जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कंप्यूटरच्या भाषांपैकी एक "कोबोल" या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर यांचा जन्म ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुमारे ८० वर्षांपूर्वी "इंटरनेट'चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून "प्रोग्रॅमिंग'मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या "नेव्हल ऑफिसर' ठरल्या.
संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि अमेरिकन नौदलातील असामान्य कामगिरीमुळे त्यांचा उल्लेख "अमेझिंग ग्रेस' असाही केला जातो. इतकेच नव्हे तर यू. एस. नेव्ही डिस्ट्रॉयरला "यू. एस.एस. हॉपर" हे नाव त्यांच्याच नावावरून दिले गेले आहे, हा केवढा मोठा गौरव आहे.
ग्रेस मरे हॉपर यांचे शालेय शिक्षणही न्यूयॉर्क येथे झाले. त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्रातील पहिली पदवीही तेथेच मिळवली. १९४१ मध्ये जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला, तेव्हा ग्रेसला नाविक दलात प्रवेश हवा होता. तो तिला मिळाला नाही. तिचे चौतीस हे वय त्यांना जास्त वाटले होते. शिवाय तिच्या पाच फूट सहा इंच उंचीच्या मानाने तिचे वजन नौदलाच्या प्रमाणाप्रमाणे सोळा पौंड कमी भरले. शासनाने तिचे गणितातील पदव्युत्तर शिक्षण पाहून गणितात अध्यापन करण्याचा निर्णय घेतलं आणि तिला सैनिकाऐवजी नागरिक राहण्याचा आदेश दिला. तरीही निराश न होता, तिने खटपट करून अमेरिकन नौदलाच्या राखीव सेनेत नेमणूक मिळवली. लेफ्टनंट हा हुद्दा तिला देण्यात आला आणि दुस-या युद्धाच्या धामधुमीत नौदलाच्या "Ordnance Computation Project" या विशेष प्रकल्पावर तिला धाडण्यात आले. वयाच्या साठाव्या वर्षी ती नौदलातून निवृत्त झाली. पण एका वर्षातच तिला पुनः बोलावण्यात आले. नौदलाच्या सर्व संगणकीय कामाचे प्रमाणीकरण करण्याच्या कामात समन्वय आणण्यासाठी तिची नेमणूक झाली. यापूर्वी तिला आदेशा बरहुकूम काम करण्याचा अनुभव होता. आता सबंध नौदलातील नोकरशाहीशी तिचा सामना होता आणि तो तिने यशस्वीपणे हाताळला.
युद्धकालीन कामगिरीवर असतांना तिला मार्क-१ हा जगातील पहिला डीजीटल संगणकीय सोफ्टवेअर प्रोग्राम शिकायला मिळाला.या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन या हुशार बाईनं एका आयुष्यात काय काय करावं? डब्यात जाणारा ‘मार्क-१’ संगणक तिनं तिच्या हुशारीनं वाचवला. तसंच ‘कंपायलर’ नावाच्या संकल्पनेला तिनं जन्म दिला. जसा एखादा दुभाष्या एका भाषेतलं बोलणं समजून घेऊन दुसऱ्या भाषेत त्याचा अर्थ लावून सांगतो, तसं ‘कंपायलर’ नावाचा एक प्रोग्रॅम आपण संगणकाला चालवायला सांगू शकतो. हा ‘कंपायलर’ प्रोग्रॅम मग आपल्याला सोप्या वाटतील अशा संगणकाच्या भाषेत (उदाहरणार्थ सी, जावा, कोबॉल) लिहिलेले प्रोग्रॅम्स संगणकाला समजतील अशा ०-१ च्या भाषेत (मशीन लँग्वेज) आपल्याला बदलून देतो. आणि हा ० आणि १ च्या भाषेतला ‘मशीन लँग्वेज’ मधला प्रोग्रॅमच संगणकाला कळू शकतो. त्यामुळे मग आपल्याला संगणकाची ०-१ ची क्लिष्ट भाषा शिकत बसावी लागत नाही. तसंच एकदा ग्रेस हॉपर तिचा एक प्रोग्रॅम चालवून बघत असताना अचानक ‘मार्क २’ संगणक नीट कामच करेना! त्या इमारतीत वातानुकूल यंत्रणा नव्हती. त्यामुळे सगळ्या खिडक्या वारं येण्यासाठी उघडलेल्या होत्या.
