ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.
एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.
सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.
प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ, भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !
सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !
बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे "काम" करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त "आऽऽ कर" असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा "कामानिराळा" राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !
दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळुशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !
पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !
ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !
ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !
आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.03.2017
March 23, 2017
काही भयानक रोगांमध्ये ऑपरेशन ऐनवेळेला टाळून किंवा ऑपरेशन करताना होणारा रक्तस्त्राव कमी करुन अथवा कॅन्सर हाताबाहेर गेल्यावर भयंकर त्रास टाळण्यासाठी क्ष किरण शास्त्र रुग्णाच्या मदतीसाठी धावून आले आहे व याचे तज्ञ खास प्रशिक्षण घेतलेले ब्लॅक कॅट कमांडोसारखे कलाबाज असतात.
January 24, 2011
अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ?
उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं.
सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा तेवढा आतून वहाणारे द्रव पदार्थ जास्ती प्रमाणात जाणार. आणि जेवढा पाईप लहान तेवढा द्रव पदार्थ देखील पुढे ढकलायला जास्ती कष्ट पडणार. हे व्यावहारिक सत्य आपण बघतोच. बरं ही स्रोतसे आतून गुळगुळीत असतील तर आतील पदार्थ पटकन पुढे ढकलला असता. पण स्रोतसे आतुन वरखाली असतात. नुसत्या डोंगर आणि दऱ्या. याकरीता या स्रोतसांमधे लाळेसारखा एक बुळबुळीत पदार्थ सतत स्रवत असतो. यामुळेच तर अन्नाचा गोळा हळुहळू पुढे ढकलला जातो. पण स्रोतसांना चिकटणारे पदार्थ आत गेले तर या स्रोतसांच्या हालचाली थोड्या मंदावतात. आतमधे या आम सदृश पदार्थाचे लेपन झाल्यामुळे यांचा आकारदेखील थोडा लहान होतो. त्यामुळे आतील द्रव ज्या वेगाने पुढे सरकला पाहिजे, त्या वेगाने पुढे सरकत नाही.
दिवसाची मिळालेली सूर्याची उष्णता, या स्रोतसांमधील आतून चिकटलेला कफसदृश द्रवपदार्थ विलयीत करते आणि स्रोतसांचा आकारही वाढवला जातो, आणि अन्न पदार्थ सहजपणे पुढे ढकलायला मदत होते.
हे सर्व काम दिवसा उजेडी झाले तर बरे ना. म्हणून दिवसा जेवावे.
आणि रात्री सूर्य नसल्यामुळे स्रोतसांचे आकुंचन सुरू होते. स्रोतसे संकुचित होतात. आतून वाहाणारा द्रवाहार सावकाश जातो. काही वेळा तर अडकूनच रहातो. त्याला मागाहून येणारा रस चिकटत जातो. थरावर थर लागत जातात आणि स्रोतसांचा आकार आणखीनच कमी होतो. स्रोतसांमधे आतून साठण्याची वृत्ती वाढली की गोळा बनत जातो.
लहान रस्त्यावर ट्रॅफिक स्लो होते, रस्ता मोठा असला तर ट्रॅफिकजामची भीती नसते. म्हणून दिवसाचे अन्न लवकर पुढे सरकते, आणि पचते आणि रात्रीचे उशीरा !
ही संकोचनाची क्रिया होऊ नये या करीता, गती आणि उष्णता दोन्ही गोष्टी हव्यात. हे चक्क भौतिकशास्त्र सांगितलेले आहे.
ग्रंथकार एक सूचना अवश्य करीत आहेत. जर सायंकाळी घेतलेले अन्न चांगले पचले नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागेपर्यंत जेऊ नये. पण दिवसाचे अन्न पचले नसेल तर परत सायंकाळी जेवले तरी ते दिवसभराच्या उष्णतेमुळे पचून जाते.
याचा दुसरा अर्थ सायंकाळी जेवताना नीट विचार केल्याशिवाय जेऊ नये. एवढे लक्ष सायंकाळच्या जेवणाच्या वेळेवर ठेवावे.
कारण,
जंतुंची वाढ देखील रात्रीच्याच वेळी होते.
कारण त्यांचाही रात्रीस खेळ चाले....
हे आयुर्वेदातील जीवशास्त्र..
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.03.2017
March 12, 2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
अंथरूणातून सूर्य बघू नये
अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. "लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे" असं एक सुभाषित शाळेतील लाकडी खांबावर लिहिलेले आठवते.
पण आता जमाना बदल गया है.
आता आम्ही फार उशीर करत नाही, बारा साडेबाराला झोपतो. (झोपतो म्हणजे बाकीच्यासाठी ! डोक्यावरून पांघरूण घेऊन आत माझ्यासकट वाॅटसप जागा असतो. जास्त नाही दीड दोन वाजताच झोपतो. )
लवकर उठायला ज्यांना जमत नाही, त्यांचे पचन बिघडते. लवकर झोपणे होत नाही, याची अनेक कारणे असतील. पण लवकर उठणे होत नाही याला कोणताही युक्तीवाद नको. किमान सहा साडे सहाला उठलेच पाहिजे. रात्रीच्या जागरणाचे संयुक्तिक कारण असेल तर ती झोप दुपारी घ्यावी. पण जेवणानंतर नको. त्याने पुनः आम निर्माण होणार. इथे युक्ती वापरावी. दुपारची झोप आधी घ्यावी आणि उठून नंतर जेवावे. म्हणजे कफ प्रकोप होणार नाही. अर्थात ही पळवाट आहे. नियमाला पळवाट असावी पण पळवाट हा नियम बनू नये.
एवढ्या लवकर उठून करायचे काय, असाही प्रश्न काही जणांना पडेल. काही जण म्हणतील, आम्हाला जाग येते पण उठवत नाही. उठलो तरी ताकद असत नाही. उठायचं असतं, पण पाय दुखतात, पायाची टाच दुखते, गुडघे दुखतात, लवकर उठले तर म्हणे पित्त वाढते, चक्कर येते, डोके दुखते इ. इ. अनेक तक्रारी सक्काळी सकाळी सुरू होतात. या सर्व तक्रारींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्रीचे जेवण सायंकाळी सातला संपलेच पाहिजे. अन्यथा जेवूच नये. जेवण नाहीतर फळ, ज्युस वगैरे वगैरे. नाही चालणार. पोट हलके सैल, रिकामे करूनच तर झोपायचे आहे.
आणि समजा उशीरा झोपणे झाले आणि सकाळी जाग आली तरी
गादीवर जास्त लोळू नये
असे आई सांगते.
मस्त बेड टी प्यावा, बायकोने हातात टीव्ही चा रिमोट आणून द्यावा, तिथूनच योगाचे चॅनेल सुरू करावे. आणि चकली वेफर्स खात खात योगा करणाऱ्यांना बघण्याचा व्यायाम करावा. नाहीतर साखरझोप अनुभवावी, पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात, म्हणून आपल्याला हवी तशी सुंदर सुंदर स्वप्ने पहावीत. आणि कानावर गोड हाक यावी,
"मोऽहऽअऽन्ऽ", जागो प्यारेऽऽऽऽऽ"
डोळे उघडून पहावे तर नेहेमीचीच......
सकाळी लवकर उठावे, आह्निक उरकावे, जमल्यास स्नानसंध्या करावी. ज्ञानमार्गाने जाणारे असू तर काहीबाही वाचन करावे, भले ते ज्ञान दै. लोकसत्ता, मटा किंवा वाॅटसप महाराजांकडून आलेले का असेना !
काही लेखन करावे. वाॅटसप वर लेखन करावे.ट्विटरवर टिवटिव करावी. मराठी इंग्लिश अथवा हिंग्लीश भाषा वापरावी. फेसबुकवरील असंख्य मित्रांना तत्वज्ञानाचे डोस पाजावेत. (आपण कोरडे पाषाण रहावे.)
ज्ञान ग्रहणाची आवड नसेल तर कोणतेही आवडीचे काम करावे. बागेत जावे, व्यायम करावा, जेवण बनवावे, टीव्ही मात्र पाहू नये.
कर्ममार्ग पण नको असेल तर सरळ साध्या सोप्या भक्तीमार्गाने जावे. देवळात जावे, तुळशीला, वडा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. घरातच राहायचे असेल तर लोटांगणे घालावीत, नाहीतर खुर्चीवर बसून नामस्मरण करीत राहावे, पण झोपून राहू नये. हे झोपणे मधुमेहाकडे नेणारे आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. ( मी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत जागा असतो, पण सकाळी सहा साडेसहाला नक्कीच उठतो. आणि रात्रीचे जागरण झाले तरी आम निर्माण होतच नाही, कारण माझे रात्रीचे भोजन सायंकाळी आटपलेले असते. )
आई जे सांगते त्यामधे काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला असतो, कारण अनुभवाचे चार पावसाळे तिने जास्ती पाहिलेले असतात. भले त्यामागील शास्त्र, विज्ञान तिला माहिती नसेल. कारण तिला तिच्या आईने तसेच सांगितले होते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
August 18, 2017
पाणी शुद्धीकरण भाग नऊ
या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?
ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा....
आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं.... एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची...
गंमत होती सर्व ...
गेली ती सारी गंमत.....
"एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा," लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
" यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं...." माझं तिरकस उत्तर.
त्यावर ती म्हणाली,
" आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं."
तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
" पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
कुठेही उगवतं,
म्हणून त्याचं
कसंही निभावतं "
खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?
जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?
एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !
आजच्या भाषेत "इम्युनिटी" कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !
हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.01.2017
January 5, 2017
An Apple A Day Keeps Doctor Away अशी एक इंग्रजी म्हण आहे त्यात कितपत तथ्य आहे हे ती म्हण निर्मात्यालाच ठाऊक असेल कदाचित.सफरचंद तसे प्रत्येकाचे आवडीचे फळ.ह्याचे अॅप्पलपाय,अॅप्पल जॅम,अॅप्पल चटणी,लोणचे,ज्यूस असे अनेक प्रकार खायला व प्यायला मिळतात.आणी ते रूचकर देखील लागतात.
असे हे सफरचंद आपण किरकोळ शारीरिक तक्रारींमध्ये सुद्धा वापरू शकतो.हे थंड प्रदेशात पिकणारे फळ असून ह्याचा वृक्ष असतो व सफरचंद कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर लालासह गुलाबी होते.
पिकलेले सफरचंद हे गोड थंड पित्त व कफ दोष कमी करणारे व वातकर असते.चला आता ह्याचे उपयोग पाहूयात.
१)पचन शक्ती कमी होऊन भूक मंदावली असल्यास सफरचंद वाफवून त्यावर मिरपुड व सैंधव मीठ लावून खावे.
२)शौचास पातळ होत असेल अथवा आव पडत असेल तर पिकलेले सफरचंद चांगले चावून खावे.
३)सफरचंद गरम पाण्या १० -१५ मिनिटे भिजत ठेऊन त्याची साल काढुन ते बारीक वाटून घ्यावे नंतर त्यात सफरचंदाच्याच वजना इतके मध घालावे व पुन्हा घोटावे मग त्या वेलची,केशर,गुलाबकळी,गुलाबपाणी,जायपत्री,भीमसेनी कापूर घालून ते चांगले घोटावे.ह्याला मधुचंद म्हणतात ह्याचे सेवन अशक्तपणा मध्ये करावे तसेच ह्याने हृदयाला बळ मिळते.मधुचंद सेवन करताना मासे,दही,तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
४)अति मांसहारी व तिखट पदार्थ खाल्ल्यावर छातीत जळजळ होणे,पित्ताचा त्रास होणे ह्यात सफरचंद खावे.
सफरचंद खायचा अतिरेक केल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 18, 2016
शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.
शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.
शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.
२)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.
३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.
४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.
५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2017

हिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व रूंदिला बारीक व अधिक पांढरा असतो.ह्या कंदाला कैरी सारखा वास येतो.
ह्याचे उपयुक्तांग कंद असून हि चवीला कडू,गोड व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.आंबेहळद कफपित्तशामक व वातकर आहे.
चला आता आपण हिचे काही औषधी उपयोग पाहुयात:
१)शरीराचा कुठला हि अवयव मुरगळला असता आंबेहळदीचा लेप लावल्यास सुज कमी होते.
२)त्वचा रोगा मध्ये खाज व पुरळ आला असता आंबेहळदीचा लेप लावतात.
३)आंबेहळद रक्त शुद्ध करते म्हणून रक्ताच्या विकारात उपयुक्त आहे.
४)चेहऱ्यावर मुरमांचे डाग अथवा मुरूमे आली असता आंबेहळदीचा लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar
English Name: Mango Ginger
March 28, 2018
हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.
July 26, 2017
भरपूर जेवल्याने भरपूर ताकद येते हा जसा गैरसमज आहे, तसा कमी जेवल्याने ताकद कमी होते, हा पण गैरसमजच आहे. विशिष्ट वयात विशिष्ट आजार होणं, हे सर्वसामान्य आहे पण, तरूणांचे अकाली आजार आणि अकाली मृत्यु चटका लावून जातात. वृद्धत्व आणि मृत्यु लवकर येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. हे चुक नाहीच. वृद्धत्व सुद्धा अनुभवले पाहीजे.
August 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti