुढे वाकून जेवल्याचे असे काही फायदे लक्षात आले आहेत.
......आणि अन्नासमोर नतमस्तक होण्यात लाज ती कसली ?
कोणाही समोर जर आपण केव्हाही नतमस्तक झालो तर समोरून आशीर्वादाचा हात सहजपणे वर उचलला जातो.
आणि इथे तर समोर, साक्षात अग्निनारायण.! जेवताना जर त्यांच्यासमोर नतमस्तक झालो, तर अग्निनारायणांना "तथास्तु" म्हणावेच लागेल. नाही का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
19.09.2016
योगरत्नाकर या ग्रंथामधील हा आणखी एक श्लोक पहा.
सायं प्रातर्मनुष्यानां अशनं श्रुतिचोदितम्।
नान्तरा भोजनं कुर्यात् अग्निहोत्र समो विधि:।।
शास्त्रात इतक्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे.
सायंकाळी आणि सकाळी या दोन वेळा जेवले पाहिजे. जसे सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र चुकत नाही, तसंच भोजन हे पण एक प्रकारचे अग्निहोत्रच आहे. या वेळेला जेवण्याचा नियम अजिबात चुकवू नये.
"काल भोजनम् आरोग्य कराणाम् श्रेष्ठः। "
म्हणजे योग्य वेळी घेतलेले भोजन हे आरोग्य मिळवण्यासाठी योग्य असते. आपण काय जेवतोय, यापेक्षा किती वाजता खातोय, या वेळेला महत्त्व आहे.
हे सगळं ठीक आहे हो, पण आजच्या काळात हे तर्कसंगत वाटत नाही. पूर्वीच्या गोष्टी सांगून हे असं स्वप्नरंजनात जाणं आणि तिथे रमणं, हे वय वाढल्याचं लक्षण वाटते. असं काहीजण म्हणतात. विशेषतः वैद्यांनी म्हटले की यांच्या पराभूत मानसिकतेला काय म्हणावं कळत नाही.
आयुर्वेद समजून घेण्याच्या प्रक्रियेत चुक झाली की अश्या शंका निर्माण होतात. आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेताना रंजक आणि रोचक भाषेत न शिकवल्यामुळे शिक्षणाबद्दलचे प्रेम वाढत तर नाहीच उलट कमी होते, एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी वेगवेगळी रूपके वापरायची असतात, हे अजूनही शिक्षकांच्या लक्षात येत नाहीये. आपली जेवणाची वेळ सकाळ आणि सायंकाळ असावी हे एकच वाक्य आपण कितीतरी वर्षापासून तसे ऐकतंच आलोय, पण बदल झाला का ?
नाही. पण कालचक्राची गती फिरल्यामुळे हेच वाक्य पुनः पुनः पटवून द्यावे लागत आहे. आणि हे सांगण्यासाठी जर भारतीय संस्कृती प्रमाण मानली तर आपला गौरवशाली इतिहास देखील लक्षात येईल आणि मुख्य म्हणजे आयुर्वेद समजून घेतला जाईल ना ! पण पटतच नाही.
समजा आपण एका रस्त्यानं जातोय, आणि काळाच्या ओघात रस्ता चुकलो. आणि अगदी एकशे ऐशी अंशात चुकलो, तर काय करायचं ?
आता एवढं आलोच आहोत तर पुढेच जायला पाहिजे ना. असा विचार करून चालेल का ?
जिथून रस्ता चुकला आहे, तिथपर्यंत मागे आलंच पाहिजे. आणि परत योग्य दिशेने प्रवास सुरू केला पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयाच्या दिशेकडे वाटचाल करू.
'काळ खूप पुढे गेला आहे. आता परत मागे फिरता येणे शक्यच नाही, प्रवाहाच्या दिशेत गेलंच पाहिजे,' अशी नकारात्मक मानसिकता असेल तर काऽही शक्य नाही. जिवंत मासेच प्रवाहाच्या विरोधात पोहू शकतात, आणि मेलेले प्रवाहात वाहात जातात.
आणि आपला आपल्या शास्त्रावर, आपल्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर, अशक्य ते शक्य करतील स्वामी या उक्तीप्रमाणे, जे रोग कधीही बरे न होणारे असे पाश्चात्य मानसिकतेचे लेबल लावलेले रोग आपण मुळातून उखडून टाकू शकतो.
