जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. त्यांच्या कवितांची शैली ही अतिशय बांधेसूद आणि मधुर आहे. दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्हा डात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त अशा प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका. १९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्त्विक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण. परंतू ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय रहात नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचे सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिले नाही. १९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. १९३४ साली त्यांचा “फुलांची ओंजळ” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. कवी बी यांचे निधन ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रियांका / स्वानंद
नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.
जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.
नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.
प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!
एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणाऱ्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.
नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच! त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे.
शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर् यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात.
एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे. आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.
ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपति सारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.
भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल.
आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे. एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव्या दूरचित्रवाणी मालिका, नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे.
राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.
एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे! नितिन देसाई यांच्यावर ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’
लेखक मंदार जोशी. हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचाऱ्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कुतुहल शमविणारं हे पुस्तक आहे.
चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई (6-Aug-2021)
दिग्दर्शक नितीन देसाई (6-Aug-2017)
#NitinChandrakantDesai
दैनिक ‘मराठा’ च्या माजी संपादक , मराठीतील ख्यातनाम लेखिका ‘प्रेम कहाणी’, ‘ऊन-सावली’, ‘ओशो’, ‘प्रियजन’,‘पप्पा’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका आणि ‘हायकू ’ हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा आणणा-या कवयित्री शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणाऱ्या लेखिका शिरीष पै. आचार्य अत्रे यांच्या शिरीष पै या कन्या. त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.
लालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबर्या त्यांन लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला, अशी पुस्तके गाजली. आपल्या अफाट कर्तृत्वाच्या वडिलांचे चित्रण पप्पा आणि वडिलांचे सेवेशी या दोन पुस्तकातून त्यांनी रंगवले आहे. शिरीष पै यांचे दोन सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
मराठीतील ‘हायकू’ला प्रतिष्ठा मिळवून देणा-या शिरीष पै यांच्या गाजलेल्या काही हायकू…
पाहिला नाही असा उन्हाळा
उगवतानाच
सूर्य भडकलेला
दुरून पाऊस पाडेन
काळा ढग येतो आहे
लांबूनी जोर दिसतोय
आठवून सारे हसू येते
याचसाठी का मी
रडले होते
केव्हापासून करत आहे
काव काव कावळा
एवढा का भरून
येतो त्याचा गळा
केळीचे पान वा-यावर डुलतय
पण त्याला माहीत नाही
टराटरा फाटतंय
बागेमध्ये आनंदात फुलपाखरू
गेलं बागडून
पाऊस थांबला म्हणून
प्राचीन किल्ल्यात पाय ठेवताच
आपल्याला कळले
भूतकाळात काय घडले
जन्म महाड येथे, मूळ गाव – महाड, जि. रायगड, शालेय शिक्षण – महाड येथेच झाले. ऐन तरुणपणी देवलांच्या रॉयल सर्कसमध्ये तारेवरती रिंग सायकल चालविणे व वाघ सिंहाचे रिंग मास्टर म्हणूनही अल्पकाळ कामगिरी केली.
इंग्रजी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून त्यांनी राजकीय , सांस्कृतिक विषयांवर खूप लेखन केले. दिलीप चित्रे यांनी चित्रकलेविषयी खूप लेखन केले आणि १९७८ साली ‘ गोदाम ‘ या चित्रपटाचे कथालेखन-दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले.
मार्क झुकरबर्गचे वडिल इलियट हे व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहेत. त्याचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक वापरायला सुरवात केली. त्याने घरात एकमेकांना संदेश देण्यासाठी एक प्रोग्रॅम विकसित केला. याचा उपयोग त्याच्या वडिलांच्या दवाखान्यात रुग्णांना त्यांचा नंबर आला आहे हे सुचित करण्यासाठी केला गेला. या नेटवर्कला ‘झुकनेट’ असं नाव दिले गेलं.
नवनवीन प्रोग्रॅम लिहणं हा तर झुकरबर्गसाठी छंदच झाला होता. मार्कने हार्वर्ड विदयापीठात कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी या शाखेत प्रवेश घेवुन आपल्या माहाविदयालयीन जीवनाला सुरवात केली. या काळात मार्कने गंमत म्हणुन ‘फेसमस’ हा प्रोग्रॅम तयार केला. यात पोस्ट केलेल्या फोटोंवर विदयार्थ्यांनी आपलं मत मांडायचं होतं. पण हा प्रोग्रॅम काही दिवसातच बंद पडला. परवानागी शिवाय फोटो वापरल्याबद्द्ल झुकरबर्गवर टिकाही झाली अणि त्याला माफीही मागावी लागली. परंतु हाच प्रयत्न झुकरबर्गला फेसबुकच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरला. मार्क शिकत असलेल्या अॅमकॅडमीत विदयार्थ्यांची माहिती आणि फोटोज संकलित केलेली डिरेक्टरी असायची त्याला फेसबुक असे म्हटलं जायचे यावरुनच साईटला ‘फेसबुक’ असं नाव दिलं गेलं असं म्हटलं जाते. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक चालू करण्याआधी 'फेसबुक'ची संपूर्ण योजना आपली मैत्रीण प्रिशिलाला(जी नंतर पत्नी झाली.) समजावून सांगितली. प्रिशिलाने देखील मार्क झुकरबर्गला सगळ्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. झुकरबर्गने 'फेसबुक'साठी शिक्षण सोडले.
'फेसबुक' सुरु झाल्यानंतर पहिला युजर म्हणून प्रिशिलाने रजिस्ट्रेशन केले. वेबच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या झुकरबर्गचे यश त्याच्या वयाच्या मानाने कितीतरी मोठे आहे, यशाची एकेक पायरी चढत असताना मोठया उद्योगसमुहांकडुन येणाऱ्या ऑफर्स डावलून फेसबुक ने आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली. मला अणि माझ्या सहकाऱ्यांना केवळ पैसा महत्वाचा नसुन लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट्य आहे. “My aim is making world open” असं त्याने एक मुलाखतीत म्हटलं आहे. सध्या जगात १.७१ अब्ज फेसबुकचे युजर्स आहेत. फेसबुकमुळे शाळा-कॉलेज मधले मित्रमैत्रिणी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले.
मित्राचा मित्र, मैत्रिणीची मैत्रीण, तिची बहिण, तिचा भाऊ, सख्ये, चुलत - निलत अगदी शेजारी राहणारे ताई, माई, दादा सुध्दा ही लिस्ट तर हजारांवर जाऊन पोहचते. ज्यांना रोजच काय पण अनेक वर्षात भेटता आले नाही किंवा ज्यांच्या भेटीची शक्यताही दुरापास्त आहे त्यांना आता आपण रोज भेटतो फेसबुकवर. या सगळ्याच्या सुखदु;खात जरी आपल्याला प्रत्यक्षपणे सामील होता आलं नाही तरी अप्रत्यक्षपणे सामील होण्याची सोय फेसबुक ने उपलब्ध करुन दिली आहे. एरव्ही सामाजिक, राजकीय विषयांवर टिका, टिपण्णी करणं ही पत्रकार आणि नेते मंडळीचीच मक्तेदारी समजली जायची पण फेसबुकमुळे सामान्य माणुस या विषयांवर आपलं मत हिरीरीने मांडू लागला. फेसबुकमुळे प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ मिळालं. मार्क झुकरबर्गची लव्हस्टोरी त्याच्यासारखीच 'हटके' आहे.
झुकरबर्ग १४ वर्षांपूर्वी पहिल्यादा आपल्या पत्नी प्रिशिला हिला भेटला होता. पहिल्या भेटीतची प्रिशिलावर झुकरबर्गला जीव जडला होता. मार्क झुकरबर्ग आणि प्रिशिला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होते. दोघे २००३ मध्ये एका पार्टीत सहभागी झाले होते. झुकरबर्ग वॉशरूमबाहेर उभा होता. तितक्यात त्याचे लक्ष रांगेत उभ्या असलेल्या एका युवतीकडे गेले. ती युवती म्हणजेच प्रिशिला चान. झुकरबर्ग व प्रिशिलाचे हाय- हॅलो झाले. हळूहळू दोघांत चांगली गट्टी जमली. दोघे दररोज भेटू लागले. मैत्री अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात कसे झाले, हे दोघांनीही कळले नाही.
