जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
‘श्रावणात घननिळा बरसला’ या गाण्यातील गोडवा अथवा ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीये’ या गाण्यातील ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचे कसब लाभलेले अनिल मोहिले यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच १९६० च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीतसंयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली. तेथेच त्यांच्या आयुष्यातील नवे लक्ष्य मिळाले आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतले. नोटेशन वाचून वाजवणं हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले. आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धूनांनी भरणं यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळाले. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती. वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचा ‘गंमत जंमत’ या मुलांच्या कार्यक्रमात एकल तबलावादनाचा कार्यक्रम सादर झाला होता.
जलतरंग, बुलबुलतरंग, व्हायोलिन, मेण्डोलिन यासारख्या वाद्यांवर कमालीचे प्रभुत्व असणाऱ्या मोहिले यांनी सुमारे ४० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत सचिनदेव बर्मन, खय्याम, कल्याणजी-आनंदजी, भप्पी लाहिरी यासारख्या अनेक संगीतकारासोबत त्यांनी संगीत संयोजक तसेच सहाय्यक संगीतकाराची भूमिका पार पाडली. त्यांच्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. ८६ हिंदी चित्रपटांचे त्यांनी संयोजन केले आहे. जवळपास ७० हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केले. लता मंगेशकर यांच्या देश-विदेशातील सर्व संगीत मैफलींमधील संगीत संयोजनाची जबाबदारी मोहिले यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. इंडस्ट्रीत माझं स्थान पक्कं करण्यात लतादीदींची बहुमोल मदत झाली. किंबहुना त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आजतागायत घट्ट पाय रोवून आहे, असे अनिल मोहिले नेहमी म्हणायचे.
अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडीने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आहेत.त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. मंगेशकर कुटुंबीयांचा उजवा हात अशी त्यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन २००३ पासून मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिलेंकडे पाहिले जात होते. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरु केला होता. त्यातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. थोडीसी बेवफाई, कयामत से कयामत, लेकिन, शराबी, डॉन, अभिमान यांसह ८६ हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजन त्यांनी केले होते. शुभमंगल सावधान, दे दणादण, थरथराट यांसह अनेक मराठी चित्रपटांचेही संगीत नियोजक तेच होते. अनिल मोहिले यांचे निधन १ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी झाला. नवनीत कौर या मूळच्या पंजाबी. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नवनीत राणा यांचे शिक्षण मुंबईत झालेले आहे. आधी मॉडेलिंग नंतर म्युझिक अल्बम आणि नंतर चित्रपट सृष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. नवनीत कौर राणा यांनी तेलगू , कन्नड आणि पंजाबी चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपला ठसा उंटावताना अनेक ब्लॉक बस्टर हिट दिलेले आहेत. नवनीत कौर यांनी कन्नड़ चित्रपट दर्शन ने आपले करीयरची सूरवात केली. त्यांनी तेलुगु चित्रपट सीनू, वसंथी व लक्ष्मी, चेतना, जग्पथी, गुड बॉय, भूमा मध्ये अभिनय केला आहे.
नवनीत कौर यांनी मल्याळम चित्रपट लव इन सिंगापुर व पंजाबीतील लड़ गए पेंच मध्ये अभिनय केला आहे. नवनीत कौर २०११ मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी अमरावती येथे विवाहबद्ध झाल्या. त्यांचा विवाहदेखील गाजला कारण त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केले. आमदार रवी राणा यांनी तीन हजार जोडप्यांसमवेत आपले लग्न केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याचा विवाह गिनीज बुकातदेखील नोंदवला गेलेला आहे. सातत्याने प्रकाशझोतात राहण्यासाठी भव्य सोहळे आयोजित करण्याची आमदार राणा यांची परंपरा राहिली आहे.
नवनित कौर राणा या चित्रपट तारका असल्याने त्यांच्या दहीहंडीच्या सोहळ्यात दरवर्षी बॉलीवुड स्टारची हजेरी असंते. नवनीत कौर यांचे पती आमदार रवि राणा गेल्या दहा वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत कौर राणा यांनी निवडणूक लढविली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बाळकृष्ण प्रधान आणि दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी यांचे नाते अतूट असे होते. इतके की प्रधान सर म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीचा चालता बोलता इतिहासच होते.
२९ मार्च १९१८ रोजी जन्मलेल्या प्रधानांचे प्राथमिक शिक्षण जुन्या जंजिरा संस्थानातील बोरली पंचायतन इथे, तर माध्यमिक शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वयाच्या १९ व्या वर्षी ते मॅट्रिक, तर १९४१ सालात राम नारायण लोहिया कॉलेजातून बी.एससी. झाले.
सुरुवातीचा काही काळ त्यांनी इंडिया युनायटेड मिल आणि दिल्ली केमिकल क्लॉथमध्ये केमिस्ट म्हणून काम केले. परंतु त्यांचा स्वाभाविक ओढा शिक्षणक्षेत्राकडे होता. त्यामुळे १९४८ सालापासून त्यांनी अध्यापनाचे काम केले.
विज्ञान आणि गणित हे विषय ते अतिशय तळमळीने शिकवित असत. वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. बहुआयामी व्यकिमत्त्व असलेले प्रधान सर हाडाचे शिक्षक होते. तळमळीने आपला विषय शिकविणे हा त्यांचा सहजस्वभाव होता. विज्ञान आणि गणित यांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी धडपडणार्या प्रधान सरांनी अखिल भारतीय शिक्षण परिषदांमध्ये एक तपाहून अधिक काळ सक्रिय सहभाग घेतला. तर १९५० ते १९६५ या काळात त्यांनी 'एज्युकेशन फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग' या विषयावरील चर्चासत्रांमध्ये सातत्याने भाग घेतला.
एस.एस.सी. मंडळाच्या विभागीय आणि राज्यस्तरावरील अभ्यासक्रम समितीतही त्यांनी काम केले. १९७२ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात विज्ञान व गणित या विषायांच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारक बदल सुचविण्यात आले. त्यावेळेस गणिताच्या अभ्यासक्रमातील बदलांच्या संकल्पना प्रधान सरांनी उचलून धरल्या आणि त्याबाबतच्या चर्चांमध्येही त्यांनी भाग घेतला. शालेय पातळीवरील विज्ञान-गणित या विषयांतील बदल हे बदलत्या काळानुरूप होत आहेत आणि त्याच्या तपशिलाबाबत मतभेद असले तरी तत्त्व म्हणून आपण ते बदल स्वीकारले पाहिजेत, असे प्रधान सरांचे म्हणणे होते. आपली ही मते त्यांनी १९७६ साली झालेल्या 'नॅशनल फोरम ऑफ टिचर सेमिनार ऑन प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन' या विषयावरील सेमिनारमध्ये मांडली.
त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांच्या शिक्षणसेवेचे कौतुक करण्यात आले. 'निर्मळ बुद्धीत ओलावा असतो आणि निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो' असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणार्या प्रधान सरांनी तत्त्वनिष्ठ आणि शाश्वत मूल्यांची आयुष्यभर जोपासना केली. असा हा शिक्षणव्रती १९ जानेवारीला काळाच्या पडद्याआड गेला आणि शिक्षणक्षेत्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व हरपले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असतांना त्यांनी मिलीटरी अकौंटस् मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता.
बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. अप्पाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीण या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.
अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविले गेले. मा.शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. जावई विकत घेणे मधील म्हातार्याच्या भूमिकेचे आणि एकटीतील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. शरद तळवलकर हे १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. शरद तळवलकर यांचे निधन २१ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्णसत्य आहे. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. आजही त्यांचे घर वाडा-फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यावर तेथेच स्थानिक झाले.
बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले.
कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात दोन वर्षे दौरा करून त्यांनी मैफलींमध्ये सादरीकरण केले. यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलविण्यासाठी केला. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक व संगीतकार म्हणून ओळख झाली.
एचएमव्ही सोबत १९४१ मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील गीते त्या काळात खूपच गाजल्याने सुधीर फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली. स्वत: गायक, गीतकार असल्याने पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून १९४६ मध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी २९ मे १९४९ ला त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वत:च्या लग्नात मंगलाष्टके म्हटल्याचे सांगितले जाते.
कवी न. ना. देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून ‘सुधीर’ असे नामकरण केले. मा.सुधीर फडके यांनी सुमारे ११० चित्रपटांना तर सुमारे २० हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीते, भक्तिगीते आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले आहे.
बाल गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे अशा अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसविले आहे.
गायक-संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले मा.सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वीह ठरले होते. हिंदी चित्रपटातील भाभी की चूडिया या चित्रपटाचे 'ज्योती कलश छलके' हे पहाटगाणं आजही रसिकमनाचा ठाव घेते. पहली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेले 'खुश है जमाना आज पहली तारीख है' हे गीत रेडियो सिलोनवरून आजही पहिल्या तारखेला वाजत आहे.
संगीतकार खय्यामही त्यांच्या संगीताच्या मधुरतेने प्रभावित झाले होते. पण महाराष्ट्राच्या घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते 'गदिमां'च्या गीत रामायणामुळे. या रामायणातील ५६ गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत-रामायणाचे देश-विदेशात १८०० हून अधिक कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्या काळी ठरला होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले होते.
स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा ‘वीर सावरकर’ चित्रपट बनविण्यासाठी त्यांनी कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून निधी गोळा केला होता. त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात स्वामी हरिदास सन्मान, सूरसिंगार सांसद पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारांचा समावेश आहे.
अमेरिकेतील ‘इंडिया हेरीटेज फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. ‘हा माझा मार्ग एकला’ या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक १९६३ मध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले. तर १९९१ साली राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय ‘दिनानाथ संगीत पुरस्कार’ व राज्यशासनाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ व ‘सह्याद्री स्वररत्न पुरस्कार’ त्यांना लाभले.
सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
देसाई, केतकी
‘मूळची पुण्याची’ ही केतकी देसाईची ओळख मराठीजनांना सुखावणारी जरूर आहे, पण केतकीने आपले विश्वनागरिकत्व सिद्ध केले आहे.. किंबहुना त्यामुळेच तिचे कौतुक. रवांडासारख्या मागास आफ्रिकी देशात ‘वन लॅपटॉप पर चाइल्ड’ (ओएलपीसी) सारख्या - विद्यार्थ्यांना परवडणारे लॅपटॉप उपलब्ध करून देणाऱ्या योजनेला मर्यादितच यश का मिळते आणि हे यश वाढवून, जगभरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ कसा मिळेल, याचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी केतकीसह तिच्या तिघा सहपाठय़ांनी उत्तमपणे पार पाडली आहे आणि यावर ‘हल्ट ग्लोबल केस चॅलेंज’च्या पुरस्काराची मोहोरही उमटली आहे. केतकी ही कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘हाइन्झ कॉलेज’मध्ये सार्वजनिक धोरण-व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट) शिकते आहे. जग बदलण्याचा आटापिटा स्वत: करू नका.. बदलांमध्ये अनेकांचा वाटा असतो, त्यापैकी योग्य वाटेकऱ्यांची सांगड घालून देणे हे काम अधिक महत्त्वाचे माना’ हा संस्कार या अभ्यासक्रमामुळेच केतकीवर झाला आणि हे आपल्याला कितपत करता येईल या विचारातूनच आपण कॉलेजतर्फे या जागतिक महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी झालो, असे तिने म्हटले आहे.
पथकामध्ये चौघेजण असल्याने मतभेदांना वाव भरपूर होता. पण निर्णय म्हणजे मतभेदांचे व्यवस्थापन, हे एकदा ओळखले की प्रश्न सुटतात, असा केतकीचा विश्वास आहे. केतकीचे नेतृत्वगुण यापूर्वीही सिद्ध झाले आहेत. अमेरिकेतून जगभर पोहोतच असलेल्या ‘टेड’ या विचारविनिमय चळवळीचे कार्नेजी मेलन विद्यापीठातील केंद्र केतकीच्या अध्यक्षतेखाली चालते. ‘नेटवर्क ऑफ इंडियन प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेच्या पीट्सबर्ग शाखेची ती सह-अध्यक्ष होती. वैद्यक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांची सांगड घालण्याचे आव्हान असलेले तीन प्रकल्प तिने यापूर्वी पूर्ण केले आहेत. यानंतर, जगभरातील मुलांचे शिक्षणाचे प्रश्न कोणते हे आधी समजून घेऊन मग ‘ओएलपीसी’सारख्या योजनांच्या यशापयशाचा मार्ग कसा आहे व कसा असायला हवा हे ठरवण्याच्या स्पर्धेत आपण उतरायचे आहे, हे केतकीने ओळखले आणि तिथे तिचे विश्वनागरिकत्व झळाळले!
अणुऊर्जा निर्मिती ही कोणत्याही देशातील शास्त्रज्ञांसमोर एक फार मोठे आव्हान असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या देशातील डॉ. अनिल काकोडकरांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी असाधारण अशीच म्हणावी लागेल.
‘शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.
Copyright © 2025 | Marathisrushti