आरोग्यटीप लिहिण्याचा मुळ उद्देश भारतीय आयुर्वेद आणि त्यातील आरोग्य समजून घेणे हा असल्याने ते मी करणारच. त्याच पद्धतीने तो समजून घ्यावा लागेल. जी चुक आधीच्या पिढीने केली ती आता परत करायची नाही.
आता या टीपेमधे स्वामी समर्थांना आणि अग्निहोत्राला कशाला आणलं ? असा प्रश्न विचारू नका.
रुग्ण बदलायला तयार असतात. वैद्यांनी सांगितलेले सर्व मनापासून करतात, विश्वास ठेवून केले की परिणाम दिसतात. असा माझा अनुभव आहे. अर्थात त्या विश्वासाने वैद्यांनी पण सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यांनी आपल्यामधे सकारात्मक बदल केले पाहिजेत, असे वाटते. मी सांगतो म्हणून अजिबात नको. शास्त्रात काय सांगितले आहे, ते तरी परत एकदा अभ्यासूया.
अर्थात गरज आहे ती, आपलं चुकलंय, हे समजण्याची. आणि मान्य करायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
03.03.2017
तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव.
हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव.
अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव !
कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, स्थिरता, जडपणा, घट्टपणा. शत्रू म्हणजे विकृत कफाचे हे सर्व गुण क्षणार्धात नाहीसे करणारा, हा तिखट गुण.
कफामुळे जिथे जिथे शरीरात हे अवगुण दिसतात, तिथे तिथे त्याच्या उलट काम करणारा हा तिखट गुण.
गळ्याचे आजार, पितांब येणे, सर्व त्वचारोग, अंगाला येणारी सूज, सांध्यांना येणारी सूज, ह्रदयात येणारी सूज, पोटात साठून राहिलेला आम यांना हलवून टाकणारी, पोटावर साठलेली फाजील चरबी या सर्वांना नष्ट करणारी ही तिखट चव.
स्वभावाने उष्ण, तीक्ष्ण, भूक वाढवणारी, रूची देणारी, अन्नमार्गाचे संपूर्ण शोधन करणारी, बंधनांचा नाश करणारी, अल्प प्रमाणात वाढलेल्या आमाचे शोषण करून घेणारी ही तिखट चव !
प्रमाणापेक्षा जास्त वापरली गेली तर तहान, चक्कर येणे, कंठशोष होणे, शिरा आकुंचन पावणे, कंप सुटणे, पोटात दुखणे, वेदना निर्माण होणे, ही लक्षणे निर्माण होतात.
पातेल्याला असलेला चिकटपणा काढण्यासाठी, जोर लावून, खरडून खरडून, तळापासून उपाय केला तर कसे पातेल्याला चरे पडतील, तसे होईल.
म्हणजे काहीवेळा तसे करणे देखील, सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखे आवश्यकपण असते.
पाचशे हजारांच्या नोटा साठवून साठवून त्याचे रूपांतर जेव्हा विकृत आमामध्ये होते, तेव्हा त्याचा साठा हलवण्यासाठी काहीतरी जालीम तिखट निर्णय घेण्यासारखे आहे. मुळापासून सुपडा साफ. मग नाकातोंडातून पाणी येणारच !
मीठी चाय खिलानेवाला तिखा जो ठहरा. जैसे चाय मे अद्रक.
एक चायवाला भी इस विकृत आम को हटा सकता है !
पण आयुर्वेद मतानुसार
निःसुखत्वम सुखायच.
आता तिखट वाटेल, थोडा त्रास होईल, पण अंतिमतः सर्वांनाच सुख देणारे असेल अशी ही तिखट चव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.11.2016
झोप येते आहे, पण झोपायचे नाही, भूक लागली आहे, पण जेवायचे नाही.
ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे.
अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच हि चवीला कडू तुरट आणि थंड असते,त्यामुळे शरीरातील पित्त व कफ कमी करते.
हिचे देखील घरगुती उपचारांमध्ये बरेच उपयोग आहेत बरं का!चला तर मग आता ते पहायचे ना?
१)ज्या मंडळींना शौचास साफ होत नाही त्यांनी मेथीची भाजी जेवणात घ्यावी.
२)गळवांवर हिच्या पानांचा लेप लावावा म्हणजे वेदना व सूज कमी होते.
३)संडासला आव पडत असल्यास ५ चमचे पानांचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
४)वारंवार लघ्वीला होत असल्यास १/४ कप मेथी पाल्यांचा रस+१/२ चमचा कात+३ चमचे खडीसाखर हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)डोक्यात कोंडा झाल्यास आंघोळी पुर्वी पाच मिनिटे केसांच्या मुळांना मेथीच्या पानांचा रस लावावा व नंतर साबण न वापरता केस धुवावेत.केस मऊ व चमकदार होतात.
६)चेहरा तेलकट होत असल्यास मेथीच्या पाल्याचा लेप चेह-यांवर लावून १/२ तास ठेवावे व कोमट पाण्याने धुवावे.
मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ व वारंवार होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे चौपन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग बारा
जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात,
बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये.
यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते.
आजच्या काळानुसार जी बॅक बुडणारी आहे, त्यात पैसे ठेवू नयेत, किंवा कमी काळात दाम दुप्पट वगैरे फसव्या योजनेत पैसे गुंतवू नयेत. मल्टीलिंक मार्केटिंग हा परदेशी फंडा आहे. आपली गुंतवणुक सोडवून घेण्यासाठी दुसऱ्याला आत गुंतवायचे असा सरळ सरळ अर्थ म्हणजे एम एल एम.
कमी पाणी असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बोकडाला वर येण्यासाठी, एक बोकड धडपडत असतो. पण वर येता येत नाही. "व्वा, पाणी किती गोड आहे, पिऊन तर बघा !" असे आमिष इतरांना दाखवल्यावर, काठावरून जाणाऱ्या दुसऱ्या बोकडाला, पाणी चाखून बघावेसे वाटते. म्हणून दुसरा बोकड इतर कोणताही विचार न करता, आत उडी मारतो. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिला बोकड केव्हा विहिरीबाहेर पडतो, ते दुसऱ्याला कधी कळतच नाही, मग तीच युक्ती दुसरा बोकड, तिसऱ्या बोकडासाठी वापरतो याला म्हणतात, मल्टी लिंक !
यात प्राॅडक्ट म्हणून काहीही साधन वापरले जाऊ शकते. मग ती बदकाच्या पिसाची गादी असेल, नाहीतर भादरलेल्या बोकडाची दाढी असेल, नाहीतर एखादे लाॅकेट असेल वा लोहचुंबक असेल, खेळण्यातली गोल्डन डाॅल असेल वा एखादे दंतमंजन असेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी काहीही फंडे वापरले जातात, पश्चात ताप होऊ नये, यासाठी सावध तो सुखी, हे सूत्र लक्षात ठेवावे.
मातीचे ढेकूळ, दगड वा फळ मारून, (आपल्या किंवा इतरांच्या ) झाडावरचे फळ तोडू नये.
हा मारलेला दगड परत आपल्याच डोक्यावर पडण्याचा संभव असतो, वा कुणाचे तरी नुकसान करणारा असतो. कुणा व्यक्तीचे नाही झाले तरी झाडाचे नक्कीच होते. गरज नसताना दुसरे कच्चे फळ पडणे, झाडावरील घरट्यातील पक्ष्यांच्या पिल्लांना धोका पोचणे, किंवा पलीकडील घराची कौले फुटणे यापैकी काहीही होऊ शकते. अगदीच काही नाही झाले तर असा शेजारी किंवा झाड मालक जेव्हा पाठ धरून बोंबलत येतो तेव्हा सैराट होऊन धावताना आपल्याला इजा होऊ शकते.
परवानगी घेऊन अथवा न घेता कोणाच्याही घरात, दाराचा वापर न करता अन्य मार्गाने घुसू नये.
दुसऱ्याच्या घरात आपण एकट्यानेच कोणाला सांगितल्या शिवाय, किंवा कोणी सांगितल्याशिवाय खुर्चीवर वा उच्च आसनावर बसू नये.