काय झालं म्हणून तिनं एका सहकाऱ्याच्या मदतीनं जरा खुडबूड करुन बघितली तेव्हा तिच्या लक्षात आलं की संगणकाचा कुठला तरी भाग उघडा राहिला होता, आणि त्यात एक किडा (बग) जाऊन बसला होता! त्याला बाहेर काढून तिनं तिचा प्रोग्रॅम परत चालवून बघितला तर तो व्यवस्थित चालला की! आजही त्या ऐतिहासिक किडय़ाचा अवशेष अमेरिकेत जपून ठेवलेला बघायला मिळतो! तेव्हापासून कोणताही प्रोग्रॅम नीट चालत नसेल तर त्या प्रोग्रॅममध्ये ‘बग’ आहे असं सॉफ्टवेअरमधली मंडळी आजही म्हणतात आणि ती ‘बग’ शोधून प्रोग्रॅम दुरुस्त करायला ‘डिबगिंग’ असं म्हणतात! असो. १९५३-५४ च्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे प्रोग्रॅमर मंडळींना इंग्रजीसारख्या भाषेत संगणकाकडून काम करुन घेण्यासाठी सूचना लिहायची सोय करणं. प्रोग्रॅमिंगचं काम शक्य तितकं सोपं व्हावं यासाठी ग्रेस हॉपर प्रयत्नशील असे. त्यातूनच जेव्हा इंग्रजीशी बऱ्यापैकी साधर्म्य असणारी ‘कोबॉल’ नावाची भाषा तयार झाली तेव्हा त्या प्रयत्नात तिचा वाटा मोठा होता. यासाठी १९५९ साली हॉपरसकट ६ माणसांनी एका परिषदेत यासंबंधी चर्चा करुन या भाषेचा तपशील ठरवला.
अनेक दशकं ‘कोबॉल’ ही भाषा संगणकाचे प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी वापरात असलेली सगळ्यात लोकप्रिय भाषा होती. १९६६ साली तिचं वय खूप जास्त असल्याच्या सबबीवर तिला नौदलानं सक्तीनं निवृत्ती घ्यायला लावली. तिच्या आयुष्यातला हा सर्वात वाईट दिवस होता. पण १९६७ साली नौदलात काम करणाऱ्यांची पगारपत्रकं बनवायच्या कामात असंख्य चुका होत असल्यानं त्या दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी तिला ‘थोडय़ा काळासाठी’ परत कामावर रुजू व्हायची विनंती केली गेली. हा ‘थोडा काळ’ चार वर्षांचा असणार होता! १९७१ साली ती परत एकदा निवृत्त झाली. पण तिला कोणी निवृत्त थोडीच होऊ देणार होतं! १९७२ साली तिला पुन्हा एकदा कामावर येण्याची विनंती केली गेली. १९७३ साली तिला ‘कॅप्टन’ म्हणून पदोन्नती मिळाली. शेवटी १९८६ साली वयाच्या ८०व्या वर्षीही ही बाई नाखुशीनं तिच्या इच्छेविरुद्धच निवृत्त झाली. ही तिची शेवटची (!) निवृत्ती होती! संगणकक्षेत्रातली बहुतेक झाडून सारे पुरस्कार तिला मिळाले होते. तिची संगणक आणि नौदल यांच्याविषयीची भाषणं अतिशय लोकप्रिय असायची.
"मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन'मध्ये काम करणाऱ्या महिलांनी "हॉपर्स' नावाचे मंडळच स्थापन केले आहे आणि त्यांच्या नावाने शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. सप्टेंबर १९९१ मध्ये तिला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय पदक मिळाले. तिने केलेल्या संगणकाच्या विकास कार्याची देशाने घेतलेली ती दखल होती. यापेक्षा आणखी एक सर्वोच्च पातळीवरील सन्मान तिला लाभला. तो म्हणजे अमेरिकन नौदलातील एका विनाशिकेला तिचे नाव देण्यात आले. यु.एस.एस. हॉपर या ४६६ फूट लांब व ८३०० टन वजनाच्या विनाशिकेवर अत्याधुनिक संगणकीय यंत्रणा बसवलेली आहे. नौदलाच्या परंपरेनुसार या विनाशिकेवरील मानचिन्हातही शब्द आहेत, ते माजी रिअर अॅयडमिरल हॉपर मार्गदर्शन करताना नेहमी वापरत असे – DARE & DO
अशा या हरहुन्नरी बाईची काही विधानंही अजरामर आहेत:
‘कुठलीही गोष्ट करायची परवानगी मागण्यापेक्षा ती सरळ करुन मोकळं होणं जास्त बरं असतं.’ किंवा
‘बंदरात असलेलं जहाज हे समुद्रातल्या जहाजापेक्षा जास्त सुरक्षित असतं. पण बंदरात ठेवण्यासाठी जहाज तयार केलेलं नसतं.’ ग्रेस हॉपर यांचे १ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विनोद गोरे
December 10, 2021
हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते.
सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे. प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. "तेरी दुनिया मे दिल लगता नही", "कहा हो तुम" ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या "मै दिल हुं एक अरमान भरा" या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते.
मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. "बार बार तोहे क्या समझाये" किंवा "झीलामील तारे करे इशारा" ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. "सलामे आली हसरत कबूल कर लो" आणि "मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है" ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. "बहारो ने मेरा चमन लूटकर" या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही.
"मैने शायद तुम्हे" या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण "सम" म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम "निराघात" आहे. "शायद" या शब्दातील, "य" अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते.
एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत."कही तो मिलेगी", "सखी रे मोरा मन", "वो चले आये रे" ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.
रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. "हम इंतजार करेंगे","छा गये बादल","पाव छु लेने दो" ,"छुपा लो युं दिल मे प्यार" इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात.
आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. "मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), "बता दो कौन गली (तिलंग), "मदभरी अंखीयां" (जौनपुरी) किंवा "गरजत बरसत" (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, "सलामे हसरत","गमे हस्तीसे बस बेगाना","वळला क्या बात","युं अगर मुझको ना चाहो तो" ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो.
"कव्वाली" हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. "अगर ये दिल" (घर घर मे दिवाली),"ना तो कारवां की तलाश" (बरसात की रात), "निगाहें मिलाने को" (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. "निगाहें मिलाने को" या कव्वालीत, यमन नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या "रे" वरून एकदम अचूक वरचा "रे" घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"
अनिल गोविलकर
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
November 27, 2017
मराठी चित्रपटसृष्टीत असे खूप गुणवंत आहेत ज्यांच्या कलेची व्हावी तशी कदर झाली नाही आणि त्यांच्या योग्यतेच्या तुलनेत त्यांच्या पदरी तसे फार यश पडले नाही. दिग्दर्शक आणि छायाचित्रकार प्रभाकर निकळंकर हे अशांपैकीच एक होते.
August 5, 2017
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. “कायद्याच बोला” या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
June 4, 2022
रोग निदानाच्या क्षेत्रात गेली ३० वर्षे व्यावसायिक यश मिळवून स्वत:च्या नावानेच ब्रॅन्डनेम तयार करणार्या डॉ. अविनाश फडके यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजची उलाढाल आज शंभर कोटींच्या घरात पोहोचली आहे. १९ प्रयोगशाळा आणि साडेनऊशे कर्मचारी यांचे बळ आज त्यांच्या पाठीशी आहे आणि रोगनिदानातील अचूकतेबाबत ते काटेकोर आहेत.
डॉ. अविनाश फडके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला यशाचे अचूक निदान हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. अविनाश फडके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला यशाचे अचूक निदान हा लेख वाचा.
September 8, 2015
भारतातील प्रसिद्ध बंगाली इतिहासकार व संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचा इंग्रजी वाङ्मय व इतिहासविषयक ग्रंथ यांचा व्यासंग होता आणि त्यांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता.
May 19, 2021
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले
May 25, 2019
ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे.
'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे. मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.
४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले.
अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
December 6, 2018
कोकणचा इतिहास अभ्यासताना अभ्यासकर्त्याला दापोली तालुकातल्या एका व्यक्तीची दखल घेणे अत्यंत अनिवार्य आहे, ती व्यक्ती म्हणजे कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन करणारे ‘श्री.अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच ‘अण्णा शिरगावकर.’ अण्णा शिरगावकर म्हणजे कोकणचा चालताबोलता ज्ञानकोश आहेत.
February 17, 2024
इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर १९२६ साली हैदराबाद पायदळ रेजिमेंट (सध्याची कुमाउँनी) मध्ये राजादिष्ट अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
December 17, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti