(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुगंध त्याचा लपेल कां ?

    उपेंद्र चिंचोरे यांनी ज्येष्ठ गायिका मालती पांडे – बर्वे यांची सांगितलेली आठवण.

    'सुगंध त्याचा लपेल कां "? … ज्येष्ठ गायिका मालती पांडे - बर्वे ह्यांच्या सहवासातील सुगंधित आठवणी :आज १९ एप्रिल त्यांची जयंती

    माझ्या लहानपणी रेडिओ हे मनोरंजनाचे मोठे आकर्षण होते ! त्याकाळी आम्ही रहात असलेल्या वाड्यामध्ये सर्वात आधी म्हणजे आमच्या घरी मर्फी कंपनीचा रेडिओ आला. माझ्या आईमुळे मलाही गाण्याची आवड लागली !

    मालती पांडे ह्यांची पहिली ओळख झाली, ती त्यांनी गायिलेल्या सुमधुर गाण्यातून, कवी श्रीनिवास खारकर ह्यांची रचना, गजानन वाटावे ह्यांच्या संगीतामध्ये मालती पांडे ह्यांनी गायिलेले गाणे - उठ जानकी मंगल घटिका, आली आनंदाची, ग. दि. माडगूळकरांचे - सुधीर फडके ह्यांची सुरावट असलेले - त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे, मधुकर पाठक ह्यांनी स्वरबद्ध केलेलं, अनिल भारतींच गाणं - खेड्यामधले घर कौलारू, मधुकर पाठक आणि अनिल भारती ह्या द्वयींच - पाहिजेस तू जवळी, राजा बढे ह्यांच्या काव्याला, श्रीनिवास खळे ह्यांचं संगीत लाभलेलं - कशी रे तुला भेटू ? गीतरामायणातील आज मी शापमुक्त झाले, कोण तू कुठला राजकुमार ? ह्या आणि अश्या अनेक गाण्यांनी मालती पांडे हे नांव खूप मोठ्ठ झालं होतं !

    गाणं एकदा ऐकलं ,की ते चालीसकट माझं तोंडपाठ होत असे. वहीमध्ये गाणं उतरवून ठेवायची मला सवय लागली, ती तेव्हांपासून, गाणही लगेच पाठ व्हायचं ! माझ्या आईचं ऐकून मी ही गाणं म्हणायचो. तो आनंद काही वेगळाच होता !

    मालती पांडे - बर्वे ह्यांची नि माझी पहिली भेट झाली, तो प्रसंग मोठा गमतीचा आहे, ऐका, अकरा जून १९८२ चा तो दिवस होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मालतीबाईंची आणि माझी ओळख कॉलेजमध्ये होईल ! होय, पण झालं अगदी तसंच ! पुण्याच्या कर्वे रोडवरील एम ई एस गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये मी नोकरी करीत होतो. दहावीचा बोर्डाचा निकाल लागला होता आणि अकरावीच्या प्रवेशाचे काम चालू होते. अकरा जूनला सकाळी ऑफिसमध्ये प्रवेशाचे काम सुरु असतांना, माझं लक्ष कार्यालयाच्या दारावर खिळले, अन् मी बघतच राहिलो, माझ्या शेजारीच बसलेल्या सहक-याला - श्री शाळीग्राम ह्याना म्हणालो, "अरे ते बघ, कॉलेजमध्ये मालती पांडे आल्यात". ते म्हणाले, "कसं शक्यय, त्या कशाला इथं येतील, तुला सगळीकडे गाण्यातली लोकं दिसतात".

    "अरे हो, नक्की मालती पांडेच आहेत त्या, थांब मी बोलून येतो" , असं म्हणून मी दाराजवळ उभ्या असलेल्या मालती पांडे ह्यांचे जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, "नमस्कार, अहो आपण इथं कश्या आलात ? कुणाच्या प्रवेशाला ?" मालती पांडे माझ्या प्रश्नाला उत्तरल्या, "अहो माझ्या मुलाच्या - राजूच्या प्रवेशासाठी आलेय" !
    "अहो मालतीबाई मी आपल्याला एका झटक्यात ओळखले, अन् त्यांना म्हणालो, आपण आत या, बसा इथं ! राजू जवळची कागदपत्रं मी तपासली, प्रवेशाची बाकीची प्रक्रिया सुरु होती, त्या पटकन मला म्हणाल्या, "तुम्ही कसं काय मला ओळखलं ?" "अहो, मला गाण्याची खूप आवड आहे, आपण गायिलेली गाणीसुद्धा मला आवडतात, इतकंच नाही तर आपलीही गाणी माझी तोंडपाठ आहेत"! त्यावर त्या म्हणाल्या, "कसं शक्यय, आता खूप काळ लोटलाय, हा लता आशाचा जामानाय …. " त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच, मी पटकन माझ्या आवडीचं त्यांचं गाणं तिथेच तोंडपाठ म्हणलो - गद्यात …।

    लपविलास तू हिरवा चाफा,
    सुगंध त्याचा छपेल का ?
    प्रीत लपवुनी लपेल का ?
    जवळ मने पण दूर शरीरे । नयन लाजरे, चेहरे हसरे
    लपविलेस तू जाणून सारे । रंग गालिचा छपेल का ?
    क्षणात हसणे, क्षणात रुसणे । उन्हात पाउस, पुढे चांदणे
    हे प्रणयाचे देणे-घेणे । घडल्यावाचुन चुकेल का ?

    पुरे बहाणे गंभिर होणे । चोरा, तुझिया मनी चांदणे
    चोरहि जाणे, चंद्रहि जाणे । केली चोरी छपेल का ?

    माझं गद्य संपलं तेव्हां मालतीबाई माझ्याकडे बघतच राहिल्या, "वा छान वाटलं, आजही माझे रसिक मला लक्षात ठेवतात", त्यांच्या चेहे-यावरचा आनंद लपत नव्हता. राजूच्या प्रवेशाचे काम तर केव्हांच झालं होतं, त्या घरी जायला निघाल्या तेव्हांच त्यांनी मला घरी यायचं आमंत्रण दिलं !

    ऑगस्ट १९८२ मधील अशीच एक हृद्य आठवण ! माझी आई वैदेही भजनी मंडळात जायची ! ते मंडळ दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करायचे. कालिंदी केसकर, भार्गवराम आचरेकर, जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार असे मातब्बर कलावंत त्या मंडळाला अध्यक्ष म्हणून लाभले होते. मी आईला म्हणालो, "अगं मालती पांडे ह्यांना विचारू कां?" मी फोन करून मालतीबाईंच्या घरी गेलो, त्यांनी त्यांचे पती - शास्त्रीय गायक, मा. पं पद्माकर बर्वे ह्यांचीही ओळख करून दिली. मी भीत भीत मालतीबाईंना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकाराल कां, असं विचारलं आणि काय आनंद झाला म्हणून सांगू, त्यांनी मला तत्काळ होकार भरला. "फक्त एकच करा, मला तिथं गायचा आग्रह करू नका, बाकी माझी मी वेळेवर येते, तुमचं काम चालू ठेवा "! इति मालती पांडे - बर्वे …

    पुण्यातील नारायण पेठेतील कन्याशाळेच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम २७ ऑगस्ट रोजी झाला होता ! कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची होती, मालतीबाई साडेतीन वाजताच हजर ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचपदीने सुरुवात झाली, थोडा वेळ होताच, मालतीबाई मला म्हणाल्या, "चिंचोरे, मी तुम्हाला आधी नाही म्हणले खरं, पण काळी पाचचा तंबोरा मिळेल कां ? मीही म्हणीन काही…। "

    मी पटकन उठलो आणि कन्याशाळे समोरच्याच वाड्यात दुस-या मजल्यावरील एका घरात गेलो, तिथं पिता-पुत्रीचा गाण्याचा रियाज सुरु होता. मला बघून, गात असलेली ती सुकन्या आणि तिचे गुरु म्हणाले, "या, या चिंचोरे सर". मी त्यांना सांगितले, "अहो, समोर कन्याशाळेच्या हॉलमध्ये चक्क मालतीबाई पांडे आल्यात, त्या काळी पाचचा तंबोरा मागतायत", … माझं बोलणं संपत न संपत तोच ते गानगुरू म्हणाले, "अरे वा, हा तर खूपच चांगला योग चालून आलाय, चला लगेच, आम्ही दोघंही त्यांच्या साथीला बसतो", असं म्हणून दोन तंबो-यांसह ते दोघेही माझ्याबरोबर कार्यक्रमस्थळी आले. मालतीबाई त्यांना बघताच म्हणाल्या, "कर्वे साहेब काय छान योग जुळून आलाय"… होय, ते गानगुरु होते, आकाशवाणीचे ए ग्रेड कलावंत पंडित मोहनबुवा कर्वे आणि त्यांची सुकन्या म्हणजे मंजिरी कर्वे होय, आत्ताची मंजिरी कर्वे - आलेगावकर ! झालं, कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगविला तो मालतीबाईंनी, कर्वेबुवा आणि मंजिरीच्या साथीने ! इथं अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो, तो म्हणजे, माझ्या आपुलकीच्या स्वभावामुळे मालतीबाईंनी कार्यक्रमाचे मानधन घेतले नव्हते !

    एरवीही मी त्यांच्याकडे जाऊ लागलो, माझ्या छंदाबद्दल त्या उत्सुकतेने बोलत असत. गप्पांच्या ओघात, एकदा त्या म्हणाल्या, "मालती-माधव" चित्रपटातील रेकॉर्डिंगसाठी लताबाई पुण्यात प्रभात कंपनीत आल्या होत्या, तेव्हां आमची ओळख झाली होती, आतामध्ये खूप गॅप पडली, त्या खूप मोठ्या आहेत, आता ओळखणारही नाहीत"… मालतीबाईंचं बोलणं मध्येच थांबवत मी म्हणालो, " नाही, मालतीबाई, दीदींची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे, त्या अजूनही तुम्ही समोर गेल्यावर तपशीलवार आठवण सांगतील". त्यावर मालतीबाई म्हणाल्या, "अहो चिंचोरे, कसं शक्यय ?"

    चोवीस एप्रिल १९८७ ह्या दिवसाची एक आठवण मुद्दाम सांगतो, ऐका, मास्टर दीनानांथांची पुण्यतिथी त्या दिवशी, पुण्यातील सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर संपन्न झाली होती. प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा पहिल्या सत्रात झाला तर दुस-यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम होता. पहिलं सत्र संपलं आणि पुढच्याची तयारी सुरु होती, त्या मधल्या वेळात, मी चटकन, श्रोतृवृंदामध्ये मालतीबाई जिथं बसल्या होत्या तिथं गेलो अन् त्यांना म्हणालो, "चला मालतीबाई, दीदींना भेटा", त्या म्हणाल्या "अहो नको, त्या ओळखणार नाहीत, खूप वर्ष झाली," चला, चला लवकर, पुढचा कार्यक्रम सुरु होण्याआधी भेटा". झालं मालतीबाईंना घेऊन, मी लतादीदी जिथं बसल्या होत्या, तिथं आलो, मी दीदींना म्हणालो, "दीदी, बघा तुम्हांला भेटायला कोण आलंय"? दिदींनी डावीकडे मागे वळून पाहिलं मात्र आणि पटकन म्हणाल्या, " वा वा मालतीबाई या या," असं म्हणून त्यांनी मालतीबाईंना आपल्याशेजारी बसवलं अन् पुढं बोलू लागल्या, "आपण खूप वर्षांनी भेटत आहोत, आपण प्रभात फिल्म कंपनीच्या, मालतीमाधवच्या रेकॉर्डिंगला भेटलो होतो, इतकंच काय, मी मुंबईला जाण्यापूर्वी तुमच्या रूमवर आले होते, आपण कॉफी घेतली होती …।" दीदी जुन्या आठवणीत रमल्या होत्या, बोलत होत्या आणि मालतीबाई आश्चर्यचकित होऊन ऐकत होत्या… "अहो, तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे," मालतीबाई उत्तरल्या…

    दुस-या दिवशी सकाळीच मालतीबाईंचा आनंदाने मला फोन आला, म्हणाल्या, "कालचा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही"।

    मालतीबाईंच्या प्रत्येक जन्मदिवसाला - एकोणीस एप्रिलला शुभेच्छा देणारा फोन मी करायचो ! मात्र, २७ डिसेंबर १९९७ नंतर तसा फोन करण्याची संधी नियतीने हिरावून घेतली होती. नंतर एकोणीस एप्रिलला मालतीबाईंची "जयंती" असं म्हणू लागलो. दिवस गेले, वर्षही गेली, तरीही त्यांच्याच गाण्याच्या ओळीत म्हणावसं वाटतं 'सुगंध त्याचा लपेल कां "? …।

    -- उपेंद्र चिंचोरे

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 19, 2017


  • प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश रोशन

    संगीतकार रोशन यांचा पुत्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांची ही ओळख. घरात संगीताचे वातावरण. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. पुढे विनोदवीर मेहमूद यांनी राजेश यांना ‘कुंवारा बाप’ मध्ये संधी दिली. त्यांचा जन्म २४ मे १९५५ रोजी झाला. स्वतंत्र संगीतकार म्हणून राजेश यांचा हा पहिलाच चित्रपट. यातील गाणी चांगलीच गाजली. यातले ‘आ री निंदिया आ’ हे गीत आजही रसिकप्रिय आहे. त्यानंतर आलेल्या ‘ज्युली ’मध्ये मात्र राजेश रोशन यांनी कमाल केली. यातले ‘भूल गया सब कुछ, याद नहीं अब कु छ ’ हे किशोर-लताचे गाणे आजही भान हरवायला लावते, तर ‘माय हार्ट इज बीटिंग’ ऐेकल्यानंतर मन प्रसन्न होते. रसिकांचा ‘मूड’ एकदम फ्रेश करणारे संगीत हा राजेश रोशन यांचा विशेष पैलू. एक रास्ता है जिंदगी (काला पत्थर ), परदेसिया (मि. नटवरलाल ), अंग्रेजी में कहते हैं कि (खुद्दार), सारा जमाना (याराना ), बाहें तेरी खुशबू के (काला पत्थर), तुज संग प्रीत लगाई (कामचोर), दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है (आखिर क्यों ), घर से निकलते ही (पापा कहते हैं ), जाती हूं मैं (करन अर्जुन ), हंसते हंसते (खून भरी मांग ), कहो ना प्यार है ही त्यांच्या प्रसन्न शैलीतील गाण्यांची काही उदाहरणे.

    गायकाच्या प्रतिभेचा समर्पक वापर करण्यात राजेश रोशन नेहमीच यशस्वी ठरले आहेत. ‘दो और दो पांच’ मध्ये किशोरकुमार यांच्या आवाजातील ‘तूने अभी देखा नहीं’ हे गाणे राजेश रोशन यांच्या संगीतप्रतिभेची चुणूक दाखवणारे आहे. ‘खेल’मध्ये आशा भोसले यांच्याकडून ‘इडली डू’ हे कॅब्रे साँग आणि तेच गाणे भजन स्वरूपात गाऊन घेण्याचा अफलातून प्रयोग केवळ राजेश रोशनच करू जाणे. ‘इन्कार’ मधले त्यांचे ‘मुंगडा मुंगडा’ हे कॅब्रे साँगही असेच आपल्याला रिफ्रेश करणारे, ठेका धरायला लावणारे. ‘लूटमार’ मधले आशातार्इंच्या आवाजातले ‘जब छाये मेरा जादू’ हे गाणेही असेच. ‘कामचोर’ मधल्या त्यांच्या संगीताने नटलेल्या ‘तुमसे बढकर दुनिया में’ या गाण्यातला गोडवा तर मधाहून मधुर. ‘दूसरा आदमी’ मधल्या ‘चल कहीं दूर’ या साडेसहा मिनिटांच्या गाण्यात लता- किशोर- रफीच्या आवाजाचा वापर एकदम कर्णमधुर. ‘याराना’ मधल्या ‘भोले ओ भोले’ मधला निरागसपणा त्यांच्या संगीताने अधिकच खुलतो, तर ‘छूकर मेरे मन को’ मधला भाव मनाला चांगलाच भावतो. ‘खट्टा मीठा’ मधले ‘थोडा है थोडे की जरूरत है’ असेच काळजाला भिडणारे. ‘जुर्म’ मधले ‘जब कोई बात’ हे गाणेही मनाला वेगळा आधार देणारे. ‘खेल’ मधल्या ‘खत लिखना है’ गाण्यातून तिची आणि त्याची अगतिकता राजेश रोशनच्या संगीतामुळे आपल्यालाही अगतिक करते. बासरी, तबला, दिलरुबा, सारंगी, बोंगो, कोंगो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन आदी वाद्यांचा उत्कृष्ट मेळ, त्यातून निर्माण होणारी उत्तम सुरावट, सहज ओठावर येतील अशा चाली, पार्श्वगायकांच्या आवाजाचा योग्य वापर ही राजेश रोशन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये. अलीकडच्या काळात कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश आणि काइट्स या चित्रपटांतील संगीताने तरुणाईची मने जिंकणारा राजेश रोशन हा एक विरळाच संगीतकार. काळानुरूप परंतु अभिरुचिपूर्ण, सातत्याने फ्रेश करणारे संगीत देण्यात राजेश रोशन यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    राजेश रोशन यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=rU0PCK5mFbU

      May 24, 2017


  • महान पार्श्वगायक मुकेश

    मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर. त्यांचा जन्म २२ जुलै १९२३ रोजी झाला. १९४१ साली ‘निर्दोष’ या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलेल्या मा. मुकेश यांनी खऱ्या अर्थाने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५ पासून ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून. हे लोकांना खुप आवडले आणी मुकेश रातोरात स्टार झाले त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही. त्यांच्या आयुष्यातील एक टर्नींग पॉइंट म्हणजे त्यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट. आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अशा बोटावर मोजता येणार्याद गायकांमध्ये मुकेश यांचा क्रम वरचा आहे. त्यांची गाणी आजही आवडीने ऐकली जातात, गुणगुणली जातात.

    आवारा, श्री ४२० चित्रपटातील गाण्यांचा जगभर बोलबाला झाला. आजही परदेशी लोक ‘आवारा हूँ’ असे म्हणून अभिवादन करतात. मुकेश यांच्या आवाजात दु:ख व्यक्त करण्याचा नैसर्गिक असा, त्यावर फुंकर घालण्याचा, गाण्यातून दु:ख विसरण्याचा भाव आहे. त्याला तोड नाही. जवळपास सर्व संगीतकारांनी, अभिनेत्यांनी त्यांचा आवाज वापरला होता. दिलीपकुमार, देवआनंद यांनीही सुरुवातीला त्यांचा आवाज घेतला आहे. ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मुकेश यांनी प्रथम पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी ! आग, आवारा, श्री 420, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच होती. प्रख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी सांगितले आहे की, उर्दूचे निर्दोष उच्चारण मुकेश यांच्याएवढे दुसरे कोणाचेही नाही.

    ‘संगीतसम्राट तानसेन’ शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट असूनदेखील ‘झुमती चली हवा’ हे गाणे मुकेश यांना दिल्याबद्दल संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की, या गाण्यातील भावना समर्थपणे व्यक्त करणारा दुसरा कोणीही गायक नाही. हिंडोल रागातील हे नितांतसुंदर गीत आहे. मन्ना डे एकदा बोलताना म्हणाले होते की, मुकेश यांच्या गाण्यातील सहजता आम्हा कोणातही नाही. त्यांना सूर व भाव अतिशय लवकर पकडता येतात. निर्माता म्हणून त्यांनी मल्हार, आक्रमण या सिनेमांची निर्मिती केली. त्यांनी दुख-सुख, आदाब अर्ज, माशूका, आह, आक्रमण, दुल्हन यांसारख्या सिनेमातून अभिनेता म्हणून कामही केले.पण ते या अभिनेता म्हणून काही विशेष चमक दाखवू शकले नाही. त्यानी अभिनायासाठी काही काळ गायन ही बाजूला ठेवले होते पण योग्य वेळीच ते सावरले आणि पुन्हा गायनावर लक्ष केन्द्रित केले. त्यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्वगायन केले. त्यांना चार वेळा फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ पा‌र्श्वगायक हा पुरस्कार मिळाला. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा मधील गाणे ‘कई बार यू हीं देखा…’ साठी मुकेश यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.

    मुकेश यांचे २७ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

    मुकेश यांची काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=Ks0k3YQRu90

      August 27, 2017


  • समाजसेविका अनुताई वाघ

    अनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर ‘ सुराज्य ‘ निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली .

      September 10, 2021


  • सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे

    स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.

      November 9, 2021


  • हिंदी,मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण पार्श्वगायिका श्रेया घोषाल मुखोपाध्याय

    घोषाल कुटुंब फाळणीनंतर पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालं. हे एक हुशार कुटुंब. श्रेयाचे वडील बिश्वजीत घोषाल मुखोपाध्याय हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. बंगालमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोघे उत्साहाने सहभागी व्हायचे. या अशा कार्यक्रमांमध्ये श्रेयाची आई गाणं म्हणायच्या. चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिचा जन्म १२ मार्च १९८४ रोजी झाला. या गाण्यांचा सराव करताना बाल श्रेया आईचं गाणं ऐकून तेच गाणं आपल्या बोबड्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करायची. इथेच श्रेयाच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. तिची आई हाच तिचा पहिला गुरु. चार वर्षांची असताना श्रेयाने आईला हार्मोनियमवर साथ करायला सुरुवात केली. अशा रितीने श्रेयाचं संगीत शिक्षण अगदी लहान वयातच सुरु झालं. संगीत तर तिच्या रक्तातच होतं पण योग्य वेळी योग्य गुरु तिला लाभले आणि तिच्या अंगभूत कलेला चांगली चालना मिळाली. एकीकडे एक बाल गायिका घडत असताना तिने तिच्या शालेय शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. अगदी लहान वयापासून व्यासपीठावर गाणी म्हणत म्हणत गाण्यांच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत घेत श्रेयाने सारेगम या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेमुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं. संजय लीला भन्साळी देवदास सिनेमा बनवत होते. इस्माईल दरबार यांनी गाण्यांच्या गायिकाही नक्की केल्या होत्या. ऐश्वर्याच्या गाण्यांसाठी मा.लताबाईंचं नाव नक्की झालं होतं. बैरी पिया हे गाणं, त्या गाण्यातले चढ उतार फक्त दिदीच म्हणू शकतात आणि ऐश्वर्याची गाणी ही देखील टिपीकल दिदींचीच गाणी असल्याने लताबाईंची निवड नक्की होती. १९९९ साली श्रेया घोषाल सारेगम या स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. असंच एकदा सारेगम बघत असताना श्रेयाचा आवाज संजय भन्साळीच्या आईने ऐकला आणि तिने लगेच आपल्या मुलाला बोलावलं आणि तिचा आवाज ऐकायला सांगितला. आणि इथेच त्याला पारोचा आवाज मिळाला. तिच्या आवाजातला निरागसपणा त्याला फार आवडला आणि पारोसाठी असाच निरागस आवाज हवा म्हणत त्याने पारोसाठी श्रेयाला घेण्याचं नक्की केलं. सारेगमची महाअंतिम फेरी श्रेया जिंकली. परिक्षक म्हणून भारतीय संगीतातली दिग्गज मंडळी होती. श्रेया घोषालने सगळ्यांची मनं जिंकली. त्या परिक्षकांमध्ये एक होते संगीतकार मा.कल्याणजी. मुंबईतले तिचे पहिले गुरु कल्याणजीच. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण गुजराथ मधील कोट्यातील मा.महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले. मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले. श्रेयाने सा रे ग म ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार व आर. डी बर्मन पुरस्कार मिळाले. त्यांनी तिच्या आवाजात देवदास हिंदी चित्रपटांसाठीचं पहिलं 'बैरी पिया' हे गाणं ध्वनिमुद्रित केलं. देवदासच्या गाण्यांसाठी कुठलाही सराव तिने केला नाही कारण स्टुडिओतही ती अभ्यासच करायची. तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व सात दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    श्रेयाची मराठी गाणी

    https://www.youtube.com/shared?ci=vlRQDsSbk50

    https://www.youtube.com/shared?ci=awbXe_lwtI8

    https://www.youtube.com/shared?ci=AVYU6MSAlQI

      March 12, 2017


  • ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव

    आज १ नोव्हेंबर... ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला.

    यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

    यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले.

    आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

    यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. मा.यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला मा.यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे मा.यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. मा देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.

    एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.

    या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. 'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. यशवंत देव यांना मराठीसृष्टी तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 1, 2016


  • सुलोचना चव्हाण

    सुलोचना चव्हाण यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात लावणीचा जागर सतत होत राहिला. ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘देव माझा मल्हारी’ अशा कितीतरी लावण्या रसिकांच्या ओठांवर सतत तरळत होत्या.

      August 5, 2017


  • थोर संत गाडगे महाराज

    अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

      December 20, 2021


  • श्रीकांत वामन नेर्लेकर

    ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य संमेलनात सहभाग. व्यास क्रिएशन्स संस्थेचे मार्गदर्शक.

      November 17, 2015