नंतर खुर्ची सोडावी लागली तर ते दुसरे दुःख कोणते नसते. विशेषतः व्यासपीठावर बसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.
झोपी गेलेल्यास उठवू नये, हे पण ग्रंथकार लिहितात. पण ही सूचना शाळा काॅलेजमधे वर्गात झोपा काढणाऱ्यांसाठी सांगितलेली नसून, अति श्रमाने जो दमलेला आहे, किंवा ज्याला खरोखरच विश्रांतीची गरज आहे, अशा मंडळींकरीता आहे हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
रात्रभर वाॅटसप चालवून दमल्याभागल्यांसाठी हा नियम लागू होत नाही. अशा मंडळीना उठवताना नाकी नऊ येतात. यांना उठवण्यासाठी हळुच यांच्या कानात म्हणावे, "मोबाईलला लाॅक टाकायला विसरला आहेस, की स्वारी टुणकन उठून बसेल बघा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१२.०९.२०१७
जेवणे म्हणजे शरीराला फक्त कॅलरीज पुरवणे नव्हे. तसं असतं तर शरीराची रोजची गरज किती आहे ती पाहून तेवढीच एक कॅपसुल घेऊन पुरते का ? किंवा एका डब्ब्यातील ड्रींक्समधे भरून ते तेवढेच प्याले तर ?
असं चालत नाही किंवा पुरत नाही.
जेवण्यातून समाधान मिळत असते.
अहो, अगदी घरच्या डब्यातील भाजी पोळी आमटीभात ऑफीसमधे खायचा असेल तर त्याच डब्यात बुचकुन बुचकुन खाणे आणि तोच डबा छान ताटात वाढून घेऊन खाणे यात कॅलरीज तेवढ्याच मिळतील, पण आनंद! समाधान !!
ते या एका कॅपसुल किंवा टीनपाट हेल्थड्रिंकच्या पत्र्याच्या डब्ब्यातून कसे मिळणार ?
मनाच्या प्रन्नतेवरच पचन देखील अवलंबून असते. मन हे अन्नापासूनच बनते, असंही उपनिषदामधे सांगितले आहे.
आता उपनिषदे भारतीय आहेत, म्हणजे फक्त थापेबाजीच असणार, असं विधान कोणी केल्यावर त्यांना कसं पटवणार ना ? जाऊंदे.
पाश्चात्य संस्कृतीला आत्ता आत्ता मनाचे अस्तित्व समजायला लागलंय. मन मानायला हवं, त्याचा अभ्यास करायला हवा, असं ते खुल्या दिलानं मान्य करताहेत. हा त्यांचा मोठेपणा नक्कीच आहे.
मन दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व असतं. यावर आता संशोधन करायला त्यांनी सुरवात केली आहे. जे दिसत नसतं, ते नसतं, असं नसतं. हे आत्ता त्यांना पटायला लागलंय. पण आमच्याकडच्या अंनिस सारख्यांना हे कळायला अजून काही वर्षे जातील. सुदैव आहे पाश्चात्य देशात अंनिसची शाखा नाही. असो.
आयुर्वेद म्हणतो, मन ह्रदयात आहे. पण शोधले जाते आहे मेंदूत. कसे मिळेल ? जिथे हरवले आहे, जिथून हरवले आहे, तिथेच जाऊन शोधले तरच मिळेल.
आरोग्याचेही तसेच आहे. जिथून आपले आरोग्य हरवायला सुरवात झाली आहे, तिथपर्यंत जाऊन पोचायचा, हा एक छोटासा भारतीय प्रयत्न आहे.
हो. भारतीय आरोग्य वेगळं आहे. ते शोधण्यासाठी तशी दृष्टी आवश्यक आहे.
ईश्वर बघण्यासाठी डोळे पण तसेच असावे लागतात. आणि पात्रता पण !
श्रीकृष्णांच्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी, अर्जुनाला पण, वेगळी दृष्टी देणं भगवंताना भाग पडलं.
भारतीय आरोग्य अभ्यासण्यासाठी अशी दृष्टी हवी तरच आरोग्यात होत गेलेले फरक लक्षात येतील.
बघा पटलं तर....
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
22.10.2016
आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन !
Copyright © 2025 | Marathisrushti