झुकरबर्ग व प्रिशिलाने १९ मे २०१२ ला विवाह केला. मार्क आणि प्रसिला यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर त्याच्या नावावर असलेले ९९ टक्के शेअर्स म्हणजेच ४५०० कोटी डॉलर दान केले. आजमितीला मार्क झुकरबर्ग हा जगातला सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आहे. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुलोचनाबाई यांनी भालजी पेंढारकर यांना अगुरु मानले. रेखीव आणि बोलक्या डोळ्याच्या रंगू दिवाण यांचे नामकरण भालजींनी ‘ सुलोचना ‘ असे केले आणि ह्याच नावाने त्या खूप लोकप्रिय झाल्या.
गोपीनाथ सावकार यांनी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमीवर सातत्याने संगीत नाटकं सादर केली. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१० रोजी झाला. 'भावबंधन', 'शाकुंतल', 'सुवर्णतुला', 'ययाती देवयानी' अशा अनेक संगीत नाटकांचे दजेर्दार प्रयोग सादर करून त्यांनी संगीत नाटकाचा प्रेक्षक टिकवून ठेवायचा जवळ जवळ एकहाती प्रयत्न केला. ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता. गोपीनाथ सावकार गोव्याचे. धि गोवा हिंदु असोसिएशन या संस्थेचा सांस्कृतिक विभाग गोपीनाथ सावकार यांनीच सुरू केला.
पु. भा. भाव्यांचं 'वीषकन्या' हे नाटक सावकार आपल्या संस्थे तर्फे’सादर करीत. यातली नीळकंठाची खलनायकी भूमिका त्यांनी अजरामर केली. आपल्या अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर एक मानदंड निर्माण केला. आचार्य अत्रेंच्या 'उद्याचा संसार'मध्ये गोपीनाथ सावकार प्रमुख भूमिका करीत होते. शरीर मधुमेहाने पोखरलेलं होतं. पायाला इजा झालेली. जखम चिघळत गेली, गॅंगरिन झालं. शेवटी पाय कापावा लागला. कुठच्याही नटाने आपली रिप्लेसमेंट तयार करा, असा सल्ला दिला असता. पण गोपीनाथ सावकार स्वत:च नाटक सादर करत होते. सांगणार कुणाला? आणि शरीरात भिनलेली नाटकाची झिंग शमवणार कशी? मागची पुढची तमा न बाळगता हा अवलिया कुबड्या घेऊन रंगमंचावर भूमिकेत उभा राहिला आणि त्यांनी ती भूमिका आपल्याला आलेल्या पंगुत्वाची फिकीर न करता शेवटपर्यंत उत्कृष्टपणे निभावून नेली. ही आठवण विजय तेंडुलकरांनी त्यांच्या 'कोवळी उन्हे' या सदरातल्या लेखात नोंदवून ठेवली आहे.
नाट्य-चित्रपट क्षेत्रातले ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ हे गोपीनाथ सावकार यांचे भाचे. संगीत रंगभूमीवर गायक नट म्हणून प्रतिष्ठा पावलेले प्रसाद सावकार हे पुतणे. अनेक संगीत नाटकांत उत्तम स्त्री पाटीर् नट म्हणून लौकिक मिळवणारे रघुनाथ सावकार हे त्यांचे चिरंजीव आणि शिष्यगणांत रामदास कामत, आशालता आणि अशा कित्येक हुन्नरी गायक कलावंतांचा भरणा होता. अशोक सराफ आणि सुभाष सराफ या गोपीनाथांच्या भाच्यांनी आपल्या मामांची कायमस्वरुपी आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावे विश्वस्त निधी स्थापन केला आहे. या विश्वस्त निधीने अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्य मंदिराला आणि पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला गोपीनाथ सावकारांच्या तैलचित्राची प्रतिमा दिलेली आहे. गोपीनाथ सावकार स्मृती विश्व स्त निधीच्या वतीने गोपीनाथ सावकार स्मृती नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. गोपीनाथ सावकार यांचे निधन १४ जानेवारी १९७३ साली झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या.
१९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं.
शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता.
लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल रफी यांना आपला गुरु मानायचे.
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत.
रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.मा.मोहम्मद रफी यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.मोहम्मद रफी यांना आदरांजली. मा.मोहम्मद रफी यांच्या जयंती निमीत्त गुगलने डुडल बनविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti